Sunday, July 20, 2025

विकास की विध्वंस?


हा प्रश्नच कार्यकर्ते-पत्रकार-अभ्यासक अविनाश पोईनकर यांनी वर्षा कोडापे या आपल्या पत्नीच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘सुरजागड विकास की विस्थापन?’ या पुस्तकाचा गाभा आहे. सुरेश द्वादशीवार यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची भूमिका विकासाविरुद्ध नसून विध्वंसाविरुद्ध असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. पुस्तकप्रवेश करणारा वाचक या प्रस्तावनेनेच हादरुन जातो. पुढे काय वाढून ठेवलंय याचा अदमास तिथेच येतो आणि त्याला सामोरे जाण्याची मनाची तयारीही होते. सुरजागडचा प्रश्न, तेथील समृद्ध जल-जंगल-जमिनीचे उजाड होणे, आदिवासींची ससेहोलपट आणि त्यांचा निकराचा लढा याचे विविध आयाम सविस्तरपणे लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहेत. या लढ्याशी परिचित व संबंधित असलेल्या पोईनकर यांना या लढ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी साधना साप्ताहिकाची तांबे-रायमाने शिष्यवृत्ती मिळाल्याने समाजशास्त्रीय संशोधनाचे हे पुस्तक आकारास येऊ शकले.

लोहाबरोबरच तांबे, जस्त, सिमेंट, डोलामाईट, लयटेराईट अशा विविध खनिजांचे आगर असलेला आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा कंपन्या आणि सरकार यांचे लक्ष्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर गडचिरोलीवर खास लक्ष आहे. सुरजागड हा मुख्यतः लोहखनिजाचा प्रदेश. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २००७ साली येथे सुमारे साडेतीनशे एकर जमीन ५० वर्षांच्या लीजवर खाणकाम करण्यासाठी सरकारने दिली. २०२३ मध्ये आणखी पाच कंपन्यांना मिळून साडेचार हेक्टरहून अधिक जमीन खाणींसाठी प्रदान करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने असलेल्या माडिया या अतिअसुरक्षित आदिम जमातीची उपजीविका आणि एकूण जीवनच यामुळे धोक्यात आले असून आता किमान ४० हजार ९०० नागरिक विस्थापित होतील आणि प्रस्तावित २५ खाणी पूर्णतः सुरु झाल्यावर लाखो आदिवासींना याचा फटका बसेल असे लेखकाने नमूद केले आहे. येत्या पाच-दहा वर्षांत घनदाट जंगलाचा प्रदेश ही गडचिरोलीची ओळख पुसली जाईल असा लेखकाचा अंदाज आहे.

आदिवासी समाजाची तथाकथित मुख्यप्रवाही समाजाने कायम उपेक्षा केली. आदिवासी नेते जयपालसिंग मुंडा यांनी संविधान सभेतील आपल्या भाषणात याकडे लक्ष वेधले होते. (त्या भाषणातील एक अवतरण या पुस्तकात प्रारंभीच दिलेले आहे.) लेखकानेही ही खंत या पुस्तकात व्यक्त केली आहे. त्यादृष्टीनेच आदिवासींच्या योगदानाला उजाळा देताना स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्ध्यांची कामगिरी पहिल्याच प्रकरणात नोंदवलेली आहे. या खाणींच्या प्रकल्पात भरडल्या जाणाऱ्या माडिया या आदिम जमातीचा परिचय दुसऱ्या प्रकरणात आहे. माडिया व गोंड या दोन स्वतंत्र जमाती असतानाही ‘माडिया गोंड’ म्हणून माडियांना संबोधले जाणे कसे गैर आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. माडियांच्या सांस्कृतिक जीवनाची आणि धारणांची ओळख त्या पुढच्या भागात आपल्याला मिळते. सुरजागड लोह खाणींचा इतिहास, वनकायदे, या कायद्यांना न जुमानणे तसेच त्यातील सोयिस्कर बदल, कंपन्यांचे आगमन, सरकार व लोकप्रतिनिधींचा साळसूद व्यवहार, नक्षलवादी आणि आंदोलक यांच्यातील भेद, अहिंसक आंदोलने करणाऱ्यांना मुद्दामहून नक्षलवादी ठरवून चिरडणे, प्रकल्पांमुळे आदिवासींचे विविध थरांवर होणारे शोषण या बाबी सविस्तरपणे विविध प्रकरणांतून लेखकाने मांडलेल्या आहेत. यात पोखरलेले डोंगर, सपाट झालेले जंगल, खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण, आरोग्याच्या समस्या, उत्खननातून निघणाऱ्या मातीने नदीचे पाणी दूषित होणे, उपीजीविकेची पारंपरिक साधने नष्ट होणे, एकूण जगण्याचा पोतच विदीर्ण होणे, दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाची माध्यमांनी दखल न घेणे अशा अनभिज्ञ वाचकाच्या मनाला आणि समजुतींना धक्का देणाऱ्या कैक बाबींचा समावेश आहे.

