Thursday, September 29, 2022

संविधानातील मूल्यांची ओळख

आकाशवाणीवर २१ ते २४ सप्टेंबर २०२२ या काळात झालेल्या प्रत्येकी ४ मिनिटांच्या ४ भाषणांची टिपणे
भाग १

आपण नुकतीच भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली. या स्वातंत्र्यासाठीच्या महान संग्रामात, इंग्रजांशी लढत असतानाच, स्वतंत्र भारत कसा घडवायचा, याचा आराखडाही बनवला जात होता. स्वातंत्र्य लढ्याच्या सोबतच सामाजिक सुधारणांची चळवळ सुरु होती. त्यातून नवी मूल्यं विकसित होत होती. त्यामुळे हा आराखडा अधिक समृद्ध होत होता. या विचारांचा, मूल्यांचा समावेश आपल्या संविधानात केला गेला.

म्हणूनच, भारताचं संविधान ही केवळ राज्यकारभाराची नियमावली नव्हे. किंवा या कारभारातील विविध घटकांचं स्वरुप स्पष्ट करणारा फक्त एक दस्तावेज नव्हे. हे तर त्यात आहेच. मात्र त्या पलीकडे भारतीय जनतेच्या आकांक्षांचा तो संकल्प आहे. भारत कसा घडवायचा, त्यातील जनतेचं सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन कसं समृद्ध करायचं, भारतीय जनतेत परस्पर भ्रातृभाव, भगिनीभाव वा सहभाव कसा वृद्धिंगत करायचा याचं दिग्दर्शन आपल्या संविधानात आहे.

संविधानातील ३९५ कलमं, २२ भाग आणि १२ अनुसूची यांमधून संविधानातील विचार किंवा मूल्यं शोधायची कशी? ...यासाठी संविधानकारांनी आपली सोय करुन ठेवली आहे. ती म्हणजे उद्देशिका. तिला प्रास्ताविका, सरनामा असंही म्हटलं जातं. संविधानाच्या प्रारंभी असलेल्या या उद्देशिकेत संविधानाचं सार आहे. त्याचा विस्तार संविधानातल्या विविध कलमांत आढळतो. संविधानाचं तत्त्वज्ञान, विचार, मूल्यं या एका वाक्याच्या उद्देशिकेत सामावलं आहे. ..हो, ही उद्देशिका एका वाक्याची आहे. ओळी अनेक दिसत असल्या तरी वाक्य एकच आहे. या एका वाक्यातले विविध शब्द ही मौलिक रत्नं आहेत. या रत्नांचा एका वाक्याच्या सूत्रात गुंफलेला हा मौल्यवान रत्नहार आहे. ही उद्देशिका समजणं म्हणजे संविधानाचं मर्म समजणं होय.

लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. निवडणुकीद्वारे जनता आपले प्रतिनिधी पाठवून राज्य करत असते. हे प्रतिनिधी उद्दिष्टांनुसार कारभार करतात की नाही, यावर जनतेचं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणूनच, हे राज्य ज्या संविधानावर चालतं, ते संविधान समजून घेणं, किमान उद्देशिका समजून घेणं ही आपल्या नागरिकत्वाची पूर्वअट आहे. यादृष्टीने, उद्देशिकेत नमूद केलेल्या संकल्पना आणि मूल्यं यांचा पुढील चार भागांत आपण थोडक्यात परिचय करुन घेणार आहोत.

‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांपासून आपल्या संविधानाची उद्देशिका सुरु होते. देशाचं जे काही बरंवाईट करायचं, त्याचे सर्वाधिकार भारतीय नागरिकांच्या हाती आहेत. संविधानातली प्रत्येक बाब संविधान सभेत चर्चा होऊन संमत झाली आहे. उद्देशिकेवरही चर्चा झाली. त्यावेळी काही सूचना आल्या. संविधानाचं कामकाज सुरु असतानाच गांधीजींची हत्या झाली होती. त्यांचं हौतात्म्य आणि राष्ट्रपिता म्हणून जनतेच्या मनात असलेलं त्यांचं स्थान लक्षात घेता, उद्देशिकेच्या प्रारंभी, महात्मा गांधीजींच्या प्रति कृतज्ञता अर्पण करण्याची सूचना एका सदस्यानं केली. त्याला गांधीजींच्या अनुयायांकडूनच विरोध झाला. गांधीजी कितीही महान असले, त्यांचे देशावर कितीही उपकार असले तरी, अशा नोंदीमुळे लोकांऐवजी एखाद्या व्यक्तीला विशेष महत्व संविधानात मिळतं. ते होऊ नये, जनतेचंच स्थान आणि अधिकार अव्वल राहावा, यासाठी राष्ट्रावर अनंत उपकार असलेल्या महान व्यक्तीच्याही नावाचा उल्लेख उद्देशिकेत करणं आपण नाकारलं.

