Friday, July 4, 2025

यशवंत मनोहरांच्या दोन नव्या पुस्तकांचे स्वागत

१) In the Rain of Fire (‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’चा इंग्रजी अनुवाद)


‘In the Rain of Fire’ हा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या यशवंत मनोहर यांच्या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद. तो केला आहे स्वतः कवी असलेल्या विवेक काटीकर यांनी. अग्निपरीक्षेचे वेळापत्रक हा ५५ कवितांचा काव्यसंग्रह; खरं म्हणजे काव्यग्रंथ. ३३५ पानांचा. यातल्या अनेक कविता दीर्घ आहेत. २०२१ साली हा कवितासंग्रह आला आणि यावर्षी २०२५ ला त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. तोही ३२८ पानांचा. मनोहरांच्या कविता गूढ नाहीत. किंबहुना कवीला म्हणायचंय त्याहून वेगळा अर्थ कवितांचा वाचकांना लागण्याच्या ते विरोधातच आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कवितालेखन करणाऱ्या मनोहरांची प्रतिभा आजही नवोन्मेषशाली आहे. त्यांची शैली आणि शब्दांची नवनिर्मिती कायम तसेच टवटवीत आहे. प्रगल्भतेचा अधिकाधिक उन्नत थर ती गाठतेच आहे. अशावेळी हे सारं इंग्रजीत आणणं हे विलक्षण आव्हान होतं. या आव्हानाला भिडण्याचं धैर्य विवेक काटीकर यांनी दाखवलं आहे.

माहितीपर गद्याचा अनुवाद आणि सर्जक साहित्याचा अनुवाद यांत जमीनअस्मानाचे अंतर असते. कवितेचा अनुवाद ही तर आणखी कठीण बाब. मूळ कवीची शैली, त्याने खेळवलेले, योजलेले शब्द, त्यांचे क्रम आणि यांतून येणारी तिची लय अनुवादात आणणे हे तर महाप्रचंड आव्हान. विवेक काटीकर त्याला सामोरे गेले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यशवंत मनोहरांची कविता ही सर्वसाधारण कविता नव्हे. सर्व तऱ्हेच्या विरुपतांतून मानवतेला मुक्त करण्याचा तो एल्गार आहे. त्यामुळेच तो मराठीपुरता न राहता जगातील अधिक विस्तृत मानवसमूहांपर्यंत पोहोचवणे आवश्यकच होते. ते काम काटीकर यांनी केले आहे. यासाठी त्यांना धन्यवाद.

अनुवाद करण्याची काय पद्धत अनुसरली याबद्दल या पुस्तकाच्या सुरुवातीलाच काटीकर यांनी लिहिले आहे. ते म्हणतात – ‘I adopted ‘meaning to meaning’ approach rather than ‘word to word approach.’’ अर्थात हे त्यांनी योग्यच केलं. भाषेला लीलया वळवणाऱ्या, नित्यनव्या शब्दनिर्मितीने तिला श्रीमंत करणाऱ्या, शब्दांना बागडवणाऱ्या मनोहरांच्या कवितांचा शब्दशः अनुवाद करणं ही किती अवघड गोष्ट आहे, हे खालचं एक उदाहरण पाहिलं तरी लक्षात येईल.

‘नदीमाय’ कवितेच्या १५ व्या भागात ते म्हणतात –

‘अशा अनेक नद्यांमधून
पाण्याऐवजी जीवनच वेल्हाळताना मी बघितले.’

काटीकरांनी इंग्रजीत केलेला याचा अनुवाद पहा –

‘I saw in such rivers, not water,
But life manifesting itself.’

मूळ मराठी कवितेत पाण्याला समानार्थी असलेला शब्द ‘जीवन’ हा आयुष्य या अर्थी मनोहरांनी वापरला आहे. पण या जीवनाचे ‘वेल्हाळणे’ पाणी या अर्थी खळखळत्या प्रवाहाच्या प्रतिमेशी समरुप आहे. वाचकाला सोबत दुडदुडवायला लावणाऱ्या मूळ मराठीतलं हे प्रतिमा-सौंदर्यसामर्थ्य इंग्रजीत कसं येणार? इंग्रजीत water आणि life हे समानार्थी आणि तरीही वेगळ्या अर्थाचे असे शब्द नाहीत. काटीकरांना ‘manifesting’ वरच भागवावे लागले आहे. मूळ इंग्रजीतून मराठीत अनुवाद करतानाही हीच अवस्था झाली असती. सर्जक साहित्याच्या - त्यातही कवितेच्या अनुवादाची ही नैसर्गिक मर्यादा आहे.

यशवंत मनोहरांची कविता इंग्रजीत आल्याने इंग्रजीचा परिचय असलेल्या जगातील व्यापक समुदायांपर्यंत ती पोहोचेलच. पण उद्या इंग्रजी न जाणणाऱ्या समुदायांपर्यंतही इंग्रजीतून त्यांच्या भाषेत अनुवाद होऊन पोहोचण्याच्या शक्यता रुंदावल्या आहेत. यशवंत मनोहरांची कविता अशारीतीने जगात जाण्याची आवश्यकता आणखी एका कारणाने मला वाटली. ते म्हणजे या ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या कवितासंग्रहाला यशवंत मनोहर यांनी जोडलेला ‘मी अशीच कविता का लिहितो?’ हा उपोद्घात. ‘In the Rain of Fire’ या इंग्रजी अनुवादातही तो आहे. साहित्याचा हेतू काय? लेखकाच्या भूमिकांचा प्रभाव त्याच्या साहित्यावर पडावा का?..या प्रश्नांवर भारतातच नव्हे, तर जगभरच्या कलाविश्वात आजही वाद झडतात. यशवंत मनोहर त्यांना म्हणायचे ते फक्त कवितेत म्हणून थांबत नाहीत. मी मला वाटते ते लिहिले, आता वाचकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊदे म्हणून सोडून देत नाहीत. आपले साहित्यहेतू थेट, सुस्पष्ट मांडतात. उच्चरवात जाहीर करतात. काहीही हातचे न राखता आपला संदर्भ अवकाश, आपली वैचारिक परंपरा रेखांकित करतात. ही त्यांची अनन्यता जगाला कळणे गरजेचेच होते. त्याची संभाव्यता या इंग्रजी अनुवादाने वाढली आहे.

मराठी उपोद्घातातली ही काही विधाने पाहिल्यावर आपल्यालाही त्याची सत्यता पटेल :

- मी कविता लिहितो म्हणजे अस्तांच्या नोंदीही लिहितो आणि क्षितिजाला येणाऱ्या नव्या पालवीचीही चाहूल लिहितो.

- बुद्ध, लोकायत, सॉक्रेटिस, मार्क्स, जोतीबा फुले, सार्त्र, रसेल, रामस्वामी नायकर आणि बाबासाहेब आंबेडकर अशा लाखो प्रज्ञावंतांनी हा सर्वोच्च नीतीचा इहवादी आदर्श मला सांगितला आहे.

- कविता अर्थमयच असते. कवितेची ही अर्थमयता कवीच्या जीवनदृष्टीतूनच उगवलेली असते.

- माझी कविता अज्ञान, विषमता आणि भ्रम तुडवितच पुढे जाते आणि सर्वहिताय नीतीने सांगितलेला कवितेचा अर्थ हाच माझ्या कवितेचा प्राण आहे असेच मी मानतो.

- (कवितेतून) स्वतःच्या सोयीचा अर्थ काढण्याची ही सोय कवीलाच नाकारीत असते. कवीचे सत्य नाकारण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले या लोकांना? हे चैतन्यवाद्यांचे लबाड सौंदर्यशास्त्र आहे.

- कवितेतला अर्थरहित मानणे आणि वाचकाला त्याला हवा तसा अर्थ घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजेच कवीच्या पुनर्रचनाशील व्यक्तिमत्वाला नकार देणेच असते.

- कवी केशवसुतांची कविता ही आजही माझी पहिली तात्त्विक आवड आहे.

- केशवसुत काही परलोकवादी प्रतिभेचे कवी नव्हते. ‘देव दानवा नरे निर्मिले’, ‘ब्राम्हण नाही हिंदुही नाही...’, ‘वंदुनिया ह्या देवांलागुनि धाई धाई मानव रडती...’, ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत’ आणि ‘जग हे बदलायाचे’ हे केशवसुतांचे इहवादी क्रांतिकारी आशयविश्व बाजूला करुनच केशवसुतांसंबंधीचा आदर व्यक्त केला गेला. हा धागा १९६० नंतरच्या काही प्रतिभांनीच पुढे नेला असे मला नम्रपणे वाटते.

हे टिपण मराठी वाचकांना ‘In the Rain of Fire’ चा परिचय व्हावा म्हणून लिहिले आहे. त्यामुळे वरील विधाने मूळ मराठी पुस्तकातूनच घेतली. इंग्रजीत त्यांचा उत्तम अनुवाद विवेक कानिटकर यांनी केला आहे.

_____________________________

In the Rain of Fire

By Yashwant Manohar

Translation: Vivek Katikar

Red Sparrow A Media House

Mob: 8530675264 / 9529593553

Price: Rs. 1200

_____________________________

मनोहरांनी ‘In the Rain of Fire’ हे पुस्तक ‘मराठी क्रांतिकारी साहित्याचे संस्थापक डॉ. म. ना. वानखडे यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण’ केले आहे. याच म. ना. वानखडे यांच्यावरच्या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. त्याविषयीचा परिचय पुढे करुन घेऊ.


२) क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ








आपल्या प्रतिभेचा आणि व्यासंगाचा सर्जनशील तसेच वैचारिक आविष्कार करणारी शेकड्याहून अधिक पुस्तके यशवंत मनोहरांनी लिहिली आहेत. त्यात हे पुस्तक नसते तर काही तरी राहून गेले आहे, असे वाटले असते. अर्थात, हे आपल्याला जाणवते ते त्यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचूनच. साहित्यातला एक लखलखीत प्रवाह म्हणून आज देश-विदेशात दखलपात्र झालेल्या ‘विद्रोही दलित साहित्य’ या इमारतीची ओळख, चौकट आणि चबुतरा सिद्ध केला तो म. ना. वानखडे यांनी. मनोहरांच्या भाषेत ‘ज्ञानयुद्धातील आधुनिक अर्हत’ असलेले म. ना. वानखडे येणाऱ्या पिढ्यांना कळण्याची सोय यशवंत मनोहर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाने झाली आहे. वास्तविक, वानखडेंच्या एकूण साहित्याचे संकलन, अनुवाद करवून घेऊन ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’ या नावाने १९७९-८० साली निघालेले पुस्तक वामन निंबाळकरांसमवेत यशवंत मनोहरांनीच संपादित केले होते. ‘क्रांतदर्शी म. ना. वानखडे’ या पुस्तकात मनोहरांनी पाच पिढ्यांच्या लोकांना लिहायला लावले आहे. यात त्यांचे समकालीन सहकारी, विद्यार्थी तसेच नातेवाईक आहेत. या प्रत्येकाच्या नजरेतून, आकलनातून आणि अनुभवातून वानखडेंचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि थोरवी आपल्यासमोर साकारते. विचार, आठवणी आणि परिशिष्टे अशा तीन भागांत या पुस्तकाची विभागणी आहे. एकूण ६५ लेख आणि मनोहरांची एक मुलाखत यात आहे. (लेखक व त्यांचे लेख यांची कल्पना येण्यासाठी अनुक्रमणिकेचे फोटो सोबत देत आहे.)

