Thursday, November 26, 2009

माझ्या मनात झालेले ‘मिरॅकल’

मिरॅकल इन रवांडा.

90 मिनिटांचा मंचकावरील थरार. वंशसंहाराचा भीषण, बिभत्‍स कल्‍लोळ.

भयाच्‍या भयाण तांडवात आध्‍यात्मिक शांततेचा शोध- भय, संताप, सूड यांच्‍या पार जाणारा.

क्रौर्याची परिसीमा गाठून सर्वस्‍व उजाड करणा-या गुन्‍हेगारांना पिडितानेच दिलेली अखेरची क्षमा. विद्वेषाच्‍या समूळ उच्‍चाटनाचा शाश्‍वत मार्ग उजागर करणारी. अखिल मानवतेला कवेत घेणारी.

प्रेक्षक म्‍हणून माझ्या मनात भय, थरकाप, आक्रोश, अश्रू आणि अखेर उन्‍नत उन्‍मनावस्‍था...

मुंबई विद्यापीठातील नाट्यलेखिकांच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदेतच्‍या समारोपावेळच्‍या या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही. रोजचे व्‍यवहार चालू असले तरी आत इम्‍याक्‍युलीचे स्‍वगत, ईश्‍वराशी चाललेला तिचा संवाद चालू असतो. मध्‍येच कळ येते. कळवळायलाही होते. जखम भळभळते. श्‍वास वाढतात. गदगदून येते. डोळे ओथंबून येतात. ...तरीही खूप बरे वाटते. काहीतरी साचलेले मोकळे होते आहे, असे वाटते. अखिल मानवजातीच्‍या भविष्‍याची आश्‍वासकता श्‍वासांतून वाहू लागते.

या नाटकाबद्दल मला काय वाटते, हे लिहिणे त्‍या अर्थाने व्‍यक्तिगत झाले आहे. माझ्या जाणिवांचा, संवेदनांचा तो आविष्‍कार आहे. डायरी लिहिल्‍यासारखा. ते तटस्‍थ, वस्‍तुनिष्‍ठ वगैरे काही नाही. मला असे वाटले, एवढेच.

रवांडातील वंशसंहारावरची ही एकपात्री एकांकिका. लेस्‍ली लेविस स्‍वोर्ड ही लेखिका आणि तीच अभिनेत्री. कथा वास्‍तवात घडलेली. इम्‍याक्‍युली या मुलीच्‍या आयुष्‍यावर बेतलेली.

रवांडा हा आफ्रिका खंडातील एक छोटा देश. लोकसंख्‍या 73 लाख. तेथील दोन प्रमुख टोळ्या- हुतू व तुत्‍सी. हुतू बहुसंख्‍य म्‍हणजे 84 टक्‍के. तुत्‍सी 15 टक्‍के. 1 टक्‍का त्‍वा नावाची एक छोटी जमात. या दोन टोळ्यांना आधीचाच संघर्षाचा इतिहास. तुलनाच करायची तर जर्मनीत ज्‍यू व भारतात मुस्लिम तसे रवांडात तुत्‍सी. या तुत्‍सींविषयी हुतूंच्‍या मनात ख-या-खोट्या कल्‍पनांचे, अफवांचे जहर साचत आलेले. तुत्‍सी आपल्‍याला कमी प्रतीचे मानतात, त्‍यांच्‍या बायका आमच्‍या हुतू पुरुषांना नादी लावतात व त्‍यांना जीवनातून उठवतात. आमच्‍या सर्वनाशाला हे तुत्‍सी कारण होणार आहेत. त्‍यांचा योग्‍य बंदोबस्‍त करायलाच हवा. ही मानसिकता तयार होत चाललेली. सरकारमधील अनेकांच्‍या मनात हाच द्वेष भरुन राहिलेला व तो प्रकटपणे व्‍यक्‍तही होणारा. आकाशवाणीवरच्‍या बातम्‍यांत, कार्यक्रमांतूनही हा द्वेष पोसला जात होता.

