Sunday, March 14, 2021

उद्देशिका...घटनेचे ‘आयकार्ड’


कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही विषयाच्या शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची उद्देशिका सुरुवातीला छापलेली असते. तिला प्रास्ताविका असेही म्हणतात. अनेक शाळांत प्रार्थनेनंतर तिचे सामुदायिक पठनही केले जाते. पाठ्यपुस्तकात उद्देशिकेच्या वर ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते. त्यामुळे ही प्रास्ताविका किंवा उद्देशिका म्हणजेच भारताचे संविधान असाही मुलांचा आणि बरेचदा थोरांचाही समज होतो. तो बरोबर नाही. उद्देशिका, जिला इंग्रजीत ‘Preamble’ म्हणतात, ती आपल्या घटनेच्या सुरुवातीला छापलेली आहे. जगातील सर्वाधिक लांबीच्या आपल्या भारतीय संविधानाची ती संक्षिप्त ओळख आहे. ती किती संक्षिप्त आहे? तर फक्त एक वाक्य आहे ते. त्यात ओळी अनेक आहेत. पण सर्व मिळून वाक्य एकच आहे. या एका वाक्यात संविधानाचे सार आहे. संविधानाचे सारतत्त्व, संविधानाचा चबुतरा, संविधानाचे तत्त्वज्ञान अशा अनेक विशेषणांनी तिचा गौरव संविधान सभेतील सदस्यांनी तसेच अनेक कायदेतज्ज्ञांनी केलेला आहे. विख्यात कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी केलेले उद्देशिकेचे वर्णन सुप्रसिद्ध आहे. ते म्हणतात – ‘उद्देशिका हे घटनेचे चैतन्य, हृदय आणि आत्मा आहे...ते घटनेचे ओळखपत्र (I card) आहे.’

