Friday, March 30, 2018

या भयावह विषमतेचे काय करायचे?


डॉ. सुखदेव थोरातांच्या आजच्या (३० मार्च २०१८) लोकसत्तेतील 'मालमत्ताधारणेतील भयावह विषमता' या लेखातील हे अवतरण व तक्ता पहाः

'२०१३ च्या आकडेवारीनुसार एकंदर मालमत्तांपकी ६६ टक्के मालमत्ता या उच्चवर्णीयांच्या मालकीच्या आहेत, १८ टक्के मालमत्तांवर ओबीसींची मालकी आहे आणि अनुसूचित जातींकडे चार टक्के, अनुसूचित जमातींकडे दोन टक्के, तर मुस्लीम समाजाकडे पाच टक्के मालमत्तांची मालकी आहे. या सामाजिक प्रवर्गाचे लोकसंख्येतील प्रमाण पाहा आणि त्यांच्याकडील मालमत्ताधारणेचे प्रमाण पाहा. त्यात विषमताच दिसून येईल. मालमत्ताधारणेतील या जातीनिहाय विषमतेच्या मागे, उच्चवर्णीयांनाच झुकते माप देणारी जातिव्यवस्था हे महत्त्वाचे कारण आहे.'

देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या गेल्या ७० वर्षांत प्रगती नक्की झालेली आहे. पण तिचे वाटप हे असे आहे. आदिवासी-दलित वर्गातील काही व्यक्ती पुढे गेल्या. पण समाज म्हणून जुनी उतरंड आर्थिक विकासक्रमात अजूनही तशीच आहे. ही अत्यंत नामुष्कीची बाब आहे.  विकासाचे न्याय्य वाटप का झाले नाही? ते कसे करायचे? आर्थिक विषमता अजूनही राहणार असेल तर तिचे सर्व जातींत समान वाटप  का नाही? जुनी जातीची उतरंड इथेही कशी काय? ही उतरंड मोडण्यासाठीच आरक्षणाचे धोरण होते. अजूनही ही उतरंड तशीच असेल तर आरक्षणाच्या विरोधकांनी ती मोडण्याचा उपाय सांगायला हवा. आरक्षण हे फक्त शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधीत्व यातच आहे. जमीन, इमारती, बँकेतील जमा, शेअर्स आदि संसाधनांना ते लागू नाही. खाजगीकरण-कंत्राटीकरण-विनाअनुदानीकरण या मार्गांनी आरक्षण निरर्थक होऊ लागले आहे. अशावेळी या संसाधनांमध्ये मागास जातींना न्याय्य वाटा कसा द्यायचा? या संसाधनांचे फेरवाटप करायचे का? कसे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत घटना मंजूर होण्याच्या आधल्या दिवशी भारतीय जनतेला उद्देशून शेवटचे भाषण करतात. त्यात ते इशारा देतातः

'२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.'

आज ६७ वर्षांनी बाबासाहेबांच्या या द्रष्टेपणाला अभिवादन करायचे की त्यांच्या या इशाऱ्याकडे गंभीरपणे पाहून तातडीने दुरुस्तीला लागायचे?  

...हे वेताळाचे प्रश्न नाहीत, ज्यामुळे राजा विक्रम निरुत्तर होईल. सरकार व समाजातल्या जाणत्यांनी यावर बोलायलाच हवे. आंबेडकरवाद, समाजवाद, भांडवलवाद, झिरप सिद्धांत आदि जी काही तुमची भूमिका असेल त्यातून या भयावह विषमतेला व त्यातील सामाजिक उतरंडीच्या जैसे थे ला काय उत्तर आहे, हे मांडावेच लागेल. मौन बाळगण्याची चैन आता परवडणार नाही.

- सुरेश सावंत

Thursday, March 29, 2018

माझ्या मनात झालेले ‘मिरॅकल’


‘मिरॅकल इन रवांडा’. 

...९० मिनिटांचा मंचकावरील थरार. वंशसंहाराचा भीषण, बिभत्‍स कल्‍लोळ. 

...भयाच्‍या भयाण तांडवात आध्‍यात्मिक शांततेचा शोध- भय, संताप, सूड यांच्‍या पार जाणारा. 

...क्रौर्याची परिसीमा गाठून सर्वस्‍व उजाड करणाऱ्या गुन्‍हेगारांना पिडितानेच दिलेली अखेरची क्षमा. विद्वेषाच्‍या समूळ उच्‍चाटनाचा शाश्‍वत मार्ग उजागर करणारी. अखिल मानवतेला कवेत घेणारी. 

...प्रेक्षक म्‍हणून माझ्या मनात भय, थरकाप, आक्रोश, अश्रू आणि अखेर उन्‍नत उन्‍मनावस्‍था. 

मुंबई विद्यापीठातील नाट्यलेखिकांच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदेच्‍या समारोपावेळच्‍या ‘मिरॅकल इन रवांडा या नाटकाने झालेल्‍या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही. रोजचे व्‍यवहार चालू असले तरी आत इम्‍याक्‍युलीचे स्‍वगत, ईश्‍वराशी चाललेला तिचा संवाद चालू असतो. मध्‍येच कळ येते. कळवळायलाही होते. जखम भळभळते. श्‍वास वाढतात. गदगदून येते. डोळे ओथंबून येतात. ...तरीही खूप बरे वाटते. काहीतरी साचलेले मोकळे होते आहे असे वाटते. अखिल मानवजातीच्‍या भविष्‍याची आश्‍वासकता श्‍वासांतून वाहू लागते. 

या नाटकाबद्दल मला काय वाटते हे लिहिणे त्‍या अर्थाने व्‍यक्तिगत झाले आहे. माझ्या जाणिवांचा, संवेदनांचा तो आविष्‍कार आहे. डायरी लिहिल्‍यासारखा. ते तटस्‍थ, वस्‍तुनिष्‍ठ वगैरे काही नाही. मला असे वाटले, एवढेच. 

