Thursday, March 24, 2016

कायद्याचा ‘आधार’, संकेतांचा भंग


आधार म्हणजे व्यक्तीला तिच्या ओळखीचा १२ अंकी क्रमांक देण्याची नंदन नीलकेणी या नामांकित माहितीतंत्रज्ञाच्या कल्पनेतून साकारलेली योजना. हा क्रमांक देशात दुसरा कोणाचाही नसेल. म्हणजेच ही ओळख एकमेवाद्वितीय असेल. विविध योजना, अनुदाने यांच्या लाभासाठी लाभार्थ्याची ओळख सिद्ध करणारी तसेच हा लाभ ती व्यक्ती एकापेक्षा अधिक ठिकाणांहून घेत नाही, याची खातरजमा करण्यासाठी उपयुक्त अशी माहिती तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था. व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, त्याचे छायाचित्र, हाताचे ठसे व डोळ्यांच्या बुब्बुळांच्या संगणकीय प्रतिमा एवढी माहिती घेऊन हा क्रमांक व व्यक्तीचे छायाचित्र असलेले कार्ड-ओळखपत्र तिला दिले जाते. यासाठी नाव, वय, पत्ता यासाठीचा जो उपलब्ध पुरावा असेल तो घेतला जातो. कागदोपत्री पुरावा नसल्यास अन्य मार्गांनी तिच्या ओळखीची पूर्तता केली जाते. समाजातल्या दुबळ्या समूहांतील व्यक्तींना या आधार कार्डाचा खूप उपयोग होतो आहे. आपलीही काहीतरी ओळख आहे, काहीतरी सरकारी कार्ड आपल्याकडे आहे ही भावना त्यांना मानसिक आधारही देणारी आहे. सरकार, पोलीस अशा अनेक ठिकाणी त्यांना आता धीराने जाता येते. आधारची पूर्णत्वाने अंमलबजावणी सुरु होईल तेव्हा अनुदाने, लाभ याचा गैरवापर रोखल्या जाऊन सरकारी खर्च वाचेलच; शिवाय संगणकीय प्रणालीमुळे लाभार्थी व्यक्तीला आपले लाभ कोठूनही घेता येण्याची शक्यता तयार होईल. काही वाजवी शंका या योजनेबाबत असल्या तरी तिचे लाभाचे पारडे निश्चित जड आहे.

२००९ ला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पुरोगामी आघाडी सरकारने आणलेली व्यक्तीच्या ओळखीसाठीची ही योजना त्यांच्या कट्टर विरोधकानेच-भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अखेर गेल्या बुधवारी कायद्यात रुपांतरित केली. प्रारंभापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला मुद्दा तूर्त तरी शांत झाला. पुन्हा कोणी न्यायालयात गेले व या कायद्याच्या प्रक्रियेलाच आव्हान दिले नाही म्हणजे झाले!

हो. याला कारणही तसेच आहे. प्रचंड बहुमतातील भाजप सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे. लोकसभेत संमत झालेले हे विधेयक राज्यसभेत अडकू शकते म्हणून सरकारने त्याला धनविधेयकाचा साज चढवला व राज्यसभेच्या मान्यतेच्या अटीतून पळवाट काढली. सरकारची ही कृती बेकायदेशीर आहे, असा आरोप ठेवायला इथे पुरेपूर अवकाश आहे. एकतर, हे विधेयक आधार (आर्थिक तसेच अन्य अनुदाने, लाभ व सेवा यांचे लक्ष्यित हस्तांतर) विधेयक, २०१६ या नव्या नावाने आले असले तरी मूळातील राष्ट्रीय ओळख प्राधिकरण विधेयक, २०१०या काँग्रेस आघाडी सरकारच्या विधेयकाचेच ते सुधारित रुप आहे. काँग्रेस आघाडी सरकारने आणलेल्या योजनेतून ९८ कोटी लोकांना ओळखीचे क्रमांक व कार्डे आतापर्यंत मिळाली आहेत. याच प्रक्रियेला कायद्याचा आधार देऊन भाजप सरकार ती पुढे चालू ठेवणार आहे. म्हणूनच, जर काँग्रेस सरकारने आणलेले विधेयक धनविधेयक नव्हते, तर भाजप सरकारने आणलेले त्याचसंबंधातले हे विधेयक धनविधेयक कसे काय होऊ शकते, ही रास्त शंका आहे. राज्यसभेतील नामुष्की टाळण्यासाठीच केवळ ही चलाखी आहे, हे अगदी उघड आहे.