या ओळखपत्राचे महत्व काय याची थोडी ओळख इथे करुन घेऊ.
संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होताना तिच्या निर्मितीचे उद्देश स्पष्ट करणारा ठराव १३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी संविधान सभेत मांडला. या उद्दिष्टांच्या ठरावाचा आधार उद्देशिका तयार करताना घेतला गेला. त्यात काही नव्या बाबी घालण्यात आल्या. बंधुता हे त्यातील मूल्य ही संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खास देण. संविधानातील प्रत्येक बाब संविधान सभेत मंजूर व्हावी लागे. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी उद्देशिका मंजुरीसाठी संविधान सभेत ठेवली. जो मसुदा बाबासाहेबांनी मंजुरीसाठी ठेवला तो जसाच्या तसा १७ ऑक्टोबर १९४९ रोजी मंजूर झाला. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यावर काही चर्चा झाली नाही. काही दुरुस्त्या सुचवल्या गेल्या नाहीत. बऱ्याच सूचना आल्या. त्या नामंजूर होऊन शेवटी मसुदा आहे तसा स्वीकारला गेला. यातल्या काही सूचना समजून घेणे खूप उद्बोधक आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या, विविध हितसंबंधांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संविधान सभेतील सदस्यांच्या देशाबाबतच्या सामायिक सहमतीच्या भूमिकेची त्यातून आपल्याला कल्पना येते. ज्याला भारतीयत्वाची संकल्पना (idea of India) म्हटले जाते, ती या चर्चांतूनच साकारली गेली. म्हणून संविधानाबरोबरच संविधान सभेतील चर्चांचा मागोवा घेणे आवश्यक असते.
‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात असलेल्या या उद्दिकेच्या प्रारंभी ‘ईश्वराला स्मरुन’ असे शब्द टाकावेत अशी सूचना एच. व्ही. कामत नावाच्या संविधान सभेच्या एका सदस्याने केली. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात देवाला स्मरुन होते, बहुतेक धर्मांत ईश्वर, परमेश्वर, निर्मिक ही कल्पना असल्याने आपणही घटनेचा शुभारंभ अशा स्मरणाने करावा, हा या सूचनेमागचा तर्क. यावर अनेकांनी आक्षेप घेतला. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देवाला या चर्चेत आपण आणू नये, अशी विनंती केली. मंत्री वा सरकारी पद ग्रहण करणाऱ्यांना संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यावी लागते. त्यावेळी त्यांना दोन पर्याय घटनेने दिले असल्याची बाब राजेंद्रबाबूंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ‘ईश्वर साक्ष शपथ घेतो की’ किंवा ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की’ असे हे दोन पर्याय आहेत. मात्र कामतांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपली सूचना मताला टाकण्याचा आग्रह धरला. शेवटी ती मताला टाकली गेली आणि मोठ्या बहुतमताने फेटाळली गेली.
संविधान सभेतील बहुसंख्य लोक काही नास्तिक नव्हते. काही अपवाद वगळले तर बहुतेक सर्व ईश्वराला मानणारे होते. तरीही घटनेतील ईश्वराच्या संबोधनाबाबतची ही सूचना का फेटाळली गेली? याचे कारण आहे. व्यक्तीला धर्म, श्रद्धा मानण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र राज्य म्हणजे शासन हे कोणत्याही धर्म वा श्रद्धेवर आधारलेले असणार नाही, ते इहवादी पद्धतीने कारभार करणार हे खूप आधीपासून स्वातंत्र्य चळवळीत ठरले होते. उदाहरणार्थ, १९२८ साली मोतिलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या भावी घटनेच्या सूत्रांविषयीच्या अहवालात व्यक्तीच्या धर्म स्वातंत्र्याचा मुद्दा होता. जो आपण कलम २५ स्वरुपात पुढे राज्यघटनेत समाविष्ट केला.
दुसरी सूचना होती महात्मा गांधींच्या प्रति या उद्देशिकेत कृतज्ञता अर्पण करण्याबाबत. ही सूचनाही कामतांनीच केली होती. घटनेचे कामकाज चालू असतानाच हिंदू कट्टरपंथी नथुराम गोडसेने महात्मा गाधींचा खून केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांचे प्रतीक म्हणून गांधीजींचे नाव असावे, हे या सूचनेमागे कारण होते. गांधीजींच्या जवळच्या अनुयायांनीच या सूचनेला विरोध केला. ती काही मताला टाकली गेली नाही. ती तोंडी विरोधानेच अव्हेरली गेली. जवळपास अख्खी संविधान सभा गांधीजींना मानणारी होती. तरीही हे घडले नाही याचे कारण ‘कोणी एक व्यक्ती नव्हे; तर भारताची जनता सर्वश्रेष्ठ होय’ हे तत्त्व आपण प्रधान मानले.
स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा वारसा असलेले लोक संविधान सभेत बहुसंख्य होते. या चळवळींतून साकारलेल्या मूल्यांना घटनेत समाविष्ट करुन देशाच्या तसेच आपल्या सार्वजनिक जीवनाचा त्यांना आधार बनवण्याबाबत ही मंडळी दक्ष होती. अनेक मतभेद असलेले हे लोक पायाभूत मूल्यांबाबत एकमतात होते, हे त्यांचे मोठेपण. त्यामुळेच ही मूल्ये आजही दीपस्तंभासारखी आपल्याला मार्गदर्शन करतात. देश एक ठेवायला मदत करतात.
स्वातंत्र्याबरोबरच फाळणी झाली. जिनांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पाकिस्तान मिळाला. पाकिस्तानच्या घटनेच्या उद्देशिकेत अल्लाचे स्मरण, जिनांप्रति कृतज्ञता, इस्लामी सामाजिक न्यायावर आधारित लोकशाही हे उल्लेख आहेत. म्हणजे आपण जे नाकारले ते त्यांनी स्वीकारले. परिणाम काय झाला? धर्म एक असतानाही पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बांगला देश हा दुसरा देश तयार झाला. आजही पाकिस्तानात लोकशाही रुजली नाही. लष्कराचा वरचष्मा आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी आपल्याच धर्मातल्या सामान्यांना छळत आहेत. तिथले दहशतवादी भारताला त्रास देत आहेतच. पण स्थानिकांनाही ते सोडत नाहीत. धर्माचे, भाषेचे, संस्कृतींचे वैविध्य असूनही खंडप्राय भारत देश एक राहिला. अजूनही आपण निवडणुकांत भाग घेऊन मतदानाद्वारे सरकार बदलतो. हे सामर्थ्य आपल्या घटनेत आणि त्यामागच्या सर्वसमावेशक, सहिष्णू वैचारिक परंपरेत आहे. ते जपले पाहिजे. तरच देश जपला जाईल.
कधी काही शंका आली तर घटनेचे आयकार्ड पहावे. म्हणजेच उद्देशिका वाचावी. तिचा अर्थ व घडण समजून घ्यावी. आपली उद्देशिका पाकिस्तानसारखी व्हावी हा हेतू असलेल्यांच्या उदंड कारवाया सध्या देशात सुरु आहेत. ते आपला स्मृतिभ्रंश करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यापासून आपल्याला व देशाला वाचवण्यासाठी उद्देशिकेतील मूल्यांचे सतत स्मरण व जतन करणे आवश्यक आहे.
- सुरेश सावंत,sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १४ मार्च २०२१)

