Thursday, September 23, 2010

रेशन आघाडीवरील सरकारचा मला आलेला अनुभव


माझी आघाडी रेशनिंग कृती समिती. रेशनसंबंधीच्‍या केंद्र व राज्‍य सरकारच्‍या अनुभवासंबंधात नवे पर्वत मी सतत लिहीत आलो आहे. अगदी अलिकडे म्‍हणजे गेल्‍या अंकात अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या निर्मितीतील संघर्ष हा लेख आहे तर याच अंकात गोदामांत धान्‍य सडण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवरील गोदामे ओसंडतात-धान्‍य सडते; मात्र रेशनवर धान्‍य नाही, गरिबांची ही चेष्‍टा रा.लो.आ. जावून सं.पु.आ. आले तरी अजूनही चालूच अशा दीर्घ शीर्षकाचा लेख आहे. या दोन तसेच आधीच्‍या लेखांतून तपशील खूप आलेले आहेत. त्‍यांची पुनरुक्‍ती करणे म्‍हणजे एक प्रबंधच होईल. अर्थातच तसे करणे अनावश्‍यक आहे. खाली काही अनुभवाची सूत्रे व संदर्भासाठी म्‍हणून काही तपशील देत आहे.

65 साली प्रमुख शहरांत सुरु झालेली रेशनची व्‍यवस्‍था 70 च्‍या दशकात देशभर पसरली. त्‍यावेळच्‍या धान्‍य टंचाईच्‍या पार्श्‍वभूमीवर ही रेशन व्‍यवस्‍था सार्वत्रिक होती. म्‍हणजे सर्वांना सारख्‍या प्रमाणात सारख्‍या दरात धान्‍य मिळत होते. सर्वसामान्‍यांना निश्चित दरात निश्चित प्रमाणात धान्‍य पुरवठा व बाजारातील भावांवर नियंत्रण या प्रमुख उद्देशांबरोबरच शे‍तक-यांना किमान आधारभूत किंमत व आपत्‍तीकाळासाठी धान्‍यसाठा हेही उद्देश रेशन व्‍यवस्‍थेत अंतर्भूत होते. हरितक्रांतीनंतर धान्‍यटंचाई संपली व बाजारात धान्‍य उपलब्‍ध झाले तसेच बाजारातील हे धान्‍य खरेदी करु शकणारा मध्‍यमवर्ग देशात वाढू लागला. या पार्श्‍वभूमीवर रेशनची व्‍यवस्‍था सार्वत्रिकतेकडून लक्ष्‍याधारित करण्‍याचे धोरण तिस-या आघाडीच्‍या काळात 1997 साली घेतले गेले.

गरिबांना अधिक स्‍वस्‍तात व अधिक प्रमाणात व इतरांना आंशिक अनुदानात रेशन देण्‍याचे धोरण तत्‍त्‍वतः योग्‍य होते. प्रत्‍यक्षात मात्र गरीब ठरवण्‍यात मोठे घोळ घातले गेले. या घोळामागे गरीब कमी दाखवण्‍यासाठी धोरणात्‍मक तसेच प्रशासकीय ढिसाळपणा, यंत्रणा व दुकानदार यांचा भ्रष्‍टाचार व स्‍थानिक राजकीय हितसंबंध अशी अनेक कारणे आहेत.

महाराष्‍ट्र राज्‍यासाठी 65 लाख कुटुंबांचे लक्ष्‍य बीपीएल कार्डांसाठी केंद्र सरकारने दिले होते. ते पूर्ण करताना शहरात 15000 रु. तर खेड्यात 4000 रु. वार्षिक दारिद्र्यरेषा ठरविण्‍यात आली. पुढे आंदोलने झाल्‍यानंतर ती सरसकट 15000 रु. ठेवण्‍यात आली. ग्रामीण भागातील 1997 सालच्‍या दारिद्र्यरेषा यादीतील 15000 रु. पर्यंतच्‍या लोकांना पिवळे कार्ड द्यायचे असे ठरवण्‍यात आले. शहरात मात्र अशी यादीच नसल्‍याने अर्जदाराने लिहून दिलेल्‍या अर्जाची तपासणी करुन अधिका-यांनी निर्णय घ्‍यायचा असे ठरवण्‍यात आले. ही उत्‍पन्‍न मर्यादा व पद्धती ठरवण्‍यात कोणताच शास्‍त्रीय आधार घेण्‍यात आला नाही. यावेळी सेना-भाजप युतीचे सरकार होते. पुढच्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारांनीही यात आजतागायत काहीही बदल केलेला नाही. युतीच्‍या काळातील मंत्र्यांनी शिष्‍टमंडळाच्‍या भेटींमध्‍ये जी काही थोड्या प्रमाणात संवेदनशीलता दाखवली तेवढी एक दत्‍ता मेघे वगळता पुढच्‍या कोणत्‍याच कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या मंत्र्यांनी दाखवली नाही.

रेशनव्‍यवस्‍था लक्ष्‍याधारित जर आहे, तर असंघटित कामगार, कचरा वेचक, सायकल रिक्‍शावाले, फुटपाथवर राहणारे, नाका कामगार, मोलकरणी, आदिम जमाती, भटक्या जमाती असे गरीब विभाग रेशनव्‍यवस्‍थेत आणण्‍याचे जाणीवपूर्वक प्रयत्‍न केंद्र व राज्य सरकारांनी करायला हवे होते. परंतु, लक्ष्‍याधारित रेशनव्‍यवस्‍था झाल्‍यानंतर 2000 साली आलेल्‍या भाजपच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने याबाबत पूर्ण अनास्‍था दाखवली. गोदामात अतिरिक्‍त साठलेले धान्‍य निर्यात करुन व्‍यापा-यांचे हित केले, हे सोबतच्‍या लेखात आहेच. तथापि, या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने आदेश दिल्‍यावर वर उल्‍लेख केलेल्‍यांपैकी काही विभागांना अंत्‍योदय योजनेत समाविष्‍ट करण्‍याचा निर्णय वाजपेयी सरकारने घेतला व त्‍यासाठीचा लक्ष्‍यांकही वाढवला. महाराष्‍ट्रात आजतागायत राज्‍याचाही शासन निर्णय असताना आदिम जमातीतील सर्व कुटुंबे अंत्‍योदयमध्‍ये नाहीत. कचरा वेचक, सायकल रिक्‍शावाले यांनाही विभाग म्‍हणून अंत्‍योदयची कार्डे दिलेली नाहीत. बीपीएलचीही नाहीत. काहींकडे एपीएलची तर असंख्‍यांना कार्डेच नाहीत. अशा दुर्बल विभागांना रेशनव्‍यवस्‍थेत समाविष्‍ट करण्‍याबाबत केंद्रातील भाजपचे सरकार व महाराष्‍ट्रातील आतापर्यंतची सर्व सरकारे ठार संवेदनशील राहिली आहेत.

संपुआ 1 सत्‍तेवर आल्‍यावर केंद्रात काही अनुकूल गोष्‍टी घडायला थोडीशी सुरुवात झाली. ज्‍या नंगेपणाने भाजप सरकार व्‍यापा-यांचा पक्षपात करत होते, त्‍यात घट झाली. एपीएलवाल्‍यांनाही अनुदान सुरु झाले. आज गहू 7.20 रू. व तांदूळ 9.60 रु. हे दर राज्‍यातील कार्डधारकांसाठी आहेत. खुल्‍या बाजाराच्‍या तुलनेत ते निम्‍म्‍याने कमी आहेत. तथापि, संपुआ 1 च्‍या काळात गोदामातील धान्‍याची उपलब्‍धता प्रारंभी कमी असल्‍याने (आधीच्‍या भाजप सरकार ते निर्यात करुन मोकळे झाले होते) राज्‍यांना एपीएलचा कोटा गरजेपेक्षा खूपच कमी पाठवण्‍यात येत होता. गत 3 वर्षाच्‍या उचलीच्‍या सरासरीवर हे प्रमाण आधारण्‍याचे धोरण स्‍वीकारल्‍याने ज्‍या दक्षिणेतल्‍या राज्‍यांची रेशन यंत्रणा पारंपरिकरित्‍याच मजबूत होती, त्‍यांची सरासरी अधिक निघाली व त्‍यांना कोटा अधिक जाऊ लागला. बिहारसारख्‍या गरीब राज्‍यात वर्षाला प्रतिव्‍यक्‍ती 6 किलो तर केरळमध्‍ये 60 किलो असा विरोधाभास तयार झाला. तो अजूनही पुरता दुरुस्‍त झालेला नाही. काही राज्‍यांनी जोरदार पाठपुरावा करुन आपला असलेला वाटा पुरतेपणी मिळवला. महाराष्‍ट्र सरकार मात्र कायम ढिम्‍म राहिले. आपल्‍या वाट्याचा बीपीएलचा कोटाही जो 100 टक्‍के द्यायला केंद्र बांधील आहे, तोही प्रारंभी निम्‍माच उचलत असे. पुढे तो 80 टक्‍क्यांपर्यंत गेला.

