Friday, December 15, 2017

धर्म, श्रध्दा व मानवाचे उन्नयन


हातात मोबाईल, खांद्याला उंची पर्स; मात्र पायात चपला नाहीत. हे दृश्य रस्त्यात, स्टेशनवर जागोजाग या नवरात्रात आपण पाहिलं आहे. दरवर्षीच पाहतो हे. पूर्वी हातात मोबाईल नसायचे, कमरेत जीन्स नसायची. साडी, सलवार-कुर्ता असायचा. साधने, वेष बदलला. त्यात अधिक प्रगती, आधुनिकता आली. पण मनावरचा रुढींचा प्रभाव जुनाच राहिला. जीवनाला वेग आला. त्या वेगाशी जुळवताना आधुनिक साधनांचा वापर वाढला. त्यात प्रत्यक्ष पूजेला बसण्याचा वेळ वाचवण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने पूजा सांगण्याचेही प्रकार लोक अवलंबतात, असे ऐकले आहे. एवढंच कशाला, कुठेतरी एक अनुभव वाचला होता. एका म्हातारीचा अंत्यविधी सुरु होता. भटाचे विधी चालले होते. त्याच्यासमोर लॅपटॉप होता. त्या लॅपटॉपवर स्काईपवर म्हातारीचा अमेरिकेतला मुलगा होता. हातातल्या महत्वाच्या एंगेजमेंटस सोडून तातडीने - तेही हजारो किलोमीटरवरुन - आईच्या अंत्यविधीला वेळेवर पोहोचणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो या मार्गाने सहभागी झाला. भटालाही काही प्रॉब्लेम नव्हता. भट भारी लवचिक असतात. अलिकडे भटही यजमानाच्या अपेक्षेप्रमाणे तासाची, मिनिटांची पूजा सांगतात. सगळी पॅकेजेस त्यांच्याकडे उपलब्ध असतात. दक्षिणेत तडजोड नसली म्हणजे झाले.

कोणी म्हणेल ही धर्माची चेष्टा आहे. कोणी म्हणेल हे आधुनिक जगाबरोबर बदलणे आहे. दोन्ही असू शकते. पण यात धर्माचा एक भाग विसरला जातो, जो अनेक थोर संतांनी सतत प्रतिपादला आहे. तो म्हणजे, ईशशक्ती चराचरात व्यापलेली आहे. तिचे स्मरण, तिच्याशी तादात्म्यता साधणे हाच धर्म आहे. त्या शक्तीशी काही मागायचे नसते. अनवाणी राहून वा अन्य एखादे व्रत करुन भौतिक जगातील समृध्दीची कामना करायचा सौदा करायचा नसतो. उलट परमशक्तीला समर्पित व्हायचे असते.

इथेच श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्या सीमारेषा ठळक होतात. हा सौदा व त्याप्रीत्यर्थ करावयाचे कर्मकांड ही अंधश्रध्दा आहे. एखादा निर्मिक कल्पून त्याच्याप्रती समर्पित होणे ही श्रध्दा आहे. अंधश्रध्दा असो वा श्रध्दा दोहोंना विज्ञानाचा, तर्काचा पाठिंबा नाही. देव, निर्मिक यांचे अस्तित्व किंवा त्याची कृपा विज्ञानाने सिध्द होत नाही. म्हणून काही जण निरीश्वरवादी, नास्तिक असतात. त्यांना अशी श्रध्दा बाळगणे, देवापुढे हात जोडणे हेही मंजूर नसते. काहीजण ईश्वर असेल वा नसेल, आज त्याची प्रचिती येत नाही, जीवन वा सृष्टीच्या घडामोडींत त्याचे अस्तित्व दिसत नाही, सबब त्याची चर्चा करण्यात वेळ घालवणे हेच निरर्थक आहे, असे मानतात. या गटातल्यांना अज्ञेयवादी म्हणतात.

