Thursday, September 29, 2011

दारिद्र्यरेषेच्‍या वादाचे स्‍वरुप व पर्याय

‘26 रु. खेड्यात आणि 32 रु. शहरात एका दिवशी खर्च करुन जगणारा माणूस सापडू शकतो का ? नियोजन आयोगाने घातलेली ही मर्यादा गरिबांची चेष्‍टा करणारी आहे.’ असा हल्‍ला अलिकडेच नियोजन आयोगाने सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केलेल्‍या शपथपत्राच्‍या संदर्भात प्रसारमाध्‍यमांतून, कार्यकर्त्‍यांकडून जोरदार चालू आहे. हा हल्‍ला योग्‍यच आहे. तथापि, याबाबतच्‍या वास्‍तवाचे इतर पदर समजून न घेता केलेली टीका ही एकांगी शेरेबाजी ठरेल. त्‍यावरची उपाययोजना सुचवता येणार नाही. यादृष्‍टीने या वादाची संदर्भचौकट मांडण्‍याचा येथे प्रयत्‍न करत आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयात 2001 पासून सुरु असलेल्‍या अन्‍न अधिकाराच्‍या याचिकेसंदर्भातील सुनावण्‍या अजूनही चालू आहेत. अलिकडच्‍या एका सुनावणीत बीपीएलची रेशन कार्डे कोणाला दिली जातात, याबाबत नियोजन आयोगाने आपले म्‍हणणे सादर करावे, असा आदेश न्‍यायालयाने दिला होता. नियोजन आयोगाने शपथपत्राद्वारे सरळ व नेमके उत्‍तर न देता सुरेश तेंडुलकर समितीच्‍या अहवालात नमूद केलेली प्रतिदिन प्रति व्‍यक्‍ती 15 रु. व 20 रु. अनुक्रमे ग्रामीण व शहरासाठीच्‍या गरिबीसाठीची खर्चमर्यादा सादर केली. तेंडुलकर समितीने राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2004-05 च्‍या पाहणीचा तपशील आपल्‍या मापनासाठी वापरला होता. मे महिन्‍याच्‍या सुनावणीत न्‍यायालयाने या खर्चमर्यादेवर अवास्‍तव असल्‍याचे ताशेरे ओढले व आजच्‍या काळाशी सुसंगत अशी सुधारित मर्यादा सादर करण्‍याचा आदेश दिला. त्‍याप्रमाणे सप्‍टेंबरमध्‍ये सादर केलेल्‍या शपथपत्रात 26 रु. ग्रामीण व 32 रु. शहर हे सुधारित आकडे नियोजन आयोगाने नमूद केले. हे आकडे तेंडुलकर समितीचा फॉर्म्‍युला आणि राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2009-10 च्‍या पाहणीचा तपशील यावर आधारित आहेत.

शपथपत्रातील या आकड्यांवर प्रसारमाध्‍यमांतून हल्‍ला सुरु झाला. सबंध नियोजन आयोग, विधी मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय यांच्‍या मंजुरीनेच अशी शपथपत्रे सादर होतात, म्‍हणून पंतप्रधान व सरकारच यास जबाबदार आहे, असा आरोप होऊ लागला. त्‍यावर नियोजन आयोगातून, सरकारमधून प्रतिक्रिया व्‍यक्‍त होऊ लागल्‍या. नियोजन आयोगातील अभिजित सेन व अन्‍य काहींनी हे शपथपत्र आमच्‍या नजरेखालून गेलेले नाही. वास्‍तविक अशा महत्‍वाच्‍या बाबीची आधी सर्व सदस्‍यांत चर्चा व्‍हायला हवी होती, असे वृत्‍तप्रतिनिधींना सांगितले. ज्‍यांच्‍याकडे या विषयाची खास जबाबदारी होती, ते नियोजन आयोगाचे दुसरे सदस्‍य सौमित्र चौधुरी म्‍हणाले, ‘ही दैनंदिन स्‍वरुपाची बाब असल्‍याने तेंडुलकर समितीच्‍या अहवालाच्‍या सूत्रानुसारच सुधारित आकडे आम्‍ही सादर केले.’ सरकारच्‍या विधी म्‍हणजेच कायदे खात्‍याने आमच्‍याकडे मंजुरीसाठी हे शपथपत्र आलेच नव्‍हते, असे सांगितले. पंतप्रधान कार्यालयाशीही अर्थातच संपर्क करण्‍यात आलेला नव्‍हता.

हे काहीही असले शपथपत्र सरकारच्‍या वतीने जाहीर केलेले असल्‍याने सरकारला मान्‍य असलेलेच हे आकडे आहेत, असा अर्थ होतो. हे आकडे निश्चितच कमी आहेत. मुंबई व ग्रामीण महाराष्‍ट्रात कार्यकर्त्‍यांनी वरवर घेतलेल्‍या अंदाजानुसार आज हे आकडे 50 रु. व 40 रु. च्‍या आसपास असायला हवेत. अर्थात, कार्यकर्त्‍यांचे हे आकडे शास्‍त्रीय पद्धतीने काढलेले नाहीत. पण डोळ्यांनी दिसणा-या वास्‍तवाशी जुळणारे आहेत. मग नियोजन आयोगाचे शास्‍त्रीय पद्धतीने काढलेले आकडे वास्‍तवाशी जुळणारे का नाहीत ? वरील आकडे मुंबई-महाराष्‍ट्रातले आहेत. देशाच्‍या अन्‍य भागातले वास्‍तव वेगळे असल्‍याने त्‍या सर्वांची सरासरी म्‍हणून नियोजन आयोगाचे आकडे कमी झाले आहेत का ? ज्‍या राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) तपशिलावर आयोगाचे हे आ‍कडे आधारित आहेत, तिच्‍या हेतूंविषयी व शास्‍त्रीयतेवर कोणी आक्षेप घेतल्‍याचे ऐकिवात नाही. सरकारी, बिगरसरकारी समित्‍यांचे बहुतेक अहवाल NSSO च्‍याच आकड्यांवर आधारित असतात. आणि या समित्‍यांच्‍या तपशिलाचा आधार एकच असताना, निष्‍कर्षांत मात्र फरक आढळतात. (उदा. गरिबीचे प्रमाणः अर्जुन सेनगुप्‍ता- 77 टक्के, सक्‍सेना- 50 टक्‍के व तेंडुलकर- 37 टक्‍के).

