Wednesday, April 25, 2018

बाबासाहेबांची चळवळ पुरुषमुक्तीच्या अंगाने पुढे का जाऊ शकली नाही?


हा प्रश्न आम्हालाच का विचारता? आम्ही नाही पुढे गेलो. कबूल. पण तुम्ही कोणी काय केले सांगा ना. डाव्यांनी काय केले? समाजवाद्यांनी, गांधीवाद्यांनी काय केले? ...अंगावर आले की कवचात शिरायचे व अशा प्रश्नांची नखे परजायची आमची जुनी सवय. त्याप्रमाणे प्रश्नाला भिडण्याऐवजी ते परतवण्याचा विचार मनात आधी आला. पण मनाला समजावले. आपण विवेकी आहोत. असे करुन चालणार नाही. सर्वांनीच ही चिकित्सा-सर्वसाधारण तसेच अंतर्गत-करायलाच हवी. मार्ग निघेल याची खात्री नाही. पण काही प्रमाणात पुढे सरकायला तरी त्याचा उपयोग होऊ शकेल. ही आशा नक्कीच वृथा नाही.

चिकित्सा म्हटले खरे. पण चिकित्सा म्हणजे काही सैद्धांतिक मांडणी असे गृहीत धरले जाते. तसे मी करणार नाही. करु शकतही नाही. त्या क्षेत्राचा मला तसा आवाका नाही. एक कार्यकर्ता-फारतर विचक्षक कार्यकर्ता या नात्याने मला जे दिसते, वाटते ते नोंदवतो.

पुढे जाण्याआधी पुरुषमुक्ती म्हणजे काय ते नक्की करायला हवे. नाहीतर गोंधळ होईल. स्त्रीमुक्ती म्हणजे काय ते कळते. स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेतून तिची मुक्तता. तिला पुरुषाबरोबरीने सर्व क्षेत्रांत वावरता येणे. स्त्री म्हणून निसर्गदत्त बाबी वगळल्यास माणूस म्हणून तिच्या वाट्याला कोणताही दुजाभाव न येणे. पुरुषमुक्ती म्हणजे याची विरोधी बाजू असा सर्वसाधारण समज असतो. होतो. केला जातो. स्त्रिया पुरुषांवर अन्याय करतात. त्यातून पुरुषांना मुक्त करणे असा तो समज. तो गैर आहे. पुरुषमुक्ती व स्त्रीमुक्ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाण्याला नाणेपण येण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजू सुस्पष्ट असाव्या लागतात. तसेच स्त्रीमुक्तीसाठी पुरुषमुक्ती गरजेची आहे. ज्या पुरुष-पितृसत्ताक संस्कृतीचा पुरुष वाहक असतो, तो एकप्रकारे तिचा गुलाम, बंदिवान असतो. त्याच्या या बंदिवान मानसिकतेने स्त्रीच्या मुक्तीला कुंपणे पडत असतात. याचाच अर्थ, स्त्रीची मुक्ती ही पुरुषमुक्तीशिवाय संभवत नाही. खरंतर स्त्री व पुरुष या दोहोंना माणूस म्हणून भरारी घ्यायची असेल तर त्या दोहोंची मुक्तता आवश्यक आहे. वर्चस्ववादी मानसिकता व स्थान हे एक बंधनच असते. पण त्या स्थानावरच्यांना ते ध्यानात येत नाही. तो त्यांना लाभ वाटत असतो. त्यांचे हे समाधान वास्तवात कृतक असते. ‘गुलामाला तो गुलाम आहे याची जाणीव करुन द्या. तरच तो बंड करुन उठेल.’ हे अब्राहम लिंकनचे विधान बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी निदर्शनास आणतात हे आपल्याला ठाऊक आहे. तेच पुरुषमुक्तीलाही लागू आहे. आपण पुरुषवर्चस्ववादी विचारांचे बंदिवान आहोत हे त्याला कळले तर तो त्याविरोधात उभा राहील. तसा तो राहिला व लढला तरच स्त्री-पुरुषांच्या माणूसपणाचे सुंदर नाते खुलणार आहे.

अशा या पुरुषमुक्तीच्या वाटेवर बाबासाहेबांची चळवळ पुढे का जाऊ शकली नाही, याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. यात काही बाबी ज्या अन्य अनेक चळवळींना लागू आहेत त्या आंबेडकरी चळवळीलाही लागू पडतात. तर काही बाबींचा संबंध व संदर्भ खास आंबेडकरी चळवळ हाच आहे.

महामानव इतिहासाचे अपत्य असतात. याचा एक अर्थ असा की त्यांची भूमिका मानवमुक्तीची असली तरी त्यांना ज्या इतिहासाच्या व भूगोलाच्या तुकड्यावर वावरावे लागते तो त्यांच्या कामाचे प्राधान्यही निश्चित करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण भूमिकेचे अनेक पदर सध्या अभ्यासकांकडून उलगडले जात आहेत. त्यातून त्यांचे महानपण अधिकाधिक दृश्यमान होते आहे. तथापि, त्यांच्या आयुष्यात त्यांना प्राधान्याने अस्पृश्यमुक्तीतच अधिक वेळ व्यतीत करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. ही अस्पृश्यमुक्ती मानवमुक्तीच्या विविध अंगांना भिडल्याशिवाय अर्थपूर्णरित्या प्रत्यक्षात येणे कठीण आहे हे त्यांना ठाऊक होते. जमेल तिथे त्या अंगांना स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करताना आपल्याला आढळतात. स्त्रीमुक्तीबाबतची त्यांची मांडणी व हस्तक्षेप खूप तगडे आहेत. १९२७ चा चवदार तळ्याचा सत्याग्रह ते संविधानर्मितीची प्रक्रिया व १९५१ चे हिंदू कोड बिल तसेच या दरम्यानच्या अनेक भाषणांतून ही मांडणी व हस्तक्षेप बाबासाहेब करत आले आहेत. त्यातून त्यांनी आधुनिक स्त्रीवादाची चौकट प्रशस्त केली आहे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान, पती-पत्नी मित्र, स्त्रीला पिता-पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधाद्वारे पतीच्या श्रेष्ठत्वाला लगाम, कामाच्या ठिकाणी बाळंतपणाच्या रजेचा अधिकार, आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार आदि भूमिकांनी बाबासाहेबांनी या चौकटीचा आशय संपन्न केला आहे.