संत तुकाराम, महात्मा फुले, गाडगेमहाराज ही निर्मिकाला मानणारी, त्याच्या प्रति श्रध्दा बाळगणारी पण अंधश्रध्देवर तुटून पडणारी मंडळी. त्यांची सश्रध्दता वैज्ञानिकतेत भले बसत नसेल पण मनुष्यजातीला पुढे नेणारी आहे. नाशिकला गोदावरीत उभे राहून स्वर्गवासी पितरांना ओंजळीत पाणी घेऊन अर्घ्य देणाऱ्यांच्या शेजारी गाडगेबाबा उभे राहतात. स्वत:ही तसेच खापरात पाणी भरुन ओतत राहतात. अर्ध्य देणाऱ्या शेजारच्या इसमाला त्यांची ही कृती चमत्कारिक वाटून 'तुम्ही हे काय करत आहात?' असे तो विचारतो. गाडगेबाबा उत्तर देतात, 'माझ्या अमरावतीच्या शेताला पाणी घालतो आहे.' प्रश्नकर्ता हसू लागतो. 'हा काय वेडपटपणा! शेकडो किलोमीटरवरच्या शेताला असे कसे पाणी पोहोचेल?' उत्तरादाखल गाडगेबाबांचा प्रतिप्रश्न असतो, 'अमरावतीपेक्षा दूर असलेल्या स्वर्गातील पितरांना जर तुमचे हे अर्ध्य पोहोचते तर माझ्या शेताला का नाही पोहोचणार?'

'गोपाळा गोपाळा-देवकीनंदन गोपाळा' असे कीर्तन करत गाडगेबाबा माणसांना माणूसपणाच्या धरतीवर उतरवण्यासाठी आयुष्यभर झटले. महात्मा फुले निर्मिकाला मानूनही कर्मकांड पसरविणाऱ्या, सत्यनारायणासारखा स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठीचा विधी प्रचारणाऱ्या ब्राह्मणांचे कसब उघडे करण्याचा सत्यशोधकी जागर करत राहिले. तथागत बुध्द अज्ञेयवादी. ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेत पडत नाहीत. जन्म व मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यानचे माणसाचे जीवन सुखी कसे होईल हे त्यांचे लक्ष्य होते. त्यामुळे बौध्द धर्मात ईश्वराच्या जागी त्यांनी 'नीती'ची प्रस्थापना केली. डॉ.आंबेडकर 'बुध्द आणि त्याचा धम्म' या आपल्या ग्रंथात म्हणतात, 'माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.'

गांधीजी हे देखील तुकाराम, फुले, गाडगेबाबा यांच्या पंक्तीत बसतात. मात्र गांधीजी धर्माचा स्वत:चा अर्थ लावतात व तो समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात. 'ज्या धर्मात अस्पृश्यता आहे तो हिंदुधर्म माझा नाही' हे, अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजाला स्वत:ला हिंदू म्हणवून घेत ते सांगतात. ते कधीही कुठल्याही देवळात गेलेले नाहीत. त्यांच्या हस्ते एकाच देवळाचे उद्घाटन झाले ते भारतमातेच्या आणि त्यातही भारतमातेची मूर्तीही नाही. काशीविश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कस्तुरबा आणि महादेवभाईंना ते, 'तिथे दर्शन घेण्याऐवजी तुम्ही सत्याग्रह करून मेला असतात तर मला आनंद झाला असता' म्हणून फटकारतात. 'मी सनातनी हिंदू आहे' असे ते म्हणतात तेव्हा धर्माचे शुद्ध स्वरुप त्यांना अपेक्षित असते, कर्मकांडांनी भ्रष्ट झालेले नव्हे.

आपण पाहिले हे लोक श्रध्दावान, धार्मिक आहेत. त्यांचा समाजाला पुढे न्यायला खूप उपयोग झाला आहे. त्यांची धार्मिकता मनुष्यजातीला पोषकच ठरली आहे. त्यामुळे मुळात धार्मिकताच वाईट असे म्हणता येत नाही. निरीश्वरवाद हा विज्ञानवाद आहे. त्याचेही स्वागतच असायला हवे. या विचारांची मंडळी धर्म मानत नसतील, तरी हरकत नाही. पण ते जर सर्वसामान्यांच्या श्रध्दांवर, धर्मावर केवळ कर्कश्य कोरडेच ओढत राहिले, तर त्यातून काही साध्य होत नाही. त्यांना अपेक्षित माणसे बदलत नाहीत. उलट ती तुटतात. हे निरीश्वरवादी माणसाचे माणसाशी असलेले नाते अधिक सुंदर करायला काय करतात, कोणती नीतीतत्वे प्रचारतात हेच त्यांच्या कार्याचे मापदंड राहणार आहेत. ते देवाला मानत नाहीत, हे नीतीमूल्य नाही. ती त्यांची धारणा आहे. धारणा नव्हे, तर नीतीमूल्य व त्याचा प्रसार माणसे बदलतो, हे निरीश्वरवाद्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

