Thursday, February 7, 2019

अपना बाजारच्या गोष्टीचे तात्पर्य

रुढ अर्थाने खातूभाईंच्या (गजानन खातू) ‘अपना बाजारची गोष्ट’ या पुस्तकाचे हे परीक्षण वा परिचय नाही.  असा परिचय झाल्यास तो आनुषंगिक परिणाम समजावा. या पुस्तकातील मला भावलेल्या, शिकवणाऱ्या व अधोरेखित करावे असे वाटलेल्या काही मुद्द्यांकडे वाचकांचे लक्ष वेधावे आणि त्यांनी त्या मुद्द्यांच्या अधिक विवेचनासाठी मूळ पुस्तक वाचण्यास उद्युक्त व्हावे, हा मर्यादित हेतू या लेखाचा आहे. शीर्षकात नमूद केलेल्या ‘तात्पर्य’ शब्दाची जबाबदारी माझी. लेखक वा वाचकांचे वेगळे मत असू शकते.
समाजवादी-पुरोगामी चळवळीत वय व समज या दोन्ही बाबतीत ज्येष्ठ असलेले खूप कमी लोक आता आहेत. त्यातील एक खातूभाई. या ज्येष्ठाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वय-समजाला अजिबात न दबकता त्यांच्याशी बोलता येते. त्यांना ज्येष्ठ मानणाऱ्या काहींशी बोलताना थोडे दबकायला होते. पण खातूभाईंशी थेट आपल्या वयाच्या पातळीवरुन दोस्ती करता येते. भिन्न मते मांडायला वा त्यांच्या मतावर प्रश्न उभे करायला किंचितही त्यांची ज्येष्ठता आड येत नाही. उलट आपल्या म्हणण्याचे स्वागत होऊन त्याबद्दल आज ना उद्या अजून काही नवे समज वाढवणारे त्यांच्याकडून मिळेल याची खात्री असते. वयाने जुने होत असताना वर्तमानाच्या तारांचे नवनवे झंकार ऐकत भविष्याचा वेध घेण्याची त्यांची वृत्ती व क्षमता अनुभवताना आपल्या म्हातारपणाविषयी मनात एक लोभस चित्र तयार होते. खातूभाईंचे खाणे, राहणे, बोलणे यातला रस पाहता ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हा कविवर्य तांबेंचा स्वतःपुरताच अनुभव असावा असे वाटू लागते.
अशा या खातूभाईंचे वैचारिक लेखन वाचले होते. पण ‘अपना बाजार’शी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधाचा केवळ संदर्भच मला होता. त्याचे तपशील ठाऊक नव्हते. या पुस्तकामुळे ती उणीव दूर झाली. त्यांच्या व्यक्तित्वाची आणि अपना बाजार या एका अत्यंत महत्वपूर्ण सहकाराच्या प्रयोगाची घडण कळायला मदत झाली.
१९६८ ते १९८२ या १४ वर्षांतली, त्यांच्या वयाच्या २७ ते ४२ या कालखंडातली ही घडण ते रेखाटतात तब्बल ३६ वर्षांनी. ‘हे पुस्तक अपना बाजारचा इतिहास नाही. १९४८ ते १९६८ पर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीची त्यात नोंद नाही. १९८२ नंतरच्या कालखंडाचीही चर्चा नाही. त्यामुळे अनेकांना ते अपुरे वाटेल.’ असा ‘कबुलीजबाब’ ते सुरुवातीलाच देतात. पण ‘निरोप घेताना’ या शेवटाकडच्या प्रकरणात ते म्हणतात- ‘ही १४ वर्षे अविरत कामाची होती. प्रतिवर्षी काही ना काही घडत होते. जणू बाल्यावस्थेतून युवावस्थेत वाटचाल होताना जडणघडणीची वाटचाल.’ त्यामुळे या पुस्तकात अपना बाजारचा संपूर्ण इतिहास नसला तरी त्यात नोंदवलेल्या काळाचे मोल मोठे आहे.
