Sunday, August 25, 2019

आरक्षण, भागवत आणि संघ




पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत केलेल्या विधानाने गदारोळ माजला आहे. संघ तसेच भाजप दोहोंनी याबाबत आम्ही आरक्षणाच्या विरोधात नसून समाजातील प्रश्न सौहार्दपूर्ण चर्चेने सुटावे हे भागवत अधोरेखित करत होते, विरोधक त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेत आहेत, असे निवेदन केले आहे.
पुन्हा एकदा यासाठी म्हटले की, या आधी २०१५साली बिहार निवडणुकांच्या आधी आरक्षणाबाबत असेच एक विधान त्यांनी केले होते. त्यावेळीही गदारोळ झाला होता. भागवतांच्या विधानाचा संबंध असो-नसो, त्यावेळी बिहार निवडणुकांत भाजपचा धुव्वा उडाला होता. यावेळीही हरयाणा, झारखंड व महाराष्ट्र राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. अशावेळी भागवतांच्या या विधानाने खळबळ माजणे साहजिकच आहे. विरोधक त्याचा अर्थ आपल्या सोयीने घेतील हे बरोबर. पण मोदींपासून तमाम भाजपची प्रमुख मंडळी ज्या संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत, त्या संघाचे, म्हणजेच कुटुंबाचे प्रमुख निवडणुका तोंडावर असताना केवळ सौहार्दपूर्ण चर्चेची रीत अधोरेखित करण्यासाठी असे विधान करतील, हे पटायला थोडे अवघड जाते.
त्यांचे विधान असे – ‘आरक्षणाच्या बाजूचे लोक आरक्षणाच्या विरोधकांचा विचार करून काही बोलतील-करतील, तसेच आरक्षणाचे विरोधक आरक्षणाच्या बाजूच्या लोकांचा विचार करून काही बोलतील-करतील, त्यावेळी या प्रश्नाचा एका मिनिटात निकाल लागेल. …सद्भावना समाजात तयार होत नाही तोवर या प्रश्नाचा निकाल लागणार नाही. ती सद्भावना तयार करण्याचे काम संघ करतो आहे.’
दर्शनी हे विधान आक्षेपार्ह नाही. कोणताही प्रश्न सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चेने सुटावा, हे चांगलेच आहे. कोणाही सत्प्रवृत्त माणसाला यात भागवतांचे काही गैर आहे असे वाटणार नाही. उलट विरोधक वा पुरोगामी विनाकारण भागवतांवर दोषारोप करत आहेत, असेच त्याच्या मनात येणार. म्हणूनच संघ, त्यांचे सरसंघचालक आणि त्यांच्या परिवारातल्या संघटना व व्यक्ती यांचा इतिहास आणि व्यवहार संदर्भात तपासावा लागतो. तरच त्यांच्या कथनी-करनीचा अर्थ लागू शकतो.
पुढे निवडणुका आल्या असताना आणि साडे तीन-चार वर्षांपूर्वीच्या त्यांच्या विधानावरून उठलेला गदारोळ विस्मरण होण्याइतका जुना झालेला नसताना त्यांनी आरक्षणाचा हा राग पुन्हा का आळवावा? सौहार्दाने चर्चा हे आनुषंगिक आहे; आरक्षणाचा फेरविचार हा प्रमुख मुद्दा आहे. अनेक तळच्या-मधल्या जातींचा विविध मार्गांनी पाठिंबा आपल्या शिडात भाजप भरून घेत आहे. अशावेळी थोडेफार साशंक होणाऱ्या संघाच्या मुख्य पाठिराख्या उच्चवर्ण-वर्गीयस्तराला सरसंघचालकांचे हे एकप्रकारे आश्वस्त करणे आहे. ज्यात आरक्षण, सामाजिक न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता वगैरेंचा लवलेश नसेल, अन्य आस्थांचे लोक दुय्यम नागरिक असतील, विविध जाती आपापल्या स्तरावरून एकात्म हिंदू समाजात समरस झालेल्या असतील अशा हिंदू राष्ट्राची प्रस्थापना या आपल्या मूळ लक्ष्यापासून आम्ही विचलित झालेलो नाही, याचे ते सूचन आहे. ते मधून मधून करत राहणे ही संघाची गरज आहे. भाजपमध्ये तसेच प्रशासनामध्ये संघाचे स्वयंसेवक प्रमुख स्थानी असले तरी त्यांना संघाचे हे म्हणणे बंधनकारक नाही, त्यांच्या पातळीवर त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत, असे भागवतांनी नंतर म्हटले असले तरी ‘समझनेवालों को इशारा काफी होता है’.
भागवतांचे हे विधान सुटे नाही. त्यासाठी गेल्या वेळचे विधान पाहू. २०१५ चे त्यांचे विधान असे आहे –
‘आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार झाला पाहिजे. त्यासाठी राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांची एक समिती नेमून कोणाला व किती काळ आरक्षणाची गरज आहे, याचा तपास केला पाहिजे. लोकशाहीत हितसंबंधितांचे गट तयार होऊ शकतात. मात्र एका गटाच्या आकांक्षांची पूर्ती दुसऱ्या गटाच्या आकांक्षांची किंमत देऊन होता कामा नये.’
या विधानाचा समाचार घेताना त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी मोदी-भागवतांसह तमाम संघीयांचे परमगुरुजी असलेले द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे ‘विचार धन’ हे पुस्तक लोकांना दाखवून म्हटले होते- ‘गोलवलकर ने कहा था कि आरक्षण आर्थिक आधार पर दिया जाना चाहिए। संघ का मौजूदा नेतृत्व अपने गुरु (गोलवलकर) के विचारों का अनुसरण कर रहा है। दलितों और पिछड़ों को दशकों के संघर्ष के बाद आरक्षण मिला था और अब वे इसे छीनना चाहते हैं।’
मोदींनी उच्चवर्णियांतल्या ‘वार्षिक उत्पन्न ८ लाख रु. असणाऱ्या गरिबांसाठी’ १० टक्के आर्थिक आरक्षण आणलेच की! अनेक घटनातज्ज्ञांच्या मते आर्थिक आरक्षण आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवणे हा संविधानाच्या मूळ पायावर केलेला आघातच आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आणि पुरेसे प्रतिनिधीत्व नसणे हे आरक्षणाचे मूळ सूत्रच यामुळे नष्ट होते. मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर त्यांनी केलेले भाषण आठवा. त्यात ‘आम्ही गरीब आणि गरिबांना गरिबीतून बाहेर पडायला मदत करणारे असे दोनच वर्ग मानतो’ असे त्यांनी नमूद केले होते. ज्या व्यवस्थेने गरीब वा दलित-मागास जाती जन्माला घातल्या ती व्यवस्था बदलण्याच्या संघर्षाला इथे पूर्ण नकार आहे. आपापल्या पायरीवर समरस होऊन जगावे हाच त्यातील खरा संदेश आहे.
भागवतांना राखीव जागांच्या विरोधात बोलायचेच नव्हते किंवा मोदींना उगाच यात खेचू नका, असे वाटणाऱ्यांनी संघ वा संघ-भाजप दोहोंत असलेली प्रमुख मंडळी काय बोलतात, बोलली आहेत तेही पाहावे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते मनमोहन वैद्य २०१७ साली एका कार्यक्रमात म्हणतात –‘आपल्या देशात आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे अलगतावाद वाढीस लागतो. …नोकऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातले जातिआधारित आरक्षण लवकर संपुष्टात यायला हवे. पात्रता असलेल्या सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे.’
संघाच्या स्वयंसेवक आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन रांची येथे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थे’ची पूरक संस्था असलेल्या ‘प्रज्ञा प्रवाह’ या संघटनेच्या चार दिवसीय संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात २०१८ साली आपली भूमिका मांडताना म्हणतात-
‘डॉ. आंबेडकरांनी म्हटलं होतं, आपल्याला आरक्षण केवळ १० वर्षांसाठी हवं आहे. १० वर्षांत समाजाची सामूहिक उन्नती करण्याची त्यांची कल्पना होती. वास्तवात सामाजिक समरसतेची कल्पना डॉ. आंबेडकरांनी मांडली होती. पण आपण काय केलं? आपण आत्मचिंतनामध्ये कुठेतरी कमी पडलो. संसदेत बसलेले लोकप्रतिनिधी स्वत:चं अपयश लपवण्यासाठी दर १० वर्षांनी आरक्षण वाढवत राहिले. एकावेळी तर २० वर्षांनी ते वाढवण्यात आलं. हे काय होतंय?’
बाबासाहेबांनी नोकरी व शिक्षणातल्या आरक्षणाला अशी कालमर्यादा घातली नव्हती. महाजनबाई चुकीचे बोलत आहेत. १० वर्षांची मुदत केवळ राजकीय आरक्षणाला आहे. याबाबतीतले बाबासाहेबांचे नेमके म्हणणे व त्यावेळचा संदर्भ याची चर्चा वेगळी करू. पण समरसतेची कल्पना बाबासाहेबांची नक्कीच नाही. बाबासाहेबांना समता अपेक्षित आहे. समाजातील उतरंड तशीच ठेवणारी समरसता नव्हे, तर ही उतरंड मोडून सगळ्यांचा दर्जा एक करणारी समता ते मानत होते. समतेचे हे मूल्य त्यांनी घटनेतच नोंदवले आहे.
भागवतांच्या म्हणण्याचा अर्थ आरक्षणाच्या विरोधात घेऊ नये असे वाटणाऱ्यांचे मत पुरेसे स्पष्ट बोलणाऱ्या वैद्य किंवा महाजन यांच्याबद्दलही तेच असू शकते का? संघाची मूळ भूमिकाच वैद्य किंवा महाजन मांडत आहेत. आडवळणाने तेच भागवत मांडत आहेत. वरच्या जातींना हजारो वर्षे विशेष दर्जा, हक्क व सवलती देणारी आणि तळच्या जातींना त्यांपासून धर्माज्ञा म्हणून वंचित ठेवणारी, गुलाम करणारी चातुर्वर्ण्यव्यवस्था हा गोळवलकर गुरुजींच्या अभिमानाचा भाग होता.
‘ती रुढी नसून तो धर्म आहे. ती ईश्वर निर्मित आहे. त्यामुळे मानवाने तिची कितीही मोडतोड केली तरी आम्ही काळजी करत नाही. ती पुन्हा प्रस्थापित होणारच..’ हा विश्वास गोळवलकरांनी व्यक्त केला आहे. रावसाहेब कसबेंनी ‘झोत’च्या नव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत याचे विवेचन केले आहे. ‘चातुर्वर्ण्य गुणकर्मविभागशः की जन्माधिष्ठित?’ या प्रश्नाला गोळवलकरांनी दिलेले उत्तर ते पुढे नमूद करतात –‘‘चातुर्वर्ण्य गुणकर्मविभागशः’ होते हे खरे. पण ‘गुण’ म्हणजे पात्रता आणि ‘कर्म’ म्हणजे आवडीनुसार स्वीकारलेले कर्म, हा अर्थ चुकीचा आहे. गुण म्हणजे सत्त्व, रज व तम हे होत आणि कर्म म्हणजे पूर्वजन्मात केलेले कर्म होय. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार पुढील जन्मी वर्ण मिळतो.’
जातिव्यव्यवस्था ईश्वर निर्मित, ईश्वर संचालित व त्यातील मनुष्याचे स्थान पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे हे एकदा मानले की ती नष्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. मग तिथे समता कशी आणणार? फार तर समरसताच संभवते. संघाच्या विचारसरणीचा हा पाया आहे. तो लक्षात घेतला तरच त्याचे नेते, प्रवक्ते, सरसंघचालक आणि स्वयंसेवक जे बोलतात व करतात त्याचा अर्थ कळू शकतो.
भागवतांची कथनी सुटी व केवळ वाच्यार्थाने घेण्यात म्हणूनच गफलत होऊ शकते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(वायर मराठी, २५ ऑगस्ट २०१९)

