Sunday, August 31, 2014

दोन व्यथा - एक अपरिहार्य; दुसरी पर्याय असलेली! ...(FB status व त्यावरील चर्चा)

दया पवारांची,
'दिस कासऱ्याला आला, जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरु, माझं लेकरु, पाटीखाली मी डालिते..'
ही व्यथा काळीज कुटणारी. आपल्या टाहोने आभाळ विस्फोटवणारी. या लेकराची माय असहाय्य, काहीही पर्याय नसलेली. व्यवसायाचे कोणतेही निवडस्वातंत्र्य नसलेली.
संदीप खरेंची,
'दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..'
हीही व्यथा. डोळे पाणवणारी. पण अपरिहार्य नाही. भौतिक समृद्धीत जीवनाची सार्थकता मानणाऱ्या या पालकांचा, अधिकाधिक साधनसंपन्नतेसाठी जीवघेण्या शर्यतीचा पर्याय ही स्वतःची निवड आहे. त्यांनी ठरवले तर तुलनेने कमी मिळकतीचे, पण ही व्यथा कमी करणारे व्यवसाय निवडण्याची क्षमता त्यांच्या शिक्षणाने-सामाजिक स्थानाने त्यांना दिलेली आहे.

- सुरेश सावंत

  • Sanyogita Dhamdhere मला नाही असं वाटत. घर, शिक्षण, आरोग्य यावरील वाढते खर्च म्हणून दोघांना काम करणे अपरिहार्य झालं आहे.
    तसंच जे शिक्षण घेतलं आहे त्याला बरहुकूम काम नाही केल तर केव्हढी साधन संपती वाया जाईल.
    स्वतःची उन्नती करण्यासाठी घराबाहेर पडून जे काम करतात त्याने देशाचाही विकासच होत अस्तो.
    असं धोरण ठरवल्यास कमी महत्वाची, कमी वेळेची, कमी पगाराची नोकरी आणि मुलासह इतर जबाबदार्या सांभाळण्याची तयारी बायकांनाच ठेवावी लागते.
    प्रवासात जाणारा वेळ , मुलांना सांभाळण्याच्या प्रशिक्षित सेवा नसणे,कामाच्या सोयीच्या वेळा नसने. कमीत कमी कर्मचार्या कडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची वृत्ती यामुळे ८ तासात काम आटोपून बहुतांश पालक घरी परतू शकत नहित.एकल पालकांचं काय ?
    2 hrs · Like · 1
  • Meera Sirsamkar << दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
    नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..' >> यातले पालकही व्यवस्थेची शिकार असतात . पर्याय नसतो त्यांच्यापुढे सुद्धा .... कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून पाहिलेय मी ...
    1 hr · Like · 2
  • Avinash Shukla आज स्त्रियांना नोकरी करणे हे जरुरीचे झाले आहे नाही तर कनिष्ठ मध्यमवर्गासाठी जीवन जिकिरीचे होते अन तसेही शिक्षण घेऊन त्याचा काय उपयोग? मुलांच्या शिक्षणासाठी साठी थोडे जास्त लक्ष्य द्यावे लागते हे मान्य पण ते जीवनाच्या थोड्या वर्षासाठी असते अन त्यानंतर स्त्रियांसाठी एक पोकळी निर्माण होऊ शकते जर नोकरी नसली तर. त्यातच ज्या मुली professional कोर्सेस करतात त्यांनी तर जरूर नोकरी करावी. अर्थात ह्याचे ज्ञान पेरेंट लोकांना पण झालेच पाहिजे.
    9 mins · Like
  • Suresh Sawant 'मुलगी झाली हो' नाटकात 'मूल नाही एकट्या बाईचे-जसे ते बाईचे, तसे ते पुरुषाचे. मूल जबाबदारी समाजाची. म्हणून पाळणाघर हवे. वस्तीवस्तीत पाळणाघर हवे. कामाच्या ठिकाणी पाळणाघर हवे.' अशी भूमिका व मागणी आहे. मी त्याचा समर्थक आहे. मुलासाठी आईने घरी थांबणे हा मुद्दा मला अर्थातच मान्य नाही. आजच्या स्थितीत सर्वांना परवडणारी, उत्तम दर्जाची पाळणाघरे उपलब्ध करणे हे सरकारचे काम आहे. आजचे मूल (मग ते पाटीखाली डालले जाणारे अथवा मध्यमवर्गीय घरात एकाकी उसासणारे) उद्याचा नागरिक व देशाचा आधारस्तंभ असल्याने त्याची उत्तम जोपासना ही सरकारची जबाबदारी असायला हवी. त्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा. दुसरे, प्राप्त स्थितीत घरी लवकर पोहोचण्याच्यादृष्टीने सोयीची म्हणून कमी मिळकतीची नोकरी ही तडजोड आहे.शक्य होईल त्यांनी करायला हवी. तथापि, वाढत्या तंत्रज्ञानाने कमी वेळात, कमी श्रमात अधिक उत्पादन होत असते. अशावेळी कामगाराचे वेतन वाढत जाऊन कामाचे तास मात्र कमी व्हायला हवेत. अधिक लोक कामाला लागायला हवेत. पण तसे होत नाही. मालकशाही ही जादा उत्पादनाची मलई गिळंकृत करत असते. आजच्या विषमतेला जन्म देणाऱ्या-माणसाचे यंत्र बनवणाऱ्या या व्यवस्थेला व बहुतांशी तिची पाठराखण करणाऱ्या सरकारला आपण प्रश्न विचारणार आहोत का? त्यांच्या विरोधात व्यापक एकजुटीचे आंदोलन करणार आहोत का? आज आम्हा मध्यमर्गीयांना (निम्न व उच्च दोन्ही जातींतल्या) आपल्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील समुदायांशी जोडून घेणे कमी प्रतीचे वाटते. शाळा, वस्त्या, रुग्णालये, वाहतूक व्यवस्था आम्हाला वेगळ्याच हव्या आहेत. त्यांच्या मुलांशी आमच्या मुलांचा संबंध येता कामा नये, याबाबत आम्ही किती दक्ष असतो! आम्ही मालक नसतो. पण स्वतःला कामगार म्हणवून घेण्यात अपमान वाटतो. आम्ही executive, representative, programme officer इ. इ. बरेच काही असतो. पण कामगार नक्की नसतो. संदीप खरेंच्याच दुसऱ्या एका गीताप्रमाणे 'मी मोर्चा नेला नाही..मी संपही केला नाही' असे वदणारा हा दांभिक एकाकी समूह आहे. त्याची वेदना कितीही खरी असली तरी ती व्यवस्था परिवर्तनाला निरुपयोगी आहे.