Friday, November 7, 2014

दलित अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी

दलित अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठीच्या उपायांमधील एक कळीचा उपाय बाबासाहेबांचे एक सहकारी व आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते मांडत असत त्याप्रमाणे 'गावकुसाच्या आतल्या व गावकुसाच्या बाहेरच्या समतावाद्यांची एकजूट' हाच आहे, असे मला वाटते.
सूचना बाळबोध वाटेल, पण माणसातील 'माणसाला', त्याच्या विवेकाला, त्याच्यातील सत्प्रवृत्ततेला साद घालणारे, वाईटाविरोधी संघटितपणे उभे राहण्याचे 'संतपद्धतीचे' आवाहन करणारे सवर्णांचा पुढाकार असलेले जथे-यात्रा संवेदनशील, अत्याचारप्रवण भागांमध्ये का निघू नयेत? मनात अनेक जातीय किल्मिषे असणाऱ्या सर्वांचाच अशा हत्यांना पाठिंबा असतो असे नाही. आज ही माणसे गप्प, तटस्थ राहतात. 'मतभेद, भांडणे चर्चेने वा कायद्याने सुटली पाहिजेत, कायदा हातात घेता कामा नये, अशी अमानुष कृत्ये तर होताच कामा नयेत', असे ठामपणे सांगणारी कृतीशील माणसे तयार करणे अगदी अशक्य आहे का? ग्रामसभा, शाळा, काॅलेजे, महिला मंडळे, बचत गट, युवक मंडळे, उत्सव मंडळे, देवळांच्या कमिट्या अशा अनेक मंचांवर माणसांशी संपर्क करुन, फाटे फोडणाऱ्या अन्य कोणत्याही चर्चा न करता केवळ वरील मर्यादित भूमिकेवर लोकांना संघटित करणे, जाहीर शपथांचे कार्यक्रम करणे, शांतता समित्या तयार करणे शक्य आहे का? ... पूर्वी असे उपक्रम अनेक विषयांबाबत झालेले आहेत. स्त्री मुक्ती संघटनेने राज्याच्या तसेच देशाच्या अनेक भागांत काढलेल्या स्त्री-पुरुष समानता यात्रांमध्ये सहभागी असताना तसेच मुंबईतील ९२-९३ च्या दंगलींत राष्ट्रीय एकता समितीत काम करत असताना मीही हा अनुभव काही प्रमाणात घेतलेला आहे. अधिक सखोल सामाजिक-राजकीय मांडणी करणाऱ्या आंदोलनांचे महत्व आहेच. त्यांना पर्याय म्हणून नव्हे, तर पूरक म्हणून या उपक्रमाचा विचार करता येणे शक्य आहे.

मोर्चे-निदर्शनांची उपयुक्तता काय?

जवखेड्याच्या अमानुष हत्याकांडाच्या विरोधात चाललेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर एका सबंधितांकडून असा मेसेज आलाः

...पण सुरेश , लोक बरेचदा असं म्हणतात की मोर्चे आन्दोलनं करून काही होत नाही ... त्यांचं हे मत मला नाही पटत. पण त्यांना हे पटवून द्यायला हवं असही वाटतं मला ... त्यावर काही लिखाण असेल तर सांग ना ... मोर्चे आन्दोलनांचं महत्व सांगणारा लेख .. तू लिही नाहीतर...

त्यांना माझे उत्तरः

माेर्चे-निदर्शने हा आंदोलनाचा एक कार्यक्रम असतो. स्वातंत्र्यासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच अनेक राजकीय, सामाजिक मागण्यांसाठी तो आपल्या महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर अशा अनेक महान नेत्यांकडून अवलंबला गेला आहे. आजही अवलंबला जातो आहे. ज्यांचा प्रश्न आहे त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, समाजातील अन्य घटकांचे लक्ष वेधणे व ज्यांच्याविरोधात तो आहे, त्यांचे लक्ष वेधण्याबरोबरच मागण्या मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर संघशक्तीचा दबाव आणणे ही उद्दिष्टे त्यामागे असतात. आणि बहुतांशवेळा ती सफलही झालेली दिसतात. जेव्हा सरकारच परके होते व ते काहीच प्रतिसाद देत नव्हते, तेव्हा ही निदर्शने हिंसकही झाली. हे हिंसक होणे योग्य की अयोग्य याबाबत स्वातंत्र्य चळवळीत मतभेद होते. जे सरकार आपले नाहीच, ते शांततामय निदर्शनांनी बधत नसेल तर केवळ नाईलाज म्हणून अशी हिंसा मला मंजूर आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण निवडलेले सरकार असते. ते बदलण्याचा निवडणुका हा लोकशाहीद्वारे आपण स्वीकारलेला मार्ग आहे. अशावेळी हिंसक आंदोलन मला अजिबात मंजूर नाही. सनदशीर, शांततामय निदर्शनेच असायला हवीत. जर सरकार ऐकत नसेल, तर प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींद्वारे सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणे, समान प्रश्न असलेल्यांची अधिकाधिक व्यापक एकजूट उभारणे, अन्य समाजाला आपले म्हणणे पटविण्याचा प्रयत्न करणे, न्यायालयात जाणे व अखेरीस निवडणुकांत भागिदारी करणे हेच उपाय अवलंबले पाहिजेत. अन्यथा अराजक तयार होईल. ही संसदीय लोकशाही प्रणाली आमचे प्रश्न सोडवू शकत नाही, अशी ज्यांची भूमिका असते, अशी (उदा. नक्षलवादी) मंडळी हिंसेचा मार्ग अनुसरतात. त्यांच्या प्रश्नांशी मी सहमत आहे, पण त्यांच्या या मार्गाशी नाही. कारण संसदीय लोकशाही प्रणालीत त्यांच्या प्रश्नांची सुनवाई होणे आज जिकीरीचे असू शकते, परंतु, अजिबात शक्य नाही, असे मला वाटत नाही.

