Sunday, May 16, 2021

राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोह


‘भारताचा शोध’ या पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ नावाची मालिका बऱ्याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर झाली. आता ती यूट्यूबवर उपलब्ध आहे. मालिकेच्या पहिल्या भागात बैलगाडीतून एका गावात नेहरु सभेला चालल्याचा प्रसंग आहे. गाडीसोबतचा जमाव ‘भारतमाता की जय’ तसेच ‘पंडित नेहरु झिंदाबाद’ अशा घोषणा देत आहे. नंतर सभा सुरु होते. सभेत बोलताना नेहरु लोकांना प्रश्न विचारतात- “क्या हमारे पहाड़, नदियां, जंगल, जमीन, वन संपदा, खनिज... यही भारत माता है?” पुढे तेच त्याचे उत्तर देतात – “आप भारत माता की जय का नारा लगाते हैं तो आप हमारे प्राकृतिक संसाधनों की जय ही करते हैं. हिन्दुस्तान एक ख़ूबसूरत औरत नहीं है. नंगे किसान हिन्दुस्तान हैं. वे न तो ख़ूबसूरत हैं, न देखने में अच्छे हैं- क्योंकि ग़रीबी अच्छी चीज़ नहीं है, वह बुरी चीज़ है. इसलिए जब आप 'भारतमाता' की जय कहते हैं- तो याद रखिए कि भारत क्या है..”
भारतमातेच्या मुक्तीचा संग्राम चालू असतानाचा हा काळ आहे. भारतमातेच्या अभिमानाने लोक भारावून गेलेले आहेत. लढ्यासाठी एवढे पुरेसे होते. मात्र नेहरु तिथे थांबत नाहीत. भारतमातेचा म्हणजेच राष्ट्राचा खरा अर्थ ते या महासंग्रामावेळीच सांगत आहेत. एखादे राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमांच्या आतला विशिष्ट भूप्रदेश नव्हे. तसेच हा भूप्रदेश मुक्त करणे यातच आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे सार्थक नाही. तर या भूप्रदेशावर राहणारी माणसे, त्यांच्या आकांक्षा म्हणजे राष्ट्र. भूप्रदेश मुक्त तर करावा लागेलच. पण त्यावरील माणसांचे दारिद्र्य, त्यांच्यातील विषमता दूर करुन एक न्याय्य, समतेच्या पातळीवरचा समाज घडवणे हे या मुक्तिसंग्रामाचे महत्वाचे उद्दिष्ट असणार आहे. तरच ते राष्ट्र सुंदर होईल. भारतमाता म्हणजे काय, ती सुंदर कशी होईल याचे खूपच प्रभावी निरुपण या प्रसंगातून होते.
राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नाही, परस्परांत बंधुता-भगिनीभाव व भविष्याविषयीच्या सामायिक आकांक्षा असलेल्या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र असते, हे आपण पाहिले. मग राष्ट्रवाद म्हणजे काय?..तर या आकांक्षांच्या पूर्ततेसाठीचा विचार, भूमिका यांना राष्ट्रवाद म्हणतात. तो संकुचित असू शकतो, तसेच व्यापक असू शकतो. हिटलरने जर्मन आर्यवंश हाच शुद्ध मानववंश असून तोच जगावर राज्य करायला लायक आहे, असा आक्रमक राष्ट्रवाद जोपासला. या राष्ट्रवादाला अखेर पराभव पत्करावा लागला. पण जर्मनीतील ज्यूंना आणि जगालाही त्याचे प्रचंड भोग भोगावे लागले. भारताचा राष्ट्रवाद व्यापक राहिला आहे. आपण केवळ आपल्यापुरता विचार केला नाही. देश मुक्त होण्याआधीच आपल्यासारख्या पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना एकत्र करुन त्यांची अलिप्त राष्ट्रांची संघटना तयार करण्यात नेहरुंनी पुढाकार घेतला. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे भारताचे प्राचीन काळापासूनचे सूत्र आहे. आधुनिक काळात विनोबा भावेंनी ‘जय जगत’ हा नारा दिला. ‘जय हिंद’ बरोबरच ‘जय जगत’ ही आपल्या देशाची भूमिका आहे.
मग आपल्याला अमूल्या नावाच्या एका १९ वर्षांच्या मुलीने ओवेसींच्या बंगलोरच्या सभेत पाकिस्तान तसेच अन्य देशांच्या झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा त्रास का व्हावा? तिला पोलिसांनी अटक करुन तिच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ‘जग जगत’ म्हणण्यास आपली हरकत नसते. पण पाकिस्तान झिंदाबाद हा आपल्याला आपल्या राष्ट्राशी केलेला द्रोह वाटतो. पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही.
