Saturday, August 1, 2020

राजकीय पक्ष कशासाठी?


gehlot sarkar crisis: sachin pilot chale jyotiraditya scindia ki ...पंधरा ऑगस्ट येऊ घातला की सुजाण मंडळींच्या मनात देशाच्या वाटचालीचा आढावा सुरु होतो. यात प्रगतीच्या, विकासाच्या पातळीवर काय झाले हे तपासणे स्वाभाविकच. याचबरोबर देशाच्या मूलभूत राजकीय रचनेचेही मूल्यांकन गरजेचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ऐतिहासिक भाषणात स्मरलेला नियतीशी करार अजून संपलेला नाही. त्याच्या पूर्ततेसाठी आपल्या राजकीय रचनेचे प्रत्येक स्तंभ सशक्त असणे आवश्यक आहे. यादृष्टीने आपल्या संसदीय प्रणालीतील ‘राजकीय पक्ष’ या घटकाची थोडी चर्चा येथे करुया.

राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवतात. ज्यांना बहुमत मिळते त्यांचे केंद्रात वा राज्यात सरकार बनते. अन्य पक्षांच्या तुलनेत निवडून आलेल्यांची संख्या जास्त, पण बहुमत नाही, अशावेळी अन्य पक्षांचा आधार घेतला जातो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यात वावगे काही नाही. जे विचारांनी जवळपास आहेत अशा पक्षांनी निवडणुकीच्या आधी वा नंतर एकजूट करणे हे लोकशाही प्रणालीशी सुसंगत आहे.

प्रश्न येतो विचारांनी जवळपास नसलेल्या किंबहुना पूर्ण विरोधी असलेल्या पक्षांच्या आमदार-खासदारांना पदाची, पैश्याची लालूच दाखवून वा धमक्या देऊन फोडले जाते तेव्हा. बहुमताची तांत्रिकता इथे पूर्ण होते. पण संसदीय लोकशाही प्रणालीचे सत्व विलय पावते. एखाद्या पक्षाची सत्ता येते. पण त्यातल्या एखाद्या गटाला वा व्यक्तीला वाटते, माझ्या पक्षात माझ्यावर वा माझ्या सहकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. योग्य पदे, योग्य प्रमाणात मिळाली नाहीत. म्हणून तो बंड करतो. पूर्ण विरोधी विचारांच्या पक्षाला मिळतो. सत्ता टिकवायला आवश्यक ते बहुमत न राहिल्याने त्याच्या पक्षाचे सरकार गडगडते. विरोधी पक्षाचे सरकार येते. त्यात या बंडखोर नेत्याला मग ‘योग्य’ तो सन्मान, वाटा मिळतो.

याची खूप उदाहरणे आहेत. हल्ली नित्य घडत असतात. अगदी अलिकडचे मध्य प्रदेशमधील ज्योतिरादित्य शिंदे यांचे. काँग्रेस श्रेष्ठींनी कमलनाथ या ज्येष्ठांची साथ केली व माझ्यासारख्या तरुणाच्या कर्तृत्वाचा अवमान केला असा आरोप ठेवून ज्योतिरादित्य आपल्या गटातील आमदारांसह भाजपला मिळाले. काँग्रेसची सत्ता गेली. यात निवडणुकीत भाजपच्या विरोधात ते जे काही बोलले, म्हणजे त्यावेळी त्यांची जी भाजपविरोधी भूमिका होती त्याचे काय झाले? ते सगळे मुद्दे गैर होते याचा त्यांना आता साक्षात्कार झाला? तसे असते तर त्याच मुद्द्यावर त्यांनी बंड केले असते. बंड होते सत्तेतील त्यांना वाटणाऱ्या न्याय्य हिश्श्याबद्दल. अगदी कमलनाथांऐवजी मला मुख्यमंत्री करा, यासाठीच त्यांची सुरुवातीची मोर्चेबांधणी होती. म्हणजे मुद्दा धोरणाचा नव्हता. सत्तेच्या भौतिक लाभाचा होता. वैयक्तिक आकांक्षेचा होता. अजित पवारांचे पहाटेचे बंड कोणत्या धोरणावर आधारलेले होते? हा लेख लिहिताना राजस्थानमध्ये सचिन पायलटांचे असेच बंड सुरु आहे. ते भाजपत जाणार नाही असे म्हणत आहेत. काँग्रेस त्यांना पुन्हा परत या असे आवाहन करत आहे. इथे सचिन पायलटांच्या बंडाचा मुद्दा गहलोतांच्या जागी मी मुख्यमंत्री असायला हवा होतो हा आहे.