रवांडातील वंशसंहारावरची ही एकपात्री एकांकिका. लेस्‍ली लेविस स्‍वोर्ड ही लेखिका आणि तीच अभिनेत्री. कथा वास्‍तवात घडलेली. इम्‍याक्‍युली या मुलीच्‍या आयुष्‍यावर बेतलेली. 

रवांडा हा आफ्रिका खंडातील एक छोटा देश. लोकसंख्‍या ७३ लाख. तेथील दोन प्रमुख टोळ्या- हुतू व तुत्‍सी. हुतू बहुसंख्‍य म्‍हणजे ८४ टक्‍के. तुत्‍सी १५ टक्‍के. १ टक्‍का त्‍वा नावाची एक छोटी जमात. या दोन टोळ्यांना आधीचाच संघर्षाचा इतिहास. तुलनाच करायची तर जर्मनीत ज्‍यू व भारतात मुस्लिम तसे रवांडात तुत्‍सी. या तुत्‍सींविषयी हुतूंच्‍या मनात खऱ्या-खोट्या कल्‍पनांचे, अफवांचे जहर साचत आलेले. तुत्‍सी आपल्‍याला कमी प्रतीचे मानतात, त्‍यांच्‍या बायका आमच्‍या हुतू पुरुषांना नादी लावतात व त्‍यांना जीवनातून उठवतात. आमच्‍या सर्वनाशाला हे तुत्‍सी कारण होणार आहेत. त्‍यांचा योग्‍य बंदोबस्‍त करायलाच हवा. ही मानसिकता तयार होत चाललेली. सरकारमधील अनेकांच्‍या मनात हाच द्वेष भरुन राहिलेला व तो प्रकटपणे व्‍यक्‍तही होणारा. आकाशवाणीवरच्‍या बातम्‍यांत, कार्यक्रमांतूनही हा द्वेष पोसला जात होता. 

अशात समेटाचा प्रयत्‍न करणा-या जुवेनाल हब्‍यारिमाना या रवांडाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचे विमान पाडले जाते व त्‍यांचा त्‍यात अंत होतो. ६ एप्रिल १९९४ रोजीची ही घटना. हे कृत्‍य करणारे नक्‍की कोण, याबद्दल अजूनही वाद असला तरी त्‍यावेळी हे करणारे तुत्‍सीच आहेत असे गृहीत धरले जाते व संहाराचा आगडोंब उसळतो. पुढच्‍या तीन महिन्‍यातील तुत्‍सींची क्रूर, हाल हाल करुन कत्‍तल केली जाते. या कत्‍तल झालेल्‍यांत तुत्‍सींच्‍या सहानुभूतिदार हुतूंचाही समावेश आहे. ही कत्‍तल लहानपणापासून एकत्र राहिलेल्‍या शेजाऱ्यांनी, गावातल्‍या जवळच्‍या परिचितांनीच प्रामुख्‍याने केलेल्‍या आहेत. 

सरकारच्‍या अधिकृत आकडेवारीनुसार ११,७४,००० लोक १०० दिवसांत मारले गेले. (१०,००० लोक प्रतिदिनी, ४०० लोक प्रति तास, ७ जण प्रति मिनिट). अन्‍य स्रोतांच्‍यानुसार हा आकडा ८,००,००० आहे. ३,००,००० तुत्‍सी वाचले. हजारो स्त्रिया विधवा झाल्‍या. त्‍यातल्‍या पुष्‍कळांना बलात्‍काराला सामोरे जावे लागले होते. अनेक बलात्‍कार अशा विटंबना करुन झाले की बऱ्याच जणी त्‍याचवेळी मेल्‍या. जिवंत बलात्‍कारितांपैकी बहुतेकांना आता एड्सने वेढले आहे. ४ लाख मुले अनाथ झाली. ज्‍या शाळांमध्‍ये, चर्चमध्‍ये तुत्‍सी जीव वाचवण्‍यासाठी लपले होते, अशा अनेक शाळा, चर्चेस आता त्‍यांच्‍या सांगाड्यांची, कवट्यांची म्‍युझियम्‍स झाली आहेत. 

या भयानक वेडाचाराला आळा घालण्‍याचा काहीच प्रयत्‍न देशात झाला नाही. उलट मारेकऱ्यांना प्रोत्‍साहन द्यायला, सर्वतोपरी शस्‍त्रांचे सहाय्य देण्‍याला, तुत्‍सींचा ठावठिकाणा सांगायला सरकारी यंत्रणाच सज्‍ज होती. आकाशवाणीवरुन तुत्‍सी झुरळांना चिरडण्‍याचे आवाहनच केले जायचे. या रणकंदनावेळी जगाची, युनोचीही स्थिती जवळपास बघ्‍यासारखी होती. यावर नियंत्रण घालण्‍याचे परिणामकारक प्रयत्‍न बाहेरुनही झाले नाहीत. त्‍यातल्‍या त्‍यात उशीरा का होईना पण फ्रान्‍सच्‍या हस्‍तक्षेपानेच थोडाफार परिणाम साधला गेला. त्‍यांनी उभारलेल्‍या छावण्‍यांतून तुत्‍सी निर्वासितांना आधार मिळाला. 