समाजाची मानसिकता, सत्ताधाऱ्यांची भूमिका यांमुळे पोलीस अटकेची कारवाई करतात. पण न्यायालयात हे राजद्रोहाचे खटले सहसा टिकत नाहीत. कारण आपल्या संविधानाने कलम १९ द्वारे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. कलम २१ मध्येही व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. ही कलमे तयार करताना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळींतून उत्क्रांत झालेली वैचारिक भूमिका घटना तयार करणाऱ्यांच्या मनात होती. संविधान सभेतील चर्चांमधून ती व्यक्त होते. न्यायालयांनी कलमांबरोबरच या चर्चांचाही आधार घेतलेला आहे. केरळमधील जेनोआ विटनेसेस पंथाच्या मुलांनी शाळेत राष्ट्रगीत म्हटले नाही, म्हणून त्यांना शाळेतून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने १९८६ साली या मुलांच्या बाजूने खटल्याचा निकाल दिला. तो देताना न्यायालय म्हणते –‘राष्ट्रगीत न म्हणता शांत राहणे याने कोणत्याही कायद्याचे हनन होत नाही…आपली परंपरा सहिष्णुता शिकवते. आपले संविधान सहिष्णुता प्रचारते. आपण ती पातळ करुया नको.'
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ही राष्ट्राची अभिमानाची प्रतीके आहेत. त्यांचा यथोचित मान राखला पाहिजे. त्यासाठी कायदेही झाले आहेत. पण तीच महत्वाची मानणे आणि त्यामागील विचारांचा विसर पडणे हे घातक आहे. आपण ‘भारतमाता की जय’ म्हणू, इतरांना म्हणायला जबरदस्ती करु, जे म्हणणार नाहीत त्यांना मारहाण करु; पण त्या भारतमातेच्या मुलांना भोगावे लागणारे दैन्य, विषमता संपवून त्यांचे खरोखरी बंधुता, मैत्री व परस्पर विश्वासावर आधारलेले नाते तयार करणे हा आपल्या राष्ट्रवादाचा हेतू आपण गमावून बसू.
१९७२ चा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता. त्याचवेळी दलितांवरील अत्याचारही वाढले होते. त्या विरोधात दलित पँथरने आंदोलन छेडले होते. ज्या देशात आमच्यावर अनन्वित अत्याचार होतात, तो देश आम्ही आमचा कसा मानावा, हा त्यांचा सवाल होता. कविता, लेख, भाषणांतून राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्हे यांना आव्हान दिले जात होते. त्यावेळच्या एका कवितेत पँथरचे एक नेते व प्रतिभावान कवी नामदेव ढसाळ म्हणतात- ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे?...कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा?' दुसरे एक नेते राजा ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या स्वातंत्र्य दिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्तच्या विशेषांकात 'काळा स्वातंत्र्य दिन' असा लेख लिहिला. त्यात त्यांनी राष्ट्रध्वजाबद्दल अत्यंत निरर्गल भाषा वापरली.
या दोन्ही कृतींमधील भाषेबद्दल अनेकांकडून नाराजी प्रकट झाली. मात्र त्यांच्या त्यामागील हेतूबद्दल कुणाचा आक्षेप नव्हता. सरकारनेही ७१ साली राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमानाबद्दल कायदा झालेला असतानाही या दोहोंवर काही कठोर कारवाई केली नाही. तत्कालीन राजकीय नेतृत्वाने आपल्या राष्ट्राच्या घडणीतील उण्या बाजू दुरुस्त करण्याकडे ही मंडळी लक्ष वेधत आहेत, ते राष्ट्राचा अवमान करत नसून, राष्ट्राला, भारतमातेला अधिक सुंदर कसे करता येईल हेच ते सांगत आहेत, हे मानले.
घटना एकच पण ती राबवणाऱ्या सत्ताधाऱ्यांची विचारसरणी महत्वाची ठरते, हेच यातून दिसते. म्हणूनच आपली फसगत होऊ नये यासाठी देश व घटना रचणाऱ्यांना अपेक्षित राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोहासारख्या संकल्पनांच्या मूळ भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १६ मे २०२१)

Monday, May 3, 2021

सत्यमेव जयते..?


