Tuesday, May 31, 2016

सैराट का भावतो? काय साधतो?


“ ‘सैराट’ वर काही लिहिलंस का? ...कधी लिहिणार आहेस? ...जरुर लिही.” ...मित्रमंडळींचे प्रश्न, सूचना चालू होती. फेसबुक-व्हॉट्सअपवर एवढं काही लिहिलं जात होतं-जात आहे की ते वाचून आपण लिहावे की न लिहावे हा हॅम्लेटी प्रश्न मनात अडकून बसला होता. जे लिहिलं जातं आहे, त्यातील काही मला पटतं, काही पटत नाही, काही अभिनिवेशी वाटतं, काही दोन्ही बाजूंनी जातीय वाटतं. आपण लिहायचं तर यातलंच काही, यातल्याच काहीवर लिहावं लागेल. नोंदवलं न गेलेलं असंही काही आहे, असं वाटतं. त्यावर बोलावं लागेल. थोडक्यात, मला न लिहून चालणार नाही. ‘फॅंड्री’च्या वेळी किती चटकन व भारावून लिहिलं होतं! मग त्याच दिग्दर्शकाचा, त्याच जाणिवांचा ‘सैराट’ अपवाद करुन कसे चालेल? तेव्हा, लिहायला सुरुवात करतो. थोडं स्वैर, थोडं संज्ञाप्रवाही होईल. पण चालवून घ्या.

‘सैराट’ आज ११ व्या दिवशी ४१ कोटींची कमाई करुन गेला आहे. (लेख छापून येताना १०० कोटींचा आकडा पार झाला आहे.) हा आकडा अजून बराच वाढेल असे दिसते. मराठी सिनेमाला अलिकडच्या काळात तिकिटबारीवर मिळालेला हा प्रतिसाद दुर्मिळच म्हणायला हवा. त्याबद्दल नागराज मंजुळे व त्यांची सगळी टीम यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पण तिकिटबारीवरची कमाई हा सिनेमाच्या मापनाचा निकष नाही. अनेकांतला एक असेही नाही. तो अजिबातच नाही. सिनेमा हा व्यवसाय आहे हे लक्षात घेता पैश्यांच्या रुपात अशी कमाई होणे, हे सिनेमाचा खर्च वसूल होणे, नफा मिळणे यासाठी खूप महत्वाचे आहेच. हे व्यावसायिक गणित जमले नाही, तर पुढचा भला-बुरा जो काही असेल तो सिनेमा निघणेच मुश्कील होईल. तेव्हा, ती कमाई सैराटने केली हे नागराज आणि टीमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप चांगले झाले. याचे अर्थातच मला समाधान आहे.

चांगला सिनेमा कशाला म्हणायचे याच्या मापनासाठी सर्वसाधारणपणे हे निकष सांगितले जातातः चांगली पटकथा, नाविन्यपूर्ण अथवा वैशिष्ट्यपूर्ण कल्पना, चांगले कलावंत, चांगले छायांकन, त्यातून सूचित होणाऱ्या संदेशाची सखोलता, वास्तवाची सर्जनशील फेरमांडणी करताना वास्तवाशी असलेली तिची वाजवी अनुरुपता, नेपथ्य, ध्वनियोजना व या सगळ्याची चपखल रचना. (नार्निया, हातिमताई किंवा अन्य परिकथांसारख्या अद्भूतकथांचा आपण इथे विचार करत नाही आहोत. त्यांचे निकष काही बाबतीत निराळे आहेत. आपण सामाजिक, वास्तववादी सिनेमाचा विचार करत आहोत.)

नागराज यांचा या आधीचा ‘फॅंड्री’ हा सिनेमा या निकषांवर उतरणारा अत्युत्तम सिनेमा आहे. ‘सैराट’ त्या श्रेणीत मोडत नाही. म्हणूनच जे कोणी ‘फॅंड्री’ सारखा किंवा त्यापेक्षा उत्तम सिनेमा आपल्याला नागराज देणार ही अपेक्षा घेऊन सैराट पाहायला गेले होते, त्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. नागराजचा पूर्ण आकाराचा फॅंड्री हा पहिला व सैराट हा दुसरा सिनेमा. फॅंड्रीने ज्या अपेक्षा तयार केल्या होत्या त्यांच्या परिपूर्ततेची अपेक्षा विचक्षक प्रेक्षकांनी सैराटकडून करणे साहजिकच आहे.

