Thursday, August 17, 2017

आमच्या या आंदोलनांचा काय परिणाम होतो?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोरक्षकांचा हिंसाचार, सहारनपूरमधील दलितांवरील हल्ले, जुनैदची हत्या आदि अनेक मुद्द्यांवर आमची निदर्शने झाली. होत आहेत. पुढेही होतील. या निदर्शनांत सहभागी होत असताना, ती संघटित करत असताना आपल्या या प्रयत्नांचा नक्की काय परिणाम होत असावा हा विचार सतत मनात येत असतो. एकतर मोर्च्यांना आझाद मैदानाच्या बाहेर निघायला न्यायालयाने बंदी घातली आहे. पूर्वी आंदोलक येथे जमत व मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा काढत. तो मोठा असेल तर काळा घोडा व लहान असेल तर सम्राट हॉटेल जवळ अडवला जाई. मग सभा होई. शिष्टमंडळ मंत्रालयात जाई. काही वेळा सत्याग्रहाद्वारे पुढे चाल करण्याचा प्रयत्न आंदोलक करत. अशावेळी अटक होई. हा सर्व प्रकार आजूबाजूचे लोक बघत असत. काही भाषणे ऐकायला थांबत. जिज्ञासेने हे काय चाललंय, तुमचे म्हणणे काय असेही विचारत. आता आझाद मैदानाच्या आत होणाऱ्या निदर्शनांना बघायला-ऐकायला निदर्शक, पोलीस व अन्य विषयांवर धरणे धरुन बसलेले आंदोलक फारतर असतात. आमची भाषणे आम्ही त्या मुद्द्यांशी सहमत असलेलेच ऐकतो. बाहेरचे कोणी नसते. आता तर मैदानाच्या या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणारी पायवाटही बंद केल्यामुळे बाहेरचे कोणी तेथे येतच नाही. त्यातल्या त्यात याचा परिणाम काय होतो? तर प्रसारमाध्यमांचे लोक त्यांना वाटले तर येतात. फोटो काढतात. त्याच्या बातम्या देतात. दुसऱ्या दिवशी काही मित्रांचा फोन येतो- ‘अरे, काल तुमच्या आंदोलनाची बातमी वाचली. फोटो पाहिला.’ म्हणजे बाहेरच्या काहींना तरी असे आंदोलन झाल्याची माहिती मिळते. (तसे पाहिले तर फेसबुक, व्हॉट्सअपवर आम्ही फोटो व माहिती टाकतो. या माध्यमांवर असलेल्यांना त्यामुळे ते कळू शकते. तथापि, छापून आलेल्या बातमीला वेगळीच ‘प्रतिष्ठा’ असते.) काही लोक विशिष्ट प्रश्नावर आवाज उठवत आहेत, हे पोलिसांकरवी सरकारला कळते. शिष्टमंडळ भेटीस गेले व मंत्र्यानी भेट दिली तर मागण्यांची चर्चा होते. काही आश्वासने मिळतात. निदर्शनांना जमणारे समविचारी असले तरी हे सुटे सुटे लोक एकत्र येतात तेव्हा ‘हम सब एक है’ ही भावना वाढायला मदत होते. सरकारी, न्यायालयीन बंधने असली तरी आयोजकांकडे बघून काही वेळा पोलीस ही बंधने सैल करतात. विविध स्टेशनांबाहेर, चौकांत तासा-दोन तासांसाठी निदर्शनांना परवानगी देतात. कोतवाल उद्यान ते चैत्यभूमी मोर्च्याला अनुमती देतात. या परवानग्या बहुधा लेखी नसतात. परस्पर समजुतीचा तो भाग असतो. यावेळी बाहेरच्या, रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना या प्रश्नाची माहिती मिळायची शक्यता तयार होते. पूर्ण मिळतेच असे नाही. एकतर ये-जा