Wednesday, October 29, 2025

संघाची शंभरी


या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभरी. संघाची शंभरी भरली नव्हे; तर संघाने शंभरी गाठली. मराठीत शंभरी भरणे आणि गाठणे याचे वेगळे अर्थ होतात. १९२५ पासून संघाच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. शंभरीत येताना तो अधिक जोमाने व ताकदीने मुसमुसतो आहे. त्यामागे संघाची वैचारिक दृढता, ध्येयाची स्पष्टता, त्यासाठीची अखंडित उपक्रमशीलता, प्रचारक-स्वयंसेवकांची चिवट निष्ठा, अपार कष्ट आहेत. पण तेवढेच नव्हे; ज्याला रणनीती वा डावपेच म्हटले जाते, त्यांची काहीही विधिनिषेध न ठेवता अंमलबजावणी, ओठावर एक व पोटात एक, बोलायचे एक व करायचे निराळे पद्धतीचा व्यवहार याचा यात मोठा वाटा आहे. लोकशाही-पुरोगामी शक्तींमधली फूट, त्यांचा बेसावधपणा आणि आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविण्यातली आत्यंतिक ढिलाई ही तरफ संघपरिवाराच्या उड्डाणाला सर्वाधिक मदतनीस ठरली. नरेंद्र मोदी संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. स्वयंसेवक तर आताही ते आहेतच. बाहेर अनेकदा त्यांनी संघाची प्रशंसा केली आहे. मात्र पंतप्रधान या नात्याने मोदींनी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात संघाच्या शंभरीचा गौरवपूर्ण उल्लेख करुन एकप्रकारे त्यास राष्ट्रातर्फे मानवंदनाच दिली. स्वातंत्र्य आंदोलनात संघाचा सहभाग नव्हता. उलट त्यासाठी लढणाऱ्यांशी त्याचे वाकडे होते. अशा संघावर स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधानांनी लाल किल्ल्य्यावरुन देशाला संबोधित करताना स्तुतिसुमने उधळणे हे त्या दिवसाला कलंकित करणे आहे. गांधीहत्येनंतर वळचणीला पडलेल्या संघाची ही धाव त्या काळापासूनच्या साक्षीदारांना निश्चित अचंबित करणारी आहे.

याच शंभरीच्या निमित्ताने ऑगस्टच्या अखेरीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सलग तीन व्याख्याने ‘संघाचा १०० वर्षांचा प्रवास : नवे क्षितीज’ या विषयावर झाली. हा कार्यक्रम देश तसेच जगासमोर संघाची भूमिका मांडण्यासाठी होता. विविध क्षेत्रातील नामवंत, प्रतिष्ठितांना त्यासाठी निमंत्रित केले गेले होते. त्यात विदेशातील संस्था व माध्यमांचे प्रतिनिधी लक्षणीय संख्येने होते. ही व्याख्याने आणि प्रश्नोत्तरे यांतून प्रकटणारा मोहन भागवतांचा आत्मविश्वास संघाच्या शंभर वर्षांत वाढलेल्या ताकदीला साजेसा होता. वाढत्या ताकदीने खरा नेता अभिनिवेशी होत नाही. आवेशाने बोलत नाही. अधिक धीरगंभीर होऊन तो आपली बाजू व भविष्याची दिशा मांडतो. मोहन भागवतांची भाषणे व त्यांचा नूर या प्रकारचा होता. जे त्यांनी मांडले, जी उत्तरे दिली ती आजच्या क्षितिजावर उठून दिसतील अशी. संघावरच्या आजवरच्या आक्षेपांना इतिहास करुन टाकणारी. इंद्रधनुषी सपकाऱ्यांनी या आक्षेपांचे ढग निस्तेज करणारी. ज्या सत्तेसाठी शंभर वर्षे संघ झुंजला, ती ताब्यात आली. आता खरी विषयपत्रिका राबवायची आहे. त्याला सुरुवात झालीच आहे. तथापि, भारताचा मूळ स्वभाव असलेली विविधता, सर्वसमावेशकता आणि त्यांस ताकद देऊन त्यात नव्या मूल्यांची भर घालणारा राजकीय स्वातंत्र्याचा लढा, त्या आधीपासून सुरु झालेला व स्वातंत्र्य चळवळीला समांतर चाललेला सामाजिक सुधारणांचा संगर आणि त्याला कोंदण राहिलेला जगभरच्या मानवतेचा संघर्ष या विषयपत्रिकेच्या आड येत राहतो. त्याचे काय करायचे, हे आव्हान संघासमोर आहे. त्यामुळे राजकीय सत्ता आली, बहुसंख्य समाज आपल्या विचारांच्या घेऱ्यात आला यावर केवळ आपण टिकू शकणार नाही, याचे संघाला भान आहे. मोहन भागवत यांची तीन व्याख्याने किंवा अलिकडे ते जे जागोजागी बोलत आहेत, ते हे ध्यानात घेऊन. ज्यांना लोकशाही वा आधुनिक मूल्ये म्हटले जाते तेच आम्ही म्हणत आलो आहोत, हा आभास तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संघाच्या इतिहासातील न पचणाऱ्या ठळक बाबी काळानुसार आम्ही बदलतो आहोत, असे जाता जाता न चुकता ते सांगतात. मात्र काय होतं आणि काय बदललं याची स्पष्टता देत नाहीत. आत्मचिकित्सा, आत्मटीका वगैरे काही करत नाहीत.

लोकशाही-पुरोगामी शक्तींनी इथेच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. संघाच्या बदलत्या रुपांवर टीका करताना या रुपांमागचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा लागेल. ते करताना त्यांचा व्यवहार दाखवावा लागेल. करणी आणि कथनी कशी वेगळी आहे, हे समजवावे लागेल. खरे तर लोकशाही-पुरोगामी शक्तींचे हे नित्याचेच काम आहे. संघाच्या शंभरीच्या निमित्ताने ते अधिक जोरात करायला हवे. त्यादृष्टीने संघाच्या इतिहासाचा, त्याच्या पूर्वसुरींच्या विचार- व्यवहाराचा मागोवा घ्यायला हवा. या लेखात तोच प्रयत्न करतो आहे. तो करताना एका अत्यंत विस्तृत पटाला नेमके करण्यासाठी ज्यांवर प्रामुख्याने संघपरिवार आघात करत आहे, त्या भारतीय संविधानातील मूल्यांची कक्षा या प्रयत्नासाठी आखून घेतो आहे. अर्थात, संविधान ज्या राजकीय तसेच सामाजिक लढ्यांतून उत्क्रांत झाले, त्यांना असलेला संघाचा प्रतिसाद हा त्याचा अपरिहार्य घटक राहणारच आहे. लेख दीर्घ असला तरी विषयाचा आवाका लक्षात घेता त्यातील मुद्दे मर्यादितच असणार आहेत. ज्यांचा मागोवा घ्यावा अशा असंख्य बाबी सोडाव्या लागणार आहेत.

संघाचा उदय, स्वरुप व परिवार

इंग्रजी सत्तेने भारतात सुरु केलेल्या इंग्रजी शिक्षणातून युरोप-अमेरिकेतल्या क्रांत्या, तेथील लोकशाही, समता आदि मूल्यांचा परिचय ज्या वर्गाला इथे झाला, त्यातून हे सगळे आमच्या इथे का नाही, असा प्रश्न विचारणारे तयार झाले. एक प्रवाह इथल्या सामाजिक विषमतेविरोधातल्या लढ्याला प्राधान्य देऊ लागला तर दुसरा राजकीय स्वातंत्र्य प्रथम हवे असे म्हणू लागला. या दोन्ही लढ्यांतून ज्या मूल्यांचा व रचनेचा आग्रह धरला जाऊ लागला, त्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार होते, तो वर्ग सजग झाला. जातव्यवस्थेच्या उतरंडीतले वरचे थर तसेच जमीनदार, संस्थानिक एकजुटीत येऊ लागले. जैसे थे रचना त्यांना सोयीची असल्याने राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या बाजूने ते नव्हते. यांच्यातला अधिक दूरदर्शी असलेला एक विभाग होता, ज्याला उद्या इंग्रज जाऊन लोकशाही शासन येणार हे दिसत होते. त्याने उद्याच्या लोकशाही शासनात आपणच सूत्रधार कसे राहू या उद्देशाने स्वातंत्र्य आंदोलनाशी व इंग्रजांशी सोयीने संबंध ठेवले.

‘हिंदू महासभा’ ही या विभागात मोडणारी संघटना. हिंदू राष्ट्राचे ध्येय बाळगून १९१५ साली तिची स्थापना मदन मोहन मालवीय यांनी केली. अनेक प्रवाहांना सामावून स्वातंत्र्य चळवळीची मुख्य वाहक झालेल्या काँग्रेस अंतर्गत हिंदूंचा दबाव गट म्हणून तिने काम सुरु केले. वि. दा. सावरकर हे तिचे आणखी एक मोठे नेते. १९२३ साली हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या साहित्य निर्मितीसाठी हनुमान प्रसाद पोद्दार यांनी ‘गीता प्रेस’ व नंतर ‘कल्याण’ मासिक सुरु केले. काँग्रेस व हिंदू महासभेशी संबंधित असलेल्या केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना केली. ते त्याचे पहिले सरसंघचालक. माधव गोळवलकर (गोळवलकर गुरुजी) हे दुसरे सरसंघचालक. बाळासाहेब देवरस तिसरे, राजेंद्र सिंग चौथे, के. एस. सुदर्शन पाचवे आणि आताचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत हे सहावे. या हिंदुत्ववादी प्रवाहांचे लक्ष्य एकच होते – हिंदू राष्ट्र. मात्र त्याकडे जाण्यासाठी विविध साधने म्हणून त्यांची अस्तित्वे वेगळी होती. मतांच्या काही भिन्न रेषा त्यांच्यात होत्या. मात्र त्या मूलभूत नव्हेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि हिंदू महासभा यांच्यातील मुख्य फरक म्हणजे RSS चे गुप्त स्वरूप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सैनिकी शिस्त. निर्णय प्रक्रिया एकचालकानुवर्ती, आदेशात्मक. स्वतंत्र भारतातही तेच स्वरुप संघाचे आहे. आपण संविधानाद्वारे लोकशाही गणराज्य पद्धती स्वीकारली. त्याप्रमाणे राजकीय शासन प्रणालीत आणि सार्वजनिक संस्थांत निवडणुकीने पदे भरण्याची रीत आपण अवलंबतो. या पदावर राहण्याची कालमर्यादाही असते. ती ओलांडल्यावर जावे लागते किंवा पुन्हा निवडून यावे लागते. संघाचा सर्वोच्च प्रमुख सरसंघचालक हा आजन्म किंवा तो स्वतःहून बाजूला होईपर्यंत त्या पदावर राहतो. आधीचा सरसंघचालक जिवंत व त्या पदावर असतानाच आपला वारसदार ठरवतो. ७५ वर्षांनंतर निवृत्त होण्याच्या भागवतांच्या एका पूर्वीच्या विधानाचा हवाला देऊन तुम्हाला व मोदींना ७५ वर्षे झाली, तुम्ही आपल्या पदांवरुन निवृत्त होणार का, असा प्रश्न दिल्लीच्या कार्यक्रमात भागवतांना विचारण्यात आला. त्यावेळी ते मत माझे नव्हते, असे सांगून मी मरेपर्यंत संघात राहणार आणि दुसऱ्या कोणाला (म्हणजे मोदींना) निवृत्तीचा सल्ला देणार नाही, हे त्यांनी स्वच्छपणे नमूद केले.

संघ आणि हिंदू महासभा या संघटनांचे अनेक नेते व कार्यकर्ते सामायिक होते. सावरकर हे दोन्ही संघटनांचे सर्वोच्च वैचारिक सुकाणू आणि प्रेरणास्रोत होते तसेच हेडगेवारांनी सावरकारांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊन संघ स्थापन केला, असे संघात बौद्धिके घेणाऱ्या जावडेकरांनी नोंदवले आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या मोहिमांना गुंफण्याचे काम करणाऱ्या गीता प्रेस व हनुमान प्रसाद यांना काही काळ सहाय्य करायला हेडगेवारांनी गोळवलकरांना गोरखपूरला पाठवले. कल्याण मासिकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे उत्तरेत अनेक नवे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळाले.

आम्ही व्यक्ती घडवतो, असे मोहन भागवत म्हणतात. ते बरोबर. विविध लोककल्याणकारी कामे संघ स्वयंसेवक करत असतात. तेही खरे. यासाठी संघ समाज विभागाच्या विविध अंगांत संचार करणाऱ्या संस्थांच्या निर्मितीस चालना देतो. पण हे सगळे करत असताना त्यांच्या डोक्यात मुख्य लक्ष्य ‘हिंदू राष्ट्र निर्मिती’ हे लख्ख असते. हिंदुत्वाचा मज्जारज्जू या सगळ्या कामांच्या कण्यातून ओवणे हे त्यांचे प्रधान कार्य असते. जिथे संघाला आपली प्रतिमा वेगळी ठेवून आपले काम अधिक थेट, प्रसंगी प्रक्षोभक, साधन-साध्य विवेक धुडकावून करायचे असते त्यावेळी त्या प्रकारच्या संघटनांना तो जन्म देतो. विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल अशा कितीतरी संघटना संघाने जन्माला घातल्या. अजूनही घालत असतो.

