Tuesday, July 18, 2023

अण्णा भाऊ साठे : जीवन, विचार व साहित्य


आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरील चिंतन कार्यक्रमात 'अण्णा भाऊ साठेः जीवन, विचार व साहित्य' या विषयावरील १७ ते २० जुलै २०२३ या कालावधीतील ४ छोटेखानी भाषणांची ही टिपणे.

अण्णा भाऊ साठे : वारसा आणि जीवन

रुढ अर्थानं औपचारिक शिक्षण न झालेल्या, उपेक्षित समाजात जन्मलेल्या माणसाचं साहित्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात लागतं, त्यांच्या साहित्याचा जगभर गौरव होतो, रशियासारख्या देशात त्यांचा पुतळा उभा राहतो, असे अण्णा भाऊ साठे आपल्या राज्याला-देशाला ललामभूत आहेत. मराठी मनं थरारून टाकणारी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातली त्यांची शाहिरी कामगिरी लक्षात घेता ते मराठी जगताचा मानबिंदू ठरतात.
वास्तविक, प्रत्येक मनुष्याची प्रतिभा विकसित व्हायला समान अवसर मिळायला हवा. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनेनं तसेच आपल्या देशाच्या संविधानानं ते ठळकपणे नमूद केलं आहे. मात्र आर्थिक स्थिती आणि विशेषकरुन जातिव्यवस्था हे घडू देत नाही. भारतीय उपखंडाला विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेनं जराजर्जर केलं. आपले कायदे, योजना यांनी आज तुलनेनं फरक पडला असला तरी त्यातून आपली पूर्ण सुटका अजून झालेली नाही. जोवर लग्न करताना माणसं जातीतच स्थळ शोधतात तोवर जात गेली असं म्हणता येणार नाही.
माणसांना जखडून टाकणाऱ्या जातींच्या या उतरंडीत अगदी तळाला असलेल्या, एकेकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या मातंग समाजात अण्णा भाऊ जन्माला आले. त्यांच्या जन्माच्या जवळपास पाऊण शतक आधी महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत शिकलेली मुक्ता साळवे मातंग समाजातली. मुक्ताचा ‘ज्ञानोदय’मासिकामध्ये १ मार्च १८५५ ला "मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध" या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात अस्पृश्यांना वेद, धर्मग्रंथ वाचायला मनाई करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना ती ठणकावते – “याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग!” या निबंधात मुक्तानं तत्कालीन अस्पृश्य मानल्या गेलेल्या समूहांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून त्यांना अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.
मुक्ताच्या आणि पुढं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेचे, लढ्याचे वारसदार अण्णा भाऊ आहेत. त्यांच्या जन्माच्या वेळी मुक्तानं वर्णन केलेली अवस्था फारशी बदललेली नव्हती. इंग्रजी राजवटीच्या काळात शहरात काही प्रमाणात उद्योगधंदे उभे राहत होते. त्यामुळे गावाकडं रोजगाराविना उपासमार होणारे आणि जातीचा जाच सोसणारे समुदाय मुंबईची वाट धरु लागले. अण्णा भाऊंचे वडील आधीच मुंबईला आले होते. त्यांच्या मागोमाग अण्णा भाऊंसह त्यांचं सर्व कुटुंब मुंबईला आलं. कसं? तर चालत. प्रवासासाठी पैसे नाहीत. म्हणून मजल दरमजल करत, मध्ये लागलेल्या शहरांत काही काम करुन अन्न मिळवत ते मुंबई नगरीत पोहोचले.
या मुंबई नगरीत ते मजूर वस्तीत राहतात. वाढतात. तिथल्या कामगार लढ्यांत सहभागी होतात. शोषणमुक्तीच्या लढ्याचं शास्त्र सांगणाऱ्या मार्क्सवादाची दीक्षा त्यांना या कामगार लढ्यांत मिळते. या नवविचाराच्या सहाय्यानं शोषितांच्या दुःखाची गाणी, कथा, कादंबऱ्या, पोवाडे ते लिहितात. लोकनाट्यांतून त्यांच्या वेदनेला सादर करतात. भाषावार प्रांत रचना होताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभं राहतं. त्या आंदोलनात शाहीर अमरशेख, गवाणकर यांच्यासह अण्णा भाऊ आपल्या शाहिरी कलापथकाद्वारे उभा महाराष्ट्र जागवतात. ‘आनंद भुवन तू भूवरी भूषण भारतवर्षा’ असं महाराष्ट्राचं गौरव गान गातात.
सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावात १ ऑगस्ट १९२० रोजी जन्माला आलेले प्रतिभावान साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ता असलेले अण्णा भाऊ साठे मुंबई या त्यांच्या कर्मभूमीत १८ जुलै १९६९ ला वयाच्या ४९ व्या वर्षी कारकीर्दीच्या ऐन उमेदीत कायमचा विसावा घेतात.
...........

