Friday, October 12, 2018

फॅसिझम व संविधान



‘...ही एक खाजगी सेना (Private Army) आहे. नाझी पद्धतीने जाणारी. तीच तंत्रे वापरणारी. नकारात्मक प्रचारावर यांचा भर असतो. त्याला तर्काची गरज नसते. बुद्धीला ताण देण्याची गरज नसते. या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर ती देशाला भविष्यात गंभीर दुखापत करील. भारत यातूनही तरेल. पण गंभीर जखमा होतील व त्या बऱ्या व्हायला खूप वेळ लागेल.’ 

पं. नेहरूंनी दिलेला हा इशारा आहे. पहिले पंतप्रधान म्हणून राष्ट्राची धुरा हाती घेतल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरुंनी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिण्याचा परिपाठ सुरु केला होता. राष्ट्रउभारणीसाठीचे सल्ले, धोक्यांबाबतचे इशारे त्यांत असत. ७ डिसेंबर १९४७ ला त्यांनी लिहिलेल्या एका पत्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधीचा हा इशारा आहे. 

या इशाऱ्यानंतर ७ आठवड्यांनी गांधीजींचा खून झाला. आज देशाची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. देशवासीयांची मने विखंडित करण्याचे होत्र चालू आहे. संविधानातील पायाभूत मूल्यांची आहुती त्यात पडत आहे. देश गंभीर जखमी झाला आहे. नेहरुंचा इशारा आज ७० वर्षांनी खरा ठरला आहे. 

या जखमा आहेत फॅसिझमच्या. संघाची भाजपमार्फत केंद्रात असलेली सत्ता जितका काळ राहील तितक्या या जखमा तीव्र होत जाणार आहेत. कदाचित या क्रमात देशवासीयांच्या मनाबरोबरच देशाच्याही चिरफळ्या होतील. 

काय आहे हा फॅसिझम? 

मूळ लॅटिनवरुन इटालियन भाषेत संक्रमित झालेल्या या शब्दाचा अर्थ आहे सळ्या अथवा काठ्यांचा जुडगा. एक काठी तुटते पण त्यांची मोळी बांधली तर ती तुटत नाही हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. एकतेची ताकद त्यातून सूचित होते. इटलीच्या मुसोलिनीच्या पक्षाचे नाव होते- नॅशनल फॅसिस्ट पार्टी. चांगल्या अर्थाच्या या शब्दाला एकाधिकारवादी, विरोधी मताला दडपणे, वांशिक प्रभुत्ववाद आदि नकारात्मक अर्थ दिले ते इटलीचा मुसोलिनी व जर्मनीचा हिटलर यांच्या क्रूर व्यवहाराने. हिटलरच्या पार्टीचे नाव नाझी. तो ‘राष्ट्रीय समाजवादी’ साठीचा जर्मन शब्द. गंमत म्हणजे कम्युनिस्टांचा कट्टर विरोधक असलेल्या हिटलरचा पक्ष स्वतःला समाजवादी म्हणवून घेत असे. मुसोलिनी व हिटलरने आपापल्या देशातल्या जनतेच्या तत्कालीन वेदनेला शिडात भरून तिचा लोकशाहीवरचा विश्वास खतम केला. एकाधिकारी पद्धतीनेच आपली प्रगती होऊ शकते, आपणच खरे पवित्र वंशाचे आहोत. अन्य वंशाची मंडळी ही गुलाम होण्याच्या अथवा नायनाट होण्याच्या लायकीची आहेत या उन्मादी अवस्थेत जनता गेली व तिने या दोहोंच्या क्रौर्याला साथ केली. या क्रौर्यामागचे तत्त्वज्ञान म्हणून पुढे फॅसिझम हा शब्द रुढ झाला. 

आक्रमक राष्ट्रवादाचे सतत आवाहन, मानवी हक्कांबाबत अनादर, विशिष्ट समाजावर वा विरोधी विचार मांडणाऱ्यांवर शत्रू म्हणून शिक्का मारणे, ही मंडळीच देशासमोरच्या खऱ्या समस्या आहेत असे प्रचारणे, वंश वा धर्म आणि सरकार यांची एकरुपता असण्यातच आपली अस्मिता व भवितव्य आहे असे मानणे, लोकशाही, स्वतंत्र विचार, स्वायत्त माध्यमे, पत्रकार-विचारवंत-कलावंत यांचे आविष्कार स्वातंत्र्य दडपून टाकणे, खोट्याचा सतत व इतका प्रचार की तेच लोकांना खरे वाटावे, पुरुषी तसेच जुनाट मूल्यांचे पुनरुज्जीवन, सारासार विचार न करता नेत्याचा शब्द परमोच्च मानणारे झापडबंद अनुयायी तयार करणे आदि लक्षणे वा वैशिष्ट्ये फॅसिझममध्ये मोडतात. 

आज आपल्याकडे अधिकृतपणे एकाधिकारशाही आलेली नाही. लोकही त्याला अजून समर्थन देत नाहीत. निवडणुका थांबलेल्या नाहीत. त्या होत आहेत. भाजपला त्या मार्गानेच सत्तेवर यावे लागत आहे. अन्य लोकही निवडले जात आहेत. लष्करशाही अवतरलेली नाही. पण संघपरिवाराची त्या दिशेने जायची मनीषा व प्रयास नक्की आहेत. मध्यंतरीचे सरसंघचालक मोहन भागवतांचे संघस्वयंसेवक तीन दिवसात सैन्याची जागा घ्यायला सक्षम आहेत हे विधान तेच दर्शवते. खुद्द संघात निवडणुका नाहीत. पुरुषांप्रमाणे संघात स्त्रिया स्वयंसेवक होऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी स्त्री सेविका समिती हे स्वतंत्र दल आहे. अन्य सांस्कृतिक धारणांना दुय्यमत्व देऊन हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे ते प्रचारत असतात. संघ तांत्रिकदृष्ट्या स्वतःला काही कृत्यांपासून वा विधानांपासून अलग करतो. पण त्यांच्या परिवारातील संघटना व व्यक्तींना हे करण्यासाठीची पूर्ण चालना व सहाय्य तो देत असतो. गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामला तो आमचा स्वयंसेवक नाही म्हणून नाकारणे हा याचाच भाग. त्याला नाकारले तरी गांधीजींच्या हत्येसाठी विषारी वातावरण तयार करायला वल्लभभाई पटेलांनी संघालाच जबाबदार धरले. म्हणून त्यावर बंदी घातली व नंतर अशा कारवाया न करण्याबद्दल हमीपत्र घेऊन ती उठवली. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश या निःशस्त्र व ज्येष्ठ विचारस्वातंत्र्यवाद्यांच्या खुन्यांना प्रोत्साहन व संरक्षण देण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्यात संघपरिवाराचा वाटा मोठा आहे. (कर्नाटकातील भाजपविरोधी सरकारच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या खमक्या शोधातून जी सूत्रे उलगडत गेली त्यामुळे या खूनकारस्थानातील काहींच्या अटका सध्या सुरु झाल्या आहेत. लोकशाही राज्याची बूज राखण्यातली ती अपरिहार्यताही असावी. तथापि, हे नीट शेवटास जाईल का याबद्दल शंका मनात येतेच. पुराव्यांची मोडतोड, साक्षीदारांचे मागे सरणे आदि कारणांनी मालेगाव बॉम्बस्फोटसारख्या केसेसमधून आरोपी सुटण्याचे दाखले ताजे आहेत. हरेन पंड्या, सहाराबुद्दिन वा लोया असोत. या सर्वातून अमित शहांच्या उपरण्याची टोके सहीसलामत सुटणे व त्या क्रमात नवे मुडदे पडणे, दहशतीच्या कराल छायेत काही धैर्याने उघडलेल्या तोंडांतून पुढचे शब्दच न फुटणे हे आपण पाहतोच आहोत.) 

संघाचे राजकीय साधन असलेला भाजप प्रचंड बहुमताने केंद्रात सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर तसेच अनेक राज्यांत त्यांची सत्ता आल्याने संघपरिवाराशी संबंधित कट्टर हिंदुत्ववादी गट मोकाट सुटले आहेत. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरुन अखलाकचे घर उद्धस्त करुन त्याला खलास करणे, उनात व अन्यत्र गोरक्षकांनी दलित-मुस्लिमांना गाईचे मांस वाहून नेत आहेत या वहिमावरुन बेदम मारणे वा त्यांचे खून करणे सुरु आहे. लव्ह जिहादच्या मिषाने मुस्लिम तरुणांना लक्ष्य करुन वांशिक वर्चस्वाची भूमिका स्थापित करण्याचे प्रयत्न जारी आहेत. याचबरोबर सध्याच्या लोकशाहीतील उणिवांची चर्चा करुन अध्यक्षीय लोकशाहीचा गौरव करणे, पंचायत पातळीवर उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी शिक्षणादि अटींचा प्रारंभ करणे, अनेक विधेयके संसदेत पुरेशा चर्चेअभावी वित्तविधेयकाच्या आवरणाखाली मंजूर करणे तसेच नोटबंदी, जीएसटी आदि निर्णय हे एकाधिकारशाहीचीच दिशा दर्शवतात. 

मोदी सत्तेवर आल्यापासूनची तर अशी कैक उदाहरणे देता येतील. ते सगळे फॅसिझमचेच नमुने आहेत. पण या नमुन्यांकडे पाहिल्यावर आपल्या मनात एक प्रश्न येतो किंवा यायला हवा तो म्हणजे आपली घटना या सगळ्याला परवानगी कशी देते? ती या कृत्यांना प्रतिबंध कशी काय करत नाही? मोदी घटनेचीच शपथ घेऊन सत्तेवर आलेत, घटनेतल्या तरतुदींप्रमाणेच त्यांना कारभार करावा लागतो. अजूनतरी त्यांनी घटना गुंडाळलेली नाही वा अधिकृतपणे दुरुस्त करुन एकाधिकारशाही प्रस्थापित केलेली नाही. मग तरीही हा फॅसिझमचा व्यवहार कसा काय? 

याचे उत्तर शोधताना दोन उदाहरणे पाहू. एक, वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निस्सीम पुरस्कर्त्या समजल्या जाणाऱ्या अत्यंत प्रगत देशातले व दुसरे, आपल्या देशातले. अमेरिकेतले हे उदाहरण आहे डोनाल्ड ट्रम्प निवडून येण्याच्या व ओबामांची मुदत संपण्याच्या संक्रमणाकाळातले. ट्रम्प निवडून आलेले आहेत पण अजून सत्तेचे दोर हातात यायला काही कालावधी बाकी आहे आणि ओबामा लवकरच अध्यक्षपदावरुन उतरणार असले तरी अजून सत्ता त्यांच्या हातात आहे. अशा या काळात कॉलिन केपर्निक हा अमेरिकन फूटबॉल खेळाडू खेळाच्या मैदानात त्याची टीम अमेरिकन ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणायला उभी असताना बसून राहतो. हे दृश्य सगळ्या अमेरिकेत प्रसारित होते आणि कॉलिनच्या या कृत्याबद्दल मतमतांतरे व्यक्त होऊ लागतात. कॉलिन हा काळा आहे. त्याचे आपल्या कृतीबद्दलचे म्हणणे असते- ‘मी काळ्या तसेच गौरेतर लोकांशी भेदभाव करणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाला अभिवादन करणार नाही. हा निषेध नोंदवणे मला खेळापेक्षा महत्वाचे वाटते.’ डोनाल्ड ट्रम्प म्हणतात- ‘काय भयानक गोष्ट आहे ही! त्याने त्याच्यासाठी दुसरा देश बघावा.’ तर ओबामा म्हणतात – ‘त्याने त्याचा संविधानात्मक अधिकार बजावला आहे. या निमित्ताने एका महत्वाच्या प्रश्नाकडे त्याने आपले लक्ष वेधले आहे.’ 

(NIKE कंपनीने याच कॉलिन केपर्निकला आपला ब्रँड अँबेसेडर केल्यावर जी त्याची जाहिरात अलीकडे आली त्यावरुन ट्रम्प महाशय खूप खवळले आहेत. काही वर्णद्वेषींनी NIKE चे बूटही निषेध म्हणून जाळले. राष्ट्रगीत चालू असताना उभे न राहता गुडघ्यात वाकून बसण्याचे हे आंदोलन अनेक काळ्या खेळाडूंनी आता सुरु केले आहे. ट्रम्प या सगळ्यांना खेळाच्या मैदानातून हाकलून द्या, किमान असे कोणी केले तर तुम्ही प्रेक्षकांनी प्रतिनिषेध म्हणून स्टेडियम सोडून बाहेर पडा, असे जोरात राष्ट्रवादी आवाहन करत आहेत.)

इथे मुद्दा येतो एकाच घटनेची शपथ घेऊन एकाच घटनेने मुक्रर केलेल्या रीतीप्रमाणे निवडून आलेल्या दोन राष्ट्राध्यक्षांची आपल्या देशातील या प्रसंगाबाबत दोन वेगळी मते कशी? याला कारण घटना नसून विचारसरणी आहे. घटना राबवणाऱ्यांची विचारसरणी काय हे महत्वाचे असते. 

दुसरी घटना भारतातली. अगदी आपल्या महाराष्ट्रातली. १९७२ सालची. स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव सुरु होता. त्याचवेळी दलितांवरील अत्याचारांनाही भर आला होता. दलित पॅंथर आक्रमक झाली होती. तिचे बंडखोर तरुण नेते व्यवस्थेवर हल्ला बोल करत होते. नामदेव ढसाळांनी आपल्या कवितेतून ’१५ ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ...स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे?’ असा सवाल केला तर राजा ढालेंनी साधनेत लिहिलेल्या ‘काळा सूर्य’ या लेखातून आमच्या आयाबहिणींच्या लुगड्याला हात घातला जातो त्याची तुम्हाला लाज वाटत नाही आणि राष्ट्रध्वजाचे फडके तुम्हाला पवित्र वाटते अशा आशयाचे असंसदीय विधान केले. या दोन्ही कृती राष्ट्रदिनांच्या-राष्ट्रचिन्हांच्या अपमान करणाऱ्या होत्या. संविधानात राष्ट्रचिन्हांच्या अवमानासंबंधी कारवायांची तरतूद नव्हती. पण १९७१ साली अशा कृत्यांना शिक्षा सांगणारा कायदा झाला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी या कायद्याप्रमाणे या दोहोंवर काहीही कारवाई केली नाही. उलट हे लोक स्वातंत्र्याला दूषणे देत आहेत याचा अर्थ हे स्वातंत्र्य अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. दुरुस्ती आपल्यात करणे गरजेचे आहे अशी भूमिका घेतलेली दिसते. कन्हैया तसेच अन्य ज्या कोणी मोदी तसेच संघाविरोधी दमदार आवाज उठवला त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली आत टाकण्यात आले. एकाच घटनेप्रमाणे पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी व मोदी यांच्या व्यवहारात हा फरक का? – कारण विचारसरणी. 