अशात समेटाचा प्रयत्‍न करणा-या जुवेनाल हब्‍यारिमाना या रवांडाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचे विमान पाडले जाते व त्‍यांचा त्‍यात अंत होतो. 6 एप्रिल 1994 रोजीची ही घटना. हे कृत्‍य करणारे नक्‍की कोण, याबद्दल अजूनही वाद असला तरी त्‍यावेळी हे करणारे तुत्‍सीच आहेत असे गृहीत धरले जाते व संहाराचा आगडोंब उसळतो. पुढच्‍या तीन महिन्‍यातील तुत्‍सींची क्रूर, हाल हाल करुन कत्‍तल केली जाते. या कत्‍तल झालेल्‍यांत तुत्‍सींच्‍या सहानुभूतिदार हुतूंचाही समावेश आहे. ही कत्‍तल लहानपणापासून एकत्र राहिलेल्‍या शेजा-यांनी, गावातल्‍या जवळच्‍या परिचितांनीच प्रामुख्‍याने केलेल्‍या आहेत.

सरकारच्‍या अधिकृत आकडेवारीनुसार 1,174,000 लोक 100 दिवसांत मारले गेले. (10,000 लोक प्रतिदिनी, 400 लोक प्रतितास, 7 जण प्रतिमिनिट). अन्‍य स्रोतांच्‍यानुसार हा आकडा 8,00,000 आहे. 3,00,000 तुत्‍सी वाचले. हजारो स्त्रिया विधवा झाल्‍या. त्‍यातल्‍या पुष्‍कळांना बलात्‍काराला सामोरे जावे लागले होते. अनेक बलात्‍कार अशा विटंबना करुन झाले की ब-याच जणी त्‍याचवेळी मेल्‍या. जिवंत बलात्‍कारितांपैकी बहुतेकांना आता एड्सने वेढले आहे. 4 लाख मुले अनाथ झाली. ज्‍या शाळांमध्‍ये, चर्चमध्‍ये तुत्‍सी जीव वाचवण्‍यासाठी लपले होते, अशा अनेक शाळा, चर्चेस आता त्‍यांच्‍या सांगाड्यांची, कवट्यांची म्‍युझियम्‍स झाली आहेत.

या भयानक वेडाचाराला आळा घालण्‍याचा काहीच प्रयत्‍न देशात झाला नाही. उलट मारेक-यांना प्रोत्‍साहन देण्‍याचा, सर्वतोपरी शस्‍त्रांचे सहाय्य देण्‍याचा, तुत्‍सींचा ठावठिकाणा सांगायला सरकारी यंत्रणाच सज्‍ज होती. आकाशवाणीवरुन तुत्‍सी झुरळांना चिरडण्‍याचे आवाहनच केले जायचे. या रणकंदनावेळी जगाची, युनोचीही स्थिती जवळपास बघ्‍यासारखी होती. यावर नियंत्रण घालण्‍याचे परिणामकारक प्रयत्‍न बाहेरुनही झाले नाहीत. त्‍यातल्‍या त्‍यात उशीरा का होईना पण फ्रान्‍सच्‍या हस्‍तक्षेपानेच थोडाफार परिणाम साधला गेला. त्‍यांनी उभारलेल्‍या छावण्‍यांतून तुत्‍सी निर्वासितांना आधार मिळाला.

इबॅगिझा या तुत्‍सी कुटुंबातील इम्‍याक्‍युली ही 24 वर्षांची युवती. वंशसंहार सुरु झाल्‍यावर वडील तिला त्‍यांच्‍या एका हुतू मित्राकडे जाऊन लपायला सांगतात. ती तयार नसते. पण तरुण मुलींना दंगलखोर काय रीतीने वागवतात, हे बापाला ठाऊक असल्‍याने तो आग्रहच करतो व इम्‍याक्‍युली अखेर घरातून निघते. तिची लपण्‍याची जागा म्‍हणजे त्‍या घरातील एक पटकन लक्षात न येणारे ओले, कोंदट बाथरुम. 3 फूट रुंद व 4 फूट लांब एवढी ही अरुंद जागा. त्‍यात आधीच 7 जणी लपलेल्‍या. सगळ्या जणी एकावेळी खाली बसूही शकत नव्‍हत्‍या अशा या जागेत इम्‍याक्‍युली तब्‍बल 91 दिवस राहिली. बाथरुमच्‍या बाहेरचे जग या काळात तिने पाहिलेच नाही. बाहेर हुतू मारेकरी सुरे परजत आरोळ्या ठोकत असलेले ऐकू येई. ते कधी ती लपलेल्‍या घरावर थापा मारत, मालकाला दम देत, घर आतून तपासत. तिच्‍या नावाने ओरडत. पण त्‍यांना ते बाथरुम काही लक्षात येत नसे. अशा अवस्‍थेत मोठ्याने बोलायचे नाही, बाथरुममधल्‍या पाण्‍याचाही आवाज होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी लपलेल्‍यांना घ्‍यावी लागे. घरमालकानेही स्‍वतः मृत्‍यूवर उदार होऊनच यांना आधार दिलेला असतो.

