Friday, August 1, 2025

हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा जोखताना


या लेखात ज्याचा परिचय करुन घ्यायचा आहे, त्या पुस्तकाच्या नावातीलच एक भाग या लेखाचे शीर्षक म्हणून घेतला आहे. तेच या लेखासाठीही अन्वर्थक होईल असे मला वाटले. या पुस्तकाचे नाव आहे - हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया. लेखक आहेत धार्मिक-जातीय सलोख्यासाठी काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक, अनुवादक प्रमोद मुजुमदार. २०२२ च्या पहिल्या आवृत्तीसह या पुस्तकाच्या आतापर्यंत एकूण तीन आवृत्त्या लोकवाङ्मय गृहाने काढल्या आहेत. आणखीही निघतील. कारण या पुस्तकाचा विषय आणि त्यातून आकळणारा १०० वर्षांचा-किंबहुना त्याही आधीपासूनचा हिंदुत्ववादी राजकारणाचा आलेख खूपच उद्बोधक व रोचक आहे. हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधकांनी एवढ्या बारकाईने हिंदुत्ववादाच्या प्रवासाकडे लक्ष दिलेले नाही, हे लेखकाचे म्हणणे खरे आहे. ज्याच्या उन्मूलनासाठी लढायचे त्याच्या उगमाची कारणे, त्याच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठीचे एक सशक्त साधन या पुस्तकाद्वारे प्रगतीशील चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रमोद मुजुमदार यांनी पुरविले आहे. या पुस्तकातील माहितीसाठीचा आधार ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ इंडिया’ हा अक्षय मुकुल यांचा संशोधित ग्रंथ असल्याची नोंद देऊन ते म्हणतात, ‘हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा अनुवाद नाही किंवा त्याचे संक्षिप्तीकरण नाही. तर मूळ ग्रंथाचा आधार घेऊन केलेली स्वतंत्र मांडणी आहे.’ पुस्तकाच्या अखेरीस संदर्भ ग्रंथांच्या यादीत अक्षय मुकुलांच्या पुस्तकाबरोबरच अन्य पुस्तकांचीही यादी आपल्याला आढळते.

मुजुमदारांनी आपल्या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिला, स्वातंत्र्यपूर्व भारत – गीता प्रेसची रुजुवात; दुसरा, गीता प्रेस आणि कल्याण मासिकाची वाटचाल; तिसरा, हिंदुत्व तत्त्वज्ञान : एक वैचारिक कसरत; चौथा, हिंदुत्वाची राजकीय चढाई आणि पाचवा, ‘दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ – अन्वयार्थ. या सगळ्या भागांतील मुद्द्यांची सविस्तर नोंद देणे हा या लेखाचा हेतू नाही. मूळ पुस्तक वाचायला वाचकांनी प्रवृत्त व्हावे, यादृष्टीने काही मोजक्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

इंग्रजी अमलाखालील बदलत्या अर्थव्यवस्थेत १८८०-९० पासून मारवाडी समाजाने व्यापार आणि उद्योगात कळीचे स्थान मिळविले. (आज अग्रणी असलेली औद्योगिक घराणी याच मारवाडी समाजातील आहेत.) तत्पूर्वी ‘ब्राम्हण-क्षत्रिय’ आघाडीकडे असलेल्या हिंदू धर्माच्या प्रतिनिधीत्वात आणि नियंत्रणात मारवाडी समाजाचा शिरकाव झाला. व्यापार-उदिमासाठी देशभर विखुरलेल्या मारवाडी समाजाचे संघटन आणि त्याच्या सामाजिक स्तराचा-आध्यात्मिक मान्यतेचा मूलाधार असलेल्या सनातन हिंदू मूल्यव्यवस्थेच्या संवर्धनाची आग्रही भूमिका तो घेऊ लागला. त्यासाठीची आर्थिक संसाधने उभारणे त्याच्या आर्थिक संपन्नतेमुळे सोपे झाले. हिंदुत्वाच्या प्रसारासाठी विविध प्रकाशने त्याने सुरु केली. हिंदुत्वाच्या चिकाटीच्या प्रचार-प्रसाराचे नेतृत्व आता ‘ब्राम्हण-बनिया’ आघाडीकडे आले. हा क्रम या पुस्तकात तपशीलवार आला आहे.

याच मारवाडी समाजातील एका व्यापारी कुटुंबातील कार्यकर्ते व आध्यात्मिक विचारवंत हनुमानप्रसाद पोद्दार यांनी जयदयाल गोयंका तसेच अन्य सहकाऱ्यांसह १९२३ साली ‘गीता प्रेस’ ही प्रकाशन संस्था काढली. त्याद्वारे हिंदू धर्मविषयक विविध साहित्य प्रकाशित होऊ लागले. पुढे १९२६ साली गीता प्रेसमधूनच त्यांनी ‘कल्याण’ मासिक सुरु केले. हे सर्व साहित्य सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी त्याचे दर स्वस्त राहतील ही दक्षता घेतली गेली. हनुमानप्रसादांनी कल्याण मासिकासाठी तसेच गीता प्रेसच्या विविध प्रकाशनांसाठी आयुष्य वेचले. त्यांची जोपासना आणि प्रचंड विस्तार केला. हिंदुराष्ट्राच्या मिशनसाठी प्रचंड जिद्दीने तथापि अत्यंत लवचीकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि संसाधनांची त्यांना कधीच वानवा पडली नाही. लेखकाने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारतात हिंदू राष्ट्र तयार व्हावे हा केवळ संघपरिवाराचाच नाही, तर देशातील पारंपरिक प्रस्थापित उद्योगपतींचाही प्रकल्प असल्याने आर्थिक संसाधनांची मुबलकता हिंदुराष्ट्राच्या मिशनला कायम राहिली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिनदारीविरोध, सामान्य शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय, समाजवाद, सामाजिक समता यांचे वाजणारे पडघम संसाधनांची परंपरागत मालकी आणि सामाजिक उतरंडीत वरचे स्थान असलेल्यांना अस्वस्थ करणारे होतेच. त्यांचे हे स्थान आणि संसाधनांची मालकी धोक्यात येणार हे त्यांना दिसत होते. या धगीपासून वाचण्यासाठीचे प्रभावी साधन म्हणून गीता प्रेस, कल्याण मासिक आणि एकूणच पुराणमतवादी हिंदुत्व प्रचारणाऱ्या संघटनांना त्यांनी जोरदार साध दिली. हे सहाय्य आणि त्याही आधी हनुमानप्रसादांची चिकाटी व कष्ट यांमुळे त्यांच्या मृत्युनंतरही गीता प्रेस आणि कल्याण मासिकाचा कारभार सांभाळणारी नवी नेतृत्वं उभी राहत गेली. अलिकडेच गीता प्रेसने शंभरी पार केली. कल्याण मासिक पुढच्या वर्षी शंभर वर्षांचे होईल.

लेखक म्हणतात, ‘आज मागे वळून पाहिले तर गीता प्रेस आणि कल्याण मासिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, हिंदी भाषा शुद्धीकरणाची चळवळ, गोरक्षा समिती इथपासून पुढे इंटरनॅशनल कृष्णा कॉन्शस (इस्कॉन) अशा सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना, संस्था, प्रसार मोहिमा यांना एकत्र बांधण्याचे काम केल्याचे दिसते. सन २०१४ पर्यंत कल्याण मासिकाचे दोन लाख वर्गणीदार आणि इंग्रजी कल्याण मासिकाचे एक लाख वर्गणीदार होते. तर ७ कोटी २० लाख गीता प्रती त्यांनी वितरित केल्या. पुराणे आणि उपनिषदांच्या एक कोटी नव्वद लाख प्रती आणि ७ कोटी तुलसीरामायणाच्या प्रती वितरित केल्या गेल्या.’ भारतासारख्या अर्धशिक्षित, अशिक्षित देशात झालेला हा साहित्याचा प्रसार लेखकाने म्हटल्याप्रमाणे खरोखरच ‘अचंबित’ करणारा आहे. देशाच्या केद्रस्थानी हिंदुत्ववाद्यांची निरंकुश सत्ता मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ साली स्थापन झाली. पण त्याच्या पायाभरणीचा हिंदुत्वाचा प्रकल्प शतकभर सुरु होता. आधुनिक मूल्यांचा जागर करणारी सामाजिक सुधारणांची चळवळ आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ यांचा दबदबा आणि देशव्यापी प्रभाव असतानाही गीता प्रेस व कल्याण मासिकाचे हिंदुत्वाचे अग्निहोत्र अखंड सुरु होते. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यांतील मूल्यांचे वारसदार विघटित व दुबळे होईपर्यंत हिंदुत्ववादी मंडळी केवळ दबा धरुन नव्हती वा वळचणीला बसली नव्हती; ती अखंड सक्रिय होती. ती कायम हिंदुराष्ट्रासाठीच्या युद्धाच्या पवित्र्यात होती. युद्धतंत्रे म्हणून विविध डावपेच टाकत होती. स्वातंत्र्य चळवळीतील सौम्य हिंदुत्ववाद्यांना हाताशी धरत होती. मोठ्या कौशल्याने आपल्या कामाला काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांच्या शुभेच्छा मिळवत होती. कल्याण मासिकात त्यांना लिहायला लावत होती. स्वतंत्रपणे काम करत असल्या तरी हिंदुत्ववादी संघटना परस्परांना कायम पूरक आणि मदतनीस राहिल्या आहेत. हेडगेवारांच्या काळात संघात आलेल्या गोळवलकरांना गीता प्रेस आणि हनुमानप्रसाद यांना काही काळ सहाय्य करायला संघाने गोरखपूरला पाठवले. कल्याण मासिकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे उत्तरेत अनेक नवे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळाले. गोळवलकर पुढे संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. या सर्व मंडळींकरवी समाजमन पोखरण्याचे, आधुनिक लोकशाही, समतेवर आधारित मूल्ये समाजमनातून निरस्त करण्याचे मिशन अहर्निश सुरु होते.

गीता प्रेस व कल्याण मासिक काय प्रचारत होते, हनुमानप्रसाद वा त्यांच्या वर्तुळातील लेखक काय म्हणत होते ते दलित आणि स्त्रियांच्या संदर्भात थोडे समजून घेऊ. बाकी मुद्द्यांसाठी वाचकांनी मूळ पुस्तकच पहावे.