(आणीबाणीत अनेक विरोधकांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले त्याचे काय?..ही शंका काहींच्या मनात येऊ शकते. आणीबाणी व इंदिरा गांधी या चर्चेला वेगळे संदर्भ व आयाम आहेत. त्यांची चर्चा खूप झालेली आहे. अजूनही ती स्वतंत्रपणे करायला करायला हरकत नाही. तूर्त इथे ती अप्रस्तुत आहे. इंदिरा गांधींच्या या व्यवहाराची संघप्रणीत फॅसिझमशी तुलना करणे ही मोठी गल्लत होईल. सामाजिक न्याय, सेक्युलॅरिझम व संघविरोध याबद्दलच्या इंदिरा गांधींच्या भूमिका संशयातीत आहेत. संघाविरोधात इंदिरा गांधी सलगपणे वा सातत्याने ठाम विरोधात आहेत. आणीबाणीविरोधातील लढ्यातल्या अनेक आदरणीय पुरोगाम्यांनी मात्र संघाशी या काळात सहकार्य केलेले दिसते. त्याचा आनुषंगिक परिणाम म्हणून गांधीहत्येनंतर आलेल्या एकाकीपणातून बाहेर पडायला संघाला मोठी मदत झाली. त्यातूनच त्यांना पुढे सत्तासोपानही प्रशस्त झाला. आणीबाणी जाहीर करणे वा संघाशी सहकार्य करणे या चुकाच होत्या. तथापि, आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधी वा या आणीबाणीविरोधी लढ्यात संघाला सोबत घेणारे पुरोगामी फॅसिस्ट नव्हते. संघ निश्चित फॅसिस्ट आहे.) 

विचारसरणीच महत्वाची असेल तर घटनेला काही किंमत आहे की नाही? नक्की आहे. घटनेत दुरुस्त्यांची एक रीत ठरवली गेली आहे, त्याप्रमाणे दुरुस्त्या करता येतात. तथापि, घटनेचा मूळ ढाचा बदलता येत नाही. ढाच्याची थेट व्याख्या केलेली नसली तरी सर्वसाधारणपणे हा ढाचा म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये; मूलभूत हक्क. घटना मुळातून बदलू पाहणाऱ्यांना ती मोठी अडचण आहे. मग ही मंडळी काय करतात, तर ज्या शब्दांच्या व्याख्या केलेल्या नाहीत त्यांचे अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात. किमान गोंधळ तयार करतात. काही संकेत असतात. ते उधळून लावतात. न्यायालयात निकाल लागेल तो लागेल; पण तोवर त्यांना नकोशा झालेल्यांना पोलिसांकरवी अटक करुन जेरीस आणतात. प्रतिबंधात्मक कारवाया करतात. 

शब्दांचा गोंधळ तयार करण्याचे एक ठळक उदाहरण पाहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने भाजप सरकारने त्यांना मानवंदना देण्यासाठी संसदेचे दोन दिवसीय खास अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात बाबासाहेबांच्या योगदानाविषयी काही चर्चा होईल अशी अपेक्षा होती. तथापि, गृहमंत्री राजनाथसिंग यांनी समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या सरनाम्यात नव्हते, ते इंदिरा गांधींनी घातले हा मुद्दा उकरुन काढला. हे खरे आहे की हे शब्द मूळ सरनाम्यात नव्हते व ते इंदिरा गांधींच्या काळात १९७६ सालच्या घटनादुरुस्तीकरवी घातले गेले. मात्र याचा असा अर्थ नव्हे की संविधानकारांना ही मूल्ये नको होती. संविधान तयार होण्यापूर्वी व तयार होत असतानाही या मूल्यांबाबत आपल्या राष्ट्रीय नेत्यांत सहमती होती. धर्मनिरपेक्षता हा शब्द मागून घातला गेला, परंतु ते मूल्य अधोरेखित करणारे कलम २५ आधीपासूनच घटनेत होते. मार्गदर्शक सूत्रांत संसाधनांच्या न्याय्य वितरणाबाबतची नोंद तसेच सामाजिक, आर्थिक न्यायाच्या हमीतून समाजवाद हे मूल्य संविधानकारांना अभिप्रेतच होते. इंदिरा गांधींनी या मूल्यांना अधोरेखित केले एवढेच. प्रश्न असा उपस्थित होतो, इंदिरा गांधींची ही दुरुस्ती मान्य नसणाऱ्यांनी त्यांची सत्ता गेल्यावर ही दुरुस्ती रद्द का केली नाही? सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या अन्य निकालांद्वारे या दुरुस्तीला मान्यताच दिली आहे. खुद्द भाजपने आपल्या पक्षाच्या ध्येयात ‘गांधीवादी समाजवाद’ समाविष्ट केला आहे. गांधी, आंबेडकर ही नावे त्यांच्यामागची नैतिक तसेच समुदायांची ताकद लक्षात घेऊन वापरायची, मात्र त्यांच्या विचारांना मूठमाती द्यायची ही संघाची खेळी भाजपवाले संसदेत मनमुराद घटनात्मकरित्या खेळत असतात. 

संविधान तयार होत असताना संघ तसेच हिंदूमहासभा त्यात मनुस्मृतीसारख्या महान भारतीय ग्रंथांतली मूल्ये नसून ही घटना परकीय पाश्चात्य मूल्यांवर आधारित आहे, अशी यथेच्छ नालस्ती करत होते. तिरंग्याचे रंग अशुभ आहेत असा अंधश्रद्ध बकवास करत होते. आज तेच लोक घटनेला कोणी हात लावू शकत नाही अशा वल्गना करत तिरंगा यात्रा काढत आहेत. आमच्या आधीच्या भूमिका बदलल्या आहेत व त्या या कारणांमुळे बदलल्या आहेत हे काहीही सांगण्याची प्रामाणिकता न दाखवता आपण विरोध केलेल्या घटनेची शपथ घेऊन मोदी-राजनाथसिंग-फडणवीसांसारखे यांचे स्वयंसेवक सत्तास्थानी विराजमान झाले आहेत. हिंदू कोड बिलाला व त्या अनुषंगाने समान नागरी कायदा या संकल्पनेला विरोध करणारे हे लोक आज समान नागरी कायद्याचा जोरदार पुरस्कार करत आहेत. एक लक्षात घ्यायला हवे, समान नागरी कायद्याचा कोणताही मसुदा त्यांनी चर्चेला ठेवलेला नाही. केवळ हाकाटी पिटत आहेत. यामागे मुस्लिम समाजाला लक्ष्य करुन समस्त हिंदू विद्वेषी धर्मभावनेच्या सहाय्याने एकवटणे हाच केवळ हेतू आहे. घटनेची शपथ घेऊन सत्तेवर आलेली मंडळी संविधान बदलायलाच सत्तेवर आलीत हे विसरता कामा नये. पहिल्या टप्प्यात तिच्यातील मूल्यांविषयी संभ्रम तयार करुन काही अर्थ बदलणे वा विरोधी धोरणे आखणे हे कार्य ते करत आहेत. प्रत्यक्ष घटना बदलायचे पाऊल पुढचे असेल. 

ज्या रीतीने हिटलरने ज्यू मंडळींना आपल्या सर्व विनाशाचे कारण बनवून त्यांचा नायनाट करायचे विष जर्मन जनतेत पसरवले तसे मुस्लिम, ख्रिश्चन, सेक्युलर, कम्युनिस्ट व मुख्य म्हणजे आधुनिक भारताची घडण करणारे नेहरु (त्यांच्या वंशजांसह) संघाला नष्ट करायचे आहेत. त्यासाठीचे जहर उगाळणे व जनतेला चाटवणे हा उद्योग सतत करत आहेत. भारतीय दंड संहितेतील ब्रिटिश भारतातील १२४ अ सारखी राजद्रोहाची कलमे नेहरुंसारख्यांनी बदलण्याचे प्रस्ताव ठेवूनही सर्व राज्यकर्त्यांनी आतापर्यंत सोयीने जतन केली. आज त्यांचा जम के अवलंब भाजप शासन करत आहे. 

मुद्दा हा की, भारतीय संविधान ज्या राजकीय व सामाजिक चळवळींतून उत्क्रांत झाले त्या चळवळी फॅसिझम-साम्राज्यवादाच्या कट्टर विरोधक होत्या. जागतिक प्रबोधन तसेच फॅसिझम-साम्राज्यवाद विरोधी चळवळींतून जे प्रगत विचार पुढे आले ते भारताच्या घटनेच्या चबुतऱ्याचा भाग आहेत. भारतातील अशोक-अकबरासारख्या सम्राटांच्या सर्वधर्मसमभावी व विचारबहुल संस्कृतीच्या वारशाच्या आधारशिला या चबुतऱ्याखाली आहेत. अशावेळी संविधानातल्या तरतुदी फॅसिझमला पूरक ठरणे सर्वथैव अशक्य आहे. मात्र संविधानाची रचना करताना ज्या बाबी गृहीत धरल्या होत्या अथवा जे संकेत पाळण्याची हमी तत्कालीन वातावरणात होती आणि ज्या संकल्पनांची स्पष्ट व्याख्या केलेली नव्हती वा सार्वत्रिक सहमतीमुळे करण्याची गरज भासली नव्हती त्या सगळ्याचा खुबीने वापर आपल्या देशातले हे नवफॅसिस्ट करत आहेत. 

अशावेळी संविधानातल्या मूल्यांची आजच्या भारतीयांच्या मनात स्पष्टता आणण्याचे जागरण महत्वाचे ठरते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘विचारही मर्त्य असतात. ते टिकवण्यासाठी त्यांची जोपासना करावी लागते.’ भारतीय संविधानातील मूल्यांना आपण गृहीत धरले. कष्टकऱ्यांच्या तसेच भौतिक बदलाच्या चळवळींत पुरोगाम्यांनी स्वतःला झोकून दिले. तथापि, बदलत्या पिढ्यांना नव्या संदर्भात या मूल्यांचा अर्थ उलगडून सांगण्याचे काम आपल्याला महत्वाचे वाटले नाही. ते राहून गेले. हा वारसा मानणाऱ्यांमधून आलेल्या दरम्यानच्या राज्यकर्त्यांनीही याबाबत जी ढिलाई दाखवली, सत्तेसाठी तत्त्वहिन तडजोडी केल्या आणि एकूण विकासक्रमातून जी विषमता वाढली वा मोठ्या प्रमाणात आजही अनेक विभाग विकासापासून वंचित राहिले, समग्र परिवर्तनाऐवजी भ्रष्टाचारासारख्या सबगोलंकारी मुद्यावर चळवळींची नैतिकता मापली जाऊ लागली या सगळ्याने या नवफॅसिस्टांना रुजण्यास सुपीक जमीन मिळाली. हेही आपल्याला दुरुस्त करावे लागेल. भाजपला सत्तेतून उतरवण्याची ताबडतोबीची निवडणुकीतली राजकीय जुळणी आणि त्यांनी पेरलेल्या विषाचा निचरा करण्यासाठीचे लांब पल्ल्याचे सततचे प्रबोधन व अशा फॅसिस्टांना रुजण्याचा पुन्हा आधार मिळता कामा नये यासाठीची समग्र परिवर्तनाची चळवळ ही त्रिसूत्री आपल्यासमोरच्या फॅसिझमच्या मुकाबल्याचा आजचा कार्यक्रम आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८, विशेषांक)

Wednesday, August 1, 2018

पैसेआधारित आरक्षण हा संविधानद्रोहच !


काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एका युवकांच्या शिबिरात आरक्षणावर घमासान चर्चा चालू होती. आरक्षणाने गुणवत्ता धोक्यात येते, कमी गुणवत्तेचे विद्यार्थी पुढे जातात, गुणवान विद्यार्थांवर कसा अन्याय होताे वगैरे जोरात मांडले जात होते. चर्चेत हस्तक्षेप करताना मी एक निरीक्षण मांडले. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एका दलित विद्यार्थ्याला उत्तम गुण असतानाही तेथील अनुसूचित जातीसाठीची कटऑफ लाईन त्याच्या गुणांपेक्षा वर असल्याने प्रवेश मिळू शकला नाही. मात्र त्याच्यापेक्षा कमी गुण असलेल्या सवर्ण मुलाला विनाअनुदानित खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये काही लाख रुपये कॅपिटेशन फी भरुन प्रवेश मिळाला. यथावकाश हा सवर्ण मुलगा डॉक्टर झाला. तथापि, त्याच्यापेक्षा अधिक गुण असतानाही त्या दलित मुलाला डॉक्टर होता आले नाही. कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. हे निरीक्षण मांडून मी प्रश्न केला - याचे काय करायचे? इथे पैश्याने गुणवत्ता धोक्यात येत नाही का?
काही गप्प झाले. कारण शिबिरार्थींमध्ये त्या सवर्ण विद्यार्थ्याप्रमाणे विनाअनुदानित कॉलेजात भरभक्कम फी भरुन प्रवेश घेतलेले काही होते. काही म्हणाले- हे दोन्ही बरोबर नाही. ना जातीने, ना पैश्याने प्रवेश राखून ठेवला जावा. प्रवेश गुणवत्तेवरच मिळावा.
नंतर मग गुणवत्ता म्हणजे काय? ती कशी तयार होते? सामाजिक-आर्थिक वारसा त्याला कारण नसतो का?...अशी बरीच चर्चा झाली. त्यातील काही बाबींचा उल्लेख पुढे होईल. त्यापूर्वी हे मला आठवण्याचे कारण व त्याचे तपशील नमूद करतो.
माझ्या वर चर्चेत मांडलेल्या निरीक्षणाला आता एका अभ्यासाने पुष्टी मिळाली आहे. अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या एका सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर केले. त्याचे शीर्षकच निष्कर्ष नमूद करणारे होते- 'कोटा (आरक्षण) नव्हे, तर पैसा गुणवत्ता पातळ करतो'.
एकूण ४०९ मेडिकल कॉलेजांतील सुमारे ५६००० विद्यार्थ्यांच्या गतवर्षीच्या राष्ट्रीय गुणवत्ता व प्रवेश परीक्षेचे (NEET) हे विश्लेषण आहे. यात ३९००० सरकारी जागा तर १७००० व्यवस्थापन व अनिवासी भारतीयांसाठीच्या जागा (ज्या पैश्यांनी मिळतात) यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या विश्लेषणातून पुढील निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवले आहेतः

  • सरकारी जागांवर प्रवेश मिळवणाऱ्यांचे सरासरी गुण आहेत ७२० पैकी ४४८. तर सर्व खाजगी जागांसाठीचा हा आकडा आहे ३०६. म्हणजेच अधिक पैसे भरून खाजगी जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा सरकारी जागांवरील विद्यार्थ्यांची गुणवत्ता बरीच जास्त आहे.
  • सरकारी कॉलेजांत प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत ३९८, तर सर्व कॉलेजांतील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत ३६७. खाजगीरीत्या नियंत्रित जागांसाठीच्या गुणांच्या तुलनेत हे दोन्ही प्रकारचे दलित विद्यार्थ्यांचे गुण अधिक आहेत.
  • खालील तक्ता पहाः
कोटा
सरासरी NEETगुणवत्ता
फी (रुपये)
सरकारी
३९९
५ लाख
व्यवस्थापन
३१५
१३ लाख
अनिवासी भारतीय
२२१
१९ लाख

  • फीचे म्हणजे पैश्यांचे प्रमाण जसे वाढत गेले तसे गुण कमी होत गेलेले दिसतात. सर्वाधिक पैसे मोजणारे अनिवासी भारतीय गुणवत्तेच्या बाबत सर्वात कमी (२२१) आहेत.
  • सरकारी मेडिकल कॉलेजमधल्या फियाही हल्ली मध्यवर्गीय पालकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. तिथेही अधिक फी कमी गुणवत्ता हा कल दिसतो. ५० हजार रुपयांच्या खाली फी असलेल्यांची सरासरी गुणवत्ता आहे ४८७, तर १ लाख किंवा त्याहून अधिक फी भरणाऱ्यांची सरासरी गुणवत्ता आढळते ३७२.५.
  • या सगळ्याचा निष्कर्ष नोंदवताना टाइम्स म्हणतो- मेडिकलच्या या प्रवेशांसाठीच्या गुणवत्तेशी होणाऱ्या तडजोडीला जातिआधारित आरक्षण नव्हे, तर पैसा जबाबदार आहे.

