Saturday, May 16, 2015

'गांधी मला भेटला' च्या वादात भूमिका काय घ्यायची?

गुर्जरांचे मित्र त्यांच्या कवितांविषयी:
त्यांची सर्वांत गाजलेली सर्वश्रेष्ठ कविता म्हणजे अशोक शहाणे यांनी छापलेली, आणि तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे प्रसिद्धी पावलेली ‘गांधी मला भेटला’. - राजा ढाले (खेळ, 2011)
समकालीन मराठी कवितेत वसंतचं वैशिष्ट्य त्याची भाषा आहे. ती सांकेतिक, रूढ भाषेविरुद्ध जाऊन सभोवारची सर्वसामान्यांची, वरवर सपाट वाटणारी पण खोलवर दडलेल्या दुःखांकडे घेऊन जाण्याचा निर्देश करणारी आहे. ती जेव्हा सामाजिक-राजकीय विसंगतीकडे बोट दाखवते तेव्हाही विद्रोहाची आक्रमकता दूर ठेवून सर्वसामान्यांच्या कवेत असलेला उपहास वापरते. आणि या उपहासाला फक्त स्वगताचंच, स्वतःशी संवाद करण्याचंच रूप असतं. यामुळे ती नारेबाजी- शेरेबाजीतून स्वतःला वाचवते. वसंतची कविता भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेचाच सर्जनशील वापर करते. -चंद्रकांत पाटील (‘पाटीवरच्या टीपा’, साकेत प्रकाशन)
मी:
ढाले-ढसाळ-गुर्जर या वातावरणातच आम्ही घडलो. हे little magazine वाले आमचे त्या काळी हिरो होते. पुढे त्यांची घसरण सुरु झाली. त्याच्याशी मी सहमत नसलो तरी साचलेल्या-सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारलेल्या या मंडळींनी आम्हाला विलक्षण ताकद दिली, हे त्यांचे आमच्या पिढीवरील ऋण मोठे आहे.
मग मी काय भूमिका घ्यायची?
माझी 'बाजू' गुर्जरांची आहे. या कवितेने गांधीजींचा अवमान होतो म्हणून कोर्टात गेलेल्या पतितपावन संघटनेचे गांधीजींविषयीचे प्रेम हे पुतनामाशीचे प्रेम आहे, हेही मला ठाऊक आहे. पण तरीही मला सुस्पष्ट भूमिका घेता येत नाही. यात अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यातील काही असे:
विचार स्वातंत्र्य व कलात्मक स्वातंत्र्य एकच समजायचे का? समाज संकेत व समाजाच्या प्रगल्भतेची अवस्था कलावंताने लक्षात घ्यायची की नाही? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी आज ढोंगबाजी चालू आहे, त्याबद्दल 'आंबेडकर मला भेटला' अशी कविता कोणी लिहिली तर काय होईल? गांधीजींबद्दल हे चालू शकते. कारण त्यांच्या मागे फक्त सरकारी भिंत आहे. खुद्द राजा ढालेंची प्रतिक्रिया काय राहील? नामदेव ढसाळांनी एका कवितेत बाबासाहेबांविषयी गुर्जरांच्या तुलनेत अत्यंत मामुली उल्लेख केले होते. त्यावरुनही गदारोळ झाला होता. कलात्मकता समजण्यासाठीची प्रगल्भता समाजात यावी यासाठी साहित्यिक-कलावंतांचे कला प्रसवण्याव्यतिरिक्त काही प्रयत्न-कार्यक्रम राहणार आहेत का?
...I'm confused.मला भूमिका ठरवायला मदत हवी आहे.
- सुरेश सावंत

केस तर केस; भीमजयंतीला वाजणार २४ बेस


…जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी ‘अत्त दीप भव’ (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु’ च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे…या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो.

पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. आपल्या लोकांच्या काय भावना आहेत, हे कळावे, म्हणून तो फोटो पाठवला.’

दुपारीच याचा प्रत्यय आला. कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज जवळ येत गेला तसा अधिकच असह्य होऊ लागला. घराच्या भिंती कंप पावू लागल्या. छातीत धकधक होऊ लागले. घराबाहेर आलो. अर्थातच जयंतीची मिरवणूक होती. मला आलेल्या संदेशासारखेच भल्या मोठ्या स्पीकर्सचे थरावर थर असलेले मोठे ट्रेलरसारखे वाहन अग्रभागी. त्याच्या मागे डीजेच्या तालावर बेधुंद नाचणारे तरुण. ‘आजचा दिवस आमचा आहे’ ही भावना त्यातून ओसंडत होती. मिरवणुकीतले बाकी महिला-पुरुष घोषणा देत होते. पण या घोषणा डीजेच्या आवाजात कुठच्या कुठे हरवून जात होत्या.

काही काळ मिरवणुकीत चाललो. पण आवाज आणि उन्ह अगदीच असह्य व्हायला लागले. मग इतरांच्या नकळत हलकेच बाहेर पडलो. मिरवणूक लांब गेल्यावर आवाजही कमी झाला. अन् मी ‘हुश्श’ केले.

मी आता मध्यमवर्गीय आहे. वस्ती सुटली आहे. नुकतीच पन्नाशीही झाली आहे. उन्हाचा-आवाजाचा त्रास पहिल्यापेक्षा अधिक जाणवू लागला आहे. पण कार्यकर्ता असल्याने तसेच अनेक नातेवाईक तिथेच राहत असल्याने वस्तीशी माझे संबंध तुटलेले नाहीत. पण पूर्वीची हस्तक्षेपाची ताकद आता राहिलेली नाही; क्षीण झालेली आहे म्हणा फारतर. कारण केलेली सूचना अगदीच कोणी अव्हेरत नाही. कधीतरी एखादी अमलातही येते.

आंबेडकरी समूहात हे जे काही बदलते आहे, ते सर्वस्वी त्याचे वैशिष्ट्य नाही. भोवतालच्या समाजात जे वारे वाहते आहे, ते त्याच्याही काना-डोक्यात शिरत आहे. शिवाय काही बाबी खास त्याच्या स्वतःच्याही आहेत. गणपती-दहिहंडी-शिवजयंतीला जर २४ बेस डिजेच्या तालावर लोक बेहोश होत असतील, फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईचा झगमगाट हेच उत्सवाच्या यशस्वीतेचे मानदंड ठरत असतील; तर मग आंबेडकर जयंतीही त्याच मानदंडांवर साजरी होणार. सगळंच आवाजी-झगमगाटी असेल, तर जयंतीही तशीच असणार. इतर जर कायदा उल्लंघत असतील, तर मग आमच्यावरही होऊ द्या केस, ही बेफिकीरी येते. अजूनही दलित-आंबेडकरी समुदायाच्या वाट्याला अत्याचार, अवमान, दुजाभाव येत असल्याने या बेफिकीरीला विद्रोहाचाही एक आयाम असतो, हे विसरुन चालणार नाही.

पण त्यामुळे हे योग्य ठरत नाही. ते सिगरेट ओढतात-दारु पितात ते चालते; मग मी हे केले तर काय वावगे झाले, हे समर्थन गैर आहे. जे कोणालाच हितावह नाही, ते दुसरा करतो म्हणून आपण करण्याने आपल्याला हितावह ठरत नाही.

हे लिहिताना जुन्या काळी सगळं कसं आदर्श होतं आणि आता सगळं ढासळत चाललं आहे, असा माझा आविर्भाव मुळीच नाही. आवाजाचे-रोषणाईचे तंत्र व आर्थिक क्षमता आजच्याच तेव्हा असत्या तर डीजे व थाटमाट तेव्हाही दिसणे अशक्य नव्हते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १४ तारीख सुरु झाली की लाऊडस्पीकरचे भोंगे जे ‘उद्धरली कोटी कुळे-भीमा तुझ्या जन्मामुळे’ गायला लागायचे त्याने बिगर आंबेडकरी माणसाची खाडकन झोपच उडायची. ती त्या रात्री तरी पुन्हा लागणे कठीण होते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहत, ते आम्ही त्या समाजाचे होतो म्हणून. आम्ही कोणी, खास करुन मुले त्या रात्री झोपतच नसू. पताका लावणे, भिंतीवर बाबासाहेबांच्या प्रतिमा रंगवणे, मंडपात पाणी मारणे, फलकावर जयंतीचा कार्यक्रम लिहिणे यात आम्हाला परमानंद मिळायचा. आता ही अनेक कामे पैश्यांनी आऊटसोर्स केली जातात.

फरक पडला आहे, तो प्रेरणांत. विचारांत. जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी ‘अत्त दीप भव’ (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु’ च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे…या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.

