Saturday, December 7, 2019

उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!

असे समजू की हैद्राबादचे एनकाऊंटर अपरिहार्य असेल. पण त्यामुळे तात्काळ न्याय झाला या उन्मादी भावनेत बहुसंख्य समाज जाणे हे महाभयंकर आहे. गोरक्षकांनी गाईची हत्या केल्याचा वहीम ठेवून दलित-मुस्लिमांना ठार करणे, लव जिहादच्या नावाखाली वा खोट्या प्रतिष्ठेपायी आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना जिवे मारणे, मुले पळवतात या संशयाने एखाद्याला झुंडीने चेचून मारणे या वर्गवारीत मोडणारी वा त्यास अप्रत्यक्ष समर्थन देणारी ही लोकभावना आहे.
काहींनी तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना दिली गेलेली ही उचित श्रद्धांजली आहे, असेही म्हटले आहे. कायद्याच्या समर्थकाच्या, संविधानाच्या शिल्पकाराच्या महापरिनिर्वाण दिनी कायदा व संविधान दोन्हीना फाटा देणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. त्या व्यक्त करुन आपण एकप्रकारे या महामानवाचा अपमान करतो आहोत, याचा विवेक सुटल्याचे हे लक्षण आहे. याच दिवशी ६ डिसेंबर १९९२ ला कट्टरपंथी हिंदुत्वाच्या उन्मादी प्रभावाखालील झुंडीने बाबरी मशीद पाडली. चर्चा वा न्यायालयीन प्रक्रिया धाब्यावर बसवून घटनात्मक मार्गांना न जुमानणारा हा हुमदांडगेपणा घटनाकार बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला काळिमा फासणाराच होता. त्याच प्रकारे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी व्यक्त झालेली, वर उल्लेखलेली समाज भावना या महामानवाच्या विचारांना बट्टा लावणारीच आहे.
पोलीस तपास व न्यायिक प्रक्रिया लवकर होणे यासाठीच्या मागण्या, सूचना यांचा आग्रह धरणे बरोबर. पण त्यात विलंब होतो, म्हणून कायदा हातात घेऊन समाजाने वा पोलिसांनी अविलंब सजा देणे हे प्रगत, मानवी अधिकारांची बूज राखणाऱ्या, लोकशाही, कायद्याच्या राज्यात अजिबात समर्थनीय नाही. तो समूहाने केलेला वा पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन केलेला गुन्हाच असतो. विशेष म्हणजे, भारतासारख्या विषम समाजरचनेत दलित, अल्पसंख्याक, आर्थिक दुर्बल असेच लोक याचे भक्ष्य ठरतात, हे विसरता कामा नये.
ज्यांना पकडले गेले ते खरे गुन्हेगार नव्हते, पोलिसांनी लोकक्षोभ आवरण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या सल्ल्याने निरपराधांना अटक केले...अशा घटना आपण वाचलेल्या आहेत. अर्थात, हे फार उशीरा कळते. तोवर निरपराध नाहक आत अडकतात. बदनाम होतात. अनेकांचे आयुष्य त्यामध्ये बरबाद होते. म्हणूनच ज्यांना पकडले जाते ते कायद्याने आधी आरोपी असतात. त्यांना कायदेशीर लढाईची संधी दिली जाते. या लढाईनंतर, साक्षी-पुरावे होऊन गुन्हा शाबित झाला तर ते गुन्हेगार ठरतात. न्यायाच्या विविध पातळ्यांवर थेट राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यापर्यंत ही कायदेशीर न्यायाची संधी आरोपीला दिली जाते. विवेकी माणसांनी घटना तयार केल्याने हे घडले. हा विवेक आज दुबळा होतो आहे. घटना बनवणाऱ्यांना तो मोडीत काढायला निघाला आहे.
एखादा गुन्हेगार म्हणून सिद्ध होतो. त्याला शिक्षा होते. आणि १५-२० वर्षांनी काही नवे पुरावे मिळाल्यावर कळते की तो निर्दोष होता. अशावेळी त्याने भोगलेल्या शिक्षेचे काय? त्याला फाशी देऊ नये, या म्हणण्यामागे हाही एक तर्क आहे. फाशी देऊन मोकळे झाल्यानंतर जर पुढे कळले तो निर्दोष होता, तर त्यास पुन्हा जिवंत कसे करणार? त्याला न्याय कसा देणार? जन्मठेप असली तर तो मुक्त तरी होऊ शकतो. म्हणून कठोरात कठोर शिक्षा सक्तमजुरी असलेली जन्मठेप हीच असावी, हा आधुनिक विवेकी विचार आहे. भगतसिंगांच्या फाशीनंतर आपले राष्ट्रीय नेते स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा नसावी या मताचे होते. बाबासाहेबही या मताचे होते. पण नथुरामने गांधीजींचा खून केल्याच्या पार्श्वभूमीवर फाशी नको या मनोभूमिकेत जनमानस आणणे कठीण झाल्याने आपल्याकडे फाशीची शिक्षा राहिली.
गुन्हा करणारा माणूस हा गुन्हेगारी मानसिकता तयार करणाऱ्या परिस्थितीचे अपत्य असतो. म्हणजेच तो गुन्ह्याची अंमलबजावणी करतो. पण त्याच्या नियोजनात समाजातील विषमता, दारिद्र्य, वंचना, भेदभाव आदि विविध घटक असतात. म्हणूनच गुन्हेगाराला त्याने इतरांना जसे संपवले तसा ‘जशास तसा’ न्याय हा आधुनिक जगातील शिक्षेचा हेतू नसतो. तर त्याला सुधारुन, त्याचे माणूसपण जागे करुन त्याला पुन्हा समाजात सोडणे हा हेतू असतो. (‘दो आँखें बारह हात’ हा सिनेमा आठवा.) ज्यांना समाजात सोडणे धोकादायक आहे, त्यांना मात्र कैदेतच ठेवावे लागते. संभाव्य गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करणे हा शिक्षेचा एक हेतू असतो. पण तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. जोवर गुन्हेगार तयार करणारी परिस्थिती बदलत नाही, तोवर हे गुन्हे घटत नाहीत, असाच जगातला अनुभव आहे. हैद्राबादच्या घटनेनंतर लगेचच उन्नाव व नंतर मालदा या ठिकाणी पीडितेला जाळून मारण्याच्या घडल्या आहेत. ज्या उजेडात येत नाहीत, अशा कितीतरी घटना असू शकतात, असतात, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.
तेव्हा, आपला विवेक शाबूत ठेवूया. तात्काळ न्यायाच्या उन्मादी मोहातून बाहेर पडूया. कायद्याच्या प्रक्रियेतून आज असलेली कठोरात कठोर शिक्षा (आज ती फाशीची आहे) मिळावी, ती लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करुया. विशेष प्रयत्न गुन्हेगार तयार होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करण्यासाठी करुया. ज्यांना लोकशाही, घटना मोडीत काढायची आहे, अशा राजकीय-सांस्कृतिक फॅसिस्टांच्या हुकुमशाहीला बळ मिळेल असा कोणताही प्रतिसाद आपल्या कळत नकळत त्यांना मिळू नये याची दक्षता घेऊया. ...उन्मादी भावनेला आवरुन आत्मघाताच्या वाटेवरुन तात्काळ मागे फिरुया.
... तीच घटना निर्मात्या बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.
______________

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
MARATHI.THEWIRE.IN
गुन्हेगाराला त्याने इतरांना जसे संपवले तसा ‘जशास तसा’ न्याय हा आधुनिक जगातील शिक्षेचा हेतू नसतो. तर त्याला सुधार...

Monday, December 2, 2019

लोकशाहीला असलेल्या धोक्यांबाबत बाबासाहेबांचा इशारा व आजचे वर्तमान

या २६ नोव्हेंबर २०१९ ला भारतीय संविधानाच्या निर्मितीला सत्तर वर्षे पूर्ण झाली. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात सत्तर वर्षे हा काही मोठा काळ नव्हे; तसाच तो अगदी छोटाही नव्हे. राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ, यास समांतर असलेली सामाजिक सुधारणांची चळवळ तसेच देशोदेशीचे राजकीय-वैचारिक संग्राम यांतून अनेक आधुनिक मूल्ये उत्क्रांत व विकसित झाली. देशातील जनतेच्या वतीने घटनाकारांनी सखोल चर्चेअंती यांतील आपणास पोषक मूल्यांचा, रीतींचा समावेश भारतीय संविधानात केला. सत्तर वर्षांत याचे काय झाले, काय अडचणी आल्या, कोणती आव्हाने उभी राहिली, याचा आढावा व पुढे काय करावयाचे याची योजना आखण्यासाठी हा टप्पा जरुर महत्वाचा आहे. २०२४ ला संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतील. आपण घेतलेल्या आढाव्यातून पुढे येणाऱ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीस ही आगामी पाच वर्षे उपयुक्त ठरु शकतात. त्यादृष्टीने काही संकल्प जाहीर करता येतील. (माझा संबंध असलेल्या संविधान संवर्धन समिती या संघटनेने ‘हर घर-संविधान साक्षर’ असा संकल्प २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त काढलेल्या संविधान जागर यात्रेत जाहीर केला आहे.) 

हा आढावा विविधांगी असणार आहे. त्यातील एका अंशाला मी इथे स्पर्श करत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या डिसेंबर महिन्याच्या ६ तारखेला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त लोकशाहीच्या यशस्वितेच्या ज्या अटी बाबासाहेबांनी नमूद केल्या आहेत, त्यातील काहींचा आजच्या संदर्भात विचार करुया. 

बाबासाहेबांचे म्हणणे नमूद करण्यापूर्वी लोकशाहीबाबतच्या काही ठळक मिळकतींची नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. जात, धर्म, भाषा, प्रदेश यांची प्रचंड विविधता असलेल्या या खंडप्राय देशात लोकशाही प्रक्रिया टिकेल का, असा जागतिक पातळीवरील भल्या भल्यांना प्रश्न होता. त्यातल्या कित्येकांना तर विभिन्नता, त्यामुळे होणारे संघर्ष, निरक्षरता यांमुळे हा देश विखंडित होईल याची खात्री वाटत होती. पाकिस्तानच्या फुटीमुळे तर त्यांच्या या दाव्याला जोरदार पुष्टी मिळाली. पण तसे झाले नाही. आपल्या देशातूनच तुटलेला, धर्माच्या आधारावर उभा राहिलेला पाकिस्तान फुटला. पण विविध धर्मांचे सहअस्तित्व राखून भारत एक राहिला. बहुसंख्य निरक्षरांच्या या देशात आजवरच्या सोळा लोकसभा रीतसर मतदानातून आकाराला आल्या आहेत. अतिरेक्यांचे, नक्षलवाद्यांचे हल्ले, धमक्या यांना पार करुन त्या त्या भागात लोक मताधिकार बजावताना आढळतात. या भारतीय जनतेने अनेक मातबर पक्षांची सरकारे बदलली. पुन्हा निवडून आणली. पाकिस्तानसह आपल्या भोवतीच्या नवमुक्त देशांत अशी सलग लोकशाही नांदताना दिसत नाही. अनेक ठिकाणी लष्कराचा हस्तक्षेप, अराजक, निर्नायकीचा प्रवास दिसतो. 

भारतीय लोकशाहीचे हे निश्चित बलस्थान आहे. त्याच्या कारणांचा शोध हे अनेक इतिहासकारांना आव्हान वाटते. ते आपापल्या परीने त्यास भिडण्याचा प्रयत्नही करत असतात. त्यांचा शोध समजून घेणे हे खूप रोचक व महत्वाचे आहे. पण तो आता या लेखाचा विषय नाही. लोकशाहीची ही मिळकत गृहीत धरुन, ही लोकशाही अधिक अर्थपूर्ण होण्याच्या दृष्टीने, टिकण्याच्या व वर्धिष्णू होण्याच्या दिशेने बाबासाहेबांच्या मांडणीचा आजचा संदर्भ पाहणे ही या लेखाची सीमा आहे. 

लोकशाहीच्या यशस्वितेसाठीसाठीची पहिली अट बाबासाहेब नोंदवतात, ती म्हणजे समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे. ते म्हणतात, ‘सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांचे ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यांमध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्यांचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते.’ 

बाबासाहेब क्रांतीच्या बाजूने होते. पण हिंसात्मक क्रांतीच्या बाजूने नव्हते. खऱ्याखुऱ्या समाजसत्तावादी लोकशाहीसाठी अशी क्रांती अपरिहार्य आहे, असे काहींचे म्हणणे असले, तरी बाबासाहेब संसदीय पद्धतीने रक्तविहिन क्रांती आणू इच्छित होते. त्यांनी लोकशाहीची व्याख्याच तशी केली आहे. ते म्हणतात – ‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय.’ 

संसदीय निवडणूक पद्धत आज रुळली आहे. एकूण विकासक्रमात गरिबांची टक्केवारी कमी होणे, उपासमार कमी होणे, साधनसुविधा तयार होणे हे बदल घडलेत. पण समाजातील सर्वांच्या वाट्याला संतुलित विकास आलेला नाही. बाबासाहेब म्हणतात ती विषमता, संसाधनांची अन्यायकारक विभागणी प्रचंड वाढली आहे. अंबानींचे घर २७ माळ्यांचे आणि त्याच्या काही किलोमीटरवर तीन माळ्यांच्या कुडाच्या झोपड्या. शिवाय त्यांना शिक्का अनधिकृततेचा. त्यामुळे कुठल्याही क्षणी त्यांवर बुलडोझर फिरतो आणि त्या झोपड्यांच्या अवशेषांच्या ढिगाऱ्यावर उघडी-वाघडी कच्ची-बच्ची वळवळत, काही वेचत राहतात. त्यांवरच त्यांच्या आया चुली पेटवतात. त्याही पुढे विझून जातात. ही दोन टोके अपवादात्मक नाहीत. या दरम्यान तीव्रतेच्या टोकांची धार कमीअधिक असलेले विषमतेचे कडे व दऱ्या यांचा प्रदेश विपुल विस्तीर्ण आहे. 

एकेकाळी विविध आर्थिक स्तरांतील मुले किमान एकाच शाळेत आढळत. आता ऐपतीप्रमाणे शाळा. त्यातून तयार होणारे भावी नागरिक, देशाचे आधारस्तंभ वेगवेगळ्या कुवतीचे, उंचीचे, जाडीचे असणार. या शाळांतील, महाविद्यालयांतील शिक्षकांच्या वेतनात प्रचंड तफावत. काहींचे पगार लाखांचे तर काहींचे जेमतेम दहा-बारा हजार. ते वाढण्याचे, नोकरी कायम होण्याची काहीही शाश्वती नाही. ‘समान कामाला समान दाम’ कुठच्या कुठे फुंकून टाकणारे हे कंत्राटीकरण आता सार्वत्रिक आहे. 