इबॅगिझा या तुत्‍सी कुटुंबातील इम्‍याक्‍युली ही २४ वर्षांची युवती. वंशसंहार सुरु झाल्‍यावर वडील तिला त्‍यांच्‍या एका हुतू मित्राकडे जाऊन लपायला सांगतात. ती तयार नसते. पण तरुण मुलींना दंगलखोर काय रीतीने वागवतात, हे बापाला ठाऊक असल्‍याने तो आग्रहच करतो व इम्‍याक्‍युली अखेर घरातून निघते. तिची लपण्‍याची जागा म्‍हणजे त्‍या घरातील एक पटकन लक्षात न येणारे ओले, कोंदट बाथरुम. ३ फूट रुंद व ४ फूट लांब एवढी ही अरुंद जागा. त्‍यात आधीच ७ जणी लपलेल्‍या. सगळ्या जणी एकावेळी खाली बसूही शकत नव्‍हत्‍या अशा या जागेत इम्‍याक्‍युली तब्‍बल ९१ दिवस राहिली. बाथरुमच्‍या बाहेरचे जग या काळात तिने पाहिलेच नाही. बाहेर हुतू मारेकरी सुरे परजत आरोळ्या ठोकत असलेले ऐकू येई. ते कधी ती लपलेल्‍या घरावर थापा मारत, मालकाला दम देत, घर आतून तपासत. तिच्‍या नावाने ओरडत. पण त्‍यांना ते बाथरुम काही लक्षात येत नसे. अशा अवस्‍थेत मोठ्याने बोलायचे नाही, बाथरुममधल्‍या पाण्‍याचाही आवाज होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी लपलेल्‍यांना घ्‍यावी लागे. घरमालकानेही स्‍वतः मृत्‍यूवर उदार होऊनच यांना आधार दिलेला असतो. 

बाहेरच्‍या थापा, आपण सापडलो तर आपल्‍यावर बलात्‍कार होणार, आपण मारले जाणार या भयाने उसासणारी, थरकापणारी, हाडांचा सापळा झालेली इम्‍याक्‍युली हळू हळू ईश्‍वराशी संवाद साधू लागते. तिचे उसासे, थरकाप, भय, चीड एका निरव शांततेत परिवर्तीत होऊ लागते. 

आणि याचवेळी फ्रान्‍सचा हस्‍तक्षेप झाल्‍याचे व त्‍यांनी छावण्‍या उघडल्‍याचे कळते व इम्‍याक्‍युली जवळच्‍या छावणीत जाण्‍याचा निर्णय घेते. हिंमतीने घराच्‍या बाहेर पडते. प्रदीर्घ काळ अवघडून राहिल्‍याने व ताकदच संपल्‍याने तिला प्रथम धड उभेच राहता येईना. हळू हळू ताकद एकवटून ती रांगत, धडपडत फ्रेंच छावणीत दाखल होते. सुटकेचा निःश्‍वास टाकते. 

आता आपल्‍या घरच्‍यांची माहिती घेऊ लागते. तेथील रजिस्‍टरमधली नावे आतुरतेने वाचायला लागते. अन् वडील, आई, भाऊ एक एक करुन सगळे कुटुंबीय केवळ मारले नव्‍हे, तर क्रूरपणे ठार केले गेल्‍याचे तिला समजते. एका भयाण पोकळीच्‍या विवरात ती कोसळत जाते. तिच्‍या कुटुंबात ती आता एकटीच शिल्‍लक असते. तिचा ईश्‍वराशी चाललेला संवाद तिला बहुधा ताकद देऊन उभी करतो. तिच्‍या कुटुंबीयांना ठार मारलेल्‍याला बघायचे आहे का, म्‍हणून तिला विचारले जाते व त्‍या मारेकऱ्यास तिच्‍या समोर आणले जाते. ती शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या थकून गेलेली आहे, गळून गेलेली आहे. आता तिने काय करायचे? त्‍यास काय म्‍हणायचे? 

...ती एवढेच म्‍हणते, ‘मी तुला क्षमा करते.’ 

वास्‍तव आणि नाटक इथे संपते. वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीने ‘Left to Tell: Discovering God Amidst the Rwandan Holocaust (2006)’ हे पुस्‍तक लिहून हा सगळा घटनाक्रम नोंदवला आहे. लेस्‍लीने त्‍याचे ‘मिरॅकल इन रवांडा’ हे नाटक केले. ते करण्‍यासाठी ती स्‍वतः वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीबरोबर रवांडात हिंडली. घटनाक्रमातली माणसे, स्‍थळे समजून घेतली. इम्‍याक्‍युलीच्‍या मनाशी, तिच्‍या जाणिवांशी, संवेदनांशी एकरुप झाली. ते ती जणू स्‍वतः जगली. नाटक तिने लिहिले व नाटकात तिनेच काम केले. 

‘नाटक लिहिले’, ‘काम केले’ असे म्‍हणणे खरे म्‍हणजे बरोबरच नाही. ती लेस्‍ली राहिलीच नाही. संहितेत आणि प्रयोगात ती ‘इम्‍याक्‍युलीच’ होती. तिला कोणी बनावे लागलेच नाही. लेस्‍ली आणि इम्‍याक्‍युली या अभिन्‍न, एकच होत्‍या. रवांडातला अख्‍खा वंशसंहार त्‍याच्‍या अमानुष क्रौर्यासहित लेस्‍लीने रंगमंचावर एकटीने उभा केला. प्रत्‍यक्षातला इम्‍याक्‍युलीचा काळजीत पडलेला बाप, लपायला आधार देणारा हुतू घरमालक, आरोळ्या ठोकत धिंगाणा घालणारे हुतू मारेकरी, छावणीतला फ्रेंच सैनिक, तिच्‍या कुटुंबीयांचा मारेकरी या सर्वांना लेस्‍लीनेच आपल्‍या प्रचंड ताकदीच्‍या अभिनयाने सजीव केले. प्रेक्षकांना त्‍या सर्व थराराचा जिवंत प्रत्‍यय दिला. 

लेस्‍ली हे नाटक घेऊन जगभर हिंडते आहे. त्‍याच्‍या तिकिटांतून येणा-या पैश्‍यांतला एक हिस्‍सा रवांडातल्‍या अनाथ मुलांच्‍या संगोपनासाठी खर्च होणार आहे (A portion of all ticket sales is donated to Orphans Of Rwanda), असे या नाटकाच्‍या वेबसाईटवरील आवाहनात छापलेले आहे. तिने स्‍वतः रवांडातील दोन मुले दत्‍तक घेतली आहेत. 