हे झाले जाणत्या प्रेक्षकांचे. पण ते संख्येने अत्यंत अल्प आहेत. सर्वसाधारण प्रेक्षक असे विचक्षक नसतात. नव्याचे रसग्रहण करणारा प्रेक्षक तयार करावा लागतो. तसा तो करण्याचे सशक्त प्रयत्न आपल्याकडे झालेले नाहीत. त्यामुळे या सर्वसाधारण प्रेक्षकांचे चक्रधरांच्या हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीसारखे असते. प्रत्येकाचे त्याच्या रुची, सामाजिक जाणीवा व स्तर यांचे म्हणून वेगवेगळे निकष असतात. त्यांप्रमाणे ते सिनेमा अनुभवत, मापत असतात.

ज्या प्रतिक्रियेची दखल घेऊ नये असे आधी वाटले; पण नंतर ती देणाराही एक प्रवाह आहे असे लक्षात आल्याने तिच्याविषयी बोलणे गरजेचे आहे. ही प्रतिक्रिया देणारा बाप ‘तुमच्या मुलीने आर्चीसारखे शाळेच्या वयात केलेले चालेल का?’ असे विचारतो. हा सिनेमा शालेय वयातील मुला-मुलींच्या अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देतो, असा या बापाचा आरोप आहे.

हा आरोप निराधार आहे. फसवा आहे. वयात येणाऱ्या मुला-मुलींमधले आकर्षण, त्यांच्यातली जवळीक ही नैसर्गिक आहे. जीवनाला रंगत आणणारा, फुलविणारा तो एक उत्सव आहे. त्याच्या स्वागताचीच भूमिका हवी. त्याचा निषेध, दमन करुन प्रश्न सुटणार नाही; या आधीही ते सुटले नाहीत. त्यांचे नियमन कसे करायचे याचे भान त्यांना द्यायला हवे. ही भीती वाटणाऱ्या पालकांनी आपल्या शाळा-कॉलेजे-वस्त्या-गाव आठवून पाहावेत. त्यांच्या वयाची इतर मुलेच नव्हे, तर हे पालक स्वतः त्यातली पात्रे होती, हे त्यांच्या लक्षात येईल. नागराजच्या सिनेमाने जे बोलता येत नाही असे एक दुखणे उफाळून येते ते म्हणजे, आमच्या पोरी या खालच्या जातीतल्यांच्या प्रेमात पडतात हे. हा प्रवाह केवळ मुला-मुलींनी कोणत्या वयात काय बंधने पाळायची एवढेच बोलत नाही, तर त्याचा मुला-मुलींनी प्रेमात पडताना जातिपातीची बंधने झुगारुन देण्याला, सामाजिक श्रेणींच्या विरोधात बंड करायला तीव्र विरोध असतो.

फॅंड्रीत जब्याला शालू प्रत्यक्षात भेटत नाही, तिला त्याच्या भावनांची खबरही नाही. तरीही फॅंड्रीला अशा पालकांचा विरोध होता. कारण एकूण मांडणीतून दिग्दर्शकाने जातिपातींच्या विरोधात समाजाला चेतवले आहे, हे त्यांना कळते. त्यामुळे त्यांचा संताप होतो. सैराटमध्ये तर प्रचंड विरोध असतानाही आर्ची-परश्याचे प्रत्यक्ष मीलन होते. दोन तरुण जीवांच्या प्रेमाच्या या उत्सवाला आग लावणाऱ्या सामाजिक विषमतेला दिग्दर्शक ललकारतो. ही ललकार सिनेमाला येणाऱ्या तुफान गर्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार होते. याविषयीचा तो खरा पोटशूळ असतो.

सैराट ही काही थिल्लर प्रेमाची कथा नाही. जबाबदारी, निष्ठा व त्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या युगुलाची व त्यांना मदत करताना त्यांच्याइतकाच स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्यांच्या भिन्न धर्माच्या-भिन्न जातींच्या मित्रांची कथा आहे. त्यामुळे मुले बिघडणार नाहीत, तर अधिक जबाबदारच होतील.

नवी पिढी अधिक मोकळीक घेते आहे. ही मोकळीक वाढणार आहे. अशावेळी पालकांनी आपापल्या भागांतल्या शाळा-कॉलेजांमध्ये लैंगिक शिक्षण व जोडीदार-विवाहविषयक समुपदेशन हे उपक्रम कसे घेता येतील, याच्या प्रयत्नाला लागायला हवे.

ज्या मंडळींना हा सिनेमा भावला, त्यांत सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्यांचा एक प्रवाह आहे. त्यांना आंतरजातीय विवाह, वरच्या जातीच्या सधन राजकारण्यांच्या दांडगाईविरोधात खंबीर व निडरपणे उभी राहणारी व तथाकथित खालच्या जात आणि आर्थिक स्थितीतल्या परश्याला निष्ठेने साथ देणारी, त्याच्यासाठी-त्याच्यासोबत हालअपेष्टा सोसणारी आर्ची (एक स्त्री), त्यांना साथ देणारे मित्र भावतात. या सर्वाची परिणती म्हणून आजही समाजात अत्यंत क्रौर्याने अशा युगुलाला संपवले जाण्याचे परिचित वास्तव त्यांना पुनःप्रत्ययाची वेदना देते. अस्वस्थ करते. प्रिन्स शिक्षकाच्याच कानाखाली वाजवतो, या प्रसंगाने काही मागास समाजातून आलेल्या प्राध्यापकांना तत्सम दांडगाईच्या अवमान-संतापजनक अनुभवांचे स्मरण होते. ग्रामीण महाराष्ट्रातील सरंजामी धनदांडग्यांच्या ताब्यातील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षक हे गुलाम असतात. ते मागास समाजातून आलेले असतील तर विचारुच नका.

या गटांच्या पलीकडचा बहुसंख्य प्रेक्षकवर्ग-ज्याच्यातील काहीजण दोन-तीनदा हाच सिनेमा पाहत आहेत, त्यांना यातले काय भावत असावे?

या गटात गावातील जातवार वस्त्यांचा, व्यवसायांचा परिचय असलेले प्रत्यक्ष गावात राहणारे, जातींचा, त्यांच्या श्रेणींचा सर्वसाधारण परिचय असलेले गावांजवळच्या छोट्या शहरात राहणारे, जातींची ढोबळ माहिती असणारे किंवा नसणारे असे मोठ्या शहरात राहणारे अशांचा समावेश होतो. मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलांना आर्ची-परश्याची कहाणी गरीब-श्रीमंतांच्या भेदाची कहाणी वाटते. त्यांना जातीची बाजू लक्षात येतेच असे नाही. गाव व छोट्या शहरांतील मुलांना ती बऱ्यापैकी येते. गाव, छोटी शहरे व मोठी शहरे यातील सर्वच मुले, जी आता पूर्वीपेक्षा स्त्री-पुरुष संबंधांबाबत कमी-अधिक प्रमाणात मोकळी आहेत, त्यांना आर्ची-परश्याची प्रेमकथा स्वतःची वाटते. आपली प्रेयसी आर्चीसारखी बुलेटवरुन येणारी, मुलांना दम देणारी, पोलीस स्टेशनवर ‘मी परश्याचे अपहरण केले, त्याच्या घरच्यांना सोडा’ असे बजावणारी, मागे लागलेल्यांवर रिव्हॉल्वर चालवणारी, ‘झिंगाट’च्या ठेक्यावर स्त्री असल्याचा संकोच सोडून मुक्तपणे नाचणारी अशी हंटरवाली-स्वप्नसुंदरी असावी हे स्वप्नरंजनही इथे असते. मुलींना बुजरा, संकोची, गोड परश्या प्रचंड आवडतो. ‘याड लागलं’ गाण्याच्या पार्श्वभूमीवर परश्या झेपावत, थिरकत येतो तो सरळ पडद्यातून बाहेर येऊन या मुलींच्या काळजात घुसतो. आर्ची-परश्याच्या भेटींचे, चिठ्ठीची देवघेव करण्याचे प्रसंग या मुलामुलींच्या दिलाचा पुरजा-पुरजा करतात. प्रौढांनाही बित्या दिनांमध्ये भिजवून आणतात. सिनेमातली सगळीच गाणी या सगळ्यांनाच मोहविणारी-थिरकवणारी आहेत. ‘झिंग झिंग झिंगाट’ वर तर झिंगून गेल्यासारखी माणसे थिएटरातच नाचायला लागतात.

गाव व छोट्या शहरांतील माणसांना हा सिनेमा जवळचा वाटण्याची जी इतर काही कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे यातील भाषा. अर्थात, हल्लीच्या अनेक सिनेमांत ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध बोलींचा वापर होताना दिसतो. पूर्वी तो मुख्यतः कोल्हापुरीच असायचा. सोलापूर-करमाळा परिसरातील ही भाषा ज्या सन्मानाने व सहजतेने वावरत असते, त्याने केवळ याच परिसरातील नव्हे, तर अन्य भागातील ग्रामीण मराठी मंडळींनाही ती आपलेसे करते. त्यातील पात्रे, त्यांचे खेळ, उत्सव हे सगळे त्यांच्या जीवनाचा भाग आहेत. ज्या बारकाईने नागराजनी संवाद, भाषेचा लहेजा, स्वभावांचे कंगोरे, दृश्ये उभी केली आहेत, ती विलक्षण प्रभावी आहेत. वास्तवाची ही कलात्मक मांडणी ही नागराजची मोठी ताकद आहे. अभिनेता अभिनय कसा करतो, यावरच त्याचे मापन केले पाहिजे हे खरे. पण यातील जी पात्रे अभिनयात बाजी मारुन जातात ती आपल्यासारखीच सामान्य, गरीब, निम्न जातींतील आहेत, सिनेमा तंत्राची काहीही माहिती नसलेली, त्यातले कुठलेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही, जन्मजात प्रतिभा नसलेली अशी आहेत. अशी माणसे अचानक पडद्यावर चमकू लागतात. यातून मीच पडद्यावर येतो आहे, असे येणे हे आपल्याही आवाक्यात आहे, हा विश्वास ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या बहुजनांच्यात तयार होतो.

