Tuesday, January 26, 2021

संविधानातील दूरदृष्टी...

भारताच्या संविधान सभेतील ३८९ (फाळणीनंतर २९९)  सदस्यांपैकी फक्त १५ महिला होत्या.  टक्केवारीत चार किंवा पाच टक्के. त्यात दलित, मुस्लिम व ख्रिस्ती महिला प्रत्येकी एक. आदिवासी एकही नाही. बाकी उच्चवर्णीय हिंदू. संविधान सभेच्या महत्वाच्या सर्व समित्यांत त्यांना संधी मिळाली असे झाले नाही.  मसुदा समितीत तर एकही स्त्री नव्हती. समाजात निम्म्या असलेल्या महिला देशाच्या भविष्याचा आराखडा निश्चित करण्याच्या या सर्वोच्च प्रक्रियेत अशा अगदी अल्प. त्या अल्प होत्या पण नगण्य नव्हत्या. देशाच्या विविध भागांतून त्या निवडून आल्या होत्या. बहुतेक सुखवस्तू घरातल्या व प्रभावशाली, राजकारणी पुरुषांच्या नातेवाईक होत्या. पण कठपुतळ्या नव्हत्या. त्या स्वयंप्रज्ञ होत्या. उच्चशिक्षित होत्या. पारंपरिक बंधनांना किंवा वहिवाटीला तसेच स्वतःच्या जात-धर्म-वर्गथरातील संकेतांना ठोकरण्याची त्यांच्यात जिद्द होती. त्यांची स्वतःची अशी देशाच्या भवितव्याविषयी मते होती. समाजात नेत्या म्हणून त्यांना मान्यता होती. पारतंत्र्याविरोधात लढताना त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता. संविधान सभेत येण्यापूर्वी, संविधान सभेत असताना व त्यानंतरही त्यांनी कर्तृत्व गाजवलेले आहे. कोणी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीही झालेल्या आहेत. त्या सगळ्यांचा तसेच त्यांच्या संपूर्ण कामगिरीचा तपशील नोंदवणे इथे शक्य नाही. त्यांच्या विस्मृतीत जाणाऱ्या ओळखीवरची थोडी राख झटकली जावी या दृष्टीने त्यांच्या योगदानाची, भूमिकांची काही वैशिष्ट्ये, सूत्रे खाली नोंदवत आहे. त्या प्रकाशात आजच्या स्थितीवर जाता जाता थोडी टिप्पणीही करु.

केरळच्या पालघाट जिल्ह्यातील अम्मू स्वामिनाथन, कोचिनच्या दाक्षायणी वेलायुधन, पंजाबच्या मलेरकोटला येथील बेगम ऐजाज रसूल, आंध्रच्या दुर्गाबाई देशमुख, बडोद्याच्या हंसा जीवराज मेहता, लखनौच्या कमला चौधरी व राजकुमारी अमृत कौर, गोलपाडा- आसामच्या लीला रॉय, पूर्व बंगालातील (आजचा बांगला देश) मालती चौधरी, अलाहाबादच्या पूर्णिमा बॅनर्जी व विजयालक्ष्मी पंडित, मालदा-प. बंगालच्या रेणुका रे, हैदराबादच्या सरोजिनी नायडू, अंबाला-हरयाणाच्या सुचेता कृपलानी, थिरुवनंथपुरम-केरळच्या अॅनी मस्कारेन अशा या पंधरा जणी. संविधान सभेतल्या महिला सदस्य.

दाक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतल्या एकमेव दलित महिला सदस्य. केरळातील पुलाया या अस्पृश्य जातीत जन्मलेल्या. त्या काळात या भागातील अस्पृश्य जातीतील स्त्रियांना चोळी घालायला मनाई होती. तो दंडनीय अपराध होता. ही मनाई ठोकरुन ब्लाऊज घालणाऱ्या त्या पहिल्या पुलाया महिला. दलितपणाचे भोग भोगलेल्या दाक्षायणी वेलायुधन दलितांच्या नेत्या होत्या. तथापि, दलितांच्या विकासासाठी स्वतंत्र मतदारसंघ, संयुक्त मतदारसंघ वा विशिष्ट टक्के राखीव जागा हा मार्ग  त्यांना मंजूर नव्हता. त्यांच्या मते जोवर दलित आर्थिकदृष्ट्या गुलाम आहेत तोवर या तऱ्हेच्या मार्गांचा काहीही उपयोग होणार नाही. सामाजिक दुर्बलता घालविणारे तसेच नैतिक संरक्षण कवच देणारे संरचनात्मक बदल त्यासाठी त्यांना गरजेचे वाटत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी या दोहोंच्या समर्थक असलेल्या दाक्षायणींचा बाबासाहेबांशी इथे मतभेद होता. अन्य बाबतीत त्या बाबासाहेबांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या दिसतात.

बेगम ऐजाज रसूलही स्वतः मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी असतानाही अल्पसंख्यांकांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात होत्या. त्यांच्या मते हे आत्मघातकी पाऊल आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बहुसंख्याकांपासून कायमस्वरुपी अलग पडतील. जिनांच्या पाकिस्तानच्या कल्पनेशी त्या सहमत नव्हत्या. राज्यघटनेत ‘गाव की व्यक्ती’ एकक मानायचे, यावरुन घमासान चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘खेडे म्हणजे स्थानिकतावाद, अज्ञान, संकुचितता आणि जातीय, धार्मिक असहिष्णुतेचे डबके’ या विधानावरुन वातावरण तापले. त्यावेळी बाबासाहेबांशी बेगम रसूल यांनी संपूर्ण सहमती दाखवली. ‘आधुनिक कल समूहसंघटनेच्या तुलनेत व्यक्तीच्या हक्कसंरक्षणाकडे असून ग्रामपंचायत एकाधिकारशाही गाजवू शकते’ अशी त्यांची भूमिका होती. वैयक्तिक पातळीवर त्या जमीनदार कुटुंबातल्या असतानाही जमीनदारी निर्मूलनाच्या बाजूने त्या लढल्या.

स्वतंत्र बाण्याच्या या महिला सदस्य स्त्रियांच्या राजकीय आरक्षणालाही विरोध करतात. हंसा मेहता संविधान सभेत म्हणतात, “आम्ही कधीच कोणत्या अग्रहक्कांची मागणी केलेली नाही. आम्हाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय हवा आहे. आम्हाला अशी समानता अभिप्रेत आहे ज्याचा परस्पर आदर, सामंजस्य हा पाया असेल.” रेणुका रे यांनी या म्हणण्याला पाठिंबा दिला. हिंदू कोड बिलाच्या चर्चेवेळी दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि राजकुमारी अमृत कौर यांनी समान नागरी कायद्याची बाजू लावून धरली. या कायद्याने सर्व क्षेत्रात स्त्रियांना समानता यायला मदत होईल, असा त्यांचा दावा होता. हंसा मेहता युनोच्या मानवी अधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्र समितीच्या सहअध्यक्ष असताना घोषणापत्रात ‘all men’ ऐवजी ‘all human beings’ या दुरुस्तीत त्यांचे मोठे योगदान झाले.


मूलभूत अधिकारांच्या उपसमितीतील चर्चेत मिनू मसानी यांनी ‘केवळ धर्म वेगळे ही बाब नागरिकांसाठी लग्नात अडथळा होता कामा नये’ हा मुद्दा स्विस घटनेतील कलमाचा आधार देऊन मांडला. यावर मतदान झाले. डॉ. आंबेडकर, हंसा मेहता, राजकुमारी कौर यांनी पाठिंबा दिला. मात्र ५:४ मतांनी या सूचनेचा पराभव झाला. आपल्या समितीच्या कक्षेबाहेरचा हा मुद्दा आहे, हे विरोधकांनी दिलेले कारण होते. पुढे १९५४ साली विशेष विवाह कायदा आल्यावर या उणीवेची बरीचशी भरपाई झाली. धर्म न बदलता लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला.

ज्यांच्या कामाची दखल घेणे या लेखात शक्य झाले नाही, त्या प्रत्येक महिला सदस्याचे काही ना काही खास वैशिष्ट्य व योगदान आहे. या सर्वांनी त्यांच्या काळात जे म्हटले वा केले त्यातला हेतू आज गैरलागू झालेला नाही. तथापि, त्यांचे बदलाच्या गतीचे जे होरे होते, ते सगळेच प्रत्यक्षात आले नाहीत. उदा. महिलांना राजकीय आरक्षणाची गरज तेव्हा त्यांना वाटली नाही. स्वबळावर तसेच सहकारी पुरुषांच्या विवेकबुद्धीने महिलांचे न्याय्य राजकीय प्रतिनिधीत्व साकारेल असे त्यांना वाटले.  या गणतंत्र दिनी संविधान लागू होऊन एकाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही महिलांच्या राज्य किंवा केंद्राच्या कायदेमंडळात महिलांची संख्या निम्मी सोडा, पावही झालेली नाही. १९५१ सालच्या पहिल्या लोकसभेत ५ टक्के महिला होत्या.  सोळाव्या लोकसभेपर्यंत त्या १४ टक्क्यांवर गेल्या आहेत. राज्यांच्या विधानसभेत आज महिलांची सरासरी संख्या आहे ९ टक्के. विवेकबुद्धीवर सोडून भागत नाही, हे कळल्याने १९९६ साली लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक आणले गेले. नगण्य अपवाद वगळता सर्व पक्षीय व जातीय पुरुषांच्या विरोधाने ते गेली २४ वर्षे बाजूला पडले आहे. याबाबत केवळ विषाद वाटून चालणार नाही. संविधाननिर्मितीतील या भागिदार महिलांनी जो कणखर बाणा दाखवला, त्या बाण्याने समानतेच्या खऱ्याखुऱ्या पक्षपात्यांनी या तसेच यासारख्या देशाची पुढे जाण्याची गती कुंठित करणाऱ्या सर्वच हितसंबंधीयांच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. गणतंत्र दिवस हा केवळ उत्सवाचा नाही, तर तो संविधानातल्या मूल्यांच्या पूर्ततेचा आढावा व नव्या संकल्पाचाही दिवस आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(दिव्य मराठी, २६ जानेवारी २०२१)

Sunday, January 24, 2021

जागर संविधानाचा, यात्रा विचारांची...


संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम आम्ही नुकतेच सुरु केले होते. त्यावेळचा प्रसंग. एका अगदी गरीब वस्तीत तिथल्या एका कार्यकर्तीने मोठ्या उत्साहात मला संविधानावर बोलायला बोलाविले. मोलमजुरी करणाऱ्या बाया कामावरुन दुपारी आलेल्या. त्यांच्यासमोर मला बोलायचे होते. अशा गटासमोर बोलताना समोरच्यांना काय ठाऊक आहे त्याचा अंदाज घेत, गप्पा-चर्चा करत पुढे सरकायचे असते. त्यांच्या कामाची वास्तपुस्त झाल्यावर मी प्रश्न विचारला- “संविधान म्हणजे काय?” त्या नुसत्याच बघत राहिल्या. मग मी “घटना म्हणजे काय?” असे विचारले. तेही त्यांना कळेना. काहीतरी घटना म्हणजे प्रसंग घडतो इतका अर्थ त्यांना समजत होता. मी इकडून तिकडून खूप वेगवेगळ्या पद्धतींनी विचारत होतो, समजावत होतो. पण त्यांना काहीही उमगत नव्हते. डीएड-बीएडच्या प्रशिक्षणार्थी शिक्षकाची उत्तम पूर्वतयारी असतानाही पाठ घेताना सुरुवातीच्याच प्रश्नांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित उत्तर न आल्याने जशी भंबेरी उडते तसे माझे झाले होते. शेवटी या बायांतल्या एकीच्या मुलीने मला वाचवले. ती तिथे होती. तिच्या शाळेच्या पुस्तकात संविधानाची उद्देशिका होती. त्यांच्या शाळेत प्रार्थनेनंतर ती म्हणून घेतली जात असे. या उद्देशिकेच्या वर ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते. तिने ही उद्देशिका म्हणजे संविधान असे सांगितले आणि माझे रुतलेले चाक बाहेर आले. तिचे उत्तर त्या अर्थाने बरोबर नव्हते. उद्देशिका म्हणजे संविधान नव्हे. संविधानाची ती प्रास्ताविका. पण बुडत्याला काडीपेक्षा मोठा आधार मिळाला आणि मला चर्चा पुढे नेता आली. 

