Thursday, October 3, 2019

गैरप्रतिमेच्या कैदेतून सुटका

पैगंबरांनी त्यांचे एक सहकारी अल्-मुआद यांची एका प्रांताचे (येमेनचे) गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. त्यांना लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर न्यायिक अधिकारही देण्यात आले होते. त्यांनी या पदाचा अधिभार सांभाळण्यापूर्वी पैगंबर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत खालीलप्रमाणे प्रश्नोत्तरे झालीः

प्रश्नः तुझ्यासमोर येणाऱ्या प्रकरणांचा न्याय-निवाडा तू कसा करशील?

उत्तरः पवित्र कुराणातील आदेशानुसार.

प्रश्नः त्यात काही आधार सापडला नाही तर?

उत्तरः अल्लाहच्या प्रेषिताच्या जीवनातील घटना व त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाच्या (सुन्ना किंवा पैगंबरीय परंपरेच्या) आधारे.

प्रश्नः आणि त्यातही काही आधार सापडला नाही तर?

उत्तरः तर मग मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आधारे न्यायनिवाडा करेन.

अल्-मुआदची उत्तरे ऐकून पैगंबरांनी समाधान व्यक्त केले व मुआदची नेमणूक पक्की केली.

इस्लामी न्यायशास्त्राच्या पुढील काही शतकांच्या विकास प्रक्रियेत पैगंबरांच्या जीवनातील ही घटना पायाभूत सूत्र किंवा तत्त्व म्हणून मान्यता पावली.

______

हा उतारा आहे अब्दुल कादर मुकादम यांच्या ‘इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात’ या अक्षर प्रकाशनाने काढलेल्या पुस्तकातला. तो जसाच्या तसा द्यावा इतके त्याचे महत्व आजच्या काळात मला वाटले. मला हे सूत्र अज्ञात होते. भोवताली जो मुस्लिम समाज दिसतो त्यातून तसेच त्याच्याविषयी जे लिहिले-बोलले जाते यामधून इस्लामविषयी काहीएक प्रतिमा मनात तयार होते. त्याला हे सूत्र धक्का देते. वर्तमान जेवढा व जसा आपल्याला कळतो त्या आधारे भूतकाळाविषयी अंदाज बांधण्यातून खूप गफलती होतात. धर्म ही एक प्रक्रिया आहे. तिचाही एक विकासक्रम असतो. सर्वच धर्मांना ते लागू आहे. इस्लाम याला अपवाद कसा असेल? पण तरीही आपल्या राजकीय-सांस्कृतिक धारणांचे साचे ते कबूल करायला सहसा तयार नसतात. मुसलमान, कुराण, पैगंबर या शब्दांच्या क्रमात कट्टर असा पुढचा शब्द बिगरमुस्लिमांच्या मनात येतोच येतो. कुराणात नसेल तर प्रेषिताच्या जीवनातील घटना व मार्गदर्शनानुसार, आणि तेथेही न आढळल्यास स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य इस्लाम देतो याचे खरेच मला आश्चर्य वाटले. असे करणारे धर्माच्या मूळ भूमिकेविरोधातले बंडखोर असतात असेच मी समजत होतो. खुद्द पैगंबरांनी स्वतंत्र विचारक्षमता हा मुआदच्या निवडीचा निकष लावावा (म्हणजे धर्माची ती मूळ असावी) हे मला अचंबित करणारे होते.

सांगोवांगी, स्वानुभव आणि जुजबी वाचन या आधारे इस्लाम व मुसलमानांविषयी मते बनविणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य बिगर मुस्लिमाला इस्लामविषयी किमान साक्षर व्हायला (तेही सुबोध मराठीत) मुकादमांचे हे पुस्तक खूप मदतनीस ठरते. प्रगतीशील विचारांचे ज्येष्ठ लेखक, वक्ते, कार्यकर्ते म्हणून अब्दुल कादर मुकादम हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांचे लेख-भाषणे यांतून इस्लामविषयीचा काही परिचय सुटा सुटा होत असतो. तथापि पुस्तकामुळे समग्र व संकलितपणे ही ओळख मिळते. या ओळखीतून आपल्याला ज्ञात असलेल्या बाबींच्या चौकटी विस्तारतात, तर कितीतरी अज्ञात बाबी समोर आल्याने आपल्या समजाचे साचे मोडून पडतात. उदाहरणादाखल त्यातल्या काहींची नोंद खाली करत आहे.

क्रमात शोषकांनी आपल्या हितरक्षणार्थ धर्मांचा वापर केला, त्यांना वळवले, तरी मुळात धर्म त्यावेळच्या समाजाची धारणा करण्यासाठीच तयार झाले असे आढळते. अरबस्थानातील मक्का-मदिना परिसरातील विषम आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत इस्लामच्या उदय आणि विकासाचे रहस्य दडलेले आहे, असे मुकादम म्हणतात. शेती नसलेला, वाळवंटात टोळ्यांनी राहणारा हा समाज श्रीमंत व्यापारी आणि त्यांचा सेवेकरी गरीब यांत विभागलेला होता. प्रचंड आर्थिक शोषण आणि टोळ्यांच्या आपापल्या देवतांच्या रुपात प्रकट होणाऱ्या संकुचित अस्मिता यांनी तो पुरता खिळखिळा झालेला होता. अशावेळी पैगंबरांनी त्यांना समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित एकेश्वरवादाची दीक्षा देऊन एकसंध करण्याचा प्रयत्न केला. ही मूल्ये केवळ प्रबोधनाचा भाग नव्हती. तर ती साकारण्यासाठीचा नवा अर्थविचार दिला.

इस्लामने संपत्तीचा संचय करणे निषिद्ध मानले आहे. त्याने सांगितलेल्या दानधर्म आणि जकात या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फरक इतकाच की दान स्वैच्छिक करायचे आहे, तर जकात हा एक प्रकारचा कर असतो. दान उपकार भावनेने नव्हे; तर कर्तव्यभावनेने करायचे असते. जकातीचा पैसा विकास कार्यासाठी खर्च करायचा असतो. हा पैसा कसा व कोणासाठी वापरायचा याचे वर्गीकरण आणि नियमही निश्चित करण्यात आले आहेत. कुराणातील नवव्या अध्यायातील सहाव्या आयतीत पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे- गरीब व गरजू यांच्यासाठी, गुलामांना मुक्त करण्यासाठी, ज्यांच्या मनात सलोख्याची भावना निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी, वाटसरुंसाठी आणि अल्लाच्या कार्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांसाठी. सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवांचा नव्हे तर इतर सर्व सजीवांचाही तितकाच अधिकार आहे ही कुराणाची भूमिका आहे.

मक्केतील व्यापाऱ्यांचा पैगंबरांच्या एकेश्वरवादी धर्माला फारसा विरोध नव्हता. त्यांचा विरोध होता तो पैगंबरांच्या नव्या समाज निर्मितीला व त्याला आधारभूत असलेल्या समता व न्यायाच्या मूल्यांना. कारण ही समाजव्यवस्था त्यांच्या आर्थिक हितसंबंधांना बाधा आणणारी होती. हा विरोध दिवसागणिक आक्रमक व हिंसक होत गेला. तो पैगंबरांच्या प्राणावर बेतणार हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी मदिनेस स्थलांतर केले.

व्याज देणे-घेणे इस्लामने निषिद्ध मानले आहे. पण त्याच्या अन्वयार्थासंबंधी बरेच मतभेद असल्याचे लेखक नोंदवतात. मदिनेत अरबांबरोबर ज्यू आणि ख्रिश्चन राहत होते आणि ज्यूंच्या परंपरेप्रमाणे ते सावकारीचा व्यवसाय करत होते. खाजगी सावकाराप्रमाणे हे ज्यू वारेमाप दराने व्याज आकारत असत. चक्रवाढ व्याज आणि दामदुप्पट दराने कर्ज देण्याची पद्धत यामुळे गरिबांच्या शोषणाची तीव्रता अनेक पटीने वाढली होती. त्यामुळे चक्रवाढ व्याज, दामदुप्पट दर तसेच व्यापार व्यवसायात वारेमाप नफा मिळविणे हा सुद्धा शोषणाचाच प्रकार आहे, म्हणून असा व्यापारी व्यवहार सुद्धा निषिद्धच मानला पाहिजे, असे काहींचे म्हणणे आहे. आज अनेक मुस्लिम राष्ट्रांत फक्त व्याजाला निषिद्ध मानले जाते. पण नफ्याच्या मर्यादेचा विचार न करता तो मात्र रास्त मानला जातो.

इस्लामच्या या भूमिकेतूनच इस्लामी बँकिंगची संकल्पना पुढे आली. लेखक म्हणतात, यामध्ये पारंपरिक व्याज पद्धत नाही. मात्र अवाजवी नफा ग्राह्य मानला जातो. हा विरोधाभास आहे. दुर्बल घटकांचे अनेक मार्गांनी शोषण त्यामुळे चालूच राहते. हे धोरण श्रीमंतांच्या पथ्यावर पडते. कारण त्यांना व्याजमुक्त कर्जाचा फायदा होतो. काही भाष्यकारांच्या मते बँका कर्जावर आकारित असलेले व्याज कुराणाने निषिद्ध मानलेले नाही. तर चक्रवाढ व्याज व दामदुप्पट दराने कर्ज देणे याला निषिद्ध मानले आहे.

