Sunday, October 25, 2015

पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी विवेकवादी नागरिकांचे निदर्शन

देशातील अविवेकी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी

विवेकवादी नागरिकांचे निदर्शन

गुरुवार, ५ नोव्हेंबर, दु. ३ वा., आझाद मैदान, मुंबई


आमची भूमिका व आवाहन

विचार पटत नाहीत म्हणून साहित्यिक-विचारवंतांचे खून, आमच्या धर्मश्रद्धांना मंजूर नसलेले गोमांस खाल्लेत अथवा खात असल्याचा संशय-अफवा यावरुन हजारोंच्या जमावाने अल्पसंख्याक समूहातील व्यक्तींच्या घरादाराचा विध्वंस करुन तर कधी रस्त्यात गाठून निर्घृणपणे हत्या करणे, दलितांविषयीची तुच्छता व संताप यामुळे रात्री झोपेत असलेल्या दलित कुटुंबाच्या घरात पेट्रोल टाकून दोन लहानग्यांना निर्ममपणे जिवंत जाळणेआरक्षणाच्या फेरविचाराची गोंधळ वाढवणारी चर्चा सुरु करुन सामाजिक विद्वेष भडकवण्याचा प्रयत्न करणे अशा असंख्य घटना हा देशात सध्या अपवाद नव्हे, तर परिपाठ झाला आहे.

हिंदू कट्टरपंथीय व त्याला प्रतिसाद देणारे मुस्लिम कट्टरपंथीय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी देशातील वातावरण कलुषित होणे हा आपला जुना अनुभव आहे. याआधीच्या राज्यकर्त्यांनी या विष पेरणाऱ्या शक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात अनेकदा कमकुवतपणा दाखवला व त्यामुळे त्यांची ताकद  वाढली, हे खरे आहे. तथापि, या राज्यकर्त्यांचे सांप्रदायिकतेचे विष पेरणे अधिकृत धोरण नव्हते. सध्या प्रचंड बहुमताने केंद्रात निवडून आलेल्या भाजपचा व त्यांच्या संघपरिवाराचा इतिहास पाहता सांप्रदायिकतेला व हिंदू प्रभुत्ववादाला चालना देणे हे त्यांचे अधिकृत धोरणच आहे. पंतप्रधान अथवा भाजपच्या प्रवक्त्यांचे जाहीर निवेदन काहीही असो, त्यांचे खासदार म्हणून लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या साधू-साध्वींची, मंत्र्यांची आगलाऊ, चिथावणीखोर तसेच अल्पसंख्याक व दलितांची मानहानी करणारी विधाने राजरोस चाललेली असतात.

तुम्ही घेतलेल्या घटनेच्या शपथेच्या हे विरोधात असल्याचा आरोप लावून पंतप्रधानांनी यांपैकी एकाचाही राजीनामा घेतल्याचे उदाहरण नाही. परदेशात बुद्धाच्या-गांधीजींच्या देशातून आल्याचे ते अभिमानाने सांगत असतात. मात्र या महामानवांनी प्रचारलेल्या करुणेला ते मान देतात, असे दिसत नाही. अत्याचार पिडितांना भेट देण्याची अथवा त्यांच्याशी सहवेदना प्रकट करण्याची त्यांनी तातडी दाखवल्याचे अजून एकही उदाहरण नाही.

वास्तविक, या वेळच्या निवडणुकीत मोदींच्या नावाने जे भरघोस मतदान झाले, त्यातून त्यांच्याकडे मोठी नैतिक व राजकीय ताकद तयार झाली आहे. तथापि, त्यांच्या परिवारातील या उपद्रवी मंडळींना ते या ताकदीचा वापर करुन आळा घालत नाहीत. त्यांना तो घालायचाच नाही, असे यावरुन दिसते. राष्ट्रीय स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या प्रदीर्घ संघर्षातून लोकशाही, धर्मनिरपेक्षता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये उत्क्रांत झाली व पुढे संविधानाचा पाया बनली. ही मूल्ये निर्माणाची प्रक्रिया ज्या स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या आंदोलनांत चालली होती, त्याच्या कायम विरोधी राहण्याचेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले आहे. ते आमचे चुकले अशी कधीही आत्मटीका त्यांनी केलेली नाही. लोकशाही प्रक्रियेचा वापर करुन आपले प्रभुत्ववादी राजकारण करण्याचा त्यांचा डाव आहे. संघपरिवाराच्या घटकांकडून देशाची सहिष्णू, सेक्युलर व सामाजिकी न्याय यांची वीण उसवायचे सध्या जे जोरदार प्रयत्न चालू आहेत, तो या त्यांच्या धोरणाचाच भाग आहे, असे म्हणावे लागते.