व्यक्तीचे खाजगी तपशील गोळा करणारी एवढी मोठी योजना कोणताही कायद्याचा आधार नसताना सरकार कसे काय राबवू शकते, असा काँग्रेस सरकारवर भाजपचा आरोप होता. हा आरोप योग्य होता. आज पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी तेव्हा या आरोपात आघाडीवर होते. आपली चूक दुरुस्त करण्यासाठी काँग्रेसने २०१० साली याला कायदेशीर आधार देण्यासाठीचे विधेयक आणल्यावर राज्यसभेत विविध आक्षेपांनी टोलवण्यात, यशवंत सिन्हांच्या अध्यक्षेतेखालील संसदीय समितीकडे चिकित्सेसाठी सोपवून त्याचे वाभाडे काढून ते लटकवण्यात हेच भाजपवाले जोरात होते. कारण राज्यसभेत काँग्रेस अल्पमतात होती. भाजपच्या पाठिंब्याशिवाय तिथे हे विधेयक मंजूर होणे शक्य नव्हते. काँग्रेस आघाडी सरकारची २००९ ची योजना गेली ६ वर्षे बिनकायदेशीर चालवण्यास भाजपच जबाबदार होता. बरे, गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका बाजूला विरोध करायचा व दुसरीकडे आपल्या राज्यात त्याची मनापासून अंमलबजावणी करायची यात मोदी वाकबगार होते. गंमत म्हणजे, काँग्रेसच्या या योजनेची काँग्रेसशासित राज्यांत गती मंद आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या भाजपशासित राज्यांत ती वेगवान असे चित्र एका अभ्यास गटाबरोबर फिरत असताना मी अनुभवले आहे.

धनविधेयक राज्यसभेत मांडले जाते. चर्चा होते. पण त्यावर मतदान होत नाही. त्याप्रमाणे हे विधेयक राज्यसभेत सादर केल्यावर त्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काही आक्षेप नोंदवले. काँग्रेसकृत विधेयकात नसलेल्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी माहिती उघड करणे, खाजगी आस्थापनांनाही आधारचा उपयोग करण्याची परवानगी असणे अशांसारख्या एकूण पाच मुद्द्यांवर त्यांनी दुरुस्त्या सुचवल्या. अर्थात, त्या सर्व फेटाळून लावून भाजप सरकारने लोकसभेत आवाजी मतदानाने आपले विधेयक कोणत्याही दुरुस्तीविना जसेच्या तसे मंजूर केले. खरे म्हणजे, अशा महत्वाच्या विधेयकावर राष्ट्रीय सहमती असणे, ही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तर आवश्यक आहेच; पण तो नैतिक संकेतही आहे. काँग्रेस हे विधेयक राज्यसभेत भाजपला जशास तसा धडा शिकवण्यासाठी रोखू शकते, ही भाजपची भीती तितकीशी खरी नाही. कारण मूळात ही काँग्रेसचीच योजना. त्यांच्यामुळेच ती रोखली गेली, हा संदेश जाणे राजकीयदृष्ट्या त्यांना परवडण्यासारखे नाही. त्यांची विश्वासार्हताच त्यामुळे धोक्यात आली असती. भाजपने संसदीय संकेत मनमानी करुन उधळून लावले आहेत, हाच निष्कर्ष इथे निघतो. एका राष्ट्रव्यापी, सरकारच्या अनेक विभागांवर परिणाम करणाऱ्या व प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या योजनेला कायदेशीर करण्याच्या प्रक्रियेला हे गालबोट लागायला नको होते.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(महाराष्ट्र टाइम्स, २२ मार्च २०१६)

Friday, March 11, 2016

काही चर्चाः स्त्री-पुरुष संबंधांची!

प्रेम आणि संभोग यात आधी काय? अर्थात प्रेम. स्त्री-पुरुष संबंधांविषयीच्या जाणिवा सुरु झाल्या झाल्या हे उत्तर माझ्या मनात कोरलं गेलं ते आजपर्यंत. म्हणजे बुद्धी काही वेगळं नमूद करत असली, तरी अंतर्यामी हेच उत्तर ठाम असतं. ज्याच्याशी प्रेम, त्याच्याशीच लग्न आणि लग्नानंतरच संभोग हा क्रमही मनात अढळ असतो. आधी आयुष्यात प्रेम हे एकदाच होतं या मताचा मी होतो. पुढे स्वानुभवातून हे मत बदलले. पण हा क्रम ढळला नाही.