प्रश्न आहे तो पुढे का गेला नाही? बाबासाहेबांची ऐतिहासिक थोरवी व त्यांच्या वाट्याला आलेला प्राधान्यक्रम लक्षात घेता हा प्रश्न बाबासाहेबांना विचारून चालत नाही. त्याची जबाबदारी संपूर्णपणे बाबासाहेबांनंतरच्या नेतृत्वावर येते. हे नेतृत्व त्यात अपयशी ठरले. म्हणजे त्यांनी प्रयत्न केले व प्रयत्नांती त्यांना अपयश आले असे नव्हे. त्यांनी प्रयत्नच केले नाहीत. याला एखादा प्रासंगिक वैयक्तिक अपवाद असूही शकतो. पण तोही संशयाचा फायदा देण्यासाठी. आंबेडकरोत्तर नेतृत्व सपशेल फेल गेले या विधानाला त्यामुळे काहीही उणेपणा येत नाही. आंबेडकरी विचार व चळवळीचा विकास सोडाच; तो जिथवर होता तेवढाही टिकवणे या मंडळींकडून झाले नाही. याला काही वस्तुनिष्ठ कारणे असू शकतात का? - काही संदर्भ असू शकतात. पण वैयक्तिक आकांक्षा व त्यासाठीची साठमारी हेच प्रमुख आहे. वैचारिक मतभेदांची पार्श्वभूमी पहिल्या पिढीतील रिपब्लिकन नेतृत्वाला तसेच पॅंथरच्या प्रारंभकाळातील युवानेत्यांना जरुर आहे. पण त्यांच्या टिकाऊ फुटीला, चळवळीच्या पतनाला व दिशाहिनतेला त्यांचे वैयक्तिक अहंभाव व स्खलनच मुख्यतः जबाबदार आहे. सत्ताधाऱ्यांनी आमीष दाखवले म्हणून आम्ही फुटलो किंवा सगळेच तसे करतात तर आम्ही का मागे राहायचे, शेवटी आपल्या लोकांची चार कामे करायची तर हे गरजेचे नव्हे काय... ही मानसिकता हे काही परिस्थितीजन्य कारण होऊ शकत नाही. तुमचा विवेक भ्रष्ट झाला असेच म्हणावे लागेल. एकूण पुरोगामी चळवळीलाच सुकाणू राहिले नाही, त्यामुळे ही विवेकभ्रष्टता अधिक गडद झाली हे खरे.