पाठबळ म्हणून पुस्तकाच्या अखेरीस काही महनीयांचे अभिप्राय आहेत. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी यांचेही एक टिपण आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मराठी वाचकांना आपली संवेदनशीलता विस्तारित करण्यासाठी’ लेखकाने मोठ्या श्रमाने तयार केलेल्या या दस्तावेजाचा नक्कीच उपयोग होईल. यापलीकडे जाऊन त्यातील प्रश्नाची दाहकता कमी करण्यात आपण समाज म्हणून काय करु शकतो हा मुद्दा आहे. तो किती कळीचा आणि कठीण आहे, याची कल्पना येण्यासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या प्रस्तावनेकडे पुन्हा वळू. त्यात ते म्हणतात – ‘या संकटाचा सामना करण्यासाठी प्रथमच सुरजागड क्षेत्रातले नेतृत्वहिन व बहुसंख्येने निरक्षर असलेले आदिवासी एकत्र आले आहेत. पैसा आणि साधने या साऱ्यांच्या अभावी ते आपला जीवनमरणाचा संघर्ष लढवीत आहेत. या संघर्षाचा शेवट कसा होईल, याची साऱ्यांना कल्पना आहे आणि तो शेवट आदिवासींचाच असणार आहे. वारुळे जमीनदोस्त करता येतात. पण मुंग्या माराव्याच लागतात. हा नैसर्गिक दुष्टावा आता व्यावसायिक अघोरीपणात रुपांतरित झाल्याचे सांगणारे हे चित्र आहे.’

हे चित्र भीषण आहे. हा शेवट ठरलेला असेल तर लेखकाने हे पुस्तक लिहावे का? आणि आपण वाचावे तरी का? कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा यातली शोकांतिका आपण पाहतोच की! तसे याकडे पहावे का? द्वादशीवार हे चित्र लिहूनही अखेर या लढ्याला शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत राहण्याचे अभिवचन देतात. जर हा शेवट अटळ असेल तर या शुभेच्छा आणि सोबत राहण्याचे वचन कशासाठी? द्वादशीवारांना त्यांनी मांडलेले चित्र बदलावे असे मनोमन वाटते. आपल्या विवेकाला हादरवून सक्रिय करणे हाच हेतू त्यांचा आहे. या देशाचे मालक असलेले ‘आम्ही भारताचे लोक’ आपले घटक असलेल्या या आदिवासी भावंडांच्या सोबत उभे राहून आपण निवडलेल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला प्रवृत्त झालो तर अविनाश पोईनकरांच्या पुस्तकलेखनाच्या श्रमाचे चीज झाले असे होईल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________________________

‘सुरजागड : विकास की विस्थापन?’

अविनाश पोईनकर

हर्मिस प्रकाशन, पुणे

पाने – १७० | मूल्य – २०० रुपये
________________________________

No comments: