Wednesday, September 23, 2009

मिलिंद मुरुगकरांच्‍या एका लेखावर दिलेली प्रतिक्रिया

27 मे 2009

प्रिय मिलिंद,

25 मे 2009 च्‍या लोकसत्‍तेतील अडवाणींचा वारसा... या तुझ्या लेखातील समूहवाद या संज्ञेविषयी, संकल्‍पनेविषयी माझे मत विचारले आहेस. मी विचार करतो आहे. निष्‍कर्षाला मी अजून आलेलो नाही. विचारांची प्रक्रिया सुरु असतानाच हे लिहितो आहे. हे काहीसे प्रकट चिंतन...loud thinking….

लेख वाचत असताना दोन लोक माझ्या डोळ्यांसमोर तरळत होते. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरी ‘The Fountainhead’ ची लेखिका Ayn Rand. या दोन्‍ही व्‍यक्‍ती माणसाला व्‍यक्‍ती म्‍हणून परमोच्‍च स्‍थान देत होत्‍या. या दोन्‍ही व्‍यक्‍ती साम्‍यवादाच्‍या कठोर टीकाकार होत्‍या. याचा अर्थ, भांडवलशाहीच्‍या निर्दयी नफेखोरीच्‍या बाजूच्‍या होत्‍या, असे अजिबात नाही. त्‍यांचा व्‍यक्‍तीच्‍या बाजूने असलेला पक्षपात मानवाच्‍या व्‍यक्तित्‍वाचा अत्‍युच्‍च सन्‍मान व विकास अपेक्षित होता. त्‍यात निर्दयी स्‍पर्धेचा लवलेशही नव्‍हता, उलट या स्‍पर्धेला त्‍यांचा ठाम विरोधच होता.

आंबेडकर व Ayn Rand यांचे साधर्म्‍य इथेच संपते. Ayn Rand व्‍यक्तिवादाची (indivisualism) पुरस्‍कर्ती होती. तर डॉ. आंबेडकर व्‍यक्तिस्‍वातंत्र्याच्‍या बाजूचे होते. Ayn Rand च्‍या संदर्भातील खालील अवतरण तिचे म्‍हणणे स्‍पष्‍ट करण्‍यास पुरेसे आहेः

Rand studied a future society where the collective mind have suppressed individual thoughts. WE THE LIVING reflected Rand's deep antipathy of communist ideology. The story follows the struggle of a young Russian girl, Kira Argounova, who wants to live her own life in a society where "man must live for the state."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्‍याचा धम्‍म या ग्रंथात म्‍हणतातः माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्‍या धम्‍माचा केंद्रबिंदू होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि Ayn Rand या दोहोंचा असलेला कम्‍युनिझमला विरोध खरे म्‍हणजे त्‍यावेळच्‍या कम्‍युनिस्‍टांना, त्‍यांच्‍या व्‍यवहाराला (तो व्‍यवहार अपरिहार्य होता का, ही एक स्‍वतंत्र चर्चा आहे.) मुख्‍यतः विरोध होता, असे मला वाटते. याचा अर्थ, कम्‍युनिझमला त्‍यांचा सैद्धांतिक विरोध नव्‍हता, असे मला म्‍हणायचे नाही. माझ्या अंगावर जे कम्‍युनिझमच्‍या संस्‍कारांचे दोन-चार शिंतोडे उडाले, त्‍यात व्‍यक्‍तीचे माहात्‍म्‍य कमी लेखल्‍याचे मला जाणवले नाही. उलट बाबासाहेबांच्‍या बुद्धधम्‍माच्‍या आकलनातील माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हाच माझ्यावरील कम्‍युनिझचा छाप होता, आहे. माणूस (व्‍यक्‍ती), माणसाचे माणसाशी असलेले नाते (समूह), या जगातील (इहवाद) या तिन्‍ही संज्ञांची संयुक्‍तता बाबासाहेबांना महत्‍वाची वाटते. मार्क्‍सला याविषयी काही आपत्‍ती होती, असे मला वाटत नाही. ऐतिहासिक भौतिकवादाच्‍या आधारे उत्‍पादनसंबंधांच्‍या पायावरील मानवी विकास तपासताना व्‍यक्‍ती, समूह आणि इहवाद या तिन्‍हींची संयुक्‍तता अध्‍याहृतच आहे.

मला शाळेत शिकलेली कवी नीरजांच्‍या एका कवितेतील ही ओळ आठवतेः फूल होता है पहले बाग का, बाद में डाली का.

चेंबूरच्‍या झोपडपट्टीत जिथे मी जन्‍मापासून 30 वर्षे होतो, तिथे आम्‍ही विद्यार्थ्‍यांनी शाळेत असतानाच प्रागतिक विद्यार्थी संघ नावाची एक संस्‍था स्‍थापली होती. आपल्‍या भोवतालचा अंधार दूर व्‍हायचा असेल, तर आपणच प्रकाशित व्‍हायला हवे, या अर्थाचे बुद्धाचे वचन अत्‍त दीप भव (स्‍वयंप्रकाशित व्‍हा) हे आमचे प्रेरक विधान होते. आणि हे स्‍वयंप्रकाशित्‍व साधण्‍याचा मार्ग म्‍हणून कवी नीरजांची वरील ओळ आमचा आधार होता. आमच्‍या कोणाच्‍याच घरात वीज नव्‍हती, कोणी घरात शिकलेले नव्‍हते. अशावेळी बुद्धविहारात एकत्र बसून अभ्‍यास करणे, तो करताना ज्‍याला ज्‍या विषयात गती आहे, त्‍याने त्‍यात गती नसणा-यांना मदत करणे, आपल्‍याहून लहान मुलांचे वर्ग घेणे आणि त्‍याचबरोबर स्‍त्री-पुरुष समतेच्‍या प्रचारात, अंधश्रद्धाविरोधी उपक्रमांत, वैचारिक उद्बोधनांत, दलित चळवळीच्‍या संघर्षांत सक्रीय भागिदारी करणे हे एकसमयावच्‍छेकरुन चालायचे. आधी अभ्‍यास करुन स्‍वतःच्‍या पायावर उभे राहू व मग सामाजिक काम करु, हे आमच्‍या मनाला शिवतही नव्‍हते. स्‍वविकास व समूहविकास यांत तेढ नव्‍हे, उलट अपरिहार्य परस्‍परपूरकताच होती. आमच्‍या व्‍यक्तित्‍वविकासाचा सामूहिकत्‍व हा आधार होता. ती समूहाची बाग नसती तर आमच्‍या व्‍यक्तित्‍वाची फुले फुललीच नसती.

आक्षेप समूहाने व्‍यक्‍तीला जखडणे, त्‍याच्‍या फुलण्‍यावर लगाम घालणे याला असू शकतो. बाग फुलांच्‍या उमलण्‍याला, विकासाला अवकाश व संरक्षण देण्‍यासाठीच असते. उमलणे-विकसणे याची व्‍याख्‍या ठरवणे, बागेच्‍या सौंदर्याच्‍या संकल्‍पनेत हे फुलणे-विकसणे मर्यादित करणे, विशिष्‍ट छाप लादणे हे होऊ शकते. पण ती बाग या गोष्‍टीची स्‍वाभाविक अपरिहार्यता नाही. बाग केवळ आपल्‍या हितासाठी लुटू पाहणा-यांचे हितसंबंध आणि बागेतील अन्‍य घटकांचे अनवधान, अज्ञान, तडजोड, धारणा व विकासक्रम यातून हे लादणे अथवा प्रभुत्‍व संपादणे होते.

