Wednesday, February 28, 2024

राजभाषेचा वाद


भारतातील राज्यकारभारासाठी इंग्रजांनी इंग्रजीचा वापर केला. ती परभाषा होती. स्वतंत्र भारताच्या राज्यकारभारासाठी भारतीय भाषा कोणती हा प्रश्न स्वातंत्र्याच्या चळवळीत चर्चेत होताच; आता तो संविधान सभेत उभा ठाकला. एन. गोपालस्वामी अय्यंगार या मसुदा समितीच्या सदस्यांनी त्यासंबंधातला दुरुस्ती प्रस्ताव मांडला. अनेक सदस्यांनी पुढे चर्चेत म्हटल्याप्रमाणे काँग्रेस अंतर्गत तसेच अन्य राजकीय प्रवाहांतील मतमतांतरांचा साकल्याने विचार करुन मांडलेला हा ‘तडजोडीचा’ प्रस्ताव होता. तरीही त्यावरुन मोहोळ उठले. १२, १३, १४ सप्टेंबर १९४९ अशी तीन दिवस यावर प्रदीर्घ व घमासान चर्चा चालली. संपर्क-संवादाची सोय, राज्यकारभाराची गरज भागवण्याची तिची क्षमता एवढ्यापुरता हा मुद्दा नव्हता. त्या भाषेची लिपी, ती बोलणाऱ्या समूहाचे संख्यात्मक, प्रादेशिक, धार्मिक वर्चस्व, कोणत्या संस्कृतीचे वहन ती भाषा करते, देशाच्या अस्मितेशी जोडून राजभाषेबरोबरच राष्ट्रभाषेचा दर्जा तिला मिळावा हा आग्रह आणि फाळणीमुळे निर्माण झालेला हिंदू-मुस्लिम दुभंग असे अनेक कळीचे व महत्वाचे संदर्भ या वादळी चर्चेला होते. या लेखाच्या मर्यादेत त्यातील काहींचीच नोंद घेता येईल.

अय्यंगार यांनी मांडलेल्या प्रस्तावातील महत्वाची सूत्रे अशी : देवनागरी लिपीतील हिंदी ही राजभाषा (इंग्रजीत ऑफिशियल लँग्वेज) असेल. तथापि, सध्या वापरात असलेल्या इंग्रजीची जागा हिंदीने पूर्णतः घेईपर्यंत तिच्यासोबतच इंग्रजी अजून १५ वर्षे राहील. राजभाषा म्हणून हिंदीचा देवनागरीत वापर होताना परदेशी व देशांतर्गत व्यवहारातील आकडेमोडीत अडचण येऊ नये म्हणून अंक मात्र आंतरराष्ट्रीय रुपात असतील. आंतरराष्ट्रीय अंकांची ही सुधारित हिंदू-अरेबिक दशमान प्रणाली मुळात भारतीय असल्याने ती परकी मानून तिला दूर लोटता कामा नये, असे तिच्या समर्थकांचे म्हणणे होते. हिंदीचा राज्यात वा भाषा म्हणून अन्यत्र वापर होताना देवनागरी अंक पूर्वीप्रमाणेच वापरात राहतील. वादळी चर्चेनंतर तपशीलातल्या काही मुद्द्यांबाबतच्या दुरुस्त्या स्वीकारल्या गेल्या, तरी ही सूत्रे कायम राहिली.

ज्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या त्यात राज्यकारभाराच्या व्यवस्थेचे बस्तान बसवणारी इंग्रजीच यापुढेही राहावी, संस्कृतप्रचुर हिंदीऐवजी उर्दू-हिंदीचे मिश्रण असलेल्या आणि हिंदी पट्ट्यातल्या अनेक बोलींना सामावणाऱ्या, स्वातंत्र्य चळवळीत सार्वत्रिकपणे वापरात असलेल्या, गांधीजींनी प्रचारलेल्या ‘हिदुस्थानी’ भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा, ती देवनागरी व उर्दू या दोन्ही लिपींत असावी, उत्तर-दक्षिण सर्वत्र अस्तित्व असलेल्या, अनेक भाषांची मातृभाषा गणल्या गेलेल्या संस्कृतलाच राजभाषेचा दर्जा द्यावा आदिंचा समावेश होता.