गीता प्रेसचे अध्वर्यू हनुमानप्रसाद हे सामाजिक समतेच्या पूर्ण विरोधात होते. अस्पृश्यतेचे ठाम समर्थक होते. ‘अस्पृश्यता पाळणे म्हणजे कोणाचाही अपमान करणे नाही. ती आमची धार्मिक रीत आहे’, ‘अस्पृश्यतेची प्रथा ही पूर्णपणे वैज्ञानिक असून त्याला धर्मशास्त्राचा आधार आहे’ अशी काही त्यांची वचने लेखकाने नोंदली आहेत. ‘गांधीजींनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा आग्रह धरणे, हा सनातन हिंदूंच्या धर्माचरणाच्या हक्कावर हल्ला आहे’ अशी स्पष्ट भूमिका हनुमानप्रसादांनी घेतल्याचेही लेखकाने नमूद केले आहे. चातुर्वर्ण्याधारित सनातन धर्म ही कल्याण मासिकाचीही भूमिका होती. लेखकाने हनुमानप्रसादांनी गांधीजींना लिहिलेल्या एका पत्राची नोंद केली आहे. त्या पत्रात हनुमानप्रसाद गांधीजींना लिहितात, ‘तुमच्या उपोषणामुळे अस्पृश्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले, अनेकांनी दलितांबरोबर सहभोजनाचे कार्यक्रम सुरु केले आहेत. तर अनेक मंदिरांनी अस्पृश्यांसाठी प्रवेश खुला केला आहे...अस्पृश्यांबरोबर सहभोजन आणि अस्पृश्यांना मंदिर प्रवेश हा हिंदू धर्मावरील मोठा हल्ला आहे. याचा काय दुष्परिणाम होईल हे त्या देवालाच ठाऊक!’ याही पुढे जाऊन पोद्दार अत्यंत कर्मठ आणि अमानुष भूमिका मांडतात. ‘अस्पृश्य जोवर अंघोळ करत नाहीत, स्वच्छ कपडे घालत नाहीत, दारु सोडत नाहीत, मृत जनावराचे मांस खाणे सोडत नाहीत, तोवर तुमच्या या ‘सहभोजनाला’ काहीही अर्थ नाही.’

पोद्दार आणि सनातनी हिंदुत्ववादी लोकांचा मुख्य टीकेचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता, असे सांगून त्या सर्व कालखंडात ‘कल्याण’ मासिकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सातत्याने अत्यंत कडक टीकेची मोहीम चालवल्याचे लेखक नमूद करतात. गांधीजींना सावध करण्याचा आव आणत पोद्दार लिहितात, ‘लक्षात घ्या, हे दलितांचे नेते (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) स्पष्टपणे म्हणत आहेत की त्यांची चळवळ ‘देवासाठी’ नाही, तर सामाजिक समतेसाठी आहे. त्यांना सरकारी नोकऱ्यांत हक्क हवा आहे...’

पोद्दारांच्या पत्राला गांधीजींनी दिलेले उत्तरही लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहे. गांधीजी म्हणतात, ‘...सनातनी सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यतेची प्रथा आणि दलितांना मंदिर प्रवेशाची बंदी या प्रथा लादून हिंदू समाजात बहिष्कृत वर्ग तयार केला आहे. हीच मुळात ‘अधार्मिक गोष्ट’ आहे आणि क्रूर प्रथा आहे. दलितांना बहिष्कृत करण्यामुळे त्यांच्यावर अस्वच्छता लादली गेली आहे. हा हिंदूधर्मावरील दोष हिंदूंनीच दूर करायला हवा. हे त्यांच्याच (हिंदूंच्या) हिताचे आहे.’

हनुमानप्रसाद, गोयंका आणि त्यांची गीता प्रेस व कल्याण मासिक हे दलितांप्रमाणेच स्त्रियांच्या अधिकारांबद्दलही अत्यंत कडवे होते. स्त्रीविषयक अनेक पुस्तिका, विशेषांक त्यांनी काढले आहेत. ‘आदर्श हिंदू नारी’ या कल्पनेचा गीता प्रेस आणि कल्याण मासिकात कायमच पुरस्कार केला गेला, असे लेखकाने म्हटले आहे. त्यांनी ‘आधुनिक शिक्षणामुळे स्त्रिया भ्रष्ट आणि नष्ट होतात, शिक्षणसंस्था म्हणजे अनैतिक संबंधांचे अड्डे आहेत, अशा स्थितीत स्त्री-पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहणे हाच योग्य मार्ग’ अशा गोयंकांच्या काही विधानांची नोंद केली आहे. मनुस्मृतीचा पुरस्कार, धर्मशास्त्रानुसार घटस्फोट अमान्य, हिंदू विवाह हा करार नव्हे-तर दोन आत्म्यांचे मीलन, घटस्फोट घेणाऱ्या स्त्रिया म्हणजे राक्षशिणी आणि जनावरासम, मातृत्वाच्या उदात्त ध्येयासाठी नवऱ्याच्या छळाकडे दुर्लक्ष करणे हितावह, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची कामेच्छा अनियंत्रित होत असल्याने मुली वयात आल्या आल्या त्यांचे विवाह करणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याला विरोध, स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे समाजाचे नैतिक अधःपतन, व्यायामामुळे स्त्रियांचा नाजुकपणा नष्ट होतो, स्त्रिया हे केवळ वंशवृद्धीचे साधन, कोणत्याही पुरुषाच्या लैंगिक भावना उद्दिपित करण्याची शक्ती स्त्रियांच्यात असल्याने स्त्रियांनी कधीही आपले वडील, भाऊ आणि मुलासोबतही एकांतात राहू नये...अशी असंख्य वचने गीता प्रेस प्रकाशित साहित्यात आणि कल्याण मासिकात नोंदली गेली आहेत.

हिंदू कोड बिलाला गीता प्रेसवाल्यांचा विरोध होणे तर अगदी स्वाभाविक होते. कल्याण मासिकात ‘हिंदू कोड : हिंदू संस्कृति के विनाश का आयोजन’ या शीर्षकाचा मोठा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याची नोंद देऊन लेखक म्हणतात, ‘सर्व सनातन हिंदू धर्म समर्थक एकजुटीने नेहरु आणि डॉ. आंबेडकरांवर तुटून पडले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध तर अत्यंत हीन पातळीवर जाऊन जहरी टीका सुरु केली. .... ‘हा स्वतः हीनवर्णीय माणूस, यांनी म्हातारपणी एका ब्राम्हण स्त्रीशी विवाह केला आणि आता आमच्या धर्मावर हल्ला करणारे हिंदू कोड बिल त्याने आणले आहे.’

गांधीजींशी डावपेचात्मक संबंध ठेवणाऱ्या हनुमानप्रसाद पोद्दारांना नंतर गांधीजी हे सनातन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गातील ‘मोठी धोंड’ आहे, असे वाटू लागल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतात. पुढे सनातनी शक्तींच्या प्रेरणेने व सहाय्याने ही धोंड नथुराम गोडसे दूर करतो. गांधीजींचा देह अचेतन होतो. पण त्यांचा प्रभाव जिवंतच राहतो. ज्यांच्याशी गांधीजींइतकेही संबंध ठेवणे हिंदुत्ववाद्यांना शक्य होत नाही, असे जवाहरलाल नेहरु पुढे दीर्घ काळ या शक्तींचे क्रमांक एकचे शत्रू राहतात. आजही आहेत. मृत नेहरुंचे भूत त्यांना कायम छळत असते.

सामाजिक समतेसंबंधीच्या हनुमानप्रसाद, पर्यायाने गीता प्रेस व कल्याण मासिक यांच्या भूमिका लेखकाने सविस्तर मांडल्या आहेत. त्यांची ओळख करुन देताना मीही त्यातला बराच भाग इथे नोंदवला आहे. याचे कारण दलितांना वश करण्याची बरीच यशस्वी खटपट करणाऱ्या, त्यासाठी हरघडी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दंडवत घालणाऱ्या आजच्या संघ-भाजपाचे मूळ वैचारिक घराणे संबंधितांना कळावे. गांधीजी आणि काँग्रेसशी बाबासाहेबांचे तीव्र मतभेद होते. पण या दोहोंत लोकशाही, समता, सामाजिक न्याय याबद्दल सहमती होती. या आधुनिक मूल्यांच्या, समतेच्या व मानवी मूलभूत हक्कांच्या विरोधात आजच्या संघ-भाजपाचे पूर्वसुरी होते. त्यामुळे त्यांना गांधी, नेहरु, काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळेच शत्रूस्थानी होते. त्यांच्या हिंदुराष्ट्राच्या मोहिमेतील हे मोठे अडथळे होते. आज अनधिकृत हिंदू राष्ट्राचा अंमल सुरुच आहे. संविधान नावापुरते राहिले आहे. तेही जाऊन येऊ घातलेल्या अधिकृत हिंदूराष्ट्राच्या पूर्ततेची दिशा रोखायची असेल तर ज्यांना ज्यांना सनातनी हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता, त्या सगळ्या लोकशाही, प्रगतीशील शक्तींची संयुक्त आघाडी होणे नितांत गरजेचे आहे. राजकीय सत्तेवरुन हिंदुत्ववादी शक्तींना बेदखल करण्यासाठीची राजकीय मोर्चेबांधणी करतानाच या शक्तींनी विषाक्त केलेल्या समाजमनाला सम्यक प्रबोधनाचा उतारा द्यावा लागेल. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यांचा वारसा असलेल्या प्रगतीशील, लोकशाहीवादी संयुक्त आघाडीला विस्कटलेल्या समाजमनाची घडी नीट बसवण्याचे हे काम दीर्घकाळ करावे लागेल. त्यासाठीचा आदर्श आपल्या विरोधकांकडून, गीता प्रेस आणि कल्याण मासिक चालवणाऱ्यांकडून जरुर घ्यावा. संघ-भाजपविरोधी लोकशाहीवाद्यांची संयुक्त आघाडी हे माझे मत आधी होतेच. प्रमोद मुजुमदारांचे हे पुस्तक वाचून त्याचे महत्व आणि तातडी अधोरेखित झाली.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मुक्तसंवाद, ऑगस्ट २०२५)



__________________________________________

हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया

लेखक : प्रमोद मुजुमदार

लोकवाङ्‌मय गृह, मुंबई

पृष्ठे २३२ | किंमत ३०० रुपये
__________________________________________

Wednesday, July 23, 2025

व्हिन्सेंट शीन आणि गांधी, नेहरु, आंबेडकर


आज २३ जुलै. दादासाहेब रुपवतेंचा स्मृतिदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं आहे. बाबासाहेबांची साथ-सोबत लाभलेल्या आणि त्यांच्यानंतर आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांतले एक अग्रणी असलेल्या दादासाहेबांच्या स्मृतीस मनोभावे अभिवादन!