मानवी विकास ही सामूहिक, परस्‍परजीवी, परस्‍पर परिणामकारी अशीच प्रक्रिया आहे. आजच्‍या अर्थाने व्‍यक्तिवाद किंवा व्‍यक्तिस्‍वातंत्र्य ही संकल्‍पना फार पुढे जन्‍माला आली. टोळी, सरंजामी अवस्‍थेत समूह हाच केंद्रस्‍थानी दिसतो. लांडग्‍याची शिकार करताना स्‍वतःच शिकार झालेल्‍या टोळीतील सदस्‍याला तो अखेर मरणार आहे, हे लक्षात येताच तिथेच तडफडत सोडून आपल्‍या गुहेत परतणारी टोळी निर्दयी म्‍हणायची की खाजगी संपत्‍ती नसलेली साम्‍यवादाची उच्‍च अवस्‍था मानायची? वेडात मराठे वीर दौडले सात ही व्‍यक्तित्‍व लोपविणारी स्‍वामिनिष्‍ठा सरंजामशाहीचे उन्‍नत मूल्‍य मानायचे तर याच सरंजामशाहीत जातिव्‍यवस्‍थेसारख्‍या मानव्‍याला काळीमा फासणा-या निर्घृण पद्धतीचा विकास झाला. भांडवलशाहीत व्‍यक्तिस्‍वातंत्र्य ही संकल्‍पना पुढे आली. ती मानवी विकासाच्‍या प्रवासात अव्‍वल, कदाचित सर्वोच्‍चही आहे. पण त्‍याचवेळी खुद का देख या वेळ आल्‍यास पिलाला पायाखाली घेण्‍याच्‍या वृत्‍तीलाही अवसर प्राप्‍त झाला. भांडवलशाही ही कवटीतून अमृत आणणारी राक्षसी आहे हे त्‍या अर्थानेच मार्क्‍सने म्‍हटले आहे. समाजाचा भौतिक विकास टीपेला नेणारी, लोकशाहीचा पुकारा करणारी ही अवस्‍था माणूस, माणसाचे माणसाशी असलेले नाते या सर्वांना कमोडीटीचा संदर्भ देते. मानवी विकासाची प्रत्‍येक अवस्‍था ही आधीच्‍या अवस्‍थेपेक्षा समाजाला पुढे नेणारी या अर्थाने पुरोगामी होती. आजची भांडवलशाही त्‍या अर्थाने पुरोगामी आहे. भांडवली लोकशाही विकासाची पूर्तता करुन समाजविकासाची पुढची अवस्‍था (आमच्‍या म्‍हणजे डाव्‍या विचारांच्‍या लोकांच्‍या मते समाजवादाची) आल्‍यावर कमोडीटीवाले नाही, तर खरेखुरे मानवी व्‍यक्तिस्‍वातंत्र्य आणि त्‍याला जपणारा, जोपासणारा, फुलविणारा समूह जन्‍मास येईल. ज्‍यांना मार्क्‍सवाद मान्‍य नाही, अशारीतीने मानवी विकासाचा क्रम मंजूर नाही, तथापि, जे मानवतावादी जरुर आहेत, त्‍यांनाही अशी अवस्‍था हवीशी वाटतेच. त्‍यांच्‍या मनात व्‍यक्‍ती व समूह हे द्वैत असण्‍याचे कारण नाही.

तुझा लेख वाचताना हे सगळे माझ्या मनात तरळून गेले. याचा अर्थ, वर मी जी बाजू मांडली तिच्‍या विरुद्ध तुझी बाजू आहे, असे मी म्‍हणत नाही. मात्र जसे हे सर्व माझ्या मनात आले, तसे माझ्यासारख्‍या अनेक वाचकांच्‍या, कार्यकर्त्‍यांच्‍या मनात ‘‘व्‍यक्तिवाद विरुद्ध समूहवाद’’ हा तुझा वाक्प्रयोग वाचून येऊ शकते.

आता तुझ्या मांडणीविषयी.

डॉ. बाबासाहेब व्‍यक्‍तीच्‍या अधिकाराचे संरक्षण भारतीय घटनेत होण्‍याच्‍या दृष्‍टीने घारीच्‍या नजरेने दक्ष होते. शहाबानोसंदर्भातील कोर्टाचा निकाल हा लोकशाहीचा आत्‍मा असलेल्‍या व्‍यक्तिस्‍वातंत्र्याच्‍या बाजूने दिलेला निर्णय होता, हे तुझे म्‍हणणे अगदी बरोबर आहे. तथापि, त्‍याच्‍याविरोधात उभे राहिलेले हे केवळ समूहवादी असे म्‍हटल्‍यास ते वर्णन नेमके होते, असे मला वाटत नाही. ज्‍यांनी विरोध केला ते धर्माचे ठेकेदार होते, राजकीय सत्‍तेसाठी धर्माचा वापर करणारी चलाख राजकारणी मंडळी होती आणि त्‍यांच्‍या प्रचाराला बळी पडणारी समाजातील मागासलेपणा, अज्ञान व धर्मविषयक चुकीच्‍या धारणांना बळी पडलेली मुस्लिम जनता होती. समूह म्‍हटल्‍याने हे सर्व व्‍यक्‍त होते, असे मला वाटत नाही. व्‍यक्‍ती व व्‍यक्‍तीच्‍या विकासाला पोषक राहणा-या समूहाच्‍या प्रगतीला आपल्‍या स्‍वार्थी, संकुचित हितासाठी अवरुद्ध करणारा त्‍याच समूहातील हा एक गट, वर्ग होता. या समूहांतर्गत एका प्रतिगामी गटाने शहाबानो निर्णयाला विरोध केला.

घटनादुरुस्‍तीचा राजीव गांधींनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी होता, हे तुझे म्‍हणणे बरोबरच आहे. राजीव गांधी काही प्रतिगामी नव्‍हते. तत्‍कालीन राजकीय महानाट्याच्‍या अनेक सूत्रधारांशी चार हात करतानाचे ते एक डावपेचात्‍मक पाऊल होते. पुढे जाताना समाजमनातील अनेक दुर्बल दुवे केवळ कायद्याने नष्‍ट होत नाहीत, ते हळुवार हाताळावे लागतात. अशा पार्श्‍वभूमीवरची ती कृती होती. पण ती निर्विवादपणे चूकच झाली. या चुकीने मुस्लिम आणि हिंदू मूलतत्‍त्‍ववाद्यांना इंधनच मिळाले.

भाजपचा घटनादुरुस्‍तीला असलेला विरोध हा कम्‍युनिस्‍टांहून किंवा आरिफ खान यांच्‍याहून मूलगामीपणे वेगळा होता, हे ही बरोबरच आहे. अडवाणींनी मुस्लिम स्त्रियांच्‍या व्‍यक्तिस्‍वातंत्र्याची बाजू घेण्‍याऐवजी या लढाईचे रुपांतर मोठ्या धूर्तपणे समूह विरुद्ध समूह असे केले. हे ही अगदी खरे. कारण त्‍यांना मुस्लिम काय, हिंदू स्त्रियांच्‍याही व्‍यक्तिस्‍वातंत्र्याशी देणेघेणे नव्‍हते. इथे, अडवाणी हे हिंदू समूहाच्‍या प्रगतीला आपल्‍या स्‍वार्थी, संकुचित हितासाठी अवरुद्ध करणा-या त्‍याच समूहातील एका गटाचे, वर्गाचे प्रतिनिधी होते. हिंदू धर्मातील ठेकेदार, राजकीय सत्‍तेसाठी धर्माचा वापर करणा-या चलाख राजकारणी मंडळींचे अध्‍वर्यू होते. त्‍यांच्‍या प्रचाराला बळी पडणारी समाजातील मागासलेपणा, अज्ञान व धर्मविषयक चुकीच्‍या धारणांना बळी पडलेली हिंदू जनता होती. तिच्‍यावर व्‍यक्तिस्‍वातंत्र्यापेक्षा मुस्लिम अनुनय हेच बिंबवले गेले. अशा धर्मभावना, अस्मितांनी समाजाला लगेच झिंग येते, हा वारंवार येणारा अनुभव आहे.

पाकिस्‍तानात जिनांच्‍या कबरीवर स्‍तुतिसुमने उधळणारे अडवाणी हे व्‍यक्तिवादी वगैरे अजिबात नाहीत. त्‍यांना भारताचे पंतप्रधान होण्‍यासाठी मुस्लिम समाजात, जगतात आणि भारतातील सेक्‍युलर विचारवंतांच्‍या मनात आपल्‍या सेक्‍युलर प्रतिमेचा आभास तयार करावयाचा होता. अशी प्रतिमा आपल्‍या हिंदू समाजातील आधाराला डळमळीत करेल, असे वाटणा-या तसेच अडवाणी पंतप्रधान होण्‍याला विरोध असणा-या भाजप तसेच संघातील त्‍यांच्‍या विरोधकांनी अडवाणींचा हा आभासी सेक्‍युलर फुगा फोडला. आताचे लोकसभेचे निकाल पाहता, तू म्‍हणतोस तसा अडवाणींना काव्‍यगत न्‍याय जरुर मिळाला.