संघाचे एक प्रमुख प्रचारक असलेले एस. एस. आपटे हे विश्व हिंदू परिषदेचे एक संस्थापक व पहिले सरकार्यवाह होते. या विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनी या महिला शाखेच्या संस्थापक व अध्यक्ष साध्वी ऋतंभरा आहेत. नव्वदच्या दशकात मंदिर वही बनायेंगेचा नारा देऊन बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या आंदोलनात या बाईंची अत्यंत प्रक्षोभक व शिव्या ओकणारी भाषणे अनेकांप्रमाणे मीही ऐकलीत. हा त्यांचा स्वभावधर्म आजही बदलेला नाही. भागवतांच्या संघात अशा व्यक्ती घडवल्या जातात. या साध्वी ऋतंभरांना या वर्षी पद्मभूषण किताब देऊन भाजपच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने गौरविले आहे. समाजकार्य, मानवसेवा असे काहीही म्हटले तरी हिंदू राष्ट्रासाठी लढणाऱ्या रणरागिणीचा तो सन्मान आहे. त्या मताचे व उद्देशाचे लोक सत्तेवर असताना तसेच होणार. होते आहे. दिल्लीच्या भाषणात भागवत म्हणाले, हे हिंदू राष्ट्र आहेच; त्याला भारत म्हणा, हिंदुस्थान म्हणा, नावाने फरक पडत नाही. ‘इस्लामशिवाय देशाची कल्पना हा हिंदू विचार नाही’ वगैरे बोलून त्याचा त्यांनी अतिव्याप्त अर्थ विशद केला तरी हिंदू राष्ट्र संकल्पनेच्या वाहकांना लागायचा तोच अर्थ लागतो. तो अजिबात अतिव्याप्त, पातळ, पसरट, संदिग्ध नसतो. हा सुस्पष्ट अर्थ व त्यातून मिळालेल्या संदेशानुसार सत्तेतले हिंदू राष्ट्राचे वाहक त्याप्रमाणे व्यवहार करतात. संविधानाच्या उद्देशिकेतल्या ‘आम्ही भारताचे लोक’ मध्ये केवळ हिंदू आणि त्यातही बारकाईने पाहिले की त्यातले वरचे थर, असा त्याचा अर्थ मर्यादित करतात.

संघ व स्वातंत्र्यलढा

संघाच्या स्थापनेआधी हेडगेवार काँग्रेसच्या लढ्यात होते. मात्र संघ ही राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक संघटना म्हणून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून तिला अलिप्त ठेवण्याचीच खटपट केली. दिल्लीच्या भाषणात मोहन भागवतांना संघ स्वातंत्र्य आंदोलनात होता का, हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हेडगेवारांचे उदाहरण दिले आणि वैयक्तिक पातळीवर संघ स्वयंसेवक कसे या चळवळीत होते, स्वातंत्र्य आंदोलनातल्या भूमिगत कार्यकर्त्यांना आपल्या घरात कसा आधार देत होते वगैरे बाबी सांगितल्या. पण संघ संघटना म्हणून यात होता असा उल्लेख त्यांनी कुठेही केला नाही. इंग्रजांशी थेट वाकड्यात न जाता टिकायचे, त्यांची इतराजी होऊ नये यासाठी प्रसंगी त्यांची स्तुती करायची व दरम्यान ते गेल्यानंतर आणावयाच्या हिंदू राष्ट्राची पायाभरणी करत राहायची हे संघाचे धोरण होते. ७ ऑक्टोबर १९३५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात हेडगेवारांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला ‘ईश्वरी कृपा’ व ‘ब्रिटिश शासनाने आम्हाला संघटना बांधणीचा धडा शिकवला’ असे म्हटल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने नोंदवले आहे.

गोळवलकरांचा हेडगेवारांइतकाही स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध आला नाही. ते त्यापासून फटकून राहिले. १९४० साली सरसंघचालक म्हणून त्यांच्या हातात सूत्रे आल्याने बेचाळीसच्या चले जाव चळवळीत संघाला ते उतरवू शकले असते. पण त्यापासून त्यांनी संघाला अलिप्त ठेवले. हिंदूंना संघटित करत राहायचे व इंग्रज गेल्यावर उठाव करुन थेट सत्ता हातात घ्यायची आणि हिंदू राष्ट्र घोषित करायचे या त्यांच्या मनसुब्याला स्वातंत्र्यासोबत आलेल्या फाळणीने आशा दाखवली. पाकिस्तानमधून निर्वासित होऊन येणाऱ्या हिंदूंच्या वेदनांच्या ज्वाळांवर यांनी मुस्लिम विद्वेषाच्या पोळ्या शेकायला सुरुवात केली. मुस्लिम विरोधी दंगली पेटवण्यात ते मार्गदर्शक व प्रेरक राहिले. काँग्रेस व गांधी मुस्लिम धार्जिणे आणि संघ हिंदूंचा खरा रक्षक अशी प्रतिमा उभी करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. दिल्लीच्या सब्जिमंडी, पहाडगंज, करोल बाग येथील हिंसाचाराबद्दल व मुस्लिमांना धडा शिकवल्याबद्दल गोळवलकरांनी संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संघ स्वयंसेवकांचे अभिनंदन केल्याची तसेच इतरांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केल्याची नोंद गुप्त पोलिसांच्या दप्तरी मिळते. दिल्ली तसेच अन्यत्र झालेल्या दंगलींचा, त्यात मुस्लिमांवर घडलेल्या अत्याचाराचा निषेध करा, ही गांधीजींची सूचना गोळवलकरांनी अमान्य केली होती.

स्वतंत्र भारतात विलीन न होता, आपले राज्य आपल्याच ताब्यात ठेवण्याची संस्थानिकांची खटपट स्वाभाविक होती. संस्थानांतल्या प्रजेने स्वातंत्र्यासाठी उठाव केल्याने पुढे त्यांचा नाईलाज झाला व वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली ही संस्थाने भारतात विलीन होऊ लागली. काहींशी लढावे लागले. यातल्या उत्तरेकडेच्या भरतपूर, अलवार आदि हिंदू संस्थानिकांच्या हितसंबंधांना आश्वस्त करत त्यांच्या अधिकारक्षेत्रातील प्रदेशात त्यांचे आर्थिक तसेच शस्त्र बळ घेऊन संघाने आपल्या छुप्या सैनिक प्रशिक्षणाच्या छावण्या तयार केल्या.

सावरकरही हिंदू संस्थानिकांचे पाठीराखे होते. २४ एप्रिल १९४५ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये हिंदू महासभेचे सर्वोच्च नेते सावरकर यांनी हिंदू संस्थानिकांना 'हिंदू शक्तीची आधारशिला' म्हटल्याचे नोंदवले आहे. ‘त्यांना नष्ट करण्याच्या उद्देशाने चाललेल्या कोणत्याही विध्वंसक चळवळीत भाग घेऊ नका’ असे सावरकरांनी आपल्या समर्थकांना सल्ला दिल्याचे म्हटले आहे.

गोळवलकरांचे नागपूरमधील व्यक्तिगत मित्र एन. बी. खरे एप्रिल १९४७ ला अलवार संस्थानाचे पंतप्रधान झाले. अलवारला त्यांनी संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणारे केंद्र बनवले. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी निश्चित आराखडा बनवण्याचे शिक्षण तिथे दिले जाई. ८ जुलै १९४७ रोजी बी. एन. खरे यांनी अलवारच्या राजाकरवी हिंदू संस्थानिकांना हिंदू संमेलनासाठी निमंत्रित केले. हिंदू राष्ट्राची मागणी, देशाचे अधिकृत नाव हिंदुस्थान, देवनागरी लिपीतली हिंदू राष्ट्रभाषा व भगवा राष्ट्रध्वज हे ठराव तिथे करण्यात आले.

इंग्रजांविरोधात लढणाऱ्यांच्या मनात भारतातील सर्वांचा समावेश असलेला ‘प्रादेशिक राष्ट्रवाद’ आहे. या लढ्याशी संबंध ठेवणे म्हणजे ‘हिंदू राष्ट्र’ या आपल्या लक्ष्यापासून विचलित होणे आहे, असे गोळवलकरांचे म्हणणे होते. काँग्रेसचे ब्रिटिश विरोधी जेल भरो आंदोलन हे हास्यास्पद असून लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे सावरकरांचेही आवाहन होते.

दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात पुढील नोंद आढळते - १९ मे १९४६ रोजी रोहतक येथे झालेल्या आरएसएसच्या गुप्त बैठकीत नागपूरचे दादाभाई म्हणाले होते की, 'संघाचा संघर्ष ब्रिटिशांविरुद्ध नसून मुस्लिमांविरुद्ध आहे आणि वेळ आल्यावर प्रत्येक हिंदूने या संघर्षात भाग घेण्यास तयार असले पाहिजे.’

फाळणीने दिलेल्या संधीमुळे संघाला हिंदूंचा हितकर्ता म्हणून एकदम उभार आला. दिल्ली व भोवतालच्या परिसरातील मुस्लिमविरोधी हिंसा प्रचंड प्रमाणात भडकत व विस्तारत होती. हे पुढे असेच वाढत जाईल आणि त्याआधारे देशाची सत्ता ताब्यात घेता येईल अशी वेळ आली असताना गांधी आडवे आले. दिल्ली परिसरातील हिंसाचाराने नेहरुही हवालदिल झाले होते. लोकांना आवर घालण्यात त्यांनाही हतबलता जाणवू लागली. आता गांधीजींवर भिस्त होती. कलकत्त्याला अशाच दंगली शमवायला गेलेले व त्यात यशस्वी झालेले महात्मा गांधी दिल्लीस आले. त्यांच्यारीतीने त्यांनी लोकांशी संवाद सुरु केला.

गांधीजींच्या या हिंसाचार शमवण्याच्या प्रयत्नांबद्दल गोळवलकरांची काय तीव्रता होती, ते गुप्त पोलिसांच्या अहवालातील या नोंदीवरुन कळते – दिल्लीच्या रोहतक रोड छावणीत २,५०० आरएसएसच्या कार्यकर्त्यांपुढे गोळवलकर बोलत होते. त्यात त्यांनी अक्षरशः धमकी दिली की, जर गांधींनी मुस्लिमांचे रक्षण करणे सुरू ठेवले तर त्यांना 'गप्प' केले जाऊ शकते. या सभेला बाहेरील व्यक्तीला परवानगी नव्हती. तरीही, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) सर्वोत्तम हेरांपैकी एक गुप्तहेर 'सेवक' या टोपण नावाने साध्या कपड्यात कार्यक्रम स्थळी घुसला. त्याने हा अहवाल लिहिला.

कलकत्त्याप्रमाणे इथली परिस्थिती आवाक्यात येणे गांधीजींनाही कठीण वाटू लागले. अखेरीस १३ जानेवारी १९४८ रोजी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. त्याचा परिणाम होऊ लागला. निर्वासितांच्या छावण्यांत राहणारे तसेच अन्यत्रच्या हिंदूंची हिंसाचार थांबवण्याची लाखांच्या सह्यांची निवेदने गांधीजींना येऊ लागली. अनेक गटांचे नेते प्रत्यक्ष येऊन गांधीजींना उपोषण सोडण्यास विनवू लागले. अपेक्षित परिणाम झाल्याचे लक्षात आल्यावर गांधीजींनी उपोषण सोडले. मुस्लिमविरोधी हिंसाचारास उतार पडला आणि संघाचे हिंदू राष्ट्राचे सत्तास्वप्न भंग पावले.

त्याच महिन्याच्या अखेरीला ३० जानेवारीला नथुराम गोडसेने गांधीजींचा खून केला. गोळवलकरांनी गांधीजींना संपवण्याची भाषा केली होती. पण त्यांचा या खुनाच्या प्रयत्नांत काही सहभाग होता का याला पुरावा नाही. हा खून करणाऱ्या नथुरामशी आमचा काही संबंध नाही, तो आमचा नव्हेच, असे संघाने जाहीर केले.

संघाच्या कार्यालयातील गांधीहत्येनंतरच्या तपासात पोलिसांना एक फाईल मिळाली. तिच्यात पान क्र. ८ वर ११ मे १९४० ला आरएसएस च्या पुण्याच्या संघटकांची (प्रचारकांची) जी बैठक झाली, तिला हजर असलेल्या संघटकांची यादी आहे. त्या यादीत एन. व्ही. गोडसे अशी नोंद मिळते.

संघाने गोडसेला अव्हेरल्याबद्दल त्याच्या आप्तांमंध्येही नाराजी आहे. नथुराम गोडसेचे एक नातेवाईक सात्यकी सावरकर यांनी नथुराम अखेरच्या श्वासापर्यंत संघाचा सदस्य होता, त्याने कधीही संघ सोडला नव्हता वा त्याला संघाने काढला नव्हता असे जाहीर वक्तव्य केले आहे.

गांधीजींच्या हत्येनंतर संघावर बंदी घातली गेली. पंतप्रधान नेहरु संघाबद्दल अत्यंत कठोर होते. धर्मनिरपेक्षता व हा देश सगळ्यांचा आहे, कोणा एका धर्माचा वरचष्मा असता कामा नये, या भूमिकेवर ते ठाम होते. लगेच बंदी उठवायला त्यांची तयारी नव्हती. उपपंतप्रधान व गृहमंत्री असलेले पटेल मात्र आधीपासूनच संघाबद्दल सौम्य व सबुरीने जाण्याच्या मताचे होते. फाळणीच्या पार्श्वभूमीवर संघाचा प्रभाव असलेल्या हिंदूंचा आधार काँग्रेसच्या पाठी राहावा असे त्यांना वाटे. त्यासाठी संघ स्वयंसेवकांनी काँग्रेसमध्ये यावे असे त्यांनी संघाला आवाहन आणि प्रयत्नही केले होते. या काळात कम्युनिस्ट चळवळ वाढत होती. तिला आवर घालायला संघाची ताकद वापरावी, असाही त्यांचा हेतू होता. कम्युनिस्टांना संघ शत्रू मानतच होता. पुढे १९६३ साली एका प्रश्नाला उत्तर देताना नेहरु संघ आणि कम्युनिस्टांत फरक करताना म्हणतात: ‘लक्षात घ्या, भारताला धोका साम्यवादाचा नाही, तर तो हिंदू उजव्या विचारसरणीच्या सांप्रदायिकतेचा आहे.’

नेहरु आणि पटेल संघर्षात संघावरची बंदी लवकर उठते. मात्र पटेलांनी बंदी उठवण्यासाठी संघाला अटी घातल्या. त्या अशा : लिखित व प्रकाशित संविधान, लोकशाही पद्धतीने पदाथिकाऱ्यांची निवड, हिंसक मार्गांचा व गुप्त कार्यपद्धतीचा त्याग, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाबद्दल पूर्ण निष्ठा, राजकीय आंदोलनांपासून दूर राहून केवळ सांस्कृतिक व सामाजिक कामावर लक्ष केंद्रित करणे. …त्या मान्य असल्याचे लिखित आश्वासन गोळवलकरांनी दिल्यावर ११ जुलै १९४९ ला संघावरची बंदी उठवण्यात आली.