याच भूमिकेने मी दलित अत्याचारांच्या विरोधातील आंदोलनाकडे पाहतो. खैरलांजी हत्याकांडाच्या वर्षपूर्तीनिमित्त ७ वर्षांपूर्वी याविषयी चर्चा करणारा 'पुढच्या खैरलांजी टाळण्यासाठी चळवळीच्या आत्मपरीक्षणाची गरज' या शीर्षकाचा एक लेख मी लिहिला होता. तत्कालीन तपशीलाचे काही संदर्भ वगळता त्यातील भूमिका आजही लागू ठरते, असे मला वाटते. तो वाचण्यासाठी व download करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे, ही विनंतीः

Sunday, August 31, 2014

दोन व्यथा - एक अपरिहार्य; दुसरी पर्याय असलेली! ...(FB status व त्यावरील चर्चा)

दया पवारांची,
'दिस कासऱ्याला आला, जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरु, माझं लेकरु, पाटीखाली मी डालिते..'
ही व्यथा काळीज कुटणारी. आपल्या टाहोने आभाळ विस्फोटवणारी. या लेकराची माय असहाय्य, काहीही पर्याय नसलेली. व्यवसायाचे कोणतेही निवडस्वातंत्र्य नसलेली.
संदीप खरेंची,
'दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..'
हीही व्यथा. डोळे पाणवणारी. पण अपरिहार्य नाही. भौतिक समृद्धीत जीवनाची सार्थकता मानणाऱ्या या पालकांचा, अधिकाधिक साधनसंपन्नतेसाठी जीवघेण्या शर्यतीचा पर्याय ही स्वतःची निवड आहे. त्यांनी ठरवले तर तुलनेने कमी मिळकतीचे, पण ही व्यथा कमी करणारे व्यवसाय निवडण्याची क्षमता त्यांच्या शिक्षणाने-सामाजिक स्थानाने त्यांना दिलेली आहे.

- सुरेश सावंत

  • Sanyogita Dhamdhere मला नाही असं वाटत. घर, शिक्षण, आरोग्य यावरील वाढते खर्च म्हणून दोघांना काम करणे अपरिहार्य झालं आहे.
    तसंच जे शिक्षण घेतलं आहे त्याला बरहुकूम काम नाही केल तर केव्हढी साधन संपती वाया जाईल.
    स्वतःची उन्नती करण्यासाठी घराबाहेर पडून जे काम करतात त्याने देशाचाही विकासच होत अस्तो.
    असं धोरण ठरवल्यास कमी महत्वाची, कमी वेळेची, कमी पगाराची नोकरी आणि मुलासह इतर जबाबदार्या सांभाळण्याची तयारी बायकांनाच ठेवावी लागते.
    प्रवासात जाणारा वेळ , मुलांना सांभाळण्याच्या प्रशिक्षित सेवा नसणे,कामाच्या सोयीच्या वेळा नसने. कमीत कमी कर्मचार्या कडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची वृत्ती यामुळे ८ तासात काम आटोपून बहुतांश पालक घरी परतू शकत नहित.एकल पालकांचं काय ?
    2 hrs · Like · 1
  • Meera Sirsamkar << दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
    नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..' >> यातले पालकही व्यवस्थेची शिकार असतात . पर्याय नसतो त्यांच्यापुढे सुद्धा .... कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून पाहिलेय मी ...
    1 hr · Like · 2
  • Avinash Shukla आज स्त्रियांना नोकरी करणे हे जरुरीचे झाले आहे नाही तर कनिष्ठ मध्यमवर्गासाठी जीवन जिकिरीचे होते अन तसेही शिक्षण घेऊन त्याचा काय उपयोग? मुलांच्या शिक्षणासाठी साठी थोडे जास्त लक्ष्य द्यावे लागते हे मान्य पण ते जीवनाच्या थोड्या वर्षासाठी असते अन त्यानंतर स्त्रियांसाठी एक पोकळी निर्माण होऊ शकते जर नोकरी नसली तर. त्यातच ज्या मुली professional कोर्सेस करतात त्यांनी तर जरूर नोकरी करावी. अर्थात ह्याचे ज्ञान पेरेंट लोकांना पण झालेच पाहिजे.
    9 mins · Like
  • Suresh Sawant 'मुलगी झाली हो' नाटकात 'मूल नाही एकट्या बाईचे-जसे ते बाईचे, तसे ते पुरुषाचे. मूल जबाबदारी समाजाची. म्हणून पाळणाघर हवे. वस्तीवस्तीत पाळणाघर हवे. कामाच्या ठिकाणी पाळणाघर हवे.' अशी भूमिका व मागणी आहे. मी त्याचा समर्थक आहे. मुलासाठी आईने घरी थांबणे हा मुद्दा मला अर्थातच मान्य नाही. आजच्या स्थितीत सर्वांना परवडणारी, उत्तम दर्जाची पाळणाघरे उपलब्ध करणे हे सरकारचे काम आहे. आजचे मूल (मग ते पाटीखाली डालले जाणारे अथवा मध्यमवर्गीय घरात एकाकी उसासणारे) उद्याचा नागरिक व देशाचा आधारस्तंभ असल्याने त्याची उत्तम जोपासना ही सरकारची जबाबदारी असायला हवी. त्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा. दुसरे, प्राप्त स्थितीत घरी लवकर पोहोचण्याच्यादृष्टीने सोयीची म्हणून कमी मिळकतीची नोकरी ही तडजोड आहे.शक्य होईल त्यांनी करायला हवी. तथापि, वाढत्या तंत्रज्ञानाने कमी वेळात, कमी श्रमात अधिक उत्पादन होत असते. अशावेळी कामगाराचे वेतन वाढत जाऊन कामाचे तास मात्र कमी व्हायला हवेत. अधिक लोक कामाला लागायला हवेत. पण तसे होत नाही. मालकशाही ही जादा उत्पादनाची मलई गिळंकृत करत असते. आजच्या विषमतेला जन्म देणाऱ्या-माणसाचे यंत्र बनवणाऱ्या या व्यवस्थेला व बहुतांशी तिची पाठराखण करणाऱ्या सरकारला आपण प्रश्न विचारणार आहोत का? त्यांच्या विरोधात व्यापक एकजुटीचे आंदोलन करणार आहोत का? आज आम्हा मध्यमर्गीयांना (निम्न व उच्च दोन्ही जातींतल्या) आपल्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील समुदायांशी जोडून घेणे कमी प्रतीचे वाटते. शाळा, वस्त्या, रुग्णालये, वाहतूक व्यवस्था आम्हाला वेगळ्याच हव्या आहेत. त्यांच्या मुलांशी आमच्या मुलांचा संबंध येता कामा नये, याबाबत आम्ही किती दक्ष असतो! आम्ही मालक नसतो. पण स्वतःला कामगार म्हणवून घेण्यात अपमान वाटतो. आम्ही executive, representative, programme officer इ. इ. बरेच काही असतो. पण कामगार नक्की नसतो. संदीप खरेंच्याच दुसऱ्या एका गीताप्रमाणे 'मी मोर्चा नेला नाही..मी संपही केला नाही' असे वदणारा हा दांभिक एकाकी समूह आहे. त्याची वेदना कितीही खरी असली तरी ती व्यवस्था परिवर्तनाला निरुपयोगी आहे.

Wednesday, July 2, 2014

पुरुषसूक्तासंबंधीच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा

विठ्ठल पूजेप्रसंगी पुरुषसूक्तावरून वाद उफाळणार?

पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या ॠग्वेदातील पुरुषसूक्तास तीव्र विरोध करीत, या प्रश्नावर येत्या आषाढी यात्रेत आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला असून, याउलट, पुरुषसूक्तामध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब नाही. पुरुषसुक्ताला विरोध करण्यापूर्वी डॉ. पाटणकर यांनी त्याचा अभ्यास करावा, असा सल्ला देत भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी पुरुषसूक्ताचे समर्थन केले आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या पूजेवरून डॉ. पाटणकर व उत्पात यांच्यातील वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बडवे-उत्पातांसह अन्य सेवेकऱ्यांचा दैनंदिन पूजाअर्चा करण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. या पाश्र्वभूमीवर मंदिर समितीनेही मंदिरात दैनंदिन पूजा व इतर धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पुजारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी समाजातील सर्वच स्तरातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यात ब्राह्मणेतर म्हणजे थेट दलित, ओबीसींसह महिलांनादेखील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून काम पाहण्याचा मान प्राप्त होणार असतानाच त्यावर पुन्हा वाद उपस्थित झाला. यासंदर्भात मंदिर समितीने राज्य शासनाकडे निर्णय सोपविला आहे. त्यामुळे पुजारी नियुक्तीचा वाद तूर्तास बाजूला पडला आहे.

तथापि, एकीकडे पुजारी नियुक्ती निर्णयाचे समाजात सर्वत्र स्वागत होत असतानाच मंदिर समितीने कचखाऊ भूमिका घेतल्यानंतर आता मंदिरात विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पुरुषसूक्तावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिरात महिला व दलितांसह सर्वानाच पुजारीपदावर काम करण्याची संधी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारे डॉ. भारत पाटणकर यांनी, कोणत्याही दबावाला बळी न पडता सामाजिक क्रांती घडविणाऱ्या पुजारी नियुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, विठ्ठल पूजेप्रसंगी म्हटले जाणारे पुरुषसूक्त म्हटले जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

डॉ. पाटणकर यांचा आक्षेप अमान्य करताना पंढरपुरातील भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी, डॉ. पाटणकर यांनी पुरुषसूक्तांचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे. संत साहित्यात कोठेही वेदाची निंदानालस्ती आढळत नाही. सबंध देशभरात देवदेवतांच्या पूजा पुरुषसूक्ताने करण्यात येते. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. वेदात जन्माबाबत रूपक आहे. त्याचा शब्दश: अर्थ लावू नये, असे उत्पात यांचे म्हणणे आहे.

पुरूषसूक्त म्हणजे जातीची उतरंड दर्शविण्याचे द्योतक आहे. विठ्ठलाकडे जातीभेद नसताना तेथे पुरूषसुक्त म्हणायचे कशासाठी. पुरूषसूक्ताऐवजी संत ज्ञानेश्वरांचे पयासदान किंवा संत तुकारामांचे अभंग म्हटले जावे.

(लोकसत्ता, ३ जुलै १४)

--------------------------------------------------------------------
ऋग्वेदात हे पुरुषसूक्त असून यात सर्वशक्तिमान परमेश्वराचे वर्णन केले आहे. ज्याला हजारो हात, हजारो कान, हजारो डोळे, हजारो पाय असलेला हा परमेश्वर असल्याचे सांगताना, यातील एका मंत्रात ब्राह्मण वर्ण मुखातून, क्षत्रिय वर्ण बाहुंमधून, वैश्य वर्ण मांडीतून आणि शूद्र वर्ण पायातून उगम पावल्याचे वर्णन आहे.
-------------------------------------------------------

पुरुषसूक्ताविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात-
'The scheme of the Purusha Sukta is unique, inasmuch as it fixes a permanent warrant of precedence among the different classes, which neither time nor circumstances can alter. The warrant of precedence is based on the principle of graded inequality among the four classes, whereby it recognises the Brahmin to be above all, the Kshatriya below the Brahmin but above the Vaishya and the Shudra, the Vaishya below the Kshatriya but above the Shudra and the Shudra below all.'
बाबासाहेबांची संपूर्ण भूमिका वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः
--------------------------------------------------------------------

Saturday, May 24, 2014

मोदींना वेळ तर द्या. त्यांच्यावर टीका करायची घाई का?

मोदींना वेळ तर द्या. त्यांच्यावर टीका करायची घाई का? ते वाईटच करणार आहेत कशावरुन? हा तुमचा पूर्वग्रह नाही का?... यारीतीचे प्रश्न आम्हा मोदींच्या टीकाकारांना विचारले जातात.

हे प्रश्न स्वाभाविक आहेत. पण रास्त नाहीत.

मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. त्या कामाचा एक भाग म्हणूनच ते राजकारणात आले. आताही भाजपच्या अडवाणी, सुषमा स्वराज आदिंना बाजूला सारुन संघानेच भाजपचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना निवडले आहे. आधी जनसंघ व नंतरचा भाजप ही संघाची राजकीय साधने आहेत. संघाचा आदेश प्रमाण मानणाऱ्या भाजपने किंवा मोदींनी संघपरिवाराच्या विचारांतला अमूक भाग आम्ही नाकारतो व अमूक स्वीकारतो, असे म्हटलेले नाही. म्हणजे संघाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीच मोदी पंतप्रधान झाले आहेत.

जर माझा संघाच्या विचारांना पूर्ण विरोध असेल, तर त्यांचा कडवा सैनिक मोदी (व ते ज्याचे नेतृत्व करतात तो भाजप) यांच्या हातात देशाची सूत्रे असता कामा नयेत, अशीच माझी इच्छा राहणार. अर्थात भाजप लोकशाही प्रक्रियेतून निवडून आला आहे, तो लोकशाहीच्या प्रक्रियेतूनच पराभूत झाला पाहिजे, हे मी मानतो. त्यासाठी जनमत तयार करणे हा मोदींच्या टीकाकारांना लोकशाहीनेच दिलेला अधिकार आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालचे सरकार जे निर्णय घेईल, ते सगळे वाईटच असतील, असे अजिबात नाही. उलट, आधीच्या सरकारपेक्षा त्यांच्या कारकीर्दीत अधिक वेगाने विकास होण्याचीही शक्यता आहे. ज्या योजना आधीच्या सरकारने आणल्या, परंतु, त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही, त्या अधिक परिणामकारकपणेही अमलात येऊ शकतात.