आम्ही भारताचे लोक या उद्देशिकेत जो संकल्प करत आहोत, त्यातील पहिला संकल्प भारत घडवण्याचा आहे. भारत कसा घडवणार आहोत? ..तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य पद्धतीचा. या प्रत्येक मूल्याचा तसेच उद्देशिकेतील आणखी काही संकल्पनांचा अर्थ आपण पुढील भागात समजून घेऊ.

====


भाग २

संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या देशाच्या स्वरुपाविषयीच्या मूल्यांची चर्चा या भागात आपण करुया.

आपला देश सार्वभौम असेल. सार्वभौम याचा अर्थ आमच्या देशावर आता इंग्रजांसारख्या कोणत्याही परकीय शक्तींचं नियंत्रण असणार नाही. तसेच देशाच्या अंतर्गत असलेल्याही कोणा समूहाचं वा शक्तीचं देशावर नियंत्रण असणार नाही. नियंत्रण असेल ते फक्त आणि फक्त भारतीय जनतेचं. एखाद्या राजकीय पक्षाला अथवा पक्षांच्या आघाडीला ५ वर्षे देशाचा कारभार करण्यासाठी जनता निवडते. तथापि, या काळापुरतं का होईना, सत्ताधारी पक्ष म्हणजे देशाचे मालक नव्हेत. अंतिम सत्ताधारी जनताच असणार.

देशाच्या स्वरुपाचं वर्णन करणारी दुसरी संकल्पना आहे - समाजवाद. जंगल, जमीन, उद्योग, खाणी आदि उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची न राहता, ती समाजाच्या, पर्यायाने सरकारच्या मालकीची असणं आणि येणाऱ्या उत्पन्नाचं समाजात न्याय्य वितरण करणं म्हणजे समाजवाद. - हा समाजवादाचा अभिजात अर्थ. आपल्या देशातला समाजवाद असा अभिजात नाही. खाजगी आणि सरकारी मालकीची संमिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली. मात्र एकूण आर्थिक धोरणात इथल्या गरीब, कष्टकरी, वंचित समूहांच्या विकासाला प्राधान्य असेल, असं आपण ठरवलं. कमाल जमीन धारणेसारखे कायदे आणून आपण भूमिहिनांना जमिनीचं वाटप केलं, ते याच धोरणातून. संपत्तीचा संचय एका जागी होऊ न देता उपजीविकेच्या साधनांचं न्याय्य वितरण करण्याचं मार्गदर्शक सूत्र संविधानात आहे. आपला समाजवाद हा या प्रकारचा आहे.

धर्मनिरपेक्षता हे देशाच्या स्वरुपाचं वर्णन करणारं तिसरं मूल्य. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माचं पालन, त्याचा प्रसार आणि त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य असेल. तथापि, शासनाचा कोणताही धर्म नसेल. व्यक्तीला असलेलं धर्म स्वातंत्र्य निरंकुश नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य, नैतिकता तसेच अन्य मूलभूत अधिकारांना हानी पोहोचणार नाही या अटी त्यात आहेत. धर्म पालनाबरोबरच धर्म न पाळण्याचाही अधिकार इथं गृहीत आहे. उद्देशिकेच्या प्रारंभी ‘ईश्वरास स्मरुन’ असं लिहावं, अशीही एक सूचना संविधान सभेत आली होती. ही सूचना बहुमतानं फेटाळली गेली. ही सूचना फेटाळणारे बहुसंख्य सदस्य काही निरीश्वरवादी नव्हते. मात्र शासनाचा कोणताही धर्म नसेल याबाबत या सर्वांची सहमती होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत झालेल्या विचारमंथनातून ही सहमती आकारास आलेली होती.