पण गांधींच्या खुनाबद्दल पटेलांनी संघाला आरोप मुक्त केले का? वल्लभभाई गांधीहत्येच्या संदर्भात श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या १८ जुलै १९४८ च्या पत्रात म्हणतात - 'रा. स्व. संघ व हिंदू महासभा या संघटनांच्या व विशेषतः संघाच्या कारवायांमुळे देशात जे वातावरण तयार झाले होते, त्यामुळेच गांधींच्या खुनासारखे घृणास्पद कृत्य घडू शकले. हिंदू महासभेला मानणारा अतिरेकी गट गांधी हत्येच्या कटात सामील होता, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. रा. स्व. संघाच्या कारवाया या राज्य व सरकार दोहोंच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरणाऱ्या आहेत.' याच पत्रात, गांधीजींच्या हत्येनंतर संघाच्या काही कार्यकर्त्यांनी मिठाई वाटली होती आणि ही गोष्ट अत्यंत दु:खद व असंवेदनशील होती, असेही पटेल नमूद करतात.

या इतिहासाची काहीही बुज न राखता स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात संघाबद्दल गौरवोद्गार काढताना आपण सेक्युलर भारताचे नव्हे, तर हिंदू राष्ट्राचे पंतप्रधान आहोत, हेच मोदींनी गृहीत धरलेले असणार.

संघाचा राजकारणाशी संबंध नाही?

पटेलांनी संघावरची बंदी उठवताना घातलेल्या अटीच दर्शवतात की संघ अव्वल राजकीय काम करत होता. तेही लोकशाही संकेत न पाळता. त्याचे राजकारण फॅसिस्ट पद्धतीचे होते. बंदी उठवल्यावर संघ खरेच राजकारणापासून दूर राहून केवळ सांस्कृतिक व लोकसेवेचे काम करत राहिला का? अजिबात नाही. आज भागवत किंवा कोणीही संघवाले गोळवलकर किंवा देवरस बोलत होते त्याप्रमाणे ‘आम्ही राजकारणात पडत नाही’ असेच बोलतात. प्रत्यक्षात राजकारणच करतात. भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड अजून का होत नाही, त्यात संघाची काही भूमिका आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना दिल्लीच्या भाषणात भागवतांनी म्हटले – ‘संघ भाजपसाठी निर्णय घेत नाही. आम्ही निर्णय करत असतो, तर अध्यक्ष निवडण्यास इतका वेळ लागला नसता.’

याचा अर्थ, भाजपच्या अंतर्गत रचनेत हस्तक्षेप करायला ते सक्षम आहेत. हा अर्थ तरी लावायला का जायचे? देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात जाहीरपणाने म्हणालेत, ‘मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करीत होतो आणि तेच काम करण्याचा निश्चय केला होता. पण, अचानक मला संघाकडून भाजपचे काम करण्याचा आदेश मिळाला. मी त्यासाठी तयार नव्हतो. पण स्वयंसेवकाला आदेशाचे पालन करावे लागते, असे सांगण्यात आले व मी संघाच्या आदेशाचे पालन करीत भाजपमध्ये काम सुरू केले.’ ११ जानेवारी २०२५ च्या वर्तमानपत्रांत ही बातमी ठळकपणे छापून आलेली आहे.

संघ राजकीय पक्ष नसून सांस्कृतिक संघटना आहे. स्वयंसेवक त्यांच्या पातळीवर राजकीय पक्षात किंवा अन्य कुठे काम करावे याचा निर्णय घेतात, असे भागवतांनी अनेक वेळा म्हटले आहे. मग फडणवीस संघाने भाजममध्ये काम करण्याचा आदेश दिला असे कसे काय म्हणतात?

संघाने आम्ही राजकीय पक्ष नाही, पण आम्ही राजकारण करतो असे थेट म्हणावे. आपल्या पूर्वसुरींच्या तत्कालीन भूमिकांची चिकित्सा करावी. वर्तमानाच्या संदर्भात त्यावर नवे भाष्य करावे. कम्युनिस्टांच्या आत्मटीकेवर ‘यांना आता शहाणपण सुचले का’ प्रकारचे टोमणे मारले जातात. पण ते करतात ना आपल्या जुन्या भूमिकांची, नेतृत्वांच्या व्यवहाराची चिकित्सा! हे धैर्य व पारदर्शकता संघ का दाखवत नाही?

कारण तो फॅसिस्ट होता. फॅसिस्ट आहे. त्याला आजच्या संविधानाच्या कक्षेत राहिल्याचे दाखवायचे आहे, प्रत्यक्षात ते उलथून टाकायचे आहे. संविधान उलथून टाकायचे म्हणजे भारतीय जनतेलाच धर्माच्या चुकीच्या व्याख्येवर आधारित संकुचित राष्ट्रवादाची झिंग द्यायची व आपल्या राष्ट्रीय जीवनाचा पाया असलेल्या सांविधानिक मूल्यांच्या विरोधात उभे करायचे. संघ उघडपणे कमी, मात्र त्याने चालना दिलेल्या परिवारातील संघटना हे राजरोस करत असतात.

संघाची फॅसिस्ट प्रवृत्ती

हिटलर आणि मुसोलिनी यांच्या अनुक्रमे जर्मनी व इटलीमधील विचार-व्यवहारातून फॅसिझम ही संज्ञा प्रचलित झाली. त्याची काही वैशिष्ट्ये अशी सांगता येतील : एकच नेता किंवा पक्ष सर्वोच्च असणारी, विरोधकांना साम, दाम, दंड, भेदाने निष्प्रभ करणारी किंवा संपवणारी सर्वंकष सत्ता. विशिष्ट धर्म किंवा विचारांच्या कर्मठतेवर आधारलेला जहाल राष्ट्रवाद. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमे आणि विरोधी विचार दडपणे. युद्ध, शिस्त आणि बळाचा वापर हे राष्ट्र उभारणीचे साधन मानणे. विशिष्ट समाज, धर्म किंवा वंश श्रेष्ठ मानणे. समाजातील त्यांनी ठरवलेल्या 'अशुद्ध' किंवा 'विघातक' घटकांना नष्ट करणे.

केवळ मोहन भागवतांच्या दिल्ली किंवा अलिकडील भाषणांवरुन संघाची तपासणी करता येणार नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या भाषणात इंद्रधनुषी सपकाऱ्यांनी आक्षेपांचे ढग निस्तेज करणारी त्यांची शैली आहे. कळणारही नाही, अशा रीतीने मुद्द्याला बगल देण्यात ते वाकबगार आहेत. म्हणून केवळ ते भाषण व त्यात म्हटलेल्या बाबी धरुन जाता येणार नाही. त्यांच्या पूर्वसुरींचे विचार आणि संघाच्या भूत व वर्तमानातल्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या मांडणीचे मापन करायला हवे. त्यातून फॅसिझमची वैशिष्ट्ये संघाला कुठे व कशी लागू होतात ते कळेल.

हेडगेवार व गोळवलकर ही संघाची परमपूज्य स्थाने आहेत. त्यांच्या मंचावर या दोहोंच्या प्रतिमा असतात. या दोघांनाही पूज्य असलेल्या हिंदू महासभेच्या मुंजे आणि सावरकरांनी ‘शक्तिशाली राष्ट्र’ निर्माण करण्याचे साधन म्हणून फॅसिझमचा स्वीकार केला होता. गोळवलकरांनी त्यांच्या १९३९ च्या ‘We or Our Nationhood Defined’ या पुस्तकात म्हटले आहे – ‘जर्मनीने हेही दाखवून दिले आहे की वंश व संस्कृती, ज्यांचे भेद मुळापर्यंत गेलेले आहेत, त्या एकत्र येऊन एकसंध अखंडित एकात्मतेत विलीन होणे जवळजवळ अशक्य आहे. हिंदुस्थानने हा धडा शिकावा व त्यातून लाभ घ्यावा.’ हा धडा अमलात आणण्याबद्दल ते पुढे लिहितात - 'हिंदुस्थानातील परकीय वंशांनी हिंदू संस्कृती व भाषा स्वीकारली पाहिजे. त्यांनी हिंदू धर्माचा आदर करावा व त्याला पूज्यभावाने मान द्यावा, हिंदू समाज व संस्कृती—म्हणजेच हिंदू राष्ट्र—यांच्या गौरवाशिवाय इतर कोणतीही कल्पना मनात आणू नये आणि आपले वेगळे अस्तित्व सोडून हिंदू समाजात विलीन व्हावे. अन्यथा, जर त्यांना या देशात राहायचे असेल, तर हिंदू राष्ट्राच्या पूर्ण अधीन राहून, काहीही हक्क न मागता, कोणत्याही विशेष सुविधांवर दावा न करता, अगदी नागरिकत्वाच्या अधिकारालाही मुकून राहावे. त्यांच्या समोर याशिवाय दुसरा मार्ग नसावा, असू नये.'

सावरकरांच्या मते पितृभूमी (जिथे जन्म झाला) व पुण्यभूमी (जिथे पवित्र धर्मस्थळे आहेत) या दोन्ही ज्यांच्या एक ते त्यांचे राष्ट्र. ही व्याख्या स्वीकारली की मुळचे इथले असलेले, इथे जन्म झालेले मुस्लिम, ख्रिस्तीही परकीय होता. कारण त्यांची पवित्र धर्मस्थळे भारताबाहेर आहेत. म्हणजे इथल्या मुस्लिम-ख्रिस्ती धर्मियांनी गोळवलकर देत असलेल्या सवलतीप्रमाणे धर्मांतर करुन हिंदू व्हावे. त्यांच्या येथील नागरिकत्वाची ती पूर्वअट असेल. अन्यथा कुठलेच नागरिकत्वाचे अधिकार न मिळता दुय्यम श्रेणीत जगावे.

गुप्तचर विभागाच्या वृत्तांतानुसार ३ मे १९४२ रोजी संघटनेचे (आरएसएस) सांप्रदायिक आणि फॅसिस्ट स्वरूप स्पष्टपणे उघड केले गेले. संघाची स्थापना केवळ मुस्लिम आक्रमणाशी लढण्यासाठीच नव्हे, तर त्या आजाराचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी करण्यात आली होती, हे तिथे मांडले गेले. ४ मे १९४२ च्या गुप्तचर विभागाच्या वृत्तांतात म्हटले आहे - 'त्यांनी संघ हुकूमशाहीचे तत्त्व अनुसरतो व लोकशाही हा शासनाचा असमाधानकारक प्रकार असल्याने त्यास नकार देतो, असे जाहीर केले.' आरएसएसच्या शिबिरांत संघाच्या शिक्षकांनी उघडपणे नाझीवाद आणि फॅसिझमचा गौरव करताना आढळणे सामान्य होते. मुसलमान मनोवृत्ती नेहमीच सत्कार्यात विघ्न आणणारी असते हे आपण लक्षात ठेवा, असे हेडगेवारांनी एका पत्रात लिहिले आहे.

ताबडतोबीने मुस्लिमांना जबरी जरब बसवणे आणि मग त्यांच्या समूळ उच्चाटनाकडे जाणे हा संघ स्वयंसेवक आणि संघ परिवारातल्या संघटनांचा मुख्य कार्यक्रम का आढळतो ते आपल्याला यावरुन कळते. स्वातंत्र्य लढा चालू असताना हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्यापासून फाळणीतला मानवसंहार ते बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या दंगली यातली संघपरिवाराच्या सहभागाची संगती त्यातून लागते. संघाचे प्रचारक मोदी गुजरातेत पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाल्यावर, पुढे देशात प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाल्यावर आणि ज्या ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्या त्या ठिकाणी मुसलमानांची ससेहोलपट चरम सीमेवर का गेली त्याचेही इंगित लक्षात येते. लव्ह जिहादच्या नावाखाली धर्मांतर विरोधी कायदे करणे, संविधानानुसार कायद्यासमोर सगळे सारखे मानायचे असताना नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) करुन मुसलमानांना अधिकृतपणे वगळणे व धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व मातीमोल करणे, गोरक्षणाच्या निमित्ताने दलित-मुस्लिमांचे झुंडबळी घडवणे ही सारी संघाच्या मूळ धोरणाची स्वाभाविक परिणती आहे.

हे आताचे वर्तमान आहे. भागवत बोलतात त्या काळातले आहे. त्याबद्दल भागवतांनी त्या त्या वेळी काही प्रतिक्रिया दिल्याचे आठवत नाही. बिल्किस बानोच्या अत्याचाऱ्यांना जेलबाहेर आणल्यावर त्यांचा विश्व हिंदू परिषदेने सत्कार केला, याबद्दल संघानेच स्थापन केलेल्या विहिंपच्या नेत्यांना भागवतांनी जाब विचारल्याचे ऐकिवात नाही. या सगळ्यांच्या विचार-कृतीचा मूळ स्रोत गोळवलकरांची मांडणी आहे. मोदींनी लिहिलेल्या ‘ज्योतिपुंज’ पुस्तकात गोळवलकरांची त्यांनी बुद्ध, शिवाजी व टिळकांबरोबर तुलना केली आहे. मोदी तसेच संघपरिवाराचे गोळवलकर आजही वैचारिक केंद्र व मार्गदर्शक होकायंत्र आहे. गोळवलकरांच्या ‘We or Our Nationhood Defined’ या पुस्तकातल्या मांडणीला भले ते सोयीने कालबाह्य म्हणतील. पण त्या काळातही ते गैर होते असे म्हणणार नाहीत. गोळवलकरांनी स्वतः लिहिलेल्या व स्वतःच्या नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे जन्मदातेपण एका गैरसोयीच्या वेळी नाकारले व हा बाबाराव सावरकरांच्या राष्ट्र मीमांसा पुस्तकातील विचार मी इंग्रजीत आणला असे म्हटले होते. या दोन्ही पुस्तकांची तुलना करुन अभ्यासकांनी त्यांचा खोटेपणा उघडा केला. ते काहीही म्हणोत, लिहोत. पण व्यवहार गोळवलकरांपासून भागवत-मोदींपंर्यत पाहिल्यावर काय आढळते ते पहा. ते तर अमूर्त शब्द किंवा कल्पना नाहीत. ती प्रत्यक्ष, मूर्त कृती आहे. ती भयंकर, रक्तलांछित आहे.