Saturday, August 3, 2019

आंबेडकरांच्या संदर्भात गांधी..



‘द डॉक्टर अ‍ॅण्ड द सेंट’ हे पुस्तक म्हणजे, मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाच्या नवयान प्रकाशनाने २०१४ साली पुनर्प्रकाशित केलेल्या आवृत्तीला प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचय. त्याचे हे स्वतंत्र पुस्तक पेंग्विन प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

आर्य समाजाचा एक भाग असलेल्या ‘जातपात तोडक मंडळा’ने लाहोरला डॉ. आंबेडकरांना १९३६ साली त्यांच्या वार्षिक परिषदेत व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. व्याख्यानाच्या मसुद्यातील हिंदू धर्मावर आघात करणारे काही उल्लेख गाळण्याची आयोजकांची विनंती बाबासाहेबांनी अमान्य केल्याने तो कार्यक्रमच रद्द करण्यात आला. हे न झालेले भाषण त्याच वर्षी- म्हणजे १९३६ साली ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या शीर्षकाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. या पुस्तकावर प्रतिक्रिया देणारा लेख महात्मा गांधींनी लिहिला. गांधीजींचा हा लेख व त्याला उत्तर पुढच्या आवृत्तीत बाबासाहेबांनी समाविष्ट केले. तेव्हापासून आजपर्यंत या पुस्तकाच्या मूळ इंग्रजीत तसेच अनुवादित अनेक आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तक बाबासाहेबांच्या जातिनिर्मूलनाच्या भूमिकेचा जाहीरनामा मानला जातो.