या विवेकभ्रष्टतेत बाबासाहेबांनी अधोरेखित केलेली मूल्ये धूसर झाली. पुढच्या पिढ्यांपर्यंत ती पोहोचण्यात अडथळा तयार झाला. ज्यांनी स्वतः बाबासाहेबांचे वाचन केले त्यांना ती कळू शकली. पण वर्तमानाशी त्यांचे नाते जोडण्यासाठी जे भाष्य करावे लागते त्यासाठीचा कालपट या वाचनातून फक्त कळत नाही. प्रत्यक्ष काम केलेल्या नेतृत्वाने आपल्या अनुभवांच्या सहाय्याने ऐतिहासिक संदर्भात तो उलगडावा लागतो. त्यादृष्टीने अभ्यासवर्ग, शिबिरे असे काही काही झाले नाही. जे झाले ते अभिनिवेशी व अन्य समाजविभागांप्रती द्वेष निर्माण करुन संकुचितता वाढवणारे. नेत्यांची आंबेडकर जयंतीला ‘असा झालाच नाही कुणी-असा होणार नाही कुणी’ या पलीकडे भाषणांची झेप जाईनाशी झाली. आता तर स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने होणाऱ्या जयंती सोहळ्यांत बाबासाहेबांबरोबर या आश्रयदात्यांची आरती ओवाळण्यातच सार्थकता मानली जाते. तरुण मुले तर ही आरती कधी संपते व डीजे लागतो त्याची वाट पाहत असतात.
बाबासाहेबांची चळवळ, देशाला मिळालेले स्वातंत्र्य, संविधान व जुन्या वारश्याची बूज राखत तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतलेल्या राखीव जागा, सवलती आदि धोरणांमुळे बौद्ध-दलित विभागांत शिक्षण व नोकऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यातून आजही अल्पसंख्य असलेला पण ठळकपणे जाणवणारा एक सुस्थिर वर्ग तयार झाला. शिक्षण व चळवळीमुळे सांस्कृतिक भान आलेला प्रारंभी वस्त्यांत राहणारा व त्याचवेळी चळवळीत (सामाजिक-साहित्यिक) भाग घेणारा तरुण वर्ग आर्थिक वृद्धी व शासकीय गृहयोजनांच्या सहाय्याने हळू हळू वस्तीबाहेर पडू लागला. त्याच्या या स्थलांतराबरोबरच त्याचा वस्तीतील हितसंबंधही संपू लागला. चळवळ बोलण्या-लिहिण्यापुरती राहिली. त्याच्या पुढच्या पिढीत तर तेही राहिले नाही. आज त्याचे अस्तित्व जवळ जवळ वस्त्यांत दिसत नाही. पूर्वी होळी-गणपती हे सण कोणी केले तर ते करणाऱ्यांत एकप्रकारची अपराधी भावना असे. आता गणपती, नवरात्रौत्सव व आंबेडकर जयंती एकाच उत्साहाने साजरे केले जातात. आंबेडकरी विचार व हे सण साजरे करणे यात काही द्वैत आहे, हे नव्या पिढीच्या ध्यानीमनीच नसते. सुस्थित वर्ग या वस्तीतल्या मुलांशी संबंध ठेवत नाही. आपल्या भूतकाळाचा कोणत्याही प्रकारे स्पर्श त्यांना पुन्हा नको असतो. आपल्या मुलांना तर ते त्यापासून कोसो दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या या तथाकथित खालच्या जातीच्या वेदनांचे भांडवल गरजेनुसार वापरणे व त्याचवेळी वरच्या जात-वर्गात सामावण्याची अखंड धडपड यात हा वर्ग अडकलेला आहे. या प्रयत्नांत वरच्या जात-वर्गाची संस्कृतीही तो प्रतिष्ठेचे गमक म्हणून स्वीकारत असतो. या दांभिकतेच्या ताणात त्याच्या व्यक्तित्वाचे केवळ भजे होते. नव्या विचारांची व आचाराची तो काय खाक जोपासना करणार! उलट सगळी जुनी जळमटे नव्या वेषात त्याच्या मनाला, घरादाराला वेढू लागतात. नाही म्हणायला यातले काही व्हॉट्सअप-फेसबुकवर लढाया मारत असतात. पण तिथेच. वस्त्यांत-रस्त्यावर उतरायला त्यांची तयारी नसते. विद्यापीठांतल्या विद्वानांच्या उड्या कॅम्पसच्या आत. सेमिनारांच्या-पेपरांच्या कक्षेत. अन्य पुरोगामी प्रवाहांना ठेचून आंबेडकरवाद कसा श्रेष्ठ आहे हे पटवण्यातच त्यांच्या विद्वत्तेची इतिश्री होते. 

एका बाजूला लक्षणीय संख्या असतानाही त्या तुलनेत राजकीय ताकद नसणे, नेतृत्वाचा आपसातील बेबनाव, सुस्थित शिक्षित वर्गाची दांभिकता, एकूण पुरोगामी चळवळीचे कमकुवत असणे, आर्थिक सुस्थिरतेचा प्रवास नव्या आर्थिक धोरणांनी लडखडणे, सामूहिकतेकडून जमावीकरण व वैयक्तिक परात्मता या वावटळीत सापडलेली आंबेडकरी चळवळ जात-वर्गीय लढ्याचेच भान हरपून बसली आहे. तिच्याकडून पुरुषमुक्तीच्या भानाची अपेक्षा हे जरा अतिच झाले.

- सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com
__________________________________
पुरुषभान परिषद, धुळे, २२-२३ डिसेंबर २०१७
__________________________

आंबेडकरी चळवळीच्या वाहक समुदायाच्या ‘पुरुषभानते’चे हे काही नमुने

पॅंथरच्या काळात आणि त्यानंतरही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अगदी मध्यरात्रीही शिजवून जेवायला घालण्याचे काम त्यांच्या आयांनी केले आहे. आणि पुरुष कार्यकर्त्यांनी तिला गृहीत धरले आहे. आई म्हणून तिच्यावर त्यांनी कितीही भावपूर्ण कविता केल्या असतील. पण रात्री उशीरा येऊन आई किंवा बहिणीला उठवून जेवायला वाढायला लावणे, सकाळी उशीरा उठल्यावर आई-बहिणींनी आंघोळीचे पाणी काढणे, समोर चहा ठेवणे या सेवा घेताना तो पारंपरिक पुरुषच असतो. स्त्रीमुक्तीच्या वल्गना करणारे हे पुरुष बहिणीच्या सार्वजनिक वावराबाबत नैतिक रक्षकच असतात. आमचे मोर्चे, सभा, जयंत्या यांत स्त्रियांची संख्या मोठी. पण वक्त्यांत व निर्णयप्रक्रियेत नगण्य. आमच्या गावी कोकणात भावकीच्या किंवा गावच्या मंडळाच्या बैठका बसतात तेव्हा स्त्रियाही असतात. पण त्या खळ्याच्या (अंगणाच्या) एका कोपऱ्यात. मुख्य गोलात सगळे पुरुष. विषय सावित्रीबाईंच्या जयंतीचा असला तरी हीच स्थिती.

बौद्ध विवाह विधीमध्ये वधू-वरांच्या ज्या शपथा आल्या, त्यात स्त्रीचे पारंपरिक स्थान सुरक्षित ठेवायचा प्रयत्न आहे. त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचे असते व पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण व घरच्यांचा मान राखायचा असतो. हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन वस्तुस्थितीशी विसंगत नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची व संधीची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. तरीही लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे लोकांना कळत नाही. त्यांना त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही.

