Saturday, January 30, 2016

शनिच्या फेऱ्यात पुरोगामी

शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरुन महिलांना दर्शन घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाबाबत पुरोगामी वर्तुळात खूप गोंधळ आहे. पुरोगाम्यांत अनेक पीठे आहेत. काहींना वाटते, देवावर विश्वास ठेवणे, हीच अंधश्रद्धा आहे, तिथे अशा आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रश्न येतोच कोठे? पुरोगामी निरीश्वरवादीच असतात, असायला हवेत, असे हे पीठ मानते. इतर अनेक गुण जुळले, तरी देव मानतो या एका कारणावरुन ते एखाद्याला त्याज्य ठरवतात. आंबेडकरी पीठाला तर जग बौद्धमय झाल्याशिवाय परिवर्तनाचे चक्र पूर्ण फिरणारच नाही, असे वाटते. बाबासाहेबांनी मंदिरप्रवेशाचे लढे सोडले, देवांच्या ३६ कोटी मांदियाळी असलेल्या हिंदूधर्मालाच त्यागले व बौद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळे हिंदू देवळातील प्रवेशासाठीच्या कोणाच्याही लढ्याला पाठिंबा द्यायचा प्रश्नच संभवत नाही. असा निरर्थक लढा देणाऱ्यांनी लवकरात लवकर बौद्ध धम्मात धर्मांतरित होण्याशिवाय त्यांच्या उन्नतीचा दुसरा कोणताही मार्ग नाही. खरं म्हणजे, निरीश्वरवादी पुरोगाम्यांनाही ते ढोंगी समजतात. एकीकडे निरीश्वरवादी स्वतःला म्हणायचे व दुसरीकडे हिंदू धर्मातच राहायचे ही आंबेडकरी पीठाला शुद्ध दांभिकता वाटते. असे दोन्ही दगडांवर पाय ठेवणारे हे खरे पुरोगामी नाहीतच, असे त्यांचे म्हणणे असते. अर्थात, तथागताच्या करुणा, मैत्री, सब्बे सत्ता सुखी होन्तु वगैरे भूमिकांतून सभोवतालच्यांची मने परिवर्तीत करावी व असे होणे हाच खरा सद्धम्माचा प्रसार आहे, एवढी उसंत सध्याच्या गतिमान काळात त्यांच्याकडे नाही. त्याऐवजी लोकांनी साग्रसंगीत धर्मांतर करावे व लेखी बौद्ध व्हावे हाच जग बौद्धमय करण्याचा जलद व टिकाऊ मार्ग त्यांना वाटतो. ऐतिहासिक भौतिकवादी वर्गलढ्याच्या क्रांतिकारी शास्त्रावर आधारित व्यवहार करणाऱ्या ज्या डाव्यांना शनिसारख्या अंतराळात भ्रमण करणाऱ्या ग्रहगोलाला देवळात प्रस्थापित करणाऱ्यांच्या अशास्त्रीयतेबाबतच तुच्छता वाटत असते, त्यांनी अशा शनिच्या दर्शनासाठी आग्रह करणाऱ्यांना पाठिंबा देणे म्हणजे स्वतःचे अगदीच अधःपतन करुन घेणे आहे. महिलांचा हा लढा समतेसाठीचा असू शकतो, अशी मान्यता देणारेही पीठ पुरोगाम्यांत आहे. पण हा लढा शुद्ध, चारित्र्यवान पुरोगाम्यांनीच द्यायला हवा, याबाबत ते चोखंदळ आहेत. भूमाता ब्रिगेड हे जातियवादी संभाजी ब्रिगेडचेच पिल्लू आहे, त्या तृप्ती देसाईंची काँग्रेसशी सोयरिक आहे, त्यामुळे यात राजकारण आहे, शिवाय त्या स्टंटबाज आहेत, महिलांना पैसे देऊन त्यांनी सत्याग्रहाला आणले आहे, नाहीतरी निवडणुकीत पैसे वाटण्याचा उद्योग ही मंडळी करतच असतात...असे बरेच त्यांनी शोधलेले असते. तेव्हा अशांना पाठिंबा देणे म्हणजे आपल्या धुतल्या चारित्र्याला गटारात बुचकळणे नाही का? त्यामुळे तूर्त पाठिंबा वगैरे काही शक्य नाही. बाकी अनेक पीठे अशीही आहेत ज्यांचे अजून काही ठरत नाही. विचार चालू आहे. पाठिंबा द्यावा, असेही वाटते. पण इतर पीठे काय म्हणतील, याचीही काळजी वाटते. आपल्या पुरोगामीत्वाला उगीच बट्टा लागायला नको, आपण काही चुकीचे केले असे पुढे सिद्ध व्हायला नको. त्यामुळे सध्यातरी आपण शहाणपणाने गप्प राहावे, असे त्यांनी ठरवले आहे. हे असे असले तरी संविधानातील समतेच्या, उपासना स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पाठिंबा द्यायलाच हवा, अशी भूमिका घेणारेही पुरोगामी आहेत. पण त्यांचे संघटित पीठ नाही. या सगळ्यात सन्मान्य अपवाद आहेतच. पण ते अपवादच.