अरुंधती रॉय यांनी या पुस्तकाला लिहिलेला परिचय त्या पुस्तकातील मांडणीची तशी काही ओळख करून देत नाही. तो म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकांविषयीचा सविस्तर निबंध आहे. त्यातही डॉ. आंबेडकरांविषयी कमी आणि गांधीजींविषयी प्रामुख्याने लेखिका भाष्य करते. खरे म्हणजे, गांधीजींचे प्रतिमाभंजन करण्यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होईल. त्यासाठी गांधीजींच्या लेखनातील अनेक उतारे देत लेखिकेने हा खटाटोप सिद्ध केला आहे. अरुंधती रॉय त्यांच्या विविध भूमिकांमुळे बहुतेकदा वादाच्या घेऱ्यात राहिलेल्या आहेत. हे पुस्तक ‘परिचय’ म्हणून आधी आले, त्या वेळीही त्याने विवाद सुरू झाला. त्या वेळी रॉय यांनी- ‘हा परिचयच आहे हे बरे झाले, स्वतंत्र पुस्तक निघाले असते तर त्यावर बंदी आली असती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तथापि, आता पुस्तकच निघाले आहे. अशी काही बंदीची अवस्था येईल असे लेखिकेला बहुधा वाटत नसावे.

आपल्या मांडणीचा प्रारंभ करताना लेखिकेने- स्वतला जातीच्या प्रश्नाची तीव्रता कशी उशिरा कळली, हे नमूद करून वाचकांच्या जातजाणिवेला आव्हान दिले आहे. ती म्हणते- ‘मलाला युसूफजाईबद्दल तुम्ही ऐकले असेल, मात्र सुरेखा भोतमांगेबद्दल तुम्हाला काही ठाऊक नसेल, तर आंबेडकरांना जरूर वाचा.’

अतिरेक्यांशी प्राणांतिक झुंज देणारी मलाला जगात चर्चिली जाते. खैरलांजीतील सुरेखा भोतमांगे व तिच्या तीन तरुण मुलांना ज्या अमानुषपणे ठार केले जाते, त्याच्या चच्रेला त्या कुटुंबाचे दलितपण आडवे येते. आपल्या आतच एक अवरोध तयार होतो. त्यामुळे आपण या कुटुंबाच्या न्यायासाठी विविध मंचांवर आवाज उठवावा असे आपल्याला वाटत नाही. लेखिकेचा भारतीयांच्या जातजाणिवेच्या संकुचितपणावर हा आक्षेप आहे. मार्क्‍सच्या वर्गविश्लेषणाने जातीला दुर्लक्षिले. परंतु भारतीय डाव्या, पुरोगामी बुद्धिवंतांचे दुर्लक्ष ही सजग राजकीय कृती आहे, असा थेट आरोप लेखिका करते. पुढे एके ठिकाणी- ‘हिंदू उजवे’ आणि ‘हिंदू डावे’ यांत इतरांना वाटतो तसा खूप फरक दलित करत नाहीत,’ असाही अभिप्राय रॉय देतात.

परंतु मुख्य आरोपी आहेत ते महात्मा गांधी. त्यांना जगात प्रशंसिले जाते. अनेक मोठय़ा लोकांचे ते प्रेरणास्रोत आहेत. देशात तर ते राष्ट्रपिता म्हणून गणले जातात. त्यांच्या या महानतेच्या वलयामुळे दलितांवरील अन्यायाला, जातीच्या प्रश्नाला उतार पडायला अडथळा तयार झाला. डॉ. आंबेडकरांची मांडणी झाकोळली गेली. किंबहुना सवर्णामध्ये त्यांची प्रतिमा धर्मद्रोही झाली. गांधीजींचे महानतेचे वलय दूर सारून त्यांचे खरे स्वरूप समोर आले तर आंबेडकरांच्या भूमिकेला लोक नीट समजून घेतील, असा लेखिकेचा कयास आहे. त्यामुळेच पुस्तकाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अन्य विषय चर्चिले जात असतानाही गांधीजींच्या महानपणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना, उतारे येत राहतात. त्याच वेळी डॉ. आंबेडकरांची तुलनाही होत राहते.

जात ही अत्यंत अधपतित सामाजिक व्यवस्था आहे, असे डॉ. आंबेडकर मानतात. तर – ‘जातींमुळे गावांची अंतर्गत व्यवस्था चालते. ती राजकीय गरज भागवते. वंशपरंपरागत व्यवसाय हा जातीचा आत्मा आहे. रोज ब्राह्मण व शूद्र वरखाली करत राहण्याने गोंधळ माजेल..’ ही १९२१ सालची गांधीजींची भूमिका आहे. पुढे त्यांच्या काही भूमिका बदलल्या तरी त्यांनी कधीही चातुर्वण्र्याच्या विरोधात रोखठोक भूमिका घेतली नाही, असे लेखिकेचे म्हणणे आहे. गांधीजींच्या व्यक्तित्वाच्या विविध नैतिक आयामांचे वर्णन केले जाते. परंतु त्या सगळ्याचा जातीबाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी मेळ कसा घालायचा, असा प्रश्न तिला पडतो. ती म्हणते : ‘नैतिक सदाचाराच्या या ढाच्याचे काय करायचे, जो अत्यंत क्रूर, संस्थात्मक अन्यायाच्या पायावर आरामात उभा आहे?’

डॉ. आंबेडकरांची मुख्य ओळख घटनाकार म्हणून सीमित होते. त्यांचे राजकारण दुर्लक्षिले जाते. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात गेल्याने ते संधिसाधू, पहिल्या गोलमेज परिषदेला हजर राहिल्याने ब्रिटिशांचे हस्तक, स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीमुळे फुटपाडे, जम्मू-काश्मीरच्या त्रिभाजनाच्या सूचनेमुळे राष्ट्रद्रोही अशा शेलक्या शिव्यांनी त्यांचा उद्धार होतो. मात्र, त्याच वेळी गांधीजींवर इतिहास मेहरबान होतो. ते ‘महात्मा’ बनतात. त्यांना देवत्व बहाल केले जाते. बराक ओबामा, नरेंद्र मोदी असोत की राहुल गांधी, सगळे त्यांच्यावर प्रेम करतात. गरीब करतात तसेच श्रीमंतही करतात, हे सांगून लेखिका पुढे कडवटपणे म्हणते : ‘ते आहेत यथास्थिती (जैसे थे)चे संत!’