छत्‍तीसगढ सरकारने आपल्‍या राज्‍यांत ज्‍या लक्षणीय सुधारणा केल्‍या आहेत, त्‍यातील काही सुधारणा इथल्‍या आमच्‍या आंदोलनांनंतर जे जी.आर. निघाले (पण नीटपणे अंमलात आले नाहीत) त्‍यांच्‍या आधारावर करण्‍यात आल्‍या. याबद्दल तिथले कार्यकर्ते व अधिकारीच बोलतात. छत्‍तीसगढच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी देशातल्‍या सर्व राज्‍यांच्‍या अन्‍न खात्‍यांच्‍या प्रधान सचिवांना आपल्‍या राज्‍यात एका परिषदेसाठी बोलावले होते. आम्‍ही केलेल्‍या सुधारणा पहा, त्‍यात आम्‍हाला सूचना करा, असे त्‍यांनी आवाहन केले होते. महाराष्‍ट्राच्‍या अधिका-यांना खास भेटून तुम्‍ही कसे जाणे आवश्‍यक आहे, हे सांगण्‍याचा आम्‍ही खूप प्रयत्‍न केला. परंतु, त्‍याला त्‍यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. ते गेलेही नाहीत. आम्‍हा काही कार्यकर्त्‍यांनाही मुख्‍यमंत्री रमणसिंग यांनी बोलावले होते. परिषदेनंतर कार्यकर्त्‍यांना त्‍यांनी घरी भोजनासाठीही निमंत्रित केले होते. निरोप देताना 10 किलो तांदळाची प्रत्‍येकाला भेटही दिली. हे विस्‍ताराने यासाठी सांगितले की, ही संवेदनशीलता, याबाबतीतील इच्‍छाशक्‍ती महाराष्‍ट्राच्‍या राज्‍यकर्त्‍यांमध्‍ये शून्‍य आहे. गेल्‍या 2 महिन्‍यांपूर्वी काही अधिकारी मंडळी छत्‍तीसगढला जाऊन आल्‍याचे कळते.

राज्‍यातील रेशनव्‍यवस्‍थेचे संगणकीकरण करण्‍याची पहिली घोषणा 2005 साली झाली. त्‍याची कन्‍सल्‍टन्‍सी एका कंपनीला देऊन झाली, त्‍यानंतर सगळ्यांकडून पुन्‍हा नव्‍या कार्डासाठीचे फॉर्म्‍स भरुन घेण्‍यात आले. पुढे हे काहीच झाले नाही. कोट्यवधी रुपये व श्रम वाया गेले (अथवा मधल्‍या काहींनी खाल्‍ले). आता पुन्‍हा फॉर्म भरण्‍याचा प्रयोग करण्‍यात आला. तोही जवळपास वाया जाणार आहे. त्‍याची कोणतीही पूर्वतयारी नसल्‍याने त्‍या फॉर्मचे करायचे काय, याचे कोणालाच काही मार्गदर्शन नाही. आता नंदन नीलकेणींच्‍या एकमेवाद्वितीय ओळख क्रमांकाशी (युआयडी) सांगड घालून बायोमेट्रिक रेशन कार्ड मार्च 2011 मध्‍ये सर्वांना मिळणार असे जाहीर झाले आहे. त्‍याचे सर्वेक्षण नोव्‍हेंबरमध्‍ये सुरु होणार आहे. ही योजना वरुनच असल्‍याने व सोनिया गांधींचा वैयक्तिक व जोरदार पुढाकार असल्‍याने ती अंमलात येण्‍याची शक्‍यता दिसते आहे.

पंचमढीला कॉंग्रेसच्‍या अधिवेशनातील ठराव तसेच सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश या पार्श्‍वभूमीवर बचत गटांना रेशनकार्डे देण्‍याचा क्रांतिकारी निर्णय राज्‍य सरकारने 2006 साली सावित्रीबाई फुलेंच्‍या जयंतीच्‍या दिवशी 3 जानेवारी रोजी घेतला. त्‍याचा त्‍या तारखेचा शासन निर्णयही निघाला. रेशन दुकानदार कोर्टात गेले. त्‍यांनी स्‍थगिती आणली. न्‍यायालयाने निर्णय देण्‍याच्‍या आधीच सर्वपक्षीय आमदारांच्‍या दबावाखाली सरकारने हा निर्णय माघारी घेतला. सुधारित निर्णय केवळ बंद पडलेल्‍या दुकानांबाबत घेतला. पण दुकान परवडण्‍यासाठीच्‍या तरतुदी काढून घेतल्‍या. त्‍यालाही स्‍थगिती आली. आता ती उठली. ज्‍यांना ही दुकाने मिळणार आहेत, अथवा मिळाली आहेत, ते बचतगट दुकाने परवडण्‍याची काहीच व्‍यवस्‍था नसल्‍याने पारंपरिक गैर व्‍यवहारांना बळी पडत आहेत. काहींच्‍या नावाने खाजगी दुकानदारच ती चालवत आहेत. अशारीतीने सरकारचा क्रांतिकारी निर्णय त्‍यांनी स्‍वतःच मोडीत काढला. सरकारबरोबरच यास सर्वपक्षीय राजकारणीही तेवढेच जबाबदार आहेत. छत्‍तीसगढमध्‍येही बचत गटांना रेशन दुकाने देताना दुकानदार न्‍यायालयात गेले होते. तथापि, कॅव्‍हेट दाखल करण्‍याची जी दक्षता छत्‍तीसगढ सरकारने घेतली, ती महाराष्‍ट्र सरकारने जाणीवपूर्वक घेतली नाही.

केंद्रात संपुआ 1 च्‍या काळात राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा तयार झाला. त्‍यांत सोनिया गांधींचा वैयक्तिक पुढाकार होता. संपुआ 2 च्‍या कारकीर्दीत त्‍यांनी अन्‍नाच्‍या अधिकाराचा कायदा आणण्‍याचा केवळ मनोदय नव्‍हे, तर त्‍या हात धुवून त्‍याच्‍या मागे लागल्‍या. शरद पवारांचा विरोध, मनमोहनसिंग-अहलुवालियांचे अनुदानाच्‍या तरतुदीचे प्रश्‍न यांतून हा कायदा तुंबवायचे, लांबवायचे, पातळ करण्‍याचे जोरदार प्रयत्‍न चालू आहेत. अन्‍न खात्‍याच्‍या किंवा मंत्रिगटाच्‍या अधीन न सोडता या कायद्याचा मसुदा सोनिया गांधींनी राष्‍ट्रीय सल्‍लागार परिषदेच्‍या पहिल्‍याच बैठकीत मागवून घेतला. आता तो दुरुस्‍त करणे चालू आहे. त्‍यातही हे अंतर्गत संघर्ष व्‍यक्‍त होतात. पण सोनिया गांधींच्‍या राजकीय मान्‍यतेच्‍या व अधिकाराच्‍या बळावर हा कायदा हवा तसा नसला तरी रेशनव्‍यवस्‍थेला व अन्‍नाच्‍या अधिकाराला ब-याच प्रमाणात न्‍याय देणारा ठरेल, अशी शक्‍यता आहे. राष्‍ट्रीय स्‍तरावरील ज्‍या अभियानाशी माझा संबंध आहे, त्‍यातील काही जण राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीत आहेत. त्‍यांच्‍याकडून अंतर्गत संघर्षाचा तपशील व सोनिया गांधींची प्रबळ इच्‍छाशक्‍ती व पुढाकार समजत असतो.