नेहरुंनी दिलेला हा इशारा पहा. ७ डिसेंबर १९४७ ला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रात ते संघाबद्दल काय म्हणतात ते इथे संक्षेपाने देत आहे - ‘ही एक खाजगी सेना (Private Army) आहे. नाझी पद्धतीने जाणारी. तीच तंत्रे वापरणारी. नकारात्मक प्रचारावर यांचा भर असतो. त्याला तर्काची गरज नसते. बुद्धीला ताण देण्याची गरज नसते. या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर ती देशाला भविष्यात गंभीर दुखापत करील. भारत यातूनही तरेल. पण गंभीर जखमा होतील व त्या बऱ्या व्हायला खूप वेळ लागेल.’

या इशाऱ्यानंतर ७ आठवड्यांनी गांधीजींचा खून झाला. आज देशाची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. देशवासीयांची मने विखंडित करण्याचे होत्र चालू आहे. संविधानातील पायाभूत मूल्यांची आहुती त्यात पडत आहे. देश गंभीर जखमी झाला आहे.

या सगळ्यावर विस्मरणाचे कातडे ओढून केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना संघात काम करण्याची अनुमती दिली आहे. त्यासाठी जुन्या मनाईच्या आदेशांत दुरुस्ती केली. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे आता संघ ही साधी लोकसेवा करणारी निरुपद्रवी एनजीओ आहे. आधीच सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांत सांप्रदायिक द्वेषाची लागण वाढत होती. आता तर अधिकृतपणे संघाचे स्वयंसेवक म्हणून ते प्रशासन विषाक्त करणार.

संविधान आणि संघ

हे सरकार संविधान बदलणार आहे, असा आक्षेप लोकशाहीवादी-पुरोगामी मंडळी घेतात. प्रत्यक्षात मोदी संविधानावर माथे टेकतात. त्याला फुले वाहतात. ‘हर घर संविधान’ मोहिमा घेतात. त्याचा जागर करतात. त्याची मंदिरे बांधतात. संविधानाच्या शिल्पकारांना-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तर प्रत्येक दहा पावले चालल्यावर सांष्टांग दंडवत घालतात. पुरोगाम्यांच्या आक्षेपाला बळ यायचे असेल तर संविधानाबद्दल संघपरिवाराचे म्हणणे काय होते आणि एकीकडे संविधानाची पूजा बांधत असताना दुसरीकडे ते त्याचे कसे लचके तोडत आहेत हे उघड करुन सांगायला हवे. याचे तपशील बरेच आहेत. त्यातल्या काही बाबी उदाहरणादाखल खाली देत आहे.

संविधान मंजूर झाले २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आणि त्यानंतर चौथ्याच दिवशी ३० नोव्हेंबर १९४९ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारपत्रात ‘ऑर्गनायझर’ मध्ये लिहिले जाते - ‘या संविधानाबाबतची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. …यात प्राचीन भारतीय सांविधानिक नियम, संस्था, संज्ञा, परिभाषा यांचा मागमूसही नाही. …प्राचीन भारतातील अतुल्य अशा सांविधानिक विकासक्रमांचा यात उल्लेख नाही. स्पार्टाचा लायकर्गस किंवा पर्शियाचा सोलोन यांच्या कितीतरी आधी मनूचे नियम लिहिले गेले आहेत. आजही मनुस्मृतीतले हे नियम जगात प्रशंसिले जातात आणि भारतीय हिंदूंना उत्स्फूर्तपणे त्यांच्या अनुपालनास व अनुसरणास उद्युक्त करतात. पण आपल्या घटना पंडितांच्या दृष्टीने त्यांस काहीही मोल नाही.’

आजवरचा मनुस्मृती हा इथल्या संस्कृती रक्षकांचा संविधान ग्रंथ होता. विषमतेच्या उतरंडीला, स्त्रियांच्या गुलामगिरीला नियमबद्ध करणारी मनुस्मृती बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ ला जाळली होती. ते प्रतीकात्मक होते. त्यानंतरही इथल्या सनातनी शक्ती भारतीयांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचा तो आधार गृहीत धरुन होत्या. त्याला पुन्हा बाबासाहेबांच्या हातूनच संविधान लिहून मुठमाती दिली गेली. मनुस्मृती अधिकृतपणे संपली. याचे शल्य किती भयंकर होते ते संघाच्या वरील भूमिकेतून कळते. ‘ऑर्गनायझर’च्या १९ जानेवारी १९५० च्या अंकात ते आंबेडकरांबद्दल कडवटपणे लिहितात – ‘आंबेडकर हा एक खुजा माणूस आहे. गलिव्हर ट्रॅव्हल्समधील अंगठ्याएवठा माणूस! मनुसारख्या हिमालयाची उंची असलेल्या माणसाबरोबर त्याची तुलना करणे चुकीचे आहे!’

हिंदू स्त्रियांना कुटुंबात पुरुषांच्या बरोबरीने संपत्तीत तसेच जगणे कठीण करणाऱ्या नात्यातून बाहेर पडण्यासाठीचा घटस्फोटाचा अधिकार देणारे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी हंगामी संसदेत लावून धरले. त्याला काय प्रकारे गोळवलकर विरोध करतात ते पहा. ‘ऑर्गनायझर’च्या ६ सप्टेंबर १९४९ च्या अंकात ते म्हणतात - ‘या सुधारणांत काहीही भारतीय नाही. विवाह व घटस्फोटाच्या प्रश्नांची सोडवणूक अमेरिका आणि ब्रिटिश नमुन्यांप्रमाणे आपल्या देशात होऊ शकत नाही. हिदू संस्कृतीप्रमाणे विवाह हा संस्कार आहे. तो मृत्युनंतरही बदलता येत नाही. केव्हाही बदलावा असा तो ‘करार’ नाही.’ गोळवलकर पुढे म्हणतात, ‘अर्थात, देशातील काही भागात हिंदू समाजातल्या काही खालच्या जातींत घटस्फोटाला मान्यता आहे व रीतीप्रमाणे त्यांच्यात घटस्फोट होतातही. पण त्यांची ही रीत आदर्श मानून सर्वांनी तिचे अनुकरण करावे असे होऊ शकत नाही.’ गोळवलकर त्यांच्या ‌‘बंच ऑफ थॉटस्‌’मध्ये म्हणतात, ‘जाती व्यवस्था एक फार चांगली व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेमुळेच अनेक काळ, अनेक आक्रमणे पचवून हा देश आणि हा धर्म अजिंक्य ठरले.’

गोळवलकरांना अभिप्रेत ‘हिंदू राष्ट्रा’तली स्त्रियांची स्थिती आज ‘राष्ट्र सेविका दला’तल्या संघविचाराच्या स्त्रियांना मान्य आहे का? असू शकेल. त्यांना थेट संघात प्रवेश कुठे आहे? तो पुरुषांचाच. स्त्रियांचे वेगळे दल करण्यात आले. हे म्हणजे चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी अस्पृश्यांना स्वतंत्र विहीर किंवा तलाव बांधून देण्याच्या सूचनेसारखे आहे. मूळ संघात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया का व्यवहार करु शकत नाहीत? मोहन भागवत यावर नेहमीच सारवासारवीचे उत्तर देतात. संघ कार्यकर्त्याचे काम अखेरीस त्याच्या कुटुंबातल्या स्त्रियांच्या सहकार्यावर अवलंबून असते वगैरे. हे म्हणजे स्त्रीला एकीकडे देवी करुन टाकणे. तिच्या त्यागाचा महिमा गाणे. दुसरीकडे तिचे दुय्यम स्थान नीट जपणे. ‘स्त्री नाही देवी, स्त्री नाही दासी, स्त्री आहे माणूस’ ही स्त्री चळवळीतील घोषणा राष्ट्र सेविका दलातल्या स्त्रियांनी ऐकली तरी आहे का?

याच अवतरणात ‘खालच्या जातीत’ घटस्फोटाच्या रीतीचा उल्लेख गोळवलकर करतात. पण ती रीत खालच्या जातीची असल्याने ती अधिकृत कशी होणार? हिंदू राष्ट्रात, खरे म्हणजे उतरंडीच्या ब्राम्हणी राष्ट्रात वरच्या जातींच्या म्हणजे मुख्यतः ब्राम्हणांच्या रीती याच प्रमाण व आदर्श असणार आहेत. संघ व त्याचे राजकीय साधन असलेल्या भाजपच्या कच्छपि लागलेल्या तमाम हिंदू बहुजन जातींना हा डाव कधीतरी कळणार आहे का?

राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाच्या निमित्ताने १९५६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर एक लेख लिहितात. त्यात त्यांनी भारताच्या संघराज्य (Fedration) पद्धतीवर टीका करुन एकात्मिक (Unitary) राजवटीचा पुरस्कार केला. त्यासाठी आजचे संविधान बदलण्याची सूचना ते करतात. ते म्हणतात – ‘...आपण संविधानातील सांघिक रचनेची चर्चा कायमची बंद करायला हवी. भारताच्या अंतर्गत असलेल्या अनेक स्वायत्त अथवा अर्धस्वायत्त राज्यांचे अस्तित्व संपवायला हवे आणि एक देश, एक शासन, एक विधिमंडळ, एक कार्यपालिका घोषित करायला हवी. संविधानाची फेरतपासणी आणि पुनर्लेखन व्हायला हवे.’

देश एकसाची करायचा आहे आणि त्यासाठी संविधान बदलायचे ही थेट सूचना गोळवलकरांची आहे. वाजपेयींच्या काळात संविधान पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली होती. पण त्यांच्या पाठीमागचे बहुमत कमकुवत असल्याने ती प्रक्रिया पुढे गेली नाही. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने भरलेल्या धर्म संसदांनी पर्यायी संविधानाचे आराखडे केले. संविधानाच्या बदलाची चर्चा संघ परिवारातली एखादी संघटना सुरु करते. मग अंदाज घेतला जातो. दुसरी एखादी संघटना चौकात संविधान जाळते. पण त्यानेही काही फार घडत नाही. आता भाजप निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून (पंतप्रधान, विरोधी पक्षनेता व सरन्यायाधीश या रचनेतून) सरन्यायाधीशांना वगळून त्या जागी आपला मंत्री घेऊन बहुमताने आपल्या सोयीचा निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी घटना दुरुस्ती करतो. घटनेला थेट हात लावण्याच्या अशा कृती क्वचित होतात. आहे ती घटना ठेवून तिला अपेक्षित असलेली नैतिकता उधळून देत आपल्याला हवे ते कायदे भाजपच्या नेतृत्वाखालचे सरकार करते आहे. यूएपीए कायद्यात दुरुस्ती करुन तो अधिक धारदार करणे, राजद्रोहाच्या कायद्याचा वारेमाप वापर करणे, महाराष्ट्रात अर्बन नक्षल विरोधाच्या नावाने जनसुरक्षा कायदा आणणे ही सरकारची एकाधिकारशाही आहे. विरोधकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांना चेपण्याचे किंवा संपवण्याचे काम ते रोज करते आहे. ही गोळवलकरांची इच्छापूर्तीच सुरु आहे.

हे सगळे करण्याचा अधिकार असलेले सरकार विना लालूच, खुल्या, निर्भय मतदानातून निवडले जात नाही. मतदान यंत्रे, मतदार याद्या यांत मुद्दाम केलेले घोळ, पक्षांना निधी देणाऱ्यांची नावे जाहीर न करण्याच्या तरतुदी, लाडक्या बहि‍णींसारख्या निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या योजना, ईडीच्या धाडी टाकून वा मोठे आमिष दाखवून विरोधकांना आपल्या बाजूने यायला भाग पाडणे ....या सगळ्यांत भागवतांना नैतिकताच नैतिकता दिसते. कारण ते कधीही यावर बोलताना, टोकताना आढळत नाहीत.

लोकशाहीवाद्यांची जबाबदारी

इथवरचे विवेचन वाचल्यावर संघ हे किती ताकदवान व भयंकर संकट आहे हे आपल्या लक्षात आले असेल. त्याच्या हातातली राजकीय सत्ता काढून घेण्यासाठी विरोधी पक्षांची संविधानातल्या मूल्यांवर आधारित एकजूट उभारण्याची सतत खटपट लोकशाहीवाद्यांनी करायलाच हवी. पण ते सत्तेवरुन गेले तरी त्यांनी पेरलेले समाजमनातील विष व त्याच्या आधारे जनसामान्यांच्या मनावरील त्यांची पकड सैल करण्यासाठीचे प्रबोधन खूप गरजेचे आहे. संघाची पोलखोल जरुर करत राहावी. पण तोच प्रबोधनाचा मुख्य भाग नको. तण काढल्यासारखे ते करावे. जे ते नष्ट करु पाहत आहेत, ते आपण घट्टपणे रुजवले पाहिजे. त्याचे पीक आले पाहिजे. त्यावर अधिक भर द्यावा लागेल. त्यासाठी संविधानाची साक्षरता करायला हवी. म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांची समज लोकांना द्यायला हवी. सनातनी हिंदू म्हणवतानाही भारत केवळ हिंदूंचा नव्हे, तो या मातीतल्या सगळ्यांचा आहे हा गांधीजींचा व्यापक सेक्युलॅरिझम सतत प्रचारला पाहिजे. हे करत असताना सगळ्यांना छेदणारे रोजगार, आरोग्य, पाणी, शिक्षण, प्रदूषण हे विषय घेऊन आंदोलने करायला हवीत. त्यावर सर्व जात-धर्मीय कष्टकरी, पीडितांची एकजूट सांधायला हवी. तिथे संपर्कात येणाऱ्या लोकांचे प्रबोधन हे अधिक परिणामकारक ठरु शकते.

हे करताना एका गाण्यातल्या या ओळी स्मरणात ठेवल्या पाहिजेत - ‘मंजिल बहुत है दूर, पर हौसला है भरपूर । मेरा संकल्प है मजबूत ।’

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_____________________________

या लेखातील संदर्भांसाठी सर्वाधिक मदत झाली ती धीरेंद्र झा यांच्या ‘Golwalkar : The Myth Behind the Man, The Man Behind the Machine’ या पुस्तकाची. त्यासोबत संघ समजून घेताना - दत्तप्रसाद दाभोलकर, बंच ऑफ थॉट्स – माधव गोळवलकर, रामचंद्र गुहा यांचे Which Ambedkar? व अन्य लेख, संघविचारांच्या लेखकांचे वर्तमानपत्रातील लेख, बातम्या, अनेक ऑनलाईन नियतकालिके यांचेही सहाय्य झाले.