लेखिकेने तिच्या विवेचनाचा मोठा भाग गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ावर खर्च केला आहे. तिच्या मते, गांधीजींचा लढा तेथील भारतीय व स्थानिक काळ्या लोकांत भेद करणारा होता. १८९५ साली दर्बन डाक कार्यालयाची एक समस्या उभी राहिली. या कार्यालयाला दोन दरवाजे होते. एक काळ्यांना आणि दुसरा गोऱ्यांसाठी. ‘काफिर’ (म्हणजे स्थानिक काळे) वापरतात तो दरवाजा भारतीयांना वापरावा लागू नये म्हणून तिसऱ्या दरवाजाची मागणी गांधीजींनी केली. तेथील भारतीय लोकांतही व्यापारी, व्यावसायिक, हिंदू-मुस्लीम उच्चवर्गीय हे प्रवासी भारतीय आणि ठेक्याने आणलेले मजूर असा फरक होता. मजुरांचे दु:ख अधिक मोठे होते. तरीही गांधीजी मात्र प्रवासी भारतीयांसाठी लढत होते. बोअर युद्धावेळी इंग्रजांना गांधीजींनी स्थानिक बंडखोरांच्या विरोधात साथ दिली. चार हजार झुलू मेले. हजारांना कैद झाली. लेखिका म्हणते, ‘युद्धाचा नियोजनकर्ता चर्चिल या हिंसेने हलला; मात्र गांधीजींनी याबद्दल खेद व्यक्त केलेला नाही.’ पुढे गांधीजींना तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला. डाक कार्यालयाचा एक दरवाजा सहन न होणाऱ्या गांधीजींना स्थानिक काळ्या ‘काफिर’ कैद्यांबरोबर ठेवण्यात आले. त्यावेळच्या प्रसंगाबद्दल गांधीजी लिहितात- ‘ते लोक त्रासदायक आहेत. अत्यंत घाणेरडे. अगदी जनावरांसारखे.’

इथे लेखिका मध्येच गांधीजींना समकालीन असणाऱ्या पंडिता रमाबाईंची थोरवी वर्णन करते. रमाबाई ब्राह्मण असून हिंदू धर्माचा त्यातील पितृसत्ताकता, जातीय आचरण यासाठी त्याग करतात व ख्रिस्ती धर्म स्वीकारतात. अमेरिकेत काळ्या गुलाम स्त्रीच्या भेटीचे त्यांनी केलेले आपुलकीचे वर्णन लेखिका नमूद करते. महात्मा फुलेंनी आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ निग्रो गुलामांना अर्पण करताना लिहिलेली अर्पणपत्रिका लेखिका इथे देते. यांच्या तुलनेत गांधीजी कुठे ते पाहा, असे लेखिका वाचकांना सुचवते.

‘गांधीजी द. आफ्रिकेतल्या गोऱ्यांशी मत्री साधू इच्छित होते. त्यांची सत्ता नष्ट करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. ते तेथील भारतीय व्यापाऱ्यांचे हितसंबंध सांभाळत होते,’ असा लेखिकेचा निष्कर्ष आहे.

लेखिका म्हणते : ‘गांधीजी गरिबातल्या गरिबासारखे मला राहायचे आहे असे म्हणत. वास्तविक गरिबी म्हणजे केवळ पशाचा अभाव नसून गरिबी म्हणजे सत्ता नसणे होय. गांधीजींना गरिबीत राहण्यासाठी खूप सारी शेतजमीन आणि जैविक फळझाडे लागत होती. टॉलस्टॉय फार्ममधील कर्मकांड करताना त्यांनी कधीही भांडवलाच्या संचयाबद्दल आणि संपत्तीच्या विषम वाटणीबद्दल प्रश्न केला नाही.’

आफ्रिकेतले गांधीजी मग नायक कसे झाले, हा लेखिकेला गोंधळात टाकणारा प्रश्न वाटतो. त्याबद्दल ती म्हणते : ‘एक स्पष्टीकरण शक्य आहे. गांधीजींनी द. आफ्रिका सोडल्यावर भारतातील स्वातंत्र्यलढय़ातील एक चकाकता तारा म्हणून त्यांना फेरआयात केले गेले. एकाकी झालेल्या आणि वंशवादी राजवटीने सतावल्या गेलेल्या द. आफ्रिकेतल्या भारतीयांना गांधीजींमुळे मातृभूमीशी नाते जोडता आले.’

‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक जसे आंबेडकरांची भूमिका स्पष्ट करते, तसे १९०९ चे ‘हिंद स्वराज’ गांधीजींची भूमिका मांडते, हे सांगून लेखिका यात अस्पृश्यतेविषयी काहीही उल्लेख नाही, हे आवर्जून नमूद करते. लेखिका पुढे म्हणते- ‘हिंदू-मुस्लिमांनी स्वराज्यात परस्परांशी सहिष्णुतेने व सहभावाने वागावे हा त्यांनी दिलेला संदेश ‘भारतीयत्वा’च्या संकल्पनेसाठीची खरी, टिकाऊ आणि महत्त्वाची देणगी आहे.’ (गांधीजींविषयी बहुधा अगदी दुर्मीळ असलेल्या चांगल्या विधानांतले त्यांचे हे एक विधान आहे!)

भारतात परतल्यावरच्या गांधीजींच्या भूमिका व व्यवहार, त्यांतील विसंगती यावर लेखिकेने विस्तृतपणे लिहिले आहे. त्या सगळ्यांची इथे नोंद करणे शक्य नाही. या नोंदींमध्ये काही नोंदी अशाही आहेत, ज्यांतून होणारे अर्थसूचन त्यांचे कडवे विरोधकही मान्य करणार नाहीत. उदा. गांधीजींना भगवद्गीता प्रिय. तीच गीता नथुराम गोडसे व नारायण आपटेच्या हातात फासावर जाताना होती!

डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या लढय़ांबद्दल (विशेषत: महाड सत्याग्रहाबद्दल) या पुस्तकात तपशिलाने लिहिलेले आहे. पुणे करार व त्यातील डॉ. आंबेडकर-गांधीजींच्या भूमिका अर्थातच विस्ताराने आहेत. ‘डॉ. आंबेडकरसुद्धा आदिवासी प्रश्नावर अडखळले’ असा उल्लेख लेखिका करते. त्यांची समज वासाहतिक मिशनरी आणि उदारमतवादी विचारवंत यांच्याप्रमाणेच असलेली दिसते, असे लेखिकेचे निरीक्षण आहे. ती म्हणते : ‘त्यांच्या मताचा खूप गंभीर परिणाम आदिवासींवर झाला. १९५० साली भारतीय संविधानाने शासनाला आदिवासींच्या जन्मभूमीचे रक्षक-पालक बनवले. ब्रिटिश वासाहतिक धोरणालाच एक प्रकारे दुजोरा दिला गेला. त्यामुळे आदिवासींचे वनोपजांवरचे पारंपरिक अधिकार गेले. त्यांच्या जीवनशैलीलाच गुन्हेगार केले गेले.’

पुस्तकातील एक उल्लेख उद्बोधक आहे. फाळणीवेळी पाकिस्तानने नगरपालिकेच्या अस्पृश्य सफाई कामगारांना भारतात जाऊ देण्यास मनाई केली. हे काम कोण करणार, असा प्रश्न होता. आंबेडकरांनी नेहरूंना पत्र लिहून यातील काहींना भारतात आणण्यात यश मिळवले.

लेखिकेला भारतीय लोकशाही आणि संविधान यांबाबत प्रश्न आहेत. वर्णाश्रम धर्म लोकशाहीत कार्यरत आहे. तसेच ती जात आणि भांडवलशाहीचे मिश्रण आहे. आंबेडकरांच्या प्रतिमेत संविधान हातात दाखवतात. त्याऐवजी तिथे ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक असणे अधिक उचित ठरेल, असे लेखिकेला वाटते. ‘‘संविधानवाद (कॉन्स्टिटय़ुशनॅलिझम)’ क्रांतीच्या आड येऊ शकतो. ‘दलित क्रांती’ अजून झालेली नाही. आपण तिची वाट पाहतो आहोत. तिच्याआधी दुसरी कोणतीही क्रांती भारतात संभवनीय नाही,’ असा लेखिकेचा निष्कर्ष आहे.

हे पुस्तक आता आले. पण हा संपूर्ण निबंध परिचय म्हणून चार वर्षे आधीच आला आहे. त्यामुळे सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे त्यावर बराच वादविवाद झालेला आहे. यात ऐतिहासिक दृष्टीचा व संदर्भात पाहण्याचा अभाव, गांधीजींचा वैचारिक विकासक्रम लक्षात न घेणे हे आरोप गांधीजींची बाजू मांडणाऱ्यांकडून झाले. तर आंबेडकरी वर्तुळातून आदिवासींविषयीच्या भूमिकेबाबत बाबासाहेबांवर टीका झाल्याबद्दलची अस्वस्थता व्यक्त झाली. या टीका, विवाद अजून होत राहतील. महान व्यक्तींच्या त्या त्या वेळच्या भूमिका, विधाने, संघर्ष यांचे सरसकट समर्थन करण्याची गरज नसते. त्यांचा तत्कालीन लोकजीवनावर झालेला परिणाम आणि आजच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दिशा देण्याची त्यांची क्षमता मुख्यत: लक्षात घेऊन पुढे जायला हवे. हे भान असेल तर वस्तुस्थिती प्रामाणिक व निडरपणे मांडणारा लेखकही चिकित्सा करताना वस्तुस्थितीतल्या कोणत्या घटकांना महत्त्व द्यायचे, याचा विवेक नक्की करेल!
_______________
‘द डॉक्टर अ‍ॅण्ड द सेंट’
लेखिका : अरुंधती रॉय

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे: १६५, किंमत : २९९ रुपये
_______________

लेखक विविध सामाजिक चळवळींशी संबंधित कार्यकर्ता आहेत. त्यांचा ईमेल : sawant.suresh@gmail.com


(लोकसत्ता, ३ ऑगस्ट २०१९)

Friday, August 2, 2019

हा खेळ थांबवला पाहिजे


केंद्राचे आर्थिक निकषावरचे आरक्षण आणि अलिकडचा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला मान्यता देणारा उच्च न्यायालयाचा निकाल यांनी मला अस्वस्थ व्हायला झाले. माझी ही भावना वाचून, सवर्णांतील गरिबांसाठीचे आरक्षण आणि मराठ्यांचे आरक्षण इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मिळत असेल तर तुमच्या पोटात का दुखते, असे कोणाच्या मनात आले तर ते स्वाभाविक आहे. दलित, आदिवासी आणि ओबीसी या विभागांतील बहुसंख्य मंडळींचा त्यांना धक्का लागत नसल्याने या दोन्ही आरक्षणांना विरोध नाही. या विभागांतील अनेक नेत्यांनी या आरक्षणांचे स्वागतच केले आहे. मनात काही शंका असल्यास त्या आता बोलून वाईटपणा का घ्या, अशी सोयिस्कर भूमिका यातल्या अनेकांची आहे. तथापि, काही मंडळी या दोन्ही निर्णयांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली आहेत. काही लोक माध्यमांतून लेख लिहून, मुलाखती देऊन आपल्या शंका, प्रश्न, चिंता उपस्थित करत आहेत. व्यापक परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मराठा वा सवर्ण समाजातील शोषित-पीडित माझ्या संवेदनांच्या परिघात येतात याबद्दल परिचय असलेले मित्र संशय घेणार नाहीत, अशी आशा आहे. पण असा संशय कोणी घेतला तर त्याला माझा इलाज नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार, विरोधक, विविध समाज विभागांतले नेते राज्यघटनेशी हा जो खेळ करत आहेत, तो अंतिमतः सर्व जातीय शोषित-पीडित विभागांना चकवा देणारा, फसगत करणारा आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

ज्या मुद्द्यांकडे इथे लक्ष वेधायचे आहे, ते केवळ माझे नाहीत. अनेकांनी मांडलेले आहेत. मी ते अधोरेखित करतो आहे. हे करताना एक अडचण आहे. आर्थिक व मराठा या दोन्ही आरक्षणाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात हा लेख छापून येईपर्यंत सुरु झालेली असेल. मासिकासाठीचा लेख असल्याने तो पंधरा दिवस आधी द्यावा लागतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात झालेल्या घडामोडींच्या-निर्णयांच्या परिणामी माझ्या मांडणीतले काही संदर्भ गैरलागू होण्याची शक्यता आहे. पण त्याला इलाज नाही. 