इथे एक गोष्‍ट नमूद करणे आवश्‍यक आहे. आज तिथे 3 छावण्‍या दिसतात. एक, शरद पवार, दुसरी मनमोहनसिंग-अहलु‍वालिया व तिसरी, सोनिया गांधी. शरद पवार आधुनिक व मुक्‍त भांडवलशाहीचे पुरस्‍कर्ते असले तरी त्‍यांचे संघटनात्‍मक यंत्रणेतले सरंजामी संबंध सुटत नाहीत. रेशनव्‍यवस्‍था जैसे थे राहण्‍यातच त्‍यांच्‍या व कॉंग्रेसमधील तसेच अन्‍य पक्षांमधीलही रेशन दुकानदार, वाहतूकदार व नोकरशहा यांचे हितसंबंध जपले जाणार आहेत. अन्‍न महामंडळाकडील धान्‍याची आयात-निर्यात हा तर त्‍यांच्‍या व कॉंग्रेसमधील काही सोबत्‍यांच्‍या वैयक्तिक रुचीचा भाग आहे. दुस-या छावणीतल्‍या लोकांचा म्‍हणजे मनामोहनसिंग प्रभृतींचा या सरंजामी भ्रष्‍टाचाराला कडाडून विरोध आहे. या सरंजामी भ्रष्‍टाचारामुळेच सरकारची सबसिडी 9191 साली 2,850 कोटी होती ती वाढत जाऊन आता 56,000 कोटींवर पोहोचली आहे. जीडीपीच्‍या तुलनेतही हे प्रमाण अधिकच आहे. नियोजन विभागाच्‍या अधिकृत अभ्‍यास अहवालानुसार केंद्राकडून निघालेल्‍या 100 गोण्‍यांपैकी 40 गोण्‍या मध्‍येच गुल होतात. 1 रु. पोहोचवायला 4 रु. खर्च येतो. सरकार ज्‍या गरिबांसाठी धान्‍य पाठवते, त्‍यातील 50 टक्‍के लोकांना ते मिळतच नाही. या प्रश्‍नांचे काय करायचे, याबद्दल ही दुसरी छावणी प्रश्‍न उपस्थित करते व त्‍यावर आपली उपाययोजनाही सुचवत असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फुड स्‍टँप, प्रत्‍यक्ष रक्‍कम देणे आदिंचे प्रयोग व्‍हावेत, असे त्‍यांना वाटते. पण त्‍याला एक विरोध सरंजामी भ्रष्‍टाचारी गटाकडून होतो, तर दुसरा विरोध हे जागतिक बँकेचे हस्‍तक असल्‍याने रेशन व्‍यवस्‍था नष्‍ट करणे हाच त्‍यांचा गुप्‍त हेतू असल्‍याची टीका डाव्‍या संघटनांकडून होत असते. त्‍यास काही आदर्शवादी, मानवतावादीही बळी पडत असतात. भांडवली विकासातूनच संपत्‍ती तयार होणार आहे व ती खाली झिरपणार आहे. हा विकास समावेशक असावा यासाठी विस्‍तृतपणे नव्‍या उद्योगांना लागणारी कौशल्‍यवृद्धी कामगारांमध्‍ये तयार करावी, माहिती तंत्रज्ञान तळापर्यंत पोहोचावे, पायाभूत विकास जलद होऊन बदलत्‍या अर्थव्‍यवस्‍थेत दुर्गमातील दुर्गम भागातील माणूस समाविष्‍ट झाला पाहिजे, ही त्‍यांची मनीषा आहे. उद्योगजगताला खास सवलती व संघटित कामगारांच्‍या कायदेशीर संरक्षणात कपात व गरिबांच्‍या योजनांचे अनुदान व्‍यवहार्य व परिणामकारक करणे हे याच धोरणाचा भाग आहे. संपत्‍तीचे विषम वाटप होईल. पण वंचितता, गरीबी नष्‍ट होईल या भविष्‍यावर त्‍यांचा विश्‍वास आहे. या धोरणातील मुक्‍त भांडवलशाहीकडे असलेला त्‍यांचा झोक व सोनिया गांधींचा गांधी घराण्‍यातील आम आदमीशी असलेल्‍या नात्‍याच्‍या दृढतेपोटी त्‍याच्‍या आजच्‍या संरक्षणाला प्राधान्‍य यांत एक ताण आहे. या ताणामुळेच सोनिया गांधी व त्‍यांच्‍या आधारे दुर्बलांचे संरक्षण करु इच्छिणारे अभ्‍यासक, कार्यकर्ते यांची तिसरी छावणी आहे, असे मला वाटते. या तिस-या छावणीत सहभागी असलेल्‍या आमच्‍याशी संबंधित मंडळींवर आमच्‍यातलेच अतिडावे सोनिया गांधींचे हस्‍तक म्‍हणून टीका करत असतात. सार्वत्रिक रेशनव्‍यवस्‍थेला दुस-या छावणीचा विरोध असताना, सोनिया गांधींच्‍या ताकदीचा वापर करुन प्रारंभी सर्वाधिक गरीब एक चतुर्थांश जिल्‍ह्यांत म्‍हणजे 150 जिल्‍ह्यांत रेशन व्‍यवस्‍था सार्वत्रिक करुया, इथपर्यंत सहमती आणण्‍यात जे सल्‍लागार समितीतील आमच्‍याशी संबंधित सदस्‍य त्‍यातल्‍या त्‍यात यशस्‍वी होत होते, त्‍यांच्‍यावर आमच्‍याशी संबंधित डाव्‍या विचारवंताने जोरदार व जाहीर हल्‍ला चढवला. 150 जिल्‍ह्यांची ही तडजोड अजिबात होता कामा नये, रेशन व्‍यवस्‍था संपूर्ण देशात संपूर्ण सार्वत्रिक, कुटुंबाला 90 किलो धान्‍य 2 रु. दराने देणारी अशीच असली पाहिजे, ही त्‍यांची भूमिका. या भूमिकेच्‍या मागे जनतेचे संघटनात्‍मक प्रबळ असे कोणतेच बळ नाही. 150 ची तडजोड करणा-यांमागेही नाही. संबंध राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानामागेही नाही. जनतेचा प्रभावी असा कोणताच हस्‍तक्षेप नसताना अतिडावी भूमिका ही केवळ वल्‍गना ठरते. भाषा क्रांतिकारी असून चालत नाही. व्‍यवहार क्रांतिकारक असावा लागतो. राजकारणातला हा बलाबलांच्‍या हितसंबंधांच्‍या गलबल्‍यातून किती पुढे सरकता येते, हे पाहणे म्‍हणजे क्रांतिकारकत्‍व असे मला वाटते. सोनिया गांधींच्‍या व्‍यापक मान्‍यतेचा उपयोग करत मनमोहनसिंगांच्‍या दुस-या छावणीला तडजोडीसाठी खाली आणणे व शरद पवारांसारख्‍या पहिल्‍या सरंजामी छावणीला पूर्ण नमवणे हाच आमच्‍या राष्‍ट्रीय अन्‍न आघाडीचा व्‍यवहार असला पाहिजे, असे मला वाटते. डावी कर्मठता, सॅटेलाईट बुद्धिजीवी वावदूकता व साधनसामग्रीने संपन्‍न तळच्‍यांशी जबाबदार नसलेले एनजीओंचे प्रतिनिधी यांचा एकत्र काला या क्रांतिकारक व्‍यवहाराला अडथळा ठरत राहतो. तरीही यातले बहुसंख्‍य गरिबांच्‍याविषयी मनोमन आस्‍था असणारे असल्‍याने शेवटी निवेदनात कठोर डावे राहूनही व्‍यवहारात तडजोडींना अनेकदा रुकार देतात.

कधी नव्‍हे एवढी रेशन व्‍यवस्‍थेवर केंद्रात आता चर्चा होत आहेत. या सर्वांच्‍या परिणामी, रेशन व्‍यवस्‍थेला पूर्वीपेक्षा बरी अवस्‍था येणार असा माझा अंदाज आहे. कायदा झाला, नव्‍या व्‍यवस्‍था निश्चित झाल्‍या की भोंगळपणाही कमी होईल, जबाबदा-या, तक्रार यंत्रणा निश्‍चित होईल. यातून महाराष्‍ट्रातील सरकारलाही इच्‍छा असो अथवा नसो पहिल्‍यासारखे अंग झटकता येणे कठीण जाईल.

या अंतर्विरोधाचा बारकाईने विचार करुन पक्ष कार्यकर्त्‍यांना तसेच जनसंघटनेतील काडरला त्‍याचे भान देण्‍याचा प्रयत्‍न करणे व या अं‍तर्विरोधांतील कोणत्‍या शक्‍ती आपल्‍या कोणत्‍या व्‍यवहाराने बळकट होतील याची निश्चिती करणे व त्‍याप्रमाणे हस्‍तक्षेपाचा कार्यक्रम ठरवून जनतेला संघटित करणे आवश्‍यक आहे, असे मला वाटते.