पशू-पक्ष्यांच्यात कुठे असतं असं आधी प्रेम आणि मग संभोग? प्रणयाराधन वगैरे काहींच्यात असतं; पण त्याला माणसांच्यात असतं तसलं प्रेम म्हणणे कठीण आहे. लग्न तर त्यांच्यात नसतंच. जोडीदारही एकच नसतो. नर व मादी एवढंच नातं त्यांच्यात असतं. माणूस हा प्राणी आहे. प्राणी म्हणून त्यालाही हीच लक्षणे लागू होतात. पण विकासक्रमात त्याने काही संकेत, नीतिनियम बनविले आणि तो प्राण्याचा संस्कारित माणूस झाला. आपल्या नर-मादी या प्राणी पातळीवरील प्रेरणांचे त्याने नियमन केले. समाजस्वास्थ्याच्या तत्कालीन निकषांस ते आवश्यक होते.

या संकेत-नीतिनियमांच्या प्रभावाखालील कोणी एकजण सोडून गेलेल्या तिला खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी..असा निरोप देत होता. पण त्याचवेळी दुसरा एकजण म्हणत होता, तू अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी.तर तिसरा तू हां कर या ना कर, तू है मेरी किरण असे बजावत होता.

या तिन्हींमधील पहिला ती सोडून गेली तरी आयुष्यभर तिच्यासाठी देवदास बनायला तयार आहे. तिला तो कोणतीही अट घालत नाही. दुसऱ्याचीही आयुष्यभर एकटे राहण्याची तयारी आहे; पण अट एकच-तिने तसेच राहायला हवे. तिसरा तर त्यालाही तयार नाही. तिची संमती असो अथवा नसो; ती त्याचीच असणार हे त्याने ठरवून टाकले आहे.

हे तिघेही प्राणी पातळीच्या पुढे आहेत. म्हणजे, केवळ मादी म्हणून संभोगासाठी त्यांना कोणतीही स्त्री नको आहे. त्यांना आवड-निवड आहे. त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. म्हणजे तिला जन्माचे जोडीदार करावयाचे आहे. तिच्याशी लग्नानंतरच संभोग करावयाचा आहे. विकासक्रमात एवढी प्रगती त्यांची झाली आहे. पण पहिला सोडला तर उरलेले दोघे स्वतः घेत असलेले हेच निवडीचे स्वातंत्र्य स्त्रीला देत नाहीत.

तिसरा तिला प्राप्त करण्यासाठी काहीही करायला, हिंसक व्हायला तयार आहे. त्याच्या या हिंसकतेला कायदा पाठिंबा देत नाही. तो त्याला अटकाव करतो किंवा शिक्षा देतो. पण कायद्याने दुसऱ्यालाही निवडीचे स्वातंत्र्य द्यायचा संस्कार होतो असे नाही.

विकासाच्या धारेत न सापडल्याने प्राण्यांच्यात गरीब-श्रीमंत, दलित-सवर्ण अशा श्रेणी नाहीत. माणसांच्यात या व अशा असंख्य श्रेणी, भेद आहेत. त्यामुळे वरील तिघांनाही त्यांचे संदर्भ आहेत. पहिल्याला सोडून गेलेली ती, तिला तो आवडला नाही किंवा त्याचे तिला काही खटकले, म्हणूनच सोडून गेली असेल असे नाही. ती जात किंवा आर्थिक किंवा अन्य कोणा श्रेणीने वरची असू शकेल. त्यामुळे तिच्या घरच्यांच्या धाकाने-भीतीने ती मागे सरली असेल.

या श्रेणींच्या, संकेत-नीतिनियमांच्या अधिकृत चौकटीबाहेरही बरेच काही चालत असते. संकेत-कायदा काहीही असला तरी त्यात फरक पडत नाही. या चौकटीबाहेरच्याला मन मानायला तयार नसले, तरी बुद्धीला ते स्वीकारावंच लागतं.