एवढेच नव्‍हे, या नाटकाच्‍या वेबसाईटवर तिने असेही आवाहन केले आहे – ‘If your theatre or organization is interested in bringing this incredible message of forgiveness to your area, please contact us!’ 

हा ‘क्षमाशीलतेचा’ संदेश तिला महत्‍वाचा वाटतो व त्‍याचा प्रसार जगभर ती करु पाहते आहे. विलक्षण ताकदीची अभिनेत्री अन् त्‍याहून मोठी जग सुंदर, मानव्‍यपूर्ण करु इच्छिणारी’ कार्यकर्ती! या कार्यकर्तीच्‍या कोंदणामुळे तिच्‍यातली अभिनेत्री खुलून दिसते. 

नाटकाच्‍या शेवटी जो प्रचंड टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांकडून झाला त्‍यास तिने ‘हसू आणि आसू’ भरल्‍या मुद्रेने प्रतिसाद दिला. केवळ कलाकार ती असती तर ‘हसू’ पुरेसे होते. शेवटी भेटायला गेलेल्‍या एका कार्यकर्तीशी बोलताना ‘नाटकाचा संदेश-क्षमेचा-खरेच लोकांपर्यंत पोहोचला का?’ हा प्रश्‍न तिला विचारावासा वाटला. 

कलेने निःसंशय संदेश द्यायचा असतो. अर्थात, तो प्रचारकी पद्धतीने नव्‍हे, तर त्‍याहून अधिक सशक्‍त, प्रत्‍ययकारी मार्गाने म्‍हणजे ‘कलात्‍मकतेने’. मानवी जीवनात सौंदर्य, समृद्धता निर्माण करणे, हेच तर कोणत्‍याही कलेचे अंतिम लक्ष्‍य असते. 

नाटक पाहत असताना आपल्‍या देशांतील फाळणीपासून, गुजरातपर्यंतच्‍या हिंदू-मुस्लिम दंगली समोर येत होत्‍या. बाबरी मशिदीच्‍या विध्‍वंसानंतरची दंगल तर अगदी जवळून, म्‍हणजे तिच्‍यात वावरुनच अनुभवली होती. ९३ च्‍या जानेवारीतील दंगलीत शिवाजी नगर, धारावीत मी पाहिलेली माणसे मला ९४ च्‍या रवांडाच्‍या वंशसंहारात त्‍याच वृत्ती-प्रवृत्‍तींसह आढळली. 

रवांडातली इम्‍याक्‍युली अमेरिकेतील फिलिपिनी लेस्‍ली मुंबईच्‍या रंगमंचावर साकार करते आणि क्षमेनेच द्वेषाचे उच्‍चाटन होणार आहे, हा बुद्ध, ख्रिस्‍त, गांधी, मार्टिन ल्‍यूथर, मंडेला आदिंनी मानवजातीला दिलेला संदेश ती इथे देते. या त्‍याच्‍या ‘व्‍यापक मानव्‍या’च्‍या मध्‍यवर्तीत्‍वामुळेच मंचकावरील नाट्य माझ्याही मनात सुरु होते. इम्‍याक्‍युली, लेस्‍ली आणि मी वेगळ्या देशांचे नव्‍हतोच. आम्‍ही एकाच पृथ्‍वी ग्रहावरचे मानव वंशाचे सदस्‍य होतो. 

जगात आजही फार फार वाईट वागणारे लोक आहेत. ते स्‍वतःच्‍याच मानवी वंशाच्‍या सदस्‍यांच्‍या कत्‍तली करत आहेत, दुसऱ्यांना मारण्‍यासाठी स्‍वतःलाही बॉम्‍बने उडवत आहेत. आपल्‍याच मानवी वंशाच्‍या दुसऱ्या व्‍यक्‍तीचा धर्म, जात, प्रदेश, देश, भाषा वेगळी आहे, म्‍हणून अपरंपार द्वेष करत आहेत. या सगळ्यामुळे मला असुरक्षित वाटते. माझे मित्र, माझी घरची माणसे यांच्‍या सुरक्षिततेबद्दल मला काळजी वाटते. केवळ लिंगाच्‍या फरकामुळे स्त्रियांशी होणारा विषम, अवमानकारक व्‍यवहार पाहिला की अस्‍वस्‍थ व्‍हायला होते. खूप मोठे लोक हा समाज, जग सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करुन गेले, तरी अजून जग पूर्ण मोकळा श्‍वास घेऊ शकत नाही. या जाणिवेने मी उदास होतो. हतबल झाल्‍यासारखेही वाटते. 

...पण मग असे काही वाचले, पाहिले, ऐकले, केले की ‘मिरॅकल’ होते. मन उभारी धरते. रंध्रारंध्रातून ऊर्जा प्रसवायला लागते. मन शांत होते. वैश्विक अणू-रेणूंशी माझी तादात्‍म्‍यता साधली जाते. एकाकीपण दूर होते. वाईटापेक्षा जग चांगले करणाऱ्यांचा प्रवाह अधिक ओजस्‍वी, तेजोपुंज व दमदार आहे, याची प्रचिती येते. 

‘मिरॅकल इन रवांडा’ने हेच माझ्या बाबतीत केले. 

म्‍हणूनच सुरुवातीला म्‍हटल्‍याप्रमाणे या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही. 

- सुरेश सावंत 

(प्रेरक ललकारी, नोव्हेंबर २००९)

Thursday, March 8, 2018

'नावा'तली स्त्रीमुक्ती


फॉर्म बघून काऊंटरवरील बाई म्हणाल्या, " ह्या सुवर्णा भुजबळ तुमच्या कोण?"

"पत्नी. लिहिलंय तसं. मॅरेज सर्टिफिकेटही आहे." 

"आडनाव बदललं नाही?"

"नाही."

"असं कसं?"

"माझी तयारी नव्हती. लहानपणासूनची 'सुरेश सावंत' ही ओळख लग्नानंतर अचानक बदलायची आणि 'सुरेश भुजबळ' करायचं, हे कसंतरीच वाटलं मला."