पर्सोनेल मॅनेजमेंट हा विषय असलेले खातूभाई ‘क्रॉम्पटनच्या भव्य कारखान्यातली’ नोकरी सोडून अपना बाजारच्या ‘नायगावच्या पत्राशेडच्या कार्यालयात’ येतात.  ते म्हणतात- ‘पण मला त्याचे फारसे वाटले नाही. कारण ही आपली माणसं होती. आपल्या विचारांची होती. क्रॉम्प्टनमधले कामगारविरोधी वातावरण मला कधी आवडले नाही. आपल्या विचारांच्या क्षेत्रात यायला मिळाले याचाही आनंद होता.’
ज्या परिसरात अपना बाजार उभे राहत होते, तो परिसर नायगाव, दादरचा. खातूभाई या परिसराचे व्यक्तित्व रेखाटताना लिहितात- ‘नायगाव हे कामगार व राजकीय चळवळीचं केंद्र. अशोक मेहतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कामगार चळवळीने इथे सामाजिक कामाची पायाभरणी केली. (त्यांच्याच प्रेरणेने अपना बाजार सुरु झाले.) जी. डी. आंबेकरांनी इंटकची उभारणी केली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांनी लाल बावटा उभारला. त्यामुळे नायगावच्या सामाजिक राजकीय जीवनात समाजवादी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. त्यामध्ये नंतर शिवसेनेची भर पडली.’
अपना बाजारच्या टीमचे निर्विवाद कॅप्टन असलेले दादा सरफरे आणि त्यांचे सहकारी या सर्व प्रवाहांना कसे यशस्वीपणे हाताळत होते त्याची नोंद खातूभाई करतात. अपना बाजारची अध्वर्यू असलेल्या या मंडळींची पाळेमुळे त्या भागातील सामाजिक-राजकीय जीवनात खोल रुतलेली होती. नायगावमध्ये आदराचे स्थान असलेल्या दादा सरफरेंबद्दल लिहिताना ते म्हणतात- ‘दादांच्या घरी गेले की दादा बहुधा नायगावमधील कुठल्या तरी मर्तिकाला जाऊन आलेले असत. …बहुधा त्या काळात नायगावमधील एकही मर्तिक असे नसेल ज्याला दादा गेले नाहीत. …दादांच्या या चौफेर जनसंपर्कामुळेच दादा नायगावचे किंगमेकर झाले.’ दादांच्या बरोबरीने अपना बाजार उभारणीतले सहकारी, पुढे आमदार झालेले व आमदार होऊनही शेवटपर्यंत एकाच खोलीच्या घरात राहणारे एन. के. सावंत यांचाही नायगावच्या सामाजिक-राजकीय जीवनावर ठसा होता. अपना बाजारचे बहुतेक कार्यकर्ते प्रजा समाजवादी पक्षाचे. संस्थेच्या कामाचा मोबदला न घेणारे, मासिक बैठकीचा प्रवासभत्ताही पार्टीला देणारे, व्यापाऱ्यांच्या दिवाळी भेटी घरी न स्वीकारता ऑफिसमध्ये जमा करायला लावणारे हे पदाधिकारी. या सर्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या धगधगत्या काळातील प्रेरक, ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या विलक्षण जिद्दीचे कोंदण अपना बाजारच्या घडणीला मिळाले.
या चबुतऱ्यावर अपना बाजारची इमारत आकार घेत होती. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व पुढे जनरल मॅनेजर म्हणून खातूभाईंचा सहभाग सुरु झाला तो या माहोलात, या गतीत. ते लिहितात- ‘पाण्यात पडलेला माणूस जसा जिवाची बाजी लावून हातपाय मारतो तसे आम्ही करत होतो.’ फिरती बससेवा, बोनस स्टॅम्प योजना, विजयी भांडी बचत योजना, दिवाळी भेट, जनता मिठाई अशा अनेक यशस्वी तर काही अयशस्वी उपक्रमांद्वारे तसेच अनेक क्षेत्रांत संचार करत अपना बाजार शिकत पुढे जात होते. या प्रयोगांवेळचे अनेक मासलेवाईक अनुभव-जिंकल्याचे, पडल्याचे, फसल्याचे या पुस्तकात वाचायला मिळतात.