मग तरीही आम्ही टीकाच करणार का? या बाबतीत टीका करण्याचा प्रश्नच नाही. उलट जे चांगले झाले त्याला चांगलेच म्हणणार. छत्तीसगडमध्ये रेशनची योजना ज्या परिणामकारकपणे राबवली जात आहे, त्याचा मी प्रशंसक आहे. तसे लेखही मी लिहिले आहेत. ज्यांच्या पुढाकाराने हे घडले ते मुख्यमंत्री रमणसिंग भाजपचे आहेत, ही बाब अशी प्रशंसा करताना मला अडचणीची वाटली नाही.

मात्र, विकास हा देशाच्या प्रगतीचा एकमेव मापदंड नाही. या विकासाचे न्याय्य वाटप, देशाची एकात्मता-अखंडता, जनतेतील बंधुता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय व सद्भाव, अल्पसंख्याकांची सुरक्षितता, स्त्रियांना समान अधिकार, लोकशाहीचा विस्तार, उपेक्षितांना झुकते माप, पुरोगामी इतिहास व परंपरांचा आदर, आंतरराष्ट्रीय शांतता व साहचर्य इ. सारख्या मूल्यांची जोपासना देशात कशी होते यावर देशाची खरी संपन्नता अवलंबून आहे. संघाची विचारधारा अशा संपन्नतेला अडथळा आहे, अशी माझी धारणा आहे. आणि अशा विचारधारेचे मोदी जोवर वाहक आहेत, तोवर त्यांच्या विकासाच्या पावलांचे स्वागत करुनही मी त्यांचा विरोधक राहणार.

- सुरेश सावंत

Thursday, May 22, 2014

मोदींचा विजय, संघीय चलाखी व पुरोगाम्यांचे इतिहासदत्त कर्तव्य

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अभूतपूर्व निर्णायक बहुमताच्या विजयाने आता देशात काय होईल, याची चिंता पुरोगामी वर्तुळात व्यक्त होत आहे. ती समजून घेण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी देशाच्या आधुनिक इतिहासातील ३ प्रमुख प्रवाहांची प्रथम नोंद घ्यावी लागेल.
 
एक, स्वातंत्र्य चळवळीतून उदयाला आलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्यांना मानणारा, वंचितांना झुकते माप देणारा, मध्यममार्गी परंतु, निश्चितपणे भांडवली विकासाच्या दिशेने जाणारा प्रवाह. आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा हे द्वंद्व स्वातंत्र्य मिळाल्यावर निमाले व संविधानात या दोहोंतून आलेल्या मूल्यांचा समावेश झाला. या प्रवाहाचे प्रतिनिधीत्व काँग्रेस परिवार (यात काँग्रेसमधून फुटून निघालेल्या गटांचाही समावेश आहे) करतो.
 
दोन, पहिल्या प्रवाहातील सर्व प्रगत मूल्यांचा समावेश असलेला, मात्र भांडवलशाही व्यवस्थेच्या पुरस्काराला विरोध व कष्टकरी-दलित समुदायांच्या प्रति निष्ठा आणि राज्यशकट त्यांच्या हाती यायला हवे यासाठी प्रयत्नरत डाव्या-पुरोगामी (फुले-आंबेडकरी गटांसह) संघटनांचा-पक्षांचा प्रवाह.
 
तीन, राजकीय स्वातंत्र्याच्या व सामाजिक सुधारणांच्या चळवळींनी ज्या उच्च जातीय-वर्गीय गटांचे हितसंबंध दुखावले गेले, त्यांचा प्रवाह. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याचा अंकुश मानणाऱ्या विविध संघटना (यातच आधीचा जनसंघ व आताच्या भाजपचा समावेश होतो) या प्रवाहाचे प्रतिनिधीत्व करतात.
 
स्वातंत्र्यलढ्यावेळी व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हे तीन प्रवाह (त्यांत अनेक छटा असल्या तरी) कायम राहिले आहेत. त्यातला तिसरा ‘संघा’चा प्रवाह हा अधिक बेरकी (सावज टिपण्यासाठीच्या संधीची दीर्घकाळ प्रतीक्षा करणारा), बांधेसूद व लवचिक (खरं म्हणजे रुपे बदलणाऱ्या झोटिंग या भूतासारखा) राहिला आहे. पहिले दोन, परस्परांत व अंतर्गतही कायम व उघड संघर्षरत राहिले; इतके की, त्यांचे दोन प्रवाह अनेक वाटावेत. या ताणात तिसऱ्या प्रवाहाची संगत-सोबतही प्रासंगिकरित्या या पहिल्या दोन प्रवाहांतील काहींनी केली. आजही करत आहेत. (उदा. आठवले, पासवान आता व आधी मायावती, नितीश, शरद यादव इ.)
 
हे सरमिसळ छटांचे खरे-खोटे (झोटिंग पद्धतीचे) चित्र दिसत राहिले तरी हे तीन प्रवाह पुढेही राहणार आहेत. त्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना-व्यक्ती कदाचित बदलतीलही; पण या प्रवाहांचे अस्तित्व त्यांच्या समाजातील आधारशक्तींचा निरास होत नाही, तोवर राहणारच आहे.
 
डाव्या-पुरोगाम्यांच्या अधिक प्रगत प्रवाहाने काँग्रेसचा पराभव करणे, हे भारतीय राजकारणातील पुढचे पाऊल ठरले असते. पण हा पराभव भाजपने करणे, हा पुरोगामी राजकारणाला काँग्रेसपेक्षाही अधिक जिव्हारी लागणारा फटका आहे. जयप्रकाशांच्या आंदोलनाने गांधीजींच्या खुनानंतर वळचणीला गेलेल्या संघपरिवाराला प्रतिष्ठा दिली. जनसंघ जनता पार्टीत डुबकी मारुन भारतीय जनता पार्टीत रुपांतरित झाला. ‘हिंदुस्तान’ संबोधणाऱ्यांनी ‘भारतीय’ नामकरण चलाखीनं करुन आपलं रुप बदललं. जनता पार्टीची संपूर्ण क्रांती तिच्या शतखंडित होऊन संपण्यात झाली. जनता पार्टीचा बॅनर मिरवणारा शेवटचा शिलेदार सुब्रमण्यम स्वामी अगदी अलिकडे भाजपात विलीन झाला. काँग्रेसमधून बाहेर निघाल्याने पुरोगामी ठरलेल्या व्ही.पी. सिंगांच्या संगतीला डावीकडे डावे व उजवीकडे उजवे-भाजप होते. या डाव्या-उजव्यांचा सामायिक शत्रू होता काँग्रेस आणि त्याला गारद करणे हे होते यांचे प्रथम कर्तव्य. या डावपेचांत डावे-पुरोगामी स्वतः इतके क्षीण झाले की यावेळी त्यांची फारशी दखल घेणेही भांडवली माध्यमांना गरजेचे वाटेनासे झाले. या डावपेचांचा फेरविचार करणे आवश्यक आहे.
 