सम्राट अशोकाचा सारनाथचा सिंहस्तंभ आपण राजमुद्रा म्हणून स्वीकारला. या राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले आहे. तो मूळ सिंहस्तंभाचा भाग नाही. हे वचन मुण्डक उपनिषदातून घेतलेले आहे. ते आपले राष्ट्रीय बोधवाक्य आहे. ‘सत्यमेव जयते’ या संस्कृत वचनाचा अर्थ आहे - सत्याचाच विजय होतो. आम्ही भारतीय सत्याचा मार्ग अनुसरणारे आहोत, आमच्या शासनाचे मार्गक्रमणही याच सत्याच्या मार्गाने असणार आहे. लबाडी, खोटेपणा टिकत नाही. कितीही अडचणी आल्या तरी अखेर सत्यच टिकते. या सत्याच्या मार्गावरुन आपण ढळता कामा नये, असा या बोधवाक्याचा प्रचलित अर्थ आहे.

इथे सत्य म्हणजे सर्वोच्च सद्गुण, सदाचार असे आपण मानतो. यात माणुसकी, करुणा, सहिष्णुता, बंधु-भगिनीभाव, परस्पर सहकार्य, परदुःख निवारण्यासाठी प्रयत्न, सर्व मानवजातीच्या सुखाची कामना अशा तमाम गुणांचा, वृत्तींचा समावेश होतो. पण सत्याचा हाच एकमेव अर्थ आहे, असे आढळत नाही. उपनिषदे तसेच अन्य आध्यात्मिक दर्शनांनुसार सत्य याचा अर्थ या सृष्टीचे मूळ तत्त्व, जे अपरिवर्तनीय आहे, निश्चित आहे. हे सत् तत्त्व म्हणजे ब्रम्ह, परमात्मा असेही समजले जाते. ‘ब्रम्हं सत्य, जगत् मिथ्या’ हे सूत्र आपण ऐकलेले आहे. सत्याचा हा अर्थ घेतला तर आपल्या बोधवाक्याचे मग काही खरे नाही. जे इंद्रिय गोचर म्हणजे आपल्या इंद्रियांनी जे पाहता, स्पर्शता, ऐकता येते, ज्याचा गंध घेता येतो ते आपण वास्तव जग मानतो. वरील सूत्रात हे सर्व इंद्रियांनी आकळणारे वास्तव माया, भ्रम मानले गेले आहे. जे इंद्रिय गोचर नाही असे जे काही ते आहे ते ‘ब्रम्ह’ हे खरे सत्य, असे अध्यात्म पुरुषांनी, ग्रंथांनी ठरवून टाकले आहे. अनेक गुरु, महाराज, अध्यात्म निरुपणकार या ब्रम्ह वा परमसत्याचे पदर आपल्या प्रवचनांतून, कीर्तनांतून उलगडत असतात. त्याचा लौकिक जीवनाशी अन्वय लावत या परमसत्याच्या प्राप्तीतच जीवनाचे साफल्य असल्याचा निर्वाळा देतात.

बुद्धाने चार आर्यसत्ये प्रतिपादिल्याचे पारंपरिक बौद्ध तत्त्वज्ञानात आहे. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे..वगैरे. आर्य म्हणजे महान, आदर्श. (आर्य लोक नव्हे.) आर्यसत्ये म्हणजे महान सत्ये. ही आर्यसत्ये बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचा भाग आहे की नंतर त्यात घुसवलेला प्रक्षिप्त भाग आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबत शंका घेतलेली आहे. ही आर्यसत्ये बुद्ध धम्माला निराशावादी बनवतात, असा त्यांचा आक्षेप आहे. आता त्या तपशीलात जायचे कारण नाही. काहीतरी मूळ, महान, चिरंतन असे तत्त्व म्हणजे सत्य ही सत्याची व्याख्या आपल्याला बुद्धाच्या या आर्यसत्यांच्या तत्त्वज्ञानात मिळते. तेवढ्याचीच नोंद आपण आता घेऊ. हे बुद्धाचे सत्य ब्रम्ह किंवा परमतत्त्वासारखे ज्याचे अस्तित्व इंद्रियांनी, लौकिक तर्काने सिद्ध करता येत नाही, असे नाही. ते स्पष्टपणे कळणारे आहे. त्यातील संदेशाचे बाबासाहेब करतात त्याप्रमाणे मापन वेगळे होऊ शकते, ती बाब वेगळी.