या प्रेरणा, जाणिवा आता आहेत, असे दिसत नाही. किमान सार्वत्रिक तरी नक्की नाहीत. अर्थात आमच्या वेदनांचा अनुभव वा त्यांची तीव्रता आताच्या मुलांमध्ये नाही, हेही कारण आहेच. पण नफा-नुकसानीच्या भाषेत बोलायचे, तर आर्थिक-भौतिक अभावग्रस्ततेत लक्षणीय घट झाली असली तरी जाणिवांचे दारिद्र्य हे खूप मोठे नुकसान आहे. बैलगाडीत बुद्ध-बाबासाहेब-फुल्यांच्या प्रतिमा व लेझिम अशा मिरवणुकांच्या जागी डीजेचा आवाजी, झगमगाटी बदल हे एकवेळ चालू शकेल. पण त्यावेळी होणाऱ्या व्याख्यानमाला आता अपवादानेच होतात. आंबेडकर, गांधी, मार्क्स यांतील मतभेद कोणते, मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी स्वीकारण्यामागचे कारण काय, देवाची पूजा आणि बुद्धाची पूजा यातला फरक, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले यांचे प्रतीकात्मक अर्थ, मंगळसूत्र घालायचे की नाही, कुंकू लावायचे की नाही…अशा चर्चांनी तेव्हा रात्री उजाडायच्या. बोलणारे बोलायचे. बाकीचे रस घेऊन ऐकत असायचे. आताच्या मुलांना हे प्रश्न ग्रासतात, असे दिसत नाही. स्मार्ट फोनवर बाबासाहेबांची पूजा बांधणारे अविवेकी संदेश, फोटो मात्र शेअर होत असतात. विभूतिपूजेच्या विरोधात असलेल्या बाबासाहेबांची ‘गर्व से कहो’चालीवर यथासांग डिजिटल पूजा होत असते. एक जीवनप्रणाली, जीवन व चळवळ उन्नत करण्याचे वैचारिक साधन याअर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, असे म्हटले होते. आज त्याला व्यवस्थित धर्माचे स्वरुप आले आहे. त्याच्याविषयी थोडे अधिक बोलू.

बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबरला दिली आणि जेमतेम दीड महिन्यात ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्माच्या आचरणाविषयी त्यांना नीट आखणी करायला तसा वेळच मिळाला नाही. काही तयारी त्यांनी आधीपासून केली होती. त्यामुळे किमान ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ सिद्ध झाला. विधिंविषयी वगैरे काही भाषणांत उल्लेख केलेले होते. त्या सगळ्याबाबत बाबासाहेबांच्या नंतरच्या नेत्यांनी एकवाक्यतेने काही ठरवायला हवे होते. राजकीय बाबतीतला त्यांचा कर्मदरिद्रिपणा इथेही दिसतो. धार्मिक संस्था निघाल्या. पण त्याही बव्हंशी राजकीय पंखाखालीच राहिल्या. धार्मिक बाबतीत दिशादिग्दर्शन करणारी आंबेडकरी बौद्धांची मध्यवर्ती मान्यता असलेली एकच एक संस्था नाही.

‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे काही ठिकाणी ग्रंथ लावल्यासारखे ‘पठन’ केले जाते. या ग्रंथाची पारायणे केलेले लोक मला भेटतात. पण या ग्रंथातला नेमका एक भाग वाचायचा विसरतात, तो म्हणजे ‘परिचय’. ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या या छोटेखानी परिचयात बाबासाहेब बौद्ध धम्माच्या प्रसारात ज्यामुळे अडथळा येतो असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करत नाही. फक्त एकच करतो. तो म्हणजे भिख्खू संघाचा. त्यांच्या काळातील पारंपरिक भिख्खूंचे ऐषारामी राहणे त्यांना खटकत असे. भिख्खूंचे समाजापासून तुटणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक कारण ते समजत. ते भिख्खूंच्या भूमिकेविषयी साशंक होते. तो एक पूर्णपुरुष असेल तर समाजाला त्याचा काही उपयोग नाही, भिख्खू हा सामान्य माणसाचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असायला हवा, असे ते या परिचयात म्हणतात. त्यांच्या दृष्टीने तो एक पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो उच्चासनावर बसणारा, विधी लावणारा पुरोहित नव्हे. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षासमारंभात महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः पत्नीसह दीक्षा घेऊन परंपरेशी नाते जोडले. मात्र समोरच्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणींच्या हस्तेच समाजाला दीक्षा दिली असती, तर दीक्षा किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी भिख्खूचीच गरज असते, असे समाजाला वाटले असते व एक नवा चिवरधारी पुरोहित तयार झाला असता, असे बाबासाहेबांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणीही उपासक कोणतेही विधी लावू शकतो. त्यासाठी भिख्खूची गरज नाही, हे सूत्र त्यांनी इथे समाजाला दिले. दीक्षा समारंभाला लाखो लोक होते. पण सगळा समाज काही तेथे नव्हता. त्याला कोण दीक्षा देणार? त्यासाठी दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी मुंबईच्या कामगार मैदानात झालेल्या दीक्षा समारंभात बॅरिस्टर भंडारेंच्या हस्ते दीक्षा घेतली.

आजही विधी लावण्याचे काम सामान्यांतलाच एकजण विधिकर्ता (बौद्धाचार्य असे चुकीचे नाव त्याला पडले आहे) म्हणून करतो. तथापि, थोडी अर्थसंपन्नता आलेला यजमान यासाठी भिख्खूला पाचारण करण्यात, त्याला उच्चासनावर बसवून, मंतरलेला धागा मनगटात बांधून विधी करण्यात प्रतिष्ठा मानताना दिसतो आहे. त्याचे अनुकरण मग सामान्य आर्थिक कुवतीचाही माणूस करताना आढळतो. बुद्धविचारांचे मार्गदर्शन, प्रवचन, प्रचार-प्रसार याच कामाला पूर्ण वाहून घेण्याऐवजी अशा विधी लावण्याच्या कामांत भिख्खूंचे जथे सामील होताना दिसू लागले आहे. ‘वंदामि भन्ते’तील ज्येष्ठ मित्राला आदरार्थी करावयाच्या संबोधनात आता लीनता येऊ लागलेली आहे. यथावकाश भिख्खूंचे ऐषारामी मठ उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये. लग्न साधेपणाने करावयाचा बाबासाहेबांचा संदेशही उधळला जावू लागला आहे. थाटमाट व प्रतिष्ठेचे सगळे संकेत खास करुन मध्यम व उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरी समुदायांत रुजायला सुरूवात झाली आहे. बुद्धाने प्रचारासाठी संस्कृतऐवजी पाली ही लोकभाषा निवडली. आज पाली लोकभाषा नाही. तरी विधिची सूक्ते पालीतच म्हटली जातात. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. पण काहीही कळले नाही तरी पालीत म्हणण्यालाच आज प्रतिष्ठा आहे.

बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीचे भले परिणाम अनुभवणाऱ्या मला हे प्रतिक्रांतीचे संकेत अस्वस्थ करतात. अर्थात, पुढे काय होणार याची केवळ चिंता वाहण्याऐवजी आपल्याला वाटणारा हस्तक्षेप करत राहणे, हेच श्रेयस्कर असते. ते करण्याचा यत्न मी करत असतो. यावेळी १३ एप्रिलला रात्री १२ वा. मला एका वस्तीत पाहुणा म्हणून बोलावले होते. (हल्ली असे बोलावणे कमी झाले आहे.) रात्री १२ च्या ठोक्याला माझ्या हस्ते ध्वजारोहण झाले. बुद्ध-बाबासाहेबांच्या प्रतिमांना हार घातले गेले. नंतर काही काळ फटाक्यांची आतषबाजी. नंतर वंदना. पूजा पाठ. आणि मग माझे भाषण. वर जे लिहिले ते आणि इतर बरेच बोललो. आगामी वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीचे १२५ वे आहे. ते साजरे करण्याकरता शेवटी मी काही कार्यक्रम सुचवला. पहाटे घरी परतलो. दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीतल्या ‘२४ बेसला’ घाबरुन घरी आलो. आणि थोड्याच वेळात रात्रीच्या आयोजकांचा फोन आला. ते म्हणाले- “तुमच्या भाषणावर आम्ही कार्यकर्ते चर्चा करत बसलो होतो. आम्हाला तुमचे पटले. आम्ही दर पौर्णिमेला एक प्रबोधनपर कार्यक्रम ह्या वर्षी नियमतिपणे घ्यायचे ठरवले आहे. तुमचे मार्गदर्शन मात्र लागेल”.

आता माझी जबाबदारी आहे, हे वर्षभराचे कार्यक्रम त्यांना सुचवणे व ते उद्दिष्टानुरुप होतील, यासाठी प्रयत्न करणे. ही जबाबदारी मी आनंदाने पार पाडेन.

– सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com
_____________________________
साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, मे २०१५
(‘बुद्ध आणि….दीक्षा घेतली’ हा परिच्छेद ‘आंदोलन’मधील लेखात समाविष्ट नाही.)

Friday, May 1, 2015

ज्या नात्यात आत्मीयता नसते, ते खात्रीने पवित्र बंधन नव्हे - पं. जवाहरलाल नेहरु

'लग्न हे भारतात पवित्र बंधन, विवाहाअंतर्गत बलात्कार अपराध नाही! - भारत सरकार' या आशयाचे शीर्षक असलेली बातमी ही आज माध्यमांतली 'ताजा खबर' आहे. या बातमीनुसार भारतात लग्न म्हणजे पवित्र संस्कार, बंधन मानले जात असल्याने विवाहाअंतर्गत होणाऱ्या बलात्काराला गुन्हा मानण्यास भारत सरकारने नकार दिला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सरकारतर्फे हे मत व्यक्त केलं आहे.