१९२४ ते १९७८ असे केवळ ५४ वर्षांचे आयुष्य लाभलेले मनोहर नामदेवराव वानखडे मूळचे अमरावती जिल्ह्यातले. तेजस्वी व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक राहिला. मराठवाड्यासारख्या मागास भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाद्वारे उच्चशिक्षणाचा पाया रचला. मिलिंद हे आंबेडकरोत्तर चळवळीच्या विविध क्षेत्रांत भरारी घेणारे कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ बनले. या उद्देशानेच बाबासाहेबांनी या कॉलेजमधील प्राध्यापक निवडताना व्यक्तिशः लक्ष दिले. वानखडेंना त्यांनी स्वतः मिलिंदमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवडले. पुढे परदेशातील उच्च शिक्षणासाठी ज्या १४ जणांची बाबासाहेबांनी निवड केली, त्यात म. ना. वानखडे होते. इंग्रजी साहित्यात एम. ए. आणि नंतर पी. एच. डी. वानखडेंनी केली. परदेशातून परतल्यावर पुन्हा त्यांनी मिलिंदमध्ये प्राध्यापकी सुरु केली. मिलिंदचे प्राचार्य म. भि. चिटणीस मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून गेल्यानंतर डॉ. वानखडे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

बाबासाहेबांना अभिप्रेत विद्यार्थी घडवणे हे त्यांचे मिशन होते. ज्या अभावग्रस्त पार्श्वभूमीतून हे विद्यार्थी येत त्यातून येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांच्यात अस्मिता जागवणे, या विद्यार्थ्यांचा कल व गुण ओळखून त्यांना विषय सुचवणे, त्यात मार्गदर्शन करणे हे त्यांचे नित्यकर्म होते. खुद्द या पुस्तकाचे संपादक यशवंत मनोहर यांना मुदत संपल्यानंतरही त्यांना रुची असणाऱ्या कलाशाखेत प्रवेश मिळवून देणे, प्रथम वर्गात एम. ए. झाल्यावर आधी पैठण आणि नंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवून देणे यासाठी वानखडेंनी सहाय्य केले. मनोहरासंहित वानखडेंच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या या मदतीच्या व्यक्तिगत अनुभवांची या पुस्तकात कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरुन येते. यशवंत मनोहर पुस्तकाच्या शेवटच्या भागातील आपल्या मुलाखतीत म्हणतात – ‘माझे सगळे वाङ्मयीन व्यक्तिमत्व आहे ते डॉ. म. ना. वानखडेंमुळेच निर्माण करण्याची संधी मला मिळाली. जर दुसरे कोणी प्रिन्सिपॉल असते आणि त्यांनी मला प्रवेश दिला नसता तर माझे आयुष्य वैराण झाले असते. मी यशवंत मनोहर होऊ शकलो नसतो.’ सुधीर रसाळ हेही वानखडेंचे विद्यार्थी. ते लिहितात – ‘वानखडे सरांनी पंधरा एक पुस्तकांची यादी मला दिली. ही पुस्तके कोणत्या क्रमाने वाचायची हेही मला समजावून सांगितले. मी आता मराठीतला एक चांगला समीक्षक म्हणून ओळखला जातो. खरे म्हणजे त्याचे श्रेय वानखडे सरांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादीला आणि त्यांनी ती कोणत्या क्रमाने वाचायची याबद्दल दिलेल्या सल्ल्याला आहे. ’

विद्यार्थ्यांना असे सहाय्य करण्याबद्दल वानखडेंची भूमिका काय होती? मिलिंद महाविद्यालयाच्या ७५-७६ च्या वार्षिकांकात लिहितात – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच मी विद्यार्थ्यांच्या बाजूने कायम उभा राहिलो...त्यांनी माझ्या हाती दिलेली ही ज्ञानाची ज्योत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्त केली.’

अमेरिकेतल्या वास्तव्यात कृष्णवर्णीय विद्रोही चळवळीचा परिचय, त्यांच्या साहित्याचा अभ्यास यांतून म. ना. वानखडेंना भारतात दलित विद्रोही साहित्याला गती देण्याची प्रेरणा मिळाली. भारतात आल्यावर ‘प्रबुद्ध भारत’ मध्ये त्यांनी ‘दलितांनो, विद्रोही वाङ्मय लिहा’ हा लेख लिहिला. याचा अर्थ दलित साहित्य त्या आधी लिहिले जात नव्हते असे नव्हे. शंकरराव खरात, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागूल आदि मंडळी आपल्या लेखणीतून दलित जीवन चितारतच होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकांना काय व कसे लिहावे याबद्दल मार्गदर्शन करताना काय म्हणतात, हे डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या लेखात भालचंद्र फडकेंच्या पुस्तकातील संदर्भ देऊन नोंदवले आहे. बाबासाहेब म्हणतात – ‘मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचे आहे की उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिक मूल्ये यांचा आपल्या साहित्यप्रकारातून आविष्कार करा. आपले लक्ष आकुंचित, मर्यादित ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका. तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करु नका. तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असे प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे फार मोठे जग आहे, हे विसरु नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजावून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे.’

बाबासाहेबांनी मांडलेल्या या साहित्याच्या प्रयोजनाची बांधबंदिस्ती म. ना. वानखडेंनी केली. सर्वसाधारण मराठी साहित्याहून दलित साहित्याचे वेगळेपण काय, याची चौकट त्यांनी रचली. विद्रोह हा त्याचा अंगभूत व अनन्य गाभा कसा याची मीमांसा केली. विद्रोही दलित साहित्याची एक आखीव व्याख्या त्यांनी केली. ‘मिलिंद साहित्य सभा’ स्थापून साहित्यविषयक उपक्रमांसाठी एक संस्थात्मक मंच तयार केला. प्रस्थापित प्रकाशने दलित साहित्य प्रकाशित करणे कठीण. त्यासाठी त्यांनी ‘अस्मिता’ हे त्रैमासिक सुरु केले. सरकारी नियमांमुळे त्याचेच पुढे ‘अस्मितादर्श’ नामकरण झाले. त्यांना स्वतःला त्यात पुढे लक्ष घालता आले नाही, तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी ते चालवले. ‘अस्मितादर्श’ने अनेक लेखकांना संधी दिली. नवे लेखक घडवले.

म. ना. वानखडे यांच्या साहित्यविषयक भूमिकेची सूत्रे समजून घेण्यासाठी त्यांचे १९६७ सालच्या भुसावळच्या ‘महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलनाच्या’ अध्यक्षपदावरुन केलेले भाषण उपयुक्त ठरते. या कृतज्ञताग्रंथातील अनेक लेखकांनी त्याची नोंद घेतली आहे. के. व्ही. सरवदेंच्या लेखातील काही अवतरणे येथे देणे उद्बोधक ठरेल. ‘आजवरच्या साहित्यात हिंदू समाजातील वरच्या मानल्या गेलेल्या वर्गाचेच जीवन प्रतिबिंबित झाले’ असल्याचे सांगून वानखडे म्हणतात – ‘आधुनिक साहित्यात मध्यमवर्गीय पांढरपेशा अशा ब्राम्हण समाजाचे चित्रण आहे. कारण लेखक हा त्या वर्गातीलच होता. काही प्रमाणात या लेखकांना स्त्रियांचे दुःख जाणवले. हरिभाऊ आपट्यांनी स्त्रियांच्या परवशतेचे चित्रण ‘पण लक्षात कोण घेतो?’ मध्ये केले. देवलांनी ‘शारदा’ या नाटकामध्ये स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. पण त्यांना आम्हा दलितांची वेदना जाणवली नाही.’

(वानखडेंचे सहकारी व प्रथितयश लेखक भालचंद्र फडके यांनी आपल्या लेखात केशवसुतांचा ते याबाबतीत अपवाद करत अशी नोंद केली आहे.)

ग्रामीण साहित्याच्या प्रवाहानेही या काळात जोम धरला होता. त्याच्याशीही फारकत घेताना ते नोंदवतात – ‘यातही आपले जीवन नाहीच. उलट त्यात चितारलेले ग्रामीण जीवनही खरे नाही. शहरात बसून रोमँटिक चष्म्यातून पाहिलेले हे जीवन आहे...जीवनाचे वास्तव दर्शनच या मराठी लेखकांना झाले नाही.’

अन्य प्रगतीशील साहित्यप्रवाहसुद्धा त्यांना जवळचे वाटत नाहीत. त्याबद्दल वानखडेंची तक्रार अशी – ‘साम्यवाद किंवा गांधीवाद यांनी प्रेरित झालेल्या मराठी वाङ्मयातही आपले चित्र आढळत नाही. या मानवतावाद्यांच्या साहित्यातील हरिजनोद्धारात आईची माया नाही. दाईची भूतदया आहे. आणि भूतदया स्वाभिमानाला डिवचणारी आहे.’

वानखडेंचे हे भाषण ‘दलित साहित्याचा जणू जाहीरनामाच’ आहे असा निर्वाळा अनेकांनी या पुस्तकात दिला आहे.

म. ना. वानखडे यांचे सर्व म्हणणे सलगपणे या पुस्तकात नाही. तो या पुस्तकाचा हेतूही नाही. यशवंत मनोहर आणि वामन निंबाळकर यांनी वानखडेंच्या लिखाणाचे संपादन करुन या आधीच पुस्तक काढल्याचे वर नमूद केले आहेच. कृतज्ञताग्रंथातील लेखांतून वानखडेंच्या मांडणीचा, त्यांच्या व्यवहाराचा काय परिणाम झाला याचा दाखला मिळतो. या लेखकांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यापक वैचारिक क्षेत्रातील मूलभूत हस्तक्षेपाबद्दलची कृतज्ञता प्रत्येक पानातून पाझरताना वाचकाला दिसते. म. ना. वानखडे २०२४ साली शंभर वर्षांचे झाले असते. त्यांच्या जन्माच्या शंभरीनिमित्ताने काढलेल्या या ग्रंथाला संपादकांनी दिलेले ‘कृतज्ञताग्रंथ’ हे अगदी सार्थ नाव आहे.

या ग्रंथातील लेख म. ना. वानखडेंविषयी असले तरी अपरिहार्यपणे मिलिंद महाविद्यालय, नागसेन वन या सर्व परिसराचे दर्शन त्यातून वाचकांना घडते. भालचंद्र फडके यांनी त्याला ‘दलित साहित्याच्या नव्या प्रवाहाचे उगमस्थान’ म्हटले आहे. बाबासाहेबांनी उभारलेल्या तेथील वास्तूंत प्रत्यक्ष वावरलेल्यांच्या जीवनाचे सोने झालेच. पण बाबासाहेबांची प्रेरणा वसत असलेल्या या परिसरातील कणाकणांचा गंध या पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचतो. त्याला ऊर्जा देतो. असे पुस्तक संपादित करण्याचे कष्ट वयाच्या ऐंशीचा टप्पा पार केलेल्या यशवंत मनोहर सरांनी घेतले आणि ही ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल सरांच्या प्रति कृतज्ञता. त्यांना सहाय्य करणाऱ्या ‘संपादक कुटुंबा’ला मनापासून धन्यवाद.

वानखडेंसारख्या प्रज्ञावंताने समाजाला अजून खूप काही दिले असते. ५४ व्या वर्षी हृदयविकाराने अकस्मात त्यांचे निधन झाले. विचारवंताच्या दृष्टीने हे उमेदीचे वय असते. त्यांच्या या जाण्याने सगळेच हादरले. या पुस्तकातील लेखांतूनही ती व्यथा व्यक्त होते. म. ना. वानखडेंचे ‘मिलिंद’ मधील एक सहकारी व थोर समीक्षक रा. ग. जाधव यांचे एक अवतरण पुस्तकाच्या प्रारंभी दिले आहे. वानखडेंनी ज्याच्या काव्यावर प्रबंध लिहिला त्या त्यांच्या आवडत्या वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कवितेचा संदर्भ या अवतरणात घेऊन जाधवांनी वानखडेंना आदरांजली वाहिली आहे. त्याची नोंद करुन या पुस्तकाचा परिचय संपवतो.

‘ “अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर व्हिटमनने एक भावोत्कट विलापिका लिहिली. तिचा आशय असा – या माझ्या कप्तानाने नाव नीटपणे किनारी लावली. वाऱ्यावादळातून ती सांभाळून अखेर एका संकटग्रस्त सफरीने मंझिल गाठली. आता किनाऱ्यावरुन घंटानाद ऐकू येत आहे. सफर सफल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या मुखावर दृगोचर होत आहे. पण माझा कप्तान कुठे आहे? तो तर नावेत अचेतनपणे पडून आहे आणि माझ्या हृदयातून रक्ताचे थेंब ठिबकत आहेत.”