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, दिवसाही पुरेसा उजेड नसलेल्या झोपडीत, रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात अण्णा भाऊ साठेंनी आपलं बहुतेक साहित्य लिहिलं. ते प्रचंड आहे. वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या ७ कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. त्यांनी लघुकथा लिहिल्या. त्यांचे २२ कथासंग्रह आहेत. लोकनाट्यासाठी लिहिलेले वग, नाटिका यांची १६ पुस्तकं आहेत. त्यांनी केलेल्या रशियाच्या प्रवासाचं वर्णन करणारं एक पुस्तक आहे. याशिवाय त्यांची गीतं, छक्कड, लावणी, पोवाडे हे पद्यलेखन बरेच आहे.
त्यातल्या काही कृतींची नावं पाहू. अकलेची गोष्ट, अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरची भुतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकिरा,फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, शेटजींचे इलेक्शन, संघर्ष, सुगंधा, सुलतान. ...अशी ही यादीच दमछाक करणारी आहे. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या अधाश्यासारख्या वाचल्या जात. त्यांची शैली, निसर्गवर्णनं, व्यक्तिचित्रणं, कथानकांतले वळसे वाचकाला खिळवून ठेवतात.
त्यांच्या काही कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. ‘आवडी’ कादंबरीवर ‘टिळा लावते मी रक्ताचा’, ‘माकडीचा माळ’ वर ‘डोंगरची मैना’, ‘चिखलातील कमळ’ वर ‘मुरली मल्हारी रायाची’, ‘अलगूज’ कादंबरीवर ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’, तर वैजयंता, वारणेचा वाघ, फकिरा या कादंबऱ्यांवर त्याच नावाने सिनेमे निघाले. वैजयंता सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
अण्णा भाऊंच्या साहित्यात काय आहे आणि त्याचे मोल काय हे समजून घेण्यासाठी त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहू. त्यात खांडेकर म्हणतात, "समाजाच्या तळाच्या थरातील माणसं, घटना आणि जीवन हे सारं अण्णा भाऊंनी अनुभवलं आहे, पचविलं आहे. माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आरामखुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात. तसं अण्णा भाऊंचं नाही. या थरातच त्यांचा जन्म झाला. ...टीपकागद जसा झटकन ओली अक्षरं टिपतो, त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातली दलितांच्या आयुष्यातली आसवं अण्णा भाऊंच्या कलावंत मनाने टिपून घेतली आहेत. नुसती आसवंच नाहीत तर त्यांच्या आकांक्षा. त्यांचे राग-लोभ सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे. या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत."
अनेक नामवंत लेखक-कलावंत अण्णा भाऊंची दखल घेत पुढं जातात. पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा ‘तीन पैश्यांचा तमाशा’ हे मुक्तनाट्य अण्णा भाऊंना अर्पण केलं आहे. अण्णा भाऊंचे ‘लाल बावटा कलापथका’तले सोबती शाहीर अमरशेख म्हणतात – ‘शाहीर अण्णा भाऊंनी तमाशाचा वग लिहावा. आम्ही तो महाराष्ट्र जनतेपुढं ठेवावा आणि महाराष्ट्रीय जनतेनं, आबालवृद्धानं, धुंद मनानं त्याला डोक्यावर घेऊन नाचावं, हा मुळी अलीकडील काळात महाराष्ट्रीय कलेच्या क्षेत्रात पायंडाच पडून गेला आहे.’
‘आई’ या जगप्रसिद्ध कांदबरीचे लेखक मॅक्झिम गॉर्की. ते रशियातले. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सदा कऱ्हाडे अण्णा भाऊंवर गॉर्कीचा प्रभाव असल्याचं नोंदवतात. मात्र त्यांनी त्याचं अनुकरण केलं नाही, असाही निर्वाळा देतात. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ ला ऐतिहासिक कादंबरी संबोधून ते इतिहासाचं साधन मानतात.
अण्णा भाऊंच्या साहित्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा याआधी बरीच झाली आहे. पुढेही होत राहील.
..........