लोकसभेच्‍या स्थिर सरकारच्‍या जनतेच्‍या कौलानंतर सेक्‍युलॅरिझम आपसूकच प्रस्‍थापित होईल, असे नाही. संघटित मूलतत्‍त्‍ववादी टोळ्या संपलेल्‍या नाहीत. फार तर काही काळ त्‍या भूमिगत राहतील. संधीची वाट पाहतील आणि नंतर कदाचित अधिक भीषण कारवाया करतील. सेक्‍युलॅरिझम च्‍या मागे या टोळ्यांहून अधिक चिवट अशी संघटित ताकद उभी करावी लागेल. केवळ सद्भावनेने चालणार नाही. भारतीय जनतेत ही सद्भावना व्‍यापक प्रमाणात आहेच. पण ती संघटित नाही.

अडवाणींनी पुरस्‍कारलेला, प्रचारलेला व संघटित केलेला हा मूलतत्‍त्‍वादाचा वारसा पुढेही प्रभाव गाजवत राहणारच आहे. या वारशाला समूहवाद म्‍हटल्‍याने मूलतत्‍त्‍ववादी झुंडशाही हा त्‍याचा गाभा व्‍यक्‍त होत नाही.

व्‍यक्तिवाद विरुद्ध समूहवाद अशा मांडणीतून तू लेखात वर्णिलेला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी राजकारण-समाजकारणाचा संघर्ष स्‍पष्‍टपणे व्‍यक्‍त होतो, असे मला वाटत नाही.

Ayn Rand प्रमाणे एकूण वैश्विकरीत्‍या व्‍यक्‍तीसमूह यांची मांडणी तुला करावयाची असल्‍यास निराळे. मग त्‍या मांडणीच्‍या विवेचनातील संदर्भ, उदाहरणेही वैश्विक राहतील.

कदाचित, याहूनही काही वेगळे तुला मांडावयाचे असल्‍यास तशा लेखाची अथवा लेखमालेची अपेक्षा.

व्‍यक्‍ती, समूह या संकल्‍पनांचा विचार करण्‍यास चालना दिल्‍याबद्दल तुला मनःपूर्वक धन्‍यवाद.

- सुरेश सावंत

'नवे पर्व' ऑक्‍टोबर 2009 साठी दिलेले साहित्‍य

राष्‍ट्रीय संपत्‍ती म्‍हणजे पैसा की जनतेचे समाधानी जीवन ?

राष्‍ट्राची संपत्‍ती, प्रगती मोजायचे सकल घरेलू उत्‍पादन हेच एक साधन आहे का ? ... हा प्रश्‍न अनेक विचारवंत उपस्थित करत असतात. आशिया खंडातील अगदी छोटा देश भूतान सर्वसामान्‍यांचे आनंदी असणे (हॅपिनेस इंडेक्‍स) हा आपल्‍या प्रगतीचा निकष मानतो. आता फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष सर्कोझी यांनीही हाच प्रश्‍न अख्‍ख्‍या जगासमोर ठेवला आहे. राष्‍ट्रीय संपत्‍ती मोजण्‍याच्‍या प्रचलित पद्धतीत क्रांतिकारक बदल करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले आहे. या प्रश्‍नावर त्‍यांनी एक आयोग नेमला होता. जोसेफ स्टिगलिट्झ व अमर्त्‍य सेन या दोन नोबेल पारितोषिक विजेत्‍या अर्थतज्‍ज्ञांच्‍या या आयोगाने नेमलेल्‍या शिफारशी आपल्‍या देशासाठी सर्कोझी यांनी स्‍वीकारल्‍याच, पण अन्‍य देशांसाठी आता ते त्‍यांचा प्रचार करत आहेत.

या नव्‍या निकषांत पर्यावरण संरक्षण, काम व जीवनाचे संतुलन, जनतेच्‍या शाश्‍वत आनंदासाठी आवश्‍यक आर्थिक विकासाचा दर या मुद्द्यांचा समावेश आहे. अँजेल गुर्रिया, सरचिटणीस, आर्थिक सहकार्य व विकास संघटना हे म्‍हणतात, आर्थिक संसाधने म्‍हणजे लोकांच्‍या जीवनातले सर्वस्‍व नव्‍हे. लोकांच्‍या आकांक्षा आणि समाधानाची पातळी काय आहे, ते त्‍यांचा वेळ कसा व्‍यतित करतात, त्‍यांचे त्‍यांच्‍या समाजातील अन्‍य व्‍यक्‍तींशी नाते कसे आहे, या बाबी मोजल्‍या गेल्‍या पाहिजेत.

गेली काही दशके फ्रान्‍सच्‍या आर्थिक विकासाचा दर मंद आहे. तथापि, त्‍यांना आपल्‍या अन्‍य काही बाबींचा अभिमान आहे. फ्रान्‍सची आरोग्‍य व्‍यवस्‍था ही जगातील एक आदर्श व्‍यवस्‍था असल्‍याचे जागतिक आरोग्‍य संघटनेने नोंदवले आहे. तुलनात्‍मकरीत्‍या त्‍यांचा कामाचा आठवडा हा लहान आहे. या अभिमानात या नव्‍या मापदंडाची भर पडली आहे. सर्कोझींना त्‍याचा रास्‍त अभिमान आहे. ते जी-20 समूहाच्‍या आगामी संमेलनात हा मापदंड सर्वांनी स्‍वीकारण्‍याचे आवाहन करणार आहेत. तसेच जोसेफ स्टिगलिट्झ व अमर्त्‍य सेन यांचा हा अहवाल आगामी जागतिक बैठकांच्‍या कार्यक्रमपत्रिकेवर आणण्‍याचा ते प्रयत्‍न करणार आहेत.

(संदर्भः द हिंदू, 16 सप्‍टेंबर 2009)


राजस्‍थानच्‍या पाठ्यपुस्‍तकांतील भगवे धडे

हिंदूंच्‍या विवाहाचे मुख्‍य उद्दिष्‍ट धर्माचे अनुसरण, तर मुसलमानांच्‍या विवाहाचे लैंगिक संबंध स्‍थापित करणे हे आहे.

हिंदूंविषयी संशयाची भावना मुसलमानांत वि‍कसित झाल्‍यानंतर ब्रिटिश सरकारच्‍या निर्देशावरुन मुस्लिम लीगची स्‍थापना करण्‍यात आली.

हे उतारे आहेत राजस्‍थानच्‍या 11 वी-12 वीच्‍या पाठ्यपुस्‍तकांतील. गेली 5 वर्षे हीच पाठ्यपुस्‍तके आहेत. या काळात वसुंधरा राजे यांच्‍या नेतृत्‍वाखालचे भाजपचे सरकार सत्‍तेत होते. नव्‍या कॉंग्रेसच्‍या सरकारने नेमलेल्‍या पंचसदस्‍यीय समितीने या पाठ्यपुस्‍तकांचा अभ्‍यास करुन आपला अहवाल दिला आहे. या अहवालाच्‍या आधारे हे तसेच यासारखे अन्‍य वादग्रस्‍त व सांप्रदायिक उल्‍लेख ताबडतोब काढून टाकण्‍याचे आदेश राज्‍य शिक्षण मंडळाला राज्‍य सरकारने दिले आहेत. वसुंधरा राजेंच्‍या गतसरकारने तरुणांच्‍यात सांप्रदायिक विचारसरणी रुजविण्‍यासाठी केलेले हे प्रयत्‍न असून ते संविधानातील तत्‍त्‍वांच्‍या विरोधात आहेत, असे मत या पंचसदस्‍यीय समितीच्‍या 75 पानी अहवालात नोंदविण्‍यात आले आहे. या धड्यांचे लेखक राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ तसेच त्‍याच्‍याशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी असून संघाचा छुपा अजेंडा शिक्षणव्‍यवस्‍थेद्वारे राबविण्‍याचा त्‍यांचा हा डाव आहे, असेही या अहवालात म्‍हटले आहे.

सांप्रदायिक शक्‍ती सत्‍तेत येतात तेव्‍हा ते काय काय करतात, त्‍याचा हा एक नमुना.

(संदर्भः हिंदुस्‍तान टाईम्स, 17 सप्‍टेंबर 2009)


ओबामांची अवघड वाट

आरोग्‍य सुधारणा

ओबामांचा रस्‍ता बराच अवघड आहे, असे अमेरिकेतील अलिकडच्‍या वृत्‍तांवरुन दिसते. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्‍टन येथे हजारोंचा एक मोर्चा अलिकडेच निघाला. आरोग्‍यासंबंधीच्‍या ओबामांच्‍या प्रस्‍तावित सुधारणांना विरोध करणा-या या मोर्च्‍याने ते अमेरिकेला समाजवादाच्‍या वाटेने नेत असल्‍याचा आरोप केला आहे.