करणारी माणसे प्रचंड घाईत असतात. पूर्वी लोक थांबून समजून घ्यायचे, ऐकायचे, तसे हल्ली अनुभवाला येत नाही. पत्रके वाटली तर ती चालता चालता घेतात. नजर टाकतात. काही जण तर तिथेच टाकून पुढे चालू लागतात असेही होते. ही निदर्शनेही आम्ही एक आहोत ही भावना सहभागींत दृढ करायला मदत करतात. कोतवाल उद्यानाकडून चैत्यभूमीकडे जाताना सेनाभवनजवळ आल्यावर मोर्च्यातील काहींना चेव येतो. घोषणांना जोर येतो. यामुळे सेनाभवनवाल्यांना किती फरक पडतो ठाऊक नाही. पण मोर्चेकऱ्यांच्या भावनांचे विरेचन व्हायला मदत होते. पुढे जाऊन पुन्हा चैत्यभूमीला सभा झाली की ऐकायला बहुधा आम्हीच असतो. मोर्च्यांची ताकद दांडगी असेल व आयोजक गडबड करणार नाहीत याची खात्री असेल अशावेळीही पोलिसांकडून बंधने सैल केली जातात. भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत असे मोर्चे निघतात. आंबेडकर भवन पाडले गेले तेव्हाचा प्रचंड मोर्चा महानगरपालिकेच्या समोरच्या चौकातच ठाण मांडून बसला. तेथील वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली होती. हल्ली पुरोगामी शक्तींच्या ‘भाग्यात’ अशा वेळा फार कमी येतात. आंबेडकर भवन प्रकरणी भावनेचा भाग मोठा होता. बाकी असे मोर्चे ट्रेड युनियनचे त्यांच्या प्रश्नावर असतात. म्हणजे मोर्चेकऱ्यांचा वैयक्तिक हितसंबंध त्या प्रश्नात गुंतलेला असतो. ज्यांत असे वैयक्तिक हितसंबंध नसतात, व्यापक प्रश्नांत समाजातील एक विवेकी नागरिक म्हणून मला सहभाग द्यायचा आहे, या जाणीवेने पहिल्या परिच्छेदात नोंदवलेल्या विषयांवरचे मोर्चे एवढ्या मोठ्या प्रमाणात निघत नाहीत. काही अपवाद आहेत. उदा. पानसरे-दाभोलकरांच्या हत्येविरोधातील मोर्चा दमदार निघाला होता. पण त्यातही डाव्या-पुरोगामी मंडळींच्या नेतृत्वाखालील जनसंघटनांच्या लोकांचा मोठा भरणा होता. आपापल्या जनसंघटनांचे लोक जरुर यायला हवेत. पण आपले प्रश्न सोडवणारा नेता सांगतो आहे म्हणून कृतज्ञतेपोटी जायचे, असे असता कामा नये. त्या प्रश्नाची तीव्रता मला माझ्या नेत्याकडून जाणवली म्हणून मी त्या मोर्च्यात सहभागी होतो आहे, अशी भावना हवी. अर्थात, नेत्याच्या बोलावण्याला कृतज्ञतेपोटी मान देणारे समूह हे बहुधा निरक्षर, अल्पशिक्षित, गरीब, दुर्बल, असंघटित क्षेत्रात रोजगार करणारे असतात. शिक्षित, संघटित विभागांतील कर्मचाऱ्यांचे नेते अशा मोर्च्यांना अनेकदा एकटे-दुकटेच येतात. हे नेते ज्यांचे नेतृत्व करतात त्या कर्मचाऱ्यांपैकी दोन-चार जवळचे कार्यकर्ते सोडले तर फारसे कोणी दिसत नाहीत. राजकीय जाण घेऊन जनसंघटनांतले लोक मोर्च्यात यायला हवेत. पानसरे-दाभोलकरांच्या हत्येविरोधातील मोठ्या मोर्च्यातही सहभागी सर्वचजण ही राजकीय जाण घेतलेले होते असे म्हणवत नाही. दोन डाव्या पक्षांच्या आज हयात नसलेल्या दोन मोठ्या नेत्यांचा ७२ सालचा पत्रव्यवहार वाचत होतो. त्यात एक नेता दुसऱ्या नेत्याला ‘जनसमूहांच्या पातळीवर तुम्ही त्यांना संघटित करण्याची जी पराकाष्ठा करत आहात त्या क्रमात नवीन प्रकारच्या ‘अर्थवादात’ तुम्ही स्वतःला गमवून बसाल’ असा इशारा देतो. तर दुसरा नेता उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात म्हणतो- ‘...