उदाहरणे अनेक देता येतील. शेती, मजुरी, सेवाक्षेत्र या सर्व ग्रामीण-शहरी विभागांत विषमतेचे, अशाश्वत उत्पन्नाचे क्षेत्र हे मुख्य झाले आहे. संघटित, किमान शाश्वतीचा रोजगार नगण्य झाला आहे. त्यातच आता मंदी, आर्थिक अरिष्टाचे सावट गडद होऊ लागले आहे. 

तथापि, बाबासाहेबांना लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंतित करणाऱ्या हिंसात्मक क्रांतीची चिन्हे कुठे दिसत नाहीत. विषमतेच्या वेदनेचे स्तर एक नाहीत. त्यात अनेक पातळ्या आहेत. त्यामुळे त्यांची एकजूट होत नाही. प्रभावशाली विभागांना जात, धर्म, स्थानिक हितसंबंध तसेच तुरळकपणे तळच्या स्तरांतील नेतृत्वक्षम व्यक्तिंकडे पाझरुन येणारे लाभ यांमुळे आव्हान मिळत नाही. या सर्वांना जाणतेपणाने संघटित करणाऱ्या संघटनाचा अभाव आहे. अशी अनेक कारणे या हिंसात्मक क्रांतीच्या दिशेने न जाण्यामागे असू शकतात. 

अशावेळी रक्तविहिन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवण्याचा मार्ग संसदीय प्रणालीत कसा शोधायचा? निवडणुकीला उभे राहण्याची कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याची आज प्राज्ञा नाही. माकपच्या डहाणूतल्या उमेदवारासारखी उदाहरणे हा अपवाद आहे. करोडोंचा खर्च आमदारकीच्या निवडणुकीत होतो. लोकसभेचा तर त्याहून कैक पटीने. 

निवडणुकीच्या पद्धतीत बदल मागायचा? ...आताची एक मत जास्त मिळाले तरी निवडून येण्याची (first past the post) पद्धत बदलून त्या जागी प्रमाणशीर पद्धत आणा, ही काहींची मागणी आहे. पक्षाला लोकांनी मते द्यावीत. ज्या प्रमाणात मते मिळतील, त्या प्रमाणात पक्षांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जातील. छोट्यात छोट्या पक्षालाही प्रतिनिधीत्व मिळण्याची संभाव्यता त्यातून वाढते. यावर अधिक व व्यवहार्य विचार व्हायला हवा. घटना समितीत हा विषय आला, त्यावेळी खुद्द बाबासाहेबांनी याला विरोध केला होता. तत्कालीन भारतीय समाजस्थितीला ही पद्धत अनुरुप नाही. त्यामानाने आताची रुढ असलेली first past the post ही पद्धत अधिक सोपी व सुटसुटीत आहे. दलित-आदिवासी या अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राखीव जागांची जोड तिला आहे, असे त्यांचे समर्थन होते. त्यावेळची घटना समितीतील चर्चा व बाबासाहेबांचे म्हणणे नीट समजून घेऊन आता ७० वर्षांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर नव्याने विचार करणे अप्रस्तुत नक्कीच नाही. ही चर्चा व्हायला लागेल. इतरही पर्याय चर्चेसाठी पुढे आणावे लागतील. 

दरम्यान सत्ताधाऱ्यांवर दबाव आणणारे लोकशाही मार्गाने करावयाचे जनतेचे लढे, ‘तिचे राजकीय जाणतेपण वाढवत’ करणे चालू ठेवायला हवे. ‘राजकीय जाणतेपण वाढवत’ हे अति महत्वाचे आहे. त्यात आपण कष्टकऱ्यांचे पक्षपाती, लोकशाहीवादी कमी पडलो आहोत, हा इतिहास आहे. 

लोकशाहीच्या यशासाठी ज्या पुढच्या अटी बाबासाहेब नोंदवतात त्यात एक आहे, वैधानिक व कारभारविषयक क्षेत्रांत पाळावयाची समता. ‘कायद्यापुढे सर्व समान’ या तत्त्वाला ते इथे खूप महत्व देतात. वर चर्चिलेली समाजातली विषमता कायद्यापुढे सर्व समान या तत्त्वाला बाधा आणते. सत्ता, संपत्ती, पैसा ज्याच्याकडे आहे, त्याच्याशी पोलिसांचे वागणे आणि यापासून वंचित असलेल्याशी पोलिसांचे वागणे यातला फरक आपण रोज पाहतो. ज्याच्याकडे न्यायालयीन लढाई लढायला पैसे नाहीत, असे कितीतरी आरोपी जामिनाअभावी तुरुंगात खितपत पडलेले असतात. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. गरीब ती चढूच शकत नाही, अशी स्थिती आहे. कायदेशीर मोफत सल्ला, सरकारी वकील वगैरे बाबी फार परिणामकारक नाहीत. गरिबांची संघटना असेल तर यात काही अंतर पुढे जाता येते. शिवाय तो सामुदायिक प्रश्न असावा लागतो. अर्थात यात संघटनेलाही न्यायालयीन लढाईचा खर्च या गरिबांतून वा हितचिंतकांकडून उभारावा लागतोच. भ्रष्टाचाराविरुद्धची कायदेशीर लढाई लढताना तारखा, काही कागदपत्रे मिळवण्यासाठी खुद्द कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते. कामाच्या महत्वानुसार या लाचेच्या रकमेची जाडी ठरते. 

अनधिकृत झोपडपट्टीचा वर उल्लेख केला आहे. मुंबईत मजुरीसाठी येणारा गरीब या अनधिकृत झोपड्यांत राहतो. तो मुंबईला भार होतो. त्याला हाकलण्याच्या मोहिमा निघतात. मात्र नोकरी-व्यवसायासाठी येणारा साधन संपदेवाला भार होत नाही. तो अपार्टमेंट्समध्ये भाड्याने राहतो. यथावकाश स्वतःचा फ्लॅट घेतो. तो प्रतिष्ठित मुंबईकर बनतो. मुंबई बेटावर अगदी समुद्रात भराव घालून किती माणसे कोंबणार याला मर्यादा आहे. मुंबई फुटायच्या मार्गावर आहे. पण तिची ही अवस्था गरिबांनी केली की इथल्या सत्ताधारी, पैसेवाल्या नियोजनकर्त्यांनी? मुंबईसारख्या शहरांचे फेरनियोजन व्हायलाच हवे. पण ते कायद्याने सर्वांना समान लेखून. इथल्या गरिबांप्रती न्याय करुन. याबाबतचे भान निर्माण करण्यासाठी कष्टकऱ्यांत काम करणाऱ्या लोकशाहीवादी संघटनांनी मुंबईतल्या सर्व थरांतल्यांशी संवाद साधावा लागेल. सर्वांप्रती न्याय करणारे शहररचनेचे नवे प्रारुप मांडावे लागेल. त्यावर जनसमर्थन उभारावे लागेल. एकाच विभागाचे प्रश्न लढवून हे साधणार नाही. आपला लढा एकाकीच राहणार. 

बाबासाहेब लोकशाही यशस्वी होणासाठी पुढचा मुद्दा मांडतात तो संविधानात्मक नीतीचा. ते म्हणतात, ‘आपली राज्यघटना ही कायदेशीर तरतुदींचा व तत्त्वांचा नुसता सांगाडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमांस संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनातच मिळेल.’ अशा नीतिमत्तेचे उदाहरण म्हणून अमेरिकन जनतेला देवासमान असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची लोकांनी गळ घातली त्यावेळी ते काय उत्तरले याची नोंद बाबासाहेब अशी करतात, ‘..आपल्याला वंशपरत्वे चालणारी राजेशाही, वंशपरंपरेने येणारा राजा किंवा हुकूमशहा नको होता म्हणूनच आपण ही घटना बनविली. इंग्लिश राजाशी तुम्ही या हेतूनेच प्रेरित होऊन संबंध तोडले आहेत. मग माझी पूजा करुन मला जर तुम्ही वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्त्वांचे काय होईल?’ ..लोकाग्रहास्तव वॉशिंग्टनला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावे लागले. पण जेव्हा तिसऱ्यांदाही त्याला गळ घालण्यासाठी लोक त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने त्यांना कठोरपणे झिडकारले, अशी माहिती बाबासाहेब पुढे देतात. 

स्वतंत्र भारतातला राजकीय इतिहास पूर्णपणे या तत्त्वावर उतरला आहे असे नाही. मात्र मोदींच्या काळात तर ही घटनात्मक नैतिकता पूर्णपणे उधळून टाकलेली दिसते. रिझर्व बॅंकेला धाब्यावर बसवून नोटबंदीचा निर्णय घेणे, विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश यांच्याशी काहीही सल्लामसलत न करता पंतप्रधानांनी नको असलेल्या सीबीआय प्रमुखांची मध्यरात्री उचलबांगडी करणे, आधारला राज्यसभेच्या मंजुरीच्या अटीला बगल देण्यासाठी त्यावर वित्तविधेयकाचा बुरखा चढवणे...अशी कैक उदाहरणे सांगता येतील. या क्रमातली नुकतीच घडलेली निलाजरी घटना म्हणजे मोदी-अमित शहा दुकलीच्या गतिमान कारस्थानी कारवायांनी एका रात्रीत आलेले महाराष्ट्रातील फडणवीस-अजित पवार यांचे सरकार. ते औटघटकेचे ठरुन या दुकलीची आणि भाजपची अब्रू गेली हे चांगलेच झाले. तथापि, सत्तेच्या घोडाबाजाराला घाबरुन प्रत्येक पक्षाला आपल्या निवडून आलेल्या आमदाराला ऐषारामी हॉटेलात कैद करुन ठेवावे लागणे काय दर्शवते? अशा या आमदारांची त्यांच्या पक्षाप्रति तसेच निवडून दिलेल्या लोकांप्रति नैतिकता काय?..हेही खूप गंभीर प्रश्न आहेत. 

सर्वात त्रासदायक, भयंकर व दूरगामी परिणाम करणारे संविधानात्मक नीतिमत्तेच्या उल्लंघनाचे उदाहरण म्हणजे काश्मीरबाबतचा निर्णय. ३७० कलम रद्द करणे तसेच काश्मिरचे विभाजन करुन त्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करणे हे निर्णय कोरड्या, क्रूर तांत्रिकतेने घेतले गेले. या निर्णयांचा प्रस्ताव काश्मिरच्या विधानसभेकडून केंद्राकडे यायला हवा आणि मग तो संसदेत संमत व्हायला हवा, अशी अट आहे. काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करुन तिथली विधानसभा बरखास्त केली गेली. केंद्राला हवा तो प्रस्ताव काश्मिरच्या राज्यपालांनी काश्मिरच्या वतीने केंद्राला पाठवला. ते काश्मिरच्या जनतेचे मत असे धरण्यात आले. त्याआधारे अमित शहांनी एके दिवशी सकाळी राज्यसभेत विधेयक मांडले. कोणतेही विधेयक मांडल्यानंतर ते सर्व सदस्यांना वितरित करुन अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी ते चर्चेला घेतले जाते. तिथे त्यावर सहमती नाही झाली तर संसदीय चिकित्सा समिती नेमली जाते. तिच्या शिफारशींनंतर पुन्हा चर्चा होते आणि मग मतदान होते. ही रीत धुडकावून, विरोधकांतील काहींना साम-दामाकरवी आधीच आपल्या बाजूला वळवले असल्याने, विधेयक मांडलेल्या दिवशीच हुमदांडगेपणाने ते मंजूर करवून घेतले. लोकसभेत तर भाजपला राक्षसी बहुमत आहे. तिथेही एका दिवसात ते मंजूर झाले. हे करत असताना काश्मिरचे नेते स्थानबद्ध होते. जनता पोलिस पहाऱ्यात होती. अजूनही आहे. ज्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे असे मोदी-शहा म्हणतात, ती जनता बंदीवान करुन, तिला न विचारता तिचे हित परस्पर हे ठरवतात कसे? 

....काश्मिरबाबतचा हा निर्णय घटनात्मक नीतीच्या चिंधड्या उडवणारा आहे. घटनाच उध्वस्त करणारा आहे. काश्मीर बाहेरची बहुसंख्य भारतीय जनता राष्ट्रवादाच्या उन्मादात ही घटनात्मक नैतिकता पायदळी तुडवण्यात आज सहभागी आहे. तिला शहाणे करणे, घटनात्मक संकेतांचे, मूल्यांचे, नैतिकतेचे भान देणे याकडे लोकशाहीवादी पक्ष, संघटना, व्यक्ती यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्याचा हा घोर परिणाम आज भोगावा लागतो आहे. 

लोकशाही यशस्वी होण्यासाठीची जी पुढची अट बाबासाहेब नोंदवतात तिलाही तिलांजली देण्याचे पातक मोदी-शहा कसे करत आहेत, ते या काश्मिरच्याच उदाहरणातून दिसते. बाबासाहेब म्हणतात, ‘लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्याकांची (अल्पमतवाल्यांची) गळचेपी होता कामा नये. अल्पसंख्याकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्याक मंडळी कारभार करत असली तरी आपल्याला इजा पोहोचणार नाही. आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्याकांना मिळाली पाहिजे.’ 

काश्मिरमधले मुस्लिम अल्पसंख्य आज सुरक्षितता अनुभवत आहेत? संघपरिवारातील सैतानांकरवी गोरक्षणाच्या नावाखाली, घरवापसीच्या मोहिमांद्वारे मुस्लिमांचा जो छळवाद होतो आहे, त्यांना चेचून ठार केले जाते आहे..यातून त्यांना कोणत्या सुरक्षेची हमी मिळते आहे? 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७.४ टक्के मते मिळाली. त्यातली सर्वसाधारणपणे ३५ टक्के मते (सर्व जातीय) हिंदूंची आहेत. सत्तेवर येण्यासाठी मुस्लिमांच्या मतांची मुदलातच त्यांना गरज उरलेली नाही. घटनात्मक नैतिकतेची बूज ही तर फार दूरची गोष्ट झाली. हिंदुराष्ट्रात मुस्लीम दुय्यम ही अवस्था आता आलीच आहे. बाबरी मशिदीच्या निकालाचे तर्क, आधार काहीही असोत; हिंदुराष्ट्रात मुस्लिमांचे दुय्यम नागरिकत्व या संघस्वप्नास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मदतच झाली आहे. 