मी दिलेल्या उत्तराने समोरच्या बाईंची मुद्रा चमत्कारिक झाली. त्यांना काय कळले ठाऊक नाही. त्यांचा प्रश्न माझ्या पत्नीच्या आडनाव न बदलण्याविषयी होता. तो मी मला लावून घेतला. अधिक काही न विचारता त्यांनी माझे काम मात्र केले.

..हा तसेच यासारखे प्रसंग स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेवेळी मी अनेकदा लिहिण्या-बोलण्यात नोंदवत असतो. ज्यांच्या बायकांची आडनावे लग्नानंतर बदललेली नाहीत त्या पुरुषांच्या वाट्याला असे प्रसंग अनेकदा येतात. त्यात त्रास असतो पण गमती अधिक. मात्र नावे न बदललेल्या बायकांच्या वाट्याला हरघडी व अनंत अडचणी. त्या खूपच त्रासदायक व वेदनादायकही. नात्यागोत्यात, नोकरीच्या ठिकाणी, सरकारी कामांत..जाईल तिथे येत असतात. एखाद्या बाईने घटस्फोटानंतर आपले मूळ माहेरचे आडनाव परत लावले तर तिचे लग्न झाले म्हणून काही जण चक्क अभिनंदन करतात. त्या बाईच्या दृष्टीने यात गंमत नसते. वेदना असते.

लग्नानंतर बाईचे नाव-किमान आडनाव बदलणे गृहीतच असते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य आमच्या वर्गावर आले असताना एकदा गुलाबी मुद्रेने म्हणाले – ‘काय तुमच्या वर्गात आडनाव बदलण्याची मोहीम निघालीय असे कळतेय!’ हे ऐकून आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक गुलाबी झालो. आमच्या वर्गात मुलींची बहुसंख्या. प्रेमात पडलेल्यांचे प्रमाण आमच्या वर्गात थोडे जास्त होते हे खरे. तथापि, त्यातली लग्नापर्यंत (म्हणजे आडनाव बदलेपर्यंत) पोहोचलेली एखाद-दोनच. आमच्याकडे लग्नसमारंभात वधूला मंगळसूत्र घातल्यावर तिचे नवे नाव जाहीर करत तेही मला किशोरवयात एकदम रोमॅंटिक वाटे. स्वप्नरंजन सुरु होई. आपलीही कोणीतरी अशी पत्नी होईल. ती ‘आपली’ होईल. तिला आपण आपल्या आवडीचे नाव देऊ. आपले आडनाव ती लावेल..वगैरे वगैरे.

नव्या जाणीवा तयार झाल्यावर मात्र याची झीट येऊ लागली. ज्या नावाने लहानपणापासून आपल्याला ओळखले जाते. ज्या नावाशी आपले काही भावबंध तयार झालेले असतात ते मुलींनी लग्नानंतर अचानक बदलायचे? अगदी अन्यायकारक! माझ्या पत्नीमुळे मला ओळखू लागलेले लोक मला तिच्या आडनावाने हाक मारतात. मीही ओ देतो. त्यांची चूक दुरुस्त करायची खटपट करत नाही. आधीच्या स्वप्नरंजनाचे ते बहुधा परिमार्जन असते. त्यांनाच मग केव्हातरी कळते व मग ते सॉरी सॉरी म्हणतात. चळवळीत पडलेल्या आमची जाणीव बदलली तरी समाज काय त्या स्थितीला आलेला नव्हता. अजून आलेला नाही. त्यामुळे आमचे आडनाव न बदलण्याचे प्रयत्न हे अजूनही वैयक्तिकच असतात. ते वाढत चाललेत. त्याचा स्वीकारही वाढतोय. पण तो लक्षणीय म्हणावा असा नाही. आंतरजातीय-धर्मीय लग्नांचे प्रमाण लक्षणीय वाढते आहे. पण आडनाव माहेरचेच ठेवण्याची गती अजून मंद आहे. लग्ने सजातीय नसली तरी आडनावे बदलण्याचा परिपाठ सर्व जाती-धर्मांत सारखाच आहे. तो इथेही पाळला जातो.

मला झीट येते, आडनाव बदललेले सहन होत नाही, ते अगदी अन्यायकारक वाटते हे माझ्यापुरते किंवा अशा विचारापर्यंत आलेल्यांचे ठीक. पण काळाच्या आजच्या टप्प्यावरचा तो स्त्रीमुक्तीचा अपरिहार्य निकष मानायचा का? अशी आडनावे न बदलणारे पण व्यवहारात व वैयक्तिक जीवनात स्त्री-पुरुष नाते आदराने व संवेदनशीलतेने जपणारे, अशी आडनावे न बदलण्याचे स्वातंत्र्य मुलींना देणारे, त्यांच्या परजातीय जोडीदार निवडीचा सन्मान करणारे किंवा खळखळ न करता स्वीकार करणारे यांना स्त्रीमुक्तीच्या बाजूचे मानायचे की नाही?

समाजातील अशा सहृदयी मंडळींना ही सूट देता येईल. पण स्त्रीमुक्ती चळवळीतील किंवा एकूण परिवर्तनवादी चळवळीतील जाणत्या कार्यकर्त्या स्त्रियांना (आणि पुरुषांनाही त्यांच्या पत्नी-मुलींबाबतच्या व्यवहारासंबंधी) ही सूट देता येईल का? हल्ली एकूणच वैचारिक संभ्रमकाळात हे प्रश्न चळवळीतल्या समजल्या जाणाऱ्या सर्वांना पडतात असे नाही. पण एकेकाळी ते खूप धारदार असत व अंगावर येत.