वास्तविक प्रवेशासाठीचे किमान गुण हे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता असते. अधिक गुण म्हणजे अधिक लायक असे काही नसते. त्यापेक्षा कमी गुण असलेला विद्यार्थी तो अभ्यासक्रम पेलू शकत नाही हे गृहीत असते. जातिगत आरक्षण वा पैसा अशा कोणत्याही प्रकाराने किमान गुणांची ही अट शिथिल होणे बरोबर नसते. आदर्श अवस्थेत हे विशिष्ट किमान गुण असलेल्या कोणत्याही इच्छुक विद्यार्थ्याला त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावयास हवा. अर्थात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक यांसारख्या व्यवसायांतील गरज लक्षात घेऊन हे प्रवेश मर्यादित होऊ शकतात. अशावेळी मेरिट व आरक्षण ही चाळणी गरजेची राहते.

हे काम सरकारने करायचे आहे. कोणत्या अभ्यासक्रमाला किती प्रवेश द्यायचे, त्यासाठी कोणती व किती कॉलेजे काढायला परवानगी द्यायची याचे नियंत्रण सरकारने करायला हवे. सरकारने आज हे बाजारावर सोडले आहे. शिक्षणाचा धंदा सुरु झाला आहे. राजकीय वरदहस्ताने सुरु झालेल्या डीएड-बीएड तसेच इंजिनिअरिंग कॉलेजांतून इतके अमाप शिक्षक-इंजिनिअरांचे पीक निघाले की त्यांना सामावणाऱ्या तेवढ्या शाळा वा उद्योग नाहीत. ज्यांनी भरमसाट पैसा मोजून ही शिक्षणे घेतली त्यांना प्रचंड बेकारीचा सामना करावा लागत आहे. ज्या आई-बापांनी विविध मार्गांनी कर्ज काढून मोठ्या आशेने आपल्या मुलांच्या अगडबंब फिया भरल्या ते पालक देशोधडीला लागलेत. ज्यांना नोकऱ्या लागत आहेत, त्याही अत्यंत अल्प मोबदला देणाऱ्या. शाळा-कॉलेजांतील कायमस्वरुपी नसलेल्या शिक्षकांना सात ते बारा हजारांवर दहा-बारा वर्षे राबावे लागते हे वास्तव एनडीटीव्हीद्वारे रवीश कुमारनी अगदी प्रखरपणे जगासमोर आणले.
ना पैसा- ना जात प्रवेशाचा निकष असावा, केवळ गुणवत्ता असावी असे ज्यांना वाटते असे विद्यार्थी वा पालक हे मध्यम अथवा गरीब वर्गातले कथित उच्चजातीय असतात. या मध्यम वा निम्न आर्थिक स्तरातील मंडळींना सरकारचे हे धोरण अंगावर येत नाही किंवा आकळत नाही. पण मागासवर्गीयांचे आरक्षण खटकत असते. आरक्षण नसलेले कंत्राटी-खाजगीकरण वाढत असलेल्या काळात आरक्षण जुजबी वा प्रतीकात्मक राहिले आहे. हाही सरकारी धोरणाचा परिणाम हे यांना समजत नाही किंवा जातभावना समजून घेण्याच्या आड येते. जातीआधारित आरक्षण नको म्हणणारे तेवढ्याच अगत्याने वैयक्तिक आयुष्यात जातिभेद संपवण्याच्या बाजूने प्रयत्नरत असतात असे नव्हे.
ना जात-ना पैसा हे एका ओघात म्हणण्याइतकी त्यांची पातळी एक नाही. जात ही एक सामाजिक व त्याच्या परिणामी आर्थिक अवस्था आहे. समाजातील काही विभागांना जाणीवपूर्वक विकासक्रमापासून व मानवी प्रतिष्ठेपासून अलग ठेवण्याचे आणि काहींना विकासाचे व प्रतिष्ठेचे खास आरक्षण देण्याचे पातक जातिव्यवस्थेने केले आहे. हे पातक हजारो वर्षांचे आहे. आर्थिक प्रगती तसेच मानवी प्रतिष्ठेपासून दूर राहिलेल्या तथाकथित खालच्या जातींत तयार झालेला न्यूनगंड आणि वरच्या जातींना मिळालेली भौतिक संपदा व आत्मविश्वास ही या विषम व्यवस्थेची देण आहे हे वस्तुनिष्ठपणे समजून घेणे गरजेचे आहे. तरच सर्वांच्या प्रगतीचा मार्ग सापडेल. तो मार्ग मागास जातींना विशेष संरक्षणाशिवाय पुढे सरकू शकत नाही हा विवेक जागृत ठेवावाच लागेल. अन्यथा खोट्या प्रतिष्ठेच्या वा गैरसमजुतीच्या अधीन होऊन विद्वेषच वाढत राहील. विद्वेषाची आग ही ज्यांच्याविषयी द्वेष वाटतो त्यांना व जे द्वेष करतात त्या दोहोंना खाक करते हे थोरामोठ्यांनी सांगितलेले सनातन सत्य आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील प्रगतीशील विचारांची, कर्मठ रूढीवाद्यांचा निडरपणे सामना करणारी गुणी कलाकार स्वरा भास्कर (ती स्वतःला 'स्टार’ नव्हे तर ‘आर्टिस्ट’ संबोधते) हिची इंडियन एक्सप्रेसच्या 'एक्सप्रेस अड्डा' या कार्यक्रमात नुकतीच मुलाखत झाली. त्यावेळी तिने खूप तीक्ष्णपणे ही जाणीव करुन दिली.  तिचे म्हणणे थोडक्यात असेः 'मी स्वतः उन्नत आर्थिक-सामाजिक वारसा असलेल्या कुटुंबात वाढले. मला इंग्रजी येते. चारचौघात बोलण्याचा-वागण्याचा आत्मविश्वास आहे. पण ज्यांना हा वारसा नाही, त्या ग्रामीण भागातील मुलींचे काय? त्यांच्याकडे कदाचित माझ्यापेक्षा अधिक प्रतिभा असेल. पण मला मिळालेला माहौल त्यांना नसल्याने त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास महाकठीण होतो.’ पुढे ती एक बोचरी वस्तुस्थिती नोंदवते- 'बॉलिवूडमध्ये दलित नायक-नायिका किती?’
स्वरा भास्करची ही संवेदना तिच्या आर्थिक-सामाजिक स्तरातल्या बहुसंख्यांच्या मनात जागली तर मागासवर्गीयांच्या वेदना कितीतरी कमी होतील.
आरक्षणाचा एकूण परिणाम कितीही कमी असला तरी ज्यांना त्याचा लाभ झाला व प्रगतीचे बरेच वरचे टप्पे ज्यांनी गाठले अशा व्यक्तींनी आपल्या पुढच्या पिढीसाठी ते न घेणे याला एक प्रतीकात्मक महत्व आहे. शिवाय शैक्षणिक आरक्षण हे त्या समाजविभागाच्या प्रतिनिधीत्वासाठी असल्याने प्रवेशापुरते हवे. नंतरची फी, वसतिगृह, खानावळ आदि सुविधा या आर्थिक उत्पन्नावर आधारित असाव्यात. यामुळे आपल्या सोबतच्या आपल्यापेक्षा अधिक चांगल्या आर्थिक स्तरातल्या दलित विद्यार्थ्याला आर्थिक सवलत मिळते व आपण त्याच्याहून गरीब असतानाही आपल्याला त्याच्याहून अधिक फी भरावी लागते यातून तयार होणारा ताण कमी व्हायला मदत होईल. या उपायाने मागास विभागातील अत्यल्प पुढारलेल्या कुटुंबांकडे बघून सगळ्या मागास विभागाच्या प्रगतीचे मापन करण्याची चूक सुधारण्यासाठीचे वातावरण तयार व्हायलाही सहाय्य होईल.
ना जात-ना पैसा हे एकाच ओघात म्हणण्याइतकी त्यांची पातळी एक नाही, याचे कारण पैसा ही एक मोठी शक्ती आहे. समाजातील विविध व्यवस्थांवर, निर्णयप्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताकद त्यातून येते. ज्या जाती परंपरेने वरच्या मानल्या जातात त्या आर्थिक बाबतीतही वरच्या आहेत. आजच्या काळात ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे तो अधिक व्हायची शक्यता स्वाभाविक असते. पैश्याने सोयीसुविधा अधिक मिळतात हे तर उघड आहे. सधन कुटुंबातील मुलांना ज्या सुविधा मिळतात त्यातून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढायला मदत होते. प्रतिकूल स्थितीतून शिकलेला विद्यार्थी व अनुकूल स्थितीचा लाभ मिळालेला विद्यार्थी यांच्या गुणांचे माप एकच ठेवून चालणार नाही.  त्यांची स्पर्धा एकाच रेषेवरुन सुरु होणे यात न्याय नाही. सामाजिक वा आर्थिक दुर्बलांप्रती न्याय करावयाचा असेल तर सामाजिक वा आर्थिक सबलांवर काही बंधने लादणे गरजेचे आहे. ते न करता उलट पैश्यांनी शैक्षणिक पात्रता खरेदी करण्याची व्यवस्था कायदेशीर करणे हा सरकारचा संविधानद्रोह आहे. संविधानाने दिलेली सामाजिक, आर्थिक न्यायाची हमी इथे सरकारच पायदळी तुडवते आहे. टाइम्स ऑफ इंडियाचा 'जातिआधारित आरक्षण नव्हे तर पैसा गुणवत्तेला ढासळवतो' हा निष्कर्ष रास्तच आहे. तथापि, याहून अधिक घातक गोष्ट घडते आहे ती अशारीतीने संविधानाच्या चबुतऱ्यावरच घाव घालण्याची. हे घाव रोखण्यासाठी संकीर्ण हितसंबंधांच्या पार जाऊन सकल, सम्यक भारतीयत्वाचा विवेक जागवणे ही आजची निकड आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Monday, July 9, 2018

डॉ. सुखदेव थोरातांशी त्यांच्या बौद्धांच्या गरिबीविषयीच्या लेखाबद्दल संवाद

डॉ. सुखदेव थोरातांनी महाराष्ट्रातील बौद्ध हिंदू दलितांपेक्षा अधिक गरीब असल्याची मांडणी त्यांच्या लोकसत्तेतील लेखांतून केली होती. त्यांच्या जानेवारीच्या लेखाबाबत मी त्यांना मेलद्वारे विचारले होते- ‘'बौद्ध दलितांमधील गरिबीचे प्रमाण २७ टक्के, तर हेच प्रमाण हिंदू दलितांमध्ये १५.६ टक्के आहे.' या निष्कर्षाचा अर्थ कसा लावायचा? आंबेडकरी चळवळीचा मुख्य वाहक असलेला, सामाजिक-राजकीय दृष्ट्या जागृत व क्रियाशील असलेला तसेच ज्या समाजातील लोक साहित्य, प्रशासन, विद्वत्ता आदि अनेक क्षेत्रांत पुढाकाराने आहेत त्या महाराष्ट्रातील बौध्द समाज अन्य दलितांच्या तुलनेत मागे (तोही इतका मागे) कसा? याची कारणे काय?’

थोरातसरांनी लागलीच उत्तर दिलेः ‘बौद्ध दलित अधिक प्रगत आहेत असाच माझाही समज होता. पण तो चुकीचा निघाला. मी वेगवेगळ्या प्रकारे शहानिशा केली. पण निष्कर्ष तोच आला. बौद्धांच्या या अधिक मागासपणाच्या कारणांचा शोध मी पुढे घेईन.’

या संवादाचा उल्लेख व त्यातील मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करणारा एक लेख मी अलीकडेच जुलै २०१८ च्या ‘आंदोलन’मध्ये लिहिला. त्याची चर्चा चालू असतानाच लोकसत्तेतील डॉ. थोरातांच्या लेखमालिकेत बौद्धांच्या गरिबीचा अधिक उहापोह करणारा लेख आला. त्याकडे लक्ष वेधणारी लेखाची लिंक असलेली पोस्ट समाज माध्यमांवर मी टाकली. डॉ. थोरातांशी कार्यकर्ते तसेच अभ्यासकांनी प्रत्यक्ष बोलावे, चर्चा करावी, असहमती असणाऱ्यांनी त्यांच्या निष्कर्षाला अभ्यासपूर्वक आव्हान द्यावे, अशी माझी इच्छा होती. ती मी जाहीरपणे व्यक्तही केली. माझ्या या पोस्टखालच्या अभिप्रायांमध्ये काही अभिप्राय हे भावनिक व मूळ लेख नीट न वाचताच दिले आहेत असे लक्षात आले. मी लेख नीट वाचून त्याचा पर्यायी तपशीलांनी प्रतिवाद करावा, असे आवाहन करत राहिलो.