याचा अर्थ, या आकड्यांचा अर्थ लावण्‍यात केवळ शास्‍त्र नसते, तर दृष्टिकोन, भूमिका, राजकारण असते, असे मानले पाहिजे. अर्थशास्‍त्र हे निव्‍वळ अर्थशास्‍त्र नसते, ते राजकीय अर्थशास्‍त्रच असते. अर्थात, असा अर्थ लावताना व आपली भूमिका प्रचारताना प्रतिपक्षाची बाजू नीट मांडणे हे केवळ नैतिकच नव्‍हे, तर ‘योग्‍य उपचारांसाठी योग्‍य निदान व योग्‍य निदानासाठी योग्‍य तपासण्‍या’ असे महत्‍व त्‍यास आहे. सोयीचे निदान चुकीच्‍या उपचारांनी भविष्‍यात गैरसोयीचेच ठरते. सोयीच्‍या प्रचाराचे एक उदाहरण पाहू. अर्जुन सेनगुप्‍ता समितीने 77 टक्‍के गरिबीचा अंदाज देताना 20 रु. प्रति दिन प्रति व्‍यक्‍ती खर्च ही मर्यादा धरली होती. तिचा आधार राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2004-05 च्‍या पाहणीचाच होता. तेंडुलकर समितीचाही आधार हीच पाहणी होती, हे वर उल्‍लेखिलेले आहेच. मग सेनगुप्‍ता समितीच्‍या अहवालावर ‘20 रु. त जगणारी एकतरी व्‍यक्‍ती दाखवा’ अशी टीका का नाही झाली ? तिथे 77 टक्‍के गरिबीचा आकडा महत्‍वाचा होता. कारण या आकड्याने ‘स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर देश अधिकाधिक गरीब झाला’ ही राजकीय लाईन प्रशस्‍त होत होती. दिवसाला 26 आणि 32 रुपयांत तुम्‍ही जगून दाखवा, असा पंतप्रधानांना आज विचारला जाणारा प्रश्‍न आधी सेनगुप्‍तांना विचारायला हवा होता.

अजून एक बाब. केंद्रातील व राज्‍यातील भाजपचे नेते सरकारवर या शपथपत्राच्‍या निमित्‍ताने तोंडसुख घेत आहेत. त्‍यांनी थोडे स्‍मरण करावे. महाराष्‍ट्रात 1997 साली रेशनच्‍या पिवळ्या (बीपीएल) कार्डांसाठीची प्रति कुटु्ंब 15000 रु. वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा ठरविली गेली. म्‍हणजे महिन्‍याला 1250 रु. त जगणारे कुटुंब किंवा दिवसाला 8 रु.त जगणारी व्‍यक्‍ती गरीब मानली गेली. या उत्‍पन्‍न मर्यादेत जगणारे कुटुंब तेव्‍हाही मिळणे असंभव होते. मनोहरपंतांच्‍या नेतृत्‍वाखालच्‍या सेना-भाजपचे सरकार तेव्‍हा होते. केंद्राने बीपीएल कार्डासाठीचा कोटा ठरवून दिला होता. गरीब निवडण्‍याची जबाबदारी राज्‍यांची होती. केंद्राने गरिबीची व्‍याख्‍या 15000 रु. अशी ठरवून दिलेली नव्‍हती. त्‍यानंतरच्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारांची कातडीही तेवढीच निबर राहिली. त्‍यांनीही यात काहीही बदल केला नाही. आज 14 वर्षांनंतरही हीच दिवसाला प्रति व्‍यक्ती 8 रु. मर्यादा रेशनसाठीच्‍या गरिबांसाठी आहे. नव्‍या सर्वेक्षणातून येणारी यादी तयार होईपर्यंत तीच राहणार आहे. 32 रु.वर हल्‍ला करणारी प्रसारमाध्‍यमे, विरोधी पक्ष आजच्‍या 8 रु. च्‍या प्रचलित गरिबीच्‍या व्‍याख्‍येवर तुटून का नाही पडले ? केंद्रात भाजपच्‍या नेतृत्‍वाखालच्‍या एनडीए सरकारच्‍या काळात 2002 च्‍या दारिद्रयरेषेच्‍या सर्वेक्षणातून देशातील गरिबांची संख्‍या 26 टक्‍के असल्‍याचे जाहीर झाले. 2000 सालापर्यंत 36-37 टक्‍के असलेली गरीबी भाजपच्‍या पुढील 2 वर्षांच्‍या ‘शायनिंग इंडिया’ कारभाराने 10 टक्‍क्यानी कमी होण्‍याचा चमत्‍कार कसा घडला, याचा खुलासा भाजपने करायला हवा होता. प्रसारमाध्‍यमांनीही त्‍यांच्‍या आजच्‍या टीकेला प्रसिद्धी देताना हा प्रश्‍न विचारायला हवा होता. कॉंग्रेसच्‍या राजवटीने स्‍वीकारलेल्‍या तेंडुलकर समितीने गरिबीचा आकडा 37 टक्‍के दिला आहे. 2004 साली सत्‍तेवर आल्‍यानंतरच्‍या कारकीर्दीत भाजपच्‍या काळात 10 टक्‍क्‍यांनी कमी झालेली गरीबी पुन्‍हा 10 टक्‍क्‍यांनी वाढवण्‍याचा चमत्‍कार तुम्‍ही कसा केलात, हे कॉंग्रेसलाही माध्‍यमांनी विचारायला हवे.

या सगळ्या गदारोळात सामान्‍य माणसांच्‍या मनाचा गोंधळ किंबहुना चुकीची समजूत होत आहे, ही गंभीर व काळजीची बाब आहे.

सेनगुप्‍ता, तेंडुलकर, एनएसएसओ या सर्वांचे निकष धोरणकर्त्‍यांना गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज घेण्‍यासाठी आहेत. आगामी सर्वेक्षण हे प्रत्‍यक्ष गरीब निवडीचे आहे. त्‍यात तुमचा दिवसाला खर्च किती, असा एकही प्रश्‍न नाही. हे प्रश्‍न सर्वस्‍वी वेगळे आहेत. प्रसारमाध्‍यमांतून गाजणा-या चर्चांमुळे जणू शहरात 32 रु.च्‍या वर व खेड्यात 26 रु.च्‍या वर खर्च करतो, असे सांगितले की आपल्‍याला दारिद्र्यरेषेच्‍या यादीत घेणार नाहीत, असा समज पसरला आहे. या वादाचा आजच्‍या तुमच्‍या सर्वेक्षणाशी ताबडतोबीने संबंध नाही, तुम्‍ही तुमची उत्‍तरे सर्वेक्षण करणा-यांना प्रामाणिकपणे द्या, असे सांगून लोकांना सर्व राजकीय पक्षांनी, संघटनांनी व प्रसारमाध्‍यमांनी आश्वस्‍त केले पाहिजे. 2 ऑक्‍टोबरपासून होऊ घातलेले सर्वेक्षण नीट होणे ही आपल्‍या सर्वांची जबाबदारी आहे.