वर नमूद केलेल्या या अतिशय गंभीर व चिंताजनक वातावरणाने व्यथित होऊन देशातील व महाराष्ट्रातील साहित्यिक-कलावंतांनी आपले साहित्य अकादमीचे तसेच अन्य सरकारी पुरस्कार मिळालेल्या रकमांसहित सरकारला परत करण्याची भूमिका घेतली, असे आमचे मापन आहे. या साहित्यिक-कलावंतांनी गट करुन, बैठक करुन सामुदायिकपणे हा निर्णय घेतलेला नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या कारणांची त्यांची म्हणून विविध तपशीलांची निवेदने त्यांनी दिलेली आहेत. त्या तपशीलांविषयी काहींची वेगळी मते असू शकतात. त्यांविषयी ज्यांना शंका आहेत, अशी मंडळी त्यांना त्याबाबत विचारणाही करत आहेत.

आम्ही त्या तपशीलात जात नाही. आजच्या भयकारी बनत चाललेल्या वातावरणामुळे व सरकारच्या त्यातील प्रभावी हस्तक्षेपाच्या अनास्थेपायी अस्वस्थ होऊन या संवेदनशील कलावंतांनी सरकारच्या व समाजाच्या विवेकाला आवाहन करण्याचे ठरवले. आपला निषेध व आवाहन सरकार तसेच समाजापर्यंत पोहोचविण्याचे त्यांच्याकडे असलेले एक साधन म्हणून शासनाने दिलेले पुरस्कार शासनाला परत करण्याची प्रतीकात्मक कृती ते करत आहेत, असे आम्ही समजतो. तुम्ही आधी का नाही परत केलेत वा ते न करताही निषेध व्यक्त करता आला असता, आदि अनेक मते अनेकांची असू शकतात. त्याविषयी या कलावंतांनी उत्तरे दिली आहेत. पुढेही देतील. तथापि, त्यामुळे त्यांच्या आजच्या हेतूंविषयी संशय घेणे हे गैर आहे, असे आम्हाला वाटते.

पुरस्कार परत करण्याच्या मार्गाविषयी वेगळे मत असलेले, तथापि पुरस्कार परत करणाऱ्यांच्या इतक्याच तीव्र भावना व भूमिका असलेले साहित्यिक-कलावंत समाजात आहेत आणि ते त्यांचा निषेध विविध पद्धतीने व्यक्त करत आहेत. त्यांचाही आम्ही आदर करतो. पुरस्कार परत करणाऱ्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे त्यांच्या भावना कमी प्रतीच्या आहेत, असे आम्ही मानत नाही. किंबहुना, समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने व पद्धतीने आजच्या विषाक्त होत असलेल्या वातावरणात हस्तक्षेप करायला हवा, अशीच आमची अपेक्षा आहे.

५ नोव्हेंबरचे हे निदर्शन हा विवेकी नागरिक म्हणून आम्ही आमच्या परीने करत असलेला असाच एक हस्तक्षेप आहे. आपल्या मनात काही किंतु-परंतु असू शकतात. पण आपण जर आमच्या हेतूंशी सहमत असाल, तर  आपण या निदर्शनांत जरुर सहभागी व्हावे. इतर समविचारी मंडळींनाही सहभागी होण्याचे आवाहन करावे. हे निवेदन फेसबुक, व्हॉट्सअप तसेच ईमेलद्वारे विस्तृत प्रमाणावर शेअर करावे.

आपण येत असल्याचे संपर्कासाठीच्या खालील मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर कळवावे, ही नम्र विनंती.

आपले,

संजय शिंदे, प्रफुल्ल शिंदे, वैभव छाया, जॉन अल्मेडा, राजू कोरडे, सुरेश सावंत, सुनील गजाकोश, देवचंद रणदिवे, निसार अली, बाळासाहेब पवार, ओमप्रकाश पासी, श्रीधर क्षीरसागर, वैभव मोरे

संयोजन समिती

विवेकवादी लोकशाही मंच
________________________________
संपर्कः sanjaysushma1991@gmail.com , 9820890318
प्रकाशकः संजय शिंदे, श्रमिक, रॉयल क्रेस्ट, लो. टिळक वसाहत, रस्ता क्र. ३, दादर (पूर्व), मुंबई- १४.