बाहेरच्‍या थापा, आपण सापडलो तर आपल्‍यावर बलात्‍कार होणार, आपण मारले जाणार या भयाने उसासणारी, थरकापणारी, हाडांचा सापळा झालेली इम्‍याक्‍युली हळू हळू ईश्‍वराशी संवाद साधू लागते. तिचे उसासे, थरकाप, भय, चीड एका निरव शांततेत परिवर्तीत होऊ लागते.

आणि याचवेळी फ्रान्‍सचा हस्‍तक्षेप झाल्‍याचे व त्‍यांनी छावण्‍या उघडल्‍याचे कळते व इम्‍याक्‍युली जवळच्‍या छावणीत जाण्‍याचा निर्णय घेते. हिंमतीने घराच्‍या बाहेर पडते. प्रदीर्घ काळ अवघडून राहिल्‍याने व ताकदच संपल्‍याने तिला प्रथम धड उभेच राहता येईना. हळू हळू ताकद एकवटून ती रांगत, धडपडत फ्रेंच छावणीत दाखल होते. सुटकेचा निःश्‍वास टाकते.

आता आपल्‍या घरच्‍यांची माहिती घेऊ लागते. तेथील रजिस्‍टरमधली नावे आतुरतेने वाचायला लागते. अन् वडील, आई, भाऊ एक एक करुन सगळे कुटुंबीय केवळ मारले नव्‍हे, तर क्रूरपणे ठार केले गेल्‍याचे तिला समजते. एका भयाण पोकळीच्‍या विवरात ती कोसळत जाते. तिच्‍या कुटुंबात ती आता एकटीच शिल्‍लक असते. तिचा ईश्‍वराशी चाललेला संवाद तिला बहुधा ताकद देऊन उभी करतो. तिच्‍या कुटुंबीयांना ठार मारलेल्‍याला बघायचे आहे का, म्‍हणून तिला विचारले जाते व त्‍या मारेक-यास तिच्‍या समोर आणले जाते. ती शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या थकून गेलेली आहे, गळून गेलेली आहे. आता तिने काय करायचे ? त्‍यास काय म्‍हणायचे ?

...ती एवढेच म्‍हणते, मी तुला क्षमा करते.

वास्‍तव आणि नाटक इथे संपते. वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीने Left to Tell: Discovering God Amidst the Rwandan Holocaust (2006) हे पुस्‍तक लिहून हा सगळा घटनाक्रम नोंदवला आहे. लेस्‍लीने त्‍याचे मिरॅकल इन रवांडा हे नाटक केले. ते करण्‍यासाठी ती स्‍वतः वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीबरोबर रवांडात हिंडली. घटनाक्रमातली माणसे, स्‍थळे समजून घेतली. इम्‍याक्‍युलीच्‍या मनाशी, तिच्‍या जाणिवांशी, संवेदनांशी एकरुप झाली. ते ती जणू स्‍वतः जगली. नाटक तिने लिहिले व नाटकात तिनेच काम केले.

नाटक लिहिले, काम केले असे म्‍हणणे खरे म्‍हणजे बरोबरच नाही. ती लेस्‍ली राहिलीच नाही. संहितेत आणि प्रयोगात ती इम्‍याक्‍युलीच होती. तिला कोणी बनावे लागलेच नाही. लेस्‍ली आणि इम्‍याक्‍युली या अभिन्‍न, एकच होत्‍या. रवांडातला अख्‍खा वंशसंहार त्‍याच्‍या अमानुष क्रौर्यासहित लेस्‍लीने रंगमंचावर एकटीने उभा केला. प्रत्‍यक्षातला इम्‍याक्‍युलीचा काळजीत पडलेला बाप, लपायला आधार देणारा हुतू घरमालक, आरोळ्या ठोकत धिंगाणा घालणारे हुतू मारेकरी, छावणीतला फ्रेंच सैनिक, तिच्‍या कुटुंबीयांचा मारेकरी या सर्वांना लेस्‍लीनेच आपल्‍या प्रचंड ताकदीच्‍या अभिनयाने सजीव केले. प्रेक्षकांना त्‍या सर्व थराराचा जिवंत प्रत्‍यय दिला.