बाबासाहेबांनी कार्यकारणभावाने धर्मग्रंथांची व बुद्धाचीही चिकित्सा केली. आज त्यांचे अनुयायी याला रजा देत आहेत. मंगळसूत्र वास्तविक पुरुषप्रधानतेचे प्रतीक. प्रारंभीच्या काळात त्याला नकार देण्याइतकी प्रगल्भता नसणे स्वाभाविक होते. पण हळूहळू त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या त्यागापर्यंत समाजाची मानसिकता तयार करणे गेल्या ६२ वर्षांत का शक्य झाले नाही? याचे कारण आहे कार्यकारणभावाला, तत्त्वज्ञानाला रजा देऊन विचारशून्य कर्मकांडी मनःस्थितीला शरण जाणे. महिला याच्या पहिल्या भक्ष्य आहेत. मंगळसूत्राचा त्याग राहिला बाजूला, आजही ते झोकात बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात (ऐपतीप्रमाणे तोळ्यांत) डोलत असते. एक बदल होतो आहे. आता लक्षणीय संख्येने विशेषतः शहरातील बौद्ध महिला पांढरे मंगळसूत्र घालू लागल्या आहेत. पांढऱ्या साड्या नेसतात. म्हणून बहुधा पांढरे मणी. आपण हिंदू नाही, म्हणून हिंदूंसारखे काळे मणी नको. आपण बौद्ध आहोत. म्हणजे वेगळे आहोत. म्हणून  पांढरे मंगळसूत्र. यात काळ्याचे पांढरे झाल्याने मूळ ‘पुरुषप्रधानतेच्या मालकी’चे तत्त्व कुठे बदलते? ते तसेच राहते.

बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनाचा एक प्रभावी उपाय आंतरजातीय लग्न हा सांगितला आहे. बौद्धांनी आपल्या उद्धारकर्त्याचा हा उपदेश शिरोधार्य मानायला हवा. पण तसे होत नाही. एकतर जातीतच लग्नाची खटपट असते. झालेच आंतरजातीय तर तथाकथित वरच्या जातीची मुलगी आपल्याकडे आलेली चालते. पण आपली मुलगी तथाकथित उतरंडीत आपल्या खालच्या स्तरावरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली बौद्धांना चालत नाही. एकूण मुलीने दुसऱ्या जातीत जाणेच फारसे रुचत नाही. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न एका संख्येने मागे पडते, ही समजूत हेही त्यामागे एक कारण असते. दुसऱ्या जातीची मुलगी आली तर हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एका संख्येने पुढे तरी सरकता येते. भारत बौद्धमय करण्याच्या वैचारिक क्रांतीला माणसांवर बौद्धपणाचे ठप्पे लावण्याची ही प्रतिक्रांती गिळू पाहते आहे.

लोकसभा व विधानसभांत ३३ टक्के आरक्षण महिलांना ठेवावे हे विधेयक गेली २० वर्षे प्रलंबित असणे ही एकूणच भारताला नामुष्कीची बाब आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी मंडळी याला विरोध करतात तो पुरुषी मानसिकतेतूनच. रिपब्लिकन नेत्यांकडूनही याला विरोध होतो. दलित महिलांना यात वाटा नाही. सवर्ण महिला तो ओढून नेतील असा समज ते पसरवतात व आपल्या महिला आघाड्यांनाच या विधेयकाच्या विरोधात उतरवतात. वास्तविक हे आरक्षण समांतर आहे. म्हणजे खुल्या व आरक्षित गटांना ते छेदणारे आहे. याचा अर्थ दलितांना आज ज्या राखीव जागा आहेत, त्यातील ३३ टक्के जागा दलित महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार. त्या खुल्या गटातील महिलांना मिळणार नाहीत. दलित पुरुषांचा या विधेयकाला विरोध असण्यामागे आपल्यातल्या स्त्रियांना वाटा द्यावा लागेल हे खरे कारण आहे.
____________________________

Thursday, April 5, 2018

असा घडला ‘समता मार्च’


रायगड-पाचाड-महाड (शिवराय ते भीमराय) या १९ मार्चच्या समता मार्चचे फोटो व त्याचे वर्णन, सहभागींच्या प्रतिक्रिया फेसबुक-व्हॉट्सअप मार्फत हा लेख छापून येईपर्यंत आपल्यातल्या अनेकांपर्यंत पोहोचल्या असतील. या लेखाद्वारे आपल्याला ठाऊक असलेल्या तपशीलाची पुनरुक्ती न करता या मार्चच्या जुळवाजुळवीतील काही वैशिष्ट्ये, संदर्भ तसेच त्याच्या यशस्वीतेबाबतचे माझे आकलन मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

ज्या निमित्ताने हा समता मार्च होता त्याविषयी आधी थोडेसे. 

२० मार्च हा चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केल्याचा दिवस. १९२७ च्या १९-२० मार्चला सत्याग्रह परिषद भरली. महत्वाचे ठराव १९ मार्चला झाले. प्रत्यक्ष सत्याग्रह २० मार्चला झाला. ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत अधिकारासाठी आहे’ ही बाबासाहेबांची ललकार साऱ्या देशभर दुमदुमली. केवळ पूर्वास्पृश्यांनाच नव्हे तर मानवी अधिकाराच्या बाजूने संघर्षरत असलेल्या स्पृश्यांनाही यातून अदम्य अशी ऊर्जा मिळाली. महाडपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या, दलित-पीडितांच्या व्यथा मुखर करणाऱ्या, जन्माने सवर्ण असलेल्या प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांनी तर आपल्या एका अंकाच्या मुखपृष्ठावरच बाबासाहेबांचे चित्र छापले. 

