Tuesday, May 31, 2016

सैराट का भावतो? काय साधतो?


“ ‘सैराट’ वर काही लिहिलंस का? ...कधी लिहिणार आहेस? ...जरुर लिही.” ...मित्रमंडळींचे प्रश्न, सूचना चालू होती. फेसबुक-व्हॉट्सअपवर एवढं काही लिहिलं जात होतं-जात आहे की ते वाचून आपण लिहावे की न लिहावे हा हॅम्लेटी प्रश्न मनात अडकून बसला होता. जे लिहिलं जातं आहे, त्यातील काही मला पटतं, काही पटत नाही, काही अभिनिवेशी वाटतं, काही दोन्ही बाजूंनी जातीय वाटतं. आपण लिहायचं तर यातलंच काही, यातल्याच काहीवर लिहावं लागेल. नोंदवलं न गेलेलं असंही काही आहे, असं वाटतं. त्यावर बोलावं लागेल. थोडक्यात, मला न लिहून चालणार नाही. ‘फॅंड्री’च्या वेळी किती चटकन व भारावून लिहिलं होतं! मग त्याच दिग्दर्शकाचा, त्याच जाणिवांचा ‘सैराट’ अपवाद करुन कसे चालेल? तेव्हा, लिहायला सुरुवात करतो. थोडं स्वैर, थोडं संज्ञाप्रवाही होईल. पण चालवून घ्या.

‘सैराट’ आज ११ व्या दिवशी ४१ कोटींची कमाई करुन गेला आहे. (लेख छापून येताना १०० कोटींचा आकडा पार झाला आहे.) हा आकडा अजून बराच वाढेल असे दिसते. मराठी सिनेमाला अलिकडच्या काळात तिकिटबारीवर मिळालेला हा प्रतिसाद दुर्मिळच म्हणायला हवा. त्याबद्दल नागराज मंजुळे व त्यांची सगळी टीम यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पण तिकिटबारीवरची कमाई हा सिनेमाच्या मापनाचा निकष नाही. अनेकांतला एक असेही नाही. तो अजिबातच नाही. सिनेमा हा व्यवसाय आहे हे लक्षात घेता पैश्यांच्या रुपात अशी कमाई होणे, हे सिनेमाचा खर्च वसूल होणे, नफा मिळणे यासाठी खूप महत्वाचे आहेच. हे व्यावसायिक गणित जमले नाही, तर पुढचा भला-बुरा जो काही असेल तो सिनेमा निघणेच मुश्कील होईल. तेव्हा, ती कमाई सैराटने केली हे नागराज आणि टीमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप चांगले झाले. याचे अर्थातच मला समाधान आहे.

चांगला सिनेमा कशाला म्हणायचे याच्या मापनासाठी सर्वसाधारणपणे हे निकष सांगितले जातातः चांगली पटकथा, नाविन्यपूर्ण अथवा वैशिष्ट्यपूर्ण कल्पना, चांगले कलावंत, चांगले छायांकन, त्यातून सूचित होणाऱ्या संदेशाची सखोलता, वास्तवाची सर्जनशील फेरमांडणी करताना वास्तवाशी असलेली तिची वाजवी अनुरुपता, नेपथ्य, ध्वनियोजना व या सगळ्याची चपखल रचना. (नार्निया, हातिमताई किंवा अन्य परिकथांसारख्या अद्भूतकथांचा आपण इथे विचार करत नाही आहोत. त्यांचे निकष काही बाबतीत निराळे आहेत. आपण सामाजिक, वास्तववादी सिनेमाचा विचार करत आहोत.)

नागराज यांचा या आधीचा ‘फॅंड्री’ हा सिनेमा या निकषांवर उतरणारा अत्युत्तम सिनेमा आहे. ‘सैराट’ त्या श्रेणीत मोडत नाही. म्हणूनच जे कोणी ‘फॅंड्री’ सारखा किंवा त्यापेक्षा उत्तम सिनेमा आपल्याला नागराज देणार ही अपेक्षा घेऊन सैराट पाहायला गेले होते, त्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. नागराजचा पूर्ण आकाराचा फॅंड्री हा पहिला व सैराट हा दुसरा सिनेमा. फॅंड्रीने ज्या अपेक्षा तयार केल्या होत्या त्यांच्या परिपूर्ततेची अपेक्षा विचक्षक प्रेक्षकांनी सैराटकडून करणे साहजिकच आहे.

हे झाले जाणत्या प्रेक्षकांचे. पण ते संख्येने अत्यंत अल्प आहेत. सर्वसाधारण प्रेक्षक असे विचक्षक नसतात. नव्याचे रसग्रहण करणारा प्रेक्षक तयार करावा लागतो. तसा तो करण्याचे सशक्त प्रयत्न आपल्याकडे झालेले नाहीत. त्यामुळे या सर्वसाधारण प्रेक्षकांचे चक्रधरांच्या हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीसारखे असते. प्रत्येकाचे त्याच्या रुची, सामाजिक जाणीवा व स्तर यांचे म्हणून वेगवेगळे निकष असतात. त्यांप्रमाणे ते सिनेमा अनुभवत, मापत असतात.

ज्या प्रतिक्रियेची दखल घेऊ नये असे आधी वाटले; पण नंतर ती देणाराही एक प्रवाह आहे असे लक्षात आल्याने तिच्याविषयी बोलणे गरजेचे आहे. ही प्रतिक्रिया देणारा बाप ‘तुमच्या मुलीने आर्चीसारखे शाळेच्या वयात केलेले चालेल का?’ असे विचारतो. हा सिनेमा शालेय वयातील मुला-मुलींच्या अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देतो, असा या बापाचा आरोप आहे.

हा आरोप निराधार आहे. फसवा आहे. वयात येणाऱ्या मुला-मुलींमधले आकर्षण, त्यांच्यातली जवळीक ही नैसर्गिक आहे. जीवनाला रंगत आणणारा, फुलविणारा तो एक उत्सव आहे. त्याच्या स्वागताचीच भूमिका हवी. त्याचा निषेध, दमन करुन प्रश्न सुटणार नाही; या आधीही ते सुटले नाहीत. त्यांचे नियमन कसे करायचे याचे भान त्यांना द्यायला हवे. ही भीती वाटणाऱ्या पालकांनी आपल्या शाळा-कॉलेजे-वस्त्या-गाव आठवून पाहावेत. त्यांच्या वयाची इतर मुलेच नव्हे, तर हे पालक स्वतः त्यातली पात्रे होती, हे त्यांच्या लक्षात येईल. नागराजच्या सिनेमाने जे बोलता येत नाही असे एक दुखणे उफाळून येते ते म्हणजे, आमच्या पोरी या खालच्या जातीतल्यांच्या प्रेमात पडतात हे. हा प्रवाह केवळ मुला-मुलींनी कोणत्या वयात काय बंधने पाळायची एवढेच बोलत नाही, तर त्याचा मुला-मुलींनी प्रेमात पडताना जातिपातीची बंधने झुगारुन देण्याला, सामाजिक श्रेणींच्या विरोधात बंड करायला तीव्र विरोध असतो.

फॅंड्रीत जब्याला शालू प्रत्यक्षात भेटत नाही, तिला त्याच्या भावनांची खबरही नाही. तरीही फॅंड्रीला अशा पालकांचा विरोध होता. कारण एकूण मांडणीतून दिग्दर्शकाने जातिपातींच्या विरोधात समाजाला चेतवले आहे, हे त्यांना कळते. त्यामुळे त्यांचा संताप होतो. सैराटमध्ये तर प्रचंड विरोध असतानाही आर्ची-परश्याचे प्रत्यक्ष मीलन होते. दोन तरुण जीवांच्या प्रेमाच्या या उत्सवाला आग लावणाऱ्या सामाजिक विषमतेला दिग्दर्शक ललकारतो. ही ललकार सिनेमाला येणाऱ्या तुफान गर्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार होते. याविषयीचा तो खरा पोटशूळ असतो.

सैराट ही काही थिल्लर प्रेमाची कथा नाही. जबाबदारी, निष्ठा व त्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या युगुलाची व त्यांना मदत करताना त्यांच्याइतकाच स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्यांच्या भिन्न धर्माच्या-भिन्न जातींच्या मित्रांची कथा आहे. त्यामुळे मुले बिघडणार नाहीत, तर अधिक जबाबदारच होतील.

नवी पिढी अधिक मोकळीक घेते आहे. ही मोकळीक वाढणार आहे. अशावेळी पालकांनी आपापल्या भागांतल्या शाळा-कॉलेजांमध्ये लैंगिक शिक्षण व जोडीदार-विवाहविषयक समुपदेशन हे उपक्रम कसे घेता येतील, याच्या प्रयत्नाला लागायला हवे.

ज्या मंडळींना हा सिनेमा भावला, त्यांत सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्यांचा एक प्रवाह आहे. त्यांना आंतरजातीय विवाह, वरच्या जातीच्या सधन राजकारण्यांच्या दांडगाईविरोधात खंबीर व निडरपणे उभी राहणारी व तथाकथित खालच्या जात आणि आर्थिक स्थितीतल्या परश्याला निष्ठेने साथ देणारी, त्याच्यासाठी-त्याच्यासोबत हालअपेष्टा सोसणारी आर्ची (एक स्त्री), त्यांना साथ देणारे मित्र भावतात. या सर्वाची परिणती म्हणून आजही समाजात अत्यंत क्रौर्याने अशा युगुलाला संपवले जाण्याचे परिचित वास्तव त्यांना पुनःप्रत्ययाची वेदना देते. अस्वस्थ करते. प्रिन्स शिक्षकाच्याच कानाखाली वाजवतो, या प्रसंगाने काही मागास समाजातून आलेल्या प्राध्यापकांना तत्सम दांडगाईच्या अवमान-संतापजनक अनुभवांचे स्मरण होते. ग्रामीण महाराष्ट्रातील सरंजामी धनदांडग्यांच्या ताब्यातील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षक हे गुलाम असतात. ते मागास समाजातून आलेले असतील तर विचारुच नका.

