Wednesday, April 29, 2020

तारीक है दिल का आंगन

चांद तन्हा है, आस्मां तन्हा
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा 

या ओळी आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी हिच्या कवितेतल्या. बैजुबावरा, पाकिजा, कोहिनूर, साहिब, बीवी और गुलाम या चित्रपटातल्या तिच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. चित्रपटातल्या तिच्या बहुतेक भूमिका शोकात्म आहेत. तिचं व्यक्तिगत जीवनही असेच शोकात्म आहे. उदास, अप्राप्य आशेवर जगणारं. मीना काव्य व जीवन अभिन्नपणे जगत होती. 

तिला असं हवं होतं तरी काय? फक्त प्रेम, साधं, निर्व्याज प्रेम. प्रियकर-प्रेयसीचं आदर्श एकात्म, अभिन्न असं भावविश्व. ती एका कवितेत आपल्या इच्छेचं स्वरुप उलगडते – 

हम तुम दोनों एक छंद है 
शायर जिसको भूल गया 

आपण दोघं एक छंद आहोत. असा छंद ज्याला गीतकारच विसरुन गेला. पण यातला ‘तुम’ तिला कधीच हवा तसा मिळाला नाही. एखादा भेटायचा. पण या दोघांचं नातं मीनाच्या एका कवितेप्रमाणेच दिवस व रात्रीसारखं अलग राहायचं. ती म्हणते – 

हमसफर कोई गर मिले भी कहीं 
दोनों चलते रहे यहाँ तन्हा 

जीवनाच्या वाटेवर हे प्रवासी चालायचे, पण कसे? तर एकाकी. याला काहीच अर्थ नव्हता. पण तरीही दुरुन का होईना याने तिला साथ दिली का? …मग मीना असं का म्हणते? – 

पलटकर यूं न देखो तुम मुझे बस 
तडपता छोड़ दो बिस्मिल समझकर 

तो तिला घायाळ अवस्थेत सोडून जायचा. पण मीना आशावादी. ती म्हणते – 

बैठे हैं रास्ते में बयाबान ए दिल सजाकर 
शायद इसी तरफ से एक दिन बहार गुजरे 

विराण हृदय सजवून ती रस्त्यात बसायची. ‘बहार’ची वाट बघत. अन् तिला क्षितिजावर आशेचा किरण दिसू लागायचा. पण तिचं अपयशी मन साशंक असायचं. आजवर जे झालं तेच होणार का याची तिला भीती वाटायची. ती म्हणते – 

उफ़क के पार जो देखी है रोशनी हमने 
वह रोशनी है खुदा जाने या अंधेरा है 

आणि हे खरंही व्हायचं. तो अंधारच असायचा. मग तिला या लोकांची दांभिकता तीव्रतेने जाणवायची. हे जग स्वार्थी आहे. आपणास कोणी समजू शकणार नाही, हे तिला पटायचं. मग ती या जगाची अन् आपली तुलना करायची – 

तुम लोग तो बादल हो 
हवाओं के साथ आए 
कुछ देर आस्मान पर छाये रहें 
बरसे, 
और कहीं दूर निकल गये. 

हम चट्टाने हैं 
अपनी जगर पर कायम 
और हमें मालूम है कि 
जानेवाले लौटकर नहीं आते. 

पण अखेर आशा माणसाला जगवते. एवढं होऊनही मीनाची आशा दबत नाही. एका क्षणी ती पुन्हा डोकं वर काढते – 

गम की सुनसान काली रातों में 
दूर एक दीप टिमटिमाता है 

अन् मीना या दिव्याच्या रोखाने धावत सुटली. तो तिला मिळालाही. आनंदाने बेहोश होत ती त्याच्यासवे अंधार कापत निघाली. पण – 

यह दिया बुझ गया आज किस मोड़ पर 
खो गई है अंधेरे में हर रहगुज़र 
कैसे जारी रखे कोई अपना सफर 
आज तूही बता – 
मेरे कदमों तले से निकलती हुई जिन्दगी की डगर. 