ही बातमी वाचल्यानंतर आजपासून ५९ वर्षांपूर्वी, १९५५ सालच्या मे महिन्याच्या ५ तारखेला संसदेत दिल्या गेलेल्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या भाषणाची आठवण झाली. संदर्भ होता हिंदू कोड बिलाचा. हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. प्रतिगामी हिंदुत्ववादी शक्तींचा या बिलाला विरोध होताच, पण कॉँग्रेस अंतर्गतही त्याला एका विचारप्रवाहाचा विरोध होता. त्यामुळे या बिलाच्या बाजूने असलेल्या नेहरुंनाही माघार घ्यावी लागली होती. १९५२ च्या निवडणुकांतील भरभक्कम बहुमताने पं. नेहरुंना मोठी ताकद दिली. या ताकदीच्या जोरावर त्यांनी हे बिल खंडित स्वरुपात संसदेत आणले. यावेळीही त्याला जोरदार विरोध झाला. आज सत्तेत असलेल्या भाजपचे पूर्वसूरी या विरोधात आघाडीवर होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या एन. सी. चटर्जी यांनी आजच्या केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरींचीच भाषा त्यावेळी वापरली होती. हिंदू कोड बिलात हिंदू स्त्रीला देऊ केलेल्या घटस्फोटाच्या अधिकाराला त्यांनी कडाडून विरोध केला. 'विवाह हा पवित्र संस्कार, पवित्र बंधन, पवित्र विधी आहे. त्यामुळे अशा पवित्र संस्काराने जोडलेले नाते तोडण्याचा कायद्याला अधिकार असू शकत नाही' अशी भूमिका त्यांनी संसदेत मांडली. सरकारचे प्रमुख या नात्याने पं. जवाहरलाल नेहरु यांनी या विरोधाचा खणखणीत समाचार घेतला. त्यांच्या त्या भाषणातील ही काही स्वैर अनुवादित विधानेः

‘पती-पत्नीच्या आत्मीय नात्यातच हे पवित्र बंधन असू शकते. ज्या नात्यात आत्मीयता नसते, तिरस्कार असतो, ते नाते चालू ठेवणे म्हणजे जीवन अधिक कटू करणे होय. अशाने त्या नात्याच्या अस्तित्वाचा पायाच डळमळीत होतो. ...हे खात्रीने पवित्र बंधन नव्हे!’

सीता-सावित्रीसारख्या स्त्रियांच्या महान त्यागाची परंपरा, मनू-याज्ञवल्क्य यांच्या वारशाची महती हिंदुत्ववादी विरोधकांकडून संसदेत गायली गेली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नेहरु प्रतिप्रश्न करतात, “सीता-सावित्री होण्याचा उपदेश स्त्रियांनाच का म्हणून? पुरुषांना का नाही राम, सत्यवान बनायला सांगत?”

संस्कृती-परंपरांचा जुना वारसा सांगणाऱ्यांना पंडितजी पुढे बजावतात, “आता काळ बदलला आहे. अर्धी मानवता बंधनात ठेवून खरी लोकशाही आपण आणू शकत नाही.”

बदलत्या काळाचा भविष्यलक्ष्यी वेध घेऊन पुरोगामी पावले टाकणारे नेहरुंच्या नेतृत्वाखालचे ते सरकार आणि आज ५९ वर्षांनंतर अधिक पुढची पावले टाकण्याऐवजी सांस्कृतिक इतिहासाची चाके उलटी फिरवू पाहणारे मोदींच्या नेतृत्वाखालचे हे सरकार!

किती ही भयप्रद विसंगती!

- सुरेश सावंत

Monday, April 20, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार (सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत, १४ एप्रिल १५)

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार' या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर १४ एप्रिल २०१५ या बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंतीनिमित्ताने साडेनऊच्या बातम्यांत सुरेश सावंत यांची झालेली ही मुलाखत. बाबासाहेब केवळ दलितांचे नव्हे; तर मानवमुक्तीच्या प्रवाहातील महामानव, त्यांचे दलित-श्रमिक-स्त्रियांच्या उन्नतीचे प्रयत्न, त्यांचे विचारस्वातंत्र्य व म. गांधी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या, आरक्षण इ. मुद्द्यांचा या मुलाखतीत मागोवा घेण्यात आला आहे. (मुलाखतीची मूळ लिंकः https://youtu.be/WmQAt9YfXXs?t=668)

Thursday, April 16, 2015

जात नाहीशी होणार आहे का?

हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून विचारवंतांपर्यंत कायम चर्चेचा राहिलेला आहे. सध्या दिल्लीतील ‘आप’च्या दणदणीत विजयाने या चर्चेला एक नवी फोडणी बसली आहे. तळपासून वरपर्यंतच्या सर्व जातींनी ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. तेव्हा, आता लोक ‘बिजली-सडक-पानी’ यालाच महत्व देतात; जातींना नाही. जात गैरलागू ठरत आहे, असेही निष्कर्ष काढले जात आहेत. एक कार्यकर्ता या नात्याने मुख्यतः निरीक्षणे व काही थोरा-मोठ्यांचे संदर्भ या आधारे या चर्चेत मी पडत आहे.

जात हे खास भारतीय समाजाचे (फार तर भारतीय उपखंडाचे) वैशिष्ट्य. जगात इतर ठिकाणी वर्गीय किंवा वांशिक अथवा त्वचेच्या रंगावरुन पडणारे फरक आढळतात. पण आपल्याकडे तसे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारतात त्याप्रमाणे, मद्रासच्या काळ्याकुट्ट ब्राम्हणात व पंजाबच्या श्वेतवर्णी ब्राम्हणात कोणते साम्य आहे? उलट मद्रासचा अस्पृश्य व ब्राम्हण वंशाने जास्त निकट आहेत. महाराष्ट्रातही देशस्थ ब्राम्हण व दलित यांच्यात रंगावरुन काय फरक करणार? विशिष्ट पर्यारणात तो विशिष्ट समूह किती काळ राहतो, त्यावर त्याचा रंग व शारीरिक ठेवण ठरते, असे मानववंशशास्त्र मानते. वंश हा प्रकारच अलिकडच्या संशोधनाने निकाली काढला आहे. आपल्याकडे रंगापेक्षा, त्याच्या वर्गापेक्षा ‘जात’ महत्वाची मानली जाते. जन्मापासून मिळणारी जातीची ओळख त्याच्या मृत्युनंतरही कायम राहते. एखाद्याला धर्म विचारला आणि त्याने उत्तर दिले – ‘हिंदू’; तर तेवढ्याने प्रश्नकर्त्याचे समाधान होत नाही. जात हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. जातीशिवाय नुसती ‘हिंदू’ म्हणून ओळख अपुरी असते. इतर धर्मांचे तसे होत नाही. तथापि, भारतातील अन्य धर्मांनाही या जातींची लागण कमीअधिक प्रमाणात झालेली आढळते.

इतरत्र वर्गीय, वांशिक रचना असताना भारतात मात्र जात कशी काय जन्माला आली?

बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, समाज वर्गीय असणे ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने सुरुवातीचा हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता. मात्र नंतर भारतात वर्ग बंदिस्त झाला. तसे जगात इतर ठिकाणी झाले नाही. भारतातही आपल्या वर्गाबाहेर विवाह करण्याची प्रथा प्रारंभी होती. नंतर ही वर्गबाह्य विवाहपद्धती बंद होऊन ती वर्गांतर्गत झाली. भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात वर्गबाह्य विवाहपद्धतीवर अशारीतीने वर्गांतर्गत विवाहांचा वरचष्मा होण्यातून जातिसंस्थेचा उदय झाला. अशारीतीने ज्याने प्रथम आपला वर्ग बंदिस्त केला तो वर्ग म्हणजे पुरोहितवर्ग, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. अनुकरणाच्या प्रक्रियेने पुरोहितवर्गानंतर इतर वर्गांनीही आपली दारे बंद करुन स्वतःला बंदिस्त केले. आणि अशारीतीने जाती तयार झाल्या. जातिव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे, असे बाबासाहेब म्हणतात.

बाबासाहेबांची ही उपपत्ती नमुन्यादाखल दिली. जातीच्या उद्गमाविषयी अशा अनेक उपपत्त्या अनेक मोठ्या अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत. त्यांच्यात मतभिन्नताही खूप आहे. त्यांचा अभ्यास उपयुक्त आहेच. पण माझी तशी तयारी नाही. आणि आताचा तो मुख्य विषयही नाही.

जात निर्माण झाली व ती आज आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपला आताचा प्रश्न- ही जात नाहीशी होणार आहे का?

काहींचे म्हणणे असते, जात नाही ती जात. तुम्ही कितीही लढलात, झगडलात तरी जात काही जाणार नाही. तर काहींना वाटते, आज तसा जातिभेद राहिलेलाच नाही. निदान आम्ही तरी मानत नाही.

असते एकेकाचे मत. तुमचेही असू शकते. माझेही आहे. पण मी ते सरळ मांडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी जातीचे स्वभावधर्म/लक्षणे सांगितली आहेत. त्यांच्या आधारे मी माझी निरीक्षणे नोंदवणार आहे.

पुनरुक्ती टाळण्यासाठी या दोहोंनी सांगितलेली सामायिक लक्षणे स्वतंत्रपणे न नोंदवता ती एकत्र करत आहे. ती अशीः १) एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही. २) स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्यासाठी झटत असते. ३) आपल्याच जातीत रोटीव्यवहार. ४) आपल्याच जातीत बेटीव्यहार. ५) जातिवर्धक असा पेहराव. ६) आनुवंशिकता. ७) जन्मसिद्ध व्यवसाय. ८) उच्चनीचता, अस्पृश्यता. ९) जातपंचायत.