माझ्याही मनात उन्नत-उदात्त भावनांच्या व जगण्याच्या चौकटी होत्या; आहेत. त्यातील काही मोडताना बघताना त्रास झाला; आजही होतो. पण काही मोडल्या जात आहेत, याने बरेही वाटते. आनंदही होतो. समाज केवळ एका व्यक्तीच्या अथवा गटाच्या इच्छेनुसार चालत नाही. अशा अनेकांच्या इच्छा-हितसंबंधांच्या, भौतिक बदलांच्या संघर्षांतून नातेसंबंधांची, नीतिनियमांची जुनी रचना मोडत असते. नवी आकार घेत असते. घरात कुरबूर करत नवं घर करायला नवऱ्याला भाग पाडणाऱ्या सुनेबद्दल सासूची तक्रार असते. पण याच सासूने (सरंजामशाही मोडून शहरी उद्योगांना जन्म देणाऱ्या भांडवलशाही रचनेच्या पार्श्वभूमीवर) भला थोरला एकत्र कुटुंबाचा वाडा निरनिराळी कारणे सांगून नवऱ्याला सोडायला लावलेला असतो, हे ती विसरते. नवऱ्यांची अशी उघड कुरबूर नसली, तरी असे विभक्त होणे त्यांनाही हितकारकच असते. त्यामुळे ते थोडे आढेवेढे घेत किंवा साळसूदपणे बायकोच्या मागे दडून या वेगळे होण्याला पाठिंबाच देत असतात. हा व्यक्तींच्या इच्छाआकांक्षांच्या टकरावाच्या रुपात होणारा व्यवस्थात्मक बदल असतो. याचा अर्थ हे सगळंच वस्तुनिष्ठ, म्हणजे माणसाच्या हाती काहीच नसतं असं नव्हे. असंख्य आत्मनिष्ठांच्या गलबल्यातून जे निरपेक्ष घडताना दिसते, त्याच्या दिशेची जाण असणाऱ्या व्यक्ती अथवा गट त्यात हस्तक्षेप करु शकतात. करत असतात. दिशा पूर्ण बदलता येत नसली, तरी तिच्यातीलच काही वाऱ्यांचा उपयोग करुन आपले शिड त्यांना अनुकूल ठेवता येते व नौकेला गती देता येते. म्हणजेच बदलाची दिशा उपकारक करायचा प्रयत्न करायचा असतो. नाहीच झाली उपकारक तरी तिची हानिकारकता तरी कमी करता येते.

मी प्रेम प्रकरणांत (तथाकथित) आदर्शवादी असलो, तरी माझ्या गावात किंवा मुंबईतील राहत्या वस्तीत स्त्री-पुरुष संबंधांचे जे चोरटे व्यवहार दिसत होते, ते या आदर्शांना धक्का देणारे होते. यात नवरा कामावर गेला की गुपचूप घरात येणारा प्रियकर होता. चुलत बहीण-भाऊ होते. वयात अंतर असलेले होते. जाती-धर्म वेगळे असलेले होते. अशी प्रकरणे उघड झाल्यावर चिडून मारहाणही होत असे. भावकी-गावकीत ही प्रकरणे जाऊन त्यांत न्याय व दंडही होई. काही बायकांना नवरे सोडूनही देत किंवा तीच प्रियकराबरोबर निघून जाई. काही नवरे हे सगळे समजून कानाडोळा करत. त्याच्यासहित संसार चालू ठेवत. मूल कोणाचे हे प्रश्नांकित असले किंवा आपले नाही हे कळले, तरी त्याचा सांभाळ करत. अर्थात, असे पुरुष बहुधा नामर्द संज्ञेला पात्र ठरत. जो बाईला हाकलून देतो, मारतो तो मर्द असतो. या सगळ्यात बाईची अब्रू ही केंद्रवर्ती असते. बाहेरख्याली पुरुषाला दूषणे दिली गेली, तरी समाजाच्या लेखी तो अखेर पुरुष असतो. भांडं तडकतं ते बाईच्या शीलाचं. पुरुषाचं भांडं तांब्याचं असतं. त्याला पोच येतात; पण ते तडकत नाही. स्त्रीची योनिशुचिता महत्वाची; पुरुषाला शिश्नशुचितेची गरज नसते.

जगात लैंगिकतेच्या आदिम प्रेरणेला संस्कृतींनी काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर निरनिराळ्या प्रकारे समजून घेतले. खजुराहो किंवा अनेक प्राचीन देवळांतली संभोगशिल्पे याची साक्ष देतात. घुंघट किंवा बुरख्यातच सगळं झाकून ठेवायचं हीच एक सलग संस्कृती नव्हती. सध्या चालू असलेल्या समलिंगी संबंधांच्या मान्य-अमान्यतेची चर्चा ही किती मागास आहे, हे या शिल्पांवरुनही कळते. लैंगिक निवडीचा कल व स्वातंत्र्य ही मानवजातीला नवी गोष्ट नाही. इतिहास ३६० अंशांत माघारी फिरत नसला, तरी त्याला वेडीवाकडे वळणे असतात. जुने प्रगत आज मागास ठरण्याचे हे एक वळण एवढेच.

या मागासपणाला हल्ली जोरदार तडाखे बसू लागले आहेत, हे नक्की. समलिंगी संबंधीय उघडपणे पुढे येऊन झगडा देत आहेत. त्यांच्या बाजूने समाजातील अन्य लोकही ठामपणे उभे राहत आहेत. साहित्य-सिनेमांत हे विषय मांडले जात आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांना विरोधही होतो. पण त्या विरोधांतूनही ते टिकाव धरत आहेत.

