Thursday, February 22, 2018

सामाजिक न्याय, आरक्षण व आजचे संदर्भ


जात-धर्मांच्या अस्मितांचे संघर्ष हा जुनाच मुद्दा असला तरी आज त्यांचे धुमसणे चिंता वाढवणारे आहे. एकीकडे प्रचलित आरक्षणाबद्दल अनेक गैरसमज व आकस असतानाच मराठा, जाट, पटेल या मध्यम जातींनी आरक्षणाच्या मागणीने सरकारला जेरबंद केले आहे. दलित, आदिवासी व ओबीसी हे आरक्षणप्राप्त घटक त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. ओबीसींना तर आपल्यातलाच वाटा हे घेणार नाहीत ना, अशी साधार भीती वाटू लागली आहे. आरक्षित जागा प्रत्यक्षात किती आहेत, त्यांचा लाभ आज आरक्षणास पात्र विभागांना कितपत मिळतो आहे, नवे आरक्षण आल्यास त्याचा नक्की फायदा कसा होणार आहे, याबद्दल आरक्षण मागणारे विभाग फारसा विचार करताना दिसत नाहीत. त्यांच्या प्रश्नांची खरी उत्तरे ज्या व्यवस्थेत व सरकारी धोरणांत दडलेली आहेत, ती शोधण्याचा प्रयास न करता भलतीच भुई धोपटली जाते आहे. जातीचे जुने आधार वेगाने नष्ट होताना विषमतेच्या दऱ्या रुंदावणाऱ्या विकासक्रमाचा भुलभुलैया व राजकीय हितसंबंध जातींचे वाळू घातलेले तण टवटवीत करत आहेत. हा दिशाहिन गोंधळ व यादवी अजून कोणत्या थराला जाणार हे आज सांगता येणे कठीण आहे. या दिशाहिन माहोलाला आपण विवेकशील मंडळी पूर्ण सुरळीत करु शकतो असा दावा करणेही मुश्किल आहे. पण या गोंधळातले काही गुंते सोडवण्याचा, किमान त्यासाठीचा संवाद करण्याचा प्रयत्न आपण नक्की करु शकतो. आरक्षणाबाबतची खालील चर्चा ही त्या दिशेने केलेली एक खटपट आहे. सामान्य लोक डोळ्यांसमोर धरुन केलेली ही परिचयात्मक चर्चा आहे. 

आरक्षणाचा संबंध आपल्या संविधानातील ‘सामाजिक न्याय’ या उद्देशिकेतील संकल्पनेशी येतो. आपण आपल्या नागरिकांना ज्या बाबी देण्याचा संकल्प केला त्यातील एक आहे सामाजिक न्याय. हजारो वर्षे ज्या समाजविभागांना रुढींच्या-धर्माच्या नावाखाली समान दर्जा व संधीपासून, माणूसपणापासून व परिणामी विकासापासून वंचित ठेवले त्या समाजविभागांना आपण घटनेद्वारे न्याय देण्याची घोषणा केली आहे. 

हे सामाजिकदृष्ट्या पीडित-वंचित विभाग कोणते? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला आज हिंदू म्हणून ओळखले जाते, तथापि, जे भारतीय उपखंडाचेच वैशिष्ट्य आहे त्या वर्ण-जातिव्यस्थेचे वर्णन करताना दोन रुपके वापरली आहेत. एक जिना नसलेल्या इमारतीचे व दुसरे मडक्यांच्या उतरंडीचे. त्यांच्या मते आपली जातिव्यवस्था ही जिना नसलेली इमारत आहे. एका जातीचा माणूस त्याची कितीही इच्छा असली तरी दुसऱ्या जातीचा होऊ शकत नाही. ना तो तथाकथित खालच्या जातीत जाऊ शकत, ना तो त्याच्या वरच्या जातीत जाऊ शकत. ज्या मजल्यावर (म्हणजे जातीत) तो जन्माला आला त्या जातीतच त्याला आजन्म राहाणे भाग असते. या जाती भले कधीकाळी व्यवसायावरुन पडल्या असतील. तथापि, पुढे माणसांना हवा तो व्यवसाय स्वीकारण्याची व त्याप्रमाणे जात बदलण्याची मुभा राहिली नाही. बाबासाहेब ही स्थिती अगदी योग्य प्रकारे शब्दबद्ध करतात. ते म्हणतात- ‘जात ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे.’ 

बाबासाहेब दुसरे रुपक योजतात मडक्यांच्या उतरंडीचे. या मडक्यांच्या उतरंडीत ब्राम्हण, क्षत्रिय. वैश्य, शूद्र असे थर आहेत. या प्रत्येक थरात दोन थर आहेत. एक पुरुषाचा व दुसरा स्त्रीचा. सर्व थरांत स्त्रीचे स्थान पुरुषाच्या खाली आहे. सर्व जातींनी स्त्रीला दुय्यम ठरविले आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांतील लोकांना ‘सवर्ण’ म्हणतात. कारण त्यांना वर्ण आहे. दलित, आदिवासी, भटके हे विभाग ‘अवर्ण’ आहेत. कारण त्यांना वर्ण नाही. सवर्ण हे गावात राहतात. तर अवर्ण हे गावाच्या बाहेर. यापैकी दलित हे अस्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श करायचा नसतो असे. तर सवर्णांना परस्परांचा स्पर्श चालतो. सवर्णांतल्या चार वर्णांतही दोन भाग आहेत. पहिल्या तीन वर्णांना (ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य) शिक्षणाचा अधिकार तर शूद्र या चौथ्या वर्णाला तो अधिकार नाही. पहिल्या त्रैवर्णिकांतील स्त्रियांनाही तो नाही. त्रैवर्णिकांतल्या स्त्रिया या त्या अर्थाने शूद्रात मोडतात. काय रुढी आहे पहा. ब्राम्हण स्त्रीच्या उदरातून जन्माला आलेला मुलगा ब्राम्हण, तर त्याच उदरातून जन्माला आलेली मुलगी मात्र शूद्र. खुद्द ब्राम्हणाला जन्म घालणारी माताही शूद्रच. मनुवादी व्यवस्था म्हणतात ती ही. 

मनूने संस्कृत ऐकले तर, उच्चारले तर ज्या शिक्षा सांगितल्या आहेत, त्या शूद्रांना. म्हणजे आजच्या ओबीसी जातींना. अनेकदा ओबीसींना वाटते मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली म्हणजे तिचा संबंध फक्त दलितांशी असेल. त्यांचा हा गैरसमज आहे. महात्मा फुले अस्पृश्यांना अतिशूद्र म्हणतात. धर्मरुढींची खास सवलत, राखीव लाभ असलेल्या त्रैवर्णिकांपासूनचा वेगळेपणा अधोरेखित करताना व धर्मानेच या लाभांपासून वंचित ठेवलेले शूद्र तसेच अतिशूद्र यांचा हितसंबंध एकत्रित करताना महात्मा फुले त्यांना शूद्रातिशूद्र असे म्हणतात. सामाजिक सुधारकांकडून स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, भटके, विमुक्त जाती असे जे रांगेत बोलले जाते ते विभाग म्हणजे हजारो वर्षे साधन-संपत्ती, सामाजिक-सांस्कृतिक अधिकार व मानवी प्रतिष्ठा यांपासून धर्माच्या नावानेच जाणीवपूर्वक वेगळे, वंचित ठेवले गेलेले लोक. त्यांच्या आजच्या अवस्थेला ते स्वतः नव्हे तर हा दुजाभाव करणारी संस्कृती, समाजव्यवस्था जबाबदार आहे. म्हणजेच ज्या जातींना साधन-संपत्ती व प्रतिष्ठा मिळाली त्यालाही हा व्यवस्थेचा दुजाभावच कारण आहे. साहजिकच मागास, दुबळ्या जाती व स्त्रिया यांना विकासात हिस्सा व न्याय द्यायचा तर ही व्यवस्थाच बदलणे गरजेचे आहे. त्या विभागांतील व्यक्तींच्या वैयक्तिक प्रयत्नांवर सोडून चालणार नाही. समाजातील त्यांच्याप्रतीचा मानसिक दुजाभाव लक्षात घेता त्यांच्यासाठी काही खास सवलती, राखीव लाभांची व्यवस्था करावी लागणार. यालाच सामाजिक न्याय म्हणतात. 