व्यक्तिशः माझ्यावर या सिनेमाचा काय परिणाम झाला?

फॅंड्री पाहिल्यावर मी लिहिले होतेः

‘स्थळ-काळाचे तपशील वेगळे असले तरी 'जब्या'चे भावविश्व हेच आमचेही भावविश्व होते. किशोरवयातील त्याच्या मनात उमललेले हळुवार अंकुर, त्यांची मुग्ध कोवळिकता व नाजूक संवेदनांनी मनाचे आभाळ झंकारणे ही भावस्थिती आमचीही होती. तथाकथित खालची जात अन् या जातीला सावलीइतके अपरिहार्य बनून आलेले दारिद्र्य, वंचना यामुळे 'शालू' हे आम्हालाही अप्राप्य असे गुलबकावलीचे फूल होते. सामाजिक-आर्थिक विषमतेच्या या दाहक वास्तवाने आमच्या भावजीवनाच्या झालेल्या चिंधड्या आजही ठसठसत असतात. फॅन्ड्रीने तर त्यांवरची खपलीच ओरबाडून काढली.’

अशीच तसेच याच तीव्रतेची भावना यावेळी नव्हती. रोमॅंटिक भावनांचे स्मरणरंजन जरुर झाले. शाळेतले काही बाक व कटाक्ष आठवले. ज्यांच्याशी आपले जात व आर्थिक स्तरामुळे जमणार नव्हते, जमले नाही, ती वेदनेची तार झंकारुन गेली. आर्ची हे सुंदर, सुबक पात्र वाटले. रिंकूने हे पात्र ताकदीने उभे केले आहे. तिच्या ताकदीबद्दल प्रश्न नाही. पण ती दिग्दर्शकाच्या स्वप्नातली मूर्ती (जे नागराजनी जाहीरपणेच सांगितले आहे) आहे. हे सुंदर, सुबक स्वप्न म्हणून ठीक. पण त्याचा वास्तवातील माझ्या ‘आर्चीं’शी मेळ बसला नाही. आर्ची-परश्याच्या भेटींची रम्य निसर्गाच्या व संगीताच्या पार्श्वभूमीवरील भेटी ‘सिलसिला’च्या आसपासच्या भावना जागवून गेल्या. पण त्याही वास्तवाशी मेळ न खाणाऱ्या. मी जिला भेटत असे, त्या जागा अशा रम्य नव्हत्या. संगीतही नव्हते. जे काही असेल ते मनात. बाहेर हॉर्न, गर्दीचा कलकलाट.

आर्ची-परश्या पळून गेल्यावर त्यांना ज्या झोपडपट्टीत आश्रय मिळतो, त्या परिसरातील दृश्यांनी माझ्या बालपणीचे व तरुणपणीचे काही प्रसंग अंगावर चालून आले. ज्या घरात ती दोघं राहतात, त्यापेक्षा माझं घर वाईट स्थितीतलं होतं. कनिष्ठ मध्यवर्गातून पण घरात संडास-बाथरुम असलेल्या सवर्ण कुटुंबातून आलेल्या माझ्या पत्नीने त्या तशा घरातच संसार थाटला. आर्ची ज्या संडासात जाते, तशाच संडासात तिला जावे लागे. आर्चीच्या निमित्ताने जेव्हा ही आठवण झाली तेव्हा आत खड्डा पडला. बराच काळ ती ठसठस राहिली.

सिनेमाचा शेवट त्रास देऊन गेला. वर उल्लेख केलेल्या सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्यांप्रमाणेच मलाही हत्याकांडाचे हे परिचित वास्तव हादरवून गेले. आज शहरातच नव्हे, तर गावांतही आंतरजातीय विवाह होण्याचे प्रमाण वाढते आहे. नाराजी, विरोध, मारहाण, पलायन आदि वाटांनी जाऊन निभणाऱ्यांची टक्केवारी मोठी आहे. अशा हत्याकांडांची टक्केवारी कमी आहे. (बातमी हत्याकांडाची होते. निभणाऱ्या विवाहांची नाही. त्यामुळे सकारात्मक बदलाचे प्रमाण ठळकपणे समोर येत नाही.) मिश्रविवाह हे भविष्य आहे. त्याला अटकाव आणण्याचे प्रयत्न हळूहळू थिटे पडणार आहेत. पण त्यामुळे अशा हत्याकांडांची दाहकता कमी होत नाही. समाजमनाला हलवून त्याच्या विवेकाला आवाहन करण्याची मोठी कामगिरी सिनेमाच्या या शेवटाने केली आहे.

झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्यांचे हावभाव, शैली ही ‘शांताबाई’ गाण्यावर नाचणाऱ्यांची आठवण करुन देते. अजय-अतुलने ही गाणी खूप मेहनतीने, प्रतिभेने व खूप खर्चाने (हॉलिवूडमध्ये संगीतबद्ध करुन) केली आहेत. तथाकथित तळच्या विभागातून आलेल्या या मंडळींनी अशी झेप घेणे हे खूपच कौतुकास्पद आहे. त्यांची धून थिरकण्यासाठीच आहे. त्यामुळे लोक उत्तेजित होतात. नाचू लागतात. खूप लोकप्रिय होतात ही गाणी. पण म्हणून ते चांगले आहे, असे मला म्हणवत नाही. कथेची अपरिहार्यता म्हणून ते येते असे वाटत नाही. फॅंड्रीत एकही गाणे नव्हते. पण झीटीव्हीने त्याच्या प्रमोशनसाठी अजय-अतुलला गाणे करायला लावले. तो धंद्याचा भाग होता. इथे थेट सिनेमातच गाणी आली. हा नेहमीचा चालू मनोरंजनाचा व्यावसायिक फंडा व फॉर्म्युला आहे. ही व्यावसायिकतेसाठी नागराजनी केलेली तडजोड असावी. ती कमाईच्या व लोकप्रियतेच्या दृष्टीने खूपच यशस्वी ठरली आहे. यानंतरच्या सिनेमातही ती तशीच करावी, असा सिनेमासाठी पैसे लावणाऱ्यांचा तगादा नक्की राहणार.

नागराज पुढे काय करणार माहीत नाही. मानवतावादाशी बांधिलकी असलेल्या व आपल्या मुळांशी पक्का असलेल्या नागराजने अशी तडजोड केली तरी ती मर्यादा सोडून असेल असे वाटत नाही. शिवाय जसा या सिनेमातून त्याने जो सामाजिक संदेश, तोही प्रत्ययकारी पद्धतीने दिला आहे, तसा संदेश तो पुढेही देतच राहणार याची खात्री वाटते. हे जर शर्कराअवगुंठीत औषध असेल, तर ते समाजहिताला उपयुक्तच आहे. प्राप्त स्थितीत नेहमीच आदर्शाची अपेक्षा धरणे बरोबर होणार नाही.

अर्थात, हे चालू असताना मध्येच ‘फॅंड्री’ सारखा एखादा सिनेमा काढण्याचा नागराजनी प्रयत्न करावा, अशी विनंती जरुर राहील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, जून २०१६