यानिमित्ताने त्यांनी आपल्या आठवणी सांगताना नोंदवलेली एक घटना समजून घेणे उचित ठरेल. मतभेद म्हणजे मनभेद नव्हे हे सतत अधोरेखित करणाऱ्या आणि विरोधी मतांच्या मंडळींशीही सौहार्दाचे संबंध ठेवून सहमतीच्या मुद्द्यांवर सहकार्य साधणाऱ्या दादासाहेबांच्या भूमिकेस कोणत्या वातावरणाचा आधार होता, ते यातून कळते. ‘प्रवरेचा दाता’ या त्यांच्या शब्दांकित केलेल्या आत्मकथेतील हा प्रसंग दत्ता बाळसराफ यांनी माझ्या निदर्शनास आणला. तो खाली देत आहे.

_____________________

व्हिन्सेंट शीन म्हणून एक प्रसिद्ध अमेरिकन लेखक यांनी महात्मा गांधींचे चरित्रपर लेखन केलं आणि त्याला जगभर खूप मागणी आली. त्या व्हिन्सेंट शीननं ठरवलं हा जो पैसा जमेल तो कुटुंबासाठी खर्च करायचा नाही. भारतातल्या एखाद्या महत्वाच्या विषयावर, जो विषय गांधीजींनाही प्यारा, त्याच्यावर हा पैसा खर्च करायचा. व्हिन्सेंट शीन भारतात आले. त्यांनी पंडित नेहरुंसह सर्वांची भेट घेतली. कोणी काय, कोणी काय सुचवलं. पंडितजींनी त्यांना सुचवलं तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना भेटा. बाबासाहेब त्यावेळी घटना समितीत काम करत होते. कायदेमंत्री होते. त्यांनी व्हिन्सेंट शीनला सांगितलं तुझ्या पैशाचा सदुपयोग व्हायचा असेल तर माझी निवडक मुलं तू अमेरिकेला शिकायला घेऊन जा. ...व्हिन्सेंट शीननं स्कॉलरशिप द्यायच्या ठरवल्या. इथं मुंबईला त्यांनी इंटरव्ह्यू ठेवले. निवडक विद्यार्थ्यांचे. मलाही त्याच्यात तार करुन बोलवण्यात आलं. (इथे दादासाहेबांनी गावावरुन सायकल, ट्रक असे करत मुंबईला कसा थकला-भागला पोहोचलो त्याचे वर्णन केले आहे.) ...एक अँग्लो इंडियन बाई इंटरव्ह्यू घ्यायला बसली होती. माझा नंबर येताच मी तिच्यापुढे दाखल झालो. तिने मला सिगरेट ऑफर केली. कदाचित सिगरेट ओढणं हे आधुनिकतेचं लक्षण त्यावेळी समजलं जात असे. मी तर सिगरेटला कधी हातही लावला नव्हता. तोपर्यंत मी चहादेखील पीत नसे. पण त्या बाईला बरं वाटलं की मी सिगरेट पीत नाही आणि ऑफर केलेल्या सिगरेटला नकार देण्याचं धैर्य दाखवलं. माझा इंटरव्ह्यू हा सर्वात दीर्घकाळ चालला. त्या बाईंनी माझ्याशी बऱ्याच विषयांवर चर्चा केली. आणि माझी निवड झाली असं मला सांगण्यात आलं. ...नंतर काय झालं कुणास ठाऊक. ती योजनाच रद्द झाली. कशामुळे रद्द झाली याची मी चौकशी केली नाही.

(प्रवरेचा दाता, पा. क्र. १४६-४७)

_______________

प्रवरेचा दाता

दादासाहेब रुपवते

ग्रंथाली

मूल्य – ३०० रु.
_______________

Sunday, July 20, 2025

विकास की विध्वंस?


हा प्रश्नच कार्यकर्ते-पत्रकार-अभ्यासक अविनाश पोईनकर यांनी वर्षा कोडापे या आपल्या पत्नीच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘सुरजागड विकास की विस्थापन?’ या पुस्तकाचा गाभा आहे. सुरेश द्वादशीवार यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची भूमिका विकासाविरुद्ध नसून विध्वंसाविरुद्ध असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. पुस्तकप्रवेश करणारा वाचक या प्रस्तावनेनेच हादरुन जातो. पुढे काय वाढून ठेवलंय याचा अदमास तिथेच येतो आणि त्याला सामोरे जाण्याची मनाची तयारीही होते. सुरजागडचा प्रश्न, तेथील समृद्ध जल-जंगल-जमिनीचे उजाड होणे, आदिवासींची ससेहोलपट आणि त्यांचा निकराचा लढा याचे विविध आयाम सविस्तरपणे लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहेत. या लढ्याशी परिचित व संबंधित असलेल्या पोईनकर यांना या लढ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी साधना साप्ताहिकाची तांबे-रायमाने शिष्यवृत्ती मिळाल्याने समाजशास्त्रीय संशोधनाचे हे पुस्तक आकारास येऊ शकले.

लोहाबरोबरच तांबे, जस्त, सिमेंट, डोलामाईट, लयटेराईट अशा विविध खनिजांचे आगर असलेला आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा कंपन्या आणि सरकार यांचे लक्ष्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर गडचिरोलीवर खास लक्ष आहे. सुरजागड हा मुख्यतः लोहखनिजाचा प्रदेश. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २००७ साली येथे सुमारे साडेतीनशे एकर जमीन ५० वर्षांच्या लीजवर खाणकाम करण्यासाठी सरकारने दिली. २०२३ मध्ये आणखी पाच कंपन्यांना मिळून साडेचार हेक्टरहून अधिक जमीन खाणींसाठी प्रदान करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने असलेल्या माडिया या अतिअसुरक्षित आदिम जमातीची उपजीविका आणि एकूण जीवनच यामुळे धोक्यात आले असून आता किमान ४० हजार ९०० नागरिक विस्थापित होतील आणि प्रस्तावित २५ खाणी पूर्णतः सुरु झाल्यावर लाखो आदिवासींना याचा फटका बसेल असे लेखकाने नमूद केले आहे. येत्या पाच-दहा वर्षांत घनदाट जंगलाचा प्रदेश ही गडचिरोलीची ओळख पुसली जाईल असा लेखकाचा अंदाज आहे.

आदिवासी समाजाची तथाकथित मुख्यप्रवाही समाजाने कायम उपेक्षा केली. आदिवासी नेते जयपालसिंग मुंडा यांनी संविधान सभेतील आपल्या भाषणात याकडे लक्ष वेधले होते. (त्या भाषणातील एक अवतरण या पुस्तकात प्रारंभीच दिलेले आहे.) लेखकानेही ही खंत या पुस्तकात व्यक्त केली आहे. त्यादृष्टीनेच आदिवासींच्या योगदानाला उजाळा देताना स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्ध्यांची कामगिरी पहिल्याच प्रकरणात नोंदवलेली आहे. या खाणींच्या प्रकल्पात भरडल्या जाणाऱ्या माडिया या आदिम जमातीचा परिचय दुसऱ्या प्रकरणात आहे. माडिया व गोंड या दोन स्वतंत्र जमाती असतानाही ‘माडिया गोंड’ म्हणून माडियांना संबोधले जाणे कसे गैर आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. माडियांच्या सांस्कृतिक जीवनाची आणि धारणांची ओळख त्या पुढच्या भागात आपल्याला मिळते. सुरजागड लोह खाणींचा इतिहास, वनकायदे, या कायद्यांना न जुमानणे तसेच त्यातील सोयिस्कर बदल, कंपन्यांचे आगमन, सरकार व लोकप्रतिनिधींचा साळसूद व्यवहार, नक्षलवादी आणि आंदोलक यांच्यातील भेद, अहिंसक आंदोलने करणाऱ्यांना मुद्दामहून नक्षलवादी ठरवून चिरडणे, प्रकल्पांमुळे आदिवासींचे विविध थरांवर होणारे शोषण या बाबी सविस्तरपणे विविध प्रकरणांतून लेखकाने मांडलेल्या आहेत. यात पोखरलेले डोंगर, सपाट झालेले जंगल, खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण, आरोग्याच्या समस्या, उत्खननातून निघणाऱ्या मातीने नदीचे पाणी दूषित होणे, उपीजीविकेची पारंपरिक साधने नष्ट होणे, एकूण जगण्याचा पोतच विदीर्ण होणे, दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाची माध्यमांनी दखल न घेणे अशा अनभिज्ञ वाचकाच्या मनाला आणि समजुतींना धक्का देणाऱ्या कैक बाबींचा समावेश आहे.

पाठबळ म्हणून पुस्तकाच्या अखेरीस काही महनीयांचे अभिप्राय आहेत. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी यांचेही एक टिपण आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मराठी वाचकांना आपली संवेदनशीलता विस्तारित करण्यासाठी’ लेखकाने मोठ्या श्रमाने तयार केलेल्या या दस्तावेजाचा नक्कीच उपयोग होईल. यापलीकडे जाऊन त्यातील प्रश्नाची दाहकता कमी करण्यात आपण समाज म्हणून काय करु शकतो हा मुद्दा आहे. तो किती कळीचा आणि कठीण आहे, याची कल्पना येण्यासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या प्रस्तावनेकडे पुन्हा वळू. त्यात ते म्हणतात – ‘या संकटाचा सामना करण्यासाठी प्रथमच सुरजागड क्षेत्रातले नेतृत्वहिन व बहुसंख्येने निरक्षर असलेले आदिवासी एकत्र आले आहेत. पैसा आणि साधने या साऱ्यांच्या अभावी ते आपला जीवनमरणाचा संघर्ष लढवीत आहेत. या संघर्षाचा शेवट कसा होईल, याची साऱ्यांना कल्पना आहे आणि तो शेवट आदिवासींचाच असणार आहे. वारुळे जमीनदोस्त करता येतात. पण मुंग्या माराव्याच लागतात. हा नैसर्गिक दुष्टावा आता व्यावसायिक अघोरीपणात रुपांतरित झाल्याचे सांगणारे हे चित्र आहे.’