अस्मितेचा मुद्दा करुन हिंदीची बाजू लावून धरणाऱ्यांत आर. व्ही. धुळेकर होते. ते म्हणतात – “मी म्हणतो हिंदी ही राजभाषा आहे आणि ती राष्ट्रभाषाही आहे. तुमचा देश दुसरा असू शकतो. माझा देश आहे भारतीय राष्ट्र, हिंदी राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदुस्थानी राष्ट्र.” त्यांना इंग्रजीत कारभार ही परभाषेची गुलामी वाटते. सेठ गोविंद दास यांनी नागरी अंक हा देवनागरी लिपीचा अंगभूत भाग असल्याने ते राहिलेच पाहिजेत असा आग्रह धरला. आम्ही सेक्युलर आहोत याचा अर्थ कायमपणे बहुविध संस्कृतीला मान्यता देणे नव्हे, असे स्पष्ट करुन ते विरोधकांना बजावतात - “आम्हाला संपूर्ण देशासाठी एक भाषा, एक लिपी हवी आहे. इथे दोन संस्कृती आहेत असे म्हटले जाणे आम्हाला नको आहे.” त्यांच्या मते राष्ट्रभाषेशिवाय स्वराज अपूर्ण आहे. “उर्दू ही मुस्लिमांबरोबरच अनेक हिंदू लेखकांची भाषा आहे हे कबूल, मात्र तिची प्रेरणा देशाबाहेरची आहे. आम्हा हिंदीच्या समर्थकांना सांप्रदायिक म्हटले जाते; वास्तविक उर्दूचे समर्थक सांप्रदायिक आहेत.” ...अशी बरीच टीका त्यांनी केली. अलगू राय शास्त्रींनी “प्रत्येक प्रांतात हिंदी कळते आणि हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याची आम्ही शपथ घेतली आहे.” असे जाहीर करुन “हिंदी म्हणजे हिंदी. बाकी सर्व बोली त्यातच सामावल्या जातात. अंक हा हिंदीचा अंगभूत भाग. ते देवनागरीतच हवेत.” असे ठासून मांडले.

भाषेला संस्कृतीशी जोडणाऱ्या अस्मितावादी विचारप्रवाहाचा समाचार घेताना काँग्रेस कार्यकारी समितीचा राजभाषेसंबंधीचा ठराव नोंदवून शंकरराव देव म्हणतात – “…यात कुठेही संस्कृती, एकता म्हटलेले नाही. देशाची सामायिक संस्कृती उदयास येण्याच्या मी विरोधात नाही. मात्र ‘एक संस्कृती’ चे धोकादायक परिणाम आहेत. ...आर.एस.एस. चे प्रमुख आणि काही काँग्रेसजन संस्कृतीच्या नावाने आवाहन करतात तेव्हा संस्कृती या शब्दाचा अर्थ कोणी स्पष्ट करत नाहीत. आज त्याचा अर्थ लागतो तो केवळ बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकांवर वर्चस्व. ..आम्हाला ‘संस्कृती’ नको आहे असे नाही. पण तिला आपण ‘सर्वसमावेशक संस्कृती’ असे म्हणायला हवे.” सरदार हुकूम सिंग बहुसंख्याकांच्या व्यवहारावर टीका करताना म्हणतात - “सांप्रदायिकतेची सोयीची व्याख्या केली जाते. बहुसंख्याक जे काही म्हणतात व करतात त्याची लोकशाहीत, किमान भारतात तरी शुद्ध राष्ट्रवादात गणना होते आणि जे काही अल्पसंख्याक बोलतात ती सांप्रदायिकता मानली जाते.”

हिंदी राजभाषा केल्याने हिंदी पट्ट्यातील लोकांचे वर्चस्व वाढणार याबद्दल दक्षिणेकडचे लोक तसेच उत्तरेकडचे बिगर हिंदी प्रांतातले लोक चिंतित होते. गांधीजींच्या आवाहनानुसार दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या मार्फत हिंदीचा दक्षिणेत प्रचार करणाऱ्या दुर्गाबाई देशमुखांनी हिंदी पट्ट्यातल्या लोकांच्या अतिआग्रहाबद्दल नाराजी व्यक्त करुन ‘या लोकांना अन्य प्रांतातील किमान एक भाषा शिकण्याची सक्ती करायला हवी.’ अशी सूचना केली. आम्ही हिंदीची बाजू घेतो म्हणून मद्रास प्रांतात “हिंदी मुर्दाबाद-तामीळ झिंदाबाद; सुब्बराय मुर्दाबाद, राजगोपालाचारी मुर्दाबाद” च्या घोषणा ऐकाव्या लागतात, असे पी. सुब्बराय यांनी नोंदवले. बंगालचे श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणतात – “भारत हा अनेक भाषकांचा देश राहिलेला आहे. आपण भूतकाळ खोदला तर लक्षात येईल एकच भाषा सगळ्यांनी स्वीकारावी हे इथे शक्य झालेले नाही. ‘असा एक दिवस जरुर येईल जेव्हा भारतात एक आणि एकच भाषा असेल’ असे माझे काही मित्र म्हणतात. - स्पष्टच बोलतो. मी त्यांच्या मताशी सहमत नाही.”

मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि पुढे जनसंघाची त्यांनी स्थापना केली. याच जनसंघाचा पुढे भारतीय जनता पक्ष झाला. या पक्षाचे एक प्रमुख नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या काही वर्षांत कधी ‘एक देश-एक भाषा’ असे विधान केले, तर कधी देशातील सर्व लोकांनी ‘इंग्रजीत न बोलता हिंदीत बोलावे’ असे आवाहन केले. त्यांच्या या विधानांवर जोरदार प्रतिक्रिया दक्षिणेतील आणि बिगर हिंदी राज्यांतून आल्या. मुखर्जींच्या बंगालमधील काहींनी ‘हा तर हिंदी साम्राज्यवाद’ असल्याचे म्हटले.

जवाहरलाल नेहरुंनी राजभाषेवरील चर्चेत हस्तक्षेप करताना हिंदी पट्ट्यातील दादागिरीवर कडक टीका केली. ते म्हणाले – “यात मोठ्या प्रमाणात वर्चस्ववादाचा सूर आहे. हिंदी भाषक विभाग हा जणू भारताचा मध्यबिंदू आहे, गुरुत्व केंद्र आहे आणि इतर सर्व परीघावर आहेत, हा यातला खोलवरचा विचार आहे. हा केवळ चुकीचा नव्हे, तर धोकादायक दृष्टिकोन आहे.” ते सल्ला देतात, “मातृभाषा हिंदी नाही अशा विविध प्रांतातील लोकांच्या सद्भावना तुम्ही जिंकायला हव्या.”

सध्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४३ नुसार देवनागरी लिपीतली हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या म्हणजेच राजभाषा आहेत. अनुच्छेद ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली एक किंवा अधिक भाषा त्या राज्याच्या राजभाषा मानल्या जातात. संविधानाच्या आठव्या अनुसूचीत देशातील प्रमुख १४ भाषांची नोंद होती. त्यात भर पडून आता त्यांची संख्या २२ झाली आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे अनेकदा बोलले जाते किंवा काहींची तशी समजूत असते. ते खरे नाही. भारतीय संविधानाने हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेला हा दर्जा दिलेला नाही.

१५ वर्षांनी इंग्रजीचे काय झाले? ती जाऊन हिंदी ही एकमेव राजभाषा म्हणून स्थापित झाली का? राजभाषा अधिनियम १९६३ नुसार ‘१५ वर्षांनंतरही इंग्रजीचा हिंदीसह राजभाषा म्हणून वापर सुरु राहील’ असे जाहीर करण्यात आले. आजही हिंदी सोबत इंग्रजी ही संघराज्याची व्यवहार भाषा आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(चतुःसूत्र, लोकसत्ता, २८ फेब्रुवारी २०२४)

Monday, February 19, 2024

कविता 'कविता' होती- सत्य, सुंदर, मंगलाची आराधना करणारी


कविता चौधरी गेल्याची बातमी आमच्या सहकारी मैत्रिणीने-भारती शर्माने कळवली. धक्का बसला. खूप दुःख झाले. अगदी अनपेक्षित होते हे. म्हणजे मला किंवा आमच्या सहकाऱ्यांना. बातमीत ती अखेरीस हृदयविकाराच्या धक्क्याने गेली तरी कॅन्सरने बराच काळ पीडित होती, हे कळले. ती अशी आजारी आहे, याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती. आधी कळले असते तर तिला भेटता आले असते, याचे शल्य कायमचे राहणार आहे. एरवीही तिच्यासारख्या व्यक्तीचे जाणे दुःखदायकच वाटले असते; पण कोणे एके म्हणजे बत्तीस-तेहत्तीस वर्षांपूर्वी तिचे-आमचे जे नाते तयार झाले होते, त्यामुळे हे दुःख अधिक गहिरे बनले.

बातमी कळली तेव्हा मी बाहेरगावी होतो. तेथील कार्यक्रम कर्तव्य म्हणून करत होतो. पण मन अस्वस्थ होते. एक वेदनेची छाया सतत सोबत करत होती. मध्येच तिच्या आठवणीने आतून कळ येई. आता घरी परतल्यावर व्यक्त होतो आहे. मुख्यतः स्वतःसाठी. वेदनेची लसलस कमी व्हावी म्हणून. हे तिच्याविषयी कमी आणि आमच्याविषयी अधिक असेही होईल. काहीसे ऐसपैस. भावनांच्या हिंदोळ्यावरचे.