Thursday, October 15, 2015

लोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात?

हा लेख लिहीत असताना ‘सनातन’च्या समीर गायकवाडला व आणखी तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. त्यांची चौकशी चालू आहे. दाभोलकरांचे खूनी प्रदीर्घ काळ सापडत नव्हते. पानसरेंच्या खून्यांचेही तसेच होते की काय असे वाटत होते. त्यात कलबुर्गींच्या त्याच प्रकारे झालेल्या खूनाची भर पडली. अशा वेळी पानसरेंच्या खून प्रकरणात असे काही लोक पकडले जाणे ही आश्वासक बाब आहे. मुख्य म्हणजे ज्या हिंदू मूलतत्त्ववादी ‘सनातन’कडे पुरोगामी बोट दाखवत होते, त्याला या अटकेमुळे पुष्टी मिळाली आहे. राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने राजकीय दबाव अथवा आकसापोटी ही कारवाई झाली, असे म्हणण्याला आता जागा नाही. या अटकेचे पुढे, विशेषतः केस उभी राहताना-राहिल्यावर काय होईल, मालेगाव-समझौता एक्सप्रेस खटल्याप्रमाणे ही केस पातळ करण्याचे प्रयत्न होणार नाहीत ना, या शंका रास्त आहेत. पण ते सगळे पुढचे. तूर्त, भाजप सरकार या प्रकरणात तटस्थतेचा दावा करायला मोकळे आहे, हे निश्चित.

आपल्या उद्दिष्टाकडे सरकताना आपल्यातल्याच काहींचा बळी देणे अपरिहार्य आहे, ही संघाची धूर्तताही यामागे असू शकते. संघ जे बोलतो तेच त्याला म्हणायचे असते किंवा ताबडतोबीने जी कृती ते करतात तेच त्यांना साधायचे असते असा संघाचा इतिहास नाही. सोयीनुसार ते कसेही बदलू शकतात, काहीही बोलू, काहीही करु शकतात. त्यातून तार्किक निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. त्यांचा इतिहास, त्यांच्या गुरुजनांचे विचारधन यातील काहीही त्यांना त्याज्य वाटल्याचे त्यांनी जाहीर केलेले नाही किंवा कोणतीही आत्मटीका केलेली नाही. ते ज्या रणनीती वापरतात, त्यांच्या फळाची तातडीने अपेक्षा ते करत नाहीत. त्यांची सबुरी दीर्घ पल्ल्याची असते. त्यांच्या राजकीय साधनाचे-भाजपचे त्यांना हवे तसे भरभक्कम बहुमताचे सरकार केंद्रात आल्याने व पुढे एवढेच बहुमत मिळेल यावर विसंबणे बरोबर नाही हे त्यांना कळत असल्याने परिवारातील घटक अधिक सक्रिय होणे अगदी स्वाभाविक आहे. काही वेळा यातील काही घटक चेकाळतात किंवा चेकाळल्यासारखे दिसतात. तथापि, त्या सगळ्यांत एक मेळ असतो. संघपरिवार हा एक वाद्यवृंद आहे. त्यातील प्रत्येक घटकाचे आपले एक वाद्य, आपली एक भूमिका असते. परस्परांशी औपचारिक संघटनात्मक नाते नसले तरी ते परस्परांना पूरक असतात. इतरांना काही वेळा त्यात बेसूरपणा भले वाटला, तरी अंतर्गत त्यांचे सूर संवादीच असतात. काही जागा चुकल्या तरी सरसंघचालक हा नैतिक अधिकारी पुरुष आपल्या कटाक्षाने त्या लगेच दुरुस्त करतो. ते एक सैन्यदळ आहे. सरसंघचालक सेनापतीने वाटून दिलेले बुरुज प्रत्येकजण निष्ठेने सांभाळत असतो. त्यांच्या या लवचिक, सशक्त पिळामुळे समाजातील सौम्य हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांपासून कट्टर पंथीयांपर्यंत, सेवाभावी काम करु इच्छिणाऱ्यांपासून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांपर्यंत समाजातील विविध छटांचे लोक ते सामावून घेत असतात. आपला जनाधार वाढवत असतात.