हे चित्र भीषण आहे. हा शेवट ठरलेला असेल तर लेखकाने हे पुस्तक लिहावे का? आणि आपण वाचावे तरी का? कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा यातली शोकांतिका आपण पाहतोच की! तसे याकडे पहावे का? द्वादशीवार हे चित्र लिहूनही अखेर या लढ्याला शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत राहण्याचे अभिवचन देतात. जर हा शेवट अटळ असेल तर या शुभेच्छा आणि सोबत राहण्याचे वचन कशासाठी? द्वादशीवारांना त्यांनी मांडलेले चित्र बदलावे असे मनोमन वाटते. आपल्या विवेकाला हादरवून सक्रिय करणे हाच हेतू त्यांचा आहे. या देशाचे मालक असलेले ‘आम्ही भारताचे लोक’ आपले घटक असलेल्या या आदिवासी भावंडांच्या सोबत उभे राहून आपण निवडलेल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला प्रवृत्त झालो तर अविनाश पोईनकरांच्या पुस्तकलेखनाच्या श्रमाचे चीज झाले असे होईल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________________________

‘सुरजागड : विकास की विस्थापन?’

अविनाश पोईनकर

हर्मिस प्रकाशन, पुणे

पाने – १७० | मूल्य – २०० रुपये
________________________________

Friday, July 4, 2025

यशवंत मनोहरांच्या दोन नव्या पुस्तकांचे स्वागत

१) In the Rain of Fire (‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’चा इंग्रजी अनुवाद)


‘In the Rain of Fire’ हा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या यशवंत मनोहर यांच्या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद. तो केला आहे स्वतः कवी असलेल्या विवेक काटीकर यांनी. अग्निपरीक्षेचे वेळापत्रक हा ५५ कवितांचा काव्यसंग्रह; खरं म्हणजे काव्यग्रंथ. ३३५ पानांचा. यातल्या अनेक कविता दीर्घ आहेत. २०२१ साली हा कवितासंग्रह आला आणि यावर्षी २०२५ ला त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. तोही ३२८ पानांचा. मनोहरांच्या कविता गूढ नाहीत. किंबहुना कवीला म्हणायचंय त्याहून वेगळा अर्थ कवितांचा वाचकांना लागण्याच्या ते विरोधातच आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कवितालेखन करणाऱ्या मनोहरांची प्रतिभा आजही नवोन्मेषशाली आहे. त्यांची शैली आणि शब्दांची नवनिर्मिती कायम तसेच टवटवीत आहे. प्रगल्भतेचा अधिकाधिक उन्नत थर ती गाठतेच आहे. अशावेळी हे सारं इंग्रजीत आणणं हे विलक्षण आव्हान होतं. या आव्हानाला भिडण्याचं धैर्य विवेक काटीकर यांनी दाखवलं आहे.

माहितीपर गद्याचा अनुवाद आणि सर्जक साहित्याचा अनुवाद यांत जमीनअस्मानाचे अंतर असते. कवितेचा अनुवाद ही तर आणखी कठीण बाब. मूळ कवीची शैली, त्याने खेळवलेले, योजलेले शब्द, त्यांचे क्रम आणि यांतून येणारी तिची लय अनुवादात आणणे हे तर महाप्रचंड आव्हान. विवेक काटीकर त्याला सामोरे गेले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यशवंत मनोहरांची कविता ही सर्वसाधारण कविता नव्हे. सर्व तऱ्हेच्या विरुपतांतून मानवतेला मुक्त करण्याचा तो एल्गार आहे. त्यामुळेच तो मराठीपुरता न राहता जगातील अधिक विस्तृत मानवसमूहांपर्यंत पोहोचवणे आवश्यकच होते. ते काम काटीकर यांनी केले आहे. यासाठी त्यांना धन्यवाद.

अनुवाद करण्याची काय पद्धत अनुसरली याबद्दल या पुस्तकाच्या सुरुवातीलाच काटीकर यांनी लिहिले आहे. ते म्हणतात – ‘I adopted ‘meaning to meaning’ approach rather than ‘word to word approach.’’ अर्थात हे त्यांनी योग्यच केलं. भाषेला लीलया वळवणाऱ्या, नित्यनव्या शब्दनिर्मितीने तिला श्रीमंत करणाऱ्या, शब्दांना बागडवणाऱ्या मनोहरांच्या कवितांचा शब्दशः अनुवाद करणं ही किती अवघड गोष्ट आहे, हे खालचं एक उदाहरण पाहिलं तरी लक्षात येईल.

‘नदीमाय’ कवितेच्या १५ व्या भागात ते म्हणतात –

‘अशा अनेक नद्यांमधून
पाण्याऐवजी जीवनच वेल्हाळताना मी बघितले.’

काटीकरांनी इंग्रजीत केलेला याचा अनुवाद पहा –

‘I saw in such rivers, not water,
But life manifesting itself.’

मूळ मराठी कवितेत पाण्याला समानार्थी असलेला शब्द ‘जीवन’ हा आयुष्य या अर्थी मनोहरांनी वापरला आहे. पण या जीवनाचे ‘वेल्हाळणे’ पाणी या अर्थी खळखळत्या प्रवाहाच्या प्रतिमेशी समरुप आहे. वाचकाला सोबत दुडदुडवायला लावणाऱ्या मूळ मराठीतलं हे प्रतिमा-सौंदर्यसामर्थ्य इंग्रजीत कसं येणार? इंग्रजीत water आणि life हे समानार्थी आणि तरीही वेगळ्या अर्थाचे असे शब्द नाहीत. काटीकरांना ‘manifesting’ वरच भागवावे लागले आहे. मूळ इंग्रजीतून मराठीत अनुवाद करतानाही हीच अवस्था झाली असती. सर्जक साहित्याच्या - त्यातही कवितेच्या अनुवादाची ही नैसर्गिक मर्यादा आहे.

यशवंत मनोहरांची कविता इंग्रजीत आल्याने इंग्रजीचा परिचय असलेल्या जगातील व्यापक समुदायांपर्यंत ती पोहोचेलच. पण उद्या इंग्रजी न जाणणाऱ्या समुदायांपर्यंतही इंग्रजीतून त्यांच्या भाषेत अनुवाद होऊन पोहोचण्याच्या शक्यता रुंदावल्या आहेत. यशवंत मनोहरांची कविता अशारीतीने जगात जाण्याची आवश्यकता आणखी एका कारणाने मला वाटली. ते म्हणजे या ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या कवितासंग्रहाला यशवंत मनोहर यांनी जोडलेला ‘मी अशीच कविता का लिहितो?’ हा उपोद्घात. ‘In the Rain of Fire’ या इंग्रजी अनुवादातही तो आहे. साहित्याचा हेतू काय? लेखकाच्या भूमिकांचा प्रभाव त्याच्या साहित्यावर पडावा का?..या प्रश्नांवर भारतातच नव्हे, तर जगभरच्या कलाविश्वात आजही वाद झडतात. यशवंत मनोहर त्यांना म्हणायचे ते फक्त कवितेत म्हणून थांबत नाहीत. मी मला वाटते ते लिहिले, आता वाचकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊदे म्हणून सोडून देत नाहीत. आपले साहित्यहेतू थेट, सुस्पष्ट मांडतात. उच्चरवात जाहीर करतात. काहीही हातचे न राखता आपला संदर्भ अवकाश, आपली वैचारिक परंपरा रेखांकित करतात. ही त्यांची अनन्यता जगाला कळणे गरजेचेच होते. त्याची संभाव्यता या इंग्रजी अनुवादाने वाढली आहे.

मराठी उपोद्घातातली ही काही विधाने पाहिल्यावर आपल्यालाही त्याची सत्यता पटेल :

- मी कविता लिहितो म्हणजे अस्तांच्या नोंदीही लिहितो आणि क्षितिजाला येणाऱ्या नव्या पालवीचीही चाहूल लिहितो.

- बुद्ध, लोकायत, सॉक्रेटिस, मार्क्स, जोतीबा फुले, सार्त्र, रसेल, रामस्वामी नायकर आणि बाबासाहेब आंबेडकर अशा लाखो प्रज्ञावंतांनी हा सर्वोच्च नीतीचा इहवादी आदर्श मला सांगितला आहे.

- कविता अर्थमयच असते. कवितेची ही अर्थमयता कवीच्या जीवनदृष्टीतूनच उगवलेली असते.

- माझी कविता अज्ञान, विषमता आणि भ्रम तुडवितच पुढे जाते आणि सर्वहिताय नीतीने सांगितलेला कवितेचा अर्थ हाच माझ्या कवितेचा प्राण आहे असेच मी मानतो.

- (कवितेतून) स्वतःच्या सोयीचा अर्थ काढण्याची ही सोय कवीलाच नाकारीत असते. कवीचे सत्य नाकारण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले या लोकांना? हे चैतन्यवाद्यांचे लबाड सौंदर्यशास्त्र आहे.

- कवितेतला अर्थरहित मानणे आणि वाचकाला त्याला हवा तसा अर्थ घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजेच कवीच्या पुनर्रचनाशील व्यक्तिमत्वाला नकार देणेच असते.

- कवी केशवसुतांची कविता ही आजही माझी पहिली तात्त्विक आवड आहे.

- केशवसुत काही परलोकवादी प्रतिभेचे कवी नव्हते. ‘देव दानवा नरे निर्मिले’, ‘ब्राम्हण नाही हिंदुही नाही...’, ‘वंदुनिया ह्या देवांलागुनि धाई धाई मानव रडती...’, ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत’ आणि ‘जग हे बदलायाचे’ हे केशवसुतांचे इहवादी क्रांतिकारी आशयविश्व बाजूला करुनच केशवसुतांसंबंधीचा आदर व्यक्त केला गेला. हा धागा १९६० नंतरच्या काही प्रतिभांनीच पुढे नेला असे मला नम्रपणे वाटते.

हे टिपण मराठी वाचकांना ‘In the Rain of Fire’ चा परिचय व्हावा म्हणून लिहिले आहे. त्यामुळे वरील विधाने मूळ मराठी पुस्तकातूनच घेतली. इंग्रजीत त्यांचा उत्तम अनुवाद विवेक कानिटकर यांनी केला आहे.