लोकशाही हे देशाचं स्वरुप नोंदवणारं चौथं मूल्य. प्रौढ आणि सार्वत्रिक मतदानानं लोकप्रतिनिधींची निवड आणि त्यातील बहुमताच्या गटाचं सरकार ही संसदीय लोकशाहीची प्रणाली आपण स्वीकारली. कायदा करताना ज्यांच्याविषयी तो कायदा आहे, त्या समाज घटकांकडून सूचना घेऊन, विरोधकांना विचारात घेऊन शक्य तितकी सहमती करुन तो मंजूर करायचा ही सांविधानिक नैतिकता सरकारनं पाळणं गरजेचं असतं. तरच लोकशाही अर्थपूर्ण होते. लोकशाही हे शासनाच्या कारभाराचं तसेच लोकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनाचंही मूल्य आहे.

देशाच्या स्वरुपाविषयीचं पाचवं आणि शेवटचं मूल्य – गणराज्य. सत्तेशी संबंधित कोणतंही पद वंशपरंपरागत नसणं म्हणजे गणराज्य. इंग्लंडमध्ये लोकशाही आहे. पण तिथं आतापर्यंत राणी होती. आता राजा आहे. राणी वा राजा वंशपरंपरागत असतात. आपल्याकडे राष्ट्रपतींची निवडणूक होते. म्हणूनच इंग्लंड हा लोकशाही देश आहे; पण ते गणराज्य नाही. भारत हे लोकशाही गणराज्य आहे.

पुढच्या दोन भागांत आपण देशातील नागरिकांना बहाल केलेले न्याय, स्वातंत्र्य, समता हे अधिकार आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या बंधुतेच्या अटीची चर्चा करणार आहोत.

====


भाग ३

आम्ही भारताचे लोक आम्हा भारतीय जनतेला कोणते अधिकार प्रदान करत आहोत, त्याची चर्चा या भागात आपण करुया.

भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्यायाची हमी दिलेली आहे. हा न्याय तीन प्रकारचा आहे. पहिला सामाजिक, दुसरा आर्थिक आणि तिसरा राजनैतिक. हा क्रमही महत्वाचा आहे. गरीब असो वा श्रीमंत, तथाकथित उच्चवर्णीय असोत वा अनुसूचित जाती-जमातीचे लोक, स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला मतदानाचा तसेच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. निवडणुकांत पैश्याची आमिषं, जाती-पातीची आवाहनं या न्यायात अडथळा आणत असली तरी, हा न्याय बऱ्याच अंशी प्रत्यक्षात येतो. या आधीचे दोन न्याय - सामाजिक आणि आर्थिक, अजून अपुरे आहेत. अनेक महत्वाचे कायदे झाले आहेत. त्यांचा उपयोग होतो. आधारही मिळतो. तथापि, सामाजिक भेदभाव आजही तीव्र आहे. जातींची उतरंड कायम आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, स्त्रिया यांच्यावरील अत्याचार थांबलेले नाहीत. सामाजिक न्यायाचा मुक्काम बराच दूर आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता घडवण्याचं मोठं काम करत राहावं लागणार आहे.

आर्थिक विषमता तीव्र होते आहे. कोविडच्या काळात स्थिर आणि उच्च उत्पन्न असलेल्यांना फारशी झळ पोहोचली नाही. तथापि, हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती शोचनीय झाल्याचं आपण पाहिलं. आर्थिक विषमता वाढत राहिली तर महत्प्रयासानं उभारलेली आपली ही लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला होता. तो लक्षात घेणे गरजेचे आहे.