Saturday, March 6, 2021

कार्यकर्त्यांची मुले




बऱ्याच वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ सहकारी कार्यकर्त्यांच्या घरी आम्ही कार्यकर्ते चर्चेला बसलो होतो. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पत्नीने आमचे उत्तम आतिथ्य केले होते. मग त्याही चर्चेला बसल्या. दरम्यान त्यांचा मुलगा बाहेरुन आला. एक नजर टाकून सरळ त्याच्या खोलीत गेला. ना हसला ना बोलला. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही त्याला थांबवून आमची दखल घ्यायला त्याला लावले नाही. आम्हाला ते खटकले. हे आमचे ज्येष्ठ सहकारी व त्यांची पत्नी इतक्या आपुलकीने वागत होते आणि हा मुलगा असा कसा? किमान हायहल्लो करण्याइतके सौजन्य त्याच्याकडे असू नये? ..आणि पुढे आणखी प्रश्न मनात आला – या मुलावर त्याच्या या कार्यकर्त्या आईवडिलांनी काहीच कसे संस्कार केले नाहीत?

...पुढे या मुलाशी वेगळ्या संदर्भात संबंध आला. त्यावेळीही तो मोकळेपणाने बोलला नाही. पण तो निगर्वी, आपल्या विश्वात किंवा क्षेत्रात मनापासून काम करणारा व रमणारा वाटला. त्याच्या संदर्भ चौकटीत आम्ही वा आमचे, म्हणजे त्याच्याही आईवडिलांचे काम नव्हते. त्याबद्दल त्याला अनादर असेल असे वाटले नाही. पण त्याबद्दल उत्सुकताही नव्हती.

कमी अधिक फरकाने आमच्या घरीही असाच प्रसंग घडला. आमचा मुलगाही असाच वागला. त्याच्या आईने, म्हणजे माझ्या पत्नीने त्याला किमान हाय तरी कर, असे दटावण्याचा प्रयत्न केल्यावर तो तिच्या समाधानाकरिता बैठकीस जमलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना हाय करुन थोडं स्मित चेहऱ्यावर आणून आतल्या खोलीत गेला. हाही असाच. ज्या घरात व नातेवाईकांच्या परिसरात तो जन्मला, वाढला ती सारीच लोकं सामाजिक कामाशी संबंधित. घरातल्या चर्चाही प्राधान्याने त्याच बाबींच्या. तरीही तो त्यापासून अलिप्त. गरिबांविषयी कणव, मित्रत्व करताना श्रेणीशी संबंध नाही, सेक्युलर, धार्मिक दृष्टिकोण त्यानेच फेसबुक प्रोफाईलवर टाकल्याप्रमाणे ‘agnostic’ (अज्ञेयवादी), अत्यंत मनस्वी, प्रचलित शिक्षण व करिअरच्या संकेतांना न जुमानता स्वतःला पटलेल्या रस्त्यावर चालणारा.