या संगरातील सहभागींत अस्पृश्यांची बहुसंख्या असली तरी तो केवळ त्यांनीच संघटित केलेला नव्हता. रामचंद्र बाबाजी मोरेंसारखे तेजस्वी अस्पृश्य तरुण जसे या सत्याग्रहाच्या आघाडीवर होते, तसेच त्यांचे सहकारी असलेले सुरबानाना टिपणीस, अनंत चित्रे, सहस्रबुद्धे आदि अनेक सवर्ण कार्यकर्त्यांचा यात बरोबरीचा पुढाकार होता. स्वतःच्या समाजाच्या विरोधात जाऊन, प्रसंगी त्यांचा बहिष्कार सोसून ही मंडळी बाबासाहेबांना जिवाभावाने साथ देत होती. १९२३ साली सी. के. बोले यांनी मुंबई विधिमंडळात सार्वजनिक पाणवठे सर्व जाति-धर्मासाठी खुले राहतील असा कायदा करवून घेतला होता. १९२४ ला सुरबानाना टिपणीस महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते. आजोबांपासून सुधारकांची परंपरा असलेल्या सुरबानानांनी या कायद्याप्रमाणे महाडमधील चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले करावे असा ठराव महाड नगरपरिषदेत संमत केला. या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. 

या सत्याग्रहाच्या स्मृतिदिनी २० मार्चला मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता इथे जमत असते. समग्र उत्थानाची भाषा बोलत असले तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात तरी आंबेडकरी चळवळीला एकजातीय वळण मिळाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यातही फाटाफूट. त्यामुळे महाडला भक्तिभावाने येणाऱ्या आंबेडकरी जनतेला या एकाच दिवशी, एकाच वेळी अनेक सभांचा सामना करावा लागतो. एकमेकांत मिसळणाऱ्या लाऊड स्पीकर्सच्या कर्कश्यतेत कोणतीच सभा नीट ऐकता येत नाही. (मुंबईला ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर असते तसेच हे.) गटा-तटांच्या बॅनर्सचा भडिमार तर शहर विद्रूप करणारा. महाडात बाबासाहेबांचे करोडो रुपयांचे राष्ट्रीय स्मारक शासनाने बांधलेले आहे. अजूनही काही वास्तू बाबासाहेबांच्या तसेच माता रमाईंच्या नावे या परिसरात आहेत. क्रांतिभूमीतल्या या वास्तूंत काही किरकोळ कार्यक्रम वगळता फारसे काही घडत नाही. काही तर नुसत्या पडून आहेत. 

या स्थितीने अस्वस्थ झालेल्या महाडच्या काही तरुणांनी एकत्र येऊन यात बदल करण्याचा चंग बांधला. ते क्रांतिभूमी युवा प्रतिष्ठान नावाने संघटित झाले. अनेक उपक्रम करु लागले. त्यातील एक होता फाटाफुटीचे ओंगळ चित्र पुसून २० मार्चला सर्वांचा एकच एक मंच लागावा हा. त्यांनी त्याला नाव दिलेः ‘एक विचार-एक मंच’. त्यासाठीच्या भेटीगाठी त्यांनी सुरु केल्या. 

महाडच्या या तरुणांच्यातील एक प्रमुख संघटक नागेश जाधव मुंबईतील आमचे सहकारी आहेत. ते दोन्हीकडे क्रियाशील आहेत. त्यांच्याकडून महाडमधील या प्रयत्नांची माहिती आम्हाला नियमित मिळत होती. त्यांना सहकार्य राहील असेही आम्ही सांगितले होते. संविधान संवर्धन समितीच्या आमच्या एका बैठकीत महाडमधील अजून काही मंडळी आली व त्यांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले. वास्तविक, ‘एक विचार-एक मंच’बद्दल आमच्यातल्या काहींनी शंकाही उपस्थित केल्या. हा रिपब्लिकन ऐक्याच्या प्रयोगासारखा प्रकार आहे व तो यशस्वी होणे कठीण आहे. शिवाय भाजपला मिळालेल्या आठवलेंपासून परस्परांशी न जमणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर, कवाडे आदि सगळ्यांची मोट बांधण्यात ‘एक विचार’ काय आहे, हे आम्हाला कळत नाही. केवळ जातीच्या ऐक्याचेच प्रयत्न त्यातून प्रतीत होतात वगैरे. अन्य पुरोगामी मंडळींनाही बोलवावे असे नागेशसारख्या तरुणांचे म्हणणे होते. पण या एक विचार-एक मंच मार्फत ते नीट आकाराला येत नव्हते. 