अंधश्रध्दांचा तर माणसाचे माणूसपण वाढविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. नऊ दिवस अनवाणी फिरा, उपवास करा, सिध्दिविनायकाला दहा किलोमीटर रांग लावा यातून स्वत:ला माणसे कष्टवतील, त्यातून पुण्यप्राप्तीचे कृतक समाधान मिळवतील एवढेच. दारु प्याल्यावर येणारी आभासी सुखद झिंग व ही कृतक पुण्यप्राप्तीची झिंग एकाच कुळातली. दारुची झिंग सकाळी उतरते तरी. अंधश्रध्देची ही झिंग अशी उतरत नाही. विवेकवादी विचारांची जोपासना हाच त्यावरचा उतारा असतो.

पण ही मंडळी जोवर इतरांना आपल्या अंधश्रध्दांचा त्रास देत नाहीत तोवर त्यांना ती पाळायचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. निरीश्वरवादी, श्रध्दावादी, अज्ञेयवादी व दुसऱ्याला त्रास न देणारे अंधश्रध्दावादी यांना आपल्या आस्था, विचार जपण्याचे, आचरणाचे व प्रचारण्याचे स्वातंत्र्य भारतीय घटनेने दिलेले आहे. तथापि, देशाचा कारभार धार्मिकतेवर चालणार नाही, भौतिकवादच त्याचा पाया राहील.

भारतीय संविधानाने धर्म व त्याची उपासना हा व्यक्तीला दिलेला अधिकार आहे. धर्माला किंवा धर्माच्या ठेकेदारांना स्वातंत्र्य दिलेले नाही. म्हणूनच मशिदीवरचे भोंगे असोत की दहीहंडीची उंची असो, यावर नागरिकांच्या वैयक्तिक वा सार्वजनिक हितासाठी सरकार बंधन आणू शकते. मुस्लिम किंवा हिंदू धर्माचे मुखंड सरकार आमच्या धर्मात ढवळाढवळ करत आहे, असे म्हणू शकत नाही. शनि-शिंगणापूर असो की हाजीअली दर्गा, जिथे-जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे-तिथे महिलांना प्रवेश द्यावाच लागेल असा आदेश म्हणूनच न्यायालय देते. न्यायालयाच्या या आदेशाला न मानणे, आमच्या धार्मिक बाबी आम्हीच ठरवणार तसेच आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ व त्याचाच स्वीकार सर्वांनी करायला हवा यासाठी हट्टाग्रही राहून भल्याबुऱ्या मार्गांचा, हिंसेचा, दहशतीचा वापर करणे याला धर्मांधता असे म्हणतात. धार्मिकता व धर्मांधता यात मूलभूत फरक आहे. धर्मांधता माणसाचे माणसाशी असलेले नाते समृध्द करत नाहीच. उलट ते नासवते. वैरभावी करते. धार्मिकता अशी नकारात्मक नसते. ती हे नाते वृध्दिंगत करु शकते. किमान नासवत तरी नाही.