या अंदाजाचा संबंध सर्वेक्षण पूर्ण झाल्‍यावर किती गरीब निवडायचे ही कटऑफ लाईन ठरविण्‍याच्‍यावेळी येणार आहे. त्‍यासाठीची मोर्चेबांधणी लोकांना वरील स्‍पष्‍टता देऊन स्‍वतंत्रपणे केली पाहिजे. खर्चाचे आकडे बदलले की अंदाजातही बदल होऊ शकतो. तसे सूतोवाच नियोजन आयोगाच्‍या शपथपत्रातही केलेले आहे. हा अंदाज योग्‍य असावा म्हणून गरिबांचे न्‍याय्य मापन होऊन त्‍यांची संख्‍या व निवड झाली पाहिजे. यासाठी पर्यायी मापनपद्धती मांडण्‍याची गरज आहे.

अलिकडेच बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी गरीब निवडीसाठी संख्‍येची कॅप (कटऑफलाईन, मर्यादा, कोटा) असता कामा नये, अशी मागणी केली आहे. त्‍याला प्रतिसाद देताना ग्रामीण विकास विभागाचे मंत्री जयराम रमेश यांनी तत्‍त्‍वतः मला ही गोष्‍ट मान्‍य आहे, नियोजन आयोगाशी सरकार चर्चा करेल, असे सांगितले आहे. गरीबांची यादी निश्चित करण्‍यासाठी यावेळी आपोआप वगळावयाचे लोक, आपोआप आत घ्‍यावयाचे लोक व उरलेल्‍यांना वंचिततेच्‍या निकषांनी गुणानुक्रम लावून अधिक गुणवाल्‍यांना प्रधम प्राधान्‍य अशी पद्धती वापरली जाणार आहे. या सध्‍या स्‍वीकारलेल्‍या पर्यायाबरोबरच अधिक न्‍याय व्‍हावा म्हणून त्‍यांनी दोन पर्याय मांडले आहेतः एक, सर्वेक्षणातून तयार होणा-या यादीतून कोणाला वगळायचे हे निश्चित करुन त्‍यांना वगळावे व उर्वरित सर्वांना गरिबांसाठीच्‍या योजनांचा लाभ द्यावा. दोन, कटऑफलाईनच्‍या थोडेसे वर गेल्‍याने गरिबीच्‍या यादीतून बाहेर पडावयाचा संभव असणा-यांना समाविष्‍ट करावे, त्‍यासाठी कटऑफलाईन सैल ठेवावी.

माझे म्‍हणणे असेः

} केंद्राची संसाधनांची तथाकथित मर्यादा व राज्‍यांची केंद्रावरच अधिक जबाबदारी ढकलण्‍याची वृत्‍ती या कारणांनी आपल्‍याला सोयीच्‍या संख्‍यामर्यादेएवढेच गरीब देशात आहेत, असा अंदाज शास्‍त्रीय म्‍हणून सांगण्‍याचा आभास बंद व्‍हायला हवा.

} न्‍याय्य व आजच्‍या काळातील विकसित जीवनमानाला आवाक्‍यात घेणा-या निकषांवर आधारित गरीब ठरावेत.

} गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज रुपयांत व निवड सामाजिक-आर्थिक निकषांनी हे विसंगत आहे. अंदाज व निवडीचे निकष सुसंगत हवेत.

} हे निकष खर्चावर आधारित रुपयांच्‍या भाषेत नको. रुपयांची भाषा फसवी असते. फुटपाथवर राहणा-याची, भिक मागून जगणा-याची, शरीरविक्रय करणा-या असहाय्य स्‍त्रीची मिळकत भले अधिक असली, तरी त्‍यांचे जगणे अशाश्‍वत व मानवी प्रतिष्‍ठेच्‍या दृष्‍टीने सन्‍मान्‍य नसते. हे निकष सामाजिक-आर्थिकच हवेत. जमतील तेवढे एकेरी हवेत. (उदा. हाताने मैला साफ करणारे, कचरा वेचक, मोलकरीण, नाका कामगार, आदिम जमात, वेश्‍या, हिजडे, माळावर पाल टाकून राहणारे भटके, फुटपाथवर राहणारे, सायकल रिक्‍शावाले इ.)

} या सर्व गरिबांची समग्र यादी (मग ती 37 टक्‍के किंवा त्‍याहून कितीतरी अधिक झाली तरी चालेल) करावी.

} या यादीतील गुणानुक्रमे अल्‍पगुणवाले सर्वप्रथम या रीतीने केंद्राने आपल्‍या संसाधनांच्‍या मर्यादेत सहाय्य द्यावयाच्‍या गरिबांची संख्‍या निश्चित करावी. त्‍यावरील गरिबांची जबाबदारी राज्‍यांनी घ्‍यावी.

या सर्वाचा महाराष्‍ट्रावर जो परिणाम होणार आहे, त्‍या संदर्भात एक नोंद देऊन हे विवेचन संपवितो.

सरकारने ग्राह्य धरलेल्‍या तेंडुलकर समितीने महाराष्‍ट्रासाठी दिलेला अंदाज असा आहेः शहर- 25.6 टक्‍के, ग्रामीण- 47.9 टक्‍के व एकूण 38 टक्‍के. हा अंदाज आधीच्‍या अंदाजापेक्षा अधिक आहे. सरकारने हाच अंदाज ठेवून आगामी सर्वेक्षणातून गरीब निवडले तरी ते पहिल्‍यापेक्षा अधिक असतील. रेशनमध्‍ये हे प्रकर्षाने लक्षात येईल. रेशनची अंत्‍योदयची कार्डे (2 रु. गहू व 3 रु. तांदूळ एकूण 35 किलो धान्‍य दरमहा मिळणारी) आज 22 टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहेत. ती प्रस्‍तावित अन्‍नसुरक्षा कायद्यानुसार ग्रामीण महाराष्‍ट्रात 46 टक्‍के होतील. मुंबई शहरात अंत्‍योदय-बीपीएल मिळून 1 टक्‍के रेश‍नकार्डे आहेत. पुण्‍यासारख्‍या अन्‍य शहरांमध्‍येही ती 5-6 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाहीत. या सर्व ठिकाणी अंत्‍योदयच्‍या दराने रेशन मिळणा-यांची संख्‍या 28 टक्‍के होईल. गरीबीच्‍या यादीचे तसेच प्रस्‍तावित कायद्याचे सर्व सोपस्‍कार अजून पूर्ण व्‍हायला अवकाश असल्‍याने हे सगळे आजतरी ‘जर-तर’च्‍या भाषेतच मांडावे लागणार. अर्थात, जे होईल, ते महाराष्‍ट्रात आधीच्‍या तुलनेत पुढेच जाणारे असेल, ही शक्‍यता दांडगी आहे.