मोदींचा एकहाती विजय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला देदिप्यमान विजय आहे. नव्या पिढीला संघाचा जुना परिचय नसल्याने आणि पुरोगामी विकलांग झाल्याने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे काही कळत-सुधरतच नसल्याने संघ आता उजळ माथ्याने क्रियाशील होऊ शकतो. त्यांचा कट्टर स्वयंसेवकच संपूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर देशाचा पंतप्रधान झाला आहे. तथापि, त्यांचा मूळ कार्यक्रम ते उघडपणे लगेच सुरु करतील, असे नाही. ते तसे चिवट, बकध्यानी-संधीची दीर्घकाळ वाट बघणारे आहेत. लोकांनी दिलेल्या कौलात या क्षणी तरी विकासाचा मुद्दा प्रधान आहे. खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या भांडवलदारांनाही त्यांच्या हिताची आर्थिक धोरणे तातडीने हवी आहेत. तेव्हा, तूर्त हेत मोदींचे प्राधान्य राहील, असे दिसते. या दरम्यान, हळूहळू अध्यक्षीय प्रणाली, ३७० कलम, राष्ट्रवाद याच्या हुशारीने चर्चा सुरु होतील.
 
तसे पाहिले तर ‘अब की बार-मोदी सरकार’ या डावपेचाने ही निवडणूक ‘अध्यक्षीय’च त्यांनी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’ असा इशारा संविधानभेतच दिला होता. बाबासाहेब अध्यक्षीय प्रणालीच्या बाजूने नव्हते. संविधान सभेत संसदीय प्रणालीचे भारतातील महत्व विशद करताना अध्यक्षीय प्रणालीचे दोष ठळकपणे त्यांनी नोंदवलेले आहेत. संघ व भाजपचे विचारवंत विविधप्रकारे पूर्वीपासूनच चर्चा-लेखांतून अध्यक्षीय प्रणालीची भलामण करत आलेले आहेत. मात्र ती करत असताना बाबासाहेबांच्या मताची चिकित्सा करण्याचा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवलेला नाही. तथापि, त्यांच्या लेखनातील वाक्ये खुबीने निवडून ते कसे मुस्लिमविरोधी होते, त्यामुळेच त्यांनी इस्लाम धर्म न स्वीकारता व्यापक हिंदुत्वाचाच एक घटक असलेला बौद्ध धर्म स्वीकारला, हे ते जोरात प्रतिपादत असतात. आपल्या विचारधारेच्या विरुद्ध असलेल्या महामानवांना आपले प्रचारक बनवण्याची ही ‘संघीय’ चलाखी महात्मा गांधींना प्रातःस्मरणीय करण्यातून व पुढे भाजपच्या जाहीरनाम्यात ‘गांधीवादी समाजवाद’ हे आमचे ध्येय असल्याचे नमूद करुन त्यांनी आधीच साधली आहे. या चलाख्या आता अधिक जोरात, उघडपणे व सरकारी पाठिंब्याने होणार आहेत.
 
भाजपच्या संसदीय मंडळासमोरील अत्यंत प्रभावी भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक व जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी २०१५-१६ या वर्षात सरकार व पक्ष या दोन्ही पातळ्यांवर साजरी करण्याचा मनोदय मोदींनी जाहीर केलाच आहे. या काळात ‘लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता यांची पाश्चात्य मुळे व भारतीय परंपरा’ अशा शीर्षकाखाली चर्चा सुरु होतील व ‘आम्ही म्हणतो ते हिंदुत्व हेच खरे भारतीयत्व’ठसविण्याची आसेतू हिमाचल मोहीम सुरु होईल. देशाच्या निर्मितीसाठी संघर्षरत व निर्मितीपासून १४ वर्षे देशाचे पंतप्रधान राहिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरुंनी आधुनिक भारताची मूल्यात्मक व आर्थिक पायाभरणी केली. या वर्षी त्यांच्या निधनाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे-योगदानाचे स्मरण करुन देणारा कार्यक्रम सरकारी पातळीवर घ्यावा, हे मोदींना सुचले नाही, हे अन्वर्थक आहे. दीनदयाळांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने नेहरुवादावरच प्रच्छन्न हल्ले करण्याचा हा डाव आहे. सरळ ‘मंदिर वहीं बनाएंगे, काशी-मथुरा बाकी है’ म्हणणाऱ्यांना ते आता गप्प बसवतील. ज्यांनी भरभरुन मते दिली त्या वेगवान विकासाच्या आकांक्षा असलेल्या तरुण पिढीला हे रुचणार नाही, हे त्यांना चांगले कळते.
 
या संघीयांचा मुकाबला करायचा तर त्यांच्यापेक्षा हुशारीने, सर्व पुरोगामी शक्तींना एकवटून (यात काँग्रेसशीही सहकार्य करुन) संपूर्ण सहमतीचा आग्रह न धरता किमान समान धोरण व कार्यक्रम ठरवून समाजात नव्याने व नव्या पद्धतीने संचार करावा लागेल. ही एकजूट निवडणुकांपुरती (संधिसाधू धर्तीची) असू नये. दीर्घकालीन कार्यक्रमावर असायला हवी. या दीर्घकालीन एकत्रित व्यवहारातून निवडणुकांतील एकजूट उदयास आली पाहिजे. तरच ती अधिक सकस होईल. स्वातंत्र्याच्या व सामाजिक सुधारणांच्या चळवळीतून जन्माला आलेल्या मूल्यांनी संविधान तयार झाले, त्या मूल्यांच्या कायम विरोधी असलेल्या संघपरिवाराचा नवा झोटिंग मोदी विकासाचा वेष धारण करुन देशाला भुलवू पाहत आहे. अशावेळी या चळवळींचा सामायिक वारसा असलेल्यांनी तो टिकविण्यासाठी पुन्हा एकदा एकवटणे, हे त्यांचे इतिहासदत्त कर्तव्य आहे.
 
- सुरेश सावंत

Monday, February 17, 2014

फँड्री...विषम समाजव्यवस्थेच्या विरोधातला सणसणीत एल्गार

फेसबुकवरच्या मित्रांच्या जोरदार शिफारशी वाचून फँन्ड्री पाहिला. त्यांना तसेच या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणाऱ्या नागराज मंजुळेंना मनोमन धन्यवाद. हा नितांत सुंदर चित्रपट अजूनही न पाहिलेल्या सर्वांनी पहावा, असेच आवाहन मीही आता करु लागलो आहे.

