Sunday, September 1, 2019

जो मजा साथ दौड़ने में है...


मागे कधीतरी सचिन तेंडुलकरचा-म्हणजे त्याच्यावरचा सिनेमा आला आणि गेला. तो काही मी पाहिला नाही. पण त्यातील लहानपणच्या सचिनची भूमिका करणाऱ्या बालकलावंताची टीव्हीवरची एक मुलाखत रात्री जेवताना पाहिली. नेहमीच्या रीतीने तुला पुढे काय व्हायचे आहे, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर अपेक्षित असे मला सचिन तेंडुलकर व्हायचे आहे, असे उत्तर त्या मुलाने दिले. इथवर ठीक. मात्र पुढच्या एका प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर मला लक्षवेधक वाटले. कारण त्यामुळेच हे उदाहरण इथे नोंदवायला मी प्रवृत्त झालो. तुला सचिन तेंडुलकरच का व्हायचे आहे, असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला- “मुझे सबसे आगे जाना है.” 

त्याच्या या उत्तराने प्रश्नकर्ते आणि त्या मुलासोबत असलेल्या त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर कौतुक झळकले. मात्र या ‘सबसे आगे’ने माझ्या घशात घास अडकला. म्हणजे हाही मुलगा ‘सबसे आगे’च्या बेछूट, दमछाकी स्पर्धेच्या चरकात कोंबला जाणार याचे वाईट वाटले. 

या लहान मुलाच्या मनात मला सचिन तेंडुलकरसारखे उत्तम खेळायचे आहे, असे का नाही आले मनात? ‘सबसे आगे’ हे त्याचे ध्येय का बनावे? 

कारण भोवताल. कारण घर. कारण शाळा. ...या सर्व ठिकाणी तुला कोणाच्या तरी पुढे जायचे आहे, त्यासाठी सतत धावत राहायचे आहे, त्यातच जीवनाचे साफल्य आहे..हे सतत बिंबवले जाते. मुलाचे मूलपण आणि एकूण माणसाचे माणूसपण मारुन टाकणारी ही शिकवण आहे. या शिकवणीने माणसांना घेरुन टाकले आहे. 

आता गणपती येतील. गल्लोगल्लीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मुलांच्या स्पर्धा होतील. निबंध, वक्तृत्व, चित्रकला यापेक्षाही हल्ली या बहुतेक स्पर्धा टीव्हीवरील गाणी, नाचांच्या स्पर्धांचे अनुकरण असते. शाळांमध्येही असेच असते. या स्पर्धांत आपल्या मुलाने फक्त भाग नाही, तर जिंकण्याच्या इर्ष्येनेच उतरले पाहिजे, यासाठी पालकांच्या जिवाचा आटापिटा चाललेला असतो. अशी जिगर आपल्या मुलात नसणे म्हणजे आजच्या ‘स्पर्धेच्या’ जगात तो टिकायला लायक नाही, अशी त्यांची खात्री असते. हल्ली टीव्हीच्या प्रादेशिक-राष्ट्रीय वाहिन्यांवर चालणाऱ्या रिअॅलिटी शोमधून अनेक सामान्य, गरीब, पीडित समूहांमधून आलेली मुले चमकताना दिसतात. त्यामुळे तर सामान्य स्तरातील पालकांच्या आशा आणखी पालवतात. 