स्त्री मुक्ती संघटनेच्या स्त्री-पुरुष समानता यात्रांमध्ये-विशेषतः विदर्भातल्या १९८६ च्या यात्रेत मी खूप तीव्रतेने हे अनुभवले. तुम्ही स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या आहात म्हणजे तुम्ही कुंकू लावता कामा नये, मंगळसूत्र घालता कामा नये, लग्नानंतर तुमची नावे-आडनावे बदललेली असता कामा नयेत हे मुद्दे तेथील चळवळीशी संबंधित तरुणांकडून आमच्यातल्या स्त्रीकार्यकर्त्यांसमोर जाब विचारण्याच्या पद्धतीने ठेवले जात. आम्हालाही आमचे म्हणणे स्पष्ट करण्याचा त्यात हुकूम असे.

आमच्यातल्या पुढारी कार्यकर्त्यांपैकी काहीजणी त्यांच्या या निकषांवर पूर्ण उतरणाऱ्या तर काही जणी न उतरणाऱ्या होत्या. ‘स्त्री नाही देवी, स्त्री नाही दासी, स्त्री आहे माणूस’ या घोषणेतले माणूसपण स्त्रीला मिळावे, नवऱ्याच्या लाथा खायला लागू नयेत, मुलीचे मुलगी म्हणून शिक्षण थांबू नये, घरात मुलगी-मुलगा भेद होता कामा नये, नवऱ्याने सोडल्यावर बाई निराधार होऊ नये, लग्नात हुंडा दिला-घेतला जाऊ नये, बाईला मारहाण होत असेल तर ते नवरा-बायकोचे खाजगी भांडण म्हणून दुर्लक्ष न करता समाजाने त्यात हस्तक्षेप केला पाहिजे, समान कामाला समान वेतन हवे, कामाच्या जागी पाळणाघर हवे...’ यासारख्या बाबी आज प्राधान्याच्या आहेत. त्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कुंकू, मंगळसूत्र, आडनाव हे मुद्दे आज ऐरणीवरचे नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर ज्याला जसे जमेल तसे त्यांनी अंमलात आणावे, असे या तप्त पुरोगामी कार्यकर्त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत असू. त्यातले काही यथावकाश आमच्याशी सहमत झाले. काही मतभेद राखून मित्र राहिले. काही फटकून दूर गेले.

त्यांची तीव्रता पुढारी कार्यकर्त्यांबद्दल अधिक होती. स्वतःला स्त्रीमुक्तीवाल्या म्हणवता, चळवळीचे पुढारीपण करता आणि तुमच्या कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि नवऱ्याचे नाव-आडनाव या स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारणारी गुलामीची चिन्हे कशी काय? त्यांना हे ढोंग वाटायचे. दुतोंडीपण वाटायचे.

...त्यांचे हे वाटणे अस्वाभाविक नव्हते. त्यांना ते प्रामाणिकपणे वाटत होते. त्यांना लक्षात येत नव्हती ती समाजाच्या बदलाची गती. त्यातले अंतर्विरोध. समग्रता. ही तरुण मुले ज्या गावांतून-कुटुंबांतून आलेली होती, खुद्द त्या त्यांच्या गावांत, कुटुंबांत त्यांचे हे म्हणणे कोणी समजून घेतले नसते. त्यांना ते प्रश्न आहेत हेही समजणे कठीण होते. या त्यांच्या कुटुंबांतून आलेल्या माणसांचा यात्रेत होणाऱ्या संघटनेच्या ‘मुलगी झाली हो’ आणि ‘हुंडा नको ग बाई’ या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळत असे. मंचावरील नाटकातले विनोद, कारुण्य समोरच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांतून उमटत-वाहत असे. कथावस्तूत काही सांस्कृतिक-आर्थिक फरक असले तरी त्यातील बाईपणाची वेदना त्यांना त्यांची वाटे. पुढारी कार्यकर्त्या असल्या तरी त्यांचेही कुटुंब असते. ते सांभाळून त्या चळवळीला वेळ देत असतात. कुटुंब त्यांना सहकार्य करत असते. त्यांचा स्वतःचा व कुटुंबातील इतरांचा जाणीवेचा थर एकच असतो असे नाही. कुटुंबात त्यांचा नव्या बदलासाठी संघर्ष असतो. या संघर्षात कुटुंबातले सगळेच कमी-अधिक बदलत असतात, तडजोडी करत असतात. पुढे जाणारा प्रवास सुकर नसतो. पुढे जाताना दोर तुटेल इतका ताणायचा नसतो. कुंकू, मंगळसूत्र, आडनाव हे महत्वाचे जरुर; पण मूलभूत महत्वाचे प्रश्न आज नाहीत, हे या पुरोगामी तरुणांना अशा संदर्भाने व खोलपणे समजून घेणे कठीण जात होते.

मी अलीकडेच कार्यकर्त्यांच्या एका गटात बोलताना मुद्दाम खोड काढली. म्हटले, ‘’महात्मा फुले स्त्रीमुक्ती चळवळीचे जनक. ‘मुलगी झाली हो’ नाटकात तर पहिलं नमन त्यांनाच केलं आहे. पण त्यांनी सावित्रीबाई फुलेंना मात्र आपलेच नाव व आडनाव लावले. ...आणि बाबासाहेबांनी तरी काय केले. स्त्रीच्या गुलामीची संहिता असलेल्या मनुस्मृतीचे दहन करणारे, नवऱ्याला मित्र माना असे स्त्रियांना सांगणारे बाबासाहेब आपल्या पत्नीला आपलेच नाव व आडनाव लावतात. रमाईंचे सोडा. त्यांच्याशी बाबासाहेबांचे लग्न लवकर झाले. तेवढी समज त्या वयात नव्हती. पण माईसाहेबांबरोबर लग्न करताना ही चूक ते सुधारत का नाहीत? त्यावेळी तर बाबासाहेब घटना लिहीत होते. जगविख्यात विद्वान होते. माईसाहेबांचे ‘डॉ. शारदा कबीर’ हे मूळ नाव बदलून ‘डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ असे ते ठेवतात. डॉक्टर बाई पण त्याही नवऱ्याच्या पुरुषीपणाला अशा शरण जातात. बाबासाहेब प्रेमाने त्यांना मूळ नावाने ‘शारू’ असेच म्हणत. पण अधिकृत नाव सविता आंबेडकर. बाबासाहेबही शेवटी पारंपरिक पुरुषासारखेच वागले ना?”