वरील मांडणी हे एक प्रकारे लाऊड थिंकींग आहे, याची मला पूर्ण कल्‍पना आहे. अर्थात, पक्षात त्‍याबद्दल औपचारिक अशी चर्चा होऊन भूमिका निश्चित न झाल्‍याने आता तरी तीच मी सर्वत्र माझे मत म्‍हणून मांडत आहे. पक्ष कार्यकर्त्‍यांनी वरील मांडणीसंबंधात काही प्रश्‍न उपस्थित करावेत, वेगळे आयाम लक्षात आणून द्यावेत व त्‍यांची एकत्रित औपचारिक चर्चा व्‍हावी व त्‍या सांगोपांग चर्चेतून तयार झालेल्‍या पक्षाच्‍या अधिकृत भूमिकेचा मी वाहक व्‍हावा, यासाठी खरे तर मी आसुसलेला आहे.

- सुरेश सावंत

Wednesday, September 8, 2010

डॉ. बाबासाहेबांची एक महत्‍वाची सूचना

'जन्‍मजात पुरोहितगिरीची पद्धत बंद करुन पुरोहितांचा धंदा सर्व हिंदूंना (सर्व जातींना) खुला केला पाहिजे. जो हिंदू (कोणत्‍याही जातीचा) उपाध्‍यायाची परीक्षा उत्‍तीर्ण होईल त्‍याला पुरोहिताची सनद दिली पाहिजे.'

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, पान क्र. 280)


आता गणपतीत ब्राम्‍हण पुरोहितांना प्रचंड मागणी येणार. घरच्‍या-सार्वजनिक गणेशोत्‍सवांत आरत्‍या लोक रोज म्‍हणतात. पण खास आरत्‍यांना आणि सत्‍यनारायणाच्‍या पूजांना आवर्जून ब्राम्‍हण आणलेच जातात. बहुजनसमाजाला हा कधीही प्रश्‍न पडत नाही की ब्राम्‍हणाच्‍या हातूनच ही पूजा करणे म्‍हणजे तो सर्वश्रेष्‍ठ व आपण निम्‍नश्रेणीचे आहोत. हा आपला अपमान आपणच करुन घेतो. आपल्‍या देवाला भजण्‍यासाठी आपल्‍याला मध्‍यस्‍थाची गरजच काय, याची जाणीवच त्‍याला होत नाही. पूर्वी याबद्दल चर्चा तरी होत. आता त्‍याही बंद आहेत. आपल्‍यातले अनेक पुरोगामी देवाला मानतच नसल्‍याने ते ह्या चर्चेत पडतच नाहीत. तथापि, आपले मत तूर्त बाजूला ठेवून, गणपती मोठ्या प्रमाणात बसवले जातात, हे लक्षात घेऊन त्‍याची पूजा गणपती बसवणा-या आपणच करायला हवी, कोणी ब्राम्‍हण असता कामा नये, एवढा तरी प्रश्‍न नम्रपणे आपापल्‍या ठिकाणी आपण का उपस्थित करु नये. तो मानला जाणार नाही, हे ही उघड आहे. तरी असा काही प्रश्‍न तरी आहे, एवढे तरी पोहोचेल.

तसेच याचवेळी बाबासाहेबांनी 75 वर्षांपूर्वी आपल्‍या 'जातिनिर्मूलन' या प्रबंधात केलेली उपाध्‍यायाच्‍या परीक्षेसंबंधातली वरील सूचनाही चर्चेत आणण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे, असे मला वाटते.

.... सुरेश सावंत

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ब्राम्‍हणच होते’ हे गिरिजा कीरांचे विधान खुद्द बाबासाहेबांनाच अमान्‍य

8 सप्‍टेंबरच्‍या लोकसत्‍तेतील एका बातमीत ठाण्‍यात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या एक उमेदवार गिरिजा कीर यांचे म्‍हणणे उद्धृत करताना जो सहन करतो, पिळला जातो, ती व्‍यक्‍ती दलित होय तर ज्ञानाने जो परिपूर्ण असतो तो ब्राम्‍हण होय असे सांगून कीर म्‍हणाल्‍या की त्‍यादृष्‍टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ब्राम्‍हणच होते, असे माझे मत आहे. असे नमूद केलेले आहे. याच बातमीत त्‍यांचे माझ्या विधानाचा विपर्यास करुन वाक्‍याचा पुढचा-मागचा संदर्भ गाळला गेला... असेही उद्गार उद्धृत करण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनाच उद्देशून मी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली तर, त्‍याविषयीही त्‍या तसे म्‍हणू शकतील. शिवाय या आशयाचे विधान अनेक नामवंत व्‍यक्‍ती (अगदी बाबासाहेबांच्‍या काळापासून) सद्भावनेपोटी करत असतात, असेही मी गृहीत धरतो. म्‍हणूनच, कीर किंवा असे उद्गार काढणारे अन्‍य प्रतिष्ठित यांच्या हेतूबाबत शंका न घेता केवळ या विधानाबाबत खुद्द डॉ. बाबासाहेबांचे म्‍हणणे काय होते, हे त्‍यांनी समजून घ्‍यावे व अशी विधाने किमान बाबासाहेबांबाबत तरी करु नयेत, अशी विनंती करत आहे.

1935 सालच्‍या जातिनिर्मूलन (Annihilation of Caste) या आपल्‍या प्रबंधातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या संबंधातील विधाने अर्थाबद्दल कोणतीही शंका राहू नये म्‍हणून अनुवाद न करता त्‍यांच्‍याच शब्‍दांत मूळ इंग्रजीत देत आहेः

...To make it more attractive and to disarm opposition the protagonists of Chaturvarnya take great care to point out that their Chaturvarnya is based not on birth but on guna (worth). ...I do not understand why the Arya Samajists insist upon labelling men as Brahmin, Kshatriya, Vaishya and Shudra. A learned man would be honoured without his being labeled a Brahmin. A solder would be respected without his being designed a Kshatriya. If Europian Society honours its solders and servants without giving them permanent labels, why should Hindu Society find it difficult to do so is a question, which Arya Samajists have not cared to consider. …The names, Brahmin, Kshatriya, Vaishya and Shudra, are names which are associated with a definite and fixed notion in the mind of every Hindu. That notion is that of a hierarchy based on birth. So long as these names continue, Hindus will continue to think of the Brahmin, Kshatriya, Vaishya and Shudra as hierarchical divisions of high and low, based on birth, and act accordingly. The Hindu must be made to unlearn all this.’

(Annihilation of Caste, S. K. Publication, Nagpur, page 26-27)

‘unlearn’ करण्‍याची बाबासाहेबांची 1935 सालची ही अपेक्षा पूर्ण करण्‍यास गिरिजा कीरांसारख्‍या विद्वतजनांनाही 75 वर्षांचा कालावधी पुरेसा झालेला नाही का ?

