Tuesday, April 16, 2024

लोकशाहीत विरोधी पक्षाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका


संसदीय लोकशाहीत जनतेच्या बहुमताच्या कौलाने सरकार बनले की त्याला विना अडथळा काम करु दिले पाहिजे, विरोधकांनी अडचणी निर्माण करता कामा नयेत असा काहींचा समज असतो. हा समज बाळबोध असतो. सरकारी पक्ष तो जाणीवपूर्वक तयारही करत असतो. स्वतःच्या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी आम्हाला खूप काही करायचे आहे, पण विरोधक करु देत नाहीत असा बहाणाही तो करतो. मते जनतेची घेतली असली तरी अन्य कोणा धनपतींच्या हिताची धोरणे राबवायची असली की असाच पवित्रा सत्ताधारी घेत असतात.

ही फसगत व्हायची नसेल तर एक साधी बाब लक्षात घ्यायला हवी. जनता ही अंतिम सत्ताधारी असे आपण लोकशाहीत मानतो. ही जनता कोणा एकाला शत प्रतिशत मत देत नाही. निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांत तिची मते विभागली जातात. त्यातल्या ज्याला इतरांच्या तुलनेत एक मत जरी अधिक पडले तरी तो निवडून येतो. याला ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’ पद्धत असे म्हणतात. इतरांना त्याच्यापेक्षा कमी मते मिळाल्याने केवळ ३० टक्के मते मिळाली तरी या पद्धतीत उमेदवार विजयी होतो. इथे ७० टक्के मते वास्तविक त्याच्या विरोधात आहेत. ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणून देशाची घडण करणाऱ्या, देशाचे भाग्यविधाते असलेल्या या ७० टक्के लोकांना मग काही किंमत आहे की नाही? दुसरे म्हणजे, जे निवडून येतात त्यांच्यात ज्या पक्ष वा गटाचे प्रतिनिधी बहुसंख्य असतात ते सरकार बनवतात. अशावेळी जनतेनेच निवडून दिलेल्यांपैकी जे प्रतिनिधी विरोधात बसतात, त्यांच्या मताला, पर्यायाने त्यांना निवडून दिलेल्या जनतेला काही महत्व आहे की नाही?

हो. हे महत्व असते. खूप महत्व असते. म्हणून तर एखादा कायदा बनायचा असतो त्यावेळी ज्यांच्याविषयी तो कायदा बनवायचा असतो, त्यांच्याशी विचारविनिमय करुन विधेयक बनवायचे असते. हे विधेयक सभागृहात मांडल्यावर सर्व लोकप्रतिधींना त्यावर अभ्यास करुन मत मांडण्यासाठी काही दिवसांचा अवकाश द्यायचा असतो. नंतर त्यावर चर्चा, सहमतीचा प्रयत्न करायचा असतो. ही सहमती नाही झाली तर सभागृहातील बलाबलनिहाय प्रतिनिधींची संयुक्त चिकित्सा समिती बनवून तिच्याकडे हे विधेयक सोपवले जाते. या समितीच्या अहवालानंतर पुन्हा सभागृहात चर्चा व मग मतदान होते. बहुमतवाल्या पक्षाचे सरकार असल्याने सरकारी पक्ष या मतदानात विजयी होणार हे उघड आहे. पण हे प्रारंभीच न करता, हा वेळखाऊ उपद्व्याप का केला जातो? ...तर तो कायदा जनतेचा बनण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची सहमती घ्यायची असते म्हणून.

हल्ली हे घडत नाही. सरकार सकाळी विधेयक मांडते आणि तात्काळ आपल्या बहुमताच्या जोरावर ते मंजूर करते; म्हणून आपल्याला या सहमतीचे महत्व कळत नाही. वास्तविक, ही संसदीय लोकशाहीची हत्या आहे. आपण एकाधिकारशाहीच्या दिशेने प्रवास करत आहोत. पण याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. कारण त्यामागची आपल्या राष्ट्रनिर्मात्यांची, घटनाकारांची भूमिका आपल्याला कळलेली नसते. संसदीय लोकशाही प्रक्रियेचा योग्य समज आपण घेतलेला नसतो. यासाठीच विरोधी पक्षांच्या अवकाशाविषयी आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, हे समजून घेणे उद्बोधक ठरेल.

लोकशाहीत जनता सजग व सक्रिय हवी. प्रचारातून एकच बाजू समजते. विविध बाजू समजणे म्हणजे शिक्षण. जनतेचे असे शिक्षण झाले तर जनता जाणतेपणाने सरकारी निर्णयप्रक्रियेवर आपला प्रभाव टाकेल, ही बाब नोंदवून बाबासाहेब पुढे लिहितात – ‘प्रचार म्हणजे कोणत्याही गोष्टीची एक बाजू होय. लोक शिक्षणावर आधारलेले सरकार म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची सांगोपांग छाननी करुन कारभार करणारे सरकार होय. ज्या प्रश्नावर कायदेमंडळांना निर्णय घ्यायचा असतो, त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू लोकांपुढे जाणे जरुर आहे. त्यासाठी ओघानेच दोन पक्षांची आवश्यकता असते. एकच पक्ष दोन्ही बाजू निसर्गतःच मांडू शकत नाही. एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकूमशाही होय. हुकूमशाही टाळण्यासाठी दुसरा पक्ष जरुरीचा आहे. ही मूलभूत बाब आहे.’

एकाधिकारशाहीकडे जायचे नसेल तर चुकीच्या बाबींवर आक्षेप घेणारा विरोधी पक्ष जरुरीचा आहे, ही बाब नोंदवताना बाबासाहेब म्हणतात – ‘...ज्यावेळी एकच पक्ष असतो त्यावेळी कोणताही अधिकारी मंत्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या राजकीय नेत्याच्या मर्जीप्रमाणे वागणारा प्राणी बनतो. मंत्र्यांचे अस्तित्व मतदारांवर अवलंबून असते. मतदारांना खूष ठेवण्यासाठी पुष्कळवेळा मंत्रिमहाशयांकडून चुकीचा असा कारभार अधिकाऱ्यांकडून करवून घेतला जातो. विरोधी पक्ष असला तर तो मंत्र्यांची ही चुकीची कृत्ये उघडकीस आणू शकेल. त्यामुळे अशा गोष्टींना पायबंद बसेल.’

लोकशाहीचे महत्वाचे अंग म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्याच्या रक्षणासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता बाबासाहेब पुढील प्रमाणे नमूद करतात – ‘विरोधी पक्ष असतो त्यावेळी भाषण स्वातंत्र्य व आचार स्वातंत्र्य यांचा लाभ होतो. विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचे हे मूलभूत अधिकार धोक्यात येतात. कारण मग यांची पायमल्ली करणाऱ्या सत्तारुढ पक्षाला कोणी जाब विचारु शकत नाही.’

सरकारवर टीका केल्याच्या साध्या साध्या बाबींवरुन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटून त्यांना कारागृहात विनाचौकशी, विनाखटला सडवले जाते. ज्या विरोधी पक्षाने अशा सामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आवाज उठवायचा त्या विरोधी पक्षाची निवडणुकीच्या तोंडावर बँक खातीच बंद केली जातात. कायदे करताना संसदेतून घाऊकपणे त्यांच्या सदस्यांना निलंबित केले जाते. बाकी नित्याचा कार्यक्रम म्हणून विरोधी नेत्यांमागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आदिंचा ससेमिरा लावून त्यांना एकतर तुरुंगात टाकले जाते किंवा जेरीस आणून आपल्या चरणी रुजू होण्यास भाग पाडले जाते. विरोधी पक्षावर विसंबणाऱ्या बाबासाहेबांनी आजच्या सरकारच्या या बेमुर्वतपणाबद्दल अजिबातच कल्पना केली नसणार.

जगात विरोधी पक्ष या संकल्पनेला किती महत्व दिले जाते, हे काही देशांची उदाहरणे देऊन बाबासाहेब नमूद करतात – ‘जेथे जेथे संसदीय लोकशाही राज्यपद्धती आहे, त्या त्या देशात विरोधी पक्ष ही सरकारमान्य राजकीय संस्था असते. इंग्लंड व कॅनडामध्ये विरोधी पक्ष ही कायद्याने मान्य केलेली संस्था आहे. कायदेमंडळातील कामे बिनधोक पार पाडता यावीत म्हणून विरोधी पक्ष-नेत्याला सरकारी तिजोरीतून पगार दिला जातो.’ आपल्याकडे विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जातो हे जगातील या रीतीशी सुसंगतच आहे.

संसदीय लोकशाहीत पाच वर्षांनी जनता सत्ताधाऱ्यांचा हिशेब करुन मतदान करते. हे पुरेसे नसते. या पाच वर्षांच्या काळात नियमितपणे सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची यंत्रणा म्हणून विरोधी पक्ष गरजेचा असतो. ही बाब बाबासाहेब अधोरेखित करतात. मात्र ती करताना पक्ष पद्धती असावी की नसावी याबद्दलच्या इंग्लंडमधील एका चर्चेचा संदर्भ देऊन ‘सत्तेवरील नियंत्रण’ या संकल्पनेचे सविस्तर विवेचन करतात. ते म्हणतात - 'जे लोक 'पक्ष पद्धती' विरुद्ध आहेत आणि अनुषंगानेच ज्यांना विरोधी पक्षाची आवश्यकता वाटत नाही, त्यांना 'लोकशाही' या बाबीचे संपूर्ण आकलन झालेले नसावे. ...लोकशाहीला 'सत्तेवरील नियंत्रण' (veto of power) असे म्हणता येईल. 'वंशपरंपरागत सत्ता' व सरंजामशाही यांच्या नेमक्या उलट अर्थाचा शब्द म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थ हा की, सत्तारुढ मंडळींच्या अमर्याद सत्तेला कोठे तरी केलेले नियंत्रण. एकाधिकारशाहीत नियंत्रणाला वावच नसतो. एकदा निवडलेला राजा आपल्या 'उपजत व दैवी' अधिकाराने राज्य करतो. दर पाच वर्षांनी त्याला आपल्या प्रजेकडे जाऊन असे म्हणावे लागत नाही की, "का हो, मी चांगला माणूस आहे ना? गेल्या पाच वर्षांतील माझा कारभार तुम्हाला पसंत आहे की नाही? पसंत असेल तर, मला पुन्हा राजा म्हणून निवडाल ना?" राजाच्या सत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसते. परंतु लोकशाहीत आपण अशी व्यवस्था केलेली असते की, ज्यामुळे सत्तारुढ असलेल्या मंडळींना दर पाच वर्षांनी लोकांपुढे जावे लागते. आणि ते सत्तास्थानी राहावयास लायक आहेत की नाही या प्रश्नावर त्यांना लोकांचा कौल घ्यावा लागतो. यालाच मी सत्तेवरील नियंत्रण म्हणतो. परंतु दर पाच वर्षांनी फक्त एकदा लोकमताचा कौल घेण्याच्या आधी मधल्या काळात अनियंत्रित सत्ता वापरण्याच्या ह्या 'पंचवार्षिक' नियंत्रणामुळे खरीखुरी लोकशाही येत नाही. लोकशाहीमध्ये राज्यसत्तेवर लोकमताचे नियंत्रण नुसतेच हवे असे नाही, तर ते तात्काळ व सतत असावयास हवे. लोकसभेत सरकारला तेथल्या तेथे अडविणारे व आव्हान देणारे लोक असावे लागतात. या विवेचनावरुन तुम्हाला दिसून येईल की, कोणालाही अविरतपणे सत्ता गाजविण्याचा अधिकार नाही. परंतु शासनसंस्था ही लोकमतानुवर्ती असावयास हवी आणि तिला अडविणारे, आव्हान देणारे लोक खुद्द सभागृहातच असले पाहिजेत. विरोधी पक्षाचे महत्व यावरुन तुम्हाला कळेल. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे सत्तारुढ सरकारचे ध्येयधोरण तापवून ऐरणीवर ठोकून नीटनेटके करण्याची व्यवस्था असते.’

बाबासाहेबांनी माध्यमे सरकार धार्जिणी कशी बनतात, विरोधी पक्षाच्या टीकेला योग्य स्थान कसे देत नाहीत, याबाबतची खंत नोंदवली आहे. ते म्हणतात- ‘सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणाचे व राज्यकारभाराचे समर्थन आणि त्या पक्षात नसलेल्या लोकांच्या शंकांचे निरसन सततपणे करावे लागते. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुतेक वर्तमानपत्रे, सरकारी जाहिरातीच्या उत्पन्नासाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा, सरकारी पक्षाला उचलून धरतात. विरोधी पक्षाला प्रसिद्धी देत नाहीत. विरोधी पक्षाकडून त्यांना काय मिळणार? सरकारकडून त्यांना जाहिरातीचा पैसा मिळतो आणि मग काय, सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांची प्रतिवृत्ते रकानेच्या रकाने भरुन ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली भाषणे अगदी त्रोटकपणे शेवटच्या पानावर कोठेतरी छापली जातात.’

बाबासाहेबांची ही निरीक्षणे पंच्याहत्तर वर्षांपूर्वीची आहेत. आजची स्थिती पाहता ती काहीच गंभीर वाटणार नाहीत. आज माध्यमांनी याबाबतची अगदी अवनत अवस्था गाठली आहे. अलीकडे तर त्यासाठी ‘गोदी मीडिया’ ही संज्ञाच प्रचलित झालेली आहे.