दरम्यान, माझा आंदोलनमधील ‘हे वेताळाचे प्रश्न नाहीत’ हा लेख डॉ. थोरातांना कोठूनतरी मिळाला. तो वाचून त्यांनी मला पुढीलप्रमाणे मेल केलाः

Dear Suresh Sawant
I read your article published in Andolan July 2018. Some body sent to me. We can now discuss on phone about the reasons for high poverty among the new-Buddhist. I have now much better idea as to why Buddhist are more poor. May be I will write a separate article to deal with the questions raised in the reaction on the article by many .
Mobile - .......
Regard 
THORAT Sukhadeo

त्याप्रमाणे त्यांच्याशी मी फोनवर बोललो. अनेक प्रश्न विचारले. सुमारे ५० मिनिटे बोलणे झाले. खूप सविस्तरपणे त्यांनी आकडेवारी कोठून कशी घेतली, कोणते तपशील मिळत नाहीत, आंबेडकरी चळवळीचे स्वरुप, हेत्वारोप याबद्दल आपले म्हणणे सांगितले.

मी या क्षेत्रातला अभ्यासक किंवा अर्थशास्त्र किंवा संख्याशास्त्र यांच्याशी परिचित नसल्याने सगळेच तांत्रिक तपशील मला समजले असे नाही. जेवढे कळले व आठवते आहे तेवढे सूत्ररुपात खाली मांडतो.

• लोकसत्तेतला त्यांचा अलीकडचा लेख ‘नवबौद्धः धर्मांतराची किंमत?’ हा वादाला कारण झाला तो त्याच्या शीर्षकामुळे. हे शीर्षक थोरातांनी दिलेले नाही. ते इंग्रजीत लेख पाठवतात. त्याचा अनुवाद करणे व शीर्षक देणे हे लोकसत्ता करते. तथापि, लेखातील आशय पाहून टीका करणे योग्य झाले असते, असे त्यांना वाटते. धर्मांतराचा उल्लेख असलेले संबंधित विधान असे आहे- ‘'समतेसाठी धर्मांतराचा एल्गार दलितांनी पुकारला, हे पाऊल अवघ्या देशाला समतेचा प्रकाश दाखविणारे होते. परंतु ते पाऊल उचलल्याची शिक्षाच नवबौद्धांना दिली जात असल्याचे चित्र आजही दिसते.' यात खुद्द धर्मांतर हेच गरीब राहण्याचे कारण आहे व धर्मांतर न करणे हा त्यावर उपाय आहे असा अर्थ अभिप्रेत नाही. धर्मांतराला त्यात दोष दिलेला नाही. उलट धर्मांतराचे पाऊल 'अवघ्या देशाला समतेचा प्रकाश दाखविणारे' अशी प्रशंसाच आहे. बौद्ध झाल्याने जो अस्मितापूर्ण व्यवहार आंबेडकरी चळवळीचा झाला त्याला प्रतिसाद म्हणून बौद्धांना जाणीवपूर्वक सत्ता-संपत्तीच्या स्थानांपासून वगळण्याची जातियवादी सवर्ण मानसिकता यास कारण आहे. हिंदू दलितांनी हा एल्गार न पुकारल्याने (जुन्या हिंदू उतरंडीच्या रचनेतच राहिल्याने) त्यांच्या वाट्याला येणाऱ्या दुजाभावाची तीव्रता बौद्धांच्या वाट्याला येणाऱ्या दुजाभावाच्या तीव्रतेपेक्षा खूप कमी राहिली, हे त्यांना सांगावयाचे आहे. एका लेखात हे सर्व मांडणे शक्य नसल्याने ते याबाबत स्वतंत्र लेख लिहिणार आहेत. लोकसत्तेतील त्यांच्या सदरासाठीचे दोन लेख आधीच त्यांनी दिले आहेत. त्यानंतरचा तिसरा लेख या विषयावरचा असेल.

• त्यांनी वापरलेली आकडेवारी राष्ट्रीय नमुना पाहणी या सरकारच्या अधिकृत स्रोतातून घेतलेली आहे. यात हिंदू दलितांची स्थिती एकत्रित समजते. त्यात दलितांतील प्रत्येक जातीची स्थिती कळत नाही. त्यामुळे चांभार, मातंग, ढोर व अन्य सर्व दलित जाती (त्यात हिंदू महारांचाही समावेश होतो) यांची एकत्रित स्थिती कळते. त्यात कोण पुढे, कोण मागे हे समजत नाही. तथापि, लोकसंख्येच्या गणनेतून तसेच अन्य स्रोतांच्या आधारे आकडेमोड करुन हा अंदाज लावता येतो. त्याप्रमाणे संख्येने आकारमान लक्षणीय असलेल्या दलित जातींत चांभार सर्वात (अन्यांच्या तुलनेत कितीतरी) पुढे, त्यानंतर महार व त्यानंतर मातंग अशी उतरंड दिसते. अन्य दलित जातींचे संख्यात्मक आकारमान खूप कमी आहे. उदा. ढोर फक्त एक टक्का आहेत.

• बौद्धांमध्ये जे अजूनही कागदोपत्री महार आहेत त्यांचा समावेश तुम्ही केला आहे का? ..या प्रश्नावर त्यांचे स्पष्टीकरण असेः अनेक लोक सार्वजनिक ओळख अथवा जनगणनेच्या नोंदीत बौद्ध सांगतात, मात्र अनुसूचित जातींच्या सवलतींसाठी जातीच्या दाखल्यावर ‘हिंदू महार’ नोंदवतात. त्यांचा समावेश बौद्ध धर्माच्या लोकसंख्येत होत असला तरी जातीच्या वर्गवारीत त्यांची संख्या हिंदू दलितांत समाविष्ट होते. म्हणजेच बौद्धांतील ज्या प्राध्यापक, विचारवंत, वकिल, सनदी अधिकारी, उद्योग-व्यावसायिक यांनी हिंदू महार अशी जातीची नोंद केलेली आहे, त्यांचा आर्थिक स्तर हिंदू दलितांचा आर्थिक स्तर वरचा व्हायलाही कारण ठरतो. ही उच्चविद्याविभूषित मंडळी बौद्धांऐवजी हिंदू दलितांत मोडतात. आज महाराष्ट्रात महार समाजाची वर्गवारी केली तर त्यातील ६० टक्के कागदोपत्री बौद्ध आहेत, तर ४० टक्के अजूनही हिंदू महार आहेत. महाराष्ट्रात बौद्धांना सवलती लागू झाल्या तरी केंद्रात ९१ सालापर्यंत त्या नव्हत्या. शिवाय आजही काही तांत्रिक कारणांनी ते अमलात आलेले नाही. त्यामुळे राखीव जागांच्या लाभांसाठी स्वतःची जात हिंदू महार लावण्याकडे बौद्धांतील प्रगती इच्छुक गटाचा कल असतो.

• ..मग या प्रगती केलेल्या महारांचा समावेश बौद्धांच्या लोकसंख्येत केला तर बौद्ध हे हिंदू दलितांपेच्या तुलनेत वर जाणार नाहीत का? म्हणजे आज ते हिंदू दलितांच्या तुलनेत गरीब आहेत, ते उलट होणार नाही का? ..याला थोरातसरांचे उत्तर होते- नाही. त्यामुळे फारतर दोन-तीन टक्के फरक पडेल. आज बौद्ध हे हिंदू दलितांच्या तुलनेत खूप मागे आहेत. (बौद्धांची गरिबी २७ टक्के तर हिंदू दलितांची गरिबी १५.६ टक्के.) त्यामुळे असा समावेश केला तरी बौद्ध हे हिंदू दलितांच्या तुलनेत कितीतरी मागेच राहणार. मातंग समाज बौद्धांच्या तुलनेत निश्चित मागे आहे. मग एवढा फरक कशामुळे पडतो? ..याचे कारण ते चांभार समाजाची प्रगती हे देतात. चांभार समाज कितीतरी पुढे आहे. या समाजाच्या व्यवसायाचे स्वरुप तसेच सत्ताधाऱ्यांकडून मिळालेले संस्थागत सहाय्य त्याच्या गतीने झालेल्या प्रगतीला कारण आहे.

• आंबेडकरी समूहातील अभिनिवेश, पूर्वगृहितके, पूर्ण वाचण्याची तसदी न घेणे, समाजमाध्यमांतून पसरले जाणारे त्रोटक संदेश, अफवांप्रमाणे त्यावर विसंबून निष्कर्ष काढण्याची घाई तसेच हितसंबंधीयांची हेत्वारोपी वृत्ती यामुळे वस्तुस्थितीचे मापन नीट होण्याला अडचण येते.

• लेखांतून व्यक्त व्हायला मर्यादा पडते. तेव्हा, तुमच्या मांडणीविषयी प्रश्न असलेल्यांशी चर्चेला तुम्ही याल का? कोणी संस्थेने तुमचे व्याख्यान व त्यानंतर प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम आयोजित करायचे ठरवले तर तुम्ही याल का? ..यावर त्यांनी 'असे कोणी बोलावले तर जरुर येईन' असे सांगितले. ते म्हणाले, आता मी सत्तरीत आहे. अजून दहा वर्षे आपल्याकडून जेवढे देता येईल तेवढे देण्याचा माझा प्रयत्न राहील.

त्यांचा-माझा प्रत्यक्ष परिचय नाही. म्हणजे मी त्यांना ओळखतो. ते मला ओळखत नाहीत. जानेवारीच्या त्यांच्या लेखानंतर त्यांना मी मेलवर विचारलेला प्रश्न व त्यांनी मेलद्वारे दिलेले उत्तर व आताचा त्यांचा माझ्या लेखाला प्रतिसाद म्हणून आलेला मेल..एवढाच संबंध. आज फोनवर पहिल्यांदाच थेट बोलणे झाले. आमच्या बोलण्यात शेवटी माझ्याविषयी त्यांनी काय करता वगैरे चौकशी केली. कार्यकर्तेपण, चळवळीतला सहभाग, सध्या संविधान संवर्धनाच्या कामात अधिक क्रियाशील आदि संक्षिप्तपणे सांगितले. 'संपर्कात राहू' या त्यांच्या विधानाने संवादाचा शेवट झाला.

मी वर दिलेला तपशील हे माझे आकलन आहे. डॉ. थोरात असे म्हणाले हे मी सांगतो आहे. मी खूप दक्षता घेऊन त्यांचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, माझ्या ऐकण्यात-समजात गडबड होऊ शकते. त्यामुळे त्या आधारावर थोरातसरांचे मापन करणारे अभिप्राय वाचक मित्रांनी देऊ नयेत. मी आधी त्यांच्याविषयी काही म्हटले होते. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेता हा संवाद खाजगीत न ठेवता तो जाहीरपणे नोंदवणे मला गरजेचे वाटले. म्हणून मी त्याची जाहीर नोंद केली. त्यांच्या म्हणण्यावर अभिप्राय देण्यासाठी आपण त्यांच्या लेखाची वाट पहावी, ही विनंती.

अजून एक विनंती. जी आधीही केली आहे. डॉ. थोरात व्याख्यान व चर्चेसाठी येण्यास तयार आहेत. अशारीतीने त्यांना व्य़ाख्यान व चर्चेसाठी निमंत्रित करण्यास साधनांचा आधार असलेली एखादी संस्था पुढे आल्यास बरे होईल. मी मुंबईत असतो. मुंबईत कोणी असा कार्यक्रम घेतल्यास त्यासाठी ऐकणारे व चर्चेत भाग घेणारे कार्यकर्ते संघटित करण्यात मी तसेच आमचे सहकारी नक्की वाटा उचलू.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Sunday, July 1, 2018

हे वेताळाचे प्रश्न नाहीत


लोकसत्तेत डॉ. सुखदेव थोरातांचे सदर सुरु आहे. त्यातील जानेवारीच्या एका लेखात 'बौद्ध दलितांमधील गरिबीचे प्रमाण २७ टक्के, तर हेच प्रमाण हिंदू दलितांमध्ये १५.६ टक्के आहे' असे वाचले त्यावेळी मला मोठा धक्का बसला. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतलेल्या व आंबेडकरी चळवळीचा मुख्य वाहक असलेल्या बौद्ध समाजातून अनेक विद्वान, प्रतिभावान, साहित्यिक, प्रशासक, न्यायविद, राजकारणी पुढे आले. अनेक पुरोगामी चळवळीत क्रियाशील असलेल्यांतही याच समाजातले कार्यकर्ते लक्षणीय आहेत. हिंदू दलितांच्या तुलनेत बौद्धांचे हे वैशिष्ट्य कितीतरी ठळक आहे. आणि तरीही तो समाज अन्य दलितांच्या तुलनेत जवळपास दुपटीने गरीब कसा? हे असे असले तर एकूण आंबेडकरी चळवळीच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. काहीतरी मोठीच गडबड दिसते. आंबेडकरी चळवळीच्या फेरविचाराचीच निकड तयार होते. 

खात्री करायला म्हणून डॉ. थोरातांना मेल केला. त्यात विचारलेः ‘'बौद्ध दलितांमधील गरिबीचे प्रमाण २७ टक्के, तर हेच प्रमाण हिंदू दलितांमध्ये १५.६ टक्के आहे.' या निष्कर्षाचा अर्थ कसा लावायचा? आंबेडकरी चळवळीचा मुख्य वाहक असलेला, सामाजिक-राजकीय दृष्ट्या जागृत व क्रियाशील असलेला तसेच ज्या समाजातील लोक साहित्य, प्रशासन, विद्वत्ता आदि अनेक क्षेत्रांत पुढाकाराने आहेत त्या महाराष्ट्रातील बौध्द समाज अन्य दलितांच्या तुलनेत मागे (तोही इतका मागे) कसा? याची कारणे काय?’ 

डॉ. थोरात हे खूप व्यस्त असलेले विद्वान. तथापि, त्यांनी अगत्याने लागलीच उत्तर दिलेः ‘बौद्ध दलित अधिक प्रगत आहेत असाच माझाही समज होता. पण तो चुकीचा निघाला. मी वेगवेगळ्या प्रकारे शहानिशा केली. पण निष्कर्ष तोच आला. बौद्धांच्या या अधिक मागासपणाच्या कारणांचा शोध मी पुढे घेईन.’ 

हा कारणांचा शोध खूप महत्वाचा आहे. त्यांतून आंबेडकरी चळवळीची दिशा व कार्यक्रम पुनर्निधारित होणार आहेत. चळवळीतल्या तसेच अभ्यासक मित्रांनाही मी याचा शोध घेण्याची विनंती केली आहे. पाहूया हे तपशील कधी मिळतात ते. 

डॉ. थोरातांच्या निष्कर्षाला अजून कोणी आव्हान दिलेले नाही. याचा अर्थ जे पुढारलेले बौद्ध दिसतात, त्यांची संख्या एकूण सर्वसामान्य वा गरीब बौद्धांच्या तुलनेत अगदीच कमी असू शकते. विकासक्रमात एकूण बौद्ध समाजाची पुढे जाण्याची गती मधल्या काळात गळफटलेलीही असू शकते. बौद्ध वस्त्यांत हिंडताना अलीकडे हे तीव्रतेने दिसते. आमची पिढी ज्या गतीने वस्तीतून बाहेर पडली वा जी वर सरकण्याची गती होती ती आता थंडावलेली दिसते. आमच्या वेळची चळवळीची प्रेरणाही थबकलेली दिसते. 