पैगंबरांच्या गरिबांच्या शोषणमुक्तीसंबंधीच्या विचार व कार्यामुळे त्यांना सुरुवातीला मिळालेले सर्वच अनुयायी कष्टकरी, शोषित, वंचित वर्गातले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या रुपाने त्यांना त्यांचा मुक्तिदाता सापडला होता. पैगंबरांच्या आर्थिक विचारांचे महत्व अधोरेखित करताना लेखक त्यांचे मार्क्सशी नाते जोडतो. ते म्हणतात, मार्क्सचा उदय पैगंबरांनंतर सुमारे हजार वर्षांनी झाला असल्यामुळे डाव्या अर्थविचारांचा आद्य प्रवर्तक म्हणून मोहम्मद पैगंबर यांचे नाव घेणे उचित होईल.

‘ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जा’ हे पैगंबरांनी दिलेले ज्ञानवादी सूत्र. (त्या काळात अरबस्थानातून चीनला जाण्यासाठी अत्यंत खडतर प्रवास करावा लागत होता.) ज्ञानासाठी कितीही कष्ट पडले तरी ते करा, हा पैगंबरांचा आदेश व आदर्श मानून त्यांच्या अनुयायांनी ज्ञानोपासकांची एक लखलखित परंपरा निर्माण केली. गणितातील शून्याचा शोध भारतात लागला, तरी त्याचा वापर हे अरबांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. दशमान पद्धती बरोबरच त्यांनी बीजगणित आणि त्रिकोणमिती या क्षेत्रांतही भरीव कामगिरी केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही मुस्लिम संशोधकांनी व डॉक्टरांनी मोलाची कामगिरी केली आहे. बेबी कॉलरासारख्या गंभीर सांसर्गिक रोगावर त्यांनी मूलगामी संशोधन केले असल्याचे लेखक नमूद करतात.

काही विद्वान, संशोधकांची नोंद मुकादम करतात. त्यातील काही नमुन्यादाखल खालीलप्रमाणेः

इब्न खतीज हा प्रखर इस्लामी बुद्धिवादी वैद्यक तज्ज्ञ होता. धर्मशास्त्रात जे काही सांगितले असेल ते वास्तवाच्या निकषावर खरे उतरले पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. मातेच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात केला पाहिजे, असे त्याचे म्हणणे होते.

जबिर हैयात हा इस्लामी रसायन शास्त्राचा जनक. धातूंची भूशास्त्रीय निर्मिती प्रक्रिया व सल्फर मर्क्युरी सिद्धांत यांचा त्याने शोध लावला. त्याच्यामुळेच अलेंबिक अँटिमनी, अल्कली या रसायनशास्त्रातील संज्ञा प्रचलित झाल्या.

मुकादम म्हणतात, मध्ययुगातील राजकीय इतिहासापेक्षा सांस्कृतिक इतिहास अधिक समृद्ध आहे. या इतिहासात मानवी समाजातील हिंसक प्रवृत्तींवर मात करून त्याला सुसंस्कृत करण्याचे सामर्थ्य होते. सम्राट शहाजानचा जेष्ठ पुत्र दारा शिकोह याने ‘मज्म उल बहारेन’ म्हणजेच हिंदू आणि मुस्लीम या दोन सांस्कृतिक सागरांचा संगम हा ग्रंथ लिहिला. गीतेचे पर्शियन भाषांतर केले. सूफी संतांच्या समता व मानवतावादी आध्यात्मिक तत्त्वज्ञानामुळे भारतातील विविध समाज आणि नव्याने आलेले मुसलमान यांच्यात परस्पर सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले होते. हिंदू आणि इस्लामी स्थापत्यशैलीच्या संमिश्रणातून नवी शैली हिंदू-इस्लाम (Indo-Islamic) या नावाने विकसित झाली. दारा शिकोहने याच संस्कृतीला गंगाजमनी संस्कृती असे म्हटले आहे. दाराचा भाऊ औरंगजेब हिंसक प्रवृत्तींचा प्रतीक होता. त्याच्यावर अनेक कादंबऱ्या, नाटके लिहिली गेली आहेत. पण दारा शिकोहवर मराठीत एकही पुस्तक नाही. लेखकाची ही खंत जळजळीत आहे.