दलित साहित्याची नौका पहिल्या वादळी लाटांमधून सुरक्षितपणे सांभाळून या कप्तानाने नीटपणे किनारी लावली. पण त्याच्या जीविताची सफर मात्र निर्दयी नियतीने संपवून टाकली. माणूस पराधीन असतो हेच खरे. पण हे कप्ताना, तुझे कार्य कोण विसरेल? तुला शतशत प्रणाम!’

___________________________

क्रांतदर्शी म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ

संपादक – यशवंत मनोहर

प्रकाशक – प्राईम पब्लिशिंग हाऊस

संपर्क - ८९९९२३४५५६ / ९६६५६२६७१७

किंमत: ५५० रु.

_____________________________

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Tuesday, May 6, 2025

सामाजिक सद्भाव (दूरदर्शन वरील मुलाखत))


 https://youtu.be/lNIvAXMYp_8?si=gqeDBGXbHjzyCB-Q

सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते यांचा सामाजिक सद्भाव हा विशेष कार्यक्रम

निर्माता - विजय ढगे 

सखी सह्याद्रीमध्ये ३० जानेवारी २०१९ रोजी थेट प्रसारण झाले.


Friday, March 21, 2025

महाबोधी विहारला ‘मुक्ती’ची प्रतीक्षा !


जवळपास पंधरा वर्षांपूर्वी बिहारमधल्या बोधगयेच्या महाबोधी विहारात मी गेलो होतो. त्यावेळी बुद्धवंदना सुरु होती. वंदना संपली आणि उपरणे घातलेले पुरोहित हातात आरतीचे ताट घेऊन आत आले. त्यांनी आरती सुरु केली. ...हे पाहून मी अचंबित झालो. नंतर कळले की हे विहार निर्णायकपणे बौद्धांच्या ताब्यात नाही. तेथील व्यवस्थापन मुख्यतः हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हा प्रश्न खूप जुना आहे. त्याविरोधात अनेकवेळा आवाज उठवूनही तो अद्याप सुटलेला नाही. सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाने जोर पकडला आहे. महाबोधी विहाराच्या परिसरात उपोषणे तसेच देशात विविध राज्यांत आंदोलने सुरु आहेत. जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपिले केली जात आहेत.

विविध अभ्यासकांनी महाबोधी विहाराच्या इतिहासाबद्दल नोंदवलेल्या या काही बाबी :

ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, त्या परिसरात सम्राट अशोकाने बांधलेले हे विहार. २३०० वर्षांपूर्वी. नंतर गुप्त आणि पाल राजांनी त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या. बौद्धांचा कट्टर विरोधक असलेल्या ब्राम्हणी धर्माच्या बंगालच्या शशांक राजाने पालांवर आक्रमण करुन त्यांना पराभूत केले. पालांची महाबोधी विहार परिसरावरील देखरेख संपली. पुढे एका शैव महंताने हे विहार ताब्यात घेतले. अनेक पुरातत्व उत्खनने करणाऱ्या अलेक्झांडर कनिंघम या इंग्रज अधिकाऱ्याने या महाबोधी विहाराचा मातीत गाडला गेलेला भाग बाहेर काढून विहाराचे एकूण संकुल नीटनेटके केले.

शैव महंताच्या ताब्यातून हे विहार बौद्धांच्या अखत्यारित यावे यासाठी १८९० पासून अनागारिक धर्मपाल या मूळच्या श्रीलंकेच्या बौद्ध भिख्खूंनी आवाज उठवला. हे विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे, यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. जागतिक बौद्ध समूहांशी संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांच्या सहाय्याने बोधगया तसेच सारनाथ येथील परिसरातील बौद्ध स्थळांच्या विकासासाठी ते अविरत कार्यरत राहिले. महाबोधी विहाराच्या ताब्याचा प्रश्न सोडवायला ब्रिटिश आधी अनुकूल होते. मात्र अनागारिक धर्मपालांच्या जपानी सधन बौद्धांच्या सहाय्याने या परिसराच्या जवळ काही वास्तू उभ्या करण्याच्या प्रयत्नांनी ब्रिटिश सावध झाले. जपान आणि इंग्लंड यांचे तणावाचे संबंध लक्षात घेता, जपान्यांचे हे हेरगिरीचे प्रयत्न असावेत या संशयाने बिथरलेल्या ब्रिटिशांनी वास्तू बांधण्याचा हा उपक्रम मोडून काढला आणि एकूणच या मुद्द्याला जैसे थे ठेवले.

काँग्रेसने या मुद्द्यावर १९२२ साली राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अन्य सहा सदस्यांत बोधगयेचे ‘महंत’, स्वामी दयानंद सरस्वती, बाबू ब्रजकिशोर प्रसाद, के. पी. जयस्वाल यांच्याखेरीज बौद्धांच्या वतीने केवळ भिख्खू अनागरिक धर्मपाल यांचा समावेश होता. हिंदुमहासभा त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व सर्वार्थाने मान्य करणारी संघटना होती. हिंदूमहासभेने आपल्या सभेत विहाराचा ताबा हिंदू आणि बौद्ध यांच्याकडे संयुक्तपणे असावा, असा ठराव केला. बुद्धाला हिंदू विष्णूचा नववा अवतार मानतात; त्यामुळे तो हिंदूंचाही आहे, या मान्यतेचा आधार त्यांनी यासाठी घेतला. खरे म्हणजे, ब्राम्हणी वैदिक धर्माविरोधात उभ्या ठाकलेल्या बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करणे हे विरोधकाला आत्मसात करुन संपवण्यासाठी केलेले अपहरण आहे. परंतु ‘पाच बौद्ध आणि पाच हिंदू यांच्याकडे या स्थळाचा ताबा असावा’ अशी शिफारस राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

अनागारिक धर्मपालांच्या नंतर जे महत्वाचे प्रयत्न महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी झाले त्यातला महत्वाचा प्रयत्न थोर बौद्ध विद्वान राहुल सांकृत्यायन यांचा होता. राहुल सांकृत्यायन काँग्रेसचे सचिव असताना त्यांनी महाबोधी विहाराचा मुद्दा महात्मा गांधीजींपुढे मांडला. स्वातंत्र्य आंदोलनात कोणतीही फाटाफूट नको, याबद्दल दक्ष असणाऱ्या गांधीजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर या प्रश्नाची सोडवणूक आपण करु, असे आश्वासन सांकृत्यायनांना दिले.

स्वातंत्र्य मिळाले आणि लगोलग १९४८ साली गांधीजींचा खून झाला. गांधीजींच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी केली नाही. उलट बिहार सरकारने घटना समितीचे कामकाज सुरु असतानाच जून १९४९ मध्ये महाबोधी विहार कायदा केला. या कायद्यानुसार विहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी ९ जणांची समिती मुक्रर करण्यात आली. त्यात ४ हिंदू, ४ बौद्ध आणि गया जिल्ह्याचा हिंदू जिल्हाधिकारी अध्यक्ष असेल, असे ठरवण्यात आले. जर जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर अन्य हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून त्याच्या जागी नेमले जाईल, अशीही त्यात तरतूद होती. म्हणजेच ४ बौद्ध आणि ५ हिंदू. हिंदूंची बहुसंख्या. अर्थात निर्णयप्रक्रियेत हिंदूंचा वरचष्मा. या कायद्यात २०१३ साली दुरुस्ती करण्यात आली, ती जिल्हाधिकारी हिंदू नसला तरी तो या समितीचा अध्यक्ष होईल ही. यावेळी नितीश कुमारांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना जिल्हाधिकारी हिंदू असला पाहिजे ही अट संविधानातील धर्मनिरपेक्षतेला मारक असल्याने आम्ही ही दुरुस्ती करत आहोत, असे सांगितले. एकतर बिगर हिंदू कलेक्टर असण्याची शक्यता कमी. कारण कलेक्टर कोण नेमायचा हे सरकारच्या हाती असते. दुसरे म्हणजे समितीतले हिंदूंचे प्रतिनिधीत्व काढून टाकण्याचा मुद्दाच या दुरुस्तीत नव्हता. त्यांची ४ ही संख्या तशीच राहणार होती. कलेक्टर हिंदूच नेमला जाणार हेही उघड होते. त्यामुळे ५ हिंदूंची ९ जणांच्या समितीतली बहुसंख्या तशीच राहिली. पर्यायाने महाबोधी विहाराचा कब्जाही हिंदूंकडेच राहिला.

हा कायदा आजतागायत आहे. बिहारात काँग्रेस गेली. लालू यादव आले. ते जाऊन नितीश कुमार आले. तरी परिस्थिती जैसे थे. आंदोलन करणाऱ्या बौद्धांतल्या पुढाऱ्यांनाच समितीत घेण्याचे डावपेच आखून आंदोलनातील हवा काढण्याचे प्रयत्न या मंडळींनी केल्याचे बोलले जाते. पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात विहार देण्याने हिंदूंची नाराजी ओढवून घ्यायची या कोणाचीही तयारी नाही.

वास्तविक जगात आणि देशातही ज्या धर्माचे प्रार्थनास्थळ असते त्याच धर्माच्या लोकांचे त्याच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आढळते. मग महाबोधी विहार त्याला अपवाद कसे? शिवाय सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती होऊन तो तथागत बुद्ध झाला, ते हे जगातील बौद्धांचे सर्वात पवित्र स्थळ. ते बौद्धांच्या ताब्यात असू नये का? आज या महाबोधी विहारात आरती होते, स्तूपाला शिवलिंग बनवून त्यावर दुधाचा अभिषेक होतो, बुद्धाच्या पाच शिष्यांच्या मूर्तींना पाच पांडव म्हणून सांगितले, पुजले जाते. पिंडदान राजरोस सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बौद्धांचे केंद्र आणि युनोने जागतिक वारसा मानलेल्या या विहाराची अशी विटंबना नियमित सुरु आहे.

प्रार्थनास्थळे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात असावीत, हा संकेत व विवेक केवळ नाही. तर तो सांविधानिक अधिकार आहे. आपल्या संविधानात अनुच्छेद २६ नुसार प्रत्येक धार्मिक गटास आपल्या धार्मिक प्रयोजनासाठी संस्था चालवण्याचा, त्याचे नियमन करण्याचा, धार्मिक व्यवहार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. अनुच्छेद १३ मध्ये संविधान निर्मितीच्या आधीचे मूलभूत अधिकारांचे हनन करणारे कायदे रद्द समजले जातील असे नमूद आहे. १९४९ चा महाबोधी विहार कायदा हा संविधान मंजूर आणि लागू होण्याच्या आधीचा आहे. मग संविधान लागू झाल्यावर तो निरस्त न होता चालू कसा राहिला? या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन दशक झाले. तथापि, अजून त्याची सुनावणी झालेली नाही.

बौद्ध विरुद्ध हिंदू अशा स्वरुपात या मुद्द्याकडे म्हणून पाहू नये. अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या बौद्धांची साधी मागणी आहे, आमचे प्रार्थनास्थळ आमच्या ताब्यात द्या. त्यासाठी संविधानाच्या विरोधात असलेला बिहार सरकारचा १९४९ चा महाबोधी विहार कायदा रद्द करा. आता हे विहार जागतिक वारसा म्हणून युनोने जाहीर केले आहे. त्यानुसार त्याचे हिंदूकरण थांबवून त्याचे मूळ स्वरुप टिकवणे ही केंद्राच्या पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे. पुरातत्व खाते आणि राज्यशासन यांनी पुरातन वारसा म्हणून त्याच्या देखभालीत जरुर लक्ष घालावे; पण बाकीचे धार्मिक विधी आणि आनुषंगिक जबाबदारी ही पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यायला हवी.