‘कायदा पाळला जाण्याइतपत सामाजिक नीती समाजात निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणाऱ्यांना मिळाली पाहिजे’ अशी लोकशाही रक्षणाची पुढची अट बाबासाहेब सांगतात. ज्यांचा संविधानाला आणि त्यातल्या सर्व आधुनिक मूल्यांना विरोध होता, तेच संविधानाची खोटी शपथ घेऊन सत्तेवर आले असताना बाबासाहेबांची ही अपेक्षा फिजूल आहे. हिताचे असोत-नसोत, ते ठरवतील ते कायदे जनतेने पाळलेच पाहिजेत, ही सत्ताधाऱ्यांची धमकी आहे. स्वतःहून कायदे पाळण्याच्या सामाजिक नीतीच्या आवाहनाची पूर्वअट समाजाच्या सहमतीने, घटना मानणाऱ्या तिच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधींनी ते कायदे केलेले असणे ही आहे. तीच धुडकावून लावली जात असताना बाबासाहेबांची वरील अपेक्षा आज निरर्थक ठरते. 

लोकशाही यशस्वी होण्यासाठीच्या अटींतला शेवटचा मुद्दा ते नोंदवतात तो विवेकी लोकमताचा. ते म्हणतात, ‘अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समष्टीची सद्सद्विवेकबुद्धी. सार्वजनिक विवेकबुद्धी याचा अर्थच असा की, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस मग तो अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो.’ 

एकतर सरकार व त्याचे वैचारिक तसेच सामाजिक आधार मागास, सांप्रदायिक विचार-मनोवृत्तीचे आणि एकूण आत्मकेंद्रित्वाचा समाजातला उभार यांतून आज जात-धर्माच्या नावाने संकीर्ण वृत्ती बळावली आहे. तीत या सार्वजनिक विवेकबुद्धीचा बळी जातो आहे. फाळणीच्या वेळीही विवेकबुद्धी धोक्यात आली होती. पण नेहरु, गांधी, मौलाना आझाद नावाची शहाणी नेतृत्वं समाजावर प्रभाव गाजवत होती. बाबासाहेबांसारखे महामानव हे शहाणपण संविधानात आणि समाजात रुजवत होते. त्यांच्या शब्दाला समाजात किंमत होती. आज अशा नेतृत्वांची पूर्ण वानवा आहे. म्हणूनच आजचा धोका अधिक भयंकर आहे. 

भारतीय समाज त्याच्या अंगभूत सुज्ञतेतून अनेक पेचांतून मार्ग काढत आला आहे. नवी नेतृत्वं क्रमात तयार झाली आहेत. त्यावर भरवसा ठेवतोच आहे मी. पण आजची स्थिती बाबासाहेबांनी अपेक्षिलेल्या लोकशाही रक्षणाच्या दृष्टीने अजिबात आश्वासक नाही. उलट त्यांनी नमूद केलेले लोकशाहीला असलेले धोके अधिकच तरारुन पुढे आले आहेत. 

ही स्थिती कबूल करु. तरच त्यावर काही विचार करु शकू. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, डिसेंबर २०१९)

Friday, November 1, 2019

संवादाचा दुस्तर घाट पार करण्यासाठी

“मैं आपकी सभी बातों से मुआफिक नहीं हूँ. फिर भी आपसे बात करना चाहता हूँ. हमारे मदरसा में आप जरुर आईएगा.” 

मौलवींच्या या वक्तव्याने मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. वास्तविक ‘मुआफिक’ या शब्दाचा नेमका अर्थ मला ठाऊक नव्हता. पण संदर्भाने अंदाज आला. माझ्या मांडणीतल्या सर्व बाबींशी ते सहमत नसले तरी माझ्याशी संवाद, संपर्क ठेवू इच्छितात एवढे उमगले. ‘जरुर बात करेंगे’ असे मी त्यांना म्हणालो. नंतर शब्दकोशात पाहिले. मुआफिक हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ अनुकूल असा आहे, असे समजले. म्हणजे माझा अंदाज बरोबर निघाला. 

संविधानातल्या मूल्यांचा प्रचार-प्रसार हा हल्ली माझा मुख्य व्याप बनला आहे. त्यासाठीची शिबिरे, सत्रे, व्याख्याने यांसाठी शाळा, कॉलेज, वस्त्या असे जमेल तिथे जात असतो. जमेल त्या लोकांना भेटत असतो. बहुधा सहमतीत असणाऱ्या नेहमीच्या पुरोगामी वर्तुळाच्या पलीकडच्या समुदायांना भेटण्याचा प्रयत्न असतो. अशाच एका सत्रावेळी हे मौलवी भेटले. 

हे मौलवी माझ्या म्हणण्याला पूर्ण अनुकूल नव्हते. तरीही मला कृतकृत्य का वाटले? 

मतभेदासहित ते माझ्याशी संवाद ठेवू इच्छित होते. अशा संवादाला मी खुला आहे हा विश्वास माझ्या मांडणीतून त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा मला आनंद झाला. भोवतालच्या वाढत्या असहिष्णू वातावरणात, समविचारी मंडळींचे सहज कंपू होत असलेल्या काळात, भिन्न मतांच्या माणसांशी संपर्क-संवाद दुरापास्त होत असलेल्या माहोलात या मौलवींना हा विश्वास मी देऊ शकलो, हे माझ्या कृतकृत्यतेचे कारण आहे. 

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ही माणसे संवादाला-मतभिन्नतेला मोकळी होती. त्यांच्या म्हणण्याशी मुआफिक नसलेल्यांना त्यांच्याशी बोलता आले असते. थेट तोंडावर टीका करता आली असती. त्यांच्या मतांचा प्रतिवाद करणारे लेख लिहिता आले असते. सभा घेता आल्या असत्या. सनदशीर निदर्शने करता आली असती. पण त्यांच्या मतांना विरोध असलेल्या काही कडव्या विरोधकांनी चक्क त्यांना संपवले. त्यांचे खून केले. त्या देहांची वाचा कायमची बंद केली. त्यांच्याशी संवादाची शक्यताच संपवली. 

काही देहांची वाचा बंद करुन काही काळ दहशत माजवता येते. हा काही काळ दीर्घही असू शकतो. पण ही स्थिती कायमस्वरुपी असू शकत नाही. काळाचे अनेक वळसे पडून कमी-अधिक सशक्त प्रतिरोध उभे राहतातच. याला जगाचा इतिहास साक्षी आहे. त्याला कारण माणसाची घडण. विविध संदर्भात ती समजून घेऊ. 

माणूस फक्त ध्वनी काढून अन्य प्राण्यांप्रमाणे दुसऱ्या माणसाला इशारे देत नाही. अन्य प्राण्यांपासून वेगळा होऊन माणसात उत्क्रांत होत असताना त्याला विचारशक्ती लाभली. ही विचारशक्ती त्याच्या अनुभवाच्या संचितावर आधारलेली असते. प्रत्येक मनुष्याचे अनुभव व त्याला प्रतिसाद देणारी त्याची विचारशक्ती, भावनाशीलता यांचे स्वरुप एकसारखे नसते. साहजिकच प्रत्येक मनुष्य आणि त्याचा विचार अनन्य असतो. वैचारिक वर्गवारीत ढोबळपणे एका विचाराची माणसे असे आपण म्हणत असलो, हितसंबंधांच्या सारखेपणामुळे ही माणसे एका गटात दिसत असली, तरीही ती हुबेहूब एका विचाराची नसतात. तशी असलीच तर ती माणसे असू शकत नाहीत. मतांचे व विचारप्रक्रियेचे साम्य नसलेली माणसे जीवनव्यवहार एकत्र करत असतात. टारझनसारखी एकटीच रानात वेलींवरुन झोका घेत, झेपावत नसतात. टारझनही कुकारा देतो. पण तो मुख्यतः प्राणी पातळीवरचा असतो. कुटुंबात, शाळा-कॉलेजात, कार्यालयात, समाजात, देशात जे काही माणसे करत असतात, ते परस्परांशी क्रिया-प्रतिक्रिया करत. ही क्रिया-प्रतिक्रिया आपापतः होत नाही. ती सहेतुक, विचारपूर्वक होत असते. संवाद हे त्याचे प्रमुख माध्यम असते. माणसाचे हे नैसर्गिक वास्तव आहे. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाचा गणपती बसवणे ही काही फार विचार करण्याची बाब नव्हे. तरीही मंडळाची बैठक होते. त्यात मूर्तीचा आकार, स्वरुप, देखावा, वर्गणी यांची चर्चा होते. वेगवेगळी मते येतात. त्यातून सहमती साधावी लागते. ती नाही साधली तर भांडणे होतात. तट पडतात. मंडळ फुटते. दोन वेगळे गणपती बसतात. वेगळे गणपती बसवणाऱ्यांनाही आपल्या गटात चर्चेची प्रक्रिया करावीच लागते. गणपती याबाबत सद्बुद्धी द्यायला अक्षम असतो. माणसांनाच ती जबाबदारी पार पाडावी लागते. मते वेगळी म्हणून मंडळ फुटून वेगळा गणपती इथवर ठीक. पण जर यात कोणी कोणाचा उपमर्द केला-हिशेबावरुन, पुढे पुढे मिरवण्यावरुन; तर आवाज चढतात, मारामाऱ्या होतात, प्रसंगी रक्त सांडते. याला माणूसजात म्हणून आपण कबुली देतो का? ..नाही देत. बोला. बोलून प्रश्न सोडवा. नसेल पटत तर वेगळे व्हा. कोणी कोणाला आडवे येऊ नका, असाच सल्ला शहाणीसुरती माणसे देतात. कुटुंब, मंडळ, देश, जग या माणसांशी संबंधित सर्व क्षेत्रांना हे शहाणपण लागू असते. 

राष्ट्राबाबतीत सूत्र हेच पण परिमाण मोठे असते. साहजिकच त्याचे परिणामही व्यापक असतात. चांगले तसेच वाईटही. स्वातंत्र्य चळवळीत अनेक हितसंबंधांचा मेळ साधत, स्वतंत्र भारत काय दिशेने पुढे न्यायचा यावर सहमती विकसित करत आपण पुढे सरकलो. आपल्यातील एका विभागाला आपण या सहमतीत नाही आणू शकलो. त्याने आपला दुसरा देश केला. ही प्रक्रिया रक्तलांच्छित झाली. ती अपरिहार्य होती का? ..जे झाले ते झाले. आता तो भूतकाळ आहे, असे म्हणून नाही चालत. संवादाचे पूल कोठे ढासळले, तिथे काय कमकुवत होते, हे आज शोधणे निरर्थक नाही. आपल्या त्या भूतकाळाचे ओझे आणि ताण अजूनही आहेत. दोन्हीकडचे काही लोक त्या वेळच्या जखमांवर खपल्या धरुच देत नाहीत. या जखमा भराव्यात, नव्या तयार होऊ नयेत यासाठी संवादाच्या पुलामधील कमकुवत जागा शोधून त्या दुरुस्त कराव्या लागतील. नवे पूलही बांधावे लागतील. 

काश्मीर प्रश्नावर बोलताना इम्रान खान आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, याची पुन्हा पुन्हा आठवण करुन देत आहेत. याला उत्तर आमच्या भारताकडेही अणुबॉम्ब आहे, एवढेच असू शकते का? आमच्याकडे किमान लोकशाही आहे. इथले लष्कर लोकनियुक्त प्रतिनिधींचे आदेश ऐकते. पाकिस्तानमध्ये पंतप्रधान बाहुला आहे. लष्कर खरे सत्ताधारी आहे. त्या देशात अंतर्गत लोकशाही संवादाची वानवा आहे. कोणीही अणुबॉम्ब टाकला तरी दोन्हीकडे संहार होऊ शकतो, हे वास्तव आहे. म्हणून या वास्तवाला घाबरून कोणी तो मार्ग अनुसरणारच नाही, या विवेकाची खात्री आज देता येत नाही. आत्मघाती पथके, स्वतःच्याच लोकांना मारणाऱ्या तालिबानी वृत्ती हे नव्या जगाचे एक ठळक वास्तव आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन लोकशाहीचा गळा घोटणारे आणि जग टाचेखाली आणण्याचे मनसुबे रचणारे माथेफिरु सत्तास्थानी गेलेले, जात असलेले आपण आजच्या जगात बघत आहोत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘राष्ट्र म्हणजे सर्वसहमतीने जगणे, राष्ट्र ही सांघिक संवादाच्या अनुभवाची पद्धती असते.’ आपल्या देशातल्याच एका विभागाला न विचारता, त्याच्याशी कोणताही संवाद न साधता, त्याच्या नेत्यांना बंदिवान करुन त्याच्या विभाजनाचा, त्याला घटनेने दिलेल्या खास अस्तित्वाचा अधिकार आपण तांत्रिक लोकशाहीने काढून घेतो. काश्मिरच्या विभाजनाचा आणि ३७० कलम काढून घेण्याचा जो निर्णय संसदेत झाला, ती केवळ बहुमताच्या ताकदीने रेटलेली तांत्रिकता होती. लोकशाही बहुमताच्या यांत्रिक प्रक्रियेवर टिकत नसते. अल्पसंख्याकांशी संवाद, त्यांना सुरक्षित वाटेल असा बहुसंख्याकांचा व्यवहार हे लोकशाहीचे अभिन्न अंग असते. बाबासाहेब आंबेडकर, पं. नेहरु यांसारख्या संविधानाच्या-देशाच्या रचनाकारांनी हे सतत अधोरेखित केले आहे. बाबासाहेब म्हणतात तो सांघिक संवाद आज देशात पायदळी तुडवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. हा देशांतर्गत संवाद मजबूत असणे, त्या आधारे अन्य देशांशी संवाद करणे यातूनच आपण व तेही टिकू शकतात. पुढे जाऊ शकतात. 