पहिलाच परिच्छेद खूप लांबला. आता बदलतो.

तर मला वाटते-म्हणजे खूप काही वाटत नाही, एवढेच वाटते, की आपण भूमाता ब्रिगेडच्या या महिलांना पाठिंबा द्यायला हवा. आपण देव मानत नसलो, तरी जे देव मानतात, त्यांना विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. त्याचा आपण आदर करुन या मूल्यांच्या संरक्षणासाठी, स्त्रियांच्या समान हक्कांसाठी आपण पाठिंबा द्यायला हवा. हा लढा देणाऱ्या या मंडळींच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या शैलीविषयी आपल्याला प्रश्न असला, तर सरळ त्यांच्यात सहभागी होऊ नये. त्यांच्या केवळ आताच्या मुद्द्याला आपली समग्र भूमिका विशद करुन बाहेरुन पाठिंबा द्यावा. आपापल्या ठिकाणी निदर्शने, पत्र परिषदा किंवा साधे निवेदन वर्तमानपत्रांत देणे या मार्गांनी हे करता येऊ शकते. संघटना म्हणून अंतर्गत सहमती नसेल, तर व्यक्तिगत पातळीवर समविचारी मंडळी सह्यांचे संयुक्त निवेदन काढू शकतात किंवा समाजमाध्यमांवर एकट्याचा पाठिंबा जाहीर करु शकतात. पाठिंब्याचा हा चहुबाजूंनी हाकारा प्रतिगाम्यांच्या बंदोबस्तासाठी खूप आवश्यक आहे. आपल्या गप्प राहण्याने काळ सोकावता कामा नये, ही खबरदारी घ्यायलाच हवी.

संविधानाने घटनात्मक मूल्यांचे दमन करणाऱ्या धर्मरुढींना स्वातंत्र्य दिलेले नाही. सांविधानिक अधिकारांचे हनन होत असेल, तर अशा धर्मकृत्यांत हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार आहे. पण हा अधिकार बजावण्याऐवजी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते म्हणून आम्ही अशा आंदोलनांना परवानगी देऊ शकत नाही, असे निमित्त करुन सरकार आपल्या कर्तव्यापासून हटते. मतांसाठी समाजातील कमकुवतपणाचे लांगूलचालन करण्याची, त्यांचा वापर करण्याची सत्ताधारी व विरोधक दोहोंकडच्या राजकारण्यांची जुनीच वहिवाट आहे. ती मोडली पाहिजे. आताही भूमाता संघटनेच्या महिला ज्या सनदशीरपणे आंदोलन करत होत्या, ते पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा भंग करत असल्याने त्यांना रोखावे लागले, हे सरकारचे म्हणणे हा मोठा भंपक विनोद वाटतो. घटनात्मक अधिकार डावलणाऱ्या शनिमंदिराच्या व्यवस्थापकांना आवरण्याऐवजी १४४ कलमाचा बहाणा करुन घटनात्मक अधिकार मागणाऱ्या भूमाता संघटनेचे आंदोलन मोडून काढणे हा सरकारचा व्यवहार सांविधानिक नैतिकतेचा अवमान आहे. सरकार अनेक पुरोगामी आंदोलनांबाबत असा व्यवहार करत असते, हा अनुभव आपल्याला नवीन नाही.