_____________________________

In the Rain of Fire

By Yashwant Manohar

Translation: Vivek Katikar

Red Sparrow A Media House

Mob: 8530675264 / 9529593553

Price: Rs. 1200

_____________________________

मनोहरांनी ‘In the Rain of Fire’ हे पुस्तक ‘मराठी क्रांतिकारी साहित्याचे संस्थापक डॉ. म. ना. वानखडे यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण’ केले आहे. याच म. ना. वानखडे यांच्यावरच्या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. त्याविषयीचा परिचय पुढे करुन घेऊ.


२) क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ








आपल्या प्रतिभेचा आणि व्यासंगाचा सर्जनशील तसेच वैचारिक आविष्कार करणारी शेकड्याहून अधिक पुस्तके यशवंत मनोहरांनी लिहिली आहेत. त्यात हे पुस्तक नसते तर काही तरी राहून गेले आहे, असे वाटले असते. अर्थात, हे आपल्याला जाणवते ते त्यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचूनच. साहित्यातला एक लखलखीत प्रवाह म्हणून आज देश-विदेशात दखलपात्र झालेल्या ‘विद्रोही दलित साहित्य’ या इमारतीची ओळख, चौकट आणि चबुतरा सिद्ध केला तो म. ना. वानखडे यांनी. मनोहरांच्या भाषेत ‘ज्ञानयुद्धातील आधुनिक अर्हत’ असलेले म. ना. वानखडे येणाऱ्या पिढ्यांना कळण्याची सोय यशवंत मनोहर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाने झाली आहे. वास्तविक, वानखडेंच्या एकूण साहित्याचे संकलन, अनुवाद करवून घेऊन ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’ या नावाने १९७९-८० साली निघालेले पुस्तक वामन निंबाळकरांसमवेत यशवंत मनोहरांनीच संपादित केले होते. ‘क्रांतदर्शी म. ना. वानखडे’ या पुस्तकात मनोहरांनी पाच पिढ्यांच्या लोकांना लिहायला लावले आहे. यात त्यांचे समकालीन सहकारी, विद्यार्थी तसेच नातेवाईक आहेत. या प्रत्येकाच्या नजरेतून, आकलनातून आणि अनुभवातून वानखडेंचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि थोरवी आपल्यासमोर साकारते. विचार, आठवणी आणि परिशिष्टे अशा तीन भागांत या पुस्तकाची विभागणी आहे. एकूण ६५ लेख आणि मनोहरांची एक मुलाखत यात आहे. (लेखक व त्यांचे लेख यांची कल्पना येण्यासाठी अनुक्रमणिकेचे फोटो सोबत देत आहे.)

१९२४ ते १९७८ असे केवळ ५४ वर्षांचे आयुष्य लाभलेले मनोहर नामदेवराव वानखडे मूळचे अमरावती जिल्ह्यातले. तेजस्वी व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक राहिला. मराठवाड्यासारख्या मागास भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाद्वारे उच्चशिक्षणाचा पाया रचला. मिलिंद हे आंबेडकरोत्तर चळवळीच्या विविध क्षेत्रांत भरारी घेणारे कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ बनले. या उद्देशानेच बाबासाहेबांनी या कॉलेजमधील प्राध्यापक निवडताना व्यक्तिशः लक्ष दिले. वानखडेंना त्यांनी स्वतः मिलिंदमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवडले. पुढे परदेशातील उच्च शिक्षणासाठी ज्या १४ जणांची बाबासाहेबांनी निवड केली, त्यात म. ना. वानखडे होते. इंग्रजी साहित्यात एम. ए. आणि नंतर पी. एच. डी. वानखडेंनी केली. परदेशातून परतल्यावर पुन्हा त्यांनी मिलिंदमध्ये प्राध्यापकी सुरु केली. मिलिंदचे प्राचार्य म. भि. चिटणीस मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून गेल्यानंतर डॉ. वानखडे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

बाबासाहेबांना अभिप्रेत विद्यार्थी घडवणे हे त्यांचे मिशन होते. ज्या अभावग्रस्त पार्श्वभूमीतून हे विद्यार्थी येत त्यातून येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांच्यात अस्मिता जागवणे, या विद्यार्थ्यांचा कल व गुण ओळखून त्यांना विषय सुचवणे, त्यात मार्गदर्शन करणे हे त्यांचे नित्यकर्म होते. खुद्द या पुस्तकाचे संपादक यशवंत मनोहर यांना मुदत संपल्यानंतरही त्यांना रुची असणाऱ्या कलाशाखेत प्रवेश मिळवून देणे, प्रथम वर्गात एम. ए. झाल्यावर आधी पैठण आणि नंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवून देणे यासाठी वानखडेंनी सहाय्य केले. मनोहरासंहित वानखडेंच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या या मदतीच्या व्यक्तिगत अनुभवांची या पुस्तकात कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरुन येते. यशवंत मनोहर पुस्तकाच्या शेवटच्या भागातील आपल्या मुलाखतीत म्हणतात – ‘माझे सगळे वाङ्मयीन व्यक्तिमत्व आहे ते डॉ. म. ना. वानखडेंमुळेच निर्माण करण्याची संधी मला मिळाली. जर दुसरे कोणी प्रिन्सिपॉल असते आणि त्यांनी मला प्रवेश दिला नसता तर माझे आयुष्य वैराण झाले असते. मी यशवंत मनोहर होऊ शकलो नसतो.’ सुधीर रसाळ हेही वानखडेंचे विद्यार्थी. ते लिहितात – ‘वानखडे सरांनी पंधरा एक पुस्तकांची यादी मला दिली. ही पुस्तके कोणत्या क्रमाने वाचायची हेही मला समजावून सांगितले. मी आता मराठीतला एक चांगला समीक्षक म्हणून ओळखला जातो. खरे म्हणजे त्याचे श्रेय वानखडे सरांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादीला आणि त्यांनी ती कोणत्या क्रमाने वाचायची याबद्दल दिलेल्या सल्ल्याला आहे. ’

विद्यार्थ्यांना असे सहाय्य करण्याबद्दल वानखडेंची भूमिका काय होती? मिलिंद महाविद्यालयाच्या ७५-७६ च्या वार्षिकांकात लिहितात – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच मी विद्यार्थ्यांच्या बाजूने कायम उभा राहिलो...त्यांनी माझ्या हाती दिलेली ही ज्ञानाची ज्योत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्त केली.’

अमेरिकेतल्या वास्तव्यात कृष्णवर्णीय विद्रोही चळवळीचा परिचय, त्यांच्या साहित्याचा अभ्यास यांतून म. ना. वानखडेंना भारतात दलित विद्रोही साहित्याला गती देण्याची प्रेरणा मिळाली. भारतात आल्यावर ‘प्रबुद्ध भारत’ मध्ये त्यांनी ‘दलितांनो, विद्रोही वाङ्मय लिहा’ हा लेख लिहिला. याचा अर्थ दलित साहित्य त्या आधी लिहिले जात नव्हते असे नव्हे. शंकरराव खरात, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागूल आदि मंडळी आपल्या लेखणीतून दलित जीवन चितारतच होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकांना काय व कसे लिहावे याबद्दल मार्गदर्शन करताना काय म्हणतात, हे डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या लेखात भालचंद्र फडकेंच्या पुस्तकातील संदर्भ देऊन नोंदवले आहे. बाबासाहेब म्हणतात – ‘मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचे आहे की उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिक मूल्ये यांचा आपल्या साहित्यप्रकारातून आविष्कार करा. आपले लक्ष आकुंचित, मर्यादित ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका. तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करु नका. तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असे प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे फार मोठे जग आहे, हे विसरु नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजावून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे.’

बाबासाहेबांनी मांडलेल्या या साहित्याच्या प्रयोजनाची बांधबंदिस्ती म. ना. वानखडेंनी केली. सर्वसाधारण मराठी साहित्याहून दलित साहित्याचे वेगळेपण काय, याची चौकट त्यांनी रचली. विद्रोह हा त्याचा अंगभूत व अनन्य गाभा कसा याची मीमांसा केली. विद्रोही दलित साहित्याची एक आखीव व्याख्या त्यांनी केली. ‘मिलिंद साहित्य सभा’ स्थापून साहित्यविषयक उपक्रमांसाठी एक संस्थात्मक मंच तयार केला. प्रस्थापित प्रकाशने दलित साहित्य प्रकाशित करणे कठीण. त्यासाठी त्यांनी ‘अस्मिता’ हे त्रैमासिक सुरु केले. सरकारी नियमांमुळे त्याचेच पुढे ‘अस्मितादर्श’ नामकरण झाले. त्यांना स्वतःला त्यात पुढे लक्ष घालता आले नाही, तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी ते चालवले. ‘अस्मितादर्श’ने अनेक लेखकांना संधी दिली. नवे लेखक घडवले.

म. ना. वानखडे यांच्या साहित्यविषयक भूमिकेची सूत्रे समजून घेण्यासाठी त्यांचे १९६७ सालच्या भुसावळच्या ‘महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलनाच्या’ अध्यक्षपदावरुन केलेले भाषण उपयुक्त ठरते. या कृतज्ञताग्रंथातील अनेक लेखकांनी त्याची नोंद घेतली आहे. के. व्ही. सरवदेंच्या लेखातील काही अवतरणे येथे देणे उद्बोधक ठरेल. ‘आजवरच्या साहित्यात हिंदू समाजातील वरच्या मानल्या गेलेल्या वर्गाचेच जीवन प्रतिबिंबित झाले’ असल्याचे सांगून वानखडे म्हणतात – ‘आधुनिक साहित्यात मध्यमवर्गीय पांढरपेशा अशा ब्राम्हण समाजाचे चित्रण आहे. कारण लेखक हा त्या वर्गातीलच होता. काही प्रमाणात या लेखकांना स्त्रियांचे दुःख जाणवले. हरिभाऊ आपट्यांनी स्त्रियांच्या परवशतेचे चित्रण ‘पण लक्षात कोण घेतो?’ मध्ये केले. देवलांनी ‘शारदा’ या नाटकामध्ये स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. पण त्यांना आम्हा दलितांची वेदना जाणवली नाही.’

(वानखडेंचे सहकारी व प्रथितयश लेखक भालचंद्र फडके यांनी आपल्या लेखात केशवसुतांचा ते याबाबतीत अपवाद करत अशी नोंद केली आहे.)

ग्रामीण साहित्याच्या प्रवाहानेही या काळात जोम धरला होता. त्याच्याशीही फारकत घेताना ते नोंदवतात – ‘यातही आपले जीवन नाहीच. उलट त्यात चितारलेले ग्रामीण जीवनही खरे नाही. शहरात बसून रोमँटिक चष्म्यातून पाहिलेले हे जीवन आहे...जीवनाचे वास्तव दर्शनच या मराठी लेखकांना झाले नाही.’