राखीव जागांबाबतची भूमिका व प्रयत्नांचा इतिहास 

या सामाजिक न्यायाबद्दल, राखीव जागांबाबतच्या भूमिकेबद्दल पहिली मांडणी केली ती महात्मा जोतिराव फुले यांनी. ते आपल्या अखंडात म्हणतात- 

‘मानव सारिखे निर्मिके निर्मिले| कमी नाही केले कोणी एक| 

कमी जास्ती बुद्धी मानवा वोपिली| कोणा नाही दिली पिढीजादा|’ 

मानवाच्या बुद्धीत फरक असू शकतो. पण वंशपरंपरेने विशिष्ट घराण्याला, जातीला बुद्धीचा मक्ता दिलेला नाही. तसेच मानव म्हणून सर्वांची प्रतिष्ठा, दर्जा एक आहे असे महात्मा फुले बजावतात. ज्या व्यवस्थेने हा दर्जा कमीजादा केला त्या व्यवस्थेला बदलण्याचा ते मार्ग सांगतात. तो असा- 

‘जातजातीच्या संख्याप्रमाण कामें नेमा ती| खरी ही न्यायाची रिति| 

नेमा गुरु अन्य जातीचे| नमुने सात्विक ज्ञानाचे| 

निवळ माळ्या कुणब्याचे|दुसरे महारमांगांचे|’ 

आजही उच्चवर्णीयांचे वर्चस्व अनेक क्षेत्रांत आहे. पण महात्मा फुलेंच्या काळात ते शतप्रतिशत होते. सर्व अधिकारपदे, वृत्तपत्रे, सरकारी नोकऱ्या, शिक्षक सगळीकडे मुख्यतः ब्राम्हण. अन्य जातींचे कुठे अस्तित्वच नाही. म्हणून जातीच्या संख्येप्रमाणे कामे नेमा, तीच न्यायाची खरी रीत आहे, असे जोतिराव सांगतात. एकजातीय तेही पांढरपेशा ब्राम्हण शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान हे पढिकच असणार. त्याला प्रत्यक्ष कामातील अनुभवाचा व कौशल्याचा आधार काय? यासाठी जे प्रत्यक्ष काम करणारे विभाग, जाती आहेत, त्यांतून गुरु नेमा. त्यांचे तेज काही वेगळेच असेल असे फुले नोंदवतात. आधुनिक शिक्षणशास्त्राचे मर्मच तर ते इथे सांगतात. 

महात्मा फुले राखीव जागांचा वैचारिक आधार तयार करतात. पण त्या प्रत्यक्षात आणायला ते काही राज्यकर्ते नव्हते. ते काम एका राजाने केले. तो राजा छ. शाहू महाराज. महात्मा फुल्यांचा वैचारिक वारसदार असलेल्या या राजाने आपल्या संस्थानात २६ जुलै १९०२ रोजी राखीव जागांची अंमलबजावणी केली. ५० टक्के जागा ब्राम्हण, प्रभू व शेणवी या उच्च जाती वगळून इतरांसाठी ठेवल्या. पुढे त्यांचे प्रमाण वाढवले. याचबरोबर दलित, बहुजनांच्या विकासासाठी वसतिगृहे आदि अनेक उपक्रम त्यांनी राबवले. 

इंग्रजांनी एतद्देशीय चळवळींच्या परिणामी तसेच त्यांच्या राजकीय हितसंबंधांचा भाग म्हणून अनेक प्रांतांत विविध प्रकारे स्वतंत्र तसेच राखीव राजकीय प्रतिनिधीत्वाची पद्धत सुरु केली. ज्यांनी राज्यघटनेत या तरतुदींना पक्केपणाने स्थापित केले त्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात स्वातंत्र्यपूर्वकाळात १९३२ साली झालेला पुणे करार हा राजकीय राखीव जागांच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा आहे. 

स्वतंत्र भारतातील राखीव जागांच्या तरतुदी 

धर्म व संस्कृती यांमुळे ज्यांच्या वाट्याला कमीअधिक तीव्रतेचा मागासपणा आला त्यातील प्रमुख विभाग दलित, आदिवासी व ओबीसी असले तरी संविधानाची रचना चालू असताना राखीव जागा मिळाल्या त्या दलित व आदिवासी या घटकांना. याचे एक कारण म्हणजे या दोन विभागांच्या मागासपणाबद्दल कोणतेही दुमत नव्हते. त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यासाठीची सहमतीही होती. शिवाय दलित व आदिवासींत कोणत्या जाती वा जमाती येतात याच्या याद्या इंग्रजांच्या काळातच (१९३५ साली) तयार झालेल्या होत्या. अस्पृश्य जातींच्या यादीतील जातींना ‘अनुसूचित जाती’ व आदिवासी जमातींच्या यादीतील जमातींना ‘अनुसूचित जमाती’ असे तांत्रिक संबोधन आहे. या दोन्ही घटकांना त्यांच्या संख्येच्या टक्केवारीप्रमाणे नोकरी, शिक्षण व राजकीय प्रतिनिधीत्वात राखीव जागा देण्यात आल्या. आज केंद्रात या राखीव जागा अनुसूचित जातींना (म्हणजे दलितांना) १५ टक्के व अनुसूचित जमातींना (म्हणजे आदिवासींना) ७.५ टक्के आहेत. राज्यांमध्ये त्या राज्यांतील त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे आहेत. त्यामुळे ते आकडे वेगवेगळे आहेत. 

ओबीसी म्हणजे अन्य मागासवर्गीयांचे काय? 

शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विभागांच्या विकासासाठीच्या शिफारशी करण्यासाठी आयोग नेमण्याची तरतूद कलम ३४० नुसार घटनेत करण्यात आली. त्याप्रमाणे पहिला आयोग १९५३ साली काकासाहेब कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. या आयोगाने केलेल्या शिफारशींच्या विरोधी मत खुद्द अध्यक्षांनीच अहवाल सादर करताना दिल्याने त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. देश स्वतंत्र होऊन जेमतेम ६ वर्षे झाली होती. धार्मिक आधारावर देशाची फाळणी झाली होती. तो तणाव अजून विरलेला नव्हता. अशावेळी अन्य मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याने त्यात जातीय ताणाची भर पडेल असे भय तत्कालीन सरकारला वाटत होते. दलित-आदिवासींबाबत जशी सहमती होती. तशी या मुद्द्यावर नव्हती. शिवाय हा विभाग दलित-आदिवासींइतका मागास म्हणजे बहिष्कृत नव्हता. तो सवर्ण होता. त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र पावले उचलण्याऐवजी एकूण राष्ट्रउभारणीच्या क्रमात जी विकासाची पावले गरिबांना केंद्रवर्ती ठेवून घेतली जातील त्यात त्यांचाही विकास होईल अशी राज्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे हा अहवाल बासनात गुंडाळला गेला. त्यानंतर दीर्घ काळाने १९७८ ला मंडल आयोग नेमण्यात आला. या अहवालातील राखीव जागांच्या शिफारशी १९९० साली व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वीकारल्या. त्याविरोधात आंदोलने झाली. जातीय ताण तयार झाला. अखेर १९९३ पासून ओबीसींच्या राखीव जागांची अंमलबजावणी सुरु झाली. 

ओबीसींच्या राखीव जागांसाठी ज्या अडचणी होत्या त्यात कोणत्या जाती यात मोडतात हे कसे ठरवायचे ही एक प्रमुख अडचण होती. नियमित होणाऱ्या जनगणनेत अनुसूचित जाती व जमातींची संख्या नोंदवली जाते. तथापि, अन्य जातींची नोंद होत नाही. आपल्या देशातील जातींची शेवटची गणना १९३१ साली इंग्रजांच्या काळात झाली होती. या जुन्या गणनेचाच आधार मंडल आयोगाला घ्यावा लागला. खूप मागणीनंतर २०११ साली स्वतंत्र भारतात प्रथम जातींची गणना करण्यात आली. ‘सामाजिक, आर्थिक व जातींची गणना’ असे तिला म्हटले गेले. प्रत्येक जातीची सामाजिक-आर्थिक प्रगतीची अन्य जातींशी तुलनात्मक अवस्था त्यातून कळणार आहे. त्याचे विश्लेषण अजून अधिकृतपणे बाहेर आलेले नाही. म्हणजेच, आज ज्या ओबीसींना राखीव जागा मिळत आहेत, त्यांचा आधार १९३१ इतका जुना आहे. नवा आधार मिळाल्यावर जुन्या यादीतील कोणत्या जाती पुढे गेल्या, कोणत्या अजून मागे आहेत हे समजू शकेल. परंतु, त्यामुळे नव्या वादाला सामोरे जावे लागेल. ज्या जातींचा विकास झाला असेल, त्यांना राखीव जागांतून बाहेर पडावे लागेल. हे फक्त ओबीसींपुरते न राहता दलित-आदिवासींतील काही जातींबाबतही हा प्रश्न उभा राहू शकतो. निवडणुकांतले जातींचे महत्व लक्षात घेता बाहेर निघणाऱ्या जातींचा रोष ओढवून घ्यायची तयारी सरकारची तसेच विरोधकांचीही आहे का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जातीच्या गणनेचे आकडे जाहीर न होणे हे बहुधा सर्वच प्रस्थापित पक्षांना सोयीचे आहे. 