Sunday, May 1, 2016

दोन भिक्खू एक तरुणी

दोन भिक्खू एक तरुणी
दोन भिक्खू प्रवास करत असतात. मध्ये नदी लागते. अचानक आलेल्या पावसाने नदीला नेहमीपेक्षा पाणी अधिक असते. कामासाठी या तीरावर आलेल्या एका तरुण मुलीला आपल्या घरी परतायचे असते. ती नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला ते कठीण जात होते. ती या दोघा भिक्खूंना पाहून त्यांच्या जवळ येते. त्यांच्यातल्या तरुण भिक्खूला मदतीची विनंती करते. तो रागावतो. म्हणतो, “तुला दिसत नाही मी भिक्खू आहे? आम्ही स्त्रीसंगापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे.”
हा संवाद ऐकणारा वयस्क भिक्खू पुढे होतो व त्या मुलीला म्हणतो, “चल बस माझ्या पाठीवर.” ती बसते. तो पाण्यात शिरतो. तरुण भिक्खू अस्वस्थ. तोही पाठून चालतो. पलिकडच्या काठावर ते सुरक्षित पोहोचतात. वयस्क भिक्खूच्या पाठीवरुन ती मुलगी उतरते. सुहास्यवदनाने ती भिक्खूचे आभार मानते. तोही स्मितवदनाने तिला निरोप देतो. ती तिच्या मार्गाने जाते. हे दोन भिक्खू त्यांच्या मार्गाने चालू लागतात.
तरुण भिक्खू रस्ताभर मनातल्या मनात धुसफूसत असतो. अखेर ते आपल्या मठाजवळ पोहोचतात. तरुण भिक्खूला राहवत नाही व तो या ज्येष्ठ भिक्खूला प्रश्न करतो, “तुम्ही असं कसं केलंत? एका स्त्रीला तुम्ही आपल्या पाठीवर घेतलेत. हा नियमभंग नाही का?”
वयस्क भिक्खू त्याला शांतपणे सांगतो, “तिला नदी ओलांडण्यासाठी मदतीची गरज होती. मी तिला पाठीवर घेतलं व नदीच्या पलीकडे उतरवलं. अरे, माझ्या पाठीवरनं ती कधीच उतरली, तुझ्या डोक्यावर मात्र ती अजूनही बसलीय.”
कन्हैयाच्या मुंबई-पुण्याच्या जोरदार सभांनंतरही स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्या काही मंडळींकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या ऐकल्या-वाचल्यावर ही गोष्ट आठवली.
कन्हैया डांगे व आंबेडकरांच्या सहकार्याचा, स्वतंत्र मजूर पक्षाच्या कालखंडाचा उल्लेख करतो आहे. संविधानातील मूल्ये उध्वस्त करु पाहणाऱ्या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातील लाल-निळ्याच्या वर्तमानातील सहकार्यासाठी तो ही पायाभरणी करतो आहे, हे उघड आहे. सभेला जमलेल्या या दोन्ही रंगांच्या समर्थकांकडून तसेच अन्य लोकशाहीवाद्यांकडून या भूमिकेला टाळ्यांच्या तुफान कडकडाटात प्रतिसाद मिळतो आहे.
यातला सकारात्मक व पुढे जाणारा भाग लक्षात न घेता, डांगे व आंबेडकरांच्या बाकी संबंधांबद्दल (म्हणजे ५२ च्या निवडणुकांतील बाबासाहेबांचा पराभव, मते कुजवा हे डांगेंचे विधान, बाबासाहेबांची मार्क्सवादावरील टीका इ.) कन्हैया काहीच बोलला नाही, तो सोयीचे तेवढेच बोलला ही या ‘आंबेडकरी’ मंडळींची कन्हैयाच्या सभांवरची पहिली व प्रधान प्रतिक्रिया आहे.
या सभा म्हणजे काही अकादमीय परिसंवाद नव्हेत. परिसंवादात विविध पैलूंची सखोल मांडणी-चिकित्सा अभिप्रेत असते. सध्या युद्धासाठी आमने-सामने ठाकलेल्या या दोन छावण्या आहेत. इथे मित्रांच्या सरासरी सहमतीची ताकद एकवटून ठाम बाजू घेऊन ती लढवणे हेच अपेक्षित असते. कन्हैयाच्याच शब्दांत सांगायचे तर ‘ब्राम्हणवाद-पूंजिवाद के खिलाफ’ लोकशाही, समाजवाद मानणाऱ्यांची आपली ही छावणी आहे. यात खरे तर ज्यांचा वारंवार उल्लेख होतो ते निळा व लाल हे दोनच रंग नाहीत. मुंबईच्या सभेत शेहला राशीद (जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष व कन्हैयाची सहकारी) हिने बहुसंख्य वक्ते ‘जयभीम-लाल सलाम’ म्हणत असताना जाणीवपूर्वक सगळ्यांना ‘सतरंगी’ सलाम केला. या छावणीत केवळ आंबेडकरवादी व मार्क्सवादी नाहीत, तर अन्य पुरोगामी विचारांचेही लोक आहेत याचे भान ठेवा, असेच तिला सांगायचे होते. खासदार आदित्यनाथशी दोन हात केलेल्या अलाहाबाद विद्यापीठातील रिचा सिंगने बोलताना लोहियांचे जातिअंतासंबंधीचे एक विधान नोंदविले व भाषणाची अखेर जयभीम, लाल सलाम सोबत ‘जय समाजवाद’ने केली. आनंद पटवर्धनांनीही या सभेत जयभीम, लाल सलाम सोबत ‘जय जगत’ असे म्हटले.