नवी पिढी खूपच मोकळी दिसते आहे. त्यांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर लिंगनिरपेक्ष म्हणावा, इतका मोकळाढाकळा असतो. जुन्या मानसिकतेतून जर आपण त्यांच्या जोड्या ठरवू लागलो, तर आपली फसगत होईल. पण या मोकळेढाकळेपणाचाच एक भाग म्हणून शारीरिक संबंध हीही बाब त्यांतील अनेकांना सहज वाटते. त्यासाठी प्रेमात असण्याची गरज त्यांना वाटत नाही. परस्परांना बांधून घेण्यात त्यांना स्वारस्य नाही. लग्न ही स्वतंत्र गोष्ट. तिच्याशी आधीच्या या व्यवहाराचा संबंध असेलच असे नाही. कोणी लग्न न करता सहजीवन पत्करतील; तर कोणी लग्न करतील. इन्स्टंट लग्न-इन्स्टंट घटस्फोट हाही या इन्स्टंट व्यवहाराच्या गाड्याचे मागचे अपरिहार्य चाक. मोकळेपणाचे स्वागत करताना नात्यातली ही इन्स्टंटता काळजी वाटायला लावणारी आहे. दुसरी एक काळजी करण्याची बाब म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची गती अधिक असणे. विषमता, दुय्यम दृष्टिकोण यांची शिकार होत असतानाही गावातील बचतगट, राजकारण यात हिरिरीने उतरणाऱ्या सामान्य स्त्रीपासून आर्थिक-शैक्षणिकदृष्ट्या वरच्या स्तरातील स्त्रीपर्यंत सर्वत्र हा अनुभव येतो. मनासारखा पुरुष जोडीदार मिळत नसल्याने निवडीच्या निकषांशी तडजोड न करणाऱ्या अनेक मुलींची लग्ने लांबणीवर पडताना दिसतात. काही जणी अविवाहित राहणे पत्करतात. पसंत करतात. पुरुषांनी स्त्रियांच्या तुलनेत आपल्याला गतिमान नाही केले, तर हा पेच आणखी वाढेल.

स्त्री-पुरुष समतेची वाट अजूनही बिकट आहे हे खरे. पण शरीरसंबंधातून नैतिकता मोजण्याच्या ढोंगातून नवी पिढी मोकळी होते आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. पण त्याचवेळी माणूसपणाचे अविभाज्य अंग असलेले स्त्री-पुरुष जोडीदारांमधले तरल प्रेम, परस्पर विश्वास यातूनच शारीरिक मीलनातील समर्पणाचा अत्युच्च आनंद गाठता येतो, याचे त्यांचे भान सुटता कामा नये. आजच्यासारखी कुटुंबव्यवस्था पुढे तशीच राहील, याची खात्री नाही. कारण साधा तर्क-आजच्यासारखी पूर्वी ती नव्हती. मानवी विकासक्रमात तिच्यात बदल होत आलेत. पुढेही होतील. पण ही जी काय नातेसंबंधांची नवी व्यवस्था होईल, ती जबाबदार, निकोप व सुंदर असायलाच हवी, यात दुमत असायचे कारण नाही.

म्हणजेच, प्रेम, लग्न, संभोग यातला क्रम मानवी विकासाच्या आजच्या टप्प्यावर प्रेम व विश्वासासह संभोग असाच राहायला हवा. संभोग लग्नाच्या आधी की नंतर? की लग्नाशिवाय? एकाशीच की अनेकांशी? भिन्नलिंगी की समलिंगी? …हे प्रश्न अर्थातच गौण आहेत.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
______________________________________