ही मागणी संविधानातील मूलभूत हक्काची आहे. म्हणूनच ती केवळ बौद्धांची न राहता सर्व भारतीयांची व्हायला हवी.

- सुरेश सावंत,sawant.suresh@gmail.com

(लोकसत्ता, २१ मार्च १९८३)

Tuesday, March 11, 2025

विजयालक्ष्मी पंडित


विजयालक्ष्मी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या भगिनी. या दोघा बंधु-भगिनींना प्रश्न विचारताना पत्रकार कसा फरक करतात, याबद्दल त्या लिहितात – ‘एकदम थेट, स्पष्ट आणि बुद्धिगम्य प्रश्न माझ्या भावाला विचारले जातात. मीही सार्वजनिक कार्य करते. मात्र मला विचारले जाणारे प्रश्न माझे कपडे, मुलं आणि आपला विवेक शाबूत ठेवायला सधन घरातल्या महिला करत असलेल्या किरकोळ उपक्रमांविषयी असतात.’

बाई आणि तीही बड्या घरची विशेष ते काय करणार? विशेष कर्तबगारी ही पुरुषाची मक्तेदारी, ही धारणा या पत्रकारांची पक्की असते. स्त्रियांना दुय्यम समजणाऱ्या या वृत्तीबद्दल विजयालक्ष्मींना संताप येतो. उदारमतवादी, प्रगत विचारांचे वडील-भाऊ असतानाही स्वतःच्या घरात या दुय्यमतेच्या कडवट अनुभवातून त्या गेलेल्या असतात.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत असताना बाईला दुय्यमतेचं हे अधिकचं ओझं कायम वागवावं लागतं. संविधानसभेतल्या ज्या महिलांविषयी आपण समजून घेत आहोत, त्या सर्व महिलांच्या विचारात-कामात हा मुद्दा ठसठशीतपणे येतो हे आपल्या लक्षात आलंच असेल.

आज विजयालक्ष्मी पंडितांविषयी अधिक जाणून घेऊ.

अलाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराजमध्ये १८ ऑगस्ट १९०० रोजी स्वरुप कुमारींचा जन्म झाला. विजयालक्ष्मी हे त्यांचं लग्नानंतरचं बदललेलं नाव. वडील मोतिलाल नेहरु आणि आई स्वरुप राणी. आई आणि लेक दोहोंच्या नावात स्वरुप असलं तरी आई राणी आणि लेक कुमारी. स्वरुप कुमारीला घरी लाडानं ‘नन्ही’ म्हटलं जाई. थोरला भाऊ जवाहरलाल आणि स्वरुप कुमारी यांच्यात ११ वर्षांचं अंतर होतं. इथलं नेहरु कुटुंबीयांचं निवासस्थान ‘आनंद भवन.’ राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचं ते एक केंद्र होतं. पुढे नेहरु कुटुंबानं काँग्रेस पक्षाला ते देणगीस्वरुपात दिलं.

मोतिलाल नेहरु काँग्रेस पक्षाचे मोठे नेते. नामांकित वकील. उच्चभ्रू राहणी. प्रगतीशील विचार. तरीही स्वरुप कुमारीला बाहेर शिकायला पाठवलं जात नाही. तिचं औपचारिक शिक्षण होत नाही. तिला घरीच खाजगी शिकवणी लावली जाते. स्वरुपला पुढे विद्यापीठात शिकायला जायचं असतं. मात्र त्यास नकार मिळतो. भाऊ जवाहरलाल मात्र लंडनला उच्च शिक्षण घेत असतो. एका बाजूला स्त्रियांच्या अधिकारासाठी आवाज उठवणं आणि दुसरीकडं आपल्याच मुलीला शिक्षणासाठी घराबाहेर पडू न देणं, या वडिलांच्या विरोधाभासी वागण्याची विजयालक्ष्मींनी आपल्या लिखाणात नोंद केली आहे.

इथं एक लक्षात घ्यायला हवं. नेहरु कुटुंबीयांचं घर आनंद भवन हेच एक विविध अनुभवांची, संस्कारांची शाळा असते. पाश्चात्य जीवनशैली, ब्रिटिश स्नेह्यांचं घरी येणं-जाणं, काँग्रेसच्या नेत्यांच्या चर्चा यांतून स्वरुप कुमारींचे विचार आणि वृत्ती घडत होती. विरोधकांशी संघर्ष करताना माणूस म्हणून त्यांच्याबद्दल द्वेषभाव न बाळगणं हा मोठा संस्कार आमच्यावर झाल्याचं विजयालक्ष्मी नमूद करतात. ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष आणि तरीही ब्रिटिश व्यक्तींशी मैत्री हे दृश्य त्या घरातच पाहत होत्या.

एकदा गोपाळ कृष्ण गोखले घरी येतात. तिला विचारतात – “तू घातलेले कपडे स्वदेशी आहेत का?” त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून भारतातल्या कापड उद्योगाला चालना मिळण्याचं महत्व स्वरुप कुमारीला कळतं. १९१६ साली लखनौला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला स्वरुप कुमारी जाते. अॅनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांच्या भाषणांनी ती प्रभावित होते. आयरिश होमरुल चळवळीनं आपल्या इथल्या होमरुल चळवळीला कशी प्रेरणा दिली हे तिला यातून समजतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच आंतरराष्ट्रीय चळवळींचा अवकाश तिच्या लक्षात येतो.

गांधीजींच्या प्रभावामुळे आपल्या घरातली उंची राहणी साधी झालेली स्वरुप कुमारीनं पाहिली होती. मात्र साबरमती आश्रमात गेल्यावर तिथली अगदी काटसरीची राहणी आणि नैतिकतेचे नियम तिला भावले नाहीत. गांधीजींविषयी आदर पण त्यांच्या सगळ्याच भूमिकांशी सहमती नाही, असा एक गट काँग्रेसमध्ये होताच. त्यात स्वरुप कुमारीचा समावेश झाला.

१९२० च्या सुमारास रणजित पंडित नावाचा तरुण बॅरिस्टर आनंद भवनध्ये येतो. एका कायदेशीर प्रकरणात त्याला मोतिलाल नेहरुंचा सल्ला हवा होता. आनंद भवनमध्ये मुक्काम असताना त्याची आणि स्वरुप कुमारीची भेट होते. इथंच त्यांची मैत्री होते आणि लग्नही ठरतं. कुटुंबाची मान्यता मिळते. १९२१ च्या १० मे रोजी लग्न समारंभ ठरतो. एक अडचण उभी राहते. गांधीजींचा आग्रह असतो, नवरीनं खादीची साडी नेसायची. अजिबात दागिने घालायचे नाहीत. स्वरुप कुमारीची आई याला तीव्र विरोध करते. लग्नानंतर आशीर्वाद घ्यायला नवं जोडपं गांधीजींना भेटतं. गांधीजी त्यांना विनासंबंध, विनापत्य केवळ मित्र म्हणून राहण्याची सूचना करतात. विजयालक्ष्मी ही सूचना उडवून लावते. तिला चारचौघांसारखं ‘सामान्य वैवाहिक जीवन’ जगायचं असतं.

लग्नानंतर रणजित आणि विजयालक्ष्मी राजकोटला, रणजितच्या घरी राहायला लागतात. रणजितच्या घरची माणसं या लग्नावर नाखुश असतात. आपल्या मुलाचं भविष्य ब्रिटिशविरोधात लढणाऱ्या नेहरु परिवाराशी संबंध आल्यानं धोक्यात येईल अशी त्यांना भीती वाटत होती. पंडित कुटुंब आता राजकोटला राहत असलं तरी त्यांचं मूळ घराणं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. या जोडप्याला तीन मुली होतात. त्यातल्या एक प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल. १९२६ ला पंडित कुटुंब अलाहाबादला स्थलांतरित होतं.

विजयालक्ष्मी अलाहाबादला काँग्रेसच्या कामात उत्साहानं भाग घेऊ लागतात. ब्रिटिशविरोधी मोर्चे, सभा संघटित करु लागतात. भाषणं देऊ लागतात. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचे वडील, भाऊ आणि नवरा तुरुंगात जातात. वडील मोतिलाल नेहरु तुरुंगात आजारी पडतात आणि १९३१ साली त्यांचा आजार बळावून निधन होतं. एक वर्षानंतर विजयालक्ष्मींना शहर काँग्रेस समितीच्या सभेचं नेतृत्व करण्याच्या आरोपाखाली सश्रम कारावासाची शिक्षा होते. विजयालक्ष्मींना लखनौच्या तुरुंगात ठेवलं जातं. तिथं त्यांना वेगळ्याच वास्तवाची प्रचिती येते. स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक तुरुंगात आपापल्या जातीच्या तथाकथित श्रेणी पाळत होते. ही बाब जवळपास ९० वर्षांनी आताही आपल्या तुरुंगात आढळते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं तुरुंगातील जातिभेदांना लगाम घालण्याचे आदेश अलीकडेच दिले.

१९३४ साली विजयालक्ष्मी अलाहाबाद नगरपालिकेवर निवडून गेल्या. शिक्षण समितीच्या अध्यक्ष झाल्या. पोषक आहार म्हणून केवळ दूध दिलं जाई. त्याऐवजी त्यांनी मध्यान्ह भोजन योजना सुरु केली. त्यासाठीचा पुरेसा निधी नगरपालिकेकडं नसल्यानं लोकवर्गणीतून त्यांनी तो उभारला. शिक्षण समितीच्या त्या अध्यक्ष असतानाच एक घटना घडली. एक तरुण विधवा शिक्षिका गरोदर राहिल्यानं तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. विजयालक्ष्मी शालेय प्रशासनाच्या या कृतीवर संतापल्या. हा अन्यायकारक नियम बदलण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. पण उपयोग झाला नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर त्या विधवा शिक्षिकेचं मूल दत्तक देऊन तिला नवी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न केले. पण संबंधित पुरुषाला मोकळं सोडून स्त्रीला दोषी ठरवणारा दांभिक नियम काही त्या बदलू शकल्या नाहीत. त्या म्हणतात हा मुद्दा सामाजिक संरचनेचा आहे. एखाद-दोन हस्तक्षेपांनी तो बदलणं कठीण आहे.

१९३६-३७ साली विजयालक्ष्मी संयुक्त प्रांताच्या विधान सभेवर कानपूरमधून निवडून गेल्या. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य खात्याचं कॅबिनेट मंत्री केलं जातं. भारतातल्या त्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. स्त्रियांच्या समान अधिकारांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय महिला परिषदेत त्या सक्रिय असतात. १९३८ साली परिषदेच्या त्या उपाध्यक्ष आणि १९४२ साली अध्यक्ष होतात. या पदाचा वापर करुन जगातल्या महिलांना युद्धाच्या विरोधात उभं राहण्याचं त्या आवाहन करतात. युद्धात वित्त, मनुष्यहानी होते. पण मनुष्यहानीत मुख्यतः स्त्रिया आणि मुलं मारली जातात. नवरे मारले गेल्यानं बाईवर त्या घराची अख्खी जबाबदारी पडते. युक्रेन, गाझा, इराण, जेरुसलेम इथल्या हल्ल्यांत आपण हे आता अनुभवत आहोत.

१९४२ च्या उठावानंतर ब्रिटिशविरोधी संघर्षाला तेज चढलं. अटकसत्र जोरात सुरु झालं. पंडित पति-पत्नी दोघंही तुरुंगात गेली. तुरुंगवासामुळे १९३२ सालापासूनच तब्येत ढासळत गेलेल्या रणजित पंडितांचा या वेळचा तुरुंगवास जीवावर बेतला. १९४३ साली बरेली तुरुंगात योग्य उपचाराविना त्यांचा मृत्यू झाला. विजयालक्ष्मी आणि पंडित कुटुंबावर हा मोठा आघात होता. आधी वडील आणि आता नवरा दोघंही तुरुंगवासात तब्येत ढासळल्यानं गेले.