आणि मग पुन्हा मीना उध्वस्ततेच्या गर्तेत सापडली. आपलं म्हणून तिला कुणी वाटलं असेल तर दारु आणि रात्र. या रात्रीच्या डोहात मदिरेच्या धुंदीत स्वतःला विसरुन जायची. रात्र तिला कशी वाटते पहा – 

आह रात आई 
चुपचाप चली आई 
इसकी खामोशी में पनाह है 
कितना प्यारा सांवलापन है 
रात का खामोश चेहरा 
झुकी हुई नर्म-नर्म खामोश आँखें 
भरी-भरी खामोश गोद 
अच्छा हुआ जो रात आई 

या रात्रीत मग तिच्या वेदना तिच्यासमोर थैमानू लागतात. अन् मग तिची स्थिती अशी होते – 

रात सुनसान है, तारीक है दिल का आंगन 
आसमां पर कोई तारा न जमीं पर जुगनू 
टिमटिमाते हैं मेरी तरसी हुई आँखों में 
कुछ दिये - 
तुम जिन्हे देखोगे तो कहोगे : आंसू. 

मीना मनसोक्त रडायची. पण रडता रडता आपल्या मनाची समजूत घालायची – 

हंस हंस के जवां दिल के हम क्यों न चुने टुकडे 
हर शख्स की किस्मत में इनाम नहीं होता 

छिन्न हृदयाचे तुकडे वेचत वास्तव का नाही स्वीकारत आपण? प्रत्येकाच्या नशिबात बक्षीस थोडंच असतं! ती आपल्या डोळ्यांनाही रडू नका म्हणून बजावयाची – 

बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर 
जो मय से पिघल जाए वह जाम नहीं होता 

ओघळणाऱ्या अश्रूंनीच डोळ्यांना समजावलं की दारुने जो वितळतो तो प्यालाच नसतो. पण हा तिचा निश्चय किती काळ टिकणार? कारण अश्रू हेच तर आता तिचं सर्वस्व उरलंय. म्हणून ती म्हणते – 

मुद्दत हो गई अब तो रोये 
बरसों से बरसात अलग है 
अन् ती पुन्हा अश्रू ढाळू लागते. 

असे हे मीनाचं शोकात्म जगणं. तिच्या कवितांचं परीक्षण ते काय करणार? परीक्षण करणं म्हणजे तटस्थ होणे. ते मला शक्य नाही. मीनाच्या भावनांशी फारकत घेणं मला शक्य किंबहुना सहनच होणार नाही. माझ्या अस्वस्थतेच्या काळात या कविता माझा मोठा आधार असतो. म्हणून मी मीनाच्या कविता मला कशा भावल्या त्याची केवळ नोंद इथे केली आहे. 

पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, मीना फार वाईट जगली. अखेरपर्यंत ती कोणाच्या-कशाच्या तरी प्रतीक्षेत होती. जग एकाकीच सोडावं लागणार हे ठाऊक असतानाही..! 

राह देखा करेगा सदियों तक 
छोड़ जायेंगे यह जहां तन्हा... 

___________________________ 

१९८३-८४ च्या सुमारास मी अठरा-एकोणीस वर्षांचा असताना लिहिलेले हे टिपण. कागदाचे काही जीर्ण तुकडे एका जुन्या फायलीत सापडले. त्यावर हे टिपण होते. आता ते टाईप केले. – सुरेश सावंत 

Wednesday, April 1, 2020

सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?


सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाने लोकसत्ता लाईव्हमधील मुलाखतीत मराठी मालिकांत मुख्य भूमिकेसाठी ब्राम्हण अभिनेत्रींनाच संधी दिली जात असल्याचा आरोप केला आणि अपेक्षेप्रमाणे टीके-प्रतिटीकेची बरीच राळ उडाली. खुद्द सुजय डहाके तसेच मराठी मालिका यांविषयी मत देण्याइतका त्यांचा परिचय मला नाही. त्यामुळे सुजय डहाकेचा आरोप मराठी मालिकांबाबत खरा की खोटा, हे मी सांगू शकत नाही. पण व्यापक सामाजिक-आर्थिक स्थिती, माध्यमांतले त्याचे प्रतिबिंब यांविषयी जे अभ्यास व निरीक्षणे मांडली जातात, त्यांचा परिचय मला आहे. सामाजिक-राजकीय चळवळीतला वावरही काही बाबी मला लक्षात आणून देत असतो. त्याआधारे सुजय डहाकेच्या आक्षेपाचा आणि त्यावरच्या टीकेचा संदर्भ पाहता येतो. सुजय डहाकेचे व्यक्तित्व उथळ की गंभीर किंवा त्याचे टीकाकार किती प्रांजळ हा माझा प्रश्न नाही. ज्या संदर्भात हा आक्षेप व त्यावरची टीका आली आहे, तो संदर्भ निश्चित गंभीर आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

सुजयच्या आरोपानंतर त्याच्या विरोधात पहिली तोफ डागली अभिनेता शशांक केतकर याने. तो म्हणतो - “माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे. पुढे तो म्हणतो, कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?”