अण्णा भाऊ साठे यांचा साहित्य विचार

‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ हा आपल्याकडे वादाचा विषय राहिलेला आहे. त्याचे अनेक पदर आहेत. हे किंवा ते अशा दोनच पर्यायांत विचार करता कामा नये, असंही म्हटलं जातं. या वादाची चिकित्सा हा आताचा विषय नाही. अण्णा भाऊ साठे यांना यात कुठं बसवायचं? त्यांचा साहित्यविषयक विचार काय आहे? हे आपण पाहणार आहोत.
‘कलेसाठी कला’ या बाजूचे ते नव्हते, एवढं नक्की म्हणता येईल. याचा अर्थ त्यांचं साहित्य प्रचारकी होतं का?
‘हो’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही उत्तरं द्यावी लागतील. त्यांच्या मुक्तनाट्यांतले वग, पोवाडे हे प्रचारकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांची शाहिरी प्रचार करते. पण त्यांच्या कथा, कादंबऱ्या थेट प्रचारकी नाहीत. त्या मुळात कलात्मक रचना आहेत. या कलात्मकतेतून प्रतीत होणारा आशय हा समाजातल्या तळच्या, उपेक्षित विभागांच्या, स्त्रियांच्या वेदनेचं जळजळीत अंजन आपल्या डोळ्यांत घालतो. हे अंजन या पीडित-शोषित विभागांबद्दल आपल्या मनात करुणा जागी करतं. त्यांना त्यांच्या या अवस्थेतून मुक्त करण्याची जाणीव आणि प्रेरणा देतं. कलेनं अशी प्रेरणा देऊ नये, त्यामुळे त्यातलं सौंदर्य बाधित होतं अशी काही अट नाही. अण्णा भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे जे प्रचारकी पोवाडे, लावण्या त्यांनी लिहिल्या तेही कलेचे अव्वल नमुने आहेत.
उदाहरणादाखल 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड घ्या. मुंबईला येताना आपल्या प्रियेला निरोप देतानाचं कासावीस होणं. तिच्या कोमेजलेल्या कळीचं वर्णन, तिची समजूत काढतानाचे वायदे हे ज्या शब्दांत, प्रतिमांत अण्णा भाऊंनी गुंफलं आहे, त्याला तोड नाही. ती अत्युच्च विराणी आहे. पण ती स्त्री-पुरुष नात्यापुरती मर्यादित नाही.
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी म्हटल्याप्रमाणं “हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे. अण्णा भाऊंच्या छकडीतली मैना नितांत सुंदर आहे. तसाच हा बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग देखील सुंदर आहे. हा भाग आपल्याला मिळाला नाही. इतर महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली आहे असं अण्णा भाऊ सुचवतात. दोन जिवांची ताटातूट झाल्यावर काय होतं याचं समर्पक वर्णन या छकडीमध्ये आपल्याला दिसतं."
एका आत्मनिष्ठ नात्यातला भाव समग्रतेला भिडतो म्हणूनच आजही ही छक्कड ऐकल्यावर आपल्याला घायाळ व्हायला होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या प्रचाराचं गीत एवढ्यावर तिची बोळवण आपण करणार की उत्तम काव्यगुण असलेली श्रेष्ठ कलाकृती म्हणून तिचा सन्मान करणार?...याचा निर्णय ज्यानं त्यानं करावा.
केवळ प्रतिभेनं काम भागत नाही. उत्तम कलाकृती निर्माण होण्यासाठी प्रतिभेला कोणते आधार हवे असतात, याबद्दल खुद्द अण्णा भाऊ एके ठिकाणी म्हणतात – ‘प्रतिभेला सत्याचं, जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती हे शब्द निरर्थक आहेत. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. कल्पकता निर्बल होते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेला जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही.’
कलावंतानं भूमिका घेऊ नये, त्यामुळे कलेच्या आविष्कारावर परिणाम होतो, असा एक विचार प्रचारला जातो. अण्णा भाऊंचं उदाहरण याला पुष्टी देत नाही. ते प्रतिभावान होतेच. पण त्यांच्या प्रतिभेला हे भूमिकेचं कोंदण असल्यानं ते श्रेष्ठ कलावंत झाले.
..........