ही लक्षणे आजही दिसतात का, त्यांच्यात काही फरक पडला आहे का, याचा विचार करु.

एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही, हे आजही दिसते. तीव्रतेत फरक असतो. सवर्ण जातींमध्ये असलेला दुरावा आणि सगळ्या सवर्ण जातींना दलित जातींविषयी असलेला दुरावा यांत दलित जातींविषयीची तीव्रता अधिक असते. स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्यासाठी झटणे, हे लक्षण आजही आहे. जातींची संमेलने, लग्ने यांतून हे व्यक्त होत असते. आनुवंशिकतेने तर जात सिद्ध होत असते. बापाची जात मुलाला हे जातीच्या जन्मापासून आजतागायत चालू आहे. आनुवंशिकता या लक्षणाला अजिबातच धक्का पोहोचलेला नाही.

जातिवर्धक किंवा जात दर्शविणारा पोशाख हे लक्षण आज जवळपास गैरलागू झाले आहे. ऐपत झाली तरीही ब्राम्हणासारखा पोशाख दलित करु शकत नसे. धर्मानेच बंदी होती. बाबासाहेबच सुटाबुटात राहू लागले. त्यांच्यानंतरच्या शिक्षित दलित पिढीने जाणीवपूर्वक तो वेश स्वीकारला. आता अशी जाणीव ठेवण्याची गरजच नाही, इतके वातावरण बदलले आहे. पोशाखाची एकसारखी धाटणी रुळली आहे. प्रादेशिकतेचे फरकही पोशाखाने ओलांडले आहेत. काही पुरोहिताचा व्यवसाय करणारे ब्राम्हण सोडले तर, शेंडीवाला ब्राम्हण सहसा दिसत नाही. वरुन पोशाखात सारखेपणा असला तरी द्विज जातींमधील काही जण अजूनही आतून जानवे घालतात.

जन्मसिद्ध व्यवसायांत खूप बदल झाले. आणि गतीने होत आहेत. औद्योगिकीकरणाने जातिनिहाय व्यवसायांचा पायाच मोडून काढला. नेहमी दिले जाणारे उदाहरण म्हणजे, बाटाच्या कारखान्यात चपला बनविणारे हे काही सगळे चांभार नसतात. कोल्हापूरची अभ्यंकरांची (चित्पावन ब्राम्हण) चप्पल खूप प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांनी जातियतेची दलदल असलेली खेडी सोडायचा आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात महार मंडळी शहरांकडे आली आणि ब्रिटिशकालीन औद्योगिकरणाच्या संधींचा त्यांनी वापर केला व गिरणी, रेल्वे इ. उद्योगांत कामाला लागले. अनेक जातींचे लोक आज आपला पारंपरिक व्यवसाय करताना दिसत असले तरी, त्यांना ते काम करण्याची सक्ती आज धर्म करत नाही. अर्थात सफाई कामांत आजही दलितच प्रामुख्याने आहेत, संडास सफाईचे काम तर भंग्यांच्याच वाट्याचे अशी स्थिती आज दिसते. याचे कारण या अप्रतिष्ठित, घाणीच्या धंद्यांत इतर जातींचे लोक येत नाहीत. आणि जे दलित किंवा भंगी येतात, त्यांना इतर रोजगार सहजासहजी मिळत नसतो आणि हे काम त्या मानाने सहज उपलब्ध होते. शिवाय ते त्यांचे पारंपरिक काम असल्याने त्यांना ते अपरिचित नसते. हे काम केल्याने जात बुडविली, असे कोणी हिणवणारही नसते. पण आधी म्हटल्याप्रमाणे त्यांना ते करण्याची सक्ती नसते. अशा कामांतले दलित कामगार आपल्या मुलांनी या कामांत येऊ नये, असाच प्रयत्न करतात. काही बनिया जाती नव्या भांडवली व्यवसायांत आपले पारंपरिक कौशल्य वाढवून अधिक प्रगत होताना दिसतात. या व्यवसायांत जम बसविण्यास त्यांच्या जातबंधूंचे सहाय्य त्यांना होत असते. जातींचे बंध त्यांना इथे उपयुक्त ठरतात. पण या धंद्यांत इतर जातींचेही लोक मुसंडी मारताना दिसू लागले आहेत. थोडक्यात, जाती म्हणजे श्रमिकांची विभागणी, हे एकेकाळचे ठळक वास्तव आता वेगाने धूसर होत आहे.

रोटीव्यवहार आपल्याच जातीत असे शहरात राहिलेले नाही. खेड्यांतही बदल होतो आहे. दलितांसाठी वेगळे कप ठेवण्याचा मागासपणा अजून काही गावाकडच्या हॉटेलांत चालतो. त्यांना वेगळे वाढले जाते. आपल्या पंक्तीला बसवले जात नाही. हा भेदभावही अनेक खेड्यांत आढळतो. दलितांसाठी वेगळे पाणवठे ठेवण्याकडेच कल असतो. दृश्य स्वरुपातली अस्पृश्यता गतीने कमी होत आहे. मात्र उच्चनीच भाव अजूनही लक्षणीय आहे. जातपंचायत हे जातीचे व्यवच्छेदक लक्षण आजही दिसते. स्वरुप व कार्य थोडे बदलले आहे. काही भटक्या, दलित जाती सोडल्या तर आता न्याय जातपंचायतीत होत नाही. कायदा, न्यायालयांचा वापर होतो. पण लग्नकार्याला, जातींच्या संमेलनांना, जातीतील मुलांच्या विकासाला मदत करणारी अशी जातमंडळे आता आहेत. काहींनी आपले हॉल, मंगल कार्यालयेही बांधलेली आढळतात.

मुद्दाम शेवटी चर्चेसाठी ठेवले ते लक्षण म्हणजे जातीअंतर्गत बेटीव्यवहार. प्रत्येक जातीचा, कुटुंबाचा आटोकाट प्रयत्न असतो, तो आपल्या मुला-मुलींनी जातीतच लग्ने करावीत असा. त्याच जातीच्या माता-पित्यांपासून मूल जन्मण्यातून ती जात चालू राहणार असते. वर्गांतर्गत विवाह ही जातीच्या अस्तित्वासाठी कळीची बाब असते. वंश वा रक्तशुद्धीसाठी हे आवश्यक आहे, असेही काही कर्मठांचे म्हणणे असते. पण जातींच्या प्रारंभापासून आजतागायत पूर्णपणे यशस्वी न झालेली ही बाब आहे. मिश्रणे कायम होत राहिली. अधिकृत विवाहाने अथवा अनधिकृतपणे. म्हणूनच तर जाती रुपावरुन समजत नाहीत. आंतरजातीय विवाह जुन्या काळीही होत होते. आता तर त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पळून जाऊन लग्न करणारे बहुधा भिन्न जातींचे-धर्मांचेच असतात. आज काही जण ठरवून करावयाच्या विवाहांमध्येही वेगळ्या जाती सहन करतात. पण खालच्या नको असे जाणीवपूर्वक म्हणतात. वर्तमानपत्रातल्या जाहिरातींत ‘जातीची अट नाही (SC/ST क्षमस्व)’ असे कटाक्षाने नोंदवलेले आढळते.

वरील निरीक्षणांतून असे दिसते की, काही लक्षणे आज अजिबात दिसत नाहीत, किंवा नष्ट होऊ लागली आहेत. काही लक्षणांचे मर्म आजही ताजे आहे. पण एकूणात जातींच्या भिंतींना जोरात धडका बसू लागल्या आहेत. काही ठिकाणी भगदाडेही पडू लागली आहेत. म्हणजेच दिशा जात जाण्याची आहे. पण...

हा ‘पण’ अवघड घाट आहे. राजकारणी आणि जातीजातींत तयार होणारा मध्यमवर्ग हा या जातिअंताच्या झारीतला शुक्राचार्य आहे. राहू, केतू जे काही म्हणायचे ते म्हणा. जातिअंताची दिशा आपल्या स्वार्थासाठी अडवून ठेवण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम हे घटक करत आहेत.

भारतातील लोकशाही इतर नवमुक्त राष्ट्रांमधली एकमेव टिकलेली लोकशाही आहे. ही बाब अभिमानास्पदच आहे. पण लोकशाही जीवनप्रणाली पूर्णांशाने आपल्यात मुरणे अजून खूप दूर आहे. जातीची एकगठ्ठा मते हा या लोकशाही प्रक्रियेला अडसर ठरतो. आज उमेदवार ठरवताना त्याची जात, त्याच्या मतदारसंघातील जातींचे बलाबल हे हिशेब प्रधान असतात. मग पुरोगामी नेत्यांकडूनही दुर्बल जातींच्या बेरजांची भाषा सुरु होते.