आंदोलन शाश्वत विकासासाठी, मार्च २०१६

‘राष्ट्र’ ही एक ‘भूमिका’ असते, याची विस्मृती नको


संसदेत स्मृती इराणी महिषासुर-दुर्गेसंबंधातील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या आवारात लागलेले पत्रक वाचत होत्या त्यावेळी माझ्या मनात राहून राहून येत होते- स्मृती इराणींच्या तावडीतून नामदेव ढसाळ वाचले. कारण ते हयात नाहीत. नाहीतर स्वातंत्र्य हे कुढल्या गाढवीचं नाव आहे?’ असं विचारणाऱ्या ढसाळांचा आताच्या सरकारने कन्हैया केला असता. ती संधी त्यांची हुकली. पण राजा ढाले जिवंत आहेत. नुकतीच त्यांची पंचाहत्तरी झाली. त्यांचा साधनेतील राष्ट्रध्वजासंबंधीच्या उल्लेखाबद्दल गाजलेला लेख मंत्रिमहोदया स्मृती इराणींनी (दुर्गा-महिषासुर पत्रकाप्रमाणे) संसदेत अक्षरशः वाचण्याचा बाणेदारपणा दाखवण्याची संधी जरुर घ्यावी. पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून अटक करावे. कोर्टात नेताना राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या वकिलांच्या तैनाती फौजेकडून त्यांना बुकलण्यात यावे. अशावेळी भाजपच्या आश्रयाने झालेले व सरळ भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार, झुंजार आंबेडकरी सैनिक अनुक्रमे रामदास आठवले व उदित राज हेही त्या लेखाची नव्या संदर्भात फेरसमीक्षा करतील व इराणींना अनुकूल अर्थ काढतील. ढालेंवरील राष्ट्रद्रोहाचा आरोप सिद्ध करण्यासाठी या दोघांची आंबेडकरी बाण्याची साक्ष महत्वाची ठरेल. अजूनही असे राष्ट्रद्रोही बरेच निघतील. पण ते किरकोळ आहेत. त्यातील एक बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी गांधीजींना तोंडावर सांगितले होते, मला मातृभूमी नाही. पुढे तर त्यांनी रिलडल्स इन हिदुइजममध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाबद्दल काहीबाही लिहिले होते. परंतु, बाबासाहेब आंबेडकर संघाला प्रातःस्मरणीय व भाजपला सायं-रात्र-मध्यान्ह सदा सर्वकाळ वंदनीय झाल्याने त्यांच्या देवादिकांवरील लिखाणाचा फेरअर्थ काढण्यासाठी छुप्या व जाहीर समित्या त्यांच्या १२५ व्या जयंतिनिमित्त स्थापन करण्यात येणार आहेत. आल्या आहेत. महात्मा फुलेंनी गणपतीबद्दल काय म्हटले किंवा पेरियारांनी हिंदू देवतांबद्दल काय म्हटले हे राष्ट्रद्रोहात बसवण्याचे कारण नाही. त्यांच्या वंशजांना राजकीय लाभवस्त्रे प्रदान करुन या पितरांचे पापक्षालन करता येऊ शकते. प्रबोधनकारांनी देवळांचा धर्म व धर्माची देवळे मधून हिंदूधर्मावर जे आसूड ओढले, त्याबद्दल हिंदुहृदय सम्राट उपाधी स्वतःप्रत अर्पण करुन त्यांच्या पुत्राने हे पापक्षालन आधीच केले आहे. प्रबोधनकारांचे पौत्रही पितृपंधरवडा पाळून नियमित पिंडदान करत असतातच.

तेव्हा, पुरोगाम्यांनी घाबरुन जायचे कारण नाही. जुन्या, आताच्या सर्वच विद्रोहींना देशद्रोही करायला ते निघालेले नाहीत. ते काही हिटलर नाहीत. एखाद्या कन्हैयासारख्या पोराच्या चुकला म्हणून कानफाटात त्यांनी मारली एवढेच. गरिबाच्या पोरानं नीट शिकावं, नाही ते धंदे करु नयेत यासाठी. त्याच्या काही जोडीदारांनाही त्यांनी समज दिली आहे, ती त्यामुळेच. आपल्या आधीच्या पिढ्यांतील मंडळींनी जो देश-संस्कृती द्रोह केला त्यापासून नव्या पिढीने दूर राहावे, यासाठी ते ही दक्षता घेत आहेत. (दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या वृद्धांना चुकून गोळ्या लागल्या. एवढ्या मोठ्या देशात असे होतच असते. अर्थात, त्या कोणी मारल्या याचा शोध व त्यांना शिक्षा होणारच आहे.)

म्हणजे, मी काही लिहिले तर तसा मलाही धोका नाही. मी कन्हैयाच्या आधीच्या पिढीतला. नामदेव-राजाच्या नंतरच्या पिढीतला. आणि मी काही त्यांच्यासारखं लिहीत नाही. प्रमाण भाषेत, सदाशिवपेठी वगैरे सभ्यता पाळून लिहिणारा आहे. मी चिंतन म्हणून- खरं म्हणजे काही शंका म्हणून भीत भीत बोट वर करतो एवढेच.

तर माझ्या या काही शंकाः

राष्ट्रप्रेम म्हणजे काय? राष्ट्रभक्ती म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे काय? या तिन्हींचा अर्थ एकच की त्यात काही फरक आहे?

मला माझ्या राष्ट्राबद्दल प्रेम असायलाच हवे, असे कामाझे राष्ट्र काही गैर वागत असेल, तर मला त्याच्याबद्दल प्रेम का वाटावे? म्हणजे हिटलरप्रमाणे जर ते वंशद्वेष करत असेल, दुसऱ्या देशांवर मुद्दाम, साम्राज्यवादी पद्धतीने आक्रमण करत असेल, तरीही मला त्याच्याविषयी प्रेम असावे?