ब्राम्हणी वर्चस्वाच्या विरोधात बोलणाऱ्या सुजयने त्याला संधी असताना अब्राम्हण अभिनेत्रींची निवड का केली नाही? ...हा प्रश्न वकिली युक्तिवादासाठी बरोबर आहे. त्याचे उत्तर सुजयने जरुर द्यावे. वैयक्तिक वागणूक बोले तैसा चाले नसेल तर नैतिक अधिकारही कमी होतो हे खरे. पण वैयक्तिक वागणुकीवर त्या व्यक्तीने विचारलेल्या सामाजिक महत्वाच्या प्रश्नाचे महत्व कमी ठरत नाही. तो प्रश्न नाहीच म्हणून बाजूला सारता येत नाही. एखादा थोर बेवडा दारुच्या दुष्परिणामांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देत असेल, तर ती माहिती चुकीची ठरत नाही. बेवडा सांगतोय...पण खरं बोलतोय असेच आपण म्हणू. म्हणायला हवे. तीच बाब सुजय कामाकडे लक्ष देतो की नाही यालाही लागू आहे. तो आता काहीही करत नसेल. चकाट्या पिटत असेल. त्याचे चित्रपट चालत नसतील. तरीही त्याने केलेल्या विधानाची किंमत तो खूप काम करत असताना, चित्रपट चालत असताना केलेल्या विधानापेक्षा कमी होत नाही.

शशांकचे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. एक, आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे. दुसरे, साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?’

शशांक केतकरने या दोन मुद्द्यांतून सांगितलेला निष्कर्ष हा कि, मराठी मालिका वा सिनेमा क्षेत्रात जातीला थारा नाही. तिथे गुणवत्ता पाहिली जाते. मंजुळे गुणवान आहे. या गुणवत्तेला सानेंनी जोखले, साथ दिली आणि उत्तम कलाकृती जन्मास आल्या.

शशांक मग सुजयला दिलेल्या उत्तरात पुढे असे का म्हणतो? - “कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.

साने, केतकर, मंजुळे, कांबळे यांत काहीही फरक तो मानत नाही. गुणवत्तेलाच त्याच्या क्षेत्रात किंमत आहे. कांबळे, छल्लारे, पवार हे गुणवान आहेत. अशा गुणवानांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा त्याला अभिमान आहे. ...असे साधे सरळ त्याला म्हणायचे आहे का?

नाही. सुजयच्या जातिवादाच्या आक्षेपाला तो उत्तर देतो आहे. कांबळे, छल्लारे व पवार हे अब्राम्हण किंवा कथित खालच्या जातीचे असतानाही माझ्यासारखा ब्राम्हण त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजेच मी जातिभेद मानत नाही. त्यातून येणारी श्रेणी मी मानत नाही. केवळ गुणवत्ता मानतो, हे तो यातून सांगतो आहे.

समाजात अन्यत्र असा जातिभेद केला जातो, जातींवरुन माणसाच्या श्रेणी ठरवल्या जातात, हे त्यास बहुधा कबूल आहे. मी मात्र ते मानत नाही आणि आमच्या क्षेत्रात असे काही होत नाही, यावर तो ठाम आहे.

शशांक स्वतः भेदभावाच्या या अमानवी प्रथेपासून पूर्ण अलिप्त आहे, याची ग्वाही देतो आहे. ते खरे असू शकते. पण तेवढेच. त्याच्या क्षेत्रात असा भेदभाव होत नाही, फक्त गुणवत्ताच महत्वाची मानली जाते, हे विधान त्यातून सिद्ध होत नाही. त्यासाठी कथित तळच्या, मधल्या जातींच्या कलावंतांच्या साक्षी आवश्यक आहेत. अर्थात केवळ त्याही पुरेशा नाहीत. त्यांच्यावर हेत्वारोप होऊ शकतात. एक पद्धतशीर समाजशास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे.