या घटनांबाबत मग प्रतिक्रिया येऊ लागतात: खरं म्हणजे सचिन पायलट वा ज्योतिरादित्य शिंदे या तरुण मंडळींना काँग्रेसने संधी द्यायला हवी होती. जुन्या खोडांना बाजूला केले पाहिजे. ..या मुद्द्यांची चर्चा होऊ शकते. पण भाजपसारख्या पूर्ण विरोधी असलेल्या पक्षात त्यांनी त्यामुळे जाणे याचा अर्थ कसा घ्यायचा? ज्या विचारांनी आम्ही चाललो आहोत, त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्याशी संघर्ष करणे, प्रसंगी बाहेर पडून त्याच विचारांवर आधारित गट करुन झगडत राहणे हा उपाय करायला हवा. तो होताना दिसत नाही. पक्ष हे केवळ माझ्या वैयक्तिक उत्कर्षाचे, सत्तेच्या लाभाचे साधन हीच या बंडवाल्या मंडळींची भूमिका आहे, असेच यातून कळते.

पक्षात वैयक्तिक उत्कर्ष साधणे, सत्तापदे मिळवणे, त्यासाठी स्पर्धा करणे हे नवीन नाही. पण हल्ली ते निलाजरेपणे सुरु आहे. एवढेच नव्हे तर पक्षात जाऊन राजकारण करणे म्हणजे हेच असे खोलवर रुजले आहे. सत्ता बचावासाठी सत्ताधारी व विरोधक दोघांनाही आपापल्या बाजूच्या आमदारांना पकडून पंचतारांकित हॉटेलात कैद करुन ठेवावे लागते, हे कशाचे लक्षण? आपल्या बाजूने आहोत असे सांगणाऱ्यांवरही विश्वास ठेवता येऊ नये, इतक्या खालच्या थराला हे पोहोचले आहे. करोडोंच्या रकमांचे हे खेळ चालतात. सामान्य लोकांतली चर्चा पाहिली तर तेथेही पक्षात जायचे ते वैयक्तिक काही मिळवायला, जवळच्या नातेवाईकांचे, मित्रांचे हित करायला असेच दिसते. पक्षाने तुला काय दिले? पक्षाने मला खूप दिले...या प्रश्नोत्तरात, संवादात पक्षाचे धोरण लोकांत पोहोचवायला, त्यासाठी आमची सत्ता यायला केलेल्या प्रयत्नांतून मला समाधान मिळाले, माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, हे मुद्दे अभिप्रेतच नसतात.

पक्ष हे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी राजकीय सत्ता मिळवायचे साधन हीच व्याख्या आज समाजमनात प्रस्थापित होऊ लागली आहे. अशावेळी अगदी बाळबोध वाटेल पण राजकीय पक्षाच्या मूळ व्याख्येची उजळणी करणे गरजेचे आहे.

कोणालाही गूगल केले की मिळेल अशी डिक्शनरीतली व्याख्या पुढीलप्रमाणे आहे – ‘समान राजकीय उद्दिष्टे आणि तत्त्वप्रणाली असणाऱ्या आणि संसद वगैरेच्या निवडणुका लढविणाऱ्या लोकांचा एक गट म्हणजे राजकीय पक्ष.’

या व्याख्येत वैयक्तिक हितासाठी एकत्र आलेली टोळी अभिप्रेत नाही. तर देश कोणत्या तत्त्वप्रणालीने विकसित करायचा हे ज्यांचे ठरले आहे, अशा समविचारी व्यक्तींची सत्तेसाठी लढणारी संघटना म्हणजे पक्ष असे अभिप्रेत आहे.

काही पक्ष असेही असतात जे निवडणुका लढणार नाहीत. पण सत्ता कोणाकडे जावी, कोणत्या दिशेने जावी यासाठी निवडणुकांच्या तसेच इतर काळातही प्रयत्न करत राहतात.

राजकीय पक्षाची भूमिका काय असावी याबद्दल एडमंड बर्क हा विचारवंत म्हणतो – ‘ज्यांबाबत सहमती आहे अशा विशिष्ट तत्त्वांवर आधारित राष्ट्रीय हित साधण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा संघ म्हणजे राजकीय पक्ष.’

याही व्याख्येत उद्दिष्ट राष्ट्रीय हिताचे. आधार सहमतीच्या विचारांचा, तत्त्वांचा. त्यासाठी काम करणाऱ्यांचे प्रयत्न सामूहिक. वैयक्तिक उत्कर्ष वा सत्तापद ही उद्दिष्टे इथे नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरही याच सूत्राला पाठिंबा देतात. ते म्हणतात – ‘विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष होय.’