कविता चौधरी १९८९ साली दूरदर्शनवर आलेल्या ‘उड़ान’ या तुफान लोकप्रिय झालेल्या मालिकेची लेखिका, दिग्दर्शक आणि त्यातली इन्स्पेक्टर कल्याणीची प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री. त्या आधीच सर्फ च्या जाहिरातीतली ललिताजी म्हणून ती घरोघर परिचित होती. त्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी असल्याने त्यावर येणारे कार्यक्रम हे सर्वांना ठाऊक व्हायचे. ८७-८८ दरम्यान एका कार्यक्रमात मी दिसलो तर केवढी माझी प्रसिद्धी आमच्या वस्तीत झाली होती. स्त्री मुक्ती संघटनेचे ‘हुंडा नको ग बाई’ हे नाटक दूरदर्शनला झाले. आम्ही या नाटकातले कार्यकर्ते कलावंत होतो. उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरुन परतताना सकाळी जळगावला ट्रेन मध्ये चढलेला जवळपास प्रत्येक जण आम्हाला उत्सुकतेने पाहू लागला. रात्रीच्या नाटकातले लोक तुम्हीच का असे काहीजण विचारु लागले. मग आम्हाला कळले की आदल्या रात्री हे नाटक टीव्हीला झाले होते. आम्हाला प्रवासात असल्याने कल्पना नव्हती. आमच्या बाबतीत हे घडत असेल तर उड़ान व कविता चौधरीची काय शान असेल हे आताच्या अनंत वाहिन्या व विविध माध्यमांत धुवांधार न्हाणाऱ्या पिढीला कळणेच शक्य नाही.

छोटी कल्याणी पिंजऱ्याची झडप उघडते आणि आतला पोपट बाहेर पडून मोकळ्या आकाशात भरारी घेतो. त्याकडे हर्षोल्हसित नजरेने मान वर करुन पाहणाऱ्या कल्याणीच्या डोळ्यांतील उड्डाण हजारो-करोडो मुलींना मुक्त अवकाशात झेपावयाचे नवे स्वप्न, अदम्य प्रेरणा देऊन गेले.

एक पोलीस इन्स्पेक्टर बाई आमच्या कामगार नेता असलेल्या मित्राला-मिलिंद रानडेला चार वर्षांपूर्वी कुठच्या तरी आंदोलनावेळी भेटल्या होत्या. त्यावेळी झालेल्या बोलण्यात उड़ान मुळे प्रेरित होऊन त्या पोलिसात आल्याचे त्या म्हणाल्या. आता कविता गेल्याचे कळल्यावर तिचा मिलिंदशी संबंध होता हे ठाऊक असल्याने या पोलीस इन्स्पेक्टर बाईंनी मिलिंदचा फोन नंबर मिल्स स्पेशलच्या सहाय्याने मिळवून त्याला फोन केला. कविता गेल्यावर ज्या काही पोस्ट फेसबुकवर आल्या त्यात काहींनी आपण ७-८ वर्षांचे असताना या मालिकेचा प्रभाव कसा पडला, विशेषतः त्यातील पिंजऱ्यातून मुक्त होऊन झेपावताना छोट्या कल्याणीचे डोळे कसे प्रेरक ठरले हे आवर्जून नोंदवले आहे.

अशी ही ‘उड़ान’ मालिका पाहून आमचे गुरु भाऊ फाटक यांनी कविता चौधरीला पत्र लिहिले. भाऊ स्वातंत्र्य सैनिक, लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते, शिक्षक चळवळीतले नेते, माजी शिक्षक आमदार. मार्क्सवादी भाऊ फाटक साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातल्या, खरं म्हणजे समाजाच्या सर्वांगांत घडत असलेल्या उन्नत-उदात्त अंकुरांचा वेध घेत असत. त्यांच्याशी संपर्क-संवाद साधायचा प्रयत्न करत असत. आणि आम्हाला त्याच्याशी जोडून द्यायची खटपट करत असत. भारत आणि जगातील सगळ्याच प्राचीन-अर्वाचीन प्रगतीशील परंपरांतून योग्य तो बोध आणि त्यांचा उचित आदर राखण्याचा संस्कार भाऊ आमच्यावर करत असत. अभ्यास मंडळांत बुद्ध, येशू, ज्ञानेश्वर, गांधीजी, नेहरु, साने गुरुजी, खांडेकर अशा अनेकांच्या शिकवणीचे, साहित्याचे संदर्भ देताना, त्यांच्या जीवनातील उदात्त प्रसंग कथन करताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. आम्हालाही गहिवरुन येई. मन उन्नत होत असे. सगळ्यांशीच आपण पूर्णतः सहमत नसू. पण तरीही त्यांनी समाजाला पुढे न्यायचा केलेला प्रयत्न त्यांच्या परीने मनापासून होता आणि त्यांच्या काळाच्या मर्यादेत तो समाजाची धारणा करणाराच होता, हे आपण नीट ध्यानात घ्यायला हवे, हे सूत्र भाऊ आमच्या मनावर बिंबवत असत. आजवरच्या तत्त्वज्ञान्यांनी केवळ जगाचा अर्थ लावला आणि जग बदलण्याचा मुद्दा केवळ मार्क्सनेच लक्षात आणून दिला (आणि म्हणून जग बदलण्याचा मक्ता केवळ मार्क्सवाद्यांकडेच आहे) हा भाऊंना अहंभाव वाटे. ज्या भांडवलशाही, साम्राज्यवादाच्या काळात मार्क्स जन्माला आला त्या काळातले विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थविचार यांचे परिशीलन करुन समाजविकासाच्या मापनाचे आणि प्रगतीशील लढ्यासाठीच्या आयुधांचे शास्त्र, दृष्टी मार्क्सने दिली याबद्दल मात्र त्यांची खात्री होती.