ओबीसींच्या राखीव जागांना क्रिमी लेयरची अट आहे. दलित-आदिवासींना ती नाही. आज ओबीसींना मिळालेल्या राखीव जागा शिक्षण व नोकरीत सरसकट आहेत. तथापि, राजकीय प्रतिनिधीत्वातील राखीव जागा दलित-आदिवासींप्रमाणे सर्व स्तरांवर नाहीत. त्या फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांत आहेत. लोकसभा व विधानसभांत नाहीत. शिवाय त्या त्यांच्या संख्येच्या टक्केवारीप्रमाणे नाहीत. मंडल आयोगाने ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के धरली होती. परंतु, घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावताना तसेच बाबासाहेबांच्या घटनाकार म्हणून संविधान सभेतील भाषणाला अधोरेखित करुन सर्वोच्च न्यायालयाने एकूण राखीव जागा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये असा निर्वाळा दिल्याने ओबीसींच्या वाट्याला २७ टक्केच राखीव जागा आल्या. दलितांच्या १५ टक्के + आदिवासींच्या ७.५ टक्के + ओबीसींच्या २७ टक्के = ४९.५ टक्के. अशारीतीने ५० टक्क्यांच्या आत राखीव जागांचे गणित बसवण्यात आले. काही राज्यांत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. ज्या राज्यातील अनु. जाती व जमातींची लोकसंख्याच जास्त आहे, त्यांना न्यायालयाने याबाबत सूट दिली आहे. तर काही राज्यांचे खटले न्यायालयात चालू आहेत. 

मराठा, जाट, पटेलांचे काय? 

महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट व गुजरातमध्ये पटेल या मध्यम जातीगटातल्या, राजकीय ताकद असलेल्या जाती आहेत. शेती तसेच अन्य व्यवसाय व साधनसंपदा असलेले हे विभाग आहेत. एकेकाळी व आजही त्यातले बरेच लोक दलित-आदिवासी व ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणारे व उभे राहणारे आहेत. ही मंडळी आरक्षण का मागू लागली आहेत? 

एकूण सर्वच विभागांच्या आकांक्षा वाढत आहेत. या वाढत्या आकांक्षांची पूर्तता मात्र सर्वांच्या वाट्याला समान येत नाही. मराठा असो की जाट की पटेल या तिन्ही जातींत-खरं म्हणजे सर्वच जातींत वेगाने स्तरीकरण होते आहे. म्हणजे एका जातीतले लोक सर्वसाधारणपणे एका आर्थिक गटातले असे आता नाही. त्यांच्यात अति सधन, सधन, मध्यम, कनिष्ठ व गरीब असे अनेक स्तर पडले आहेत. शेतीच्या अरिष्टाने शेतीवरच अवलंबून असलेल्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. जमिनीचे पिढीगणिक तुकडे पडून त्यातील अनेक अल्पभूधारक होत आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने ते महागले आहे. त्यामुळे अनेक पालक कर्जबाजारी होऊन मुलांना शिकवत आहेत. तर अनेकांना तेही शक्य नसल्याने शिक्षण सोडत आहेत. सरकारी नोकऱ्या प्रचंड कमी झाल्या आहेत. त्याचवेळी जुनी सरंजामी मिजास मात्र त्या प्रमाणात कमी झालेली नाही. राखीव जागा व सवलतींचा लाभ घेऊन पुढे गेलेल्या त्याच गावातील दलित कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारताना दिसते. तसेच पूर्वीप्रमाणे दबून न राहता ताठ मानेने वावरतात हेही दिसते. त्यातल्याच काहींच्या या वरिष्ठ जातींतल्या मुली प्रेमात पडतात व खूप विरोधानंतरही त्यातल्या काहींची आंतरजातीय लग्नेही होताना दिसतात. दलितांत जे स्तर पडले आहेत, त्यातील वरच्या स्तराकडेच व आत्मबल आलेल्या कुटुंबांकडेच ही वरिष्ठ जातीची मंडळी पाहतात. जणू सर्वच दलित आमच्या पुढे गेले आहेत व त्याला कारण आरक्षण व सवलती आहेत असा सोयीचा निष्कर्ष काढून मोकळे होतात. वास्तविक राष्ट्रीय वा राज्य स्तरावरची प्रगतीची आकडेवारी पाहिली तर आजही जुनी उतरंड तशीच दिसते. सामाजिक दृष्ट्या जो विभाग ज्या स्तरावर त्याच स्तराची त्याची आर्थिक स्थिती आढळते. आजही आर्थिक बाबतीत आदिवासी तळाला, त्याच्यावर दलित, त्याच्यावर ओबीसी, त्याच्यावर मराठा, जाट, पटेल, राजपूत या मध्यम जाती व त्यांच्यावर ब्राम्हण समकक्ष जाती असाच पिरॅमिड दिसतो. तळच्या श्रेणीतील जातींमधील काही प्रगत कुटुंबे पाहून ती सबंध जात प्रगत झाली असा निष्कर्ष काढल्याने वरच्या श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वा अडचणीत आलेल्या लोकांचा जळफळाट होतो. मुख्यतः याच जातींतील असलेल्या राज्यकर्त्यांचे धोरण, त्रासदायक विषमतेला जन्म देणारा विकासक्रम या बाबींकडे त्यांचे दुर्लक्ष होते. स्वजातीय राज्यकर्त्यांनाही आपल्याकडे हा मोर्चा न वळता सोयीस्करपणे दलितांकडे वळला तर हवेच असते. प्रारंभीची मागणी येते या दलितांचे आरक्षण काढून घ्या व गुणवत्तेवर प्रवेश द्या. पुढच्या टप्प्यात ती होते आरक्षणाला आर्थिक निकष लावा व तिसऱ्या टप्प्यात होते आम्हाला आरक्षण द्या. मराठा, जाट व पटेल या तिन्हींचे बाबतीत हेच टप्पे दिसतात. 

सरकारे या आरक्षणाची ग्वाही देतात. काहीवेळा मंजूर करतात. पण ते न्यायालयात अडकते. मात्र सत्ताधारी पक्ष आम्ही तर दिले होते, न्यायालय देत नाही याला आमचा इलाज नाही. पण आम्ही प्रयत्नरत आहोत असे सांगत राहतात. स्वतःवरचा रोष टाळणे व मतांच्या बेगमीसाठी त्या समाजविभागांना झुलवणे चालू ठेवतात. या समाजविभागांतील राजकीय नेतेही हेच बहाणे करतात. मराठा, जाट व पटेल या तिन्ही विभागांना-विशेषतः त्यातील करिअर करु पाहणाऱ्या युवक-युवतींना हे आरक्षण मिळणे कठीण आहे, हे नीटपणे सांगणे व वास्तव स्वीकारावयास लावणे गरजेचे आहे. पुढील फसगत व त्यातून येणारा उद्रेक टाळायचा असेल तर हे करणे अगदी निकडीचे आहे. 

घटनेच्या १५ व्या कलमाप्रमाणे ज्या विभागासाठी आरक्षण लागू करावयाचे त्याचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध होणे गरजेचे आहे. शैक्षणिक मागासलेपण भले सिद्ध झाले तरी सामाजिक मागासलेपण कसे सिद्ध होणार? हे तिन्ही विभाग सामाजिकदृष्ट्या वरच्या श्रेणीत आहेत. खालच्यांच्या वाट्याला आलेला सामाजिक अवहेलनेचा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. बरे हे दोन्ही मंजूर झाले तरी एकूण राखीव जागांची ५० टक्क्यांची अट आड येणारच. ती शिथिल व्हायची व अपवाद करायचा तर त्या गरजेची निकड म्हणजेच त्या जातीच्या मागासलेपणाची तीव्रता न्यायालय तपासणारच. सार्वजनिक नोकऱ्यांतील समान संधीसाठीचे कलम १६ मागास वर्गांसाठी आरक्षणाला अनुमती देते. हे मागासपण आर्थिकही असू शकते, असा अर्थ काही तज्ज्ञ लावतात. मात्र हा आर्थिक निकष फक्त त्या जातीलाच लागू होणार नाही. तर तो सर्वच जातींना लागू होईल. कारण तो वर्ग आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त मराठ्यांनाच आर्थिक निकषावर नोकऱ्या मिळतील असे नव्हे, तर सर्वच जातींतल्या आर्थिक दुर्बलांना ते लागू होईल. आता इथे अजून एक वांधा आहे. नोकऱ्यांतील आरक्षणाला पात्र होण्यासाठी या वर्गाला त्या नोकरीच्या क्षेत्रात आपले पुरेसे प्रतिनिधीत्व नाही हे सिद्ध करावे लागेल. ही अडथळ्यांची शर्यत मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात राणे कमिटीच्या अहवालापासून फडणवीसांच्या भरघोस आश्वासनापर्यंत अनुभवतो आहोत. मराठ्यांतील काही विभागांना कुणबी म्हणून यापूर्वीच ओबीसी आरक्षण मिळाले आहे. आताही त्याच धर्तीवर मराठ्यांतील काही विभागांना कुणबी म्हणून आरक्षण मिळू शकते, असा काहींचा होरा आहे. एकतर अशी मराठ्याचे कुणबी व्हायची तयारी हवी. समजा ती झाली तरी आजचे कुणबी वा एकूण ओबीसी आपल्यात वाटेकरी होऊ देतील काय? त्यांनी आधीच मोर्चे काढून या शक्यतेला तीव्र विरोध केला आहे. 

धनगरांना महाराष्ट्रात ‘भटका समाज (क)’ या श्रेणीत ३.५ टक्के राखीव जागा आज आहेत. त्यांना आदिवासींत वाटा हवा आहे. त्यासाठीचा अभ्यास सरकार करते आहे. तथापि, आदिवासींतून त्यांच्या अशारीतीने वाटेकरी व्हायला विरोध आहे. 