याच बैठकीत २० मार्चच्या एक विचार-एक मंचच्या स्थानिक तरुणांच्या लोकशाही निर्णयाला धक्का न लावता त्याच्या आधल्या दिवशी १९ मार्चला रायगड ते महाड अशी रॅली काढावी (पुढे त्याला समता मार्च नाव दिले गेले) व त्यात महाराष्ट्रभरच्या पुरोगामी संघटनांना सहभागाची हाक द्यावी अशी कल्पना संजय लोखंडे यांनी मांडली. भीमा-कोरेगावमुळे बौद्ध व सवर्ण (मुख्यतः मराठा) जी दरी तयार झाली, बौद्धांचे जे एकाकीपण वाढले त्यावरचा एक उपाय म्हणूनही बौद्धांसहित परंतु बौद्धेतरांचा सहभाग अधिक असलेला असा एखादा उपक्रम होणे आम्हाला निकडीचे वाटत होते. त्यामुळे संजयची सूचना आम्हाला एकदम पटली. या बैठकीत महाडच्या तरुणांशी विचारविनिमयाने परंतु आम्ही बाहेरची मंडळी या रॅलीच्या-समता मार्चच्या संघटनात विशेष लक्ष घालू असे आश्वासन आम्ही दिले. महाडला तरुणांची बैठक झाली. त्यात रॅलीऐवजी रायगड ते महाड मानवी साखळी करावी अशी कल्पना पुढे आली. तथापि, एवढ्या कमी वेळात तिच्या तयारीतली अव्यावहारिकता लवकरच त्यांच्याही ध्यानात आली व समता मार्चवर मतैक्य झाले. 

मुंबईत गेल्या वर्षी संविधान दिनी २६ नोव्हेंबरला संविधान जागर यात्रा झाली होती. त्यात आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी शक्ती एकवटल्या होत्या. अशा एकजुटीच्या भरघोस यशाचे साक्षीदार व भागिदार असलेल्या काही कार्यकर्ते व संघटनांचा रायगड जिल्ह्यातही मजबूत आधार आहे. उल्का महाजन व त्यांचे सर्वहारा जनआंदोलन रायगड जिल्ह्यात आदिवासी-कष्टकरी-शेतकऱ्यांच्यातले दमदार घटक आहेत, हे सुविदित आहे. प्रमोद निगुडकर, युवराज मोहिते हे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते गोरेगाव (माणगाव) येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे आताचे कर्तेधर्ते आहेत. हे सगळे लोक संविधान जागर यात्रेच्या संयोजनातील-विचारविनिमयातले घटक असल्याने हा समता मार्च त्या यात्रेतील भूमिका पुढे नेण्याची एक संधी आहे याबद्दल एकमतात होते. स्थानिक जमवाजमवीत उल्का महाजन व सर्वहारा जनआंदोलन हा मजबूत आधार असल्याने समता मार्च संख्येच्या व नेतृत्वाच्या पातळीवर दुबळा ठरणार नाही ही खात्री होती. मुंबईत संविधान जागर समिती (संविधान जागर यात्रेच्या संयोजन समितीचे आताचे नाव) च्या बैठकीत समता मार्च संघटित करण्यात आपण जास्तीत जास्त जोर लावायचा असे ठरले. 

पुढे मग माणगावला बैठक झाली. त्यात स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते होते. त्यांच्यातील व मुंबईतील काहींच्या समावेशाने एक संयोजन समिती तयार करण्यात आली. पुण्यात बैठक झाली. समता मार्चच्या विचारविनिमयात आधीपासूनच असलेल्या सुभाष वारेंच्या पुढाकाराने ही बैठक झाली. तिला नाशिकहून अनिता पगारे आल्या होत्या. अशाच काही बैठका वा भेटी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच अन्यत्रही झाल्या. शांताराम पंदेरे, मंगल खिंवसरा, ललित बाबर, अविनाश पाटील, अरुण जाधव, राजन इंदुलकर अशा अनेक पुढारी कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता. या सर्व मंडळींनी आपापल्या भागातून ताकदीनिशी उतरायचे ठरवले. तसे ते उतरलेही. यात मुंबईतलीही अनेक नावे आहेत. ती सगळीच घेणे शक्य नाही. तरीही आता नावांचा उल्लेख करतोच आहे, तर शरद कदम, उमेश कदम, अल्लाउद्दिन शेख, सागर तायडे, अविनाश कदम, शिवराम सुखी, किशोर कांबळे, संजय मं. गो., मोहन सकपाळ ते थेट तरुण कार्यकर्ता दीपक सोनावणेपर्यंत अनेक नावे घेता येतील. आम्ही संविधान संवर्धन समितीतील मंडळी अशी व्यक्तिगत नावे घेण्याचे टाळत असलो तरी आता इतरांची घेत असताना आमच्यातलीही काही घेणे औचित्याला धरुन होईल. शरद शेळके, मुमताज शेख, प्रदीप शिंदे, हिरामण खंडागळे, मोहन सोनावणे, अजित बनसोडे, वैशाली जगताप, कालिदास रोटे, लक्ष्मण साळवे अशा कितीतरी जणांनी समता मार्चच्या जमवाजमवीत तसेच संघटनात मोलाचा सहभाग दिला. हिरामण खंडागळेंनी समता मार्चवर एक गाणेच तयार केले होते. फारसे व्यक्त न होता समन्वयाचे धागे गुंफण्यात यावेळी शरद शेळकेचा वाटा मोठा होता. आमच्यातलेच पण अन्य दोन मोठ्या संस्थांचेही प्रमुख घटक असलेले महेंद्र रोकडे, संजय लोखंडे, राजेश ठोकळे, प्रफुल्ल शिंदे यांचे संसाधनांच्या जुळवाजुळवीतले सहाय्य फार मोलाचे ठरले. त्यामुळे संयोजनासाठीच्या आमच्या हालचाली खूप सुकर झाल्या. संजय तर प्रारंभापासून शेवटपर्यंत आणि आता पाठपुराव्यातही उत्प्रेरकाची भूमिका निभावतो आहे. खुद्द महाड-माणगाव परिसरातील मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस, श्रीप्रकाश अधिकारी, दीपक क्षीरसागर, सतीश शिर्के, चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार, आरिफ करबेळकर, संदेश कुलकर्णी तसेच क्रांतिभूमी युवा प्रतिष्ठानचे तरुण कार्यकर्ते यांच्यावर स्थानिक नियोजनाची मोठी जबाबदारी पडली होती. मधुकर गायकवाड सांगता सभेचे स्वागताध्यक्ष होते. आता नावे थांबवतो. अशी नावे घेणे हे मोठे जिकीरीचे काम. ज्यांची राहिली असतील त्यांनी क्षमा करावी. 