अन्य प्रगतीशील साहित्यप्रवाहसुद्धा त्यांना जवळचे वाटत नाहीत. त्याबद्दल वानखडेंची तक्रार अशी – ‘साम्यवाद किंवा गांधीवाद यांनी प्रेरित झालेल्या मराठी वाङ्मयातही आपले चित्र आढळत नाही. या मानवतावाद्यांच्या साहित्यातील हरिजनोद्धारात आईची माया नाही. दाईची भूतदया आहे. आणि भूतदया स्वाभिमानाला डिवचणारी आहे.’

वानखडेंचे हे भाषण ‘दलित साहित्याचा जणू जाहीरनामाच’ आहे असा निर्वाळा अनेकांनी या पुस्तकात दिला आहे.

म. ना. वानखडे यांचे सर्व म्हणणे सलगपणे या पुस्तकात नाही. तो या पुस्तकाचा हेतूही नाही. यशवंत मनोहर आणि वामन निंबाळकर यांनी वानखडेंच्या लिखाणाचे संपादन करुन या आधीच पुस्तक काढल्याचे वर नमूद केले आहेच. कृतज्ञताग्रंथातील लेखांतून वानखडेंच्या मांडणीचा, त्यांच्या व्यवहाराचा काय परिणाम झाला याचा दाखला मिळतो. या लेखकांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यापक वैचारिक क्षेत्रातील मूलभूत हस्तक्षेपाबद्दलची कृतज्ञता प्रत्येक पानातून पाझरताना वाचकाला दिसते. म. ना. वानखडे २०२४ साली शंभर वर्षांचे झाले असते. त्यांच्या जन्माच्या शंभरीनिमित्ताने काढलेल्या या ग्रंथाला संपादकांनी दिलेले ‘कृतज्ञताग्रंथ’ हे अगदी सार्थ नाव आहे.

या ग्रंथातील लेख म. ना. वानखडेंविषयी असले तरी अपरिहार्यपणे मिलिंद महाविद्यालय, नागसेन वन या सर्व परिसराचे दर्शन त्यातून वाचकांना घडते. भालचंद्र फडके यांनी त्याला ‘दलित साहित्याच्या नव्या प्रवाहाचे उगमस्थान’ म्हटले आहे. बाबासाहेबांनी उभारलेल्या तेथील वास्तूंत प्रत्यक्ष वावरलेल्यांच्या जीवनाचे सोने झालेच. पण बाबासाहेबांची प्रेरणा वसत असलेल्या या परिसरातील कणाकणांचा गंध या पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचतो. त्याला ऊर्जा देतो. असे पुस्तक संपादित करण्याचे कष्ट वयाच्या ऐंशीचा टप्पा पार केलेल्या यशवंत मनोहर सरांनी घेतले आणि ही ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल सरांच्या प्रति कृतज्ञता. त्यांना सहाय्य करणाऱ्या ‘संपादक कुटुंबा’ला मनापासून धन्यवाद.

वानखडेंसारख्या प्रज्ञावंताने समाजाला अजून खूप काही दिले असते. ५४ व्या वर्षी हृदयविकाराने अकस्मात त्यांचे निधन झाले. विचारवंताच्या दृष्टीने हे उमेदीचे वय असते. त्यांच्या या जाण्याने सगळेच हादरले. या पुस्तकातील लेखांतूनही ती व्यथा व्यक्त होते. म. ना. वानखडेंचे ‘मिलिंद’ मधील एक सहकारी व थोर समीक्षक रा. ग. जाधव यांचे एक अवतरण पुस्तकाच्या प्रारंभी दिले आहे. वानखडेंनी ज्याच्या काव्यावर प्रबंध लिहिला त्या त्यांच्या आवडत्या वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कवितेचा संदर्भ या अवतरणात घेऊन जाधवांनी वानखडेंना आदरांजली वाहिली आहे. त्याची नोंद करुन या पुस्तकाचा परिचय संपवतो.

‘ “अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर व्हिटमनने एक भावोत्कट विलापिका लिहिली. तिचा आशय असा – या माझ्या कप्तानाने नाव नीटपणे किनारी लावली. वाऱ्यावादळातून ती सांभाळून अखेर एका संकटग्रस्त सफरीने मंझिल गाठली. आता किनाऱ्यावरुन घंटानाद ऐकू येत आहे. सफर सफल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या मुखावर दृगोचर होत आहे. पण माझा कप्तान कुठे आहे? तो तर नावेत अचेतनपणे पडून आहे आणि माझ्या हृदयातून रक्ताचे थेंब ठिबकत आहेत.”

दलित साहित्याची नौका पहिल्या वादळी लाटांमधून सुरक्षितपणे सांभाळून या कप्तानाने नीटपणे किनारी लावली. पण त्याच्या जीविताची सफर मात्र निर्दयी नियतीने संपवून टाकली. माणूस पराधीन असतो हेच खरे. पण हे कप्ताना, तुझे कार्य कोण विसरेल? तुला शतशत प्रणाम!’

___________________________

क्रांतदर्शी म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ

संपादक – यशवंत मनोहर

प्रकाशक – प्राईम पब्लिशिंग हाऊस

संपर्क - ८९९९२३४५५६ / ९६६५६२६७१७

किंमत: ५५० रु.

_____________________________

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Tuesday, May 6, 2025

सामाजिक सद्भाव (दूरदर्शन वरील मुलाखत))


 https://youtu.be/lNIvAXMYp_8?si=gqeDBGXbHjzyCB-Q

सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते यांचा सामाजिक सद्भाव हा विशेष कार्यक्रम

निर्माता - विजय ढगे 

सखी सह्याद्रीमध्ये ३० जानेवारी २०१९ रोजी थेट प्रसारण झाले.


Friday, March 21, 2025

महाबोधी विहारला ‘मुक्ती’ची प्रतीक्षा !


जवळपास पंधरा वर्षांपूर्वी बिहारमधल्या बोधगयेच्या महाबोधी विहारात मी गेलो होतो. त्यावेळी बुद्धवंदना सुरु होती. वंदना संपली आणि उपरणे घातलेले पुरोहित हातात आरतीचे ताट घेऊन आत आले. त्यांनी आरती सुरु केली. ...हे पाहून मी अचंबित झालो. नंतर कळले की हे विहार निर्णायकपणे बौद्धांच्या ताब्यात नाही. तेथील व्यवस्थापन मुख्यतः हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हा प्रश्न खूप जुना आहे. त्याविरोधात अनेकवेळा आवाज उठवूनही तो अद्याप सुटलेला नाही. सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाने जोर पकडला आहे. महाबोधी विहाराच्या परिसरात उपोषणे तसेच देशात विविध राज्यांत आंदोलने सुरु आहेत. जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपिले केली जात आहेत.

विविध अभ्यासकांनी महाबोधी विहाराच्या इतिहासाबद्दल नोंदवलेल्या या काही बाबी :

ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, त्या परिसरात सम्राट अशोकाने बांधलेले हे विहार. २३०० वर्षांपूर्वी. नंतर गुप्त आणि पाल राजांनी त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या. बौद्धांचा कट्टर विरोधक असलेल्या ब्राम्हणी धर्माच्या बंगालच्या शशांक राजाने पालांवर आक्रमण करुन त्यांना पराभूत केले. पालांची महाबोधी विहार परिसरावरील देखरेख संपली. पुढे एका शैव महंताने हे विहार ताब्यात घेतले. अनेक पुरातत्व उत्खनने करणाऱ्या अलेक्झांडर कनिंघम या इंग्रज अधिकाऱ्याने या महाबोधी विहाराचा मातीत गाडला गेलेला भाग बाहेर काढून विहाराचे एकूण संकुल नीटनेटके केले.

शैव महंताच्या ताब्यातून हे विहार बौद्धांच्या अखत्यारित यावे यासाठी १८९० पासून अनागारिक धर्मपाल या मूळच्या श्रीलंकेच्या बौद्ध भिख्खूंनी आवाज उठवला. हे विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे, यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. जागतिक बौद्ध समूहांशी संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांच्या सहाय्याने बोधगया तसेच सारनाथ येथील परिसरातील बौद्ध स्थळांच्या विकासासाठी ते अविरत कार्यरत राहिले. महाबोधी विहाराच्या ताब्याचा प्रश्न सोडवायला ब्रिटिश आधी अनुकूल होते. मात्र अनागारिक धर्मपालांच्या जपानी सधन बौद्धांच्या सहाय्याने या परिसराच्या जवळ काही वास्तू उभ्या करण्याच्या प्रयत्नांनी ब्रिटिश सावध झाले. जपान आणि इंग्लंड यांचे तणावाचे संबंध लक्षात घेता, जपान्यांचे हे हेरगिरीचे प्रयत्न असावेत या संशयाने बिथरलेल्या ब्रिटिशांनी वास्तू बांधण्याचा हा उपक्रम मोडून काढला आणि एकूणच या मुद्द्याला जैसे थे ठेवले.

काँग्रेसने या मुद्द्यावर १९२२ साली राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अन्य सहा सदस्यांत बोधगयेचे ‘महंत’, स्वामी दयानंद सरस्वती, बाबू ब्रजकिशोर प्रसाद, के. पी. जयस्वाल यांच्याखेरीज बौद्धांच्या वतीने केवळ भिख्खू अनागरिक धर्मपाल यांचा समावेश होता. हिंदुमहासभा त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व सर्वार्थाने मान्य करणारी संघटना होती. हिंदूमहासभेने आपल्या सभेत विहाराचा ताबा हिंदू आणि बौद्ध यांच्याकडे संयुक्तपणे असावा, असा ठराव केला. बुद्धाला हिंदू विष्णूचा नववा अवतार मानतात; त्यामुळे तो हिंदूंचाही आहे, या मान्यतेचा आधार त्यांनी यासाठी घेतला. खरे म्हणजे, ब्राम्हणी वैदिक धर्माविरोधात उभ्या ठाकलेल्या बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करणे हे विरोधकाला आत्मसात करुन संपवण्यासाठी केलेले अपहरण आहे. परंतु ‘पाच बौद्ध आणि पाच हिंदू यांच्याकडे या स्थळाचा ताबा असावा’ अशी शिफारस राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

अनागारिक धर्मपालांच्या नंतर जे महत्वाचे प्रयत्न महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी झाले त्यातला महत्वाचा प्रयत्न थोर बौद्ध विद्वान राहुल सांकृत्यायन यांचा होता. राहुल सांकृत्यायन काँग्रेसचे सचिव असताना त्यांनी महाबोधी विहाराचा मुद्दा महात्मा गांधीजींपुढे मांडला. स्वातंत्र्य आंदोलनात कोणतीही फाटाफूट नको, याबद्दल दक्ष असणाऱ्या गांधीजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर या प्रश्नाची सोडवणूक आपण करु, असे आश्वासन सांकृत्यायनांना दिले.