या वडार बाया होत्या. त्याआधी आम्ही गरीब वस्त्यांत महिलांशी बोललो होतो ते मुख्यतः बौद्ध महिलांशी. तिथे हा प्रश्न नव्हता. या बाया कचरा वेचक म्हणजे अगदी तळच्या आर्थिक स्तरातल्या असल्या, ठार निरक्षर असल्या तरी त्यांना देशाचे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे हे ठाऊक असते. संविधानात काय असते वगैरे तपशील माहीत नसतो. पण आपल्या जीवनाचे भले करणारे, आपल्याला माणूसपण देणारे असे काहीतरी त्यात लिहिलेले आहे हा त्यांचा समज नक्की असतो. संविधान बदलणे म्हणजे आपल्या माणूसपणाचे अधिकार हिरावून घेणे, हेही त्यांना कळते. त्यामुळे या बौद्ध समूहात संविधानाचा प्रचार-प्रसार ही तुलनेने सोपी गोष्ट असते. याच आर्थिक व निरक्षर थरातल्या अन्य मागास जातिसमूहांतील बायांत हे कठीण होते. त्यांच्यातल्या पुरुषांशी बोलताना तेवढी अडचण येत नाही. त्यांना आंबेडकर हा संदर्भ बहुतकरुन ठाऊक असतो. संविधान व त्या अनुषंगाने चाललेल्या राजकारकारणाबाबत अतिगरीब बौद्ध पुरुष हे या बौद्धेतर पुरुषांहून अधिक जाणते असतात. 

खरं तर संविधानाबाबतच्या विविध आर्थिक व शैक्षणिक थरातल्या जाणतेपणाला खूप खूप मर्यादा आहेत, हे पुढे कळत गेले. सुरुवातीला ज्या मुलीने प्रास्ताविका हेच संविधान म्हणून सांगितले यात तिचा बहुधा दोष नसावा. कारण मुलांपुढे संविधानाचे सत्र घेताना मला काही ठिकाणी शिक्षकच आमच्या मुलांना संविधान पाठ असल्याचे अभिमानाने सांगतात. पहिल्या वेळी मला आश्चर्य वाटले. पण मुलांनी उद्देशिका म्हणायला सुरुवात केल्यावर कळले की सरांना उद्देशिका म्हणजेच संविधान म्हणायचे आहे. तेव्हा आता आश्चर्य वाटत नाही. ते खजिल होणार नाहीत, अशा बेताने उद्देशिका व संविधान हा फरक मी लक्षात आणून देतो. पुढे आम्ही प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी सत्रे घेऊ लागलो. कार्यकर्त्यांची शिबिरे आयोजित करु लागलो. 

शिबिरांत घटनेशी संबंधित विविध विषय घेतो. पण एकच सत्र घ्यायचे असले तर ‘उद्देशिकेतील मूल्यांचा परिचय’ यावर भर देतो. उद्देशिकेत घटनेचे सार आहे. ती एकाच वाक्याची आहे. ती विद्यार्थ्यांना बहुधा पाठ असते. इतर शिक्षित विभागाला तिची माहिती असते. काहींच्या घरात, कार्यालयात ती फ्रेम करुन लावलेली असते. त्यामुळे घटना समजून घ्यायची म्हणजे काहीतरी अपरिचित, गहन ऐकायचे आहे, या दडपणातून लोक बाहेर निघतात. त्यातील मूल्ये, संकल्पना यांच्या चर्चा वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे व समोरच्यांच्या समजाप्रमाणे घडवता येतात. त्यातून आताच्या प्रश्नांवर भाष्य करता येते. इतिहास, संस्कृती सांगता येते. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखालील लोकांतही जाता येते. त्यांच्या शाळा-कॉलेजांतही बोलता येते. कारण प्रत्येक पाठ्यपुस्तकात उद्देशिका छापलेली असते. ती समजून सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत, म्हटल्यावर फारसा प्रश्न येत नाही. अशा ठिकाणी थेट काही नावे किंवा उदाहरणे टाळण्याची दक्षता घेतली की पुरे होते. 

फार कमी ठिकाणी सार्वभौमत्व, समाजवाद व गणराज्य या शब्दांचे व्यवस्थित अर्थ अगदी शिकलेल्या मंडळींकडून, अनुभवी कार्यकर्त्यांकडून सांगितले गेले. धर्मनिरपेक्षता संकल्पनेचा गोंधळ असतोच. अलिकडे तो अधिकच आहे. सार्वभौम म्हणजे सगळे मिळून, समाजवाद म्हणजे समाजात वाद नको असे काहीही सांगितले जाते. समाजात वाद नको म्हणजे समाजवाद हा अर्थ तर मला एका डाव्या पक्षाच्या ट्रेड युनियन कार्यकर्त्यांनी सांगितला. नव्या पिढीला समाजवाद ही संकल्पनाच अनोखी वाटते. घटना बाबासाहेबांनी घरी किंवा कार्यालयात बसून लिहिली व राजेंद्र प्रसादांच्या हाती सोपवली हा समज आंबेडकरी तसेच बिगर आंबेडकरी अशा सर्व समूहांत मला आढळला. संविधान सभेची निर्मिती, त्यातील चर्चा, आजच्या लोकसभा किंवा राज्यसभेत चालते तशी ही चर्चा असे, बाबासाहेब आंबेडकरांचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणजे नेमके काय हे मग संगतवार समजवावे लागते. बिगर आंबेडकरी वा पुरोगामी वर्तुळाच्या बाहेरील लोकांत आंबेडकरांनी संविधान लिहिल्याने हे आरक्षण आले, त्यामुळे दलितांचे लाड चाललेत असा समज असतो. आंबेडकरांची ही घटना आपल्यावर लादली गेली असेही काहींना वाटते. घटना हा सर्व भारतीयांच्या प्रतिनिधींनी चर्चा करुन तयार केलेला सहमतीचा सामायिक दस्तावेज आहे, हे त्यांना नवीन असते. 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी काही सत्रांत भेटतात. त्यातील आंबेडकरी समूहातील विद्यार्थ्यांचे नेहमीचे एकदोन प्रश्न असतात. त्यांचे सवर्ण मित्र म्हणतात, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर नाहीतच. सर बेनेगल नरसिंग राव यांनी ती लिहिली. दुसरे काही म्हणतात, नेहरुंचा त्यात खूप मोठा वाटा आहे. बाबासाहेबांना एकट्याला श्रेय दिले जाते हे बरोबर नाही. हेच प्रश्न सवर्ण विद्यार्थ्यांकडूनही मला येतात. यातील आंबेडकरी समूहातील विद्यार्थ्यांना घटनेचे श्रेय बाबासाहेबांनाच हवे, त्यात कोणी वाटेकरी नको असे वाटत असते. तर सवर्ण विद्यार्थ्यांना संविधानाचे शिल्पकार ही बाबासाहेबांची उपाधी नको असते. त्यासाठी त्यांची कामगिरी ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून या दोन विभागांतील जातीय ताण काय प्रकारचा आहे, हेही कळते. यावेळी मग कोणताही निष्कर्ष आधी मांडण्याऐवजी मी घटना निर्मितीची प्रक्रिया क्रमवार सांगतो. त्यात बी. एन. राव यांनी घटनेचा पहिला मसुदा केला. मात्र प्रशासकीय वा तज्ज्ञ अधिकारी घटना करणार नाही, घटना करणारे लोकांचे राजकीय प्रतिनिधी असतील हे ठरवले गेल्याने त्यांच्या मसुद्याची चिकित्सा करुन त्याची नवी रचना बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केली गेली. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या. त्यांच्या शिफारशींवर चर्चा झाल्या. काही स्वीकारल्या गेल्या. काही फेटाळल्या गेल्या. नेहरु हे निःसंशय आधुनिक भारताचे रचनाकार होते. घटना समितीत प्रचंड बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचे ते प्रमुख नेते होते. पुढे पंतप्रधान झाले. घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडण्यापासून घटनेच्या पायाभूत मूल्यांच्या संस्थापनेत त्यांची मोठी भागिदारी होती. काँग्रेस सदस्यांना समजावून, कधी व्हेटो वापरून घटनेतल्या अनेक बाबी घडवण्यात ते सहभागी होते. बाबासाहेबांच्या कामगिरीबद्दल विशेषतः मसुदा समितीत एकहाती त्यांच्यावर आलेल्या जबाबदारीबद्दल घटना समितीतल्या अनेकांनी बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता, प्रशंसा व्यक्त केली आहे. खुद्द घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांबद्दल जी भावना व्यक्त केली आहे, त्यातून त्यांचे शिल्पकारपद सिद्ध होते. ते आंबेडकरी समूहाने नव्हे, घटना समितीतल्या खूप मोठ्या लोकांनी त्यांना बहाल केले आहे. बाबासाहेबांनीही या कार्यात मदत झालेल्या सर्वांचा आदराने उल्लेख केला. आभार मानले आहेत. त्यात बी. एन. राव आहेत. काँग्रेस पक्ष आहे. हे सर्व सांगितल्यावर मग या विद्यार्थ्यांना कळते की ही मंडळी परस्परविरोधी नसून या सगळ्यांचा घटनेच्या रचनेत सहभाग आहे. तो कबूल केल्याने बाबासाहेबांचे महानपण कमी होत नाही किंवा इतरांचे योगदान दुर्लक्षिले जात नाही. घटना ही या सगळ्यांच्या कष्टाचा परिपाक आहे. 

आंबेडकरी समूहातील बामसेफ, बीएसपीच्या प्रभावाखालील लोकांना बाबासाहेबांना घटना समितीत दुसऱ्यांदा निवडण्यात काँग्रेसने केलेले सहकार्य किंवा गांधीजींनी त्यांचा केलेला पुरस्कार हे सहन होत नाही. त्यावेळीही थेट उत्तर देण्याऐवजी त्यावेळचा घटनाक्रम मी तपशीलात मांडतो. एकूण पुणे करार व त्यानंतरच्या बाबासाहेबांच्या काँग्रेस, गांधींजींवरील कठोर टीकेमुळे बाबासाहेबांचे घटना समितीत काँग्रेस नेत्यांकडून अजिबात स्वागत नव्हते. पण नेहरुंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर टीका करताना त्यांच्या भाषणातून जी प्रगल्भ राष्ट्रीय जाणीव व्यक्त झाली, त्याने अख्खी संविधानसभा प्रभावित झाली. त्यानंतर बाबासाहेबांना अनेक महत्वाच्या समित्यांवर घेतले गेले. या क्रमात बाबासाहेब आता देशाची गरज झाले. फाळणीमुळे त्यांचा बंगालमधील मतदार संघ पाकिस्तानात गेल्याने त्यांच्यावर घटना समितीच्या बाहेर पडण्याची वेळ आली. अशावेळी मुंबई प्रांतातून काँग्रेसचे मावळणकर हे मोठे नेते घटना समितीवर निवडून येणार होते, त्यांना बसवले गेले व बाबासाहेबांना काँग्रेसने निवडून आणले. त्यामुळे काँग्रेसचा बाबासाहेबांना आधी विरोध होता, हे खरे तसेच त्यांना पुन्हा घटना समितीवर निवडून आणून त्यांच्या हस्ते घटना पूर्ण करण्यात मोठा सहभाग होता तो काँग्रेसचाच. मतभेद असतानाही सामायिक राष्ट्रीय हितासाठी एकत्र कसे यावे याचा हा वस्तुपाठ आहे. 

हे मांडल्यावर बरेच जण ते पहिल्यांदाच कळले व खूप वेगळे आहे, असे सांगतात. तर काहींना बाबासाहेब व गांधीजी, नेहरु, काँग्रेस यांचे साहचर्य अजूनही खटकतच राहते. 

सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आरक्षणाची चर्चा सुरु झाली की उच्चवर्णीय व दलित, अधिककरुन बौद्ध यांत ताण तयार होतो. इतिहासाने दिलेले हे कर्ज लवकर उतरवून सगळे समान संधीच्या एका रेषेवर येण्यासाठीची ती तात्कालिक उपाययोजना आहे; हे घडले की आरक्षणाची गरज राहणार नाही, हे उच्चवर्णीयांपैकी अनेकांना पटत नाही. काहींचे तर कान बंद होतात. काही अविवेकी, तर्कहिन वाद घालू लागतात. दलितांबद्दलचा दुस्वास किती तीव्र आहे ते कळू लागते. आधीच्या मांडणीतून माझ्याविषयी झालेले त्यांचे बरे मत इथे बदलू लागते. त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण मला एक बाजू इथे घ्यावी लागते. इथे त्यांचे थोडे, यांचे थोडे असे करता येत नाही. 

साने गुरुजी स्मारकात एक कॉलेजवयीन तरुण मुलांचे शिबीर होते. त्यात पुरोगामी कार्यकर्त्यांची मुलेही होती. तिथे आरक्षणाचा विषय सुरु झाल्यावर ही पुरोगामी कार्यकर्त्यांची मुलेही मेरिटचा मुद्दा जोरात मांडू लागली. मी त्यांना एक घटना सांगितली. 