पुरोगाम्यांच्यात याची चिंताजनक वानवा आहे. विचार थोर असून चालत नाही. तो रुजवण्यासाठी सुनियोजित प्रचार व संघटना असावी लागते. नाहीतर बी वाऱ्यावर उडून जाते. ते रुजत नाही. एकूणच भारतीय समाजाचे विविधतापूर्ण स्वरुप व आजवर प्रत्ययाला आलेली अंगभूत सूज्ञता या बळावर आपले सर्व काही चालू आहे. भारतीयांचे हे वैशिष्ट्य नादुरुस्त करण्याच्या प्रयत्नांनी काही वळसे पडतात. पण त्या सगळ्यांतून देश पुन्हा सावरतो. पण याला पुरोगाम्यांनी आपली ताकद समजू नये किंवा त्यावर कायमचा भरवसा ठेवू नये. ती आपल्या जमेची बाब असू शकते. पण ती बोनस समजावी. आपल्या ताकदीने व कौशल्याने आपण समाजाची ही घडी विस्कटू देणार नाही, हा निश्चय करण्याची गरज आहे. हा निश्चय परिणामकारक व्हायचा असेल तर आपल्या ताकदीला व कौशल्याला हानी पोहोचवणाऱ्या आपल्या कमजोऱ्यांचा वस्तुनिष्ठ शोध घेऊन त्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.

आताच्या या समीर गायकवाडच्या अटकेनंतर ‘खरे सूत्रधार बहुजनांना हाताशी धरुन आपला कार्यभाग साधतात’ असा आरोप पुरोगामी वर्तुळांतून काहींनी सुरु केला. माध्यमांनी त्याला आणखी फोडणी दिली. ज्यांना पुरोगामी-प्रतिगामी हे शब्दही समजत नाहीत, असा समाज याकडे कसा पाहतो, त्याच्यावर आपल्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो, डावपेच म्हणूनतरी लांब पल्ल्याचे यात काही हित आहे का, याचा ही पुरोगामी मंडळी काय विचार करतात हे मला कळत नाही.

आज समाज सरळ सरळ ब्राम्हण-ब्राम्हणेतर पद्धतीने विभागला गेलेला नाही. ज्याला ब्राम्हणी मूल्यविचार म्हणू तो मानणारे आता बहुजनांतही लक्षणीय आहेत व स्वतःच्या प्रेरणेनेच ते याचे वाहक-चालक झालेले आहेत. अशावेळी कोणीतरी ब्राम्हण सूत्रधार व बहुजन केवळ कठपुतळ्या आहेत, हे समाजाला समजत नाही. कारण तसे दिसत नाही. सरसंघचालक व मुख्य पदाधिकारी सोडले तर संघात व संघपरिवारातील अन्य संघटनांत पुढाकाराने असणाऱ्यांत ब्राम्हणच आहेत, असे आता दिसत नाही. (उद्या सरसंघचालक म्हणून ब्राम्हणेतर व्यक्तीची ते निवड करणारच नाहीत असे नाही. तेवढे ते लवचिक नक्की आहेत. त्या व्यक्तीत त्यांना सोयीचे ब्राम्हण्य ठासून भरलेले असले म्हणजे झाले.) पंतप्रधान मोदी तेली म्हणजे ओबीसी आहेत. त्यांना कोणी ब्राम्हण सूत्रधारांचे कठपुतळी म्हणणे म्हणजे कठीणच होईल. ते स्वतः सूत्रधारांतले एक आहेत. त्यांनी संघप्रणीत ब्राम्हणी विचार आत्मसात केला आहे, असे जरुर म्हणूया. पण कोणीतरी ब्राम्हण व्यक्ती वा समूह त्यांच्यावर अधिसत्ता गाजवतो आहे व त्याबरहुकूम ते वागत आहेत, असे समजणे ही आत्मवंचना ठरेल. या सूत्रधार ब्राम्हण व्यक्ती वा समूहाचा पर्दाफाश केला की बहुजन त्यांच्याबाबतीत निराभास होतील व आपल्या मूळ ‘पुरोगामी (?)’ भूमिकेवर परत येतील, ही आपण आपली फसवणूक करुन घेण्यासारखे आहे. आजच्या नाजूक स्थितीत ते बेजबाबदारपणाचेही आहे. हिंदूंतील प्रत्येक जातीत पुरोगामी व प्रतिगामी आहेत, अशी आजची स्थिती आहे. हिंदू मूलतत्त्ववाद्यांच्या (मग ते ब्राम्हण असोत अथवा ब्राम्हणेतर) आम्ही विरोधात आहोत, अशी सुस्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. ते लोकांना कळू शकते.