मोर्चेक-यांपैकी एकाच्‍या हातातील फलकावर लिहिले होते- गर्भपात हा आरोग्‍यसुधारणांच्‍या धोरणाचा भाग होत नाही. युक्रेनहून स्‍थलांतरित असलेल्‍या मोर्च्‍यातील एका व्‍यक्‍तीच्‍या हातातील फलकावर मजकूर होता- सोव्हिएट युनियनमध्‍ये मी पुरेसा समाजवाद भोगला आहे.

हा मोर्चा फ्रीडमवर्क्‍स या चळवळीने संघटित केला होता. करांमध्‍ये घट, कमी प्रशासन आणि सर्व अमेरिकनांना अधिक आर्थिक स्‍वातंत्र्य या त्‍यांच्‍या प्रमुख मागण्‍या होत्‍या. जवळपास अमेरिकेच्‍या सर्व भागांतून आलेल्‍यांचा या मोर्च्‍यात सहभाग होता.

ओबामा आपल्‍या भूमिकेवर ठाम आहेत. जैसे थे वाल्‍या शक्‍तींना माझा विरोध असून सुधारणा होणारच, असा त्‍यांनी मनोदय व्‍यक्‍त केला आहे. तथापि, खुद्द डेमोक्रॅटिक पक्षातले सगळे त्‍यांच्‍या बाजूने नाहीत. असे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोहोंना राजी करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न चालू आहेत.

इराण

अमेरिकेचे माजी अध्‍यक्ष जॉर्ज बुश यांनी बहिष्‍कृत ठेवलेल्‍या इराणशी बोलणी सुरु करण्‍याचे आश्‍वासन ओबामांनी आपल्‍या निवडणूक प्रचारावेळी केले होते. अध्‍यक्ष झाल्‍यावर ओबामांनी इराणला दोन पत्रे लिहून प्रत्‍यक्ष बोलणी करण्‍याचा प्रस्‍ताव दिला. पण इराणने प्रतिसाद दिला नाही. अखेर या महिनाअखेरची अंतिम मुदतच ओबामांनी इराणला दिली आहे. इराणहून येणारे इशारे मिश्र आहेत. इराणचे अध्‍यक्ष अहमदेनिजाद यांची एक सोडून बाकी सर्व विषयांवर बोलणी करण्‍याची तयारी आहे. तो एक कळीचा विषय म्‍हणजे, अण्‍वस्‍त्र प्रसार. याविषयी अमेरिकेकडूनच अजून स्‍पष्‍ट प्रस्‍ताव आला नसल्‍याचे इराणचे म्‍हणणे आहे.

जर इराणने बोलणी केली नाहीत, तर अमेरिका ब्रिटन, फ्रान्‍स आणि जर्मनीसहित नव्‍याने इराणवर आर्थिक बंधने लादण्‍याचा प्रस्ताव आणण्‍याची शक्‍यता आहे. इराणच्‍या तेल व वायू उद्योगावर त्‍याचे गंभीर परिणाम होतील. तथापि, युनोच्‍या सुरक्षा मंडळाचे सदस्‍य असलेल्‍या व व्‍हेटोचा अधिकार असलेल्‍या चीन व रशिया या दोन देशांचा त्‍यास पाठिंबा मिळायची खात्री नाही.

अशावेळी इस्रायल स्‍वबळावर एकट्यानेच इराणवर हल्‍ला करण्‍याची शक्‍यता आहे. इस्रायलच्‍या अशा कारवाईस ओबामांचा विरोध आहे.

जागतिक तापमानवाढ

ऊर्जा सुधारणा हा ओबामांच्‍या कार्यक्रमपत्रिकेवरील एक महत्‍वाचा मुद्दा. जागतिक तापमानवाढीला कारण असणारे कार्बन उत्‍सर्जन अमेरिकेने कमी करण्‍यासंबंधातले विधेयक प्रतिनिधी सभागृहात कसेतरी संमत करुन घेण्‍यात ओबामा यशस्‍वी झाले. पण सिनेटमध्‍ये त्‍याचे कायद्यात रुपांतर होणे अवघड झाले आहे. कोळसा, तेल आणि उत्‍पादन उद्योगांतल्‍या हितसंबंधीयांनी ओबामांच्‍या या प्रयत्‍नाविरोधात मोर्चा उघडला आहे.

साहजिकच, या वर्षी डिसेंबरमध्‍ये कोपनहॅगेन येथे होणा-या आंतरराष्‍ट्रीय जागतिक हवामान बदल परिषदेत काही सहमती होण्‍याची शक्‍यता नाही. चीन, भारत आणि अन्‍य काही प्रदूषणात आघाडीवर असणा-या देशांनी आधीच इशारा दिला आहे की, जोवर अमेरिका आपले कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याचे आश्‍वासन पाळत नाही, तोवर ते जागतिक हवामान बदलाच्‍या करारावर सही करणार नाहीत.

अफगाणिस्‍तान

ओबामांच्‍या निवडणुकीतील प्रचाराचा एक मुद्दा इराक युद्ध संपुष्‍टात आणून अफगाणिस्‍तानवर अधिक लक्ष देणे हा होता. 21000 जादा सैन्‍यदले ओबामांनी अफगाणिस्‍तानमध्‍ये धाडली आहेत. तेथील आपल्‍या आ‍धीच्‍या सै‍न्‍यप्रमुखाची हकालपट्टी करुन त्‍या जागी नवीन प्रमुखही त्‍यांनी नेमला. पण तरीही अमेरिकन सैन्‍याची होणारी हानी वाढतच आहे. अफगाण अध्‍यक्ष हमीद करजाई यांच्‍यावर अमेरिकेचा फारसा विश्‍वास राहिलेला नाही. विशेषतः नुकत्‍याच झालेल्‍या अफगाणिस्‍तानमधील अध्‍यक्षीय निवडणुकीतील त्‍यांच्‍या कथित लबाड्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर. तालिबान्‍यांविरोधातली कारवाई लवकर संपुष्‍टात आली पाहिजे, यावर अमेरिकेत चर्चा बरीच गरम आहे. यात पाकिस्‍तानच्‍या भूमिकेमुळे आणखी अडचणी तयार झाल्‍या आहेत. पाकिस्‍तान इस्‍लामी दहशतवादाऐवजी भारतालाच आपला प्रमुख धोका मानत आहे. आणि त्‍यासाठी अफगाणिस्‍तानवरील भारताचा प्रभाव कमी करण्‍यासाठी ते तालिबान्‍यांना सहाय्य करत आहे.

आर्थिक अरिष्‍ट

आर्थिक अरिष्‍ट हा ओबामांच्‍या समोरील आजचा सर्वात मोठा प्रश्‍न. अध्‍यक्षपदाची पुढची खेप त्‍यांना मिळणार की नाही, त्‍यावर ठरणार आहे.

आर्थिक अरिष्‍टातून अमेरिका हळू हळू बाहेर पडत आहे अशी आकडेवारी येत असली तरी बेकारांच्‍या संख्‍येत वाढ होत आहे. ही बेरोजगारी 10 टक्‍क्‍यांवर गेल्‍याचा अलिकडचा आकडा आहे. यातील आफ्रिकन-अमेरिकन (अमेरिकेतले काळे) जनतेत तर ही बेकारी 15 टक्‍क्‍यांवर गेली आहे.

हे झाले अधिकृत आकडे. पण जे स्‍वतःला बेकार म्‍हणून जाहीर करत नाहीत, अशा कोट्यवधी मनुष्‍यबळाच्‍या बेकारीचे प्रमाण यात नमूद नाही.

787 बिलियन्‍स डॉलर्सचे अर्थसहाय्य ओबामांनी अरिष्‍टात सापडलेल्‍या कंपन्‍यांना दिले. ते पुरेसे नाही, अशी त्‍यांच्‍यावर टीका होत आहे. आणखी अशाच मोठ्या अर्थसहाय्याच्‍या दुस-या हप्‍त्‍याची गरज आहे, असे टीकाकारांचे म्‍हणणे आहे.

अरिष्‍टातून बाहेर निघण्‍यासाठीच्‍या ज्‍या उपाययोजना ओबामा करत आहेत, त्‍यातील एक यशस्‍वी होताना दिसते आहे. जुन्‍या कार विकून नवीन घेणा-यांसाठी रोख रकमेचे अर्थसहाय्य ओबामांनी जाहीर केले. त्‍याचा फायदा लोक घेत आहेत. त्‍यामुळे कार उत्‍पादक व विक्रेते यांच्‍या उद्योगांना रोजगार मिळाला आहे. अन्‍य उपाययोजनांनी काही परिणाम साधल्‍याचे अजून तरी दिसत नाही.