व्यत्यास हा की, महाराष्ट्रात प्रश्न सबंध दलितांचा असला तरी लक्ष्य होतो तो बौद्ध. मुद्दा आरक्षणाचा असो, दलित अत्याचाराचा असो, त्यासाठी लढणारा म्हणून डोळ्यावर येतो तो बौद्धच. सवर्णांतल्या काहींचा समज तर दलित म्हणजे बौद्ध असाच असतो. बौद्धांव्यतिरिक्तच्या इतर दलित जाती त्यांच्या गणनेत येत नाहीत. एकूण आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिक संवेदनशील असतो तो बौद्धच. ओबीसींना जेवढे पडलेले नसते तेवढे त्यांच्या आरक्षणाबाबत दक्ष असतो तो बौद्ध. या बौद्धांना एकाकी पाडण्याचा सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहे. अन्य दलित जातींना बौद्धांनी तुमचे आरक्षण हिरावले, त्यांनीच मोठा घास घेतला, तेव्हा तुम्हाला तुमचा स्वतंत्र वाटा मिळण्याची गरज आहे, असे जोरात प्रचारले जाते आहे. काही दलित जाती त्याप्रमाणे आरक्षणांतर्गत आरक्षणाच्या वर्गवारीची मागणी करु लागल्या आहेत. आरक्षणाच्या लाभाचा एकूण आढावा घेऊन त्यात दुरुस्त्या करणे गरजेचेच आहे. पण आज जे चालले आहे, त्यांतून दुस्वास वाढतो आहे. शिवाय एकूण आरक्षणाच्या वर्तमान वास्तवाचा व त्याआधारे भविष्याचा वेध घेण्याची दक्षता त्यात आहे असे दिसत नाही. 

भीमा-कोरेगावच्या १ जानेवारीच्या शौर्यदिनाचा आणि तुमचा संबंध काय असे बौद्धेतर दलितांना विचारले जाते. महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले, त्याचा अभिमान आजच्या महारांच्या वंशजांनी-म्हणजे बौद्धांनी धरावा. पण लहुजी वस्ताद तर इंग्रजांच्या विरोधात लढले. त्यामुळे मातंग समाजाचा महारांच्या या शौर्याशी संबंध नाही. वास्तविक, मातंग हे खरे राष्ट्रवादी; कारण ते इंग्रजांच्या विरोधात लढले आणि महार देशद्रोही..कारण ते इंग्रजांच्या बाजूने लढले. हा बुद्धिभेद जोरात असतो. भिडेंच्या समर्थनार्थ जे मोर्चे निघाले त्यात मातंग समाजाचे तरुण लक्षणीय होते, असे प्रत्यक्षदर्शींचे निरीक्षण आहे. एकबोटेंनी तर लहुजी नावाने मातंगांचे संघटनच केले आहे. बुलडाण्यात चर्मकार स्त्रीवर अत्याचार झाला. दलित स्त्रीवरील अत्याचार म्हणून आवाज उठवण्यात बौद्ध पुढाकाराने होते. चर्मकार समाजाच्या संघटनाही उतरल्या होत्या. पण एकूण चर्मकार समाज या दलित अत्याचारांच्या प्रश्नावर सरसावून उठतो असे होत नाही. स्वतःची दलित ओळख त्याला तशी नकोशी असते. सवर्णांच्यात सामावण्याचेच त्याचे प्रयत्न असतात. 

बौद्धांच्यातले सध्याचे निर्नायकीपण, नेत्यांची वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांशी लगट, बुद्धिवंत मध्यमर्वगाची आत्मकेंद्रितता, चळवळीतील बहुआयामी भूमिकेचा व ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अभाव, डावपेचात्मक, दूरपल्ल्याचा विचार न करता भावनिक कार्यक्रमांच्या वा तात्कालिक प्रतिक्रियांच्या घेऱ्यात अडकणे ही त्यांची स्वतःची वैशिष्ट्ये आजच्या त्यांच्या या एकाकीपणाला पुरेपूर मदतनीस आहेत. उदाहरणार्थ, शहरात मोठा मोर्चा काढून तो आपला विद्रोह शांत करतो. पण ज्यांच्यासाठी मोर्चा काढला त्या गावातील ३-४ दलित घरांना संरक्षण वा आधार कसा मिळणार हे त्याच्या विषयपत्रिकेवर राहत नाही. 

या पार्श्वभूमीवर वास्तवातील खऱ्या-खोटया घटनांच्या अप्रमाण मापनाने गैरसमजांना उधाण येते. त्यांना ४० टक्क्याला प्रवेश व आम्हाला ७० टक्के असतानाही मिळत नाही. अॅट्रॉसिटी अॅक्टखाली सर्रास खोट्या केसेस घातल्या जातात. कुवत नसताना आरक्षणापायी मोठमोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या अडवून बसतात. असे बरेच काही. असे गैरसमज निर्माण व्हायला सवर्णांतल्या कष्टकरी, गरीब विभागांतल्या तरुण पिढीच्या शिक्षण-रोजगाराच्या रास्त प्रश्नांचा आधार असतो. या प्रश्नांची सोडवणूक व्यवस्थेच्या समग्र परिवर्तनाने होणार या समजाचा अभाव त्यांना दलितविरोधी बनवतो. सवर्ण-दलित दोहोंतल्या पीडितांच्या विकासाची खरी उत्तरे ज्यांच्या मूळावर येणार असतात ते हितसंबंधी हा गैरसमजाचा धुरळा तसाच राहावा अशा प्रयत्नात असतात. 

आर्थिक निकषावर आरक्षण द्या, हा असाच मुद्दा. तो केवळ सवर्णांनाच पटतो असे नाही. तर दलितांतही त्याबद्दल स्पष्टता नसते. सामाजिक विषमतेमुळे ज्या समूहांना इतरांच्या बरोबरीने शिक्षण, नोकरी, राजकारण यात प्रतिनिधीत्व मिळाले नाही व त्यामुळे त्यांचा विकास खोळंबला त्या क्षेत्रांत त्यांचे प्रतिनिधीत्व राखून ठेवणे म्हणजे आरक्षण. आज संविधान लागू झाल्यानंतरच्या ६७ वर्षांत जर सर्व समाजविभागांतल्या विकासाच्या पातळ्या सारख्या असतील तर हे आरक्षण समाजविभाग किंवा जातींचा वर्ग (दलित, आदिवासी) याआधारे देण्याचा प्रश्नच निकाली निघाला असता. परंतु, वास्तव तसे नाही. विकासाच्या वाटपाची उतरंड आजही तीच आहे. डॉ. थोरातांच्याच एका लेखातला हा तक्ता डोळ्यांत अंजन घालतो. (लेखाच्या शीर्षक चित्रातला तक्ता पहावा.)

डॉ. थोरात म्हणतातः '२०१३ च्या आकडेवारीनुसार एकंदर मालमत्तांपकी ६६ टक्के मालमत्ता या उच्चवर्णीयांच्या मालकीच्या आहेत, १८ टक्के मालमत्तांवर ओबीसींची मालकी आहे आणि अनुसूचित जातींकडे चार टक्के, अनुसूचित जमातींकडे दोन टक्के, तर मुस्लीम समाजाकडे पाच टक्के मालमत्तांची मालकी आहे. या सामाजिक प्रवर्गाचे लोकसंख्येतील प्रमाण पाहा आणि त्यांच्याकडील मालमत्ताधारणेचे प्रमाण पाहा. त्यात विषमताच दिसून येईल. मालमत्ताधारणेतील या जातीनिहाय विषमतेच्या मागे, उच्चवर्णीयांनाच झुकते माप देणारी जातिव्यवस्था हे महत्त्वाचे कारण आहे.' 

मालमत्ताधारणेची स्थिती (त्यातील विषमता कितीही कटू असली तरी) जर सर्व समाजविभागांत सारखीच असती तर विशिष्ट जातींना आरक्षण असण्याची गरजच संपली असती. विकासाचे न्याय्य वाटप हा सगळ्यांचा सारखाच मुद्दा बनला असता. आज तो सारखा नाही. विशिष्ट जात-धर्म समूहांना विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणारी व्यवस्था आजही शाबूत असल्याने तिच्या विरोधातला एक उपाय हा समूहनिहाय करावाच लागणार. आणि त्याचवेळी बहुसंख्यांना त्रास देणाऱ्या प्रश्नांना सर्व पीडितांच्या एकजुटीने भिडण्याचा सर्वसाधारण संघर्षही करावा लागेल. हे दोन लढे परस्परांचे विरोधी नाहीत. आजाराच्या प्रमाणानुसार काही रोग्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते तर बाकीच्यांना सर्वसाधारण विभागात, तसे हे आहे. अतिदक्षता विभागातल्यांना सर्वसाधारण विभागात कधी आणणार? याचे उत्तर असते- त्यांच्या आजाराची तीव्रता वा धोका कमी झाल्यावर. आरक्षण किती काळ ठेवणार? याचेही उत्तर ‘त्या विशिष्ट समूहातच मागासपण अधिक असे राहणार नाही व तो प्रश्न सर्व समूहांचा सारखा होईल तेव्हा’ हेच असावे लागेल. 

वास्तविक, आरक्षण हे फक्त सरकारी-निमसरकारी बिगरकंत्राटी नोकऱ्यांना व शासनाने जबाबदारी घेतलेल्या शिक्षणालाच आहे. या सगळ्यात कमालीची घट दिवसेंदिवस होत असल्याने हे आरक्षण प्रतीकात्मक होत चालले आहे. शिवाय संसाधनांच्या एकूण पटावरचा तो एक छोटा ठिपका आहे. अन्य सर्व संसाधने या आरक्षणाच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांवर पारंपरिक जातवर्चस्वच आहे. डॉ. थोरातांचा तक्ता तेच दाखवतो. 

आरक्षणासाठी किंवा अॅट्रॉसिटी अॅक्टसाठी जो आधार धरला जातो तो सामाजिक अन्याय. जो इतरांच्या वाट्याला येत नाही. आजही दलित घोड्यावर बसला म्हणून त्याला मारले जाते. घोड्यावरून दलित वराची वरात काढायला बंदी घातली जाते. प्रशासनही दक्षता म्हणून अशी वरात काढणार असाल तर आधी नोंद द्या असे सांगते. पोलिस भरतीत दलित वर्गाचे उमेदवार ओळखता यावे म्हणून त्यांच्या छातीवर ‘SC’ असा इंग्रजी अक्षरांचा शिक्का मारला जातो. सवर्ण मुलीशी प्रेमसंबंध जुळले म्हणून वा लग्न केले म्हणून त्या मुलाला किंवा दोघांनाही ठार केले जाते. मुलाच्या कुटुंबावर वा त्याच्या वस्तीवर हल्ला केला जातो. 

आरक्षण असलेल्या नोकऱ्यांच्या सर्व थरांत ते पूर्ण लागू आहे असेही दिसत नाही. अब्दुल खालिक या माजी सनदी अधिकाऱ्याने अलिकडेच एका लेखात दिलेली आकडेवारी अशी आहेः केंद्र सरकारच्या नोकऱ्यांत एकूण २३ टक्के दलित-आदिवासी आहेत. तथापि, ही टक्केवारी सर्व थरांत तीच नाही. ८५ सचिवांपैकी फक्त १ सचिव दलित आहे. संचालक वा त्याच्या वरच्या ७४७ अधिकाऱ्यांमध्ये १० टक्क्यांहून कमी दलित-आदिवासी अधिकारी आहेत. सर्वात जास्त संख्या सफाई कर्मचाऱ्यांत आहे. 

ही स्थिती जर आजही असेल तर त्यावरचे उपाय काय? आरक्षण वा अॅट्रॉसिटी अॅक्ट हेच जालिम उपाय नव्हेत हे खरे. पण ते काढून टाकावे वा मर्यादित करावे असे तर अजिबातच म्हणता येणार नाही. 

परिस्थिती अशी जिकीरीची असताना बौद्धांच्या एकाकीपणावर त्यांनी स्वतः तसेच अन्य दलितांनी तसेच समाजातल्या सर्वच परिवर्तनवाद्यांनी इलाज केला पाहिजे. समग्र परिवर्तनाचा लढा पुढे न्यायचा तर त्यातील आघाडीची तुकडी असलेल्या बौद्ध विभागाची अंतर्गत दुरुस्ती करुन तो मजबूत करावाचा लागेल. याचा अर्थ दुरुस्ती फक्त बौद्धांनाच आवश्यक आहे असे नाही. वेगवेगळ्या प्रकारची अंतर्गत दुरुस्ती बौद्धेतर दलित, ओबीसी व एकूण पुरोगामी सर्वांनाच करावी लागेल. अंतर्गत यादवी शमवून समग्र परिवर्तनाच्या लढ्याच्या सिद्धतेसाठी ते गरजेचे आहे. 

लेखाच्या शेवटाकडे येताना वर आलेले काही प्रश्न-मुद्दे त्यांचे महत्व ठसविण्यासाठी पुन्हा अधोरेखित करतोः 

देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या गेल्या ७० वर्षांत प्रगती नक्की झालेली आहे. पण तिचे वाटप हे असे आहे. आदिवासी-दलित वर्गातील काही व्यक्ती पुढे गेल्या. पण समाज म्हणून जुनी उतरंड आर्थिक विकासक्रमात अजूनही तशीच आहे. ही अत्यंत नामुष्कीची बाब आहे. विकासाचे न्याय्य वाटप का झाले नाही? ते कसे करायचे? आर्थिक विषमता अजूनही राहणार असेल तर तिचे सर्व जातींत समान वाटप का नाही? जुनी जातीची उतरंड इथेही कशी काय? ही उतरंड मोडण्यासाठीच आरक्षणाचे धोरण होते. अजूनही ही उतरंड तशीच असेल तर आरक्षणाच्या विरोधकांनी ती मोडण्याचा उपाय सांगायला हवा. आरक्षण हे फक्त शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधीत्व यातच आहे. जमीन, इमारती, बँकेतील जमा, शेअर्स आदि संसाधनांना ते लागू नाही. खाजगीकरण-कंत्राटीकरण-विनाअनुदानीकरण या मार्गांनी आरक्षण निरर्थक होऊ लागले आहे. अशावेळी या संसाधनांमध्ये मागास जातींना न्याय्य वाटा कसा द्यायचा? या संसाधनांचे फेरवाटप करायचे का? कसे? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत घटना मंजूर होण्याच्या आधल्या दिवशी भारतीय जनतेला उद्देशून शेवटचे भाषण करतात. त्यात ते इशारा देतातः 

'२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील. परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.' 