आरक्षणाच्या लाभाची आजची स्थिती 

ज्यांना आरक्षण लागू आहे, त्या जातींतल्या एका विभागाला जरुर लाभ झाला. त्या व्यक्तींच्या पुढे जाण्याने इतरांना प्रेरणा मिळायलाही मदत झाली. पण त्या सबंध विभागाचे इतरांच्या बरोबरीने येणे अजून झालेले नाही. त्यासाठी त्याला आरक्षणाबरोबरच अन्य सहाय्याचीही गरज आहे. अलीकडे ते अन्य सहाय्य सोडाच असलेले आरक्षणही निरर्थक होत आहे. आरक्षण सरकारी वा निमसरकारी नोकऱ्यांत असते. आज या नोकऱ्याच कमी झाल्या आहेत. तिथे खाजगीकरण-कंत्राटीकरण आले आहे. मराठा आरक्षणाची जोरदार बाजू घेणारे मुख्यमंत्री फडणवीस खुद्द आपल्या कार्यालयात विशेष अधिकाऱ्यांची भरती कंत्राटावर करत आहेत. आज देशात एकूण नोकऱ्यांत केवळ ३ टक्के दलित सामावले गेले आहेत. हे प्रमाण अजून कमी होईल असा तज्ज्ञांचा कयास आहे. ज्या दलितांना राखीव जागांपायी सरकारी जावई म्हणून हिणवले जाते त्यांची ही गत असेल, तर इतरांची काय कथा? मराठा समाजाला समजा उद्या आरक्षण लागू झाले तरी प्रत्यक्षात त्याला किती नोकऱ्या मिळणार आहेत, हे यावरुन स्पष्ट व्हावे. 

खरा उपाय 

याला उपाय परस्परांविरोधी लढणे वा मोर्च्याला प्रतिमोर्च्याने उत्तर देणे वा दुबळ्यांना आपल्या जुन्या सरंजामी खानदानीपणाचा धाक दाखवणे-त्यांच्यावर हल्ले करणे हा नाही. याला उपाय सर्व पीडितांनी एकत्र येऊन आपल्या या स्थितीला कारण सरकारी धोरणे व व्यवस्था बदलण्याचा संघर्ष गतिमान करणे. आरक्षण कशासाठी? तर संसाधनांच्या न्याय्य वाटपासाठी. मग ह्या संसाधनांचा न्याय्य हिस्सा मिळण्यासाठी आरक्षण हा एकच मार्ग आहे का? अर्थातच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी देशातल्या सर्वजातीय भूमिहिनांचा सत्याग्रह छेडला होता. या आंदोलनात लाखो लोक तुरुंगात गेले. भूमिहिनांना जमीन हा संसाधनांच्या न्याय्य वाटपाचाच मुद्दा होता. असे मुद्दे अनेक आहेत. उदा. कामगारांना वाऱ्यावर सोडणारे कंत्राटीकरण, न परवडणारे विनाअनुदानित शिक्षण, घरांचे प्रश्न, सार्वजनिक वाहतूक इ. इ. या सर्व प्रश्नांवर योग्य त्या प्रबोधनाबरोबर व्यापक एकजुटीचे लढेच समाजातील जातीय ताण कमी करतील व परस्पर विश्वास आणि भ्रातृ-भगिनीभाव वाढीस लावतील. 

असलेले आरक्षण अधिक न्याय्य करणे 

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात प्रवेशावेळी एक वेगळी पद्धत वापरली जाते. तेथील १०० टक्के प्रवेशांना दोन निकष लावले जातात. एक लिंगाचा व दुसरा प्रदेशाचा. प्रवेश घेणारी स्त्री असेल तर तिला विशिष्ट जादा गुण दिले जातात. तसेच प्रवेश घेणारी व्यक्ती मागास जिल्ह्यांतील असेल तर तिलाही अधिकचे गुण मिळतात. यामुळेच उच्चवर्णीय असलेल्या तथापि, बिहारच्या मागास जिल्ह्यातून आलेल्या गरीब कन्हैयाला इथे प्रवेश मिळू शकतो. आरक्षित जागांनाही प्रदेश व लिंगाचे हे निकष अतिरिक्तरित्या लागू आहेत. त्यामुळे मुंबईतील दलित विद्यार्थ्याऐवजी चंद्रपूरमधील दलित विद्यार्थ्याला प्रवेश मिळण्याची शक्यता तयार होते. ही पद्धत आणखी सुस्पष्ट व शास्त्रीय करुन सार्वत्रिक करण्याची मागणी करायला हवी. त्यामुळे त्या त्या आरक्षित वर्गातले पुढे गेलेले लोकच ते आरक्षण लाटतात या आरोपाला उत्तर मिळेल तसेच खुल्या वर्गातील गरीब व मागास भागातील विद्यार्थ्यांनाही न्याय मिळण्याची शक्यता वाढेल. सर्व जातीत मुली मागे राहतात, त्यावरही या पद्धतीने उपाय करता येईल. 

आरक्षणाच्या या मुद्द्याची खूपच विस्ताराने चर्चा आपण केली. ती सोपी करण्याच्या प्रयत्नामुळेही हा विस्तार झाला. आरक्षण हा मुद्दाच संवेदनशील आहे. तो एवढ्या चर्चेने संपणार नाही. याउपरही कोणाला काही शंका असल्यास, काही वेगळे म्हणायचे असल्यास वा माझ्या वरील मांडणीत काही दुरुस्ती सुचवायची असल्यास वा काही भर घालायची असल्यास खाली दिलेल्या ईमेल आयडीवर तसे जरुर कळवावे. ही चर्चा अधिक पुढे नेण्यास व नेटकी करण्यास त्याची मदतच होईल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

____________________________ 

राष्ट्र सेवा दल पत्रिका, जाने-फेब्रु २०१८

Saturday, February 10, 2018

निवडणूक व्यवस्थेचे नायक


गांधी-आंबेडकर तणावांची, विशेषत: पुणे करारावेळच्या (१९३२) त्यांच्यातल्या ताणांची सर्वसाधारण कल्पना आपल्याला असते. स्वतंत्र मतदारसंघाला गांधीजींचा कडवा विरोध, डॉ. आंबेडकरांचे ताणून धरणे व अखेर गाधीजींच्या प्राणांतिक उपोषणाने त्या दोघांत झालेल्या समझोत्यानुसार राखीव जागांवर झालेली सहमती, त्यानंतर आजही त्यावर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह.. या साऱ्याशी आपण परिचित असतो. सामाजिक, राजकीय, वैचारिक विश्वांत या ऐतिहासिक व्यक्तींच्या नावे माजणारे रण तर आपला वर्तमानच आहे. मात्र या सगळ्यांत या दोहोंना नक्की काय म्हणायचे होते, त्यांच्यातील मतभेदांच्या मुद्दय़ांची त्यांची समर्थने काय होती, तडजोडीला ते का व कोणत्या बाबींवर तयार झाले याविषयीचे वस्तुनिष्ठ बारकावे आपल्याला ठाऊक असतातच असे नाही. साहजिकच त्यांच्यासंबंधीची मापने बहुधा आपापल्या सामाजिक स्थानांवरून वा जी निवडक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यावरून आपण करत असतो. फार कमी विद्वान आपल्याला या तपशिलांची साद्यंत नोंद देतात. भारतीय प्रशासन सेवेतले उच्चपदस्थ अधिकारी व अभ्यासक राजा सेखर वुंडरू हे त्यांत मोडतात. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘आंबेडकर, गांधी अ‍ॅण्ड पटेल : द मेकिंग ऑफ इंडियाज् इलेक्टोरल सिस्टीम’ या ग्रंथाद्वारे हा सगळा तपशील आपल्यासमोर तत्कालीन संदर्भासह ते उलगडत नेतात.

हा ग्रंथ आहे भारतीय निवडणूक व्यवस्था कशी उत्क्रांत झाली, तिच्या घडणीतले घटक व या घटकांच्या दृष्टीने तिची परिणामकारकता काय याचा ऐतिहासिक पट मांडणारा. अर्थात, यातले मुख्य घटक डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल हे असल्याने त्यांच्या भूमिकांचे विवेचन हा या ग्रंथाचा गाभा राहिला आहे. डॉ. आंबेडकर आणि म. गांधी यांच्याबरोबरच सरदार पटेल हे या घडणीतले एक मुख्य नायक आहेत याची बहुधा आपल्याला कल्पना नसते. या ग्रंथातून सार्वजनिक चर्चाविश्वात फारसे नसलेले पटेलांचे अनेक नवे पैलू आपल्याला समजतात. नवभारताचे सूत्रधार नेहरू या घडणीत तसे जवळपास नाहीत व पटेलांनंतर येतात तेही मर्यादित भूमिकेत, ही नवीन माहिती आपल्याला इथे कळते.