- सुरेश सावंत

Thursday, September 15, 2011

‘गरिबीचे न्‍याय्य मापन झालेच पाहिजे’ या मागणीसाठी एक दिवसीय धरणे

ऑक्‍टोबरमध्‍ये सुरु होणा-या दारिद्र्यरेषेच्‍या सर्वेक्षणात

‘गरिबीचे न्‍याय्य मापन झालेच पाहिजे’

या मागणीसाठी

एक दिवसीय धरणे

20 सप्‍टेंबर 2011, दु. 12 ते सायं. 5, आझाद मैदान, मुंबई

जातीच्‍या जनगणनेबरोबरच दारिद्र्यरेषेच्‍या सर्वेक्षणाला जूनपासून देशभर सुरुवात झाली असून येत्‍या 2 ऑक्‍टोबरपासून महाराष्‍ट्रातील ग्रामीण व शहरी भागात ते सुरु होत आहे. डिसेंबरअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याआधीच्‍या 1997 तसेच 2002 च्‍या सर्वेक्षणांचा अनुभव चांगला नव्‍हता. असंख्‍य पात्र गरी‍ब त्‍यातून वगळले गेले होते. चुकीचे वा अपुरे निकष तसेच सर्वेक्षणातील त्रुटी यामुळे असे घडले.

यावेळच्‍या सर्वेक्षणात असे होऊ नये यासाठी राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियान केंद्र सरकारशी पाठपुरावा करत असून महाराष्‍ट्र सरकारकडे राज्‍य अन्‍न अधिकार अभियान पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्‍या दरम्‍यान, या अत्‍यंत महत्‍वाच्‍या सर्वेक्षणासाठी सरकार सिद्ध असल्‍याचे दिसले नाही. जेमतेम 12 दिवसांत प्रगणकांचे प्रशिक्षण तसेच अन्‍य यंत्रणा राज्‍य सरकार कशी उभारणार आहे, हे कळत नाही. यावेळी देशात प्रथमच शहरांचेही सर्वेक्षण होणार असल्‍याने त्‍यासाठीची तयारी तर अधिकच करणे गरजेचे आहे. तथापि, हे सर्वेक्षण करण्‍याची जबाबदारी असणा-या महानगरपालिका, नगरपालिकांना अजून याची पुरेशी खबरबातच नाही. शहरी भागासाठी गरीब ठरविण्‍याचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत.

प्रस्‍तावित अन्‍न सुरक्षा कायदा, राजीव आवास योजना इ. अनेक योजनांसाठी या सर्वेक्षणातून तयार होणारी गरिबांची यादी पुढील 5 वर्षांसाठी आधार मानली जाणार आहे. यादृष्‍टीने हे सर्वेक्षण निर्दोष व न्‍याय्य होणे गरजेचे आहे. तथापि, सरकारची वरील अवस्‍था पाहता, पुन्‍हा जुन्‍या सर्वेक्षणांतील उणिवांची पुनरावृत्‍ती होण्‍याचीच शक्‍यता दिसते.

अशावेळी जागृत नागरिक म्‍हणून आपण सरकारला याचा जाब विचारला पाहिजे व सर्वेक्षणासाठीची आवश्‍यक ती सिद्धता युद्धपातळीवर करुन गरिबीचे न्याय्य मापन करायला भाग पाडले पाहिजे.

या हेतूने अन्‍न अधिकार अभियानाशी संबंधित राज्‍यातल्‍या संघटनांनी 20 सप्‍टेंबर 2011 रोजी दु. 12 ते सायं. 5 या वेळात आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय धरणे आयोजित केले आहे. यावेळी सरकारला सर्वेक्षणाच्‍या गांभीर्याबाबतचा इशारा देत असतानाच संभाव्‍य त्रुटी दूर करुन गरिबीचे न्याय्य मापन होण्‍यासाठीच्‍या सूचनाही करण्‍यात येणार आहेत.

प्रश्‍नाचे महत्‍व व तातडी लक्षात घेता, आपण या धरणे आंदोलनात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे तसेच आपल्‍या संपर्कातील जास्‍तीत जास्‍त लोकांना, संघटनांना हे पत्रक पाठवून आंदोलनात सहभागी होण्‍याचे आवाहन करावे, ही विनंती.

या विषयीची अधिक माहिती, अन्‍य संदर्भ साहित्‍य, अहवाल, मागणीपत्र यासाठी खाली संपर्क करावा.

- अन्‍न अधिकार अभियान, महाराष्‍ट्र

संपर्कः मुक्‍ता श्रीवास्‍तव, 604, सप्‍तगिरी, कॉस्‍मॉस हिल्‍स, उपवन तलावासमोर, पोखरण, मार्ग क्र. 1, ठाणे (प) – 40060 र्इमेलः muktaliberated@gmail.com फोनः 9969530060

Tuesday, September 6, 2011

हितसंबंधीयांच्‍या संघर्षातून वाट काढत निघालेला प्रस्‍तावित राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा कायदा

प्रस्‍तावित राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा कायद्यासाठीच्‍या विधेयकाचा त्रोटक का होईन सरकारी मसुदा अखेर तयार झाला आहे. मंत्रिमंडळाची मंजूरी, संसदेत मांडला जाणे, स्‍थायी समितीकडे अधिक चिकित्‍सेसाठी सोपविले जाणे इ. सोपस्‍कारांचा पुढचा टप्पा आता सुरु होईल, अशी आशा आहे. आशा म्‍हणण्‍याचे कारण त्‍याला आजवर होत आलेल्‍या विरोधात आहे. या कायद्याच्‍या किमान प्रस्‍तावित तरतुदी काय आहेत, हे बघण्‍याआधी त्‍याच्‍या निर्मितीप्रक्रियेतील हितसंबंधीयांतील संघर्षाचा थोडक्‍यात परिचय करुन घेणे राजकीयदृष्‍ट्या उद्बोधक ठरेल.