स्वातंत्र्य मिळाले आणि लगोलग १९४८ साली गांधीजींचा खून झाला. गांधीजींच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी केली नाही. उलट बिहार सरकारने घटना समितीचे कामकाज सुरु असतानाच जून १९४९ मध्ये महाबोधी विहार कायदा केला. या कायद्यानुसार विहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी ९ जणांची समिती मुक्रर करण्यात आली. त्यात ४ हिंदू, ४ बौद्ध आणि गया जिल्ह्याचा हिंदू जिल्हाधिकारी अध्यक्ष असेल, असे ठरवण्यात आले. जर जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर अन्य हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून त्याच्या जागी नेमले जाईल, अशीही त्यात तरतूद होती. म्हणजेच ४ बौद्ध आणि ५ हिंदू. हिंदूंची बहुसंख्या. अर्थात निर्णयप्रक्रियेत हिंदूंचा वरचष्मा. या कायद्यात २०१३ साली दुरुस्ती करण्यात आली, ती जिल्हाधिकारी हिंदू नसला तरी तो या समितीचा अध्यक्ष होईल ही. यावेळी नितीश कुमारांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना जिल्हाधिकारी हिंदू असला पाहिजे ही अट संविधानातील धर्मनिरपेक्षतेला मारक असल्याने आम्ही ही दुरुस्ती करत आहोत, असे सांगितले. एकतर बिगर हिंदू कलेक्टर असण्याची शक्यता कमी. कारण कलेक्टर कोण नेमायचा हे सरकारच्या हाती असते. दुसरे म्हणजे समितीतले हिंदूंचे प्रतिनिधीत्व काढून टाकण्याचा मुद्दाच या दुरुस्तीत नव्हता. त्यांची ४ ही संख्या तशीच राहणार होती. कलेक्टर हिंदूच नेमला जाणार हेही उघड होते. त्यामुळे ५ हिंदूंची ९ जणांच्या समितीतली बहुसंख्या तशीच राहिली. पर्यायाने महाबोधी विहाराचा कब्जाही हिंदूंकडेच राहिला.

हा कायदा आजतागायत आहे. बिहारात काँग्रेस गेली. लालू यादव आले. ते जाऊन नितीश कुमार आले. तरी परिस्थिती जैसे थे. आंदोलन करणाऱ्या बौद्धांतल्या पुढाऱ्यांनाच समितीत घेण्याचे डावपेच आखून आंदोलनातील हवा काढण्याचे प्रयत्न या मंडळींनी केल्याचे बोलले जाते. पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात विहार देण्याने हिंदूंची नाराजी ओढवून घ्यायची या कोणाचीही तयारी नाही.

वास्तविक जगात आणि देशातही ज्या धर्माचे प्रार्थनास्थळ असते त्याच धर्माच्या लोकांचे त्याच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आढळते. मग महाबोधी विहार त्याला अपवाद कसे? शिवाय सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती होऊन तो तथागत बुद्ध झाला, ते हे जगातील बौद्धांचे सर्वात पवित्र स्थळ. ते बौद्धांच्या ताब्यात असू नये का? आज या महाबोधी विहारात आरती होते, स्तूपाला शिवलिंग बनवून त्यावर दुधाचा अभिषेक होतो, बुद्धाच्या पाच शिष्यांच्या मूर्तींना पाच पांडव म्हणून सांगितले, पुजले जाते. पिंडदान राजरोस सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बौद्धांचे केंद्र आणि युनोने जागतिक वारसा मानलेल्या या विहाराची अशी विटंबना नियमित सुरु आहे.

प्रार्थनास्थळे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात असावीत, हा संकेत व विवेक केवळ नाही. तर तो सांविधानिक अधिकार आहे. आपल्या संविधानात अनुच्छेद २६ नुसार प्रत्येक धार्मिक गटास आपल्या धार्मिक प्रयोजनासाठी संस्था चालवण्याचा, त्याचे नियमन करण्याचा, धार्मिक व्यवहार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. अनुच्छेद १३ मध्ये संविधान निर्मितीच्या आधीचे मूलभूत अधिकारांचे हनन करणारे कायदे रद्द समजले जातील असे नमूद आहे. १९४९ चा महाबोधी विहार कायदा हा संविधान मंजूर आणि लागू होण्याच्या आधीचा आहे. मग संविधान लागू झाल्यावर तो निरस्त न होता चालू कसा राहिला? या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन दशक झाले. तथापि, अजून त्याची सुनावणी झालेली नाही.

बौद्ध विरुद्ध हिंदू अशा स्वरुपात या मुद्द्याकडे म्हणून पाहू नये. अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या बौद्धांची साधी मागणी आहे, आमचे प्रार्थनास्थळ आमच्या ताब्यात द्या. त्यासाठी संविधानाच्या विरोधात असलेला बिहार सरकारचा १९४९ चा महाबोधी विहार कायदा रद्द करा. आता हे विहार जागतिक वारसा म्हणून युनोने जाहीर केले आहे. त्यानुसार त्याचे हिंदूकरण थांबवून त्याचे मूळ स्वरुप टिकवणे ही केंद्राच्या पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे. पुरातत्व खाते आणि राज्यशासन यांनी पुरातन वारसा म्हणून त्याच्या देखभालीत जरुर लक्ष घालावे; पण बाकीचे धार्मिक विधी आणि आनुषंगिक जबाबदारी ही पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यायला हवी.

ही मागणी संविधानातील मूलभूत हक्काची आहे. म्हणूनच ती केवळ बौद्धांची न राहता सर्व भारतीयांची व्हायला हवी.

- सुरेश सावंत,sawant.suresh@gmail.com

(लोकसत्ता, २१ मार्च १९८३)

Tuesday, March 11, 2025

विजयालक्ष्मी पंडित


विजयालक्ष्मी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या भगिनी. या दोघा बंधु-भगिनींना प्रश्न विचारताना पत्रकार कसा फरक करतात, याबद्दल त्या लिहितात – ‘एकदम थेट, स्पष्ट आणि बुद्धिगम्य प्रश्न माझ्या भावाला विचारले जातात. मीही सार्वजनिक कार्य करते. मात्र मला विचारले जाणारे प्रश्न माझे कपडे, मुलं आणि आपला विवेक शाबूत ठेवायला सधन घरातल्या महिला करत असलेल्या किरकोळ उपक्रमांविषयी असतात.’

बाई आणि तीही बड्या घरची विशेष ते काय करणार? विशेष कर्तबगारी ही पुरुषाची मक्तेदारी, ही धारणा या पत्रकारांची पक्की असते. स्त्रियांना दुय्यम समजणाऱ्या या वृत्तीबद्दल विजयालक्ष्मींना संताप येतो. उदारमतवादी, प्रगत विचारांचे वडील-भाऊ असतानाही स्वतःच्या घरात या दुय्यमतेच्या कडवट अनुभवातून त्या गेलेल्या असतात.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत असताना बाईला दुय्यमतेचं हे अधिकचं ओझं कायम वागवावं लागतं. संविधानसभेतल्या ज्या महिलांविषयी आपण समजून घेत आहोत, त्या सर्व महिलांच्या विचारात-कामात हा मुद्दा ठसठशीतपणे येतो हे आपल्या लक्षात आलंच असेल.

आज विजयालक्ष्मी पंडितांविषयी अधिक जाणून घेऊ.

अलाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराजमध्ये १८ ऑगस्ट १९०० रोजी स्वरुप कुमारींचा जन्म झाला. विजयालक्ष्मी हे त्यांचं लग्नानंतरचं बदललेलं नाव. वडील मोतिलाल नेहरु आणि आई स्वरुप राणी. आई आणि लेक दोहोंच्या नावात स्वरुप असलं तरी आई राणी आणि लेक कुमारी. स्वरुप कुमारीला घरी लाडानं ‘नन्ही’ म्हटलं जाई. थोरला भाऊ जवाहरलाल आणि स्वरुप कुमारी यांच्यात ११ वर्षांचं अंतर होतं. इथलं नेहरु कुटुंबीयांचं निवासस्थान ‘आनंद भवन.’ राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचं ते एक केंद्र होतं. पुढे नेहरु कुटुंबानं काँग्रेस पक्षाला ते देणगीस्वरुपात दिलं.

मोतिलाल नेहरु काँग्रेस पक्षाचे मोठे नेते. नामांकित वकील. उच्चभ्रू राहणी. प्रगतीशील विचार. तरीही स्वरुप कुमारीला बाहेर शिकायला पाठवलं जात नाही. तिचं औपचारिक शिक्षण होत नाही. तिला घरीच खाजगी शिकवणी लावली जाते. स्वरुपला पुढे विद्यापीठात शिकायला जायचं असतं. मात्र त्यास नकार मिळतो. भाऊ जवाहरलाल मात्र लंडनला उच्च शिक्षण घेत असतो. एका बाजूला स्त्रियांच्या अधिकारासाठी आवाज उठवणं आणि दुसरीकडं आपल्याच मुलीला शिक्षणासाठी घराबाहेर पडू न देणं, या वडिलांच्या विरोधाभासी वागण्याची विजयालक्ष्मींनी आपल्या लिखाणात नोंद केली आहे.

इथं एक लक्षात घ्यायला हवं. नेहरु कुटुंबीयांचं घर आनंद भवन हेच एक विविध अनुभवांची, संस्कारांची शाळा असते. पाश्चात्य जीवनशैली, ब्रिटिश स्नेह्यांचं घरी येणं-जाणं, काँग्रेसच्या नेत्यांच्या चर्चा यांतून स्वरुप कुमारींचे विचार आणि वृत्ती घडत होती. विरोधकांशी संघर्ष करताना माणूस म्हणून त्यांच्याबद्दल द्वेषभाव न बाळगणं हा मोठा संस्कार आमच्यावर झाल्याचं विजयालक्ष्मी नमूद करतात. ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष आणि तरीही ब्रिटिश व्यक्तींशी मैत्री हे दृश्य त्या घरातच पाहत होत्या.