योग्य अशा क्रांतिकारक व्यवहाराकरिता कामगार वर्गाला सिद्ध करण्याकरिता कामगार वर्गाची जाणतेपणाची पातळी अत्युच्च बिंदूला नेण्याचे चिकाटीचे प्रयत्न, आवश्यक ती कृती करण्यापासून परावृत्त न होण्याचा निर्धार, चुका दुरुस्त करण्याची निःसंकोच तयारी या आमच्या सामायिक कमाईच्या बाबी आहेत आणि या कमाईबद्दल आम्ही अभिमान बाळगतो.’ हे लिहिणारे नेते निःसंशय महान होते. त्यांच्या आयुष्यात ते या निर्धारापासून कणभरही हलले नाहीत, याचा मला व्यक्तिशः अनुभव आहे. या दोन्ही नेत्यांची कम्युनिस्ट चळवळीच्या वैचारिक व संघटनात्मक उभारणीत मोठी भागिदारी आहे. त्यांच्या काळात ते खासदार वगैरेही होते. त्यातील एकजण तर भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे अध्वर्यू म्हणून जगात ओळखले जातात. पण या दोन्ही नेत्यांच्या पक्षांत वा अन्य कम्युनिस्ट प्रवाहांत कमीअधिक प्रमाणात कामगार वर्गाची ‘जाणतेपणाची पातळी’ अत्युच्च बिंदूला नेण्याचे प्रयत्न ढिले पडत गेले व क्रमात त्यांना ‘अर्थवादाने’ग्रासले असे म्हणणे भाग पडते. अभ्यासमंडळे हे डाव्या-समाजवादी विभागाचे वैशिष्ट्य हळूहळू थंडावत गेले. जनसंघटनांचे लढे व त्यातील पुढारपण यालाच प्रतिष्ठा तयार झाली. डाव्या प्रवाहातील आम्ही काही लोक आमच्या प्रवाहांतर्गत कामगारांच्या राजकीय शिक्षणाविषयी आग्रह धरत असू. त्याला नकार मिळत नसे. पण तुम्ही ते करा अशी सूचना येई. तसे आम्ही करतही असू. पण त्याला मर्यादा पडत. युनियनच्या बैठकीला आलेल्यांची रोजच्या पुढाऱ्याऐवजी दुसऱ्याला-तेही आपल्या प्रश्नाच्या बाहेरचे काहीतरी ऐकायला फारशी तयारी नसे. आपल्या नेत्याने सांगितले आहे म्हणून ते जबरदस्तीने बसून राहत एवढेच. अशारीतीने बाहेरच्या संसाधन व्यक्ती बोलावून सत्र घेऊन राजकीयीकरण होत नाही. मुखपत्रांत अव्वल राजकीय लेख लिहूनही ते होत नाही. जनसंघटनेच्या नेत्याने दैनंदिन स्वरुपात ते करायचे असते. आपल्या प्रश्नाचा संबंध एकूण समाज परिवर्तनाशी कसा आहे, याची भोवताली घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांतून नियमितपणे जाणीव करुन द्यायची असते. संधी मिळेल तसे व्यापक प्रश्नांवरील आंदोलनात त्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करायचे असते. या सहभागाविषयी पुन्हा बसून चर्चा करायची असते. त्याचा अर्थ व पुढील दिशा लक्षात आणून द्यायची असते. युनियनच्या ताकदीवर पक्षमुखपत्राचे घाऊक वर्गणीदार करता येतात. पण नंतर ते