विरोधासाठी विरोध किंवा संविधानात्मक नैतिकतेला धाब्यावर बसवून सत्तेसाठी वाटेल ते करण्याच्या प्रवृत्तीला अजिबात थारा देता कामा नये, यामुळे चुकीचे मानदंड तयार होतील याबद्दल बाबासाहेब इशारा देतात. त्यासाठी इंग्लंडमधील एक उदाहरणही ते देतात. घटनात्मक संकेताप्रमाणे राजाला पंतप्रधानाचा सल्ला इंग्लंडमध्ये ऐकावा लागतो. अन्यथा पंतप्रधान राजाला घालवू शकतो. एका प्रसंगात हुजूर पक्षाच्या पंतप्रधानांचा एक सल्ला राजाने ऐकता कामा नये व त्या प्रश्नावर पंतप्रधानाचा संसदेत पराभव व्हावा अशी मजूर पक्षाची खेळी व्हावी, असा एक विचार पुढे येतो. हुजूर पक्षातली पंतप्रधानांविषयी नाराज असलेली मंडळीही पाठीशी असतात. तथापि, असा पराभव करणे हे गैर असून ज्यायोगे राजाचे अधिकारक्षेत्र वाढेल अशी वर्तणूक आपण करु नये असा सल्ला विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचेच एक नेते देतात. हा सल्ला ऐकला जातो व प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याची अनैतिक खेळी मजूर पक्षाकडून रद्द केली जाते. या घटनेचे वर्णन करुन ‘..तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकांस मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करत असोत, कैचीत पकडण्याचे प्रसंग संविधानाची व लोकशाहीची हानी होऊ नये म्हणून’ कटाक्षाने टाळण्याचा संदेश बाबासाहेब देतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या महामानवाने संसदीय लोकशाहीच्या यशासाठी विरोधी पक्षाचे हे जे महत्व प्रतिपादिले आहे, त्याप्रमाणे त्यांना रिपब्लिकन पक्ष घडवायचा होता. त्यासाठी त्यांनी एस. एम. जोशी, लोहिया, आचार्य अत्रे आदिंशी संवादही सुरु केला होता. म्हणजेच त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा एकजातीय नव्हता, हे उघड आहे. या पक्षाची जी ध्येय-धोरणे त्यांनी लिहून ठेवली, त्यात संविधानाचे तत्त्वज्ञान असलेली उद्देशिका हेच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय असेल असे त्यांनी नमूद केले आहे. सर्वतऱ्हेच्या संकुचित हितसंबंधांना फाटा देऊन भारतीय जनतेच्या व्यापक हितासाठी झटणारा बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष त्यांच्या हयातीत स्थापन झाला नाही. पक्षाची संकल्पना मांडल्यावर काही काळातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या नंतर त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली खरी. पण या नेत्यांच्या लघुदृष्टीने आणि त्यांना गळाला लावण्यात यशस्वी झालेल्या इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने बाबासाहेबांना अभिप्रेत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना अस्तित्वात येऊ दिली नाही. आजही ही संकल्पना कालबाह्य झालेली नाही. संसदीय लोकशाही कधी नव्हे इतकी धोक्यात आलेली असताना, त्यातल्या विरोधी पक्षाचा आशय संपवून टाकला जात असताना, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभा राहण्याची नितांत गरज आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(प्रजापत्र, बीड, १४ एप्रिल २०२४)

बाबासाहेबांना अभिप्रेत लोकशाही : कुठे हरवली? कोणी पळवली?


जात, धर्म, भाषा, प्रदेश यांची प्रचंड विविधता असलेल्या आपल्या खंडप्राय भारत देशात लोकशाही प्रक्रिया टिकेल का, असा जागतिक पातळीवरील भल्या भल्यांना प्रश्न होता. त्यातल्या कित्येकांना तर विभिन्नतेमुळे हा देश विखंडित होईल याची खात्री वाटत होती. पाकिस्तानच्या फुटीमुळे त्यांच्या या दाव्याला पुष्टी मिळाली. पण वास्तवात तसे झाले नाही. धर्माच्या आधारावर उभा राहिलेला खुद्द पाकिस्तानच फुटला. मात्र विविध धर्मांचे सहअस्तित्व राखून भारत एक राहिला. आपल्या सामाजिक सुधारणांच्या व राजकीय स्वातंत्र्याच्या संग्रामांतून भारताच्या विविधतेला सन्मानाने कवेत घेणारी जी लोकशाही मूल्ये उदयास आली, त्यात या एकतेचे गमक आहे. या मूल्यांच्या विरोधातल्या शक्ती स्वातंत्र्य चळवळीच्या रणधुमाळीत वळचणीला बसल्या होत्या. लोकशाहीवादी म्हणवल्या जाणाऱ्यांच्या व्यवहारातल्या गफलतींचा आधार घेऊन या शक्तींनी देशाचा कारभार आपल्या हाती घेतला आहे. विरोधी आवाज संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा बेमुर्वत वापर आणि त्यांच्या समाजातील पाठिराख्यांकडून सर्वसमावेशकतेची उसवली जाणारी वीण यांमुळे लोकशाहीच्या मूळ पायालाच सुरुंग लागतो आहे. आजवरचा भारत पुढे तसाच राहील याची खात्री राहिलेली नाही. अशा या वळणावर आपल्या लोकशाहीची घडण करणाऱ्यांतले एक प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी नोंदवलेल्या लोकशाहीच्या यशस्वीतेसाठीच्या अटी समजून घेणे उद्बोधक ठरेल.

लोकशाहीच्या यशासाठीची पहिली अट बाबासाहेब नोंदवतात, ती म्हणजे समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे. ते म्हणतात, ‘सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांचे ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यांमध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्यांचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते.’

बाबासाहेब क्रांतीच्या बाजूने होते. पण हिंसात्मक क्रांतीच्या बाजूने नव्हते. खऱ्याखुऱ्या समाजसत्तावादी लोकशाहीसाठी अशी क्रांती अपरिहार्य आहे, असे काहींचे म्हणणे असले, तरी बाबासाहेब संसदीय पद्धतीने रक्तविहिन क्रांती आणू इच्छित होते. त्यांनी लोकशाहीची व्याख्याच तशी केली आहे. ते म्हणतात – ‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय.’

आजवर रुळलेली संसदीय पद्धत आता धोक्यात आली आहे. एकूण विकासक्रमात उपासमार कमी होणे, साधनसुविधा तयार होणे हे बदल घडलेत. पण समाजातील सर्वांच्या वाट्याला संतुलित विकास आलेला नाही. काहींची विकासाची गाडी चुकल्याने ते वंचितच राहिले आहेत. बाबासाहेब म्हणतात ती विषमता, संसाधनांची अन्यायकारक विभागणी प्रचंड वाढली आहे. कोणा उद्योगपतीचे घर २७ माळ्यांचे आणि त्याच्या काही किलोमीटरवर तीन माळ्यांच्या कुडाच्या झोपड्या. शिवाय त्यांना शिक्का अनधिकृततेचा. त्यामुळे कुठल्याही क्षणी त्यांवर बुलडोझर फिरतो.

एकेकाळी विविध आर्थिक स्तरांतील मुले किमान एकाच शाळेत आढळत. आता ऐपतीप्रमाणे शाळा. त्यातून तयार होणारे भावी नागरिक समान कसे बनणार? या शाळांतील, महाविद्यालयांतील शिक्षकांच्या वेतनात प्रचंड तफावत. काहींचे पगार लाखांत तर इतरांचे काही हजारांत. ते वाढण्याची, नोकरी कायम होण्याची शाश्वती नाही. ‘समान कामाला समान दाम’ कुठच्या कुठे फुंकून टाकणारे हे कंत्राटीकरण आता सार्वत्रिक आहे. शेती, मजुरी, सेवाक्षेत्र या सर्व ग्रामीण-शहरी विभागांत विषमतेचे, अशाश्वत उत्पन्नाचे क्षेत्र हे मुख्य झाले आहे. संघटित, किमान शाश्वतीचा रोजगार नगण्य झाला आहे.

लोकशाहीच्या यशासाठी ज्या पुढच्या अटी बाबासाहेब नोंदवतात त्यात एक आहे, वैधानिक व कारभारविषयक क्षेत्रांत पाळावयाची समता. ‘कायद्यापुढे सर्व समान’ या तत्त्वाला इथे महत्व आहे. वर चर्चिलेली समाजातली विषमता कायद्यापुढे सर्व समान या तत्त्वाला बाधा आणते. सत्ता, संपत्ती, पैसा ज्याच्याकडे आहे, त्याच्याशी पोलिसांचे वागणे आणि यापासून वंचित असलेल्याशी पोलिसांचे वागणे यातला फरक आपण रोज पाहतो. शहरात मजुरीसाठी येणारा गरीब अनधिकृत झोपड्यांत राहतो. तो शहर प्रशासनाला भार होतो. त्याला हाकलण्याच्या मोहिमा निघतात. मात्र नोकरी-व्यवसायासाठी येणारा साधन संपदेवाला भार होत नाही. तो अपार्टमेंट्समध्ये भाड्याने राहतो. यथावकाश स्वतःचा फ्लॅट घेतो. तो प्रतिष्ठित शहरवासी बनतो.

बाबासाहेब लोकशाही यशस्वी होण्यासाठी पुढचा मुद्दा मांडतात तो संविधानात्मक नीतीचा. ते म्हणतात, ‘आपली राज्यघटना ही कायदेशीर तरतुदींचा व तत्त्वांचा नुसता सांगाडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमांस संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनातच मिळेल.’ अशा नीतिमत्तेचे उदाहरण म्हणून अमेरिकन जनतेला देवासमान असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची लोकांनी गळ घातली त्यावेळी ते काय उत्तरले याची नोंद बाबासाहेब अशी करतात - ‘..आपल्याला वंशपरत्वे चालणारी राजेशाही, वंशपरंपरेने येणारा राजा किंवा हुकूमशहा नको होता म्हणूनच आपण ही घटना बनविली. इंग्लिश राजाशी तुम्ही या हेतूनेच प्रेरित होऊन संबंध तोडले आहेत. मग माझी पूजा करुन मला जर तुम्ही वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्त्वांचे काय होईल?’ ..लोकाग्रहास्तव वॉशिंग्टनला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावे लागले. पण जेव्हा तिसऱ्यांदाही त्याला गळ घालण्यासाठी लोक त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने त्यांना कठोरपणे झिडकारले, अशी माहिती बाबासाहेब पुढे देतात.

स्वतंत्र भारतातला राजकीय इतिहास पूर्णपणे या तत्त्वावर उतरला आहे असे नाही. मात्र मोदींच्या काळात तर ही घटनात्मक नैतिकता पूर्णपणे उधळून टाकलेली दिसते. रिझर्व बॅंकेला धाब्यावर बसवून नोटबंदीचा निर्णय घेणे, विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश यांच्याशी काहीही सल्लामसलत न करता पंतप्रधानांनी नको असलेल्या सीबीआय प्रमुखांची मध्यरात्री उचलबांगडी करणे...अशी कैक उदाहरणे सांगता येतील. आता तर कायदा करुन निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाद केले आहे. त्या जागी सरकारचा मंत्री असेल. सरकारी पक्षाला धार्जिणा असलेला निवडणूक आयुक्त नेमल्यावर निःपक्षपाती निवडणुकांची आशाच सोडायला हवी.

कोणतेही विधेयक मांडल्यानंतर ते सर्व सदस्यांना वितरित करुन अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी ते चर्चेला घेतले जाते. तिथे त्यावर सहमती नाही झाली तर संयुक्त चिकित्सा समिती नेमली जाते. तिच्या शिफारशींनंतर पुन्हा चर्चा होते आणि मग मतदान होते. ही रीत धुडकावली जाते आहे. काश्मीरचे विभाजन आणि ३७० कलम रद्द करताना काश्मिरचे नेते स्थानबद्ध होते. जनता दीर्घकाळ पोलिस पहाऱ्यात होती. ज्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे असे मोदी-शहा म्हणतात, ती जनता बंदीवान करुन, तिला न विचारता तिचे हित परस्पर ठरवणे हे घटनात्मक नीतीच्या चिंधड्या उडवणारे आहे.

लोकशाही यशस्वी होण्यासाठीची पुढची अट बाबासाहेब नोंदवतात - ‘लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्याकांची (अल्पमतवाल्यांची) गळचेपी होता कामा नये. अल्पसंख्याकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्याक मंडळी कारभार करत असली तरी आपल्याला इजा पोहोचणार नाही, आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्याकांना मिळाली पाहिजे.’

गोरक्षण, लव्ह जिहाद, घरवापसी या मोहिमांद्वारे मुस्लिमांचा जो छळवाद होतो आहे, मणिपूरमध्ये जे घडले त्यातून अल्पसंख्याकांना कोणत्या सुरक्षेची हमी मिळते आहे?

‘कायदा पाळला जाण्याइतपत सामाजिक नीती समाजात निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणाऱ्यांना मिळाली पाहिजे’ अशी लोकशाही रक्षणाची पुढची अट बाबासाहेब सांगतात. ज्यांचा संविधानाला आणि त्यातल्या सर्व आधुनिक मूल्यांना विरोध होता, तेच संविधानाची खोटी शपथ घेऊन सत्तेवर आले असताना बाबासाहेबांची ही अपेक्षा आता फिजूल आहे.

लोकशाही यशस्वी होण्यासाठीच्या अटींतला शेवटचा मुद्दा ते नोंदवतात तो विवेकी लोकमताचा. ते म्हणतात, ‘अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समष्टीची सद्सद्विवेकबुद्धी. सार्वजनिक विवेकबुद्धी याचा अर्थच असा की, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस मग तो अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो.’