आमच्याशी संबंधित त्याच्या वयाच्या आसपासचे तरुण कार्यकर्ते हे पाहत असतात. त्यांना काय वाटत असेल, हे आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मुलांविषयी आम्हाला काय वाटले होते हे ठाऊक असल्याने अंदाज असतो. त्यांच्यातला एकजण एकदा बोललाही – ‘तुम्ही सगळे लोक जसे आमच्याशी मोकळेपणाने वागता, तशी तुमची मुले वागत नाहीत.’

आमच्या वयाच्या सहकारी कार्यकर्त्यांची मुले माझ्या मुलासारखी मनस्वी वा हायहल्लो म्हणायला त्रास वाटणारी आहेत असे नाही. पण त्यातली बहुतेक आमच्यासारखी चळवळीत सक्रिय नाहीत. आमच्या तरुण सहकाऱ्यांशी आमच्यासारखे मोकळे संबंध ठेवणारी नाहीत. एकूण आमच्या कामाबद्दल सहानुभूती असणारी, सहाय्य करणारी आहेत. आपले जीवन आपल्या आवडीप्रमाणे व्यतीत करत आहेत. आमची किमान मूल्ये मानणारी आहेत.

यातल्या काहींची लग्ने झाली. ती त्यांनी त्यांच्या पसंतीने केली. या लग्नांत कर्मकांड नाही, पण किमान काही विधी व्हावेत असे त्यांच्यातल्या काहींना वाटले. वास्तविक त्यांच्या आई-बापांची लग्ने साधेपणाने, नोंदणी पद्धतीने व धार्मिक रुढींना पूर्ण फाटा देऊन झाली होती. त्यांच्या वाढीतही कुठे देव-धर्म वा त्याचे संस्कार आले नव्हते. तरीही त्यांना हे माफक प्रमाणात करावेसे वाटले.

हे असे का, याची मला आता काहीएक समज आल्याने काही वाटत नाही. पण सुरुवातीला हा आपला पराभव वाटत होता. यांच्याच वयाची तरुण मंडळी आमच्यासोबत कार्यकर्ती असताना आमची मुले मात्र त्यात नाहीत, याची खंतही वाटे. (आताही तशी थोडी वाटते.)

काही कार्यकर्ते असेही असतात जे स्वतः चळवळीत राहतात. पण आपल्याला जो ताण सहन करावा लागला तो मुलांना लागू नये म्हणून त्यांना स्वतःहून चळवळीपासून दूर ठेवतात. कम्युनिस्ट बापांची पोरं शिवसैनिक झाली, लालबाग भगवी झाली, असे एकेकाळी बोलले गेले. त्यात बापांचे चळवळीत पूर्ण झोकून देण्याने घराची झालेली परवड, त्यांच्या मुलांच्या आकांक्षांच्या पूर्ततेच्या शक्यतांना होणारा अडथळा आणि शिवसेनेने या आकांक्षांसाठी वा मराठी माणसावरील अन्यायपूर्तीसाठी पुरवलेले शॉर्टकट्स ही त्यातील अनेक कारणांपैकी काही कारणे आहेत. आरक्षणाच्या पूर्ण बाजूने ज्यांचे कार्यकर्ते पालक आहेत, अशा कॉलेजला जाणाऱ्या मुलांच्या शिबिरांत आरक्षणाला तीव्र विरोध करणारी मुलेही मला आढळली आहेत. आमच्या परिसरात काही कार्यकर्त्यांची मुले विषम समाजव्यवस्था ही निसर्गदत्त असून, कर्तृत्व, नशीब हे व्यक्तीच्या उन्नतीला कारण ठरतात, अशावेळी आपापल्या कुवतीनुसार माणसांनी जगावे या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असलेलीही आढळतात. आज कितीतरी तरुण मुले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्यावरण यांवर आवाज उठवताना, त्यासाठी सरकारी दमन सहन करताना आढळतात. तथापि, त्यांच्या बाजूने उतरण्याची तडफड या आमच्या मुलांत दिसत नाही. काहीजण जे चालले आहे ते अयोग्य आहे, याबद्दल बोलतात, त्याबद्दलचे लेख वाचतात. चर्चांतही सामील होतात. या सरकारला त्यांचा विरोध असतो. पण मतदानाला उतरत नाहीत.