आज ६७ वर्षांनी बाबासाहेबांच्या या द्रष्टेपणाला केवळ अभिवादन करायचे की त्यांच्या या इशाऱ्याला गांभीर्याने घेऊन तातडीने दुरुस्तीला लागायचे? 

...ज्यांमुळे राजा विक्रम निरुत्तर होईल असे हे वेताळाचे प्रश्न नाहीत. सरकार व समाजातल्या जाणत्यांनी यावर बोलायलाच हवे. आंबेडकरवाद, समाजवाद, भांडवलवाद, झिरप सिद्धांत आदि जी काही तुमची भूमिका असेल त्यातून या वेदनादायी विषमतेला व त्यातील सामाजिक उतरंडीच्या ‘जैसे थे’ ला काय उत्तर आहे, हे मांडावेच लागेल. मौन बाळगण्याची चैन आता परवडणार नाही. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जुलै २०१८)

Friday, June 1, 2018

रोखणे म्हणजे जिंकणे नव्हे


कर्नाटकचा निकाल लागताना मी सतलजच्या तीरावर हिमाचलमध्ये होतो. त्या डोंगर-दऱ्यांतही नेटवर्क उत्तम मिळत होते. त्यामुळे मोबाईलवर निकाल कळत होते. त्या रम्य परिसरातही भाजपची घोडदौड बघून कासावीस व्हायला झाले. अस्वस्थता घेरायला लागली. काँग्रेस विजयी व्हावी, किमान जनता दलाचा पाठिंबा घेऊन सत्ता घेता यावी एवढे बहुमत काँग्रेसला मिळावे या अपेक्षेच्या दरडी कोसळू लागल्या. अखेर सायंकाळी भाजप १०४ जागांवर स्थिरावला आणि काँग्रेस व जनता दल (से) मिळून बहुमतात आहेत असे कळल्यावर हायसे वाटले. काँग्रेसचे निवडून आलेले आमदार ७८ व जनता दलाचे ३८. म्हणजे काँग्रेसचे आमदार जनता दलापेक्षा दुपटीने अधिक. तरीही काँग्रेसने जनता दलाने सरकार बनवावे, आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली या शहाणपणाने खूप बरे वाटले. जनता दलाने त्यास प्रतिसाद दिला व त्याचे नेते कुमारस्वामी यांनी त्याप्रमाणे सरकार बनविण्यास आम्हाला आमंत्रित करावे असे राज्यपालांना पत्र दिले. भाजप जरी एक पक्ष म्हणून बहुमतात असला तरी निवडले गेलेले विविध पक्षांचे सदस्य एकत्रितपणे सत्तेवर दावा करत असतील व त्यांचे एकत्रित संख्याबळ भाजपहून अधिक असेल तर त्यांना सरकार बनविण्यास निमंत्रित करणे हे राज्यपालांचे कर्तव्य होते. तरीही मोदी-शहांचे गुलाम असल्यासारखे राज्यपाल वागले. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माझ्या आशा मावळल्या. पुन्हा निराशा दाटून आली. आता काही खरे नाही. साम, दाम, दंड, भेद तसेच कपट, लबाडी वगैरे घटक ज्यांच्या घरी पाणी भरतात ती मोदी-शहा दुकली गोवा, मणिपुरादी राज्यांप्रमाणे विरोधकांतले आमदार फोडून विश्वासमत जिंकणार याबद्दल मला शंका राहिली नव्हती. तथापि, आश्चर्यकारकपणे या दुकलीच्या व राज्यपालांच्या हुमदांडगेपणाला सर्वोच्च न्यायालयाने लगाम लावला. ..पुढे सगळी स्थितीच पालटली. हिमाचलमधून परतताना पुन्हा मनात आनंदाची शिरशिरी उम़टली. आता दोन दिवसांत कुमारस्वामींचा शपथविधी व त्यानंतर विश्वासमताचा सोपस्कार होईल. त्याला फारशी अडचण येईल असे वाटत नाही. अर्थात, आपल्याच आमदारांना हॉटेलवर ठेवून विश्वासमतापर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागणे ही तशी लाजिरवाणीच स्थिती आहे. केव्हाही धोका होऊ शकतो याचेच ते निदर्शक आहे. 

सुटीवर फिरायला, विश्रांतीला गेलो तरी कर्नाटकचे काय होते आहे याची चिंता लागून राहणे, ते सात-आठ दिवसही राजकारण विसरता न येणे, राजकारणातल्या घडामोडींनी वैयक्तिक जीवनातल्या आशा-निराशेची जागा घेणे हे वाईट आहे हे मला कळते. पण हा काळ नेहमीच्या लोकशाही चौकटीत चालणाऱ्या लढायांचा नाही. ही चौकटच उध्वस्त करु पाहणारा फॅसिझमचा अवलांच संविधान व त्यावर निर्भर असलेले माझे वैयक्तिक, सामाजिक जीवन गडप करु पाहत असताना मी देवदारांच्या राईत पूर्ण रममाण कसा होईन? तेथील सौंदर्य उपभोगताना राजकीय मळभाने मन झाकोळलेले राहणारच. 

निकालांचा वेध घेत सतलजच्या काठी मी उभा होतो तिथून जवळच एक बाई झाडाच्या सावलीत बसली होती. आमच्या सोबतची मुले राफ्टिंगला गेली होती. त्यांच्या परतण्याची आम्ही वाट पाहत होतो. त्या बाई आपल्या शाळेतून परतणाऱ्या मुलांची वाट पाहत होत्या. समोरच्या पुलाकडे त्या नजर लावून होत्या. त्यांच्याशी बोलणे छेडले तेव्हा त्या म्हणाल्या-“ पूल हलतो. म्हणून मुलांची काळजी वाटते.“ त्यांचे गाव जवळच होते. घरे नजरेच्या टप्प्यात होती. अधिक चौकशी केल्यावर त्या स्वतःहून म्हणाल्या- “आम्ही हरिजन आहोत.” त्या मोकळेपणाने बोलताहेत हे पाहून माझा धीर चेपला व विचारले, ‘’जात कोणती?”. त्या म्हणाल्या- “लोहार”. (आपल्याकडे महाराष्ट्रात लोहार अन्य मागासवर्गात म्हणजे ओबीसींत मोडतात. हिमाचल प्रदेश तसेच अन्य काही राज्यांत लोहार अनुसूचित जातींत येतात. परीट, कुंभार अशा काही जातींचेही तसेच आहे. आपल्याकडे त्या ओबीसी तर इतर काही राज्यांत त्या दलित मानल्या जातात. या आधारे महाराष्ट्रातही आम्हाला अनुसूचित जातींत घाला अशी त्यांची मागणी उठत असते. असो. असे का ही चर्चा स्वतंत्रपणे केव्हातरी.) पुढे विचारले- “जातिभेदाचे काय?” त्या उत्तरल्या- “हो. चालतो ना! आता फरक पडलाय. कार्यक्रमाला परस्परांकडे जाणेयेणे असते. पण पंगती दोघांच्या वेगळ्या. ती वर दिसताहेत ती घरे ब्राम्हणांची.” त्यांनी वरच्या दिशेने बोट दाखवले. मग नेहमीचा उत्सुकता असणारा प्रश्न विचारला, “आंतरजातीय लग्नं होतात का?” त्या म्हणाल्या- “हो. होतात. पण विरोध खूप होतो. सरकार अशा लग्नांना पैसे देते.” यानंतर मग भाजप, मोदींकडे आलो. “भाजप जातिवादी आहे ना?” या अपेक्षित उत्तरासाठीच्या माझ्या प्रश्नरचनेवर त्या बाईंनी ‘हो’ म्हटले. पण त्या ‘हो’त खूप जोर नव्हता. वरताण म्हणजे तिने स्वतःहून मोदींची प्रशंसा सुरु केली. मोदींमुळे मुलांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे पैसे येऊ लागले, सुविधा मिळू लागल्या वगैरे. पुढे त्या म्हणाल्या- “फिर भी मोदी अच्छे नहीं है ऐसे लोग कहते हैं.” 

मोदींच्या सत्ताग्रहणानंतर, विशेषतः भाजपशासित राज्यांत कट्टर हिंदुत्ववाद्यांचे जे थैमान सुरु झाले त्याचा फटका मुस्लिमांना सर्वाधिक व त्याखालोखाल दलितांना बसतो आहे. याच्या परिणामी मुस्लिमांतून त्यांना राजकीय विरोध होतो आहे हे उघड दिसते. पण दलितांतून सरसकट असा विरोध होतो आहे हे स्पष्ट दिसत नाही. अनेक ठिकाणी भाजपला दलितांतून पाठिंबा मिळताना दिसतो. कर्नाटकात गेल्यावेळी म्हणजे २०१३ च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला दलित मतदारसंघांतून ४९ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या फक्त ३४ आहेत. म्हणजे त्यांनी १५ जागा गमावल्या. तर भाजपने ३१ दलित मतदारसंघांत विजय मिळवला. काँग्रेसपेक्षा त्या कमी असल्या तरी गेल्यावेळी त्यांच्याकडे या मतदार संघातल्या फक्त ९ जागा होत्या. म्हणजे २२ जागांची अधिकची कमाई त्यांनी यावेळी केली आहे. 

लिंगायतांच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीला काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मान्यता दिली. ज्यांच्या पुरोगामी विचारांमुळे सनातनी संतापले आणि त्यांनी कलबुर्गी व गौरी लंकेश यांचा खून केला हे दोघेही लिंगायत. या खुनांच्या विरोधात देशभरचे पुरोगामी बुद्धिजीवी, कलावंत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बंगलोरमध्ये तर प्रचंड मोठा मोर्चा झाला. विशिष्ट पक्षाच्या बाजूच्या नसलेल्या या कलावंत-लेखक मंडळींनी आपल्या विवेकाला सक्रिय कृतीत आणून यावेळी भाजपच्या विरोधात आपापल्या माध्यमांतून आघाडी उघडली. पण या सगळ्याचा परिणाम नक्की काय व किती झाला? भाजपला मिळालेल्या जागांचे यश हा परिणाम दर्शवत नाही. उलटच दिसते. त्यांच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत तिपटीच्या जवळपास गेल्या आहेत. गेल्या वेळी त्या ४० होत्या. यावेळी १०४ आहेत. लिंगायत आमदारांपैकी ६५ टक्के आमदार भाजपकडे आहेत, तर काँग्रेस व जनता दल (से) यांचे मिळून लिंगायत आमदार ३५ टक्के आहेत. लिंगायतांना स्वतंत्र धर्म बहाल केल्याचा तसेच कलबुर्गी, लंकेश या लिंगायत पुरोगाम्यांच्या खूनाच्या रोषाचा परिणाम इथे कुठेच दिसत नाही. 

याचा अर्थ कसा लावायचा? …मतदारांना स्वाभिमान नाही? लोक लाचार झालेत? ते दहशतीखाली आलेत? आम्ही पुरोगाम्यांनी मोदींचे एवढे पोलखोल केले. कर्नाटकातील प्रचारादरम्यान नेहरु-थिमय्या, नेहरु-भगतसिंग याबाबत मोदींनी खोटे बोलण्याचा कहरच केला होता. त्यांचा हा खोटारडेपणा रवीश कुमार, विनोद दुआ आदि नामांकित विवेकी पत्रकारांनी जनतेसमोर पुराव्यानिशी उघड केला. मग मतदार जनतेने तो गंभीरपणे का घेतला नाही? जनताही मोदींसारखी सोयीने खोटे स्वीकारणारी निघाली का? 

शहाणी किंवा लबाड असे निष्कर्ष व्यक्तीबाबत काढणे समजू शकते. पण जनता नावाच्या व्यक्तींच्या समूहाला अशी द्विध्रुवीय विशेषणे लावणे कठीण आहे. निवडणुकीतील निकाल हे अनेक हितसंबंधांचा सरमिसळ परिणाम असतो. वरुन शांत दिसणाऱ्या अथवा ठरावीक दिशेने लाटा प्रवास करत असलेल्या समुद्रात खोलीच्या विविध टप्प्यांवर अनेक प्रवाह असतात. त्यांची दिशा एक नसते. हे प्रवाह वा त्यांची दिशा वरुन दिसत नसते. अगदी किनाऱ्यापासून थोड्या दूरवर पाण्यात गेलेल्यांनाही हे प्रवाह खेचून घेतात हे आपल्याला ठाऊक आहे. हे प्रवाह माणसाच्या मनासारखे स्वयंगतीचे नसतात. त्यांची नैसर्गिक गती शोधता येऊ शकते. निवडणुकीच्या राजकारणात माणसे कशी वागतात. त्यांच्या मनाची सामूहिक प्रतिबिंबे निकालात कशी उमटतात हा शोध संपूर्णतः गणिताने घेणे कठीण आहे. अधिकाधिक बारकाईने तपशील जमविणे व त्यांचा अन्वय लावणे ही कला, प्रतिभाही आहे. अर्थात, कोणी कितीही प्रतिभावान असला तरी निवडणुकीच्या निकालाबाबत सर्व कळल्याचा दावा तो करुच शकत नाही. जास्तीत जास्त कळल्याचे विधान तो फारतर करु शकेल. आपण पुरोगाम्यांनी अशी वस्तुनिष्ठतेने बारकावे तपासण्याची वृत्ती जोपासणे खूप गरजेचे आहे. त्यातून शंभर टक्के कळणार नाही. मात्र जास्तीत जास्त कळण्याची वा अंदाज येण्याची शक्यता नक्की वाढू शकते. अशा तपासाची काही क्षेत्रे नोंदवावीशी वाटतात ती अशीः 

मोदी खोटे बोलतात. रेटून खोटे बोलतात. पण ते खोटे आहे हे सर्वसामान्यांना कुठे ठाऊक असते! ज्यांच्याबद्दल ते खोटे बोलत असतात ते नेहरु, थिमय्या, भगतसिंग यांच्याबद्दल आजच्या काळात माहीतगार असणारे जनतेत तसे अगदी अल्प. ते कोणी उघड केले तरी त्याबद्दल गांभीर्याने दक्ष असणारेही कमी. खरे म्हणजे राजकारणात काही गंभीरपणे बोलायचे असते, जनतेचे शिक्षण करायचे असते हा पुरोगामी राजकारण्यांबाबतही जनतेला अनुभव नाही. मोदींच्या-संघाच्या फॅसिस्ट राजकारणाविषयी जनतेला तिला समजेल अशा भाषेत, शांतपणे समजावून सांगण्याची पद्धत अत्यल्प अपवाद वगळता पुरोगाम्यांत दिसत नाही. त्यांची मोदींवरची घणाघाती टीका जनतेतल्या अनेकांना कंठाळी वाटू शकते. फॅसिझम म्हणजे काय हे उलगडून सांगितल्याशिवाय केवळ फॅसिस्ट शब्दाचे वारंवार उच्चारण करणे फक्त शिवीसारखे वाटू शकते. भौतिक प्रश्नावर लढणारे पुरोगामी जनतेला त्या प्रश्नांसाठी जवळचे वाटतात. पण या प्रश्नांचा व व्यापक राजकारणाचा संबंध जोडून त्याची समग्रता लक्षात आणून देणारेही अपवादात्मकच आहेत. बाकी सर्व भौतिक प्रश्नांवर मोर्चाला आलेले लोक आपल्या राजकीय विचारांना मानणारच असे सोयीने गृहीत धरतात. लोकही त्यांच्या सरकारविरोधी वा मोदीविरोधी घोषणांना जोरदार प्रतिसाद देतात. ती सहज सवयीची कृती वा नेत्याच्या प्रति कृतज्ञता असते. ते त्यांना प़टलेलेच असते असे नाही. पुरोगामी मंडळी कार्यकर्त्यांची शिबिरे क्वचित घेतात. तीही विशिष्ट विषय घेऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या पद्धतीची नसतात. सुट्या विषयांवर सुटे सुटे ‘रिसोर्स पर्सन’ बोलावून बरेचदा हे शिबीर साजरे केले जाते. दैनंदिन आंदोलनातून राजकीय विचारांचा पेळू वळायचा व त्यातून सूत कातायचे हे घडत नाही. साहजिकच जनतेत जाऊन त्यांचे शिक्षण करणारे जाणते कार्यकर्ते तयार होत नाहीत. याच्या उलट विरोधी विचारांकडे-विशेषतः संघपरिवाराकडे अशा कार्यकर्त्यांची फौजच्या फौज आहे. 