धर्मांधता ही धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीतून येते. तथापि, धर्माचा वापर आपल्या राजकीय वा अन्य सत्ता-स्वार्थासाठी करणे हा निराळा प्रकार आहे. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना हे वैयक्तिक पातळीवर अजिबात धार्मिक नव्हते. इस्लामला मंजूर नसलेल्या अनेक गोष्टी व्यक्तिगत पातळीवर ते करत. तथापि, सत्ताकारणासाठी त्यांनी इस्लामी भावनेला भडकावले. धर्म हा राष्ट्राचा पाया मानला. हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, हा त्यांनी सिध्दांत मांडला. हाच सिध्दांत सावरकरांनीही मांडला. मुस्लिम व हिंदू या धर्मांतल्या कट्टरतावादाचा हा धर्मबाह्य राजकारणाचा, सत्ताकारणाचा आयाम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या धार्मिक कट्टरतावादाचा धर्माशी काहीही संबंध नाही. लालकृष्ण अडवाणींनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली व पुढे बाबरी मशीद कोसळवल्यानंतर जी हिंदू-मुस्लिम दंगल झाली, जी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या प्रक्षोभक उद्गारांनी अधिकच भडकवली या मागे केवळ आणि केवळ सत्तेचे राजकारण होते. गोध्रा येथील ट्रेनमधला व त्यानंतरचा तसेच अलिकडे मुजफ्फरनगर असो की दादरी असो, या सर्व ठिकाणचा हिंसाचार याचा पाया धर्म नसून सत्ताकारण आहे. पाकिस्तानशी होणाऱ्या संघर्षाला किंवा काश्मीरमधील उद्रेकांना दोन्ही देशांतील हितसंबंधी धर्माची फोडणी द्यायचा प्रयत्न म्हणूनच करत असतात.

धर्मांधांपासून तसेच सत्तेसाठी धर्माला वापरणाऱ्या या चलाखांपासून लोकांना सतत सावध करत राहावे लागेल. तथापि, एक लक्षात घ्यायला हवे. भौतिक प्रगतीबरोबर माणसे आपोआप प्रगत होत नाहीत. त्यासाठी मनांची मशागत समांतरपणे करत राहावी लागते.या मशागतीचा एक भाग धर्म, धार्मिकता, श्रध्दा, अंधश्रध्दा, अज्ञेयवाद, निरीश्वरवाद व संविधानाचा त्यांच्याप्रतीचा दृष्टिकोन यांच्या स्पष्टतेचे प्रबोधन हा असेल.

- सुरेश सावंत, 

Tuesday, December 5, 2017

संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने

_________________________________

२६ नोव्हेंबरच्या संविधान जागर यात्रेची तयारी चालू असताना अगदी घाईत, मासिक सदरासाठी लेख देण्याची मुदत संपत असताना, खाली दिलेला लेख मी लिहिला. या यात्रेला लोक किती जमतील याबद्दल त्यात मी शंका नोंदवली होती. ती शंका पूर्णपणे गैरलागू ठरली. इतका भरघोस प्रतिसाद मिळेल हे अनपेक्षित होते. किती लोक आले हे मी मोजू शकलो नाही. पण इतरांकडून आलेले आकडे पाच ते वीस हजार या दरम्यानचे आहेत. त्यामुळे सहमतीचा आकडा नक्की करणे आज तरी कठीण आहे. काहीही असो. हजारांत लोक आले खरे. रस्त्यावर तिची दोन टोके गाठणे आम्हा संयोजकांना अशक्य झाले. नियोजनाची बारीक तयारी केली होती तरी या संख्येमुळे आमची नियंत्रणाची यंत्रणा काही बाबतींत कोलमडून पडली. पण लोकच सूज्ञपणा दाखवत होते. यात्रेत चालताना वाटेत मला अनेक पुरुष, महिला, मुली भेटून तुम्ही आमच्याकडे आला होतात, याची ओळख व नोंद देत होत्या. याचा अर्थ, आम्ही कोणतीही वाहनांची सोय केलेली नसतानाही लोक उत्स्फूर्तपणे त्यांची त्यांची व्यवस्था करुन आले होते. आपण श्रम करावे आणि ते सर्व सार्थकी लागावे हा माझ्याबाबतीत तरी या यात्रेनिमित्ताने आलेला हा दुर्मीळ अनुभव होता.

वस्त्यांत यात्रेच्या आधीच्या दोन दिवसांत लोकांच्या उत्साहाचा तसा अंदाज येत होता. पण तो एवढा असेल असे वाटले नव्हते. सण असल्यासारखी ही यात्रा लोकांनी वाजत, नाचत गाजवली. लोक ११ किलोमीटर कसे चालतील हा प्रश्न तर मला यात्रा ठरली त्या दिवसापासून सतावत होता. पण लोक चालले. गाड्यांचा आधार कमी लोकांनी घेतला. शिवाय सगळ्यांना गाड्या मिळणेही शक्य नव्हते. लोक दमलेत असेही दिसले नाही. वाटेत नियोजित तसेच उत्स्फूर्त आहार व पाणीवाटपाचे स्टॉल लागले होते. तिथेही लोकांची झुंबड उडाली वा ती व्यवस्था कोसळली असे झाले नाही. लोकांचा जथा अंतःप्रेरणेने चालतच होता. चैत्यभूमी हेच त्याचे लक्ष्य होते.