माणूस प्राण्यांहून वेगळ्या रीतीने उत्क्रांत झाल्याचा उल्लेख वर आलाच आहे. अन्य प्राण्यांप्रमाणे जगणे हा एकच हेतू वा प्रेरणा माणसाची नसते. हे जगणे कसे असावे याबाबत त्याची भूमिका असते. काही मापदंड असतात. केवळ भौतिक सुख त्याला पुरेसे नसते, त्याच्या जगण्याची शान त्याची अस्मिता, स्वत्व शाबूत राहण्यात असते. काश्मिरी जनतेला कितीही सुखसुविधांचे प्रलोभन दाखवले, या सुविधा प्रत्यक्षात आणल्या, तरीही ती ज्याला स्वत्व मानते ते तिने गमावल्याची भावना तेथील बहुसंख्याकांची राहणार. ३७० कलम किती पातळ झाले होते किंवा आता ते निरर्थकच आहे, हे काश्मिरबाहेरच्यांचे म्हणणे असू शकते. जे काही माझे होते, जसे होते, ते तुम्ही मला न विचारता, माझ्याशी कोणताही संवाद न करता हिरावून घेतलेत, ही काश्मिरी जनतेची वेदना असणारच. तिला कोणत्याही स्पष्टीकरणाने वा भौतिक सुखसुविधांच्या आश्वासनांनी वा अंमलबजावणीने उतार पडणार नाही. खड्या सैन्याच्या जोरावर, चहुकडून नाकेबंदी करुन, त्यांच्या नेत्यांना कैदेत टाकून काश्मीर शांत ठेवण्याला मर्यादा पडणारच. जेव्हा कधी हे पहारे उठतील, त्यावेळी उद्रेक होणे अटळ आहे. भारताच्या सांघिक रचनेचा भाग काश्मीरचा भूप्रदेश नव्हे, तर तेथील जनता आहे. बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे ‘राष्ट्र ही सांघिक संवादाच्या अनुभवाची पद्धती’ असेल, तर काश्मिरी जनतेशी संवाद करावाच लागेल. मनाने माणसे आधी वेगळी होतात, नंतर घरे तुटतात. देशाचेही तसेच असते. सैन्यबळाच्या जोरावर काश्मीरचा भूगोल आमच्या ताब्यात असेल, पण तेथील जनतेची मने देशापासून तुटलेली असतील. 

भारतीय जनतेला आपण हे समजावणार कसे? बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाचा ज्वर चढतोच आहे. या ज्वराधीनतेत अल्पसंख्याक मुस्लिमांची प्रतिमा तिला विकटच दिसते. घरातले सगळे सेक्युलर असलेल्या आमच्या एका सहकाऱ्याला मध्यंतरी आलेला अनुभव हादरवणारा आहे. त्याचा लहान मुलगा मॉलमध्ये एका टोपी व दाढी असलेल्या मुस्लिम माणसाकडे बोट दाखवत म्हणाला- ‘Papa, see the bad guy!’ 

या मुलाला मुस्लिम मनुष्य वाईट असतो, हे घरातून तर कळले नव्हते. म्हणजेच, शेजारीपाजारी, त्याचे मित्र बोलतात त्यातून, अन्य नातेवाईकांच्या बोलण्यातून, तो जिथे शिकतो तेथून त्याच्या कानावर असे काही संवाद आले असतील, ज्यातून मुस्लिम मनुष्याबद्दलची त्याच्या मनात अशी प्रतिमा तयार झाली. 

म्हणूनच, जनतेला असे संवाद करु नका असे समजावत राहावे लागेल. आज जरी ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसली तरी तिच्याशी संवाद चालू ठेवावा लागेल. कोवळ्या मुलांची मनेही कोवळी असतात. त्यावर उमटणारे ठसे खोल असतात. कुटुंबातले लोक एकत्र गप्पा मारत बसले असताना एखाद्याविषयीचे मतभेद सरळपणे मांडावेत. आपल्या बोलण्यातून एखाद्या समूहाची खलनायकी प्रतिमा मुलांच्या मनात तयार होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असे आवाहन तिला करत राहावे लागेल. आपल्याच मुलांची मने आपण नासवतो, हे पटवत राहावे लागेल. 

आज संवादाचे घाट दुस्तर झालेत हे खरे. एका बाजूला खाई, दुसरीकडे ढासळणारे कडे अशातून आपण चाललो आहोत. असे असले तरी आपली परंपरा ही संवादाची आहे, हे विसरुया नको. अमर्त्य सेन भारतीयांचे वर्णन ‘Argumentative Indian’ (वाद-संवादप्रिय भारतीय) असे करतात. याच शीर्षकाच्या पुस्तकात आपल्या संस्कृतीतील त्याची कितीतरी उदाहरणे ते देतात. त्यांचे स्मरण जागवावे लागेल. वर्तमानातली अशी उदाहरणे पुढे आणावी लागतील. भारतीय विविधतेचे स्वाभाविक सूत्र मतमतांतरे, संघर्ष, संवाद यांसह एकत्रित प्रवाहित राहणे हे आहे. त्याचे धार्मिक मान्यता वा भाषा कशाच्याही आधाराने एकसाचीकरण करणे हे त्याच्या स्वाभाविक प्रकृतिविरोधात आहे. एकसाचीकरणाची छेडछाड काहींना यशोगामी वाटली तरी तिची अंतिम परिणती भारतीयत्वाची विण उसवण्यातच होऊ शकते. म्हणूनच परस्पर संवादी भारतीयत्वाचे धागे बळकट करण्यातच देशाचे हित आहे. 

संवाद हरवण्याला प्रतिगामीच कारण असतात असे नाही. पुरोगाम्यांतही आपल्यालाच सत्य गवसल्याचा आणि आपली बाजूच बरोबर असल्याचा अहंगंड मुबलक आढळतो. प्रतिपक्षावर वार करणे, वकिली युक्तिवादाने त्याला नामोहरम करणे, त्याची खिल्ली उडवणे हे त्यांना लढ्याचे मार्ग वाटतात. या मार्गांनी प्रतिपक्षाशी सहमत असणाऱ्या सामान्यजनांच्या समजात भर पडून ते आपल्या बाजूला येणे सोडाच; ते अधिकच दुसऱ्या बाजूला जातात. ज्या बुद्धाविषयी पुरोगामी वर्तुळात बरीच आस्था असते, त्या बुद्धाच्या ‘सम्यक वाचा’ या तत्त्वाचे आचरण करणारे या वर्तुळात अल्पसंख्याक आहेत. 

व्यक्तीच्या अनुभवाला, वाचनाला, चिंतनाला त्याच्या जीवनकालाची, मिळालेल्या परिसराची, त्याच्या आकलनक्षमतेची मर्यादा असते. त्याला कळले ती सत्याची एक बाजू असू शकते. अशाच मर्यादा असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला कळलेली बाब आणखी वेगळी असू शकते. अशा अनेकांनी विनम्रतेने परस्परांशी संवाद केला, त्यांना कळले ते समजून घेतले, अगदी कट्टर विरोधकाशीही आदराने चर्चेची तयारी ठेवली, तरच समग्र सत्याच्या आकलनाच्या दिशेने अधिक पुढे जाता येईल. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ याचा अर्थ हाच आहे. 

संवादाचे आजचे दुस्तर घाट सहज-सोपे करण्यासाठी हीच भूमिका व वृत्ती हवी. ती अंगात बाणली तर विरोधी मतांच्या माणसांना देहाने संपवणे मग निरर्थक होऊन जाईल. ‘मैं आपसे मुआफिक नहीं हूँ’ हे मोकळेपणाने सांगितले जाईल. कुणाची खिल्ली उडवणे, त्याला नामोहरम करणे यांत कोणाला रस उरणार नाही. हितसंबंधांचे विरोध, मतभेद जरुर राहतील. त्यावर उदंड चर्चा झडत राहतील. वादविवाद होत राहतील. सामान्यजन त्यातले पटेल ते स्वीकारतील. जे पटले त्यावरही पुढे प्रश्न उभे राहतील. त्यांच्या सोडवणुकीचा क्रमही हाच राहील. 

हे सगळे आदर्श स्वप्न आहे ना? ...हो. आहे! पण अशक्य आहे का? तुम्ही ‘नाही’ म्हणावे अशी अपेक्षा आहे. पण ‘हो’ म्हणालात तर? ...तर मी म्हणेन, ‘मैं आपसे मुआफिक नहीं हूँ.’ 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुरुष उवाच, दिवाळी, २०१९)

हमरस्ते नाकारणारेच नव्या वाटा मळतात

‘हमरस्ता नाकारताना’ हे सामाजिक कार्यकर्त्या सरिता आवाड यांचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले आत्मचरित्र. पुस्तक लिहीत असताना आणि ते प्रकाशित झाल्यावर मला त्यांचा फोन आला. विचारवेध, दक्षिणायन आदि उपक्रमांतून त्यांच्याशी कार्यकर्ता या नात्याने माझा संपर्क-संवाद होता. त्यातून माझ्या सामाजिक व वैचारिक पार्श्वभूमीचा त्यांना परिचय झाला होता. त्यामुळे या पुस्तकाबद्दल - मुख्यतः त्यांच्या नवऱ्याविषयीच्या माझ्या अभिप्रायाबद्दल त्यांना उत्सुकता होती. पुस्तक वाचून मी त्यांना पत्र लिहिले. ते वैयक्तिक होते. पण आता लक्षात आले की काही संदर्भ व संबोधने वगळता ते तसे वैयक्तिक राहत नाही. शिवाय जे म्हणून वैयक्तिक आहे, ते लेखिकेनेच नावानिशी मोकळेपणाने लिहिले आहे. म्हणजेच वैयक्तिक आधीच सार्वजनिक झाले आहे. मग मी लिहिलेला अभिप्राय तरी वैयक्तिक ठेवण्यात काय हशील? म्हणूनच लेखिकेच्या अनुमतीने हा अभिप्राय सार्वजनिक करत आहे. 

__________________________________ 


प्रिय सरिता आवाड, 

सविनय स्नेह. 

‘हमरस्ता नाकारताना’ हे तुमचं आत्मचरित्र वाचून खाली ठेवलं आणि तुम्हाला लिहायला बसलोय. मुद्द्यांचा विचार केलेला नाही. संदर्भ, अवतरणे काढलेली नाहीत. सरळ लिहायला सुरु केले आहे. आता जसे जे मनात येईल ते नोंदवत जाणार आहे. 

मला कल्पना आहे, तुम्हाला उत्सुकता आहे ती तुमच्या नवऱ्याबाबत, म्हणजे रमेशविषयीच्या माझ्या प्रतिक्रियेची. आम्ही दोघेही बौद्ध. पुरोगामी चळवळीशी संबंधित. दोघांचेही आंतरजातीय लग्न झालेले. त्यामुळे अशी उत्सुकता तुम्हाला असणे स्वाभाविकच. पुस्तक वाचायला घेताना मलाही तुमच्या दोघांचे नाते, तुमचा संसार, सासर, त्यात तुम्हाला कसे स्वीकारले गेले, तुमच्या घरच्यांनी कसा प्रतिसाद दिला, हे समजून घेण्याची घाई होती. आणि पुस्तकाची पाने कशीही उलटता, वाचता येत असल्याने थेट तुम्हा दोघांचे नाते सुरु होते, तिथे मी जाऊही शकत होतो. पण तसे केले नाही. कोठून, कसा, किती पाहायचा याचे आपल्या हाती नियंत्रण नसलेल्या थिएटरमधील सिनेमाप्रमाणे पुस्तक मी आरंभापासून शांतपणे वाचत गेलो. सुरुवात, शेवट, मध्य अशा कुठेही उड्या मारल्या नाहीत. त्यामुळे तुमच्या चरित्राचे एक सलग व समग्र चित्र उलगडायला मदत झाली. 

तुमच्या दोन्ही आजोळांतले ब्राम्हणी वातावरण मला अपरिचित नाही. म्हणजे त्यात प्रत्यक्ष वावरलो आहे असे नव्हे. नावाजलेल्या लेखकांत ब्राम्हणच बहुसंख्य असल्याने त्यांचेच साहित्य माझ्याकडून प्रारंभी अधिक वाचले गेले. त्यात जरठ-कुमारी विवाह, विधवांची करुण स्थिती हे सार्वत्रिक संदर्भ असत. पण ते खूप जुने, ऐतिहासिक असेच वाटत. माझ्या भोवतालच्या ब्राम्हण कुटुंबांत पती-पत्नीच्या वयात तब्बल तीस वर्षांचे अंतर माझ्या पाहण्यात नव्हते. तुमच्या दोन्हीकडच्या आज्या ९-१३ वर्षांच्या आणि त्यांचे नवरे, म्हणजे तुमचे आजोबा ४०-४२ वर्षांचे. या आज्या कुमारिका आणि आजोबा पुनर्विवाहाची धर्माने परवानगी असलेले विधुर. थ्रीडीच्या आभासी वास्तवातील डायनॉसोर एकदम अंगावर येतो, तसे हे वास्तवातील भयंकर विजोड स्त्री-पुरुष नातेसंबंध माझ्या अंगावर आले. अगदी तुमच्या आज्यांपर्यंत हे असेल असे वाटले नव्हते. अर्थात ते माझे अज्ञान होते. माझ्या या अज्ञानाला अजून एक कारण म्हणजे माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या परिचयाच्या कोणाच्याच घरात असा इतिहास नव्हता. विधुर वा विधवा असत. पण ठरवले तर दोघांचीही पुन्हा लग्ने होत असत. हा प्रश्न उच्चवर्णीय ब्राम्हण समकक्ष जातींचा होता. आपल्या वडिलांच्या किंवा त्याहून मोठ्या वयाच्या पुरुषांशी या मुली कशा रत होत असतील, त्यात काय आनंद त्यांना मिळत असेल, याची मला कल्पनाच करवत नाही. ज्या स्त्री-पुरुषांची स्वतःची निवड असते, त्याला वयाचा हा संदर्भ गैरलागू आहे हे मी मानतो. पण माणसाच्या इच्छेचा काहीही विचार न करता रीत, धर्म म्हणून हे केले जाते, त्यावेळी काय? परांडे आजीच्या जवळपास समवयीन असलेल्या जावयाबद्दलच्या अस्फुट भावनांचा उल्लेख तुम्ही केला आहेच. काहीही न उमलता, किंवा उमललेलं कुस्करुन टाकत धर्माच्या नावाने निर्माल्य होणं हे केवळ भयंकर आहे! 