आर्थिक विकासाच्‍या गतीतून क्रयशक्‍ती असलेला वर्ग वाढत असला, तरी याच विकासप्रक्रियेतून जन्‍माला आलेल्‍या विषमतेने दोन वेळच्‍या अन्‍नाची भ्रांत मिटवू शकेल, अशी क्रयशक्‍ती अजूनही वाट्याला न आलेला एक मोठा समुदाय जगभर आहे. विकसनशील व अविकसित राष्‍ट्रांत त्‍याचे प्रमाण साहजिकच अधिक आहे. 2008 सालचे जागतिक अन्‍नअरिष्‍ट हे प्रगतीपथावरील मानवतेला लांच्‍छन होते. हैती, फिलिपाईन्‍स, बांगला देश इ. देशांत दंगली, सत्‍तांतरे झाली. शेतीच्‍या अनेक गंभीर प्रश्‍नांना भारत तोंड देत असला तरी हरितक्रांतीसारख्‍या धोरणांनी आयातीवरचे अवलंबित्‍व सं‍पविल्‍याने तसेच जागतिक अन्‍नव्‍यापारातील आपला सहभाग कमी असल्‍याने भारताला या अरिष्‍टाचा फारसा धोका पोहोचला नाही. तथापि, तो टळला आहे, असेही नाही. जागतिक संदर्भ असलेली अन्‍नसुरक्षेची समस्‍या कधी उग्र रुप धारण करील, याचा नेम नाही. जगभरचे तज्‍ज्ञ, नेते, युनो, अगदी जागतिक बँकेसारख्‍या आंतरराष्‍ट्रीय संघटनांचे प्रमुखही विकासप्रक्रियेतील प्राधान्‍यक्रमाबाबत शंका उपस्थित करत आहेत. जागतिक मध्‍यमवर्गाच्‍या इंधनाच्‍या तसेच मांस-दुग्‍धजन्‍य पदार्थांच्‍या वाढत्‍या उपभोगासाठी अन्‍नधान्‍याचा वापर (जैवइंधन व जनावरांचा आहार यासाठी धान्‍याचा वापर) होणे आणि अन्‍नधान्‍याच्‍या व्‍यापारातील सट्टेबाजारी यामुळे अन्‍नसुरक्षेचा धोका अधिक गडद होत आहे, यावर बहुतांश तज्‍ज्ञांची सहमती आहे. अनेक राष्‍ट्रे या समस्‍येचा मुकाबला करण्‍यासाठी आपापल्‍यापरीने उपाययोजना करत आहेत.

आर्थिक विकासस्‍तराच्‍या दृष्‍टीने आपल्‍याला जवळचा असलेल्‍या ब्राझीलने ‘अन्‍नसुरक्षा कायदा’ करुन आपल्‍या देशातील गोरगरीब, सामान्‍य जनतेचे भुकेपासून संरक्षण करण्‍यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. असा कायदा भारतातही व्‍हावा, अशी मागणी अनेक अभ्‍यासक, कार्यकर्ते करत होते. भारतातील हरितक्रांतीचे एक जनक कृषितज्‍ज्ञ डॉ. एम.एस. स्‍वामिनाथन यांनी तर कितीतरी वर्षे हा मुद्दा लावून धरला होता. एकीकडे गोदामांत धान्‍य ठेवायला जागा नाही व दुसरीकडे रेशनवर धान्‍य मिळत नाही, कुपोषण, उपासमारीचे प्रमाण लक्षणीय आहे या विरोधाभासावर बोट ठेवणारी एक याचिका 2001 साली पी.यू.सी.एल. या संस्‍थेने सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली. सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकारचे वाभाडे काढून जे अंतरिम आदेश दिले, त्‍यातून अन्‍नसुरक्षेशी संबंधित अनेक योजनांना (रेशन, अंगणवाडीतील, शाळेतील आहार, वृद्ध पेन्‍शन योजना, मातृत्‍व अनुदान इ.) कायदेशीर संरक्षण प्राप्‍त झाले. योजनांच्या अंमलबजावणीदरम्‍यानची प्रशासनाची अनास्‍था, भ्रष्‍टाचार, लोकांच्‍या तक्रारींबाबतची बेफिकीरी याला काही प्रमाणात आळा बसू लागला. यातून योजनांऐवजी ‘कायदा’ असणे अधिक लाभप्रद ठरेल हे अधोरेखित झाले व अन्‍नसुरक्षेच्‍या कायद्याच्‍या मागणीला अन्‍न अधिकाराच्‍या चळवळींमधून पाठिंबा वाढू लागला. वरील याचिकेवरील अं‍तरिम आदेशांच्‍या पार्श्‍वभूमीवर आकारास आलेल्‍या अनेक संघटना, आघाड्यांचा समावेश असलेल्‍या राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानातही या कायद्याची चर्चा जोर पकडू लागली.

कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्‍या पहिल्‍या खंडातील कारकीर्दीत माहितीचा अधिकार, राष्‍ट्रीय रोजगार हमी हे कायदे झाले होते. 2009 च्‍या निवडणुकांतील यशात या कायद्यांचा हातभार आहे, याची नोंद संपुआच्‍या नेतृत्‍वाने घेतली व आता चालू असलेल्‍या संपुआच्‍या दुस-या कारकीर्दीच्‍या प्रारंभी राष्‍ट्रपतींच्‍या अभिभाषणाद्वारे अन्‍नसुरक्षा कायद्याचे सूतोवाच केले. कायद्याचे सूतोवाच झाले, त्‍याच्‍या दुस-या दिवसापासून, असे कायद्याने बांधून घेणे कितपत योग्‍य ठरेल, वाढीव धान्‍याची उचल व त्‍यासाठीचे वाढीव अनुदान सरकारला पेलणारे आहे का, अशा शंका सरकारमधील प्रमुख मंडळींनीच उपस्थित करायला सुरुवात केली. शरद पवार हे त्‍यातील एक मुख्‍य घटक होते. सोनिया गांधींचा निग्रह लक्षात घेऊन पवारांच्‍या अन्‍न खात्‍याने अखेर एक मसुदा तयार केला. हा मसुदा अत्‍यंत अपुरा व असंवेदनशील होता. पुढे प्रणव मुखर्जींच्‍या नेतृत्‍वाखालील सक्षम मंत्रिगटाकडे अवलोकनार्थ हा मसुदा गेला. या मंत्रिगटानेही यात विशेष मौलिक बदल केला नाही. कायद्यामागील उद्देश सफल होण्‍याऐवजी, आज लोकांना मिळणारे लाभही मर्यादित होण्‍याची भिती निर्माण झाली होती.

याच दरम्‍यान, राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाने अनेक चर्चांनंतर कायद्यासाठीचा एक समग्र मसुदा तयार करुन त्‍याचा पाठपुरावा सुरु केला होता. अन्‍नसुरक्षेच्‍या आदर्श व्‍याख्‍येप्रमाणे अन्‍नाचे उत्‍पादन, वितरण, क्रयशक्‍ती प्रदान करणारा रोजगार, जमीनसुधारणा, अन्‍न पचविण्‍यासाठी लागणारे आरोग्‍य इ. अनेक बाबींचा समावेश या मसुद्यात होता. त्‍याच्‍या या अतिव्‍याप्‍तीशी असहमती म्‍हणून तसेच या अभियानाची एकूण राजकीय ताकद नगण्‍य असल्‍याने सरकारकडून या मसुद्याची प्रारंभी अजिबात दखल घेण्‍यात आली नाही.