सरकारी मेडिकल कॉलेजला एका दलित मुलाला प्रवेश मिळाला नाही. त्याचे गुण उत्तम होते. पण प्रवेश मिळालेल्या अन्य अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचे गुण त्याच्यापेक्षा अधिक होते. ठराविक जागा होत्या. त्या भरल्या गेल्याने त्याला आरक्षित जागेचा लाभ मिळाला नाही. याचवेळी या दलित विद्यार्थ्यापेक्षा कमी गुण असलेल्या एका उच्चवर्णीय विद्यार्थ्याने एका खाजगी अनुदानित मेडिकल कॉलेजमध्ये लाखो रुपये बिगर पावतीचे पैसे भरुन प्रवेश घेतला. एवढे पैसे दलित विद्यार्थ्याकडे नसल्याने तो हा मार्ग अवलंबू शकला नाही. त्याला मेडिकलचा नाद सोडावा लागला. आता तो उच्चवर्णीय विद्यार्थी डॉक्टर झाला आहे. पण हा दलित विद्यार्थी डॉक्टर होऊ शकला नाही. 

याचे काय करायचे? आरक्षणाने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, हे तुमचे म्हणणे असेल तर इथे कोणावर अन्याय झाला? पैश्याने गुणवत्ता कशी खरेदी करता येते? ..मी मुलांना प्रश्न केला. 

सगळे गप्प झाले. दुपारच्या जेवणाच्या वेळात चौकशी केल्यावर कळले की यातली अनेक मुले अशा खाजगी विनाअनुदानित कॉलेजांत बक्कळ पैसे भरुन शिकत आहेत. जातीबरोबरच हा आर्थिक वर्णही आपली कुंपणे, आपले निकष तयार करतो. या वर्णातल्यांना आपली व आपल्यापेक्षा कमी आर्थिक कुवत असलेल्यांचे मूल्य समान वाटत नाही. दोघांसाठी वेगळे मापदंड असतात, हे त्यांच्या मनात कोरले गेले आहे. दलितांतून आरक्षणाचा लाभ घेतलेले व आता या आर्थिक थरात असलेल्यांचेही हेच दंडक असतात. तुमची मुले आता विनाअनुदानित खर्चिक शाळा-कॉलेजात जातात. मात्र तुम्ही ज्या वस्तीतून आलात, तेथील मुलांना अत्यंत वाईट अवस्थेतल्या शाळांत जावे लागते. शिक्षण हे सगळ्या मुलांना उत्तम दर्जाचे मोफत किंवा परवडण्यासारखे मिळायला नको का? ..याला त्यांचेही उत्तर ‘ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे लोक मुलांना शिक्षण देणार’ हेच असते. 

हे किंवा यानंतरही मी नोंदवणार असलेले अनुभव महाराष्ट्रात आणि बाहेरही सार्वत्रिक आहेत. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, रत्नागिरी, बीड, सातारा, कोल्हापूर ही जिल्ह्याची शहरे असोत किंवा त्यांतील तालुक्यांची ठिकाणे असोत. सामाजिक-आर्थिक श्रेणीप्रमाणे मिळणाऱ्या प्रतिसादाचे, समज-गैरसमजांचे स्वरुप सारखे असते. 

आपण अजून खरेखुरे लोकशाही राष्ट्र झालेलो नाहीत. जोवर जातीच्या तसेच आर्थिक विषमता तीव्र आहेत, तोवर आपण एक राष्ट्र बनणे अशक्य आहे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत तसेच बाहेरही सतत मांडलेले आहे. जाणिवांच्या बाबतीत जिथवर आपण प्रगती केली होती, तिथूनही आता आपण खाली उतरत आहोत. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हवे की नको याला उत्तर ‘हो’ असेच मिळते. पण त्याची उदाहरणे घेऊन चर्चा करायला सुरुवात झाली की समोरच्यांत धर्म, जातनिहाय अस्वस्थता तयार होते. 

मध्ययुगीन प्रबोधनाचा भारतीय संविधानाशी संबंध सांगताना कबीराच्या ‘पाथर पूजे हरि मिले तो मैं पूजू पहाड’ या विधानाला प्रतिसाद देणारे मुस्लिम त्याच्या ‘काकर-पाथर जोडी के मस्जिद लय बनाय, ता चढ़ी मुल्ला बांग दे, क्या बहरा हुआ खुदाय’ यावर रुष्ट होतात. तस्लिमा नसरीनचे म्हणणे तुम्हाला मान्य नसेल. तिचा निषेध जरुर करावा. पण तिला औरंगाबादमध्ये आम्ही प्रवेशच देणार नाही, अशी तेथील मुस्लिम गटांनी धमकी देऊन विमानतळावरुनच तिला परतायला लावणे, हे तिच्या लोकशाही अधिकाराचे हनन नाही का? हेही सत्रातील मुस्लिमांना पटत नाही. काही जण तर खूप संतापतात. हमारे इस्लाम में इसकी इजाजत नहीं वगैरे बोलू लागतात. हिंदू कट्टरपंथीयांच्या कारवायांबद्दल आम्ही टीका करत असतो ती त्यांना एकदम पटत असते. पण स्वतःवर आले की त्यांचे निकष बदलतात. यातले गप्प राहिलेले एक-दोन सत्र संपल्यावर भेटतात. खाजगीत सांगतात – “तुमचे म्हणणे पटले. पण आमच्यातल्या या कर्मठांना ते पटायचे नाही. तेवढे तस्लिमा, कबीर वगळून बोललात तर बरे होईल.” 

घटना आमच्या बापाने लिहिली आहे, ती आमच्या रक्तातच आहे…या सुमारपणावरची टीका आंबेडकरी विभाग ऐकून घेतो. पण बाबासाहेबांच्या व्यंगचित्राचा अकरावीच्या पुस्तकात समावेश करण्यावरुन सुहास पळशीकरांच्या कार्यालयाची मोडतोड करणाऱ्या आंबेडकरवाद्यांचे काय करायचे? अरुण शौरींनी बाबासाहेबांवर टीका करणारे पुस्तक लिहिले म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काय करायचे? यावर आंबेडकरी विभागही गप्प राहतो. त्यांचा गोंधळ उडतो. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला सोडायचे कसे? त्याला धडा शिकवायला नको का? आपण गप्प राहून फक्त निषेध करायचा, टीकेचा टीकेने प्रतिवाद करायचा हे त्याला अगदीच श्यामळू वाटते. दलित पँथरच्या विद्रोही संस्कृतीत एका बाजूला त्यांनी जबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतले. पण दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांना देवत्व बहाल करुन त्यांच्याविरोधात बोलणाऱ्याला धर्मद्रोही केले गेले. इथे १९७२ साली स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राजा ढालेंचा साधनेतील राष्ट्रध्वजाबद्दल निरर्गल विधाने करणारा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख किंवा नामदेव ढसाळांची ‘’पंधरा ऑगस्ट एक महाकाय भगोष्ठ..कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा..स्वातंत्र्य कुठच्या गाढवीचं नाव’ ही कविता मी नमूद करतो. एवढे कठोर लिहूनही त्यांच्यावर त्यावेळी कायदेशीर कारवाई झाली नाही. कोणी त्यांना देशद्रोही म्हणून आत टाकले नाही, हे कसे काय? आता मात्र त्यांना नक्की आत टाकले गेले असते. ..वगैरे मुद्दे उपस्थित करतो. यातून मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करण्यात बाबासाहेबांच्या अनुयायांनी अधिकच दक्ष व उदार असले पाहिजे, यावर चर्चा घडवतो. 

यालाच जोडून श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याची चर्चा आम्ही करतो. हिंदू धर्म सोडून बौद्ध होताना बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांना धर्माज्ञेसारखे स्वरुप बौद्ध विभागात आहे. प्रत्यक्षात त्यातील सगळे पाळले जाते असे नाही. पण समाज म्हणून ते पाळले गेलेच पाहिजे असा दंडक तयार झाला आहे. यातून प्रश्न तयार होतो, तो आंतरजातीय/धर्मीय लग्नाच्या वेळी व त्यानंतर. पुरुष प्रधानतेमुळे अशी लग्ने ही बहुतेक नवऱ्याच्या धर्माप्रमाणे होतात. नवरीला नवऱ्याच्या धर्मात धर्मांतरित व्हावे लागते. बौद्धांच्यातही हेच चालते. आम्ही घटनेतील मूल्यांचा हवाला देऊन प्रश्न उपस्थित करु लागलो – ज्या हिंदू मुलीने बौद्ध मुलाशी लग्न करायचे ठरवले, ते त्याच्या धर्माकडे बघून नाही. तिला तो धर्म पटला म्हणून नाही. तर तिला तो मुलगा आवडला म्हणून. अशावेळी लग्नात तिचा धर्म बदलण्याचे प्रयोजन काय? बाबासाहेबांच्या घटनेने तिला तिचा धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ते आपण हिरावून घेत नाही का? वास्तविक धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब. लग्नाशी त्याचा संबंध येता कामा नये. म्हणूनच अशी लग्ने कोणत्याही धर्मपद्धतीने न करता विशेष विवाह कायद्याखाली व्हायला हवीत. त्यास आपण प्रोत्साहन द्यायला हवे. 

या चर्चेत लोकांना एका बाजूला तथ्य वाटते. पण दुसरीकडे पारंपरिक धर्म व त्याभोवतीची अस्मिता यांचे संस्कार बौद्धांच्यातही खोलवर रुतल्याने त्यांना व्यवहारात ते पटत नाही. हिंदू बायको, पण तिने बौद्ध संस्कारांतच राहायला हवे, असे पुरुषप्रधान आग्रह करकचून होतात. बौद्ध संघटनांतील मातब्बरांकडूनही तू तुझ्या बायकोला ताब्यात ठेवू शकत नाहीस का? ती अजून हिंदू कशी? अशी फर्माने निघत असतात. 

आमच्या या गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांतून काही जोडपी प्रेरित होऊन त्यांनी आपली लग्ने व संसार नव्या पद्धतींनी रचायला सुरुवात केली आहे. संविधानाला साक्ष ठेवून किंवा विशेष विवाह कायद्याखाली लग्न, कोणी कोणाचे धर्म न बदलणे, बायकोने लग्नानंतरही तिचेच नाव-आडनाव लावणे हे होऊ लागले आहे. 

हल्ली आंतरजातीय/धर्मीय लग्ने वाढू लागली आहेत. पण त्यांमागे विचारांचा भाग कमी असतो. आमच्या पिढीत होणाऱ्या अशा लग्नांना चळवळींची, विचारांची पार्श्वभूमी असे. आता तसे दिसत नाही. मात्र तरुण मुलांशी कॉलेजमध्ये, बाहेर बोलताना विशेष विवाह कायदा, बायकोचा धर्म, आडनाव न बदलणे याची जाणीव करुन दिल्यावर त्यांचा प्रतिसाद चांगला असतो. असे काही माहीतच नव्हते. याचा आम्ही जरुर विचार करु, असे ही मुले बोलून दाखवतात. 

आपण माघारी चाललो आहोत, याचा ठळक प्रत्यय सेक्युलॅरिझम-धर्मनिरपेक्षता यांच्या चर्चेवेळी येतो. सरकारचा कोणता धर्म नाही हे सर्वसाधारणपणे पटते. त्याने सर्व धर्मांचा आदर करायला हवा, हेही पटते. पण बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंचा वरचष्मा राहायलाच पाहिजे, असे हिंदूंना वाटते. म्हणजे काय हे नीट सांगता येत नाही. पण मुसलमानांनी मापात राहायला पाहिजे, हे ते नक्की सांगतात. सोरटी सोमनाथच्या मूर्तिप्रतिष्ठापनेला राष्ट्रपती पदावर असताना राजेंद्र प्रसादांनी जाऊ नये, अशी नेहरुंनी विनंती केली होती, हे त्यांना पटत नाही. मोदींनी राममंदिराचे सरकारी भूमिपूजन केले यात त्यांना काही वावगे वाटत नाही. हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात हिंदूंना एवढाही अधिकार नाही का? असा त्यांचा प्रश्न असतो. काँग्रेसच्या काळात हे चालले. आता यापुढे हे चालणार नाही, असेही हे लोक बोलतात. हा मुद्दा समजावणे आम्हाला हल्ली कठीण जाते आहे. 

CAA/NRC विरोधातल्या आंदोलनांवेळीही हिंदूंना आणि बौद्धांनाही समजावणे कठीण जात होते. आम्ही आमच्या संघटनेकरवी निदर्शने अनेक केली. आमच्यात बहुसंख्याक असलेले बौद्ध कार्यकर्ते त्यात सहभागी होत राहिले. निदर्शने संघटित करण्यातही त्यांचा पुढाकार होता. पण शाहीन बागेच्या धर्तीवर मुंबई बागेत बसलेल्या महिलांना पाठिंबा द्यायला जाण्याची तत्परता काही या मंडळींकडून दाखवली गेली नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीत अनेक भागातली बौद्ध मंडळी हिंदूंच्या बाजूने मुसलमानांच्या विरोधात उतरली होती. मुसलमानांबद्दलची ही भावना बौद्ध समाजात आजही तीव्र आहे. 