सांप्रदायिक विचार-मनोवृत्ती आणि एकूण आत्मकेंद्रित्वाचा समाजातला उभार यांत सार्वजनिक विवेकबुद्धीचा बळी जातो आहे. फाळणीच्या वेळीही विवेकबुद्धी धोक्यात आली होती. पण नेहरु, गांधी, मौलाना आझाद नावाची शहाणी नेतृत्वं समाजावर प्रभाव गाजवत होती. बाबासाहेबांसारखे महामानव हे शहाणपण संविधानात आणि समाजात रुजवत होते. त्यांच्या शब्दाला समाजात किंमत होती. आज अशा नेतृत्वांची पूर्ण वानवा आहे. म्हणूनच आजचा धोका अधिक भयंकर आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(नवशक्ती, १४ एप्रिल २०२४)

Tuesday, April 2, 2024

मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट

मानवाच्या पुढील प्रगतीत विज्ञान वा निरीश्वरवादाचं स्थान काय असेल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'प्रेरक ललकारी' च्या मार्च-एप्रिल २०२४ च्या विशेषांकात करण्यात आला आहे. या चर्चेत ‘बुद्ध, निरीश्वरवाद, आजचे बौद्ध व मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट’ या मुद्द्यांच्या अनुषंगाने भाग घेणारा हा एक लेख.
ईश्वर आहे की नाही, याचे हो किंवा नाही असे थेट उत्तर बुद्धाने दिलेले नाही. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील मानवी जीवन सुखी कसे करायचे, यावरच त्याने आपले लक्ष केंद्रित केले आहे. या अर्थाने बुद्ध अज्ञेयवादी ठरु शकतो. ईश्वर आहे किंवा नाही याचा काहीच पुरावा नसताना, तो संदर्भ ठेवून काही करु नये, म्हणजे अज्ञेयवाद. ईश्वर, आत्मा, ब्रम्ह या संकल्पनांच्या अस्तित्वाचा काहीच पुरावा नाही. म्हणून ज्याचे प्रमाण आहे, त्या मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करणे, हे बुद्धाचे जीवितकार्य होते.
यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे आकर्षित झाले. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार नागपूरच्या दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केला आणि भारतातून जवळपास परागंदा झालेल्या बौद्ध धर्माचे जोरदार पुनरागमन झाले. बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ लिहून आपल्या नवदीक्षित बौद्ध अनुयायांना आणि जगालाही बुद्धाच्या विचारांचे नवे निरुपण दिले. तोच बुद्धाचा मूळ विचार आहे, असे बाबासाहेबांचे प्रतिपादन आहे. त्यांच्या काळात बुद्ध धम्माच्या ज्या आवृत्त्या जगभर प्रचलित होत्या, त्यावर अलौकिक शक्तीवरच्या तर्कहिन विश्वासाची आवरणे होती. महायान, हिनयान, वज्रयान असे पंथही होते. या सगळ्यास बाजूला सारुन बुद्धाचा मूळ विचार उजागर करणारे आमचे हे ‘नवयान’ आहे, असे बाबासाहेब म्हणत.
‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात बुद्धाचे उपदेश, प्रवचने, संवाद देताना त्यांनी जी चर्चा केली आहे, त्यात ईश्वर, ब्रम्हादी कल्पनांचीही चर्चा आहे. एरवी ईश्वर आहे की नाही या चर्चेत न पडणारे, मौन बाळगणारे तथागत बुद्ध काही चिकाटीच्या प्रश्नकर्त्यांना प्रतिप्रश्न करुन आपले मत थेट उत्तर न देताही स्पष्ट करतात. याचे अनेक दाखले बाबासाहेब या ग्रंथात देतात. उदाहरणादाखल वासेट्ठ आणि भारद्वाज यांनी बुद्धाला विचारलेल्या प्रश्नांवर ते काय म्हणतात, ते पाहू.
“पण वासेट्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांपैकी एकाने ब्रम्ह्याचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय?"
"नाही, गौतमा नाही."
"ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांच्या गुरुने तरी ब्रम्ह्याला समोरासमोर पाहिले आहे काय?"
"नाही, गौतमा नाही."
"कोणीही ब्रम्ह पाहिलेले नाही, कोणालाही ब्रम्हसाक्षात्कार झाला नाही." वासेट्ठ बोलला, "होय, असे आहे."
"तर मग तू असे कसे मानतोस की, हे जग ब्राम्हण सांगतात त्या सत्यावर आधारलेले आहे?"
...पुढे तथागत विचारतात, "ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय?"
सृष्टी कशी निर्माण झाली, या प्रश्नाच्या चर्चेत तथागतांची भूमिका काय होती हे सांगताना बाबासाहेब म्हणतात- 'महत्वाचा प्रश्न हा आहे की, ईश्वराने सृष्टी भाव (काही पदार्थ) यातून उत्पन्न केली की अभाव (शून्य) यातून निर्माण केली? 'काही तरी' हे 'काहीच नाही'मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने 'काही तरी' हे 'काही तरी' मधून निर्मिले असे म्हटले तर, ज्या 'काही तरी' तून जे नवे 'काही तरी' निर्मिले ते निर्मितीपूर्वीच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या 'काही तरी' चा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी 'कोणी तरी' 'काही तरी' निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येत नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा हा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो.'
हे विवेचन पाहता बुद्ध अज्ञेयवादापुरता सीमित करता येत नाही. ईश्वराच्या अस्तित्वाला जवळ जवळ स्पष्ट नकारच त्याने दिलेला आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचे तो कारण नाही, हेही तथागतांनी इथे ठळक केलेले आहे.
तथागत स्वतः ज्या धम्माचे संस्थापक आहेत, त्यातही स्वतःला मध्यवर्ती स्थान देत नाहीत. आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी तथागत त्यांचा जवळचा शिष्य आनंद याला म्हणाले होते - "हे आनंद! तुमच्यापैकी काहींच्या मनात असा विचार आला असेल की शास्त्याचे प्रवचन भूतकाळ आहे, आता आमच्याकडे शास्ता नाही. पण, असा विचार करणे योग्य नाही. हे आनंद! तुम्ही स्वतःसाठी दिवा व्हा, धम्माचा आश्रय घ्या, इतर कोणाचाही आश्रय घेऊ नका.”
व्यक्तीऐवजी धम्म म्हणजेच विचार हा मध्यवर्ती आहे हे ते सांगतात. विभूतिपूजेला नकार देऊन केवळ विचारांवर विसंबण्याचे, आपल्या अनुयायांना स्वावलंबी बनवणारे तत्त्वज्ञान तथागतांचे आहे.
आजच्या विज्ञान आणि लोकशाही शासनप्रणालीशी सुसंगत आणि त्यांस बळकट करणारा बुद्धाचा धम्मविचार आहे.
प्रत्यक्षात बाबासाहेबांनी घासून पासून त्याच्यावरील पारंपरिक वारुळे दूर करुन दिलेला लखलखीत बुद्धविचार आजच्या नवदीक्षित बौद्धांत रुजला आहे काय?
याचे उत्तर ‘नगण्य’ किंवा ‘अगदी अत्यल्प’ असेच द्यावे लागेल.
विषमतावादी व्यवस्थेला नकार देऊन तिच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या जाणत्या आंबेडकरी अनुयायांनी हा विचार जरुर स्वीकारला. किंबहुना ती त्यांच्या लढ्याची ऊर्जा आणि सुकाणू बनली. मात्र सर्वसामान्य बौद्धांमध्ये ईश्वरी शक्तीला नकार देण्याचे सामर्थ्य तयार झाले नाही. त्यातले काही बुद्धातच ईश्वरी अंश शोधू लागले. बुद्धाने धम्मामध्ये स्वतःला मध्यवर्ती स्थान दिले नाही. मात्र आज बुद्धविहारांत बुद्धमूर्ती मध्यवर्ती असते. तिला हात जोडणाऱ्या, विहारात वंदना करणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या मनात ईश्वराप्रमाणे बुद्धाची करुणा भाकणे हेच असते. बुद्धमूर्ती विहारात असणे ही बाबासाहेबांची तडजोड होती असे दिसते. शेंदूर फासलेल्या, फुले वाहिलेल्या प्रत्येक दगडाला हात जोडण्याच्या मानसिकतेचा समाज बाबासाहेबांच्या हाकेसरशी बौद्ध बनला म्हणून त्याच्या मनातले विश्वास थोडेच लगेच दूर होणार होते! ती यथावकाश संस्कारांनी, प्रबोधनाने येणारी अवस्था होती. ती अवस्था येईपर्यंतच्या संक्रमण काळात देवाऐवजी हात जोडायला मानव असलेल्या बुद्धाची मूर्ती गरजेची होती. अन्यथा तो समाज सैरभैर झाला असता. एक सोडायचे तर दुसरे त्या जागी काहीतरी हवेच होते. महायान पंथाने बुद्धमूर्ती असलेली विहारे आणि तिची पूजा आधी प्रचलित केली होतीच. त्यामुळे बाबासाहेबांनी विहार व मूर्ती स्वीकारणे हे खास वेगळे असे काही वाटण्याचा प्रश्न नव्हता. हिंदू देवतेला नवस करण्याऐवजी, तिच्याकडे सुखाची कामना करण्याऐवजी नवे बौद्ध बुद्धमूर्तीकडून तिच्या विचारांची प्रेरणा घेतील, बुद्धाच्या विचारांचे जागरण विहारात होईल, बुद्धविहार हे चळवळीला प्रेरणा देणारे सांस्कृतिक केंद्र होईल हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते.
दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब दीड-पावणेदोन महिन्यात गेले. साहजिकच बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध धम्म प्रचार-प्रसारणे व समाजाच्या मनात रुजवणे यासाठीचे नियोजन करणे हे त्यांच्या सहकाऱ्यांचे काम होते. ते तसे झाले नाही. पुढे त्यांच्यातच फूट पडत गेली. ज्या धार्मिक संघटना उभ्या राहिल्या, त्या बुद्ध धम्माचा बाबासाहेबांना अपेक्षित तत्त्वविचार पोहोचविण्यात कमी पडल्या. विधी-पठन यांवरच त्यांचा जोर राहिला. बुद्धाने संस्कृतला नकार देऊन आपला विचार लोकभाषेत-त्यावेळच्या पाली भाषेत प्रचारला. पाली महत्वाची आणि समृद्ध साहित्य असलेली भाषा असली तरी आज ती लोकभाषा नाही. पालीतली सूक्ते आजच्या लोकभाषेत, म्हणजे महाराष्ट्रात मराठीत आणायला हवीत. हवे तर दोन्ही भाषांत ठेवता येतील. पण केवळ पालीत म्हटली जाणारी ही सूक्ते मंत्रपठण केल्यासारखी लोकांना पवित्र वाटतात, पण अर्थ न कळता डोक्यावरुन जातात. न कळणारे मंत्र म्हणणाऱ्या पुरोहितांवर आमची टीका असते. त्याहून वेगळे बौद्ध विधी लावणारे काय करतात? हळू हळू मंगळसूत्रालाच नकार द्यायला हवा; त्याऐवजी पांढरी मंगळसूत्रे घालण्याचा प्रघात सुरु झाला आहे. हिंदू धर्माला नकार म्हणजे काळ्याऐवजी पांढरे असा समज व्हायला लागला तर बुद्ध धम्माचा आशयच धोक्यात येणार. दिशा तीच आहे. धम्म आणि धर्म हे दोन भाषांतले समानार्थी शब्द असले तरी आशयाच्या बाबतीत बाबासाहेब त्यांच्यात मूलभूत फरक करतात. आज तो फरकच धूसर होतो आहे. धम्माचा धर्म होतो आहे. याबद्दल आणखी सविस्तर लिहिता येईल. पण या लेखाचा मुख्य मुद्दा तो नव्हे.
हे सर्व असले तरी एकेकाळच्या बहिष्कृत समाजाला जुन्या जातीची ओळख संपून ‘बौद्ध’ हे नवे संबोधन मिळणे हे प्रचंड क्रांतिकारक परिवर्तन आहे. अन्य समाज त्याला काय समजतो हे अलाहिदा. स्वतःची ओळख स्वतःच्या नजरेत, स्वतःच्या मनात अभिमानाची होणे हे विलक्षण मानसिक शक्ती प्रदान करणारे आहे. बौद्ध ही नवी अस्मिता माणसाला अंतर्बाह्य बदलणारी आहे. हा समाज बुद्धाला ईश्वरस्थानी ठेवो वा पाली त्याला ना कळो, ही अस्मिता दुर्दम्य आहे. तिला अजिबात तडा गेलेला नाही.
माझ्या आईने बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उच्चवर्णीय महिला नेसतात तसे पायाच्या घोट्यापर्यंत नऊवारी लुगडं नेसायला सुरुवात केली. आमच्याकडे गुडघ्यापर्यंतच लुगडं नेसायची प्रथा होती. हिंदू धर्माची चिन्हे त्यागायची म्हणून वाख्या वगैरे चांदीचे दागिने वापरणे बंद केले. मेलेली ढोरं ओढू नयेत सांगतानाच मृत मांस खाऊ नये असे बाबासाहेबांनी आवाहन केले होते. आमच्या घरातल्यांनी तर मोठ्याचे मांसच सोडले. सगळे जुने देव नदीत विसर्जित केले. आमच्या घरात केवळ बुद्ध आणि बाबासाहेब यांच्याच प्रतिमा मी लहानपणापासून पाहतो आहे. या प्रतिमांना आठवड्यातून एकदा हार, मात्र रोज अगरबत्ती-मेणबत्ती आणि त्रिसरण पंचशील भक्तिभावाने होई. हो भक्तिभावाने. आधीच्या देवांबद्दल असेल तसाच भक्तिभाव. पण नव्या अस्मितेचा. नव्या ओळखीचा. नवी ताकद देणारा. नवजीवन देणारा.
बुद्ध-बाबासाहेब माझ्या आईसाठी ईश्वर होते. मी आजारी पडलो तर बुद्ध-बाबासाहेबांच्या फोटोसमोरील अगरबत्तीचा अंगारा आई माझ्या कपाळावर लावी. एरवीही वंदना झाली की लावत असूच. आजारी पडल्यावर आवर्जून लावला जाई. मीही याच संस्कारात वाढलो. आई-वडील दोघेही निरक्षर. पण मी साक्षर झाल्याने पाचवी-सहावीलाच मला बाबासाहेब, बुद्ध यांचे साहित्य वाचता आले. त्यातून मला त्यांचे इहवादी असणे, ईश्वरादी बाबींना नकार या गोष्टी कळल्या. नव्या प्रगतीशील आंबेडकरी जाणिवा माझ्यात निर्माण झाल्या. त्यापोटी गावातले दगडाचे देव आपटणे, देवांना जाहीर शिव्या घालणे हे अतिविद्रोही प्रकार सुरु झाले. देवाला मानणे हेच प्रतिगामी. जे हे करतात त्यांना ठोकणे हेच समाजपरिवर्तन असा ग्रह माझा आणि माझ्या सोबत्यांचा झाला. मैत्री, करुणा वगैरे बुद्धाच्या उपदेशातील बाबींच्या कक्षेत देवावर विश्वास ठेवणारे लोक आम्ही वर्ज्य मानत असू. यातून खूप भांडणे होत. त्यातून आमचा हुरूप आणखी वाढे. व्यक्तीला पटून तिचे मनपरिवर्तन होणे हे आम्हाला अमान्य होते.
यातून यथावकाश मी बाहेर पडलो. कोकणात होळी हा मोठा सण. सगळा गाव तिथे एकत्र येई. प्रत्येक वाडीचा त्यात वाटा, मान असे. एकीकडे अस्पृश्यता पाळली जाई. पण त्याचवेळी होळीत महारांचा म्हणून एक मान असे. हिंदू धर्म सोडण्याच्या क्रमात तोही आम्ही सोडला. एकूण होळीत सहभागी होणे हाच आम्ही अधर्म मानला. आजही पालखी जुन्या नेमाप्रमाणे आमच्या घरासमोर थांबते. पण आम्ही तिला सामोरे जात नाही. जुने अस्पृश्यतेचे संदर्भ बदलले. गावातली तरुण मुले परस्परांकडे मोकळेपणी जाऊ लागली. जेवू-खाऊ लागली. पण आमची होळीत न जाण्याची भूमिका ठाम होती. हळू हळू मीच पुढाकार घेऊन आपण केलेल्या नियमाचा पुनर्विचार करावा, असे बोलू लागलो. ज्यामुळे प्रेम, सद्भाव, मैत्री वाढते अशा बाबींना आपण प्रतिसाद द्यायला हवा. लोकांनी गणपतीला प्रेमाने निमंत्रण दिले तर त्या बोलावणाऱ्याच्या भावना लक्षात घ्याव्या. गणपतीच्या मूर्तीला नव्हे, तर ती बसवणाऱ्याच्या आपल्याबद्दलच्या भावनांना मान द्यायला हवा. होळी गावाचा आनंदाचा सण. सगळे चाकरमानी, गावाकडचे त्यावेळी भेटतात. त्यात जाणे वावगे समजायचे कारण नाही. आपण गपपती बसवू नये किंवा होळी करु नये, पण जे करतात आणि आपल्याला प्रेमाने त्यासाठी निमंत्रित करतात, त्यावेळी जरुर जावे, असे मी आमच्या लोकांना समजावू लागलो. मीच एकदा होळी गाठून गावी गेलो. रात्रभर चालणाऱ्या त्या सोहळ्यात सहभागी झालो. खूप लोक भेटले. माझ्या वडिलांचे जुने सोबतीही त्यात होते. त्यांनी जुन्या आठवणी जागवून ममतेने आमची चौकशी केली.
बाबासाहेब आंबेडकर ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय’ असे म्हणतात. हे नाते जपणे, ते अधिक समृद्ध करणे हा धम्म समजायचा की देवाच्या अस्तित्वाला संपूर्ण नकार देताना त्यावर विश्वास असणाऱ्यांनाही निषिद्ध मानायचे? ...ही गफलत मला कळली आणि माझा व्यवहार आणि भाषाही बदलू लागली.
बाबासाहेबांनी दिलेला इहवादी बुद्ध माझ्या आईने स्वीकारला नाही. तिला इहवाद कळलाच नाही. (कळला असता तरी पटण्याची शक्यता कमीच होती.) पण तिला नव्या जीवनाचा अर्थ उमगला. तिने तिचे व्यक्तित्व बदलले. आमचेही बदलवले. माझ्या इहवादाच्या समजुतीने मी माणसे तोडली. जे बुद्धाच्या मैत्री-करुणेत बसत नाही.
आता मला कळते त्याप्रमाणे निरीश्वरवादी असणे ही मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट अजिबात नाही. टक्क्यांच्या भाषेत १ टक्काही निरीश्वरवादी जगात नाहीत. आपल्या आसपास अगदी अपवादानेच ईश्वरावर विश्वास नसणारी व्यक्ती सापडते. निरीश्वरवादी अत्यंत नगण्य असतानाही मानवता पुढे गेलेली आहे. त्याचे कारण बुद्धासारख्या ईश्वराचा संदर्भ न मानणाऱ्या महामानवाने मैत्री, करुणा, वैराचा निरास वैराने न करण्याचा उपदेश आहे. ईश्वराचा पुत्र मानणाऱ्या येशूने स्वतःवर करतो त्याप्रमाणे शेजाऱ्यावर प्रेम करण्याची दिलेली शिकवण कारण आहे. पैगंबर तर ईश्वराचा प्रेषित. आपापल्या टोळीच्या गर्वापोटी परस्परांचा संहार करणाऱ्यांना एकत्र करुन शांततेने नांदण्याचा, गुलाम-मालक ईश्वराच्या दरबारी समान लेखण्याचा संस्कार पैगंबरांनी केल्याने अरबस्तानातली मानवता टिकली. भारतात मध्ययुगात झालेल्या संतांनी - मग ते भागवत असोत, महानुभाव असोत अथवा सुफी असोत – ईश्वर आणि भक्त यातील मध्यस्थ नाकारले. ईश्वर आणि त्याचा उपासक यांचे नाते वैयक्तिक मानले. ईश्वर आपल्या भक्ताचा सखा, प्रियतम किंवा माऊली असू शकतो. तो देवळात-मशिदीत असायचे कारण नाही. तो चराचरात असतो. ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो, पर प्यार भरा दिल ना तोडो’ म्हणणारा १७ व्या शतकातला बुल्लेशहा पंजाबातल्या हिंदू-मुसलमान कुटुंबांच्या अंतःकरणात आजही विराजमान आहे.
धर्माचा फुका अभिमान बाळगणारी आणि आपल्या स्वार्थासाठी भिन्न धर्मीयांना आपसात लढवणारी प्रवृत्ती जुनी आहे. बदललेल्या काळात हानिकारक ठरत असतानाही जुन्या तत्त्वाला शाश्वत धर्मतत्त्व मानणारा मूलतत्त्ववाद राजकारणासाठी साधन ठरतो तेव्हा तो भयानक बनतो. मतदानाने सरकार निवडण्याच्या आधुनिक काळात एकगठ्ठा मतांसाठी धार्मिक ध्रुवीकरण केले जाते तेव्हा त्याचा ईश्वरावर विश्वास ठेवण्या न ठेवण्याशी संबंध नसतो.
म्हणजेच निरीश्वरवादी मानवतेला पुढे नेतो आणि ईश्वरावर विश्वास असलेला मानवतेला मागे खेचतो असे दिसत नाही. या दोहोंत मानवतेबद्दल प्रेम, सद्भावना, परस्परांच्या आस्थांबद्दल आदर वा सहिष्णुता, वैविध्याला कवेत घेणारी सर्वसमावेशकता असली तरच मानवता टिकू शकते. पुढे जाऊ शकते. विश्वाचा सूत्रधार म्हणून ईश्वराला मानणारे ‘सर्वेपि सुखि न सन्तु..’ ची आराधना करतात आणि ईश्वराचा संदर्भच न घेणारा बुद्ध ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ असा घोष करतो. दोहोंत मानवाच्या निरामय सुखाची कामना आहे. ही कामनाच मानवतेच्या प्रगतीची पूर्वअट आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(प्रेरक ललकारी, मार्च-एप्रिल २०२४)