सगळ्या रीतीभाती सांभाळत घर उभं करणाऱ्या या कर्तृत्ववान परांडे आजीची पुढे नावारुपाला आलेली कर्तृत्ववान लेक म्हणजे तुमची आई - प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळी. तुमच्याशी माझा परिचय अलीकडे काही वर्षांचा. पण तुमच्या आईंचे लेखकपण बऱ्याच वर्षांचे ठाऊक असलेले. लोकसत्तेत तुमच्या या आत्मकथनाचा सुप्रसिद्ध लेखिका आसलेल्या आईला (नावाचा उल्लेख न करता) उद्देशून लिहिलेला अंश प्रसिद्ध झाला, त्यावेळी माझी उत्सुकता चाळवली. नंतर कळले सुमती देवस्थळी या त्या लेखिका. त्यांचे हे लेखिका म्हणून नावारुपाला येणे नंतरचे. अगदी लहानपणापासून त्यांच्यात काही स्वतंत्र वृत्तीचे अंकुर, जिद्द होती, तरीही त्या शिक्षण सोडून पारंपरिक लग्न-संसाराला सामोरे गेल्या. तो संसार एकीकडे निभवत असताना त्याच्याशी, नवऱ्याशी त्या समरस होऊ शकल्या नाहीत. स्वतःच्या शोधाचा संघर्ष त्यांच्या आत धुमसत राहिला. राहिलेले शिक्षण पुरे करत, नोकरी करत पुढे त्यांनी स्वकर्तृत्वाने प्रथितयश लेखिकेचा मुक्काम गाठला. अर्थात, त्यांची अस्वस्थता, संसारातील आधे-अधुरेपणाची त्यांना त्रस्त करणारी भावना काही संपली नाही. प्रतिष्ठेच्या या मुक्कामावर पोहोचताना किंवा पोहोचल्यावरही त्यांच्या मनातल्या प्रतिष्ठेच्या रुढ चौकटी काही ढिल्या झाल्या नाहीत. या चौकटीतल्या प्रतिमेप्रमाणे मुलगी म्हणून तुम्हाला घडवायचे त्यांनी अपार प्रयत्न केले. रमेशच्या तुमच्या निवडीने ही चौकट मुळासकट उध्वस्त झाली. एका मोठ्या लेखिकेच्या मनातही पारंपरिक जात-वर्गाच्या श्रेणी इतक्या बळकट असू शकतात, याची प्रचिती वाचकाच्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला धक्का लावतेच. पण तुम्हाला लेक म्हणूनही आईचे वागणे, तिचे रमेशच्याविषयी अनुदार उद्गार खूप धक्कादायक होते, हे कळते. आईचा हमरस्त्याचा आग्रह तुम्ही नाकारलात. स्वतःचे जग स्वतः घडवायला बाहेर पडलात. 

भूमिकेच्या, विचारांच्या पातळीवर मी तुमच्या बाजूने असलो तरी तुमची आजी, तुमची आई व तुम्ही या तिघींतही एक समान स्फुल्लिंग मला आढळते. ते म्हणजे असलेली स्थिती मुकाट न स्वीकारता आपापल्या परीने ती बदलण्याची जिद्द. त्या अर्थाने हमरस्ता तुमच्याबरोबरच आधीच्या या दोघींनीही आपापल्या संदर्भात सोडलेला आहे, असे मला वाटते. दिल्या घरी यथास्थिती त्या राहिल्या नाहीत. अर्थात, तुमच्या बंडखोरीतून एका नव्या, आधुनिक जीवनाची वाट प्रशस्त होते. पारंपरिक प्रतिष्ठेच्या, सुखाच्या चौकटी तुम्ही नाकारल्यात. तुमच्या सुखाची व्याख्या वेगळी होती. त्यामुळे तुमच्या हमरस्ता नाकारण्याची प्रत निश्चित वेगळी आहे. आजीला जे शक्य नव्हते, ते ‘नवे’ रमेश व तुमच्या नात्याचा स्वीकार करुन तुमची आई रचू शकली असती. पण त्यांच्या नवरा, कुटुंब याविषयीच्या अपेक्षाभंगातून आलेले कुचंबलेपण, त्याला प्रतिक्रिया म्हणून बहुधा त्यांनी स्वीकारलेले पारंपरिक प्रतिष्ठेचे मापदंड या नव्याच्या पुरस्कारापासून त्यांना परावृत्त करायला मदतनीस झाले. जातिव्यवस्थेने दिलेले उच्चनीचतेचे, प्रतिष्ठेच्या चौकटीचे संस्कार अर्थात असणारच. ते भेदण्यास वा सहन करण्यास त्यांना ताकद न द्यायला या कुचंबणेचा मोठा हातभार लागला असे मला वाटते. तुम्हाला मिळालेला काळाचा आजी-आईच्या पुढचा टप्पा, युक्रांदसारख्या पुरोगामी संघटनांचा तसेच मार्क्स-आंबेडकरादि वैचारिकतेचा परिसर तुमच्या निर्णयप्रक्रियेला ताकद देणारा होता. 

तुम्हा तिघी स्त्रियांचे (आजी, आई व तुम्ही) चैतन्य जे या पुस्तकातून व्यक्त होते, ते तुमचे आजोबा, वडिल आणि अगदी पुरोगामी नवरा या पुरुषांचे होत नाही. रमेश हुशार, आयआयटीत असलेला. आंबेडकर, मार्क्स आदिंचे वैचारिक साहित्य वाचलेला. त्यांची प्रभावी मांडणी करणारा. चळवळींत वावरणारा. प्रारंभी बिनलग्नाचे एकत्र राहण्याची अट घालणारा. म्हणजेच पारंपरिक विवाह चौकटीवर प्रश्न उभा करणारा. तरीही या चौकटी मोडण्याच्या दर्शनी चिन्हांच्या आत सहजीवनाचा परस्परांच्या आदराने, विश्वासाने फुलणारा आशय त्याला तुमच्या वर्णनाप्रमाणे गवसलेला दिसत नाही. रमेशच्या शेवटच्या वीस दिवसांत तुम्हाला यातले काही प्रत्ययास आले. परंतु, त्यानंतर तो गेलाच. त्या आधीचे त्याचे जे वागणे तुमच्या वाट्याला आले, त्याबाबत ‘पुरुषप्रधानतेचा आणि दलितद्वेषाचा बळी’ असे तुम्ही त्याचे वर्णन केले आहे. तुमच्या नात्या-गोत्यातून, काही प्रतिष्ठित पुरोगामी उच्चवर्णियांकडून रमेशबाबत जे बोलले गेले, जो व्यवहार झाला, तो निश्चित दलितद्वेषाचा निदर्शक आहे. ते केवळ रमेश या व्यक्तीबद्दलचे मापन नाही. सार्वजनिक ठिकाणच्या अस्पृश्यतेच्या आम्ही कठोर विरोधात आहोत. पण थेट आमचे जावई अस्पृश्याने होणे हे पुरोगामी उच्चवर्णियांतील एका विभागाला आजही सहन होत नाही. 

तुमच्या ब्राम्हणी परिसराचे वर्णन औत्सुक्याने वाचत होतो. पण रमेशचा प्रवेश सुरु झाला आणि मी काळजातून त्याच्याशी, त्याच्या घराशी, भावा-वहिनींशी, त्यांच्या मुलांशी आणि मुख्य म्हणजे वडिलांशी जोडला जाऊ लागलो. रमेश व माझा रुढार्थाने जातीचा, सामाजिक थराचा परिसर एक आहे. रमेशच्या मनातील खळबळी, सिगरेट, दारु, वर्तनाची वैशिष्ट्ये माझ्या परिसरातील मित्रांत मी पाहिलेली, अनुभवलेली आहेत. मी या सगळ्यांत पुरेपूर असलो तरी मी थेट तसा होऊ शकलो नाही. पण माझ्यासारखे अपवाद होते. रमेश प्रातिनिधिक आहे. उच्चवर्णियांच्या मान्यतेची आकांक्षा आणि त्याचवेळी त्यांच्या नजरेतून स्पष्ट-अस्पष्ट झोंबणारी जातश्रेष्ठत्वाची अहंता यांत विद्रोही दलित युवक पिचतो. काहींचे मग अगदी चिपाड होते. टीआयएसएस, मुंबई विद्यापीठ किंवा अन्य नामांकित संस्थांमधील हुशार, कर्तबगारी करु शकण्याची क्षमता असणाऱ्या दलित विद्यार्थ्यांचे हे व्यवच्छेदक लक्षण असल्यासारखे मला जाणवत आले आहे. यातले अनेक कुठच्या ना कुठच्या वस्तीतून आलेले असतात. पण त्यांना पुन्हा तिथे जाऊन त्या लोकांच्यात काही करण्याची इच्छा उरत नाही. पँथर, मागोवा, युक्रांदच्या काळाचा अपवाद केला, तर उच्चशिक्षित असतानाही सर्व झुगारुन दलित-शोषितांच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याची धमक आता दिसत नाही. हे लक्षण सार्वत्रिक आहे. पण जो विभाग अजूनही खूप मागे आहे, त्या दलित विभागातील, ते मागासपण, ती वंचितता, ती वेदना सोसलेल्या वा समजून घेऊ शकणाऱ्या दलित युवकांत याला अपवाद असावेत, अशी माझी अपेक्षा असते. मी अशा अनेकांशी सतत संपर्क करत असतो. त्यांना वस्तीत नेण्याचा प्रयत्न करत असतो. पण नाही होत ते. त्यांना कुठेतरी वर पोहोचायचे असते. त्यांच्या जीविताची सार्थकता त्या वरच्या जगात-स्तरात कुठेतरी त्यांना जाणवत असते. 

रमेशच्या तुमच्या वर्णनात दादरच्या मुंबई मराठीच्या (ग्रंथसंग्रहालयाच्या) पायरीचा उल्लेख आहे. तो वाचून माझ्याही जुन्या आठवणी वर आल्या. मी आठवी-नववीपासून या पायरीवर ज्येष्ठ मित्रांसोबत बसत असे. पण रमेशचा संबंध आल्याचे आठवत नाही. रमेशच्या मित्रांतले वसंत पाटणकर मला एम. ए. च्या शेवटच्या वर्षाला ८८-८९ च्या सुमारास शिकवायला होते. अशोक बागवेंचा परिचय होता. निळूशी (निळकंठ कदम) खूप जवळचे नसले तरी मैत्रीचे संबंध आजही आहेत. तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठे आहात. तुम्ही टीआयआयएसमध्ये तुमच्या वसतिगृहातून राज कपूरचा बंगला पाहत होता, त्यावेळी सातवीत असलेला मी त्याच बंगल्याजवळून भाड्याची सायकल चालवत असे. मी चेंबूर स्टेशनच्या लेबर कॅम्प, लोखंडे मार्ग परिसरातील झोपडपट्टीत जन्मलेला व तिथेच वाढलेला. लग्न झाल्यानंतर ६-७ वर्षांनी तिथले वास्तव्य सोडले. पण चळवळीच्या कामासाठी आजही त्याच परिसरात वावरत असतो. आपल्या वयातल्या या अंतरामुळे तुम्ही मंडळी पॅंथर, मागोवा, युक्रांद यात लढत असताना आम्ही केवळ पाहत होतो. त्या वातावरणाचा दणाणता ठसा मनावर उमटण्याइतपत सजग नक्की होतो. पॅंथरच्या नेत्यांच्या मोर्च्यांत, सभांत घोषणा देत सहभागी होत होतो. पण त्यातले सगळे बारकावे त्यावेळी उमगत नव्हते. 

रमेशच्या घरातले आतिथ्य, समावेशकता हे आमचे सगळ्यांचे वैशिष्ट्य होते. माझी आई त्यावेळच्या गरिबीतही कुटुंबातल्या गरजेपेक्षा अधिक स्वयंपाक करत असे. येणारे जाणारे जेवून जाणे हे नित्याचे असे. घरी आलेल्याला आवर्जून जेवायला घालणे यात खरोखर आईला, वडिलांना आनंद होई. १० बाय १८ च्या आमच्या झोपडीत सरासरी १५ माणसे राहत. रात्री सगळीच तिथे झोपू शकत नसत. उरलेली घराच्या कडेला, रस्त्यावर, जागा मिळेल तिथे पथारी टाकत. पण समावेशकतेचे हे वैशिष्ट्य हे त्या समाजाचे नसून त्या अवस्थेचे होते, हे तुमचे निरीक्षण बरोबर आहे. शिक्षित, सुस्थित फ्लॅटधारी विभक्त दलित कुटुंबात हे चित्र दिसत नाही. काही वैशिष्ट्ये जुन्या संस्कारांमुळे काही काळ राहत असली तरी ती विरुन जाण्याचा वेगही जास्त असतो. 

आई-वडिल म्हातारे आणि मीच थोरला. त्यामुळे माझी बायको व मी घरातले कर्ते. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्हाला होते. त्याचबरोबर या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारीही होती. सकाळी मी पीठ मळायचो, ती लाटायची, मी शेकायचो...ढीगभर चपात्या करायला लागायच्या. पहाटे सार्वजनिक नळावर मी किंवा धाकट्या भावाने पाणी भरणे, हा स्वयंपाक आणि धुणे हे सगळे करुन ती नोकरीला आणि मी चळवळीच्या पूर्णवेळ कामाला निघत असे. मी नसलो तर तिलाच हे करावे लागे. रमेशच्या घरी थोरली भावंडे असल्याने तुम्ही दोघं स्वतंत्र राहू शकलात. हे राहणेही कसे कष्टप्रद होते, त्याचे वर्णन तुम्ही केलेच आहे. सिमेंट-काँक्रिटच्या शौचालय असलेल्या घरातून माझी पत्नी झोपडपट्टीत आली. तिने किती सहन केले असे कोणाला वाटले, तरी तिच्या जगण्याचे सार्थक नक्की ठरले होते, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे ती अशा सहानुभूतीला प्रतिसाद देत नाही. तुमची निवड ‘रमेश’ होती. त्यामुळे तुमचे सुस्थित घरातून अवनत अवस्थेत येणे, त्याचे ताण सहन करणे मी समजू शकतो. या काळात तुम्हाला चळवळीतल्या अनेक मित्रमंडळींनी साथ दिली. आम्हालाही अशी साथ मिळाली. तुमच्या वाट्याला आलेले संशयाचे मन उद्ध्वस्त करणारे ताण आमच्या नात्यांत आले नाहीत, पण त्याची तीव्रता समजू शकतो. 