आता मागास जातींतही एक मध्यमवर्ग तयार होऊ लागला आहे. हा शिक्षित, थोडाफार साधनसंपन्न मध्यमवर्ग त्या त्या जातीचा प्रवक्ता असतो. तो त्या जातीचे नेतृत्व करत असतो. ते आवश्यकच असते. पण त्याच्या स्तराच्या आर्थिक, भौतिक आकांक्षा त्याच्यात संधिसाधूपणा निर्माण करतात व त्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी तो आपल्या समाजविभागाला वापरु लागतो. त्या समाजविभागाचा त्राता म्हणून आभास तयार करतो. मात्र त्याचे खरेखुरे प्रश्न शेवटास नेत नाही. त्याच्या स्वार्थासाठी तो ते कायम ताजे ठेवत असतो.

यामुळे मरु घातलेल्या जाती ताज्या राहतात.

हे बदलू शकत नाही का? निश्चित बदलू शकते.

जातींच्या लक्षणांचा आढावा घेताना जातींची दिशा जाण्याची आहे, हे जे म्हटले ते आपोआप घडलेले नाही. विज्ञानतंत्रज्ञानाने उत्पादनव्यवस्थेत झालेले बदल तसेच जाणीवपूर्वक केलेले सामाजिक प्रबोधनाचे, बदलाचे संघर्ष, असंख्य थोरा-मोठ्यांचे, जाणत्यांचे अथक प्रयास त्यामागे आहेत. असेच अथक, जाणते प्रयास आपल्याला करावे लागतील. भौतिक परिस्थिती तर पोषकच आहे.

यादृष्टीने जातिअंताच्या लढवय्यांनी सुचवलेले व अवलंबलेले तसेच काही नवीन उपाय आपल्याला योजावे लागतील. त्यातील काही असेः

बाबासाहेब तसेच अन्य सुधारकांचा ज्यावर भर होता तो आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करतच राहावा लागेल. याचा अर्थ, मने जुळत नसतील तरी उच्च ध्येयासाठी आंतरजातीय विवाह करणे, असे नव्हे. जात हे मर्यादित क्षेत्र असते. मोकळ्या जगात वावरणाऱ्या मुलामुलींना मनाजोगता जोडीदार निवडण्याची संधी व मोठ्यांचा पाठिंबा असेल तर बहुतेक विवाह हे जातिबाहेरच होतील. कारण हे मोकळे जग विविध जाती-धर्म समूहांचे मिश्रण आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशी लग्ने कोणत्याही धार्मिक पद्धतीने न करता विशेष विवाह कायद्याखाली नोंदणी पद्धतीने करावी. आपल्या मुलांची शाळेत कोणतीही जात वा धर्म नोंदवू नये. मुलांची नावे त्याचे नाव + आईचे नाव + वडिलांचे नाव अशारीतीने लावावी. त्यामुळे आडनावातून जात कळण्याचा तसेच मूल आईचे व वडिलांचे दोघांचे असताना केवळ वडिलांचे नाव धारण करण्यातली पितृप्रधानता दिसण्याचा प्रश्न निकाली निघतो. असे करणारे लोक पूर्वी दुर्मिळ होते. आता ते वाढताना दिसत आहेत, हे आश्वासक आहे.

जातींच्या ओळखी नाहीशा होऊन शोषक व शोषित असा वर्गीय झगडा उभा राहायचा असेल, तर गावकुसाच्या आतल्या व बाहेरच्या कष्टकऱ्यांचे ‘कष्टकरी’ हे नाते ठळक करावे लागेल. त्यासाठी त्यांच्या सामायिक प्रश्नांचे लढे जोरदार करावे लागतील. आणि त्यांचे त्या लढ्याच्या क्रमात, मात्र जाणीवपूर्वक जातिअंताचे प्रबोधन करावे लागेल. कष्टकरी म्हणून नाते उजळले की जातीचा संस्कार आपोआप जाईल, असे होणार नाही. हजारो वर्षांच्या तिच्या अस्तित्वाची मनावर चढलेली पुटं लगेच जात नसतात. जात हे त्या अर्थाने काळजाचे दुखणे असते. ते काळजीपूर्वक हाताळावे लागते.

याचबरोबर आपल्या जातीअंतर्गत तयार झालेल्या परंतु संकुचित स्वार्थासाठी जातीला वापरणाऱ्या आपल्याच मध्यमवर्गीय जाचबांधवांशी संघर्षही करावा लागेल. राखीव जागा केवळ आर्थिक निकषावर नको, हे बरोबरच आहे. पण ती जागा खुली न करता, त्या वर्गवारीत ओबीसींप्रमाणे दलित-आदिवासींसाठीही अंतर्गत आर्थिक निकष लावण्याची मागणी कधीतरी करावीच लागेल. त्या विशिष्ट वर्गवारीसाठी असलेल्या सवलती त्या वर्गवारीतील अधिक गरिबाला मिळणे, हाच न्याय आहे. राखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या वरच्या थरातील व्यक्ती राखीव जागा अथवा सवलतीचा लाभ घेताना दिसल्यामुळे तिच्याविषयी जो खुल्या वर्गातील निम्न आर्थिक स्तरातील लोकांमध्ये दुखरेपणा तयार होतो, तो निवळायला मदत होईल.

युरोपात सरंजामशाही तिच्या भाराने कोसळली. ती कोसळत असताना तेथील समाजाच्या सर्वांगात बदलाच्या ऊर्मी वाहू लागल्या. राजकीय व सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा एकच प्रवाह तिथे होता. आपल्याकडे मात्र निराळे घडले. आपली सरंजामशाही मोडकळीला येण्याची चिन्हे दिसू लागली होती. परंतु, तिची मूळे अजून सुकलेली नव्हती. अशावेली इंग्रज येथे आले आणि त्यांनी आपल्या भांडवलशाहीचे कलम येथील सरंजामशाहीवर केले. त्यामुळे भांडवली विकास, त्यातून नवे रोजगार, आधुनिक शिक्षण, लोकशाहीसारखा नवविचार यांसोबतच सरंजामशाहीतील जाती, जुनाट बंधने, संस्कार टिकून राहिले. परिणामी ‘आधी सामाजिक की आधी राजकीय’ असा तिढा इथे तयार झाला. साहजिकच सामाजिक व राजकीय चळवळींचे पुरस्कर्ते परस्पर शत्रू वाटावेत असे चित्र तयार झाले. या विशिष्ट अवस्थेमुळे भांडवली विकासातही जातींचे तण जोमदार राहिले. स्वातंत्र्यानंतर हा अंतर्विरोध नष्ट झाला. तथापि, शोषक वर्ग व त्याला आपल्या संकुचित स्वार्थासाठी पाठिंबा देणारा मध्यमवर्ग हे तण आज पोसतो आहे. जातीच्या आवाहनाला अजिबात थारा न देता निखळ लोकशाही निवडणुकांची प्रक्रिया होण्यासाठी सायास करावे लागतील. अथक सामाजिक प्रबोधन व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक एकजुटीचा संघर्ष करत भांडवली लोकशाही विकासाला (समाजवादाच्या वाटेवरील अपरिहार्य टप्पा म्हणून) गती देण्यानेच जातींचे ढासळू लागलेले, तरीही आज भक्कम असलेले बुरुज उध्वस्त होणार आहेत.

...जात खरोखरच नाहीशी होणार आहे.


- सुरेश सावंत

(आंदोलन, एप्रिल २०१५)

Sunday, March 15, 2015

११ मार्चचा मोर्चा अधिक आश्वासक झाला असता (!)

कॉ. पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईत निघालेला मोर्चा मोठा होता. भायखळ्यापासून आझाद मैदानापर्यत भर उन्हात चालत निघालेल्या या मोर्च्यात राज्यभरातून सामान्य कष्टकरी महिला-पुरुष ज्या संख्येने व वेदनेने या मोर्च्यात सहभागी झाले होते, ते पाहून हेलावायला होत होते. पानसरे-दाभोलकरांच्या खूनामागील सूत्रधारांविषयी मनात चीड-संताप उसळत होता. प्रतिगाम्यांनी आरंभलेल्या या खूनसत्राने आम्ही डगमगणार नाही, हा निर्धारही मोर्चेकऱ्यांच्या घोषणांमधून व सभेतील भाषणांमधून व्यक्त होत होता. कम्युनिस्ट, रिपब्लिकन, समाजवादी तसेच अन्य पुरोगामी प्रवाहांची या मोर्च्यातील एकजूट आश्वासक वाटत होती. मोर्च्याला येणाऱ्यांचे तसेच तो संघटित करणाऱ्यांचे प्रचंड कष्ट दिसत होते. आझाद मैदानातील विशाल सभामंच उभारण्यासाठी आयोजकांना निधी गोळा करण्यासाठी काय प्रयास करावे लागले असतील, याची कल्पना येत होती.

या मोर्च्याचा परिणाम काय झाला? होऊ शकतो?

आम्ही अशा हत्यांना घाबरणार नाही, हा विश्वास मोर्च्यात सहभागी झालेल्यांना तसेच मोर्च्याला सदिच्छा असणाऱ्यांच्या मनात नक्की जागला असणार. पुरोगामी प्रवाहांतले 'आम्ही सारे पानसरे' ही एकजुटीची भावना नक्की वाढीस लागू शकते.