राष्ट्रवादाची संकल्पना समजून सांगताना आपला राष्ट्रवाद हा ‘जय भारत-जय जगत’ वाला आहे. तो सगळ्या जगाचे मंगल चिंतितो, हे आमचे म्हणणे ऐकून घेतले जाते. पण पाकिस्तानचा संदर्भ आला की आक्रमक, संकुचित राष्ट्रवादाच्याच बाजूने लोकांचा कल आहे हे कळते. काश्मीरचे विभाजन, ३७० कलम काढून घेणे व त्यानंतर तेथील जनतेला वर्षभर बिगर इंटरनेटचे कैद करणे यातली वेदना त्यांना पोहोचत नाही. ज्यारीतीने काश्मिरचा निर्णय घेतला गेला, त्यामुळे सांविधानिक नैतिकतेला सुरुंग लावला गेला हे मुसलमानांबद्दलच्या मनातल्या अढीमुळे समजून घेतले जात नाही. एखाद-दोन लोक जे कुठल्या तरी पुरोगामी चळवळीच्या मांडवाखालून गेलेले असतात तेच या मांडणीला रुकार देतात. 

आमच्या या मर्यादित प्रयत्नांतून प्रबोधनाबरोबर जे कृतिकार्यक्रम घेतले त्यात आश्वासक बाबी नक्की आढळल्या. आमच्या संघटनेसारख्या अनेक संघटना एकत्रित येऊन संविधान दिनाच्या निमित्ताने ‘संविधान जागर यात्रा’ आम्ही जोरदार संख्येच्या करु शकलो. यात आंबेडकरी, समाजवादी, गांधीवादी, कम्युनिस्ट असे पुरोगामी वर्तुळातल्या विविध प्रवाहांची चांगली एकजूट दिसली. आंबेडकरी समूहाला या निमित्ताने गांधीजी, नेहरु समजावता आले. किमान त्यांच्याप्रति आपण अद्वातद्वा बोलता कामा नये, त्यांच्या अनुयायांसहित आपण एकदिलाने काम केले पाहिजे याला मान्यता मिळाली. मराठा क्रांती मोर्चे सुरु झाले त्यावेळी त्याच्या विरोधात संविधान सन्मान मोर्चे काहींनी सुरु केले. असे काहीही न करता आरक्षण व दलित अत्याचार कायदा आढावा परिषदा आम्ही संघटित केल्या. त्यात दलित, मराठा, ओबीसी युवक एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. सर्वांनी मिळून आरक्षणाचे व दलित अत्याचार कायद्याचे आजवर काय झाले, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन त्यावर मत बनवायचे आवाहन केले. यामुळे सगळे सहमतीत आले असे नाही. पण गैरसमज दूर होऊन परस्परांशी संवाद ठेवायची तयारी नक्की झाली. मला अनेक मराठा युवकांचे त्या काळात फोन आले. त्यांना माझे सगळेच पटत नव्हते. पण माझ्याशी संपर्क ठेवायची, संवाद करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही आमची मिळकत आहे, असे मला वाटते. 

आम्ही संविधान परिचय वर्ग, त्यातून प्रचारक कार्यकर्ते तयार करणे, संविधान साक्षर वस्ती, संविधान साक्षर शाळा, वस्तीत संविधान शाखा, असे नियमित उपक्रम करत असतो. करोनामुळे प्रत्यक्ष जमताना नीट काळजी घेतो. वेबसंवादाच्या मार्फत प्रबोधनपर सत्रे, चर्चा सध्या घेत आहोत. 

मी किंवा आता संविधानाच्या प्रचारात उतरलेले अनेक कार्यकर्ते हे मुळात दलित-कष्टकऱ्यांच्या भौतिक प्रश्नावर, स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारे. आमच्या कामात संविधानाचा संबंध त्यातील काही मूल्यांचा उल्लेख करण्यापुरता असे. ज्यांच्यात आम्ही काम करतो, ती मंडळी संविधानाच्या मूल्यांचा आदर करणारच हे आम्ही गृहीत धरले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या दंगलींनी आम्ही सावध झालो. संविधान, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव यावर अधिक बोलू लागलो, काम करु लागलो. पण नंतर ते सुटले. त्यात सातत्य राहिले नाही. आम्ही पुन्हा आमच्या भौतिक प्रश्नांवरच्या लढाईत रुजू झालो. गुंतून गेलो. मोदींच्या भरभक्कम बहुमताने सत्तेवर येण्याने आम्ही दचकलो. त्यानंतर जी भारतीय संस्कृतीची, सांविधानिक मूल्यांची जोरदार मोडतोड सुरु झाली. रस्त्यावर संघपरिवाराची चौखूर उधळलेली पलटण आणि त्यांना केंद्रातील सत्तेतून मिळणारे सहाय्य व प्रोत्साहन यांनी आम्ही पुरते नाही पण बरेचसे भानावर आलो. आमच्या चळवळीतून तयार झालेत असे वाटलेले लोकांचे आधार आमचे नाहीत, याचा साक्षात्कार होऊ लागला. भौतिक प्रश्नांवरील लढाया चालू असतानाच लोकांच्या मनाची वैचारिक मशागत करायची असते हे आपण विसरलो किंवा त्यावर खास लक्ष दिले नाही, हे तीव्रतेने कळले. त्यातून मग संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम पुरोगामी चळवळीतल्या अनेक मंडळींनी एक प्रमुख काम म्हणून समांतरपणे सुरु केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणूस मरतो त्याप्रमाणे विचारही मरतो. विचार अमर्त्य असत नाही. एखाद्या रोपाची जोपासना करायला जसे नियमित पाणी घालावे लागते, तशी विचारांचीही जोपासना करावी लागते. विचारांचा प्रचार करावा लागतो. वर्तमानातील प्रश्नांशी त्याचे नाते जोडावे लागते. नवे भाष्य करावे लागते. तरच विचार जिवंत राहतात. 

संविधान हाही विचार आहे. देशाची ती भूमिका, संकल्प आहे. लोकांच्या मनात तो रुजला नाही, तर केवळ पुस्तकात राहील. घटनेचे पुस्तक पवित्र मानले जाईल. पण व्यवहार त्याच्या विरोधात केला जाईल. विचार व व्यवहार यातली विसंगती कळणार कशी? त्यासाठी घटनेत काय आहे हे तर कळले पाहिजे. म्हणूनच ही लोकांच्या मनाची मशागत करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. अर्थात त्यातून येणाऱ्या वर नोंदवलेल्या अनुभवांतून आमच्याच मनाची मशागत अधिक होते आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(वसा, दिवाळी अंक, २०२०)

Sunday, January 17, 2021

संविधान समजून का घ्यायचे?


संविधान दिनाला एका शाळेत पाहुणा म्हणून गेलो असताना मुलांना प्रश्न केला, “आपल्या देशाचे संविधान कोणी कोणी पाहिले आहे?” 

जवळपास सगळ्यांचे हात वर झाले. मग मी पुढचा प्रश्न केला, “कोठे पाहिलेत?” 

मुलांनी भिंतीकडे बोट केले. मी तिकडे पाहिले. भिंतीवर संविधानाची उद्देशिका फ्रेम करुन लावलेली होती. मुले उद्देशिकेलाच संविधान समजत होती. मुलांची चूक नव्हती. कारण उद्देशिकेच्या प्रारंभी मध्यभागी महिरपीत मोठ्या अक्षरांत ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते. त्याखाली तुलनेने छोट्या अक्षरांत ‘उद्देशिका’ लिहिलेले आहे. मुलांनी संविधानाचे पुस्तक पाहिलेले नव्हते. त्यांना कोणी दाखवलेले नव्हते. शाळांमधून बव्हंशी हाच अनुभव येतो. 

त्याचबरोबर संविधान पाहिलेले तरुण, प्रौढ लोकही खूप भेटतात. त्यांच्यापैकी काहींच्याकडे घरी संविधान असतेही. काय असते त्यात? असे विचारल्यावर कलमे, भाग, अनुसूची यांच्या संख्या सांगणारेही हुशार लोक त्यात असतात. काही तर ‘संविधान म्हणजे देशाच्या कारभाराची नियमावली’ असे नेमकेपणाने सांगण्याइतपत जाणकार असतात. ‘आमच्या रक्तातच संविधान आहे’ असे अभिमानाने सांगणारेही कमी नसतात. 

अलीकडे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा होण्याचे प्रमाण वाढले आहे. या दिवशी संविधान रथात ठेवून त्याच्या वाजत, गाजत, नाचत मिरवणुकाही निघतात. संविधान हा पूज्य, पवित्र ग्रंथ होऊ लागला आहे. हे सगळे व्हावे, परंतु, संविधानाचे आपल्या जीवनातील महत्व व त्याचे मर्म आपल्याला ठाऊक असणे हेही त्याचबरोबर व्हायला हवे. उद्देशिकेलाच संविधान समजणाऱ्या मुलांपासून, संविधान पाहिलेल्या, संग्रही असलेल्या, रक्तातच असणाऱ्या, जोरदार मिरवणुका काढणाऱ्या सर्वांना हे कळणे गरजेचे आहे. 

आता राजे नाहीत. ‘आम्ही भारताचे लोक’ आमचे प्रतिनिधी निवडून देऊन त्यांच्यामार्फत देश चालवतो. भारताचे संविधान ही केवळ देशाच्या कारभाराची नियमावली नव्हे. देशाच्या विविध भागातील प्रतिनिधींचा समावेश असलेल्या आपल्या संविधान सभेने सुमारे तीन वर्षांच्या विचारविनिमयाने संमत व स्वीकृत केलेला तो भारतीय नागरिकांचा सामायिक संकल्प आहे. भारत कसा घडवायचा याचे ते मार्गदर्शन आहे. आपण निवडणुकीतून ज्यांच्या हातात कारभाराची सूत्रे देतो, त्यांच्या कामाचे मापन करण्यासाठीचा तो मापदंड आहे. जीवन स्थिर नसते. ते सतत बदलत असते. या बदलाला अनुसरुन संविधानातही दुरुस्त्या आवश्यक असतात. राज्यकर्ते करत असलेल्या या दुरुस्त्या संविधानाला पुढे नेणाऱ्या आहेत की मागे यावर देशाचे मालक म्हणून नागरिकांची नजर असायला हवी. अशा जागृत नागरिकाच्या कसोटीला उतरण्यासाठी अख्खे संविधान किंवा त्याचा बारीक तपशील नव्हे, तर किमान त्याची पायाभूत सूत्रे आपल्याला ठाऊक असायला हवीत. नोकरीधंद्यासाठी आपल्याला काहीएक प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याचप्रमाणे नागरिक होण्याची पात्रता म्हणून संविधानाची ही किमान पायाभूत सूत्रे आपल्याला माहीत हवीच. 

आपल्या अवतीभोवती आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय घटना घडत असतात. नवे प्रश्न, नवी आव्हाने उभी राहत असतात. केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतीविषयक तीन कायदे रद्द करण्यासाठी लाखोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दीड महिने तटून बसलेत. त्याआधी आलेला नागरिकता दुरुस्ती कायदा रद्द करण्यासाठी असेच दीर्घ काळ आंदोलन चालले. कोरोनामुळे ते स्थगित झाले. एका बाजूला आरक्षण केवळ आर्थिक निकषांवर द्या अशी मागणी होते, तर दुसरीकडे मराठा, पटेल, जाट असे नवे विभाग आरक्षण मागतात. मराठा समाजाला राज्यात मिळालेल्या आरक्षणाला आव्हान मिळून ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यात एक मुद्दा ५० टक्क्यांच्या वर आरक्षणाचे प्रमाण जाता कामा नये, असा आहे. लव्ह जिहाद ही एक नवी संकल्पना जन्माला घातली गेली आहे. या लव्ह जिहादला अटकाव करायला उत्तर प्रदेश सरकारने वटहुकूम काढला. मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक ही राज्ये असेच कायदे करायच्या तयारीत आहेत. कोणी राष्ट्रगीताला उभा राहिला नाही म्हणून, कोणी भारतासहित पाकिस्तान व अन्य देश झिंदाबाद म्हटले म्हणून त्यांना राष्ट्रद्रोही मानले गेले व त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. काहींना अटकही झाली. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान हे सगळे एकच की यात अर्थाचे ठळक फरक आहेत? धर्मनिरपेक्ष देशात पंतप्रधानांनी मंदिराच्या भूमिपूजनाचे यजमान बनणे हे धर्मनिरपेक्षतेत बसते का? केंद्र सरकारने संवैधानिक रीतीने कायदे केले, पण त्यांत सांविधानिक नैतिकता पाळली गेली नाही असा आरोप होतो. याचा अर्थ काय? 

....अशा तमाम बाबी, मुद्दे आपल्या सार्वजनिक जीवनात उसळत असतात. या सगळ्याचा घटनेशी संबंध काय, त्यांच्या सोडवणुकीसाठी घटनेत काही मार्गदर्शन आहे काय, की घटनाच याला प्रतिसाद द्यायला अपुरी पडते आहे, की घटनाच धाब्यावर बसवली जाते आहे, याचा वेध आपण या सदरातील लेखांमधून घेणार आहोत. वर उल्लेख केलेल्यांपैकी काही तसेच नव्याने घडणाऱ्या घटनांचा घटनेतील मूल्यांच्या संदर्भात अन्वयार्थ लावणार आहोत. 