रणजित पंडितांच्या मृत्यूनं दुसरं एक संकट विजयालक्ष्मींवर आलं. त्यांना मुलगा नसल्यानं रणजित पंडितांच्या संपत्तीवर त्या किंवा मुली अधिकार सांगू शकल्या नाहीत. सासरच्यांनी स्वतःहून काही हिस्सा द्यायला नकार दिला. रणजित आणि विजयालक्ष्मी या दोघांचं संयुक्त खातंही दीरानं गोठवलं. मुलींनाही वारसा हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाची किती गरज होती, हे यावरुन लक्षात येतं. तसा कायदा त्यावेळी असता तर हा प्रसंग विजयालक्ष्मी आणि त्यांच्या मुलींवर आला नसता.

पती गेल्यावर विजयालक्ष्मींवर कामाचा बोजा आणखी वाढला. कलकत्त्याला दुष्काळात मदत करायला त्या गेल्या. तथापि, तेथून लगेचच गांधीजींनी त्यांना अमेरिकेला पाठवलं. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं यासाठी अमेरिकेचा दबाव यावा म्हणून अमेरिकेचं जनमत संघटित करणं, तिथल्या विविध घटकांशी संवाद करणं, परिषदांत बाजू मांडणं हे शिष्टाईचं काम विजयालक्ष्मींना अमेरिकेत जाऊन करायचं होतं. पण याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारनं त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला. अखेर काही खटपटींनंतर अमेरिकन लष्करी विमानानं विनापासपोर्ट त्या अमेरिकेला पोहोचल्या. खुद्द तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनीच ही मदत केली असं बोललं जातं.

संविधानसभेवर त्या निवडल्या गेल्या. पण तिथं फार काही त्या करु शकल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्याच्या, शिष्टाई करण्याच्या जबाबदाऱ्या विजयालक्ष्मींवर येत गेल्यानं त्यांना बराच काळ परदेशी राहावं लागे. मॉस्को, मेक्सिको आणि वॉशिंग्टन येथे राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. एक वर्षानंतर त्यांनी एकाच वेळी इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं.

विजयालक्ष्मी भारतात परतल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९६४ ते १९६८ पर्यंत त्या लोकसभेत खासदार राहिल्या. त्यानंतर सक्रिय राजकारणातून त्या निवृत्त झाल्या. मात्र जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी त्यांनी उघडपणे आपली भाची इंदिरा गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतली.

१ डिसेंबर १९९० रोजी डेहराडून येथे त्यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आणीबाणीच्यावेळी विरोधकांना तुरुंगात टाकणं, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं याबद्दल एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या – ‘असहमती प्रकट करण्याच्या अधिकाराशिवाय लोकशाही टिकू शकत नाही.’ किमान एवढ्याचा आग्रह सार्वजनिक जीवनात आपण धरणं ही विजयालक्ष्मी पंडितांना उचित आदरांजली ठरेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा शेवटचा सोळावा भाग ११ मार्च २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

Tuesday, March 4, 2025

सुचेता कृपलानी


राजकीय मतभिन्नतेमुळे नवरा आणि बायको वेगवेगळ्या राजकीय पक्षांत आहेत, हे आजही आपल्याला पचत नाही. व्यक्ती म्हणून पती-पत्नींची वेगळी स्वतंत्र मतं असू शकतात, हे तत्त्व म्हणून आपण भले मानत असू. पण ज्याअर्थी ही दोघं वेगळ्या पक्षांत आहेत, त्याअर्थी त्यांच्या वैवाहिक नात्यांत प्रश्न असावेत, अशी शंका आपल्या मनात डोकावत राहतेच. शिवाय नवऱ्याला त्याच्या सगळ्या निर्णयांत साथ करणं हे बायकोचं कर्तव्यच असल्यानं तो ज्या पक्षात आहे, त्यातच बायकोनं असलं पाहिजे हा पुरुषप्रधान संस्कृतीचा संस्कारही आपल्यावर असतो. ७० वर्षांपूर्वी राजकारणात महिलांचा एकूणच वावर अगदी मर्यादित असताना तर हे पचायला खूपच जड होतं.

१९५६ साली आचार्य जे. बी. कृपलानी आणि त्यांचे समाजवादी विचारांचे सहकारी काँग्रेसमधून बाहेर पडून किसान मजूर प्रजा पक्ष स्थापन करतात. आधी त्यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी काही काळानं पुन्हा काँग्रेसमध्ये जातात. त्यावरुन संसदेत तसेच बाहेर शेरेबाजी होई. एक मंत्री आचार्य कृपलानींना सभागृहात टोमणा मारतात – ‘अहो, खुद्द यांची बायको त्यांचं ऐकत नाही.’ त्यावर कृपलानी प्रत्युत्तर देतात – ‘आपण आधुनिकतेच्या बाता करतो. पण आपल्या मनात खोलवर जुनाट विचार दडलेले असतात आणि आपलं वर्तनही तसंच असतं. आता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मिळाला असताना बायकोनं नवऱ्याचंच अनुसरण करायला हवं या जुन्या मानसिकतेतनं आपण अजूनही बाहेर पडायला तयार नाही.’

पक्षातून बाहेर पडण्याआधी आचार्य कृपलानी काँग्रेसचे महासचिव असतात. सुचेता कृपलानी राजकीय काम करण्याचा निर्णय घेतात, त्यावेळी महासचिव म्हणून नवऱ्याच्या त्या सहाय्यक होऊ शकल्या असत्या. मात्र आचार्य कृपलानींनी तसं होऊ दिलं नाही. त्याचं कारण सांगताना ते म्हणतात – ‘या कामात ती तिची प्रतिभा पूर्णपणे वापरु शकली नसती. तिनं तिच्या पद्धतीनं स्वतःचं जीवन घडवावं, आपली वाढ करावी, अशी माझी इच्छा होती. आणि ती त्यासाठी सक्षम होती.’

अशी स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असलेली बायको आणि तिच्या निर्णयाला केवळ साथ नव्हे, तर असा निर्णय घेण्याची तिची क्षमता वाढायला संधी देणारा, त्यासाठी तिच्या बाजूनं ठाम उभा राहणारा नवरा याचं आजही आपल्याला अप्रूप वाटतं. काळाच्या पुढं वाटचाल करणारी ही स्वातंत्र्य चळवळीतली माणसं म्हणूनच आजही आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत.

संविधानसभेतल्या महिला सदस्यांचा आपण परिचय करुन घेत आहोत. त्यातल्या एक सुचेता कृपलानी. आज त्यांची ओळख आपण करुन घेत आहोत.

हरयाणातल्या अंबाला येथे २५ जून १९०८ रोजी सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला. वडील सुरेंद्रनाथ मजुमदार आणि आई प्रेमबाला. या दोहोंची कुटुंबं ब्राम्हो समाजाशी संबंधित होती. त्यामुळे सुचेताचं घरही ब्राम्हो समाजाच्या अनेक सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचं केंद्र होतं. सुचेतासह एकूण नऊ भावंडं. त्यावेळच्या उत्तम गणल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थांत त्यांनी शिकावं यावर आईचा कटाक्ष होता. सुचेता आणि तिची बहीण सुलेखा आधी शिमल्याच्या लॉरेटो कॉन्व्हेंट मध्ये आणि नंतर अलाहाबादच्या निवासी शाळेत शिकल्या. त्यानंतर त्यांचं शिक्षण दिल्लीच्या क्वीन मेरी’ज स्कूल मध्ये झालं. या त्यांच्या शाळेत इंग्लंडचा राजपुत्र आठवा एडवर्ड येणार असतो. त्याच्या नियोजित आगमनापूर्वी काही महिने आधी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं असतं. भारतीयांच्या मनात त्याबद्दल संताप असतो. अशावेळी या राजपुत्राला मानवंदना देण्याची सुचेता आणि सुलेखाची तयारी नसते. त्या राजपुत्र यायच्या दिवशी गैरहजर राहतात.

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजी असहकार चळवळ सुरु करतात. सुचेताचा चुलत भाऊ धिरेन त्यावेळी बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असतो. गांधीजींचे सहकारी आचार्य जे. बी. कृपलानी तिथं शिकवत असत. त्यांचा धिरेनवर प्रभाव होता. या धिरेनमार्फत गांधीजींचा विचार सुचेताच्या घरात पोहोचतो. दिल्लीला १९२४ साली या धिरेनमुळेच त्यांना गांधीजींचं दर्शन होतं. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची ऊर्मी सुचेताच्या मनात जागी होते, तरी त्यात पडण्याआधी आपण आपला अभ्यास पूर्ण करु असा निर्णय ती घेते. शालांत परीक्षेत तिला सुवर्णपदक आणि शिष्यवृत्ती मिळते.

सुचेताचं कुटुंब लाहोरला स्थलांतरित होतं. तिथं ती महाविद्यालयीन शिक्षण घेते. याच काळात त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आघात होतात. बहीण सुलेखा हृदयरोगानं जाते आणि तिच्या जाण्यानं खचलेल्या वडिलांचं पुढच्या दोन वर्षांत निधन होतं. वडिलांच्या जाण्यानं कुटुंबाची आर्थिक स्थितीही ढासळते. पण आई या संकटात डगमगत नाही. मुलांचं शिक्षण काही करुन पूर्ण व्हायला हवं, हा तिचा निश्चय पक्का असतो. मुलांना घेऊन ती दिल्लीला येते. छोटं घर भाड्यानं घेतात. काटकसरीनं राहतात.

लाहोरला पदवीचं शिक्षण पूर्ण केलेली सुचेता इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या सेंट स्टीफन’स कॉलेजमध्ये प्रवेश घेते. वर्गात ती एकटी मुलगी असते. बाकी सगळे मुलगे. टिंगल, अपमान तिच्या वाट्याला येतो. पण परीक्षेत ती अव्वल आल्यानंतर हा त्रास कमी कमी होत जातो. इथं ती दुसरं सुवर्ण पदक मिळवते. १९२७ साली सुचेताचं शिक्षण पूर्ण होतं आणि ती लाहोरला शिक्षिका म्हणून नोकरी करु लागते. ती लाहोरला असतानाच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिलं जातं. लाहोरमधलं वातावरण पेटून उठतं. प्रचंड संख्येच्या मिरवणुकांनी लोक या क्रांतिकारकांच्या अंत्यविधीसाठी येतात. सुचेताच्या मनात स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेण्याची ऊर्मी पुन्हा उसळी घेऊ लागते. पण कुटुंबाची जबाबदारी आड येते. सुचेताला बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापिकेची नोकरी लागते. त्यांच्या कुटुंबाला यामुळे आर्थिक स्थैर्य मिळतं. वर्षभरात कुटुंबातली मंडळीही तिच्यासोबत बनारसला राहायला येतात.

बनारसला सुचेताची आचार्य कृपलानींसोबत ओळख होते. त्यांच्या विचार आणि व्यक्तित्वाचा तिच्यावर प्रभाव पडतो. त्यांच्याशी तिची मैत्री होते. कृपलानी बनारसला आले की तिला भेटत असत. १९३४ च्या भूकंपाचा बिहारला मोठा फटका बसतो. कृपलानींसह अनेक काँग्रेस नेते मदतकार्यासाठी बिहारला येतात. कृपलानींच्या सूचनेनुसार सुचेता विद्यापीठातून रजा घेऊन बिहारला येते. दारिद्र्याचं आणि लोकांच्या अमानवी स्थितीचं तिला इथं दर्शन होतं. इथंच तिचा गांधीजींशीही जवळून संबंध येतो.

आचार्य कृपलानी आणि सुचेताची मैत्री अधिक घट्ट होत जाते. ही मैत्री त्यांना पुरेशी होती. मात्र त्या काळातील लोकांच्या दृष्टीनं अशा मैत्रीला मान्यता नव्हती. म्हणून कृपलानी सुचेताला लग्नासाठी मागणी घालतात. कृपलानींचं वय आणि गांधीवादी साधी राहणी यामुळे सुचेताच्या घरी हे नातं पसंत नव्हतं. तर कृपलानींच्या बहिणीचा या लग्नानं त्यांची प्रतिष्ठा कमी होईल, म्हणून विरोध होता. आश्चर्यकारक विरोध केला तो गांधीजींनी. या लग्नामुळे कृपलानी स्वातंत्र्य चळवळीच्या आपल्या ध्येयापासून विचलित होतील अशी त्यांना भीती वाटत होती.