या गटांच्या पलीकडचा बहुसंख्य प्रेक्षकवर्ग-ज्याच्यातील काहीजण दोन-तीनदा हाच सिनेमा पाहत आहेत, त्यांना यातले काय भावत असावे?

या गटात गावातील जातवार वस्त्यांचा, व्यवसायांचा परिचय असलेले प्रत्यक्ष गावात राहणारे, जातींचा, त्यांच्या श्रेणींचा सर्वसाधारण परिचय असलेले गावांजवळच्या छोट्या शहरात राहणारे, जातींची ढोबळ माहिती असणारे किंवा नसणारे असे मोठ्या शहरात राहणारे अशांचा समावेश होतो. मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलांना आर्ची-परश्याची कहाणी गरीब-श्रीमंतांच्या भेदाची कहाणी वाटते. त्यांना जातीची बाजू लक्षात येतेच असे नाही. गाव व छोट्या शहरांतील मुलांना ती बऱ्यापैकी येते. गाव, छोटी शहरे व मोठी शहरे यातील सर्वच मुले, जी आता पूर्वीपेक्षा स्त्री-पुरुष संबंधांबाबत कमी-अधिक प्रमाणात मोकळी आहेत, त्यांना आर्ची-परश्याची प्रेमकथा स्वतःची वाटते. आपली प्रेयसी आर्चीसारखी बुलेटवरुन येणारी, मुलांना दम देणारी, पोलीस स्टेशनवर ‘मी परश्याचे अपहरण केले, त्याच्या घरच्यांना सोडा’ असे बजावणारी, मागे लागलेल्यांवर रिव्हॉल्वर चालवणारी, ‘झिंगाट’च्या ठेक्यावर स्त्री असल्याचा संकोच सोडून मुक्तपणे नाचणारी अशी हंटरवाली-स्वप्नसुंदरी असावी हे स्वप्नरंजनही इथे असते. मुलींना बुजरा, संकोची, गोड परश्या प्रचंड आवडतो. ‘याड लागलं’ गाण्याच्या पार्श्वभूमीवर परश्या झेपावत, थिरकत येतो तो सरळ पडद्यातून बाहेर येऊन या मुलींच्या काळजात घुसतो. आर्ची-परश्याच्या भेटींचे, चिठ्ठीची देवघेव करण्याचे प्रसंग या मुलामुलींच्या दिलाचा पुरजा-पुरजा करतात. प्रौढांनाही बित्या दिनांमध्ये भिजवून आणतात. सिनेमातली सगळीच गाणी या सगळ्यांनाच मोहविणारी-थिरकवणारी आहेत. ‘झिंग झिंग झिंगाट’ वर तर झिंगून गेल्यासारखी माणसे थिएटरातच नाचायला लागतात.

गाव व छोट्या शहरांतील माणसांना हा सिनेमा जवळचा वाटण्याची जी इतर काही कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे यातील भाषा. अर्थात, हल्लीच्या अनेक सिनेमांत ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध बोलींचा वापर होताना दिसतो. पूर्वी तो मुख्यतः कोल्हापुरीच असायचा. सोलापूर-करमाळा परिसरातील ही भाषा ज्या सन्मानाने व सहजतेने वावरत असते, त्याने केवळ याच परिसरातील नव्हे, तर अन्य भागातील ग्रामीण मराठी मंडळींनाही ती आपलेसे करते. त्यातील पात्रे, त्यांचे खेळ, उत्सव हे सगळे त्यांच्या जीवनाचा भाग आहेत. ज्या बारकाईने नागराजनी संवाद, भाषेचा लहेजा, स्वभावांचे कंगोरे, दृश्ये उभी केली आहेत, ती विलक्षण प्रभावी आहेत. वास्तवाची ही कलात्मक मांडणी ही नागराजची मोठी ताकद आहे. अभिनेता अभिनय कसा करतो, यावरच त्याचे मापन केले पाहिजे हे खरे. पण यातील जी पात्रे अभिनयात बाजी मारुन जातात ती आपल्यासारखीच सामान्य, गरीब, निम्न जातींतील आहेत, सिनेमा तंत्राची काहीही माहिती नसलेली, त्यातले कुठलेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही, जन्मजात प्रतिभा नसलेली अशी आहेत. अशी माणसे अचानक पडद्यावर चमकू लागतात. यातून मीच पडद्यावर येतो आहे, असे येणे हे आपल्याही आवाक्यात आहे, हा विश्वास ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या बहुजनांच्यात तयार होतो.

व्यक्तिशः माझ्यावर या सिनेमाचा काय परिणाम झाला?

फॅंड्री पाहिल्यावर मी लिहिले होतेः

‘स्थळ-काळाचे तपशील वेगळे असले तरी 'जब्या'चे भावविश्व हेच आमचेही भावविश्व होते. किशोरवयातील त्याच्या मनात उमललेले हळुवार अंकुर, त्यांची मुग्ध कोवळिकता व नाजूक संवेदनांनी मनाचे आभाळ झंकारणे ही भावस्थिती आमचीही होती. तथाकथित खालची जात अन् या जातीला सावलीइतके अपरिहार्य बनून आलेले दारिद्र्य, वंचना यामुळे 'शालू' हे आम्हालाही अप्राप्य असे गुलबकावलीचे फूल होते. सामाजिक-आर्थिक विषमतेच्या या दाहक वास्तवाने आमच्या भावजीवनाच्या झालेल्या चिंधड्या आजही ठसठसत असतात. फॅन्ड्रीने तर त्यांवरची खपलीच ओरबाडून काढली.’

अशीच तसेच याच तीव्रतेची भावना यावेळी नव्हती. रोमॅंटिक भावनांचे स्मरणरंजन जरुर झाले. शाळेतले काही बाक व कटाक्ष आठवले. ज्यांच्याशी आपले जात व आर्थिक स्तरामुळे जमणार नव्हते, जमले नाही, ती वेदनेची तार झंकारुन गेली. आर्ची हे सुंदर, सुबक पात्र वाटले. रिंकूने हे पात्र ताकदीने उभे केले आहे. तिच्या ताकदीबद्दल प्रश्न नाही. पण ती दिग्दर्शकाच्या स्वप्नातली मूर्ती (जे नागराजनी जाहीरपणेच सांगितले आहे) आहे. हे सुंदर, सुबक स्वप्न म्हणून ठीक. पण त्याचा वास्तवातील माझ्या ‘आर्चीं’शी मेळ बसला नाही. आर्ची-परश्याच्या भेटींची रम्य निसर्गाच्या व संगीताच्या पार्श्वभूमीवरील भेटी ‘सिलसिला’च्या आसपासच्या भावना जागवून गेल्या. पण त्याही वास्तवाशी मेळ न खाणाऱ्या. मी जिला भेटत असे, त्या जागा अशा रम्य नव्हत्या. संगीतही नव्हते. जे काही असेल ते मनात. बाहेर हॉर्न, गर्दीचा कलकलाट.

आर्ची-परश्या पळून गेल्यावर त्यांना ज्या झोपडपट्टीत आश्रय मिळतो, त्या परिसरातील दृश्यांनी माझ्या बालपणीचे व तरुणपणीचे काही प्रसंग अंगावर चालून आले. ज्या घरात ती दोघं राहतात, त्यापेक्षा माझं घर वाईट स्थितीतलं होतं. कनिष्ठ मध्यवर्गातून पण घरात संडास-बाथरुम असलेल्या सवर्ण कुटुंबातून आलेल्या माझ्या पत्नीने त्या तशा घरातच संसार थाटला. आर्ची ज्या संडासात जाते, तशाच संडासात तिला जावे लागे. आर्चीच्या निमित्ताने जेव्हा ही आठवण झाली तेव्हा आत खड्डा पडला. बराच काळ ती ठसठस राहिली.

सिनेमाचा शेवट त्रास देऊन गेला. वर उल्लेख केलेल्या सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्यांप्रमाणेच मलाही हत्याकांडाचे हे परिचित वास्तव हादरवून गेले. आज शहरातच नव्हे, तर गावांतही आंतरजातीय विवाह होण्याचे प्रमाण वाढते आहे. नाराजी, विरोध, मारहाण, पलायन आदि वाटांनी जाऊन निभणाऱ्यांची टक्केवारी मोठी आहे. अशा हत्याकांडांची टक्केवारी कमी आहे. (बातमी हत्याकांडाची होते. निभणाऱ्या विवाहांची नाही. त्यामुळे सकारात्मक बदलाचे प्रमाण ठळकपणे समोर येत नाही.) मिश्रविवाह हे भविष्य आहे. त्याला अटकाव आणण्याचे प्रयत्न हळूहळू थिटे पडणार आहेत. पण त्यामुळे अशा हत्याकांडांची दाहकता कमी होत नाही. समाजमनाला हलवून त्याच्या विवेकाला आवाहन करण्याची मोठी कामगिरी सिनेमाच्या या शेवटाने केली आहे.

झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्यांचे हावभाव, शैली ही ‘शांताबाई’ गाण्यावर नाचणाऱ्यांची आठवण करुन देते. अजय-अतुलने ही गाणी खूप मेहनतीने, प्रतिभेने व खूप खर्चाने (हॉलिवूडमध्ये संगीतबद्ध करुन) केली आहेत. तथाकथित तळच्या विभागातून आलेल्या या मंडळींनी अशी झेप घेणे हे खूपच कौतुकास्पद आहे. त्यांची धून थिरकण्यासाठीच आहे. त्यामुळे लोक उत्तेजित होतात. नाचू लागतात. खूप लोकप्रिय होतात ही गाणी. पण म्हणून ते चांगले आहे, असे मला म्हणवत नाही. कथेची अपरिहार्यता म्हणून ते येते असे वाटत नाही. फॅंड्रीत एकही गाणे नव्हते. पण झीटीव्हीने त्याच्या प्रमोशनसाठी अजय-अतुलला गाणे करायला लावले. तो धंद्याचा भाग होता. इथे थेट सिनेमातच गाणी आली. हा नेहमीचा चालू मनोरंजनाचा व्यावसायिक फंडा व फॉर्म्युला आहे. ही व्यावसायिकतेसाठी नागराजनी केलेली तडजोड असावी. ती कमाईच्या व लोकप्रियतेच्या दृष्टीने खूपच यशस्वी ठरली आहे. यानंतरच्या सिनेमातही ती तशीच करावी, असा सिनेमासाठी पैसे लावणाऱ्यांचा तगादा नक्की राहणार.