यानिमित्ताने फक्त शनि शिंगणापूरच नव्हे, तर अन्य देवळांतल्या तसेच केवळ हिंदूच नव्हे तर अन्य धर्मांतल्या स्त्रियांबाबतच्या दुजाभावाविषयी आवाज उठवायला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सर्व धर्मांतल्या सनातन्यांना चेपायची ही संधी गमावता कामा नये. हाजीअली दर्ग्यातील प्रवेशाविषयी मुस्लिम महिलांनी लागलीच आझाद मैदानात निदर्शन केले. ही खूप आश्वासक घटना आहे. आपले समज-गैरसमज, तात्त्विकता, पावित्र्य यांबाबतच्या गंडांच्या शनिफेऱ्यातून बाहेर पडून या घटनांचे मुक्तपणे स्वागत करायला हवे. त्यांच्या भोवती एक व्यापक संरक्षक कवच उभारायला हवे. प्राप्त स्थितीतले हे पुढे जाणारे अंकुर शोधणे व जोपासणे यालाच पुरोगामीत्व म्हणतात.

- सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com

लोक किती सहिष्णू आहेत!

आठवड्याभरापूर्वीची गोष्ट.

बेल वाजल्याने दरवाजा उघडला. बाहेर २०-२२ वयोगटातील मुले.

"काका, २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची माहिती द्यायला आम्ही आलो आहोत. आपण सकाळी सत्यनारायणाची पूजा व नंतर मुलांच्या-महिलांच्या स्पर्धा व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणार आहोत. स्टेज, डीजे धरुन यावेळी बराच खर्च येणार आहे. म्हणून ९०० रु. वर्गणी ठरवत आहोत."

तसे आम्ही या वसाहतीत नवीन. त्यामुळे इथल्या सणउत्सवांचा, रिवाजांचा मर्यादित परिचय. आपण राहतो तेथील सण-उत्सवांत सामील व्हायला हवे, ही माझी भूमिका जुनीच. पण सत्यनारायण आणि तोही २६ जानेवारीला आणि त्यासाठी ९०० रु. वर्गणी द्यायची याने मी आतून खवळलो. पण खवळणे बाहेरुन न दाखवण्याइतका मी संयमी आहे. तरुण मुले. समाजाचे, देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, अशी ही पिढी. त्यांना समजावणे ही आपली जबाबदारी आहे.

मी सुरु झालो, "हे बघा. मी महात्मा फुलेंचा अनुयायी आहे. मी सत्यनाराणाच्या विरोधात आहे. महात्मा फुलेंनी सत्यनारायणाबद्दल काय सांगितले ठाऊक आहे..."

मी बोलत होतो. शिक्षकापुढे मुकाट उभे राहून ऐकण्याच्या शिस्तीने ती मुले ऐकत होती. 

एक पॉज घेतला. आता नवीन मुद्दा.

"सत्यनाराणायचं हे पटलं तर घ्या. नाहीतर सोडा. पण २६ जानेवारी हा तर राष्ट्रीय सण. आपले राष्ट्र काही एका धर्माचे नाही. मग फक्त हिंदूंचा असलेला सत्यनारायण हा विधी त्या दिवशी करणे कितपत योग्य ठरते?...आणि हे बघा, वर्गणी एवढी देणे मला शक्य नाही."

एवढा वेळ गप्प असलेल्या मुलांतल्या एकाने चटकन विचारले, "मग तुम्ही किती देऊ शकाल?"

"दोनशे."

मी आता निगोशिएट करणार होतो. पण काही न बोलता मुले गेली. वर्गणीसाठी दोन दिवसांनी ती नक्की परत येणार हा माझा होरा होता. २५ तारखेला ती मुले आलीही. त्यांनी अदबीने मला आमंत्रण दिले.

"काका, सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या."

वर्गणीचं ते काही बोललेच नाहीत.

दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीला सकाळी खिडकी उघडली तर आमच्या आवारात माझ्या खिडकीच्या समोरच दोन स्टेज. भटजीची सत्यनारायणाची तयारी सुरु होती. मी खिडकी लावून घेतली. पण आत नको इतक्या मोठ्या आवाजात सगळे ऐकू येत होते. सत्यनारायणाची कथा ऐकली. महाआरतीचे आवाहन ऐकले. नंतर मुलांच्या स्पर्धा, त्यांचे आनंदाने चेकाळणे सगळे ऐकू येत होते. टीव्हीचा आवाज मोठा केला. पण तरीही ऐकू येतच होते. संध्याकाळी महिलांचा हळदी-कुंकू. रात्री 'शांताबाई' व अन्य गाणी आणि नाच. डीजेने खिडक्यांच्या खाचा हादरत होत्या. हे सगळं काय चाललंय ते न बघताही कळत होतं. पण मधूनच कुतुहल जागे होई. खिडकी उघडावी वाटे. पण ते बरोबर होणार नाही. आपण वर्गणी दिलेली नाही. आपल्याला खिडकीत उभे असलेले त्या मुलांनी पाहिले तर... 