(अक्षर, दिवाळी २०२५)



Friday, August 1, 2025

हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा जोखताना


या लेखात ज्याचा परिचय करुन घ्यायचा आहे, त्या पुस्तकाच्या नावातीलच एक भाग या लेखाचे शीर्षक म्हणून घेतला आहे. तेच या लेखासाठीही अन्वर्थक होईल असे मला वाटले. या पुस्तकाचे नाव आहे - हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया. लेखक आहेत धार्मिक-जातीय सलोख्यासाठी काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक, अनुवादक प्रमोद मुजुमदार. २०२२ च्या पहिल्या आवृत्तीसह या पुस्तकाच्या आतापर्यंत एकूण तीन आवृत्त्या लोकवाङ्मय गृहाने काढल्या आहेत. आणखीही निघतील. कारण या पुस्तकाचा विषय आणि त्यातून आकळणारा १०० वर्षांचा-किंबहुना त्याही आधीपासूनचा हिंदुत्ववादी राजकारणाचा आलेख खूपच उद्बोधक व रोचक आहे. हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधकांनी एवढ्या बारकाईने हिंदुत्ववादाच्या प्रवासाकडे लक्ष दिलेले नाही, हे लेखकाचे म्हणणे खरे आहे. ज्याच्या उन्मूलनासाठी लढायचे त्याच्या उगमाची कारणे, त्याच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठीचे एक सशक्त साधन या पुस्तकाद्वारे प्रगतीशील चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रमोद मुजुमदार यांनी पुरविले आहे. या पुस्तकातील माहितीसाठीचा आधार ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ इंडिया’ हा अक्षय मुकुल यांचा संशोधित ग्रंथ असल्याची नोंद देऊन ते म्हणतात, ‘हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा अनुवाद नाही किंवा त्याचे संक्षिप्तीकरण नाही. तर मूळ ग्रंथाचा आधार घेऊन केलेली स्वतंत्र मांडणी आहे.’ पुस्तकाच्या अखेरीस संदर्भ ग्रंथांच्या यादीत अक्षय मुकुलांच्या पुस्तकाबरोबरच अन्य पुस्तकांचीही यादी आपल्याला आढळते.

मुजुमदारांनी आपल्या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिला, स्वातंत्र्यपूर्व भारत – गीता प्रेसची रुजुवात; दुसरा, गीता प्रेस आणि कल्याण मासिकाची वाटचाल; तिसरा, हिंदुत्व तत्त्वज्ञान : एक वैचारिक कसरत; चौथा, हिंदुत्वाची राजकीय चढाई आणि पाचवा, ‘दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ – अन्वयार्थ. या सगळ्या भागांतील मुद्द्यांची सविस्तर नोंद देणे हा या लेखाचा हेतू नाही. मूळ पुस्तक वाचायला वाचकांनी प्रवृत्त व्हावे, यादृष्टीने काही मोजक्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

इंग्रजी अमलाखालील बदलत्या अर्थव्यवस्थेत १८८०-९० पासून मारवाडी समाजाने व्यापार आणि उद्योगात कळीचे स्थान मिळविले. (आज अग्रणी असलेली औद्योगिक घराणी याच मारवाडी समाजातील आहेत.) तत्पूर्वी ‘ब्राम्हण-क्षत्रिय’ आघाडीकडे असलेल्या हिंदू धर्माच्या प्रतिनिधीत्वात आणि नियंत्रणात मारवाडी समाजाचा शिरकाव झाला. व्यापार-उदिमासाठी देशभर विखुरलेल्या मारवाडी समाजाचे संघटन आणि त्याच्या सामाजिक स्तराचा-आध्यात्मिक मान्यतेचा मूलाधार असलेल्या सनातन हिंदू मूल्यव्यवस्थेच्या संवर्धनाची आग्रही भूमिका तो घेऊ लागला. त्यासाठीची आर्थिक संसाधने उभारणे त्याच्या आर्थिक संपन्नतेमुळे सोपे झाले. हिंदुत्वाच्या प्रसारासाठी विविध प्रकाशने त्याने सुरु केली. हिंदुत्वाच्या चिकाटीच्या प्रचार-प्रसाराचे नेतृत्व आता ‘ब्राम्हण-बनिया’ आघाडीकडे आले. हा क्रम या पुस्तकात तपशीलवार आला आहे.

याच मारवाडी समाजातील एका व्यापारी कुटुंबातील कार्यकर्ते व आध्यात्मिक विचारवंत हनुमानप्रसाद पोद्दार यांनी जयदयाल गोयंका तसेच अन्य सहकाऱ्यांसह १९२३ साली ‘गीता प्रेस’ ही प्रकाशन संस्था काढली. त्याद्वारे हिंदू धर्मविषयक विविध साहित्य प्रकाशित होऊ लागले. पुढे १९२६ साली गीता प्रेसमधूनच त्यांनी ‘कल्याण’ मासिक सुरु केले. हे सर्व साहित्य सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी त्याचे दर स्वस्त राहतील ही दक्षता घेतली गेली. हनुमानप्रसादांनी कल्याण मासिकासाठी तसेच गीता प्रेसच्या विविध प्रकाशनांसाठी आयुष्य वेचले. त्यांची जोपासना आणि प्रचंड विस्तार केला. हिंदुराष्ट्राच्या मिशनसाठी प्रचंड जिद्दीने तथापि अत्यंत लवचीकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि संसाधनांची त्यांना कधीच वानवा पडली नाही. लेखकाने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारतात हिंदू राष्ट्र तयार व्हावे हा केवळ संघपरिवाराचाच नाही, तर देशातील पारंपरिक प्रस्थापित उद्योगपतींचाही प्रकल्प असल्याने आर्थिक संसाधनांची मुबलकता हिंदुराष्ट्राच्या मिशनला कायम राहिली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिनदारीविरोध, सामान्य शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय, समाजवाद, सामाजिक समता यांचे वाजणारे पडघम संसाधनांची परंपरागत मालकी आणि सामाजिक उतरंडीत वरचे स्थान असलेल्यांना अस्वस्थ करणारे होतेच. त्यांचे हे स्थान आणि संसाधनांची मालकी धोक्यात येणार हे त्यांना दिसत होते. या धगीपासून वाचण्यासाठीचे प्रभावी साधन म्हणून गीता प्रेस, कल्याण मासिक आणि एकूणच पुराणमतवादी हिंदुत्व प्रचारणाऱ्या संघटनांना त्यांनी जोरदार साध दिली. हे सहाय्य आणि त्याही आधी हनुमानप्रसादांची चिकाटी व कष्ट यांमुळे त्यांच्या मृत्युनंतरही गीता प्रेस आणि कल्याण मासिकाचा कारभार सांभाळणारी नवी नेतृत्वं उभी राहत गेली. अलिकडेच गीता प्रेसने शंभरी पार केली. कल्याण मासिक पुढच्या वर्षी शंभर वर्षांचे होईल.

लेखक म्हणतात, ‘आज मागे वळून पाहिले तर गीता प्रेस आणि कल्याण मासिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, हिंदी भाषा शुद्धीकरणाची चळवळ, गोरक्षा समिती इथपासून पुढे इंटरनॅशनल कृष्णा कॉन्शस (इस्कॉन) अशा सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना, संस्था, प्रसार मोहिमा यांना एकत्र बांधण्याचे काम केल्याचे दिसते. सन २०१४ पर्यंत कल्याण मासिकाचे दोन लाख वर्गणीदार आणि इंग्रजी कल्याण मासिकाचे एक लाख वर्गणीदार होते. तर ७ कोटी २० लाख गीता प्रती त्यांनी वितरित केल्या. पुराणे आणि उपनिषदांच्या एक कोटी नव्वद लाख प्रती आणि ७ कोटी तुलसीरामायणाच्या प्रती वितरित केल्या गेल्या.’ भारतासारख्या अर्धशिक्षित, अशिक्षित देशात झालेला हा साहित्याचा प्रसार लेखकाने म्हटल्याप्रमाणे खरोखरच ‘अचंबित’ करणारा आहे. देशाच्या केद्रस्थानी हिंदुत्ववाद्यांची निरंकुश सत्ता मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ साली स्थापन झाली. पण त्याच्या पायाभरणीचा हिंदुत्वाचा प्रकल्प शतकभर सुरु होता. आधुनिक मूल्यांचा जागर करणारी सामाजिक सुधारणांची चळवळ आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ यांचा दबदबा आणि देशव्यापी प्रभाव असतानाही गीता प्रेस व कल्याण मासिकाचे हिंदुत्वाचे अग्निहोत्र अखंड सुरु होते. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यांतील मूल्यांचे वारसदार विघटित व दुबळे होईपर्यंत हिंदुत्ववादी मंडळी केवळ दबा धरुन नव्हती वा वळचणीला बसली नव्हती; ती अखंड सक्रिय होती. ती कायम हिंदुराष्ट्रासाठीच्या युद्धाच्या पवित्र्यात होती. युद्धतंत्रे म्हणून विविध डावपेच टाकत होती. स्वातंत्र्य चळवळीतील सौम्य हिंदुत्ववाद्यांना हाताशी धरत होती. मोठ्या कौशल्याने आपल्या कामाला काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांच्या शुभेच्छा मिळवत होती. कल्याण मासिकात त्यांना लिहायला लावत होती. स्वतंत्रपणे काम करत असल्या तरी हिंदुत्ववादी संघटना परस्परांना कायम पूरक आणि मदतनीस राहिल्या आहेत. हेडगेवारांच्या काळात संघात आलेल्या गोळवलकरांना गीता प्रेस आणि हनुमानप्रसाद यांना काही काळ सहाय्य करायला संघाने गोरखपूरला पाठवले. कल्याण मासिकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे उत्तरेत अनेक नवे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळाले. गोळवलकर पुढे संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. या सर्व मंडळींकरवी समाजमन पोखरण्याचे, आधुनिक लोकशाही, समतेवर आधारित मूल्ये समाजमनातून निरस्त करण्याचे मिशन अहर्निश सुरु होते.

गीता प्रेस व कल्याण मासिक काय प्रचारत होते, हनुमानप्रसाद वा त्यांच्या वर्तुळातील लेखक काय म्हणत होते ते दलित आणि स्त्रियांच्या संदर्भात थोडे समजून घेऊ. बाकी मुद्द्यांसाठी वाचकांनी मूळ पुस्तकच पहावे.

गीता प्रेसचे अध्वर्यू हनुमानप्रसाद हे सामाजिक समतेच्या पूर्ण विरोधात होते. अस्पृश्यतेचे ठाम समर्थक होते. ‘अस्पृश्यता पाळणे म्हणजे कोणाचाही अपमान करणे नाही. ती आमची धार्मिक रीत आहे’, ‘अस्पृश्यतेची प्रथा ही पूर्णपणे वैज्ञानिक असून त्याला धर्मशास्त्राचा आधार आहे’ अशी काही त्यांची वचने लेखकाने नोंदली आहेत. ‘गांधीजींनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा आग्रह धरणे, हा सनातन हिंदूंच्या धर्माचरणाच्या हक्कावर हल्ला आहे’ अशी स्पष्ट भूमिका हनुमानप्रसादांनी घेतल्याचेही लेखकाने नमूद केले आहे. चातुर्वर्ण्याधारित सनातन धर्म ही कल्याण मासिकाचीही भूमिका होती. लेखकाने हनुमानप्रसादांनी गांधीजींना लिहिलेल्या एका पत्राची नोंद केली आहे. त्या पत्रात हनुमानप्रसाद गांधीजींना लिहितात, ‘तुमच्या उपोषणामुळे अस्पृश्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले, अनेकांनी दलितांबरोबर सहभोजनाचे कार्यक्रम सुरु केले आहेत. तर अनेक मंदिरांनी अस्पृश्यांसाठी प्रवेश खुला केला आहे...अस्पृश्यांबरोबर सहभोजन आणि अस्पृश्यांना मंदिर प्रवेश हा हिंदू धर्मावरील मोठा हल्ला आहे. याचा काय दुष्परिणाम होईल हे त्या देवालाच ठाऊक!’ याही पुढे जाऊन पोद्दार अत्यंत कर्मठ आणि अमानुष भूमिका मांडतात. ‘अस्पृश्य जोवर अंघोळ करत नाहीत, स्वच्छ कपडे घालत नाहीत, दारु सोडत नाहीत, मृत जनावराचे मांस खाणे सोडत नाहीत, तोवर तुमच्या या ‘सहभोजनाला’ काहीही अर्थ नाही.’

पोद्दार आणि सनातनी हिंदुत्ववादी लोकांचा मुख्य टीकेचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता, असे सांगून त्या सर्व कालखंडात ‘कल्याण’ मासिकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सातत्याने अत्यंत कडक टीकेची मोहीम चालवल्याचे लेखक नमूद करतात. गांधीजींना सावध करण्याचा आव आणत पोद्दार लिहितात, ‘लक्षात घ्या, हे दलितांचे नेते (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) स्पष्टपणे म्हणत आहेत की त्यांची चळवळ ‘देवासाठी’ नाही, तर सामाजिक समतेसाठी आहे. त्यांना सरकारी नोकऱ्यांत हक्क हवा आहे...’

पोद्दारांच्या पत्राला गांधीजींनी दिलेले उत्तरही लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहे. गांधीजी म्हणतात, ‘...सनातनी सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यतेची प्रथा आणि दलितांना मंदिर प्रवेशाची बंदी या प्रथा लादून हिंदू समाजात बहिष्कृत वर्ग तयार केला आहे. हीच मुळात ‘अधार्मिक गोष्ट’ आहे आणि क्रूर प्रथा आहे. दलितांना बहिष्कृत करण्यामुळे त्यांच्यावर अस्वच्छता लादली गेली आहे. हा हिंदूधर्मावरील दोष हिंदूंनीच दूर करायला हवा. हे त्यांच्याच (हिंदूंच्या) हिताचे आहे.’