नागराज पुढे काय करणार माहीत नाही. मानवतावादाशी बांधिलकी असलेल्या व आपल्या मुळांशी पक्का असलेल्या नागराजने अशी तडजोड केली तरी ती मर्यादा सोडून असेल असे वाटत नाही. शिवाय जसा या सिनेमातून त्याने जो सामाजिक संदेश, तोही प्रत्ययकारी पद्धतीने दिला आहे, तसा संदेश तो पुढेही देतच राहणार याची खात्री वाटते. हे जर शर्कराअवगुंठीत औषध असेल, तर ते समाजहिताला उपयुक्तच आहे. प्राप्त स्थितीत नेहमीच आदर्शाची अपेक्षा धरणे बरोबर होणार नाही.

अर्थात, हे चालू असताना मध्येच ‘फॅंड्री’ सारखा एखादा सिनेमा काढण्याचा नागराजनी प्रयत्न करावा, अशी विनंती जरुर राहील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, जून २०१६

Sunday, May 1, 2016

दोन भिक्खू एक तरुणी

दोन भिक्खू एक तरुणी
दोन भिक्खू प्रवास करत असतात. मध्ये नदी लागते. अचानक आलेल्या पावसाने नदीला नेहमीपेक्षा पाणी अधिक असते. कामासाठी या तीरावर आलेल्या एका तरुण मुलीला आपल्या घरी परतायचे असते. ती नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला ते कठीण जात होते. ती या दोघा भिक्खूंना पाहून त्यांच्या जवळ येते. त्यांच्यातल्या तरुण भिक्खूला मदतीची विनंती करते. तो रागावतो. म्हणतो, “तुला दिसत नाही मी भिक्खू आहे? आम्ही स्त्रीसंगापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे.”
हा संवाद ऐकणारा वयस्क भिक्खू पुढे होतो व त्या मुलीला म्हणतो, “चल बस माझ्या पाठीवर.” ती बसते. तो पाण्यात शिरतो. तरुण भिक्खू अस्वस्थ. तोही पाठून चालतो. पलिकडच्या काठावर ते सुरक्षित पोहोचतात. वयस्क भिक्खूच्या पाठीवरुन ती मुलगी उतरते. सुहास्यवदनाने ती भिक्खूचे आभार मानते. तोही स्मितवदनाने तिला निरोप देतो. ती तिच्या मार्गाने जाते. हे दोन भिक्खू त्यांच्या मार्गाने चालू लागतात.
तरुण भिक्खू रस्ताभर मनातल्या मनात धुसफूसत असतो. अखेर ते आपल्या मठाजवळ पोहोचतात. तरुण भिक्खूला राहवत नाही व तो या ज्येष्ठ भिक्खूला प्रश्न करतो, “तुम्ही असं कसं केलंत? एका स्त्रीला तुम्ही आपल्या पाठीवर घेतलेत. हा नियमभंग नाही का?”
वयस्क भिक्खू त्याला शांतपणे सांगतो, “तिला नदी ओलांडण्यासाठी मदतीची गरज होती. मी तिला पाठीवर घेतलं व नदीच्या पलीकडे उतरवलं. अरे, माझ्या पाठीवरनं ती कधीच उतरली, तुझ्या डोक्यावर मात्र ती अजूनही बसलीय.”
कन्हैयाच्या मुंबई-पुण्याच्या जोरदार सभांनंतरही स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्या काही मंडळींकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या ऐकल्या-वाचल्यावर ही गोष्ट आठवली.
कन्हैया डांगे व आंबेडकरांच्या सहकार्याचा, स्वतंत्र मजूर पक्षाच्या कालखंडाचा उल्लेख करतो आहे. संविधानातील मूल्ये उध्वस्त करु पाहणाऱ्या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातील लाल-निळ्याच्या वर्तमानातील सहकार्यासाठी तो ही पायाभरणी करतो आहे, हे उघड आहे. सभेला जमलेल्या या दोन्ही रंगांच्या समर्थकांकडून तसेच अन्य लोकशाहीवाद्यांकडून या भूमिकेला टाळ्यांच्या तुफान कडकडाटात प्रतिसाद मिळतो आहे.
यातला सकारात्मक व पुढे जाणारा भाग लक्षात न घेता, डांगे व आंबेडकरांच्या बाकी संबंधांबद्दल (म्हणजे ५२ च्या निवडणुकांतील बाबासाहेबांचा पराभव, मते कुजवा हे डांगेंचे विधान, बाबासाहेबांची मार्क्सवादावरील टीका इ.) कन्हैया काहीच बोलला नाही, तो सोयीचे तेवढेच बोलला ही या ‘आंबेडकरी’ मंडळींची कन्हैयाच्या सभांवरची पहिली व प्रधान प्रतिक्रिया आहे.
या सभा म्हणजे काही अकादमीय परिसंवाद नव्हेत. परिसंवादात विविध पैलूंची सखोल मांडणी-चिकित्सा अभिप्रेत असते. सध्या युद्धासाठी आमने-सामने ठाकलेल्या या दोन छावण्या आहेत. इथे मित्रांच्या सरासरी सहमतीची ताकद एकवटून ठाम बाजू घेऊन ती लढवणे हेच अपेक्षित असते. कन्हैयाच्याच शब्दांत सांगायचे तर ‘ब्राम्हणवाद-पूंजिवाद के खिलाफ’ लोकशाही, समाजवाद मानणाऱ्यांची आपली ही छावणी आहे. यात खरे तर ज्यांचा वारंवार उल्लेख होतो ते निळा व लाल हे दोनच रंग नाहीत. मुंबईच्या सभेत शेहला राशीद (जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष व कन्हैयाची सहकारी) हिने बहुसंख्य वक्ते ‘जयभीम-लाल सलाम’ म्हणत असताना जाणीवपूर्वक सगळ्यांना ‘सतरंगी’ सलाम केला. या छावणीत केवळ आंबेडकरवादी व मार्क्सवादी नाहीत, तर अन्य पुरोगामी विचारांचेही लोक आहेत याचे भान ठेवा, असेच तिला सांगायचे होते. खासदार आदित्यनाथशी दोन हात केलेल्या अलाहाबाद विद्यापीठातील रिचा सिंगने बोलताना लोहियांचे जातिअंतासंबंधीचे एक विधान नोंदविले व भाषणाची अखेर जयभीम, लाल सलाम सोबत ‘जय समाजवाद’ने केली. आनंद पटवर्धनांनीही या सभेत जयभीम, लाल सलाम सोबत ‘जय जगत’ असे म्हटले.
हे आंदोलन केवळ मार्क्सवाद्यांचीच नव्हे तर आंबेडकरवाद्यांचीही-खरे म्हणजे कोणाही एका विचार-वादाची मक्तेदारी नव्हे; सर्व लोकशाहीवादी पुरोगामी प्रवाहांचा हा सप्तरंगी कारवा आहे, हेच यातून ठसवले जात होते.
कन्हैयाने लाल किल्ल्यावर निळा झेंडा लागणार की लाल झेंडा लागणार याचा आपल्या ढंगाने समाचार घेतला व आधी धोक्यात आलेला ‘तिरंगा’ वाचवूया मग निळा की लाल याचा विचार करु, असे सांगितले. शेहला राशीदने २०१९ ला ‘यूपीए ३’ येता कामा नये असे जोरात मांडले. ‘यूपीए ३’ याचा अर्थ काँग्रेसबरोबर आघाडी. ती तिला नको आहे. दोघे सहकारी असले तरी कन्हैया व तिच्यात ही मतभिन्नता असल्याचे दिसते आहे. कन्हैया काँग्रेसबाबत कठोर टीकेची भूमिका घेत नाही. इथेही त्याने या टीकेला उत्तर देताना ‘वेळ येईल तेव्हा मी काँग्रेसबाबतही बोलेन, पण आता वेळ आहे केंद्रातल्या ‘संघी’ सरकारची’ असे सांगून आपला प्राधान्यक्रम व डावपेचच घोषित केला. देशातील संस्कृतीबहुलता, विचारबहुलता टिकविणे कसे आवश्यक आहे, हे सांगताना त्याने मंचकावरील अन्य विद्यार्थी नेत्यांकडे निर्देश करुन ‘आमच्यातही मतभेद आहेत. असे मतभेद असणे हे लोकशाहीचेच लक्षण आहे व या मतभेदांसहित आम्ही एकत्र लढणार आहोत, प्रस्थापिताच्या विरोधातील सर्व रंगांची ही लढाई आहे’ हे जाणीवपूर्वक नमूद केले.
हे विद्यार्थी नेते विलक्षण जाणते आहेत. राज्यकर्त्यांचे-संघप्रणीत संघटनांचे जे काही अनुभव त्यांच्या वाट्याला आले व त्यात जे संघर्ष त्यांनी केले त्यातून त्यांची ही समज व करारीपणा वृद्धिंगत झाला असावा. त्यांच्या भाषणातील काही उल्लेख व विश्लेषण पद्धती पाहता राजकीय-वैचारिक पीठांच्या मांडवाखालूनही ते गेलेले असावेत असे दिसते. केवळ विद्यार्थीच नव्हे; तर दुष्काळग्रस्त, सफाई कामगार, स्त्रिया, महागाई, विकासाची दिशा, त्याचे वितरण, शिक्षण, वित्तीय अर्थव्यवस्थेचे आक्रमण, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा परिणाम व या सगळ्याचा संविधानाच्या सरनाम्यातील मूल्यांशी संबंध अशी समग्र, अव्वल राजकीय मांडणी ते करत आहेत. राजकीय व्यवस्था बदलाची, नव्या पर्यायी व्यवस्थेची ही मांडणी आहे. त्याला सुस्पष्ट टोक आहे. कोण बाजूचे व कोण विरोधातले ही विभागणी स्पष्ट आहे. त्यात धूसरता नाही. सबगोलंकारीपण नाही. हे विद्यार्थी आपले हे आंदोलन विद्यापीठांतून रस्त्यावर नेऊ पाहत आहेत. ते ज्यावर आवाज उठवणार आहेत, त्या विविध प्रश्नांशी संबंधित समाज विभागांच्या स्वतंत्र परिषदा घेऊन या पर्यायांचे मसुदे तयार करण्याची त्यांची मनीषा आहे. याचाच एक भाग म्हणून कन्हैयाने विद्यापीठांत दलित विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध करणाऱ्या ‘रोहित अॅक्ट’ ची मागणी करुन मे महिन्यात ५ तारखेला होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
हे सगळंच खूप नवं आहे. याच्या भवितव्याविषयी लगेच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. तथापि, या प्रक्रियेची जी बीजं दिसत आहेत, ती खूपच आश्वासक आहेत. त्यांची जोपासना, पुढचे वादळवारे, भूकंप, पूर, नेतृत्वांच्या मनुष्यस्वभावांचे फेरे, विरोधकांच्या चाली, मित्रांचा गाफीलपणा, प्रस्थापित पक्षांची राजकीय मोर्चेबांधणी इ. अनेक बाबींवर या अंकुरांच्या वेली कशा, कुठे जाणार आहेत ते ठरणार आहे.
ही मुलं निडर, हुशार, समजदार आहेत. ताजी आहेत. जुनी ओझी नाहीत. नव्याचा नव्याने विचार व आविष्कार करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ज्येष्ठांना ते बजावत आहेत- ‘तुम्ही सल्ला द्या, पण निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्या. आम्ही तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाही.’ या त्यांच्या भूमिकेने तर मला हर्षभरित व्हायला झाले आहे. (तसा मी अधिकचा भावूक आहे. पण ते सोडा.) नवी पिढी ही जुन्यांच्या खांद्यावर उभी असते. तिला अधिक पुढचे दिसणे हे स्वाभाविक आहे. आपला खांदा त्यांना लागेल तेव्हा देणे व अशी निर्णय घेणारी मुले आपल्याला लाभलीत, याचा रास्त अभिमान व कौतुक आम्हा ज्येष्ठांना असायला हवे. या मुलांना पोषक वातावरण खाली तयार व्हावे, यासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते आपापल्या पातळीवर करायला हवे, मदतीसाठी नेहमी तयार असावे, असे मला वाटते.
अशांचे मुक्तकंठाने स्वागत करायला हवे. त्यांच्या या एल्गाराविषयी संभ्रम तयार होईल, असे काहीही करता कामा नये. नीती व लढ्याचे डावपेच या दोहो बाजूंनी ते गैर होईल. बहुसंख्य आंबेडकरी जनतेला कन्हैयाचे आगमन स्वागतार्ह व आश्वासक वाटते आहे. त्याच्या जयभीम-लालसलामाला ते मनापासून प्रतिसाद देत आहेत. आंबेडकरी व डावे यांचा जात व वर्ग या बाबतीतला एकारलेपणा जाऊन कन्हैया दोहोंचा मेळ घालून पुढे जात असेल, तर जुन्या वादांचे या घडीला तरी काहीच प्रयोजन राहत नाही. त्या चर्चा यथावकाश चालू राहतील.
या सगळ्यात गांधीजी पुन्हा उपेक्षितच राहत आहेत, याची खंत मला आहे. शाहू-फुले-आंबेडकर-मार्क्स-बिरसा-पेरियार या रांगेत गांधी-नेहरु नावे घेणे पुरोगाम्यांच्यातल्या अनेकांना सोयीचे वाटत नाही. गांधीजींना त्याची सवय आहे. नेहरु तर काँग्रेसचे. त्यांच्याबद्दल चांगले बोलल्याचे श्रेय काँग्रेसला जाईल ही भीती. गंमत ही की काँग्रेसलाच नेहरु आपले आहेत, याचे फारसे स्मरण नाही. नेहरुंनी त्यांच्या परीने भारताचा शोध घेतला, नवा भारत घडवला. त्यांचीही काही तक्रार असायचे कारण नाही. नुकसान त्यांचे काहीच नाही. ती मृत माणसे आहेत. नुकसान जिवंत माणसांचे होणार आहे. आधुनिक मूल्यांवर भारत उभारण्यासाठी ज्यांनी जीवन वेचले त्यांच्याप्रतीची कृतज्ञता राखणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. तथापि, पुढील लढ्यासाठीची दिशा व साधने जी त्यांनी दिली आहेत, ती नाकारणे हा कर्मदरिद्रीपणा आहे.
माझ्या एका लेखात ‘बाबासाहेबांचा पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींची होती, असे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते, असेही हे इतिहासकार म्हणतात.’ अशी विधाने आहेत. परस्पर समन्वयाचा आग्रह न धरता परस्पर पूरकता शोधण्याचे आवाहन हा या लेखाचा गाभा होता. त्याचे स्वागत करणाऱ्या प्रतिक्रिया पुष्कळ आल्या. पण आंबेडकरी विभागातील ज्या प्रवृत्तीचा मी उल्लेख केला, तिने मात्र हा इतिहास कसा खोटा आहे, हे व तेवढेच पटविण्याचाच आटोकाट प्रयत्न केला.
समजा राम गुहांसारख्या इतिहासतज्ज्ञांचे हे म्हणणे खोटे ठरले, तरी सध्याची आव्हाने परतवण्याच्या लढ्यात गांधीवाद्यांच्या मांडणीतली कोणती बाब अडचणीची ठरते की ज्यामुळे रोहित प्रकरणाने पेटविलेला व कन्हैयाने पुढे नेलेला हा लढा अवरुद्ध होतो आहे? मला तर या आंदोलनाच्या आजच्या टप्प्यावर अशी काहीच अडचण दिसत नाही. एकूणच गांधीवादी, मार्क्सवादी, नेहरुवादी आदींच्याबद्दल ज्यांना ती दिसत असेल, त्यांनी या चळवळीत सहभागी होऊन ती चर्चेला आणणे व त्याच्या निरासाचे मार्ग सुचविणे गरजेचे आहे. तरच ती टीका विधायक होईल. अन्यथा केवळ खवखवत राहण्याने उबळ शमल्याचे कृतक समाधान होईल, पण नीट उपचार न झाल्याने दुखणे विकोपाला जाईल. नव्याच्या स्वागताला अनुकूल असलेल्या समाजाला संभ्रमित करण्यात याने जे योगदान होईल ते होईल, पण स्वतःचे व्यक्ती म्हणून उमदेपण नेस्तनाबूत करायला हे नक्कीच फायदेमंद राहील.
बुद्धसंदेशाचे व्यावहारिक उपयोजन सांगणाऱ्या वरील कथेतून बोध घेऊया. ही किंतु-परंतुची, छिद्रान्वेषी ओझी उतरवूया. त्या वयस्क भिक्खूसारखे स्मितवदनाने जबाबदारी वाहूया. मोकळ्या मनाने चळवळीतील सहकाऱ्यांबरोबर मार्गक्रमण करुया.
बौद्ध वाङ्मयात असंख्य बोधकथा आहेत. या बुद्धजयंतीला एवढी एक पुरेशी आहे.
सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, मे २०१६