तथापि, याचवेळी एक महत्‍वाची घटना घडली. सोनिया गांधींच्‍या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीचे पुनर्घटन झाले. या समितीत राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाच्‍या मसुदा प्रक्रियेत प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष सहभागी असलेले एन.सी. सक्‍सेना, हर्ष मंदर, जॉं ड्रेझ, अरुणा रॉय तसेच या कायद्याची मागणी करणारे खुद्द डॉ. स्‍वामिनाथन यांचा समावेश सोनिया गांधींनी केला. समितीच्‍या पुनर्घटनानंतर पहिले कार्य सोनिया गांधींनी केले ते म्‍हणजे, मंत्रिगटाने मंजूर केलेला अन्‍नसुरक्षा कायद्याचा मसुदा समितीत चर्चेसाठी मागवला. त्‍यावर खोलात चर्चा घडवली. त्‍यानंतर सहमतीच्‍या शिफारशी बाहेर आल्‍या. हितसंबंधांच्‍या नानाविध संघर्षातून निघणारे मसुदे हे तडजोडीचेच असतात. कोणा एका गटाची संपूर्ण सरशी होत नसते. अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या शिफारशींबाबतही तेच आहे. अन्‍न अधिकाराचा कायदा समग्र असावा, असे वाटणारा एक गट, मुक्‍त आर्थिक विकासाला अडथळा न होता व अनुदान वाया न जाता गरिबांपर्यंत नेमकेपणाने योजना पोहोचाव्‍यात या भूमिकेचा दुसरा गट, तर आजच्‍या व्‍यवस्‍थेतील हितसंबंध जैसे थे राहावेत म्‍हणून कायदा होऊच नये, झालाच तर बोथट व्‍हावा, असे इच्छिणारा तिसरा गट असा हा संघर्ष राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या मैदानात खेळला गेला. हे सर्व गट अनेक छटांसहित आजच्‍या सत्‍ताधा-यांच्‍या अंतर्गतच आहेत. सर्वोच्‍च राजकीय मान्‍यता असलेल्‍या सोनिया गांधी आपले वजन कोठे टाकणार याला खूप महत्‍व होते. तथापि, त्‍यांना कितीही राजकीय व नैतिक मान्‍यता असली, तरी अखेर सत्‍तेच्‍या राजकारणात हितसंबंधांच्‍या संघर्षातूनच मार्ग काढावा लागतो. तोल साधावा लागतो.

इथेही तेच झाले. राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीचा सहमतीच्‍या शिफारशींचा मसुदा पंतप्रधानांना पाठवण्‍यात आला. तो त्‍यांनी त्‍यांचे आर्थिक सल्‍लागार रंगराजन यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीकडे चिकित्‍सेसाठी पाठवला. रंगराजन समितीने तो अंशतः स्‍वीकारला, बहुअंशी नाकारला. सल्‍लागार समितीने रंगराजन यांच्‍या टीकेवर चर्चा करुन आपले समर्थन दिले व विधेयकाचे मसुदा प्रारुप बनवले. हे प्रारुप पंतप्रधानांना पाठवण्‍यात आले. प्रणव मुखर्जींच्‍या अध्‍यक्षतेखालील मंत्रिगटाकडे अन्‍न मंत्रालयाने सुधारित मसुदा पाठवला. तो संमत करुन पुढील प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्‍यात आला आहे.

सल्‍लागार समितीच्‍या मसुद्याचे काय झाले ? अन्‍न मंत्रालयाचे म्‍हणणे सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यातील शिफारशींच्‍या सहाय्यानेच आम्‍ही आमचा मसुदा बनवला आहे. हे संपूर्ण खरे नाही. सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यातील काही भाग या सरकारी मसुद्यात स्‍वीकारला गेला आहे. अनेक तरतुदी काढून टाकण्‍यात आल्‍या आहेत अथवा पातळ करण्‍यात आल्‍या आहेत.

सल्‍लागार समितीच्‍या चर्चांतील सर्व मुद्द्यांचा तसेच या दोन मसुद्यांतील सर्व फरकांचा परामर्श घेणे, या लेखाच्‍या मर्यादेत शक्‍य नाही. (राईट टू फूड कँपेन ऑफ इंडिया तसेच नॅशनल अॅडव्‍हायजरी काऊन्सिल यांच्‍या वेबसाइेट्सवर हे मसुदे, बैठकांची इतिवृत्‍ते, लेख उपलब्‍ध आहेत. जिज्ञासूंनी ते जरुर वाचावेत.) उदाहरणादाखल काही ठळक बाबींची नोंद येथे करत आहे.

खुद्द सल्‍लागार समितीचा मसुदा विस्‍तृत व भरीव असला तरी, अन्‍न अधिकार अभियानाने अपेक्षिल्‍याप्रमाणे समग्र नाही. वर म्‍हटल्‍याप्रमाणे तो तडजोडीचाच आहे. त्‍यात आरोग्य, जमीन, शेतीसुधारणा इ. अनेक कळीच्‍या बाबींना मार्गदर्शक तत्‍त्‍वांत टाकले गेले आहे. कायद्याच्‍या मुख्‍य भागात त्‍यांचा समावेश नाही. रेशनला अधिक महत्‍व देण्‍यात आले आहे. तेही अभियानाने अपेक्षिल्‍याप्रमाणे संपूर्ण सार्वत्रिक नाही, तर सार्वत्रिकतेच्‍या जवळ आहे. म्‍हणूनच अभियानाकडून त्‍यावर टीका झाली. अभियानातील काही घटकांकडून तर जुनी व्‍यवस्‍थाच पुन्‍हा ‘नव्‍या बाटलीत जुनी दारु’ पद्धतीने कायम केली जात असल्‍याची टीका झाली. अर्थात, ही टीका एकांगी आहे. वस्‍तुस्थिती तशी नाही. सल्‍लागार समितीच्‍या तडजोडीच्‍या शिफारशी हे पुढचेच पाऊल आहे. या शिफारशींना कात्री लावणारा सरकारी मसुदाही आधीच्‍या तुलनेत थोडे अधिक नक्‍की देतो आहे. काही प्रमुख शिफारशी पाहिल्‍यावर हे लक्षात येते.

सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यानुसार देशातील किमान 75 टक्‍के लोकांना अनुदानित अन्नधान्‍याचा कायदेशीर अधिकार देऊ केला आहे. ग्रामीण भागातील 90 टक्‍के जनतेला तर शहरांतील 50 टक्‍के जनतेला हा लाभ मिळेल. लाभार्थींचे दोन गट करण्‍यात आले आहेत. अधिक गरजवंतांचा प्राधान्‍य गट व त्‍याच्‍या वरचा सर्वसाधारण गट. ग्रामीण भागातील कायद्याच्‍या क्षेत्रातील 90 टक्‍के जनतेपैकी प्राधान्‍य गटात 46 टक्‍के व सर्वसाधारण गटात 44 टक्‍के लोक मोडतील. शहरातील कायद्याच्‍या क्षेत्रातील 50 टक्‍के जनतेपैकी प्राधान्‍य गटात 28 टक्‍के व सर्वसाधारण गटात 22 टक्‍के लोक येतील. प्राधान्‍य गटाला (46 टक्‍के ग्रामीण व 28 टक्‍के शहरी विभाग) दरमहा 35 किलो धान्‍य (प्रति व्‍यक्‍ती 7 किलो या प्रमाणे) अनुदानित दराने म्‍हणजे 1 रु. भरड धान्‍य, 2 रु. गहू व 3 रु. तांदूळ असे मिळेल. सर्वसाधारण गटाला (44 टक्‍के ग्रामीण व 22 टक्‍के शहरी विभाग) दरमहा 20 किलो धान्‍य (4 किलो प्रति व्‍यक्‍ती प्रमाणे) भरड धान्‍य, गहू व तांदूळ यांच्‍या किमान आधारभूत किंमतीच्‍या 50 टक्‍क्यांपेक्षा कमी दराने मिळेल.