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच प्रकारची स्वातंत्र्यं संविधानानं दिली आहेत. ही स्वातंत्र्यं इतरांच्या याच स्वातंत्र्यांना धक्का न पोहोचवता भोगावयाची आहेत. विशिष्ट विचाराचा स्वीकार आणि त्या विचाराची भाषण, लेख, नाट्य, सिनेमा, कथा, कविता, चित्र आदि माध्यमांद्वारे अभिव्यक्ती करणं याचा व्यक्तीला अधिकार आहे. वास्तविक, भारतीय परंपरा ही परस्परांच्या आस्थांचा आदर राखणारी आहे. हा आदर राखून धर्ममतांची चिकित्सा करण्याचा संदेश देणारे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. मध्ययुगात कबीर, रविदास, तुकोबा, जनाबाई, बुल्लेशहा आदि संतांनी कर्मकांडावर आघात केलेत. ब्रिटिश काळात नवशिक्षण घेतलेल्या पिढीतील महात्मा फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे वगैरे समाज सुधारकांनी हे चिकित्सेचं प्रबोधन खूप पुढं नेलं.

मात्र आज लोकांच्या धार्मिक-जातीय भावना फारच हळव्या झालेल्या दिसतात. त्याचा फायदा संविधानातील मूल्यांचे विरोधक घेतात. भिन्न मतं मांडणाऱ्यांना धमक्या देतात. प्रत्यक्ष हिंसेवर उतरतात. टीकेला उत्तर टीका हेच आहे. मतभेद असलेल्यांना धमक्या वा हिंसा हे उत्तर कदापि असता कामा नये. ‘वादे वादे जायते-तत्त्वबोधः’ हे प्राचीन विचारसूत्र आपल्या संविधानानंही अधोरेखित केलं आहे. ते धोक्यात येणं हे समाजाच्या पतनाचं लक्षण आहे. आधी मनांचं आणि नंतर देशाचं विघटन होतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

ही स्वातंत्र्यं व्यक्तीला दिलेली आहेत. उदाहरणार्थ, प्रौढ स्त्री-पुरुषांना पसंतीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यांच्या जातीच्या वा धर्माच्या समूहाने त्यात बाधा आणता कामा नये. आपापले धर्म कायम ठेवून विशेष विवाह कायद्याखाली लग्न करता येतं. अशा लग्नांना प्रोत्साहन, संरक्षण आणि सहाय्य देणं हे शासनाचं कर्तव्य आहेच. पण समाजानेही ते मनापासून स्वीकारणं आवश्यक आहे. समाजाच्या निरामय वाढीसाठी ते गरजेचं आहे.

====

भाग ४

या शेवटच्या भागात आपण समता आणि बंधुता या संविधानातल्या मूल्यांचा परिचय करुन घेणार आहोत.

देशातील प्रत्येक नागरिकाचा धर्म, लिंग, जन्मस्थान, भाषा कोणतीही असो, हे सर्व नागरिक कायद्यापुढे समान असतील आणि त्या सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असेल. तथापि, समता म्हणजे एवढंच नव्हे. संविधानाच्या उद्देशिकेत समतेचा उल्लेख करताना ‘दर्जाची व संधीची समानता’ असं म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा वा मूल्य समान असेल. या सर्वांना विकासाची संधी समान असेल. पाच-सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. महाराष्ट्रातील दोन धर्मस्थळांत पुरुषांना जिथवर प्रवेश दिला जातो, तिथवर आम्हालाही प्रवेश द्या, अशी त्या त्या धर्मातल्या महिलांनी मागणी केली होती. या मागणीच्या मागे स्त्री आणि पुरुष या दोहोंचा दर्जा संविधानानं समान मानला आहे, हे सूत्र होतं. बरीच आंदोलनं या महिलांनी केली. नंतर न्यायालयात त्यांनी दाद मागितली. न्यायालयानं संविधानातील दर्जाच्या समानतेचं तत्त्व प्रमाण मानून या महिलांच्या बाजूनं न्याय दिला.

समान संधी याचा अर्थ तगडे आणि दुबळे यांची एकाच रेषेवरुन स्पर्धा लावणं नव्हे. यात तगडे जिंकणार हे उघडच आहे. समाजातील संसाधनं तसेच विकासाच्या संधी यांत खुली स्पर्धा ठेवली, तर समाजातील ताकदवान व्यक्ती वा समूहच त्यांवर कब्जा करतील आणि दुबळ्या व्यक्ती वा समूह वंचित राहतील. त्यांच्या प्रति न्याय होणार नाही. म्हणून अशा दुबळ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी, सवलती, राखीव जागा यांची व्यवस्था सरकार करतं. ही सकारात्मक विषमता खरी समता अस्तित्वात येण्यासाठी गरजेची आहे. अर्थात, दुबळे अन्य सशक्तांबरोबर स्पर्धा करायला तयार होईपर्यंतच ही वेगळी तरतूद, सवलत वा राखीव जागा असणार आहेत.

बंधुतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनन्यसाधारण महत्व देतात. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही एक तत्त्वत्रयी ते मानतात. यातलं कोणतंही एक वगळून चालणार नाही. बंधुता नसेल तर न्याय, स्वातंत्र्य, समता यांच्या रक्षणासाठी पोलीस ठेवायला लागेल असं ते म्हणतात. समाजातील व्यक्तींना परस्परांबद्दल आपुलकी, ममत्व नसेल, तर दुसऱ्याचं दुःख कळणार कसं? ते कळलं नाही तर त्यावर उपाय करायला पुढं येणार कसं? समाजातले दुबळे, उपेक्षित समूह, अल्पसंख्य, स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायानं मन कळवळलं तरच त्यांच्या संरक्षणासाठी लोक पुढे येतील. या विभागांबद्दल जर मनात विद्वेष, नफरत असेल, तर त्यांनाही न्याय मिळावा, त्यांनाही समान दर्जा व संधी मिळावी, त्यांनाही सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्यं मिळावीत, यासाठी प्रयत्न वा सदिच्छाही राहणार नाही. अशावेळी संविधानानं या विभागांना दिलेले अधिकार संविधानातच राहतील. ते प्रत्यक्षात येणार नाहीत.

‘व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता’ अशी शब्दरचना उद्देशिकेत आहे. यातील क्रम महत्वाचा आहे. इथं व्यक्ती प्रथम आहे. व्यक्तीचं सुख हा आपल्या संविधानाचा केंद्रबिंदू आहे. या व्यक्तीसाठी राष्ट्र आहे. राष्ट्रासाठी व्यक्ती नव्हे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता आवश्यक आहे, ती व्यक्तीच्या भल्यासाठी. हे सूत्र कळलं, तर ‘राष्ट्र म्हणजे भूप्रदेश नव्हे; तर तेथील लोक’ आणि या लोकांचं कल्याण म्हणजेच राष्ट्रकल्याण हे आपल्या मनात दृढ होईल.

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांच्या या ओळखीतूनच आपल्या भारतीयत्वाची ओळख सिद्ध होते, हे आपल्या ध्यानी आलं असेलच.