ग्रीक भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार अनेक लेखक-अनुवादकांनी अरबी भाषेत अनुवादित केले. दरम्यान युरोपात मूळ ग्रंथ धूळ खात पडले. त्यातल्या कित्येकांचे अस्तित्व राहिले नाही. पुढे या अनुवादाच्या माध्यमातून हे ज्ञानभांडार पुन्हा युरोपमध्ये गेले.

आठव्या शतकातला खलिफा हारुन अल् रशीद हा कला, साहित्य आणि विज्ञानाचा आश्रयदाता होता. त्याचा मुलगा मामून याने बगदाद येथे ज्ञानपीठ, ग्रंथसंग्रहालय, अनुवाद केंद्र इत्यादीची स्थापना केली. खगोलशास्त्र, वैद्यक, भूगोल आणि अंकगणित या विषयांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाला याच काळात सुरुवात झाली.

मानव आणि ईश्वर यांच्यात अद्वैत साधण्यासाठी कोण्या त्रयस्थाची गरज नाही, हे इब्न गजालीचे सूत्र सेंट थॉमस पासून अनेक ख्रिश्चन संतांनी पूर्ण श्रद्धेने स्वीकारले होते. लेखक म्हणतात, इस्लामपूर्व काळातील आदिम अवस्थेत असलेल्या अरब समाजाने संस्कृती व वैज्ञानिक दृष्ट्या पैगंबरांच्या निधनानंतर केवळ दोनशे वर्षात प्रगतीची विस्मयकारक झेप घेतली. अरब विचारवंतांनी आणि संशोधकांनी दोन शतकांत प्रगतीचा टप्पा गाठला. तसा टप्पा गाठण्यासाठी ख्रिश्चन समाजाला पंधराशे वर्षे लागली, हे ख्रिश्चन अभ्यासक संशोधकांनी लिहून ठेवले आहे.

त्रिवार तलाक पद्धतीच्या विरोधातील कायद्यादरम्यान मुस्लिम समाजातील स्त्रियांच्या स्थितीविषयी बरीच चर्चा सामान्यांतही झाली. मध्ययुगीन कालखंड लक्षात घेता स्त्रियांबाबत इस्लामची भूमिका खूपच प्रगत होती, हे या चर्चेत कुठेच अधोरेखित झाले नाही.

मक्केतील श्रीमंत विधवा खदिजा ही व्यावसायिक होती. तिच्याकडेच तरुण पैगंबर कामाला होते. पुढे तिच्याशी त्यांनी लग्न केले. खदिजा चाळीस वर्षांची तर पैगंबर पंचविशीतले. दोघांत पंधरा वर्षांचे अंतर. सातव्या शतकात अरबस्थानात एक स्त्री व्यावसायिक असते. लोकांना कामाला ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. विधवा म्हणून माजघरात बसत नाही. तिला पुनर्विवाहाची बंदी नाही. तिचा पुनर्विवाह अविवाहिताशी होतो. नवऱ्याचे लहान वय आड येत नाही. पैगंबर तिच्या मृत्युपर्यंत तिच्याशी एकनिष्ठ राहतात. ती असेपर्यंत दुसरे लग्न करत नाहीत.

स्वातंत्र्य व हक्क म्हणून स्त्री करत असलेल्या अशा व्यवसायातून मिळालेल्या संपत्तीवर केवळ तिचा अधिकार असतो. या संपत्तीचा विनियोग व त्यासंबंधीचे कुठलेही व्यवहार केवळ तीच करू शकते. त्यात तिचे वडील, पती, भाऊ, मुलगा यांपैकी कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.

मुलींना शिक्षणाचा अधिकार आहे. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार (खुला) आहे. ओहदच्या युद्धात दहा टक्के पुरूष मारले गेल्याने विधवा झालेल्या स्त्रिया आणि अनाथ मुलांना आधार देण्यासाठी एकापेक्षा अधिक स्त्रियांशी लग्न करण्याची प्रथा सुरु झाली. मात्र असे लग्न प्राधान्याने विधवेशी करणे अपेक्षित आहे. बुरखा पद्धतीला कुराण किंवा हदीस यांत निःसंदिग्ध असा पुरावा आढळत नाही, असे लेखकाचे म्हणणे आहे.

हान्नफी संप्रदायाच्या तत्त्वानुसार मुलगी सज्ञान झाली असेल (म्हणजे इस्लामी कायद्यानुसार १४ वर्षांची) तर कोणाही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय ती स्वतःचा जोडीदार निवडू शकते व त्याच्याशी विवाहबद्ध होऊ शकते. जर वयात येण्याआधी तिचा विवाह तिच्या मर्जीविरुद्ध झालेला असेल, तर तो विवाह ती रद्द करून घेऊ शकते. स्त्रीचे आरोग्य आणि मुलाची वाढ चांगली व्हावी म्हणून दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असले पाहिजे असा कुराणाचा आदेश आहे. इस्लाम व कुटुंब नियोजन असे स्वतंत्र प्रकरणच या पुस्तकात आहे.