लेस्‍ली हे नाटक घेऊन जगभर हिंडते आहे. त्‍याच्‍या तिकिटांतून येणा-या पैश्‍यांतला एक हिस्‍सा रवांडातल्‍या अनाथ मुलांच्‍या संगोपनासाठी खर्च होणार आहे (A portion of all ticket sales is donated to Orphans Of Rwanda), असे या नाटकाच्‍या वेबसाईटवरील आवाहनात छापलेले आहे. तिने स्‍वतः रवांडातील दोन मुले दत्‍तक घेतली आहेत.

एवढेच नव्‍हे, या नाटकाच्‍या वेबसाईटवर तिने असेही आवाहन केले आहे If your theater or organization is interested in bringing this incredible message of forgiveness to your area, please contact us!

हा क्षमाशीलतेचा संदेश तिला महत्‍वाचा वाटतो व त्‍याचा प्रसार जगभर ती करु पाहते आहे. विलक्षण ताकदीची अभिनेत्री अन् त्‍याहून मोठी जग सुंदर, मानव्‍यपूर्ण करु इच्छिणारी कार्यकर्ती ! या कार्यकर्तीच्‍या कोंदणामुळे तिच्‍यातली अभिनेत्री खुलून दिसते.

नाटकाच्‍या शेवटी जो प्रचंड टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांकडून झाला त्‍यास तिने हसू आणि आसू भरल्‍या मुद्रेने प्रतिसाद दिला. केवळ कलाकार ती असती तर हसू पुरेसे होते. शेवटी भेटायला गेलेल्‍या एका कार्यकर्तीशी बोलताना नाटकाचा संदेश -क्षमेचा- खरेच लोकांपर्यंत पोहोचला का ?’ हा प्रश्‍न तिला विचारावासा वाटला.

कलेने निःसंशय संदेश द्यायचा असतो. अर्थात, तो प्रचारकी पद्धतीने नव्‍हे, तर त्‍याहून अधिक सशक्‍त, प्रत्‍ययकारी मार्गाने म्‍हणजे कलात्‍मकतेने. मानवी जीवनात सौंदर्य, समृद्धता निर्माण करणे, हेच तर कोणत्‍याही कलेचे अंतिम लक्ष्‍य असते.

नाटक पाहत असताना आपल्‍या देशांतील फाळणीपासून, गुजरातपर्यंतच्‍या हिंदू-मुस्लिम दंगली समोर येत होत्‍या. बाबरी मशिदीच्‍या विध्‍वंसानंतरची दंगल तर अगदी जवळून, म्‍हणजे तिच्‍यात वावरुनच अनुभवली होती. 93 च्‍या जानेवारीतील दंगलीत शिवाजी नगर, धारावीत मी पाहिलेली माणसे मला 94 च्‍या रवांडाच्‍या वंशसंहारात त्‍याच वृत्तीप्रवृत्‍तींसह आढळली.

रवांडातली इम्‍याक्‍युली अमेरिकेतील फिलिपिनी लेस्‍ली मुंबईच्‍या रंगमंचावर साकार करते आणि क्षमेनेच द्वेषाचे उच्‍चाटन होणार आहे, हा बुद्ध, ख्रिस्‍त, गांधी, मार्टिन ल्‍यूथर, मंडेला आदिंनी दिलेला अखिल मानवी संदेश देते. या त्‍याच्‍या व्‍यापक मानव्‍याच्‍या मध्‍यवर्तीत्‍वामुळेच मंचकावरील नाट्य माझ्याही मनात सुरु होते. इम्‍याक्‍युली, लेस्‍ली आणि मी वेगळ्या देशांचे नव्‍हतोच. आम्‍ही एकाच पृथ्‍वी ग्रहावरचे मानव वंशाचे सदस्‍य होतो.