जैनादि तत्त्वज्ञानांत सत्याच्या आकलनाचा एकच एक थेट मार्ग मानला जात नाही. अनेक मार्गांनी सत्याच्या बोधाप्रतचा प्रवास करावा लागतो. ‘अनेकांतवाद’ असे त्याला म्हटले जाते. चक्रधरांची हत्ती व आंधळ्यांची कथा आपल्याला ठाऊक आहे. अनेकांतवाद समजायला ती आपण आठवूया. ज्याला जे हाताला लागेल, त्याला तो हत्ती समजतो व त्याप्रमाणे त्याचे हत्ती सुपासारखा, हत्ती खांबासारखा असे वर्णन करतो. जेवढे आकळते तो त्या हत्तीचा भाग जरुर; पण संपूर्ण हत्ती म्हणजे तो केवळ एक भाग नव्हे. तर या विविध भागांचा मिळून हत्ती होतो. सत्याचे समग्र आकलन असे विविध पैलू, आयाम लक्षात घेतल्याशिवाय होत नाही. केवळ जी बाजू आपल्याला कळते तीच आपण सत्य मानू नये. आणखी अनेक बाजू असू शकतात. त्या समजून घेऊन निष्कर्षाला यावे हे वस्तुनिष्ठ व्यावहारिक शहाणपण आपल्याला इथे सापडते.

हा खरा आधुनिक विज्ञानाच्या शोधाचा रास्त मार्ग आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही डोळ्यांनी दिसणारी म्हणजे इंद्रिय गोचर बाब. ती इंद्रिय गोचर आहे, म्हणून सत्य आहे, असा दावा पुढचे शोध लागण्यापूर्वीच्या काळात केला जाई. पण वैज्ञानिक या एका निरीक्षणावर संतुष्ट होऊन गप्प राहिले नाहीत. त्यांनी अजून वेगवेगळ्या रीतीने तपासले (याला बराच काळ गेला, अनेक शास्त्रज्ञ दरम्यान होऊन गेले) आणि मग निष्कर्ष निघाला की सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सत्याचा शोध हा असा फक्त जेवढे दिसते त्यावरुन घ्यायचा नसतो. अनेक अंगांनी, मार्गांनी सत्याच्या शोधाला निघायचे असते.

‘जसे आहे तसे म्हणजे सत्य’ अशी शब्दकोशातली व्याख्या आहे. इथेही जेवढे दिसते त्यावरुन सत्य ठरवायचे नसते. विविध मार्गांनी तपास करुन जे आढळते ते जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे सत्यवादीपण. जे सत्य समोर येते ते प्रिय असेल अथवा अप्रिय. ते सत्य आहे. स्वीकारलेच पाहिजे. या स्वीकारातूनच पुढच्या दिशा किंवा उपाय ठरवता येऊ शकतात.