एवढ्या मोठ्या मोर्च्याला प्रसारमाध्यमांत मात्र हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, याची खंत जरुर वाटते. ही प्रसिद्धी मिळाली असती, तर ही भावना ज्यांना मोर्च्याची कल्पना नव्हती पण या खूनाबद्दल ज्यांना चीड होती, अशा अनेकांपर्यंत पोहोचायला मदत झाली असती. टीआरपीची गणिते सांभाळणारी प्रसारमाध्यमे कर्तव्यापोटी अशी प्रसिद्धी देतील, याची खात्री अर्थातच बाळगता येत नाही. आहे या रचनेत या प्रसिद्धीसाठी आपण आयोजक काय व किती सुनियोजित प्रयत्न करतो, एवढेच आपल्या हाती असते. त्यात आपण कोठे कमी पडलो का, याचा आढावा घेऊन, पुढच्या वेळी आवश्यक त्या दुरुस्त्या करायला हव्या.

एवढ्या लांबवर चालत आल्यानंतर पुन्हा सभेला बसणे हे जिकीरीचे होते, असे दिसते. लोक पांगतात. काहींना परतीच्या प्रवासाला निघायचे असते. हे सगळेच लोक राजकीय कार्यकर्ते असतात असे नाही. बहुसंख्या ही जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे सगळी भाषणे शांतपणे ऐकणे होत नाही. मोर्च्यातील संख्या व जोश सभेत राहत नाही. वास्तविक, एवढ्या लांबवर चालत आल्यानंतर, एखाद-दुसरे प्रेरक गाणे, पानसरेंच्या रेकॉर्ड केलेल्या भाषणातील एखादा संदेशाचा भाग व पुढील कार्यक्रम जाहीर करणारे एक भाषण व प्रतिज्ञावाचन असा फारतर अर्ध्या-एक तासाचाच हा कार्यक्रम असता, तर अधिक परिणाम साधला असता, असे वाटते. सहभागी घटकांच्या सर्व प्रतिनिधींना बोलू देण्याने मुद्द्यांची पुनरावृत्ती होत राहते. सभा लांबते. परिणाम साधत नाही. सर्व वक्त्यांनी आपल्या सूचना आधीच संयोजकांकडे दिल्या तर जो एक वक्ता बोलणार आहे, तो त्यातील पुनरावृत्ती टाळून मोजक्याच सूचना मांडू शकतो. लोकप्रबोधनासाठी आपापल्या भागात अधिकाधिक भाषणांची गरज असते. तिथे वक्त्यांना ही भाषणे करता येतील.

मोर्चा सर्व पुरोगामी प्रवाहांच्या संयुक्त समितीतर्फे होतो आहे, असा माझा समज होता. प्रत्यक्षात, पत्रकावर मोजक्याच पक्ष-संघटनांची नावे होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व अध्यक्ष हे कॉ. पानसरे ज्या पक्षाचे होते, त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे होते. कॉ. पानसरेंच्या पक्षाकडे अधिक जबाबदारी येणे, त्यांनी त्यासाठी अधिक कष्ट घेणे हे स्वाभाविक आहे. तथापि, व्यापक मंचाद्वारेच या मोर्च्याचे आयोजन करुन या जबाबदाऱ्या सगळ्यांत बरोबरीने वाटल्या गेल्या असत्या, तर चांगले झाले असते. कॉ. पानसरे हे आम्हा सगळ्या पुरोगाम्यांचे आहेत, केवळ एका पक्षाचे नाहीत, ह्या सध्या प्रचलित झालेल्या भावनेशी ते अधिक सुसंगत झाले असते.

सभास्थानी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आले होते. तथापि, त्यांना बोलण्यास परवानगी नसल्याने थोडावेळ थांबून ते निघून गेले. या पक्षांशी तूर्त राजकीय एकजुटीचा प्रश्न नव्हता. लोकशाही संरक्षणाच्या व्यापक कार्यक्रमावर त्यांच्याशी सहकार्य करण्यास, किमान ते स्वतःहून आलेत म्हणून त्यांचा मान ठेवण्यास हरकत काय होती, हे कळत नाही. हा साध्या सौजन्याचा भाग आहे. प्रतिगामी शक्तींशी लढताना जी अधिकाधिक व्यापक संयुक्त आघाडी करावी लागते, त्यासाठीचा डावपेच म्हणून तरी हा मान राखायला हवा होता. हे पक्ष पूर्णतः प्रतिगामी आहेत, बिनसेक्युलर आहेत, संविधानद्रोही आहेत, त्यांचा एकूण व्यवहार पानसरेंच्या खून्यांना मदतनीसच ठरला आहे, म्हणून ते शत्रूस्थानीच राहतील, असे आयोजकांनी सर्वानुमते आधी ठरवलेच असेल, तर त्याला इलाज नाही. कॉ. पानसरेंच्या हत्येनिषेधार्थ जो महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता, त्यावेळी रामदास आठवले स्वतः चेंबूरला रास्ता रोको करण्यात उतरले होते. ते या मोर्च्यात का नाहीत, असे त्यांच्या सहकाऱ्यांना विचारल्यावर कळले की, त्यांना एकतर बोलावले गेले नाही. ते न बोलावताही अशा ठिकाणी जातात. पण इथे आल्यावर कोणी जर, भाजपशी युती केलेल्यांनी यायचे नाही, असा जाहीर अवमान केला तर काय करायचे, म्हणून ते आले नाहीत. हेच आठवले मंचकावरील अनेक घटकांचा समावेश असलेल्या 'रिडालोस'चे काल-परवापर्यंत निमंत्रक होते. आता ते स्थान महाराष्ट्र लोकशाही आघाडीद्वारे प्रकाश आंबेडकरांनी घेतले आहे. भाजपला पाठिंबा दिला, म्हणून जर आठवले संपूर्ण बाद ठरत असतील, तर मंचावर असेही घटक होते, ज्यांच्या बायोडेटात भाजप-सेना युतीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चुंबाचुंबी केल्याच्या नोंदी आहेत.

...मला या सगळ्याचा सुसंगत अर्थ लागत नाही. सहभागी संघटनांचा इतिहास वा भविष्य काहीही असो. आज जे युतीबरोबर नाहीत, ते आम्हाला चालतील, हाच केवळ निकष असेल, तर मग आठवलेंना सामील करुन न घेणे बरोबर आहे. हाही निकष सर्वांनी विचारविनिमयाने ठरवलेला असल्यास, तेही शिस्तीला धरुन आहे.

या पुरोगामी चळवळीतला एक सहप्रवासी म्हणून लोकशाहीवाद्यांची व्यापक संयुक्त आघाडी उभारण्यासाठी या शिस्तीचा, विचारपद्धतीचा फेरविचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. तसे आधीच झाले असते तर हा मोर्चा अधिक आश्वासक झाला असता. जे झाले, तेही अर्थात कमी नाही.

- सुरेश सावंत


काॅम्रेड कांगोंचा प्रतिसाद:

व्यापक एकजूट आवश्यक आहेच.मोर्चा हा सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळीच्या आयोजकांनी १९ फेब्रुवारीच्या बैठकीत ठरविला होता. मी जरी सभेचा अध्यक्ष होतो तरी कोणी बोलावे ह्यासंबंधी निर्णय कमिटीने घेतला होता. पानसरे यांचे निधन २० फेब्रुवारीला झाले. त्यामुळे अनेक व्यक्ती व संघटना या मोर्चात सामील झाल्या. त्यांना व्यासपीठावर आमंत्रण देऊन एकजूट व्यापक आहे याची जाणीव होईल असा प्रयत्न केला. एकदोन संघटनाचे प्रतिनिधी राहून गेले. मोर्चाचे आमंत्रण सर्वांनाच होते. सर्वांनी बोलावे असा आग्रह धरणे वेळे अभावी शक्य नव्हते. त्यामुळे गैरसमज झाले. परंतु आपण सुचविल्या प्रमाणे या पुढे सभा थोडक्यात संपविण्याचे तंत्र आत्मसात करावेच लागेल.

Thursday, February 26, 2015

कॉ. पानसरेंच्या हत्येनंतर भाऊ तोरसेकर यांनी पुरोगाम्यांवर केलेली टीका, त्यामुळे व्यथित झालेल्या मैत्रिणीच्या भावना व माझे तिला पत्र

भाऊ तोरसेकरांची टीकाः

पोर लाडावलेले असले, मग त्याला वेळीच वठणीवर आणावे लागते. अन्यथा असे पोर शेफ़ारत जाते आणि अतिरेक करू लागते. आपल्यालडे पुरोगामीत्व किंवा सेक्युलर नावाचे पोर असेच दिवसेदिवस खुप शेफ़ारले आहे. ते ओळखण्याची अक्कल स्वत:ला बुद्धीमंत मानणार्‍यांना नसली, तरी सामान्य जनतेला पुरेशी आहे. म्हणूनच कुठल्याही शेफ़ारत जाणार्‍या पोराला वेळीच वठणीवर आणायचे कौशल्य आजवर सामान्य बुद्धीच्या भारतीयांनी दाखवले आहे. अलिकडेच दिल्लीच्या निकालातून त्या जनतेने भाजपाच्या शेफ़ारत चाललेल्या मस्तवालपणाला वठणीवर आणले. पण ते भाजपाचे पोर तरी कशामुळे शेफ़ारले होते? आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे? ती नैतिक ताकद पुरोगामीत्वाचे उपरणे पांघरून निषेधाची होमहवने करण्यात गर्क असलेल्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे आठ महिन्यात भाजपाला दिल्लीतल्या जनतेने त्याची औकात दाखवून दिली. याचा अर्थ आता भाजपा वा मोदींचा शेवट सुरू झाला, असल्या धुंदीत पुन्हा तथाकथित सेक्युलर पुरोगामी शेफ़ारल्यासारखे वागू लागले तर नवल नाही. आजकालच्या पुरोगाम्यांची अवस्था तर आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच असते.