आज आपल्यासमोर असलेली निवडणूक व्यवस्था व तिच्या बऱ्यावाईटपणाबद्दल चर्चा होत असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पिढीला मुद्दामहून तपास केला तरच कळते, की आज आपल्या प्रत्येकाला असलेला प्रौढ मताधिकार एके काळी तसा नव्हता. आपल्यावर ब्रिटिशांचे राज्य होते म्हणून नव्हे, तर जगातील स्वतंत्र व प्रगत देशांतही सरसकट सर्वाना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या देशात- इंग्लंडमध्ये १९२८ साली स्त्रियांना मताधिकार मिळाला, तर अमेरिकेत गौरेतर व स्त्रियांना तो १९६५ साली मिळाला. हे अधिकार या घटकांना आंदोलन करून मिळवावे लागले. या देशांत, तसेच आपल्या देशात ब्रिटिशांनी जी मर्यादित निवडणूक प्रक्रिया सुरू केली त्यात करदाते व जमीनमालक अशा अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच मताधिकार होता. अमेरिकेत गरीब गोऱ्यांनाही तो नव्हता. आपल्याला मात्र तो संविधानाबरोबरच मिळाला.

राजा सेखर वुंडरू यांनी पुस्तकात या बाबींची नोंद घेऊन त्याचे मुख्य श्रेय डॉ. आंबेडकरांना दिले आहे. ते घटनाकार झाले म्हणून नव्हे (वास्तविक घटना समितीत आले तेव्हाही बाबासाहेबांना आपल्यावर घटना लिहिण्याची प्रमुख जबाबदारी येणार याची काहीही कल्पना नव्हती), तर मानवाच्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराची मागणी ते थेट १९१९ सालापासून जमेल त्या व्यासपीठांवरून लावून धरताना दिसतात. डॉ. आंबेडकरांच्या या सर्व प्रयत्नांचा व त्यांच्या मागणीचा तपशीलवार आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ‘एक माणूस जो सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या मागणीने ब्रिटिशांना सतत अडचणीत आणत होता तो म्हणजे डॉ. आंबेडकर’ असे पहिल्याच प्रकरणात लेखकाने नोंदवले आहे. प्रौढ स्त्री-पुरुष, मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे, आर्थिक स्तरातले, शिकलेले- न शिकलेले असोत, त्यांना मताचा अधिकार मिळालाच पाहिजे यासाठी डॉ. आंबेडकरांनी चिवट झुंज दिलेली आहे. १९२८ ला सायमन कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत निरक्षरांना मताचा अधिकार नको म्हणणाऱ्यांच्या विरोधात डॉ. आंबेडकरांनी केलेल्या युक्तिवादाची लेखकाने दिलेली ही नोंद पाहा : ‘मला (डॉ. आंबेडकर) वाटते प्रत्येक माणसाला त्याला काय हवे हे समजण्याइतके शहाणपण असते. साक्षरतेमुळे यात फार काही फरक पडतो असे नव्हे. माणूस निरक्षर असू शकतो; तरीही तो खूप बुद्धिवान असू शकतो.’

पुढे संविधान तयार होतानाही डॉ. आंबेडकरांना ही बाजू लावून धरावी लागत होती. सर्व स्त्री-पुरुषांना प्रौढ मताधिकार मिळाला. पण तो मूलभूत अधिकार म्हणून घटनेत स्वीकारला गेला नाही. विविध कारणांनी तो अडवला गेला. या अडवण्यात वल्लभभाई पटेल मुख्य होते. संस्थाने त्यास नकार देतील, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र अखेर खूप प्रयासाने प्रौढ मताधिकार घटनेत नोंदवला गेला. पण तो मूलभूत अधिकार आजही नाही. त्यामुळेच अलीकडे हरयाणा व राजस्थानात पंचायत निवडणुकांमध्ये शिक्षण व स्वच्छतागृहांची अट लादली जाऊ शकली, याकडे लेखक आपले लक्ष वेधतात.

भारतातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या रेटय़ामुळे राजकीय सुधारणांचे हप्ते देण्यास ब्रिटिशांनी सुरुवात केली. मुस्लीम, शीख, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन आदींसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. डॉ. आंबेडकरांनीही दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. गोलमेज परिषदांत (१९३०-३१) व अन्य पातळ्यांवर तिचा पाठपुरावा केला. गांधीजींनी या मागणीला कडाडून विरोध केला. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे ज्या विभागासाठी तो असेल त्याचाच उमेदवार व तेच मतदान करणारे. अन्य समाजविभागांना तिथे उभे राहण्याचा वा मतदान करण्याचा अधिकार नाही. अस्पृश्यांची उन्नती होण्यासाठी त्यांना राजकीय अधिकार मिळणे आवश्यक आहे व तो अधिकार त्यांनी निवडलेले खास त्यांचे प्रतिनिधी असल्याशिवाय मिळणे कठीण आहे, असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते.

तर गांधीजींना हिंदू समाजात गावोगावी यामुळे उभी फूट पडेल अशी भीती वाटत होती. मुसलमानांना व शिखांना स्वतंत्र मतदारसंघ असायला गांधीजींची हरकत नव्हती. मात्र दलितांना तो अधिकार द्यायला गांधीजी तयार नव्हते. गांधीजींच्या या दुहेरी भूमिकेवर डॉ. आंबेडकरांनी घणाघाती हल्ला चढवला. गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरांची सरशी झाली. ब्रिटिशांनी डॉ. आंबेडकरांची मागणी मान्य केली. तथापि, परस्पर चर्चेतून तडजोडीचा प्रस्ताव आणण्यासही मुभा ठेवली. गांधीजींनी येरवडय़ाला आमरण उपोषण केले. त्या वेळी झालेल्या तडजोडीत दलितांना कोणताही वेगळा अधिकार देण्याच्या विरोधात असलेले गांधीजी व स्वतंत्र मतदारसंघावर अढळ असलेले डॉ. आंबेडकर काही पावले मागे आले व दलितांसाठी संयुक्त मतदारसंघात राखीव जागांवर तडजोड झाली.

या राखीव जागांवरच्या निवडणुकीत मतदानाच्या दोन पायऱ्या होत्या. प्राथमिक पायरीत चार उमेदवार दलितांच्या मतदानातूनच निवडले जाणार व या चार जणांपैकी एक सर्वसाधारण मतदानातून निवडला जाणार. इथे दलितांच्या निवडीचा अधिकार काही प्रमाणात राहील व इतर समाजवर्गही त्यात सहभागी होतील, असा मेळ घातला गेला. परंतु याप्रमाणे झालेल्या १९३७ व १९४६ च्या निवडणुकांतून दलितांचे खरेखुरे प्रतिनिधी निवडून यायला मदत झाली नाही, असे विश्लेषण डॉ. आंबेडकरांनी केले. दलितांनी निवडलेल्या चार उमेदवारांतील सर्वात कमी पसंतीचा उमेदवार सवर्णाच्या बहुमताने निवडून येतो व दलितांनी सर्वाधिक मतांनी प्राथमिक फेरीत निवडलेला उमेदवार पडतो, याची आकडेवारी त्यांनी या विश्लेषणातून मांडली. यासाठी दोन फेऱ्यांची मतदानाची पद्धत बंद करून निवडून येण्यासाठी दलितांची २५ टक्के मते मिळणे अनिवार्य करावे, अशी सूचना डॉ. आंबेडकरांनी गांधीजींना केली. परंतु ही मागल्या दाराने स्वतंत्र मतदारसंघ आणण्याची चाल आहे, असे म्हणून गांधीजींनी ती अमान्य केली. हा सगळा क्रम, दोघांतील संवाद, वर्तमानपत्रांचे तत्कालीन अभिप्राय, आपापल्या बाजू स्पष्ट करण्यासाठीच्या भेटीगाठी यांचे बरेच तपशील लेखकाने दिले आहेत. असे संगतवार तपशील हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाची बाजू सखोलपणे समजायला मदत होते.

पुणे करारावेळी सरदार पटेल येरवडय़ाला गांधीजींबरोबर होते. पण ते या चर्चेत कुठेही सहभागी झाले नाहीत. मात्र १९४६ साली कॅबिनेट मिशनने संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या वेळी पटेलांची भूमिका कळीची राहिली. गांधीहत्येनंतर तर तेच सूत्रधार झाले. संविधान सभेच्या अल्पसंख्याकांसाठीच्या सल्लागार समितीचे ते प्रमुख होते. पुणे करारामुळे माघारी घेतलेला दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा डॉ. आंबेडकर विविध पातळ्यांवर मांडतच होते. तो त्यांनी घटनानिर्मितीच्या प्रक्रियेतही मांडला. मात्र पटेलांनी तो उडवून लावला. त्यांच्या पक्षाचे जे दलित सदस्य या मुद्दय़ाला पाठिंबा देत होते, त्यांनाही त्यांनी गप्प केले. गांधीजींशी डॉ. आंबेडकर ज्या पद्धतीने वागले त्याची चीड पटेलांच्या मनात होती, असे लेखकाचे मत आहे. पटेलांनी मुसलमान, शीख आदी सर्वाचेच स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले. दलितांना स्वतंत्र सोडाच, पण राखीव जागा द्यायलाही त्यांनी नकार दिला. डॉ. आंबेडकरांनी घटना समितीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने व त्यांच्याकरवी घटनेचा मसुदा अंतिम पातळीवर आलेला असल्याने त्यांचे जाणे परवडणारे नव्हते म्हणून पटेल नमले व दलितांना राखीव जागा द्यायला तयार झाले, असा लेखकाचा युक्तिवाद आहे.