जगात आजही फार फार वाईट वागणारे लोक आहेत. ते स्‍वतःच्‍याच मानवी वंशाच्‍या सदस्‍यांच्‍या कत्‍तली करत आहेत, दुस-यांना मारण्‍यासाठी स्‍वतःलाही बॉम्‍बने उडवत आहेत. आपल्‍याच मानवी वंशाच्‍या दुस-या व्‍यक्‍तीचा धर्म, जात, प्रदेश, देश, भाषा वेगळी आहे, म्‍हणून अपरंपार द्वेष करत आहेत. या सगळ्यामुळे मला असुरक्षित वाटते, माझे मित्र, माझी घरची माणसे यांच्‍या सुरक्षिततेबद्दल मला काळजी वाटते. केवळ लिंगाच्‍या फरकामुळे स्त्रियांशी होणारा विषम, अवमानकारक व्‍यवहार पाहिला की अस्‍वस्‍थ व्‍हायला होते. खूप मोठे लोक हा समाज, जग सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करुन गेले, तरी अजून जग पूर्ण मोकळा श्‍वास घेऊ शकत नाही. या जाणिवेने मी उदास होतो. हतबल झाल्‍यासारखेही वाटते.

...पण मग असे काही वाचले, पाहिले, ऐकले, केले की मिरॅकल होते. मन उभारी धरते. रंध्रारंध्रातून ऊर्जा प्रसवायला लागते. मन शांत होते. वैश्विक अणू-रेणूंशी माझी तादात्‍म्‍यता साधली जाते. एकाकीपण दूर होते. वाईटापेक्षा जग चांगले करणा-यांचा प्रवाह अधिक ओजस्‍वी, तेजोपुंज व दमदार आहे, याची प्रचिती येते.

मिरॅकल इन रवांडाने हेच माझ्या बाबतीत केले.

म्‍हणूनच सुरुवातीला म्‍हटल्‍याप्रमाणे या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही.

- सुरेश सावंत

Wednesday, November 4, 2009

रेशनिंग कृती समितीतील सहभागामागची माझी भूमिका

हा लेख नव्‍हे; चर्चेसाठीचे स्‍वैर टिपण आहे

मी रेशनिंग कृती समितीचा संस्‍थापक नाही. 88 ते 93 पर्यंत प्रासंगिक सहभाग व 94 पासून अधिक क्रियाशील. 98 ते जून 2008 या काळात पूर्णवेळ काम. सध्‍या मदतनीस.

उद्दिष्‍टे

रेशनिंग कृती समितीच्‍या कामात सहभाग घेतानाची माझ्या मनातली उद्दिष्‍टे अशीः

भांडवली लोकशाही क्रांतीच्‍या टप्‍प्‍याची पूर्तता हे व्‍यापक ध्‍येय

लोकशाही अर्थपूर्ण करण्‍यासाठी जनतेची सिद्धता

चळवळींच्‍या परस्‍परावलंबित्‍वाची, परस्‍परपरिणामकारकतेची, समग्रतेची जाणीव देणे

या उद्दिष्‍टांचा काही भाग सहभागापूर्वी मनात होता. काही सहभागादरम्‍यान विकसित झाला. या उद्दिष्‍टांचे स्‍वरुप पाहता साहजिकच प्रश्‍न सुटण्‍याऐवजी तो सुटण्‍याच्‍या प्रक्रियेला माझ्याकडून अधिक महत्‍व दिले गेले. प्रश्‍नाचा अभ्‍यासही त्‍या कक्षेत व प्रासंगिक राहिला. रेशनची एकूण व्‍याप्‍ती, त्‍यातले सर्व तपशील, अन्‍न अधिकाराचा व्‍यापक पट या बाबी माझ्यादृष्‍टीने दुय्यम राहिल्‍या.

संघटना

संघटनेचे प्रकार व निर्णयप्रक्रियाः

1. पक्षसंघटना/राजकीय संघटना- राजकीय शिक्षणाचे, आकलनाचे, विश्‍लेषणाचे व दिशादिग्दर्शनाचे केंद्र. येथील निर्णयप्रक्रिया लोकशाही केंद्रीकरणाची.