(हिंदुस्‍तान टाईम्‍स व द हिंदू या वृत्‍तपत्रांतील सप्‍टेंबर महिन्‍यातील विविध बातमीपत्रांच्‍या आधारे)

वाढती महागाई व दुष्‍काळाची छायाः रेशनव्‍यवस्‍था मजबूत करा


सरकारचे अधिकृत आकडे काहीही असले तरी, गेली दीड-दोन वर्षे किरकोळ बाजारातील महागाई गतीने वाढत आहे. महागाईच्‍या यातना कमी की काय म्‍हणून आता दुष्‍काळ समोर उभा ठाकला आहे. केंद्र व राज्‍य शासन काही उपाय करत आहे. पण हे उपाय पुरेसे व मूलभूत नाहीत, अशी टीका त्‍यांवर होत आहे. या उपायांनी सामान्‍य, गोरगरीब जनतेच्‍या वेदनांना उतार पडतो आहे, असे चित्र दिसत नाही. विरोधी पक्षांकडून काही आंदोलने झाली. तथापि, त्‍यांच्‍या आंदोलनांत मूलभूत मागण्‍या व कार्यक्रम मांडला जात नाही. सत्‍ताधा-यांना विरोध व लोकांचा असंतोष आपल्‍या राजकीय हितसंबंधांसाठी शिडात भरणे, हाच प्रमुख हेतू दिसतो. डावे पक्ष, संघटना यांच्‍याकडूनही रान उठवण्‍याच्‍या पद्धतीने आंदोलने घडवण्‍याची मनःस्थिती दिसत नाही. आता तर निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. उमेदवार, जागावाटप या घाईत सगळे आहेत. रेशन व अन्‍न अधिकाराच्‍या प्रश्‍नावर काम करणा-या काही संघटना, आघाड्या आंदोलने करत आहेत. त्‍यांच्‍याकडे नेमक्‍या मागण्‍या व कार्यक्रमही आहे. तथापि, त्‍यांची व्‍याप्‍ती व खोली अजूनही मर्यादितच आहे.

1972 च्‍या दुष्‍काळानंतर महाराष्‍ट्रात शेती, रोजगार, पाणी यांबाबत मूलभूत मांडणी व कार्यक्रम निर्माण करणारे व्‍यापक आंदोलन झाले. त्‍याचा महाराष्‍ट्राच्‍या लोकजीवनावर सखोल परिणाम झाला. हा जुना वारसा असणा-या अनेक संघटना, पक्ष, व्‍यक्‍ती, विचारवंत महाराष्‍ट्रात आज आहेत. त्‍यांनी जर ठरवले तर, या जुन्‍या इतिहासाच्‍या मार्गदर्शनातून व नव्‍या परिस्थितीच्‍या अभ्‍यासातून पुन्‍हा एकदा व्‍यापक चळवळ, योग्‍य मांडणी व कार्यक्रम पुढे येऊ शकतो.

या क्रमाला पूरक व पोषक प्रयत्‍न आपल्‍या सर्वांकडून तातडीने व्‍हायला हवेत. दुष्‍काळ व महागाई या आपत्‍तींचे संधीत रुपांतर करुन मरगळलेली चळवळ पुन्‍हा चैतन्‍यशील करणे, ज्‍याचा सुवर्ण महोत्‍सव सध्‍या साजरा होत आहे, त्‍या संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनाला अभिप्रेत असलेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा आराखडा मूर्त करणे या दिशेने आपण कामाला लागणे आवश्‍यक आहे.

तूर्त, महागाईबाबत अभ्‍यासक व कार्यकर्त्‍यांनी सूचवलेले काही उपाय व मागण्‍या चळवळीसाठी खाली मांडत आहेः

1. साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई करुन महागाई वाढविणा-या साठेबाजांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तूर डाळ शेतक-याकडून 20 रु.ला घेतली जाते. प्रक्रिया, वाहतूक व पुरेसा नफा धरुनही ती 40 रु. प्रति किलोच्‍या वर जाता कामा नये, असे असतानाही आज ती 100 रु.ला विकली जाते. याचा अर्थ उत्‍पादक व उपभोक्‍ता यांच्‍या मधला दलाल, साठेबाज व्‍यापारी हेच 60 रु. फस्‍त करतात. या दलालांना वठणीवर आणणे आवश्‍यक आहे.

2. महागाई घाऊक वस्‍तूंच्‍या किंमतीवर मोजण्‍याऐवजी ती सामान्‍य ग्राहक खरेदी करत असलेल्‍या वस्‍तूंच्‍या किरकोळ किंमतीवर मोजण्‍यात यावी. त्‍यामुळे महागाईच्‍या वाढीचा खरा बोध होईल.

3. ज्‍या जीवनावश्‍यक वस्‍तू महागतात त्‍या रेशनवर स्‍वस्‍तात व पुरेशा प्रमाणात दिल्‍या की गरीब व सामान्‍य माणसाचे संरक्षण होतेच शिवाय साठेबाजी करुन कृत्रिमरीत्‍या वाढवलेले बाजारभावही कमी होतात. यासाठीच सरकारने रेशनव्‍यवस्‍था सुरु केली. आज रेशनव्‍यवस्‍था मजबूत व विस्‍तृत करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी-

3.

a. सर्व गरजवंतांना रेशन व्‍यवस्‍थेत आणले पाहिजे. त्‍यासाठी शासनाने खास मोहिमा काढल्‍या पाहिजेत.

b. दारिद्र्यरेषेखालच्‍या पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठीची वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा 15000 रु. वरुन 1 लाख रुपयांपर्यंत वाढवा. याचाच अर्थ, पिवळ्या रेशनकार्डधारकांप्रमाणेच केशरी कार्डधारकांनाही निम्‍म्‍या दरातील 35 किलो धान्‍य दरमहा खात्रीने मिळाले पाहिजे.

c. गहू, तांदूळ, केरोसीन याचबरोबर डाळी, खाद्यतेल, साखर इ. महागाईचा फटका बसलेल्‍या जीवनावश्‍यक वस्‍तूंचा रेशनमध्‍ये समावेश झाला पाहिजे.

d. महाराष्‍ट्रात खाल्‍ली जाणारी व उत्‍पादित होणारी ज्‍वारी, बाजरी, नागली ही भरडधान्‍ये रेशनवर उपलब्‍ध व्‍हायला हवी. त्‍यासाठी इतर अनेक राज्‍यांप्रमाणे केंद्रसरकारकडून आपल्‍या वाट्याची सबसिडी प्रत्‍यक्ष घेऊन स्‍थानिक धान्‍यखरेदी करावयास हवी. यामुळे कोरडवाहू शेतक-यालाही किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळेल. महाराष्‍ट्र डाळींच्‍या उत्‍पादनात देशांत क्रमांक 1 वर आहे. खाद्यतेलात तो क्रमांक 2 वर आहे. कांदा उत्‍पादनात तो क्रमांक 1 वर आहे. ज्‍वारी-बाजरीच्‍या उत्‍पादनात तो क्रमांक 2 वर आहे. असे असतानाही या वस्‍तू रेशनवर राज्‍य सरकार का देत नाही, याचा जाब त्‍यास विचारलाच पाहिजे.