घटनेने दिलेल्या राजकीय राखीव जागांचा आजवरचा अनुभव पाहता दलितांना त्यांचे न्याय्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही, असा लेखकाचा निर्वाळा आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या उपायांचा अवलंब करावा लागेल; त्याची सुरुवात दलितांच्या विशिष्ट मतांची अट असलेली राखीव जागेची पद्धत लागू करण्याने होऊ शकते, असे लेखक पुस्तकाच्या शेवटी नमूद करतो.

गांधी, पटेल, काँग्रेस व आंबेडकर यांच्या संबंधांचे आकलन होण्यासाठी लेखक मागचे-पुढचे अनेक संदर्भ या पुस्तकात देतात. बंगालमधून घटना समितीवर डॉ. आंबेडकरांच्या निवडीची प्रक्रिया विस्ताराने सांगितली आहे. परंतु डॉ. आंबेडकरांची घटना समितीवर काँग्रेसच्या साहाय्याने झालेली फेरनिवड, त्यांचे मसुदा समितीचे अध्यक्ष होणे हा एक महत्त्वाचा संदर्भ यात राहून गेलेला आहे. तसेच सायमन कमिशनसमोरच्या साक्षीत स्वतंत्र मतदारसंघाच्या मर्यादा सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या निवेदनाचा उल्लेखही इथे नाही. या त्यांच्या निवेदनाचे व त्यानंतरच्या त्यांच्या बदललेल्या भूमिकेचे नाते उलगडणे त्यामुळे उद्बोधक ठरले असते.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com
___________

‘आंबेडकर, गांधी अ‍ॅण्ड पटेल : द मेकिंग ऑफ इंडियाज् इलेक्टोरल सिस्टीम’

लेखक : राजा सेखर वुंडरू

प्रकाशक : ब्लूम्सबरी

पृष्ठे : १७८, किंमत : ४९९ रुपये
___________

(लोकसत्ता, १० फेब्रुवारी २०१८)

https://www.loksatta.com/athour-mapia-news/ambedkar-gandhi-and-patel-the-making-of-indias-electoral-system-1629545/

Thursday, February 1, 2018

'भीमा-कोरेगाव' …निव्वळ बाकी काय?


२ व ३ जानेवारीच्या मुंबईतील घडामोडींत मी काही प्रमाणात प्रत्यक्ष वा आसपास होतो. पण भीमा-कोरेगाव, शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद यांना इच्छा असूनही घरच्या काही अडचणींमुळे जाऊ शकलो नाही. आमच्या संविधान संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी एक खास बसच केली होती. या आमच्या सहकाऱ्यांनी ३१ डिसेंबरला वढू गावात संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाध्यांना भेट दिली. तिथून एल्गार परिषदेला आले. तिथून काही मुंबईस परतले. तर काही जण दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला भीमा-कोरेगावला गेले. भीमा-कोरेगावला गेलेले प्रत्यक्ष हल्ल्यात सापडले. वढूला आधल्या दिवशी गेलेल्यांना गावात ताण जाणवत होता. पण असे होईल याचा अंदाज आला नाही.

हल्ल्यात सापडलेल्यांचे अनुभव ऐकताना हा हल्ला व्यवस्थित पूर्वतयारीने झालेला होता हे अगदी स्पष्ट होत होते. आमचा एक सहकारी गेली काही वर्षे नियमितपणे १ जानेवारीला तिथे जातो. त्याला हा अनुभव अगदीच अनपेक्षित होता. नेहमी तिथे रस्त्याच्या बाजूला विक्रेते असत. आजूबाजूच्या घरातले लोक पाणी देत. सहकार्य करत. यावेळी मात्र विक्रेते नव्हते. बाजूच्या रस्त्यालगतच्या घरांत लोक नव्हते. अचानक दगडफेक सुरु झाल्यावर गाड्या थांबल्या. ही मंडळी दगडफेक करणाऱ्यांच्या मागे धावली. १८-२० वर्षे वयोगटातली मुले गल्लीतून पळत होती. घराच्या गच्च्यांवर दगड साठवलेत असे यांच्या लक्षात आले. गाड्या तिथेच सोडून हे लोक चालत निघाले. नंतर या सोडलेल्या गाड्यांची तोडफोड झाली. भगवे झेंडे घेऊन तरुण मुलांचे गट ही तोडफोड करत होते. गाड्यांवरचे पंचशीलचे ध्वज काढून त्यांनीच काचा फोडत होते. लोकांना काठ्यांनी बडवत होते. ..या दृश्याचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. तसेच व्हिडिओ क्लिप्सही आहेत.

याची प्रतिक्रिया २ तारखेला राज्यात विविध ठिकाणी उमटली. आंबेडकरी समूहाने दुकाने बंद करणे, रास्ता रोको, रेल रोको वगैरे. त्यात पोलिसांशी झटापट, तोडफोड हेही आले. हे सगळे उत्स्फूर्त होते. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले व दुसऱ्या दिवशी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद झाला. हा बंद बऱ्याच प्रमाणात शांतपणे झाला. पण काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागले.

मुख्यतः चेंबूर-ट्रॉम्बे परिसरातील आम्ही मंडळी या काळात व त्यानंतर वारंवार बसत होतो. आढावा घेत होतो. आपण नक्की काय करायचे ते ठरवत होतो. हे जे ठरले त्याप्रमाणे ज्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या आहेत, पोलिसांच्या मारहाणीत ज्यांना जबर मार बसल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहेत, ज्या तरुण मुलांची मनःस्थिती बिघडली आहे, अशांना भेटून दिलासा देणे, शक्य ते सहाय्य करणे, मिळवून देणे यात हे कार्यकर्ते सध्या व्यग्र आहेत.

२६ नोव्हेंबरच्या देवनार ते चैत्यभूमी संविधान जागर यात्रेच्या क्रमात संयत, सम्यक, व्यापक भूमिका रुजवण्याचा जो बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न आम्ही केला व त्यानंतर पुढील बांधाबांध वस्त्यांत सुरु करण्याच्या खटपटीला लागलो त्याला भीमा-कोरेगावच्या या घडामोडींनी तडाखा बसला आहे. एकतर तरुणांची धरकपकड, कोर्टकचेऱ्या यामुळे त्याबाबत काही करणे, किमान विचारपूस करणे हे आता प्राधान्याचे काम झाले आहे. ‘आपल्या समाजा’ला हे असे वागवले जाते, इतर कोणी मदतीला येत नाही ही भावना सध्या प्रखर आहे. अशावेळी व्यापक एकजुटीचा आमचा प्रचार ऐकायला स्वाभाविकपणे मर्यादा पडत आहेत. त्यात आपण बंद यशस्वी करुन दाखवला, महाराष्ट्र बंद करण्याची आपली ताकद इतरांना यामुळे कळली याचा एक अभिमानही आंबेडकरी समाजमनात उचंबळून आला आहे.

हे खरे आहे की दीर्घ काळाने आंबेडकरी समुदायाला ही आपली ताकद दिसली आहे. गटातटात विखुरले जाणे, स्वतःच्या ताकदीने मिळालेले राजकीय प्रतिनिधीत्व नाही, सत्ताधाऱ्यांनी आपल्यातल्या वरपासून खालपर्यंतच्या नेत्यांना विकत घेणे, मराठा आंदोलनाने आरक्षण व अॅट्रॉसिटी अॅक्टबद्दल प्रश्न उपस्थित करणे, आपल्यावर झालेल्या अत्याचाराला न्याय मिळण्यात दुजाभाव होणे व त्याचवेळी वाढत्या आकांक्षांच्या पूर्तीत आड येणारी तीव्र आर्थिक विषमता आणि या सगळ्यात आपले राजकारण म्हणजे नेमके काय याची स्पष्टता नसणे यामुळे जी असुरक्षितता, विसविशितपणा आला होता त्याला या बंदतून व्यक्त झालेल्या ताकदीने दिलासा मिळाला आहे. आम्हीही काहीतरी आहोत ही भावना आंबेडकरी समुदायाला आजतरी संतोष देणारी आहे.

ज्यांच्या मुलांना पोलिसांनी बेदम मारले, १५ दिवस अटकेत ठेवले त्यातील काही पालकांचा या विजयी भावनेला अपवाद असू शकेल. पण सर्वसाधारण आंबेडकरी समुदायाला आम्हीही कोणी आहोत ही दाखवण्याची संधी मिळाली हे खरे. ज्यांच्या मुलांना मारहाण झाली, अटक झाली त्या आया रडताना पाहणे हे त्रासदायक होते. काहींना नोकऱ्यांचे कॉल आलेले आहेत. काहींचे उच्चशिक्षण सुरु आहे. झाले आहे. ते आपले भविष्य लवकर उजळणार अशा अपेक्षेत होते. केसेस पडल्याने ते एकदम असुरक्षित झाले आहेत.