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायिका

जाती आणि त्यातलं स्त्रियांचं स्थान सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मडक्यांच्या उतरंडीचं रुपक योजतात. कथित उच्चतेच्या मान्यतेनुसार जातींची मडकी एकावर एक रचलेली आहेत. सगळ्यात वर सर्वोच्च मानलेल्या जातीचं. मग त्याखाली वरच्याहून दुय्यम पण खालच्यापेक्षा वरचं मानलेल्या जातीचं. अशी ही उतरंड आहे. या उतरंडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक जातीच्या मडक्यात दोन थर आहेत. वरचा थर पुरुषाचा तर खालचा स्त्रीचा. म्हणजेच प्रत्येक जातीत स्त्री पुरुषाच्या तुलनेत दुय्यम मानली गेली आहे. कथित सर्वोच्च जातीतली स्त्री त्या जातीतल्या पुरुषाहून कमी लेखली जाते आणि कथित तळच्या जातीतली स्त्रीही त्या जातीतल्या पुरुषापेक्षा कमतर मानली जाते. या कथित तळच्या जातीतल्या स्त्रीला तिहेरी जाच सोसावा लागतो. ती जातीनं तळची असल्यानं त्या जातीचे भोग तिच्या वाट्याला येतातच. शिवाय स्त्री म्हणून आपल्या जातीतल्या पुरुषांचं वर्चस्व, त्रास सहन करावा लागतो. तळच्या जातीतली आणि स्त्री असल्यानं ती साधनसंपत्तीपासून वंचित असते. तिला आपल्या मुलांच्या, कुटुंबाच्या पोषणासाठी मिळेल ती मजुरी, रोजगार करावा लागतो. ही मजुरी देणाऱ्या मालकांच्या शोषणाचा त्यांना सामना करावा लागतो.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायिका मुख्यतः या तळच्या विभागातल्या आहेत. त्या तिहेरी शोषणाचा मुकाबला करतात. डगमगत नाहीत. त्यांची जीवनप्रेरणा त्यांना चिवटपणे झुंजायला लावते. अण्णा भाऊंच्या साहित्याच्या बहुतेक अभ्यासकांनी त्यातल्या स्त्री चित्रणाविषयी हे निरीक्षण नोंदवलं आहे. तारा रेड्डी, प्रा. इंदिरा आठवले अण्णा भाऊंच्या साहित्यातल्या स्त्रियांना लढाऊ, आत्मविश्वासानं बहरलेल्या नायिका मानतात. आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड्या या गावगुंडाला शेवटी फुला ही नायिका त्याच्या रानातल्या घरात कोंडून, जाळून मारते. बापानं आजारी, अयोग्य नवऱ्याशी लग्न केलं म्हणून त्याला सोडून जाणारी बरबाद्या कंजाऱ्याची मुलगी आणि तिच्या भल्यासाठी समाजाचं वैर ओढवून घेणारा बरबाद्या, यातून चुकीचे संबंध फेटाळणाऱ्या नायिकेचं दर्शन घडतं.
अण्णा भाऊंच्या विचार व साहित्याचे अभ्यासक महादेव खुडे यांच्या मते अण्णा भाऊंच्या नायिकेचं खरं विस्तृत जीवन त्यांच्या कादंबऱ्यांतून कळतं. त्यांच्या काही कादंबऱ्या तर नायिकाप्रधान आहेत. चित्रा, वैजयंता, चंदन, चिखलातील कमळ, फुलपाखरु, रत्ना, आवडी, टिळा लाविते मी रक्ताचा या कादंबऱ्यांमधल्या नायिका स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या प्रातिनिधिक नायिका आहेत. तर अलगूज, राणगंगा, संघर्ष, अहंकार या प्रेमकथांमधल्या नायिका उदात्त प्रीतीचं दर्शन घडवतात. माकडीचा माळ मधली दुर्गा, चंदन, आवडी, चित्रा, वैजयंता, रत्ना, माझी मैनामधली मैना, निखारातली फुला यांनाच खऱ्या अर्थानं अण्णा भाऊंच्या प्रातिनिधिक नायिका मानावं लागेल असं खुडे म्हणतात. त्याचं कारण नोंदवताना ते म्हणतात – या नायिकांचं वर्णन करताना अण्णा भाऊंनी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीनं सन्मानाचा, आदराचा दर्जा दिला आहे. अण्णा भाऊंच्या नायिका नाजूक कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. त्या रणरागिणी आहेत. खांद्यावर बंदूक घेऊन पुरुषांच्या बरोबरीनं ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी मंगला इथं आढळते. पैलवान भावानं केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी घरदार सोडून रामोशी समाजातल्या प्रियकराची साथ करणारी चौगुल्याची आवडी इथं सापडते. दुर्दैवी मजूर स्त्रीचं जीवन जगताना झोपडपट्टी दादाबरोबर लढणारी चंदन आढळते. भटक्या जमातीतली वासनेनं बरबटलेल्या रानरेड्याशी झुंजणारी दुर्गा आपल्याला भेटते.
अशा प्रकारे कष्टकरी-शोषित स्त्रियांना आपल्या साहित्यातल्या नायिका बनवून त्यांना संघर्षाच्या मैदानात उतरवणं हे अण्णा भाऊ साठे यांचं अनन्य वैशिष्ट्य आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
Like
Comment
Share

Tuesday, July 4, 2023

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

काल वर्षावासास प्रारंभ झाला. आमच्या बुद्धविहारात त्यानिमित्ताने कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर मी राहत होतो त्या गल्लीतल्या एक महिला येऊन मला भेटल्या.