संविधान अमलात आल्याला या गणतंत्र दिनी एकाहत्तर वर्षे पूर्ण होतील. संविधान मंजूर होण्याच्या आदल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना इशारा देणारे शेवटचे भाषण केले. त्याची सविस्तर चर्चा पुढे कधीतरी आपण करुच. इथे त्यातील फक्त एक उल्लेख करतो. ते म्हणतात – 

‘२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.’ 

आपल्या आसपास डोळे उघडून आपण पाहिले, तर हे शब्द आजही तीक्ष्ण सुरीसारखे आपल्या काळजात घुसतात. हे भाषण करणारे बाबासाहेब तसेच घटनेला आकार देणारे इतर कोणी आज हयात नाहीत. आज आपण आहोत. संविधानाच्या शिल्पकाराची ही भविष्यवाणी खरी व्हायची नसेल, तर आपल्याला गतीने हालचाल करावी लागेल. या हालचालीची दिशा कळण्यासाठी संविधानातील तांत्रिकता वगळून त्यातील विचार समजून घेऊया. माणसे मरतात, तसे विचारही मरतात, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यांच्या मते विचार टिकण्यासाठी त्यांना रोपासारखे जोपासावे लागते. वर्तमानाशी त्याचे नाते सांगणारे भाष्य करावे लागते. संविधान हाही एक विचार आहे. म्हणूनच संविधान डोक्यावर नव्हे, तर डोक्यात राहायला हवे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com; मोबाईलः ९८९२८६५९३७ 

(लेखक संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.) 

(पुण्यनगरी, १७ जानेवारी २०२१) 

‘संविधानाचा अन्वयार्थ’ 

राज्यकारभाराची नियमावली, नागरिकांच्या विकासाची रुपरेखा आणि भवितव्याचा संकल्प असलेल्या भारतीय संविधानातील मूल्यांशी संबंधित घडामोडींचा वेध व त्यांचा संविधानाच्या मर्माशी अन्वय साधणारे मासिक सदर.

Thursday, January 14, 2021

धर्म व अध्यात्माचे आजचे संदर्भ




सर्व प्रमुख धर्म हजार ते चार हजार वर्षे जुने आहेत. तथापि, मनुष्यमानसावरील त्यांचा प्रभाव, समाजजीवनातील त्यांचा हस्तक्षेप आजही ताजा आहे. सृष्टीतली अनेक रहस्ये उलगडणारे आजच्या इतके प्रगत विज्ञान नव्हते, सार्वजनिक व राजकीय व्यवहाराचे नियमन करणारे संविधान किंवा राष्ट्रराज्य नव्हते, अशा काळात या गरजा धर्म भागवत होता. ती गरज आता उरलेली नसतानाही धर्माला माणसांच्या मनात तसेच सामाजिक जीवनात कळीचे महत्व आहे. मध्ययुगीन राजेशाहीच्या काळातील सम्राट अकबराने ‘दीने इलाही’ नावाचा नवा धर्म काढण्याचा प्रयत्न केला, हे समजू शकतो. पण आधुनिक काळातील महात्मा फुले यांनाही ‘सार्वजनिक सत्यधर्म’ स्थापावासा वाटतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बुद्धाचा धम्म आपल्या लाखो अनुयायांसह अनुसरावासा वाटतो याचे गमक काय? 

म्हणजेच व्यक्तीची, समाजाची काहीएक महत्वाची गरज धर्म आजही भागवतो. संविधान, राष्ट्रराज्य, विज्ञान किंवा अन्य कोणतेही घटक ही गरज भागवायला अपुरे पडतात. म्हणूनच ज्यांना समाजाच्या गतीचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना समाज अधिक न्याय्यपूर्ण बनवायचा आहे, त्या अभ्यासक किंवा कार्यकर्त्यांना धर्माला टाळता येत नाही. समाजबदलाच्या दिशेचा वेध घेण्यासाठी धर्माच्या आजच्या प्रयोजनाचा, लोकमनातील व लोकजीवनातील त्याच्या अस्तित्वाच्या संदर्भांचा विचार करावाच लागतो. एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ता म्हणून (व त्या मर्यादेत) या लेखाद्वारे तोच प्रयत्न मी करतो आहे. 

काही संकल्पनांचे स्वरुप आधी नक्की करु. 

ज्याला आपण धर्म म्हणतो त्याचा अर्थ सगळीकडे एक नाही. ज्यांना आपण नंतर धर्म म्हणू लागलो त्यांनी त्यांच्या स्थापनेच्या वेळी त्याला धर्म म्हटलेच होते असे नाही. ख्रिस्ती आणि इस्लाम हे Religion आहेत. म्हणून पाश्चात्यांनी आपल्याकडच्या धर्मांनाही त्याच दृष्टीने पाहिले व रिलिजन म्हटले. आपणही ख्रिस्ती व इस्लाम यांना धर्म म्हटले. एकमेकांचे भिन्न भाषांतले समानार्थी शब्द म्हणून वापरत असलो तरी रिलिजन व धर्म यांचा अर्थ एक नव्हे. आपल्याकडे धर्म हा शब्द कर्तव्य वा कर्तव्यांची सूची या अर्थाने आहे. एक गॉड किंवा अल्ला, एक धर्मग्रंथ, एक संस्थापक, सर्वसाधारण विधींचे निर्देश ही ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्माची वैशिष्ट्ये हिंदू धर्माला वा त्याआधीच्या वैदिक धर्माला लागू पडत नाहीत. हिंदू धर्माचा एक संस्थापक, एक ईश्वर, एक धर्मग्रंथ, उपासनेची सर्वसाधारण समान रीत नाही. बौद्ध व जैन धर्मांत ईश्वरच नाही. बौद्ध धर्मात भिख्खूंसाठी दीक्षा होती. सर्वसामान्य उपासकासाठी असा दीक्षाविधी नव्हता. ज्याला आज आपण हिंदू म्हणतो, ती हिंदू संज्ञा हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांत आढळत नाही. म्हणजेच आधी जे अस्तित्वात होते त्याचे नंतर नामकरण केले गेले. भारतात प्राचीन काळापासून असलेल्या विविध संप्रदायांचा संच म्हणजे आजचा हिंदू धर्म असे म्हटल्यास वावगे ठरु नये. जगण्याची पद्धत (Way of life) असे त्यास म्हटले जात असले, तरी तीही एकसारखी नाही, असे हे धर्माचे स्वरुप होते. वैदिक चाणक्याचा शिष्य चंद्रगुप्त जैन होतो, चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार वैदिक धर्म स्वीकारतो तर बिंदुसाराचा मुलगा अशोक बौद्ध बनतो. आजोबा, पिता व मुलगा तिघांचे तीन वेगळे धर्म. सम्राट अशोक बौद्ध तरी त्याच्या राज्यात सर्व धर्मांच्या प्रति समान व्यवहार. धर्म या संज्ञेच्या अर्थाचा व स्वरुपाचा हा असा विस्तृत प्रवाही अवकाश आहे. 

तरीही आज मात्र हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आदिंना आपल्याकडे सरसकटपणे धर्मच म्हटले जाते. आणि ते रिलिजन या अर्थानेच. या संज्ञांचा इतिहास काहीही असला तरी समाजमानसात त्यांचा आजचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे रिलिजन. 

आता पुढची संकल्पना- अध्यात्म. धर्म आणि अध्यात्म हे एकच आहे का? नाही. म्हणजे धर्माचा अध्यात्म हा घटक असतो. पण अध्यात्म हे विशिष्ट धर्माशी जोडलेले असलेच पाहिजे असे नाही. ईश्वर, स्वर्ग, नरक मानण्याशीही अध्यात्माचा संबंध नाही. ईश्वरी शक्तीवर विश्वास असलेला तसेच असा विश्वास नसलेला निरीश्वरवादी माणूसही आध्यात्मिक असू शकतो. मी आध्यात्मिक आहे पण माझा कोणताही धर्म नाही, मी आध्यात्मिक आहे पण मी ईश्वर मानत नाही, असे म्हणणारे लोक जगात खूप आहेत. रजनीश, जे कृष्णमूर्ती यांचे पंथ आध्यात्मिक आहेत. पण त्यात रुढ अर्थाने देव नाही. गोयंकागुरुजींची विपश्यना याच प्रकारची. अध्यात्म याचा ढोबळ अर्थ- स्वतःचा शोध. मी कोण आहे, माझे या सृष्टीशी, अन्य मनुष्यमात्राशी नाते काय, माझ्या जीवनाचा हेतू काय अशा प्रश्नांचा शोध अध्यात्मात मोडतो. अध्यात्म ही अगदी वैयक्तिक प्रक्रिया आहे. रिलिजन या अर्थी धर्म ही सामूहिक बाब आहे. धर्मातले लोक वैयक्तिक पातळीवर आध्यात्मिक असू शकतात. तसेच धर्माला मानणारे पण अजिबात आध्यात्मिक नसलेले लोक असू शकतात. बहुसंख्य तसेच असतात. धर्माचे विधी, कर्मकांडे, जपजाप्य, सण-समारंभ, तीर्थयात्रा नित्यनेमाने करणारे लोक आध्यात्मिक असतातच असे नाही. तर हे काहीही न करणारे लोक पूर्णपणे आध्यात्मिक असू शकतात. 

ज्या काळात सृष्टीची कोडी आजच्यासारखी विज्ञानाने उलगडलेली नव्हती, त्यावेळी निसर्गाच्या विविध रुपांविषयी अचंबित होऊन तसेच त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून त्यांना भजणारी सूक्ते मानवाने गायली. त्यांच्या कृपेसाठी अनुष्ठाने, कर्मकांडे केली. पण आता विज्ञानाने हे सर्व उलगडल्यावर त्यांची गरज काय? राज्यरचना कशी असावी, कोणाची कर्तव्ये काय असावीत, कोणत्या गुन्ह्यांना कोणत्या शिक्षा असाव्यात, उत्पन्नाचे वितरण कसे व्हावे यासाठी घटना व राज्याचे प्रशासन, दंडसंहिता असताना धर्माचे काम काय? कोणताही धर्म न मानता आजच्या व्यवस्थेत मी जगू शकतो. या व्यवस्था नसण्याच्या काळात मला ते शक्य झाले नसते. आज व्यक्ती म्हणून मला याबाबतीत मोकळीक आहे. घटनेने मला उपासनेचे तसेच उपासना न करण्याचे, धर्म मानण्याचे तसेच धर्म न मानण्याचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकार म्हणून दिला आहे. तरीही बहुसंख्य लोक धर्माचा अंगिकार करतात. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर धर्माचा पुरस्कार करतात. 

विज्ञान सृष्टीची रहस्ये उलगडते, त्यातील घटनांची कार्यकारणपरंपरा विशद करते. मात्र माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगत नाही. विज्ञान नीती शिकवत नाही. विज्ञान अणूचा वापर काय काय प्रकारे करता येऊ शकतो, याच्या शक्यता सिद्ध करते. पण या तंत्राच्या सहाय्याने अणुबॉम्ब बनवून हिरोशिमा-नागासाकीवर टाकून माणसांच्या कित्येक पिढ्या बरबाद करायच्या की ऊर्जेसाठी, आरोग्य चिकित्सेसाठी, पदार्थ टिकविण्यासाठी त्याचा वापर करायचा हा निर्णय विज्ञान देत नाही. तो निर्णय माणसे, त्यांचे शासन घेते. हे शासन स्वतः जगा, इतरांनाही जगू द्या सांगणारे असू शकते. त्याच्या घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही तत्त्वे असू शकतात. ही नीतीतत्त्वे आहेत. त्यांना कायद्याचे स्वरुप असू शकते वा भविष्यातील राज्यासाठीचे ते दिशादिग्दर्शनही असू शकते. विज्ञानाने न घडणारी कामे जर राज्य व घटना करत असेल, तर मग धर्माची गरज काय? घटना लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. म्हणजेच धर्म करत असलेली अजून अशी काही महत्वाची कामे आहेत, जी घटना किंवा राज्य करु शकत नाही. 

बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘धर्म माणसाला आशा देतो. त्यामुळेच गरिबांना धर्माची अधिक गरज आहे.’ मार्क्स धर्माला अफू म्हणतो, हे आपण लाख वेळा ऐकलेले आहे. पण ते विधान करण्याआधीची दोन विधाने आपल्यापर्यंत पोहोचतात असे नाही. तो म्हणतो- ‘धर्म हा पीडितांचा निःश्वास आहे, तो हृदयहिन जगाचे हृदय आहे. आत्माहिन परिस्थितीचा तो आत्मा आहे. ती माणसांची अफू आहे.’ 