खातूभाईंच्या कारकीर्दीतील या सर्व प्रयत्नांचे फलित नोंदवताना ते लिहितात-‘१९६८ ते १९८२ या चौदा वर्षांत अपना बाजारचा कायापालट झाला. १९४८ साली नायगावमध्ये एक धान्य दुकान सुरु करणाऱ्या नायगाव कामगार ग्राहक सहकारी संस्थेचे १४ शाखा आणि २५ प्राथमिक संस्था सदस्य असलेल्या मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक संस्थेत रुपांतर झाले. अन्नधान्याबरोबर रेशनिंगचे वितरण, कापड दुकान, औषध दुकान आणि औषध भांडार असा विस्तार झाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत संस्थेची ओळख निर्माण झाली.’ नायगावमधील अपना बाजार मागोमाग वाशी, मुलुंड, अंधेरी या ठिकाणी स्वतःच्या इमारतींत अपना बाजार विस्तारला. याच काळात संस्थेने सरकारचे भागभांडवल व कर्जाची संपूर्ण परतफेड केली. अशी परतफेड करणारी संस्था हे अपना बाजारचे वेगळेपण …या तसेच आणखी बऱ्याच मिळकती ते पुढे नोंदवतात.
या यशाची गुरुकिल्ली काय? ..याचं सरळसोपं उत्तर नाही आणि तसं ते नसंतही असे ते म्हणतात. मात्र काही ठळक गोष्टींची, वैशिष्ट्यांची ते नोंद करतात. उदा. पदाधिकारी व अधिकारी यांची साप्ताहिक बैठक. त्यामुळे निर्णयप्रक्रिया जलद व्हायला तसेच पदाधिकारी व अधिकारी यांतील संवाद वाढायला मदत झाली. अपना बाजारचे वार्षिक अहवाल फक्त कायद्याच्या पूर्ततेसाठी नसत तर त्यातून सभासदांना आपली संस्था खरोखरी कशी चालते ते कळण्यासाठी असत. त्यात कारणमीमांसा असे. सभोवतालच्या घडामोडींचा (उदा. १९७१ चे बांगला देशाचे स्वातंत्र्य युद्ध), सरकारी धोरणांचा या अहवालात तपशील असे. खातूभाई म्हणतात- ‘अपना बाजारचे अहवाल म्हणजे वैश्विक विचार आणि स्थानिक कृती याचा वस्तुपाठच आहेत.’ अपना बाजार हे समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम आहे व सहकारी चळवळ परिवर्तनासाठी आहे हे भान कायम ठेवले. परिणामी राजकीयदृष्ट्या कायम एकत्र राहिलेल्या या मंडळींनी संस्था चालवताना पक्षीय संकुचितता येणार नाही याची काळजी घेतली.
परिवर्तनवादी संस्थाचालक आणि त्याच दृष्टिकोणाचा उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेला व्यवस्थापक एकत्र आल्याने धंदा, परिवर्तनाची चळवळ व कामगारांचे हितसंबंध यांची कशी समतोल सांगड घातली जाते, तुटू न देता पेच कसे सोडवले जातात याचे नमुने या पुस्तकात आहेत. अपना बाजारच्या कामगारांनी शिवसेनेची युनियन आणली तेव्हा तिला मान्यता द्यायचा प्रश्न तयार झाला. खाजगी कारखान्यात मालकधार्जिणी युनियन असायला आपला विरोध असतो. सहकारी क्षेत्रही याला अपवाद असता कामा नये. या भूमिकेतून कामगारांच्या युनियन निवडण्याच्या अधिकाराची खातूभाईंनी साथ केली. संस्थाचालक नाराज झाले. पण त्यांनी आपला आग्रह सोडून अखेर या युनियनला मान्यता दिली.
कामगारांचे अधिकार आणि धंद्याचे हित याबाबत कामगार संघटनांतील कार्यकर्ते व नेत्यांची भूमिका हा मोठा प्रश्न आजही आहे. या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार करण्याचे व तसे कामगारांचे शिक्षण करण्याचे काम कॉ. डांगेंनी केले. पण ती परंपरा पुढे चालवणारे नेते पुढे कमी राहिले. जवळपास दुर्मिळ आहेत. खातूभाई या परंपरेचे वाहक आहेत. कामगारांच्या योग्य मागणीसाठी संस्थाचालकांशी संघर्ष आणि संस्थेच्या व पर्यायाने कामगारांच्या भविष्यातील अहिताला रोखण्यासाठी युनियनच्या मागणीला विरोध यात खातूभाईंनी कधी तडजोड केली नाही.