म्हणजे जे आता आपल्याकडे सुरु आहे, ते राजकीय पक्ष प्रणालीला, संसदीय लोकशाहीला घातक आहे. पण हे नीटपणे समाजाच्या लक्षात आणून देणारेही आपल्याकडे दुर्मिळ आहेत. ज्यांचे समाजात एक नैतिक वजन असते अशांतले बरेच जण बिगर पक्षीय संघटनांतले नेते वा स्वतंत्र विचारवंत आहेत. त्यातले काही तर राजकीय पक्ष हा भ्रष्टच असतो, राजकारण हे गलिच्छच असते, असे प्रचारत असतात. काहींची मजल तर वेगवेगळे पक्ष असणे ही फाटाफुटच असते; सर्व राजकारणी हे चोर असतात; सर्व सज्जनांनी एकत्र येऊन एकच पक्ष करुन देश चालवला पाहिजे, असे प्रचारण्यापर्यंत जाते. लोकशाहीत विविध हितसंबंध, विविध भूमिकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी वेगवेगळे पक्ष असतात हे त्यांना आकळतच नाही. वेगवेगळे पक्ष असणे हे सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे. त्यातील कार्यकर्ते, नेते पक्षाचा हितसंबंध एकत्रित पुढे न नेता वैयक्तिक हितासाठी परस्परांचे पाय खेचतात, फूट पाडतात हा काळजीचा मुद्दा आहे. वैयक्तिक स्वार्थासाठीचा हा गलिच्छ व्यवहार म्हणजे राजकारण नव्हे. राजकारण हा समान हितसंबंधांच्या व्यक्तींच्या संघटनांचा सत्तेच्या संदर्भातला संघर्ष असतो.

ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना संधी, त्यांचे करिअर, सोनिया, राहुल, प्रियंका या तीन गांधींच्या नेतृत्वातील उणेपणा वगैरे चर्चा चालू आहे. या चर्चेत गर्क असणाऱ्यांचे राजकीय पक्षाच्या मूळ स्वरुप-भूमिकेकडे लक्ष वेधण्याचे काम अपवादानेच होते आहे. त्यातील दोन अपवाद आहेत कुमार केतकर आणि मणिशंकर अय्यर. समाजमाध्यमांवरील एका चर्चेत कुमार केतकरांचे मत वाचले. त्यातील आपल्या विवेचनाशी संबंधित मुद्दे सारांशात असे – “एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे अधिक पगार वा पदासाठी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत किंवा एका कॉलेजातील नोकरी सोडून दुसऱ्या कॉलेजात जाणे नव्हे. अशा नोकऱ्या बदलण्यात विचारसरणीचा संबंध नसतो. वैयक्तिक महत्वाकांक्षा यात सर्वमान्य असते. राजकारण आणि कंपनी यांची तुलना होऊ शकत नाही. सोनिया वा राहुल चूक की बरोबर यापेक्षा मुख्य मुद्दा आहे तो या पक्ष सोडणाऱ्या मंडळींचे राजकारणातले उद्दिष्ट काय? त्यांचा जागतिक दृष्टिकोण काय? त्यांची वैचारिक भूमिका काय?”

मणिशंकर अय्यर यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये १५ जुलैला एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या पिढीने पाहिलेल्या काही काँग्रेसमधील जुन्या फुटींचे संदर्भ दिलेत. या फुटींचा पाया विचारसरणीतील फरक हा होता. आपले पुढील वारसदार म्हणून ज्यांच्याकडे नेहरु पाहत होते ते जयप्रकाश नारायण तसेच आचार्य नरेंद्र देव व अशोक मेहता यांनी नेहरुंना सोडले ते नेहरु त्यांच्यादृष्टीने पुरेसे समाजवादी नव्हते म्हणून. राजाजी नेहरुंपासून वेगळे झाले ते त्यांच्या मते नेहरु अति समाजवादी होते म्हणून. या फुटी कुठच्या पदासाठी वा भौतिक फायद्यासाठी नव्हत्या. त्यांच्या दृष्टीने भारत अधिक चांगला घडवण्यासाठीचा मार्ग कोणता यासाठी होत्या. लेखाच्या अखेरीस संघटनात्मक तिढे सोडवताना काँग्रेस नेतृत्वाने काय निकष लावावे याबद्दल ते बोलतात. तरुण की वयस्क, कोण किती प्रतिभावान आहे हे नव्हे; तर काँग्रेसचे धोरण व कार्यक्रम याबाबतची निष्ठा मापली जावी. वैयक्तिक महत्वाकांक्षेला थारा देता कामा नये असे त्यांचे म्हणणे आहे. लोकशाही मार्गाने निवडलेल्या कोणत्याही संघटनेत मतभिन्नता मुक्त व स्पष्टपणे मांडायला प्रोत्साहन हवे असेही ते पुढे सांगतात.