मोदींना स्वतःचा स्वार्थ नाही. बायको-पोरे नाहीत. ते कोणासाठी भ्रष्टाचार करणार? ..हे अनेकांच्या मनात खोलवर असते. वास्तविक सत्तेची आकांक्षा हीही एक प्रेरणा असते. ही प्रेरणा असलेले रुढ भाषेत बिनभ्रष्टाचारी, त्यागी असेही असू शकतात. ही जाणीव सर्वसामान्य जनतेला नसते. शिवाय मोदींच्या जनतेशी संवादी बोलण्याचा प्रभाव हाही घटक असतो. अर्थात तो निर्णायक नाही. नाहीतर उत्तम वक्तृत्ववाले सर्वच नेते झाले असते. तसे होत नाही. काँग्रेसने आतापर्यंत काय केले हा खरा-खोटा प्रचार जनतेत जोरदार मुरलेला आहे. भोवताली दिसणारे स्वार्थी, सत्तेचे भाट काँग्रेसवाले इतक्या संख्येने दिसतात की त्यापुढे सोनिया, राहुल गांधी, मनमोहनसिंग फिके पडतात. काँग्रेसच्या धोरणाचा सर्वाधिक लाभार्थी मध्यमवर्ग आपल्या आत्मकेंद्रित स्वार्थापायी व सांस्कृतिक वर्चस्वाच्या दांभिकतेत लपेटल्याने काँग्रेसचा कडवा टीकाकार असतो. काँग्रेसचे मुस्लिम धार्जिणेपण, दलित-आदिवासींबद्दलचे जवळिकीचे धोरण त्याच्या अंगावर पाल पडल्यासारखे येत असते. त्याचा उच्चवर्णीय हिंदुत्वाचा आत्मिक कंड व त्यात गुंडाळलेल्या संकुचित राष्ट्रवादाची खाज भाजप व खास करुन मोदी शमवतील याची त्याला खात्री असते. 

भाजप-मोदींकडे संघटना आहे व ती जिंकण्याच्या इर्ष्येने लढते आहे. भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची संघटना अगदीच विसविशीत आहे. पुरोगाम्यांचे तर राजकीय संघटनात्मक अस्तित्व नगण्य म्हणावे असे आहे. अशावेळी मोदींच्या नोटबंदीचा, जीएसटीचा, महागाईचा कितीही त्रास झाला तरी पर्याय म्हणून कोणाला निवडायचे हा प्रश्न अनेक सामान्यांचा असतो. काँग्रेसला आजवर संधी दिली. अजून काही काळ मोदींना दिली तर काय बिघडते असे त्यांना वाटत असते. ज्या दलितांना भाजपच्या जातीय राजकारणाचा त्रास होतो, तो आता वाढला आहे हे खरे. पण पूर्वीही तो होताच. इथे या त्रासाला कारण आधीच्या व्यक्ती होत्या तर इथे भाजपचे अधिकृत धोरण आहे, हे त्यांना लक्षात येत नाही. दलितांतल्या जातींची फोडाफोडी, त्यातल्या मध्यवर्गीयांना सत्तालाभाच्या जाळ्यात ओढण्याचे कसब यात भाजप-संघ सराईत आहे. शिवाय हे त्यांचे कार्य सत्तेवर येण्याच्या कैक वर्षे आधीपासून आहे. अत्याचारांच्या घटना इतर ताणांसहित एकत्र होतात त्यावेळी दलितांमधून उद्रेक घडतात. पण ते ओसरले की पुन्हा पहिले पाढे पंचावन. त्यांचा आक्रोश समग्र परिवर्तनासाठी व्यवस्थेला धडका देण्यास कामी येत नाही. मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या भोवतालच्या दलित कुटुंबियांना काय मिळाले यावरच या दलित मतदाराचा निर्णय ठरतो. हिमाचलमधल्या बाईला तुम्ही मतदान कोणाला करता असे विचारल्यावर ती म्हणाली- “आम्ही एकत्र गाव म्हणून ठरवतो. शेवटी आपल्याला कोण मदत करणार आहे त्यावर आमचे मतदान ठरते.” ..यात सबंध दलित हितसंबंध कोठे येतो? दलितांच्या जाणतेपणालाही खूप मर्यादा आज आहेत. भीमा-कोरेगावच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र बंद मध्ये आघाडीवर असणारा आमच्या एका बौद्ध मित्राचा मुलगा हनुमान जयंतीच्या बजरंग दलाच्या पोस्टरवरही दिमाखात आपली प्रतिमा मिरवताना दिसला. त्याच्या समजाचे घनफळ-क्षेत्रफळ कसे मोजायचे? 

मुस्लिम, दलित यांच्यावरच्या अन्यायाचे लागते असणारा बंधुतेचा समाज आज नाही. त्याला त्यांच्यापासून अलिप्त केले गेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या प्रगतीच्या मार्गातल्या या धोंडी आहेत, ती घाण आहे इतपत मानसिकता तयार झाली आहे. गांधी-आंबेडकरांच्या काळात दलितांवरील अन्याय हा सवर्ण हिंदुंत काही प्रमाणात अपराधभाव जागवत होता. आज त्यांच्याविषयी घृणा तयार झालेली आहे. त्यामुळे मुस्लिम-दलितांवर अन्याय करणारा भाजप हा मुद्दा सर्वसामान्य सवर्ण हिंदूंना पटत नाही. आणि तेच बहुसंख्य आहेत. भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्व असे असणे का गैर आहे हे त्याला कळत नाही. आदिवासी हिंदू नाही हे आम्ही पुरोगामी जोरात मांडतो. पण खुद्द आदिवासींत आम्हाला हिंदू म्हणा अशी एक प्रतिष्ठावर्धक अनुकरणीय अपेक्षा दिसते. वेगवेगळ्या कारणांनी भाजपला मते न देणाऱ्यांनाही भाजपचे हे म्हणणे पटत असते. त्यांच्या या मताचा निरास करणारी परिणामकारक प्रचारयंत्रणा पुरोगामी, लोकशाहीवादी यांच्याकडे आज नाही. हे करायला हवे याची आचही नाही. 

व्हॉट्सअप-फेसबुकवर पुरोगामी-प्रतिगामी झुंजी जोरात लागतात. त्यात पुरोगाम्यांचे कंड शमतात. मोदींना-संघाला आम्ही कसे धुतले याचे कृतक समाधान मिळते. यापलीकडचा जो समाज असतो, ज्यातून मतदान अधिक होत असते, त्याच्याशी आमचा फारसा संपर्क वा संवाद नसतो. त्यामुळे आमचे फेसबुकवरचे शहाणपण या सामान्य मतदारापर्यंत वाहत नाही. सर्वसामान्यांना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ही नावेही ठाऊक नसतात. असली तरी त्यांच्या हत्येचे गांभीर्य बरेच विस्मरणात गेलेले असते. त्यांच्याविषयीचे कार्यक्रम खूप मर्यादित विभागांत होतात. दलितांतल्या नव्या पिढीत आता नामदेव ढसाळ, राजा ढाले या पँथरकाळातल्या तळपत्या ताऱ्यांची नावे माहीत नसलेले बरेच आढळतात. समाजमाध्यमांचा वापर याचा एक नक्की अवकाश आहे. तथापि, प्रत्यक्षातल्या लोकांना भिडणे याला आजही पर्याय नाही. तेव्हा पुरोगामी विद्वतजगतातल्या मंडळींनी आपल्या क्षेत्राबाहेरच्या या सामान्यांशी बोलण्याचा खास प्रयत्न करायला हवा. 

सर्वसामान्यांतले बहुसंख्य लोक विवेकवादी नसतात. वैज्ञानिक तार्किक दृष्टिकोन त्यांच्याकडे नसतो. अनुभवाच्या एका चौकटीत त्यांच्या मर्यादित जाणतेपणाने मुख्यतः भावनिक प्रतिसाद ते देत असतात. यातून एक सुज्ञताही प्रकट होत असते. तथापि, भावनांना आवाहन करणाऱ्यांच्या जाळ्यात ते सहज अडकतात. यांत ते प्रसंगी क्रूरही होतात. गोध्रा व त्यानंतरच्या कितीतरी जातीय संहारात आपण ते पाहिले आहे. समाज शांत असताना त्याला मानवतेचे भावनिक आवाहनही पटते. संतांची करुणा त्याला भावते. राष्ट्रवादाचा वास्तविक अर्थ त्याला उमगत नाही. पण वैविध्यपूर्ण सहअस्तित्वाची भूमिका त्याला उदात्त, उन्नत वाटू शकते. मुद्दा आहे, हे सकारात्मक भावनेचे आवाहन त्याला दमदारपणे, सातत्याने, त्याच्यात घुसून, वावरुन आपण करणार आहोत का? 

...तपासाची अशी अनेक क्षेत्रे असू शकतात. त्या सर्वांचा विचार व्हावा, ही पुरोगामी सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. भाजप-संघाच्या राजकारणाचा संदर्भ २०१९ च्या जय-पराजयापुरता मर्यादित नाही. तो त्यानंतरही राहणार आहे. २०१९ ला भाजपला सत्तेतून पायउतार होण्यास समजा आपण भाग पाडले तर त्याचा अर्थ या मंडळींना सत्तेपासून रोखले एवढाच असेल. त्यांच्या प्रतिगामी विचारांशी असलेली लढाई जिंकली असा त्याचा अर्थ नसेल. तसा तो समजणे ही आत्मवंचनाच नव्हे तर आत्मघात ठरेल. पुरोगामी विचारांच्या मशागतीनेच प्रतिगामी विचारांची विषवल्ली वठणार आहे. ही मशागत लांब पल्ल्याची आहे. आपली तयारी व उमेद तशीच लांब पल्ल्याची असावी लागणार आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जून २०१८)

Tuesday, May 22, 2018

विचारांनी जीवन लखलखीत झाले


जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या काही बाबी पहिल्यांदा पाहिल्या असतील त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचा समावेश ठळक असेल. कारण घरातल्या अन्य वस्तूंत त्याच दर्शनी, रंगीत व उठून दिसणाऱ्या होत्या. हे दोघेही महान होते. पण मानव होते. देव नव्हते. त्यांचा काहीएक विचार होता. कार्य होते. त्यामुळे आमचे म्हणजे माझ्या आई-वडिलांचे व त्यांच्या पिढीतील दलित समुदायाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलले होते. एक अस्मिता, नवचैतन्य जगण्यात आले होते. पण विचार न कळत्या वयात या दोहोंच्या प्रतिमा अन्य मित्रांच्या घरातील देवांप्रमाणेच मला होत्या. त्यात आई-वडिल या दोहोंच्या प्रतिमांना नियमित हार घालायचे, अगरबत्ती, मेणबत्ती लावायचे व त्रिसरण-पंचशील घ्यायचे. मला हात जोडायला व नमस्कार करायला सांगायचे. माझ्या मुलांना सांभाळ अशी करुणा आई भाकायची. त्यामुळे देवांच्या पलीकडे विचारांचा काही भाग या प्रतिमांत आहे, याचा उमज पडणे कठीण होते. आम्ही बौद्ध झालो तरी माझ्या आईच्या अंगात ‘साती आसरा’ यायच्या. मांड भरला जायचा. त्यावेळी साती आसरांची (मोठ्या बायांची) भजने होत. मी त्यात तल्लीन होई. टाळ वाजवी. भजने म्हणत असे. पुढे सप्ताहात कीर्तने ऐकायला आवर्जून जाई. आंबेडकर-बुद्ध जयंती व कीर्तने दोन्ही मला आवडे. 

अक्षरओळख व पॅँथरची वावटळ समांतर सुरु झाली. आमची वस्ती गदगदू लागली. धुमसू लागली. सभा-भाषणांतून नवे विचार कानावर पडू लागले. पत्रे-पत्रके-नियत-अनियतकालिके हातात पडू लागली. गल्ली-चौकांत सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी चर्चा झडू लागल्या. चर्चा करणाऱ्यांच्या घोळक्यात उभे राहून मोठ्या माणसांचे बोलणे ऐकणे हे वेगळेच वाटत होते. चौथीला बाबासाहेब-बुद्धाबद्दल थोडे थोडे वाचायला मिळू लागले व अधिक अधिक समजू लागले. सहावीला वीज चमकावी तसा या वाचनातून निरीश्वरवादाचा साक्षात्कार झाला. हे जग कोणी निर्माण केलेले नसून ते विकसित झालेले आहे. जगात ईश्वर नावाची कोणतीही शक्ती नसून तिच्यावर विसंबणे म्हणजे परावलंबी होणे. अनुभवाला येणाऱ्या व विज्ञानाने सिद्ध होणाऱ्याच बाबींवर विश्वास ठेवायचा. ईश्वर व त्यावर आधारित धर्माने आपला विकास रोखला. आपल्या कैक पिढ्यांवर अस्पृश्यतेचे जिणे लादले. देव-कर्मकांड-उच्चनीचतेचे हिंदूधर्माचे हे जोखड झुगारुन बाबासाहेबांनी नीती व वैज्ञानिकतेवर आधारित बौद्ध धर्म आपल्याला दिला. ज्यात करुणा, मैत्री असे बरेच काही महान आहे. आणि हे महानपण प्रदान करणारा बुद्ध स्वतः माणूस आहे. ...अहाहा! किती भाग्यवान आहोत आपण! इतरांकडे नसलेले असे काही मौलिक वैभव आपल्याला सापडले याची ती प्रचिती रोम न रोम थरारवणारी होती. 