- सुरेश सावंत

Wednesday, August 4, 2010

सर्व जातीय ‘नव्‍या मनुवादा’ च्‍या विरोधातील लढा ही काळाची गरज


शिक्षणाची दिशा व दशा हा 4 ऑगस्‍टच्‍या लोकसत्‍तेतील विजय कदम यांचा लेख शिक्षणक्षेत्रातील नव्‍या मनुवादाच्‍या मर्मावर नेमकेपणाने बोट ठेवणारा आहे. ऐपतवाल्‍यांनाच उच्‍च शिक्षण व न परवडणा-यांना त्‍यांच्‍या लायकीचे निम्‍नस्‍तरीय शिक्षण ही नवी मनुवादी व्‍यवस्‍था जातीवर आधारित न राहता वर्गावर आधारित बनते आहे, हे कदमांचे म्‍हणणे अगदी रास्‍त आहे. दलित-बहुजनांच्‍या अवनतीचे अविद्या हे कारण सांगून त्‍यावर सक्‍तीच्‍या व मोफत शिक्षणाच्‍या उपायाची देशात सर्वप्रथम मागणी करणारे महात्‍मा फुले, समानतेसाठी विधायक विषमतेचे तत्त्व सर्वप्रथम राखीव जागा देऊन अंमलात आणणारा लोकराजा छ. शाहू महाराज आणि सामाजिक न्‍याय, लोकशाही प्रस्‍थापनेसाठीचे मूलभूत हत्‍यार शिक्षण आहे, हे स्‍वतःच्‍या उदाहरणातून तसेच राज्‍यात अनेक ठिकाणी शिक्षणसंस्‍थांची उभारणी करुन सिद्ध करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रेरणेने व कृपेने शिक्षण घेऊन पुढे आलेल्‍या मंडळींनी शिक्षणक्षेत्रातील प्रतिगामी हल्‍ल्‍यांना प्रतिकार करावयास खरे म्‍हणजे अग्रभागी असावयास हवे होते. जातीच्‍या भाषेत बोलायचे झाल्‍यास त्‍यांच्‍याच जातीतील गरिबांना याचा मोठा फटका बसणार आहे. दुर्दैवाची गोष्‍ट अशी की, असा विरोध सोडाच, वरील महापुरुषांच्‍या तत्त्‍वांना तिलांजली देत, निर्लज्‍जपणे त्‍यांच्‍याच नावाने विनाअनुदानित शिक्षणसंस्‍थांचे साम्राज्‍य ही मंडळी उभी करत आहेत. देशातील तसेच देशाबाहेरच्‍या श्रीमंत पालकांच्‍या मुलांकडून लाखो रुपयांची लूट करणा-या या शिक्षणसंस्‍था ज्‍या भागात आज उभ्‍या आहेत, त्‍या स्‍थानिक तसेच संस्‍थाचालकाच्‍या जातीतील गरीब मुलांना आपल्‍या दारात उभेही करत नाहीत. मागोवा, युक्रांद, पँथर यातून व्‍यवस्‍था बदलावयास पुढे आलेल्‍या बहुजन-दलित युवकांतील अनेक जण आज मध्‍यम व उच्‍च मध्‍यमवर्गात सामील झाले आहेत. तेही कोणी या नव्‍या मनुवादाविरोधात बोंब मारताना दिसत नाहीत. (यास अपवाद आहेत, पण ते अगदी नगण्‍य.) त्‍याऐवजी आपली मुले आणि नातवंडांच्‍या मनावर अगं अगं म्‍हशी करत विकतचे शिक्षण घेऊन भरपूर पैसे मिळविण्‍याचा व्‍यवसाय करण्‍यातच जीवनाचे साफल्‍य असल्‍याचे बिंबवत आहेत. म्‍हणूनच या चळवळींच्‍या वारसदारांच्‍या एकीकृत रिपब्लिकन, बिगर एकीकृत रिपब्लिकन, बसप, जनता दल अ, ब, क, ड अथवा रिडालोस या राजकीय संघटनाही बोंब मारताना दिसत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्‍हणत मी ब्राम्‍हण, ब्राम्‍हणेतर तसेच बहिष्‍कृत अशा सर्वांमधील ब्राम्‍हण्‍याच्‍या (विषमतापोषक प्रवृत्‍तीच्‍या) विरोधात आहे. बाबासाहेबांच्‍या या शिकवणुकीस अनुसरुन सर्व जातींतील ब्राम्‍हणांच्‍या नव्‍या मनुवादाविरोधात सर्व जातीतील सामान्‍य, गरिबांचा एकजुटीचा लढा उभा राहणे ही काळाची गरज आहे.

- सुरेश सावंत, sureshsawant8@hotmail

Tuesday, July 20, 2010

अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या निर्मितीतील संघर्ष


अनेकप्रकारच्‍या खेचाखेचीतून, अंतर्गत संघर्षातून अखेर राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या 14 जुलैच्‍या बैठकीत अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या स्‍वरुपाविषयी सहमती झाली. अर्थात ही सहमती म्‍हणजे कायदा तसाच होणार असे नाही. अजून नियोजन आयोग, अर्थखाते, अन्‍नखाते, स्‍थायी समिती, संसद असे अनेक टप्‍पे त्‍याला पार करावे लागणार आहेत. तांत्रिकरीत्‍या, राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती हा टप्‍पा नव्‍हेच. सोनिया गांधींच्‍या अध्‍यक्षतेखाली देशातील काही तज्‍ज्ञांची ही समिती विविध जनहिताच्‍या प्रश्‍नांवर सरकारी धोरणांचा आढावा घेऊन आपल्‍या शिफारशी सरकारला देणे, हे तिचे काम. तथापि, राजकीयदृष्‍ट्या सर्वोच्‍च मान्‍यता असलेल्‍या सोनिया गांधींच्‍या अध्‍यक्षतेखालील ही समिती असल्‍याने तिच्‍या शिफारशींना विशेष वजन प्राप्‍त होणे स्‍वाभाविक आहे. म्‍हणूनच, अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याला पातळ करणारे व त्‍याला मजबूत करु इच्छिणारे असे दोन्‍ही घटक आपल्‍याला अपेक्षित अशा शिफारशी या समितीने कराव्‍यात, यासाठी निकराने झुंजत होते.

मे 2009 ला संयुक्‍त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्‍तेवर आल्‍यावर राष्‍ट्रपतींनी 100 दिवसांत पूर्ततेची जी अभिवचने दिली, त्‍यातील एक म्‍हणजे राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार कायदा. असा कायदा व्‍हावा, अशी मागणी हरितक्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्‍वामिनाथनांसारखे कृषितज्‍ज्ञ, अभ्‍यासक तसेच कार्यकर्ते अनेक वर्षे करत होते. वाजपेयींच्‍या नेतृत्‍वाखालील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्‍या कारकीर्दीत 2000 साली आपल्‍या देशात एक अभूतपूर्व परिस्थिती तयार झाली. उपासमार, कुपोषणाची प्रकरणे प्रसारमाध्‍यमांतून गाजत असताना रेशनची दुकाने ओस पडलेली व त्‍याचवेळी सरकारी गोदामांत मात्र धान्‍याचे साठे ओसंडून वाहत आहेत, असा संतापजनक विरोधाभास समोर आला. सरकारी नाकर्तेपणाच्‍या, असंवेदनशीलतेच्‍या विरोधात अन्‍न अधिकाराच्‍या प्रश्‍नावर काम करणा-या संघटना हालचाल करु लागल्‍या. त्‍यांच्‍यातील एक संघटना पब्लिक युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) हिने सर्वोच्‍च न्‍यायालयात 2001 साली याचिका दाखल केली. अन्‍नाच्‍या अधिकाराचा कायदा नसल्‍याने या याचिकेत त्‍यावेळी जगण्‍याच्‍या अधिकाराचे कलम 21 चा आधार घेण्‍यात आला. या याचिकेनंतर सर्वोच्‍च न्‍यायालयाने अन्‍नसुरक्षेच्‍यादृष्‍टीने अनेक उपयुक्‍त आदेश दिले. या आदेशांच्‍या अंमलबजावणीतील सरकारी दिरंगाईच्‍या दर्शनाने अन्‍नाच्‍या अधिकाराच्‍या कायद्याची गरज तीव्रतेने समोर आली. दरम्‍यान, राष्‍ट्रीय रोजगार हमी कायदा केंद्रात मंजूर झाला व त्‍याचे सुपरिणामही दिसून आले. संयुक्‍त पुरोगामी आघाडी- 1 च्‍या काळातील या कायद्याच्‍या परिणामकारकतेचा सं.पु.आ.- 2 ला सत्‍तेवर येताना राजकीय फायदा मिळाल्‍याचेही ध्‍यानात आले. छत्‍तीसगढसारख्‍या नक्षलप्रभावित, छोट्या व मागास राज्‍यात भाजपच्‍या डॉ. रमणसिंहांच्‍या जबरदस्‍त राजकीय इच्‍छाशक्‍तीमुळे रेशनव्‍यवस्‍थेचा कायापालट झाल्‍याचे व चावलबाबा म्‍हणून जनतेत प्रसिद्धी मिळून पुन्‍हा अधिक ताकदीने ते सत्‍तेवर आल्‍याचा नमुना वातावरणात होता.

यात सोनिया गांधी ह्या एका (बहुधा सर्वाधिक) प्रभावी घटकाची भर पडली. स्‍वातंत्र्य चळवळीच्‍या मंथनातून तयार झालेला कॉंग्रेसचा लोककल्‍याणकारी वारसा उखडून टाकण्‍याचे जोरदार प्रयत्‍न खुद्द कॉंग्रेसमधूनच होत असताना त्‍याच्‍या संरक्षणाची लढाई सोनिया गांधी जवळपास एकाकीपणे लढत आहेत. अरुणा रॉय, जॉं ड्रेझ यांसारखी कार्यकर्ते-तज्‍ज्ञ मंडळी रोजगार हमीच्‍या कायद्यासाठी अनेक वर्षे झुंजत असताना त्‍यांच्‍या या झुंजीला सोनिया गांधींनी व्‍यक्तिशः प्रतिसाद दिला व कॉंग्रेसमधील त्‍यांच्‍या सहका-यांकडून अनेक शंकांचे मोहोळ उठवले जात असतानाही त्‍यांनी लोकमान्‍यतेच्‍या बळावर हा कायदा घडवून आणला. प्रारंभी मर्यादित जिल्‍ह्यांत असलेला हा कायदा आता सबंध देशभर झाला आहे.