तेजश्री प्रधान हिनेही “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्षं माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?” अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या क्षेत्रात गुणवत्तेलाच महत्व दिले जाते. ती स्वतः अब्राम्हण असूनही तिला काही त्रास होत नाही, हा तिचाही निष्कर्ष आहे.

ब्राम्हण विरुद्ध सीकेपी हा तीव्र ऐतिहासिक झगडा आहे. मात्र तो जातीय उतरंडीच्या वरच्या भागातल्या जातींच्या स्पर्धेचा आहे. सीकेपी ही मागास जात नव्हे, हे इथे जाता जाता लक्षात ठेवूया. मागास विरुद्ध वरच्या जाती या संघर्षात छावण्या कशा पडतात, ते पहावे लागते.

सौरभ गोखले यानेही सुजयची लायकी काढून त्याला कडक समज दिली आहे- पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.

त्याचे क्षेत्र किती नितळ, निर्मळ आहे आणि आजूबाजूची घाण इथे कशी घुसडू नये हे सौरभ इथे बजावून सांगतो आहे. श्रीमुखात भडकवण्याची भाषा हा सुजयच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला वगैरे मानूया नको. सुजयच्या त्याच्या क्षेत्रातल्या मित्राचा तो सात्विक संताप आहे, असेच तूर्त गृहीत धरुया.

या सगळ्याबाबत गिरीश दातारांची एक वेगळी प्रतिक्रिया आहे. दातार नावावरुन कळते त्याप्रमाणे ब्राम्हण असावेत. ते स्वतःला ब्राम्हण वा कुठल्याही जातीचे मानतही नसतील. पण जन्म कथित ब्राम्हण घरात झालेला असावा. ते स्वतः माध्यम क्षेत्रातलेच दिसतात. ते त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात-

माझ्या मते सुजय डहाके कलाक्षेत्रातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादाबद्दल त्याची सल व्यक्त करतोय. आणि जे अतिशय योग्य असेच आहे. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकलावंताला अशी सल का वाटतीये, याचा 'किमान विचारही' न करता, त्याच्या बोलण्यात तात्विक पातळीवर खरंच काही सत्य आहे का (मी तात्विक म्हणतोय. सांख्यिकी नाही. त्यामुळे मूर्खासारखे कोणत्या सिरीयल आणि सिनेमांमध्ये किती ब्राह्मणेतर कलाकारांनी कामे केलीयेत याची उदाहरणे देत बसू नये) हे तपासून पाहण्याची, त्याच्यावर मूर्खासारखी टीका करणाऱ्यांना गरजही वाटत नाही - हीच खरी सांस्कृतिक वंचना आहे.

ब्राम्हणी वर्चस्व म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण करताना ते पुढे नोंदवतात – काही अपवाद सोडल्यास, ब्राह्मणी चालीरीती, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी सणवार, ब्राह्मणी पोशाख - हाच काय जणू epitome of ideal and standard culture अर्थात - भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक आदर्शाचा अत्युच्च नमुना आहे - अश्याच प्रकारे - ब्राह्मणांनी आपले सौंदर्य निकष बहुजनांवर लादणे चालवले आहे. म्हणूनच सिरीयल, सिनेमांमध्येही बहुजन पात्रेही ब्राह्मणी चालीरीती आचरताना दिसतात. (काही मोजके अपवाद वगळता).

त्यांच्या या कलाक्षेत्रात सहकलाकारांशी व्यवहार करताना हे ब्राम्हणी वर्चस्व कसे काम करते, याचे वर्णन ते असे करतात- ब्राह्मणी वर्चस्ववाद म्हणजे केवळ ब्राह्मण कलाकार संख्येने अधिक असणे, किंवा ब्राह्मणेतर कलाकारांची कलेच्या क्षेत्रात कमी संख्या असणे नव्हे, तर याहून अधिक व्यापक स्वरूपात याचा विचार व्हायला पाहिजे. '' आणि '' मधल्या फरकाने आपल्या सोबत काम करणाऱ्याला हीन लेखणे, ज्यांना तसे बोलता येत नाही म्हणून - त्यांना अत्यंत कळकळीने मराठीतले मोठे कवी तू कसे वाचले पाहिजेस, ज्यामुळे तुझी भाषा कशी सुधारेल (हे सांगणे)... हे ध्यानात घेतले तर आपणही नकळत याचे वाहक कसे होत असतो, हे ध्यानात येईल.