सनातनसारख्या संस्थांना ‘हिंदुत्ववादी’ म्हणून पुरोगामी संबोधतात तेव्हा त्यांना कडवे धर्मवादी किंवा मूलतत्त्ववादी असे म्हणायचे असते. सनातनही स्वतःला हिंदुत्ववादीच म्हणवते. हिंदू धर्माचे खरेखुरे अनुसरण करणारे असे त्यांना म्हणायचे असते. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे. म्हणजे त्यांचेही एक हिंदुत्व होते. पण त्यांचे हिंदुत्व सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव मानणारे होते. देशाच्या राजकीय व प्रशासकीय व्यवहारात ढवळाढवळ करणारे नव्हते. भागवतपंथीय वारकरी हिंदू (व म्हणून हिंदुत्ववादी) या ओळखीतच आज मोडतात. बौद्धत्ववादी, जैनत्ववादी, शीखत्ववादी असे त्या त्या धर्मातल्या कोणी स्वतःला म्हटले, तर ते प्रतिगामी ठरत नसल्यास हिंदूने मात्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हटल्यास प्रतिगामी कसे ठरते, असा अनेक सामान्य हिंदूंना प्रश्न पडतो. हा देश फक्त हिंदूंचा नाही. पण तो हिंदूंचाही आहे. आणि हे हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या स्वतःच्या ओळखीला असे नकारात्मक मानले जाणे त्यांना मानवत नाही, असे अनेकांशी बोलताना लक्षात येते. (डॉ. आंबेडकरांनी सबंध हिंदूधर्मच- म्हणजे हिंदुत्वच नाकारले. त्यांनी बौद्धधम्म स्वीकारला. त्याचा अर्थ, संदर्भ हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण हे पाऊल न उचलणारे बहुसंख्य पुरोगामी हिंदू धर्मातच आहेत. त्यांपैकी कागदोपत्री धर्म न नोंदवणारे अपवादानेच असतील.) या हिंदूंपासून सनातनसारख्या मूलतत्त्ववादी हिंदूंना वेगळे काढण्याऐवजी सनातनलाच या सबंध हिंदूंचा-हिंदुत्वाचा ताबा आपण देत असतो, असे मला वाटते. पुरोगाम्यांची धर्मचिकित्सा न कळणाऱ्यांची समाजात आज बहुसंख्या आहे. अशावेळी पुरोगाम्यांकडून निषेधात्मक पद्धतीने होणारा हिंदुत्ववादी हा उल्लेख अपेक्षित परिणाम साधतो असे वाटत नाही. म्हणूनच यातही सुस्पष्टता आणून सनातन किंवा बजरंग दलसारख्यांसाठी हिंदू कट्टरपंथी किंवा मूलतत्त्ववादी अथवा यासारखे काही वेगळे संबोधन वापरायला हवे.

मूळात हिंदू ही संज्ञा नव्हतीच. सिंधू नदीच्या पलीकडच्यांना दिलेल्या नामाभिधानाचे ते अपभ्रंशित रुप आहे, ही व्युत्पत्ती पटवण्याची ही वेळ नव्हे. ते सावकाश करायचे काम आहे. आज हिंदूंतल्या पुरोगाम्यांनी स्वतःची हिंदू ही ओळख दाखवून हिंदूंच्या कळपातल्या या लांडग्यांना बाहेर काढायला हवे. आजचे प्राधान्य ते आहे. पण ते समजण्यात आपली पुरोगामी मंडळी गडबड करतात. सैद्धांतिक स्पष्टतेच्या या अस्थानी आग्रहाच्या तार्किक कर्कशतेतून आपण बाहेर यायला हवे.

‘लोकसत्तेत आलेले शेषराव मोरेंचे अंदमानच्या साहित्य संमेलनातील भाषण किती छान आहे नाही!’ हा अभिप्राय मी आमच्या सोबत्यांकडूनच ऐकला आहे. ती त्यांची प्रामाणिक, बाळबोध भावना होती. शेषराव मोरे हे ‘आपल्यातलेच’ (पुरोगामी छावणी) तलेच आहेत, अशी त्यांच्यापैकी काहींची समजूतही होती. त्यांच्याशी बोलताना नेहमीप्रमाणेच माझी दमछाक झाली. जातिव्यवस्था, जागतिकीकरण याबाबतची मोरेंची निरीक्षणे किंवा सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी ही मंडळी मोरेंशी सहमत होती. पुरोगाम्यांकडून काळ्या-पांढऱ्याऐवजी अनेक करड्या छटा असलेले बदलते वास्तव, त्यातील अंतर्विरोध नीट मांडले गेले असते, या मांडणीत सावरकरांना नाकारताना त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून लोकांच्या मनात जो खोल ठसा आहे, त्याचा योग्य तो आदर राखला गेला असता, तर ही दमछाकीची वेळ बहुधा आली नसती.