वस्त्यांतील लोकांबरोबरच अनेक पुरोगामी संघटना, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, साहित्य-कलाक्षेत्रातील नामवंत, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यापैकी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलेले नव्हते. सर्वसाधारणपणे केलेल्या आवाहनाला आत्मीयतेने त्यांनी हा प्रतिसाद दिला होता.

या यात्रेला विविध प्रकारचे सहाय्य करणारे शेकडो लोक आहेत. त्यातले काही ठाऊक आहेत. तर असंख्यांची काहीही नोंद नाही वा त्यांनी कोणी अशा नोंदींची अपेक्षाही केली नाही. आता यात्रा संपल्यावर लोकांच्या भेटी होतात त्यावेळी कोणी कोणी काय केले ते काही प्रमाणात कळते आहे. त्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी लिहिलेल्या पोस्ट्समध्ये जेव्हा काही नावे आली, त्यावेळी अनेकांनी त्यांना इतर खूप नावे सुचवली. शेवटी सगळ्यांच्या सहाय्याची अशी जाहीर नोंद घेणे अशक्य आहे, अशा निष्कर्षाला आम्ही आलो.

यात्रेत बहुसंख्या आंबेडकरी समूहाची होती. तथापि, अन्य समाजविभागही लक्षणीय संख्येने होते. पुरोगामी परिवारातल्या आंबेडकरी, डावे, गांधीवादी, समाजवादी आदि सर्वांचा संयोजनापासूनच समान अधिकार असलेली ही यात्रा होती. यात्रा केवळ आंबेडकरी समुदायाची व इतर पुरोगामी मंडळी पाहुणे वा हितचिंतक असे तिचे स्वरुप नव्हते. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला होता. म्हणूनच यात्रेत फक्त तिरंगा असेल, अन्य पक्ष वा धार्मिक गटाचे झेंडे नसतील, बॅनर मात्र प्रत्येकजण आणू शकतो, असे ठरवण्यात आले होते. कोणा नवख्या सहभागींचा बारीकसा अपवाद वगळता झेंड्याची ही शिस्त बव्हंशी पाळली गेली. आपल्यात अनेक मतभेद असतानाही संविधानातल्या मूल्यांचे रक्षण या सामायिक मुद्द्यावर सगळा संविधान परिवार एकवटला पाहिजे हे जे आम्ही सतत बोलत असतो, त्याचा नमुना या यात्रेच्या मर्यादेत आम्हाला पाहता आला.

यात्रा ज्या प्रमाणात मोठी होती त्या प्रमाणात प्रसारमाध्यमांनी तिची दखल घेतली नाही. आमच्या काही कार्यकर्त्यांना त्याचा खूप रागही आला आहे. अशी दखल त्यांनी घेतली असती तर अन्य भागांतील लोकांपर्यंत ही घटना पोहोचायला खूप मदत झाली असती हे खरे. पण जे प्रत्यक्ष सहभागी होते त्यांना आत्मबलाचा जो प्रत्यय आला तो आलाच. प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष त्याला रोखू शकले नाही.

आता लोकांचे आभार मानायला संघटक-कार्यकर्ते वस्त्यांत हिंडताना लोक खूप अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्याचे दडपण येते आहे. पुढे काय करायचे, कसे करायचे हे मोठे आव्हान आहे. यात्रेची तयारी, सहभाग, स्वरुप व परिणाम आदिंचा बारकाईने धांडोळा तसेच या अशा भरघोस प्रतिसादाच्या कारणांचा शोध नीटपणे घेणे गरजेचे आहे. अनेकांनी आपापले फोटो व वृत्तांत खूप शेअर केले आहेत. ते सर्व संकलित करुन एक नेटका अहवाल तयार होणे आवश्यक आहे. हे कसे, कधी होणार ठाऊक नाही. पण हे सर्व अनुभव, निरीक्षणे नीट संकलित झाली तर या आव्हानाला भिडण्यासाठीच्या दिशादिग्दर्शनाला त्याची नक्कीच मदत होऊ शकेल.
- सुरेश सावंत
_________________________________