ऐकणाऱ्यांची गडबड होते. याचा कसा विचार करावा ते काही काळ कळत नाही. फुले किंवा बाबासाहेब इतर बाबतीत प्रगतीशील होते. पण नाव, आडनाव, कुंकू, मंगळसूत्र या बाबींत मात्र तसे मागासच होते असे कसे म्हणणार?

ऐकणाऱ्यांची अधिक परीक्षा न घेता मी मग ऐतिहासिकदृष्ट्या याकडे कसे बघायचे असते त्याची चर्चा केली. त्या काळात व त्या काळाने पुरवलेल्या संदर्भांत जेवढा पुढचा वेध घेता येणे शक्य आहे, तेवढा हे महामानव घेतच असतात. मुक्तीच्या कल्पना, निकष, संकेत विकसित होत असतात. ज्या काळाच्या टप्प्यावर ते होते, त्यावेळी त्यांनी काय केले व काय म्हटले यावरच त्यांचे मापन करायला हवे. शिवाजी महाराजांनी युनियन का काढली नाही, हा प्रश्न कारखाने-कामगार नसलेला तो काळ लक्षात न घेता विचारणे अयोग्य आहे. तसेच राजकीय हितसंबंध व राजघराणे लक्षात न घेता त्यांनी आठ बायका का केल्या, एकच का नाही, हाही प्रश्न अनैतिहासिक आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळातील टोळीजीवनात स्वैर संबंध ठेवणारे स्त्री-पुरुष हे आजच्या नैतिक संकेतांनी व्यभिचारी ठरवणे मूर्खपणाचे होईल. आपण काळाच्या पुढच्या टप्प्यावर आहोत. फुले, आंबेडकर आदिंनी पायाभरणी केलेल्या चबुतऱ्यावर आपण उभे आहोत. अधिक विकसित काळात आहोत. अशावेळी दृष्टिकोण, बदलाचे निकष व संकेतही प्रगत होत असतात. अर्थात ते आपोआप होत नाहीत. या महामानवांच्या व आपल्या काळादरम्यानचे अनेक ज्ञात-अज्ञात प्रयत्न व विचारांची पेरणी त्यामागे असते. अशावेळी बाबासाहेब किंवा फुलेंनी आपल्या पत्नींची मूळ नावे तशीच ठेवली नाही म्हणून त्यांचे महानपण उणे समजणे वेडेपणाचे होईल. तसेच इतक्या थोर मंडळींच्या बायकांनी आपल्या नवऱ्याची नावे-आडनावे लावली हा अनुकरणीय आदर्श मानणेही बरोबर होणार नाही. या पूर्वसूरींच्या प्रति कृतज्ञ राहून त्यांच्या प्रयत्नांना आपण आपल्या काळात किती व कसे पुढे न्यायचे हे आपले आजचे व्यवधान असायला हवे.

ज्या १९८६ च्या काळातल्या विरोधाचे मी वर्णन केले, तो विरोधही हवाहवासा वाटावा इतका संभ्रम व शैथिल्य किंवा मांद्य वैचारिक बाबतीत सभोवताली दाटून आलेले आहे. आम्हा चळवळीतील कार्यकर्त्यांच्या घरातलीही पुढची पिढी संमिश्र जाणीवांची आहे. आम्ही लग्न साधेपणाने केले म्हणून त्यांनी तसे करायला हवे असे नव्हे. साधेपणा हाही सापेक्ष असतो. आनंदासाठीच्या कृती व साधने हीही बदलती असू शकतात. पण आधुनिक जीवनशैली व लग्नातले विधी मात्र परंपरागत हे फ्यूजन म्हणजे नवनिर्मिती नक्की नव्हे. पुढे जातानाचा हा काहीतरी गोंधळ आहे. आधुनिकतेचे काही ताण, परात्मता जुन्यात आधार शोधायचा प्रयत्न करत असावी किंवा जगण्याची व्याख्या व उद्दिष्ट यांच्या स्पष्टतेचाही प्रश्न असावा.

मध्यमवर्गीय शिक्षित थरातील मुली मंगळसूत्राला किंमत देतात असे नाही. ते त्या नियमित घालतीलच असेही नाही. पण त्यांना ते हवे असते. वेगळ्या पद्धतीचे आधुनिक वगैरे. लग्नानंतर स्वतःचे नाव बदलत नाहीत. तशी सासरहूनही कोणी सूचना करत नाही. आडनावात वेगवेगळ्या तऱ्हा असतात. यातल्या काही आधीच्या पिढीतही सुरु झालेल्या आहेत. अलीकडे या मध्यमर्गीय शिक्षित थरात त्या वाढल्या आहेत. विवाहित अथवा बिनविवाहित स्त्री-पुरुषांच्या नावांच्या सध्याच्या एकूण रचना या अशा आहेतः