Saturday, April 30, 2016

मला आनंद कसला व्हावा- 'माझा' धर्म स्वीकारल्याचा की पटलेला धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या धाडसाचा?

रोहित वेमुलाच्या आई व भावाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर माझी एक जुनी पोस्ट आठवली. नव्या संदर्भात ती परत इथे टाकत आहे.
___________

मला आनंद कसला व्हावा- 'माझा' धर्म स्वीकारल्याचा की पटलेला धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या धाडसाचा?
___________

मला मध्यंतरी एक SMS आला.
'I am proud that I am Buddhist - Steve Jobs'
SMS पाठवणारा मित्र बौद्ध होता.
वाचले आणि मला आनंद झाला. अभिमानही वाटला.
असाच आनंद व अभिमान सुरेश भट व रुपाताई कुलकर्णींनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे कळले तेव्हा झाला होता.
पण आता मी सावध झालो. विचार करु लागलो...मला कसला आनंद झाला ? ...मला कसला अभिमान वाटला?
लक्षात आले - मीही बौद्ध आहे. स्टीव्ह जॉब्ससारख्या जागतिक कीर्तीच्या कर्तृत्ववान व्यक्तीने माझा धर्म स्वीकारला याचा हा आनंद व अभिमान होता.
समजा माझा नसलेला दुसरा धर्म स्टीव्ह जॉब्सने स्वीकारला असता तर माझ्या भावना अशा नसत्या. माझ्या बौद्ध मित्रानेही बहुधा तो SMS पाठवला नसता.
मी अजून विचार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात उपासना स्वातंत्र्य बहाल केले आहे. खरे तर भारतीयांना मिळालेला हा हक्क जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. तो मानवी अधिकारच आहे. उपासना स्वातंत्र्य हे कळत्या वयात विचारपूर्वक उपभोगावयाची बाब आहे. मग माझ्या वडिलांचा धर्म केवळ मी त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझा कसा काय होऊ शकतो ? जाणतेपणी मी विविध धर्मांचा समज घेतला व नंतर माझ्या वडिलांचा धर्म मला योग्य वाटला तर मी तो कायम ठेवेन; न पटला तर सोडेन व दुसरा पटलेला स्वीकारेन किंवा धर्महिन राहिन. खरे म्हणजे असेच व्हायला हवे. आधुनिक काळात 'जन्मजात धर्म' हा प्रकार असता कामा नये.
मला वाटते, स्टीव्ह जॉब्स आधुनिक आहे. त्याने 'जन्मजात धर्म' ही संकल्पना नाकारली व त्याला पटलेल्या धर्माचा जाणतेपणी स्वीकार केला. पूर्वजांकडून आलेली उपासना नाकारुन स्वतःला पटलेल्या उपासनेचे स्वातंत्र्य बजावणे ही मोठ्या धैर्याची गोष्ट असते. स्टीव्ह जॉब्स, सुरेश भट, रुपाताई कुलकर्णी आणि मुख्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे धैर्य दाखवले.
स्टीव्ह जॉब्सने माझा धर्म स्वीकारला म्हणून नव्हे, तर त्याला पटलेला धर्म स्वीकारायचे धाडस दाखवले, याचा आनंद व अभिमान वाटायला हवा.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Tuesday, April 19, 2016