हे असेच असते असे नाही. कार्यकर्त्यांची मुले कार्यकर्ती होत नाहीत वा कार्यकर्त्याच्या विचारांचा वारसा चालवत नाहीत असे नाही. अगदी त्या कार्यकर्त्यासारखीच किंबहुना अधिक चिवट व झुंजारपणे, त्यागपूर्वक काम करतानाही दिसतात. आपल्या घरच्यांच्या सामाजिक कामाच्या वातावरणाचा त्यांच्या या घडणीला पुरेपूर उपयोग झालेला दिसतो. त्यांनी तो स्वतःत मुरवून त्यापलीकडे स्वतःचा समज व योगदान वाढवलेले दिसते. मला माझा मुलगा माझ्यासारखा पूर्णवेळ कार्यकर्ता व्हावा, असे तो जन्माला आल्यापासूनच वाटू लागले. ते रोमॅंटिक होते. पण तसे घडलेले काही पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या घरात दिसतेसुद्धा. पण मी त्यामुळे खजिल व्हावे का?

वर लिहिल्याप्रमाणे काहीएक समज मला आला तो असा. जीवनाच्या अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्राबाबतही मुलांचे स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तित्व कबूल करायला हवे. आई-वडिलांशी त्यांचे जैविक नाते असते. त्यांच्यापासून त्यांची शारीरिक उत्पत्ती झालेली असते. पण त्यांना घडवणारे अन्य जैविक घटकही असतात. यात आईवडिलांच्या नातेवाईकांपासून आलेली गुणसूत्रेही समाविष्ट असतात. आणि या सगळ्यांमध्ये सामाजिक पर्यावरणातले घटक कळीचे असतात. त्यांचा वेध घेण्याचा वैचारिक दृष्टिकोण महत्वाचा असतो. भोवतालच्या पर्यावरणाला सगळे एकसारखा प्रतिसाद देत नाहीत. त्याला हे वेगवेगळे घटक व त्यांची परस्परांवरील क्रिया-प्रतिक्रिया कारण असते.

माझ्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असतानाही मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. मला माझा भोवतालचा समाज बदलायचा होता. ती माझी गरज होती. रुढ करिअर मला मंजूर नव्हते. माझ्या पत्नीने माझ्याशी आंतरजातीय व आंतरस्तरीय विवाह केला. तिचा आर्थिक स्तर माझ्यापेक्षा वरचा होता. रुढ संकेतांप्रमाणे तिला तिच्या जातीत, स्तरात अधिक भौतिक संपन्नतेचा जोडीदार सहज मिळणार होता. ते नाकारुन ती माझ्यासोबत आली. तिला ते सारे खूप कष्टप्रद होते. पण ती म्हणते त्याप्रमाणे तिला तिच्या जीवनाचे सार्थक उमगले होते. त्यामुळे कष्टाने वा प्रतिकूलतेने तिला खचवले नाही. तिच्या लोकांत सहज मिसळण्याच्या, सदैव मदतीस तत्पर व आनंदी राहण्याच्या वृत्तीने अधिक माणसे, कार्यकर्ती जोडली गेली. माझे माझ्याच लोकांशी अधिक स्नेहपूर्ण नाते तिच्यामुळे तयार झाले.

आमचे हे उदाहरण जसेच्या तसे आमच्यासोबतच्या आमच्या पिढीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांबाबत दिसले नाही. त्या सगळ्यांनाच हे करावेसे वाटले नाही. त्यातल्या काहींनी व्यावहारिक हिशेबही केले. जाणिवांच्या व चळवळीच्या त्याच माहोलात असतानाही हा फरक पडतो. भोवतालचा माहोल, वैचारिक संस्कार आत्मिक ताकद घडवतो. पण या आत्मिक बळाला घडवण्यात काही अन्य घटकही कारण असू शकतात.