अंक न वाचता तसेच पडून राहतात असे आढळते. दैनंदिन संपर्कातील नेत्याने राजकीयीकरणाचे दैनंदिन काम केले तरच मुखपत्रातील राजकीय लेखनाचा तसेच संसाधन व्यक्ती बोलावल्याचा उपयोग होतो. ज्याची युनियन दांडगी त्याची आर्थिक व मनुष्यबळ या दोन्ही बाबतीत क्षमता मोठी. त्यामुळे व्यापक विषयांवरील मोर्च्यांतही अशांना किंमत अधिक. मोर्च्याचा खर्च व मोर्च्यासाठीची माणसे हे घसघशीत भांडवल त्यांच्या हाती असते. यामुळे मोर्चा सजतो. मोठा झाल्याचा आभास तयार होतो. पण त्याची खरी ताकद फार कमी असते. कोकणातील नद्यांना पूर आला की प्रचंड पाणी व पूर ओसरला की खडक उघडे तशी स्थिती नंतर होते. मोर्च्याला लोक शरीराने आले तरी त्यांच्या मनावरचे संस्कार त्यांच्या वस्त्यांत होत असतात. तिथे भाजप, संघ, सनातनची मंडळी फिरत असतात. आम्ही कंपनीच्या गेटवर किंवा हजेरीच्या ठिकाणी असतो. (आता कंत्राटी काळात गेटवर जमणे मुश्किल होते. काही कामांना गेटही नाही. म्हणून युनियनच्या कार्यालयात अथवा अन्य सोयीच्या जागी कामगारांच्या भेटी, बैठका होतात.) मला ९२-९३ चा प्रसंग आठवतो. बाबरी मशीद कोसळवल्यावर झालेल्या दंगलीत कामगार चाळीत राहणाऱ्या एका मुस्लिम गिरणीकामगार कार्यकर्त्याचे घर जाळले गेले. ही अभूतपूर्व, आश्चर्यकारक व तेवढीच वेदनादायक बाब होती. या चाळीतले त्याचे शेजारीपाजारी कित्येक दशकांचे त्याचे सहकारी गिरणी कामगारच होते. दंगलीत त्या सर्वांचे कॉम्रेडपण धूसर झाले व हिंदू-मुस्लिम ही ओळख ठळक झाली. कामगार कार्यकर्ता म्हणून सन्मानाने वागवल्या जाणाऱ्या या मुस्लिम कार्यकर्त्यास त्या प्रसंगाने एकदम असुरक्षित केले. युनियनच्या नेत्यांनी या वेळी निर्णायक हस्तक्षेप केल्याचे, किमान आपले हे कृत्य कामगार वर्गाच्या एकजुटीला हानिकारक आहे एवढेतरी सांगितल्याचे मला आठवत नाही. या वातावरणात आपण तिथे गेलो तर कामगार ऐकणार नाहीत व आपलीच अप्रतिष्ठा होईल अशी भीती त्यांना होती. कामगार हा फक्त कामगार नसतो. त्याला जात-धर्म असतो. भाषा असते. प्रदेश असतो. तो गावाकडच्या अल्प का होईना जमिनीचा मालक अथवा भूमिहीन असतो. इथे राहतो त्या वस्तीतल्या निवासाचे, व्यवस्थेचे प्रश्न असतात. त्याच्या मुलांच्या शिक्षणाच्या, रोजगाराच्या समस्या असतात. या त्याच्या अंगांना कामगार नेत्याचा स्पर्शच नसेल, या बाबींविषयी कामगार नेता बोलतच नसेल तर तो फक्त कामगार पुढारीच राहतो. तो त्याचा राजकीय नेता होत नाही. कामगार वर्गाच्या जाणतेपणाची अत्युच्च पातळी गाठण्यासाठी कामगार नेत्याने कामगारांच्या जीवनाला समग्रपणे भिडणे ही पूर्वअट आहे. डाव्यांच्या व्यवहाराची चिकित्सा हा या लेखाचा मुख्य मुद्दा नाही. लिहिण्याच्या ओघात त्याविषयीचे थोडे अधिक विवेचन झाले एवढेच. मुख्य मुद्दा आमच्या आंदोलनांची परिणामकारकता हा आहे. त्यासाठी निदर्शनादी