e. वरील बाबी करण्‍यासाठी नेहमी केंद्राकडे बोट दाखवण्‍याचे महाराष्‍ट्र सरकारने बंद केले पाहिजे. केंद्राने ठरविलेल्‍या लाभार्थ्‍यांच्‍या मर्यादेबाहेर जाऊन स्‍वतःच्‍या तिजोरीतून खर्च करुन रेशन व्‍यवस्‍था अधिक परिणामकारक करण्‍याचा प्रयत्‍न अनेक राज्‍यांनी केला आहे. उदा. छत्‍तीसगड राज्‍याने आदिवासी, दलित व स्‍त्रीप्रमुख असलेल्‍या सर्व कुटुंबांना सवलतीच्‍या रेशन योजनेत समाविष्‍ट केले आहे. त्‍यामुळे या राज्‍यातील 70 टक्‍के जनता आज 2 रु. किलो भावाने 35 किलो धान्‍य दरमहा घेत आहे. त्‍यातील अंत्‍योदय योजनेखाली येणा-यांना तर हा दर फक्‍त 1 रु. आहे. केरळमधील 11 टक्‍के जनतेला केंद्र सरकारने गरिबांच्‍या रेशनचा लाभ दिलेला आहे. तथापि, गरिबी मोजण्‍याचे स्‍वतःचे निकष लावून आपल्‍या राज्‍यातील 30 टक्‍के जनतेला केरळ गरिबांसाठीच्‍या रेशनचा लाभ देत आहे. 2 रु. किलो दराने 35 किलो धान्‍य दरमहा ते या लोकांना देत आहे. त्‍यासाठीचा खर्च अर्थात स्‍वतः सोसत आहे. आंध्र प्रदेश आपल्‍या राज्‍यातील 80 टक्‍के जनतेला 2 रु. किलो भावाने माणशी 6 किलो धान्‍य दरमहा देत आहे. तामिळनाडू तर राज्‍यातील सर्व जनतेला 1 रु. किलो दराने 16 ते 20 किलो धान्‍य देत आहे. या रीतीची पावले उचलण्‍यासाठी अनेकवार मागणी करुनही आपले फुले-शाहू-आंबेडकरांच्‍या नावांचा घोष करणारे महाराष्‍ट्र सरकार याबाबतीत अत्‍यंत उदासीन, बेपर्वा व निगरगट्टही आहे. ते स्‍वतःच्‍या खिश्‍याला हात लावायला तयार नाही. एवढेच नव्‍हे तर, केंद्राने देऊ केलेले धान्‍यही पूर्णपणे उचलण्‍याची खबरदारी ते घेत नाही. महाराष्‍ट्र सरकारला याचा जाब विचारलाच पाहिजे.

f. रेशनवरील धान्‍याच्‍या परिणामकारक वितरणासाठी नाशिक जिल्‍ह्यात यशस्‍वी झालेली घरपोच धान्‍य योजना सार्वत्रिकपणे अंमलात आणा.

4. आज केंद्राच्‍या गोदामात धान्‍य भरुन वाहू लागले आहे. ते ठेवायला जागा नाही. अशावेळी हे धान्‍य रेशनवर मोठ्या प्रमाणात आणून तसेच खुल्‍या बाजारात फ्री सेलद्वारे आणून वाढलेले दर कमी करता येतील.

5. डाळी तसेच खाद्यतेले यांची आयात करुन त्‍यांची बाजारपेठेतील उपलब्‍धता वाढवल्‍यास त्‍यांचे वाढलेले दर कमी करता येतील.

6. अधिक उत्‍पादक वाणांचे संशोधन तसेच संशोधित वाणांचे शेतक-यांपर्यंत विनाविलंब वितरण यासारख्‍या तज्ज्ञांनी केलेल्‍या शेतिविषयक सुधारणांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.

7. रोजगार हमी कायद्याप्रमाणेच अन्‍न सुरक्षा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे. ही अत्‍यंत चांगली गोष्‍ट आहे. त्‍याचे स्‍वागतच केले पाहिजे. या कायद्याचा मसुदा चर्चेसाठी सरकार जाहीर करणार आहे. या कायद्यात आजच्‍या सर्व चांगल्‍या तरतुदी कायम राहून गरीब, दुबळ्या विभागांची अन्‍नसुरक्षा राखण्‍याच्‍यादृष्‍टीने इतर अनेक पोषक तरतुदींचा समावेश झाला पाहिजे. सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना या कायद्यासंबंधी लिहिलेल्‍या पत्रातील सर्व तरतुदींचा समावेश या कायद्यात झाला पाहिजे. हा कायदा पातळ करण्‍याचे जोरदार प्रयत्‍न सध्‍या केंद्र सरकारमधील घटकांकडूनच चालू आहेत. शरद पवारांच्‍या नेतृत्‍वाखालील अन्‍न मंत्रालयाने प्रस्‍तावित केलेल्‍या मसुद्यात या कायद्याची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संपूर्णतः राज्‍यांची व केंद्रशासित प्रदेशांची असावी, अशी सूचना आहे. याचा अर्थ, केंद्र सरकारने आपली जबाबदारी टाळण्‍याचा हा प्रकार आहे. शिवाय गरीबीरेषेखालील कुटुंबांची आजची मर्यादा गोठवावी व त्‍यांच्‍यासाठीच हे कायद्याचे संरक्षण असावे, अशीही सूचना आहे. ही सूचना अंमलात आली, तर कायदा नको असे म्‍हणण्‍याची वेळ येईल. मुंबईत आज 1 टक्‍क्‍यापेक्षा कमी लोकांना गरीबांसाठीचे पिवळे कार्ड आहे. म्‍हणजे, उरलेले 99 टक्‍के कायद्याने रेशनच्‍या बाहेर पडतील. आजचे गरीब ठरवावयाचे निकष, त्‍यांची निवड करण्‍याची पद्धती, सदोष याद्या हे लक्षात घेता ही सूचना घातकच ठरेल. कायदा गैरलागू करण्‍याच्‍या या प्रयत्‍नांना जागरुक राहून विरोध करायला हवा.

या मागण्‍या करण्‍याबरोबरच पुढील काही कार्यक्रम आपण अंगिकारले पाहिजेत. ते असेः

1. अधिकृतपणे प्रत्‍येक केशरी कार्डधारकाला 7.20 रु. प्रति किलो गहू व 9.60 रु. प्रति किलो तांदूळ असे दोन्‍ही मिळून 35 किलो धान्‍य मिळायला हवे. तथापि, त्‍यांच्‍यासाठीचा कोटा सरकार पाठवतच नव्‍हते अथवा अत्‍यल्‍प पाठवत होते. परिणामी केशरी कार्डधारकांना धान्‍य जवळपास मिळतच नव्‍हते. आता महागाईच्‍या पार्श्‍वभूमीवर आणि गोदामात प्रचंड धान्‍यसाठा असल्‍याने सप्‍टेंबरपासून 15 किलो धान्‍य, 1 लीटर पामतेल (30 रु. लीटर), तूरडाळ (55 रु. प्रति किलो), 2 किलो साखर (20 रु. प्रति‍ किलो) मिळणार आहे. पिवळ्या व अंत्‍योदय कार्डांनाही पामतेल, तूरडाळ मिळणार आहे. हे अपुरे आहे, ते पुरेसे हवे, ही मागणी करायचीच. पण, हे जे सरकारने देऊ केले आहे, त्‍याची लोकांमध्‍ये जागृती करणे, त्‍याच्‍या अंमलबजावणीचे झगडे हा आपला दैनंदिन कार्यक्रम व्‍हायला हवा. तो केल्‍याने आहे ते टिकविणे व लोकांचा रेशनव्‍यवस्‍थेत रस तयार करणे साधता येऊ शकेल. ते झाले तरच पुढच्‍या मागण्‍यांना पाठबळ तयार होईल. चळवळीने त्‍यास प्राधान्‍य देणे आवश्‍यक आहे.

2. परिषदेतील तसेच इतरही मागण्‍यांवर आपल्‍या विभागात चौकाचौकात थाळ्या वाजविणे, लाटणे मोर्चा काढणे असे महागाई विरोधी कार्यक्रम घ्‍यायला हवेत. विधानसभांच्‍या निवडणुकांचा माहौल सुरु होत आहे, हे लक्षात घेऊन सत्‍ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोन्‍ही घटकांचे लक्ष वेधण्‍याचे प्रयत्‍न करायला हवेत. तसेच निवडणुकांनंतर नवीन सत्‍ताधा-यांसमोरही हे प्रश्‍न मांडण्‍याच्‍या दृष्‍टीने परिषदांसारखे उपक्रम घ्‍यायला हवेत.

3. अन् समविचारी मंडळींना एकत्रित करुन राज्यस्तरीय व्यापक आंदोलन उभे राहते का, याची चाचपणी करायला हवी.

4. प्रस्‍तावित अन्‍न सुरक्षा विधेयकाचा मसुदा जाहीर झाल्‍यावर त्‍यावर आपण जागोजागी चर्चा संघटित करुन चांगल्‍या सूचना एकत्रित करणे गरजेचे आहे. तसेच अशा योग्‍य सूचनांसहित तो कायदा लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे, यासाठी सरकारवर दबाव आणण्‍यासाठी जनमत संघटित केले पाहिजे.

वरील मुद्द्यांबाबत विचारविनिमय करुन त्‍यात आणखी भर घालता येऊ शकेल.