अन्‍नाच्‍या अधिकाराच्‍या प्रस्‍तावित कायद्यामागेही सोनिया गांधी व्‍यक्तिशः तटून उभ्‍या आहेत. राष्‍ट्रपतींनी घोषित केल्‍याप्रमाणे पहिल्‍या 100 दिवसांतच हा कायदा मंजूर करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न होते. जॉं ड्रेझ, हर्ष मंदर या कार्यकर्त्‍या तज्‍ज्ञांशी कायद्याच्‍या मसुद्याविषयी त्‍यांचा विचारविनिमयही चालू होता. परंतु, यात पहिला खोडा अन्‍न खात्‍याने (शरद पवार या खात्‍याचे मंत्री आहेत) घातला. सरकारला होणारी धान्‍याची उपलब्‍धता अनियमित असल्‍याने आपण असे कायद्याने स्‍वतःला बांधून घेणे योग्‍य होईल का, अशा आशयाची शरद पवारांची विधाने प्रसारमाध्‍यमांतून व्‍यक्‍त होऊ लागली. या शंकांमध्‍ये 100 दिवसांचा कालावधी उलटून गेला. पुढे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्‍पीय भाषणात अन्‍न अधिकाराचा कायदा करण्‍यास सरकार बांधील असल्‍याचे सांगून या कायद्याचा प्रस्‍तावित मसुदा जनतेच्‍या माहितीसाठी व चर्चेसाठी सरकारच्‍या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्‍यात येईल, अशी ग्वाही दिली.

अन्‍न अधिकाराचा कायदा होणारच असे स्‍पष्‍ट झाल्‍यावर अन्‍न खात्‍याने सरकारच्‍या अंतर्गत चर्चेसाठी एक मसुदा तयार केला. त्‍यात 25 किलो धान्‍य बीपीएल कुटुंबांना दरमहा देण्‍याची हमी दिली. त्‍यावरच्‍या कुटुंबांना सरकार धान्‍य देण्‍यास कायद्याने बांधील नाही, आजच्‍या बीपीएल कुटुंबांची संख्‍याच कायद्यात विचारात घेण्‍यात येईल, हा कायदा राबविणे ही सर्वस्‍वी राज्‍यांची जबाबदारी राहील अशा या कायद्याच्‍या मर्मावरच आघात करणा-या तरतुदी त्‍यात होत्‍या. आज बीपीएल कुटुंबांना 35 किलो धान्‍य मिळते. ते कायद्याने 25 किलो म्‍हणजे 10 किलो कमी केले जाणार. आज दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सरकारी आकडा 27 टक्‍के व प्रत्‍यक्षात बीपीएलची रेशनकार्डे 37 टक्‍क्‍यांच्‍या जवळपास आहेत. कायदा झाल्‍यावर 10 टक्‍के बीपीएल कुटुंबांचा लाभ काढून घेतला जाणार. यावर कडी म्‍हणजे हा केंद्रीय कायदा राबविण्‍याच्‍या जबाबदारीतून खुद्द केंद्रीय अन्‍नखातेच सटकू पाहत होते. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांत अन्‍न अधिकाराशी संबंधित 9 योजनांचा (मध्‍यान्‍ह भोजन, अंगणवाडीतील आहार, मातृत्‍व अनुदान योजना, वृद्ध पेन्‍शन योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इ.) समावेश आहे. अन्‍नाच्‍या अधिकारात प्रत्‍यक्ष अन्‍नाची उपलब्‍धता, हे अन्‍न खरेदी करण्‍यासाठीची क्रयशक्‍ती, हे अन्‍न पचविण्‍यासाठी आवश्‍यक आरोग्‍य इ. अनेक बाबी अंतर्भूत आहेत. रेशन ही महत्‍वाची बाब असली तरी केवळ त्‍याभोवतीच कायदा सीमित करण्‍याचा, असलेले लाभही काढून घेण्‍याचा नतद्रष्‍ट प्रयत्‍न अन्‍नखात्‍याने केला होता.

या प्रयत्‍नांना अनेक तज्‍ज्ञांनी, कार्यकर्त्‍यांनी विरोध केला. सोनिया गांधींनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून प्रस्‍तावित कायद्यात 25 किलोऐवजी 35 किलो धान्‍य, केवळ रेशन नव्‍हे, तर बेघरांसाठी कम्‍युनिटी किचन, वृद्धांना, निराधारांना अंगणवाडी किंवा शाळेतील मध्‍यान्‍ह भोजनात सहभागी करणे इ. बाबी असाव्‍यात अशा सूचना केल्‍या. हे पत्र प्रसारमाध्‍यमांतून प्रसिद्ध झाले होते. त्‍यानंतर हा मसुदा पुनर्विलोकनासाठी सक्षम मंत्रिगटाकडे सोपविण्‍यात आला. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी प्रमुख असलेल्‍या या मंत्रिगटाने सुचविलेल्‍या दुरुस्‍त्‍याही अन्‍नखात्‍याच्‍या मूळ प्रस्‍तावाच्‍या फार पुढे जात नव्‍हत्‍या. त्‍याविरोधात अभ्‍यासक, कार्यकर्त्‍यांनी पुन्‍हा मोर्चेबांधणी सुरु केली. राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाने संसदेबाहेर साखळी उपोषण सुरु केले.

या दरम्‍यान एक चांगली गोष्‍ट घडली. सोनिया गांधींच्‍या अध्‍यक्षतेखाली राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीची पुनर्स्‍थापना झाली. कार्यभार स्‍वीकारल्‍या स्‍वीकारल्‍या सोनिया गांधींनी पहिली गोष्‍ट केली ती म्‍हणजे, सक्षम मंत्रिगटाचा दुरुस्‍त मसुदा मागवला व तो परत दुरुस्‍तीसाठी पाठवला. सक्षम मंत्रिगटाच्‍या वतीने नंतर प्रणव मुखर्जींनी प्रसारमाध्‍यमांना सांगितले की, या मसुद्याच्‍या फेररचनेसाठी आम्‍ही नियोजन आयोगाकडून गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज 3 आठवड्यात मागवला आहे. तर शरद पवारांनी सांगितले, आम्‍ही देशोदेशीच्‍या अन्‍नअधिकाराच्‍या तरतुदींचा अभ्‍यास करुन 3 आठवड्याच्‍या आत दुरुस्‍त मसुदा प्रसृत करु.

3 आठवड्यांत काही हे झाले नाही. दरम्‍यान, राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीतील सदस्‍यांच्‍या नेमणुका झाल्‍या. त्‍यात योगायोगाने किंवा जाणीवपूर्वक अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याचा पुरस्‍कार करणा-या डॉ. स्‍वामिनाथन, जॉं ड्रेझ, डॉ. सक्‍सेना, हर्ष मंदर, अरुणा रॉय या 5 लोकांचा समावेश झाला. साहजिकच, अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याची प्राधान्‍यक्रमाने व जोरदार चर्चा समितीत सुरु झाली. 3 जुलैच्‍या बैठकीत सहमती न झाल्‍याने पुढची बैठक 14 जुलै रोजी ठरली. दरम्‍यान, संबंधितांशी चर्चा करुन सहमतीचा प्रयत्‍न करण्‍याची जबाबदारी हर्ष मंदर यांच्‍यावर सोपविण्‍यात आली. त्‍यांनी नियोजन आयोग, अन्‍न खाते, राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियान आदिंशी चर्चांच्‍या अनेक फे-या घडवल्‍या. अखेर 14 जुलैच्‍या बैठकीत या सर्व संघर्षांतून तावूनसुलाखून निघालेल्‍या कायद्याच्‍या मसुद्यासंबंधीच्‍या सूचनांपैकी ब-याच सूचनांवर सहमती झाली. समितीचे यासंबंधातील अधिकृत निवेदनही देशभरच्‍या प्रसारमाध्‍यमांतून प्रसिद्ध झाले.

काय आहेत, या सहमतीच्‍या शिफारशी?