खिडकी नाहीच उघडली. रात्री उशीरा सगळे शांत झाल्यावर हुश्श वाटले.

दुसऱ्या दिवशी ती मुले पुन्हा दाराशी. 

"काका, काल तुम्ही नव्हता. हा तुमचा प्रसाद."

"............."

- सुरेश सावंत

Sunday, January 24, 2016

राम गुहांच्या भाषणातील 'पक्ष व लेखक-कलावंताचे स्वातंत्र्य' या मुद्द्याविषयी

२३ जानेवारी २०१६
प्रिय स्नेही,

परवा मुंबई विद्यापीठात निखिल वागळेंच्या पुढाकाराने विजय तेंडुलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजिलेल्या रामचंद्र गुहांच्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेले ८ धोके' या विषयावरील व्याख्यानाला आपल्यापैकी अनेक जण उपस्थित होते. सध्याच्या काळात ज्यांचे लेखन व भाषण समाजाची सम्यक घडण करायला मदतनीस होते, अशांपैकी गुहा आहेत, असे मी मानतो. त्यांची अनेक मते मला पटतात. काहींविषयी मला वेगळेही वाटत असते. पण ते खूप मूलभूत नाही. तथापि, परवाच्या त्यांच्या भाषणातील एका आनुषंगिक मताबाबत माझ्या मनात मूलभूत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, ते आपल्याला सांगावे, असे मला वाटते. 'लेखक किंवा कलाकाराने पक्षाशी संबंध ठेवला तर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही अंशी तरी निश्चित परिणाम होतो. हे होऊ द्यायचे नसेल, तर त्याने कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवता कामा नये,'  या त्यांच्या मताविषयी मला प्रश्न आहे. खरे म्हणजे या क्षणी ते मला पटलेले नाही. काही संदिग्धता माझ्याही मनात आहे. आणखी काही मुद्दे, स्पष्टता यथावकाश इतर कोणाकडून आल्यास त्याविषयी मतनिश्चिती व्हायला मदत होईल. म्हणून, तूर्त ते प्रश्नचिन्ह आहे, असे मी म्हटले आहे.

आजचा राजकीय पक्षांचा (भांडवली तसेच डाव्या) व्यवहार पाहिला, तर असे बंधन येते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण तो व्यवहार झाला. गुहा व्यवहाराविषयी बोलत असते तर प्रश्न नव्हता. ते तत्त्व, सूत्र म्हणून ते मांडतात. जे कलाकार, लेखक राजकीय पक्षात सामील होतात, त्यांच्याविषयी त्यांना अनादर नाही. ती त्यांची निवड आहे. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांच्या या निर्णयाचा ते आदरच करतात. पण तरीही तत्त्व म्हणून कलाकाराने-लेखकाने स्वतंत्रच राहिले पाहिजे, असे ते मानतात. कलाकार-लेखकाने व्यापक राजकीय भूमिका घेऊ नयेत, यालाही त्यांचा विरोध नाही. ही भूमिका पक्षीय नको, असे त्यांचे म्हणणे आहे.

काल प्रश्नोत्तरांच्या वेळी नचिकेत कुलकर्णी (आमचा/आपला एक तरुण अभ्यासक मित्र) नेही प्रश्न विचारायला हात वर केला होता. पण वेळेच्या मर्यादेमुळे त्याला प्रश्न विचारायला संधी मिळाली नाही. मी औत्सुक्यापोटी त्याला तू कोणता प्रश्न विचारणार होतास, म्हणून विचारले. त्यालाही हाच प्रश्न विचारायचा होता. घाईत झालेल्या या आमच्या बोलण्यात त्याने कैफी आझमींचे, भीष्म सहानींचे नाव घेतले. त्यांना कोठे मर्यादा पडल्या असे त्याला म्हणायचे असावे. तू यावर लेख लिही, अशी मी त्याला सूचना केली. त्याला बहुधा ती कल्पना पसंत पडली, असा माझा अंदाज आहे. निघायच्या घाईत अधिक बोलता आले नाही.