अपना बाजारचा सेवक वर्ग मुख्यतः बहुजन समाजातला. कारागिरी, शेती आणि कष्ट करणारा. पारंपारिकपणे उच्चवर्णीयांचा प्रभाव असलेल्या व्यापारात बहुजनसमाजातील नव्या पिढीत व्यापार हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे काम खातूभाईंच्या पुढाकाराखाली अपना बाजारमध्ये झाले. अपना बाजारच्या चळवळीचे मापन करताना या social engineering ची दखल घेणे गरजेचे आहे, असे खातूभाई म्हणतात ते रास्तच आहे.
अपना बाजारच्या सेवकांना हाऊसिंग बोर्डाच्या जागा मिळाव्यात यासाठी संस्थेने प्रयत्न केले. आर्थिक अडचणींमुळे पुढे न येणाऱ्या सेवकांना ही संधी कशी महत्वाची आहे, त्यासाठी सोने विका, पतपेढीतून कर्ज घ्या असे समजवावे लागे. या कर्जाचा न पेलणारा भार संस्थेने उचलावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खातूभाई सेवकांना देत. यामुळे या सेवकांचे आयुष्य कसे बदलून गेले याची उदाहरणे खातूभाईंनी पुस्तकात दिली आहेत. या सेवकांच्या करवी झालेल्या, सामान्य माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास वाढवणाऱ्या घटनाही ते नोंदवतात. सेवकांना शिकवणारे खातूभाई ‘भोगलेंमुळे मला शिक्षणापलीकडच्या व्यावहारिक शहाणपणाचे दर्शन झाले.’ असेही नमूद करतात.
इतकं सगळं करणाऱ्या खातूभाईंनी अपना बाजार यशाच्या शिखरावर असताना आणि कर्तृत्वाची आणखी भरारी घेण्याचे वय असताना, संस्थेच्या वाढीबरोबरच मोठ्या प्रमाणात वेतनवाढीची शक्यता असताना, विशेषतः मुले लहान व एकटा कमावता असताना अवघ्या ४२ व्या वर्षी अपना बाजार का सोडले?
पदाधिकाऱ्यांबरोबर मतभेद नव्हते. कामकाजात पेचप्रसंग नव्हते. सेवकांशी उत्तम संबंध होते. अशावेळी काहीही कारण नसताना मी अपना बाजार सोडले हे आपल्या स्नेही, सहकाऱ्यांना शेवटपर्यंत पटले नाही, असे खातूभाई म्हणतात. या पुस्तकात काही कारणे, त्यावेळची त्यांची मनःस्थिती तसेच भूमिका ते नोंदवतात.
संस्था उत्तम अवस्थेत असताना, सर्वांशी सलोख्याचे संबंध असताना बाहेर पडावे हे उत्तम, हे पहिले कारण. आपल्याकडून होण्यासारखे, निर्मिती करण्यासारखे जे होते ते झाल्यावर केवळ दैनंदिन कामात अडकून पडावे असे वाटत नव्हते. असे अडकून पडणे संस्थेच्या हिताला तसेच व्यक्तिगत विकासाला अडथळा ठरणार होते. अशावेळी नव्या नेतृत्वाला संधी देऊन नव्या दिशेच्या शोधाच्या शक्यता निर्माण करणे, हे दुसरे.
संवेदना पूर्ण शाबूत ठेवून वस्तुनिष्ठपणे जीवनाला सामोरे जाण्याच्या (छे! जीवनाला वळविण्याच्या) या निःसंग स्थितप्रज्ञतेमुळेच त्यांच्या निरोपाची घटना अशी असू शकते – ‘प्रत्येक माळ्यावरती सर्वांना भेटत चार मजले उतरलो आणि हिंदमाताच्या बस स्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहत उभा राहिलो.’