Thursday, March 28, 2024

नागरिकतेचा पैस

नागरिकता विषयावरील चर्चेवेळी संविधान सभेचे एक सन्माननीय सदस्य के. टी. शहा म्हणतात – “आता आपण ‘देशी’ (native) या मृत आणि दफन केलेल्या भूतकाळातील ओळखीने संबोधले जाणार नाही. ‘नागरिक’ म्हणून उर्वरित जग आपल्याकडे आदराने पाहणार आहे.” रोमन गणराज्यातील नागरिक जेव्हा ‘मी रोमन नागरिक आहे’ असे म्हणे, त्यावेळी राजा आणि मी एकाच तोलाचे आहोत हा भाव त्याच्या मनात असल्याचा दाखला शहा देतात. स्वातंत्र्य आणि संविधानाने आपल्याला देशाचे एकसमान नियंते बनवणारे ‘नागरिकत्व’ बहाल केले हे निश्चित. पण ते आकाराला येताना अनेक पेचांना त्यास सामोरे जावे लागले. हे पेच मृत आणि दफन झालेले नाहीत. चार वर्षांपूर्वीचा नागरिकता दुरुस्ती कायदा, नुकतेच झालेले त्याचे नियम आणि त्यावरुन होत असलेल्या वाद-प्रतिवादांच्या तीव्रतेमधून त्याची प्रचिती येते. ‘नागरिकता’ ही केवळ तांत्रिक बाबींच्या पूर्ततेची व्याख्या नव्हे. त्याभोवती देशाने स्वीकारलेल्या मूल्यांचे कोंदण आहे. नागरिकत्व विचारांच्या कोणत्या कोंदणात बसवायचे हा संघर्ष संविधान सभेत होता. तत्कालीन प्रभावी वैचारिक प्रवाहाच्या ताकदीने त्याची काहीएक सोडवणूक त्यावेळी झाली. मात्र हा संघर्ष संपला नव्हता. संविधान सभेतील सशक्त वैचारिक प्रवाहाची ताकद राजकारणात होती तोवर तो वर आला नाही. पण आता त्याचे ठळक पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पाऊणशे वर्षांपूर्वी संविधान सभेत नागरिकतेचा पैस अथवा आवाका ठरवताना पुढे आलेल्या मुद्द्यांपैकी काहींची नोंद या लेखात घेत आहे.

इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्याच्या संग्रामाला आपल्या तत्कालीन नेतृत्वाने जागतिक साम्राज्यवाद विरोधाचे व्यापक परिमाण दिले होते. राष्ट्रीय सभेच्या विविध ठरावांत आणि पुढे संविधान सभेतील चर्चांत आपल्याला त्याचे संदर्भ सतत दिसत राहतात. प्रासंगिक घटनांनी संकुचित, स्थानिक हितसंबंधांना उठाव मिळत असला तरी बहुमत व्यापक मतप्रवाहाच्या बाजूने होते.  त्यामुळे मतभेदांच्या संघर्षांचा कौल काही अपवाद वगळता या व्यापक मतप्रवाहाच्या बाजूने पडायचा. संविधान सभेचे कामकाज चालू असतानाच देशाला फाळणीसह स्वातंत्र्य जाहीर झाले. पाकिस्तान व भारत यांमध्ये लोकसंख्येची रक्तरंजित अदलाबदल सुरु झाली. ठरलेल्या मुदतीत भारतात स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्व सहज मिळाले. या मुदतीनंतर आलेल्या आणि भारतातून पाकिस्तानात गेलेल्या, मात्र तिथे विविध कारणांनी न जमल्याने परत आलेल्या लोकांबाबतचे प्रश्न तयार झाले. त्याबाबत सहमती नव्हती. सर्वसमावेशक मानवी दृष्टिकोन की ‘आपल्या’ लोकांचे हितरक्षण प्रथम हा तिढा होता. ‘आपले’ म्हणजे हिंदू व शीख. पाकिस्तानातून भारतात मुदतीत आलेले वा त्यानंतर येणारे मुख्यतः हिंदू व शीख होते.  तर भारतातून पाकिस्तानात गेलेले व पुन्हा परत भारतात येणारे हे मुख्यतः मुस्लिम होते. वास्तविक, आपले राजकीय नेतृत्व आणि मसुदा समितीचे सदस्य नागरिकत्वाची ही तरतूद केवळ संविधान लागू होतानाची असणार आहे, पुढे गरजेनुसार कायदा करुन त्याचे तपशील संसदेने ठरवायचे आहेत असे सतत मांडत होते. नागरिकतेच्या प्रस्तावातही ही बाब नमूद करण्यात आली होती. तथापि, विरोधी मते बाळगणाऱ्यांना तेवढी सबुरी नव्हती. कारण त्यातील काहीजण फाळणीमुळे तप्त मनःस्थितीत होते; तर काहींची राजकीय मते वेगळी होती. दुसरे म्हणजे, आता संविधानात जे घातले जाईल ती देशाची अधिकृत वैचारिक भूमिका ठरणार हेही त्यांना ठाऊक होते.