त्याचा हा मुद्दा मला रास्त वाटतो. कैफी आझमी, भीष्म सहानी, बलराज सहानी, ए. के. हंगल या कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते, म्हणून मर्यादा पडल्या असे दिसत नाही. नारायण सुर्वे खाजगीत पक्षव्यवहाराविषयी किंतुपरंतु व्यक्त करत असत. पण त्यांच्या कवितांच्या कलात्मक मूल्यांवर त्याचा परिणाम झाला, असे मला वाटत नाही. इथे, कम्युनिस्ट पक्षांच्या व्यवहाराला सर्टिफिकेट मी देत नाही, हे लक्षात घ्यावे. व्यवहारात गडबडी झाल्या आहेत. होऊ शकतात. तत्त्व म्हणून पाहायचे तर वरील मंडळींच्या अभिव्यक्तीवर त्यांच्या पक्षसान्निध्यामुळे बंधन आले नाही, एवढेच मला सांगायचे आहे. कोणी रशिया-चीनमधील कम्युनिस्ट पक्षांच्या व्यवहाराविषयी बोलेल. जरुर बोलावे. अॅन रँड (Ayn Rand)सोव्हिएट सोडून अमेरिकेत गेल्याने तिचे आविष्कार स्वातंत्र्य बहरले, याविषयी तिने व इतरांनी जे म्हटले आहे, त्याविषयीही मला काही म्हणायचे नाही. ती चर्चा जरुर व्हावी.

पक्षाशी जोडले गेले की प्रतिभेच्या आविष्काराचे स्वातंत्र्य गडबडते, त्याला तडजोड करावी लागते, या तत्त्वाबाबत मला प्रश्न आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य आणि विचारवंताचे स्वातंत्र्य यांच्या आविष्कारात फरक आहे. कलाकृती रुपकात्मक, सांकेतिक बोलते. तिचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाऊ शकतो. विचारवंताला ती मुभा नसते. त्याचे म्हणणे शब्दशः असते. समजा विचारवंताची भूमिका व तो ज्या पक्षाचा असेल त्याची भूमिका यात विरोध, फरक असेल तर? असू शकतो. व्यक्तिगत भूमिका व अशा अनेक व्यक्तींच्या गटाची, पक्षाची भूमिका यात फरक असू शकतो. अनेकांच्या मतांची ती सामायिक सहमती असते. म्हणजेच तडजोड असते. ती अपरिहार्य असते. पक्षातच कशाला, संघटनेत, गटात, कुटुंबातही असा व्यवहार करावा लागतो. तो आवश्यक असतो. कोणताही सामुदायिक व्यवहार हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसे पाहिले तर संकोचच करतो. समाज चालण्यासाठी तो आवश्यकच असतो. मुद्दा आहे, मला एकाच वेळी व्यक्ती म्हणून व पक्ष, गट, समूह म्हणून म्हणणे मांडता येते का? यायला हवे. माझे वैयक्तिक म्हणणे हे आहे व माझ्या गटाचे सहमतीचे म्हणणे अमुक आहे, असे मांडता आले पाहिजे. पण ते कोठे, कधी याचे तारतम्य मात्र हवे.

विशिष्ट पक्षाचा, संघटनेचा प्रवक्ता म्हणून मी बोलत असेन तर तिथे त्या पक्षाची, संघटनेची सामुदायिक सहमतीची भूमिकाच मी मांडेन. तिथे कोणी तुमची वैयक्तिक भूमिका काय, असे विचारले तर आताचा हा मंच वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी नाही वा ते आता इथे अप्रस्तुत आहे, असे मी म्हणेन. हे म्हणताना मी माझ्या स्वातंत्र्याचा संकोच करत नाही, तर अधिक जबाबदारीने सामुदायिक शिस्त पाळतो.

ज्यांना अशा दोन भूमिका ठेवता येतात, हे कळत नाही, असे पक्षात लोक असले तर ते वैयक्तिक व सामुदायिक सहमती यात फरक करत नाहीत व आक्षेप घेतात. तो त्या पक्षाच्या धुरिणांच्या-कार्यकर्त्यांच्या समजाचा प्रश्न झाला. त्यामुळे काही वैयक्तिक भूमिका ही सामुदायिक भूमिकेत विसर्जित व्हायला हवी, असे तत्त्व तयार होत नाही.