या रोमांचित अवस्थेत त्या शालेय जीवनातच सामाजिक हालचाली सुरु झाल्या. अंगात येण्यावरुन, मोठ्या बायांच्या भजनावरुन मुंबईत घरात व गावी गेल्यावर गावात भांडणे सुरु झाली. या भूमिकेने तप्त झालेल्या समविचारी मुलांचे आमचे गट तयार झाले. त्यांनी गावी तसेच मुंबईतील वस्तीत नवे जागरण सुरु केले. फुले, शाहू आदि पुरोगामी विचारांचा मागोवा सुरु झाला. दलितांवरील अत्याचाराचा विरोध म्हणून स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार, शाळेत गेलोच तर राष्ट्रगीत न म्हणणे, काळ्या फिती लावणे हे भूषणावह वाटू लागले. बुद्धाला आपले केस कापून आलेल्या पैश्यातून खिर देणाऱ्या सुकेशिनीच्या डोक्यावरुन बुद्ध हात फिरवतो व तिच्या पाठीवरुन पुन्हा तिचे सुंदर लांबसडक केस सळसळू लागतात, या आमच्या पुस्तकातील धड्यावरुन मी शाळेत गदारोळ केला. हिंदू देवता चमत्कार करतात. आमचा बुद्ध चमत्कार करत नाही. तेव्हा त्याची यातून बदनामी होते व बौद्ध मुलांवर आपलाही बुद्ध चमत्कार करणारा एकप्रकारे देव आहे, असा संस्कार होतो. हे थांबले पाहिजे. ..वगैरे. 

पॅंथरच्या या भराच्या काळात व्हॉल्टेअरची जयंती, पॅंथर हे नाव ज्यावरुन घेतले ती ब्लॅक पॅँथर ही आंतरराष्ट्रीय परिमाणेही मिळाली. पण ज्या वेगाने पॅंथर भरात आली त्याच वेगात तिचे पतनही सुरु झाले. या ढासळण्याचा व आमची मॉडेल्स असलेल्या नेत्यांच्या नैतिक व राजकीय घसरगुंडीचा आमच्यावर विपरित परिणाम होऊ लागला. आमच्या आस्थांवर आघात झाले. त्यातूनच नव्या विचारांचा शोध सुरु झाला. कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, उच्चवर्णीय (मुख्यतः ब्राम्हण) यांच्याविषयी तिटकारा व संशय वातावरणात भरगच्च होता. तरीही नेते वा आपल्यातले अन्य कार्यकर्ते सांगतात म्हणून या मंडळींपासून दूर न राहता त्यांना भेटून, त्यांचे साहित्य वाचून स्वतः पारखले पाहिजे असे वाटू लागले. तसे प्रयत्न सुरु झाले. 

या क्रमात भाऊ फाटकांची भेट झाली. मी ८ वी ते १० वी जिथे शिकलो त्या चेंबूर हायस्कूलचे ते माजी शिक्षक. मी तिथे जाण्याआधीच ते निवृत्त झालेले. पण त्यांचा उल्लेख व एखादी आठवण कानावर होती. त्यांच्याविषयी वाचलेही होते. त्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता होतीच. मी ज्या मुक्तानंद हायस्कूलमध्ये पुढे शिक्षक झालो, तेथील आमच्या पर्यवेक्षिका रजनी लिमये या भाऊंच्या कन्या. त्यांच्यामार्फत भाऊंची भेट झाली. भाऊ कम्युनिस्ट. त्यामुळे उत्सुकता असली, नवे समजून घेण्याची आस असली तरी संशय होताच. प्रत्यक्ष भेट काही समजुतींना तडा देणारी ठरली. आम्हा आंबेडकरी संस्कारातील मंडळींना सर्वसाधारणपणे उच्चवर्णीय पुरोगाम्यांकडून चुचकारणे, जादाचा आदर व आधारही देणे होते. तसे इथे काहीही नव्हते. (या भेटीचे सविस्तर वर्णन उद्बोधक असले तरी आता विस्तारभयास्तव ते टाळतो.) भाऊंच्या या पहिल्याच भेटीत आपल्या विचारांतल्या रोमँटिकतेचे वस्त्रहरण होते आहे व वस्तुनिष्ठता दृश्यमान होत आहे हे जाणवले. अर्थात पहिल्या भेटीतच संशय फिटला असे काही झाले नाही. तो संपायला वेळ गेला. भाऊंच्या अभ्यासमंडळातून व कामातील सान्निध्यातून बुद्ध, आंबेडकर, गांधी, मार्क्स यांचे ऐतिहासिक योगदान व मतभेदांचे संदर्भ तसेच आजच्या काळातील त्यांची परस्पर पूरकता (समन्वय नव्हे) अधिक उलगडायला मदत झाली. भाऊंमुळेच स्त्री मुक्ती संघटनेची व पुढे लाल निशाण पक्षाची गाठ पडली. आमच्या वस्तीत संघटनेचे काम सुरु झाले. आक्षेप, आरोप, संशय यांचे प्रहार प्रस्थापित विचारांच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांकडून झाले. जवळच्या मित्रांकडूनही काही काळ असहकार व त्यामुळे एकाकीपण वाट्याला आले. ज्यांच्यात काम होते त्या सामान्य लोकांतून हा अनुभव नव्हता. उलट साथ होती. त्यामुळे सावरायला मदत झाली. 

‘आपल्या वस्तीत येणाऱ्या स्त्री मुक्ती संघटनेच्या या उच्चवर्णीय मुलींपैकी तुझ्याशी लग्न करुन राहणार आहे का या झोपडपट्टीत कोणी?’ या प्रश्नाला ‘त्या माझ्या सहकारी आहेत. त्या त्यांचा स्तर सोडून आपल्या वस्तीत येत आहेत, याचे आपण स्वागत करायला हवे. लग्न करण्यातूनच त्यांची निष्ठा जोखणे बरोबर नाही.’ असे उत्तर मी देत असे. पुढे यातल्याच एका मुलीबरोबर माझे आंतरजातीय लग्न झाले. ती झोपटपट्टीतच राहिली. तो प्रश्नही संपला. माझ्या डाव्या-पुरोगाम्यांशी असलेल्या सहकार्यातून आमच्या घरात व नातेवाईकांत एक नाराजी होती. तथापि, या आंतरजातीय लग्नाबाबत ‘आपल्यातलीच केली असतीस तर बरं झालं असतं’ एवढेच घरच्यांकडून बोलले गेले. बाकी सगळे उत्तम झाले. पत्नीने तिच्या वागण्यातून त्यांना, नातेवाईकांना, शेजारपाजारच्यांना व गावातल्यांनाही अक्षरशः जिंकून घेतले. आणि त्यामुळे या सगळ्यांशी असलेल्या माझ्या संबंधातही अधिक जवळीक तयार झाली. 

तीव्रता तयार झाली ती मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता होणार त्यावेळी. मी एम. ए. फर्स्ट क्लास झालो. प्राध्यापक म्हणून नोकरी करुन स्थिर व बरे आयुष्य वाट्याला यायच्या काळात ही अवदसा का आठवली ही वंचनेतच आयुष्य काढलेल्या आई-वडिलांची तडफड होती. नातेवाईक, मित्र, समाजातले कार्यकर्ते यांनाही आपल्यातला एक होतकरू युवक या डाव्यांनी गटवला याची चीड आली होती. पत्नी नोकरी करणार होती, घरच्या जबाबदाऱ्या सोडणार नव्हतो हे आश्वासन त्यांना तसे पचत नव्हते. मी नोकरी सोडली. पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. पत्नी तिचे शिक्षण पूर्ण करुन दोन वर्षांनी नोकरीला लागली. हा काळ कठीण गेला. पण चळवळीतील सहकाऱ्यांच्या आधाराने तो निभला. 

डाव्या-पुरोगामी वर्तुळात वावर, कष्टकऱ्यांच्या तसेच स्त्री-पुरुष समतेच्या सांस्कृतिक चळवळींत सहभाग, अलीकडे संविधानातल्या मूल्यांच्या प्रसाराला प्राधान्य, त्याचवेळी ज्या आंबेडकरी विभागातून आलो त्याच्याशी मुंबईपासून गावच्या भावकीपर्यंत जैव नाते, यासंबंधातल्या विषयांवर लेखन व बोलणे असे काही माझ्याबाबत सांगता येते. जे आजही चालू आहे. अलीकडे विचारांचा मागोवा अधिक घेत असतो. पण तोही व्यवहाराशी नाते जोडत. त्यामुळे ते कळायला मदत होते व उपयोगीही ठरते. 

एकूण पुरोगामी-आंबेडकरी चळवळीतले अंतराय संपले नसले तरी देशातील लोकशाही विरोधी, अराजकी, कट्टरपंथी शक्तींच्या चढाईच्या माहोलामुळे डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी, गांधीवादी विचारांच्या दावेदारांमध्ये संवाद वाढू लागला आहे. त्यात अधिक सौहार्द येणे व एकजुटीच्या व्यवहाराला गती मिळणे यासाठी शक्य ते प्रयत्न हे सध्याचे माझे व्यवधान आहे. 

मला जे अनुभवाला आले त्यापासून चळवळीतली पुढची पिढी पूर्ण अनभिज्ञ नाही. तिलाही हे ताणतणाव जाणवतात. तीही जुन्याची वाहक आहे. पण दिशाहिनता व व्हॉट्सअपी-फेसबुकी कृतिहिन बेजबाबदारपणा वाढला आहे. 

घरच्या म्हणजे आमच्या मुलांच्या पिढीबद्दल बोलायचे तर मध्यवर्गीय घरात वाढलेली व भोवताली दमदार पुरोगामी चळवळ नसलेल्या काळात वाढलेली ही मुले आमच्यापासून बरीचशी अलिप्त आहेत. त्यांची जगण्याची व्याख्या व उद्दिष्ट आमच्याशी मेळ खात नाही. याला अपवाद असू शकतात. पण सर्वसाधारणपणे असे दिसते. व्यक्तिशः माझ्या घरचे काय? माझा मुलगा झोपडपट्टीत केवळ जन्माला आला. सहा महिन्यांतच आम्ही आधी भाड्याने व नंतर स्वतःच्या सेल्फ कंटेन्ट घरात मिश्र वसाहतीत स्थलांतरित झालो. माझ्या वाट्याला आलेला जवळपास सगळाच बौद्ध सभोवताल, सतत ‘जयभीम’चा उच्चार, जवळ बुद्धविहार, आंबेडकर-बुद्ध जयंतीचा, ६ डिसेंबरचा माहोल माझ्या मुलाला मिळाला नाही. त्यापासून तो पूर्ण अलिप्त वातावरणात वाढला. त्याची शाळाही या वातावरणाचा मागमूस नसलेली. घरातील बाबासाहेब-बुद्धाच्या प्रतिमा, आमचे सार्वजनिक जीवनातले वावरणे, तशा प्रकारचे लोक घरी येणे यामुळे आमच्या विचारांचे जे काही शिंतोडे त्याच्यावर उडाले असतील त्यामुळे तो बाय डिफॉल्ट निरीश्वरवादी-सांप्रदायिकताविरोधी आहे एवढेच. बाकी आमच्या कामा-भूमिकांबाबत त्याला काही औत्सुक्य आहे असे दिसत नाही. असो. 

कोवळ्या वयात एका टप्प्यावर जी विचारांची वीज चमकली तिने जगण्याची वाट उजागर केली. पुढे कृतीतून अधिकाधिक परिपोषित होत गेलेल्या विचारांच्या लकाकण्याने अख्खे जीवन लखलखीत झाले. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(ललकारी, मार्च २०१८)

Thursday, May 10, 2018

ही वृत्ती सार्वत्रिक कधी होईल?

माझ्या एका लेखाला (विवेकाची नाव स्थिर ठेवू) आलेला प्रतिसाद व त्याला मी दिलेले उत्तर स्वतंत्र पोस्ट म्हणून टाकण्याचा हा मोह मी टाळू शकत नाही.
_________

सुधीर कारंडेः

सुरेश जी, नमस्कार, उत्कृष्ट मांडणी आणि समतोल असे लेखन वाटले, मी मूळ संघ विचारांचा असल्यामुळे काही मतांतरे आणि प्रश्न आहेत ते तुम्हाला खाजगीत पाठवतोय, पण इथे तुमच्या लेखन शैलीचा आणि अभ्यासाचा चाहता झालोय, परत तुमचं लेखन वाचायला मिळावे ही इच्छा.

माझे उत्तरः

प्रिय सुधीरजी,

सविनय स्नेह.

मतभेद राखून संवाद ठेवता येतो, अगदी विरोधकाच्या शैलीची प्रशंसा करता येते याचा दाखला असलेले आपले व्यक्तिमत्व हल्ली विरळा आहे. आपल्या या वृत्तीला अभिवादन. कितीही विरोधी मते असली तरी परस्परांविषयी आदर ठेवून ती व्यक्त करणे, विरोधकाला त्याचे मत मांडण्याचा पूर्ण अवसर देणे, कोणत्याही प्रकारे मानसिक वा शारीरिक हिंसेवर न उतरणे, दोन्ही मतांचा स्वीकार-अस्वीकार अखेर जनतेच्या स्वाधीन करणे ही लोकशाही यशस्वी होण्याची पूर्वअट आहे. आपल्याकडे ती बहुधा धाब्यावर बसवली जाते. विरोधी छावणीचे सोडा, आपल्या छावणीतल्याशी होणारा जरासा मतभेदही शत्रुत्व निर्माण करतो असे सार्वत्रिक चित्र दिसते. अशावेळी आपण ज्या उमदेपणाने संघाचे आहात हे मोकळेपणाने सांगून माझ्या शैलीची प्रशंसा करता व संवाद करु इच्छिता हे मला फार विशेष वाटते. खरं म्हणजे सगळेच असे वागले तर विखार किती कमी होईल ! मी संयतपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ज्याला आम्ही संघपरिवार म्हणतो त्यातील मंडळींची भाषा ऐकल्यावर माझ्याही भाषेत कधी कधी कडवटपणा येतो हे मला कबूल करावे लागेल. तो तसा येऊ न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे हे तुमच्यासारख्यांच्या प्रतिसादाने लक्षात येते. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद.

सदिच्छांसह,
सुरेश सावंत