सर्वांना पुरुन उरेल एवढे नसेल तर दुबळ्यांना लाथा घालून तगडे फस्त करतात, हे घोड्यांच्या उदाहरणावरुन आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी सव्वा शतक आधीच स्पष्ट केले आहे. न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी जी कायदेशीर पावले भारतीय संविधानाने टाकली, त्यातले आरक्षण हे एक महत्वाचे पाऊल. ज्या दलित व आदिवासींच्या विकासाचे दोर संस्कृती, धर्म यांच्या हवाल्यानेच कापले गेले, त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी त्यांचे योग्य प्रतिनिधित्व आरक्षणाद्वारे शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला गेला. या दोन विभागांची अवस्था इतकी दारुण आणि उघड होती की त्यांच्यासाठीच्या या विशेष तरतुदींना बहुसंख्यांचा पाठिंबाच मिळाला. गावगाड्यात स्थान आणि काही साधने असलेल्या ओबीसींच्या आरक्षणावेळी मात्र बरीच खळखळ झाली. घटनेतील मार्गदर्शनानुसार नेमलेल्या १९५३ च्या कालेलकर आयोगाने विरोध केला. त्यानंतर १९७८ च्या मंडल आयोगाने ओबीसी आरक्षणाची शिफारस केली. प्रत्यक्षात ते मंजूर झाले १९९० ला आणि अंमलात आले १९९३ पासून. सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आणि पर्याप्त प्रतिनिधीत्व नसणे या निकषावर हे आरक्षण ठरवले गेले. जुन्या वर्णव्यवस्थेत ज्यांना शिक्षणाचा तसेच संस्कृत उच्चारण्या-ऐकण्याचा अधिकार नाकारला गेला ते शूद्र म्हणजे आजचे ओबीसी. त्यांच्या आरक्षणाला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आधार सुस्पष्ट होता. महाराष्ट्रातील मराठा, हरयाणातील जाट, गुजरातेतील पटेल आणि आंध्रातील कापू यांच्या आरक्षणाच्या मागणीच्या आधाराबाबत ही सुस्पष्टता नव्हती. शिवाय राजकारणात पुढाकार आणि साधनसंपदेतील प्रभुत्व ही त्यांची ठळक ओळख असल्याने त्यांच्या आरक्षणाच्या मागणीचे समर्थन खूपच कमकुवत होते. त्यांच्यात शोषित-गरीब विभाग लक्षणीय असला तरी आरक्षणासाठीचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण या निकषांची पूर्तता त्यांच्याकडून होत नव्हती. शिवाय एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे जाता कामा नये ही सर्वोच्च न्यायालयाची अट आड येत होती. 

यातल्या मराठा समाजाने या अडचणी भेदल्या आणि महाराष्ट्रात त्याला आता आरक्षण लागू झाले. उच्च न्यायालयाने १६ टक्क्यांऐवजी १२-१३ टक्क्यांवर आणून त्यावर शिक्कामोर्तब केले. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार देऊन दोन आठवड्यांत सरकारला आपले म्हणणे सादर करायला सांगितले आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने अंमल करण्यास मात्र मनाई केली आहे. केंद्राने काही महिन्यांपूर्वी बिगर आरक्षित विभागांतील गरिबांसाठी १० टक्के आरक्षण लागू केले. त्यासाठीची घटना दुरुस्ती केली. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. दोन्ही सरकारांनी या आरक्षणाची अंमलबजावणी सुरु ठेवली आहे. उद्या निर्णय विरोधात गेला तर या नियुक्त्यांचे काय होणार ठाऊक नाही. 

पण मग माझ्या अस्वस्थतेचा मुद्दा यात कुठे येतो? ..घटनात्मक अडचण आहे म्हणून? - मुद्दा रास्त असेल तर घटना पुढे जाण्यासाठी बदलली पाहिजे. तशी ती बदलत आली आहेच. ५० टक्क्यांची अडचण आर्थिक निकषावरच्या आरक्षणासाठी केंद्राने घटनादुरुस्ती करुन बदलली आहेच. अपवादात्मक आणि असाधारण स्थितीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडायला खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच परवानगी दिली आहे. 

माझी अस्वस्थता आहे ती आरक्षणाचे मूळ मर्म दुर्लक्षून ते निरर्थक करण्याबाबत. ..आणि त्या योगे समाजाची दिशाभूल करण्याबाबत. व्यवस्था बदलाच्या मूळ झगड्यासाठी बहुसंख्य सामान्य, कष्टकरी समाजाची एकजूट न होऊ देण्याबाबत. 

मुद्दा आहे, आरक्षण नक्की कशासाठी? ...गरिबी निर्मूलनासाठी? – नाही. ते आहे प्रतिनिधित्वासाठी. ज्या समाजविभागांना रुढी, संस्कृती आणि ऐतिहासिक कारणांनी मागे लोटले गेले आणि आजही लोटले जाते आहे, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी. एकाच गुणवत्तेचे असलेले दोन उमेदवार-एक दलित आणि एक उच्च जातीचा- असे निवड समितीसमोर आले तर कोणाची निवड होईल? ...निवड समितीत ज्या जातीचे प्राबल्य असेल त्या जातीच्या उमेदवाराची. आज तरी हे प्राबल्य उच्च जातींचे बहुतकरुन असल्याने दलित उमेदवाराच्या निवडीची शक्यता नसते. म्हणून कायद्याने ती जागा राखीव ठेवावी लागते. नोकरी, शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रांत या मागास विभागांचे प्रतिनिधित्व तयार होण्याने त्या क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढेल आणि त्या विभागांच्या हिताचे निर्णय होणे शक्य होईल, ही अपेक्षा या आरक्षणामागे आहे. 