हनुमानप्रसाद, गोयंका आणि त्यांची गीता प्रेस व कल्याण मासिक हे दलितांप्रमाणेच स्त्रियांच्या अधिकारांबद्दलही अत्यंत कडवे होते. स्त्रीविषयक अनेक पुस्तिका, विशेषांक त्यांनी काढले आहेत. ‘आदर्श हिंदू नारी’ या कल्पनेचा गीता प्रेस आणि कल्याण मासिकात कायमच पुरस्कार केला गेला, असे लेखकाने म्हटले आहे. त्यांनी ‘आधुनिक शिक्षणामुळे स्त्रिया भ्रष्ट आणि नष्ट होतात, शिक्षणसंस्था म्हणजे अनैतिक संबंधांचे अड्डे आहेत, अशा स्थितीत स्त्री-पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहणे हाच योग्य मार्ग’ अशा गोयंकांच्या काही विधानांची नोंद केली आहे. मनुस्मृतीचा पुरस्कार, धर्मशास्त्रानुसार घटस्फोट अमान्य, हिंदू विवाह हा करार नव्हे-तर दोन आत्म्यांचे मीलन, घटस्फोट घेणाऱ्या स्त्रिया म्हणजे राक्षशिणी आणि जनावरासम, मातृत्वाच्या उदात्त ध्येयासाठी नवऱ्याच्या छळाकडे दुर्लक्ष करणे हितावह, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची कामेच्छा अनियंत्रित होत असल्याने मुली वयात आल्या आल्या त्यांचे विवाह करणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याला विरोध, स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे समाजाचे नैतिक अधःपतन, व्यायामामुळे स्त्रियांचा नाजुकपणा नष्ट होतो, स्त्रिया हे केवळ वंशवृद्धीचे साधन, कोणत्याही पुरुषाच्या लैंगिक भावना उद्दिपित करण्याची शक्ती स्त्रियांच्यात असल्याने स्त्रियांनी कधीही आपले वडील, भाऊ आणि मुलासोबतही एकांतात राहू नये...अशी असंख्य वचने गीता प्रेस प्रकाशित साहित्यात आणि कल्याण मासिकात नोंदली गेली आहेत.

हिंदू कोड बिलाला गीता प्रेसवाल्यांचा विरोध होणे तर अगदी स्वाभाविक होते. कल्याण मासिकात ‘हिंदू कोड : हिंदू संस्कृति के विनाश का आयोजन’ या शीर्षकाचा मोठा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याची नोंद देऊन लेखक म्हणतात, ‘सर्व सनातन हिंदू धर्म समर्थक एकजुटीने नेहरु आणि डॉ. आंबेडकरांवर तुटून पडले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध तर अत्यंत हीन पातळीवर जाऊन जहरी टीका सुरु केली. .... ‘हा स्वतः हीनवर्णीय माणूस, यांनी म्हातारपणी एका ब्राम्हण स्त्रीशी विवाह केला आणि आता आमच्या धर्मावर हल्ला करणारे हिंदू कोड बिल त्याने आणले आहे.’

गांधीजींशी डावपेचात्मक संबंध ठेवणाऱ्या हनुमानप्रसाद पोद्दारांना नंतर गांधीजी हे सनातन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गातील ‘मोठी धोंड’ आहे, असे वाटू लागल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतात. पुढे सनातनी शक्तींच्या प्रेरणेने व सहाय्याने ही धोंड नथुराम गोडसे दूर करतो. गांधीजींचा देह अचेतन होतो. पण त्यांचा प्रभाव जिवंतच राहतो. ज्यांच्याशी गांधीजींइतकेही संबंध ठेवणे हिंदुत्ववाद्यांना शक्य होत नाही, असे जवाहरलाल नेहरु पुढे दीर्घ काळ या शक्तींचे क्रमांक एकचे शत्रू राहतात. आजही आहेत. मृत नेहरुंचे भूत त्यांना कायम छळत असते.

सामाजिक समतेसंबंधीच्या हनुमानप्रसाद, पर्यायाने गीता प्रेस व कल्याण मासिक यांच्या भूमिका लेखकाने सविस्तर मांडल्या आहेत. त्यांची ओळख करुन देताना मीही त्यातला बराच भाग इथे नोंदवला आहे. याचे कारण दलितांना वश करण्याची बरीच यशस्वी खटपट करणाऱ्या, त्यासाठी हरघडी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दंडवत घालणाऱ्या आजच्या संघ-भाजपाचे मूळ वैचारिक घराणे संबंधितांना कळावे. गांधीजी आणि काँग्रेसशी बाबासाहेबांचे तीव्र मतभेद होते. पण या दोहोंत लोकशाही, समता, सामाजिक न्याय याबद्दल सहमती होती. या आधुनिक मूल्यांच्या, समतेच्या व मानवी मूलभूत हक्कांच्या विरोधात आजच्या संघ-भाजपाचे पूर्वसुरी होते. त्यामुळे त्यांना गांधी, नेहरु, काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळेच शत्रूस्थानी होते. त्यांच्या हिंदुराष्ट्राच्या मोहिमेतील हे मोठे अडथळे होते. आज अनधिकृत हिंदू राष्ट्राचा अंमल सुरुच आहे. संविधान नावापुरते राहिले आहे. तेही जाऊन येऊ घातलेल्या अधिकृत हिंदूराष्ट्राच्या पूर्ततेची दिशा रोखायची असेल तर ज्यांना ज्यांना सनातनी हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता, त्या सगळ्या लोकशाही, प्रगतीशील शक्तींची संयुक्त आघाडी होणे नितांत गरजेचे आहे. राजकीय सत्तेवरुन हिंदुत्ववादी शक्तींना बेदखल करण्यासाठीची राजकीय मोर्चेबांधणी करतानाच या शक्तींनी विषाक्त केलेल्या समाजमनाला सम्यक प्रबोधनाचा उतारा द्यावा लागेल. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यांचा वारसा असलेल्या प्रगतीशील, लोकशाहीवादी संयुक्त आघाडीला विस्कटलेल्या समाजमनाची घडी नीट बसवण्याचे हे काम दीर्घकाळ करावे लागेल. त्यासाठीचा आदर्श आपल्या विरोधकांकडून, गीता प्रेस आणि कल्याण मासिक चालवणाऱ्यांकडून जरुर घ्यावा. संघ-भाजपविरोधी लोकशाहीवाद्यांची संयुक्त आघाडी हे माझे मत आधी होतेच. प्रमोद मुजुमदारांचे हे पुस्तक वाचून त्याचे महत्व आणि तातडी अधोरेखित झाली.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मुक्तसंवाद, ऑगस्ट २०२५)



__________________________________________

हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया

लेखक : प्रमोद मुजुमदार

लोकवाङ्‌मय गृह, मुंबई

पृष्ठे २३२ | किंमत ३०० रुपये
__________________________________________

Wednesday, July 23, 2025

व्हिन्सेंट शीन आणि गांधी, नेहरु, आंबेडकर


आज २३ जुलै. दादासाहेब रुपवतेंचा स्मृतिदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं आहे. बाबासाहेबांची साथ-सोबत लाभलेल्या आणि त्यांच्यानंतर आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांतले एक अग्रणी असलेल्या दादासाहेबांच्या स्मृतीस मनोभावे अभिवादन!

यानिमित्ताने त्यांनी आपल्या आठवणी सांगताना नोंदवलेली एक घटना समजून घेणे उचित ठरेल. मतभेद म्हणजे मनभेद नव्हे हे सतत अधोरेखित करणाऱ्या आणि विरोधी मतांच्या मंडळींशीही सौहार्दाचे संबंध ठेवून सहमतीच्या मुद्द्यांवर सहकार्य साधणाऱ्या दादासाहेबांच्या भूमिकेस कोणत्या वातावरणाचा आधार होता, ते यातून कळते. ‘प्रवरेचा दाता’ या त्यांच्या शब्दांकित केलेल्या आत्मकथेतील हा प्रसंग दत्ता बाळसराफ यांनी माझ्या निदर्शनास आणला. तो खाली देत आहे.

_____________________

व्हिन्सेंट शीन म्हणून एक प्रसिद्ध अमेरिकन लेखक यांनी महात्मा गांधींचे चरित्रपर लेखन केलं आणि त्याला जगभर खूप मागणी आली. त्या व्हिन्सेंट शीननं ठरवलं हा जो पैसा जमेल तो कुटुंबासाठी खर्च करायचा नाही. भारतातल्या एखाद्या महत्वाच्या विषयावर, जो विषय गांधीजींनाही प्यारा, त्याच्यावर हा पैसा खर्च करायचा. व्हिन्सेंट शीन भारतात आले. त्यांनी पंडित नेहरुंसह सर्वांची भेट घेतली. कोणी काय, कोणी काय सुचवलं. पंडितजींनी त्यांना सुचवलं तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना भेटा. बाबासाहेब त्यावेळी घटना समितीत काम करत होते. कायदेमंत्री होते. त्यांनी व्हिन्सेंट शीनला सांगितलं तुझ्या पैशाचा सदुपयोग व्हायचा असेल तर माझी निवडक मुलं तू अमेरिकेला शिकायला घेऊन जा. ...व्हिन्सेंट शीननं स्कॉलरशिप द्यायच्या ठरवल्या. इथं मुंबईला त्यांनी इंटरव्ह्यू ठेवले. निवडक विद्यार्थ्यांचे. मलाही त्याच्यात तार करुन बोलवण्यात आलं. (इथे दादासाहेबांनी गावावरुन सायकल, ट्रक असे करत मुंबईला कसा थकला-भागला पोहोचलो त्याचे वर्णन केले आहे.) ...एक अँग्लो इंडियन बाई इंटरव्ह्यू घ्यायला बसली होती. माझा नंबर येताच मी तिच्यापुढे दाखल झालो. तिने मला सिगरेट ऑफर केली. कदाचित सिगरेट ओढणं हे आधुनिकतेचं लक्षण त्यावेळी समजलं जात असे. मी तर सिगरेटला कधी हातही लावला नव्हता. तोपर्यंत मी चहादेखील पीत नसे. पण त्या बाईला बरं वाटलं की मी सिगरेट पीत नाही आणि ऑफर केलेल्या सिगरेटला नकार देण्याचं धैर्य दाखवलं. माझा इंटरव्ह्यू हा सर्वात दीर्घकाळ चालला. त्या बाईंनी माझ्याशी बऱ्याच विषयांवर चर्चा केली. आणि माझी निवड झाली असं मला सांगण्यात आलं. ...नंतर काय झालं कुणास ठाऊक. ती योजनाच रद्द झाली. कशामुळे रद्द झाली याची मी चौकशी केली नाही.

(प्रवरेचा दाता, पा. क्र. १४६-४७)

_______________

प्रवरेचा दाता

दादासाहेब रुपवते

ग्रंथाली

मूल्य – ३०० रु.
_______________

Sunday, July 20, 2025

विकास की विध्वंस?


हा प्रश्नच कार्यकर्ते-पत्रकार-अभ्यासक अविनाश पोईनकर यांनी वर्षा कोडापे या आपल्या पत्नीच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘सुरजागड विकास की विस्थापन?’ या पुस्तकाचा गाभा आहे. सुरेश द्वादशीवार यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची भूमिका विकासाविरुद्ध नसून विध्वंसाविरुद्ध असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. पुस्तकप्रवेश करणारा वाचक या प्रस्तावनेनेच हादरुन जातो. पुढे काय वाढून ठेवलंय याचा अदमास तिथेच येतो आणि त्याला सामोरे जाण्याची मनाची तयारीही होते. सुरजागडचा प्रश्न, तेथील समृद्ध जल-जंगल-जमिनीचे उजाड होणे, आदिवासींची ससेहोलपट आणि त्यांचा निकराचा लढा याचे विविध आयाम सविस्तरपणे लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहेत. या लढ्याशी परिचित व संबंधित असलेल्या पोईनकर यांना या लढ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी साधना साप्ताहिकाची तांबे-रायमाने शिष्यवृत्ती मिळाल्याने समाजशास्त्रीय संशोधनाचे हे पुस्तक आकारास येऊ शकले.

लोहाबरोबरच तांबे, जस्त, सिमेंट, डोलामाईट, लयटेराईट अशा विविध खनिजांचे आगर असलेला आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा कंपन्या आणि सरकार यांचे लक्ष्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर गडचिरोलीवर खास लक्ष आहे. सुरजागड हा मुख्यतः लोहखनिजाचा प्रदेश. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २००७ साली येथे सुमारे साडेतीनशे एकर जमीन ५० वर्षांच्या लीजवर खाणकाम करण्यासाठी सरकारने दिली. २०२३ मध्ये आणखी पाच कंपन्यांना मिळून साडेचार हेक्टरहून अधिक जमीन खाणींसाठी प्रदान करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने असलेल्या माडिया या अतिअसुरक्षित आदिम जमातीची उपजीविका आणि एकूण जीवनच यामुळे धोक्यात आले असून आता किमान ४० हजार ९०० नागरिक विस्थापित होतील आणि प्रस्तावित २५ खाणी पूर्णतः सुरु झाल्यावर लाखो आदिवासींना याचा फटका बसेल असे लेखकाने नमूद केले आहे. येत्या पाच-दहा वर्षांत घनदाट जंगलाचा प्रदेश ही गडचिरोलीची ओळख पुसली जाईल असा लेखकाचा अंदाज आहे.