- सुरेश सावंत

लाल निशाण पक्षाचे पक्षगीत

फडकत आम्‍ही उभे ठेविले

फडकत आम्‍ही उभे ठेविले, लाल निशाण हे लाल निशाण || धृ ||

कुणी म्‍हणाले, हे एकांडे

ही तर पोरे आताची

कशी प्रतिष्‍ठा लाभे यांना

आंतरराष्‍ट्रीय कीर्तीची

कष्‍टक-यांना निष्‍ठा देणे हेच आमुचे शक्तिस्‍थान || 1 ||

खुशाल वाटो मठ हा कोणा

संघटनेचे बळ पसरे

कष्‍टक-यांची नवीन शक्‍ती

महाराष्‍ट्री ती या विचरे

प्रतिगाम्‍यांना या राष्‍ट्राच्‍या होईल आता हे आव्‍हान || 2 ||

तत्त्वनिष्‍ठता आम्‍ही राखिली

शर्थ करुनी धीराने

जे जे ठावे आम्‍हास झाले

जनास ते ते शिकविणे

पदोपदी जनसंघटनेचा कृ‍तीत आणला मंत्र महान || 3 ||

दिव्‍यसंगरी वर्गलढ्याच्‍या

लेनिनवादी दृष्‍टीचे

रहस्‍य उमजो दारिद्र्याचे

तसेच त्‍याच्‍या नाशाचे

कामगार हा नेता व्‍हावा होऊनी त्‍याला वर्गज्ञान || 4 ||

वर्गलढ्याचे अखेरचे ते

भारत अजूनी घडायचे

कौरव किंवा पांडव यास्‍तव

नाही आता लढायचे

एकलव्‍य चिरवंचित घेई राज्‍य स्‍थापण्‍या धनुष्‍यबाण || 5 ||

- कॉ. सुमन कात्रे

आघाडीचे सूत्र


कम्‍युनिस्‍ट विचारप्रणाली व कम्‍युनिस्‍ट पक्ष संघटना ही समाजातील अन्‍य पुरोगामी विचारप्रणालींची व त्‍यावर आधारुन समाजकार्य करणा-या संघटनांची व व्‍यक्‍तींची स्‍पर्धक नाही. ती त्‍यांची मित्रशक्‍ती आहे. जेथे जेथे असे क्रम, मग ते समाज विभागाच्‍या रुपाने असो, संघटनेच्‍या वा संघटनेतील एखाद्या प्रवाहाच्‍या रुपाने असो, दृगोचर होऊ लागतात, तेथे तेथे ते हेरुन त्‍यांच्‍याशी त्‍यांच्‍याशी आपल्‍या स्‍वतःच्‍या विचारसरणीच्‍या, धोरणाच्‍या व वर्गनिष्‍ठेच्‍या आत्‍मविश्‍वासाने तसेच आपापल्‍या परिस्थितीत आपापल्‍या जाणीवेच्‍या पातळीप्रमाणे इतर जे पुरोगामी दिशेने धडपडत असतील त्‍यांच्‍या प्रयत्‍नांबद्दल आदरभाव बाळगून त्‍यांच्‍याशी क्रांतिकारक नम्रतेने संबंध जोडण्‍याचे आणि क्रांतिकारक शक्‍ती संघटितपणे उभ्‍या करण्‍याच्‍या महान कार्यात त्‍यांचे जे काही सहाय्य होऊ शकत असेल ते घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची व त्‍याचवेळी त्‍यांच्‍या पाठीमागील समुदायांशी प्रत्‍यक्ष चळवळीचे तसेच वैचारिक संबंध बांधण्‍याचे बाबतीत कुठलाही संकोच न करण्‍याची अथवा बंधन न स्‍वीकारण्‍याची नवजीवन संघटनेची भूमिका राहिली आहे. या भूमिकेमुळेच निरनिराळ्या चळवळींतील अनेक कार्यकर्ते आज आपल्‍या पक्षात आहेत. अशा प्रकारच्‍या शक्‍तींशी मध्‍यमवर्गीय स्‍पर्धेच्‍या पद्धतीने वागण्‍याची, त्‍यांच्‍या उणिवांवर भर देऊन त्‍यांचा पाणउतारा करण्‍याची व त्‍यांचा वैचारिक संघटनात्‍मक मोड करुन अथवा आमिष देऊन त्‍यांना आपल्‍या वर्चस्‍वाखाली आणण्‍याची जी संयुक्‍त आघाडीच्‍या व्‍यवहाराला घातक ठरणारी रीत कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या पुढारी कार्यकर्त्‍यांनी रुढ केली होती, त्‍यापासून वेगळी, आंतरराष्‍ट्रीय कम्‍युनिस्‍ट चळवळीची खरीखुरी संयुक्‍त आघाडी बांधण्‍याची रीत ही कॉ. एस. कें. ची या भूमीतील कम्‍युनिस्‍ट चळवळीला खास वैयक्तिक देणगी आहे, असे म्‍हटले तर अति‍शयोक्‍ती होणार नाही. हिंदुस्‍तानसारख्‍या परतंत्र मागास देशात पुरोगामित्‍वाचा मक्‍ता फक्‍त कम्‍युनिस्‍टांकडे नाही. देशातील सर्व पुरोगामित्‍वाचे संकलन करण्‍याची जबाबदारी कम्‍युनिस्‍टांची आहे. कम्‍युनिस्‍ट विचारसरणीचे जे शास्‍त्रीयत्‍व व जी मौलिकता आहे, त्‍यामुळे सर्व पुरोगामित्‍वाचा पुढाकार कम्‍युनिस्‍ट आंदोलनाकडे येणे अपरिहार्य आहे. परं‍तु, तो त्‍यांनी आपल्‍या कार्याने व सर्वांच्‍या मान्‍यतेने मिळवला पाहिजे. संघटनात्‍मक अथवा अन्‍य क्‍लृप्‍त्‍या करुन बळकावता कामा नये. तसा तो कधीच बळकावता येत नाही. याबाबतीत घाई करुन चालत नाही. धिमेपणाने व्‍यवहार करावा लागतो, ही व्‍यावहारिक शिकवणसुद्धा व्‍यक्तिशः कॉ. एस. कें.चीच आहे. नवजीवन संघटनेच्‍या व नंतर लाल निशाण कार्यकर्त्‍यांच्‍या व्‍यवहारात इतर सर्वांच्‍या स्‍पर्धाशील व्‍यवहाराच्‍या पार्श्‍वभूमीवर उठावाने दिसणा-या पद्धती आजसुद्धा उपयुक्‍त आहेत आणि त्‍या काटेकोरपणे अवलंबल्‍या पाहिजेत. नवीन येणा-या कार्यकर्त्‍याला जुन्‍यांनी शिकविल्‍या पाहिजेत. म्‍हणून हा खास उल्‍लेख आहे.

(कॉ. यशवंत चव्‍हाण, पक्षांतर्गत विचारविनिमय, 1979, पान 69-70)

रिडालोसला लाल निशाण पक्षाचे पत्र

लाल निशाण पक्ष

श्रमिक, रॉयल क्रेस्‍ट, लो. टिळक वसाहत गल्‍ली क्र.3, दादर, मुंबई- 400014. फोनः022-24102180


11 सप्‍टेंबर 2009

प्रिय मा. रामदासजी आठवले,

निमंत्रक,

रिपब्लिकन डावी लोकशाही समिती

महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. आपल्‍या पुढाकाराने रिपब्लिकन, डाव्‍या, समाजवादी विचारसरणीच्‍या तसेच अन्‍य अनेक पक्षांची रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्‍थापन झाली आहे. समितीतले आपण सगळे जण जागावाटपाच्‍या अत्‍यंत किचकट व प्रचंड घाईच्‍या कामात सध्‍या व्‍यग्र आहात. अशा व्‍यग्रतेतून वेळ काढून आपण आमचे हे पत्र वाचाल, अशी अपेक्षा आहे.

ही समिती स्‍थापन करताना ही एकजूट केवळ विधानसभा निवडणुकांपुरती राहणार नसून त्‍यानंतरही कष्‍टकरी-दलितांच्‍या प्रश्‍नावर कार्यरत राहणार असल्‍याचे आपण जाहीर केले आहे. तसेच संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनात एकत्र असलेले आम्‍ही लोक पुन्‍हा एकत्र येऊन संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनाला अपेक्षित असलेला परंतु अपुरा राहिलेला कार्यक्रम पुढे नेणार आहोत, असेही आपण व्‍यक्‍त केले आहे. आपल्‍या या भूमिकेचे आम्‍ही मनःपूर्वक स्‍वागत करतो व निवडणुकांनंतर आपल्‍या पुढाकाराखाली होणा-या यासंबंधीच्‍या आंदोलनाचा सक्रीय भाग होण्‍याची इच्‍छाही प्रदर्शित करतो.