समता मार्चच्या सांगता समारंभाचे वक्ते निवडणे हेही कमी त्रासाचे नव्हते. ते पुरोगामी हवेत पण सम्यकही असावेत. शिवाय असे सम्यक लोक उपलब्धही हवेत. अखेरीस सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख व प्रमुख वक्त्यांत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कर्वे इन्स्टिट्यूट (पुणे) येथे अध्यापन करणाऱ्या सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या प्रा. अंजली मायदेव व सुराज्य सेनेचे संस्थापक सदस्य फारुक अहमद नक्की झाले. बहुतेक वक्ते स्वखर्चाने, दुरुन व कष्टपूर्वक प्रवास करुन आले होते. त्यांची भाषणेही अपेक्षेप्रमाणे संयत व समता मार्चची भूमिका पुढे नेणारी झाली. 

समता मार्च शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पुतळ्याला तसेच समाधीला अभिवादन करुन रायगडावरुन सुरु झाला. वर २५ लोक गेले होते. त्यात लक्ष्मिकांत देशमुखही होते. बाकी सगळ्यांना गडाच्या पायथ्याशी पाचाडला जिजाऊंच्या समाधीजवळ बोलावण्यात आले होते. जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करुन तिथून मुख्य मार्चला प्रारंभ झाला. मध्ये मध्ये स्वागत व नाते-कोळोसेला जेवण व पुढे महाड शहरातून दोन तास पायी मिरवणूक आणि शेवटी चवदार तळ्यावर सांगता झाली. 

स्थानिक तरुणांचे प्रतिनिधी नागेश जाधव यांचे प्रास्ताविक, स्वागताध्यक्ष मधुकर गायकवाड यांचे स्वागतपर भाषण, उल्का महाजन यांची भूमिका मांडणी, तीन वक्ते व अध्यक्ष यांची भाषणे, ठराव व संकल्प हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे झाला. हे सात वक्ते व सूत्रसंचालक युवराज मोहिते अशा आठ जणांव्यतिरिक्त मंचावर कोणीही असणार नाही हे आधी ठरल्याप्रमाणे पाळले गेले. 

दुपारच्या जेवणाची साडेनऊशे पानं उठली. याचा अर्थ समता मार्चमधील लोक हजाराच्या वर नक्की असावेत. बौद्ध अल्पसंख्य व अन्य मंडळी अधिक, झेंडे फक्त तिरंगे हे दृश्य महाडकरांना नवीन होते. एकूण मार्चबद्दल पोलीस, स्थानिक सवर्ण तसेच आंबेडकरी समूहातील मंडळींच्या प्रतिक्रिया सर्वांचीच उमेद वाढवणाऱ्या आहेत. नागेशने महाडच्या तरुणांचे प्रयत्न व भूमिका मांडणारे केलेले सभेतील भाषण बौद्ध समाजातील लब्धप्रतिष्ठित, कोत्या प्रवृत्तींवर कोरडे ओढणारे व व्यापक एकजुटीची दिशा ठळकपणे अधोरेखित करणारे होते. नागेशच्या भाषणावर वक्तेही खूष झाले. अंजली मायदेव तर खूपच प्रभावित झाल्या होत्या. आंबेडकरी चळवळीत असह्य अशा ज्या विकृती तयार झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्याच समूहातील तरुणांकडून तीही महाडच्या क्रांतिभूमीतून अशी भूमिका पुढे येणे हे सगळ्यांनाच आश्वासक वाटले. महाराष्ट्राच्या अन्य भागांतील आंबेडकरी तरुणांना प्रेरणा व दिशा देणारी ही घटना असल्याचे अनेकांना वाटते. 

ज्यासाठी महाडची तरुण मंडळी कंबर कसून मागे लागली होती तो २० मार्चचा ‘एक विचार-एक मंच’ हा उपक्रम काही सफल झाला. त्यातील अंतर्विरोधांच्या भाराने तो कोसळला. रिपब्लिकन नेत्यांच्या भेटींचे ‘उद्बोधक’ अनुभव खाजगीत त्यांच्याकडून ऐकावेत. ते जाहीरपणे नोंदवणे हे चिखलात दगड मारण्यासारखे आहे. एक झाले, या अनुभवांनी या तरुणांचे खाली गेलेले मनोधैर्य परत वर यायला समता मार्चची मोठी मदत झाली. 