आपल्या सहकाऱ्याची टीका संवेदनशीलतेने ऐकून तपासण्याची गरज तसेच गुणवत्ता कशाला म्हणायचे, ब्राम्हणी वर्चस्व हे केवळ संख्येवर अवलंबून नाही तर तो धाक निर्माण करणारा एक सांस्कृतिक मापदंड असतो, असे नमूद करुन या चर्चेला प्रगल्भ आयाम दातारांनी दिले आहेत. सुजय डहाकेच्या हेतूंना वा त्याच्या मूर्खपणाला तपासण्यात वेळ घालवण्याऐवजी दातारांनी मांडलेल्या या मुद्द्यांची चर्चा शशांक, तेजश्री, सौरभ यांनी करणे गरजेचे आहे.

सांस्कृतिक वर्चस्व संख्येवर अवलंबून नसले तरी प्रत्यक्ष संख्येची अवस्था माध्यम आणि आर्थिक क्षेत्रात काय आहे आणि जातींच्या उतरंडीचा त्याच्याशी संबंध कसा आहे, हे पाहणे कमी उद्बोधक नाही. ही अवस्था स्वातंत्र्याचे आयुर्मान पाऊणशे व्हायला येत असताना असणे हे खूप गंभीर आहे.

७-८ महिन्यांपूर्वी जाहीर झालेला हा अभ्यास. ऑक्सफॅम आणि न्यूजलाँड्री यांनी केलेला. त्यात त्यांनी जातींची उतरंड माध्यमांतल्या विविध क्षेत्रात कशी आजही कायम आहे, याचे आकडे दिले आहेत. असा अभ्यास याही आधी योगेंद्र यादव वगैरे मंडळींनी केलेला आहे. त्यांचेही निष्कर्ष तेच आहेत. हे आकडे ताजे आहेत, म्हणून ते घेतले आहेत.

आधी देशातल्या लोकसंख्येची सामाजिक विभागणी कशी आहे ती पाहू.

टक्के
विभाग
२२.८
सर्वसाधारण (ब्राम्हण, कायस्थ, क्षत्रिय, बनिया आदि उच्चवर्णीय)
५२
ओबीसी (शूद्र जाती)
१६.६
अनुसूचित जाती (दलित जाती)
८.६
अनुसूचित जमाती (आदिवासी जाती)

आता माध्यमांतल्या नेतृत्वस्थानी असणाऱ्यांचे प्रमाण पाहू.

माध्यम
सर्वसाधारण (२२.८ टक्के)
ओबीसी (५२ टक्के)
अनु. जाती (१६.६ टक्के)
अनु. जमाती (८.६ टक्के)
इंग्रजी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
८९.३ टक्के



हिंदी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
१०० टक्के



इंग्रजी वर्तमानपत्रे
९१.७ टक्के



हिंदी वर्तमानपत्रे
८७.५ टक्के



डिजिटल मीडिया
८४.२ टक्के
५.३ टक्के


नियतकालिके
७२.७ टक्के
१३.६ टक्के



याचा अर्थ काय?

लोकसंख्येत २२.८ टक्के असलेल्या उच्चवर्णीयांचे जवळपास एकहाती नेतृत्व कसे काय? फक्त दोन ठिकाणी मामुली प्रमाणात ओबीसी दिसतात. दलित-आदिवासींचा तर पत्ताच नाही. (अधिक तपशीलात गेल्यास उच्चवर्णीयांतल्या श्रेणीचेही दर्शन इथे घडते.)