ज्या समाजात सगळी माणसे न्याय्यपूर्ण, सर्व भौतिक सुख-सुविधा असलेले व त्या भोगण्याची उसंत असलेले जीवन जगत नाहीत, जिथे आजही प्रचंड विषमता व त्यापोटी येणारी मानसिक असुरक्षितता आहे, तिथे धर्म दिलासा देतो. आधार देतो. माणसांना परस्परांशी माणुसकीने वागण्याची प्रेरणा देतो. त्यासाठीची आत्मिक ताकद देतो. अर्थात, या आधाराने बाहेरची विषम स्थिती बदलणार नसते. ती सहन करण्याची शक्ती धर्म देतो. ऑपरेशनवेळी वेदना कळू नयेत म्हणून भूल दिली जाते. हे भुलीचे काम पूर्वी अफू करे. या अर्थाने आजच्या स्थितीत अफू उपयुक्त आहे. पण दुखणे तसेच ठेवून त्याची वेदना कळू नये म्हणून धर्माचा वापर होण्याने मूळ दुखणे दूर होणार नाही. त्यासाठी बाहेरची स्थिती बदलली पाहिजे. त्यासाठीचा संघर्ष अनिवार्य आहे. त्याला धर्म अडथळा होता कामा नये. धर्माचे हे आभासी स्वरुप म्हणूनच दूर झाले पाहिजे, अशी मार्क्सची मांडणी आहे. 

बाबासाहेब आंबेडकर पारंपरिक बौद्ध धर्म नाकारुन ‘नवयान’ स्वरुपात जो धम्म देतात तो असे आभासी समाधान देत नाही. हा बौद्ध धर्म ईश्वराचा संदर्भ घेत नाही. आत्मा नाकारतो. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर बुद्ध अज्ञेयवादी (Agnostic) आहे. देव आहे की नाही या चर्चेत वा त्यासंबंधीच्या अंतिम निष्कर्षात तो पडत नाही. सृष्टीच्या उत्पत्तीची कोणतीही चमत्कृतीपूर्ण कथा तो सांगत नाही. सृष्टीचा कोणीही निर्माता नसून ती विकसित झालेली असल्याचे सांगतो. जग अनित्य, परिवर्तनशील आहे, माणसे मर्त्य आहेत, ही वस्तुस्थिती मांडतो. जन्म व मृत्यू यातील जीवन ही हकिगत आहे. हे जीवन कसे सुंदर करायचे याचा मार्ग बुद्ध सांगतो. म्हणूनच मार्क्सला वाटणारी चिंता बाबासाहेबांना वाटत नाही. बौद्ध धम्म माणसाला जीवन सुंदर करण्यासाठीचा संघर्ष करायला परावृत्त करत नाही. आत्मसंतुष्ट करत नाही. बाबासाहेबांनी याची पराकाष्ठेने दक्षता घेतली आहे. मात्र त्यांच्यानंतर बौद्ध धर्माचे आचरण म्हणजे काय, याबद्दल ज्या काही बाबी वा विचार प्रचारण्यात येत आहेत, त्यांत मार्क्स म्हणतो तशी गडबड होऊ शकते. त्यातील एक भाग विपश्यना आहे. विपश्यना याचा अर्थ विशेष प्रकारे पाहणे. या ध्यानाच्या सरावाने साक्षीभावाची ताकद मिळते. तो मनाचा व्यायाम आहे. मनाचे हे स्थैर्य अंतिम लक्ष्य मानले तर गडबड होते. विपश्यनेने मिळालेली मनाच्या स्थैर्याची ताकद भोवतालचे दुःख निर्माण करणारे विषम जग बदलण्यासाठीचा संघर्ष करायला मदतच करते. मात्र केवळ विपश्यनेने प्रत्येक माणूस बदलण्याचे लक्ष्य ठेवल्याने सामाजिक-राजकीय व्यवस्था बदलत नाही. प्रत्येकाने विपश्यना करावी असा प्रचार, प्रयत्न जरुर करावा. पण तो समाज बदलण्याचा पर्यायी मार्ग नव्हे. तो तसा समजणे म्हणजे मार्क्सचे म्हणणे खरे होणे होय. बाबासाहेब बसलेला बुद्ध की उभा बौद्ध अशी चर्चा करुन उभा बुद्ध प्रचारतात ते यासाठीच. 

महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म धर्म स्वीकारण्याचे आवाहन करतात. त्याचवेळी त्यांच्या चळवळी, संघर्ष चालू आहेत. हा धर्म त्यांना या संघर्षातून अलिप्त करत नाही. तर तो या संघर्षाचा एक भाग असतो. सर्व अनिष्ट रुढींना फाटा देत, मांग, मुस्लिम, ब्राम्हण सर्वांना बंधुपरी पोटाशी घेणाऱ्या नव्या समाजरचनेचा तो नमुना असतो. पुन्हा यातही हाच धर्म स्वीकारण्याचा आग्रह नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने विविध धर्मांची पुस्तके अभ्यासून त्यांना पटणारा धर्म स्वीकारण्यास फुले प्रोत्साहन देतात. अशा विविध धर्ममतांचा स्वीकार केलेली माणसे एका कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदावीत, असे त्यांचे स्वप्न आहे. सेक्युलर घटना लिहिणारा महामानव डॉ. आंबेडकर जन्माला येण्याआधी मृत्यू पावलेल्या महात्मा फुलेंचे हे द्रष्टेपण वा उद्दिष्ट किती महान होते, ते आपल्याला यावरुन कळते. 

मानसिक असुरक्षिततेच्या काळात लोक अधिक धार्मिक होतात, हे आपण पाहतो. पण सारं काही नीट असतानाही माणसे धार्मिक असतात. या सृष्टीच्या उत्पत्तीची कितीतरी रहस्ये उलगडली, जगात देव नाही हे स्टिफन हॉकिंगने सिद्ध केले असले तरी बहुसंख्य माणसांना धर्म लागतो. पूर्ण विवेकवादी ती बनत नाहीत. अवकाशात यान सोडतानाही शास्त्रज्ञांकरवी धार्मिक पूजा केली जात असल्याचे आपण पाहतो. अवकाशयानाच्या तयारीच्या शास्त्रात ते ईश्वराला किंवा त्याच्या चमत्कारांना गृहीत धरत नाहीत. मात्र या अनंत, असीम विश्वाच्या पसाऱ्याचा नियंता म्हणून कुठेतरी त्यांना ईश्वर दिलासा देत असतो. तो पार करण्याची ताकद फार कमी शास्त्रज्ञांत व डॉक्टरांच्यात असते. सामान्यांचे तर विचारुच नका. म्हणूनच समाजवादी क्रांतीनंतरही लोक रशियात चर्चमध्ये किंवा चीनमध्ये बुद्धविहारात जायचे थांबत नाहीत. जेव्हा त्यांवर काही बंधने आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी लोकांनी लष्करी ताकदीला घाबरुन बंड केले नसेल, पण ते अत्यंत अस्वस्थ मात्र झाले. सोव्हिएट कोसळल्यावर आणि चीनमध्ये थोडी मोकळीक मिळाल्यावर लोकांचे धर्मस्थळांमध्ये जाणे प्रचंड वाढले. 

माणसाच्या मनाच्या गुंत्यांचा निरास विज्ञान किंवा मानसशास्त्र पूर्णपणाने करु शकत नाही. त्याला धर्म हा आधार लागतोच असे आजही दिसते. नजिकच्या भविष्यात यात बदल होण्याची संभावना नाही. अशावेळी हा आधार मानव्यपूर्ण, करुणावंत कसा असेल, माणसाला परावलंबी करणारा नसेल याकडे आपण लक्ष द्यायला हवे. धर्माचे नव्हे, तर त्यातील कशाचे उच्चाटन करायचे याचा विवेक विवेकशील म्हणवणाऱ्यांना करावा लागेल. 

आपापल्या मूर्ती कवटाळून परस्परांचे कोथळे काढणाऱ्या अरबस्थानातील टोळ्यांना एक करताना भेदांचे कारण म्हणून मूर्तींना उद्ध्वस्त करुन त्याजागी निराकार अल्लाची स्थापना करणारा इस्लाम हे प्रगत पाऊल होते. पण कोणतीही मूर्ती हाच अधर्म मानणे हा मूलतत्त्ववाद होतो. धर्माचे मर्म हरवून त्यातील सूत्राचा कर्मठ अर्थ लावणे, विवेकाला, ऐतिहासिकतेला मूठमाती देणे म्हणजे मूलतत्त्ववाद. शेकडो वर्षांची निर्मिती असलेले, असंख्यांनी आपले श्रम व कला ओतलेले बामियानचे विशाल बुद्धशिल्प तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे तालिबानचे कृत्य हा या मूलतत्त्ववादाचा क्रूर नमुना. बायबलमध्ये पृथ्वी सपाट असल्याचे म्हटले आहे. म्हणून गॅलिलिओचे पृथ्वी गोल आहे हे म्हणणे पोपच्या दृष्टीने धर्मद्रोही ठरते. गॅलिलिओपुढे विधान मागे घेणे वा देहदंड स्वीकारणे हा पर्याय ठेवला जातो. गॅलिलिओ नाईलाजाने जीव वाचावा म्हणून पहिला पर्याय स्वीकारतो. पुढच्या इतिहासात गॅलिलिओचाच जय होतो. आज ख्रिस्ती जगत बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून पृथ्वी सपाट मानून व्यवहार करत नाही. धर्माच्या नावाने ख्रिश्चनांनी क्रुसेड्स तर मुस्लिमांनी जिहाद केलेत. अशी धर्मयुद्धे हिंदूंत दिसत नसली तरी धर्मरक्षणासाठी शंबुकाचा शिरच्छेद करणे, ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना बहिष्कृत करणे, तुकोबांना सदेह वैकुंठाला पोहोचविणे अशी कैक पापे हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी केली आहेत. आम्ही म्हणू ते धर्ममत. त्याला आजची कायदेव्यवस्था आड येत असेल तर तीही आम्ही धुडकावून लावू म्हणणारी या ठेकेदारांची परंपरा आजही जिवंत आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या ही या मूलतत्त्ववादी हिंदूंची अधम करणी आहे. 

मूलतत्त्ववादाला कायम राजकीय हितसंबंधांसाठी वापरले जाते. अमेरिका-सोव्हिएट शीतयुद्धात तालिबान्यांना अमेरिकेने पोसले. भारत आपल्या गोटात येत नाही, म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानातील धार्मिक दहशतवाद्यांना तसेच आपल्याकडच्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना शस्त्र तसेच ते चालवण्याचे प्रशिक्षण अमेरिकन शासकांनीच दिले. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे हे केवळ धार्मिक मूलतत्त्ववादी काम नव्हे, तो मूलतत्त्ववादाचा वापर करुन झालेली अव्वल राजकीय कृती होती. त्याची फळे मोदींच्या सत्तारोहणानंतर आपण भोगतो आहोत. संविधानाची शकले उडवण्याचा बेछूट तालिबानी कार्यक्रम अहर्निश चालू आहे. धर्माला राजकारणात खेचण्याने, धर्माच्या नावाने राष्ट्र उभारण्याने लोकांचे कल्याण होत नाही हे सिद्ध झालेले आहे. इस्लाम हा सामायिक धर्म आहे म्हणून अरबस्थान एक राहिला नाही. इराण-इराक संघर्ष शमला नाही. आपल्याच बौद्ध धर्माची माणसे आहेत म्हणून जपानने चीनवरील हल्ले सौम्य केले नाहीत. सेक्युलर भारतापासून फुटून धर्माच्या आधारावर स्थापन झालेला पाकिस्तान एक राहिला नाही. भाषा, संस्कृती व पश्चिम पाकिस्तानची प्रभुत्वशाली वृत्ती या कारणांनी बांगला देश अलग झाला. 

धर्माचे निर्मूलन नव्हे, तर राजकारण, मूलतत्त्ववाद यांतून धर्माला सोडविणे हे प्रगतीशील प्रवाहाचे आजचे लक्ष्य हवे. धर्माला देशाच्या, भाषेच्या सीमा नाहीत. मुसलमानांचा पाकिस्तान म्हणून हिंदूंचा हिंदुस्तान हे अवास्तव व गैर आहे. उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे, म्हणून ती मुसलमानांची भाषा आहे हा चुकीचा समज आहे. उर्दू ही भारतीय भाषा आहे. ती उत्तरेकडील मुस्लिम व हिंदू दोहोंत प्रचलित आहे. सामाजिक सण-उत्सव, प्रार्थना स्थळे यादृष्टीने धर्माचे सामाजिक स्वरुप हानिकारक नाही. मात्र आस्थेच्या पातळीवर धर्म वैयक्तिक बाब राहणे याकडे आपण सरकायला हवे. आजही त्याचा लग्न, वारसा आदि बाबींत जो सामाजिक संबंध आहे, तो हलक्या हाताने, प्रबोधन करत दूर करायला हवा. केवळ कायद्याच्या ऑपरेशनने ते साधणार नाही. भारतीयत्वाची ओळख ठळक करणाऱ्या विशेष विवाह कायद्याचा वापर करण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहन द्यायला हवे. कोणत्याही धर्माशिवायचे अध्यात्म मानणारी माणसे वाढली तर ते चांगलेच आहे. ही माणसे भले वैयक्तिक मुक्तीचा ध्यास धरत असतील. पण ती दुसऱ्याला हानी पोहोचावी असे कृत्य करत नाहीत. तसे झालेच तर ते त्यांना स्खलन वाटते. धर्माच्या नावाने हिंसेला त्यांचा विरोधच असतो. ती जात्याच सेक्युलर असू शकतात. घटना वा राष्ट्र राज्याचे नियमन याच्या पलीकडे जाणारे, मानसिक पातळीवर अधिक स्वीकृत होणारे नियमन धर्माचे असते. त्यासाठी वारकरी, सूफी, बाऊल असे संप्रदाय त्यांच्या निखळ स्वरुपात पसरायला हवेत. 