केतकर व अय्यर यांचे हे म्हणणे आताच्या काळात कोणाला किती समजेल वा पटेल हे ठाऊक नाही. केतकर वर उल्लेख केलेल्या चर्चेत वैयक्तिक महत्वाकांक्षेबद्दल बोलताना निलाजरा व्यक्तिवाद हे भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान आहे असे म्हणतात. आता तर त्याची सार्वत्रिक चलती आहे. समाजातल्या विविध थरांत ते आडवे-उभे पसरले आहे. आज ज्यांना भांडवली पक्ष म्हटले जाते, त्यात तर पुरेपूर आहेच. पण कष्टकरी-दलित हिताचा दावा करणाऱ्या पक्षांभोवतीचे त्याचे वेटोळेही घट्ट आहे.


रिपब्लिकन पक्ष (विविध गटांत विभाजित) उदाहरणादाखल घेऊ. भांडवली पक्षांत विविध घटकांच्या भांडवली आकांक्षांचा मेळ घालावा लागतो. पण रिपब्लिकन पक्षगटांना कोणत्या विविध थरांच्या हितसंबंधांचा मेळ घालावा लागतो? तो तर दलित, पीडित, वंचितांचाच वसा सांगतो. तरी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट का? निवडणुकांत कोणाशी युती करावी, यावरुन होणारे मतभेद समजू शकतो. पण पक्ष फोडण्याइतके ते नेहमीच मूलभूत होते का? भूमिकांपेक्षाही अन्य व्यक्तिवादी हेतू इथे प्रबळ ठरतात हेच खरे.

बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना स्पष्ट करताना पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहेः

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (भारतीय रिपब्लिकन पक्ष) ह्या संस्थेस पक्षाला मान्य असलेल्या तत्त्वज्ञानाच्या व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मतदारांची (जनतेची) संघटना करावी लागेल. ही पक्ष संघटना पुढीलप्रमाणे काम करीलः

१) पक्ष स्थापनेसाठी व त्याच्या संघटित वाढीसाठी झटणे; आणि पक्षाचे तत्त्वज्ञान व ध्येयधोरण यांचा प्रचार करणे.

२) पक्षाची तत्त्वे, विचारसरणी याचा प्रचार वृत्तपत्रे, सभा-संमेलने, व्याख्याने, वाङ्मय-लेखन इ. मार्गाने करणे.

३) पक्ष सभासदांच्या वतीने संयुक्त राजकीय चळवळी व राजकीय कृती करण्यासाठी निवडणुका लढविणे.

यापैकी काय व किती प्रमाणात रिपब्लिकन पक्षगटांनी केले याचा बाबासाहेबांच्या अनुयायांनी विचार करावा. डाव्या पक्षांतल्या बऱ्याचशा फुटी या भूमिकांवर झालेल्या आहेत हे खरे. पण त्याला नेतृत्वाचे वैयक्तिक कंगोरे कारण नाहीतच असे नाही. अनेक पुरोगामी, विद्रोही राजकीय संघटनांतल्या फुटींचे विश्लेषण करु गेल्यास त्या फुटींमागे व्यक्तिवादाचे कोंब तरारुन आलेले आढळतील.

भांडवली पक्षांना समाजात मूलभूत बदल नको आहे. त्यांना व्यक्तिवादी फाटाफुटी परवडू शकतात. पण मूलभूत बदल मागणाऱ्यांना त्या परवडू शकत नाहीत. त्याने काय नुकसान होते याचा आपण भरपूर अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच पुढे जायचे असेल तर या व्यक्तिवादी व्यवहाराचा आपण अधिक गंभीरपणे विचार करणे भाग आहे.

हे असे आताच वेगाने घडत, घसरत का आहे? ..याची कारणमीमांसा केवळ माणसे व त्यांच्या प्रवृत्ती बदलल्या असे म्हणून चालणार नाही, हे मला ठाऊक आहे. बदलती उत्पादन पद्धती, त्यातून आकारास येणारे नवे उत्पादन संबंध, त्यामुळे चालना मिळालेल्या समाजशक्ती, त्यांचा राष्ट्रीय व जागतिक आयाम या सगळ्याचा त्यासाठी वेध घ्यावा लागेल. या गुंतागुंतीची उकल हा अगदी आवश्यक पण मोठ्या क्षमतेची मागणी करणारा भाग आहे. ती माझी मर्यादा आहे. ज्यांना यात गती आहे, अशांनी त्यास भिडावे अशी जरुर अपेक्षा आहे. तोवर प्रश्नाचे स्वरुप उलगडून ठेवणे नक्कीच उपयुक्त ठरेल.

ते करण्याचा प्रयत्न मी केला आहे. या १५ ऑगस्टसाठी तेवढे पुरेसे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, ऑगस्ट २०२०, इ अंक)