सत्य म्हणजे आपल्या किंवा धर्मग्रंथांनी पवित्र ठरवलेल्या धारणा नव्हे. पण त्यासच सत्य म्हणावे असा आग्रह या धर्मग्रंथांचा असतो. ऋग्वेदातील पुरुषसूक्त (हेही प्रक्षिप्त असावे असे बोलले जाते) वर्णव्यवस्थेच्या उद्गमाचे चित्र रेखाटते. ब्रम्ह्याच्या मुखातून ब्राम्हण, बाहुंतून क्षत्रिय व जांघांतून शूद्र वगैरे. हेच सत्य मानून जेव्हा समाजव्यवस्था चालवली जाते वा तिचे समर्थन केले जाते, तेव्हा सत्याची ही आवृत्ती वास्तविक असत्य असते. पण धार्मिक श्रद्धा व विवेकबुद्धीच्या वापरास बंदी यामुळे ते असत्यच सत्याच्या दिमाखात वावरते. बहुसंख्य समाज हे सत्य मानतो, म्हणून जिला विवेकबुद्धी आहे व तिचा निर्वाळा हे असत्य आहे असा आहे, त्या व्यक्तीनेही ते मानावे का? समाजातील कथित अधिकारी वर्ग वा सबंध समाजाचा तो आग्रह असू शकतो. या आग्रहास सगळेच शरण जात नाहीत. आपले बरेच काही पणाला लावून ‘सत्यअसत्याशी मन केले ग्वाही-नाही मानिले बहुमता’ अशी ठाम भूमिका घेणारे तुकोबा असतातच. भेदाभेद करणारी जातिव्यवस्था, ब्राम्हणांचे वर्चस्व हे परमसत्य असल्याची अगदी त्यांच्या आप्तांची धारणा महात्मा फुले ठोकरतात. स्त्रीशूद्रातिशूद्रांना समान लेखणारे, मांग-महम्मद-ब्राम्हणांना एकाच मायेने पोटाशी धरणारे ‘सत्य’ ते ‘सर्वांचे आदिघर’, ‘सर्व धर्मांचे माहेर’ मानतात. या सत्याच्या प्रस्थापनेसाठी सत्यशोधक चळवळ उभारतात. महात्मा गांधी ईश्वराला सत्य नव्हे, तर सत्याला ईश्वर मानतात. सत्य सर्वांठायी आहे. प्रेम हा त्याचा आविष्कार आहे. सर्वांचे भले साधणाऱ्या, विरोधकाच्या माणुसकीला आवाहन करणाऱ्या सत्याला जागविण्यासाठी ते ‘सत्याग्रह’ करतात. अलिकडे दलाई लामांनी बुद्ध विचार आणि वैज्ञानिक सत्य यांत विरोध आढळल्यास मी विज्ञानाच्या बाजूने कौल देईन असे जाहीर विधान केले. बुद्धाच्या ‘एही पस्सिको’ (या आणि पहा) तत्त्वाशी आणि स्वानुभवाच्या, व्यवहाराच्या कसोटीवर माझे विचार तपासूनच ते स्वीकारा या भूमिकेशी दलाई लामांचे हे विधान सुसंगतच आहे.

संशोधकांचा भौतिक सत्याचा शोध किंवा सद्विचारांच्या सत्याचे संरक्षण या वरील प्रकारच्या बंडखोरींमुळे शक्य होते. सत्य स्वतःच्या ताकदीवर टिकते असे दिसत नाही. ‘सत्यमेव जयते’ किंवा ‘सत्याचाच अखेरीस विजय’ हे आपोआप होत नाही. पृथ्वी सपाट नसून ती गोल आहे, हे नंतर कळले. पण ती वस्तुस्थिती किंवा सत्य आधी, नंतर तसेच कायम होते. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्नच झाले नसते, विविध पुराव्यांनी ते सिद्ध केले गेले नसते, तर पृथ्वी गोल असूनही ती सपाट आहे, या बायबलच्या म्हणण्यालाच लोक सत्य मानत राहिले असते.

काही सत्ये ही सत्ये असतातच. पण आपल्यासमोर आलेल्या आयामांचाच केवळ अन्वय लावून निकाल दिला तर तो सत्याची बाजू घेणारा असेलच असे नाही. आपण सत्यवादी असू. पण सत्य त्यामुळे पुढे येईलच व आपण त्याचे रक्षण करु शकू असे नाही. आकिरा कुरोसोवाचा ‘राशोमॉन’ चित्रपट जगप्रसिद्ध आहे. त्यात खून झाला आहे. ते सत्य आहे. पण तो कोणी केला याच्या अनेक आवृत्त्या संबंधितांकडून मांडल्या जातात. त्या इतक्या प्रभावी असतात, की आता ऐकलेली आवृत्तीच सत्य वाटावी. हा सिनेमा आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात असे खून वकिली युक्तिवादांतून सिद्ध होतातच असे नाही किंवा भलताच निरपराध माणूस खुनी म्हणून लटकवला जातो. खूप नंतर कधीतरी योगायोगाने दुसऱ्या वस्तुस्थिती पुढे येतात व तो निरपराध असल्याचे कळते. तोवर तो मेलेला असतो, प्रदीर्घ शिक्षा त्याने भोगलेली असते, त्याचे कौटुंबिक जीवन, समाजातली त्याची प्रतिमा उद्ध्वस्त झालेली असते. अशा सत्य घटनांवर आधारित अनेक सिनेमे निघालेले आहेत. फाशीची शिक्षा देऊ नये या मागणीतला हाही एक मुद्दा असतो. कधीतरी नंतर जर नव्या पुराव्यांनी तो मनुष्य गुन्हेगार नाही असे कळले, तर त्याच्या प्रति न्याय करायला तो किमान जिवंत तरी हवा. फाशी दिलेली असल्यास या नंतरच्या पुराव्यास त्या माणसाच्या दृष्टीने काही अर्थ राहत नाही. म्हणून कठोरातल्या कठोर गुन्ह्यासही फाशी नव्हे, तर जन्मठेप हीच सर्वोच्च शिक्षा हवी असे काहींचे मत आहे.