अखेर सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचं लग्न ब्राम्हो समाजाच्या पद्धतीनं होतं. एक छोटा स्वागत समारंभ विजयालक्ष्मी पंडित आयोजित करतात. तो अलाहाबादला नेहरु कुटुंबीयांच्या घरी आनंद भवनमध्ये होतो. या विवाहाची नोंदणी करताना जवाहरलाल नेहरु साक्षीदार म्हणून सही करतात. गांधीजी या जोडप्याला आशीर्वाद द्यायला नकार देऊन मी त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करेन असं सांगतात. मी या लग्नाला मान्यता देत नाही, असं गांधीजी सरोजिनी नायडूंची कन्या पद्मजा नायडू हिला सांगतात. त्यावर ती त्यांना म्हणते –‘तुमचा काय संबंध? हा त्या दोघांचा मामला आहे. ती दोघंही प्रौढ आहेत.’

यथावकाश सुचेता आणि गांधीजी यांचा समेट होतो. त्यांचं परस्परसहकार्य घट्ट होतं.

सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचा संसार सुरु होतो. पण पारंपरिक अर्थानं नव्हे. तो मैत्रीच्या पातळीवरच राहतो. आधी एक वर्ष रजा आणि नंतर राजीनामा देऊन सुचेता अलाहाबादला कृपलानींच्याकडे येतात. ते स्वराज भवनमधून चळवळीचं काम करत असतात. तेच या जोडप्याचं घर होतं. स्वराज भवन हे संयुक्त प्रांतातल्या काँग्रेसच्या राजकारणाचं केंद्र असतं.

अलाहाबादला वॉर्ड पातळीवरची कार्यकर्ती म्हणून सुचेतांचं राजकीय काम सुरु होतं. काही काळानं त्या काँग्रेसच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी घेतात. मात्र नंतर या विभागाची जबाबदारी डॉ. राममनोहर लोहियांकडे सोपवली जाते. आज काँग्रेस पक्षात असलेल्या अखिल भारतीय महिला काँग्रेस या विभागाची स्थापना करण्याचं श्रेय सुचेता कृपलानींना जातं. सामाजिक बदलासाठी महिलांच्या राजकीय जाणिवा वाढवणं हे या विभागाचं उद्दिष्टं होतं. सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह या स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व लढ्यांत सुचेतांचा पुढाकार असतो. त्यासोबत तुरुंगवासही मिळतो. १९४२ च्या चले जाव चळवळीत सर्व प्रमुख नेत्यांना अटक होते. आचार्य कृपलानीही त्यात असतात. अटकेपासून सटकलेल्यांवर भूमिगत राहून चळवळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी येते. भूमिगत राहून रेडिओचं प्रसारण करणाऱ्या गटाचं व्यवस्थापन सुचेता करतात. उषा मेहतांवर रेडिओच्या प्रत्यक्ष प्रसारणाची जबाबदारी असते. रेडिओ प्रसारणाची सतत जागा बदलूनही अखेर उषा मेहतांना पकडलं जातं. चार वर्षांचा तुरुंगवास होतो. वेश बदलून ब्रिटिश पोलिसांना गुंगारा देण्यात सुचेताही फार काळ यशस्वी ठरत नाहीत. बिहारला त्यांना अटक होते. ‘धोकेदायक कैदी’ या श्रेणीत लखनौच्या तुरुंगात त्यांना ठेवलं जातं. १९४५ ला त्यांची सुटका होते.

१९४७ च्या एप्रिल महिन्यात त्या संविधानसभेवर संयुक्त प्रांतातून निवडून जातात. मात्र फाळणीमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनात व्यग्र राहिल्यानं संविधानसभेच्या कामकाजात पुरेशी भागिदारी त्या करु शकल्या नाहीत. हिंदू कोड बिलाला मात्र त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. एकरुप नागरी संहितेच्याही त्या समर्थक होत्या.

स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५२ च्या पहिल्या लोकसभेची निवडणूक सुचेता कृपलानी किसान मजूर प्रजा पक्षातर्फे लढवतात. आचार्य कृपलानींसोबत त्या तेव्हा काँग्रेसमधून मतभेद होऊन बाहेर पडल्या होत्या. ही निवडणूक त्या जिंकतात. पुढे काही काळानं त्या पुन्हा काँग्रेसमध्ये परतात. काँग्रेसच्या महासचिव होतात. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभेतही त्या निवडून येतात. मात्र नंतर उत्तर प्रदेशचं मंत्रिपद स्वीकारावं लागल्यानंतर त्या लोकसभेचा राजीनामा देतात. ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदं सोडून पक्षबांधणीत उतरावं या कामराज योजनेनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सी. बी. गुप्ता यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी सुचेता कृपलानींना निवडलं जातं. देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलानींना जातो.

पुढच्या काळात त्यांची तब्येत खालावत जाते. पक्षातल्या प्रतिकूल घडामोडींचाही त्यांच्या मनावर परिणाम होतो. १ डिसेंबर १९७४ रोजी सुचेता कृपलानींचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन होतं. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचं रास्त वर्णन करतात – ‘दुर्मीळ धैर्य आणि चारित्र्य असलेली व्यक्ती. त्यांनी भारतीय स्त्रीत्वाचा गौरव वाढवला.’

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा पंधरावा भाग ४ मार्च २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.
________________

Tuesday, February 25, 2025

सरोजिनी नायडू


भारतीय जनतेला परमआदरणीय असलेल्या महात्मा गांधींना त्यांच्या तोंडावर कोणी ‘मिकी माऊस’ म्हणत असेल, ही कल्पना तरी आपण करु शकतो का? हो, असं म्हणणारी एक व्यक्ती होती. आणि तिला मनमोकळं हसून गांधीजी प्रतिसादही देत असत. ती व्यक्ती म्हणजे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू गांधीजींची इतरही बाबतीत मनमुराद चेष्टा करत. त्यांना विनोदी गोष्टी सांगत. गांधीजी त्यावर खळखळून हसत. चळवळीतले काही ताण मनावर असलेच तर त्यांचा निचरा होण्यात सरोजिनी नायडूंचे विनोद, गोष्टी कामी येत.

आपण शाळेत इतिहास शिकलो, त्यातून सरोजिनी नायडू वगैरे सगळ्या थोर माणसांच्या गंभीर प्रतिमाच आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यांची थोरवी, त्यांच्या कामाचं गांभीर्य हे खरंच आहे. पण त्यापलीकडचं या माणसांचं मानवीपण सहसा आपल्याला ठाऊक नसतं. आपल्या आईशी लेक कसं वागेल, तसं सरोजिनी नायडूंचं गांधीजींशी वागणं होतं. गांधीजी आणि सरोजिनी नायडूंचं नातं गुरु-शिष्याचं होतं, एवढं सांगून भागत नाही. त्याला आई-लेकीच्या नात्याची उपमा दिली तरच त्यातलं मनीचं गुज व्यक्त करणारं मोकळं मैत्र ध्यानात येतं.

स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध टप्प्यांवर कायम सोबत असलेली ही गुरु-शिष्येची जोडी आहे. दांडी यात्रेच्या छायाचित्रात गांधीजींबरोबर सरोजिनी नायडू दिसतात. डॉ. आंबेडकर आणि गांधीजींच्यात येरवड्याच्या तुरुंगात झालेल्या पुणे करारावेळी त्या गांधीजींच्या सोबत दिसतात. अनेक बैठकांत गांधीजींच्या आसपास त्या आढळतात.

गांधीजींनीही त्यांना एक नाव दिलं. पण ते विनोदी नव्हतं. सरोजिनी नायडूंचं रास्त वर्णन करणारं होतं. ते म्हणजे – नाईटिंगल ऑफ इंडिया. म्हणजेच भारताची कोकिळा किंवा भारत कोकिळा.

त्या गायिका या अर्थानं कोकिळा नव्हत्या. सरोजिनी नायडूंच्या कवितांतलं माधुर्य, अंतर्गत लय आणि त्यातला उन्नत आशय, मातृभूमीचं प्रेम यामुळे त्या ‘भारताची कोकिळा’ बनल्या.

१३ वर्षांच्या सरोजिनीनं १३०० ओळींची कविता लिहिली. प्रेरणा काय? तर डॉक्टरांनी तिला आजारी असल्यानं पूर्ण आराम कर. पुस्तकाला हात लावू नकोस, असं सांगितलं म्हणून. डॉक्टरांना धडा शिकवायला स्वतःला त्रास करुन तिनं ही प्रदीर्घ कविता लिहिली.

अशी ही बंडखोरी संविधानसभेतल्या महिलांचा स्थायीभावच दिसतो. वैयक्तिक नात्यांपासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र ती आढळते. सरोजिनी नायडू यांच्यात ज्येष्ठ. इतर महिलांपेक्षा ह्या अधिक प्रसिद्ध. संविधानसभेत त्या होत्या. पण त्यांची मुख्य ओळख स्वातंत्र्य चळवळीतल्या थोर नेत्या अशीच आहे. त्यांच्याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत.

सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी आजच्या तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद येथे झाला. त्यांचं मूळ नाव सरोजिनी चट्टोपाध्याय. अघोरनाथ चट्टोपाध्याय हे नामांकित विद्वान त्यांचे वडील. ते त्यावेळी निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सामाजिक सुधारणा आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरी बंगाली गीतकार, गायिका आणि नर्तक होत्या.

सरोजिनी आणि तिच्या भावंडांना इंग्रजी आणि फ्रेंच भाषा शिकवायला घरी शिक्षिका यायच्या. नंतर सरोजिनीला मद्रासला म्हणजे आजच्या चेन्नईला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. मद्रास विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत सरोजिनी सर्वप्रथम आली. पुढची तीन वर्षं आजारपणामुळं हैद्राबादला आपल्या घरीच तिला राहावं लागलं. सुधारकांचं घर म्हणून या काळात अनेक लोकांची त्यांच्या घरी ये-जा होती. त्यांतच डॉ. गोविंदराजुलू नायडू या तरुणाशी तिची भेट झाली. इंग्लंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातून तो नुकताच डॉक्टर होऊन आला होता. पुढच्या काही भेटींत आयुष्याचे जोडीदार व्हायचं सरोजिनी आणि या गोविंदराजुलूनं नक्की केलं. सरोजिनीचं घर सुधारकांचं असलं तरी या नात्याला घरच्यांचा विरोध होता. मुख्य कारण दोघांच्या जाती वेगळ्या होत्या. पण सरोजिनी निर्णयाला ठाम होती. याच दरम्यान सरोजिनीनं लिहिलेल्या एका पर्शियन नाटकावर खुश होऊन हैद्राबादच्या निजामानं परदेशी शिक्षणासाठी तिला शिष्यवृत्ती दिली. परदेशी जाण्याची सरोजिनीची तयारी नव्हती. मात्र काही करुन तिला बाहेर पाठवण्यात घरच्यांच्या मनात दोन उद्देश होते. एक म्हणजे, तिचे उच्च शिक्षण होईल. आणि दुसरे म्हणजे त्यामुळे ती गोविंदराजुलूपासून दूर होईल.

नाराजीनंच सरोजिनी इंग्लंडला जाते. तिथं किंग्ज कॉलेज, लंडन आणि नंतर गर्टन कॉलेज, केंब्रिज या जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांत ती शिकते. पण परीक्षा न देताच भारतात परतते. पदवी नसली तरी हा अनुभव तिला व्यापक जगाचं भान येण्यास उपयुक्त ठरला. तिच्या कवितेला अधिक परिपक्वता यायला मदत झाली. इंग्लंडमध्ये भेटलेल्या कवी आणि समीक्षक एडमंड गोसे यांनी तिच्या कवितेत ‘वैयक्तिकतेचा अभाव’ असल्याची परखड टीका करुन तिला सल्ला दिला – ‘तुझ्या देशासंबंधीच्या तुझ्या अस्सल दृष्टीतून पुन्हा सुरुवात कर.’ यानंतर सरोजिनीच्या कवितांचा बाजच बदलला. तिनं तिचा पहिला कवितासंग्रह ‘द गोल्डन थ्रेशहोल्ड’ गोसे या आपल्या टीकाकारालाच अर्पण केला.