महाराष्‍ट्र राज्‍य निर्मितीला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईसह महाराष्‍ट्रासाठी जी संयुक्‍त महाराष्‍ट्र समिती बनविण्‍यात आली होती, त्‍यात सोशालिस्‍ट पार्टी, कम्‍युनिस्‍ट पार्टी तसेच शेड्युल्ड कास्‍ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष हे मुख्‍य घटक होते. कॉ. डांगे व साथी एस.एम. जोशी यांच्‍या सहकार्याच्‍या रुपाने कम्‍युनिस्‍ट व सोशालिस्‍टांची एकजूट घडविण्‍यात लाल निशाण पक्षाने कॉ. दत्‍ता देशमुखांच्‍या रुपाने महत्‍वाची भूमिका बजावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्‍यासाठी समितीतर्फे दत्‍ता देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, एस.के. लिमये हीच मंडळी गेली होती. बाबासाहेबांनी शिष्‍टमंडळाचे प्रेमाने स्‍वागत केले आणि ते म्‍हणाले, संयुक्‍त महाराष्‍ट्राला माझा संपूर्ण पाठिंबा आहेच. आणि पुढे त्‍यांनी दत्‍ता देशमुख व नाना पाटलांचा हात हातात घेऊन, आपुलकीने पण खोचकपणे विचारले, संयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य होईल तेव्‍हा तुम्‍ही मराठे (सत्‍तेवर) याल, त्‍यावेळी माझ्या दलित जनतेशी कसे वागणार?’ दत्‍ता व नाना पाटील या दोघांनी तळमळीने उत्‍तर दिले, कधीही अंतर देणार नाही.

57 च्‍या निवडणुकीत बी.सी. कांबळे व दा.म.शिर्के या दोघांना कॉ. दत्‍ता देशमुख व कॉ. संतराम पाटील यांनी साथीला घेऊन बरोबरीची मते मिळवून विजयी होण्‍यात सहाय्य केले. समितीत जागावाटपांवरुन मतभेद सुरु झाले तेव्‍हा, प्रसंगी आम्‍हाला एकही जागा देऊ नका, पण एकजूट टिकवा, ती मोडाल, तर सर्व पडाल, असा इशारा दत्‍ता देशमुखांनी दिला होता. एकमताने लाल निशाण पक्षाच्‍या वाट्याला आलेल्‍या आठही जागा त्‍यावेळी निवडून आल्‍या. त्‍यात त्‍यावेळच्‍या संयुक्‍त मतदारसंघ पद्धतीत कांबळे व शिर्के उभे असलेल्‍या अनुक्रमे नगर व कोल्‍हापूर या जागांचा समावेश होता.

मुंबईसह संयुक्‍त महाराष्‍ट्र मिळविण्‍यात मराठी जनता यशस्‍वी झाली. दिल्‍लीहून महाराष्‍ट्राचा मंगल कलश घेऊन आलेल्‍या यशवंतराव चव्‍हाणांनी केलेल्‍या आवाहनाला मान देऊन शेतकरी कामगार पक्षाचे मातब्‍बर पुढारी शहरी, ग्रामीण नवधनिकांच्‍या वर्चस्‍वाखाली गेलेल्‍या कॉंग्रेसमध्‍ये सामील झाले. वैचारिक मतभेदांचे निमित्‍त करुन समाजवादी व कम्‍युनिस्‍ट आपापल्‍या मूळ छावण्‍यांत परतले. मुंबईसह महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतरच्‍या पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत 62 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचा प्रचंड पराभव झाला. महाराष्‍ट्रावर शहरी व ग्रामीण धनिकांचे वर्चस्‍व प्रस्‍थापित झाले. ते आजतागायत आहे. मुंबईवरील बडे भांडवलदार, बिल्‍डर व व्‍यापारी यांचे प्रभुत्‍व दिवसेंदिवस वाढतेच आहे. कामगार-शेतकरी एकजुटीचा प्रभाव आणि दबाव महाराष्‍ट्र सरकारच्‍या धोरणावर पाडण्‍याचे संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे उद्दिष्‍ट विफल झाले आहे. अन्‍यायाने महाराष्‍ट्राबाहेर ठेवण्‍यात आलेल्‍या बेळगाव, निपाणी, बिदर हे मराठीबहुल भाग अजूनही आपण मराठी राज्‍यात समाविष्‍ट करु शकलेलो नाही.

आम्ही लाल निशाण पक्ष गेली 20 वर्षे देशाच्‍या राजकारणाचा विचार करताना, धर्मांध झोटिंगशाही राजकारणाला विरोध करण्‍यासाठी कॉंग्रेससह सर्व सर्वधर्मसमभाव मानणा-या पक्षांच्‍या एकजुटीचे प्रवक्‍तेपण सातत्‍याने करीत आहोत. केंद्रातील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्‍या काही धोरणाबाबत आमची तीव्र टीका असतानाही व त्‍याच्‍या विरुद्ध लोकांना निःसंकोचपणे संघटित करत असतानाही, अखिल भारतीय पातळीवर कॉंग्रेससह व्‍यापक लोकशाही आघाडी करण्‍याच्‍या धोरणात बदल करण्‍याची वेळ आली आहे, असे वाटत नाही.

मात्र महाराष्‍ट्रातील कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी सरकारचा व्‍यवहार हा असंवेदनशील, ग्रामीण व शहरी सधनांचे हितरक्षण करणारा व केंद्र सरकारने घेतलेल्‍या जनस्‍वी भूमिका व योजना अंमलात आणण्‍याबाबत दुर्लक्ष करणारा, महाराष्‍ट्राचा मोठा भाग असलेल्‍या दुष्‍काळी व कोरडवाहू शेतीकडे गुन्‍हेगारी दुर्लक्ष करणारा आहे.

अशावेळी खरे पाहता, संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे पुनरुज्‍जीवन व्‍हावे, ही काळाची गरज आहे. महाराष्‍ट्राचा कामगार वर्ग आज फारच दुर्बल झाला आहे. समितीचा मुख्‍य आधार असलेला मुंबईचा गिरणी कामगार, गिरणी मालक आणि सरकार यांनी संगनमताने नेस्‍तनाबूत केला आहे. संघटित क्षेत्रातील इतर कामगार पक्षीय संघटनात्‍मक फुटीमुळे राजकीय दृष्‍ट्या प्रभावशून्‍य बनला आहे. असंघटित क्षेत्रातील संख्‍येने अफाट वाढलेला कामगार विस्‍कळीत आहे. खेडोपाडीचा भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, आदिवासी सधनांच्‍या वर्चस्‍वाखाली आहे.

प्रत्‍येक धंद्यात एक संघटना व सर्व धंद्यातील कामगारांच्‍या वर्गीय एकजुटीची एकच एक केंद्र संघटना, तसेच प्रत्‍येक खेड्यात भूमि‍हीन शेतमजूर, गरीब शेतकरी यांच्‍या एकजुटीच्‍या संघटना व्‍हायला हव्‍यात. श्रमिकांच्‍या या संघटनांबरोबरच सामाजिक अत्‍याचारांना तोंड देणा-या आदिवासी, दलित व महिला या समाजविभागांकडे अग्रक्रमाने लक्ष द्यायला हवे. याचबरोबर आरोग्‍य, शिक्षण व अन्‍य नागरी तसेच सांस्‍कृतिक प्रश्‍न हाती घ्‍यायला हवेत. संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीने या भूमिका घेतल्‍या होत्‍या. त्‍यामुळे समितीला सामर्थ्‍य प्राप्‍त झाले होते. पण समिती विसर्जित झाली आणि त्‍या भूमिकाही उधळल्‍या गेल्‍या. या जनस्‍वी भूमिकांचा आज एकजुटीने पुरस्‍कार अत्‍यंत निकडीचा आहे. म्‍हणूनच पुरोगामी संपूर्ण संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीच्‍या रुपात पुनरुज्‍जीवन आम्‍हाला समयोचित वाटते.

निवडणुकीनंतर या विभागांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जो आंदोलनाचा कार्यक्रम ठरवावयास आपण बसाल, त्‍यावेळी आम्‍हाला आपण निमंत्रित कराल, ही अपेक्षा आहे.

आपल्‍याला मनःपूर्वक शुभेच्‍छा !

आपला भ्रातृभावपूर्वक,

(कॉ. यशवंत चव्‍हाण)