२९ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत चर्चेला आलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालच्या मूलभूत अधिकार समितीच्या अहवालात नागरिकतेसाठी तीन सूत्रे नमूद होती. एक, केवळ भारतात जन्म. दोन, भारतात जन्म नाही, परंतु विशिष्ट कालावधीपर्यंत भारतीय संघराज्याच्या अधिकारक्षेत्रात वास्तव्य असलेल्या व्यक्तीला संघराज्याच्या तत्संबंधातील कायद्यानुसार नागरिकत्व मिळेल. याला स्वाभाविकीकरण (इंग्रजीत नॅचरालायझेशन) म्हणतात. तीन, नागरिकत्वासाठीच्या यापुढील तरतुदींसाठी संघराज्य कायदा करेल. काही थोडे बदल वगळता हीच सूत्रे मसुदा समितीच्या प्रस्तावात होती. पुढे संविधानातही ती नमूद झाली. के. एम. मुन्शी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे वंशाधारित राष्ट्रीयतेऐवजी केवळ जन्म अथवा स्वाभाविकीकरण यांच्या आधारे नागरिकता आपण महत्वाची मानली. पटेलांच्या अहवालातील ही बाब बी. दास यांना पटत नव्हती. त्यांनी तसेच त्यांच्या मताच्या अन्य सदस्यांनी कोणाही परदेशी माणसाच्या इथे जन्मलेल्या मुलाला यामुळे भारतीय नागरिकता सहज मिळेल हा मुद्दा संविधान सभेत वांरवार मांडलेला आढळतो. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी आपल्या वैचारिक वारशाची ओळख करुन देऊन आपण नागरिकतेची वैश्विक संकल्पना स्वीकारायची की वांशिक वा सांप्रदायिक संकल्पना स्वीकारायची, असा सवाल या मंडळींना केला. वल्लभभाई पटेल यांनी अय्यरांचे तत्त्व अधोरेखित करताना म्हटले – “आपण सध्या द. आफ्रिकेत जन्मलेल्या भारतीयांना तेथील नागरिकत्व मिळण्याचा दावा करतो. अशावेळी इथे संकुचित दृष्टिकोन घेणे योग्य नव्हे.”

संविधानाच्या मसुद्याच्या दुसऱ्या वाचनावेळी १०, ११ व १२ ऑगस्ट १९४९ या तीन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेत हे मुद्दे अधिक टोकदारपणे पुढे आले. पंजाबराव देशमुखांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी प्रस्तावित केलेली नागरिकता पृथ्वीतलावरची सर्वात स्वस्त नागरिकता असल्याची टीका केली. ते पुढे म्हणतात – “पाकिस्तान हा मुस्लिमांना त्यांचे स्वतःचे घर, देश हवा म्हणून तयार झाला. हिंदू व शीख यांना जायला भारत वगळता सबंध जगात दुसरी जागा नाही. जर मुस्लिमांना खास त्यांचा देश म्हणून पाकिस्तान हवा असेल, तर हिंदू-शिखांना भारत का नको?” संविधान सभा ‘धर्मनिरपेक्षतेच्या’ नावाखाली ‘आपल्याच’ लोकांना संपविणार आहे का? असा तिखट सवाल त्यांनी यावेळी केला. मसुदा समितीच्या प्रस्तावाच्या विरोधात असलेले अनेक जण होते. याबाबतचा राग व धुमसणे किती तीव्र होते ते देशमुखांच्या मुद्द्याला पाठिंबा देणाऱ्या आणखी काही सदस्यांच्या विधानांतून कळते. शिब्बनलाल सक्सेना म्हणतात - “धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेने आपल्याला भिवविता कामा नये. ...जे देश आपल्याला लाथ घालतात, त्यांना आपणही लाथ घातली पाहिजे. ...स्वतःहून पाकिस्तानात गेलेल्या ‘हस के लिया पाकिस्तान - लड़ के लेंगे हिंदुस्थान’ म्हणणाऱ्यांना पुन्हा भारतात घेता कामा नये.” भूपिंदर सिंग मान यांनी मसुदा समितीच्या धर्मनिरपेक्षतेची ‘कमजोर धर्मनिरपेक्षता’ म्हणून संभावना केली. पुन्हा भारतात परतलेल्या मुस्लिमांच्या ‘वाढीव लोकसंख्येसाठी’ पाकिस्तानने आपल्या जमिनीचा एक पट्टा द्यावा, मग माझे काही म्हणणे नाही, असा खवट शेराही त्यांनी मारला.

धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवणे हा नेहरुंना सरळ सरळ मूर्खपणा वाटतो. नागरिकत्वाची रचना धर्मनिरपेक्ष पद्धतीने करताना “काही दिशाभूल झालेले व मागास देश वगळता प्रत्येक देश करतो तेच भारताने केले” या शब्दांत डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या प्रस्तावाचे त्यांनी समर्थन केले. चर्चेच्या अखेरीस काही सदस्यांनी दुरुस्त्या माघारी घेतल्या. काहींच्या फेटाळल्या गेल्या आणि बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असल्याने मसुदा समितीची नागरिकतेसंबंधीची भूमिका स्वीकारली गेली.

हीच भूमिका १९५५ सालच्या नागरिकत्वाच्या कायद्यात ठेवली गेली. याबाबतचे विधेयक संसदेत मांडताना गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आपल्या भाषणात म्हणतात – “ नागरिकतेच्या अधिकारासाठी ‘भारतातला जन्म’ हीच मुख्य अट आम्ही नमूद केली आहे. सभ्य जगात ज्याचा परिपोष व्हावा असा आजच्या काळाचे चैतन्य, भावना व माहोल यांना अनुरुप वैश्विक दृष्टिकोन आम्ही स्वीकारला आहे.” पुढे १९८७ व २००३ मध्ये या कायद्यात दुरुस्त्या होऊन व्यक्तीच्या जन्माबरोबर आई-वडिलांच्या भारतातील जन्माच्या अटी क्रमशः वाढत गेल्या. तथापि, त्यांचा संविधान सभेने बहुमताने मंजूर केलेला ‘धर्मनिरपेक्षेतचा पाया’ कायम होता. या पायाला प्रथम आणि जोरदार धक्का लागला तो २०१९ च्या दुरुस्तीने. या दुरुस्त कायद्याचे आता नियमही झाले आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगला देश इथून भारतात आलेल्या कोणाला स्वीकारले जाईल हे नमूद करताना हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन या धर्मांचे उल्लेख त्यात आहेत. पर्यायाने इतरांना, मुख्यतः मुस्लिमांना स्वीकारणार नाही हा थेट इशारा भाजप सरकार देते आहे. धर्मनिरपेक्ष नागरिकतेचा व्यापक पैस आकसतो आहे.

 - सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(लोकसत्ता, २७ मार्च २०२४)

Wednesday, February 28, 2024

राजभाषेचा वाद


भारतातील राज्यकारभारासाठी इंग्रजांनी इंग्रजीचा वापर केला. ती परभाषा होती. स्वतंत्र भारताच्या राज्यकारभारासाठी भारतीय भाषा कोणती हा प्रश्न स्वातंत्र्याच्या चळवळीत चर्चेत होताच; आता तो संविधान सभेत उभा ठाकला. एन. गोपालस्वामी अय्यंगार या मसुदा समितीच्या सदस्यांनी त्यासंबंधातला दुरुस्ती प्रस्ताव मांडला. अनेक सदस्यांनी पुढे चर्चेत म्हटल्याप्रमाणे काँग्रेस अंतर्गत तसेच अन्य राजकीय प्रवाहांतील मतमतांतरांचा साकल्याने विचार करुन मांडलेला हा ‘तडजोडीचा’ प्रस्ताव होता. तरीही त्यावरुन मोहोळ उठले. १२, १३, १४ सप्टेंबर १९४९ अशी तीन दिवस यावर प्रदीर्घ व घमासान चर्चा चालली. संपर्क-संवादाची सोय, राज्यकारभाराची गरज भागवण्याची तिची क्षमता एवढ्यापुरता हा मुद्दा नव्हता. त्या भाषेची लिपी, ती बोलणाऱ्या समूहाचे संख्यात्मक, प्रादेशिक, धार्मिक वर्चस्व, कोणत्या संस्कृतीचे वहन ती भाषा करते, देशाच्या अस्मितेशी जोडून राजभाषेबरोबरच राष्ट्रभाषेचा दर्जा तिला मिळावा हा आग्रह आणि फाळणीमुळे निर्माण झालेला हिंदू-मुस्लिम दुभंग असे अनेक कळीचे व महत्वाचे संदर्भ या वादळी चर्चेला होते. या लेखाच्या मर्यादेत त्यातील काहींचीच नोंद घेता येईल.

अय्यंगार यांनी मांडलेल्या प्रस्तावातील महत्वाची सूत्रे अशी : देवनागरी लिपीतील हिंदी ही राजभाषा (इंग्रजीत ऑफिशियल लँग्वेज) असेल. तथापि, सध्या वापरात असलेल्या इंग्रजीची जागा हिंदीने पूर्णतः घेईपर्यंत तिच्यासोबतच इंग्रजी अजून १५ वर्षे राहील. राजभाषा म्हणून हिंदीचा देवनागरीत वापर होताना परदेशी व देशांतर्गत व्यवहारातील आकडेमोडीत अडचण येऊ नये म्हणून अंक मात्र आंतरराष्ट्रीय रुपात असतील. आंतरराष्ट्रीय अंकांची ही सुधारित हिंदू-अरेबिक दशमान प्रणाली मुळात भारतीय असल्याने ती परकी मानून तिला दूर लोटता कामा नये, असे तिच्या समर्थकांचे म्हणणे होते. हिंदीचा राज्यात वा भाषा म्हणून अन्यत्र वापर होताना देवनागरी अंक पूर्वीप्रमाणेच वापरात राहतील. वादळी चर्चेनंतर तपशीलातल्या काही मुद्द्यांबाबतच्या दुरुस्त्या स्वीकारल्या गेल्या, तरी ही सूत्रे कायम राहिली.

ज्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या त्यात राज्यकारभाराच्या व्यवस्थेचे बस्तान बसवणारी इंग्रजीच यापुढेही राहावी, संस्कृतप्रचुर हिंदीऐवजी उर्दू-हिंदीचे मिश्रण असलेल्या आणि हिंदी पट्ट्यातल्या अनेक बोलींना सामावणाऱ्या, स्वातंत्र्य चळवळीत सार्वत्रिकपणे वापरात असलेल्या, गांधीजींनी प्रचारलेल्या ‘हिदुस्थानी’ भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा, ती देवनागरी व उर्दू या दोन्ही लिपींत असावी, उत्तर-दक्षिण सर्वत्र अस्तित्व असलेल्या, अनेक भाषांची मातृभाषा गणल्या गेलेल्या संस्कृतलाच राजभाषेचा दर्जा द्यावा आदिंचा समावेश होता.

अस्मितेचा मुद्दा करुन हिंदीची बाजू लावून धरणाऱ्यांत आर. व्ही. धुळेकर होते. ते म्हणतात – “मी म्हणतो हिंदी ही राजभाषा आहे आणि ती राष्ट्रभाषाही आहे. तुमचा देश दुसरा असू शकतो. माझा देश आहे भारतीय राष्ट्र, हिंदी राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदुस्थानी राष्ट्र.” त्यांना इंग्रजीत कारभार ही परभाषेची गुलामी वाटते. सेठ गोविंद दास यांनी नागरी अंक हा देवनागरी लिपीचा अंगभूत भाग असल्याने ते राहिलेच पाहिजेत असा आग्रह धरला. आम्ही सेक्युलर आहोत याचा अर्थ कायमपणे बहुविध संस्कृतीला मान्यता देणे नव्हे, असे स्पष्ट करुन ते विरोधकांना बजावतात - “आम्हाला संपूर्ण देशासाठी एक भाषा, एक लिपी हवी आहे. इथे दोन संस्कृती आहेत असे म्हटले जाणे आम्हाला नको आहे.” त्यांच्या मते राष्ट्रभाषेशिवाय स्वराज अपूर्ण आहे. “उर्दू ही मुस्लिमांबरोबरच अनेक हिंदू लेखकांची भाषा आहे हे कबूल, मात्र तिची प्रेरणा देशाबाहेरची आहे. आम्हा हिंदीच्या समर्थकांना सांप्रदायिक म्हटले जाते; वास्तविक उर्दूचे समर्थक सांप्रदायिक आहेत.” ...अशी बरीच टीका त्यांनी केली. अलगू राय शास्त्रींनी “प्रत्येक प्रांतात हिंदी कळते आणि हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याची आम्ही शपथ घेतली आहे.” असे जाहीर करुन “हिंदी म्हणजे हिंदी. बाकी सर्व बोली त्यातच सामावल्या जातात. अंक हा हिंदीचा अंगभूत भाग. ते देवनागरीतच हवेत.” असे ठासून मांडले.

भाषेला संस्कृतीशी जोडणाऱ्या अस्मितावादी विचारप्रवाहाचा समाचार घेताना काँग्रेस कार्यकारी समितीचा राजभाषेसंबंधीचा ठराव नोंदवून शंकरराव देव म्हणतात – “…यात कुठेही संस्कृती, एकता म्हटलेले नाही. देशाची सामायिक संस्कृती उदयास येण्याच्या मी विरोधात नाही. मात्र ‘एक संस्कृती’ चे धोकादायक परिणाम आहेत. ...आर.एस.एस. चे प्रमुख आणि काही काँग्रेसजन संस्कृतीच्या नावाने आवाहन करतात तेव्हा संस्कृती या शब्दाचा अर्थ कोणी स्पष्ट करत नाहीत. आज त्याचा अर्थ लागतो तो केवळ बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकांवर वर्चस्व. ..आम्हाला ‘संस्कृती’ नको आहे असे नाही. पण तिला आपण ‘सर्वसमावेशक संस्कृती’ असे म्हणायला हवे.” सरदार हुकूम सिंग बहुसंख्याकांच्या व्यवहारावर टीका करताना म्हणतात - “सांप्रदायिकतेची सोयीची व्याख्या केली जाते. बहुसंख्याक जे काही म्हणतात व करतात त्याची लोकशाहीत, किमान भारतात तरी शुद्ध राष्ट्रवादात गणना होते आणि जे काही अल्पसंख्याक बोलतात ती सांप्रदायिकता मानली जाते.”