समता मार्चच्या या तयारीवेळचा एक अनुभव त्रासदायक होता. वर उल्लेख केलेल्या व नागेशने आपल्या भाषणात कोरडे ओढलेल्या बौद्धांतील एका विभागाच्या संकुचितपणाचा तो दाखला होता. जे ठराव सांगता सभेत प्रस्तावित होते, त्यातील एक बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहाला सुरबानाना टिपणीस यांचे नाव देण्याच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, हा होता. परंतु, महाडच्या तयारीच्या बैठकीत याला विरोध झाला. सुरबानाना थोर आहेत, त्यांचे स्मारक स्वतंत्रपणे उभारावे, बाबासाहेबांच्या नावाच्या स्मारकात दुसरे कोणाचे नाव असता कामा नये अशी मते बौद्धांतील ज्येष्ठ मंडळींकडून आली. यावर चर्चा नको असेही एकजण म्हणाले. सुरबानानांचे नातू मिलिंद टिपणीस बैठकीला होते. ते म्हणाले, “मी आतापर्यंत कधी बोललो नाही. पण माझे वडिल गेले, त्यांच्या हयातीत काही झाले नाही. आता आम्ही असेपर्यंत तरी ते व्हावे.” 

आम्ही यावर खेद व्यक्त केला. बाबासाहेबांचे व सुरबानानांचे नाते पाहता व अन्य मुख्य स्मारकांतील दालनांना इतरांची नावे देण्याची प्रथा पहाता बाबासाहेबांच्या नावाला कमी महत्व येईल ही भीती अनाठायी आहे. शिवाय ही काही नवी मागणी नाही. शासन निर्णय २००७ चा आहे. असे असताना दहा वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी न होणे हे व्यथित करणारे आहे. याबद्दल तरुण कार्यकर्त्यांनी आता काही ठरवण्याची गरज आहे. आपण त्यांच्यावर हा निर्णय सोडू, असे म्हणून हा मुद्दा आम्ही त्या बैठकीपुरता सोडून दिला. पुढे स्थानिक तरुणांच्यातही या मुद्द्यावर पूर्ण सहमती आहे असे न दिसल्याने सांगता सभेच्या ठरावांत त्याचा समावेश आम्ही करु शकलो नाही. 

सुरबानानांचे घर गोविंद निवास हे महाडमधील बाबासाहेबांचे निवासाचे ठिकाण तसेच चवदार तळे सत्याग्रहाचे विचार विनिमय केंद्र होते. त्याला अलीकडेच आग लागून त्याचे बरेच नुकसान झाले आहे. ते दुरुस्त करुन त्याचे स्मारक नक्की व्हावे. परंतु बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील एका सभागृहाला त्यांचे नाव देता येणार नाही अशी भूमिका म्हणजे ‘सवर्णांच्या पाणवठ्यावर तुम्हाला पाणी पिण्याचा हक्क कशाला पाहिजे, आम्ही तुमच्यासाठी स्वतंत्र पाणवठा देतो’ म्हणण्यासारखे आहे. ही भेदभावाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 

शिवराय ते भीमराय जोडणे हे एक आव्हान आहे. पण ते पेलण्याच्या ताकदीआड येणाऱ्या या दुसऱ्या आव्हानाचे काय करायचे? भीमरायाने ज्यांना सख्खेसोबती मानले त्यांच्याशी परजातीचे म्हणून भीमरायांच्या अनुयायांनी अंतराय राखणे या आव्हानाला भिडावेच लागेल. त्या अर्थाने समता मार्चची खरी सांगता होणे अजून बाकी आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, एप्रिल २०१८)



समता मार्चच्या सांगता सभेतले ठराव 

१) छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या कर्तृत्वाची, योगदानाची स्मृती व इतिहास जतन करून पुढील पिढ्यांकरिता मांडण्यासाठी शिवसृष्टी व भीमसृष्टी हे प्रकल्प साकारण्यात यावेत अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. शिवसृष्टी साठी जागा उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे महाडमधील क्रांतीस्तंभालगत असलेल्या १५ एकर जमिनीवर भीमसृष्टी साकारण्यात यावी अशी मागणी या ठरावाद्वारे आजची सभा करीत आहे. 


२) १९ मार्च १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक अशी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद महाडमध्ये ज्या ठिकाणी भरवण्यात आली, ते त्या काळचे विरेश्वर थिएटर व सध्याचा गाडीतळ ही जागा परिषदेचे स्मृतिस्थळ म्हणुन जतन करण्यात यावे व त्या जागी सदर स्मृतींना उजाळा देणारे, परिषदेची माहिती मांडणारे, तसेच परिषद व समता संगरामधे अनमोल योगदान देणाऱ्या सर्व मंडळींचा परिचय देणारे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी आजची सभा करीत आहे. 


समता मार्चच्या सांगता सभेच्या अखेरीस घेतलेला संकल्प 

आम्ही या स्वतंत्र, सार्वभौम भारत देशाचे नागरिक आजच्या दिवशी, म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता संगराला सुरूवात केलेल्या ऐतिहासिक दिवशी असा संकल्प घेतो की, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य जनतेसाठी, समतेच्या व रयतेच्या राज्यासाठी दिलेल्या संघर्षाच्या वाटेवर चालण्यास आजच्या काळातही आम्ही कटिबद्ध आहोत. 

भारताचे संविधान ज्या समता, न्याय, बंधुता, समाजवाद व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांच्या अंमलबजावणीचे आश्वासन देते व त्यासाठी मार्ग दाखवते, त्यातील एकाही मूल्याला आम्ही धक्का लागू देणार नाही. ती मूल्ये प्रत्यक्ष जीवनात टिकवण्यासाठी व संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचे जीवन पणाला लावू. संविधानातील मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींशी सर्व बळानिशी संघर्ष करण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.