रिअॅलिटी शोचा धंद्याचा फंडा बाजूला ठेवू. त्याची चिकित्सा आता नको. पण या सगळ्याच्या परिणामी प्रगतीचे आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचे जे मापदंड ठरले आहेत, ते जिवघेणे आहेत. ज्या गरीब मुलाकडे उपजत प्रतिभा आहे, तो या शोमधून टॉपला जातो. तो एका रात्रीत लखपती वा करोडपती होतो. हा केवळ आणि केवळ अपवाद आहे, हे सामान्यांना कळत नाही. गरीब-पीडित थरातली मुलेही अशी टॉपला जाऊ शकतात, या आश्वासकतेपर्यंत ठीक. त्यापासून मिळणारी प्रेरणाही पोषक. पण जेवढ्या म्हणून गरीब मुलांकडे प्रतिभा आहे, असण्याची शक्यता आहे, त्या सर्वांना त्या प्रतिभेचा शोध व विकास करण्याची संधी आजच्या व्यवस्थेत नाही. दुर्गम तर सोडाच, पण शहरातल्या सर्वसाधारण शाळांतही मुलांच्या विविध प्रतिभा जाणण्यासाठीच्या सोयी, जाणलेल्या प्रतिभांच्या विकासासाठीची साधने वा दिशादिग्दर्शन उपलब्ध आहे, अशी आज स्थिती नाही. उत्तम पोहणारी मुले शोधण्यासाठी आधी शाळेत किंवा गावात वा वस्तीत स्विमिंग पूल तर हवेत. लाखो रुपयांची मेंबरशिप असलेले शहरातले क्लब वा तशाच लाखोंच्या फिया असलेल्या शाळा यांतूनच आज हे स्विमिंग पूल आहेत. म्हणजे हे परवडणाऱ्या थरातील मुलांमधूनच पोहण्याची प्रतिभा शोधली जाणार. वास्तविक ही प्रतिभा वस्ती-पाड्यावरील मुलात असू शकते. पण अशा स्विमिंग पुलांत उतरण्याची संधीच ज्यांना मिळाली नाही त्या मुलांत ही प्रतिभा आहे हे शोधणार कसे? फोटोग्राफीच्या रिअॅलिटी शोमध्येही अशीच मुले येणार ज्यांना कॅमेरा हाताळण्याची संधी मिळाली. हे कॅमेरे खरेदी करण्याची क्षमता असलेल्या पालकांचीच, म्हणजेच आर्थिक दृष्ट्या उच्च वा मध्यम थरातील ही मुले असणार. टीव्हीच्या रिअॅलिटी शोमध्ये चमकणारी बहुतेक गरीब मुले ही गाणे, नृत्य, विनोद अशा बिनसाधनांच्या-बिनखर्चाच्या वा अल्पखर्चाच्या कौशल्यांच्या मर्यादेतच असतात, हे लक्षात ठेवायला हवे. 

या लेखातील चर्चेचा हा आनुषंगिक भाग आहे. मुख्य मुद्दा आहे तो स्पर्धेत टॉपला जाण्यासाठी मुलांना आणि स्वतःलाही धावडवणे व दमछाक करुन घेणे हा. सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला आवडायचे. त्यात त्याला गती होती. ती ओळखून तिचा विकास करणारे आचरेकर सर त्याला लाभले. आणि तो टॉपला गेला. टॉपला जायचेच म्हणून काही तो क्रिकेट खेळायला आला असे नव्हे. अशा पद्धतीने ज्या मुलांना ज्यात गती असेल ती विकसित करून टॉपला वा त्याच्या आसपास ती गेली तर उत्तमच आहे. पण असे टॉपला, सबसे आगे जाणे या घेऱ्यात अडकता कामा नये. आज समाज त्या घेऱ्यात अडकला आहे. नोकरी, राजकीय पक्ष, संघटना, राहती जागा अशा अनेक बाबतीत ‘अरे, तो कुठे गेला अन् तू अजून इथेच?’असा प्रश्न आपल्या अनुभवाचा भाग आहे. जिथे आपण आहोत तिथून इतरांच्या तुलनेत वरच्या हुद्द्यावर, वरच्या जागेवर-प्रतिष्ठेच्या आणि पैश्यांच्या जायलाच हवे, हा जीवनसाफल्याचा निकष बनला आहे. या घेऱ्यातून सुटण्यासाठी मानवी जीवनाच्या साफल्यात स्पर्धेला काय स्थान आहे, ते नीट समजून घ्यायला हवे. 