  • देशातील एकचतुर्थांश सर्वाधिक गरीब जिल्‍ह्यां/तालुक्‍यांतील सर्वांना प्रति कुटुंब प्रति महिना 35 किलो धान्‍य 3 रु. प्रति किलो दराने दिले जाईल.
  • देशातील उर्वरित भागांत सामाजिक दुर्बल घटकांना (अनु.जाती, जमातींसह) प्रति कुटुंब प्रति महिना 35 किलो धान्‍य 3 रु. प्रति किलो दराने दिले जाईल. इतरांना 25 किलो धान्‍य प्रति कुटुंब प्रति महिना योग्‍यप्रकारे निर्धारित केलेल्‍या दराने दिले जाईल. या लाभापासून ज्‍यांना वगळायचे आहे, त्‍यांच्‍याबाबतचे निकष पारदर्शक व वस्‍तुनिष्‍ठपणे तपासता येतील, असे असतील.
  • नियोजन आयोगाच्‍या हाशीम समितीने निश्चित केलेल्‍या निकषांनुसार शहरी भागातील पात्र कुटुंबांना (यात बेघर तसेच झोपडपट्टीवासीयांचा समावेश आहे) दरमहा प्रति कुटुंब 35 किलो धान्‍य 3 रु. दराने दिले जाईल.
  • अंगणवाडी व शालेय मध्‍यान्‍ह भोजन योजनेच्‍या लाभासंबंधी सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशांचा नव्‍या कायद्यात समावेश केला जाईल.
  • टीबी, कुष्‍ठरोग व एड्स झालेल्‍यांना दरमहा 10 किलो मोफत धान्‍य, शहरी बेघरांना कम्‍युनिटी किचन तसेच कँटीनची व्‍यवस्‍था, ग्रामीण तसेच शहरी निराधारांसाठी मोफत जेवणाची व्‍यवस्‍था, मातृत्‍व अनुदान योजनेचा विस्‍तार इ. उपक्रमांना या कायद्याचा अंमल सुरु झाल्‍यापासून 1 वर्षाच्‍या आत सरकार चालना देईल.
  • याचबरोबर शेतीउत्‍पादनात वृद्धी, रेशनव्‍यवस्‍था परिणामकारक होण्‍यासाठी तिच्‍या अंमलबजावणी यंत्रणेतील सुधारणा, तक्रारनिवारण यंत्रणा याबाबत राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती तिच्‍या पुढच्‍या बैठकांमध्‍ये चर्चा करुन उपाय सुचवेल.
  • वरील आराखड्याच्‍या परिपूर्तीच्‍यादृष्‍टीने अन्‍न अधिकार कायद्याचा प्रस्‍तावित मसुदा राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती तयार करील.

रेशन व्‍यवस्‍था सार्वत्रिक करण्‍याचे तत्‍त्‍व सल्‍लागार समितीने स्‍वीकारले असले तरी, ज्‍या भागांत ती सार्वत्रिक करावयाची आहे, तेथील श्रीमंतांना त्‍यातून वगळले जावे, रेशनचे वितरण ही फाटकी झोळी असल्‍याने त्‍याचा बंदोबस्‍त करण्‍यासाठी रेशन दुकाने बचतगटांच्‍या, ग्रामपंचायतीच्‍या ताब्‍यात देणे, काही ठिकाणी धान्‍याऐवजी रोख अनुदान देण्‍याचे प्रयोग करावेत, अशा सूचना समितीच्‍या चर्चेत आहेत. अर्थात, धोरण म्‍हणूनच रेशनव्‍यवस्‍था मोडीत काढण्‍याच्‍या गेल्‍या कित्‍येक वर्षांच्‍या डावांना लगाम बसून ती मजबूत करण्‍याचे धोरण येऊ घातले आहे, हे स्‍वागतार्ह आहे. धोरण मजबूत असेल तर त्‍याच्‍या अंमलबजावणीचाही गांभीर्याने विचार होतो. शिफारशींच्‍या तपशीलाची पुरेशी स्‍पष्‍टता अजून यावयाची आहे व त्‍यासाठी राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती अजून काम करणार आहे. तथापि, हा कायदा ज्‍यारीतीने पातळ करण्‍याचे प्रयत्‍न चालवले गेले होते, त्‍यांना या टप्‍प्‍यावर तरी सणसणीत चपराक बसली आहे, हे निश्चित. या कायद्याच्‍या निर्मितीची ही कथा याच वेगाने सुफळ, संपूर्ण होवो, ही सदिच्‍छा.

सदिच्‍छा यासाठी की, धडक देऊन धोरण ठरविण्‍याची किवा बदलण्‍याची ताकद असलेली लोकांची उठावणी, जोमदार चळवळ आज तळात नाही. राष्‍ट्राचा अन्‍न अधिकाराचा कायदा वर ठरतो आहे, पण त्‍याची खबरबात जनतेलाच काय, कष्‍टक-यांत काम करणा-या कित्‍येक कार्यकर्त्‍यांना, संघटनांनाही आज नाही. जे काही प्रयत्‍न चालले आहेत, ते लोकांच्‍यावतीने काही स्‍वयंप्रेरित लोक (तज्‍ज्ञ, अभ्‍यासक, कार्यकर्ते) वा त्‍यांचे गट करत आहेत. त्‍याचवेळी विरोध करणारी शक्‍ती मात्र संघटित आहे. अशावेळी कौशल्‍यपूर्ण शिष्‍टाई, धोरणकर्त्‍यांवर प्रभाव पाडण्‍याचे सामर्थ्‍य असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या विवेकाला आवाहन इ. मार्गांवरच विसंबावे लागते आहे. हे मार्ग अर्थातच लॉटरीसारखे असतात. अ‍पेक्षित परिणामांची खात्री ते देत नाहीत.

...म्‍हणूनच वरील सदिच्‍छा.

- सुरेश सावंत

Monday, June 28, 2010

गरिबांचे चटके कमी करण्‍यासाठी रॉकेल-गॅसची सबसिडी त्‍याला थेट द्या

28 जूनच्‍या आधी खिशाला चटके...!’ या अग्रलेखात म्‍हटल्‍याप्रमाणे मल्टिप्‍लेक्‍समधील तिकिटे व बर्गर्स सहज खरेदी करणाया मध्‍यमवर्गाला पेट्रोल व गॅस विशेष सवलतील देण्‍याचे खरोखरच कारण नाही. गॅस 35 रुपयांनीच काय 70 रुपयांनी वाढला तरी त्‍याला फरक पडणार नाही. 30-35 टक्‍क्‍यांच्‍या उच्‍च व मध्‍यमवर्गाला सबसिडी देणे ही चैन आपल्‍या देशाला परवडणारी नाही. शिवाय तो गरिबांच्‍यादृष्‍टीने द्रोह आहे. या गरिबांना अन्‍य मार्गाने कसा लाभ पोहोचवता येईल याचा सरकारने विचार केला पाहिजे, अशी योग्‍य अपेक्षा याच अग्रलेखात आपण पुढे व्‍यक्‍त केली आहे. अनेक अभ्‍यासकांनी याबाबत उपाययोजना सुचविल्‍या आहेत. गरिबांना भार सोसावा लागू नये म्‍हणून सरसकट किंमती कमी ठेवण्‍याऐवजी अशा गरिबांनाच ही सवलत ठेवणे आवश्‍यक आहे. गॅस सिलेंडरची किंमत गरिबांना वेगळी व इतरांना वेगळी ठेवावी किंवा रेशनचे रॉकेल गरिबांना कमी किंमतीने व इतरांसाठी फ्री सेलचे जादा किंमतीत द्यावे, अशी काहींची सूचना आहे. तथापि, एकाच वस्‍तूच्‍या अशा दोन किंमती ठेवण्‍याने त्‍या वस्‍तूंच्‍या काळाबाजाराला उत्‍तेजन मिळते. उदा. आजही गॅस किंवा रेशनचे रॉकेल हॉटेलवाले अनधिकृतपणे वापरत असतात. त्‍याऐवजी, वस्‍तूंचा भाव एकच ठेवून गरिबांना सबसिडीची रक्‍कम बँकेमार्फत अथवा स्‍मार्ट कार्डाद्वारे थेट देणे हा उपाय अधिक परिणामकारक आहे. उदा. रेशनवरचे रॉकेल बंद करुन फ्री सेलची केंद्रे काढावीत. हे रॉकेल टपरीवाला, हॉटेलवाला कोणीही घेऊ शकतो. गरिबांना तोच दर असेल. तथापि, त्‍यांना त्‍यांच्‍या सबसिडीचे पैसे आगाऊ मिळालेले असल्‍याने त्‍यांना ते रेशनप्रमाणेच स्‍वस्‍तात पडेल. भाव सगळ्यांना सारखा असल्‍याने रॉकेलचा काळाबाजारही होणार नाही. गॅसबाबतही हेच करता येईल. नंदन नीलकेणींच्‍या पुढाकाराने येऊ घातलेल्‍या युनिक आयडेंटी ओळखपत्रामुळे तसेच अधिकाधिक प्रगत होत असलेल्‍या माहिती तंत्रज्ञानामुळे गरिबांना थेट सबसिडी देण्‍याची तांत्रिक यंत्रणा उभारणे आता सोपे होणार आहे. अर्थात, गरीब कोणाला म्‍हणायचे हा राजकीय प्रश्‍न आहे. गरीब कमीत कमी दाखवण्‍याच्‍या सरकारी प्रयत्‍नांच्‍या विरोधात जनसंघटनांना लढावेच लागेल. सार्वजनिक वाहतुकीच्‍या बससारख्‍या वाहनांचा प्रवास डिझेलच्‍या दरवाढीमुळे सर्वसामान्‍यांना महाग पडू शकतो. त्‍यासाठी अशा उपक्रमांनाही सरकारने थेट सबसिडी देणे आवश्‍यक आहे. अशी थेट सबसिडी देण्‍याचे प्रायोगिक प्रकल्‍प काही ठिकाणी करुन त्‍यांची परिणामकारकता सरकारला अभ्‍यासता येऊ शकेल. जीवनावश्‍यक वस्‍तूंची वाहतूक रेल्‍वेद्वारे व्‍हावे, यासाठी सुविधा व प्रोत्‍साहन सरकारने द्यायला हवे. रेल्‍वेची वाहतूक ट्रकच्‍या तुलनेत स्‍वस्‍त व प्रदूषणरहित असते. वाहतुकीची कोंडीही टाळता येते. तथापि, आपल्‍याकडची ट्रक लॉबी राजकारण्‍यांच्‍या आशीर्वादाने हे होऊ देत नाही, असेही काही तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. गरिबांना महागाईपासून संरक्षण देण्‍याचे असे उपाय एका बाजूला करत असतानाच दरवाढीमुळे होणा-या महागाईचा बोझा नव्‍या आर्थिक धोरणाचा व जागतिकीकरणाचा खरा लाभार्थी असलेल्‍या नवमध्‍यमवर्गाला सहज पेलता येणारा आहे व तो त्‍याने पेलण्‍यास पुढे आलेच पाहिजे, हे सरकारने त्‍याला ठामपणे सांगायला हवे.