प्रसिद्धीच्या झोतात व लोकप्रियतेत बऱ्याच उंचीवर असलेल्या कविता चौधरीला अशी शेकडो पत्रे येत असताना, ती भाऊंच्या पत्राची दखल घेईल का, ही तशी शंकाच होती. तिचे कार्यक्षेत्र आणि तिची वाढ झाली ते ठिकाण लक्षात घेता भाऊंचा परिचय आणि आम्हाला वाटणारी त्यांची थोरवी तिला ठाऊक असण्याचा संभव नव्हता. पण भाऊंची ही भूमिका आणि मुख्य म्हणजे त्यांची वृत्ती पत्रातून कविताला भावली. तिने भाऊंना प्रतिसाद दिला. ती भाऊंना भेटायला आली. पुढे येतच राहिली. भाऊंशी एकप्रकारे पितृत्वाच्या भावनेने ती जोडली गेली.

भाऊंचे अस्तित्व काही एकट्याचे नव्हते. आम्ही सगळे त्यांच्या अस्तित्वाचा भाग होतो. कविताशी आम्ही जोडले गेलो. आम्ही पंचविशी-सत्ताविशीतले तर कविता बत्तीशीतली असावी. हा वयोगट एकूण तरुण म्हणून गणला जाणारा. आम्ही महिला, कष्टकरी, दलित समूहांत चळवळी करणारे लोक. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रांत रुची असणारे आमच्यात काही जण होते. तरीही कविताच्या सिनेक्षेत्राशी, त्यातील लेखन वा सर्जनशीलतेशी आमचा काहीही संबंध नव्हता. कविता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, एफटीआय मधून शिकलेली. अनुपम खेर, सतीश कौशिक तिचे सहाध्यायी. एकदा तिने तिच्या घरी आम्ही गेलो असताना आमच्या आधी तिला भेटायला आलेल्या सतीश कौशिकची ओळख करुन दिली होती. कविता विचारांनी, भावनांनी आमच्याशी जोडली गेली तरी आमच्या तळच्या विभागांतील कामांशी तिचा संबंध नव्हता. भाऊंशी संबंधित आलेला कोणी केवळ चर्चा-संवादापुरता राहत नसे. भाऊंचाही चर्चा-संवादाचा हेतू हा प्रत्यक्ष कामाशी जोडून घेणे किंवा नवे काम तयार करणे हाच असे. कविताच्या क्षेत्रात आम्ही काही करावे हा मुद्दाच नव्हता. मात्र आमच्या काही चळवळींत ती सहभागी होऊ लागली.

रामजन्मभूमीच्या आंदोलनाने जोर पकडला होता. ‘मंदिर वहीं बनायेंगे’ चे नारे बुलंद होत होते. सामाजिक सलोखा बिघडू नये, चर्चेने हा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही सह्यांची मोहीम सुरु केली होती. ‘मंदिर बनाओ-पर मस्जिद ना तोड़ो; सवाल सुलझाने के लिए चर्चा करो; चर्चा से हल नही निकला तो न्यायालय का निर्णय मानो; दोनो तरफ की धर्मांधता का हम विरोध करते हैं; देश की एकता अखंड रखनेका संकल्प दोहराते हैं.’ या मसुद्यावर आम्ही लोकांच्या सह्या घेत होतो. स्टेशनच्या बाहेर, चौकांत उभे राहून गाणी, घोषणा व भाषणे देऊन लोकांना आम्ही सह्या करण्याचे आवाहन करत असू. या मोहिमेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असे. मंदिराच्या बाजूने पण हिंसेच्या विरोधातले हिंदू सह्या करायला पुढे येत असत. मुस्लिम तर पाठिंबा देतच. या कार्यक्रमांना कविता येऊ लागली.