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना झालेल्या विरोधाची कारणे सांगतानाही अशीच दमछाक झाली. तरी अलिकडेच कॉ. पानसरेंचे शिवाजी महाराजांवरील भाषण यातील काहींना ऐकवले होते. त्यांचे पुस्तकही वाचायला सांगितले होते. त्यामुळे थोडे सोपे गेले. पण सामान्यांना जर पुरंदरेंनीच सांगितलेला शिवाजी ठाऊक असला व डांगे किंवा पानसरेंचा शिवाजी पोहोचवायचा आपण फारसा प्रयत्नच केलेला नसला, तर ‘पुरंदरेंना विरोध का?’ याचे उत्तर ते ‘ब्राम्हण’ आहेत म्हणून, हेच लोकांपर्यंत पोहोचते. पुरोगामी हेच खरे जातियवादी आहेत, हे पटवायला भाजप सरकारला व संघपरिवाराला त्यामुळे सोपे झाले.

पुरोगाम्यांच्या या कमकुवत जागांबद्दल आत्मचिकित्सा म्हणून अजून बरेच लिहावे लागेल. ते यथावकाश लिहीन. तूर्त, या प्रतिकूल माहोलाचा नीट समज घेण्यासाठी आपल्या भोवतालच्या-जवळच्या मंडळींना सहाय्य करणे हा दिनक्रम म्हणून अंगिकारावा, अशी पुरोगामी सहकाऱ्यांना विनंती आहे. हे प्रासंगिक घटनांबाबत चर्चा छेडून करता येते. त्यासाठी भाषणे, लेख, माध्यमांना प्रतिक्रिया, शिबिरे, निदर्शने हीच साधने आहेत असे नव्हे. ते करावेच. ते करताना आपल्या सहवासात येणाऱ्या एकट्या-दुकट्या तरुण मंडळींशी अनौपचारिक बोलण्याचे विसरु नये एवढेच. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________________

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, ऑक्टोबर २०१५)

वल्लभभाईंना नाकारायचा ५६ इंची बाणेदारपणा मोदी दाखवतील का?

‘दादरी येथील हत्याकांड आणि पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे यासारख्या घटना अतिशय दुर्दैवी अशाच आहेत. पण, त्या घटनांचा संबंध केंद्र सरकारशी जोडणे मुळीच योग्य नाही. भाजपा केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या घटना घडत आल्या आहेत. त्यावेळी ढोंगी धर्मनिरपेक्षवादी शांत राहायचे. आता भाजपा सत्तेवर असल्याने ते या घटनांना जातीय रंग देत आहेत’ -  नरेंद्र मोदी (‘आनंद बाजार पत्रिका’ या बंगाली दैनिकाला दिलेली मुलाखत)

यापूर्वीच्या व आताच्याही बहुसंख्य घटना या भाजपच्या भावकीतल्या संघटनांनी व त्यांच्याच प्रवृत्तीच्या दुसरीकडच्या कट्टरपंथीयांनी समाजात जे सांप्रदायिकतेचे विष भिनवण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यातून झालेल्या आहेत. नरेंद्र दाभोलकर किंवा कलबुर्गी यांची हत्या ज्या राज्यांत व काळात झाली त्यावेळी भाजपचे तिथे सरकार नसले तरीही याच मंडळींनी निर्माण केलेल्या विषाक्त वातावरणाचे ते बळी आहेत. आता तर भाजप (म्हणजे हीच सगळी भावकी) सत्तेत आल्याने त्यांचा उन्माद अधिकच वाढला आहे. परिणामी वातावरण अधिकच विषाक्त होत आहे. त्यामुळे राज्यात आमचे सरकार नाही किंवा पूर्वी आम्ही सत्तेत नव्हतो, ही मोदींची तांत्रिक कारणे पूर्णतः गैरलागू आहेत.