- सुरेश सावंत

Saturday, April 3, 2010

आंदोलन विशेषांकावर दिलेली प्रतिक्रिया

प्रिय सुनीती,

सप्रेम नमस्‍कार,

'आंदोलन’च्‍या विशेषांकाबद्दल प्रतिक्रिया देण्‍यास उशीर झाल्‍याबद्दल दिलगिरी व्‍यक्‍त करतो.

तुमचे पत्र मिळाले पण त्‍या आधी पाठवलेला अंक मात्र पोहोचला नाही. पोस्‍टात प्रत्‍यक्ष जाऊन तुमच्‍या पत्रातील अंक पाठवल्‍याचा उल्‍लेख दाखवून तक्रार केली. पण याही वेळी उपयोग झाला नाही. आमच्‍या नव्‍या मुंबईत ज्‍याला रद्दीचीही किंमत येणार नाही, असेच टपाल, तेही बरेच उशीरा, पोहोचते. अंक शेवटी अन्‍य ठिकाणाहून मिळवला.

प्रतिक्रियेच्‍या उशिराबद्दल एवढे समर्थन पुरे.

अंक सुंदर, समग्र झाला आहे. तुमच्‍या साक्षेपी व कुशल संपादनाला मुख्‍य श्रेय जाते. मनःपूर्वक अभिनंदन!

माझा लेख वाचून अनेकांचे मला फोन/एसएमएस आले. माझ्यासाठी नेहमीच्‍या वर्तुळाबाहेरील व बरेचसे अपरिचितांचे हे फोन होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रतिक्रिया औपचारिक नव्‍हत्‍या. आपण ‘योग्‍य लाईन’वर आहोत, याचा दिलासा मिळाला. तुम्‍ही लेख छापला नसतात, तर अर्थातच हे कळले नसते. त्‍याबद्दल तुमचे मनापासून आभार.

जीवन समग्र असते. त्‍यामुळे राजकारणही समग्र असावे लागते. अंकात जीवनाच्‍या विविध क्षेत्रांना तुम्‍ही जाणीवपूर्वक भिडला आहात. आंदोलनांच्‍या विखुरलेपणाची, मर्यादांची वस्‍तुनिष्‍ठ नोंद घेऊन या सर्व आंदोलनांना कवेत घेणारे समग्र राजकारण उभे राहावे, ही तुमची कळकळ, आस प्रत्‍यही जाणवते. नव्‍या जगाची आस’ या तुमच्‍या व मेधाताईंच्‍या लेखात त्‍याची नोंद करताना तुम्‍ही ‘जनआंदोलनंदेखील विस्‍थापित समूहांना त्‍यांच्‍या प्रश्‍नापलीकडे व्‍यापक भूमिका घेऊन उभे राहण्‍यात कमी पडताहेत, तशीच त्‍या प्रश्‍नांना प्रत्‍यक्ष सामोरं जावं न लागणा-या समाजाला त्‍या प्रश्‍नासंदर्भात भूमिका घ्‍यायला लावण्‍यातही.’ असे म्‍हटले आहे. उल्‍काच्‍या संपादकीयातही ‘आंदोलने होत आहेत पण या आंदोलनांचा आणि मूलभूतरीत्‍या व्‍यवस्‍था परिवर्तन करण्‍याच्‍या लढ्याचा सांधा निखळला आहे....या लढ्यातून निर्माण होणा-या ऊर्जेचे राजकीय शक्‍तीत रुपांतर होतानाही दिसत नाही. तसेच संसदीय राजकारणात सक्रीय असणारे डावे पक्ष व हे जीवन वाचवण्‍यासाठी लढे लढवणा-या जनसंघटना यांच्‍यातील जैविक नातेदेखील तुटले आहे.’ अशी नेमकी नोंद आहे.

हा ‘पेच’ आहे, याची तुम्‍ही लोक नोंद घेत आहात व तो दूर व्‍हावा, यासाठी तळमळत आहात, याचे मला व आमच्‍यातल्‍या (म्‍हणजे लाल निशाण पक्षातल्‍या) काहींना अप्रूप व समाधानही वाटते. समाधान यासाठी की, काही बाबतींत मतभिन्‍नता असली तरी हा पुरोगामी चळवळींपुढचा ‘पेच’ सुटण्‍याची ‘आस’ तुम्‍हा मंडळींशी नाते अधिक घट्ट व्‍हायला मदतकारक होईल.

दुर्दैवाने आमच्‍या डाव्‍या पक्षांतल्‍या जवळपास कोणासही या ‘पेचा’चा वारा लागत नाही. जणू त्‍यांच्‍या सर्व संवेदना बधीर झालेल्‍या आहेत. त्‍यांच्‍याकडे प्रत्‍येक गोष्‍टीला उत्‍तर आहे. त्‍यांची मुखपत्रे चाळली तरी हे जाणवते. हे अंक त्‍यातील कागदासारखेच शुष्‍क. त्‍यांत ओलावा असा नसतोच. ट्रेड युनियन एके ट्रेड युनियन, तीही अर्थवादी, काही असंघटित क्षेत्रातल्‍या संघटना, महिला आघाड्या... हे केले म्‍हणजे कष्टक-यांचे राजकारण झाले, ही त्‍यांची ठाम समजूत. मार्क्‍सवाद नित्‍यनूतन विरोधविकासी वास्‍तवाचा सर्जक शोध आहे, हे न कळणारे आजचे मार्क्‍सवादी आहेत. (सन्‍माननीय अपवाद आहेत, पण त्‍यांचा प्रवाह नाही. म्‍हणून सरसकट विधान केले आहे.) असो.

खातूभाईंचा लेख मला सगळयात जास्‍त आवडला. वर लिहिलेले ‘मार्क्‍सवाद नित्‍यनूतन विरोधविकासी वास्‍तवाचा सर्जक शोध’ म्‍हणजे काय, ते त्‍या लेखातून कळते. आजच्‍या तरुण पिढीच्‍या मानसाचा माझा अंदाज स्‍पष्‍ट व्‍हायला मला खूप मदत झाली. खातूभाई आमच्‍यापेक्षा खूपच तरुण आहेत, याचीही खात्री झाली. खातूभाईंचे व्‍यक्तिशः आभार.

माध्‍यमांविषयीचे काही लिखाण सामान्‍य कार्यकर्त्‍या वाचकांना पुरेशा तयारीअभावी जड वाटू शकते. अर्थात, सामान्‍य कार्यकर्त्‍यांना माध्‍यमांचे, साहित्‍याचे भान सोप्‍या पद्धतीने कसे द्यायचे, हा प्रश्‍नच आहे म्‍हणा.

आता थांबतो. पुन्‍हा एकदा एक चांगला व संदर्भ अंक दिल्‍याबद्दल अभिनंदन व आभार.

आपला,

सुरेश सावंत