हे आंदोलन केवळ मार्क्सवाद्यांचीच नव्हे तर आंबेडकरवाद्यांचीही-खरे म्हणजे कोणाही एका विचार-वादाची मक्तेदारी नव्हे; सर्व लोकशाहीवादी पुरोगामी प्रवाहांचा हा सप्तरंगी कारवा आहे, हेच यातून ठसवले जात होते.
कन्हैयाने लाल किल्ल्यावर निळा झेंडा लागणार की लाल झेंडा लागणार याचा आपल्या ढंगाने समाचार घेतला व आधी धोक्यात आलेला ‘तिरंगा’ वाचवूया मग निळा की लाल याचा विचार करु, असे सांगितले. शेहला राशीदने २०१९ ला ‘यूपीए ३’ येता कामा नये असे जोरात मांडले. ‘यूपीए ३’ याचा अर्थ काँग्रेसबरोबर आघाडी. ती तिला नको आहे. दोघे सहकारी असले तरी कन्हैया व तिच्यात ही मतभिन्नता असल्याचे दिसते आहे. कन्हैया काँग्रेसबाबत कठोर टीकेची भूमिका घेत नाही. इथेही त्याने या टीकेला उत्तर देताना ‘वेळ येईल तेव्हा मी काँग्रेसबाबतही बोलेन, पण आता वेळ आहे केंद्रातल्या ‘संघी’ सरकारची’ असे सांगून आपला प्राधान्यक्रम व डावपेचच घोषित केला. देशातील संस्कृतीबहुलता, विचारबहुलता टिकविणे कसे आवश्यक आहे, हे सांगताना त्याने मंचकावरील अन्य विद्यार्थी नेत्यांकडे निर्देश करुन ‘आमच्यातही मतभेद आहेत. असे मतभेद असणे हे लोकशाहीचेच लक्षण आहे व या मतभेदांसहित आम्ही एकत्र लढणार आहोत, प्रस्थापिताच्या विरोधातील सर्व रंगांची ही लढाई आहे’ हे जाणीवपूर्वक नमूद केले.
हे विद्यार्थी नेते विलक्षण जाणते आहेत. राज्यकर्त्यांचे-संघप्रणीत संघटनांचे जे काही अनुभव त्यांच्या वाट्याला आले व त्यात जे संघर्ष त्यांनी केले त्यातून त्यांची ही समज व करारीपणा वृद्धिंगत झाला असावा. त्यांच्या भाषणातील काही उल्लेख व विश्लेषण पद्धती पाहता राजकीय-वैचारिक पीठांच्या मांडवाखालूनही ते गेलेले असावेत असे दिसते. केवळ विद्यार्थीच नव्हे; तर दुष्काळग्रस्त, सफाई कामगार, स्त्रिया, महागाई, विकासाची दिशा, त्याचे वितरण, शिक्षण, वित्तीय अर्थव्यवस्थेचे आक्रमण, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा परिणाम व या सगळ्याचा संविधानाच्या सरनाम्यातील मूल्यांशी संबंध अशी समग्र, अव्वल राजकीय मांडणी ते करत आहेत. राजकीय व्यवस्था बदलाची, नव्या पर्यायी व्यवस्थेची ही मांडणी आहे. त्याला सुस्पष्ट टोक आहे. कोण बाजूचे व कोण विरोधातले ही विभागणी स्पष्ट आहे. त्यात धूसरता नाही. सबगोलंकारीपण नाही. हे विद्यार्थी आपले हे आंदोलन विद्यापीठांतून रस्त्यावर नेऊ पाहत आहेत. ते ज्यावर आवाज उठवणार आहेत, त्या विविध प्रश्नांशी संबंधित समाज विभागांच्या स्वतंत्र परिषदा घेऊन या पर्यायांचे मसुदे तयार करण्याची त्यांची मनीषा आहे. याचाच एक भाग म्हणून कन्हैयाने विद्यापीठांत दलित विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध करणाऱ्या ‘रोहित अॅक्ट’ ची मागणी करुन मे महिन्यात ५ तारखेला होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
हे सगळंच खूप नवं आहे. याच्या भवितव्याविषयी लगेच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. तथापि, या प्रक्रियेची जी बीजं दिसत आहेत, ती खूपच आश्वासक आहेत. त्यांची जोपासना, पुढचे वादळवारे, भूकंप, पूर, नेतृत्वांच्या मनुष्यस्वभावांचे फेरे, विरोधकांच्या चाली, मित्रांचा गाफीलपणा, प्रस्थापित पक्षांची राजकीय मोर्चेबांधणी इ. अनेक बाबींवर या अंकुरांच्या वेली कशा, कुठे जाणार आहेत ते ठरणार आहे.
ही मुलं निडर, हुशार, समजदार आहेत. ताजी आहेत. जुनी ओझी नाहीत. नव्याचा नव्याने विचार व आविष्कार करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ज्येष्ठांना ते बजावत आहेत- ‘तुम्ही सल्ला द्या, पण निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्या. आम्ही तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाही.’ या त्यांच्या भूमिकेने तर मला हर्षभरित व्हायला झाले आहे. (तसा मी अधिकचा भावूक आहे. पण ते सोडा.) नवी पिढी ही जुन्यांच्या खांद्यावर उभी असते. तिला अधिक पुढचे दिसणे हे स्वाभाविक आहे. आपला खांदा त्यांना लागेल तेव्हा देणे व अशी निर्णय घेणारी मुले आपल्याला लाभलीत, याचा रास्त अभिमान व कौतुक आम्हा ज्येष्ठांना असायला हवे. या मुलांना पोषक वातावरण खाली तयार व्हावे, यासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते आपापल्या पातळीवर करायला हवे, मदतीसाठी नेहमी तयार असावे, असे मला वाटते.