गुणवत्ता केवळ उच्चवर्णीयांत आहे का? ती जन्मजात आहे का? याला शशांक, सौरभ किंवा तेजश्री यांचे उत्तर नाही असेच असेल. मग आमच्या क्षेत्रात फक्त टॅलेंट पाहिले जाते, हे विधान कसे कबूल करायचे? मराठी टीव्ही किंवा मराठी सिनेमा याला अपवाद आहे का? समजा जास्त उच्चवर्णीयच प्रमुख भूमिकांत किंवा उच्च स्थानांवर असले आणि ते खरोखरच टॅलेंटमुळेच तिथे असले तरी त्यांच्यातल्याच बहुसंख्यांमध्ये हे टॅलेंट का? ...या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ व्हायला नको का? शशांकने उल्लेखिलेल्या दोन नावांबाबतच बोलायचे तर साने व मंजुळे यांपैकी किती मंजुळे सानेंच्या जागी आहेत? नसतील तर का नाहीत? या प्रश्नाने त्रास व्हायला नको का? टॅलेंट जन्मजात नाही हे कबूल असेल तर तथाकथित खालच्या जातींचे टॅलेंट पुढे न यायला काहीतरी अडथळे आहेत आणि ते शोधून दूर करायला हवेत, ही आपली भावना व खटपट असायला हवी की नको?

पैसे-संपत्ती कमाविण्याची अक्कलपण उच्चवर्णीयांतच जास्त कशी? ...योगायोगाने? अलिकडच्याच एका अभ्यासाने मांडलेली ही खालील आकडेवारी पहा.

जात/समाज विभाग
संपत्तीतला वाटा (%)
हिंदू उच्चवर्णीय
४१
हिंदू ओबीसी
३०.७
अन्य
मुस्लिम
हिंदू अनु. जाती
७.६
हिंदू अनु. जमाती
३.७

हिंदू समाजातली सामाजिक/जातीची उतरंड जशीच्या तशी आर्थिक बाबतीत दिसते. व्यवसायांतही त्याचा पडताळा येतो. सफाई कामात शतप्रतिशत दलित कसे? लोकसंख्येतले जातनिहाय प्रमाण सफाई कामगारांत का दिसत नाही?

सुजय डहाकेने हे सर्व प्रश्न विचारलेले नाहीत. पण त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे सर्व मुद्दे येतात.  त्याने विचारलेल्या प्रश्नाला गैरलागू ठरवताना हे प्रश्न गैरलागू कसे ठरवणार? ते ढळढळीत समोर उभे आहेत. त्यांची उत्तरे द्यावीत लागतील.

स्वतंत्र भारतात विकास जरुर झाला. नव्या आर्थिक धोरणाने काही काळ आर्थिक उन्नतीला गती आली. पण हा विकास वा उन्नती कोणाच्या, किती व काय प्रकारे वाट्याला आली? त्याचा परिणाम काय झाला? ...हा हिशेब करायचा नाही का? प्रत्येक जातीत काहीजण सुळक्यासारखे वर आलेले दिसतात. पण त्यावर त्या जातीचे मोजमाप करुन चालणार नाही. त्याचे जातीतले प्रमाण किती ते पहावेच लागेल. नव्या आर्थिक धोरणानंतरच्या संपत्ती वितरणात दिवसेंदिवस विषमता वाढत चालली आहे, असे अभ्यासक नोंदवत आहेत. त्यावर उपाय नाही झाला तर तो असंतोष समाजात अन्य मार्गांनी उफाळून येतो. तो आपण अनुभवत आहोत. संविधानातली मानवी प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक न्याय, समता या मूल्यांच्या रुजवातीशिवाय समाजाचा निरामय विकास संभवनीय नाही, हे आपण समजून घ्यायला अजून किती उशीर करणार आहोत?

शशांक, तेजश्री, सौरभ यांच्यात जरुर टॅलेंट आहे. पण या टॅलेंटला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा वर्ग व जात यांचे कोंदण लाभलेले आहे. त्यांची इच्छा असो वा नसो. ते मागोत वा न मागोत. त्यांना ते मदत करतच असते. हे कोंदण गळून पडून खऱ्या टॅलेंटची निःपक्षपाती निवड होण्यासाठी आजची भयावह होत चाललेली सामाजिक-आर्थिक विषमता आपल्याला कमी करत न्यावी लागेल.

हे आकळले व त्याप्रति कृतिशील संवेदना जागी झाली तर शशांक, सौरभ, तेजश्री आणि सुजय या लढ्यात बहुधा एकत्रच दिसतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, एप्रिल २०२०)