जाहीर कृती लक्ष वेधण्यासाठी, आपले म्हणणे जाहीररित्या नोंदवण्यासाठी जरुर करु. पण लोकशिक्षण हे मूलभूत आहे. ‘विचारही मर्त्य असतात’ असे बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात. त्यांचा प्रचार, प्रसार, जोपासना आवश्यक असते. तरच ते टिकतात, असे ते आग्रहाने सांगतात. डावा, पुरोगामी, आंबेडकरी अथवा एकूण प्रगतीशील असा जो काही आपला विचार आहे, तो समूहांना समजून सांगणे, त्याची आताच्या संदर्भात प्रस्तुतता पटवणे गरजेचे आहे. ‘विचार माणसाच्या मनाची पकड घेतात तेव्हा ते भौतिक शक्ती बनतात’, असे मार्क्स म्हणतो. तथापि, आम्ही हे विचार मुरवून त्यांचे भौतिक शक्तींत रुपांतर करण्यात कमी पडलो आहोत. ते कार्य प्रतिगाम्यांनी केले आहे. त्यांच्या विचारांनी ज्यांच्या मनाची पकड घेतली आहे, ते आज गोरक्षणाच्या कल्पनेच्या प्रभावाखाली भौतिक जगातील माणसांचे मुडदे पाडत आहेत, आपल्या विरोधी विचार मांडणाऱ्यांच्या मुसक्या आवळत आहेत. आंबेडकर व मार्क्स यांच्या म्हणण्याची एवढी ठळक प्रचिती देणाऱ्या विरोधकांचे आभार मानून आपण लोकांच्या मनाची मशागत करायच्या कामाला लागूया. त्यातून येणाऱ्या रसरशीत पीकानेच आपली आंदोलने सकस व जोमदार होणार आहेत.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________________________
आंदोलन, ऑगस्ट २०१७

Thursday, August 3, 2017

तस्लिमा, कट्टरपंथी व पुरोगामी


Image result for taslima back to mumbai

तस्लिमा नसरीनना औरंगाबादच्या ‘पाक’ (पवित्र) भूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशा घोषणा देणाऱ्या मुस्लिम कट्टरवाद्यांचे ‘नापाक’ इरादे आजतरी यशस्वी झालेत. औरंगाबादला पर्यटनासाठी आलेल्या तस्लिमा यांना प्रसारमाध्यमांसमोर एमआयएमचे आमदार जलील ‘चुडैल’असे संबोधतात. एवढेच नव्हे तर जर पोलिसांनी तस्लिमांना शहरात अन्य मार्गाने प्रवेश करु दिला असता तर आमची ‘आधी कौम (म्हणजे मुस्लिम धर्मीय जनता) अजिंठा लेणीत व आधी कौम खुलताबाद-वेरुळमध्ये बसली असती व तस्लिमांना अजिंठा-वेरुळ काय असते ते दाखवून दिले असते’ अशी जाहीर धमकी देतात. ही धमकी फक्त तस्लिमांना नाही. ती प्रशासनाला, राज्यव्यवस्थेला आहे. संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेले व संविधानातील व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाला बांधील असलेले सरकार याबाबत ढिम्म राहते. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तस्लिमा नसरीननी औरंगाबाद विमानतळावरुन पुन्हा मुंबईला माघारी जाण्यात समाधान मानते. सरकार यापलीकडे याबाबत काही बोलत नाही, करत नाही. आणि काही किरकोळ अपवाद वगळता सर्वसाधारण समाजालाही याबाबत काही गैर वाटत नाही. ज्यांना काही वाटले त्यांच्या नाराजीला आंदोलकांच्या मुसलमान असण्याची किनार होती.

फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअरचे एक प्रसिद्ध वचन आहे – ‘तुझ्याशी मी सहमत नाही. पण ते मांडण्याच्या तुझ्या अधिकारासाठी मी मरेपर्यंत लढेन.’ आपल्या संविधानाने व्यक्तीला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हाच अर्थ आहे. समाजाने ही भूमिका आपल्या मनात रुजवण्याची प्रगल्भता दाखवायची असते व शासनाने या अधिकाराचे रक्षण करायचे असते. आज समाज प्रगल्भ नाही. तो संकुचित अस्मितांच्या प्रभावाखाली आहे. त्याला प्रगल्भ करणाऱ्या शक्ती दुर्बळ आहेत. समाज असा प्रगल्भ न होण्यातच ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, अशांची आज चलती आहे. सारी ‘कौम’ आपल्या मालकीची असल्याचा आज ते दावा करतात. काही राजकीय पक्ष समाजाच्या या दुर्बलतेचा वापर आपला पाया मजबूत करायला करतात. एम.आय.एम. तस्लिमा प्रकरणाच्या निमित्ताने तेच करत आहे. तर काही राजकीय पक्ष कोंडीत सापडून ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतात. म्हणजे स्पष्ट बोलत नाहीत.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशनाला विरोध करताना शिवसेनेने या कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले होते. पाकिस्तानला आमचा विरोध आहे. म्हणून त्या देशाच्या नागरिकाची भारतात दखल घेता कामा नये, ही त्यामागे भूमिका होती. गुलाम अलींच्या कार्यक्रमालाही असाच विरोध शिवसेनेने केला. जोवर भारतात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश देण्यावरच बंधन येत नाही व अशा नागरिकाशी संबंध ठेवण्याच्या भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याला कायद्याने मनाई करण्यात येत नाही, तोवर शिवसेनेलाही असे करण्याचा अधिकार नाही. काळे फासण्याचा तर नाहीच नाही. बेकायदेशीर बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणणे एवढेच काम व्यक्ती व जागरुक पक्षाचे, संघटनेचे आहे. ती कायदा हातात घेऊ शकत नाही. ज्यांना जे मान्य नाही, त्याबाबत विविध माध्यमांतून टीका करणे, अगदी कार्यक्रमाच्या हॉलबाहेर सनदशीर मार्गाने निषेध-निदर्शन करणे हे ते करु शकतात. पण ज्याचा ते निषेध करतात, त्या व्यक्तीला किंवा तिला निमंत्रित करणाऱ्यांना बलप्रयोगाने प्रतिबंध करणे अथवा त्यांना शारीरिक इजा करणे हा गुन्हा आहे. अस्मिताबाज मंडळी व हिंदू कट्टरपंथीयांकडून हा हैदोस नित्याचाच असतो.

तथापि, हीच गोष्ट पुरोगामीत्वाचा मुकुटमणी म्हणवणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांतील काही विभागांतूनही घडते. बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणारे पुस्तक लिहिणाऱ्या अरुण शौरीच्या तोंडाला काळे फासणे किंवा अभ्यासक्रमातील पुस्तकात व्यंगचित्र छापून बाबासाहेबांचा अवमान केला म्हणून व्यथित झालेल्या भीमसैनिकांकडून सुहास पळशीकरांच्या कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांशी द्रोह आहे, हे त्यांना आकळत नाही. विभूतिपूजेला सक्त विरोध करणाऱ्या बाबासाहेबांनाच विभूती केले गेल्याचा व त्यांचे विचार आत्मसात न केल्याचा हा परिणाम आहे. भावना दुखावतात म्हणून नाटक-सिनेमांना विरोध हे तर नेहमीचेच झाले आहे. अलिकडे ‘इंदू सरकार’ सिनेमाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अशीच निदर्शने झाली. ती टोकाला गेली नाहीत. हिंसक झाली नाहीत, हे चांगले. वास्तविक, कलेला उत्तर कलेनेच द्यायचे असते. त्यावरची समीक्षा, चर्चा हाही मार्ग असतो. पण ती बाब समाजाला समजावून सांगितली जात नाही. समाजाची घडण केली जात नाही.