आमच्या वाट्याला चळवळीचा माहोल आला होता. चळवळीची आम्हाला प्रत्यक्ष जीवनबदलासाठी वा जाणिवेतून वाटणारी गरज होती. पूर्णवेळ असतानाही जोडीदाराच्या नोकरीमुळे मध्यमवर्गात प्रविष्ट झालेल्या आम्हा मंडळींच्या मुलांची चळवळ ही जीवनाची गरज नाही. जाणिवेतून आली तरच ती असेल. शिवाय आज व्यक्तिवादाने झपाटलेल्या पिढीचे व वर्गाचे ही मुले घटक आहेत.

आपल्या रक्तामांसाची मुले मातीचे गोळे नसतात. त्यामुळे मनचाहा आकार त्यांना देता येत नाही. त्यांनी आकार घेण्यात सहाय्यभूत राहता येते. त्यात आम्ही कमी पडता कामा नये. मात्र त्यांनी घेतलेला आकार अखेर कबूल करावा करायला हवा. शाळेच्या निकालावेळी पालक आपल्या मुलाची तुलना त्याच्या वर्गातल्या अन्य मुलांशी करतात ते जसे योग्य नसते, तसेच इथेही आहे. करिअरचा त्याग करुन चळवळीत पूर्णवेळ पडणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकांचा सर्वसाधारणपणे विरोधच असतो. पाठिंबा देणारे अपवाद असतात. पालक विरोधात व मुले बंडखोर. हे आमच्या वेळी होते. तेच आताही आहे. आमचे निर्णय त्याच्या जबाबदारीसह आम्ही घेतले. तेच आता पूर्णवेळ होणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनीही करायला हवे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुले चळवळीत आहेत की करिअर करत आहेत, हा संदर्भ आमच्या निर्णयाला नव्हता. त्यांच्याही निर्णयाला असू नये.

त्याही वेळी, म्हणजे मी पूर्णवेळ होण्याच्या वेळी सद्भावनेने, काळजीने सल्ला देणारे मित्र, शिक्षक होते. त्यातल्या काहींचा ‘त्यांनी त्यांच्या मुलांना करिअर करायला लावायचे आणि तुम्हाला भिकेचे कटोरे धरायला लावायचे’ असाही आमच्या ज्येष्ठांबाबतचा राग व्यक्त होई. ‘मी मला वाटते म्हणून चळवळीत पडलो. पूर्णवेळ झालो. त्यांची मुले काय करत आहेत किंवा त्यांच्यासाठी त्यांचे पालक म्हणून आमचे ज्येष्ठ काय करत आहेत, हा माझ्या विचाराचा मुद्दा होऊ शकत नाही.’ असे मी उत्तर या माझ्या हितचिंतकांना देई.

यात अजून एक बाब असे. मी ज्या तळच्या विभागांत होतो, त्यांना चळवळीची खरोखर गरज होती. आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांत मुख्यतः उच्च वर्णीय, उच्च वर्गीय पार्श्वभूमी असलेले लोक होते. त्यांनी त्यांचा वर्ग त्यागलेला होता. पिढीजात संपत्तीचा वारसा काहींनी स्वतःहून सोडला होता. तर काहींनी तो पार्टीला, चळवळीला अर्पण केला होता. त्यांच्या वा त्यांच्या समाजातील, थरातील लोकांचे जीवन बदलण्याची गरज नव्हती. त्यासाठी ते चळवळीत नव्हते. माझ्या सामाजिक व आर्थिक थरातल्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांचा हा त्याग होता. वास्तविक त्याग म्हणण्यापेक्षा त्यात त्यांना जीवनसाफल्य वाटत होते. सगळा समाज सुखी होण्यातच आमचे व आमच्या भावी पिढ्यांचे निकोप सुख आहे, अशी त्यांची धारणा होती.