2. पक्ष आघाडी- विशिष्‍ट प्रश्‍नावर काम करणा-या पक्षकार्यकर्त्‍यांच्‍या विचारविनिमयाची पक्षांतर्गत समिती. (उदा. विविध कामगार संघटनांत काम करणा-या पक्षकार्यकर्त्‍यांची कामगार आघाडी, सांस्‍कृतिक प्रश्‍नावर विविध ठिकाणी काम करणा-या पक्षकार्यकर्त्‍यांची सांस्‍कृतिक आघाडी) या आघाडीत जनसंघटनेत मांडावयाच्‍या धोरणाची निश्चिती होते. अर्थात जनसंघटनेत तेथील एक कार्यकर्ता म्‍हणून तो कार्यकर्ता हे धोरण आपले व्‍यक्तिगत मत म्‍हणून मांडेल. ते जनसंघटनेत मान्‍य होईल, दुरुस्‍त होईल. कदाचित अव्‍हेरले जाईल. जनसंघटनेचे धोरण हे त्‍या जनसंघटनेतील सदस्‍यांच्‍या लोकशाही निर्णयप्रक्रियेने ठरेल. त्‍याचा पूर्ण मान राखून राजकीय कार्यकर्त्‍याने तेथे पक्षनिरपेक्षच व्‍यवहार केला पाहिजे. आपले मत स्‍वतःच्‍या नैतिक अधिकाराचा वापर करुन, वकिली युक्तिवादाने, गटबाजी करुन लादता कामा नये.

3. जनसंघटना- विशिष्‍ट प्रश्‍नासाठी समाजातल्‍या त्‍या प्रश्‍नाची झळ लागलेल्‍या तसेच त्‍या प्रश्‍नाविषयी आस्‍था असलेल्‍या व्‍यक्‍तींनी घेतलेले संघटनात्‍मक रुप. या व्‍यक्‍ती विविध राजकीय मतांच्‍या अथवा केवळ सत्‍प्रवृत्‍त असू शकतात. येथील निर्णयप्रक्रिया लोकशाही पद्धतीने 1) बहुमत 2) सहमती अथवा 3) एकमत या प्रकारे होते.

बहुमत ही बांधेसूद संघटनांत निर्णयप्रक्रिया असते. ट्रेड युनियन किंवा नोंदणीकृत संस्‍थांत ती अवलंबतात. सहमती ही निर्णयप्रक्रिया अनेक संघटनांच्‍या सैलसर फेडरेशनमध्‍ये, जिथे मतांची विविधता असते, अवलंबतात. सर्वांचा मिळून निर्णय होत नसेल, तर काहींनी आपले वेगळे मत नोंदवून पण सर्वसाधारणपणे बहुसंख्‍यांच्‍या मतास मान्‍यता द्यायची असते. एकमत म्‍हणजे मतभिन्‍नता असलेले सर्व लोक एकमतात येईपर्यंत निर्णय न घेणे अथवा जिथवर पूर्ण सहमती आहे, त्‍या किमान पातळीपर्यंतचाच निर्णय घेणे. फेडरेशन, समन्‍वय समित्‍या या अधिक सैल असलेल्‍या संघटनांमध्‍ये ही प्रक्रिया अवलंबली जाते. (जायला हवी)

रेशनिंग कृती समितीत किमान समजावर आधारित किमान सहमती हे सूत्र आजवर अवलंबले गेले आहे. एकमतावर अधिक भर दिला गेला.

निधी

संघटना चालवायला चळवळ करायला निधी, संसाधने लागतातच. वर्गणी, देणगी (पैश्‍यांत अथवा वस्‍तूंत) या मार्गाने संसाधने जमा होतात. माझी या संदर्भातली भूमिका महात्‍मा गांधींनी माझ्या आधीच मांडली होती. मला ती अलिकडे कळली. ती अधिक नेमकेपणाने मांडल्‍याने तीच खाली उद्धृत करत आहेः

अनेक सार्वजनिक संस्‍था सुरु करुन त्‍यांची व्‍यवस्‍था चालविण्‍याच्‍या जबाबदारीचा अनुभव घेतल्‍यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो, की कोणत्‍याही सार्वजनिक संस्‍थेने कायम फंडावर गुजारा करण्‍याचा प्रयत्‍न करु नये. तसे करण्‍यामध्‍ये तिच्‍या अधोगतीचे बीज साठविलेले आहे.