हिंदी राजभाषा केल्याने हिंदी पट्ट्यातील लोकांचे वर्चस्व वाढणार याबद्दल दक्षिणेकडचे लोक तसेच उत्तरेकडचे बिगर हिंदी प्रांतातले लोक चिंतित होते. गांधीजींच्या आवाहनानुसार दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या मार्फत हिंदीचा दक्षिणेत प्रचार करणाऱ्या दुर्गाबाई देशमुखांनी हिंदी पट्ट्यातल्या लोकांच्या अतिआग्रहाबद्दल नाराजी व्यक्त करुन ‘या लोकांना अन्य प्रांतातील किमान एक भाषा शिकण्याची सक्ती करायला हवी.’ अशी सूचना केली. आम्ही हिंदीची बाजू घेतो म्हणून मद्रास प्रांतात “हिंदी मुर्दाबाद-तामीळ झिंदाबाद; सुब्बराय मुर्दाबाद, राजगोपालाचारी मुर्दाबाद” च्या घोषणा ऐकाव्या लागतात, असे पी. सुब्बराय यांनी नोंदवले. बंगालचे श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणतात – “भारत हा अनेक भाषकांचा देश राहिलेला आहे. आपण भूतकाळ खोदला तर लक्षात येईल एकच भाषा सगळ्यांनी स्वीकारावी हे इथे शक्य झालेले नाही. ‘असा एक दिवस जरुर येईल जेव्हा भारतात एक आणि एकच भाषा असेल’ असे माझे काही मित्र म्हणतात. - स्पष्टच बोलतो. मी त्यांच्या मताशी सहमत नाही.”

मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि पुढे जनसंघाची त्यांनी स्थापना केली. याच जनसंघाचा पुढे भारतीय जनता पक्ष झाला. या पक्षाचे एक प्रमुख नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या काही वर्षांत कधी ‘एक देश-एक भाषा’ असे विधान केले, तर कधी देशातील सर्व लोकांनी ‘इंग्रजीत न बोलता हिंदीत बोलावे’ असे आवाहन केले. त्यांच्या या विधानांवर जोरदार प्रतिक्रिया दक्षिणेतील आणि बिगर हिंदी राज्यांतून आल्या. मुखर्जींच्या बंगालमधील काहींनी ‘हा तर हिंदी साम्राज्यवाद’ असल्याचे म्हटले.

जवाहरलाल नेहरुंनी राजभाषेवरील चर्चेत हस्तक्षेप करताना हिंदी पट्ट्यातील दादागिरीवर कडक टीका केली. ते म्हणाले – “यात मोठ्या प्रमाणात वर्चस्ववादाचा सूर आहे. हिंदी भाषक विभाग हा जणू भारताचा मध्यबिंदू आहे, गुरुत्व केंद्र आहे आणि इतर सर्व परीघावर आहेत, हा यातला खोलवरचा विचार आहे. हा केवळ चुकीचा नव्हे, तर धोकादायक दृष्टिकोन आहे.” ते सल्ला देतात, “मातृभाषा हिंदी नाही अशा विविध प्रांतातील लोकांच्या सद्भावना तुम्ही जिंकायला हव्या.”

सध्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४३ नुसार देवनागरी लिपीतली हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या म्हणजेच राजभाषा आहेत. अनुच्छेद ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली एक किंवा अधिक भाषा त्या राज्याच्या राजभाषा मानल्या जातात. संविधानाच्या आठव्या अनुसूचीत देशातील प्रमुख १४ भाषांची नोंद होती. त्यात भर पडून आता त्यांची संख्या २२ झाली आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे अनेकदा बोलले जाते किंवा काहींची तशी समजूत असते. ते खरे नाही. भारतीय संविधानाने हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेला हा दर्जा दिलेला नाही.

१५ वर्षांनी इंग्रजीचे काय झाले? ती जाऊन हिंदी ही एकमेव राजभाषा म्हणून स्थापित झाली का? राजभाषा अधिनियम १९६३ नुसार ‘१५ वर्षांनंतरही इंग्रजीचा हिंदीसह राजभाषा म्हणून वापर सुरु राहील’ असे जाहीर करण्यात आले. आजही हिंदी सोबत इंग्रजी ही संघराज्याची व्यवहार भाषा आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(चतुःसूत्र, लोकसत्ता, २८ फेब्रुवारी २०२४)

Monday, February 19, 2024

कविता 'कविता' होती- सत्य, सुंदर, मंगलाची आराधना करणारी


कविता चौधरी गेल्याची बातमी आमच्या सहकारी मैत्रिणीने-भारती शर्माने कळवली. धक्का बसला. खूप दुःख झाले. अगदी अनपेक्षित होते हे. म्हणजे मला किंवा आमच्या सहकाऱ्यांना. बातमीत ती अखेरीस हृदयविकाराच्या धक्क्याने गेली तरी कॅन्सरने बराच काळ पीडित होती, हे कळले. ती अशी आजारी आहे, याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती. आधी कळले असते तर तिला भेटता आले असते, याचे शल्य कायमचे राहणार आहे. एरवीही तिच्यासारख्या व्यक्तीचे जाणे दुःखदायकच वाटले असते; पण कोणे एके म्हणजे बत्तीस-तेहत्तीस वर्षांपूर्वी तिचे-आमचे जे नाते तयार झाले होते, त्यामुळे हे दुःख अधिक गहिरे बनले.

बातमी कळली तेव्हा मी बाहेरगावी होतो. तेथील कार्यक्रम कर्तव्य म्हणून करत होतो. पण मन अस्वस्थ होते. एक वेदनेची छाया सतत सोबत करत होती. मध्येच तिच्या आठवणीने आतून कळ येई. आता घरी परतल्यावर व्यक्त होतो आहे. मुख्यतः स्वतःसाठी. वेदनेची लसलस कमी व्हावी म्हणून. हे तिच्याविषयी कमी आणि आमच्याविषयी अधिक असेही होईल. काहीसे ऐसपैस. भावनांच्या हिंदोळ्यावरचे.

कविता चौधरी १९८९ साली दूरदर्शनवर आलेल्या ‘उड़ान’ या तुफान लोकप्रिय झालेल्या मालिकेची लेखिका, दिग्दर्शक आणि त्यातली इन्स्पेक्टर कल्याणीची प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री. त्या आधीच सर्फ च्या जाहिरातीतली ललिताजी म्हणून ती घरोघर परिचित होती. त्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी असल्याने त्यावर येणारे कार्यक्रम हे सर्वांना ठाऊक व्हायचे. ८७-८८ दरम्यान एका कार्यक्रमात मी दिसलो तर केवढी माझी प्रसिद्धी आमच्या वस्तीत झाली होती. स्त्री मुक्ती संघटनेचे ‘हुंडा नको ग बाई’ हे नाटक दूरदर्शनला झाले. आम्ही या नाटकातले कार्यकर्ते कलावंत होतो. उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरुन परतताना सकाळी जळगावला ट्रेन मध्ये चढलेला जवळपास प्रत्येक जण आम्हाला उत्सुकतेने पाहू लागला. रात्रीच्या नाटकातले लोक तुम्हीच का असे काहीजण विचारु लागले. मग आम्हाला कळले की आदल्या रात्री हे नाटक टीव्हीला झाले होते. आम्हाला प्रवासात असल्याने कल्पना नव्हती. आमच्या बाबतीत हे घडत असेल तर उड़ान व कविता चौधरीची काय शान असेल हे आताच्या अनंत वाहिन्या व विविध माध्यमांत धुवांधार न्हाणाऱ्या पिढीला कळणेच शक्य नाही.

छोटी कल्याणी पिंजऱ्याची झडप उघडते आणि आतला पोपट बाहेर पडून मोकळ्या आकाशात भरारी घेतो. त्याकडे हर्षोल्हसित नजरेने मान वर करुन पाहणाऱ्या कल्याणीच्या डोळ्यांतील उड्डाण हजारो-करोडो मुलींना मुक्त अवकाशात झेपावयाचे नवे स्वप्न, अदम्य प्रेरणा देऊन गेले.

एक पोलीस इन्स्पेक्टर बाई आमच्या कामगार नेता असलेल्या मित्राला-मिलिंद रानडेला चार वर्षांपूर्वी कुठच्या तरी आंदोलनावेळी भेटल्या होत्या. त्यावेळी झालेल्या बोलण्यात उड़ान मुळे प्रेरित होऊन त्या पोलिसात आल्याचे त्या म्हणाल्या. आता कविता गेल्याचे कळल्यावर तिचा मिलिंदशी संबंध होता हे ठाऊक असल्याने या पोलीस इन्स्पेक्टर बाईंनी मिलिंदचा फोन नंबर मिल्स स्पेशलच्या सहाय्याने मिळवून त्याला फोन केला. कविता गेल्यावर ज्या काही पोस्ट फेसबुकवर आल्या त्यात काहींनी आपण ७-८ वर्षांचे असताना या मालिकेचा प्रभाव कसा पडला, विशेषतः त्यातील पिंजऱ्यातून मुक्त होऊन झेपावताना छोट्या कल्याणीचे डोळे कसे प्रेरक ठरले हे आवर्जून नोंदवले आहे.

अशी ही ‘उड़ान’ मालिका पाहून आमचे गुरु भाऊ फाटक यांनी कविता चौधरीला पत्र लिहिले. भाऊ स्वातंत्र्य सैनिक, लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते, शिक्षक चळवळीतले नेते, माजी शिक्षक आमदार. मार्क्सवादी भाऊ फाटक साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातल्या, खरं म्हणजे समाजाच्या सर्वांगांत घडत असलेल्या उन्नत-उदात्त अंकुरांचा वेध घेत असत. त्यांच्याशी संपर्क-संवाद साधायचा प्रयत्न करत असत. आणि आम्हाला त्याच्याशी जोडून द्यायची खटपट करत असत. भारत आणि जगातील सगळ्याच प्राचीन-अर्वाचीन प्रगतीशील परंपरांतून योग्य तो बोध आणि त्यांचा उचित आदर राखण्याचा संस्कार भाऊ आमच्यावर करत असत. अभ्यास मंडळांत बुद्ध, येशू, ज्ञानेश्वर, गांधीजी, नेहरु, साने गुरुजी, खांडेकर अशा अनेकांच्या शिकवणीचे, साहित्याचे संदर्भ देताना, त्यांच्या जीवनातील उदात्त प्रसंग कथन करताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. आम्हालाही गहिवरुन येई. मन उन्नत होत असे. सगळ्यांशीच आपण पूर्णतः सहमत नसू. पण तरीही त्यांनी समाजाला पुढे न्यायचा केलेला प्रयत्न त्यांच्या परीने मनापासून होता आणि त्यांच्या काळाच्या मर्यादेत तो समाजाची धारणा करणाराच होता, हे आपण नीट ध्यानात घ्यायला हवे, हे सूत्र भाऊ आमच्या मनावर बिंबवत असत. आजवरच्या तत्त्वज्ञान्यांनी केवळ जगाचा अर्थ लावला आणि जग बदलण्याचा मुद्दा केवळ मार्क्सनेच लक्षात आणून दिला (आणि म्हणून जग बदलण्याचा मक्ता केवळ मार्क्सवाद्यांकडेच आहे) हा भाऊंना अहंभाव वाटे. ज्या भांडवलशाही, साम्राज्यवादाच्या काळात मार्क्स जन्माला आला त्या काळातले विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थविचार यांचे परिशीलन करुन समाजविकासाच्या मापनाचे आणि प्रगतीशील लढ्यासाठीच्या आयुधांचे शास्त्र, दृष्टी मार्क्सने दिली याबद्दल मात्र त्यांची खात्री होती.

प्रसिद्धीच्या झोतात व लोकप्रियतेत बऱ्याच उंचीवर असलेल्या कविता चौधरीला अशी शेकडो पत्रे येत असताना, ती भाऊंच्या पत्राची दखल घेईल का, ही तशी शंकाच होती. तिचे कार्यक्षेत्र आणि तिची वाढ झाली ते ठिकाण लक्षात घेता भाऊंचा परिचय आणि आम्हाला वाटणारी त्यांची थोरवी तिला ठाऊक असण्याचा संभव नव्हता. पण भाऊंची ही भूमिका आणि मुख्य म्हणजे त्यांची वृत्ती पत्रातून कविताला भावली. तिने भाऊंना प्रतिसाद दिला. ती भाऊंना भेटायला आली. पुढे येतच राहिली. भाऊंशी एकप्रकारे पितृत्वाच्या भावनेने ती जोडली गेली.