१८९८ ला भारतात परतल्यावर ती आणि गोविंदराजुलू ‘विशेष विवाह कायदा १८७२’ खाली लग्न करतात. गंमत म्हणजे यांच्या लग्नाला पाठिंबा नसलेल्या तिच्या वडिलांनीच हैद्राबादमध्ये हा कायदा लागू व्हावा म्हणून प्रयत्न केले होते.

कवयित्री म्हणून सरोजिनी नायडूंची ख्याती वाढली होती. कवितेसोबतच त्यांनी सामाजिक कामाला आरंभ केला. देशभरच्या विविध चर्चागटांत त्या भाग घ्यायला लागल्या. त्यांच्या स्वतःच्या भूमिका, मते तयार होऊ लागली. महिलांचं उत्थान हा त्यांच्या कामाचा प्रमुख भाग झाला. महिलांच्या मेळाव्यांत त्या बोलू लागल्या. ‘एकटेपणातनं बाहेर पडा. काम करा. स्वतःचं जीवन घडवा’ असं त्यांना आवाहन करु लागल्या. १९०३ साली मद्रासमधल्या एका महाविद्यालयात व्याख्यान देताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदेश, धर्म आणि राष्ट्रीयता यांच्या संकुचित सीमेच्या पार जाण्याचं आवाहन केलं. केवळ आपल्यापुरतं पाहण्यानं, केवळ आपल्या देशाचं हित पाहण्यानं आपण आहोत तिथंच थांबू. सबंध जगाच्या उद्धाराचा ध्यास घेण्यानंच आपल्या राष्ट्राचा आणि आपलाही विकास होणार आहे. आम्ही भारतीय आहोत यावरच न थांबता आपण जगाचे नागरिक आहोत, ही उन्नत भावना आपल्या मनात जागवली पाहिजे, ही सरोजिनी नायडूंच्या मांडणीची सूत्रं होती. रवींद्रनाथ टागोरांनी संकुचित राष्ट्रवादावर आपल्या साहित्यातून कोरडे ओढले होते. आपला राष्ट्राभिमान दुसऱ्या राष्ट्राच्या निंदेवर आधारलेला असता कामा नये, अशी भूमिका टागोरांच्या एका कादंबरीतला नायक मांडतो. त्याच्याशी सरोजिनी नायडू यांचं साधर्म्य जाणवतं.

सरोजिनी नायडू भारतमातेबद्दल भरभरुन बोलल्या आहेत. कवितेतनं तसंच भाषणातनं. त्यांचं मातृभूमीवरचं प्रेम यत्किंचितही कमी नाही. मात्र हे प्रेम जगातल्या सगळ्या देशांवर, सबंध मानवजातीवर प्रेम करण्याच्या आड येत नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्या जिनांकडं पाहत होत्या. जिना त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले मित्र होते. मात्र नंतर जिनांची भूमिका बदलते. फाळणीचा आग्रह धरुन भारत-पाक दोन देश घडवण्यात ते यशस्वी होतात. जिनांविषयीच्या या भ्रमनिरासानं आणि मातृभूमीचे असे तुकडे पडल्यानं सरोजिनी नायडू खूप व्यथित होतात. तरीही या दोन देशांतल्या जनतेच्या सुखाची एकसारखीच कामना करतात.

१९०६ साली भारतीय सामाजिक परिषदेत सरोजिनी नायडूंचं व्याख्यान होतं. तिथं त्यांची गोपाळ कृष्ण गोखलेंशी भेट होते. त्यांच्या बऱ्याच चर्चा होतात. त्यानंतर गोखले सरोजिनींची गांधीजींशी भेट घालून देतात. पुढे गांधीजी आणि सरोजिनींचं एकत्रित काम सुरु होतं. ते शेवटपर्यंत. १९२५ मध्ये कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ४० व्या अधिवेशनाचं त्यांना अध्यक्ष बनवलं जातं. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

असहकार चळवळ, होमरूल आंदोलन, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांत सरोजिनी नायडूंनी भाग घेतला. यात त्यांना ५ वेळा तुरुंगवास झाला. अॅनी बेझंट आणि इतरांसोबत त्यांनी भारतीय महिला संघाची स्थापना केली. संविधानसभेतल्या तसेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या इतरही अनेक महिलांना जोडण्याचं काम सरोजिनी नायडू यांनी केलं. गांधीजींप्रमाणेच नवे लोक जोडणं आणि त्यांना चळवळीत क्रियाशील करणं यात त्यांना गती होती.

स्त्रियांच्या मताधिकाराचा मुद्दा त्यांनी सतत लावून धरला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान सर्वत्र असायला हवं, याबद्दल त्या आग्रही असत. १९१८ च्या काँग्रेसच्या विजापूर अधिवेशनात त्या आपल्या भाषणात म्हणतात – ‘नागरिकत्वाच्या अधिकारांची चर्चा करताना Man (म्हणजे पुरुष) शब्दासोबत woman (म्हणजे स्त्रिया) हा शब्द असायलाच हवा.’ याच वर्षी मुंबई काँग्रेसच्या अधिवेशनात त्या एक ठराव संमत करुन घेतात. ‘पुरुषांसाठी निश्चित केलेली सर्व तऱ्हेची पात्रता ज्या स्त्रियांच्यात असेल, त्यांना केवळ लैंगिक कारणानं (म्हणजे त्या स्त्रिया आहेत म्हणून) अपात्र ठरवता कामा नये.’ – असा तो ठराव असतो. तो संमत झाल्यावर अन्य प्रांतांतल्या काँग्रेस संघटनांतही त्याचं अनुकरण केलं जातं.

विनाचौकशी तुरुंगात टाकणाऱ्या १९१९ च्या रौलेट कायद्याविरोधात गांधीजी सत्याग्रहाची हाक देतात. आंदोलनाचा हा प्रकार सनदशीर नाही, असं एक मत व्यक्त होतं. त्यावेळी सरोजिनी नायडू जुलुमी कायदे करणाऱ्या सरकारशी लढण्याच्या सत्याग्रह या अस्त्राची बाजू लोकांना नीट समजावून सांगतात. जालियनावाला बाग हत्याकांडाविरोधात त्या ब्रिटिश संसदेत जाऊन ब्रिटिश सरकारचे वाभाडे काढतात. या हत्याकांडाच्या निषेधार्थ सरकारनं दिलेला नाईटहूड किताब टागोर परत करतात. गांधीजी आणि सरोजिनी नायडूही आपले पुरस्कार परत करतात. सरोजिनी नायडू यांनी परत केलेला कैसर-ए-हिंद हा पुरस्कार हैद्राबाद पूरप्रसंगी केलेल्या मदतकार्यासाठी १९०८ साली त्यांना मिळाला होता.

चळवळीच्या कामानिमित्त सरोजिनी नायडूंना बराच काळ घराबाहेर राहावं लागे. त्यांच्या या कामाला त्यांचे पती गोविंदराजुलू यांची पूर्ण साथ होती. तरीही प्रश्न उठायचे. त्या अशांना म्हणत – ‘माझं घर, माझा नवरा आणि माझी मुलं यांची मला पूर्वी होती तेवढीच काळजी आता आहे. माझं सार्वजनिक कार्य या काळजीच्या आड येत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. ते आणि मी आमच्यात रस दाखवणाऱ्या तुम्हा मंडळींचे आभारी आहोत.’

१९४६ साली सरोजिनी नायडूंची संविधानसभेवर बिहार प्रांतातून निवड होते. फाळणी, राष्ट्रध्वज तसेच इतरही महत्वाच्या मुद्द्यांवरील चर्चेत त्या भाग घेतात. मात्र थोड्याच काळात त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नेमणूक होते. हे पद स्वीकारायला त्या प्रारंभी राजी नसतात. कर्तव्यापोटी अखेर त्या ते स्वीकारतात. त्यांचे त्यावेळचे उद्गार आहेत – ‘तुम्ही जंगली पक्षाला पिंजऱ्यात बंद करत आहात.’

सरोजिनी नायडूंचं २ मार्च १९४९ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन होतं. ज्या स्वातंत्र्यासाठी त्या लढल्या, ते स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं. मात्र स्वतंत्र देशाचं संविधान पूर्ण होण्याआधीच त्या हे जग सोडतात. सरोजिनी नायडूंसारख्यांच्या विचार आणि कृतीनंच संविधानाची पायाभूत मूल्यं रचली गेली याबद्दल भारतीय नागरिक म्हणून आपण कायम त्यांचे ऋणी राहू.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा चौदावा भाग २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

Tuesday, February 18, 2025

रेणुका रे


‘जर मी आता तरुण असते आणि गांधीजींसारख्यांचं मार्गदर्शन मिळालं नसतं, तर बहुधा मी नक्षलवाद्यांत सामील झाले असते.’ १९७० च्या दशकात देशात नक्षलवादी चळवळीनं जोर पकडला होता. त्यावेळी रेणुका रे गांधीयुगाच्या आपल्या आठवणी सांगताना हे लिहितात. वयाच्या १७-१८ व्या वर्षी लंडनमध्ये शिकत असताना त्यांच्या एका नातेवाईक तरुणानं त्यांच्या हातात रिव्हॉल्वर दिलं आणि सरावासाठी बोलावलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांत जे विविध प्रवाह होते, त्यातल्या भूमिगत राहून इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा उभारणाऱ्या एका गटाचा हा तरुण कार्यकर्ता होता. एका दुसऱ्या तरुणानं, जो तिचा पुढे नवरा झाला, त्या सत्येनला तिच्या पर्समध्ये रिव्हॉल्व्हर आढळलं. तो चपापला. त्यानं तिला समजावलं. हिंसक मार्गाचा फोलपणा सांगण्याचा प्रयत्न केला. योगायोगानं त्याच दिवशी तिला गांधीजींचं पत्र मिळालं. पुढच्या काळात हिंसक मार्ग अवलंबणाऱ्या क्रांतिकारकांच्या हेतूबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल रेणुकांच्या मनात आदर राहिला, तरी त्यांचा प्रवास मात्र गाधीजींच्या अहिंसक मार्गानंच झाला.

संविधानसभेतल्या महिला सदस्यांचा आपण परिचय करुन घेत आहोत. रेणुका रे त्यातल्या एक. आज त्यांची माहिती आपण घेणार आहोत.

४ जानेवारी १९०४ रोजी तेव्हाच्या पूर्व बंगालमधल्या म्हणजे आजच्या बांगला देशातल्या पबना या ठिकाणी रेणुका रे यांचा जन्म झाला. वडील सतीश चंद्र मुखर्जी, आई चारुलता मुखर्जी. रेणुका चार भावंडांत थोरली. त्यांचं कुटुंब उच्चशिक्षित आणि सुधारणावादी होतं. वडील आयसीएस झालेले मोठे सनदी अधिकारी. १८९७ च्या सुमारास कलकत्त्याच्या प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये फक्त दोन मुली शिकत होत्या. बाकी सारे पुरुष. या दोघींतली एक रेणुका रे यांची आई होती. आई चारुलता समाजसेविका होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा काढल्या. महिला समित्या संघटित केल्या. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडूंशी त्यांची मैत्री होती. रेणुकाचे वडिलांकडचे आजी-आजोबा ब्राम्हो समाज या सुधारणावादी चळवळीचे कार्यकर्ते होते. आईकडचे आजोबा डॉ. पी. के रॉय मोठे विद्वान होते. एडिनबर्ग विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्राची पदवी मिळवली तर लंडन विद्यापीठातून ते डॉक्टरेट झाले. त्यांची पत्नी म्हणजे रेणुकाची आजी सरला रॉय याही कार्यकर्त्या होत्या. त्यांनीही मुलींसाठी अनेक शाळा उघडल्या. रॉय कुटुंबीयांच्या घरी थोरा-मोठ्यांचा राबता असे. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या घरी येत-जात असत. टागोरांनी त्यांचं एक पुस्तक रेणुकाच्या आजी सरला यांना अर्पण केलं आहे.