कुत्रा मागे लागला तर त्याच्यापेक्षा वेगाने धावता आले पाहिजे; नाहीतर तो चावेल. इथे कुत्र्याशी स्पर्धा गरजेची आहे, हे मला समजू शकते. पण जो चावणार नाही, मारणार नाही अशा माणसाशी स्पर्धा कशासाठी? दुसऱ्यापेक्षा मी उत्तम गायला हवे, नाचायला हवे, वाजवायला हवे, खेळायला हवे असे का? त्यातून सर्वोत्तम ही मान्यता वा प्रतिष्ठा आणि असलेच तर बक्षीस मिळते. ही प्रतिष्ठा आणि बक्षीस यांचे महत्व आणि समाधान मर्यादित आहे. शिवाय ज्याला हरवून ही प्रतिष्ठा आणि बक्षीस मिळालेले असते, त्याचे असमाधान ही नाण्याची दुसरी बाजू या समाधानाबरोबरच जन्माला येते. दुसऱ्याला दुःखी, नाराज करुन मिळवलेली प्रतिष्ठा आणि बक्षीसाचा आनंद निर्भेळपणे कसा काय घेता येईल? तो घ्यायला हवा, जो हरतो त्याने खिलाडूवृत्तीने हार कबूल करायला हवी, पुढे कोणालातरी हरवायची तयारी आताच सुरु करायला हवी..हे शिक्षण, संस्कार आपल्यावर सतत होत राहतात. 

माणसे खिलाडूवृत्तीने हार स्वीकारत असती तर रिअॅलिटी शोमध्ये, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये हरणारे सर्वस्व गमावल्यासारखे रडतात का? खेळ हा खेळ आहे. हार-जित असणारच...हे फार थोडे कबूल करतात. भारत-पाक क्रिकेट सामना असला की त्यावर राष्ट्रवादाची वारुळे चढतात. दोन देशांच्या युद्धासारखीच स्थिती लोकांच्या मनात असते. जो उत्तम खेळेल तो दुसऱ्या देशाचा-अगदी पाकिस्तानचा असला तरी त्याचे कौतुक करायचा उमदेपणा आपल्यात नसतो. 

स्पर्धेमुळे माणसांच्या क्षमतेचा विकास होतो. कबूल. मला काहीतरी गाठायचे आहे, अमक्याच्या पुढे जायचे आहे, या प्रेरणेने मी जोरात प्रयत्न करतो. माझे कौशल्य, क्षमता वाढवतो. पण कोणाच्या तरी वा सबसे आगे या रेषेची मर्यादा का? माझी आज जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा मी पुढे जायला हवे ही स्वतःशीच स्पर्धा (शरीर-मनाला अनावश्यक न ताणता) का नको? काही जण ती करतातही. पण मुख्य इच्छा असते ती कोणाच्या तरी वा सगळ्यांच्या पुढे असण्याची. तो किंवा ते जिथे असतील त्याच्या एक मिलिमीटरनेही मी पुढे असलो तरी पुरे. पुढच्या वेळी ते जिथे आहेत त्याच्या खाली आले तर मीही खाली आलेला चालेल. त्यांच्या पुढे असलो म्हणजे झाले. आपल्या मुलाला या चाचणीत मिळालेले गुण मागच्या चाचणीतल्यापेक्षा अधिक असणे पुरेसे नसते. ते इतरांपेक्षा अधिक असायला लागतात. मुलाचे गुण कळल्यावर वर्गातल्या इतर मुलांना मिळालेले गुण आपण आवर्जून विचारतो. ते केवळ संदर्भासाठी नाही. तुलनेसाठी. कोणाच्या किती मागे वा पुढे आपले मूल आहे हे कळण्यासाठी. गुण कळण्याआधीची घालमेल आणि कळल्यानंतरचा अर्धवट वा अधिकचा आनंद यावर अवलंबून असतो. 

दहावी-बारावीच्या गुणांशी कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळणार ही एक व्यावहारिक बाबही जोडलेली असते. त्यामुळे ती एक अपरिहार्यताही असते. अर्थात, चांगल्या कॉलेजला चांगले गुण मिळवणाऱ्यांना, म्हणजे हुशार मुलांना, म्हणजे ज्यांना कमी चांगले शिक्षण मिळाले तरी ते त्यांच्या क्षमतेमुळे शिकू शकतात अशांना प्रवेश मिळतो. तर कमी गुणांच्या, म्हणजे कमी हुशार मुलांना कमी चांगले कॉलेज मिळते. म्हणजे इथे कमी चांगले शिकवले जाते तसेच कमी सुविधा आहेत असे गृहीत आहे. वास्तविक कमी गुणांच्या मुलांना पुढे येण्यासाठी अधिक चांगले शिकवणारे, अधिक सुविधा असलेले कॉलेज मिळायला हवे हे न्याय्य नाही का? ...पण असे होत नाही. सगळेच स्पर्धा, प्रतिष्ठा, मान्यता व त्यातून मिळणाऱ्या कृतक आनंदाच्या सापळ्यात अडकलेले आहेत. 