भाऊंचे अस्तित्व काही एकट्याचे नव्हते. आम्ही सगळे त्यांच्या अस्तित्वाचा भाग होतो. कविताशी आम्ही जोडले गेलो. आम्ही पंचविशी-सत्ताविशीतले तर कविता बत्तीशीतली असावी. हा वयोगट एकूण तरुण म्हणून गणला जाणारा. आम्ही महिला, कष्टकरी, दलित समूहांत चळवळी करणारे लोक. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रांत रुची असणारे आमच्यात काही जण होते. तरीही कविताच्या सिनेक्षेत्राशी, त्यातील लेखन वा सर्जनशीलतेशी आमचा काहीही संबंध नव्हता. कविता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, एफटीआय मधून शिकलेली. अनुपम खेर, सतीश कौशिक तिचे सहाध्यायी. एकदा तिने तिच्या घरी आम्ही गेलो असताना आमच्या आधी तिला भेटायला आलेल्या सतीश कौशिकची ओळख करुन दिली होती. कविता विचारांनी, भावनांनी आमच्याशी जोडली गेली तरी आमच्या तळच्या विभागांतील कामांशी तिचा संबंध नव्हता. भाऊंशी संबंधित आलेला कोणी केवळ चर्चा-संवादापुरता राहत नसे. भाऊंचाही चर्चा-संवादाचा हेतू हा प्रत्यक्ष कामाशी जोडून घेणे किंवा नवे काम तयार करणे हाच असे. कविताच्या क्षेत्रात आम्ही काही करावे हा मुद्दाच नव्हता. मात्र आमच्या काही चळवळींत ती सहभागी होऊ लागली.

रामजन्मभूमीच्या आंदोलनाने जोर पकडला होता. ‘मंदिर वहीं बनायेंगे’ चे नारे बुलंद होत होते. सामाजिक सलोखा बिघडू नये, चर्चेने हा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही सह्यांची मोहीम सुरु केली होती. ‘मंदिर बनाओ-पर मस्जिद ना तोड़ो; सवाल सुलझाने के लिए चर्चा करो; चर्चा से हल नही निकला तो न्यायालय का निर्णय मानो; दोनो तरफ की धर्मांधता का हम विरोध करते हैं; देश की एकता अखंड रखनेका संकल्प दोहराते हैं.’ या मसुद्यावर आम्ही लोकांच्या सह्या घेत होतो. स्टेशनच्या बाहेर, चौकांत उभे राहून गाणी, घोषणा व भाषणे देऊन लोकांना आम्ही सह्या करण्याचे आवाहन करत असू. या मोहिमेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असे. मंदिराच्या बाजूने पण हिंसेच्या विरोधातले हिंदू सह्या करायला पुढे येत असत. मुस्लिम तर पाठिंबा देतच. या कार्यक्रमांना कविता येऊ लागली.

पण तिची लोकप्रियता अडचणीची व्हायला लागली. तिला पाहायला लोक लोटत असत. तिच्याशी बोलायला, तिला आपल्याकडे बोलवायला धडपडत असत. एकदा कुर्ला स्टेशनबाहेरील कार्यक्रमानंतर एका चाळीत लोकांच्या आग्रहाखातर ती गेलीही. आम्ही सोबत होतो. लोकांचे तिच्यावरचे प्रेम आणि तिची ऋजुता यांचा मनोहारी संगम तिथे पाहायला मिळाला.

आमच्या चेंबूर लोखंडे मार्गावरील वस्तीतल्या घरीही ती एकदा आली. सुवर्णाने केलेले पोहे तिला खूप आवडले होते. मिलिंद सोबत होता. माझे लग्न आंतरजातीय. बायको सवर्ण. मध्यमवर्गातली. तिच्या मित्रमैत्रिणी तसेच चळवळीतले संबंध यांमुळे आमच्या घरी वरच्या थरातल्या लोकांची ये-जा हे आमच्या गल्लीतल्या लोकांना नवे नव्हते. पण साक्षात कविता चौधरी म्हणजे भलताच प्रकार होता. तिच्या दर्शनाला सगळ्या मार्गावर लोक घरातून बाहेर पडून उभे. मला काहीसे ओशाळल्यासारखे झाले. आपली प्रतिमा उजळायला हिरो-हिरॉईनसोबत काही लोक जवळीक दाखवतात, तसे काहीसे आपले होते आहे, असे वाटले.

तिच्या या लोकप्रियतेपायी कार्यक्रमाचा किंवा आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला पडू नये आणि तिलाही त्रास होऊ नये, म्हणून बुरखा घालून ती काही ठिकाणी येऊ लागली. मला आठवते स्त्री मुक्ती संघटनेतर्फे पालीला काढलेल्या एका मोर्च्यात नीला लिमयेसोबत ती अशीच बुरखा घालून गेली होती.

वर उल्लेख केलेल्या मंदिर-मशीद प्रश्न सलोख्याने सुटावा यासाठीच्या सह्यांच्या मोहिमेने लोकशाहीवादी शक्तींच्या एकजुटीला चालना दिली. या सर्वांची मिळून ‘राष्ट्रीय एकता समिती’ तयार झाली. तिने प्रचंड मोठा मोर्चा ४ डिसेंबर १९९२ ला आझाद मैदान ते डिलाईल रोड असा उलटा काढला होता. धर्मांध शक्तींना विरोध व सलोखा राखला जाण्याचे आवाहन करणारा हा मोर्चा हिंदू-मुस्लिम वस्त्यांतून गेला. फारुख शेख राष्ट्रीय एकता समितीच्या या बैठकांना अनेकदा आला आहे. कधी कोपऱ्यात बसला, कधी बोलला. अत्यंत निगर्वी, समाजात सलोखा नांदावा यासाठी मनापासून इच्छा व शक्य ते प्रयत्न करणाऱ्यांतला फारुख शेख. मागे त्याच्या निधनानंतर मी त्याबद्दल लिहिले होते. कविता या बैठकांना असे. पुढे मशीद कोसळवली गेल्यावर दंगली झाल्या. आम्ही धारावीत शांततेचे आणि दंगलपीडितांच्या पुनर्वसनाच्या कामात व्यग्र झालो. या कामात कविता चौधरी सहभागी असे. भीम रास्करने त्याचा उल्लेख आपल्या फेसबुक पोस्टवर कविता गेल्यावर केला आहे.

ती मुंबईला कशी आली वगैरे बोलताना एकदा ती दिल्ली किंवा उत्तरेकडेच्या अन्य शहरांच्या तुलनेत स्त्रियांच्या बाबत मुंबई खूप सुरक्षित वाटते असे म्हणाली.

एक गमतीचा प्रसंग आठवला. कविताने आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलावले. अगदी आग्रहाने. आम्ही आठ-नऊ जण असू. तिच्या घरी जेवण बनवायला महाराज. ते फुलके बनवत. कविता वाढे. एक फुलका म्हणजे आमचा एक घास. दुसऱ्या फुलक्याची प्रतीक्षा करावी लागे. कविता यजमान. ती सोडून आम्ही सगळे एकदम जेवायला बसलो होतो. आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. ‘भरपूर खा, पण पुन्हा मागू नको’ अशी अवस्था झालेली. आता काय केले आठवत नाही. हळूहळू खाल्ले किंवा थांबून वाट पाहिली. काही का असेना. आम्हाला घरी बोलावून जेवू घालण्याची कविताची इच्छा आम्ही अखेर पूर्ण केली.

कविताचे सस्मित, मृदू बोलणे हे तात्विक कवितेसारखेच असे. पण दुर्बोध, अगम्य नव्हे. तिचे डोळे आणि वाणी यांतून भावना झरत असत नि थेट आपल्या अंतरात उतरत असत. सत्य, सुंदर, मंगलाची ती नित्य आराधनाच असे. त्यातून जागवल्या जाणाऱ्या संवेदना विश्वाचे आर्त मनी प्रगटवणाऱ्या, अफाट करुणेचे अवगाहन करणाऱ्या होत्या.

हे प्रत्यक्ष तसेच पडद्यावरही. उड़ानच्या व्हिडिओ कॅसेट मिळवून आम्ही एकत्र पाहू लागलो. चळवळीतल्या इतर सोबत्यांना दाखवू लागलो. शिबिरांत त्याचे शो लावू लागलो. यातला प्रत्येक भाग आणि त्यातील संवाद हे मूल्यभान देणारे आहेत. वृत्ती नितळ, निकोप करणारे आहेत. त्यातली कित्येक विधाने तर कविताच आहेत.

त्यातले बारीक तपशील वा शब्द जसेच्या तसे मला आता आठवत नाहीत. पण मुख्य सूत्र मनावर कोरले गेले आहे.

कल्याणी आणि तिचे वडिल हातात हात घालून धावत आहेत. मुलगी म्हणते- “बाबा, इसी तरह हात पकड़कर दौडे़ंगे, तो हममें से कोई आगे कैसे जाएगा?”

बाबा म्हणतो- “जो मजा साथ दौड़ने में है, वो आगे निकलने में कहाँ?”

आणखी एका प्रसंगात तिचे कवितेसारखे निवेदन आहे – “मेरा हाल मेरा कहाँ है, वो जुड़ा है इस व्यवस्था से. वो बदलेगा तभी, जब हाल बदलेगा व्यवस्था का.”

उड़ान ही अख्खी मालिका अशा विचार व वृत्तीची मशागत करणाऱ्या संवाद, निवेदन व प्रसंगांनी भरलेली आहे. त्यातल्या निवडक क्लिप्स एकत्र करुन तासाभराची एक संक्षिप्त आवृत्ती करता आली तर ती विविध ठिकाणी शिबिरांत वापरता येईल तसेच यू ट्यूब व अन्य माध्यमांतून प्रसारित करता येईल. सम्यक समाजमन घडवण्याचा तो ऐवज होईल आणि कविता चौधरीची तिच्या विचार-भूमिकांसह स्मृती जपता येईल.

कविता गेल्यावर अश्विनीला (आमची सहकारी मैत्रिण) मेसेज केला – कविताची कविता पाठव. अश्विनी निगुतीने अशा बाबी सांभाळते. तिच्या सुंदर हस्ताक्षरात तिने कविताची ‘उड़ान’ ही कविताच पाठवली. (भीमने अश्विनीच्या हस्ताक्षरातली संपूर्ण कविता फेसबुकवर टाकली आहे.) या कवितेतले काही अंश खाली देत आहे –

‘जैसे पैदा होना, मरना, ब्याह इन सबका एक दिन आता है

वैसेही सोचनेवाले की जिंदगी में वह एक दिन आता है,

जब वो पूछ बैठता है खुदसे -

कितना समय दिया मैंने अपनी ख्वाईशों और कमजोरियों को

और कितना आया मेरे समाज के हिस्से...

सबसे बड़ी लड़ाई तो यही है,

सबसे बड़ी जित भी यही, मुक्ती भी, उड़ान भी

जब मैं अपने छोटे से 'मै' से मुक्त होकर

घुलमिल जाऊँगा सब में, और समझ जाऊंगा की -

यह भी मै और और वह भी मै, और इन सबों में बसा मेरा खुदा...

तब क्या आसमान खुद चलकर मेरे घर ना बस जाएगा?’

तिचा व भाऊंचा आणि मग आमचा स्नेह जमला तो या सामायिक भूमिका व वृत्तीमुळे. व्यक्ती समष्टीचा घटक आहे. समष्टी अथवा समाजातील प्रत्येकजण माझा अंश आहे. आम्ही सारे परस्परावलंबी आहोत. माझे सुख-दुःख इतरांच्या सुख-दुःखाशी निगडित आहे. हा समाज सुखी होणे म्हणजे मी सुखी होणे ही भूमिका आमची समान होती. दुसरे म्हणजे ‘मी’ पणातून मुक्त होण्याची वृत्ती. भाऊ याबद्दल टाकीला घाव घालावेत तसे आमच्यावर घालत असत.

एक इच्छा तेव्हा आणि आमचा संपर्क कमी किंवा थांबल्यानंतरही होती ती म्हणजे – तिला समजून घेणारा जोडीदार मिळावा. उड़ान मधले पडद्यावरचे शेखर कपूर आणि तिचे उमलणारे नाते मोहून टाकणारे आहे. असे नाते प्रत्यक्ष तिच्या जीवनात अवतरावे, असे सतत वाटे.

तिच्या थरातले आम्ही नव्हतो. तिच्या क्षेत्रात आमचा वावर नव्हता. त्यामुळे इच्छेपलीकडे काहीच करु शकत नव्हतो. दुसरे म्हणजे अगदी रास्तपणे वैयक्तिक नात्यात वा तिच्या क्षेत्रातील व्यावसायिक व्यवहारांत तिची तडजोडीची तयारी नव्हती. ती करणे म्हणजे ती न उरणे असेच होते.

यामुळेच उड़ाननंतर तशी भरारी मारण्याची संधी तिला मिळाली नाही. वैयक्तिक नात्याचेही तसेच असावे. एका मर्यादेनंतर तिचा आणि आमचा सामायिक दुवा फारसा राहिला नाही. तो विरत गेला. (स्त्री मुक्ती संघटना व ज्योती म्हापसेकरांशी तिचे संबंध बराच काळ होते. शेवटच्या काळात त्यांचाही संपर्क नव्हता, असे त्यांच्याशी बोलताना कळले.) हा संबंध विरत गेला, थांबला तरी ती कायम आमच्या जाणिवांत होती. कोणतेही मतभेद किंवा भौगोलिक अंतर असे काहीही कारण नव्हते. तिचा अवकाश तिला हवा. आपल्या अवकाशात ती फार काळ वावरु शकणार नाही, हे कळत होते.