समाजाची त्या विशिष्ट काळातली, त्या विशिष्ट संदर्भातली समजाची पातळी व विरोधकांचे डावपेच या पार्श्वभूमीवर 'सत्य ते कोठेही, कधीही वदणारच' असे करुन चालत नसते. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, समोर खांब आला तरी मी सरळच जाणार व त्याला धडकणार, असे करुन चालत नसते. त्याप्रमाणे 'इष्ट समयी इष्ट तेवढेच बोलणार' हेच योग्य ठरते.

या मुद्द्याच्या अधिक स्पष्टतेसाठी माझा दोन महिन्यांपूर्वी 'आंदोलन'मध्ये  लिहिलेला 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्वअट' हा लेख खाली देत आहे. तो वाचावा. आपल्यातल्या काहींनी तो आधी वाचलाही असावा.

पक्षाशी, संघटनेशी कोणताही संबंध न ठेवणारा व स्वमत बाणेदारपणे कधीही, कोठेही व्यक्त करणारा लेखक-कलावंत बाणेदार असू शकतो; पण योग्यअयोग्य वेळेचा, समाजाच्या समजाचा, कोणत्या शक्तींना बळ द्यायचे याचा अंदाज घेत समाजाला पुढे न्यायची प्रगल्भता त्यात असेलच असे नाही. अस्थानी बाणेदारपणाएेवजी योग्य वेळेची निवड करणारी प्रगल्भता मला महत्त्वाची वाटते. 

पक्षाशी संबंध म्हणजे अधःपतन व स्वतंत्र बाण्याने एकटे राहणे हेच श्रेष्ठ असे गुहांना नक्की म्हणायचे नाही. पण फार पाचपोच नसणाऱ्यांना वा नवागतांना त्याचा अर्थ तोच लागू शकतो. तसा अर्थ लागणे हे नुकसानकारक आहे, असे मला वाटते. आंबेडकर, गांधी, नेहरु, डांगे, मंडेला, एस. एम. जोशी या सगळ्या आदरणीय मंडळींना पक्ष होते, हे लक्षात ठेवायला हवे.

थांबतो. जे वाटले ते स्वैरपणे व्यक्त केले आहे. अधिक विचारांती पुन्हा कधीतरी यावर लिहीन.

सदिच्छांसह,
सुरेश सावंत
_____________________________________

मेलद्वारे आलेल्या काही प्रतिक्रियाः

सुरेश,
तुम्ही फार महत्वाचे लिहिले आहे. विशेषतः तुमच्या लेखातील खालील मजकुराशी शंभर टक्के सहमत आहे. संघटनेअंतर्गत अल्पमतवाल्यांना आपले वेगळे मत मांडण्याची व नोंदविण्याची (Dissent Note)  संधी असणे व बहुमताने झालेला निर्णय कुरकुर न करता अल्पमतवाल्यांनी सुद्धा अमलात आणायचा, आपले वेगळे मत कुठे आणि कसे व्यक्त करायचे याचा पाचपोच बाळगायचा. अंतर्गत विचारपीठ (फोरम) आणि सार्वजनिक विचारपीठावर बोलताना तारतम्य बाळगायचे व बहुमतवाल्यांनीही अल्पमत वाल्यांचा सन्मान राखायचा हे पाळले असते तर परिवर्तनवाद्यांच्या अनेक संघटना आता बहरत दिसल्या असत्या.......सुभाष वारे  

तुमच्या लेखातील खालील मजकुराशी शंभर टक्के सहमत आहे.  

कलाकाराचे स्वातंत्र्य आणि विचारवंताचे स्वातंत्र्य यांच्या आविष्कारात फरक आहे. कलाकृती रुपकात्मक, सांकेतिक बोलते. तिचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाऊ शकतो. विचारवंताला ती मुभा नसते. त्याचे म्हणणे शब्दशः असते. समजा विचारवंताची भूमिका व तो ज्या पक्षाचा असेल त्याची भूमिका यात विरोध, फरक असेल तर? असू शकतो. व्यक्तिगत भूमिका व अशा अनेक व्यक्तींच्या गटाची, पक्षाची भूमिका यात फरक असू शकतो. अनेकांच्या मतांची ती सामायिक सहमती असते. म्हणजेच तडजोड असते. ती अपरिहार्य असते. पक्षातच कशाला, संघटनेत, गटात, कुटुंबातही असा व्यवहार करावा लागतो. तो आवश्यक असतो. कोणताही सामुदायिक व्यवहार हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसे पाहिले तर संकोचच करतो. समाज चालण्यासाठी तो आवश्यकच असतो. मुद्दा आहे, मला एकाच वेळी व्यक्ती म्हणून व पक्ष, गट, समूह म्हणून म्हणणे मांडता येते का? यायला हवे. माझे वैयक्तिक म्हणणे हे आहे व माझ्या गटाचे सहमतीचे म्हणणे अमुक आहे, असे मांडता आले पाहिजे. पण ते कोठे, कधी याचे तारतम्य मात्र हवे.