संविधान यात्रेच्या तयारीची खूप घाई सुरु आहे. आता तर तीन दिवसच राहिलेत. कशीतरी आजची संध्याकाळ लेख लिहायला काढली होती. लेख लिहायला सुरुवात करणार एवढ्यात फोन आला- “सभेला येताय ना?” एक सहकारी कार्यकर्ता वस्तीतून बोलत होता. वस्त्यांत प्रचार बैठका रोजच्याप्रमाणे आजही होत्या. पण मी कोणाला हो सांगितलेले नव्हते. मात्र या सहकाऱ्याच्या मते स्थानिक मंडळींनी मी येणार हे गृहीत धरुनच बैठक लावली होती. तो म्हणत होता- “लाऊड स्पीकर, खुर्च्या हा सगळा खर्च त्यांनी केला आहे. आपले इतर सहकारी आहेत. पण तुम्ही नाही आलात तर ते लोक नाराज होतील. उशीर झाला तरी तुम्ही या. आम्ही तोपर्यंत गाणी वगैरे सुरु करतो.”

मी माझी अडचण सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने ती ऐकली. मग म्हणाला- “ठीक आहे. आम्ही करतो बैठक. पण तुम्ही आला असतात तर बरे झाले असते.” त्याच्या मनातील नाराजी स्पष्ट कळत होती. मी क्षणभर विचार केला. जेव्हा कधी परतू त्यानंतर अख्खी रात्र असेल लेख लिहायला. पण आता आपल्याला लोक बोलावत आहेत तर जायलाच पाहिजे. आणि मी गेलो.

सभा उत्तम झाली. म्हणजे रुढ अर्थाने लोक फार नव्हते. शे-सव्वाशेच्या घरात. पण सभा संघटित करणारी तरुण मंडळी होती. त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांनी लोकांना घरी जाऊन जाऊन आणले होते. या मंडळींनी आमच्या इतर सभा ऐकल्या होत्या. त्यातील मुद्दे लोकांना बोलावताना ते सांगत होते. माईकवर आवाहन करत होते. त्यानंतर जमलेली माणसे शांतपणे दोन तास आम्हाला ऐकत होती. सभा संपल्यावर काही पुरुष-महिला-तरुण भेटायला आले. खूप छान सांगितलेत, ऐकतच राहावेसे वाटत होते वगैरे अभिप्राय त्यांनी दिला.

सभेला आल्याचे सार्थक झाल्याचे सुखद तरंग मनात उमटले. वास्तविक आम्ही लोकांकडे जाऊन गाणी म्हणून लोकांना जमवून भाषण करणारे लोक. आज आम्हाला लोक स्वतःहून बोलावतात यातील आनंद काही निराळाच आहे. आपण लोकांना हवेसे वाटतो ही भावना खूपच प्रेरक व ऊर्जा देणारी आहे.

सभेनंतरच्या या प्रशंसेत ‘तुम्ही संयत बोलता, लोकांना समजेल असे बोलता’ असे जे अभिप्राय हल्ली येतात, हे वैशिष्ट्य काही नवे नाही. माझी ही शैली थोड्याफार फरकाने जुनीच आहे. आशयसूत्रही जुने. तपशील काही नवे असतात. पण हल्ली मिळतो तसा प्रतिसाद पूर्वी नव्हता. याचा अर्थ, शैली व आशयसूत्र जुने असले तरी भोवतालचा संदर्भ बदलला आहे. या बदललेल्या संदर्भामुळे लोकांना हे आशयसूत्र व शैली भावू लागली आहे. हे सगळे खूप आश्वासक आहे.

सभा याचा अर्थ हजार-पाचशे लोक नव्हे. ते क्वचित असतात. लोक कमीच. त्यातही तरुण दुर्मीळ. बहुतेक मध्यमयीन व वयस्क. पण जे जमतात ते शांतपणे ऐकत बसतात. प्रसारमाध्यमांतून जे त्यांच्यापर्यंत पोहोचते वा त्यांच्यावर आदळत असते, त्यातून त्यांना जे मिळत वा आकळत नाही ते त्यांना या भाषणांतून मिळते असे लक्षात आले आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, वृत्तपत्रे, टीव्ही आदि माध्यमांची भरमार असली तरी थेट माणसाने माणसाला भेटून बोलायचे याला अजून पर्याय नाही, हे जाणवते.

संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी आम्ही वस्त्यांतून हिंडत होतोच. पण संविधान दिनी २६ नोव्हेंबरला अनेक संघटना एकत्र येऊन मुंबईत ‘संविधान जागर यात्रा’ काढायचे सुमारे अडिच महिन्यांपूर्वी ठरले. त्यानंतर ह्या प्रचार-प्रसाराला अधिक गती आली. पहिल्यांदा आम्हीच लोकांत जाऊन ओळखी काढून बोलायचो. नंतर आधीच्या बैठकांत आमचे ऐकलेले लोक अन्य ठिकाणी बैठका लावू लागले. मग रोजच बैठका-सभा सुरु झाल्या. आम्हाला घरी पोहोचायला मध्यरात्र होते. खूप थकायला होते. पण ते शारीरिकदृष्ट्या. मन खूप उल्हसित असते.

सभांची संख्या व सभेतील संपर्कात आलेले लोक यांची गणना खूप मोठी होईल. पण हे सगळे लोक यात्रेला येतील का? नाही. सगळे नाही येणार. पण काही नक्की येतील. ते किती हे सांगता येत नाही. निश्चित येणाऱ्यांची कार्यकर्त्यांनी दिलेली संख्या काही हजारांत जाते. पण एवढ्या संख्येने लोक येतील का याबद्दल मला शंका आहे. न आलेल्यांच्या शुभेच्छा राहतील याची खात्री आहे. शंकेचे कारण आमचा हा प्रचार तसा वाऱ्यावरचा आहे. अजून वस्त्यांत आमची संघटनात्मक बांधणी झालेली नाही. आमचे मनुष्यबळ हुकमी नाही. जे यात्रेला येतो म्हणालेत त्यांना स्मरण देऊन त्या दिवशी बाहेर काढणे, त्यांना वाहनांची सुविधा करुन देणे हे आमच्या आवाक्यातले नाही. लोकांची प्रेरणा व स्थानिक संघटकांचे प्रयत्न यावर सोडून द्यावे लागत आहे. शिवाय ही यात्रा थोडीथोडकी नव्हे, तर ११ किलोमीटर लांब असणार आहे. देवनार पांजरापोळ येथील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा ते चैत्यभूमी, दादर. तीही दुपारी. उन्हात. मुख्यतः चालायचे आहे. दमल्यावर वाहनात बसायची मुभा आहे. पण तेवढी वाहने असली तर. ही अडचण आमच्या संघटनेची, म्हणजे संविधान संवर्धन समितीची. ज्या संघटनांकडे साधने आहेत, हुकमी मनुष्यबळ आहे, ते किती आहे व किती लोकांना ते बाहेर काढणार आहेत, याचा अजूनही अंदाज नाही.

मध्यंतरी या यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे एक परिसंवाद झाला. डॉ. गणेश देवी, तिस्ता सेटलवाड, कुमार केतकर त्याला होते. त्यावेळी खूप लोक जमले होते. फेसबुक, व्हॉट्सअपवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांत कित्येक वर्षांत मुंबई मराठीचा हॉल असा ओसंडून वाहिलेला पाहिला नव्हता, असे अनेकांनी म्हटले. पण इथे आलेले लोक सायंकाळी सावलीत खुर्च्यांवर बसले होते वा उभे होते. हे सगळेच्या सगळे उन्हात रस्त्यावर चालायला उतरतील असे नव्हे.

यात्रेला जेवढे येतील तेवढे येतील. ते जास्त आले तर खूप छान होईल. पण कमी आले तरी वाईट वाटण्याचा प्रश्न नाही. वस्त्यांतले वर वर्णन केलेले वातावरण, आमच्या बैठकांना मिळणारा प्रतिसाद आश्वासक भवितव्याकडेच निर्देश करत आहे. त्याचे मोल मोठे आहे.