आदिवासी समाजाची तथाकथित मुख्यप्रवाही समाजाने कायम उपेक्षा केली. आदिवासी नेते जयपालसिंग मुंडा यांनी संविधान सभेतील आपल्या भाषणात याकडे लक्ष वेधले होते. (त्या भाषणातील एक अवतरण या पुस्तकात प्रारंभीच दिलेले आहे.) लेखकानेही ही खंत या पुस्तकात व्यक्त केली आहे. त्यादृष्टीनेच आदिवासींच्या योगदानाला उजाळा देताना स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्ध्यांची कामगिरी पहिल्याच प्रकरणात नोंदवलेली आहे. या खाणींच्या प्रकल्पात भरडल्या जाणाऱ्या माडिया या आदिम जमातीचा परिचय दुसऱ्या प्रकरणात आहे. माडिया व गोंड या दोन स्वतंत्र जमाती असतानाही ‘माडिया गोंड’ म्हणून माडियांना संबोधले जाणे कसे गैर आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. माडियांच्या सांस्कृतिक जीवनाची आणि धारणांची ओळख त्या पुढच्या भागात आपल्याला मिळते. सुरजागड लोह खाणींचा इतिहास, वनकायदे, या कायद्यांना न जुमानणे तसेच त्यातील सोयिस्कर बदल, कंपन्यांचे आगमन, सरकार व लोकप्रतिनिधींचा साळसूद व्यवहार, नक्षलवादी आणि आंदोलक यांच्यातील भेद, अहिंसक आंदोलने करणाऱ्यांना मुद्दामहून नक्षलवादी ठरवून चिरडणे, प्रकल्पांमुळे आदिवासींचे विविध थरांवर होणारे शोषण या बाबी सविस्तरपणे विविध प्रकरणांतून लेखकाने मांडलेल्या आहेत. यात पोखरलेले डोंगर, सपाट झालेले जंगल, खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण, आरोग्याच्या समस्या, उत्खननातून निघणाऱ्या मातीने नदीचे पाणी दूषित होणे, उपीजीविकेची पारंपरिक साधने नष्ट होणे, एकूण जगण्याचा पोतच विदीर्ण होणे, दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाची माध्यमांनी दखल न घेणे अशा अनभिज्ञ वाचकाच्या मनाला आणि समजुतींना धक्का देणाऱ्या कैक बाबींचा समावेश आहे.

पाठबळ म्हणून पुस्तकाच्या अखेरीस काही महनीयांचे अभिप्राय आहेत. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी यांचेही एक टिपण आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मराठी वाचकांना आपली संवेदनशीलता विस्तारित करण्यासाठी’ लेखकाने मोठ्या श्रमाने तयार केलेल्या या दस्तावेजाचा नक्कीच उपयोग होईल. यापलीकडे जाऊन त्यातील प्रश्नाची दाहकता कमी करण्यात आपण समाज म्हणून काय करु शकतो हा मुद्दा आहे. तो किती कळीचा आणि कठीण आहे, याची कल्पना येण्यासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या प्रस्तावनेकडे पुन्हा वळू. त्यात ते म्हणतात – ‘या संकटाचा सामना करण्यासाठी प्रथमच सुरजागड क्षेत्रातले नेतृत्वहिन व बहुसंख्येने निरक्षर असलेले आदिवासी एकत्र आले आहेत. पैसा आणि साधने या साऱ्यांच्या अभावी ते आपला जीवनमरणाचा संघर्ष लढवीत आहेत. या संघर्षाचा शेवट कसा होईल, याची साऱ्यांना कल्पना आहे आणि तो शेवट आदिवासींचाच असणार आहे. वारुळे जमीनदोस्त करता येतात. पण मुंग्या माराव्याच लागतात. हा नैसर्गिक दुष्टावा आता व्यावसायिक अघोरीपणात रुपांतरित झाल्याचे सांगणारे हे चित्र आहे.’

हे चित्र भीषण आहे. हा शेवट ठरलेला असेल तर लेखकाने हे पुस्तक लिहावे का? आणि आपण वाचावे तरी का? कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा यातली शोकांतिका आपण पाहतोच की! तसे याकडे पहावे का? द्वादशीवार हे चित्र लिहूनही अखेर या लढ्याला शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत राहण्याचे अभिवचन देतात. जर हा शेवट अटळ असेल तर या शुभेच्छा आणि सोबत राहण्याचे वचन कशासाठी? द्वादशीवारांना त्यांनी मांडलेले चित्र बदलावे असे मनोमन वाटते. आपल्या विवेकाला हादरवून सक्रिय करणे हाच हेतू त्यांचा आहे. या देशाचे मालक असलेले ‘आम्ही भारताचे लोक’ आपले घटक असलेल्या या आदिवासी भावंडांच्या सोबत उभे राहून आपण निवडलेल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला प्रवृत्त झालो तर अविनाश पोईनकरांच्या पुस्तकलेखनाच्या श्रमाचे चीज झाले असे होईल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________________________

‘सुरजागड : विकास की विस्थापन?’

अविनाश पोईनकर

हर्मिस प्रकाशन, पुणे

पाने – १७० | मूल्य – २०० रुपये
________________________________

Friday, July 4, 2025

यशवंत मनोहरांच्या दोन नव्या पुस्तकांचे स्वागत

१) In the Rain of Fire (‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’चा इंग्रजी अनुवाद)


‘In the Rain of Fire’ हा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या यशवंत मनोहर यांच्या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद. तो केला आहे स्वतः कवी असलेल्या विवेक काटीकर यांनी. अग्निपरीक्षेचे वेळापत्रक हा ५५ कवितांचा काव्यसंग्रह; खरं म्हणजे काव्यग्रंथ. ३३५ पानांचा. यातल्या अनेक कविता दीर्घ आहेत. २०२१ साली हा कवितासंग्रह आला आणि यावर्षी २०२५ ला त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. तोही ३२८ पानांचा. मनोहरांच्या कविता गूढ नाहीत. किंबहुना कवीला म्हणायचंय त्याहून वेगळा अर्थ कवितांचा वाचकांना लागण्याच्या ते विरोधातच आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कवितालेखन करणाऱ्या मनोहरांची प्रतिभा आजही नवोन्मेषशाली आहे. त्यांची शैली आणि शब्दांची नवनिर्मिती कायम तसेच टवटवीत आहे. प्रगल्भतेचा अधिकाधिक उन्नत थर ती गाठतेच आहे. अशावेळी हे सारं इंग्रजीत आणणं हे विलक्षण आव्हान होतं. या आव्हानाला भिडण्याचं धैर्य विवेक काटीकर यांनी दाखवलं आहे.

माहितीपर गद्याचा अनुवाद आणि सर्जक साहित्याचा अनुवाद यांत जमीनअस्मानाचे अंतर असते. कवितेचा अनुवाद ही तर आणखी कठीण बाब. मूळ कवीची शैली, त्याने खेळवलेले, योजलेले शब्द, त्यांचे क्रम आणि यांतून येणारी तिची लय अनुवादात आणणे हे तर महाप्रचंड आव्हान. विवेक काटीकर त्याला सामोरे गेले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यशवंत मनोहरांची कविता ही सर्वसाधारण कविता नव्हे. सर्व तऱ्हेच्या विरुपतांतून मानवतेला मुक्त करण्याचा तो एल्गार आहे. त्यामुळेच तो मराठीपुरता न राहता जगातील अधिक विस्तृत मानवसमूहांपर्यंत पोहोचवणे आवश्यकच होते. ते काम काटीकर यांनी केले आहे. यासाठी त्यांना धन्यवाद.

अनुवाद करण्याची काय पद्धत अनुसरली याबद्दल या पुस्तकाच्या सुरुवातीलाच काटीकर यांनी लिहिले आहे. ते म्हणतात – ‘I adopted ‘meaning to meaning’ approach rather than ‘word to word approach.’’ अर्थात हे त्यांनी योग्यच केलं. भाषेला लीलया वळवणाऱ्या, नित्यनव्या शब्दनिर्मितीने तिला श्रीमंत करणाऱ्या, शब्दांना बागडवणाऱ्या मनोहरांच्या कवितांचा शब्दशः अनुवाद करणं ही किती अवघड गोष्ट आहे, हे खालचं एक उदाहरण पाहिलं तरी लक्षात येईल.

‘नदीमाय’ कवितेच्या १५ व्या भागात ते म्हणतात –

‘अशा अनेक नद्यांमधून
पाण्याऐवजी जीवनच वेल्हाळताना मी बघितले.’

काटीकरांनी इंग्रजीत केलेला याचा अनुवाद पहा –

‘I saw in such rivers, not water,
But life manifesting itself.’

मूळ मराठी कवितेत पाण्याला समानार्थी असलेला शब्द ‘जीवन’ हा आयुष्य या अर्थी मनोहरांनी वापरला आहे. पण या जीवनाचे ‘वेल्हाळणे’ पाणी या अर्थी खळखळत्या प्रवाहाच्या प्रतिमेशी समरुप आहे. वाचकाला सोबत दुडदुडवायला लावणाऱ्या मूळ मराठीतलं हे प्रतिमा-सौंदर्यसामर्थ्य इंग्रजीत कसं येणार? इंग्रजीत water आणि life हे समानार्थी आणि तरीही वेगळ्या अर्थाचे असे शब्द नाहीत. काटीकरांना ‘manifesting’ वरच भागवावे लागले आहे. मूळ इंग्रजीतून मराठीत अनुवाद करतानाही हीच अवस्था झाली असती. सर्जक साहित्याच्या - त्यातही कवितेच्या अनुवादाची ही नैसर्गिक मर्यादा आहे.

यशवंत मनोहरांची कविता इंग्रजीत आल्याने इंग्रजीचा परिचय असलेल्या जगातील व्यापक समुदायांपर्यंत ती पोहोचेलच. पण उद्या इंग्रजी न जाणणाऱ्या समुदायांपर्यंतही इंग्रजीतून त्यांच्या भाषेत अनुवाद होऊन पोहोचण्याच्या शक्यता रुंदावल्या आहेत. यशवंत मनोहरांची कविता अशारीतीने जगात जाण्याची आवश्यकता आणखी एका कारणाने मला वाटली. ते म्हणजे या ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या कवितासंग्रहाला यशवंत मनोहर यांनी जोडलेला ‘मी अशीच कविता का लिहितो?’ हा उपोद्घात. ‘In the Rain of Fire’ या इंग्रजी अनुवादातही तो आहे. साहित्याचा हेतू काय? लेखकाच्या भूमिकांचा प्रभाव त्याच्या साहित्यावर पडावा का?..या प्रश्नांवर भारतातच नव्हे, तर जगभरच्या कलाविश्वात आजही वाद झडतात. यशवंत मनोहर त्यांना म्हणायचे ते फक्त कवितेत म्हणून थांबत नाहीत. मी मला वाटते ते लिहिले, आता वाचकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊदे म्हणून सोडून देत नाहीत. आपले साहित्यहेतू थेट, सुस्पष्ट मांडतात. उच्चरवात जाहीर करतात. काहीही हातचे न राखता आपला संदर्भ अवकाश, आपली वैचारिक परंपरा रेखांकित करतात. ही त्यांची अनन्यता जगाला कळणे गरजेचेच होते. त्याची संभाव्यता या इंग्रजी अनुवादाने वाढली आहे.

मराठी उपोद्घातातली ही काही विधाने पाहिल्यावर आपल्यालाही त्याची सत्यता पटेल :

- मी कविता लिहितो म्हणजे अस्तांच्या नोंदीही लिहितो आणि क्षितिजाला येणाऱ्या नव्या पालवीचीही चाहूल लिहितो.

- बुद्ध, लोकायत, सॉक्रेटिस, मार्क्स, जोतीबा फुले, सार्त्र, रसेल, रामस्वामी नायकर आणि बाबासाहेब आंबेडकर अशा लाखो प्रज्ञावंतांनी हा सर्वोच्च नीतीचा इहवादी आदर्श मला सांगितला आहे.

- कविता अर्थमयच असते. कवितेची ही अर्थमयता कवीच्या जीवनदृष्टीतूनच उगवलेली असते.

- माझी कविता अज्ञान, विषमता आणि भ्रम तुडवितच पुढे जाते आणि सर्वहिताय नीतीने सांगितलेला कवितेचा अर्थ हाच माझ्या कवितेचा प्राण आहे असेच मी मानतो.

- (कवितेतून) स्वतःच्या सोयीचा अर्थ काढण्याची ही सोय कवीलाच नाकारीत असते. कवीचे सत्य नाकारण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले या लोकांना? हे चैतन्यवाद्यांचे लबाड सौंदर्यशास्त्र आहे.

- कवितेतला अर्थरहित मानणे आणि वाचकाला त्याला हवा तसा अर्थ घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजेच कवीच्या पुनर्रचनाशील व्यक्तिमत्वाला नकार देणेच असते.

- कवी केशवसुतांची कविता ही आजही माझी पहिली तात्त्विक आवड आहे.

- केशवसुत काही परलोकवादी प्रतिभेचे कवी नव्हते. ‘देव दानवा नरे निर्मिले’, ‘ब्राम्हण नाही हिंदुही नाही...’, ‘वंदुनिया ह्या देवांलागुनि धाई धाई मानव रडती...’, ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत’ आणि ‘जग हे बदलायाचे’ हे केशवसुतांचे इहवादी क्रांतिकारी आशयविश्व बाजूला करुनच केशवसुतांसंबंधीचा आदर व्यक्त केला गेला. हा धागा १९६० नंतरच्या काही प्रतिभांनीच पुढे नेला असे मला नम्रपणे वाटते.

हे टिपण मराठी वाचकांना ‘In the Rain of Fire’ चा परिचय व्हावा म्हणून लिहिले आहे. त्यामुळे वरील विधाने मूळ मराठी पुस्तकातूनच घेतली. इंग्रजीत त्यांचा उत्तम अनुवाद विवेक कानिटकर यांनी केला आहे.

_____________________________

In the Rain of Fire

By Yashwant Manohar

Translation: Vivek Katikar

Red Sparrow A Media House

Mob: 8530675264 / 9529593553

Price: Rs. 1200

_____________________________

मनोहरांनी ‘In the Rain of Fire’ हे पुस्तक ‘मराठी क्रांतिकारी साहित्याचे संस्थापक डॉ. म. ना. वानखडे यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण’ केले आहे. याच म. ना. वानखडे यांच्यावरच्या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. त्याविषयीचा परिचय पुढे करुन घेऊ.