विशिष्ट पक्षाचा, संघटनेचा प्रवक्ता म्हणून मी बोलत असेन तर तिथे त्या पक्षाची, संघटनेची सामुदायिक सहमतीची भूमिकाच मी मांडेन. तिथे कोणी तुमची वैयक्तिक भूमिका काय, असे विचारले तर आताचा हा मंच वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी नाही वा ते आता इथे अप्रस्तुत आहे, असे मी म्हणेन. हे म्हणताना मी माझ्या स्वातंत्र्याचा संकोच करत नाही, तर अधिक जबाबदारीने सामुदायिक शिस्त पाळतो.

ज्यांना अशा दोन भूमिका ठेवता येतात, हे कळत नाही, असे पक्षात लोक असले तर ते वैयक्तिक व सामुदायिक सहमती यात फरक करत नाहीत व आक्षेप घेतात. तो त्या पक्षाच्या धुरिणांच्या-कार्यकर्त्यांच्या समजाचा प्रश्न झाला. त्यामुळे काही वैयक्तिक भूमिका ही सामुदायिक भूमिकेत विसर्जित व्हायला हवी, असे तत्त्व तयार होत नाही.

समाजाची त्या विशिष्ट काळातली, त्या विशिष्ट संदर्भातली समजाची पातळी व विरोधकांचे डावपेच या पार्श्वभूमीवर 'सत्य ते कोठेही, कधीही वदणारच' असे करुन चालत नसते. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, समोर खांब आला तरी मी सरळच जाणार व त्याला धडकणार, असे करुन चालत नसते. त्याप्रमाणे 'इष्ट समयी इष्ट तेवढेच बोलणार' हेच योग्य ठरते.