मराठा, जाट, पटेल किंवा कापू यांच्या प्रतिनिधित्वाची ही स्थिती नाही. त्यांचे प्रतिनिधित्व आहेच. नोकऱ्या-शिक्षणात कमी असले तरी राजकीय निर्णयप्रक्रियेत पुरेसे अथवा अधिकच आहे. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात मराठा समाजाच्या राजकीय क्षेत्रातील प्रभुत्वाची नोंद घेतलेली आहे. हे राजकीय आणि सांपत्तिक प्रभुत्व असलेले लोक मराठा समूहातले वरचे २० टक्के आहेत, हे खरे. तो विभाग आपल्याच जातीतल्या गरिबांकडे दुर्लक्ष करतो. शेतीतले अरिष्ट वा शिक्षणातले विनाअनुदानित खाजगीकरण या धोरणांमुळे ज्या गरीब मराठ्यांना फटका बसला त्याला हे जातीतलेच मुखंड जबाबदार आहेत. या मुखंडांविरोधात आपल्यासम भरडल्या गेलेल्या अन्य जातसमूहांतील पीडितांसोबत संघर्ष हा मार्ग त्याने अवलंबला पाहिजे. या खाजगीकरणाने आज ज्यांना आरक्षण आहे, त्यांनाही तसा लाभ मिळत नाही. त्यांचेही दुःख तेच आहे. उलट त्यांना जी सामाजिक ताकद नाही, ती गरीब मराठ्याकडे, जाटाकडे, पटेल वा कापूकडे आहे. तिचा वापर त्याने ही व्यवस्था, सरकारी धोरण बदलण्यासाठी करायला हवा. घटनेच्या कलम ३९ (काही जण त्याला समाजवादाचे कलम म्हणतात) मधील उपजीविकेच्या साधनांचे न्याय्य वितरण, मोजक्यांकडेच संपत्तीच्या संचयाला नकार या आर्थिक न्यायाच्या मार्गदर्शक सूत्रांना सरकारच्या धोरणाचा भाग बनवण्यासाठी लढले पाहिजे. 

कुणबी या अर्थाने मराठा समाज ऐतिहासिक शूद्र संकल्पनेत सामावला जातो. पण बऱ्याच शतकांपूर्वी राज्यकर्ते वा सैनिक-सरदार झालेल्या कुणब्यांनी स्वतःला क्षत्रिय मराठे म्हणविले आणि अन्य कुणब्यांपासून स्वतःला अलग केले ही वस्तुस्थिती आहे. कुणबी ओबीसी म्हणून आरक्षित विभागात आला. मराठा म्हणवणारे आले नाहीत. हे खरे की जुनी रया जाऊन यातले अनेक आज कष्टकरी, गरीब झाले आहेत. पण ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत असे म्हणणे हे अति होईल. एकूणच आपल्याकडे ब्राम्हणांचा जो सांस्कृतिक वा विकासाच्या-निर्णयप्रक्रियेच्या विविध क्षेत्रांत वरचष्मा होता, त्याचा फटका मराठ्यांसह अन्य ब्राम्हणेतरांना बसला आहे. शाहू महाराज राजे असतानाही ब्राम्हणांनी जो त्यांचा छळ केला, त्यांच्या विरोधात जी कपट-कारस्थाने केली ती आपल्याला ठाऊक आहेत. पण आता प्रदीर्घ काळ राजकीय प्रभुत्व असलेल्या मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण आणि दलित-आदिवासी-ओबीसींचे सामाजिक मागासलेपण सारखे आहे, हे म्हणता येत नाही. ब्राम्हणांच्या वा संस्कृतीच्या-धर्माच्या छळापायी मराठ्यांचा आजही विकास खोळंबला आहे, हे म्हणणे वास्तवाला धरुन नाही. महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये सवर्ण म्हणून ओबीसी-मराठा दोन्ही आहेत. पण या दोहोंमध्ये मराठ्यांचे प्रमाण अधिक आहे. जो अत्याचार करायला धजावतो व ज्यावर अत्याचार होतो त्यांचे सामाजिक मागासलेपण एका श्रेणीतले कसे असू शकेल? 

मराठा आरक्षणासाठीच्या या आधीच्या आयोगांपैकी काहींनी हे मागासलेपण नाकारले तर काहींनी त्याचा पुरस्कार केला. मात्र न्यायालयाने ते नामंजूर केले. यावेळच्या गायकवाड आयोगाच्या शिफारशी मात्र उच्च न्यायालयाने स्वीकारल्या. गायकवाड आयोगाचा हा अहवाल हे मागासलेपण कसे सिद्ध करतो, हे जाणण्याची उत्सुकता आहे. मात्र हा अहवाल सार्वजनिक झालाच नाही. तो सरकार आणि नंतर न्यायालय एवढ्यांनाच ठाऊक आहे. तो सार्वजनिक होऊन त्यावर चर्चा होणे ही लोकशाही प्रक्रियेतली महत्वाची बाब इथे टाळली गेली आहे. तसेच न्यायालयाने राज्य सरकारचा असे आरक्षण देण्याचा अधिकार मान्य केला आहे. अपवादात्मक आणि असाधारण स्थितीत ५० टक्क्यांची अट ओलांडायचे सरकारचे समर्थनही मान्य केले आहे. आता जाट, पटेल, कापू आदिंच्या आरक्षणाची सोडवणूक त्यांच्या राज्यांनी याच धर्तीवर करावी, ही मागणी जोर पकडू शकते. 

आरक्षण हे जातसमूहाला असते. एका जातीला नाही. अनुसूचित जाती वा जमाती तसेच ओबीसी हे जातसमूह/वर्ग आहेत. मराठ्यांना ओबीसींच्या निकषावरच आरक्षण दिले गेले आहे. मात्र त्यांना ओबीसीत घातलेले नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये म्हणून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण ठेवले आहे. इथे काहींचा प्रश्न असा आहे- १९ टक्क्यांत ओबीसींतल्या अनेक जातींनी स्पर्धा करायची; मात्र मराठ्यांना १६ (आता १३) टक्क्यांत दुसरी कुठची जात वाटेकरीच नाही. ..हे असे कसे? 

मराठ्यांचा प्रश्न सुटला. मात्र धनगर समाजाचा सुटलेला नाही. त्याच्या समाधानासाठी राज्य सरकारने करोडोंच्या योजना जाहीर केल्या आहेत. अशा एका समाजासाठी त्याची समजूत काढण्यासाठी योजना देणे हे घटनेच्या समभावाच्या कलम १५ त कसे काय बसते? 