स्पर्धेने होणारा विकास आणि त्यातून मिळणारा आनंद यांना ही मर्यादा आहे. व्यक्ती वा संघ- एकक काहीही असो, दोहोंना हे लागू होते. 

स्पर्धा हे उत्तेजक काही ठिकाणी कामी येत असेल. पण मानवी जीवनाचा गाडा त्यावर चालत नाही. तो चालतो सहकार्यावर. केवळ मानवीच नाही, तर प्राणी वा अन्य जिवांच्या बाबतही शास्त्रज्ञ हा हवाला देतात. पण तो माझा प्रांत नाही. 

मानवाच्या प्राथमिक अवस्थेत-टोळी अवस्थेत शिकार हा सहकार्याने करण्याचा प्रकार होता. वैयक्तिक पातळीवर काही शिकारी होऊ शकतात. पण मुख्यतः त्या सहकार्यानेच व्हायच्या. राजे-महाराजे किंवा सामान्य गावकरीही शिकारीला जायचे ते सहकार्यानेच. एकमेकांना पूरक असे कामांचे नियोजन शिकारीतही असते. केवळ टोळीच नव्हे, तर गुलामी, सरंजामशाही आणि आता भांडवलशाही या मानवी विकासांतील आजवरच्या अवस्थांतली उत्पादक वा व्यवस्थापनाची कामे- मग ती शेती, कारखाने, बॅंका, कार्पोरेट, शासन-प्रशासन, सैन्य काहीही असो, सहकार्यानेच होत आली आहेत. कामांचे विभाजन, त्यांचे योग्य संयोजन यासाठी स्पर्धा नव्हे, सहकार्यच लागते. नासा किंवा इस्रो येथून जी अवकाशयाने उड्डाण करतात, त्यासाठीच्या सहकार्याचे किती बारकाईने संयोजन होत असते, हे आपण जाणतोच. सध्या ज्यांची जोरदार चलती आहे असे नरेंद्र मोदी आणि आता अमित शहा या दोहोंच्या नेतृत्वाखाली अनेक उलथापालथी देशात होत आहेत. त्यांची शैली आणि त्यामागची भूमिका याचे वहन करणारे, त्याला आधार देणारे असंख्य हात, खांदे आणि डोकी खाली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या परिवारातील लाखो प्रशिक्षित, प्रेरित, अनाम कार्यकर्ते त्यांच्या साथीला आहेत. या सगळ्यांच्या चिवट सहकार्यानेच मोदी व शहा यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. या दोन व्यक्ती कर्तृत्ववान व हुशार आहेतच. पण केवळ त्यामुळेच सर्व काही चालले आहे, अशा भ्रमात कोणी राहू नये. 