“तुम्ही येणार हे कळल्याने भेटायला आले. तुम्हाला काही सांगायचे आहे. हे बरोबर नाही. यावर काही तरी केलं पाहिजे.” त्या म्हणाल्या.
“हो. बोला ना. काय झालं?” मी म्हणालो.
त्या म्हणाल्या, “विश्व हिंदू परिषदेने आम्हाला वस्त्यांत ट्युशन्स घ्यायला सांगितले आहे. त्याचे आम्हाला महिन्याला ३ हजार रुपये देणार आहेत. या ट्युशन्सचा महत्वाचा भाग हा हिंदू प्रार्थना आणि त्यांचा प्रचार आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत, असे ते सांगतात. याबद्दल आपण काहीतरी करायला पाहिजे.”
माझी पहिली प्रतिक्रिया तातडीने अशी आली – “त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तुम्ही त्यात भाग घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवा.”
पुढे त्या म्हणाल्या – “मी हे करणार नाही. पण आपल्यातल्या (म्हणजे बौद्धांतल्या) अनेक बाया काहीतरी रोजगार मिळणार म्हणून त्यांच्या केंद्रावर जातात. तिथे ते लोक प्रशिक्षण देतात. त्यात या प्रार्थना कशा म्हणायच्या, काय शिकवायचे हे सांगतात. आमच्यातल्या काहींनी आम्ही आमच्या समाजात (बौद्ध समाजात) या हिंदू प्रार्थना घेणार नाही, फक्त शाळेचा अभ्यास शिकवू, असे सांगितले. त्यावर मग त्यांनी बौद्ध वंदनेचाही त्यात समावेश करा अशी सूट दिली. पण पैसे हवेत तर हे करावेच लागेल, असे बजावले.”
काहींनी नकार दिला. पण गरजवंत म्हणून अनेक बौद्ध महिला हे करत आहेत, याचा अंदाज या महिलेच्या बोलण्यातून आला.
या आमच्या गल्लीतल्या महिलेला आम्ही तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात काही करायला हवे, अशी अपेक्षा होती. मी त्यांना समजावले – “तुम्ही हे लक्षात आणून दिलेत हे चांगले झाले. पण त्यांना त्यांचा हा उपक्रम करण्याचा अधिकार आहे. आपण त्यात सहभागी होऊ नये. त्याचबरोबर आपण आपले पर्यायी वर्ग सुरु करायला हवे. त्याबद्दल काय करता येईल ते पाहू.”
............
मला याचे आश्चर्य वाटले नाही. त्यातल्या त्यात बरे वाटले ते अशा महिला जागृत आहेत, या बाबींची चीड त्यांना येते, यांच्या विरोधात काही करायला हवे, याची तातडी त्यांना वाटते याचे. कारण गेली कित्येक वर्षे आमच्या परिसरात ही कडवी हिंदुत्ववादी मंडळी जाळे विणत आहेत. बौद्धांचे बालेकिल्ले म्हणवणाऱ्या वस्त्यांतही त्यांनी शिरकाव केला आहे. आमच्या काही जुन्या पँथर्सची मुले आंबेडकर जयंती जोरदार करतात; त्याचवेळी बजरंग दलाच्या हनुमान जयंतीच्या फ्लेक्सवरही पदाधिकारी म्हणून त्यांच्या छब्या दिसतात.
पँथरच्या भराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळ आमच्या या बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आमच्या घरांतले अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य असे. त्याची एक झिंग होती. २२ प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते.
आता डीजे लावून आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका इथली तरुणाई संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीतांनी सगळा माहोल उत्साहाने ओसंडत असतो. ..आणि मग काही काळाने आमच्या विहारासमोर साई भंडारा होतो. शेजारी नवरात्र चालतो. जवळपास गणपती बसतात. हे करणारे तरुण एकजात बौद्ध असतात.
मग एकेकाळी पँथरमधून आलेले आमचे नगरसेवक, नेते काय करतात? त्याला शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावतात. गणपतीच्या मिरवणुकांचे स्वागत करतात. खाजगीत बोलताना या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. नाईलाजाने हे करावे लागते. निवडून यायचे तर लोक आपल्या बाजूने राहायला हवेत, अशी कबुली देतात.