वल्लभभाई पटेल हे भाजपचे हल्ली आराध्य दैवत आहे. या वल्लभभाईंनी गांधीहत्येच्या संदर्भात त्यांच्याच परिवारातील श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रातील खालील मजकूराविषयी मोदींचे काय म्हणणे आहे?

'रा. स्व. संघ व हिंदू महासभा या संघटनांच्या व विशेषतः संघाच्या कारवायांमुळे देशात जे वातावरण तयार झाले होते, त्यामुळेच गांधींच्या खुनासारखे घृणास्पद कृत्य घडू शकले. हिंदूमहासभेला मानणारा अतिरेकी गट गांधीखुनाच्या कटात सामील होता, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. रा. स्व. संघाच्या कारवाया या राज्य व सरकार दोहोंच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरणाऱ्या आहेत.' (वल्लभभाई पटेल पत्रसंग्रह, खंड ६, पान ३२३, नवजीवन प्रकाशन, १९७३)

गांधीहत्येवेळी तर काँग्रेस सत्तेवर होती. हत्या दिल्लीत झाली. दिल्ली केंद्राच्या ताब्यात होती. नेहरु पंतप्रधान व स्वतः वल्लभभाई गृहमंत्री होते. त्या अर्थाने गांधीहत्येला तेच जबाबदार होते, असे मोदींनी म्हणायला हवे. या खूनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नथुराम गोडसेने केली असली तरी असा खून करण्यासाठी पोषक विषाक्त वातावरण ज्यांच्या कारवायांनी तयार केले गेले त्या हिंदू महासभा व रा. स्व. संघाला वल्लभभाईंनी स्पष्टपणे जबाबदार धरले आहे.

मोदी वल्लभभाईंचे शिष्योत्तम स्वतःला म्हणवत असतील, तर आपल्या या गुरुचा तर्क त्यांना मान्य आहे का? नसल्यास, वल्लभभाईंची ही मीमांसा आम्हाला मान्य नाही. आधुनिक भारताचा पाया घालणारे नेहरु मरणोत्तरही आम्हाला छळत आहेत. त्यांनी घट्ट केलेली भारताची सहिष्णू-सेक्युलर वीण अजूनही आम्हाला पूर्णतः उसवता येत नाही. उलट, मनात नसतानाही नाईलाजाने देशी-परदेशी जाहीर भाषणात तेच बोलावे लागते. म्हणून त्यांना बदनाम करुन संपविण्यासाठी कधी वल्लभभाई तर कधी नेताजी आम्ही हवे तेव्हा दत्तक घेतो, हवे तसे वापरतो, हे सांगण्याचा ५६ इंची बाणेदारपणा मोदी दाखवणार आहेत का?

- सुरेश सावंत

Thursday, October 8, 2015

गुलामअली...

गुलामअली, तुम्हाला माझ्या शहरातून माघारी जावे लागत आहे, याची मला लाज वाटते. तुम्हाला परतण्यास भाग पाडणाऱ्या धटिंगणांना मी अडवू शकत नाही, या माझ्या हतबलतेची मला घृणा येते आहे.

तुमच्या सूर व स्वरांनी मनाच्या तारा छेडल्या आणि आपण वयात आल्याचा बोध झाला. तेव्हापासून अनेक दशके तुम्ही माझे सोबती आहात. 'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना' असो की 'थोडी सी जो पी ली है' ची मस्ती असो. भावनांच्या अशा अनेक आवर्तनांत तुमच्याशी मोकळं होताना तुम्हालाही एखादा देश असणार, हे कधी ध्यानातच आलं नाही. आज ते आलं. हो, तुम्हालाही एक देश आहे. मलाही एक देश आहे. आपले देश वेगळे आहेत. या दोन देशांचे भांडण आहे, म्हणून माझ्या देशातल्या या धटिगणांनी तुम्हाला व मला भे़टू दिले नाही. तुमच्या गझलांचा आणि या दोन देशांच्या भांडणाचा काय संबंध आहे, हे मला कळत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष पाहता-भेटता येणार नाही, हे खरे. पण तसा मी प्रत्यक्ष कधीच तुम्हाला भेटलो नाही. तरीही तुम्ही माझे सोबती होता. तसेच यापुढेही राहाल.

...तरीही तुम्हाला माझ्या शहरातून परतावे लागणे व तुम्हाला परतताना असहायतेने बघणे हा घाव जिव्हारी लागला आहे, हे खरे.


- सुरेश सावंत