हे खरे की ज्या वर्ण-वर्ग थरातून ही मंडळी डीक्लास-डीकास्ट होण्याचा प्रयत्न करतात, त्यात यातले कोणीच पूर्ण यशस्वी होऊ शकत नाहीत. ते पूर्णपणे त्यांच्या हातात नसते. ज्याला सोशल कॅपिटल असे आता म्हटले जाते, ते त्यांच्या वर्ण-वर्गाचे पर्यावरण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करत असते. त्यांचे नातेवाईक त्यांना, त्यांच्या मुलांना मदतनीस होत असतात. ती स्थिती तळच्या विभागांतून पूर्णवेळ होणाऱ्या कार्यकर्त्यांची नसते. त्यामुळे कम्युनवर राहणाऱ्या, एकसारखे जीवन जगणाऱ्या कॉम्रेड्सच्या पुढच्या पिढीची उन्नती त्यांच्या या सोशल कॅपिटलमुळे भिन्न राहते. वरच्या वर्ण-वर्ग थरातल्या साधेपणाने, काटकसरीने जगणाऱ्या कार्यकर्त्यांची मुले दलित-बहुजन कार्यकर्त्यांच्या मुलांपेक्षा अधिक संपन्न स्थितीत गेलेली दिसतात. यात अपवाद आहेत. आपण सर्वसाधारण काय असते ते इथे पाहतो आहोत.

आज समाजात विषमता आहे. ती कम्युन केले तरी पूर्णतः नष्ट होत नाही. म्हणजे असे- कम्युनवर उच्च वर्ग-वर्णीय तसेच निम्न वर्ग-वर्णीय कार्यकर्त्यांची मुले एकत्र वाढतात. एकत्र खातात. पण एखाद्याचा मामा त्या मुलाला आजोळी घेऊन जातो तेव्हा तिथले उपभोग किंवा वंचना वर्ग-वर्ण स्तराप्रमाणे बदलतात. उच्च वर्ण-वर्गीय स्तरातील कार्यकर्त्यांची कम्युनवरील मुले आपल्या आजोळी अथवा अन्य नातेवाईकांकडे जातात तेव्हा त्यांना मिळणारे उपभोग त्यांच्या कम्युनमधल्या दलित-बहुजन कार्यकर्त्यांच्या मुलांना मिळत नाहीत. हे होऊ द्यायचे नाही, यासाठी आजोळी जाण्यापासून, नातेवाईकांना भेटण्यापासून मुलांना परावृत्त करणे हा उपाय होऊ शकत नाही. तो अघोरी आहे. आर्थिक, सामाजिक विषमता पूर्णतः नष्ट झाल्यावरच हे भेद जाणार आहेत. केवळ तत्त्वकठोर व्यवहाराने ते साधणार नाही. अशी तत्त्वकठोरता मुलांची कुचंबणा करते, त्यांच्यात विकृती तयार करते.

कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढीत आणखी काही कारणांनी विकृती तयार होतात. ही मंडळी वरच्या कार्यकर्त्यांच्या प्रकारात धरायची नाहीत. हे कार्यकर्ते सुटे असतात. त्यांच्या वैयक्तिक पुढाकाराने मोठ्या संस्था उभ्या राहतात. बहुधा त्यांना सहकारी नसतात. असले तरी ते नंतर दूर होतात. केले जातात. त्यांचे अनुयायी असतात. खरे म्हणजे पूर्णवेळ कर्मचारी असतात. या संस्था उभ्या करताना त्यांचा प्रारंभ त्यागातून झालेला असू शकतो. पुढे मात्र या संस्थांची संस्थाने होतात. अशावेळी ही संस्थाने सांभाळायला त्यांची मुले ते पुढे आणतात. या मुलांना हे काम करायचे असतेच असे नाही. त्यांना काही वेगळे करण्यात गती असू शकते. पण साधनसंपन्न संस्थानांचा खानदानी वारसा आपल्याकडेच राहायला पोटची मुलेच असावी लागतात. भौतिक सुबत्तेचे वा तातडीने स्थिरस्थावर होण्याचे आकर्षण या मुलांनाही पडते. काहींना जबाबदारीही वाटते. पण आपल्या पित्याचा वकुब त्यांच्याकडे असतोच असे नाही. यात या मुलांचे व्यक्तित्व दुभंगते. दांभिकतेने ग्रासते. एकीकडे चळवळीची, साध्यसाधन शुचितेची भाषा करायची आणि दुसरीकडे स्वतःचे जगणे त्याच्या उलट जगायचे, यातून नासणेच होते. प्रस्थापित राजकारणात बापाची मुले येतात. पण तिथे ही चळवळीची, साध्यसाधन शुचितेची भाषा नसते. तिथे रुढ सत्ताकारणाचे सरळसोट हिशेब असतात. ते लोकांनाही ठाऊक असतात. तिथे दुहेरी व्यक्तिमत्व सांभाळायचे ओझे नसते.