एकदा गोपाळ कृष्ण गोखले घरी येतात. तिला विचारतात – “तू घातलेले कपडे स्वदेशी आहेत का?” त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून भारतातल्या कापड उद्योगाला चालना मिळण्याचं महत्व स्वरुप कुमारीला कळतं. १९१६ साली लखनौला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला स्वरुप कुमारी जाते. अॅनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांच्या भाषणांनी ती प्रभावित होते. आयरिश होमरुल चळवळीनं आपल्या इथल्या होमरुल चळवळीला कशी प्रेरणा दिली हे तिला यातून समजतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच आंतरराष्ट्रीय चळवळींचा अवकाश तिच्या लक्षात येतो.

गांधीजींच्या प्रभावामुळे आपल्या घरातली उंची राहणी साधी झालेली स्वरुप कुमारीनं पाहिली होती. मात्र साबरमती आश्रमात गेल्यावर तिथली अगदी काटसरीची राहणी आणि नैतिकतेचे नियम तिला भावले नाहीत. गांधीजींविषयी आदर पण त्यांच्या सगळ्याच भूमिकांशी सहमती नाही, असा एक गट काँग्रेसमध्ये होताच. त्यात स्वरुप कुमारीचा समावेश झाला.

१९२० च्या सुमारास रणजित पंडित नावाचा तरुण बॅरिस्टर आनंद भवनध्ये येतो. एका कायदेशीर प्रकरणात त्याला मोतिलाल नेहरुंचा सल्ला हवा होता. आनंद भवनमध्ये मुक्काम असताना त्याची आणि स्वरुप कुमारीची भेट होते. इथंच त्यांची मैत्री होते आणि लग्नही ठरतं. कुटुंबाची मान्यता मिळते. १९२१ च्या १० मे रोजी लग्न समारंभ ठरतो. एक अडचण उभी राहते. गांधीजींचा आग्रह असतो, नवरीनं खादीची साडी नेसायची. अजिबात दागिने घालायचे नाहीत. स्वरुप कुमारीची आई याला तीव्र विरोध करते. लग्नानंतर आशीर्वाद घ्यायला नवं जोडपं गांधीजींना भेटतं. गांधीजी त्यांना विनासंबंध, विनापत्य केवळ मित्र म्हणून राहण्याची सूचना करतात. विजयालक्ष्मी ही सूचना उडवून लावते. तिला चारचौघांसारखं ‘सामान्य वैवाहिक जीवन’ जगायचं असतं.

लग्नानंतर रणजित आणि विजयालक्ष्मी राजकोटला, रणजितच्या घरी राहायला लागतात. रणजितच्या घरची माणसं या लग्नावर नाखुश असतात. आपल्या मुलाचं भविष्य ब्रिटिशविरोधात लढणाऱ्या नेहरु परिवाराशी संबंध आल्यानं धोक्यात येईल अशी त्यांना भीती वाटत होती. पंडित कुटुंब आता राजकोटला राहत असलं तरी त्यांचं मूळ घराणं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. या जोडप्याला तीन मुली होतात. त्यातल्या एक प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल. १९२६ ला पंडित कुटुंब अलाहाबादला स्थलांतरित होतं.

विजयालक्ष्मी अलाहाबादला काँग्रेसच्या कामात उत्साहानं भाग घेऊ लागतात. ब्रिटिशविरोधी मोर्चे, सभा संघटित करु लागतात. भाषणं देऊ लागतात. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचे वडील, भाऊ आणि नवरा तुरुंगात जातात. वडील मोतिलाल नेहरु तुरुंगात आजारी पडतात आणि १९३१ साली त्यांचा आजार बळावून निधन होतं. एक वर्षानंतर विजयालक्ष्मींना शहर काँग्रेस समितीच्या सभेचं नेतृत्व करण्याच्या आरोपाखाली सश्रम कारावासाची शिक्षा होते. विजयालक्ष्मींना लखनौच्या तुरुंगात ठेवलं जातं. तिथं त्यांना वेगळ्याच वास्तवाची प्रचिती येते. स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक तुरुंगात आपापल्या जातीच्या तथाकथित श्रेणी पाळत होते. ही बाब जवळपास ९० वर्षांनी आताही आपल्या तुरुंगात आढळते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं तुरुंगातील जातिभेदांना लगाम घालण्याचे आदेश अलीकडेच दिले.

१९३४ साली विजयालक्ष्मी अलाहाबाद नगरपालिकेवर निवडून गेल्या. शिक्षण समितीच्या अध्यक्ष झाल्या. पोषक आहार म्हणून केवळ दूध दिलं जाई. त्याऐवजी त्यांनी मध्यान्ह भोजन योजना सुरु केली. त्यासाठीचा पुरेसा निधी नगरपालिकेकडं नसल्यानं लोकवर्गणीतून त्यांनी तो उभारला. शिक्षण समितीच्या त्या अध्यक्ष असतानाच एक घटना घडली. एक तरुण विधवा शिक्षिका गरोदर राहिल्यानं तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. विजयालक्ष्मी शालेय प्रशासनाच्या या कृतीवर संतापल्या. हा अन्यायकारक नियम बदलण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. पण उपयोग झाला नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर त्या विधवा शिक्षिकेचं मूल दत्तक देऊन तिला नवी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न केले. पण संबंधित पुरुषाला मोकळं सोडून स्त्रीला दोषी ठरवणारा दांभिक नियम काही त्या बदलू शकल्या नाहीत. त्या म्हणतात हा मुद्दा सामाजिक संरचनेचा आहे. एखाद-दोन हस्तक्षेपांनी तो बदलणं कठीण आहे.

१९३६-३७ साली विजयालक्ष्मी संयुक्त प्रांताच्या विधान सभेवर कानपूरमधून निवडून गेल्या. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य खात्याचं कॅबिनेट मंत्री केलं जातं. भारतातल्या त्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. स्त्रियांच्या समान अधिकारांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय महिला परिषदेत त्या सक्रिय असतात. १९३८ साली परिषदेच्या त्या उपाध्यक्ष आणि १९४२ साली अध्यक्ष होतात. या पदाचा वापर करुन जगातल्या महिलांना युद्धाच्या विरोधात उभं राहण्याचं त्या आवाहन करतात. युद्धात वित्त, मनुष्यहानी होते. पण मनुष्यहानीत मुख्यतः स्त्रिया आणि मुलं मारली जातात. नवरे मारले गेल्यानं बाईवर त्या घराची अख्खी जबाबदारी पडते. युक्रेन, गाझा, इराण, जेरुसलेम इथल्या हल्ल्यांत आपण हे आता अनुभवत आहोत.

१९४२ च्या उठावानंतर ब्रिटिशविरोधी संघर्षाला तेज चढलं. अटकसत्र जोरात सुरु झालं. पंडित पति-पत्नी दोघंही तुरुंगात गेली. तुरुंगवासामुळे १९३२ सालापासूनच तब्येत ढासळत गेलेल्या रणजित पंडितांचा या वेळचा तुरुंगवास जीवावर बेतला. १९४३ साली बरेली तुरुंगात योग्य उपचाराविना त्यांचा मृत्यू झाला. विजयालक्ष्मी आणि पंडित कुटुंबावर हा मोठा आघात होता. आधी वडील आणि आता नवरा दोघंही तुरुंगवासात तब्येत ढासळल्यानं गेले.

रणजित पंडितांच्या मृत्यूनं दुसरं एक संकट विजयालक्ष्मींवर आलं. त्यांना मुलगा नसल्यानं रणजित पंडितांच्या संपत्तीवर त्या किंवा मुली अधिकार सांगू शकल्या नाहीत. सासरच्यांनी स्वतःहून काही हिस्सा द्यायला नकार दिला. रणजित आणि विजयालक्ष्मी या दोघांचं संयुक्त खातंही दीरानं गोठवलं. मुलींनाही वारसा हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाची किती गरज होती, हे यावरुन लक्षात येतं. तसा कायदा त्यावेळी असता तर हा प्रसंग विजयालक्ष्मी आणि त्यांच्या मुलींवर आला नसता.

पती गेल्यावर विजयालक्ष्मींवर कामाचा बोजा आणखी वाढला. कलकत्त्याला दुष्काळात मदत करायला त्या गेल्या. तथापि, तेथून लगेचच गांधीजींनी त्यांना अमेरिकेला पाठवलं. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं यासाठी अमेरिकेचा दबाव यावा म्हणून अमेरिकेचं जनमत संघटित करणं, तिथल्या विविध घटकांशी संवाद करणं, परिषदांत बाजू मांडणं हे शिष्टाईचं काम विजयालक्ष्मींना अमेरिकेत जाऊन करायचं होतं. पण याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारनं त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला. अखेर काही खटपटींनंतर अमेरिकन लष्करी विमानानं विनापासपोर्ट त्या अमेरिकेला पोहोचल्या. खुद्द तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनीच ही मदत केली असं बोललं जातं.

संविधानसभेवर त्या निवडल्या गेल्या. पण तिथं फार काही त्या करु शकल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्याच्या, शिष्टाई करण्याच्या जबाबदाऱ्या विजयालक्ष्मींवर येत गेल्यानं त्यांना बराच काळ परदेशी राहावं लागे. मॉस्को, मेक्सिको आणि वॉशिंग्टन येथे राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. एक वर्षानंतर त्यांनी एकाच वेळी इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं.

विजयालक्ष्मी भारतात परतल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९६४ ते १९६८ पर्यंत त्या लोकसभेत खासदार राहिल्या. त्यानंतर सक्रिय राजकारणातून त्या निवृत्त झाल्या. मात्र जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी त्यांनी उघडपणे आपली भाची इंदिरा गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतली.

१ डिसेंबर १९९० रोजी डेहराडून येथे त्यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आणीबाणीच्यावेळी विरोधकांना तुरुंगात टाकणं, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं याबद्दल एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या – ‘असहमती प्रकट करण्याच्या अधिकाराशिवाय लोकशाही टिकू शकत नाही.’ किमान एवढ्याचा आग्रह सार्वजनिक जीवनात आपण धरणं ही विजयालक्ष्मी पंडितांना उचित आदरांजली ठरेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा शेवटचा सोळावा भाग ११ मार्च २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.