स्थळ-काळाचे तपशील वेगळे असले तरी 'जब्या'चे भावविश्व हेच आमचेही भावविश्व होते. किशोरवयातील त्याच्या मनात उमललेले हळुवार अंकुर, त्यांची मुग्ध कोवळिकता व नाजूक संवेदनांनी मनाचे आभाळ झंकारणे ही भावस्थिती आमचीही होती. तथाकथित खालची जात अन् या जातीला सावलीइतके अपरिहार्य बनून आलेले दारिद्र्य, वंचना यामुळे 'शालू' हे आम्हालाही अप्राप्य असे गुलबकावलीचे फूल होते. सामाजिक-आर्थिक विषमतेच्या या दाहक वास्तवाने आमच्या भावजीवनाच्या झालेल्या चिंधड्या आ़जही ठसठसत असतात. फॅंन्ड्रीने तर त्यांवरची खपलीच ओरबाडून काढली.

याच किशोरवयात 'प्यासा' पाहिला. एकदाच नाही. अनेकदा. गुरुदत्त दुरावलेल्या माला सिन्हाला म्हणतो, “मुझे तुमसे शिकायत नहीं. मुझे शिकायत है समाज के इस ढाँचे से.” भोवताली घोंगावणाऱ्या फुले-आंबेडकरी, डाव्या-समाजवादी चळवळींमुळे हेच विचारसूत्र आम्हाला मिळाले. माझे दारिद्र्य, माझी जात व त्यामुळे येणारी प्रेमातली विफलता यास मी किंवा ती जबाबदार नाही, तर जबाबदार आहे ही 'समाजव्यवस्था'. ...आणि म्हणूनच पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही वंचना, ही विफलता येऊ द्यायची नसेल, तर समाजाचा हा 'ढाँचा' बदलला पाहिजे, हे आपसूकच जीवनाचे ध्येय झाले.

समाज खूप बदलला आहे, बदलतो आहे, हे खरे. तथापि, सामाजिक परिवर्तन हे राजकीय परिवर्तनासारखे वेगाने होत नाही. ते धिमे असते. सामाजिक बदलाचा संघर्ष चिवट असतो. अनेक पिढ्यांचा हा प्रवास असतो. हे लक्षात घेऊन या लढ्यातील चिकाटी व सातत्य टिकवावे लागेल.

सिनेमाच्या अखेरीस जब्याने त्वेषाने फेकलेल्या दगडाने आपले तोंड सणसणीत फुटणार या जाणिवेने आपण दचकतो. जब्याचा हा दगड हा या विषम समाजव्यवस्थेवरच्या तीव्र संतापातून फेकलेला व तिला उध्वस्त करु पाहणारा एल्गार आहे. नव्या पिढीला जब्याचा हा एल्गार प्रेरित करेल, ही अपेक्षा.

- सुरेश सावंत


Saturday, January 11, 2014

फारुख शेखः ‘इन्सानियत’चा पुजारी!

फारुख शेख माझा आवडता अभिनेता. ज्यात आपण स्वतःला पाहू शकतो असा- अँटी हिरो..न-नायक. तो गेल्याची बातमी कळली आणि काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

९२-९३ चा काळ. बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाने देश ढवळून निघाला होता. भावना भडखाऊन सत्तेचे तख्त पटकावण्याचा तो विखारी डाव होता. मुंबईतले आम्ही पंचविशी-तिशीतले युवक-युवती आमच्या परीने यात उतरलो. सह्यांची मोहीम सुरु केली. चौकात-वस्त्यांत-स्टेशनबाहेर उभे राहून गाणी, भाषणे व नंतर सह्यांचे आवाहन असा हा कार्यक्रम असे. सह्यांसाठीचा मजकूर असा होताः

‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना|
मंदिर बनाओ-पर मस्जिद न तोडो|
चर्चा से सवाल सुलझाओ|
चर्चा से हल नहीं निकला तो न्यायालय का निर्णय मानो|
दोनो तरफ की धर्मांधता का हम विरोध करते हैं|
देश की एकता अखंड रखने का संकल्प दोहराते हैं|’

या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो सह्या गोळा झाल्या. या भांडवलावर सर्वधर्मसमभावावर विश्वास असणाऱ्या नेत्या-संघटना-पक्षांना भेटू लागलो. यातूनच ‘राष्ट्रीय एकता समिती’ हा धार्मिक तेढ माजवणाऱ्या शक्तींच्या विरोधातला व्यापक एकजुटीचा मंच तयार झाला. समितीच्या बहुतेक बैठका दादरला ‘श्रमिक’ या लाल निशाण पक्षाच्या कार्यालयात होत असत. समाजवादी वसंतराव खानोलकर, कम्युनिस्ट कॉ. धुमे, काँग्रेसी प्रभाकर कुंटे अशा मंडळींचा या बैठकांत पुढाकार असे. राजकीयदृष्ट्या विविध छावण्यांत; परंतु, सेक्युलॅरिझमच्या मुद्द्यावर एका मंचावर या मंडळींना आणण्यात आम्हाला यश आले होते. सह्यांची मोहीम सुरु करण्याआधीही या मंडळींना आम्ही भेटून एकजुटीचे आवाहन करत होतो. तथापि, गाडे फारसे हलत नव्हते. सह्यांच्या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर हे गाडे हलू लागले. (‘राष्ट्रीय एकता समिती’ हे नाव वसंतराव खानोलकरांनीच सुचवलेले.) वर ‘भांडवल’ हा शब्द त्यामुळेच वापरला आहे.

या बैठकांत शेवटी कोठेतरी फारुख शेख बसलेले मी अनेकदा पाहिलेत. सामान्यांतले एक. अभिनेता म्हणून आपली खास दखल घेतली पाहिजे, याचा लवलेशही त्यांच्यात नसे. बैठकीचे खास निमंत्रणही त्यांना दिलेले नसायचे. कानोकानी जी निमंत्रणे जात त्यांतून कोठूनतरी त्यांना बैठकीविषयी बहुधा कळत असे. पण हा विषय त्यांच्या काळजाला हलवणारा होता, हे नक्की. पुढे एका बैठकीत याचा प्रत्यय आला.

४ डिसेंबरला ‘राष्ट्रीय एकता समिती’च्या बॅनरखाली ‘आझाद मैदान ते महाराष्ट्र हायस्कूल मैदान’ असा उलट्या दिशेने व्यापक एकजुटीचा मोठा मोर्चा झाला. अन् एक दिवसाच्या अंतराने ६ डिसेंबरला मशीद पाडली गेली. दंगली भडकल्या. माणसे मारली गेली. नुसतीच नव्हे; क्रौर्याचे विविध प्रयोग झाले. विद्वेषाने माणसे किती हिंस्र होतात, याचे आम्ही साक्षी होतो. धर्मांध शक्तींचा डाव यशस्वी झाला होता. संख्येने अधिक असूनही पुरेशा एकजुटीअभावी व वेळेवारी हस्तक्षेप व लोकजागरण न केल्याने सेक्युलर शक्तींनी मार खाल्ला.