या सगळ्या प्रवासात तुमचे टिकणे, नव्या जिद्दीने जीवनाला सामोरे जाणे, नवी नाती तयार करणे विलक्षण आहे. स्पंजासारखे सगळे कडक कंगोरे सोसून संबंध जपणारे तुमचे व्यक्तित्व व जगण्याचे उद्दिष्ट ओळखणारी वैचारिक बेगमी याला कारण आहे. साठीनंतर तुमचे प्रेमात पडणे, लैंगिक स्वातंत्र्याची भूमिका असलेला जुना मित्र सचोटीचा जोडीदार लाभणे या क्लायमॅक्सचे सुखद आश्चर्य वाटते. त्याच्या कोवळ्या उबदार उन्हासारखे सान्निध्य आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला मिळते आहे, हे तुमचा हा सगळा प्रवास वाचलेल्या माझ्यासारख्या तुमच्या हितचिंतकाला समाधान देते. 

सरिताच्या या आनंदसघन खळखळ वाहण्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 

स्नेहांकित, 
सुरेश सावंत 

_______________________________ 

हमरस्ता नाकारताना 

सरिता आवाड 

राजहंस प्रकाशन 

पृष्ठेः २८७ | मूल्यः रू. ३५० 

______________________________ 

(आंदोलन, नोव्हेंबर २०१९)

Thursday, October 3, 2019

गैरप्रतिमेच्या कैदेतून सुटका

पैगंबरांनी त्यांचे एक सहकारी अल्-मुआद यांची एका प्रांताचे (येमेनचे) गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. त्यांना लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर न्यायिक अधिकारही देण्यात आले होते. त्यांनी या पदाचा अधिभार सांभाळण्यापूर्वी पैगंबर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत खालीलप्रमाणे प्रश्नोत्तरे झालीः

प्रश्नः तुझ्यासमोर येणाऱ्या प्रकरणांचा न्याय-निवाडा तू कसा करशील?

उत्तरः पवित्र कुराणातील आदेशानुसार.

प्रश्नः त्यात काही आधार सापडला नाही तर?

उत्तरः अल्लाहच्या प्रेषिताच्या जीवनातील घटना व त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाच्या (सुन्ना किंवा पैगंबरीय परंपरेच्या) आधारे.

प्रश्नः आणि त्यातही काही आधार सापडला नाही तर?

उत्तरः तर मग मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आधारे न्यायनिवाडा करेन.

अल्-मुआदची उत्तरे ऐकून पैगंबरांनी समाधान व्यक्त केले व मुआदची नेमणूक पक्की केली.

इस्लामी न्यायशास्त्राच्या पुढील काही शतकांच्या विकास प्रक्रियेत पैगंबरांच्या जीवनातील ही घटना पायाभूत सूत्र किंवा तत्त्व म्हणून मान्यता पावली.

______

हा उतारा आहे अब्दुल कादर मुकादम यांच्या ‘इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात’ या अक्षर प्रकाशनाने काढलेल्या पुस्तकातला. तो जसाच्या तसा द्यावा इतके त्याचे महत्व आजच्या काळात मला वाटले. मला हे सूत्र अज्ञात होते. भोवताली जो मुस्लिम समाज दिसतो त्यातून तसेच त्याच्याविषयी जे लिहिले-बोलले जाते यामधून इस्लामविषयी काहीएक प्रतिमा मनात तयार होते. त्याला हे सूत्र धक्का देते. वर्तमान जेवढा व जसा आपल्याला कळतो त्या आधारे भूतकाळाविषयी अंदाज बांधण्यातून खूप गफलती होतात. धर्म ही एक प्रक्रिया आहे. तिचाही एक विकासक्रम असतो. सर्वच धर्मांना ते लागू आहे. इस्लाम याला अपवाद कसा असेल? पण तरीही आपल्या राजकीय-सांस्कृतिक धारणांचे साचे ते कबूल करायला सहसा तयार नसतात. मुसलमान, कुराण, पैगंबर या शब्दांच्या क्रमात कट्टर असा पुढचा शब्द बिगरमुस्लिमांच्या मनात येतोच येतो. कुराणात नसेल तर प्रेषिताच्या जीवनातील घटना व मार्गदर्शनानुसार, आणि तेथेही न आढळल्यास स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य इस्लाम देतो याचे खरेच मला आश्चर्य वाटले. असे करणारे धर्माच्या मूळ भूमिकेविरोधातले बंडखोर असतात असेच मी समजत होतो. खुद्द पैगंबरांनी स्वतंत्र विचारक्षमता हा मुआदच्या निवडीचा निकष लावावा (म्हणजे धर्माची ती मूळ असावी) हे मला अचंबित करणारे होते.

सांगोवांगी, स्वानुभव आणि जुजबी वाचन या आधारे इस्लाम व मुसलमानांविषयी मते बनविणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य बिगर मुस्लिमाला इस्लामविषयी किमान साक्षर व्हायला (तेही सुबोध मराठीत) मुकादमांचे हे पुस्तक खूप मदतनीस ठरते. प्रगतीशील विचारांचे ज्येष्ठ लेखक, वक्ते, कार्यकर्ते म्हणून अब्दुल कादर मुकादम हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांचे लेख-भाषणे यांतून इस्लामविषयीचा काही परिचय सुटा सुटा होत असतो. तथापि पुस्तकामुळे समग्र व संकलितपणे ही ओळख मिळते. या ओळखीतून आपल्याला ज्ञात असलेल्या बाबींच्या चौकटी विस्तारतात, तर कितीतरी अज्ञात बाबी समोर आल्याने आपल्या समजाचे साचे मोडून पडतात. उदाहरणादाखल त्यातल्या काहींची नोंद खाली करत आहे.

क्रमात शोषकांनी आपल्या हितरक्षणार्थ धर्मांचा वापर केला, त्यांना वळवले, तरी मुळात धर्म त्यावेळच्या समाजाची धारणा करण्यासाठीच तयार झाले असे आढळते. अरबस्थानातील मक्का-मदिना परिसरातील विषम आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत इस्लामच्या उदय आणि विकासाचे रहस्य दडलेले आहे, असे मुकादम म्हणतात. शेती नसलेला, वाळवंटात टोळ्यांनी राहणारा हा समाज श्रीमंत व्यापारी आणि त्यांचा सेवेकरी गरीब यांत विभागलेला होता. प्रचंड आर्थिक शोषण आणि टोळ्यांच्या आपापल्या देवतांच्या रुपात प्रकट होणाऱ्या संकुचित अस्मिता यांनी तो पुरता खिळखिळा झालेला होता. अशावेळी पैगंबरांनी त्यांना समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित एकेश्वरवादाची दीक्षा देऊन एकसंध करण्याचा प्रयत्न केला. ही मूल्ये केवळ प्रबोधनाचा भाग नव्हती. तर ती साकारण्यासाठीचा नवा अर्थविचार दिला.

इस्लामने संपत्तीचा संचय करणे निषिद्ध मानले आहे. त्याने सांगितलेल्या दानधर्म आणि जकात या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फरक इतकाच की दान स्वैच्छिक करायचे आहे, तर जकात हा एक प्रकारचा कर असतो. दान उपकार भावनेने नव्हे; तर कर्तव्यभावनेने करायचे असते. जकातीचा पैसा विकास कार्यासाठी खर्च करायचा असतो. हा पैसा कसा व कोणासाठी वापरायचा याचे वर्गीकरण आणि नियमही निश्चित करण्यात आले आहेत. कुराणातील नवव्या अध्यायातील सहाव्या आयतीत पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे- गरीब व गरजू यांच्यासाठी, गुलामांना मुक्त करण्यासाठी, ज्यांच्या मनात सलोख्याची भावना निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी, वाटसरुंसाठी आणि अल्लाच्या कार्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांसाठी. सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवांचा नव्हे तर इतर सर्व सजीवांचाही तितकाच अधिकार आहे ही कुराणाची भूमिका आहे.

मक्केतील व्यापाऱ्यांचा पैगंबरांच्या एकेश्वरवादी धर्माला फारसा विरोध नव्हता. त्यांचा विरोध होता तो पैगंबरांच्या नव्या समाज निर्मितीला व त्याला आधारभूत असलेल्या समता व न्यायाच्या मूल्यांना. कारण ही समाजव्यवस्था त्यांच्या आर्थिक हितसंबंधांना बाधा आणणारी होती. हा विरोध दिवसागणिक आक्रमक व हिंसक होत गेला. तो पैगंबरांच्या प्राणावर बेतणार हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी मदिनेस स्थलांतर केले.

व्याज देणे-घेणे इस्लामने निषिद्ध मानले आहे. पण त्याच्या अन्वयार्थासंबंधी बरेच मतभेद असल्याचे लेखक नोंदवतात. मदिनेत अरबांबरोबर ज्यू आणि ख्रिश्चन राहत होते आणि ज्यूंच्या परंपरेप्रमाणे ते सावकारीचा व्यवसाय करत होते. खाजगी सावकाराप्रमाणे हे ज्यू वारेमाप दराने व्याज आकारत असत. चक्रवाढ व्याज आणि दामदुप्पट दराने कर्ज देण्याची पद्धत यामुळे गरिबांच्या शोषणाची तीव्रता अनेक पटीने वाढली होती. त्यामुळे चक्रवाढ व्याज, दामदुप्पट दर तसेच व्यापार व्यवसायात वारेमाप नफा मिळविणे हा सुद्धा शोषणाचाच प्रकार आहे, म्हणून असा व्यापारी व्यवहार सुद्धा निषिद्धच मानला पाहिजे, असे काहींचे म्हणणे आहे. आज अनेक मुस्लिम राष्ट्रांत फक्त व्याजाला निषिद्ध मानले जाते. पण नफ्याच्या मर्यादेचा विचार न करता तो मात्र रास्त मानला जातो.

इस्लामच्या या भूमिकेतूनच इस्लामी बँकिंगची संकल्पना पुढे आली. लेखक म्हणतात, यामध्ये पारंपरिक व्याज पद्धत नाही. मात्र अवाजवी नफा ग्राह्य मानला जातो. हा विरोधाभास आहे. दुर्बल घटकांचे अनेक मार्गांनी शोषण त्यामुळे चालूच राहते. हे धोरण श्रीमंतांच्या पथ्यावर पडते. कारण त्यांना व्याजमुक्त कर्जाचा फायदा होतो. काही भाष्यकारांच्या मते बँका कर्जावर आकारित असलेले व्याज कुराणाने निषिद्ध मानलेले नाही. तर चक्रवाढ व्याज व दामदुप्पट दराने कर्ज देणे याला निषिद्ध मानले आहे.

पैगंबरांच्या गरिबांच्या शोषणमुक्तीसंबंधीच्या विचार व कार्यामुळे त्यांना सुरुवातीला मिळालेले सर्वच अनुयायी कष्टकरी, शोषित, वंचित वर्गातले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या रुपाने त्यांना त्यांचा मुक्तिदाता सापडला होता. पैगंबरांच्या आर्थिक विचारांचे महत्व अधोरेखित करताना लेखक त्यांचे मार्क्सशी नाते जोडतो. ते म्हणतात, मार्क्सचा उदय पैगंबरांनंतर सुमारे हजार वर्षांनी झाला असल्यामुळे डाव्या अर्थविचारांचा आद्य प्रवर्तक म्हणून मोहम्मद पैगंबर यांचे नाव घेणे उचित होईल.

‘ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जा’ हे पैगंबरांनी दिलेले ज्ञानवादी सूत्र. (त्या काळात अरबस्थानातून चीनला जाण्यासाठी अत्यंत खडतर प्रवास करावा लागत होता.) ज्ञानासाठी कितीही कष्ट पडले तरी ते करा, हा पैगंबरांचा आदेश व आदर्श मानून त्यांच्या अनुयायांनी ज्ञानोपासकांची एक लखलखित परंपरा निर्माण केली. गणितातील शून्याचा शोध भारतात लागला, तरी त्याचा वापर हे अरबांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. दशमान पद्धती बरोबरच त्यांनी बीजगणित आणि त्रिकोणमिती या क्षेत्रांतही भरीव कामगिरी केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही मुस्लिम संशोधकांनी व डॉक्टरांनी मोलाची कामगिरी केली आहे. बेबी कॉलरासारख्या गंभीर सांसर्गिक रोगावर त्यांनी मूलगामी संशोधन केले असल्याचे लेखक नमूद करतात.

काही विद्वान, संशोधकांची नोंद मुकादम करतात. त्यातील काही नमुन्यादाखल खालीलप्रमाणेः

इब्न खतीज हा प्रखर इस्लामी बुद्धिवादी वैद्यक तज्ज्ञ होता. धर्मशास्त्रात जे काही सांगितले असेल ते वास्तवाच्या निकषावर खरे उतरले पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. मातेच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात केला पाहिजे, असे त्याचे म्हणणे होते.

जबिर हैयात हा इस्लामी रसायन शास्त्राचा जनक. धातूंची भूशास्त्रीय निर्मिती प्रक्रिया व सल्फर मर्क्युरी सिद्धांत यांचा त्याने शोध लावला. त्याच्यामुळेच अलेंबिक अँटिमनी, अल्कली या रसायनशास्त्रातील संज्ञा प्रचलित झाल्या.

मुकादम म्हणतात, मध्ययुगातील राजकीय इतिहासापेक्षा सांस्कृतिक इतिहास अधिक समृद्ध आहे. या इतिहासात मानवी समाजातील हिंसक प्रवृत्तींवर मात करून त्याला सुसंस्कृत करण्याचे सामर्थ्य होते. सम्राट शहाजानचा जेष्ठ पुत्र दारा शिकोह याने ‘मज्म उल बहारेन’ म्हणजेच हिंदू आणि मुस्लीम या दोन सांस्कृतिक सागरांचा संगम हा ग्रंथ लिहिला. गीतेचे पर्शियन भाषांतर केले. सूफी संतांच्या समता व मानवतावादी आध्यात्मिक तत्त्वज्ञानामुळे भारतातील विविध समाज आणि नव्याने आलेले मुसलमान यांच्यात परस्पर सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले होते. हिंदू आणि इस्लामी स्थापत्यशैलीच्या संमिश्रणातून नवी शैली हिंदू-इस्लाम (Indo-Islamic) या नावाने विकसित झाली. दारा शिकोहने याच संस्कृतीला गंगाजमनी संस्कृती असे म्हटले आहे. दाराचा भाऊ औरंगजेब हिंसक प्रवृत्तींचा प्रतीक होता. त्याच्यावर अनेक कादंबऱ्या, नाटके लिहिली गेली आहेत. पण दारा शिकोहवर मराठीत एकही पुस्तक नाही. लेखकाची ही खंत जळजळीत आहे.