वैचारिक मान्यतांच्या सत्याबाबत एक अडचण असते, ती म्हणजे ते सत्य निरपेक्ष, वस्तुनिष्ठ नसते. पृथ्वी गोल आहे, हे सिद्ध झाले की झाले. त्यावर मतभिन्नता राहण्याचा संभव नसतो. पण विशिष्ट विचारांना सत्य मानले जाते, त्यावेळी ते वादातीत नसते. समाजाच्या सुव्यवस्थित संचालनासाठी वर्णव्यवस्था-जातिव्यवस्था हवी. पण ती जन्मावर आधारित नको. कर्मावर ठरावी. ती श्रेणीबद्ध नसावी. ती समांतर असावी. या जातींजातींत विवाह तसेच भोजन आदि बाबींना प्रतिबंध नको. परस्परांच्यात समरसता असावी. आर्यसमाज तसेच अन्य काही प्रगतीशील हिंदू प्रवाहांची ही भूमिका होती. आर्य समाज वर्णव्यवस्था मानायचा. हे लोक सत्प्रवृत्त होते. त्यांच्या मनात विखार, द्वेष नव्हता. पीडितांबाबत त्यांच्या मनात कणव, करुणा होती. या मतप्रवाहाच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना मुळात जातिव्यवस्था ही रचनाच मंजूर नव्हती. ती व तिला आधार देणाऱ्या धर्ममान्यतांवर त्यांनी कठोर आघात केले. समाजाच्या सुव्यवस्थित संचालनासाठी जगभर कामांची विभागणी आहे. ती वैयक्तिक निवडीवर आधारित आहे. त्यासाठी जातीची, वर्णाची संज्ञा कशाला हवी? समरसता अखेरीस जैसे थे रचनेला पुरस्कृत करते. म्हणून सर्व व्यक्तींना समान पायावर उभी करणारी, त्यांचे मोल एकच मानणारी समता प्रस्थापित करण्याचा ते चंग बांधतात. गांधीजी व आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार कोणाला खलनायक न ठरवता समजून घ्यायचा झाला, तर तो दोन सत्यांतला संघर्ष होता, असे म्हणायला लागेल. म्हणजेच ही सत्ये सापेक्ष आहेत. त्यांचा निकाल या दोन महामानवांच्या हयातीत तर लागला नाहीच. पण त्यांच्या हयातीनंतर आजही लागलेला नाही. या दोन सत्यांप्रति ठाम बाजू असणारे दोन्ही बाजूंचे सत्प्रवृत्त लोक आजही आहेत. कोणी कठोर बोलेल, तर कोणी सौम्य. पण सत्याच्या बाजू दोन किंवा सत्येच दोन नक्की. अजून खूप काळानंतर कदाचित यातले अधिक योग्य कोणते किंवा या दोहोंपेक्षाही तिसराच पर्याय अधिक योग्य ठरला असता असे काहीतरी पुढे येऊ शकते. कदाचित ते दोघांनाही मान्य होऊ शकते. इथे सत्य एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल का? अखेरीस सत्याचा विजय होतो, असे म्हणता येईल का? दोहोंपैकी एकही सत्य टिकले नाही, तिसरेच पुढे आले, तर त्या तिसऱ्या सत्याचा विजय झाला असे तरी म्हणता येईल का? ...कारण पुढे जाऊन, ज्यावर सहमती झाल्याने मतभेद राहिले नाहीत, तरी दोहोंना विचार करायला लावणारा एखादा नवा आयाम समोर येऊ शकतो.