पूर्वी या वस्त्यांत, मुख्यतः बौद्ध वस्त्यांत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्याना खूप प्रश्नांना सामोरे जावे लागे. हे प्रश्न खूपसे हेतूंवर संशय घेणारे असत. ते जाणूनबुजूनही असत. हल्ली असे प्रश्न करणारे लोक वस्त्यांत क्वचित दिसतात. त्यांचा मध्यमवर्गात प्रवेश झाल्याने त्यांची वसतिस्थाने बदलली आहेत. त्यामुळे त्यांचे शब्दच्छल करणारी, हेत्वारोप करणारी शेरेबाजी ज्या प्रमाणात समाजमाध्यमांवर दिसते, तेवढी वस्त्यांत दिसत नाही. अर्थात, आम्हाला याचा अनुभव अगदी आलाच नाही, असे नाही. पण जो आला तोही बऱ्या स्थितीतल्या वसाहतीत.

याच्या उलट पूर्वी जेवढे चळवळीविषयी, आंबेडकरी, पुरोगामी विचारांविषयी जाणतेपण असायचे तेही लयाला गेलेले आढळते.

यात्रेच्या तयारीच्या या काळातच नवरात्रोत्सव होता. अनेक मंडपांतच आमच्या बैठका झाल्या. देवी बसवणारी वस्त्यांतील तरुण मुले आमचा आदर करत. दांडियाची सुरुवात व्हायच्या आधी त्यांचा मंच व माईक वापरायला देत. बैठकीला बसत. शेवटी यात्रेत आम्ही येणार आहोत, असे आश्वासन देत. एके ठिकाणी एक आयोजक तरुण म्हणाला, “सर, बिनधास्त बोला. आपलेच लोक आहेत.”

आपलेच म्हणजे बौद्ध. या मुलांना कोणतेही वैषम्य वाटत नव्हते, कोणताही अपराधीभाव त्यांच्यात नव्हता. जशी आंबेडकर जयंती तसा देवीचा उत्सव. तसाच गणपती. बाबासाहेबांबद्दल कणभरही कमी अभिमान नाही. तसेच गणपती-देवीबद्दलही काही वावडे नाही. एकदम समभाव.

मी राहत होतो त्या वस्तीतल्या मंडपातही अशीच बैठक झाली. तोच अनुभव...आपले लोक वगैरे. या वस्तीत आमचे एक पँथरचे नेते बौद्ध असतानाही होळी वगैरे कोणी रचली तर ती उद्धस्त करायचे. गणपती बसवायची तर कुणाची हिंमतच नव्हती. आम्ही मुले त्यांच्यासोबत असू. त्यांचे हे ‘अँग्री यंग मॅन’ असणे आम्हाला विलक्षण भावायचे. आमचे ते आदर्श होते. या जुन्या आठवणी एका बाजूला मनात उसळून येत होत्या अन् माझ्या त्याच वस्तीत देवीच्या मूर्तीच्या साक्षीने मी तरुण मुलांना संविधानातील मूल्ये समजावून सांगत होतो.

ही स्थिती त्रासदायक आहे हे खरे. भौतिक विकासक्रमात आमच्या पुढे असलेली ही पिढी पुरोगामी वैचारिक जाणीवेच्या बाबतीत कितीतरी मागे राहिली आहे. पण याला जबाबदार कोण? आम्ही एकेकाळी वस्तीत राहणारे सजग लोक. दरम्यान आंबेडकरी चळवळ विदीर्ण-विशीर्ण झाली हे खरे. पण आम्ही वस्ती सोडल्यानंतर वस्तीशी व चळवळीशीही संबंध तोडले किंवा तुटले हेही खरे. ते जाणीवपूर्वक सांधायचे आम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत. आमचे नाकर्तेपण आमच्यापुढे या मुलांच्या रुपाने दत्त म्हणून आता उभे ठाकले आहे.

हे आव्हान समोर आहे. पण आधी वर्णन केलेली आश्वासकताही आहे. आमचे स्वागत होते आहे. लोक शांतपणे समजून ऐकायचा प्रयत्न करतात. म्हणजेच या यात्रेच्या प्रचाराच्या निमित्ताने तयार झालेल्या संपर्कांना यात्रेनंतरही आम्ही जिवंत ठेवू शकलो, त्यांच्याशी संपर्क-संवादात सातत्य ठेवू शकलो तर ही स्थिती काही अंशी नक्कीच बदलू शकते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_______________________________

आंदोलन, डिसेंबर २०१७