१९११ साली चारुलतांच्या वडिलांची लंडनमधल्या उच्चायुक्तांच्या कार्यालयात अकादमीय समुपदेशक म्हणून नियुक्ती झाली. रेणुकाचं कुटुंबही दोन वर्षांसाठी त्यांच्यासोबत लंडनला स्थलांतरित झालं. सहा वर्षं वयाची रेणुका लंडनमधल्या केन्स्टिंग्टन हायस्कूलमध्ये शिकू लागली. भारतात परतल्यावर कलकत्त्याच्या लोरेटो हाऊस स्कूल मध्ये रेणुकाचं पुढचं शिक्षण सुरु झालं.

असहकार चळवळीची घोषणा करण्यासाठी १९२० च्या सप्टेंबर महिन्यात गांधीजी कलकत्त्याला आले होते. त्यावेळी एका नातेवाईकांच्या घरी रेणुकाची गांधीजींशी भेट झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या रेणुकाचं संपूर्ण जीवन बदलून टाकणारी ही भेट होती. ती आणि तिची एक मैत्रिण ललिता यांनी कॉलेज सोडलं आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत उतरल्या. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे त्या घरोघर फिरुन जागृती करु लागल्या. चळवळीसाठी निधी जमा करु लागल्या. गांधीजींनी त्यांना चरखा चालवायला आणि हिंदी शिकायला सांगितलं. घरोघर फिरण्यातून या मुलींना स्त्रियांच्या पराधीनतेचा अधिक सखोल समज आला. कर्मठ, खानदानी घरांतल्या महिला आतल्या खोलीत असत. त्यांना भेटायला घरच्या कर्त्या पुरुषाची परवानगी घेऊनच या मुलींना आत जाता येई. यातल्या काही महिला गल्लीत त्यांना भेटत आणि पुरुष घरी नसतील तेव्हा यायला सांगत. यातल्या बहुतेकजणी चळवळीला पैसे आणि दागिने देत. शक्य तिथं या महिलांच्या सभा संघटित करुन गांधीजींना त्यांच्यासमोर बोलायला रेणुका बोलावत असे.

पुढं काय करावं, याची स्पष्टता येण्यासाठी रेणुका साबरमती आश्रमात येते. सुखवस्तू घरातल्या या मुलीला आश्रमातली साधी, काटकसरीची राहणी तशी कठीण होती. पण तिला तिथलं वातावरण भावलं. तिथल्या जीवनात रुळायला तिला वेळ गेला नाही. गांधीजींबरोबर चळवळीच्या कामासाठी ती बंगालला काही काळासाठी आली. त्यावेळी रेणुकाचे वडील तिच्या नकळत गांधीजींना भेटले. तिला ते लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवू इच्छित होते. रेणुका संतापली. तिनं लंडनला जायला जोरदार विरोध केला. पण गांधीजींनी तिला समजावलं. तिथल्या ‘मुक्त वातावरणात’ ल्या शिक्षणाचं महत्व त्यांनी तिला पटवून दिलं. ते म्हणाले, ‘तू न इंग्राजळता तिथल्या शिक्षणाचा पूर्ण लाभ घे आणि नव्या धडाडीनं तसेच स्वतंत्र दृष्टिकोनानं आपल्या देशाची सेवा करायला सिद्ध होऊन ये.’

अखेर मनाविरुद्ध ऑगस्ट १९२१ ला रेणुका लंडनला केंब्रिज विद्यापीठातल्या एलिट गिर्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेते. मात्र तिथलं उमरावी, शाही वातावरण तिला रुचत नाही. ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेते. इथेच तिची सत्येंद्र नाथ रे या तरुणाबरोबर मैत्री होते. रेणुकाच्या मते त्याचं व्यक्तित्व समतोल आणि तिच्या भावनावेगानं उसळी मारणाऱ्या व्यक्तित्वाला सावरणारं होतं. रिव्हॉल्वरचा प्रसंग आपण सुरुवातीला पाहिलाच आहे.

कॉलेजच्या युनियनमध्ये रेणुका निवडून येते. तिथल्या सदस्यांत ती एकमेव महिला आणि एकमेव भारतीय असते. याच दरम्यान भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पुढे महत्वाचं स्थान निर्माण करणाऱ्या मंडळींशी तिची भेट होते. कृष्ण मेनन, सुभाष चंद्र बोस ही त्यातली दोन नावं.

सत्येन आयसीएस होतो. सरकारी सनदी अधिकारी आणि आपण सरकारच्या विरोधात चळवळ करणारे. हे कसं जमायचं असा प्रश्न रेणुकाच्या मनात असतो. पण रेणुका तिच्या मनाप्रमाणे काम करु शकते, तिच्या कामात त्याचा अडथळा येणार नाही, याची खात्री सत्येन देतो. गांधीजी याविषयी सत्येनशी बोलतात. सत्येनची स्पष्टता आणि रेणुकाच्या कामाविषयीचा आदर गांधीजींना भावतो. रेणुका ऑगस्ट १९२५ ला भारतात परतते. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रेणुका आणि सत्येन यांचं लग्न होतं.

सत्येनचं सरकारी काम आणि रेणुकाचं चळवळीचं, विशेषतः महिलांतलं काम सुरु होतं. १९२८ साली राष्ट्रीय पातळीवर झालेल्या महिलांच्या सामाजिक परिषदेत रेणुका आणि इतर काही जणींनी द्विभार्या प्रतिबंध, घटस्फोटाचा अधिकार आणि स्त्रियांना वारसा हक्क हे ठराव मांडले. मोठ्या बहुमतानं ते मंजूर झाले. पण विरोधाची धारही तीव्र होती. विरोध करणाऱ्यांत नामवंत महिला नेत्याही होत्या. त्यांची म्हणून काही समर्थनं होती. यावरुन हे लक्षात येतं की त्यावेळच्या स्त्रीवाद्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद होते. प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या ब्राम्हो समाजानं घटस्फोटाच्या मुद्द्यावर रेणुका रे यांच्यावर जोरदार टीका केली. रेणुकांनी त्यांना आठवण करुन दिली. ब्राम्हो समाजाची लग्नं ज्या विशेष विवाह कायद्याखाली होत, त्यात घटस्फोटाचा अधिकार अनुस्यूत आहेच. संततिनियमनाचा मुद्दाही रेणुका प्रचारत. या विषयाची अशी जाहीर चर्चा करणं त्याकाळात शिष्टसंमत नसल्यानं माध्यमांतून रेणुकांवर आगपाखड होई. धार्मिक कायदे स्त्रियांना दुय्यम लेखणारे असल्यानं त्याविरोधात ब्रिटिशांनी कायदा करावा, अशी रेणुकांची मागणी होती. एकरुप नागरी संहितेच्या त्या जोरदार पुरस्कर्त्या होत्या.

दरम्यान ग्रामोद्योग तसेच ग्रामसुधारणा यांना चालना देण्यासाठी रेणुकांनी नियोजित प्रयत्न केले. जातिभेदविरोधी पदयात्रांत गांधीजींबरोबर त्या फिरल्या. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना विश्वभारती विद्यापीठाच्या ‘कर्म समिती’वर म्हणजेच कार्यकारी समितीवर घेतलं.

१९४१ साली बी. एन. राव या कायदेतज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन कायद्यांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी हिंदू कायदा समिती सरकारनं स्थापन केली. या समितीला सूचना करण्यासाठी केंद्रीय कायदेमंडळात महिला संघटनांच्या प्रतिनिधी म्हणून यावं, अशी राव यांनी रेणुकांना विनंती केली. आमच्या लोकांना बंदीवान करणाऱ्या सरकारच्या कायदेमंडळात जायला त्यांनी प्रारंभी नकार दिला. पण अनेकांनी त्यांचं समितीच्या कामात महत्वाचं योगदान होईल हे सांगून त्यांना गळ घातल्यानं अखेर त्या १९४३ साली केंद्रीय कायदेमंडळात गेल्या. तिथं त्यांनी चक्क सुधारित कायदे हा अर्धवट उपाय असून आम्हाला जनतेला उत्तरदायी असलेलं स्वतंत्र राष्ट्रीय सरकार हवं अशी मागणी केली. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांचे पहिल्या पानावरील मथळे या बातमीचे होते.

रेणुका पुढे १९४६ साली संविधानसभेवर गेल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर संविधानसभाच हंगामी कायदेमंडळ म्हणून काम करु लागली. त्यात हिंदू कोड बिल डॉ. आंबेडकरांनी मांडलं. त्याला विरोध झाला. ते मंजूर झालं नाही. त्याच्या निषेधार्थ त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. संविधानसभेत विविध विषयांवर त्या बोलल्याच. पण हिंदू कोड बिलाच्या बाजूनं त्या ठाम उभ्या राहिल्या. पुढे पहिल्या लोकसभेत ते टप्प्याटप्यानं मंजूर झालं. त्यावेळी रेणुका प. बंगाल सरकारात मंत्री होत्या. तरीही त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल मंजूर व्हावे यासाठी पाठिंबा मिळवण्याचे अथक प्रयत्न केले.

त्यांची प. बंगाल सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारतानाची घटना उद्बोधक आहे. मुख्यमंत्री रेणुकांनी मंत्री व्हावं यासाठी आग्रही होते. मी विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यानं मी मंत्रिपद घेणार नाही, असा रेणुकांचा पवित्रा होता. वास्तविक, ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचं सदस्यत्व घेता येण्याची तरतूद होती. पण रेणुकांना ते मान्य नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी अखेरीस त्यांचे पती सत्येन यांना मध्ये घालून रेणुकांना समजावलं. सत्येन त्यावेळी प. बंगाल सरकारचे मुख्य सचिव होते. सत्येन रेणुकांनी मंत्री व्हावं या बाजूचे होते. रेणुकांनी सत्येनना मुख्यमंत्री काय म्हणाले विचारलं. सत्येन म्हणाले, ‘बायको मंत्री म्हणून दालनात आली की तुला उठून उभं राहायला अडचण होईल का? मी म्हटलं – कोणीही महिला आली तरी मी उठून उभा राहतो. ’

रेणुका मंत्रिपद स्वीकारतात. ६ महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून येतात.

१९५७ साली त्या लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र संविधान सभेच्या तुलनेत आताच्या लोकसभेतील सदस्यांची प्रेरणा आणि गुणात्मकता रेणुकांना खंतावणारी वाटत होती. संसदेनं सामाजिक कल्याण आणि मागासवर्ग कल्याण यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. तिच्या अध्यक्ष त्या होत्या. ‘रेणुका रे समिती’ या नावानं ही समिती ओळखली जाते. या समितीनं अनेक महत्वाच्या सूचना केल्या.

१९६९ साली पती सत्येन वारल्यानंतर विविध महिला संघटनांना एकवटणाऱ्या महिला समन्वय परिषदेच्या कामात त्या स्वतःला व्यग्र ठेवू लागल्या. १९९८ साली त्यांना पद्मभूषण किताबानं भारत सरकारनं गौरवलं. ११ एप्रिल १९९७ रोजी कलकत्त्याला वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

महिलांच्या अधिकारांचे खूप प्रश्न त्यांच्या कारकीर्दीत मार्गी लागले. तथापि, बरेच प्रश्न अजून शिल्लक आहेत. मुख्यतः स्त्रियांकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन. त्यासाठी लढणाऱ्या पिढीला रेणुका रेंचं कार्य आणि विचार दीपस्तंभ म्हणून नेहमीच दिशा दाखवत राहतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

______________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा तेरावा भाग १८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.