या तरुणांना आपण बौद्ध असतानाही हे करतो याचे काहीही वैषम्य वाटत नाही. (आधीच्या पिढीत चोरुन लपून हिंदू आचरण करणाऱ्यांना ते वाटे.) आपण बौद्ध का झालो, हिंदू धर्म का सोडला, याची नीटशी समज त्यांच्यात दिसत नाही. त्यांच्या बाबतीत बौद्ध आणि हिंदू यातली सीमारेषा धूसर झालेली आहे. आपण हिंदूंमधलीच एक जात आहोत अशी काहीतरी त्यांची मानसिकता असावी. मुसलमानांविषयीचा विद्वेष पुरेपूर आहे. महिलांच्या बैठकांतही सलोख्याचा मुद्दा समजावताना ‘सर तुम्हाला माहीत नाही ती मुसलमानं कशी असतात ती..!’ असे त्यातली एखादी आदर राखून दुरुस्ती करते.
ही प्रक्रिया विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचा थेट शिरकाव होण्याआधीपासून सुरु झालेली आहे. या कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटनांना या प्रक्रियेने मदत झाली. मुसलमान द्वेष हा त्याचा पाया असतो. बौद्ध-हिंदू-जैन-शिख सगळे आपण एक आहोत, इथले मूळ भारतीय आहोत. मुसलमान परकीय, आक्रमक आहेत. त्यांचा पाकिस्तान त्यांना दिला आहे. तरीही ते इथे वाटेकरी आहेत..वगैरे वगैरे पढवले जाते. शहरातील बौद्धांना अस्पृश्यता, जातीय अत्याचार यांचा ग्रामीण भागातल्या एवढा सामना करावा लागत नाही. त्यामुळे ती वेदना तीव्र नसते. तरुणाईला राष्ट्रवादी आवाहने, जोश शमवणाऱ्या मिरवणुका, त्यातल्या घोषणा, त्यांच्यातल्या पुढारपण करणाऱ्यांना दरमहा विशिष्ट रकमेची पाकिटे, व्यसन, पार्ट्या आणि हत्यारे हा या कट्टरपंथी हिंदुत्ववादी टोळ्यांचा नित्याचा कार्यक्रम असतो.
याबद्दल खटकत असणारे काही तरुणही भेटतात. पण त्यांची ताकद अगदी मर्यादित असते. कधी एकदा शिकून, नोकरी मिळवून या वस्तीच्या बाहेर पडतो, अशी त्यांची मनोवस्था असते.
.........
जीवन बदलण्याची आंबेडकरी प्रेरणा आणि त्याला आरक्षण, शिष्यवृत्त्या यांच्या साथीने वस्त्यांतून बाहेर पडलेले, शिक्षित होऊन, चांगल्या नोकऱ्यांत जाऊन मध्यमवर्गीय झालेले आम्ही लोक आता वस्तीशी नियमित संबंध ठेवत नाही. कधीमधी कार्यक्रमाला जातो. पण विहारात किंवा तत्सम जागेत. ती जयंती असते, वर्षावास असतो किंवा पँथरचा सुवर्णमहोत्सव किंवा विद्रोही वा आंबेडकरी साहित्य-संस्कृती संमेलन. वक्ते व श्रोते बहुतेक आम्ही बाहेरचेच असतो. अजूनही ही जाणीव असलेले वस्तीत राहणारे काही लोक येतात. पण ते सुटे सुटे. वस्तीतून समुदाय म्हणून लोक या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी नसतात. ज्या विहारात किंवा सभागृहात आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्या आसपासच्या गल्ल्यांत जाऊन दलित पँथर काय होते, राजा ढाले-नामदेव ढसाळ कोण होते, दलित किंवा आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य म्हणजे काय, मुळात साहित्य म्हणजे काय हे नव्या पिढीला विचारायचे प्रयोग आम्ही केले तर खजिल करणारी उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
आम्ही मध्यमवर्गीय बौद्ध आणि आमचे प्रगतीशील चळवळीतले सवर्ण मित्र दलित अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करतो. त्यालाही आम्ही सुटे सुटे असतो. आम्ही जिथून आलो, त्या वस्तीतले कोणी आमच्या सोबत नसतात. आम्ही त्यांना आणू शकत नाही. कारण आमचा त्यांच्याशी अजिबात किंवा फारसा संबंध नसतो.
बौद्ध मध्यमवर्गाचे हे आपल्या वस्तीतल्या समुदायापासून तुटणे, त्याला आपल्या प्रबोधित जाणिवांपासून अलग ठेवणे, तिथल्या मुला-महिलांच्या विकासाशी संबंध नसणे, त्यांना तिथल्या भाईंच्या आणि जातीच्या मतपेटीआधारे सत्तेशी सौदा करणाऱ्या बौद्ध राजकारण्यांच्या स्वाधीन करणे याचे काय करायचे?
सुरुवातीला नोंदविलेल्या ट्युशन्सच्या निमित्ताने हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या उपक्रमाबद्दल चीड येणाऱ्या महिलेला एकाकी ठेवायला आम्ही त्याच वस्तीतून आलेले बौद्ध मध्यमवर्गीय जबाबदार नाही का?