पण तिची लोकप्रियता अडचणीची व्हायला लागली. तिला पाहायला लोक लोटत असत. तिच्याशी बोलायला, तिला आपल्याकडे बोलवायला धडपडत असत. एकदा कुर्ला स्टेशनबाहेरील कार्यक्रमानंतर एका चाळीत लोकांच्या आग्रहाखातर ती गेलीही. आम्ही सोबत होतो. लोकांचे तिच्यावरचे प्रेम आणि तिची ऋजुता यांचा मनोहारी संगम तिथे पाहायला मिळाला.

आमच्या चेंबूर लोखंडे मार्गावरील वस्तीतल्या घरीही ती एकदा आली. सुवर्णाने केलेले पोहे तिला खूप आवडले होते. मिलिंद सोबत होता. माझे लग्न आंतरजातीय. बायको सवर्ण. मध्यमवर्गातली. तिच्या मित्रमैत्रिणी तसेच चळवळीतले संबंध यांमुळे आमच्या घरी वरच्या थरातल्या लोकांची ये-जा हे आमच्या गल्लीतल्या लोकांना नवे नव्हते. पण साक्षात कविता चौधरी म्हणजे भलताच प्रकार होता. तिच्या दर्शनाला सगळ्या मार्गावर लोक घरातून बाहेर पडून उभे. मला काहीसे ओशाळल्यासारखे झाले. आपली प्रतिमा उजळायला हिरो-हिरॉईनसोबत काही लोक जवळीक दाखवतात, तसे काहीसे आपले होते आहे, असे वाटले.

तिच्या या लोकप्रियतेपायी कार्यक्रमाचा किंवा आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला पडू नये आणि तिलाही त्रास होऊ नये, म्हणून बुरखा घालून ती काही ठिकाणी येऊ लागली. मला आठवते स्त्री मुक्ती संघटनेतर्फे पालीला काढलेल्या एका मोर्च्यात नीला लिमयेसोबत ती अशीच बुरखा घालून गेली होती.

वर उल्लेख केलेल्या मंदिर-मशीद प्रश्न सलोख्याने सुटावा यासाठीच्या सह्यांच्या मोहिमेने लोकशाहीवादी शक्तींच्या एकजुटीला चालना दिली. या सर्वांची मिळून ‘राष्ट्रीय एकता समिती’ तयार झाली. तिने प्रचंड मोठा मोर्चा ४ डिसेंबर १९९२ ला आझाद मैदान ते डिलाईल रोड असा उलटा काढला होता. धर्मांध शक्तींना विरोध व सलोखा राखला जाण्याचे आवाहन करणारा हा मोर्चा हिंदू-मुस्लिम वस्त्यांतून गेला. फारुख शेख राष्ट्रीय एकता समितीच्या या बैठकांना अनेकदा आला आहे. कधी कोपऱ्यात बसला, कधी बोलला. अत्यंत निगर्वी, समाजात सलोखा नांदावा यासाठी मनापासून इच्छा व शक्य ते प्रयत्न करणाऱ्यांतला फारुख शेख. मागे त्याच्या निधनानंतर मी त्याबद्दल लिहिले होते. कविता या बैठकांना असे. पुढे मशीद कोसळवली गेल्यावर दंगली झाल्या. आम्ही धारावीत शांततेचे आणि दंगलपीडितांच्या पुनर्वसनाच्या कामात व्यग्र झालो. या कामात कविता चौधरी सहभागी असे. भीम रास्करने त्याचा उल्लेख आपल्या फेसबुक पोस्टवर कविता गेल्यावर केला आहे.

ती मुंबईला कशी आली वगैरे बोलताना एकदा ती दिल्ली किंवा उत्तरेकडेच्या अन्य शहरांच्या तुलनेत स्त्रियांच्या बाबत मुंबई खूप सुरक्षित वाटते असे म्हणाली.

एक गमतीचा प्रसंग आठवला. कविताने आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलावले. अगदी आग्रहाने. आम्ही आठ-नऊ जण असू. तिच्या घरी जेवण बनवायला महाराज. ते फुलके बनवत. कविता वाढे. एक फुलका म्हणजे आमचा एक घास. दुसऱ्या फुलक्याची प्रतीक्षा करावी लागे. कविता यजमान. ती सोडून आम्ही सगळे एकदम जेवायला बसलो होतो. आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. ‘भरपूर खा, पण पुन्हा मागू नको’ अशी अवस्था झालेली. आता काय केले आठवत नाही. हळूहळू खाल्ले किंवा थांबून वाट पाहिली. काही का असेना. आम्हाला घरी बोलावून जेवू घालण्याची कविताची इच्छा आम्ही अखेर पूर्ण केली.