हजारो वर्षांचा धर्म व अध्यात्माचा प्रवास आजही चालू आहे, समाजमनात तो घट्ट रुतलेला व रुजलेला आहे. आगामी काळातही तो राहणार आहे. हे कबूल करुन केवळ नव्हे, तर नीट समजून घेऊन, त्याच्याशी जोडून घेऊन, त्यातील वावगे ते दूर करण्याचे व पोषक ते टिकवण्याचे, संवर्धित करण्याचे प्रयास करणे हे आजचे पुरोगामी कार्य आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुरुष उवाच, दिवाळी २०२०)

Saturday, January 2, 2021

खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’




एकूण शिक्षण क्षेत्रातले आजचे बाजारुपण, दिशाहिनता, मराठी माध्यमांच्या शाळांना आलेली अवकळा, एकेकाळी ध्येयवादातून काढलेल्या पण आता परवडत नसतानाही या शाळा टिकवण्याची धडपड करणारे अपवाद वगळता काळाच्या बरोबर बदलायला हवेचा बहाणा करत स्वतःहून बाजारुपणाला शरण जाणारे प्रवाहपतित संस्थाचालक, शिक्षकांच्या प्रेरणेची व समजाची काळजी वाटावी अशी अवस्था, हे सर्व मुकाट बघत स्पर्धेत मूल टिकले पाहिजेच्या अजिजीपोटी प्रवेश शाळेत पण भरपूर फिया घेणाऱ्या क्लासेसवर अवलंबून राहणारे पालक आणि या सगळ्यात भरडून निघणारी, कोवळ्या वयातील हक्काच्या, नैसर्गिक निर्मळ आनंदाला मुकणारी मुले...हे आजचे नव नित्य म्हणजे न्यू नॉर्मल.

या स्थितीशी झुंजणारे हाताच्या बोटावर मोजता येणारे दुर्मिळ प्रयोग आपल्याला कुठे तरी दिसतात. पण ते प्रयोग असतात. त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता जरुर. मात्र सर्वसामान्य शहरात, वस्तीत, सर्वसामान्य अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटींत हे प्रयोग करणे हे दमछाक करणारे तर अनेकदा अव्यवहार्य ठरते. या दिशादर्शक प्रयोगांना सामावून, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन, समाजातील अनेक संस्था, व्यक्तींचे सहाय्य घेऊन, आपल्या स्थापनेपासूनच्या इतिहासाशी, ध्येयाशी बांधीलच नव्हे, ते ध्येय अधिक विकसित करत, नव्या आव्हानांना पुरून उरणारी, शिक्षणाचा नित्य आनंदोत्सव करणारी सर्वसामान्य शाळा मुंबईच्या उपनगरात असू शकते हे अचंबित करणारे आहे. अचंबित करणारे पण अशक्य नाही. शाळा चालवणाऱ्यांना ती दृष्टी, ध्येयाची स्पष्टता व त्यावरची अढळ निष्ठा, स्वतःच्या वस्तुनिष्ठ मापनाची तयारी, सतत नवे शिकत राहण्यासाठीची सर्जनशील प्रयोगशील वृत्ती व चिकाटीचे प्रयत्न एवढे मात्र जरुर हवे. म्हणूनच ही शाळा हा अप्राप्य तारा नाही, तर जमिनीवरील प्रयत्नसाध्य नमुना ठरतो. त्यामुळेच वर उल्लेख केलेल्या न्यू नॉर्मलला छेद जाऊ शकतो असे आश्वासन त्यातून मिळते.

ही शाळा आहे गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल व तिला नंतर जोडलेले घटक डोसीबाई जीजीभॉय बालविहार व डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा. ही शाळा मी अनेकदा पाहिली आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी तिच्या आवारात बरेचदा जाणे होते. तिचे चालक माहीत असल्याने ती वेगळी असणार हे अपेक्षित होते. पण ती एवढी वेगळी असेल याचा खरोखरच अंदाज नव्हता. तो आला या शाळेवरची दोन पुस्तके वाचून. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ व ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तके. पुस्तकांचे संपादन केले आहे शाळेच्या माजी विद्यार्थिनी व आपल्याला पत्रकार व लेखिका म्हणून परिचित असलेल्या वैशाली रोडे यांनी तर ती प्रकाशित केली आहेत ग्रंथालीने. शाळेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शाळेच्या वाटचालीचा परिचय करुन देणारी ही पुस्तके आहेत. शाळा चालवणारे विविध घटक संस्थाचालक, शिक्षक, माजी विद्यार्थी हे यातील प्रकरणांचे लेखक आहेत. ही लेखन प्रक्रिया बरीच सामुदायिकही आहे. त्याविषयी संपादकांनी सुरुवातीला लिहिले आहेच. अशी पुस्तके आशय दमदार असतानाही अनेकदा घटनांची जंत्री होते. तसे इथे झालेले नाही. त्याचे श्रेय संपादकांना द्यावे लागेल. ही पुस्तके रोचक व वाचनीय आहेत. कथा-कादंबरीसारखी आपण ती वाचत जातो. कधी संपली ते कळतही नाही. आपण ती जरुर वाचावीत. इथेच अजून एक सांगतो. दुसरे पुस्तक ‘शिकणारी शाळा बालरंग’ हे छोट्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात लक्ष घालण्यासाठी एक खूप उपयुक्त मार्गदर्शिका आहे. आपल्या संपर्कातील अशा पालकांना ते वाचण्यास जरुर प्रवृत्त करावे. ही दोन्ही पुस्तके सर्वसामान्य वाचकांना मूल्यसमृद्ध करतातच पण शिक्षक, पालक व कार्यकर्ते यांच्यासाठी ती हस्तपुस्तिकाही ठरु शकतात.

दोन्ही पुस्तके मिळून सुमारे पावणेसहाशे पानांतील आशय, तोही पाऊणशे वर्षांतल्या खूप साऱ्या घडामोडींवर, प्रयोगांवर बेतलेला एका सदरासाठीच्या लेखात संक्षेपाने नोंदवणे मला कठीण आहे. तथापि, या पुस्तकांतून आढळलेली, मला अधोरेखित करावीशी वाटलेली काही वैशिष्ट्ये, मुद्दे एक झलक म्हणून खाली नमूद करत आहे.

शाळेच्या संस्थेचे नाव ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव’. तिचे विद्यमान अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी विजय नाईक यांनी ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ या पुस्तकाच्या प्रारंभी केलेल्या निवेदनात शाळेच्या स्थापनेमागची प्रेरणा, भूमिका, जपलेली मूल्ये, आव्हाने विशद केली आहेत. त्यांची सुरुवातच अशी आहे – ‘पातकर गुरुजींनी शाळा सुरु केली ते वर्ष होतं १९४०. त्यानंतर दोन वर्षांत दि शिक्षण मंडळ, गोरेगावची अधिकृत नोंदणी झाली आणि १९४२ मध्ये ऑक्टोबरला अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या इमारतीचं उद्घाटन झालं. धेयवादाने प्रेरित झालेल्या गोरेगावकरांनी स्वतःच्या हातांनी, श्रमदानाने या इमारतीच्या विटा रचल्या होत्या. ही एकाकी आकस्मिक घटना नव्हती. तो काळ म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचं निर्णायक आणि रोमहर्षक पर्व होतं.’

हे रोमहर्षक पर्व आकारास येण्याआधी बरेच संघर्ष होऊन गेले आहेत. त्यांची नोंद करताना महात्मा फुले यांनी १८८२ साली हंटर कमिशनसमोर तर नामदार गोखले यांनी १९११ साली प्रांतिक सरकारांसमोर ‘सरकारी खर्चाने सर्वांना समान व मोफत प्राथमिक शिक्षणाची’ केलेली मागणी, त्यास समाजातील वर्ण-वर्ग श्रेष्ठींकडून झालेला विरोध यांचे विवेचन ते करतात. पुढे महात्मा गांधींच्या प्रेरणेने १९३७ साली वर्ध्याला काँग्रेसने घेतलेली शिक्षण परिषद, तिच्यात ‘शालेय शिक्षण सार्वत्रिक, सक्तीचं, मोफत, स्वतंत्र बुद्धीला व वैज्ञानिक वृत्तीला वाव, त्याचबरोबर श्रम व प्रत्यक्ष कृतीला प्रतिष्ठा देणारं, मातृभाषेतून दिलं जाणारं’ असलं पाहिजे ही स्वीकारली गेलेली भूमिका यांची नोंद आहे. इंग्रजांच्या विरोधात लढ्याची धामधूम सुरु असतानाच देशाच्या भावी रचनेविषयीची स्वातंत्र्य चळवळीने जाहीर केलेली ही भूमिका अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या संस्थापनेमागची रोमांचकारी प्रेरणा व आणि पार्श्वभूमी असल्याचे विजय नाईक नमूद करतात.

नाईक नोंदवत असलेली ही प्रेरणा हे केवळ त्यांच्या इथले वैशिष्ट्य नाही. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ही एकाकी व आकस्मिक घटना नाही. स्वातंत्र्य आंदोलनाचं रोमहर्षक पर्व व पुढे देश-समाज उभारणीची प्रेरणा ही देशभर होती. अ. भि. गोरेगावकर स्कूलसारख्या शाळा व त्यामागचे ध्येयवादी लोक ही त्या काळाची निपज होती. याचा अर्थ तो काळ, त्यावेळचे श्रम, संसाधनांची उपलब्धता हे सहज सोपे होते असा नव्हे. शाळा उभारतानाचे पातकर गुरुजी व त्यानंतर प्रभू सर यांचे प्रयत्न, कष्ट प्रचंड होते. काळ मात्र प्रेरणादायी होता. हा काळ सरल्यानंतर त्याच प्रेरणेने दीर्घकाळ टिकलेल्या फार कमी शाळा आहेत. अ. भि. गोरेगावकर शाळेचे ते वैशिष्ट्य आहे. प्रेरणादायी काळ संपल्यानंतरही शाळेचे रसरशीतपण संपले नाही. भोवतालच्या प्रतिकूलतेतही ते तिने जोपासले, वाढवले. स्थापनेमागच्या मूल्यांवर ठाम राहून बदलत्या परिस्थितीशी तिने सामना केला. या सामन्यासाठीची नवी कौशल्ये ती सतत शिकत राहिली. काळाच्या प्रेरणेवर अवलंबून न राहता ती आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवून ज्यांनी या शाळेचं नेतृत्व केलं त्या माणसांना म्हणूनच या प्रक्रियेत अनन्य महत्व आहे.

दयानंद प्रभू हे त्यात मुख्य. पातकर गुरुजींनंतर प्रदीर्घ काळ शाळेचे मुख्याध्यापक राहिलेल्या प्रभू सरांचे कर्तृत्व, शाळेसाठीचे कष्ट व मूल्यांप्रतिची दक्षता इतकी थोर की ‘प्रभू सरांची शाळा’ म्हणूनच ती ओळखली जाऊ लागली. ‘अभि’रंगमधील विविध प्रकरणांत त्यांच्याविषयी काही ना काही उल्लेख येत राहतो. पातकर गुरूजींनी रचलेल्या विटांचा पाया अधिक मजबूत करण्याचे पुढचे काम प्रभू सरांचे. त्यावरच पुढची इमारत उभी असल्याने त्यांचे स्मरण विविध ठिकाणी होणे हे अगदी स्वाभाविक आहे. प्रभू सरांनी असे काय केले, याची काही उदाहरणे बघू.

शिक्षणातील नव्या धारणा, नवे शोध अजून यायचे होते, अशा काळात प्रभू सरांनी भोवतालच्या शाळांमध्ये जे चाले, ती वहिवाट आपल्या शाळेत मोडली. एका इयत्तेच्या गुणवत्तेप्रमाणे तुकड्या असत. म्हणजे अ पासून फ पर्यंत तुकड्या असल्या तर सर्वात हुशार मुले अ मध्ये, त्या खालोखाल ब व सगळ्यात कमी गुण मिळालेली मुले फ मध्ये. ‘अभि’त ही रचना नव्हती. प्रत्येक तुकडीत विविध गुणवत्तेचे समान स्तर राहतील अशा रीतीने मुलांचे वाटप केले जाते. हुशार मुलांचे पालक यावरुन तक्रार करत. पण प्रभू सर नमले नाहीत. समाजातील वंचितांना सर्वांच्या बरोबरीने वागवण्याच्या तत्त्वावर ते ठाम राहिले. आपली भूमिका सांगूनही ज्यांना पटत नाही, त्यांना ते आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत घालावे, असा पर्याय देत.