आमच्यातले काही जण केवळ फेसबुक-व्हॉट्सअपवर आवाज उठवत असतात. काही जण प्रासंगिक आंदोलनात सहभागी होतात. काही जण अजूनही वस्तीतल्या विहारांचे, संस्थांचे ट्रस्टी आहेत, ते कार्यक्रमांपुरते तिथे जातात. काहींची पूर्वीची वस्तीतली घरे भाड्याने दिलेली आहेत किंवा आता पुनर्विकासात तिथे इमारती होऊन मोठी प्रॉपर्टी होणार आहे म्हणून अपरिहार्यपणे संबंध ठेवतात. काहींचे जवळचे नातेवाईक अजूनही तिथेच असतात. नाईलाजाने काही नात्यातल्या कार्यक्रमांवेळी, अडचणींवेळी त्यांना भेटावे लागते. मर्तिकावेळी तर टाळणे कठीण जाते. काही जण एनजीओचे पगारी कार्यकर्ते असतात म्हणून तिथे प्रोजेक्ट राबवत असतात.
.......
आज बौद्धांतल्या मध्यमवर्गीयांनी ठरवले तर स्वतःच्या संसाधनांनी आपण जिथून आलो त्या वस्त्यांत विविध विकासाचे, जागृतीचे, लोकांना संघटित करण्याचे उपक्रम ते करु शकतात. ते आठवड्याला वस्तीत जाऊन मुलांचे वर्ग घेऊ शकतात. ज्यात शैक्षणिक आणि सामाजिक-राजकीय विचारांचे प्रबोधन असेल. नोकरी-व्यवसायाचे मार्गदर्शन असेल. पुढे जाऊन त्यांच्या आर्थिक-भौतिक-सामाजिक प्रश्नांवर ते लढले तर उत्तमच.
विश्व हिंदू परिषदेच्या ट्युशन्स म्हणून कळलेल्या या उपक्रमाचा गूगल करुन शोध घेतला. त्याचे नाव आहे – संस्कार शाळा. मला आमच्या गल्लीतल्या महिलेने तिला मुलांना शिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून मिळालेले जे हिंदू प्रार्थना, मंत्र, घोष शिकवण्याचे कागद दिले (ते सोबत जोडले आहेत), त्यातही शीर्षकस्थानी ‘संस्कारशाला : आचार पद्धति एवं प्रमुख विषय’ असे लिहिलेले आहे. देशभर त्यांनी त्या सुरु केल्या आहेत. स्थानिक प्रेरित, गरजू महिला-पुरुषांना ३ हजार किंवा अशीच काही रक्कम दरमहा देऊन ते मिशन म्हणून हा उपक्रम चालवतात. साधने, पैसे नंतर येतात, त्याआधी विशिष्ट ध्येयाची बांधिलकी मानलेले लोक लागतात. ते त्यांच्याकडे उदंड आहेत.
बौद्ध मध्यमवर्गाला आपल्या उद्देशाला आकार देणारे असे ‘संस्कार वर्ग’ संघटित करणे, त्यासाठी पैसे उभे करणे कठीण आहे का?
बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ट असणाऱ्या संघटनांनी आपल्या कामात हा ध्येयवाद आणणे आणि त्यानुसार उपक्रम व विषय ठरवून आपले काम अधिक अर्थपूर्ण करणे कठीण नाही.
बाबासाहेबांच्या काळात ‘समता सैनिक दला’ने केवळ आपल्याच नव्हे, तर अन्य प्रगतीशील शक्तींसहितच्या व्यापक आंदोलनात सुव्यवस्था आणि व्यत्यय आणणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आज चैत्यभूमी, चवदार तळे, दीक्षाभूमी, भीमा कोरेगाव वा तत्सम ठिकाणी वा प्रसंगी मानवंदना देणे, काही व्यवस्था ठेवणे ही कामे समता सैनिक दल करत असते. ते महत्वाचे आहे. ते करावेच. पण त्यापलीकडे जाऊन बजरंग दली संघटनांना प्रत्युत्तर देणारे तरुणांचे गट संघटित करण्यात त्यांनी पुढाकार घेणे अशक्य नाही. काही ठिकाणी करुन पाहायला हवे.
बौद्ध मध्यमवर्ग अशारीतीने सक्रिय झाला तर वस्त्यांतून त्यांना ‘आपले लोक’ म्हणून जी मान्यता आजही मिळते, ती आणखी वाढेल. वस्तीतली तरुण मंडळी जोडली जातील. आपल्याला अपेक्षित उपक्रम संघटित करु लागतील.
मध्यमवर्गीय बौद्धांनी नव्या भानाने, नियमित सक्रिय होण्याने विश्व हिंदू परिषदेच्या संस्कार शाळेच्या विरोधात बोलणाऱ्या महिलेला ताकद मिळेल. ज्या गरजवंत म्हणून पैश्यासाठी नाईलाजाने हे वर्ग चालवतात अशा बौद्ध महिलांना तिथून बाहेर पडण्याची उभारी येईल.
बौद्ध मध्यमवर्ग हलत नाही तोवर माझे उत्तर काही एका अपेक्षेने आलेल्या त्या महिलेला एवढेच असेल का?– “त्यांना असे वर्ग घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही त्यात जाऊ नका.”
........
मी किंवा आमचे सहकारी एवढेच म्हणून थांबणार नाही. थांबलो नाही. वैयक्तिक आणि आमच्या संघटनेच्या मर्यादित आवाक्यात या दिशेने आम्ही काही ना काही हालचाल करत असतो. ती अधिक नेटकी करुन नेटाने चालू ठेवूच.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com | ४ जून २०२३