लग्नानंतर ‘स्वतःचे नाव + नवऱ्याचे नाव + नवऱ्याचे आडनाव’ ही पहिली व जुनी रीत. ती आजही प्रमुख रीत आहे. एक बदल पूर्वीच्या प्रगत विचारांच्या महिलांनी केला व आजच्या अनेक जणी तो अंमलात आणत आहेत तो म्हणजे आडनावे दोन लावणे-एक स्वतःचे व दुसरे नवऱ्याचे. आपली मूळ ओळख ठेवून सासरची ओळख दर्शवणे हा हेतू किंवा तडजोड त्यात असते. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे, आपले मूळ नाव (स्वतःचे + वडिलांचे + वडिलांचे आडनाव) कायम ठेवण्याचा. यात स्त्रियांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राहते. मात्र त्यांच्या कुटुंबात मुलांना बहुधा वडिलांचेच नाव, आडनाव पारंपरिक पद्धतीने लावले जाते. त्या स्वतंत्र तरी त्यांच्यापासून झालेली मुले मात्र पित्याच्या मालकीची असा त्याचा अर्थ असतो. चौथा प्रकार, आडनावाजागी नवऱ्याचे नाव लावण्याचा. तो काहींना एकदम आधुनिक वाटतो. पण त्याचे कारण कळत नाही. नवऱ्याचे नाव आडनाव म्हणून लावणे म्हणजे त्याचे प्रभुत्व तत्त्वतः कबूल करणेच होय. बरे, अशी दोन शब्दांची नावे लावणाऱ्या मुलींचे नवरे तसे नाव लावताना (म्हणजे पहिले त्यांचे व आडनावाच्या जागी बायकोचे नाव) दिसत नाहीत. त्यांचे अस्तित्व स्वतंत्रच असते. बायकोचे मात्र त्यांच्यावर अवलंबून. पाचवा प्रकार ‘स्वतःचे नाव + आईचे नाव + वडिलांचे नाव’ हा. यात काही जण वडिलांचे नाव दोन क्रमांकावर व आईचे नाव तिसऱ्या क्रमांकावरही घेतात. इथे आडनाव नसते. नवऱ्याचे आडनाव लावणाऱ्या आयांच्या मुलांची आडनावे नवऱ्याचीच असतात. दोन आडनावे लावणाऱ्या आयांच्या मुलांची आडनावे दोन असत नाहीत. तिथे बापाचेच लावले जाते. पाचव्या प्रकारात मात्र पुढच्या पिढीतही तोच क्रम राहू शकतो. मूल + आई + वडिल. पितृप्रधानतेच्या दर्शनी ओळखीला इथे लगाम बसतो. ज्या आईने जन्म दिला ती केवळ साधनमात्र, खरा मालक बाप, या भूमिकेला नाकारुन आई व बाप या दोन्ही जन्मदात्यांना इथे समानतेने स्थान आहे. काहींनी वडिलांचे नाव नाकारलेले आहे. ते फक्त आईचेच लावतात. हा सहावा प्रकार. काहींनी मधल्या (बापाच्या) जागी आईचे व बापाच्या आडनावाजागी आईचे आडनाव लावलेले आढळते. हा सातवा प्रकार. तो धैर्याचा आहे. इतरांचे मधले नाव वडिलांचे असताना तिथे आईचे नाव असलेल्या मुलांना शाळेत त्यांच्या सोबत्यांकडून होणाऱ्या विचारणा त्रासदायक व न्यूनगंड तयार करणाऱ्या असतात. तर काहीजण ‘स्वतःचे + आईचे + वडिलांचे + वडिलांचे आडनाव’ अशीही रचना करतात. हा आठवा प्रकार. या आठव्या प्रकारात आईला किंमत दिली तरी आडनाव वडिलांचेच असल्याने पितृप्रधानतेला आव्हान मिळत नाही. त्यामुळे पाचवी म्हणजे ‘मूल + आई + वडिल’ ही किंवा ज्यांना काही कारणाने जन्मदात्या पुरुषाचा उल्लेख नाकारायचा/टाळायचा असेल त्यांची ‘मूल + आई’ ही सहावी पद्धत अधिक योग्य व स्त्रीमुक्तीच्या विकसित पुढच्या टप्प्याला अनुरुप अशी आहे. लग्नाचा व या पद्धतीच्या नावाच्या रचनेचा काही संबंध नाही. पती-पत्नींची आपापली नावे स्वतंत्र असतात. मुलांच्या नावात मात्र त्यांची नावे समान पातळीवर गुंफली जातात. यात व्यक्तीला महत्व मिळते. आडनावाने घराणे सूचित व्हायच्या (अनुषंगाने जात, धर्म या ओळखी जपणाऱ्या) सरंजामी प्रकाराला इथे आळा बसतो.

नव्या विचारांच्या अनेक मंडळींनी आपल्या जाणत्या वयात आपली पारंपरिक रचनेच्या नावाची ओळख रुढ झालेली असतानाही तत्त्व म्हणून वरील पितृप्रधानतेला नकार देणाऱ्या नावाच्या नव्या रचनेचा स्वीकार केलेला आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. तथापि, काहींना जुनी सर्वपरिचित ओळख बदलावी असे सध्या वाटत नाही. त्यास हरकत नाही. कारण आजच्या टप्प्यावरचा तो निकराचा मुद्दा नाही. मात्र आपल्या मुलांच्या बाबत जन्मतःच नावाची नवी प्रगत रचना (पाचवी किंवा सहावी) ते अंमलात आणू इच्छितात, हे स्वागतार्ह आहे. जे स्वतःची ओळख आज बदलू इच्छित नाहीत तसेच ज्यांची मुले मोठी आहेत व त्यांची नावे जुन्या पारंपरिक रीतीने लागलेली आहेत, अशांनी आपल्या मुलांना नव्या रचनेचा समज द्यायला हवा व त्यांच्या किंवा त्यांच्या पुढच्या पिढीबाबत असा निर्णय घेण्याची विनंती करायला हवी. तेवढे ते नक्की करु शकतात.

स्त्रीमुक्ती चळवळीच्या ऐतिहासिक विकासक्रमात नावातली स्त्रीमुक्ती हा अनिवार्य टप्पा आज नसला तरी अधिक प्रगत टप्प्यावर जाताना नावाची पारंपरिक पितृप्रधान रचना नाकारणे व नवी समानतेची रचना स्वीकारणे ही बाब स्त्रीमुक्तीला बळकटी आणणारीच आहे. ही नावातली स्त्रीमुक्ती आज ना उद्या व्हायलाच हवी.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

___________________________________

आंदोलन, मार्च २०१८