ग्रीक भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार अनेक लेखक-अनुवादकांनी अरबी भाषेत अनुवादित केले. दरम्यान युरोपात मूळ ग्रंथ धूळ खात पडले. त्यातल्या कित्येकांचे अस्तित्व राहिले नाही. पुढे या अनुवादाच्या माध्यमातून हे ज्ञानभांडार पुन्हा युरोपमध्ये गेले.

आठव्या शतकातला खलिफा हारुन अल् रशीद हा कला, साहित्य आणि विज्ञानाचा आश्रयदाता होता. त्याचा मुलगा मामून याने बगदाद येथे ज्ञानपीठ, ग्रंथसंग्रहालय, अनुवाद केंद्र इत्यादीची स्थापना केली. खगोलशास्त्र, वैद्यक, भूगोल आणि अंकगणित या विषयांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाला याच काळात सुरुवात झाली.

मानव आणि ईश्वर यांच्यात अद्वैत साधण्यासाठी कोण्या त्रयस्थाची गरज नाही, हे इब्न गजालीचे सूत्र सेंट थॉमस पासून अनेक ख्रिश्चन संतांनी पूर्ण श्रद्धेने स्वीकारले होते. लेखक म्हणतात, इस्लामपूर्व काळातील आदिम अवस्थेत असलेल्या अरब समाजाने संस्कृती व वैज्ञानिक दृष्ट्या पैगंबरांच्या निधनानंतर केवळ दोनशे वर्षात प्रगतीची विस्मयकारक झेप घेतली. अरब विचारवंतांनी आणि संशोधकांनी दोन शतकांत प्रगतीचा टप्पा गाठला. तसा टप्पा गाठण्यासाठी ख्रिश्चन समाजाला पंधराशे वर्षे लागली, हे ख्रिश्चन अभ्यासक संशोधकांनी लिहून ठेवले आहे.

त्रिवार तलाक पद्धतीच्या विरोधातील कायद्यादरम्यान मुस्लिम समाजातील स्त्रियांच्या स्थितीविषयी बरीच चर्चा सामान्यांतही झाली. मध्ययुगीन कालखंड लक्षात घेता स्त्रियांबाबत इस्लामची भूमिका खूपच प्रगत होती, हे या चर्चेत कुठेच अधोरेखित झाले नाही.

मक्केतील श्रीमंत विधवा खदिजा ही व्यावसायिक होती. तिच्याकडेच तरुण पैगंबर कामाला होते. पुढे तिच्याशी त्यांनी लग्न केले. खदिजा चाळीस वर्षांची तर पैगंबर पंचविशीतले. दोघांत पंधरा वर्षांचे अंतर. सातव्या शतकात अरबस्थानात एक स्त्री व्यावसायिक असते. लोकांना कामाला ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. विधवा म्हणून माजघरात बसत नाही. तिला पुनर्विवाहाची बंदी नाही. तिचा पुनर्विवाह अविवाहिताशी होतो. नवऱ्याचे लहान वय आड येत नाही. पैगंबर तिच्या मृत्युपर्यंत तिच्याशी एकनिष्ठ राहतात. ती असेपर्यंत दुसरे लग्न करत नाहीत.

स्वातंत्र्य व हक्क म्हणून स्त्री करत असलेल्या अशा व्यवसायातून मिळालेल्या संपत्तीवर केवळ तिचा अधिकार असतो. या संपत्तीचा विनियोग व त्यासंबंधीचे कुठलेही व्यवहार केवळ तीच करू शकते. त्यात तिचे वडील, पती, भाऊ, मुलगा यांपैकी कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.

मुलींना शिक्षणाचा अधिकार आहे. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार (खुला) आहे. ओहदच्या युद्धात दहा टक्के पुरूष मारले गेल्याने विधवा झालेल्या स्त्रिया आणि अनाथ मुलांना आधार देण्यासाठी एकापेक्षा अधिक स्त्रियांशी लग्न करण्याची प्रथा सुरु झाली. मात्र असे लग्न प्राधान्याने विधवेशी करणे अपेक्षित आहे. बुरखा पद्धतीला कुराण किंवा हदीस यांत निःसंदिग्ध असा पुरावा आढळत नाही, असे लेखकाचे म्हणणे आहे.

हान्नफी संप्रदायाच्या तत्त्वानुसार मुलगी सज्ञान झाली असेल (म्हणजे इस्लामी कायद्यानुसार १४ वर्षांची) तर कोणाही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय ती स्वतःचा जोडीदार निवडू शकते व त्याच्याशी विवाहबद्ध होऊ शकते. जर वयात येण्याआधी तिचा विवाह तिच्या मर्जीविरुद्ध झालेला असेल, तर तो विवाह ती रद्द करून घेऊ शकते. स्त्रीचे आरोग्य आणि मुलाची वाढ चांगली व्हावी म्हणून दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असले पाहिजे असा कुराणाचा आदेश आहे. इस्लाम व कुटुंब नियोजन असे स्वतंत्र प्रकरणच या पुस्तकात आहे.

धर्मशास्त्र आणि कायद्यात स्त्रियांविषयीच्या इतक्या प्रगत तरतुदी असतानाही व्यवहारात मात्र हा अधिकार स्त्रीला वापरता येत नाही ही तिची शोकांतिका आहे, असे मुकादम नमूद करतात.

हे सगळे प्रगत वातावरण पैगंबरांच्या काळापासून, इ. स. च्या ७ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत होते. चौदाव्या शतकापासून ते उताराला लागल्याचे मुकादम नोंदवतात. चौदाव्या शतकापासून उलेमा धर्मपंडित ही संस्था अस्तित्वात आली. ती पुढे अधिकाधिक प्रभावी झाली. या उलेमांनी धर्मशास्त्राचा अर्थ लावायचा अधिकार स्वतःकडे घेतला. त्यातून तकलीदची नवी परंपरा सुरू झाली. तकलीद म्हणजे पूर्वसुरींचे अंधानुकरण. लेखकाच्या मते मुस्लिम समाजाला या उलेमांच्या प्रभावातून मुक्त केल्याशिवाय या परिस्थितीत कसलाही बदल होणे शक्य नाही.

मुकादम म्हणतात, मुळात इस्लाममध्ये पुरोहित ही संस्थाच अस्तित्वात नाही. ख्रिश्चन धर्मासारखी अतिशय सुसंघटित अशी धर्मसत्ताही अस्तित्वात नाही. त्यामुळे एखाद्या जुजबी ज्ञान असलेल्या मुल्लापासून मान्यवर व्यासंगी उलेमापर्यंत सगळेच एका पातळीवर असतात. परिणामतः एकाच विषयावर वेगवेगळे उलेमा परस्परविरोधी फतवे काढतात. खलिफा ही संस्था सुद्धा पैगंबरांच्या नंतर अस्तित्वात आली.

इस्लामचे हिंसक चित्र निर्माण करण्यात मुसलमानांतल्या जहाल गटांनी फार मोठा हातभार लावल्याचा आक्षेप मुकादम नोंदवतात. कर्मठ व श्रेष्ठता गंड पसरवणाऱ्या वहाबी पंथाला जबाबदार धरतात. अल-कायदा, लष्कर-ए-तय्यबा, इंडियन मुजाहिदीन या सारख्या जहाल दहशतवाद्यांनी गेली अनेक वर्षे इस्लामच्या नावाने दहशतवादी कारवाया करून निरपराधी निःशस्त्र माणसांना किड्या-मुंग्यांसारखे मारण्याचे जे सत्र गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू ठेवले आहे ते पाहता, इस्लाम विषयी घृणा निर्माण झाली तर त्याबद्दल कुणाला दोष देता येणार नाही, असे ते सडेतोड मांडतात.

आज मुस्लिमांची प्रतिमा मलीन करणाऱ्या काफिर, मूर्तिभंजन, जिहाद इत्यादी संकल्पनांचे मूळ अर्थ आणि आताचे त्यांचे भ्रष्ट स्वरुप यांचे अनेक ऐतिहासिक व कुराणातले संदर्भ देऊन लेखकाने विवेचन केले आहे. त्या सगळ्यासाठी मूळ पुस्तकच वाचायला हवे.

आपल्या देशातील बहुसंख्याक हिंदूंच्या खालोखाल मोठ्या संख्येने असलेला मुस्लिम समाज हा इतर कोणाहीपेक्षा कमी भारतीय नाही. त्याच्याविषयीचा मनात असलेला संशय त्याच्याविषयीच्या खोट्या-नाट्या प्रचाराने आपल्याला अधिकच घेरतो. त्याला शिकवण देणारा त्याचा धर्म इस्लाम हाच एक खलनायक बनून जातो. या गैरप्रतिमेच्या कैदेत आपण आपसूक अडकतो. त्यापासून मुक्त व्हायला अब्दुल कादर मुकादमांचे हे पुस्तक खूप उपयुक्त ठरु शकते. ते जरुर वाचा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, ऑक्टोबर २०१९)


______________________________________________

इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात

लेखक : अब्दुल कादर मुकादम

प्रकाशक : अक्षर प्रकाशन, मुंबई

पृष्ठे : २१६ | किंमत : रु. ३००

______________________________________________

Sunday, September 1, 2019

जो मजा साथ दौड़ने में है...


मागे कधीतरी सचिन तेंडुलकरचा-म्हणजे त्याच्यावरचा सिनेमा आला आणि गेला. तो काही मी पाहिला नाही. पण त्यातील लहानपणच्या सचिनची भूमिका करणाऱ्या बालकलावंताची टीव्हीवरची एक मुलाखत रात्री जेवताना पाहिली. नेहमीच्या रीतीने तुला पुढे काय व्हायचे आहे, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर अपेक्षित असे मला सचिन तेंडुलकर व्हायचे आहे, असे उत्तर त्या मुलाने दिले. इथवर ठीक. मात्र पुढच्या एका प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर मला लक्षवेधक वाटले. कारण त्यामुळेच हे उदाहरण इथे नोंदवायला मी प्रवृत्त झालो. तुला सचिन तेंडुलकरच का व्हायचे आहे, असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला- “मुझे सबसे आगे जाना है.” 

त्याच्या या उत्तराने प्रश्नकर्ते आणि त्या मुलासोबत असलेल्या त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर कौतुक झळकले. मात्र या ‘सबसे आगे’ने माझ्या घशात घास अडकला. म्हणजे हाही मुलगा ‘सबसे आगे’च्या बेछूट, दमछाकी स्पर्धेच्या चरकात कोंबला जाणार याचे वाईट वाटले. 

या लहान मुलाच्या मनात मला सचिन तेंडुलकरसारखे उत्तम खेळायचे आहे, असे का नाही आले मनात? ‘सबसे आगे’ हे त्याचे ध्येय का बनावे? 

कारण भोवताल. कारण घर. कारण शाळा. ...या सर्व ठिकाणी तुला कोणाच्या तरी पुढे जायचे आहे, त्यासाठी सतत धावत राहायचे आहे, त्यातच जीवनाचे साफल्य आहे..हे सतत बिंबवले जाते. मुलाचे मूलपण आणि एकूण माणसाचे माणूसपण मारुन टाकणारी ही शिकवण आहे. या शिकवणीने माणसांना घेरुन टाकले आहे. 

आता गणपती येतील. गल्लोगल्लीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मुलांच्या स्पर्धा होतील. निबंध, वक्तृत्व, चित्रकला यापेक्षाही हल्ली या बहुतेक स्पर्धा टीव्हीवरील गाणी, नाचांच्या स्पर्धांचे अनुकरण असते. शाळांमध्येही असेच असते. या स्पर्धांत आपल्या मुलाने फक्त भाग नाही, तर जिंकण्याच्या इर्ष्येनेच उतरले पाहिजे, यासाठी पालकांच्या जिवाचा आटापिटा चाललेला असतो. अशी जिगर आपल्या मुलात नसणे म्हणजे आजच्या ‘स्पर्धेच्या’ जगात तो टिकायला लायक नाही, अशी त्यांची खात्री असते. हल्ली टीव्हीच्या प्रादेशिक-राष्ट्रीय वाहिन्यांवर चालणाऱ्या रिअॅलिटी शोमधून अनेक सामान्य, गरीब, पीडित समूहांमधून आलेली मुले चमकताना दिसतात. त्यामुळे तर सामान्य स्तरातील पालकांच्या आशा आणखी पालवतात. 

रिअॅलिटी शोचा धंद्याचा फंडा बाजूला ठेवू. त्याची चिकित्सा आता नको. पण या सगळ्याच्या परिणामी प्रगतीचे आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचे जे मापदंड ठरले आहेत, ते जिवघेणे आहेत. ज्या गरीब मुलाकडे उपजत प्रतिभा आहे, तो या शोमधून टॉपला जातो. तो एका रात्रीत लखपती वा करोडपती होतो. हा केवळ आणि केवळ अपवाद आहे, हे सामान्यांना कळत नाही. गरीब-पीडित थरातली मुलेही अशी टॉपला जाऊ शकतात, या आश्वासकतेपर्यंत ठीक. त्यापासून मिळणारी प्रेरणाही पोषक. पण जेवढ्या म्हणून गरीब मुलांकडे प्रतिभा आहे, असण्याची शक्यता आहे, त्या सर्वांना त्या प्रतिभेचा शोध व विकास करण्याची संधी आजच्या व्यवस्थेत नाही. दुर्गम तर सोडाच, पण शहरातल्या सर्वसाधारण शाळांतही मुलांच्या विविध प्रतिभा जाणण्यासाठीच्या सोयी, जाणलेल्या प्रतिभांच्या विकासासाठीची साधने वा दिशादिग्दर्शन उपलब्ध आहे, अशी आज स्थिती नाही. उत्तम पोहणारी मुले शोधण्यासाठी आधी शाळेत किंवा गावात वा वस्तीत स्विमिंग पूल तर हवेत. लाखो रुपयांची मेंबरशिप असलेले शहरातले क्लब वा तशाच लाखोंच्या फिया असलेल्या शाळा यांतूनच आज हे स्विमिंग पूल आहेत. म्हणजे हे परवडणाऱ्या थरातील मुलांमधूनच पोहण्याची प्रतिभा शोधली जाणार. वास्तविक ही प्रतिभा वस्ती-पाड्यावरील मुलात असू शकते. पण अशा स्विमिंग पुलांत उतरण्याची संधीच ज्यांना मिळाली नाही त्या मुलांत ही प्रतिभा आहे हे शोधणार कसे? फोटोग्राफीच्या रिअॅलिटी शोमध्येही अशीच मुले येणार ज्यांना कॅमेरा हाताळण्याची संधी मिळाली. हे कॅमेरे खरेदी करण्याची क्षमता असलेल्या पालकांचीच, म्हणजेच आर्थिक दृष्ट्या उच्च वा मध्यम थरातील ही मुले असणार. टीव्हीच्या रिअॅलिटी शोमध्ये चमकणारी बहुतेक गरीब मुले ही गाणे, नृत्य, विनोद अशा बिनसाधनांच्या-बिनखर्चाच्या वा अल्पखर्चाच्या कौशल्यांच्या मर्यादेतच असतात, हे लक्षात ठेवायला हवे. 