घटनेतला सामाजिक न्याय आरक्षण रुपाने प्रत्यक्षात शाळेत यायला अजून अवकाश होता. त्या आधीच प्रभू सरांनी मागासवर्गीयांना १० टक्के जागा अग्रहक्काने मिळण्याचा नियम शाळेत लागू केला. महानगरपालिकेच्या शाळेतून जी मुले शाळेत येत त्यांच्यासाठीही अशीच १५ टक्क्यांची व्यवस्था सरांनी केली. म्हणजे एकूण राखीव जागा झाल्या २५ टक्के. यात जी बाब आजही मानसिक पातळीवर अनेकांना पचत नाही ती त्या काळात सरांनी केली. खुल्या स्पर्धेत टिकण्याइतकी गुणवत्ता असलेल्या आरक्षणपात्र विभागांतील उमेदवारांना जाणीवपूर्वक आरक्षित गटातच घालण्याची खटपट व्यवस्थापनाची असते. प्रभू सरांनी आपल्या शाळेत खुल्या गटात स्पर्धा करण्याची मुभा सर्वांना ठेवली. आरक्षित गटातली मुलेही गुणवत्तेनुसार खुल्या गटात निवडली जात. नंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरु होई. स्त्री-पुरुष समानतेबद्दल सर दक्ष असत. नकळतपणे ‘द गर्ल इज क्राइंग’ म्हटले जाते. तिथे जाणीवपूर्वक ‘द बॉय इज क्राइंग’ म्हणत जा, असे सर सांगत.

प्रवेश व नोकरी गुणवत्तेवर, वशिल्याने नाही हा नियम सर्वसामान्यांसाठी असतो. पण समाजातले नामवंत, सत्ताधारी राजकारणी, संस्थेचे विश्वस्त हे त्यास अपवाद असतात, हा शिरस्ता सार्वत्रिक आहे. प्रभू सरांच्या शाळेत मात्र हे चालत नाही. मृणालताई गोरेंना आपल्या लेकीच्या प्रवेशासाठी रांगेतच उभे राहावे लागले. अनेक बडी मंडळींची नाराजी त्यासाठी शाळेने पत्करली आहे. हा वारसा आजही जपला जातो. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या माजी मंत्र्यांच्या, तसेच शाळेला लाखो रुपये मदत केलेल्यांच्या शिफारशी शाळेने विनम्रपणे नाकारल्या आहेत. याचा ताण येतो हे आताचे विश्वस्त मोकळेपणाने कबूल करतात. पण आपल्या भूमिकेपासून ही मंडळी ढळत नाहीत. 

निवृत्त झाल्यावर प्रभू सरांनी शाळेच्या कामात लक्ष घालावे अशी त्यांना आम्ही विनंती केली. पण त्याला सरांनी ठाम नकार दिल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष गिरीश सामंत सांगतात. सरांचे म्हणणे ते नमूद करतात- “मी परत आलो तर मागाहून आलेल्यांवर दडपण येईल. काम करण्याचं स्वातंत्र्य ते घेऊ शकणार नाहीत. स्वतः धडपड करताना चुकले तर ते त्यातून शिकू शकतील.” खूप आग्रह केल्यावर ते संस्थेच्या सर्वसाधारण मंडळाचे सदस्य झाले. पण दैनंदिन कामकाजात लक्ष न घालण्यावर ते ठाम राहिले, असे सामंत पुढे नमूद करतात.

प्रेरणादायी वातावरणाचा भाग संपल्यावरही मूल्यांच्या जोपासणीसाठी एवढी कडवी झुंज सहजवृत्तीने देणारे प्रभू सर म्हणूनच शाळेच्या पुढच्या चालकांपुढे दीपस्तंभ ठरतात. गिरीश सामंत, विजय नाईक तसेच शाळेचे अन्य चालक यांना यातूनच ताकद मिळते. प्रभू सरांचे हे वारसदार तेवढेच मजबूत असल्याने शाळेची प्रभू सरांनंतरची वाटचाल तेवढ्याच ताकदीची, सृजनशील राहिली आहे. वारसदारांची वृत्ती कळावी, याचे एक उदाहरण देतो. विजय नाईकांच्या निवेदनाचा आधी उल्लेख केला आहे. त्यात ते आठवी-नववीत त्यांच्या वर्गात असलेल्या अर्जुन या दलित विद्यार्थ्याची व स्वतःची तुलना करतात. अर्जुनचे विषयांतले प्रावीण्य नमूद करतात. हा हुशार विद्यार्थी परिस्थितीपायी पुढे जात नाही. खूप वर्षांनी त्याला खंगलेल्या अवस्थेत ते पाहतात. त्यांचे मन विषण्ण होते. नंतर त्याचा अकाली मृत्यू होतो. आज ते व्यथित होऊन लिहितात – ‘अर्जुनची प्रतिभा उमलण्याआधीच का कोमेजून विकीर्ण झाली? ....माझ्या आणि त्याच्या बुद्धिमत्तेत कणभरही फरक नव्हता. फरक होता तो केवळ कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि जातीचा. हा प्रश्न, ही स्मृती अनेकदा मनाला टोचत राहते.’

नाईकांनी नोंदवलेली विषम स्थिती, असे अर्जुन आजही आहेत. वानवा आहे ती विजय नाईकांच्या मनाला लागलेली टोचणी सार्वत्रिक नसण्याची. हल्ली तर ती फारच दुर्लभ आहे. अशी टोचणी असलेली माणसे जेव्हा शाळेच्या चालकपदी असतात, तेव्हा ती टोचणी केवळ भावना राहत नाही. ती कृतीत परिवर्तित होते. प्रेरणादायी वातावरणात घडलेले पातकर गुरुजी, त्या काळाचेच उत्पादन असलेले, मात्र काळ बदलूनही त्याच मूल्यांवर ठाम राहिलेले प्रभू सर आणि आज प्रेरणादायी वातावरण पूर्ण विलयाला गेले असताना नाईकांसारख्या प्रभू सरांकडून वारसा घेतलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे संस्थेत असणे व आजही काही टोचण्याइतकी त्यांची संवेदना ताजी असणे हा या शाळेची पुढची वाटचाल न खोळंबता अधिक गतिमान होण्याचा पाया आहे, असे मला वाटते.

शाळेची आताची ओळख गिरीश सामंतांची शाळा अशीही केली जाते असा उल्लेख पुस्तकात एके ठिकाणी आहे. त्यांचे वडील प. बा. सामंत हे शाळा उभारणीच्या प्रारंभीच्या फळीतले. संस्था चालकांचे सुपुत्र म्हटले की हल्ली आपल्या डोळ्यासमोर एक वेगळी, नकारात्मक प्रतिमा येते. एकेकाळच्या ध्येयवादी संस्थाचालकांच्या पुत्र-पौत्रांची पुढे ती संस्था जहागीर झाल्याचे दृश्य आपल्याला नवे नाही. अशावेळी गिरीश सामंत वगैरे या संस्थेच्या चालकांची मुले आज जे करताना दिसतात, ते केवळ त्यांचे निरलस कार्यकर्तेपण असते. वृत्तपत्रांतून शिक्षणधोरणाविषयी जे ते लिहीत असतात किंवा या पुस्तकातही त्यांनी आव्हाने म्हणून तसेच इतरत्रही जे लिहिले आहे त्यातून आणि मुख्य म्हणजे इतरांच्या लिखाणातून त्यांच्या व्यवहाराचे, मार्गदर्शनाचे जे उल्लेख येतात, त्यातून शिक्षण क्षेत्रातले ते अभ्यासक कार्यकर्ते आहेत, हे पुढे येते. आणि असा कार्यकर्ता संस्थेचा कार्याध्यक्ष असणे ही खूप जमेची व महत्वाची बाब आहे. 

काय दृष्टीने व्यवस्थापन ही मंडळी करतात याची प्रचिती व्यवस्थापनाबद्दलच्या प्रकरणात त्यांनी जे लिहिलंय त्यावरुन येते. गिरीश सामंत लिहितात- ‘व्यवस्थापन हे केवळ योजना, कार्यालय किंवा कागदपत्रांचं नसतं; तर ते मानवी मनांचं, परस्परसंबंधांचं व्यवस्थापनही असतं. आपापले विचार आणि अनुभव घेऊन आलेल्या माणसांची मतभिन्नता मान्य करुन, एकमेकांची बलस्थानं आणि कमतरता लक्षात घेऊन, परस्परांना सतत माहिती देत-घेत आणि एकमेकांना विश्वासात घेऊन काम करणं आवश्यक ठरतं. तेच आम्ही करत गेलो.’ निर्णयप्रक्रियेविषयी पुढे ते लिहितात- ‘बहुमतापेक्षा आम्ही सहमतीने निर्णय घेणं महत्वाचं मानतो. त्यामुळे आतापर्यंत एकही ठराव मताला टाकण्याची वेळ आली नाही. तात्त्विक मुद्दे किंवा संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयांवर मतभिन्नता असली, तर ती दूर होईपर्यंत इथे निर्णय होत नाहीत किंवा ते इतरांवर लादले जात नाहीत.’

अशा संस्था चालवणाऱ्या कोणाला आपण हे वाचून दाखवले तर त्यांना हा लोकशाहीचा पराकोटीचा (म्हणजे नको इतका) आदर वाटेल किंवा अशाने संस्था चालतात का, गतीने निर्णय घ्यायला हे तत्त्व उपयोगाचं नाही, हे फारच आदर्श झाले, व्यवहारात हा आदर्श टिकत नाही...असे शहाणपणाचे व्यवहारी सल्लेही ते देतील. या दोन्ही पुस्तकांतून शाळेने जे घडवलं ते अमूर्त नाही. तो प्रत्यक्ष पुरावा आहे. हे घडवण्यामागे ही संस्थेतली लोकशाही, भिन्नमताचा नितांत आदर करणारी सहमतीची निर्णय प्रक्रिया खूप कामी आल्याचे दिसते. म्हणजेच तो केवळ आदर्श नव्हे, तर व्यवहाराची पूर्वअट आहे.

मला पायाभूत महत्वाची वाटणारी काही सूत्रे मी नोंदवली. पण शाळेने काय काय नवीन उपक्रम, प्रयोग केले, आलेल्या अडचणींवर कशी मात केली, यांविषयी काही लिहिले नाही. ते लिहिण्याचा खूप मोह मला होतो आहे. पण तो आवरतो. हे उपक्रम खूप कल्पक आहेत. ते उद्बोधक, रंजक व आपल्या पारंपरिक समजुतींना झटकाही देणारे आहेत. अडचणींवर काढलेले मार्ग खूप दमदार आहेत. आजच्या स्थितीत दिशादर्शक आहेत. त्यासाठी मूळ पुस्तकेच वाचायला हवीत. वाचून त्यावर चर्चा व्हायला किंवा घडवायला हव्यात. जे हरवते आहे ते कळायला, जिथे जे जेवढे आहे ते जपायला, नसल्यास निर्माण करायला या चर्चा खूप मदत करतील. एक माणूस म्हणून समृद्ध व्हायला तर नक्कीच उपयोग होईल.

ता. क. – थोडं वैयक्तिक. मी कधीकाळी शिक्षक होतो. पूर्णवेळ कार्यकर्ता होण्यासाठी नोकरी सोडली. त्या निर्णयाबद्दल तर्काच्या पातळीवर, कर्तव्याच्या निकषावर वेगळे मत नाही. पण मधून मधून ३२ वर्षांपूर्वीच्या त्या वातावरणात मी जात असतो हे खरे. माझ्या भोवती मुलांचे अन् माझे मुलांभोवती रुंजी घालणे, बागडणे, सहली, रिकाम्या तासाला मुलांनी मला ओढून वर्गावर नेणे, स्नेहसंमेलने, त्यातील कार्यक्रम बसविणे, विविध उपक्रम आखणे व अमलात आणणे, शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे रमणे हे आठवत असते. या पुस्तकांनी जरा जोरातच खपली काढली. आता हे लिहितानाही भळभळ, वेदना आहे. आत खोलवर एक पोकळी जाणवते आहे. मोठं काही हरवल्याची भावना आहे. ...असो. आता लेख संपला आहे. लवकरच मीही वर्तमानात येईन.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जानेवारी २०२१)

शिकणारी शाळा

‘अभि’रंग

संपादन

वैशाली रोडे

प्रकाशन

ग्रंथाली

पृष्ठे ३०४ | मूल्य ३५० रु.

___________________________


शिकणारी शाळा

बालरंग

संपादन

वैशाली रोडे

प्रकाशन

ग्रंथाली

पृष्ठे २६४ | मूल्य ३०० रु.