सरकारी मसुद्यात ग्रामीण भागातील 90 टक्‍क्‍यांऐवजी 75 टक्‍क्‍यांना कायद्याचा अधिकार देण्‍यात येईल तसेच सर्वसाधारण गटाला प्रति व्‍यक्‍ती 4 किलो ऐवजी 3 किलो व एकूण 20 किलो ऐवजी 15 किलो धान्‍य देण्‍यात येईल, असे म्‍हटले आहे. दुसरे म्‍हणजे, प्राधान्‍य गटाची टक्‍केवारी सल्‍लागार समितीच्‍या शिफारशींप्रमाणे निश्चित करण्‍यात आलेली नाही. देशातील गरिबीच्‍या प्रमाणाच्‍या मापनाच्‍या आधारे केंद्र सरकार हा आकडा जाहीर करेल, असे नमूद करण्‍यात आले आहे.

गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज ठरविण्‍यासाठी नेमलेल्‍या सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल सरकारने स्‍वीकारल्‍याने त्‍यातील अंदाज प्रमाण मानले जाण्‍याची शक्‍यता आहे. तेंडुलकर समितीच्‍या अहवालाप्रमाणे देशात एकूण गरीबी 37.2 टक्‍के (शहरः 25.7 व ग्रामीणः 41.8) आहे. महाराष्‍ट्रासाठी समितीने दिलेला अंदाज असा आहेः शहर- 25.6 व ग्रामीण- 47.9. प्राधान्‍य गटासाठी हेच आकडे गृहीत धरले तर ग्रामीण भागात सल्‍लागार समितीच्‍या 46 टक्‍क्‍यांऐवजी सरासरी 42 टक्‍के हा आकडा असेल. तथापि, राज्‍यागणिक अंदाज भिन्‍न असल्‍याने प्राधान्‍य गटांतील लोकांचे प्रमाणही सगळीकडे सारखे नसेल. महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागातील 48 टक्‍के लोक तर शहरातील 26 टक्‍के लोक प्राधान्‍य गटात मोडतील. संसदेत चर्चा होऊन यात सुधारणा व्‍हायची शक्‍यता आहे. समजा झाली नाही, तरी हे आकडे व मिळणारा लाभ आताच्‍या रेशनव्‍यवस्‍थेतील लाभापेक्षा निश्चित जास्‍त असेल.

तो कसा ते पाहू.

अंत्‍योदय, बीपीएल व एपीएल या परिभाषेऐवजी 'प्राधान्‍य गटातील कुटुंबे' 'सर्वसाधारण गटातील कुटुंबे' असे शब्‍दप्रयोग अस्तित्‍वात येणार आहेत. प्राधान्‍य गटाला अंत्‍योदयच्‍या दराने 35 किलो धान्‍य मिळणार तर सर्वसाधारण गटाला बीपीएलच्‍या आसपासच्‍या दराने 15 किलो धान्‍य मिळणार. आजचे अंत्‍योदय व बीपीएल एकत्रितपणे प्राधान्‍य गटात मोडण्‍याची शक्‍यता असल्‍याने बीपीएलवाले एकप्रकारे अंत्‍योदयवाले होणार आहेत. आजच्‍या एपीएलवाल्‍यांपैकी एक विभाग सर्वसाधारण गटात येणार आहे. आजच्‍या घडीला रेशनचे अंत्‍योदय व बीपीएल धरुन देशातील 6.5 कोटी कुटुंबांना लाभ मिळतो. नव्‍या कायद्याने ही संख्‍या 10 कोटींच्‍या आसपास जाणार आहे. आज एपीएलवाल्‍यांना महाराष्‍ट्रात 15 किलो धान्‍य सरकारने दरमहा जाहीर केले आहे. परंतु, ते अजिबात मिळत नाही, असा अनुभव आहे. त्‍यापैकी एका विभागाला 15 किलोचे कायदेशीर संरक्षण मिळेल. मुंबईत आज अंत्‍योदय व बीपीएल एकत्रित कुटुंबे 1 टक्‍क्‍यांच्‍या आत आहेत. पुण्‍यात 5 टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहेत. शहरी विभागांसाठीचे प्रमाण प्राधान्‍य गटासाठी 26 टक्‍के असल्‍याने मुंबई-पुण्‍यासारख्‍या शहरांत ही संख्‍या लक्षणीयरीत्‍या वाढण्‍याची शक्यता आहे. आजच्‍या एपीएलपैकी अनेक कुटुंबे प्राधान्‍य गटात येतील. महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण जनतेला मात्र अधिक लाभ मिळण्‍याची शक्‍यता आहे. महाराष्‍ट्रात अंत्‍योदय व बीपीएल मिळून 31 टक्‍क्‍यांच्‍या आसपास कुटुंबे सध्‍या आहेत. नव्‍या कायद्याप्रमाणे प्राधान्‍य गटाचे ग्रामीण भागासाठीचे प्रमाण 48 टक्‍के असल्‍याने महाराष्ट्रातील आजची सर्व अंत्‍योदय व बीपीएल कुटुंबे प्राधान्‍य गटात येतील.

सल्‍लागार समितीच्‍या मसुदद्यात प्राधान्‍य गटातील कुटुंबांसाठीच्‍या दरांत 10 वर्षे बदल करता येणार नाही, असे म्‍हटले आहे. तर सरकारी मसुद्यात या मुदतीचे बंधन नाही. केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे दरांमध्‍ये तसेच लाभांच्‍या प्रमाणात सुधारणा करु शकते, असे त्‍यात म्‍हटले आहे. आपत्तिग्रस्‍त विभागातील सर्वसाधारण गटातील कुटुंबांना प्राधान्‍य गटाप्रमाणे किमान 1 वर्ष लाभ मिळावा, असे सल्‍लागार समितीचे म्‍हणणे आहे, तर सरकारी मसुद्यात ही तरतुदच नाही. उपासमारीने ग्रस्‍त प्राधान्‍य गटातील कुटुंबांना 6 महिने दुप्‍पट लाभ द्यावा, अशा कुटुंबांचा सरकारने स्‍वतःहून शोध घ्‍यावा, असे सल्‍लागार समितीचा मसुदा म्‍हणतो, तर सरकारी मसुद्यात अशा कुटुंबांना दोन वेळा मोफत जेवण दिले जाईल, असे म्‍हटले आहे.