या प्रश्नावर थबकायला होते. पण, कोणी असा प्रश्न विचारला, तुला तुझ्या आईबद्दल प्रेम आहे का? याला उत्तर हो असेल. पण ती जर वाईट असेल तर? होय. तरीही असेल. आपल्या मुलासाठी वाटेल ते पण सन्मार्गाने कष्ट करणारी आई असते, तसेच चोऱ्या करुन आपल्या लेकराला सुख देण्याचा प्रयत्न करणारीही आई असू शकते. अशा आईबद्दलही मुलाला प्रेम असते. पण फक्त प्रेमच असते. तिच्याबद्दल अभिमान असत नाही. ती त्याच्या नजरेत श्रेष्ठही असत नाही. तिने वाईट काम करु नये, असेच त्याला वाटते. ती चोरी करताना पकडली गेली, तर तिला सोडवायलाही तिचे मूल (मुलगा किंवा मुलगी) प्रयत्न करेल. कारण ती त्याची आई आहे. त्याचे तिच्यावर प्रेम आहे. पण ती श्रेष्ठ बाई नक्की नसते. या उदाहरणात, मुलाच्या जागी आई व आईच्या जागी मुलाला ठेवले, तरीही तेच. आपला मुलगा चोऱ्यामाऱ्या करताना पकडला गेला, तरी आईचा जीव तुटतच असतो. तो चांगला असतो म्हणून नव्हे, तर तो तिचा मुलगा असतो म्हणून. सर्व गुणांनी श्रेष्ठ अशी दुसऱ्याची आई किंवा दुसऱ्याचे मूल असेल, तर तिला/त्याला वस्तुनिष्ठपणे श्रेष्ठ जरुर म्हणता येईल, पण तिच्यावर/त्याच्यावर प्रेम असायला हवे, अशी सक्ती नसते. पूर्वअटही नसते.

देशाच्या बाबत, गावाच्या बाबत असेच असते. मी जिथे जन्माला आलो, त्या गावाबद्दल, तिथल्या निसर्गाबद्दल (तो रुक्ष का असेना) मला एक जिव्हाळा, प्रेम असते. देशाचेही तसेच. माझ्या देशाबद्दल मला प्रेम असते. तो इतर देशांशी चांगला वागत नसेल, तर त्याचे मला वाईट वाटते. त्याने सुधारायला हवे, अशी माझी इच्छा असते. प्रयत्न असतो. पण त्याच्याविषयी अभिमान नसतो. अभिमान तेव्हाच असू शकतो, जेव्हा, माझा देश माझ्या देशातील जनतेच्याच नव्हे; तर जगातील जनतेच्या कल्याणाची मनोकामना करत तिच्या हितासाठी प्रयत्नरत राहील.

या तर्काप्रमाणे माझ्या भारत देशाबद्दल मला प्रेम आहे. ...आणि अभिमान? अर्थातच आहे. सकारण आहे. अखिल मानवाच्या हिताची कामना करणारा सर्वेपि सुखिन सन्तुहा वेदघोष किंवा बुद्धाचे सब्बे सत्ता सुखि होन्तु हे ऊर्जस्वल सुत्त किंवा ज्ञानेश्वरांचे पसायदान, निरीश्वरवादी चार्वाकापासून सम्राट अशोक, सम्राट अकबर ते कबिरापर्यंतचा विचार-संस्कृतीच्या बहुलतेचा वारसा ही मला अभिमानाची बाब आहे.

अशा गुणसंपन्न देशाचा नागरिक या नात्याने मी देशभक्त-राष्ट्रभक्त असणे स्वाभाविक नव्हे काय? -इथे मला अडचण आहे. माणसे देवाची भक्त असतात. त्याला वैज्ञानिक तर्क काही नसतो. ती श्रद्धा असते. ती अंधही असू शकते. जोवर एखाद्याच्या श्रद्धेचा-भक्तीचा दुसऱ्याला त्रास होत नाही, तोवर हे ठीक. पण मी ज्याचा भक्त आहे, तोच सर्वश्रेष्ठ देव किंवा मी ज्याचा भक्त आहे, तोच सर्वश्रेष्ठ देश असे झाले की गडबड होऊ शकते. देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हातीया पंक्ती कितीही रक्त उचंबळवत असल्या तरी आजच्या आधुनिक इहवादी युगात माझ्या मनात हा प्रश्न आलाच पाहिजे- का? मी प्राण हाती का घ्यावेत? हा देश, देव, धर्म केवळ माझा आहे म्हणून? आपण ज्या अतिरेक्यांशी लढतो, त्यांना यमसदनास पाठवल्याचा आनंद साजरा करतो, ते अतिरेकी त्यांच्या विशिष्ट हेतूसाठी काम करणाऱ्या गटा-समुदाया-देशासाठी शहीदच असतात. म्हणजे भक्ती दोन्हीकडे असते. आपली भक्ती चांगली व दुसऱ्याची वाईट असे कसे असू शकते?