सोहळ्याबरोबर चिकित्साही करुया


आज बाबासाहेबांची १२५ वी जयंती. आज सुरु होणारा दिमाखदार सोहळा पुढचा आठवडा-खरं म्हणजे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे दीड महिने चालणार आहे. गेले दोन महिने प्रचंड उत्साहात तयारी चालू होती. कुठे १२५ फुटी भला थोरला कटआऊट, कुठे १२५ फुटी रांगोळी, झगमग रोषणाई, मिरवणुकीसाठी डीजेवाल्यांना ऑर्डर, आठडाभराच्या करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी टीव्ही-सिनेमा फेम गायक-वाद्यवृंदांना सुपाऱ्या याची काय लगबग सुरु होती! आजपासून या तयारीचा, तयारी करणाऱ्यांच्या प्रचंड ऊर्जेचा आविष्कार सुरु होणार. या साऱ्यातून बाबासाहेब किती महान होते, हे सतत दुमदुमत राहणार. पण महान म्हणजे नक्की काय होते, त्यांची शिकवणूक समाज आज कशी अमलात आणतो आहे, आपल्यात कोणत्या उणिवा राहिल्या आहेत, कोणती नवी आव्हाने समोर आहेत, त्यांना बाबासाहेबांच्या विचारप्रणालीतून कसे तोंड द्यायचे...या बाबींचा आढावा, मूल्यांकन केले जाईल का? खात्रीने हो म्हणता येणार नाही. याला कारण आंबेडकरी चळवळीची वाताहत. दिशाहिनता. कधी नव्हे एवढी ही वाताहत आपल्या उद्धारकर्त्याच्या १२५ व्या जयंतीवेळी झालेली पाहायला मिळते आहे. वास्तविक, हीच वेळ आत्मचिकित्सेची मानायला हवी. कठोरपणे स्वतःला तपासायला हवे आणि पुढची दिशा व कार्यक्रम आखायला हवा. तरच बाबासाहेबांचा हा शतकोत्तर रौप्यमहोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल. सोहळा व चिकित्सा एकाचवेळी होऊ शकते. जे कोणी असे करु इच्छितात, त्यांच्यासाठी नमुन्यादाखल हे काही मुद्दे:
आंबेडकरी समूहात जे काही बदलते आहे, ते सर्वस्वी त्याचे वैशिष्ट्य नाही. भोवतालच्या समाजात जे वारे वाहते आहे, ते त्याच्याही काना-डोक्यात शिरत आहे. शिवाय काही बाबी खास त्याच्या स्वतःच्याही आहेत. गणपती-दहिहंडी-शिवजयंतीला जर २४ बेस डिजेच्या तालावर लोक बेहोश होत असतील, फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईचा झगमगाट हेच उत्सवाच्या यशस्वीतेचे मानदंड ठरत असतील; तर मग आंबेडकर जयंतीही त्याच मानदंडांवर साजरी होणार. सगळंच आवाजी-झगमगाटी असेल, तर जयंतीही तशीच असणार. इतर जर कायदा उल्लंघत असतील, तर मग आम्ही का मागे सरायचे, ही बेफिकीरी येते. अजूनही दलित-आंबेडकरी समुदायाच्या वाट्याला अत्याचार, अवमान, दुजाभाव येत असल्याने या बेफिकीरीला विद्रोहाचाही एक आयाम असतो, हे विसरुन चालणार नाही.
पण त्यामुळे हे योग्य ठरत नाही. ते सिगरेट ओढतात-दारु पितात ते चालते; मग मी हे केले तर काय वावगे झाले, हे समर्थन गैर आहे. जे कोणालाच हितावह नाही, ते दुसरा करतो म्हणून आपण करण्याने आपल्याला हितावह ठरत नाही.
हे लिहिताना जुन्या काळी सगळं कसं आदर्श होतं आणि आताच सगळं ढासळत चाललं आहे, असा माझा आविर्भाव मुळीच नाही. आवाजाचे-रोषणाईचे तंत्र व आर्थिक क्षमता आजच्याच तेव्हा असत्या तर डीजे व थाटमाट तेव्हाही दिसणे अशक्य नव्हते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १४ तारीख सुरु झाली की लाऊडस्पीकरचे भोंगे जे उद्धरली कोटी कुळे-भीमा तुझ्या जन्मामुळेगायला लागायचे त्याने बिगर आंबेडकरी माणसाची खाडकन झोपच उडायची. ती त्या रात्री तरी पुन्हा लागणे कठीण होते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहत, ते आम्ही त्या समाजाचे होतो म्हणून. आम्ही कोणी, खास करुन मुले त्या रात्री झोपतच नसू. पताका लावणे, भिंतीवर बाबासाहेबांच्या प्रतिमा रंगवणे, मंडपात पाणी मारणे, फलकावर जयंतीचा कार्यक्रम लिहिणे यात आम्हाला परमानंद मिळायचा. आता ही अनेक कामे पैश्यांनी आऊटसोर्स केली जातात.
फरक पडला आहे, तो प्रेरणांत. विचारांत. जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी अत्त दीप भव (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, सब्बे सत्ता सुखि होन्तु च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे...या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.
या प्रेरणा, जाणिवा आता आहेत, असे दिसत नाही. किमान सार्वत्रिक तरी नक्की नाहीत. अर्थात आमच्या वेदनांचा अनुभव वा त्यांची तीव्रता आताच्या मुलांमध्ये नाही, हेही कारण आहेच. पण नफा-नुकसानीच्या भाषेत बोलायचे, तर आर्थिक-भौतिक अभावग्रस्ततेत लक्षणीय घट झाली असली तरी जाणिवांचे दारिद्र्य हे खूप मोठे नुकसान आहे. बैलगाडीत बुद्ध-बाबासाहेब-फुल्यांच्या प्रतिमा व लेझिम अशा मिरवणुकांच्या जागी डीजेचा आवाजी, झगमगाटी बदल हे एकवेळ चालू शकेल. पण त्यावेळी होणाऱ्या व्याख्यानमाला आता अपवादानेच होतात. आंबेडकर, गांधी, मार्क्स यांतील मतभेद कोणते, मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी स्वीकारण्यामागचे कारण काय, देवाची पूजा आणि बुद्धाची पूजा यातला फरक, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले यांचे प्रतीकात्मक अर्थ, मंगळसूत्र घालायचे की नाही, कुंकू लावायचे की नाही...अशा चर्चांनी तेव्हा रात्री उजाडायच्या. बोलणारे बोलायचे. बाकीचे रस घेऊन ऐकत असायचे. आताच्या मुलांना हे प्रश्न ग्रासतात, असे दिसत नाही. स्मार्ट फोनवर बाबासाहेबांची पूजा बांधणारे अविवेकी संदेश, फोटो मात्र शेअर होत असतात. विभूतिपूजेच्या विरोधात असलेल्या बाबासाहेबांची गर्व से कहोचालीवर यथासांग डिजिटल पूजा होत असते. एक जीवनप्रणाली, जीवन व चळवळ उन्नत करण्याचे वैचारिक साधन याअर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, असे म्हटले होते. आज त्याला व्यवस्थित धर्माचे स्वरुप आले आहे. त्याच्याविषयी थोडे अधिक बोलू.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबरला दिली आणि जेमतेम दीड महिन्यात ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्माच्या आचरणाविषयी त्यांना नीट आखणी करायला तसा वेळच मिळाला नाही. काही तयारी त्यांनी आधीपासून केली होती. त्यामुळे किमान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ सिद्ध झाला. विधिंविषयी वगैरे काही भाषणांत उल्लेख केलेले होते. त्या सगळ्याबाबत बाबासाहेबांच्या नंतरच्या नेत्यांनी एकवाक्यतेने काही ठरवायला हवे होते. राजकीय बाबतीतला त्यांचा कर्मदरिद्रिपणा इथेही दिसतो. धार्मिक संस्था निघाल्या. पण त्याही बव्हंशी राजकीय पंखाखालीच राहिल्या. धार्मिक बाबतीत दिशादिग्दर्शन करणारी आंबेडकरी बौद्धांची मध्यवर्ती मान्यता असलेली एकच एक संस्था नाही.
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे काही ठिकाणी ग्रंथ लावल्यासारखे पठन केले जाते. या ग्रंथाची पारायणे केलेले लोक मला भेटतात. पण या ग्रंथातला नेमका एक भाग वाचायचा विसरतात, तो म्हणजे परिचय. ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या या छोटेखानी परिचयात बाबासाहेब बौद्ध धम्माच्या प्रसारात ज्यामुळे अडथळा येतो असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करत नाही. फक्त एकच करतो. तो म्हणजे भिख्खू संघाचा. त्यांच्या काळातील पारंपरिक भिख्खूंचे ऐषारामी राहणे त्यांना खटकत असे. भिख्खूंचे समाजापासून तुटणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक कारण ते समजत. ते भिख्खूंच्या भूमिकेविषयी साशंक होते. तो एक पूर्णपुरुष असेल तर समाजाला त्याचा काही उपयोग नाही, भिख्खू हा सामान्य माणसाचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असायला हवा, असे ते या परिचयात म्हणतात. त्यांच्या दृष्टीने तो एक पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो उच्चासनावर बसणारा, विधी लावणारा पुरोहित नव्हे. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षासमारंभात महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः पत्नीसह दीक्षा घेऊन परंपरेशी नाते जोडले. मात्र समोरच्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणींच्या हस्तेच समाजाला दीक्षा दिली असती, तर दीक्षा किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी भिख्खूचीच गरज असते, असे समाजाला वाटले असते व एक नवा चिवरधारी पुरोहित तयार झाला असता, असे बाबासाहेबांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणीही उपासक कोणतेही विधी लावू शकतो. त्यासाठी भिख्खूची गरज नाही, हे सूत्र त्यांनी इथे समाजाला दिले. दीक्षा समारंभाला लाखो लोक होते. पण सगळा समाज काही तेथे नव्हता. त्याला कोण दीक्षा देणार? त्यासाठी दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले.  माझ्या वडिलांनी मुंबईच्या कामगार मैदानात झालेल्या दीक्षा समारंभात बॅरिस्टर भंडारेंच्या हस्ते दीक्षा घेतली.
आजही विधी लावण्याचे काम सामान्यांतलाच एकजण विधिकर्ता (बौद्धाचार्य असे चुकीचे नाव त्याला पडले आहे) म्हणून करतो. तथापि, थोडी अर्थसंपन्नता आलेला यजमान यासाठी भिख्खूला पाचारण करण्यात, त्याला उच्चासनावर बसवून, मंतरलेला धागा मनगटात बांधून विधी करण्यात प्रतिष्ठा मानताना दिसतो आहे. त्याचे अनुकरण मग सामान्य आर्थिक कुवतीचाही माणूस करताना आढळतो. बुद्धविचारांचे मार्गदर्शन, प्रवचन, प्रचार-प्रसार याच कामाला पूर्ण वाहून घेण्याऐवजी अशा विधी लावण्याच्या व त्यायोगे भरभक्कम दान प्राप्तीच्या कामांत भिख्खूंचे जथे सामील होताना दिसू लागले आहे. वंदामि भन्तेतील ज्येष्ठ मित्राला आदरार्थी करावयाच्या संबोधनात आता लीनता येऊ लागलेली आहे. यथावकाश भिख्खूंचे ऐषारामी मठ उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये. लग्न साधेपणाने करावयाचा बाबासाहेबांचा संदेशही उधळला जावू लागला आहे. थाटमाट व प्रतिष्ठेचे सगळे संकेत खास करुन मध्यम व उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरी समुदायांत रुजायला सुरूवात झाली आहे. बुद्धाने प्रचारासाठी संस्कृतऐवजी पाली ही लोकभाषा निवडली. आज पाली लोकभाषा नाही. तरी विधिची सूक्ते पालीतच म्हटली जातात. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. पण काहीही कळले नाही तरी पालीत म्हणण्यालाच आज प्रतिष्ठा आहे.
प्रत्येक रिपब्लिकन गट म्हणतो माझा पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित आहे. एकजातीय नव्हे, तर व्यापक समाजाचा, लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना स्पष्ट करणारे बाबासाहेबांचे खुले पत्र (पहाः डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०) वाचण्याचा व त्याप्रमाणे आपले रिपब्लिकन गट वागत आहेत का, हे तपासण्याचे आपले काम आहे. आजवर नसेल झाले. पण आतातरी ते करुन आपली राजकीय चळवळ सबल करुया. सत्तालाभाच्या किरकोळ तुकड्यांसाठी प्रस्थापित पक्षांसमोर (काही तर घटना उध्वस्त करु पाहणाऱ्यांशी सोयरिक करुन) लाचार होणाऱ्या रिपब्लिकन नेतृत्वाला बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील कोणत्या मुद्द्याला धरुन तुम्ही ही सौदेबाजी करत आहात, असा जाब समाजाने आतातरी विचारायला हवा.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लेखाची मर्यादा लक्षात घेता हे मुद्दे नमुन्यादाखल आहेत. समाज विचार करायला बसला तर असे अनेक मुद्दे नोंदवता येतील. शेवटी एकच आवाहन करतो. राज्यात, विशेषतः मराठवाड्यात भयंकर दुष्काळ पडला आहे. जयंतीच्या निधीचा १० टक्के हिस्सा आपण या दुष्काळ निवारणाच्या कामाला (किमान तेथील दलित वस्त्यांना तरी) देऊया. बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रास्ताविकात खास भर देऊन नोंदवलेल्या बंधुता या तत्त्वाचा आम्ही अंगिकार करतो याचा महाराष्ट्राला परिचय देऊया.
-     सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Monday, April 4, 2016