रेशनच्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य अनेक योजनांचा समावेश दोन्‍ही मसुद्यांत आहे. तथापि, सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यातील भरीवपणा सरकारी मसुद्यात नाही. मातृत्‍व अनुदान योजनेद्वारे गर्भवती स्‍त्रीला एकूण 6 महिने दरमहा 1000 रु. दिले जावेत, अशी तरतूद सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यात आहे. सरकारी मसुदा याबाबतीत मौन आहे. कुपोषित मुलांना योग्‍य असा उपचारात्‍मक आहार मोफत दिला जाईल तसेच पौष्टिकता पुनर्वसन केंद्राद्वारे त्‍यांची खास काळजी घेतली जाईल, असे सल्‍लागार समितीचा मसुदा म्‍हणतो. सरकारी मसुद्यात याचा काहीच उल्‍लेख नाही. या कायद्याच्‍या देखरेखीसाठी राष्‍ट्रीय अन्‍न आयोग असेल, त्‍याची नियुक्‍ती सार्वजनिक नामांकन पद्धतीने करण्‍यात येईल. त्‍यास संबंधित प्रशासकीय अधिका-यांवर देखरेख करण्‍याचा, त्‍यांची चौकशी व दंड करण्‍याचा अधिकार असेल. त्‍यास दिवाणी न्‍यायालयाचे अधिकार असतील, असे सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यात म्‍हटले आहे. सरकारी मसुद्यात या आयोगाच्‍या नियुक्‍तीचा अधिकार सरकारकडेच ठेवण्‍यात आला असून त्‍याला दंड करण्‍याचा अथवा न्यायालयीन चौकशीचा अधिकार नाकारण्‍यात आला आहे.

परिचयासाठी म्‍हणून एवढे मुद्दे पुरे झाले. तथापि, पुढची एक घडामोड नोंदविणे आवश्‍यक आहे. रंगराजन समितीने सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यावर टीका करताना त्‍यातील तरतुदींच्‍या अंमलबजावणीसाठी लागणारे धान्‍य एकूण उत्‍पादित धान्‍याच्‍या 30 टक्‍के इतके असेल व तेवढे सरकारने उचलले तर अनुदानाचा बोझा वाढेलच शिवाय बाजारातील धान्‍याचे भाव वाढतील, असे म्‍हटले होते. यासाठी प्रत्‍यक्ष धान्‍य देण्‍याऐवजी लाभार्थ्‍यांना रोख रक्‍कम देण्‍याचा प्रयोग टप्‍प्‍याटप्‍प्‍याने करावा, त्‍यासाठी आधी प्रायोगिक प्रकल्‍प करावा, अशी सूचना केली होती. आता सरकारने नंदन नीलकेणींच्‍या नेतृत्‍वाखाली एक टास्‍क फोर्स नेमून या प्रयोगाची आखणी सूचविण्‍याची जबाबदारी त्‍यावर सोपविली आहे.

धान्‍याऐवजी रोख रक्‍कम या मुद्द्याला अन्‍न अधिकार अभियानात तीव्र विरोध आहे. तथापि, या प्रयोगाला आपण खुले असले पाहिजे, असे मला वाटते. आजही 1 . अनुदान पोहोचवायला 4 रु. खर्च होतो. अर्थात, 1 रुपयातलाही बराचसा हिस्‍सा भ्रष्‍टाचार गिळून टाकतो. गोदाम ते दुकान या प्रवासात होणा-या 40 टक्‍के धान्‍याची गळती, दुकानदाराची भेसळ व भ्रष्‍टाचार आदिंच्‍या बाबतीत संगणकीय तंत्रज्ञानाच्‍या आधारे निय‍मन करण्‍याचा प्रस्‍ताव कायद्याच्‍या मसुद्यात आहे. तथापि, या नियमनाला मर्यादाच असणार आहेत. धान्‍याच्‍या वाहतुकीची व वितरणाची आजची कमजोर यंत्रणा कायदा केला की लगेच सुधारणार आहे, ही अपेक्षा अवास्‍तव आहे. आज त्‍यामुळेच 640 लाख टन धान्‍य गोदामात साठले आहे. 2000 सालची स्थिती पुन्‍हा तयार झाली आहे. या धान्‍याची विल्‍हेवाट हा नेहमीप्रमाणे आतबट्ट्याचा व्‍यवहार ठरणार आहे. यासाठी रोख रकमेच्‍या हस्‍तांतराच्‍या ब्राझीलमध्‍ये झालेल्‍या प्रयोगांचा आपणही आपल्‍यापद्धतीने विचार करणे आवश्‍यक आहे.

या सगळ्याचा विचार करता, जराही आपल्‍या मनासारखे (अथवा राजकीय लाईनप्रमाणे) झाले नाही की दूषणे देण्‍याऐवजी, मनासारखे घडविण्‍याचा पुरेपूर लोकशाही प्रयत्‍न, जे होईल त्‍यातील पुढे जाणा-या भागाची जोपासना, अंमलबजावणी करणे व त्‍याआधारे जनाधार तयार करणे व या जनाधाराच्‍या सहाय्याने पुढे व्‍हावेसे वाटणा-या गोष्‍टींसाठी संघर्षरत राहणे असाच चळवळीचा डावपेच राहायला हवा.

कायदा व्‍हायला अजून बरेच टप्‍पे पार करावे लागणार आहेत. अशावेळी या कायद्याच्‍या मसुद्यावर जागोजाग चर्चा, मेळावे, परिषदा संघटित करुन सुधारणा सुचविणे आवश्‍यक आहे. केवळ संसदेत चर्चा न होता लोकांमध्‍ये, प्रसारमाध्‍यमांत चर्चा व्‍हायला हव्‍या. त्‍याचा दबाव संसदेतील चर्चांवर पडला पाहिजे. राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीतील चर्चांच्‍या दरम्‍यान राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाचा अपवाद करता कोठेही देशात जनसंघटनांनी या प्रश्‍नावर व्‍यापक चर्चा, हालचाली केल्‍या असे झाले नाही. किमान आतातरी अशा हालचाली होणे आवश्‍यक आहे. धोरणकर्त्‍यांतील सत्‍प्रवृत्‍तांवर विसंबणे योग्‍य नाही. लोकशाहीत अंतिम सत्‍ताधारी जनता असते. संसदीय प्रणालीला बाधा न आणता तिची आकांक्षा तिच्‍या संघटित हालचालीने कायद्यात प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com