अपना बाजार सोडल्यावर पुढे काय? ऐन उमेदीच्या काळात गतिमान आयुष्याला ब्रेक लागणार होता. पण त्याच्यावर मात करणारे अपना बाजारच्या बाहेर सामाजिक कामाचे एक बृहद वर्तुळ मी तयार केले होते, असे खातूभाई सांगतात. अपना बाजारमध्ये असतानाच राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, विषमता निर्मूलन शिबिरे, नामांतर आंदोलन, जेपी आंदोलन यांत त्यांचा सहभाग असे. या सामाजिक-राजकीय कामातून अनेक आव्हाने पुढे येत होती. त्यामुळे अपना बाजारनंतर नोकरी स्वीकारली नाही असे खातूभाई म्हणतात. रिटेल मॅनेजमेंटमध्ये कन्सलटन्सी, व्याप न वाढवता गरजेपेक्षा जास्त कमाईच्या मागे लागायचे नाही असे ठरवून १९८२ पासून ‘सार्वकालिक कार्यकर्ता न होता सर्वकाळ सार्वजनिक जीवनात वावरलो.’ असे ते नोंदवतात.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात सहकारी चळवळीच्या भवितव्याविषयी खातूभाईंचे चिंतन आहे. हे प्रकरण मूळातूनच वाचायला हवे. या चिंतनाची प्रत कळावी म्हणून काही सूत्रे नोंदवतो.
  • औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आर्थिक विषमतेच्या कष्टकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांपासून सोडवणूक करायला शासनव्यवस्था पुरेशी सक्षम नव्हती. अशावेळी या दुर्बल घटकांनी सहकारी चळवळीचा आधार घेतला. हे जगभरच्या विकसनशील तसेच विकसित देशांत घडले.
  • आता औद्योगिक भांडवलशाहीची जागा वित्तीय भांडवलशाहीने घेतली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि सेवाक्षेत्रातील रोजगार घटतो आहे. संघटित क्षेत्र मोडल्यामुळे संघटित कामगार चळवळ संदर्भहिन होत आहे. तशीच आजवरची सहकारी चळवळही संदर्भहिन होत आहे.
  • सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचे अधिकार जसे रजिस्ट्रारकडे आहेत, तसेच लहानसहान हाऊसिंग सोसायट्यांची निवडणूकही रजिस्ट्रारच घेत आहे. मग या सगळ्यात लोकसहभाग आणि सहकार राहिला कोठे?
  • शेतीसमाज, औद्योगिक कष्टकरी समाज आणि मध्यमवर्ग या स्थिर व आंतरिक नाते असलेल्या समूहांचे स्थलांतर सुरु झाले. असा विखंडित समूह परस्पर सहकार्याने सहकारी संस्था कशा उभ्या करु शकेल?
  • तरीही सहकारी चळवळीला भविष्य प्रदान करणारी नवी परिस्थिती आता तयार होत आहे. कोणत्याही पेचप्रसंगातून बाहेर पडू शकेल अशी लवचिकता दाखवणाऱ्या भांडवलशाहीला २००८ नंतरच्या अरिष्टातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्थव्यवस्था ठीकठाक करण्याच्या सर्व प्रचलित उपाययोजना निरुपयोगी ठरत आहेत. अशावेळी सहकारी अर्थव्यवस्था प्रस्थापित स्पर्धेच्या मूल्याला, प्रस्थापित नफ्याच्या संकल्पनेला आणि प्रचलित भांडवलीकरणाच्या प्रक्रियेला पर्याय देऊ शकते.
तथापि, यासाठी सहकाराचे नवे प्रारुप सिद्ध करण्याची गरज पुस्तकाच्या अखेरीस ते नमूद करतात.
-सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, फेब्रुवारी २०१९)
अपना बाजारची गोष्ट
गजानन खातू
अक्षर प्रकाशन
पृष्ठेः १९० | मूल्यः २०० रुपये
अप

Friday, February 1, 2019

सामाजिक सद्भाव' या विषयावर सह्याद्री वाहिनीवर झालेली मुलाखत

हुतात्मा दिनी 'सामाजिक सद्भाव' या विषयावर सह्याद्री वाहिनीवर झालेली सुरेश सावंत यांची मुलाखत. सवड झाल्यास ती पहावी ही विनंती.

https://youtu.be/lNIvAXMYp_8