यावेळी एक बाब फार आश्वासक होती. आंबेडकरी समुदायातून वकिलांची फौज कायदेशीर लढा लढवायला या मुलांच्या मागे उभी राहिली. फुकट. कर्तव्य भावनेने. ज्यांना रुग्णालयात दाखल केले होते व बराच खर्च आला होता, अशांना वस्तीने पैसे उभे करुन सहाय्य केले. याआधीच्या घटनांत हे अटक झालेले, जखमी झालेले कार्यकर्ते एकाकी पडत. कुटुंबीय व जवळचे मित्र यांनाच त्यांचा भार उचलावा लागे. चळवळ, समाज अथवा संघटना यांचे सहाय्य अपवादाने मिळे. समाज आपल्या साथीला आहे ही यावेळची भावना त्यांना नक्की आश्वस्त करणारी आहे. 

जामीन मिळाल्यावर ऑर्थर रोड जेलमधून सुटलेल्या तरुणांचे बाहेर जमलेल्या लोकांनी स्वागत केले. त्यामुळे या तरुणांच्या मुद्रांवर सुटकेचा आनंद व आपण समाजासाठी (जातीसाठी) काही मोठे काम केले अशी भावना झळकत होती. या सुटलेल्या मुलांतील एकजण मात्र या सगळ्यापासून अलिप्त व चिंताक्रांत होता. आमचा तेथे असलेला या कायदेशीर बाबींत सहाय्य करणारा कार्यकर्ता त्या मुलाला व त्याच्या पालकांना भेटला. त्या मुलाला वाटत होते आता माझे करिअर संपले. केसेस पडल्याने मला नोकरी मिळणार नाही. मुलाच्या या मनःस्थितीने पालकही चिंतित होते. आमच्या या कार्यकर्त्यालाही त्या मुलाची मनःस्थिती गंभीर, आपल्या जीवाचे तो काही बरेवाईट करुन घेऊ शकेल अशी वाटली. आपण त्याला त्याच्या घरी जावून भेटावे व त्याच्याशी बोलून त्याला आधार द्यावा, अशी आमच्या या सहकाऱ्याने आम्हाला सूचना केली. आम्ही लगोलग गेलो. वस्तीतले चहाच्या टपरीच्या आकाराचे क्षेत्रफळ असलेले घर. त्यात हे अख्खे कुटुंब राहते. तो सध्या बीएससी करतो आहे. चळवळीचा याआधीचा काहीही अनुभव नाही. आपल्या लोकांच्या एका वस्तीवर इतर लोकांनी हल्ला केला आहे, असा व्हॉट्सअप मेसेज आल्याने मित्रांबरोबर तो तेथे धावला. पालकांच्या मते त्याने काहीही केले नाही. तो उभा होता आणि पोलिसांनी त्याला पकडला. त्याचे वडिल म्हणत होते, याला आम्ही कधी एक फटकाही दिला नाही आणि अशा या मुलाला पोलिसांनी बेदम मारला. कधी घराबाहेर तो राहिला नाही. आणि आता जेलमध्ये १५ दिवस त्याला काढावे लागले. त्याच्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल?

आम्ही समजावले. या केसेसने नोकरी धोक्यात येत नाही. त्या आपण काढून घेण्याचा प्रयत्न करु. आम्ही आमची उदाहरणे दिली. आमच्यावर कशा केसेस पडल्या. आम्ही कसे त्यातून बाहेर निघालो. तू गुन्हेगार नाहीस. चळवळीसाठी आत गेलास वगैरे. तो थोडा हुशारला. घरच्यांनाही बरे वाटले. आमच्या सहकाऱ्याची त्याच्यावर नजर आहे. अशी भेदरलेली मुले अनेक आहेत असे आमच्या अन्य सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. परत कधी असे आंदोलनात उतरायचे नाही, अशा प्रतिक्रिया त्यांच्या आहेत. त्यांना याचरीतीने भेटण्याचा व संपर्कात राहण्याचा प्रयत्न हे सहकारी करत आहेत.

आम्हाला अनेक त्रुटींसहित का होईना एक चळवळीचे-त्यागपूर्वक लढणाऱ्यांचे वातावरण व व्यवस्था परिवर्तनाची दिशा व्यक्त करणारे चर्चाविश्व वस्तीतच मिळाले. आता त्याची पूर्ण बोंब आहे. दिशाहिनतेच्या या वावटळीत या नव्या मुलांचे तारू कसे सावरणार? त्यांना काय दिशा मिळणार? …कठीण आहे. त्यांना सोडवायला पारंपरिक स्वार्थाचे-पैश्याचे राजकारण करणारी विविध पक्षांत असणारी ‘जातीची’ मंडळीही जोरात होती. त्यांचे ऋण या मुलांच्यावर राहणार (त्यापायी त्यांचा वापर होणार) त्याचे काय?

भीमा-कोरेगावचा हल्ला नियोजित होता. पण २ आणि ३ तारखेला जे प्रतिक्रियात्मक आंदोलन झाले ते बिननियोजनाचे व निर्नायकी होते. मी माझ्या पूर्वीच्या वस्तीत ३ तारखेला संध्याकाळी गेलो. त्या भागातल्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांची बैठक चालू होती. एक पोलीस अधिकारीही होते. त्यांच्या बोलण्यावरुन ते बौद्ध होते हे लक्षात आले. त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. त्यांच्या बोलण्यावरुन त्या दिवशी काय घडले त्याचा अंदाज आला. आपण काहीतरी करायला हवे म्हणून जाणती मंडळी जमली. पण तेवढ्यात तरुणांच्या एका गटाने पुढाकार घेतला व तो घोषणा देत रास्ता रोकोसाठी निघाला. ही जाणती मंडळी त्यांच्या मागे. त्या गटाने रास्ता रोको करताना गाड्यांची तोडफोड, पोलिसांवर चालून जाणे असे प्रकार केले. पोलिसांनी मग लाठीमार केला. त्यात म्हाताऱ्या महिलांनाही खाली पडून दुखापत झाली. या पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे होते, तुम्ही शांतपणे रास्ता रोको केला असतात तर आम्ही काही करणार नव्हतो. उलट लोकांचा उद्रेक अशा रीतीने शांत व्हावा असाच आमचा प्रयत्न असतो. पण तुम्ही पोलिसांवरच हात उचललात, तोडफोड केलीत तर आम्हाला केसेस टाकाव्याच लागतात. तो तरुण मुलांचा बेबंद गट तुमच्या नियंत्रणात नसताना तुम्ही त्यांना सोबत करायचीच नव्हती. तो अधिकारी वाचणारा, माहितगार व समजदार होता. त्याने बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या, काळाराम मंदिराच्या आंदोलनाची उदाहरणे दिली. बाबासाहेबांनी कधी आंदोलन नियंत्रणाबाहेर जाऊ दिले नाही. या आंदोलकांवर हल्ले झाले. पण त्यांनी आपल्या अनुयायांना प्रतिहल्ला करु दिला नाही.

२ व ३ तारखेला रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच्यात असे बेबंद गट अनेक ठिकाणी होते. सगळेच तसे नव्हते. पण जे होते त्यांचा व्यवहार अराजकी होता. दुसऱ्या समाजाचे नाव गुंफून गलिच्छ शिव्या वाहणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. त्याने त्या समाजविभागातले लोक संतापले. यावेळचे आपले आंदोलन नक्की कोणाविरोधी आहे याचे डावपेचात्मक तारतम्य न ठेवता सरकार, मराठा समाज, भाजपबरोबर शिवसेना असे ज्याच्याज्याच्याबद्ल मनात राग असेल त्या सर्वांना एकाचवेळी ठोकणे झाले. शिवसेनेची शाखा, बॅनर तोडण्याचा आततायीपणा कशासाठी? त्यातून शिवसैनिक चिडले. त्यांनी यांच्यावर प्रतिहल्ला केला. पण शिवसेनेच्या वरच्या नेतृत्वाने बौद्ध विरुद्ध शिवसेना असे वाढू दिले नाही. भाजपलाच याचा फटका बसला पाहिजे ही समजदारी त्यांनी दाखवली. एका विभागात प्राबल्याने असलेल्या आगरी समाजाची दुकाने-गाड्या फोडल्या गेल्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी चार तारखेला बौद्धांना चोपले. जयभीमवाल्यांना त्यांच्या पद्धतीच्या शिव्या परत केल्या. आता आगरी हे ओबीसी. त्यांच्याविरोधात जाण्यात काय राजकीय शहाणपण होते? तो तणाव एवढा होता की अन्य भागात विजयी मुद्रेत असलेला बौद्ध समाज तिथे असुरक्षित झाला. तिथे राहणाऱ्या आमच्या एका कार्यकर्त्याला आपण बौद्ध आहोत हे कळल्यावर काय होईल या भितीने आपल्या मोटारसायकलवरचे अशोकचक्र ठेवू की नको असा प्रश्न पडल्याचे त्याने आम्हाला मोकळेपणाने सांगितले.