अशा एकूण धुंदीतल्या पुरोगाम्यांना पुन्हा शेफ़ारून जायला नुसती संधीच हवी होती. दिल्लीने तो मोका दिला आणि कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने तर हे लाडावलेले पोर पुन्हा शेफ़ारल्यागत भरकटू लागले. अजून कुठला पुरावा हाती नाही की तपासाला दिशाही मिळालेली नाही, अशा स्थितीत बेलगाम आरोपांची बरसात सुरू झाली. जगातल्या कुठल्याही दुर्घटनेला हिंदूत्ववादी वा हिंदू संघटनाच जबाबदार असतात, असा त्यांचा एक आवडता सिद्धांत आहे. त्यामुळे मग विनाविलंब कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे खापर हिंदू संघटनावर फ़ोडण्याची स्पर्धाच सुरू झाली. इथपर्यंतही ठिक म्हणता येईल. कुठेही असे बेछूट आरोप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर होतच असतात. पण त्यासाठी थेट नथूरामपर्यंत जाणे आणि आपण कसे अहिंसेचे पुजक असल्याचा आव आणणे; म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. ज्यांच्या अशा वल्गना चालू आहेत, त्यांना त्यांचीच वंशावळ मग सांगणे भाग होते. पण दुर्दैवाने स्वत:ला जाणकार व विश्लेषक म्हणवून घेणारी मोठमोठी तोंडे अशावेळी मुग गिळून गप्प बसतात, हाच आजवरचा अनुभव आहे. मग ते काम कोणी तरी करायला हवे ना? आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे? की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात? नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना? जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल? गेल्या काही वर्षात केरळमध्ये डझनावारी हत्या कोणाच्या झाल्या व कोणी केल्या?

आपल्या विचारांशी व भूमिकेशी सहमत नसतील त्यांना खुन पाडून संपवायची लढाई कम्युनिस्टांनी गेल्या शतकात जगभर अंमलात आणलेली आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. त्यामुळे जो कोणी कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे गोडवे गातो, त्याने उगाच विचारांचा संघर्ष विचारांनीच करायवी मानभावी भाषा करण्यात अर्थ नाही. मजेची गोष्ट म्हणजे असे आज कोणी म्हटले, मग तमाम पुरोगामी एकाच बापाचे वारस असल्यासारखे अंगावर येतात. पण वास्तवात ते एकाच पित्याची संतान नाहीत आणि कालपरवा त्यांचेच पुर्वज एकमेकांवर असेच अरोप करत होते. दाभोळकरांनी ज्यांचा वारसा चालविला, ते एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरिस्टर नाथ पै यांनी अर्धशतकापुर्वी कोणाकडे खुनी व रक्तपिपासू म्हणून बोटे दाखवली होती? त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी? नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते? त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता? छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते? तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता? वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय? केरळात एका मार्क्सवादी नेत्याने विरोधकांना ठार मारण्याचा जो ‘विचार’ मांडला, त्याचे चित्रणही प्रसिद्ध आहे. त्याचा निषेध यापैकी कितीजणांनी केला होता?

संवेदनाशील असणे म्हणजे काय असते बुवा? चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय? त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो? ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात? आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती? नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही? त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही? इतिहासाचा तो कोळसा उगाळण्याची इच्छा नव्हती. पण शेफ़ारलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी तोच कोळसा उगाळणे भाग आहे. मोठ्या तोंडांची दातखिळी बसली असेल, तर लहान तोंडी मोठा घास घेणेही भाग आहे.

मैत्रिणीच्या भावनाः

सुरेश, ह्याला कोणी उत्तर देईल काय? असे बोलणारे कोणी आले की मी गडबडते. ...काय करायचं ह्याचं?

माझे तिला पत्रः

असल्या युक्तिवादाने, विशेषतः ऐतिहासिक संदर्भांच्या दाव्यांनी काही क्षण गडबडून जायला होणे स्वाभाविक आहे. त्याचे एक कारण हे ऐतिहासिक संदर्भ व तत्कालीन परिस्थितीचे सूक्ष्म तपशील आपल्याला ठाऊक नसतात. दुसरे कारण आपण ज्या गृहितकावर प्रतिक्रिया दिली, ते गृहितक खोटे तर नाही ना, असा आपल्या मनात उमटणारा प्रश्न. अशी प्रतिक्रिया द्यायला आपण खरे म्हणजे घाई करायला नको होती, असे एका बाजूने मन खात राहते. दुसऱ्या बाजूने आपले म्हणणे खरेच आहे, हे सिद्ध करणारे मजबूत पुरावे आपल्याला मिळावेत, विरोधकाच्या युक्तिवादाला पराभूत करणारा युक्तिवाद आपण किंवा आपल्या बाजूच्यांनी करायला हवा, त्यांची बोलती बंद करावी, असे वाटत असते.

हे सर्व स्वाभाविक आहे. असे ऐतिहासिक तपशील, संदर्भ आपल्यातील जाणकारांनी शोधून विरोधकांना उत्तर नक्की द्यायला हवे. हे आवश्यकच आहे. पण अशा उत्तरानंतर विरोधक आणखी काही संदर्भ देतात. मग त्याला आणखी प्रत्युत्तरे द्यावी लागतात. हेही करायलाच हवे. आपल्यात असे करणारी अभ्यासकांची एक फळी निश्चित हवी. तशी ती आपल्यात नाही, असे नाही. तथापि, ती वेळच्यावेळी ही उत्तरे देण्याइतपत सावध व तत्पर नाही. आपण संघटित व परस्परपूरक नाही, ही आपली मोठी उणीव आहे.

मुद्दा असा आहे, असा युक्तिवाद परतवून लावेपर्यंत आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींनी काय करायचे? ज्यांच्यात अशा अभ्यासाची कुवत नाही किंवा सवड नाही किंवा अन्य प्राधान्याच्या कामात व्यग्र आहेत, अशांनी मग असहाय, निरुत्तर होऊन गप्प राहायचे का? आपले चुकले तर काय घ्या, लोक आपल्याला काय म्हणतील म्हणून माघार घ्यायची का?

आपण असे करावे, हाच तर असा युक्तिवाद करणाऱ्यांचा खरा हेतू असतो.

मग आपण काय करावे?

आपण सत्य, सुंदर, मंगलाची आराधना नित्य करायला हवी. हे जग मानव्यपूर्ण व्हावे, सकलांचे कल्याण होवो (यात विरोधकांचेही कल्याण अभिप्रेत आहे) यासाठीची करुणा व कामना आपल्या मनात हवी. थोडक्यात, बुद्द, ख्रिस्त किंवा संतांनी ज्या मानवतेची शिकवण दिली, ती आपल्यात हवी. यासाठी कोणत्याही ऐतिहासिक संदर्भांची जरुरी नाही.

कोणावरही अन्याय, अत्याचार होत असेल, तर त्याने आपण कळवळून जायला हवे. त्याच्या प्रतिकारासाठी, प्रतिबंधासाठी उभे राहायला हवे. यासाठीही अभ्यासाची गरज नाही.

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या विरोधात पहिली प्रतिक्रिया तीच हवी. मग दुसरी प्रतिक्रिया येते ती अधिक समजाने. अशा हत्या वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे होऊ शकतात की नाही? होऊ शकतात. पण या दोहोंच्या बाबतीत हे संभवत नाही, कारण त्यांचे पूर्ण पारदर्शक चरित्र व त्यांचे जीवनध्येय. ज्यांनी समाज सुधारण्यासाठी जीवन वेचले, त्यांच्याबाबतीत हे त्यांचे कार्य ज्यांना मंजूर नाही, अशांनीच हे कृत्य केले असणार हा संशय, तर्क योग्यच ठरतो. इथे हा संशय वा तर्क संघपरिवारातील कट्टरपंथीयांबाबत व्यक्त होणे हे चूक नाही. नथुराम आमचा नाही, असे कितीही अंग झटकायचा प्रयत्न संघाने केला, तरी नथुराम हा त्यांच्याच शिकवणुकीतून तयार झाला होता व त्यांच्याच मिशनची गांधींजींना मारुन त्याने पूर्तता केली, हे उघड आहे. कायद्याने भले संघ खूनी ठरला नाही, पण खरा खूनी संघच आहे. कारण त्याने जी विषाक्त वातावरणनिर्मिती केली त्यात नथुराम घडला.

मग आपण पुढच्या अधिक समजाने म्हणतो, की नथुरामप्रवृत्तीच्या विरोधातील मंडळींनी एक व्हावे. नथुराम किंवा संघप्रवृत्ती म्हणजे ज्यांना संविधानाच्या प्रास्ताविकातील मूल्ये मूळातच मंजूर नाहीत, अशा प्रवृत्ती. या मूल्यांना सातत्याने प्रकट, अप्रकट, चलाखीने विरोध करणे हाच त्यांचा इतिहास राहिला आहे. संविधानाची शपथ घेऊन संसदीय राजकारण करतानाही त्यांच्या या कारवाया आपण आज पाहतो आहोत.