समन्वयाचा आग्रह नको; परस्परपूरकत्व शोधू


गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रीय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय? हे वाद ऐतिहासिक आहेत. ते तीव्र आहेत. त्यांचा निरास होण्याची सुतराम शक्यता नाही. मग तरीही या तिघांना एकत्र गुंफण्याचे कारण काय? हो. कारण आहे. या तिघांच्या उद्दिष्टांत सामायिक असणाऱ्या काही महत्वाच्या उद्दिष्टांना जोरदार धडका देणारी त्सुनामी सध्या उसळली आहे. जे सामायिक आहे, त्याच्या रक्षणासाठी या तिघांच्या वारसदारांनी एकजुटीत येणे ही काळाची गरज आहे. यात प्रत्येकाने आपल्या वैचारिक भूमिका पातळ करण्याचा, सोडण्याचा प्रश्न येत नाही. तसेच जे सामायिक आहे, त्यासाठी या तिघांच्या तत्त्वज्ञानाचा, वैचारिक भूमिकांचा समन्वय करत बसण्याचीही गरज नाही. गरज आहे ती केवळ परस्परपूरकता शोधण्याची. हा शोध मात्र प्रामाणिक व पारदर्शी असायला हवा. त्यात कोण कोणाला आपल्याकडे खेचते आहे, फशी पाडून आपल्या गोटात आणते आहे, असे वाटता कामा नये. खरं म्हणजे, आपल्याला खेचले जाते आहे, फशी पाडले जाते आहे, ही भावना आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्येच प्रकर्षाने आहे. आणि ती निराधार नाही.

बाबासाहेबांचे भारताच्या राजकीय क्षितिजावर आगमन झाले, त्यावेळी गांधीजींचा सूर्य मध्यान्ही तळपत होता. बाबासाहेबांनी या सूर्याला आव्हान देणे, हे प्रचंड धाडसाचे व पराकोटीचे दडपण आणणारे होते. ते त्यांनी केले. वर्णाश्रमधर्माचे पाठीराखे महात्मा गांधी अस्पृश्यता नष्ट करुन हिंदूधर्म स्वच्छ करु पाहत होते. स्वातंत्र्य चळवळीतील आपल्या अन्य सहकाऱ्यांची प्राधान्यक्रमाविषयी नाराजी असतानाही अस्पृश्यताविरोधी जागरण हे राजकीय लढ्याचे अभिन्न अंग त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी अपार कष्टही घेतले. बाबासाहेबांनी हिंदू धर्मावरच आघात चढवले. हिंदूधर्मातील जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यांना मुक्ती नाही, अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच, सार्वजनिक तळी, मंदिरे खुली करण्याच्या सत्याग्रहांनंतर जोवर हिंदू धर्म आहे, तोवर जाती असणार, जाती असणार तोवर अस्पृश्यता असणार या निष्कर्षाला ते आले. हिंदूधर्म त्यागणे हाच त्यांना उपाय वाटला. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसहित बौद्ध धम्म स्वीकारला.

गांधी-आंबेडकरांतील या वादाचा त्यांच्या काळात त्यांनी निरास केला नाही, तो त्यांच्या मृत्युनंतर कसा करायचा? हे त्यांच्यातील वैचारिक मतभेद होते. ते आजही कबूल करावेच लागतील. त्यांच्या वारसदारांतही ते राहतील. ते तसेच व तेवढेच तीव्र राहतील असे नाही. गांधींची वर्णाश्रमधर्माची व जातिव्यवस्थेबाबतची मते आजच्या गांधीवाद्यांना मान्य आहेत, असे नव्हे. पण गांधीजींना अभिप्रेत उन्नत मूल्यांवर आधारलेला सनातन हिंदूधर्म हा कट्टर हिंदुत्वाची घोडदौड रोखण्यासाठी पर्याय आहे, असे त्यांना वाटू शकते. या दोन्ही बाबी आंबेडकरी कार्यकर्त्यांना अमान्य असू शकतात.

काही ऐतिहासिक बाबींचे मात्र आज मापन करुन कोण बरोबर कोण चूक हे ठरवता येणे कठीण असते. त्यातील एक पुणे करार. तेव्हा मी असतो तर कोणाच्या बाजूने उभा राहिलो असतो? अर्थात बाबासाहेबांच्या बाजूने. याचे कारण मी दलित आहे. आपल्या अवनत अवस्थेला राजकीय अधिकारांच्या सहाय्याने नष्ट करण्याची आता नाही तर कधीच नाही अशा कोटीतली ती संधी होती. ही संधी घेणे म्हणजे ब्रिटिशांचे पाठीराखे होणे नाही. आम्हालाही देश स्वतंत्र होणे हवे आहे. पण देशाला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही पारतंत्र्यात राहणे आम्हाला मंजूर नाही.

पण मी सवर्ण व स्वातंत्र्य चळवळीतील एक कार्यकर्ता असतो तर? नक्कीच गांधीजींच्या बाजूने असतो. आधीच मुस्लिम लीगने मुस्लिमांना अलग करुन स्वातंत्र्य चळवळीत खिंडार पाडलेले असताना अस्पृश्यांसाठी  स्वतंत्र मतदारसंघाद्वारे हे दुसरे खिंडार पाडणे म्हणजे स्वातंत्र्याचा लढा कमजोर करणे होय, ही माझी भूमिका असती. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देऊनही दलितांचे उत्थान साधता येईल. आणि देश स्वतंत्र झाल्यावर तर आपण हे सगळे करुच. आज आपली जूट टिकविणे कळीचे आहे. दलित म्हणून माझा जो अनुभव पारतंत्र्यातील इंग्रजांच्या कायद्याच्या राज्यात भोवतालच्या सवर्णांबाबत होता, तो पाहता याच सवर्णांच्या हातात सगळी सत्ता आल्यावर आमचे काय होईल, ही बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहणाऱ्या माझी भीती होती.