आंबेडकरी याचा अर्थ मुख्यतः बौद्ध. गावात एकटीदुकटी घरे असलेले बौद्ध शहरात मात्र एकगठ्ठा वस्तीत बऱ्या संख्येने असतात. ही संख्या व एकत्र राहण्यामुळे त्यांच्या आंदोलनाची कृती प्रभावी होते. पण हीच बाब गावात शक्य नसते. तेथील बौद्धांना नमते घ्यावे लागते. अन्यथा गावच सोडावे लागते. अन्य अल्प संख्येच्या समूहांना तर शहरातही आपला आवाज उठवता येत नाही. कातकरी समाजावर समजा असा अन्याय झाला असता तर तो महाराष्ट्र बंद करु शकला असता? त्याला पाठिंबा देण्यासाठी बौद्ध समाज ‘समाज’ म्हणून (काही व्यक्ती, संघटना नव्हे) रस्त्यावर उतरला असता? आपल्याहून पीडित असलेल्या या समाजाला आपण आधार द्यायला हवा, ही बाबासाहेबांना अभिप्रेत भावना त्याने दाखवली असती?

संघ, भाजप, मोदी, पेशवाई यांना जोरदार ठोकणारी भाषणे कोणीही करो, बौद्धांच्या सभेत त्याला तुफान प्रतिसाद मिळतो. या सभा शहरात होतात. तिथे बौद्ध मंडळी शेकडो-हजारोंच्या संख्येने जमतात. ही भाषणे करणाऱ्या पुरोगाम्याला त्यामुळे वाटले की आता आपल्याला समाजात व्यापक पाठिंबा मिळतो आहे. आता संघमुक्त भारत आपण लीलया करणार. तर ती फसगत होईल. त्याची व बौद्ध समाजाचीही. या भाषणांना बौद्ध समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा प्रतिसाद मिळणारच. संघपरिवाराला विरोध हे त्याचे ठरले आहे. त्याला पुरोगाम्यांच्या भाषणाने अनुमोदन मिळाले एवढेच. हे विभाग या भाषणांनी नव्या विचाराला प्रवृत्त झाले असे नव्हे. जे समाजघटक अशा विचारांशी सहमत नाहीत किंवा काठावर आहेत, अशांच्यात जाऊन त्यांचे प्रबोधन करण्याचा, त्यांना आपले म्हणणे पटविण्याचा आपला कार्यक्रम व शैली काय राहणार? एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणीने मोदींना ललकारणे व नागपूरात जाऊन आव्हान देण्याचे जाहीर करणे हे कोणाच्या ताकदीवर? ..बौद्धांच्या? …नाही जमणार. अन्य विभाग सहमत व्हायला लागतील. बौद्धांची एकत्रित सभेतली ताकद कितीही मोठी असली तरी संसदीय निवडणुकांत मतदारसंघनिहाय ते अल्पच असतात. बौद्ध वस्तीत सगळे बौद्ध एकत्र झाले तर (तेही कठीण असते) समाजाचा नगरसेवक निवडून येऊ शकेल. पण केवळ बौद्धांच्या ताकदीवर आमदार निवडून येणे कठीण. अन्य समाजविभागांच्या हितसंबंधांची मोट बांधावीच लागते. जिग्नेश मेवाणींना त्यांच्या मतदारसंघात याचा चांगला अनुभव आला आहे.

भीमा-कोरेगाव अन्य समाजाच्या दृष्टीने बौद्धांचे एक तीर्थक्षेत्र होते. प्रत्येक समाजाचे असे असते. त्याला कोणाची आडकाठी नव्हती. १ जानेवारी शौर्यदिन म्हणण्यालाही जाणते व करामतखोर प्रतिगामी वगळता अन्यांना तशी अडचण नव्हती. वढू गावातल्यांनाही नव्हती. भिडे-एकबोटे मंडळींना नक्की होती. त्यांच्या भूमिका, भाषणे पाहता, त्यांच्या संघटनाची रीत पाहता ते या विरोधात खात्रीने होते. पेशवाईला कमी लेखणे त्यांना मंजूर नाही. त्यांनी प्रत्यक्ष कारस्थान काय केले हे कधी उजेडात येईल ठाऊक नाही. पण त्यांच्या या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या भूमिकेने संभाजी महाराजांना कट्टर हिंदुत्ववादाचा मानबिंदू व त्यायोगे वर्णवर्चस्वाचे प्रतीक करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे संभाजी महाराज या मराठ्याचा अंत्यसंस्कार करायला महाराने पुढे येणे या मांडणीला सवर्ण मराठा समाजातून, ओबीसींतून विरोध उभा करणे सोपे झाले. त्यात गेली २ वर्षे मराठा आंदोलनाने (ते कितीही शिस्तबद्ध व शांततामय असले तरी) बौद्धांच्याबद्दल आरक्षण व अॅट्रॉसिटी अॅक्टच्या मुद्द्यांमुळे दुस्वास तयार झाला होता. आमच्या मुलींना जाळ्यात ओढणाऱ्यांचा कोणी ‘सैराट’ केला तर ते अगदीच गैर नाही ही भावना काहींच्यात घट्ट व्हायलाही त्यातून मदत झाली. जी मुले गल्ल्यांतून भीमा-कोरेगावला दगड मारायला पुढे येत होती, त्यांच्या मनात आमच्या बहिणींना पळवणारे, आरक्षणामुळे आमच्या शिक्षणाच्या संधी हिसकावणारे ते हे बौद्ध अशी चीड असायची शक्यता आहे. वढू गावातील गोविंद महार-संभाजी महाराज यांच्या संबंधाचा फलक लावण्यातून जो ताण तयार झाला, त्यातून गोविंद महाराच्या समाधीचे छप्पर तोडणे, त्याविरोधात बौद्धांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टखाली खटले दाखल करणे व त्यापायी संभाजी महाराजांच्या समाधीला भीमा-कोरेगावला १ जानेवारीला जमणाऱ्या बौद्ध मंडळींकडून धोका होऊ शकतो अशी आवई ठोकून त्या दिवशी जमावबंदी करावी असा वढू ग्रामपंचायतीने ठराव पोलिसांना देणे ही तात्कालिक जळती काडी होती. वाळक्या गवताच्या गंजी तर आधीपासूनच साठल्या होत्या. 

बौद्ध, मराठा किंवा ओबीसी वा अन्य कोणी जे निम्न आर्थिक थरात आहेत त्यांचे शिक्षण, नोकरी हे प्रश्न व्यवस्थात्मक आहेत हे त्यांना समजावून सांगण्याची काही खास मोहीम आंबेडकरी वा पुरोगामी चळवळीने घेतली असे झाले नाही. हे यापुढे तरी करावेच लागेल. तोच याच्या शमनाचा टिकाऊ मार्ग आहे. एकबोटे-भिडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण केवळ तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही.

बौद्ध समाजाने आपण जे मांडतो त्याचे अन्य समाजाला अर्थ काय लागतात, याचा विचार करायला हवा. आपले म्हणणे इतरांना पटवावे लागेल. ते त्यांनी स्वतःच समजून बौद्धांशी समजुतदारपणे वागावे अशी अपेक्षा करणे वाजवी नाही. दलित-शूद्रांना नाडणाऱ्या पेशवाईचा अंत करणारा म्हणून शौर्यदिन हे बौद्धांच्या मनात असले तरी अन्य समाजाला (शूद्र असणाऱ्या ओबीसींनाही) ‘तुम्ही इंग्रजांना फितूर झालात’ हा हितशत्रूंनी प्रचारलेला अर्थ अधिक पटतो. हा महारांचा शौर्यदिन आहे-त्यात तुम्हा मांगा-चांभारांचे काय, अशा चकव्यात बौद्धेतर दलितांना अडकवले जाते. नवपेशवाई म्हणताना तुम्हाला आम्हा ब्राम्हणांना कमी लेखायचे असते, असे आजच्या ब्राम्हणांना वाटते. भिडे-एकबोटे किंवा संघपरिवाराचा त्यांच्या भूमिकांचा प्रचार-तोही समाजाच्या सर्व विभागांत, विविध मार्गांनी हा नित्यधर्म आहे. आम्ही प्रसंगाने, तेही केवळ जाहीर सभांत व आमच्यातच बोलतो.

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आपल्या हस्तक्षेपांचा हिशेब कोणत्याही पद्धतीने केला तरी निव्वळ बाकी काय याचे उत्तर तेच येईल. ते प्रांजळपणे स्वीकारण्यातच भले आहे. आपण महाराष्ट्र बंद केला याचा अर्थ महाराष्ट्राला आपला मुद्दा पटला अशा भ्रमात राहू नये. मुद्दा पटवण्याचे तसेच सामायिक प्रश्नांवर आंदोलन उभारण्याचे खास व सतत प्रयास करावे लागतील. या प्रयासांचा अंतिम मुक्काम काय? तर तथागत गौतम बुद्धाच्या ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ या घोषात अपेक्षिलेला, सर्वतऱ्हेचा अन्याय दूर होऊन, परस्परांतील विद्वेष वितळून एक निरामय समाज निर्माण होणे हाच आहे...हे कायम स्मरणात हवे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________________

आंदोलन, फेब्रुवारी २०१८