नथुरामप्रवृत्तीच्या विरोधातील शक्ती म्हणजे संविधानातील मूल्यांचे वारसदार. या मूल्यांची निर्मिती ज्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या संघर्षातून झाली त्या संघर्षात सहभागी लोक. यात लोकशाहीवादी, समाजवादी, गांधीवादी, फुले-आंबेडकरवादी, कम्युनिस्ट या प्रवाहांतील संघटना, व्यक्ती, पक्ष यांचा समावेश होतो.

ज्या अर्थी, हे प्रवाह वेगळे आहेत, त्या अर्थी, त्या प्रत्येकाचे इतरांहून काही निराळे मत आहे. संविधानातील मूल्ये हा सामायिक सहमतीचा धागा आहे. पण ही मूल्ये पुढे कशी न्यावीत, विकसित कशी करावीत, याविषयी त्यांच्या भूमिका व कार्यक्रम यात फरक आहे. यांचे आपसातील मतभेद आणि संघाशी असलेले मतभेद यांचे स्वरुप म्हणजे काळरेषेवरील शून्याच्या उणे बाजूला संघ तर धन बाजूला या संघटना असा आहे. त्या वेगवेगळ्या अंकांवर असतील, पण हे सगळे अंक धन आहेत.

धन बाजूंच्यात जो विरोध आहे, त्याचा आविष्कार हिंसकही झाला आहे. ही हिंसा समर्थनीय नक्कीच नाही. मतभेदांपोटी खूनाखूनी हे वाईटच आहे. पण हे त्यांचे अधिकृत धोरण नाही. उण्या बाजूकडच्यांना कोणतेही साधन वर्ज्य नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात कम्युनिस्टांच्या व्यवहारात विरोधकांशी व आपल्यातल्या भिन्न मतवाल्यांशी हिंसक व्यवहार झाला आहे. कामगार-कष्टकऱ्यांच्या समाजवादी राज्याच्या ध्येयासाठी वर्गशत्रूशी लढताना जी कमालीची सावधानता बाळगायला हवी, जी पोलादी शिस्त व संघटना हवी, त्या गरजेपोटी हा हिंसक व्यवहार झाला, असे समर्थन मी ऐकलेले होते. त्या परिस्थितीतले ताणे-बाणे तपशीलात मला ठाऊक नाहीत. पण असा व्यवहार व्हायला नको होता, असेच मला वाटते. तथापि, वंशप्रभुत्वाने झपाटलेल्या हिटलरची हिंसा आणि जग आपल्या साम्राज्यवादी पंखाखाली घेण्यासाठी चाल करत असलेल्या या हिटलरला रोखणाऱ्या स्टॅलिनची हिंसा मी ‘एकाच प्रतीची’ मानत नाही. औरंगजेबाला दाढी व शिवाजीलाही दाढी म्हणून दोघे एक असे आपण म्हणत नाही, तसेच हे.

अर्थात, याचे तपशील अभ्यासकांनी शोधल्यावर जे नवीन समजेल, त्याप्रमाणे आपल्या मतात यथोचित बदल करायलाच हवा. आपले ते सर्व समर्थनीय किंवा आपल्याची बाजू घेतलीच पाहिजे, अशा मनोभूमिकेने आपण स्वतःला संकुचित करणे म्हणजे चुकांतून शिकण्याची संधी गमावणे होय. वकिली युक्तिवादातून सत्याचा जय होतो, असा आपला अनुभव नाही. उपलब्ध पुरावे व वकिलाचे कौशल्य यास त्याचे श्रेय जाते. (उदाहरणादाखल थोडी स्वस्तुती करतो. लोकशाही श्रेष्ठ की हुकूमशाही श्रेष्ठ या शालेय जीवनातील वादविवाद स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला विषय निवडण्याची संधी देऊन माझ्या वाट्याला आलेला विषय घेऊन मी स्पर्धा जिंकली आहे. त्याने लोकशाही निवडली. मी हुकूमशाहीचे समर्थन केले. माझ्या जिंकण्याने माझे वादविवाद कौशल्य श्रेष्ठ ठरले. माझे वैयक्तिक मत अर्थातच लोकशाहीच्या बाजूने होते. प्रतिस्पर्ध्याने हुकूमशाही निवडली असती, तर मी लोकशाही जिंकून दाखवली असती.) वकिली युक्तिवादाने विरोधकाला नामोहरम करणे, निरुत्तर करणे प्रसंगोपात करावे लागले, तरी तो सत्याकडे जाण्याचा मार्ग नव्हे, हे आपण स्वतःला पटवले पाहिजे. म्हणूनच, मला उद्या कोणी युक्तिवादाने निरुत्तर केले, तरी त्याने मला पराभूत वाटता कामा नये.

समोरच्यांविषयी जेव्हा ‘शेफारलेले’ सारखी विशेषणे, ‘वठणीवर’ आणण्याची भाषा वापरली जाते, तेव्हा एक आविर्भाव घेऊन, तुम्हाला खोटे पाडण्यासाठीच युक्तिवाद केला जातो, तेव्हा ती वस्तुनिष्ठ चिकित्सा नसते. दुसऱ्याला दुरुस्त करण्याची भूमिका नसते, तर त्याच्याविषयीचा द्वेष, संताप असतो. ते गरळ ओकले जाते; मात्र वकिली युक्तिवादाने, समोरच्याला बेसावध गाठून संदर्भांचे सुरे चालवून. या लढाईत युक्तिवादाने उतरावेच लागेल. पण त्याची मर्यादा आपल्याला स्पष्ट हवी. शिवाय समोरच्याविषयी घृणा न ठेवता, उद्या तोही बदलला पाहिजे, सगळी मानवजात सुखी झाली पाहिजे, या करुणेनेच ही लढाई लढायला हवी. याचा अर्थ टीकेची भाषा मवाळ असावी, असे मी म्हणत नाही. कठोर दंभस्फोट जरुर हवा. आवश्यक तो त्वेषही हवा. चीड, राग नसेल तर हल्ला जोरदार होत नाही, हे मला पटत नाही. डॉक्टर जेव्हा धनुर्वात झालेला पाय कापतात, तेव्हा त्यांच्या मनात रोग्याविषयी राग नसतो, उलट तो त्याचे उर्वरित अंग सुरक्षित राहावे, अशीच इच्छा असते. आपली सामाजिक लढाई या ऑपरेशनसारखी असायला हवी.

भाऊ तोरसेकरांची टीका द्वेषपूर्ण आहे. पुरोगाम्यांना ठोकण्यासाठी केलेली आहे. तिच्यात पुरोगामी चळवळ दुरुस्त करण्याची आस्था नाही. एवढेच नाही, तर दाभोलकर-पानसरेंच्या हत्येविषयी खेद-खंत-निषेध असे काही नाही. ‘कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने...’ अशा चालीच्या लेखनातून कॉ. पानसरेंच्या हत्येचे गांभीर्य ते कमी करतात, असे वाटते. इतरही विधाने त्यांची अशीच आहेत.

भारतातील कम्युनिस्टांनी बदलत्या परिस्थितीत संसदीय प्रणालीचा स्वीकार केला आहे. नक्षलवादी पद्धतीने जाणाऱ्या कम्युनिस्टांनी तो केलेला नाही. त्यांचे उद्दिष्ट कितीही उन्नत असले व त्यासाठी सर्वस्व त्यागून जीवन अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत मला वैयक्तिक पातळीवर कितीही कणव असली, तरी आजचा त्यांचा हिंसक व्यवहार मला निषिद्ध व डावपेचात्मकरीत्याही गैर वाटतो. त्यांना मी संविधान परिवारात धरत नाही.

ज्या टीकेतून माझे शिक्षण होत नाही, जी टीका केवळ उच्छेद करते, पुरोगामी छावणीतल्यांच्या मनात हेतुतः गोंधळ उडवते, विरोधकांना मदतनीस ठरते किंवा विरोधकांचा डावपेच म्हणूनच ती केली जाते, अशी टीका आपले मनोधैर्य ढासळवायला खरे म्हणजे पात्रच नाही. जरी काही चलबिचल झाली, तरी लगेच सावरावे. भोवतालच्या आपल्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी त्याबाबत काही विचारल्यास वर मांडलेली भूमिका प्रांजळपणे जमेल तेवढी सांगावी. बाकी येणाऱ्या काळावर व परिस्थितीवर सोडून द्यावे. टीका किंवा आपले समर्थन यामुळेच लोक बदलतात, असे नाही. आपल्या निरपेक्ष खूप गोष्टी घडत असतात. त्यांचा परिणाम लोकांवर होत असतो. शिवाय ‘मित्रांना समर्थनाची गरज नसते; तर विरोधकांना कितीही केले तरी समर्थन पटत नाही’ हे बोलही ध्यानी धरावे.

तोरसेकरांच्या टीकेतील मुद्द्यांवर लिहून आपल्यातला कोणीतरी तज्ज्ञ त्यातील यथार्थता अथवा वैयर्थता लवकरच स्पष्ट करेल, अशी आशा धरुया. त्यावेळी जे नवीन शिक्षण होईल त्याप्रमाणे व्यवहारात बदल करु. तूर्त, अशा स्पष्टतेअभावी बिचकून थांबण्याचे काहीच कारण नाही.

सदिच्छांसह,

सुरेश