अशांचे मुक्तकंठाने स्वागत करायला हवे. त्यांच्या या एल्गाराविषयी संभ्रम तयार होईल, असे काहीही करता कामा नये. नीती व लढ्याचे डावपेच या दोहो बाजूंनी ते गैर होईल. बहुसंख्य आंबेडकरी जनतेला कन्हैयाचे आगमन स्वागतार्ह व आश्वासक वाटते आहे. त्याच्या जयभीम-लालसलामाला ते मनापासून प्रतिसाद देत आहेत. आंबेडकरी व डावे यांचा जात व वर्ग या बाबतीतला एकारलेपणा जाऊन कन्हैया दोहोंचा मेळ घालून पुढे जात असेल, तर जुन्या वादांचे या घडीला तरी काहीच प्रयोजन राहत नाही. त्या चर्चा यथावकाश चालू राहतील.
या सगळ्यात गांधीजी पुन्हा उपेक्षितच राहत आहेत, याची खंत मला आहे. शाहू-फुले-आंबेडकर-मार्क्स-बिरसा-पेरियार या रांगेत गांधी-नेहरु नावे घेणे पुरोगाम्यांच्यातल्या अनेकांना सोयीचे वाटत नाही. गांधीजींना त्याची सवय आहे. नेहरु तर काँग्रेसचे. त्यांच्याबद्दल चांगले बोलल्याचे श्रेय काँग्रेसला जाईल ही भीती. गंमत ही की काँग्रेसलाच नेहरु आपले आहेत, याचे फारसे स्मरण नाही. नेहरुंनी त्यांच्या परीने भारताचा शोध घेतला, नवा भारत घडवला. त्यांचीही काही तक्रार असायचे कारण नाही. नुकसान त्यांचे काहीच नाही. ती मृत माणसे आहेत. नुकसान जिवंत माणसांचे होणार आहे. आधुनिक मूल्यांवर भारत उभारण्यासाठी ज्यांनी जीवन वेचले त्यांच्याप्रतीची कृतज्ञता राखणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. तथापि, पुढील लढ्यासाठीची दिशा व साधने जी त्यांनी दिली आहेत, ती नाकारणे हा कर्मदरिद्रीपणा आहे.
माझ्या एका लेखात ‘बाबासाहेबांचा पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींची होती, असे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते, असेही हे इतिहासकार म्हणतात.’ अशी विधाने आहेत. परस्पर समन्वयाचा आग्रह न धरता परस्पर पूरकता शोधण्याचे आवाहन हा या लेखाचा गाभा होता. त्याचे स्वागत करणाऱ्या प्रतिक्रिया पुष्कळ आल्या. पण आंबेडकरी विभागातील ज्या प्रवृत्तीचा मी उल्लेख केला, तिने मात्र हा इतिहास कसा खोटा आहे, हे व तेवढेच पटविण्याचाच आटोकाट प्रयत्न केला.
समजा राम गुहांसारख्या इतिहासतज्ज्ञांचे हे म्हणणे खोटे ठरले, तरी सध्याची आव्हाने परतवण्याच्या लढ्यात गांधीवाद्यांच्या मांडणीतली कोणती बाब अडचणीची ठरते की ज्यामुळे रोहित प्रकरणाने पेटविलेला व कन्हैयाने पुढे नेलेला हा लढा अवरुद्ध होतो आहे? मला तर या आंदोलनाच्या आजच्या टप्प्यावर अशी काहीच अडचण दिसत नाही. एकूणच गांधीवादी, मार्क्सवादी, नेहरुवादी आदींच्याबद्दल ज्यांना ती दिसत असेल, त्यांनी या चळवळीत सहभागी होऊन ती चर्चेला आणणे व त्याच्या निरासाचे मार्ग सुचविणे गरजेचे आहे. तरच ती टीका विधायक होईल. अन्यथा केवळ खवखवत राहण्याने उबळ शमल्याचे कृतक समाधान होईल, पण नीट उपचार न झाल्याने दुखणे विकोपाला जाईल. नव्याच्या स्वागताला अनुकूल असलेल्या समाजाला संभ्रमित करण्यात याने जे योगदान होईल ते होईल, पण स्वतःचे व्यक्ती म्हणून उमदेपण नेस्तनाबूत करायला हे नक्कीच फायदेमंद राहील.
बुद्धसंदेशाचे व्यावहारिक उपयोजन सांगणाऱ्या वरील कथेतून बोध घेऊया. ही किंतु-परंतुची, छिद्रान्वेषी ओझी उतरवूया. त्या वयस्क भिक्खूसारखे स्मितवदनाने जबाबदारी वाहूया. मोकळ्या मनाने चळवळीतील सहकाऱ्यांबरोबर मार्गक्रमण करुया.
बौद्ध वाङ्मयात असंख्य बोधकथा आहेत. या बुद्धजयंतीला एवढी एक पुरेशी आहे.
सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, मे २०१६