अशा वातावरणात बाबासाहेब व गांधीजी या दोहोंच्या अनुयायांना परस्परांच्या नेत्यांविषयी चीड येणे हे अगदी स्वाभाविक आहे, हे मात्र काळाच्या या टप्प्यावर समजून घेणे शक्य आहे. गांधीजींसारख्या देशाचे आराध्य असलेल्या नेत्याचे उपोषणाद्वारे प्राण गेल्यास होणारा देशभरच्या दलितांवरील परिणाम लक्षात घेऊन बाबासाहेबांनी माघार घेणे, स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा कबूल करणे यापेक्षा प्राप्त स्थितीत उत्तम निर्णय कोणता असू शकला असता, हे मला कळत नाही.

या निर्णयाविषयी बाबासाहेब म्हणतात- हिंदूंना करार आवडला नाही आणि अस्पृश्यांना तो अनुकूल नव्हता. असे असतानाही दोन्ही पक्षांनी पुणे कराराला मान्यता दिली.

ही दोन्ही बाजूंची माघार व सन्मान्य तडजोड असली तरी दलितांना हा पराभव वाटणे व त्यातही दलित म्हणून या पराभवाची वेदना अधिक जाणवणे हे स्वाभाविक आहे. काहींना हा पराभव आजही बोचत राहणे हेही मला समजू शकते. पण वर्तमानाच्या आजच्या टप्प्यावर त्यातच अडकून पडणे व गांधीजींना शिव्या देणे हे गैरवाजवी आहे. या शिव्या देण्यात हा करार करणाऱ्या बाबासाहेबांचाही आपण उपमर्द करतो, हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. या बाबी ऐतिहासिक संदर्भात पाहणे नाकारल्याने मित्रशक्ती गमावून आपणच आपली ताकद खच्ची करत असतो.

गांधीजींशी बाबासाहेबांचे मतभेद काय होते, ते किती तीव्र होते, हे आपण पाहिले. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य काँग्रेसला मिळालेले नसून देशाला मिळाले आहे आणि म्हणून पहिल्या मंत्रिमंडळात देशातील विविध राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधीत्व असायला हवे ही भूमिका घेण्यात गांधीजींचा पुढाकार होता. बाबासाहेबांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींची होती, असे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते, असेही हे इतिहासकार म्हणतात. लखलखीत गुणवत्तेमुळेच बाबासाहेबांना हा बहुमान मिळाला, हे उघडच आहे. तथापि, राष्ट्रीय हिताचा विचार करताना मतभेद आड येऊ देता कामा नये, या गांधीजींच्या भूमिकेचा यथोचित आदरही करायला हवा.

ज्या मूल्यांवर आधारित संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब हवे असे गांधीजींना वाटत होते, ती मूल्ये या दोघांची समान होती. संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद झालेली ती हीच दोहोंची सामायिक मूल्ये. जर त्या काळात तीव्र मतभेद असतानाही या सामायिक मूल्यांसाठी ते एकमेकांना सहकार्य करत होते, एकत्र काम करत होते, तर आज ही मूल्ये धोक्यात आलेली असताना त्यांच्या वारसदारांनी परस्परांत तसेच सहकार्य का करु नये? बाबासाहेबांनी जर त्यावेळी गांधीजी किंवा नेहरु यांच्या सगळ्या भूमिका पटल्या तरच मी घटना लिहीन अशी अट ठेवली नाही किंवा गांधी-नेहरुंनी बाबासाहेबांकडून ठेवली नाही, तर आपण तरी ती आज का ठेवावी? ते जसे परस्परपूरक राहिले, तसेच आपणही राहू शकतो.

काठमांडूचे बाबासाहेबांचे भाषण बुद्ध आणि मार्क्स यात बाबासाहेबांनी मार्क्स व बुद्धाचे लक्ष्य एक असले तरी मार्ग वेगळे आहेत, मार्क्सचा मार्ग हिंसेचा आहे, बुद्धाचा अहिंसेचा आहे, म्हणून तो अधिक योग्य आहे, अशी मांडणी केली आहे. मूळ मार्क्सने काय म्हटले यापेक्षाही मार्क्सवादी क्रांत्यांतील रक्तरंजित व्यवहार बाबासाहेबांना आक्षेपार्ह वाटतो. देशातील कम्युनिस्टांनी जातीच्या लढ्याला दुय्यम लेखणे, जातिव्यवस्था ही फक्त श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे हे लक्षात न घेणे यावर बाबासाहेबांचा आक्षेप आहे. ५२ च्या निवडणुकीतील मते कुजवा या डांगेंच्या आवाहनाने बाबासाहेबांच्या पराभवाला जो हातभार लागला, त्याने कम्युनिस्ट व बाबासाहेब यांच्यातली दरी अधिकच रुंदावली.

बाबासाहेब संसदीय लोकशाहीचे भोक्ते, तर कम्युनिस्टांनी आपद्धर्म म्हणून तीस मान्यता देणे (काही कम्युनिस्ट गटांना तर हा आपद्धर्मही मान्य नाही.) हा मोठा तात्त्विक मतभेद दोहोंत होता. आजही तो आहे. पण कम्युनिस्टांकडून आंबेडकरी जनतेशी संबंध जोडताना त्याबाबत स्पष्ट व पारदर्शक मांडणी होताना दिसत नाही. मतभेद स्पष्ट नोंदवून स्वतंत्र मजूर पक्षकाळातील बाबासाहेबांचे सर्व कष्टकऱ्यांना एकवटणाऱ्या आंदोलनाच्या स्मृती जागवून त्यावर एकत्र येणे म्हणजेच दोघांतले सामायिकत्व शोधणे होय. हे होत नसल्याने सतत संशयाचे भुंगे आंबेडकरी कार्यकर्त्यांचे मन कुरतडत राहतात.

बरे, यात काहीजण चलाखीने बाबासाहेब व गांधीजींच्या मतभेदाचा वापर करतात. गांधीजींची अहिंसा बाबासाहेबांना मान्य नव्हती, असे म्हणत वर्गशत्रूचा निःपात करताना हिंसा आवश्यकच असते, याला जणू बाबासाहेबांची संमतीच आहे, असे भासवतात. आपल्या प्रचारसाहित्यात बाबासाहेबांची एका हातात घटना व दुसऱ्या हाताचे बोट उंचावलेली प्रचलित प्रतिमा किंचित बिघडवतात. उंचावलेल्या बोटाच्या जागी वळलेली मूठ दाखवतात. यातून सनदशीर लोकशाहीऐवजी व्यवस्था उलथवणाऱ्या विद्रोहाचा संदेश बाबासाहेबच देत आहेत, असा आभास तयार होतो. यांच्या कलापथकाचा वेश निळा असतो, पण गाणी मात्र जहाल क्रांतीची असतात. कष्टकऱ्यांच्या, पिडितांच्या न्यायासाठी त्यागपूर्वक लढणाऱ्या या जहाल कम्युनिस्टांकडे आंबेडकरी समूहातील कोवळी तरुण मुले आकर्षित होत असतात. बाबासाहेबांच्या मूळ साहित्याचा परिचय नसल्याने व एकूण आंबेडकरी चळवळ विशीर्ण-विदीर्ण झालेली असल्याने या जहाल मंडळींबाबत समाजासाठी काही करु इच्छिणाऱ्या आंबेडकरी युवकांना आपलेपणा वाटणे स्वाभाविक आहे. या मुलांतील काहींचा प्रवास मग अधिक जहाल कारवायांकडे होतो. काही क्रमात जाणते होऊन तो मार्ग पकडतात. काहींना फसगत झाल्याचे उशीरा कळते. काही परततात. काहींचा परिस्थितीनेच परतीचा मार्ग बंद होतो. भल्या उद्दिष्टासाठी का होईना पण माणसाच्या माणूसपणाला कमी लेखून त्याला साधन म्हणून वापरण्याची ही रीत मला क्रूर व अनैतिक वाटते.

मार्क्स, गांधी, आंबेडकर ही माणसे होती. त्यांच्या मांडणीला कमीअधिक काळाच्या मर्यादा पडू शकतात. त्यांच्या मांडणीतील जे आता गैरलागू असेल ते सोडणे, उपयुक्त असेल ते टिकवणे व काहींचा विकास करणे यातूनच वर्तमान आव्हाने पेलण्याचा विचार व कार्यक्रम मिळू शकतो. ही ऐतिहासिक दृष्टी व संदर्भ हरवले की महामानवांना देवत्व व पावित्र्य येणे सुरु होते. त्यांच्या मांडणीवर कोणी टीका केली की त्यांचे अनुयायी (एव्हाना ते भक्त झालेले असतात) खवळून उठतात. गांधी या बाबत सुदैवी आहेत. त्यांच्यावर कोणीही कशीही टीका करु शकतो. त्यांचे विडंबन करु शकतो. मार्क्सही टीकेला-चिकित्सेला पात्र होतो, त्यामुळे तोही तसा भाग्यवान आहे. बाबासाहेब मात्र अत्यंत दुर्दैवी आहेत. विचारवंताला त्याच्या आयुष्यातच चांगला टीकाकार मिळणे, हे भाग्याचे असते, असे मानणाऱ्या बाबासाहेबांना हे भाग्य त्यांच्या समाजाने मिळू दिलेले नाही. पर्यायाने, त्यांच्या मांडणीचा विकास होऊ दिलेला नाही. संभाजी भगतांच्या गाण्याचा आधार घेऊन म्हणायचे तर भीम पुतळ्यात बंद केला बाई!’