म्हणजेच ज्याचे त्याच्या संख्येमुळे उपद्रव वा राजकीय दबावाचे मूल्य तयार होते त्याची दखल सरकार घेते. ज्या छोट्या लोकसंख्येच्या जाती आहेत, त्यांची रस्त्यावर उतरण्याची, कायदा-सुव्यवस्थेत अडथळा तयार करण्याची वा सरकारला मते जाण्याचे भय दाखवण्याची ताकद नाही. त्यांची सरकार दखल घेत नाही. आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ आदिवासींतल्या सापेक्ष सबल जाती अधिक घेतात. कातकरी ही दुबळी जमात सार्वत्रिकपणे वंचित राहते. तिची ना संख्येची ना उपद्रवाची ताकद. आपल्या संविधानात व्यक्तीची प्रतिष्ठा, तिला दर्जाची व संधीची समानता मध्यवर्ती आहे. या मूल्याचे शासन सरळ सरळ उल्लंघन करते. लोकशाहीची पूर्वअट अल्पसंख्याकांचे संरक्षण ही आहे. मात्र सत्तेसाठीचे बहुमत हीच चिंता राजकीय पक्षांची राहिल्यास ती लोकशाहीलाच आडवे करते. निवडणुका लढवू पाहणाऱ्यांकडून मराठा आरक्षणाबद्दल मनात काही वेगळे असले तरी न बोलणे किंवा गोलमोल बोलणे हे मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या ताकदीमुळे आहे, त्याच्या मागणीच्या न्याय्यतेमुळे नव्हे, हे कष्टकरी, गरीब मराठ्यांनीही समजून घ्यायला हवे. कोणत्याही जातीची संख्येची वा साधनसंपत्तीची वा सांस्कृतिक वर्चस्वातून येणारी दादागिरी ही लोकशाहीचा गळा घोटणारीच असते. 

आरक्षण हा जर गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसेल तर आर्थिक निकषावरील आरक्षणाचा आधार काय? गरीब ब्राम्हणाला श्रीमंत ब्राम्हण कमी लेखतो हे खरे. पण म्हणून गुणवत्ता असूनही त्याला विशिष्ट नोकरी नाकारली जाते व त्या जागी आर्थिकदृष्ट्या वरच्या निम्न जातीच्या व्यक्तीला घेतले जाते, म्हणजे या गरिबांचे प्रतिनिधित्व रोखले जाते, असे नाही. इथे मुख्यतः जात-जमात-धर्म हे निकष प्रभावी असतात. त्यामुळे आरक्षणाचा घटनात्मक आधारच धूसर करणारा हा निर्णय आहे. आरक्षण मिळालेल्या विभागांचे सामाजिक मागासलेपण हे ऐतिहासिक-सांस्कृतिक कारणांनी आहे. या सामाजिक मागासलेपणाच्या परिणामी त्यांचे आर्थिक मागासलेपण आहे. या आर्थिक कमकुवतपणास ते व्यक्तिशः जबाबदार नाहीत. या आरक्षित विभागांत न मोडणाऱ्या म्हणजे कथित वरच्या जातींतील लोकांसाठी आर्थिक निकषावरचे आरक्षण आहे. या वरच्या जातीतील लोकांच्या आर्थिक कमकुवत स्थितीला त्यांच्या जातसमूहाच्या इतिहासाचा संदर्भ नाही. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि तो वर्तमान आहे. बदलणारा आहे. अशा स्थितीत एका अर्थाने स्थायी असलेले आरक्षण देण्यात काहीही तर्क नाही. शिवाय वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादा या निकषामुळे कथित वरच्या जातींतले त्यातल्या त्यात साधनसंपन्न लोकच या आरक्षणाचा फायदा घेण्याची शक्यता अधिक आहे. वास्तविक आर्थिक निकषावर विविध सवलती, योजना द्याव्यात. आरक्षण नव्हे. आरक्षण या व्यवस्थेची ही थट्टा आहे. 

आंबेडकरी वर्तुळातून किरकोळ अपवाद वगळता मराठा आरक्षणाचे सावधपणे पण स्वागतच केले जाते आहे. आर्थिक आरक्षणाबद्दलही फारसा विरोध नाही. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता अख्ख्या १०० टक्क्यांची वाटणी केलीत तरी आमचे काही म्हणणे नाही, असेही काही बोलतात. हे बोलणे जबाबदारीचे नाही. घटनेतील समान संधीच्या तत्त्वाला बाधा येऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण जाऊ नये असे मत संविधान सभेत व्यक्त केले होते. ते सारांशात असे- 

“उदाहरणार्थ, ज्या समाजांना सार्वजनिक सेवेत आजपर्यंत पुरेसा रोजगार अगर नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यांची मागणी आपण पुरेपूर मान्य केली तर संधीची समानता हे आद्य तत्त्वच आपण नष्ट केल्यासारखे होईल. समजा, एखाद्या समाजासाठी अगर लोकसमूहांसाठी आपण ७० टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या आणि केवळ ३० टक्के खुल्या  स्पर्धेसाठी ठेवल्या, तर संधीची समानता हे तत्त्व अंमलात आणण्याच्या दृष्टीने तसे करणे योग्य होणार नाही असे मला वाटते. म्हणूनच राखीव जागांची  संख्या उपलब्ध जागांमध्ये अल्पसंख्य  (म्हणजेच ५० टक्क्यांच्या आत) असावी. तरच संधीची समानता या तत्त्वाला संविधानात स्थान देणे आणि त्या तत्त्वाची परिणामकारक अंमलबजावणी करणे शक्य होईल.” 

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मंडल खटल्यात ५० टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये असा निकाल दिला. हा निकाल ९ जणांच्या पीठाने दिला आहे. तो बदलण्यासाठी त्यापेक्षा अधिक संख्येचे पीठ लागेल. ५० टक्क्यांची मर्यादा घटनेने नाही, या निकालाने घातली आहे. आजवर जी राज्ये याच्या पलीकडे गेली आहेत, त्यांचे निर्णय विविध आव्हानांद्वारे न्यायप्रविष्ट आहेत. आर्थिक आरक्षण आणि मराठा आरक्षण यांच्यामुळे ओलांडलेली आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयात चर्चिली जाईल. या आरक्षणांचे मूलाधारही तपासले जातील. त्याचे काय होईल, घटनेचा अर्थ कसा लावला जाईल, आजच्या राजकीय माहोलात न्यायालय आपली निरपेक्षता कशी जपते हे येणाऱ्या काळात दिसेलच. हा काळ किती हे सांगणे कठीण आहे. लवकरही कळेल वा प्रदीर्घ काळ न्यायालयात प्रकरण खितपतही पडेल. 

आपल्या आधीच्या पिढ्यांनी स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणा यांच्या महान संगरातून विकसित झालेल्या मूल्यांना संविधानात बद्ध केले. त्यातून आपल्या भवितव्याची हमी तयार केली. अशा या घटनेच्या सत्वाचा आदर करायचा की तोही खितपत ठेवायचा हे आपल्या हातात आहे. त्याच्याशी कोणालाही खेळू देऊया नको. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, ऑगस्ट २०१९)