या लेखातील चर्चेचा हा आनुषंगिक भाग आहे. मुख्य मुद्दा आहे तो स्पर्धेत टॉपला जाण्यासाठी मुलांना आणि स्वतःलाही धावडवणे व दमछाक करुन घेणे हा. सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला आवडायचे. त्यात त्याला गती होती. ती ओळखून तिचा विकास करणारे आचरेकर सर त्याला लाभले. आणि तो टॉपला गेला. टॉपला जायचेच म्हणून काही तो क्रिकेट खेळायला आला असे नव्हे. अशा पद्धतीने ज्या मुलांना ज्यात गती असेल ती विकसित करून टॉपला वा त्याच्या आसपास ती गेली तर उत्तमच आहे. पण असे टॉपला, सबसे आगे जाणे या घेऱ्यात अडकता कामा नये. आज समाज त्या घेऱ्यात अडकला आहे. नोकरी, राजकीय पक्ष, संघटना, राहती जागा अशा अनेक बाबतीत ‘अरे, तो कुठे गेला अन् तू अजून इथेच?’असा प्रश्न आपल्या अनुभवाचा भाग आहे. जिथे आपण आहोत तिथून इतरांच्या तुलनेत वरच्या हुद्द्यावर, वरच्या जागेवर-प्रतिष्ठेच्या आणि पैश्यांच्या जायलाच हवे, हा जीवनसाफल्याचा निकष बनला आहे. या घेऱ्यातून सुटण्यासाठी मानवी जीवनाच्या साफल्यात स्पर्धेला काय स्थान आहे, ते नीट समजून घ्यायला हवे. 

कुत्रा मागे लागला तर त्याच्यापेक्षा वेगाने धावता आले पाहिजे; नाहीतर तो चावेल. इथे कुत्र्याशी स्पर्धा गरजेची आहे, हे मला समजू शकते. पण जो चावणार नाही, मारणार नाही अशा माणसाशी स्पर्धा कशासाठी? दुसऱ्यापेक्षा मी उत्तम गायला हवे, नाचायला हवे, वाजवायला हवे, खेळायला हवे असे का? त्यातून सर्वोत्तम ही मान्यता वा प्रतिष्ठा आणि असलेच तर बक्षीस मिळते. ही प्रतिष्ठा आणि बक्षीस यांचे महत्व आणि समाधान मर्यादित आहे. शिवाय ज्याला हरवून ही प्रतिष्ठा आणि बक्षीस मिळालेले असते, त्याचे असमाधान ही नाण्याची दुसरी बाजू या समाधानाबरोबरच जन्माला येते. दुसऱ्याला दुःखी, नाराज करुन मिळवलेली प्रतिष्ठा आणि बक्षीसाचा आनंद निर्भेळपणे कसा काय घेता येईल? तो घ्यायला हवा, जो हरतो त्याने खिलाडूवृत्तीने हार कबूल करायला हवी, पुढे कोणालातरी हरवायची तयारी आताच सुरु करायला हवी..हे शिक्षण, संस्कार आपल्यावर सतत होत राहतात. 

माणसे खिलाडूवृत्तीने हार स्वीकारत असती तर रिअॅलिटी शोमध्ये, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये हरणारे सर्वस्व गमावल्यासारखे रडतात का? खेळ हा खेळ आहे. हार-जित असणारच...हे फार थोडे कबूल करतात. भारत-पाक क्रिकेट सामना असला की त्यावर राष्ट्रवादाची वारुळे चढतात. दोन देशांच्या युद्धासारखीच स्थिती लोकांच्या मनात असते. जो उत्तम खेळेल तो दुसऱ्या देशाचा-अगदी पाकिस्तानचा असला तरी त्याचे कौतुक करायचा उमदेपणा आपल्यात नसतो. 

स्पर्धेमुळे माणसांच्या क्षमतेचा विकास होतो. कबूल. मला काहीतरी गाठायचे आहे, अमक्याच्या पुढे जायचे आहे, या प्रेरणेने मी जोरात प्रयत्न करतो. माझे कौशल्य, क्षमता वाढवतो. पण कोणाच्या तरी वा सबसे आगे या रेषेची मर्यादा का? माझी आज जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा मी पुढे जायला हवे ही स्वतःशीच स्पर्धा (शरीर-मनाला अनावश्यक न ताणता) का नको? काही जण ती करतातही. पण मुख्य इच्छा असते ती कोणाच्या तरी वा सगळ्यांच्या पुढे असण्याची. तो किंवा ते जिथे असतील त्याच्या एक मिलिमीटरनेही मी पुढे असलो तरी पुरे. पुढच्या वेळी ते जिथे आहेत त्याच्या खाली आले तर मीही खाली आलेला चालेल. त्यांच्या पुढे असलो म्हणजे झाले. आपल्या मुलाला या चाचणीत मिळालेले गुण मागच्या चाचणीतल्यापेक्षा अधिक असणे पुरेसे नसते. ते इतरांपेक्षा अधिक असायला लागतात. मुलाचे गुण कळल्यावर वर्गातल्या इतर मुलांना मिळालेले गुण आपण आवर्जून विचारतो. ते केवळ संदर्भासाठी नाही. तुलनेसाठी. कोणाच्या किती मागे वा पुढे आपले मूल आहे हे कळण्यासाठी. गुण कळण्याआधीची घालमेल आणि कळल्यानंतरचा अर्धवट वा अधिकचा आनंद यावर अवलंबून असतो. 

दहावी-बारावीच्या गुणांशी कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळणार ही एक व्यावहारिक बाबही जोडलेली असते. त्यामुळे ती एक अपरिहार्यताही असते. अर्थात, चांगल्या कॉलेजला चांगले गुण मिळवणाऱ्यांना, म्हणजे हुशार मुलांना, म्हणजे ज्यांना कमी चांगले शिक्षण मिळाले तरी ते त्यांच्या क्षमतेमुळे शिकू शकतात अशांना प्रवेश मिळतो. तर कमी गुणांच्या, म्हणजे कमी हुशार मुलांना कमी चांगले कॉलेज मिळते. म्हणजे इथे कमी चांगले शिकवले जाते तसेच कमी सुविधा आहेत असे गृहीत आहे. वास्तविक कमी गुणांच्या मुलांना पुढे येण्यासाठी अधिक चांगले शिकवणारे, अधिक सुविधा असलेले कॉलेज मिळायला हवे हे न्याय्य नाही का? ...पण असे होत नाही. सगळेच स्पर्धा, प्रतिष्ठा, मान्यता व त्यातून मिळणाऱ्या कृतक आनंदाच्या सापळ्यात अडकलेले आहेत. 

स्पर्धेने होणारा विकास आणि त्यातून मिळणारा आनंद यांना ही मर्यादा आहे. व्यक्ती वा संघ- एकक काहीही असो, दोहोंना हे लागू होते. 

स्पर्धा हे उत्तेजक काही ठिकाणी कामी येत असेल. पण मानवी जीवनाचा गाडा त्यावर चालत नाही. तो चालतो सहकार्यावर. केवळ मानवीच नाही, तर प्राणी वा अन्य जिवांच्या बाबतही शास्त्रज्ञ हा हवाला देतात. पण तो माझा प्रांत नाही. 

मानवाच्या प्राथमिक अवस्थेत-टोळी अवस्थेत शिकार हा सहकार्याने करण्याचा प्रकार होता. वैयक्तिक पातळीवर काही शिकारी होऊ शकतात. पण मुख्यतः त्या सहकार्यानेच व्हायच्या. राजे-महाराजे किंवा सामान्य गावकरीही शिकारीला जायचे ते सहकार्यानेच. एकमेकांना पूरक असे कामांचे नियोजन शिकारीतही असते. केवळ टोळीच नव्हे, तर गुलामी, सरंजामशाही आणि आता भांडवलशाही या मानवी विकासांतील आजवरच्या अवस्थांतली उत्पादक वा व्यवस्थापनाची कामे- मग ती शेती, कारखाने, बॅंका, कार्पोरेट, शासन-प्रशासन, सैन्य काहीही असो, सहकार्यानेच होत आली आहेत. कामांचे विभाजन, त्यांचे योग्य संयोजन यासाठी स्पर्धा नव्हे, सहकार्यच लागते. नासा किंवा इस्रो येथून जी अवकाशयाने उड्डाण करतात, त्यासाठीच्या सहकार्याचे किती बारकाईने संयोजन होत असते, हे आपण जाणतोच. सध्या ज्यांची जोरदार चलती आहे असे नरेंद्र मोदी आणि आता अमित शहा या दोहोंच्या नेतृत्वाखाली अनेक उलथापालथी देशात होत आहेत. त्यांची शैली आणि त्यामागची भूमिका याचे वहन करणारे, त्याला आधार देणारे असंख्य हात, खांदे आणि डोकी खाली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या परिवारातील लाखो प्रशिक्षित, प्रेरित, अनाम कार्यकर्ते त्यांच्या साथीला आहेत. या सगळ्यांच्या चिवट सहकार्यानेच मोदी व शहा यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. या दोन व्यक्ती कर्तृत्ववान व हुशार आहेतच. पण केवळ त्यामुळेच सर्व काही चालले आहे, अशा भ्रमात कोणी राहू नये. 

स्वयंपाक एकटी व्यक्ती करु शकते. करत असते. शिलाई मशिन एकटी व्यक्ती चालवत असते. सुरीला धार एकटा धारवाला लावत असतो. संगणकावर एकटा माणूस काम करत असतो. तथापि, ही कामेही एकट्याची नाहीत. स्वयंपाकाला लागणारे सामान (धान्य, तेल, मसाले इ.) तयार व्हायला असंख्यांचे हात लागलेले असतात. शिलाई मशिनचा धागा, यंत्र किंवा धार लावण्याचे चाक, त्याचा पट्टा तसेच संगणकातील अनेक भाग (हार्डवेअर-सॉफ्टवेअर) असंख्य तज्ज्ञ, कामगार- देशभरचेच नव्हे तर जागतिक स्तरावरचे बनवत असतात. गायक एकटा गात असेल, पण त्यासाठीचे संगीत, सुरावटी यांसाठी अनेकजण वाद्यांचा योग्य तो मेळ घालत असतात. कोणीही कलावंत, चित्रकार, गायक, शिल्पकार ही मंडळी कलेतून नवनिर्मिती करत असतात. ही नवनिर्मिती अनेकांच्या सहकार्याने जे बनलेले आहे, त्यातून योग्य निवड, योग्य प्रमाण व त्यांचा कलात्मक वापर वा रचना यांतून होत असते. हे नवसर्जन एकट्या-दुकट्याच्या नावाने लागत असले तरी त्यामागे ज्ञात-अज्ञात अगणित माणसे असतात. जीवनाचे कुठलेही क्षेत्र घेतले तरी हे सहकार्य तिथे दिसेल. त्याची आणखी उदाहरणे अनावश्यक आहेत. माणूस हा मूळातच परस्परावलंबी व परस्परपरिणामकारी आहे. 

या सहकार्याचा नाद अनाहत आहे. जो प्रत्यक्ष दिसणारेच निर्माण करत आहेत असे नाही. तर असंख्य, अनंत लोक त्यात स्वर भरत आहेत. तोच सृष्टीचा-मनुष्यजातीचा मूलभूत नाद आहे. गप्पाष्टके करत वा निसर्गाची साद ऐकत, चढावर एकमेकांना हात देत होणारे ट्रेकिंग, विद्यार्थ्यांचे एखाद्या प्रकल्पासाठी चाललेले गटकार्य, शेतीची कापणी वा झोडणी, एखादा जड ओंडका एका सूरात तोंडाने विशिष्ट आवाज करत सर्वांनी मिळून उचलणे, सैनिकांचा कदमताल, देवळातली वा शाळेतली प्रार्थना, चौकात म्हटलेली चळवळीची गाणी आणि घोषणा या सगळ्यांत एक शांत नाद आहे. त्यात माझे एकट्याचेच नाव स्पर्धेसाठी पुकारताना आणि निकाल ऐकताना उरात होणाऱी धडधड आणि त्याच्या तयारीवेळचे धपापलेपण नाही. सहकार्यात कोणी एक विजयी नसतो. पराजितही कोणी एक नसतो. त्यातला आनंद आणि दुःख यांची गती संथ असते. एकाचवेळी अनेकजण वल्हे मारत असतात. त्यामुळे वादळातही कोणा एकालाच नाव तिरी लावण्याचा आकांत करावा लागत नाही. 

सहकार्याचा हा नाद ऐकण्यासाठीचे कान तयार व्हायला आजची व्यवस्था मोठा अडसर आहे. त्यासाठी व्यवस्था बदलाचे अनेक बारीक-मोठे संघर्ष करत राहावे लागतील. या संघर्षासाठी प्रेरित करणाऱ्या काही घटना, काही प्रसंग, काही विचार, काही कलात्मक आविष्कार आपल्या वाट्याला येत असतात. ते टिपत राहायला हवेत. 

सुमारे तीस वर्षांपूर्वी ‘उड़ान’ नावाची मालिका दूरदर्शनवर खूप गाजली. (नुकतेच ज्यांचे निधन झाले त्या देशातील पहिल्या पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांच्यावरुन या मालिकेतले इन्स्पेक्टर कल्याणी हे मध्यवर्ती पात्र बेतले आहे.) या मालिकेतील एक प्रसंग मला असाच प्रेरित करुन गेला. त्यातले बारीक तपशील वा शब्द जसेच्या तसे मला आता आठवत नाहीत. पण मुख्य सूत्र मनावर कोरले गेले आहे.

त्यातील मुलगी आणि तिचे वडिल हातात हात घालून धावत आहेत. 

मुलगी म्हणते- “बाबा, इसी तरह हात पकड़कर दौडे़ंगे, तो हममें से कोई आगे कैसे जाएगा?” 

बाबा म्हणतो- “जो मजा साथ दौड़ने में है, वो आगे निकलने में कहाँ?” 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, सप्टेंबर २०१९)