सार्वजनिक संस्‍था म्‍हणजे लोकांची मान्‍यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्‍था. अशा संस्‍थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल तेव्‍हा तिला अस्तित्‍वात राहण्‍याचा हक्‍कच राहत नाही. कायम फंडावर चालणा-या संस्‍था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्‍येक वेळा धडधडीत लोकमताविरुद्ध आचरण करताना दृष्‍टीस पडतात. ...त्‍यांचे व्‍यवस्‍थापक त्‍यांचे मालक होऊन बसतात. सृष्‍टी ज्‍याप्रमाणे रोजचे अन्‍न रोज तयार करुन खाते, त्‍याप्रमाणे सार्वज‍निक संस्‍थांचे असले पाहिजे, याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. ज्‍या संस्‍थेला लोक मदत करण्‍यास तयार नाहीत, त्‍या संस्‍थेला सार्वजनिक संस्‍था म्‍हणून जगण्‍याचा अधिकारच नाही. प्रति‍वर्षी लोकवर्गणीतून मिळणारा फंड ही त्‍या संस्‍थेच्‍या लोकप्रियतेची (मान्‍यतेची) व तिच्‍या व्‍यवस्‍थापकांच्‍या प्रामाणिकतेची कसोटी आहे; आणि प्रत्‍येक संस्‍थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, असा माझा अभिप्राय आहे.

या माझ्या लिहिण्‍याविषयी गैरसमज होऊ नये. ज्‍या संस्‍थांना इमल्‍याची वगैरे जरुर लागते, अशा संस्‍थांना वरील टीका लागू पडत नाही. सार्वजनिक संस्‍थांच्‍या दैनंदिन खर्चाचा आधार स्‍वेच्‍छेने मिळालेली वार्षिक लोकवर्गणी हाच असला पाहिजे.

(स्रोतः सत्‍याचे प्रयोग अथवा आत्‍मकथा, महात्‍मा गांधी, पान 187-188)

माझ्या मते, संसाधन केंद्रे किंवा संशोधन करणा-या संस्‍थांना, अभ्‍यासक व्‍यक्‍तींना वरील बाब लागू नाही. रेशनिंग कृती समितीने जर खरोखरीचे संसाधन केंद्र अथवा संशोधन केंद्र सुरु केले, तर त्‍यासाठी नियमित निधी असावाच लागेल. तथापि, रेकृसची चळवळ ही महात्‍मा गांधी म्‍हणतात त्‍याप्रमाणे लोकवर्गणीतूनच चालली पाहिजे. या लोकवर्गणीसोबत सहानुभूतिदारांच्‍या देणग्‍याही चालतील. (पण लोकवर्गणी मुख्‍य, देणग्‍या पूरक). जेवढी वर्गणी मिळेल, तेवढीच चळवळ होईल. मिळालीच नाही, तर चळवळ थांबेल. किंवा घरचे खाऊन विनामोबदला जे वेळ देतील, त्‍यांच्‍या बळावर-वेळावर जेवढी चालायची तेवढी चालेल. तरच तिला आत्‍मगती प्राप्‍त होईल. आजच्‍या रुढ एनजीओ फंडिंग पॅटर्नचा आधार उत्‍प्रेरक म्‍हणून काही काळ ठीक. पण लवकरात लवकर तिला लोकवर्गणीवरच जाणे भाग आहे. अन्‍यथा आत्‍मगती नसलेला तो चळवळीचा आभास, केवळ उपचार होईल.

काही विभाग पुरेशी अथवा सुरुवातीलाच वर्गणी देऊ शकत नाहीत, अशावेळी दुस-या एखाद्या लोकवर्गणीतून चालणा-या संघटनेने त्‍या विभागाच्‍या चळवळीसाठी सहाय्य करायला हवे. उदा. संघटित कामगार संघटनांनी शेतमजुरांच्‍यात, असंघटित कामगारांच्‍यात काम करणा-या पूर्णवेळ कार्यकर्त्‍यांच्‍या मानधनाचा-खर्चाचा भार उचलणे. मात्र ज्‍यांची चळवळ करायची त्‍यांच्‍याकडून नाममात्र का होईना पण वर्गणी घ्‍यायचीच. ज्‍यांची चळवळ करायची आहे, त्‍यांचे तन, मन व धन या तिन्‍ही गोष्‍टी चळवळीत पायाभूत महत्‍वाच्‍या आहेत.