आमची सह्यांची मोहीम थांबली. आता आम्ही अपरिहार्यपणे मदत कार्यात व मने सांधण्याच्या कामात जुंपले गेलो.

आम्ही धारावीत होतो. धारावी हा कष्टकऱ्यांचा ‘मिनिभारत’. पण धर्मभेदाच्या विषाने भाषा-प्रदेशभिन्नता लोपून हिंदू व मुसलमान असे दोन तट पडले. वर्षानुवर्षे परस्परांना सोबत करणाऱ्यांना परस्परांचे भय वाटू लागले. धारावी कोळीवाड्यात एक बैठक झाली. फारुख शेख या बैठकीला होते. त्यांना बोलण्याचा आग्रह झाला. ते बोललेही. त्यांचे नेमके शब्द आता आठवत नाहीत. पण आशय, त्यांची कळकळ, देहबोली मनात कोरली गेल्यासारखी स्मरणात आहे. त्यांचे म्हणणे लक्षात यायला धारावीची रचना समजून घ्यायला हवी. सायन, गुरु तेग बहादूर व माहीम या ३ रेल्वे स्टेशनांच्या त्रिकोणात धारावी वसली आहे. चर्चगेटला जाण्यासाठी सायनकडच्या बाजूला राहणारा चालत माहीमला जाऊन ट्रेन पकडतो. माहीमकडच्या बाजूला राहणारा मुलुंडला जाण्यासाठी सायनला चालत येतो. मानखुर्दला सरळ जाण्यासाठी सायन व माहीमकडच्यांना गुरु तेग बहादूर स्टेशन सोयीचे वाटते. या धारावीतल्या आतल्या प्रवासात हिंदू-मुस्लिमांना परस्परांच्या वस्त्या पार कराव्या लागतात. दंगलीत असा प्रवास करणाऱ्यांचे जीव घेतले जात होते, ही वस्तुस्थिती होती. फारुख शेख याचाच संदर्भ घेत बोलले- ‘रास्ता काटते समय पीठ में छुरा घोपने का डर..यह इन्सान की बस्ती है या जंगल है?..कहाँ गयी वो इन्सानियत..?’

त्यांनी धारावीकरांच्या मर्मावर बोट ठेवले होते. सभेला दोन्ही समाजातील लोक हजर होते. त्यांचे हे भाषण सगळ्यांना अंतर्मुख करणारे, हेलावून सोडणारे होते.

पुढे फारुख शेख अनेकवेळा धारावीत आले. आमच्याबरोबरच्या काहींनी त्यांना ‘तपासण्यासाठी’ तिथल्या अगदी सामान्य हॉटेलमध्ये चहा घेण्याची ऑफर दिली. मीही त्यांच्यासोबत होतो. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ती सहज स्वीकारली. जो काही वेळ ते आमच्यासोबत होते, त्या काळात ते आमच्यातीलच एक होते. त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलण्याचे काही प्रसंग माझ्यावर आले. त्यावेळचा त्यांचा भाव हा मित्राचा-कॉम्रेडचा होता. ज्येष्ठ मित्राचाही नव्हे. म्हणजे उपदेश वगैरे काही नाही. उपचार नाही. घाई नाही. केवळ निर्व्याजता. सहजसुंदर ऋजुता.

‘इन्सानियत’च्या या पुजाऱ्याला मनोभावे अभिवादन!