(जीवनमार्ग, ९ ते १५ जुलै २०२३)





Monday, July 3, 2023

चाणक्य नीती की सांविधानिक नीती..?

आज चाणक्याचे संविधान नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीयांच्या प्रतिनिधींनी घडवलेले संविधान आहे. चाणक्य नीती नव्हे; तर सांविधानिक नीती आमच्या राजकीय व्यवहाराचा पाया आहे. 

आपल्याला पटणाऱ्या भूमिकांचे वहन करणाऱ्या पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना मत देण्यासाठी निवडणुका आहेत. तुम्ही कोणत्याही पक्षाला मत द्या. त्यातून बहुमत मिळेल ते सत्तेत येतील. सत्तेत आल्यावर जे कायदे ते करतील तेही जनता आणि विरोधी राजकीय गट यांना अधिकाधिक विश्वासात घेऊन करतील. न पटणाऱ्या किंवा सुधारणा हव्या असलेल्या कायद्यांबद्दल सनदशीर मार्गाने आपण विरोध करु शकतो. लढू शकतो. ...याला 'संविधानवाद' म्हणतात.

आता राजेशाही नाही. राजांच्या आपसातील स्पर्धा, सत्तेसाठीची युद्धे, चाणक्य नीती यांची कक्षा राजेशाही होती. आता लोकशाही आहे. 'आम्ही भारताचे लोक' भारताचे कर्ते, नियंते आहोत.

चाणक्य नीतीचा गौरव म्हणजे सांविधानिक नीतीला आणि संविधानवादाला तिलांजली देणे. 'आम्ही भारताच्या लोकांनी' स्वतःहून सत्तेचा अपहार करणाऱ्यांना शरण जाणे होय.

यातून केवळ अराजक माजेल. अराजकाची सगळ्यात अधिक झळ सामान्य, कष्टकरी, पीडित यांना बसते, हा आपला अनुभव आहेच.

एका दुसऱ्या शक्यतेसाठीही आजची स्थिती पक्व नाही.

या अराजकातून जनता निराभास होऊन क्रांती करेल हे दिवास्वप्न आहे. क्रांती आपोआप होत नाही.

क्रांतीसाठी असंतोषाचे वातावरण पूरक ठरते. अराजक म्हणजे असंतोष नव्हे. त्यावर स्वार होऊन क्रांती होत नाही. कष्टकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या सत्तेसाठी जी क्रांती हवी त्यासाठी परिस्थितीचा उलगडा करून पुढील दिशा दाखवणारा तत्त्व-विचार, हा विचार स्वीकारून तिचे भौतिक शक्तीत रूपांतर करणारी जनता आणि त्या आधी या सगळ्याचे संचालन करणारी बांधेसूद राजकीय संघटना या पूर्वअटी आहेत.

आज हे नाही. त्यामुळे अराजकाचा फायदा लुटालूट करणारे टगेच प्रामुख्याने घेतील. लोकशाही आवाज पूर्ण दाबून टाकून फॅसिझम आपल्या कराल जबड्यात संसदीय लोकशाहीचा चुराडा करेल.

...म्हणून जे संविधान आज आहे, ते टिकवणे हेच आजचे क्रांतिकार्य आहे.

_________

सुरेश सावंत, sawant.suresh @gmail.com