धर्मशास्त्र आणि कायद्यात स्त्रियांविषयीच्या इतक्या प्रगत तरतुदी असतानाही व्यवहारात मात्र हा अधिकार स्त्रीला वापरता येत नाही ही तिची शोकांतिका आहे, असे मुकादम नमूद करतात.

हे सगळे प्रगत वातावरण पैगंबरांच्या काळापासून, इ. स. च्या ७ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत होते. चौदाव्या शतकापासून ते उताराला लागल्याचे मुकादम नोंदवतात. चौदाव्या शतकापासून उलेमा धर्मपंडित ही संस्था अस्तित्वात आली. ती पुढे अधिकाधिक प्रभावी झाली. या उलेमांनी धर्मशास्त्राचा अर्थ लावायचा अधिकार स्वतःकडे घेतला. त्यातून तकलीदची नवी परंपरा सुरू झाली. तकलीद म्हणजे पूर्वसुरींचे अंधानुकरण. लेखकाच्या मते मुस्लिम समाजाला या उलेमांच्या प्रभावातून मुक्त केल्याशिवाय या परिस्थितीत कसलाही बदल होणे शक्य नाही.

मुकादम म्हणतात, मुळात इस्लाममध्ये पुरोहित ही संस्थाच अस्तित्वात नाही. ख्रिश्चन धर्मासारखी अतिशय सुसंघटित अशी धर्मसत्ताही अस्तित्वात नाही. त्यामुळे एखाद्या जुजबी ज्ञान असलेल्या मुल्लापासून मान्यवर व्यासंगी उलेमापर्यंत सगळेच एका पातळीवर असतात. परिणामतः एकाच विषयावर वेगवेगळे उलेमा परस्परविरोधी फतवे काढतात. खलिफा ही संस्था सुद्धा पैगंबरांच्या नंतर अस्तित्वात आली.

इस्लामचे हिंसक चित्र निर्माण करण्यात मुसलमानांतल्या जहाल गटांनी फार मोठा हातभार लावल्याचा आक्षेप मुकादम नोंदवतात. कर्मठ व श्रेष्ठता गंड पसरवणाऱ्या वहाबी पंथाला जबाबदार धरतात. अल-कायदा, लष्कर-ए-तय्यबा, इंडियन मुजाहिदीन या सारख्या जहाल दहशतवाद्यांनी गेली अनेक वर्षे इस्लामच्या नावाने दहशतवादी कारवाया करून निरपराधी निःशस्त्र माणसांना किड्या-मुंग्यांसारखे मारण्याचे जे सत्र गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू ठेवले आहे ते पाहता, इस्लाम विषयी घृणा निर्माण झाली तर त्याबद्दल कुणाला दोष देता येणार नाही, असे ते सडेतोड मांडतात.

आज मुस्लिमांची प्रतिमा मलीन करणाऱ्या काफिर, मूर्तिभंजन, जिहाद इत्यादी संकल्पनांचे मूळ अर्थ आणि आताचे त्यांचे भ्रष्ट स्वरुप यांचे अनेक ऐतिहासिक व कुराणातले संदर्भ देऊन लेखकाने विवेचन केले आहे. त्या सगळ्यासाठी मूळ पुस्तकच वाचायला हवे.

आपल्या देशातील बहुसंख्याक हिंदूंच्या खालोखाल मोठ्या संख्येने असलेला मुस्लिम समाज हा इतर कोणाहीपेक्षा कमी भारतीय नाही. त्याच्याविषयीचा मनात असलेला संशय त्याच्याविषयीच्या खोट्या-नाट्या प्रचाराने आपल्याला अधिकच घेरतो. त्याला शिकवण देणारा त्याचा धर्म इस्लाम हाच एक खलनायक बनून जातो. या गैरप्रतिमेच्या कैदेत आपण आपसूक अडकतो. त्यापासून मुक्त व्हायला अब्दुल कादर मुकादमांचे हे पुस्तक खूप उपयुक्त ठरु शकते. ते जरुर वाचा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, ऑक्टोबर २०१९)


______________________________________________

इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात

लेखक : अब्दुल कादर मुकादम

प्रकाशक : अक्षर प्रकाशन, मुंबई

पृष्ठे : २१६ | किंमत : रु. ३००

______________________________________________