कविताचे सस्मित, मृदू बोलणे हे तात्विक कवितेसारखेच असे. पण दुर्बोध, अगम्य नव्हे. तिचे डोळे आणि वाणी यांतून भावना झरत असत नि थेट आपल्या अंतरात उतरत असत. सत्य, सुंदर, मंगलाची ती नित्य आराधनाच असे. त्यातून जागवल्या जाणाऱ्या संवेदना विश्वाचे आर्त मनी प्रगटवणाऱ्या, अफाट करुणेचे अवगाहन करणाऱ्या होत्या.

हे प्रत्यक्ष तसेच पडद्यावरही. उड़ानच्या व्हिडिओ कॅसेट मिळवून आम्ही एकत्र पाहू लागलो. चळवळीतल्या इतर सोबत्यांना दाखवू लागलो. शिबिरांत त्याचे शो लावू लागलो. यातला प्रत्येक भाग आणि त्यातील संवाद हे मूल्यभान देणारे आहेत. वृत्ती नितळ, निकोप करणारे आहेत. त्यातली कित्येक विधाने तर कविताच आहेत.

त्यातले बारीक तपशील वा शब्द जसेच्या तसे मला आता आठवत नाहीत. पण मुख्य सूत्र मनावर कोरले गेले आहे.

कल्याणी आणि तिचे वडिल हातात हात घालून धावत आहेत. मुलगी म्हणते- “बाबा, इसी तरह हात पकड़कर दौडे़ंगे, तो हममें से कोई आगे कैसे जाएगा?”

बाबा म्हणतो- “जो मजा साथ दौड़ने में है, वो आगे निकलने में कहाँ?”

आणखी एका प्रसंगात तिचे कवितेसारखे निवेदन आहे – “मेरा हाल मेरा कहाँ है, वो जुड़ा है इस व्यवस्था से. वो बदलेगा तभी, जब हाल बदलेगा व्यवस्था का.”

उड़ान ही अख्खी मालिका अशा विचार व वृत्तीची मशागत करणाऱ्या संवाद, निवेदन व प्रसंगांनी भरलेली आहे. त्यातल्या निवडक क्लिप्स एकत्र करुन तासाभराची एक संक्षिप्त आवृत्ती करता आली तर ती विविध ठिकाणी शिबिरांत वापरता येईल तसेच यू ट्यूब व अन्य माध्यमांतून प्रसारित करता येईल. सम्यक समाजमन घडवण्याचा तो ऐवज होईल आणि कविता चौधरीची तिच्या विचार-भूमिकांसह स्मृती जपता येईल.

कविता गेल्यावर अश्विनीला (आमची सहकारी मैत्रिण) मेसेज केला – कविताची कविता पाठव. अश्विनी निगुतीने अशा बाबी सांभाळते. तिच्या सुंदर हस्ताक्षरात तिने कविताची ‘उड़ान’ ही कविताच पाठवली. (भीमने अश्विनीच्या हस्ताक्षरातली संपूर्ण कविता फेसबुकवर टाकली आहे.) या कवितेतले काही अंश खाली देत आहे –

‘जैसे पैदा होना, मरना, ब्याह इन सबका एक दिन आता है

वैसेही सोचनेवाले की जिंदगी में वह एक दिन आता है,

जब वो पूछ बैठता है खुदसे -

कितना समय दिया मैंने अपनी ख्वाईशों और कमजोरियों को

और कितना आया मेरे समाज के हिस्से...

सबसे बड़ी लड़ाई तो यही है,

सबसे बड़ी जित भी यही, मुक्ती भी, उड़ान भी

जब मैं अपने छोटे से 'मै' से मुक्त होकर

घुलमिल जाऊँगा सब में, और समझ जाऊंगा की -

यह भी मै और और वह भी मै, और इन सबों में बसा मेरा खुदा...

तब क्या आसमान खुद चलकर मेरे घर ना बस जाएगा?’

तिचा व भाऊंचा आणि मग आमचा स्नेह जमला तो या सामायिक भूमिका व वृत्तीमुळे. व्यक्ती समष्टीचा घटक आहे. समष्टी अथवा समाजातील प्रत्येकजण माझा अंश आहे. आम्ही सारे परस्परावलंबी आहोत. माझे सुख-दुःख इतरांच्या सुख-दुःखाशी निगडित आहे. हा समाज सुखी होणे म्हणजे मी सुखी होणे ही भूमिका आमची समान होती. दुसरे म्हणजे ‘मी’ पणातून मुक्त होण्याची वृत्ती. भाऊ याबद्दल टाकीला घाव घालावेत तसे आमच्यावर घालत असत.

एक इच्छा तेव्हा आणि आमचा संपर्क कमी किंवा थांबल्यानंतरही होती ती म्हणजे – तिला समजून घेणारा जोडीदार मिळावा. उड़ान मधले पडद्यावरचे शेखर कपूर आणि तिचे उमलणारे नाते मोहून टाकणारे आहे. असे नाते प्रत्यक्ष तिच्या जीवनात अवतरावे, असे सतत वाटे.