मग डावे-पुरोगामीही या सापळ्यात अडकतात. तस्लिमा नसरीन तिच्या मुस्लिम धर्ममार्तंडांबद्दलच्या बंडखोर लिखाणामुळे आपल्या बांगला देशातून परागंदा आहे. या मुस्लिम कट्टरपंथीयांनी तिच्या खुनाचा फतवाच काढला आहे. अशावेळी कलकत्त्यात तिला आश्रय देणे डाव्यांनाही जड होत होते व आता ममता बॅनर्जींनाही ती नको आहे. गुलाम अलींचे ममता बॅनर्जी स्वागत करत आहेत, मात्र मला कलकत्त्यात येऊ देत नाहीत, ही तुमची ढोंगी धर्मनिरपेक्षता नव्हे काय, असे तस्लिमा नसरीनने मागे एकदा ट्विट केले होते. प. बंगालातील डाव्यांबद्दलही तिचा तोच आक्षेप आहे. तुम्ही मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करत आहात, हा तिचा थेट आरोप आहे.

भौतिक विकास व वैचारिक प्रगल्भता समांतर गतीने जातात असे होत नाही. वैचारिक प्रगल्भतेचे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात. ते तसे नाही झाले तर ही गती व्यस्तही असू शकते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ती मोठी मर्यादा असते. विचारवंत वा कलावंताने समाजाची वर्तमान मानसिक चौकट लक्षात घेऊन तिच्यावरच्या आघाताची मात्रा ठरवायची असते. समाजाची मानसिकता बदलून त्याला प्रगत करायचा उद्देश असेल तर ही टीकेची मात्रा तेवढीच हवी जेवढी औषध म्हणून कामी येईल. ती जादा झाली तर अर्थात रोगी बरा होण्याऐवजी तो आजार बळावेल. डॉक्टरचे श्रेष्ठत्व रोगी बरा करण्याच्या कौशल्यावर मोजले जाते त्याप्रमाणे समाजाची प्रगल्भता उंचावण्यातील भागिदारीवर विचारवंत वा कलावंताचेही मापन व्हायला हवे. पण त्याकडे आपले दुर्लक्ष होते. कोण किती ‘सडेतोड’ आहे, हा श्रेष्ठत्वाचा निकष नाही. वाटेल ते-वाटेल तेव्हा बोलण्याने इष्ट परिणाम होत नाही. योग्य वेळी, योग्य ते बोलणे ही ‘सम्यक’ कला अंगी बाणवणे म्हणून गरजेचे आहे.

तस्लिमासारख्या कलावंतांकडे ही ‘सम्यक’ कला नाही किंवा त्यांना ती तत्त्व म्हणूनच मान्य नाही. मग ती हाराकिरी होते. ही त्यागाची हाराकिरी म्हणजे एकप्रकारे ‘स्व’ प्रतिमा संवर्धनच असते. असे हे स्वकेंद्री विचारवंत-कलावंत समाजातल्या प्रगतीशील व्यक्ती-संघटनांचीही मग अडचण करतात. तस्लिमाबाबतची डाव्यांची अडचण ही या प्रकारची आहे. पण म्हणून काहीच न बोलण्याने अथवा आधे-अधुरे बोलण्याने कट्टरपंथीयांचे फावते. सामान्य समाज जुनाट विचारांच्या प्रभावाखाली येतो. ते स्वाभाविक असते. तस्लिमांना चुडैल म्हणणारे जलीलसारखे पुढारी मनापासून ते म्हणत असतात असे नाही. ते वैयक्तिक प्रगतीशील भूमिकेचेही असू शकतात. पण राजकीय अथवा धार्मिक सत्ता मिळविण्यासाठी ते समाजाच्या कमजोरपणाचा फायदा घेतात. समाजाच्या मागासपणाचा असा उपयोग करणारी व आपल्या स्वार्थासाठी त्याला तसाच मागास ठेवू पाहणारी ही मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात समाजापासून अलग पाडणे हे पुरोगामी शक्तींचे काम आहे. 

त्यासाठी आर्थिक-भौतिक प्रश्नांबरोबरच समाजाच्या सांस्कृतिक जीवनाशी जैव संबंध जोडणे व या संबंधांतून त्यास योग्य वळण लावणे, प्रगल्भ करणे याकडे खास लक्ष द्यावे लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पुरोगाम्यांची कोंडी फुटायचा व समाज सम्यक दिशेने प्रवाहित होण्याचा तोच मार्ग आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com