----------------------------------------------

प्रिय सुरेश सावंत यांस,
स.न.
रामचंद्र गुहा यांच्या विधानावरचा तुमचा आक्षेप बरोबर आहे. गुहांच्या मनातली शंका अगदीच चूक आहे असं नाही, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येऊ नयेत असं वाटत असेल तर लेखकाने कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवू नये, असं ते म्हणतात ते पटण्यासारखं नाही. याचा एक थेट व्यत्यास असा होतो की जे पक्षाशी संबंध ठेवतात ते राजकारणी वा राजकीय कार्यकर्ते ठरतात आणि तसे ते ठरले की लेखक म्हणून नालायक ठरतात. अशी भिंत देखील भेदभावाला खतपाणी घालेल. 
पक्षाशी संबंधित लेखकावर व्यक्त होताना मर्यादा येतात, असा जर गुहांच्या म्हणण्याचा अर्थ घेतला तर तो आजच्या काळात बरोबर आहे. किंबहुना राजकीय विचार प्रणाली मानणाऱ्या संघटनांशी संबंधित लेखकावर असा दबाव अप्रत्यक्षरित्या असतो. त्याच्यावर ज्या विचारप्रणालीचे संस्कार होतात तिचे आदर्श हे लेखकासाठी वंदनीय ठरतात आणि तो त्यांच्या विरोधात जाऊ धजावत नाही किंबहुना त्या आदर्शांनी आखून दिलेल्या चौकटीपलीकडे तो सहसा बघत नाही. सत्य त्याही पलिकडे असू शकतं असं मानायची त्याची तयारी असत नाही. पण हे सर्वसाधारण लेखकाच्या बाबतीत खरं आहे. ही सर्वसाधारणतेची पायरी ओलांडून पुढे जाणाऱ्या लेखकाला या चौकटीवर मात करावीच लागते आणि तो त्याचा आंतरिक झगडा असतो. तो सर्व इझम्सच्या चौकटे लांघून मानवतावादाकडे जाण्याचा प्रयास असतो. तो मानवतावाद या शब्दाच्या केवळ उच्चाराइतका सोपा नसतो.
रामचंद्र गुहा ज्या विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात बोलले त्या खुद्द तेंडुलकरांनी मला एकदा जे सांगितलं ते असं होतं की, 'लिहिताना तू कोणाचा नाहीस हे लक्षात ठेव.' ही अतिशय मोलाची गोष्ट आहे. आपण कोणत्या पक्षाचे असो नसो, संघटनांशी बांधिल असो नसो, मात्र जगताना आणि भोवतालचं जगणं बघताना आपली एक भूमिका तयार होत असते. कधी नकळतपणे तर कधी थेट आपण एखाद्या राजकीय विचाराशी, एखाद्या तत्त्वप्रणालीशी जोडले जात असतो. तिचा चष्मा चढवून सर्वत्र बघू लागलेलो असतो. हे देखील एक गरज आहे. त्या शिवाय आपल्या जगण्याची कक्षा व्यापक होत नाही. आपली भूमिका तयार होत नाही. कुठल्याही काळात भूमिका असणं आणि ती घेणं गरजेचं असतं. आणि कुठलीही भूमिका ही राजकीयच असते. पण सर्जनशील लेखन ही स्वायत्त गोष्ट आहे. तिच्या प्रदेशात जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा आत झिरपलेल्या विचारांचा दाब कमी करून स्वतःलाच प्रश्न विचारावे लागतात. तिथे गोष्ट माणूस समजून घेण्याची असते आणि कोणताही माणूस हा विचारप्रणाली, मानसशास्त्राचे आडाखे, तर्काच्या खुंट्या यांच्या पार पलिकडे असतो. प्रत्येक माणूस हेच एक स्वतंत्र विश्व असतं आणि अशी अनेक विश्वं एकमेकांशी घसली जातात, संपर्कात येतात तेव्हा जगण्याचं एक जगडव्याळ रूप समोर दिसू लागतं. ते कवेत घेणं हा अत्यंत कष्टसाध्य प्रवास असतो. तो फारच कमी लोकांना जमतो. पण तिथवर पोचायची धडपड तर प्रत्येकालाच करावी लागते. या प्रवासात तुम्ही म्हणता तसं व्यक्ती आणि समष्टी या दोन्ही घटकांचं अस्तित्व मान्य करूनच चालावं लागतं. अर्थात हा प्रवास लेखकाला स्वतःचा स्वतःच करावा लागतो. तो करणाऱ्याला जे सत्य सापडतं ते मांडायचं धैर्य त्याचं त्यालाच कमवावं लागतं. त्यासाठी त्याला गुहांप्रमाणे उसने सल्ले देऊन उपयोगाचे नसतात. खरा लेखक आपल्याला सापडलेल्या सत्याची किंमत मोजायला तयार असतो. तो आजूबाजूला काय पर्यावरण आहे आणि काय शहाणपणाचं आहे याचा विचार करत नाही. जो आपल्या पक्षाला घबरून आपल्याला सापडलेलं सत्य सांगणार नाही तो खरा लेखक नव्हे. मग तो पक्षालाच काय कोणालाही घाबरेल. दबाव केवळ राजकीय पक्षांचाच असतो असं नाही, तो समाजाचा, कुटुंबाचा, व्यवहरातील नात्यांचा, संस्कारांचा कशाचाही असतो. हा दबाव घ्यायचा की नाही, हीच  लेखकाची पहिली कसोटी असते. असो.
तुमचं विवेचन सुंदर आणि विचाराला चालना देणारं आहे. त्याबद्दल धन्यवाद.
आपला मित्र
जयंत पवार

----------------------------------

अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत त्यापैकी किती जणांनी त्यावेळच्या सोव्हिएट राशियाचा चिकित्सक आढावा घेतला किंवा पक्षाला घ्यायला भाग पाडले? व्यापक दृष्ट्या डअवे असणे वेगळे आणि पक्षाच्या भूमिकेची चिकित्सा करणे वेगळे. पदाधिकारी असतांना तर वेगळे मत मांडणे शक्यच नाही. विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य प्रसंगी वगैरे प्रगल्भता आवश्यक आहेच. वि.का. राजवाडे, ढेरे वगैरे मंडळीवरही हिंदुत्ववाद्यांचे वार झालेच असते. त्यांच्या सनरक्षणासाठी  कोणता पक्ष पुढे आला असता?
छाया दातार

----------------------------


Praveen Bardapurkar Suresh Sawant....तुमच्या प्रतिपादनात तथ्य आहे-च