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतरची आंदोलने व कन्हैयाच्या संदर्भातली आंदोलने यात निळा-लाल सहकार्याची मांडणी होऊ लागल्यावर आंबेडकरी समुदायातील एका शिक्षित विभागात अस्वस्थता पसरु लागली. (उदित राज व आठवले हे आंबेडकरी बाण्याचे नेते भाजपला मिळाले व खासदार झाले यामुळे येणारी अस्वस्थता ही या तुलनेत अगदीच मामुली.) काहींना हे नेहमीप्रमाणे बामणी कारस्थान वाटले. त्यासाठी कन्हैयाच्या जातीचा खरा-खोटा शोध घेतला गेला. काहींना संघपरिवाराचा धोका लक्षात घेता कन्हैयाने दिलेले आव्हान आश्वासक  वाटले. पण त्याच्या घोषणेतील जयभीम-लाल सलाम ही संयुक्तता त्यांना रुचली नाही. कम्युनिझम हा निकामी (काहींच्या मते धोकेदायक) आहे, तो सोडून कन्हैया आंबेडकरवादाकडे येत असेल तरच आम्ही त्याचे स्वागत करु. इथे आंबेडकरवाद हीच जगाला तारणारी एकमेव विचारसरणी आहे, तिच्याकडेच सगळ्यांनी आले पाहिजे, अन्य पुरोगामी विचारधारांशी तिची जूट बांधणे हा बाबासाहेबांच्या विचारांशी द्रोह आहे, हे गृहीत आहे. खरं म्हणजे, आपले तेच श्रेष्ठ मानणारी ही भूमिका हाच आंबेडकरवादाशी द्रोह आहे.

ही अहंता व कर्मठपणा यापासून आजादी, मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखणे आणि आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे हा संकल्प बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने आपण करायला हवा. कन्हैया कशाकशापासून आजादी हवी आहे, त्याच्या घोषणा देतो आहे. ही आजादी प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या वाटेवर असा हा संकल्प एक सशक्त पाऊल नक्की ठरेल.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, एप्रिल २०१६

Thursday, March 24, 2016

कायद्याचा ‘आधार’, संकेतांचा भंग


आधार म्हणजे व्यक्तीला तिच्या ओळखीचा १२ अंकी क्रमांक देण्याची नंदन नीलकेणी या नामांकित माहितीतंत्रज्ञाच्या कल्पनेतून साकारलेली योजना. हा क्रमांक देशात दुसरा कोणाचाही नसेल. म्हणजेच ही ओळख एकमेवाद्वितीय असेल. विविध योजना, अनुदाने यांच्या लाभासाठी लाभार्थ्याची ओळख सिद्ध करणारी तसेच हा लाभ ती व्यक्ती एकापेक्षा अधिक ठिकाणांहून घेत नाही, याची खातरजमा करण्यासाठी उपयुक्त अशी माहिती तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था. व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, त्याचे छायाचित्र, हाताचे ठसे व डोळ्यांच्या बुब्बुळांच्या संगणकीय प्रतिमा एवढी माहिती घेऊन हा क्रमांक व व्यक्तीचे छायाचित्र असलेले कार्ड-ओळखपत्र तिला दिले जाते. यासाठी नाव, वय, पत्ता यासाठीचा जो उपलब्ध पुरावा असेल तो घेतला जातो. कागदोपत्री पुरावा नसल्यास अन्य मार्गांनी तिच्या ओळखीची पूर्तता केली जाते. समाजातल्या दुबळ्या समूहांतील व्यक्तींना या आधार कार्डाचा खूप उपयोग होतो आहे. आपलीही काहीतरी ओळख आहे, काहीतरी सरकारी कार्ड आपल्याकडे आहे ही भावना त्यांना मानसिक आधारही देणारी आहे. सरकार, पोलीस अशा अनेक ठिकाणी त्यांना आता धीराने जाता येते. आधारची पूर्णत्वाने अंमलबजावणी सुरु होईल तेव्हा अनुदाने, लाभ याचा गैरवापर रोखल्या जाऊन सरकारी खर्च वाचेलच; शिवाय संगणकीय प्रणालीमुळे लाभार्थी व्यक्तीला आपले लाभ कोठूनही घेता येण्याची शक्यता तयार होईल. काही वाजवी शंका या योजनेबाबत असल्या तरी तिचे लाभाचे पारडे निश्चित जड आहे.

२००९ ला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पुरोगामी आघाडी सरकारने आणलेली व्यक्तीच्या ओळखीसाठीची ही योजना त्यांच्या कट्टर विरोधकानेच-भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अखेर गेल्या बुधवारी कायद्यात रुपांतरित केली. प्रारंभापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला मुद्दा तूर्त तरी शांत झाला. पुन्हा कोणी न्यायालयात गेले व या कायद्याच्या प्रक्रियेलाच आव्हान दिले नाही म्हणजे झाले!

हो. याला कारणही तसेच आहे. प्रचंड बहुमतातील भाजप सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे. लोकसभेत संमत झालेले हे विधेयक राज्यसभेत अडकू शकते म्हणून सरकारने त्याला धनविधेयकाचा साज चढवला व राज्यसभेच्या मान्यतेच्या अटीतून पळवाट काढली. सरकारची ही कृती बेकायदेशीर आहे, असा आरोप ठेवायला इथे पुरेपूर अवकाश आहे. एकतर, हे विधेयक आधार (आर्थिक तसेच अन्य अनुदाने, लाभ व सेवा यांचे लक्ष्यित हस्तांतर) विधेयक, २०१६ या नव्या नावाने आले असले तरी मूळातील राष्ट्रीय ओळख प्राधिकरण विधेयक, २०१०या काँग्रेस आघाडी सरकारच्या विधेयकाचेच ते सुधारित रुप आहे. काँग्रेस आघाडी सरकारने आणलेल्या योजनेतून ९८ कोटी लोकांना ओळखीचे क्रमांक व कार्डे आतापर्यंत मिळाली आहेत. याच प्रक्रियेला कायद्याचा आधार देऊन भाजप सरकार ती पुढे चालू ठेवणार आहे. म्हणूनच, जर काँग्रेस सरकारने आणलेले विधेयक धनविधेयक नव्हते, तर भाजप सरकारने आणलेले त्याचसंबंधातले हे विधेयक धनविधेयक कसे काय होऊ शकते, ही रास्त शंका आहे. राज्यसभेतील नामुष्की टाळण्यासाठीच केवळ ही चलाखी आहे, हे अगदी उघड आहे.

व्यक्तीचे खाजगी तपशील गोळा करणारी एवढी मोठी योजना कोणताही कायद्याचा आधार नसताना सरकार कसे काय राबवू शकते, असा काँग्रेस सरकारवर भाजपचा आरोप होता. हा आरोप योग्य होता. आज पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी तेव्हा या आरोपात आघाडीवर होते. आपली चूक दुरुस्त करण्यासाठी काँग्रेसने २०१० साली याला कायदेशीर आधार देण्यासाठीचे विधेयक आणल्यावर राज्यसभेत विविध आक्षेपांनी टोलवण्यात, यशवंत सिन्हांच्या अध्यक्षेतेखालील संसदीय समितीकडे चिकित्सेसाठी सोपवून त्याचे वाभाडे काढून ते लटकवण्यात हेच भाजपवाले जोरात होते. कारण राज्यसभेत काँग्रेस अल्पमतात होती. भाजपच्या पाठिंब्याशिवाय तिथे हे विधेयक मंजूर होणे शक्य नव्हते. काँग्रेस आघाडी सरकारची २००९ ची योजना गेली ६ वर्षे बिनकायदेशीर चालवण्यास भाजपच जबाबदार होता. बरे, गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका बाजूला विरोध करायचा व दुसरीकडे आपल्या राज्यात त्याची मनापासून अंमलबजावणी करायची यात मोदी वाकबगार होते. गंमत म्हणजे, काँग्रेसच्या या योजनेची काँग्रेसशासित राज्यांत गती मंद आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या भाजपशासित राज्यांत ती वेगवान असे चित्र एका अभ्यास गटाबरोबर फिरत असताना मी अनुभवले आहे.

धनविधेयक राज्यसभेत मांडले जाते. चर्चा होते. पण त्यावर मतदान होत नाही. त्याप्रमाणे हे विधेयक राज्यसभेत सादर केल्यावर त्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काही आक्षेप नोंदवले. काँग्रेसकृत विधेयकात नसलेल्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी माहिती उघड करणे, खाजगी आस्थापनांनाही आधारचा उपयोग करण्याची परवानगी असणे अशांसारख्या एकूण पाच मुद्द्यांवर त्यांनी दुरुस्त्या सुचवल्या. अर्थात, त्या सर्व फेटाळून लावून भाजप सरकारने लोकसभेत आवाजी मतदानाने आपले विधेयक कोणत्याही दुरुस्तीविना जसेच्या तसे मंजूर केले. खरे म्हणजे, अशा महत्वाच्या विधेयकावर राष्ट्रीय सहमती असणे, ही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तर आवश्यक आहेच; पण तो नैतिक संकेतही आहे. काँग्रेस हे विधेयक राज्यसभेत भाजपला जशास तसा धडा शिकवण्यासाठी रोखू शकते, ही भाजपची भीती तितकीशी खरी नाही. कारण मूळात ही काँग्रेसचीच योजना. त्यांच्यामुळेच ती रोखली गेली, हा संदेश जाणे राजकीयदृष्ट्या त्यांना परवडण्यासारखे नाही. त्यांची विश्वासार्हताच त्यामुळे धोक्यात आली असती. भाजपने संसदीय संकेत मनमानी करुन उधळून लावले आहेत, हाच निष्कर्ष इथे निघतो. एका राष्ट्रव्यापी, सरकारच्या अनेक विभागांवर परिणाम करणाऱ्या व प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या योजनेला कायदेशीर करण्याच्या प्रक्रियेला हे गालबोट लागायला नको होते.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(महाराष्ट्र टाइम्स, २२ मार्च २०१६)