अहिंसक, द्वेषरहित आंदोलन करणाऱ्या लोकांबाबत आपण हे पाहिले. पण इथे हिटलर व त्याला साथ देणारे वंशविद्वेषाची शिकार झालेले जर्मन यांचा विचार कसा करायचा? ज्या क्रौर्याने हे लोक वागले, त्याचे त्यांचे म्हणून समर्थन होते. अर्थात ती वर्चस्ववादी मनोरुग्णता होती. त्याला कोणीच सत्य म्हणून मान्यता देणार नाही. या मंडळींचा पुढे पराभव झाला. नाझींत सहभागी झालेले जे कोणी आताआतापर्यंत शिल्लक होते, त्यांच्या पश्चातापाच्या कहाण्याही पुढे आल्या आहेत. इथे उशीरा का होईना, सत्याचा विजय झाला असे आपण म्हणू. अर्थात त्यासाठी प्रचंड किंमत द्यावी लागली. तरीही जय सत्याचाच झाला हे खरे. पण हे नेहमीच होईल वा होते असे नव्हे. समाजमनाची खरी-खोटी दुखरी बाजू, अवमानाची भावना चेतवून प्रचंड क्रौर्य करुन आयुष्यभर हुकुमशहा म्हणून जगणारेही आहेत. त्यांच्या पोलादी पकडीत अनेक निरपराध लोक राष्ट्राचे शत्रू म्हणून घोषित होऊन लोकपाठिंब्याने यमसदनाला धाडले गेले आहेत. इथे सत्याचा विजय किमान या सगळ्यांच्या हयातीत तरी होत नाही. विरोधकांना नेस्तनाबूत करणारे, त्यासाठी कोणत्याही मार्गांचा अवलंब करणारे उलट्या काळजाचे राजकारणी आपल्या देशात सध्या आहेतच. त्यांची मने इतकी निगरगट्ट आहेत की त्यांच्या स्वप्नातही या क्रूर कृत्यांच्या छाया त्यांना भेडसावत नाहीत. त्यामुळे असत्याने वागणे माणसाला अंतर्यामी खात राहते, अस्वस्थ करते हे सार्वत्रिक नाही. ते ज्यांची काळिजे नाजूक असतात, त्यांच्याबाबतीत खरे असते. सत्याच्या रक्षणासाठी या निगरगट्ट, निर्ममांशी करावयाचा संघर्ष व्यापक अर्थाने आंतरिक विवेकाला साद घालून करता येईल असे नव्हे. समाजाला ती हाक जरुर देता येईल. समाजाच्या मनोभूमिकेचा दबाव तयार करता येईल. पण या निष्ठूर, क्रूरकर्म्यांना जेरबंद करावयाचे अन्य मार्गही वापरावे लागतील.

व्यवस्था बदलाचे उपाय विश्वस्त, वर्गसंघर्ष, लोकतांत्रिक कायदे या दोन्ही-तिन्ही पद्धतींनी करण्याच्या भूमिका आपल्याकडे तसेच जगात आहेत. त्या अवलंबल्या गेल्या आहेत. त्याचे अगदी निर्णायक नसले तरी कमीअधिक अनुकूल परिणामही दिसतात. या विचारप्रणाल्यांनी कार्यरत लोक लोकहिताच्या त्यांना वाटणाऱ्या सत्याच्या स्थापनेसाठी जिद्दीने काम करताना दिसतात. त्यांच्यात मतभिन्नतेसह सामायिक सहमतीच्या मुद्द्यांवर सहकार्य व प्रसंगी संघर्ष हीच सत्याकडे जाण्याची रीत असू शकते. ती ‘सत्य रीत’ असू शकते. अनेक संघर्ष व मतभिन्नतेसह संविधानाची निर्मिती ही आंबेडकर, गांधी, नेहरु यांची सामायिक सहमतीची कृती होती. आपापल्या सत्याप्रत जाण्याचे त्यांचे संघर्ष व मतभेद संविधान निर्मितीनंतरही चालू होते.

हे एक किंवा अनेक जनहितकारी सत्ये आपण पाहिले त्याप्रमाणे आपसूक स्थापित वा विजयी होत नाहीत. त्यांच्या प्रस्थापनेसाठी तत्त्वज्ञान सिद्ध करावे लागते. त्याच्या प्रकाशात समाजविण समजून घ्यावी लागते. त्यातून झालेल्या बोधाप्रमाणे प्रबोधन, आंदोलन करावे लागते. संघटना बांधावी लागते. रणनीती आखावी लागते. तिची अंमलबजावणी करताना सतत दक्ष राहावे लागते. ‘सत्य’ चप्पल घालून तयार होईपर्यंत ‘खोटं’ गावभर हिंडून आलेलं असतं, हे आपलं ग्रामीण बोलीतलं शहाणपणही तेच सांगतं.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, मे २०२१)