स्वयंपाक एकटी व्यक्ती करु शकते. करत असते. शिलाई मशिन एकटी व्यक्ती चालवत असते. सुरीला धार एकटा धारवाला लावत असतो. संगणकावर एकटा माणूस काम करत असतो. तथापि, ही कामेही एकट्याची नाहीत. स्वयंपाकाला लागणारे सामान (धान्य, तेल, मसाले इ.) तयार व्हायला असंख्यांचे हात लागलेले असतात. शिलाई मशिनचा धागा, यंत्र किंवा धार लावण्याचे चाक, त्याचा पट्टा तसेच संगणकातील अनेक भाग (हार्डवेअर-सॉफ्टवेअर) असंख्य तज्ज्ञ, कामगार- देशभरचेच नव्हे तर जागतिक स्तरावरचे बनवत असतात. गायक एकटा गात असेल, पण त्यासाठीचे संगीत, सुरावटी यांसाठी अनेकजण वाद्यांचा योग्य तो मेळ घालत असतात. कोणीही कलावंत, चित्रकार, गायक, शिल्पकार ही मंडळी कलेतून नवनिर्मिती करत असतात. ही नवनिर्मिती अनेकांच्या सहकार्याने जे बनलेले आहे, त्यातून योग्य निवड, योग्य प्रमाण व त्यांचा कलात्मक वापर वा रचना यांतून होत असते. हे नवसर्जन एकट्या-दुकट्याच्या नावाने लागत असले तरी त्यामागे ज्ञात-अज्ञात अगणित माणसे असतात. जीवनाचे कुठलेही क्षेत्र घेतले तरी हे सहकार्य तिथे दिसेल. त्याची आणखी उदाहरणे अनावश्यक आहेत. माणूस हा मूळातच परस्परावलंबी व परस्परपरिणामकारी आहे. 

या सहकार्याचा नाद अनाहत आहे. जो प्रत्यक्ष दिसणारेच निर्माण करत आहेत असे नाही. तर असंख्य, अनंत लोक त्यात स्वर भरत आहेत. तोच सृष्टीचा-मनुष्यजातीचा मूलभूत नाद आहे. गप्पाष्टके करत वा निसर्गाची साद ऐकत, चढावर एकमेकांना हात देत होणारे ट्रेकिंग, विद्यार्थ्यांचे एखाद्या प्रकल्पासाठी चाललेले गटकार्य, शेतीची कापणी वा झोडणी, एखादा जड ओंडका एका सूरात तोंडाने विशिष्ट आवाज करत सर्वांनी मिळून उचलणे, सैनिकांचा कदमताल, देवळातली वा शाळेतली प्रार्थना, चौकात म्हटलेली चळवळीची गाणी आणि घोषणा या सगळ्यांत एक शांत नाद आहे. त्यात माझे एकट्याचेच नाव स्पर्धेसाठी पुकारताना आणि निकाल ऐकताना उरात होणाऱी धडधड आणि त्याच्या तयारीवेळचे धपापलेपण नाही. सहकार्यात कोणी एक विजयी नसतो. पराजितही कोणी एक नसतो. त्यातला आनंद आणि दुःख यांची गती संथ असते. एकाचवेळी अनेकजण वल्हे मारत असतात. त्यामुळे वादळातही कोणा एकालाच नाव तिरी लावण्याचा आकांत करावा लागत नाही. 

सहकार्याचा हा नाद ऐकण्यासाठीचे कान तयार व्हायला आजची व्यवस्था मोठा अडसर आहे. त्यासाठी व्यवस्था बदलाचे अनेक बारीक-मोठे संघर्ष करत राहावे लागतील. या संघर्षासाठी प्रेरित करणाऱ्या काही घटना, काही प्रसंग, काही विचार, काही कलात्मक आविष्कार आपल्या वाट्याला येत असतात. ते टिपत राहायला हवेत. 

सुमारे तीस वर्षांपूर्वी ‘उड़ान’ नावाची मालिका दूरदर्शनवर खूप गाजली. (नुकतेच ज्यांचे निधन झाले त्या देशातील पहिल्या पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांच्यावरुन या मालिकेतले इन्स्पेक्टर कल्याणी हे मध्यवर्ती पात्र बेतले आहे.) या मालिकेतील एक प्रसंग मला असाच प्रेरित करुन गेला. त्यातले बारीक तपशील वा शब्द जसेच्या तसे मला आता आठवत नाहीत. पण मुख्य सूत्र मनावर कोरले गेले आहे.

त्यातील मुलगी आणि तिचे वडिल हातात हात घालून धावत आहेत. 

मुलगी म्हणते- “बाबा, इसी तरह हात पकड़कर दौडे़ंगे, तो हममें से कोई आगे कैसे जाएगा?” 

बाबा म्हणतो- “जो मजा साथ दौड़ने में है, वो आगे निकलने में कहाँ?” 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, सप्टेंबर २०१९)