चळवळीतल्या संस्था त्यांचे प्रमुख मृत अथवा निष्क्रिय झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांकडे सोपवल्या जायला हव्यात. घरची मंडळी-पत्नी वा मुले कार्यकर्ते असतील तर इतरांप्रमाणे ते त्यातला घटक असतील. ती घरची माणसे आहेत, म्हणून त्यांच्याकडे त्या संस्थांचे प्रमुखपण जाता कामा नये. ते आलेच तर कुशल कार्यकर्ता म्हणून यायला हवे. त्याला कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. हेत्वारोप तरीही होतात हा भाग सोडू. कार्यकर्त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्मृतीची जपणूक करण्याची जबाबदारी कुटुंबाची असायचे कारण नाही. कुटुंबाने त्यातून मुक्त व्हावे. तीही मालकी सोडून द्यावी. ज्या चळवळीचा तो नेता होता, त्यांनी हवे तर जपावी स्मृती. नसतील जपत तर तो त्यांचा प्रश्न मानून सोडून द्यावे. कुटुंबाने कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देणे, दरवर्षी काही जाहीर कार्यक्रम करणे हे करायचेच असेल तर फारतर पाचेक वर्षे करावे. नंतर जाहीर करुन बंद करावे. नाहीतर उगीच ओढाताण होत राहते. त्यात त्या आपल्या माणसाचीही शान राहत नाही. एखाद्या संस्थेकडे कुटुंबाने एकरकमी ठेव देऊन त्यातून कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या संस्थेने नियमित उपक्रम करणे ही वेगळी गोष्ट. ती जरुर व्हावी. पण स्वतःच हे उपक्रम संघटित करणे काही काळाने थांबवायला हवे.

‘तुम्ही दलित-कष्टकऱ्यांची पोरं आहात. आपण आधी नीट स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. नंतर चळवळीत उतरा.’ हा पोक्त सल्ला निम्नवर्ण-वर्ग स्तरातील हितचिंतक देत असतात. त्यांच्या भावनेचा आदर ठेवू. पण असे होत नसते. स्वावलंबी उत्पन्नाचे मार्ग जरुर शोधावे. पण ती पूर्वअट होऊ शकत नाही. आजवरच्या चळवळीत पडलेल्या व ज्यांनी काही घडवले त्यांत ‘आधी आर्थिक स्थैर्य व मग चळवळ’ हा पॅटर्न दिसत नाही. चळवळीत पडताना आपल्या कुटुंबाची पडझड होऊ नये याचा अधिकाधिक प्रयत्न करायला हवा. पण त्याची गॅरंटी देता येत नाही.

त्याचबरोबर सर्व त्यागूनच चळवळ यशस्वी होऊ शकते, असेही नाही. आधी चळवळीत नसलेले, स्थिरस्थावर जीवन जगणारे लोकही कुठल्या तरी एका टप्प्यावर चळवळीत पडलेले दिसतात. त्यावेळपावेतो त्यांनी कमावलेले असते, त्याचा उपयोग त्यांना जीवनाच्या गरजा नीट भागवण्यासाठी होतो. पण काहींची त्यानंतर परवडही होते. पूर्णवेळ कार्यकर्ताच समाजाला वळण लावू शकतो असे नाही. परीघावर असलेला, अगदी तरुण वा ज्येष्ठ नवागतही जाणिवा वा समजाची प्रगल्भता एखाद्या टप्प्यावर दाखवतो. नेता होतो. स्वयंप्रेरणेने अनेक अंशकालीन वेळ देणारे लोक चळवळीला हवे असतात. मात्र तिच्या समन्वयासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता असणे गरजेचे असतेच.

या कुठल्या तरी टप्प्यावर कार्यकर्त्यांची मुलंही असू शकतात. नसूही शकतात. - मात्र ती कोणाची तरी मुलं नक्की असतात.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०२१)