तिच्या थरातले आम्ही नव्हतो. तिच्या क्षेत्रात आमचा वावर नव्हता. त्यामुळे इच्छेपलीकडे काहीच करु शकत नव्हतो. दुसरे म्हणजे अगदी रास्तपणे वैयक्तिक नात्यात वा तिच्या क्षेत्रातील व्यावसायिक व्यवहारांत तिची तडजोडीची तयारी नव्हती. ती करणे म्हणजे ती न उरणे असेच होते.

यामुळेच उड़ाननंतर तशी भरारी मारण्याची संधी तिला मिळाली नाही. वैयक्तिक नात्याचेही तसेच असावे. एका मर्यादेनंतर तिचा आणि आमचा सामायिक दुवा फारसा राहिला नाही. तो विरत गेला. (स्त्री मुक्ती संघटना व ज्योती म्हापसेकरांशी तिचे संबंध बराच काळ होते. शेवटच्या काळात त्यांचाही संपर्क नव्हता, असे त्यांच्याशी बोलताना कळले.) हा संबंध विरत गेला, थांबला तरी ती कायम आमच्या जाणिवांत होती. कोणतेही मतभेद किंवा भौगोलिक अंतर असे काहीही कारण नव्हते. तिचा अवकाश तिला हवा. आपल्या अवकाशात ती फार काळ वावरु शकणार नाही, हे कळत होते.

भारतीकडून ती गेल्याचा मेसेज आल्यावर मला धक्का बसला, आपण तिला एकदा भेटायला हवे होते. ते राहून गेल्याची चुटपूट कायम राहील, अशी प्रतिक्रिया मी दिली. त्यावर भारतीचा मेसेज आला – ‘खूपच वाईट वाटले,एखादी जवळची व्यक्ती अचानक निघून जावी न भेटता बोलता...इतकी वर्षे काही संपर्क नव्हता, अश्विनी ने प्रयत्न केले होते बरेचदा,पण काही पत्ता लागला नाही. आपल्या बाजूने जिव्हाळ्याचं नातं होतं, तिच्या मनाचा मात्र थांगपत्ता लागला नाही.’

आता तो लागणारही नाही. प्रौढ समंजसपणाने आम्हीही संपर्क कमी केला, हे योग्यच होते असे मला वाटते. भाऊ गेल्यावर तर तो थांबलाच.

त्यामुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींचे वर्तमान आम्हाला ठाऊक नव्हते. ती मुंबईतच आहे, असे मी गृहीत धरुन होतो. प्रत्यक्षात तिच्या मूळ गावी अमृतसरला सध्या ती होती. तिथेच ती गेली. ती आजारी होती, हेही ठाऊक नव्हते.

ती गेल्यावर तिच्याविषयी काही मिळते का, तिने स्वतः काही म्हटल्याचे सापडते का ते गूगल करुन शोधले. फार काही मिळाले नाही. एक-दोन सिरियल्स तिने केल्याचे कळले. मात्र त्याविषयीच्या एका मुलाखतीत तिने म्हटले ते तीच कविता अजूनही ताजी आहे, याचा पुरावाच आहे. ती म्हणते -

“आज प्रोग्राम मशीनी हो गये हैं. टेक्निकली विकास हुआ है. उनमें ग्लैमर आ गया है. पहले धारावाहिकों का एक स्तर होता था. लेकिन आज सब कमर्शियल हो चुके हैं. लेकिन मैं इस दौड़ में शामिल नहीं हूं.”

...प्रगतीच्या, यशाच्या प्रचलित निकषांच्या स्पर्धेत ती आम्हाला तीन दशकांपूर्वी भेटली तेव्हाही नव्हती आणि हे जग सोडतानाही नव्हती हे आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. आम्ही तिचे होतो की नव्हतो हा संदर्भ आता संपला आहे. पण ती आमची होती. शेवटीही होती तशीच होती हे अभिमानाने स्मरणात राहील.

अश्विनीने पाठवलेल्या तिच्या कवितेच्या पुढच्या काही ओळी देऊन हे दीर्घ व्यक्त होणे थांबवतो.

‘…पर वहाँ तक पहुँचने के लिए

पहले तो मीलों मील चलना है मुझे,

पकना है, और पकना है,

बीच में ना सुस्ताना है,

तारीफों की सराई में

ना मोझिम होना है, मेरी तरफ उठी किसी उंगली से...

उड़ना है मुझे वहाँ तक.

मेरे बाबा के कहे आसमान तक

तसल्ली तो यह है कि हर एक तेज रौं के साथ,

थोड़ी दूर तो चल पायी हूँ मै

...क्या यह कम है प्रेरणा के लिए?’

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com