- सुरेश सावंत

अन्नसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही


केंद्राच्या अन्नसुरक्षा कायद्याचे स्वागतच करायला हवे. खूप संघर्षातून व तडजोडींतून या कायद्यास जावे लागल्याने सगळ्यांच्या अपेक्षा तो अर्थातच पूर्ण करु शकत नाही. तथापि, हा कायदा झाल्याने रेशन, मातृत्व अनुदान, मध्यान्ह भोजन आदि महत्वाच्या योजनांना आता कायदेशीर आधार तयार झाला आहे. त्यांची व्याप्ती व परिणामकारकता अधिक वाढणार आहे.
आता प्रश्न आहे अंमलबजावणीचा. महाराष्ट्रात डिसेंबरअखेर या कायद्याची अंमलबजावणी होणार असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले होते. तथापि, ही मुदतही आता उलटली आहे. ही अंमलबजावणी कधी होणार यापेक्षाही ती कशी होणार याविषयी पुरेशी स्पष्टता अजून झालेली नाही, ही अधिक काळजीची बाब आहे.   
या कायद्याप्रमाणे राज्यात सुमारे ३१ टक्के इतक्याच स्वस्त धान्याचा निश्चित लाभ असलेल्या अंत्योदय-बीपीएल कार्डधारकांची संख्या (मुंबईत ती जेमतेम १ टक्के आहे. अन्य शहरांतही हे प्रमाण ५-७ टक्क्यांच्या पुढे नाही.) वाढून ती ग्रामीण भागात ७६.३२% तर शहरी भागात ४५.३४ % होणार आहे. हे पुढचे पाऊल आहे.
तथापि, या योजनेसाठीचे लाभार्थी निवडण्याचे जे निकष सरकारने जाहीर केले आहेत, ते सदोष आहेत. शहरात ज्यांचे वार्षिक उत्पन्न  ५९,००० रु. च्या आत व ग्रामीण भागात ४,००० रु. च्या आत असेल त्यांना या योजनेत सामावले जाणार आहे. गरिबांची चेष्टा करणारी सरसकट १५,००० रु. ही आजवरची वार्षिक उत्पन्न मर्यादा राज्य सरकारने वाढवली आहे, ही चांगली बाब आहे. मात्र ही वाढीव मर्यादाही आजचे वास्तव लक्षात घेता अपुरी आहे. शिवाय केवळ आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन गरिबी मोजता येत नाही. अन्य सामाजिक घटकही विचारात घ्यावे लागतात. उदा. कचरा वेचक महिलेचे आर्थिक उत्पन्न या मर्यादेपेक्षा अधिक असू शकते. तथापि, ज्या घाणीत तिला काम करावे लागते, ती स्थिती, तिचे वास्तव्य, सततचे आजारपण, नियमित मिळकतीची शाश्वती नसणे, नवऱ्याचे दारुत पैसे उडवणे या तिचे जीवन अस्थिर व बिकट करणाऱ्या बाबी लक्षात घेतल्या नाहीत, तर ती सरकारच्यादृष्टीने लाभार्थी ठरणार नाही. अशारीतीने असंघटित क्षेत्रात काम करणारे अनेक गरजवंत रेशनच्या बाहेर फेकले जातील. वास्तविक गरिबी मोजताना हे सामाजिक घटक विचारात घ्यायचे केंद्र सरकारच्या पातळीवर ठरलेले असताना व त्याप्रमाणेच सामाजिक-आर्थिक गणना सध्या देशात सुरु असताना महाराष्ट्र सरकार हा मागासलेपणा का करत आहे?
बरे, हे निकष लावून लाभार्थी निवडीची प्रक्रिया काय असेल हेही महाराष्ट्र सरकारने अजून जाहीर केलेले नाही. म्हणजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार की रेशनकार्डांवर लिहिलेले उत्पन्न गृहीत धरणार? रेशनकार्डावरचे हे उत्पन्न स्वयंघोषित अथवा अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीने नोंदवलेले आहे. एकाच आर्थिक स्तरात असलेल्या, दोन शेजारी केशरी कार्डधारकांच्या उत्पन्नाची नोंद भिन्न असेल व एकाला लाभार्थी गणले गेले आणि दुसऱ्याला वगळले गेले, तर मोठाच असंतोष तयार होईल. 
महाराष्ट्रात सरकारनेच जाहीर केल्याप्रमाणे ८ कोटी ७७ लाख लोक रेशन व्यवस्थेत आहेत. त्यापैकी ७ कोटी लोक केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कायद्याच्या लाभार्थ्यांत मोडतात. उर्वरित १ कोटी ७७ लाखांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तथापि, त्यांना प्रचलित दर व प्रमाणानुसार रेशन मिळेल, असे मंत्रिमंडळाच्या निर्णयात म्हटले आहे. हे दर आहेत गहू प्रति किलो रु. ७.२० व तांदूळ रु. ९.६०. दोन्ही मिळून एकूण धान्य मिळणार महिन्याला १५ किलो. आता इथेही अनवस्था प्रसंग ओढवणार. एकाच आर्थिक गटातील एकाच वस्तीत राहणाऱ्या केशरी कार्डधारकांपैकी काहींना कायद्याप्रमाणे धान्य मिळणार २-३ रुपयांना, तेही प्रत्येकी ५ किलो म्हणजे कुटुंबाला सरासरी २५ किलो महिन्याला, तर इतरांना मिळणार ७.२० व ९.६० या जादा दराने फक्त १५ किलो. अशा स्थितीत आम्ही एकाही रेशनकार्डधारकाला वगळणार नाहीया घोषणेने सरकारला या सामावल्या जाणाऱ्यांचा दुवा मिळण्याऐवजी रोषच पत्करावा लागेल, असे दिसते.
लक्ष्याधारित योजनेत प्रारंभी १५,००० रु. ही लाभार्थ्यांसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा महाराष्ट्र सरकारने ठरवली असल्याने व केंद्राने दिलेल्या लक्ष्यांकाच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जबाबदारी (स्वतःच्या तिजोरीतून अनुदान देण्याची) घेत नसल्याने लक्ष्यांक पूर्ण झाल्यावर उर्वरित रेशनकार्डधारकांच्या कार्डावर १५,००० रु.च्या वर उत्पन्न नोंदवले जाईल, अशी खबरदारी घेण्याचे अलिखित आदेश अधिकाऱ्यांना होते. बहुतेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी हे उत्पन्न १५.००० च्या वर मात्र १८,००० ते २५,००० या दरम्यानच नोंदवलेले आढळते. इतर योजनांचा लाभ मिळण्यात या कार्डधारकांना अडचण येऊ नये, हा परोपकारी दृष्टिकोणही त्यामागे होता. त्यामुळे, आता ४४ व ५९ हजारांच्या मर्यादेच्या आतच जर बहुसंख्य आले, तर सरकारची चांगलीच पंचाईत होणार.
एकतर, ,,३ रु. हे दर सरसकट सगळ्यांना ठेवण्याचा जो सवंगपणा केंद्राने केला, तो त्याच्या तसेच राज्यांच्याही अंगाशी येणार आहे. हे दर ५-६ रु. च्या दरम्यान ठेवून उरलेल्या रकमेचा उपयोग डाळी-तेल देण्यासाठी करता आला असता. पुढील ३ वर्षे हे दर कायद्याप्रमाणे सरकारला बदलता येणार नाहीत. हा सवंगपणा अन्य काही राज्यांनी-मात्र स्वतःच्या तिजोरीतून खर्च करुन-याआधीच केला आहे. तामिळनाडूत तर २० किलो तांदूळ रेशनवर फुकट दिला जातो. त्यासाठी ते राज्य ५००० कोटी रु. वर्षाला स्वतः खर्च करते. महाराष्ट्राने अशी दानत याच्या दशांशानेही कधी दाखवलेली नाही. आता ते ११०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मंत्रिमहोदयांनी जाहीर केले आहे. पण त्याने लाज झाकली जाणार नाही. निवडणुका तोंडावर आहेत हे तरी लक्षात घेऊन पांढरे रेशनकार्डवाले वगळून उर्वरित सर्वांना कायद्यातील दर व प्रमाण लागू करण्याचा शहाणपणा सरकारने दाखवायला हवा. त्यासाठीचा (१ कोटी ७७ लाख लोकांसाठीचा) वाढीव खर्च अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सोसला पाहिजे. आपल्या शेजारचे २ कोटी लोकसंख्येचे छोटे राज्य छत्तीसगड जर १६०० कोटी रु. वर्षाला स्वतःच्या तिजोरीतून घालते, तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला हा वाढीव खर्च सहजच झेपू शकतो. ३ वर्षांनी यात बदल करण्याची मुभा आहेच.
अजून दोन बाबींचा सरकारने विचार करायला हवा. आपल्या राज्यातील पिवळ्या रेशनकार्धारकांना आज एका कार्डावर दरमहा ३५ किलो धान्य मिळते. कायद्यातील तरतुदीप्रमाणे ते प्रति व्यक्ती ५ किलो म्हणजे कुटुंबाला सरासरी २५ किलो मिळेल. हे धान्य स्वस्तात असले तरी या कुटुंबांना उर्वरित १० किलो धान्य बाजारभावाने घेताना साठेक रुपये जादा मोजावे लागणार आहेत. त्यांनाही अंत्योदयप्रमाणे ३५ किलोंची खात्री द्यावी लागेल. तसेच जे गरजवंत तांत्रिक कारणांनी कागदोपत्री पुराव्यां अभावी रेशनकार्ड न मिळाल्याने रेशनव्यवस्थेच्या बाहेर आहेत, अशांना खास मोहीम काढून न्याय द्यावा लागेल.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com