====

हिजाब काढणे व घालणे या दोहोंतील सक्तीच्या मी विरोधात


मुस्लिम मुली हिजाब घालतात तो त्यांचा अभिमानाचा मुद्दा माझ्या दृष्टीने नक्कीच नाही. तो पुरुषी वर्चस्वाचाच धर्मातला भाग आहे. तो जायला हवा, हेच माझे मत आहे. पण तो निर्णय त्या मुलींचा हवा. त्यासाठीचे प्रबोधन व संघर्ष त्या समाजांतर्गत व्हायला हवा. इराण मध्ये तो सुरु आहे. त्याचे मी स्वागत करतो. हिजाबच्या सक्तीपायी महसा अमिनी या इराणी युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्या विरोधात इराणमध्ये तेथील प्रतिगामी राजवटीविरुद्ध जो प्रक्षोभ उसळला आहे, ते समाजाला पुढे नेणारे पाऊल आहे, असेच मला वाटते. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.
तथापि, "जब मुस्लिम देश ईरान में हिजाब के खिलाफ उठ रही आवाज तो फिर हिंदुस्तान में इसके समर्थन में हंगामा क्यों?" हा प्रश्न उपस्थित करणारे एकतर सरळ मार्गी आहेत, अज्ञानी आहेत किंवा मतलबी. इराण व भारत येथील स्थिती एक नाही. दोन्ही समाजातले ताणेबाणे व वर्तमान अंतर्विरोध सारखे नाहीत.
इराणमध्ये एकाच धर्मातल्या कर्मठ व प्रगतीशील या दोन गटांत संघर्ष आहे. भारतात हिंदू कट्टरपंथी हा तिसरा आणि सर्वाधिक ताकदीचा घटक आहे. जो सर्वार्थाने प्रतिगामी आहे. सर्व प्रगतीशील मूल्यांचा तो शत्रू आहे. त्याचा शासन-प्रशासनावरही प्रभाव आहे. त्याचा शिक्षण संस्थांत मुलींनी हिजाब घालण्याला विरोध हा सेक्युलॅरिझम वरील विश्वासापायी नसून मुस्लिम द्वेषातून आहे. 'हे हिंदू राष्ट्र आहे. इथे मुस्लिमांनी मापात राहा', असे ते मुस्लिम मुलींच्या हिजाबला विरोध करण्याच्या मिषाने बजावत आहेत. मुस्लिम मुलींविषयी कणव वा न्याय ही त्यांची भावना नाही.
अशावेळी परधर्माचे कोणी मला जबरदस्तीने मी ज्याला (अज्ञान, रुढी याने का होईना) मानबिंदू मानते, ती बाब काढायला सांगत असेल तर मी त्या बाबत अधिकच आग्रही राहणार. कारण तो माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, पर्यायाने माझ्या अस्तित्वावरचा घाला आहे, असे मी मानते. कर्नाटकातल्या मुलींची ही मनःस्थिती समजून घ्यायला हवी.
त्यामुळे इतरांना हानी न पोहोचवणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे ही भूमिका या स्थितीत योग्य राहील. यात हिजाब नाकारणाऱ्या इराण मधील मुस्लिम स्त्रिया आणि हिजाब हवा म्हणणाऱ्या भारतातील मुस्लिम मुली या दोहोंच्या व्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा द्यावा लागेल. यात मला विसंगती दिसत नाही.
इराणमध्ये महिला एकाच शत्रूशी लढत आहेत. भारतात मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही कट्टरपंथीयांशी एकाच वेळी लढायचे कसे? एकाला विरोध करताना दुसऱ्याला त्याचा फायदा होता कामा नये, यासाठीची रणनीती काय? कार्यक्रम काय? ...हा पेच सोडवण्याचे परिणामकारक मार्ग पुढे येईपर्यंत व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याला धरुन दोन्ही देशांतील मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्याची माझी भूमिका राहील. त्याचवेळी हितचिंतक म्हणून हळुवारपणे, जमेल तसे, जमेल तिथे, जमेल तेवढे, हिजाब घालणे ही गुलामी आहे, हेही नोंदवण्याचा प्रयत्न मी करत राहणार.
- सुरेश सावंत

'धर्म आणि संविधान' पुस्तिकेचे प्रकाशन

'दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा परिवार' साठी मी लिहिलेल्या 'धर्म आणि संविधान' या पुस्तिकेचे आज अन्नपूर्णा परिवाराच्या वारजे, पुणे येथील सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख मेधाताई सामंत, कॉ. सुरेश धोपेश्वरकर, प्रमोद मुजुमदार, वृषाली मगदूम तसेच संस्थेचे अन्य विश्वस्त मंचावर उपस्थित होते. तत्पूर्वी 'धर्म, धार्मिकता आणि धर्मांधता' या विषयावर प्रमोद मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात नीलम पंडित, संकेत मुनोत, परिमल माया सुधाकर, तमन्ना इनामदार व प्रशांत केदारी हे वक्ते होते.
_______

धर्म आणि संविधान
सुरेश सावंत
पृष्ठे : ८० | किंमत : ६० रु.
_______

पुस्तिका मिळण्याचे ठिकाण :

दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा परिवार, सुवास्तू प्रेस्टिज, आदित्य गार्डन सिटी जवळ, मेघमल्हार सोसायटी शेजारी, आर. एम. डी. इन्स्टिट्यूटच्या मागे, मुबई - गोवा हायवे जवळ, वारजे, पुणे - ४११०५८
मो. क्र.: ९३७२७१५४२१; ९९२२९६७०००

काही काळात खालील वेबसाईटवर मोफत download करण्यासाठी पुस्तिका उपलब्ध होईल :
यथावकाश या पुस्तिकेचा इंग्रजी अनुवादही प्रकशित होणार आहे आणि तोही वरील वेबसाईटवर उपलब्ध होईल.