भारतीकडून ती गेल्याचा मेसेज आल्यावर मला धक्का बसला, आपण तिला एकदा भेटायला हवे होते. ते राहून गेल्याची चुटपूट कायम राहील, अशी प्रतिक्रिया मी दिली. त्यावर भारतीचा मेसेज आला – ‘खूपच वाईट वाटले,एखादी जवळची व्यक्ती अचानक निघून जावी न भेटता बोलता...इतकी वर्षे काही संपर्क नव्हता, अश्विनी ने प्रयत्न केले होते बरेचदा,पण काही पत्ता लागला नाही. आपल्या बाजूने जिव्हाळ्याचं नातं होतं, तिच्या मनाचा मात्र थांगपत्ता लागला नाही.’

आता तो लागणारही नाही. प्रौढ समंजसपणाने आम्हीही संपर्क कमी केला, हे योग्यच होते असे मला वाटते. भाऊ गेल्यावर तर तो थांबलाच.

त्यामुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींचे वर्तमान आम्हाला ठाऊक नव्हते. ती मुंबईतच आहे, असे मी गृहीत धरुन होतो. प्रत्यक्षात तिच्या मूळ गावी अमृतसरला सध्या ती होती. तिथेच ती गेली. ती आजारी होती, हेही ठाऊक नव्हते.

ती गेल्यावर तिच्याविषयी काही मिळते का, तिने स्वतः काही म्हटल्याचे सापडते का ते गूगल करुन शोधले. फार काही मिळाले नाही. एक-दोन सिरियल्स तिने केल्याचे कळले. मात्र त्याविषयीच्या एका मुलाखतीत तिने म्हटले ते तीच कविता अजूनही ताजी आहे, याचा पुरावाच आहे. ती म्हणते -

“आज प्रोग्राम मशीनी हो गये हैं. टेक्निकली विकास हुआ है. उनमें ग्लैमर आ गया है. पहले धारावाहिकों का एक स्तर होता था. लेकिन आज सब कमर्शियल हो चुके हैं. लेकिन मैं इस दौड़ में शामिल नहीं हूं.”

...प्रगतीच्या, यशाच्या प्रचलित निकषांच्या स्पर्धेत ती आम्हाला तीन दशकांपूर्वी भेटली तेव्हाही नव्हती आणि हे जग सोडतानाही नव्हती हे आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. आम्ही तिचे होतो की नव्हतो हा संदर्भ आता संपला आहे. पण ती आमची होती. शेवटीही होती तशीच होती हे अभिमानाने स्मरणात राहील.

अश्विनीने पाठवलेल्या तिच्या कवितेच्या पुढच्या काही ओळी देऊन हे दीर्घ व्यक्त होणे थांबवतो.

‘…पर वहाँ तक पहुँचने के लिए

पहले तो मीलों मील चलना है मुझे,

पकना है, और पकना है,

बीच में ना सुस्ताना है,

तारीफों की सराई में

ना मोझिम होना है, मेरी तरफ उठी किसी उंगली से...

उड़ना है मुझे वहाँ तक.

मेरे बाबा के कहे आसमान तक

तसल्ली तो यह है कि हर एक तेज रौं के साथ,

थोड़ी दूर तो चल पायी हूँ मै

...क्या यह कम है प्रेरणा के लिए?’

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Wednesday, January 31, 2024

इंडिया अर्थात भारत

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपतींनी जी – २० परिषदेच्या स्नेहभोजनासाठी पाठवलेल्या एका निमंत्रणात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ हा नेहमीचा प्रघात मोडून ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्याआधीच झालेल्या विरोधकांच्या आघाडीने आपले नाव ‘इंडिया’ असे जाहीर केल्याने सत्ताधारी भाजपने हे जाणीवपूर्वक केले, असा विरोधकांचा आरोप होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले, “इंडिया हे परदेशी लोकांनी दिलेले नाव असून भारत हे या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेतले नाव आहे.” त्यावर विरोधकांचा प्रतिप्रश्न होता- “आतापर्यंत तुम्हीच ‘इंडिया शायनिंग’, 'डिजिटल इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'न्यू इंडिया' असे शब्दप्रयोग जोरात प्रचारले आहेत, मग आताच ‘इंडिया’ शब्दाबद्दल तुम्हाला तिटकारा कसा वाटू लागला?”
या वादाने सामान्य माणसांच्या मनात मात्र गोंधळ तयार झाला. देशाचे योग्य नाव काय? – इंडिया की भारत? यावर वर्तमानपत्रे तसेच अन्य माध्यमांतून बरेच लिहिले गेले तरी अजूनही अनेकांच्या मनात याबद्दल प्रश्न आहेत. याचे सरळ उत्तर ‘दोन्ही’ असे आहे. ‘कोणी गोविंद घ्या-कोणी गोपाळ घ्या’ या धर्तीवर कोणी भारत म्हणा, कोणी इंडिया म्हणा. ही दोन्ही आपल्या देशाची घटनेत नोंदवलेली अधिकृत नावे आहेत.
आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये इंग्रजीत ‘इंडिया, दॅट इज भारत, शल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे. घटनेच्या मराठी अनुवादात ‘इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल’ तर हिंदी अनुवादात ‘भारत, अर्थात इंडिया, राज्यों का संघ होगा’ असे म्हटले आहे. इंग्रजी व मराठीत ‘इंडिया’ शब्द प्रथम; तर हिंदीत ‘भारत’ प्रथम आहे. भारतीय पासपोर्टवर ‘भारत गणराज्य’ आणि ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ असे अनुक्रमे देवनागरी व रोमन लिपीत लिहिले जाते. सर्वसाधारणपणे इंग्रजीत ‘इंडिया’ आणि अन्य भारतीय भाषांत ‘भारत’ असे लिहिण्याचा प्रघात आहे. पण इंडिया आणि भारत हा असा दोन्ही नावांचा गोंधळ करण्यापेक्षा केवळ भारत हेच नाव का नाही आपण स्वीकारले? …हा प्रश्न जुना आहे. संविधान सभेत यावर वाद झडले. त्यानंतर ही दोन्ही नावे स्वीकृत झाली.
इंग्रजांच्या अमलाखाली आपला देश असताना देशांतर्गत तसेच एकूण जगाशी होणाऱ्या व्यवहारात ‘इंडिया’ हेच नाव प्रचलित होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत इंडिया, हिंदुस्थान, भारत ही तीन नावे सार्वत्रिक होती. तथापि प्रशासकीय व आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांतल्या सोयीसाठी इंग्रजांनी प्रचलित केलेले इंडिया हेच नाव आपण प्रथम स्वीकारले. जवाहरलाल नेहरु यांनी १३ ऑगस्ट १९४६ रोजी संविधान सभेच्या अगदी प्रारंभी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यात देशासाठीचे संबोधन केवळ ‘इंडिया’ असे होते. १ ऑक्टोबर १९४७ ला संविधान सभेचे सल्लागार बी. एन. राव यांनी सादर केलेल्या संविधानाच्या प्राथमिक मसुद्यातही फक्त ‘इंडिया’ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने ४ नोव्हेंबर १९४८ ला संविधान सभेत सादर केलेल्या संविधानाच्या मसुद्यातही देशाचे नाव ‘इंडिया’ एवढेच होते. घटनेशी संबंधित अत्यंत महत्वाच्या अशा या तिन्ही दस्तावेजांत ‘भारत’ हे नाव आलेले नव्हते. डॉ. आंबेडकरांनी सादर केलेल्या मसुद्यात आपल्या देशाचे ‘मूळ नाव’ का नाही याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप नोंदवले. या मुद्द्यावर चर्चा मात्र साडेदहा महिन्यांनी झाली. १७ सप्टेंबर १९४९ रोजी आपल्या मसुद्याच्या अनुच्छेद १ मध्ये दुरुस्ती करणारा प्रस्ताव डॉ. आंबेडकरांनी संविधान समितीत मांडला. ‘इंडिया शल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ ऐवजी ‘इंडिया, दॅट इज, भारत शल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ असा हा दुरुस्ती प्रस्ताव होता. या दुरुस्तीत इंडियासह भारत शब्दाचा प्रथमच संविधानात समावेश झाला.
या दुरुस्तीवर १८ सप्टेंबर १९४९ रोजी चर्चा झाली. या चर्चेत आलेल्या सूचना ‘भारत’ हा शब्द प्रमुख करण्याबाबत होत्या. ‘इंडिया म्हणजेच भारत’ याऐवजी ‘भारत, जो इंडिया नावाने ओळखला जातो’ असा शब्दप्रयोग करण्याची सूचना एच. व्ही. कामत यांनी केली. त्यांची दुसरी पर्यायी सूचना होती – ‘हिंद, अथवा इंग्रजी भाषेत इंडिया’ असा शब्दप्रयोग करावा. सेठ गोविंद दास यांनी ‘भारत, जो बाहेरच्या देशांत इंडिया नावानेही ओळखला जातो’ असे लिहिण्याची सूचना केली. इंडिया हा शब्द आपल्या प्राचीन ग्रंथांत आढळत नाही. तो ग्रीकांच्या आगमनानंतर आला. त्यांनी आपल्या सिंधू नदीला इंडस म्हटले व या इंडसवरुन इंडिया आला. वेद, उपनिषदे, पुराणे, ब्राम्हणे, महाभारत या प्राचीन वाङ्मयांत भारताचे उल्लेख आढळतात, ह्यु एन त्संग या चिनी प्रवाशाच्या प्रवासवर्णनातही भारताचा उल्लेख आढळतो, असा त्यांचा युक्तिवाद होता. स्वातंत्र्यलढ्यातील आपली घोषणा ‘भारतमाता की जय’ होती याचेही स्मरण दास यांनी सभागृहाला करुन दिले. भारत शब्दाच्या समर्थनार्थ प्राचीन संदर्भ देण्यात, त्याच्या व्युत्पत्ती विशद करण्यात अनेक सदस्यांचा पुढाकार होता. कला वेंकट राव यांनी संस्कृत ‘सिंध’ चे प्राकृतात स चा उच्चार ह होत असल्याने ‘हिंद’ झाल्याची नोंद दिली. (अभ्यासक मात्र इराणच्या पर्शियन भाषेत स चा उच्चार ह होत असल्याने त्यांनी सिंधचे हिंद केले व त्यावरुनच पुढे हिंदुस्थान हे आपल्या देशाचे नाव पडले, असे नमूद करतात.) भारत, हिंदुस्थान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष अशा अनेक नावांचे उल्लेख यावेळी संविधान सभेतील चर्चांत झालेले आढळतात. गोविंद वल्लभ पंतांनी आपण आपल्या धार्मिक श्लोकांत जंबू द्वीप, भारत वर्ष, भारत खंड, आर्यावर्त आदि नावांनी देशाला संबोधत असतो याचे स्मरण दिले. दुष्यंत-शकुंतलेचा शूर पुत्र भरत आणि त्याच्या राज्याला भारत म्हटले गेल्याचा दाखलाही पंत देतात.
कमलापती त्रिपाठी कामतांना पाठिंबा देताना म्हणतात – “जर ‘दॅट इज’ शब्द आवश्यक असतील तर ‘भारत, दॅट इज, इंडिया’ असे नोंदवणे अधिक योग्य राहील.” ते पुढे म्हणतात – “एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत आपल्या देशाने आपले सर्वस्व गमावले. आम्ही आमची संस्कृती गमावली, आम्ही आमचा इतिहास गमावला, आम्ही आमची प्रतिष्ठा गमावली, आम्ही आमची माणुसकी गमावली, आम्ही आमचा स्वाभिमान गमावला, आम्ही आमचा आत्मा गमावला... आज एक हजार वर्षे गुलामगिरीत राहिल्यानंतर, हा स्वतंत्र देश पुन्हा त्याचे नाव प्राप्त करेल... तो खरोखरच जगात त्याची प्रतिष्ठा परत मिळवेल.”
ही हजारो वर्षांची गुलामी काही इंग्रजांची नाही. पण स्वातंत्र्य लढ्यात देशाचे स्वत्व जागवताना सांस्कृतिक राष्ट्रवादाखाली हे सगळे एका सूरात म्हटले जाई. त्याचाच हा संविधान सभेतील नमुना होता.
इथे आणखी एक लक्षात घ्यायला हवे. भारत हा शब्द प्राचीन आहेच. पण हिंदुस्थान किंवा इंडिया हे काही कमी प्राचीन नाहीत. इंडिया हे नाव काही इंग्रजांनी आल्यावर दिलेले नाही. संविधान सभेतील सदस्यांनीच नोंदवल्याप्रमाणे इंडिया नावाच्या उत्पत्तीचे नाते ग्रीकांशी आहे. ते भारतात आले तो काही आधुनिक काळ नव्हता. वेदांपेक्षा कमी प्राचीन असे म्हणू. इ. स. पूर्व चौथ्या शतकाच्या आसपास ग्रीक भारतात आले. हा मौर्यांचा काळ आहे. इंडो-ग्रीक संस्कृतीच्या देवाण-घेवाणीचा हा काळ आहे. ज्याला भारतीय संस्कृती असे आपण आज म्हणतो व जिची प्रचिती चित्र, शिल्प, तत्त्वज्ञान यांतून येते ते सगळे या संकराचे फलित आहे. ग्रीकांमार्फत या देशाचे इंडिया हे संबोधन युरोपात पसरले. पुढे आधुनिक काळात भारतात आलेल्या इंग्रजांनीही तेच नाव गृहीत धरले. अधिक प्रचलित केले.
डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या अनुच्छेद १ मधील दुरुस्तीवर आलेल्या सर्व सूचना व आक्षेप अखेर फेटाळण्यात आले आणि ती दुरुस्ती मंजूर करण्यात आली. ‘इंडिया अर्थात भारत’ या शब्दावलीतून ‘इंडिया’ व ‘भारत’ ही दोन्ही नावे अधिकृत झाली.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(चतुःसूत्र, लोकसत्ता, ३१ जानेवारी २०२४)