म्हणूनच मी राष्ट्रप्रेमी आहे. त्याला कारण एवढेच हे राष्ट्र माझे आहे. पण मी राष्ट्रभक्त नाही. राष्ट्राभिमानी जरुर आहे. त्याला माझ्या राष्ट्राच्या उन्नत परंपरांचे कारण आहे. राष्ट्रभक्तीत माझे राष्ट्र कसेही वागो, ते मला आदर्श असायलाच हवे, असा आग्रह आहे. त्यातून होणारी कृती ही केवळ भावनिक नाही, तर या भावना दुसऱ्या राष्ट्राची न्याय्य बाजू दुर्लक्षिणाऱ्या, पर्यायाने त्याच्यावर अन्याय करणाऱ्या असू शकतात.

या चर्चेनंतर आणखी एक संकल्पना उभी ठाकते, ती म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्र ही संस्था कशी तयार झाली, राष्ट्रवादाचा कसा जन्म झाला याची चर्चा हा एक स्वतंत्र अध्याय आहे. त्या खोलात इथे जात नाही. राष्ट्रवाद याचा मला लागणारा साधा अर्थ असा आहे- ज्यामुळे माझ्या राष्ट्राचा मला अभिमान वाटतो अशा भूमिकांचा समुच्चय म्हणजो आमचा राष्ट्रवाद. माझा देश माझ्या देशातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नरत आहे. देशवासीयांतील दुबळ्यांसाठी (स्त्रिया, दलित, आदिवासी इ. समाजविभाग तसेच मागास राहिलेले प्रादेशिक विभाग) ते लवकरात लवकर इतरांच्या बरोबरीने यावेत म्हणून तो खास सवलती ठेवतो. योजना आखतो. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल याची दक्षता घेतो. देशातील नागरिकांच्या मतांचा (मग ती मते राष्ट्राला कितीही दोष देणारी असो) आदर करतो. राष्ट्राला दोष देणारे मत म्हणजे देशद्रोह असे न मानता त्यांच्याशी संवाद करत राहतो. स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतो, पण दुसऱ्या देशावर स्वतःहून आक्रमण करत नाही. या सर्व भूमिकांचा समुच्चय म्हणजे आमचा राष्ट्रवाद. आम्ही स्वतंत्र झालो. मात्र अशा नवस्वतंत्र देशांच्या विकासासाठीही अलिप्त राष्ट्रांची संघटना बांधून आम्ही कार्यरत झालो. जागतिक शांततेसाठी प्रयत्न करु लागलो. शेजाऱ्यांशी काही कारणाने झालेल्या तणावाप्रसंगी लगेच युद्धासारखा मार्ग न अवलंबता जास्तीत जास्त चर्चेने उपाय शोधायचा आपण प्रयत्न करत आलो. आमचा हा व्यवहार राष्ट्रवादी व्यवहार आहे. माझा राष्ट्रवाद दुसऱ्या राष्ट्राला हानिकारक नाहीच; उलट त्याच्या उन्नतीची कामना करणारा व त्याला सहाय्य करणारा आहे.

राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्त, राष्ट्रवाद या संकल्पनांची अशी का म्हणून पिसं काढायची? कारण समाजातील हितसंबंधीयांकडून आणि खुद्द संसदेत सरकारकडूनच जेव्हा या तसेच राष्ट्राचा पाया असलेल्या अन्य सांविधानिक मूल्यांच्या अर्थाचा पिसारा व पसारा केला जातो, तेव्हा या पिसांच्या मुळांशी जाणे एक राष्ट्रप्रेमी, राष्ट्राभिमानी व राष्ट्रवादी म्हणून आपले आद्यकर्तव्य आहे. राष्ट्र हा केवळ सीमाबद्ध भूप्रदेश नाही; तर राष्ट्र ही एक भूमिका आहे. चलाख स्मृतीने ती विस्मृतीत ढकलू नये, यासाठी दक्ष राहायलाच हवे.
-          सुरेश सावंत
__________________________________
साभारः मी मराठी लाईव्ह, ११ मार्च २०१६