संघटना/चळवळ बांधणीची सूत्रे-पथ्‍ये

रेशनिंग कृती समितीत संघटनात्‍मक तसेच चळवळीचा व्‍यवहार करताना खालील सूत्रे/पथ्‍ये पाळण्‍याचा माझा कसोशीचा प्रयत्‍न राहिला आहेः

  • लोकसिद्धता
  • पक्षनिरपेक्षता
  • किमान समजावर आधारित किमान सहमती
  • विरोधी मताचा पूर्ण आदर व संरक्षण
  • व्‍यक्तिकेंद्रितता अथवा गटबाजीला पूर्ण विरोध
  • संघर्ष व्‍यवस्‍थेशी-व्‍यक्‍तीशी नाही, या भूमिकेने अधिकारी-दुकानदारांशी, पोलिसांशी, विरोधकांशी वागणे (औद्धत्‍य अथवा खुशामत दोन्‍हीस नकार)
  • मोर्च्‍याच्‍या वेळी निर्णयाचा अधिकार, शिष्‍टमंडळातील सहभाग, भाषणाची संधी संख्‍याबळावर अवलंबून नाही.
  • प्रत्‍येक माणूस त्‍याच्‍या अंगच्‍या चांगल्‍या गुणांमुळे टिकतो, अन् प्रत्‍येकात कमी-अधिक असे गुण असतातच, यावर विश्‍वास.
  • समग्रता, परस्‍परावंबित्‍व व परस्‍परपरिणामकारकतेची जाणीव वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने चर्चा, अन्‍य चळवळींशी सहकार्य व व्‍यापक एकजुटीचे प्रयत्‍न.


वरील भूमिकेच्‍या पार्श्‍वभूमीवर रेशनिंग कृती समितीच्‍या खालील प्रवासाची चर्चा मला अभिप्रेत आहे.

रेकृसचा प्रवास

(हा प्रवास प्रश्‍न, संघटना व चळवळ या तिन्‍ही अंगांनी पाहिला पाहिजे.)

v रेकृसच्‍या जन्‍मकाळाच्‍या प्रेरणा

(याबद्दल मला स्‍पष्‍टता नाही)

v टप्‍पे

    1. 1988 ते 93
    2. 1994 ते 1998
    3. 1998 ते 2008
    4. 2008 ते पुढे

v नमुन्‍यादाखल काही लढे

    • भुसा मोर्चाः सीलबंद सँपल
    • अंमलबजावणीसाठी संघर्षः धारावी, अपना बाजार
    • पामतेल
    • एकाच दिवशी एकच पावती हा नियम नाही.
    • तक्रार वहीः कटोरी हटाओ-सील्‍ड सँपल दिखाओ
    • दुकानावर पिकेटिंगः सांताक्रूझ
    • रेशन दुकानदारांच्‍या बैठका
    • अंत्‍ययात्रा
    • रॉकेलः वजनमाप अधिका-यांचा वापर
    • लाचलुचपत अधिका-यांचा वापर

v लढ्याच्‍या पातळ्या

n रेशन दुकान/वस्‍ती

¨ जागृती बैठका

¨ दुकान बैठका

¨ गट/संघटन बांधणी

¨ दुकानावर हक्‍क बजावणी

¨ वस्‍तीतले/गावातले अंतर्विरोध

Ø दुकानदार व लोकांचे अवलंबित्‍व

Ø दुकानदार, राजकीय कार्यकर्ते व लोक (वाशीनाका अग्रवाल व रिप. कार्यकर्ते)

Ø गट/मंडळातील पदाधिकारी महिलांशी साम, दाम, दंड, भेदाचा प्रयोग

n रेशन कार्यालये

¨ रेशन कार्डांची कामे व दुकानदाराच्‍या तक्रारी

¨ मुदतबंद व लेखी उत्‍तर मागणारा अर्ज

¨ उत्‍तर न आल्‍यास सामुदायिक शिष्‍टमंडळ, धरणे, सत्‍याग्रह, मोर्चे

¨ वरच्‍या अधिका-यांशी संपर्क

n शासन

¨ धोरण व अंमलबजावणीसंबंधीच्‍या नव्‍या पद्धती

¨ उदा. स्‍थलांतरित मजूर, असंघटित कामगार, परित्‍यक्‍ता यांची कार्डे

¨ कार्डधारकांनी रांग लावून जाणे, धरणे, मोर्चे

n विधिमंडळ

¨ प्रश्‍न मांडणे उदा. केरोसीन वेळापत्रक, सीलबंद सँपल, विडी कामगार

n न्‍यायालये

¨ उच्‍च न्‍यायालय (इष्‍टांक)

¨ सर्वोच्‍च न्‍यायालय(पीयूसीएल, बेघर, अंत्‍योदय इ.)

- सुरेश सावंत

4 नोव्‍हेंबर 2009