२) क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ








आपल्या प्रतिभेचा आणि व्यासंगाचा सर्जनशील तसेच वैचारिक आविष्कार करणारी शेकड्याहून अधिक पुस्तके यशवंत मनोहरांनी लिहिली आहेत. त्यात हे पुस्तक नसते तर काही तरी राहून गेले आहे, असे वाटले असते. अर्थात, हे आपल्याला जाणवते ते त्यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचूनच. साहित्यातला एक लखलखीत प्रवाह म्हणून आज देश-विदेशात दखलपात्र झालेल्या ‘विद्रोही दलित साहित्य’ या इमारतीची ओळख, चौकट आणि चबुतरा सिद्ध केला तो म. ना. वानखडे यांनी. मनोहरांच्या भाषेत ‘ज्ञानयुद्धातील आधुनिक अर्हत’ असलेले म. ना. वानखडे येणाऱ्या पिढ्यांना कळण्याची सोय यशवंत मनोहर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाने झाली आहे. वास्तविक, वानखडेंच्या एकूण साहित्याचे संकलन, अनुवाद करवून घेऊन ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’ या नावाने १९७९-८० साली निघालेले पुस्तक वामन निंबाळकरांसमवेत यशवंत मनोहरांनीच संपादित केले होते. ‘क्रांतदर्शी म. ना. वानखडे’ या पुस्तकात मनोहरांनी पाच पिढ्यांच्या लोकांना लिहायला लावले आहे. यात त्यांचे समकालीन सहकारी, विद्यार्थी तसेच नातेवाईक आहेत. या प्रत्येकाच्या नजरेतून, आकलनातून आणि अनुभवातून वानखडेंचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि थोरवी आपल्यासमोर साकारते. विचार, आठवणी आणि परिशिष्टे अशा तीन भागांत या पुस्तकाची विभागणी आहे. एकूण ६५ लेख आणि मनोहरांची एक मुलाखत यात आहे. (लेखक व त्यांचे लेख यांची कल्पना येण्यासाठी अनुक्रमणिकेचे फोटो सोबत देत आहे.)

१९२४ ते १९७८ असे केवळ ५४ वर्षांचे आयुष्य लाभलेले मनोहर नामदेवराव वानखडे मूळचे अमरावती जिल्ह्यातले. तेजस्वी व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक राहिला. मराठवाड्यासारख्या मागास भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाद्वारे उच्चशिक्षणाचा पाया रचला. मिलिंद हे आंबेडकरोत्तर चळवळीच्या विविध क्षेत्रांत भरारी घेणारे कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ बनले. या उद्देशानेच बाबासाहेबांनी या कॉलेजमधील प्राध्यापक निवडताना व्यक्तिशः लक्ष दिले. वानखडेंना त्यांनी स्वतः मिलिंदमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवडले. पुढे परदेशातील उच्च शिक्षणासाठी ज्या १४ जणांची बाबासाहेबांनी निवड केली, त्यात म. ना. वानखडे होते. इंग्रजी साहित्यात एम. ए. आणि नंतर पी. एच. डी. वानखडेंनी केली. परदेशातून परतल्यावर पुन्हा त्यांनी मिलिंदमध्ये प्राध्यापकी सुरु केली. मिलिंदचे प्राचार्य म. भि. चिटणीस मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून गेल्यानंतर डॉ. वानखडे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

बाबासाहेबांना अभिप्रेत विद्यार्थी घडवणे हे त्यांचे मिशन होते. ज्या अभावग्रस्त पार्श्वभूमीतून हे विद्यार्थी येत त्यातून येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांच्यात अस्मिता जागवणे, या विद्यार्थ्यांचा कल व गुण ओळखून त्यांना विषय सुचवणे, त्यात मार्गदर्शन करणे हे त्यांचे नित्यकर्म होते. खुद्द या पुस्तकाचे संपादक यशवंत मनोहर यांना मुदत संपल्यानंतरही त्यांना रुची असणाऱ्या कलाशाखेत प्रवेश मिळवून देणे, प्रथम वर्गात एम. ए. झाल्यावर आधी पैठण आणि नंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवून देणे यासाठी वानखडेंनी सहाय्य केले. मनोहरासंहित वानखडेंच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या या मदतीच्या व्यक्तिगत अनुभवांची या पुस्तकात कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरुन येते. यशवंत मनोहर पुस्तकाच्या शेवटच्या भागातील आपल्या मुलाखतीत म्हणतात – ‘माझे सगळे वाङ्मयीन व्यक्तिमत्व आहे ते डॉ. म. ना. वानखडेंमुळेच निर्माण करण्याची संधी मला मिळाली. जर दुसरे कोणी प्रिन्सिपॉल असते आणि त्यांनी मला प्रवेश दिला नसता तर माझे आयुष्य वैराण झाले असते. मी यशवंत मनोहर होऊ शकलो नसतो.’ सुधीर रसाळ हेही वानखडेंचे विद्यार्थी. ते लिहितात – ‘वानखडे सरांनी पंधरा एक पुस्तकांची यादी मला दिली. ही पुस्तके कोणत्या क्रमाने वाचायची हेही मला समजावून सांगितले. मी आता मराठीतला एक चांगला समीक्षक म्हणून ओळखला जातो. खरे म्हणजे त्याचे श्रेय वानखडे सरांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादीला आणि त्यांनी ती कोणत्या क्रमाने वाचायची याबद्दल दिलेल्या सल्ल्याला आहे. ’

विद्यार्थ्यांना असे सहाय्य करण्याबद्दल वानखडेंची भूमिका काय होती? मिलिंद महाविद्यालयाच्या ७५-७६ च्या वार्षिकांकात लिहितात – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच मी विद्यार्थ्यांच्या बाजूने कायम उभा राहिलो...त्यांनी माझ्या हाती दिलेली ही ज्ञानाची ज्योत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्त केली.’

अमेरिकेतल्या वास्तव्यात कृष्णवर्णीय विद्रोही चळवळीचा परिचय, त्यांच्या साहित्याचा अभ्यास यांतून म. ना. वानखडेंना भारतात दलित विद्रोही साहित्याला गती देण्याची प्रेरणा मिळाली. भारतात आल्यावर ‘प्रबुद्ध भारत’ मध्ये त्यांनी ‘दलितांनो, विद्रोही वाङ्मय लिहा’ हा लेख लिहिला. याचा अर्थ दलित साहित्य त्या आधी लिहिले जात नव्हते असे नव्हे. शंकरराव खरात, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागूल आदि मंडळी आपल्या लेखणीतून दलित जीवन चितारतच होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकांना काय व कसे लिहावे याबद्दल मार्गदर्शन करताना काय म्हणतात, हे डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या लेखात भालचंद्र फडकेंच्या पुस्तकातील संदर्भ देऊन नोंदवले आहे. बाबासाहेब म्हणतात – ‘मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचे आहे की उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिक मूल्ये यांचा आपल्या साहित्यप्रकारातून आविष्कार करा. आपले लक्ष आकुंचित, मर्यादित ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका. तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करु नका. तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असे प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे फार मोठे जग आहे, हे विसरु नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजावून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे.’

बाबासाहेबांनी मांडलेल्या या साहित्याच्या प्रयोजनाची बांधबंदिस्ती म. ना. वानखडेंनी केली. सर्वसाधारण मराठी साहित्याहून दलित साहित्याचे वेगळेपण काय, याची चौकट त्यांनी रचली. विद्रोह हा त्याचा अंगभूत व अनन्य गाभा कसा याची मीमांसा केली. विद्रोही दलित साहित्याची एक आखीव व्याख्या त्यांनी केली. ‘मिलिंद साहित्य सभा’ स्थापून साहित्यविषयक उपक्रमांसाठी एक संस्थात्मक मंच तयार केला. प्रस्थापित प्रकाशने दलित साहित्य प्रकाशित करणे कठीण. त्यासाठी त्यांनी ‘अस्मिता’ हे त्रैमासिक सुरु केले. सरकारी नियमांमुळे त्याचेच पुढे ‘अस्मितादर्श’ नामकरण झाले. त्यांना स्वतःला त्यात पुढे लक्ष घालता आले नाही, तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी ते चालवले. ‘अस्मितादर्श’ने अनेक लेखकांना संधी दिली. नवे लेखक घडवले.

म. ना. वानखडे यांच्या साहित्यविषयक भूमिकेची सूत्रे समजून घेण्यासाठी त्यांचे १९६७ सालच्या भुसावळच्या ‘महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलनाच्या’ अध्यक्षपदावरुन केलेले भाषण उपयुक्त ठरते. या कृतज्ञताग्रंथातील अनेक लेखकांनी त्याची नोंद घेतली आहे. के. व्ही. सरवदेंच्या लेखातील काही अवतरणे येथे देणे उद्बोधक ठरेल. ‘आजवरच्या साहित्यात हिंदू समाजातील वरच्या मानल्या गेलेल्या वर्गाचेच जीवन प्रतिबिंबित झाले’ असल्याचे सांगून वानखडे म्हणतात – ‘आधुनिक साहित्यात मध्यमवर्गीय पांढरपेशा अशा ब्राम्हण समाजाचे चित्रण आहे. कारण लेखक हा त्या वर्गातीलच होता. काही प्रमाणात या लेखकांना स्त्रियांचे दुःख जाणवले. हरिभाऊ आपट्यांनी स्त्रियांच्या परवशतेचे चित्रण ‘पण लक्षात कोण घेतो?’ मध्ये केले. देवलांनी ‘शारदा’ या नाटकामध्ये स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. पण त्यांना आम्हा दलितांची वेदना जाणवली नाही.’

(वानखडेंचे सहकारी व प्रथितयश लेखक भालचंद्र फडके यांनी आपल्या लेखात केशवसुतांचा ते याबाबतीत अपवाद करत अशी नोंद केली आहे.)

ग्रामीण साहित्याच्या प्रवाहानेही या काळात जोम धरला होता. त्याच्याशीही फारकत घेताना ते नोंदवतात – ‘यातही आपले जीवन नाहीच. उलट त्यात चितारलेले ग्रामीण जीवनही खरे नाही. शहरात बसून रोमँटिक चष्म्यातून पाहिलेले हे जीवन आहे...जीवनाचे वास्तव दर्शनच या मराठी लेखकांना झाले नाही.’

अन्य प्रगतीशील साहित्यप्रवाहसुद्धा त्यांना जवळचे वाटत नाहीत. त्याबद्दल वानखडेंची तक्रार अशी – ‘साम्यवाद किंवा गांधीवाद यांनी प्रेरित झालेल्या मराठी वाङ्मयातही आपले चित्र आढळत नाही. या मानवतावाद्यांच्या साहित्यातील हरिजनोद्धारात आईची माया नाही. दाईची भूतदया आहे. आणि भूतदया स्वाभिमानाला डिवचणारी आहे.’

वानखडेंचे हे भाषण ‘दलित साहित्याचा जणू जाहीरनामाच’ आहे असा निर्वाळा अनेकांनी या पुस्तकात दिला आहे.

म. ना. वानखडे यांचे सर्व म्हणणे सलगपणे या पुस्तकात नाही. तो या पुस्तकाचा हेतूही नाही. यशवंत मनोहर आणि वामन निंबाळकर यांनी वानखडेंच्या लिखाणाचे संपादन करुन या आधीच पुस्तक काढल्याचे वर नमूद केले आहेच. कृतज्ञताग्रंथातील लेखांतून वानखडेंच्या मांडणीचा, त्यांच्या व्यवहाराचा काय परिणाम झाला याचा दाखला मिळतो. या लेखकांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यापक वैचारिक क्षेत्रातील मूलभूत हस्तक्षेपाबद्दलची कृतज्ञता प्रत्येक पानातून पाझरताना वाचकाला दिसते. म. ना. वानखडे २०२४ साली शंभर वर्षांचे झाले असते. त्यांच्या जन्माच्या शंभरीनिमित्ताने काढलेल्या या ग्रंथाला संपादकांनी दिलेले ‘कृतज्ञताग्रंथ’ हे अगदी सार्थ नाव आहे.

या ग्रंथातील लेख म. ना. वानखडेंविषयी असले तरी अपरिहार्यपणे मिलिंद महाविद्यालय, नागसेन वन या सर्व परिसराचे दर्शन त्यातून वाचकांना घडते. भालचंद्र फडके यांनी त्याला ‘दलित साहित्याच्या नव्या प्रवाहाचे उगमस्थान’ म्हटले आहे. बाबासाहेबांनी उभारलेल्या तेथील वास्तूंत प्रत्यक्ष वावरलेल्यांच्या जीवनाचे सोने झालेच. पण बाबासाहेबांची प्रेरणा वसत असलेल्या या परिसरातील कणाकणांचा गंध या पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचतो. त्याला ऊर्जा देतो. असे पुस्तक संपादित करण्याचे कष्ट वयाच्या ऐंशीचा टप्पा पार केलेल्या यशवंत मनोहर सरांनी घेतले आणि ही ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल सरांच्या प्रति कृतज्ञता. त्यांना सहाय्य करणाऱ्या ‘संपादक कुटुंबा’ला मनापासून धन्यवाद.

वानखडेंसारख्या प्रज्ञावंताने समाजाला अजून खूप काही दिले असते. ५४ व्या वर्षी हृदयविकाराने अकस्मात त्यांचे निधन झाले. विचारवंताच्या दृष्टीने हे उमेदीचे वय असते. त्यांच्या या जाण्याने सगळेच हादरले. या पुस्तकातील लेखांतूनही ती व्यथा व्यक्त होते. म. ना. वानखडेंचे ‘मिलिंद’ मधील एक सहकारी व थोर समीक्षक रा. ग. जाधव यांचे एक अवतरण पुस्तकाच्या प्रारंभी दिले आहे. वानखडेंनी ज्याच्या काव्यावर प्रबंध लिहिला त्या त्यांच्या आवडत्या वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कवितेचा संदर्भ या अवतरणात घेऊन जाधवांनी वानखडेंना आदरांजली वाहिली आहे. त्याची नोंद करुन या पुस्तकाचा परिचय संपवतो.

‘ “अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर व्हिटमनने एक भावोत्कट विलापिका लिहिली. तिचा आशय असा – या माझ्या कप्तानाने नाव नीटपणे किनारी लावली. वाऱ्यावादळातून ती सांभाळून अखेर एका संकटग्रस्त सफरीने मंझिल गाठली. आता किनाऱ्यावरुन घंटानाद ऐकू येत आहे. सफर सफल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या मुखावर दृगोचर होत आहे. पण माझा कप्तान कुठे आहे? तो तर नावेत अचेतनपणे पडून आहे आणि माझ्या हृदयातून रक्ताचे थेंब ठिबकत आहेत.”

दलित साहित्याची नौका पहिल्या वादळी लाटांमधून सुरक्षितपणे सांभाळून या कप्तानाने नीटपणे किनारी लावली. पण त्याच्या जीविताची सफर मात्र निर्दयी नियतीने संपवून टाकली. माणूस पराधीन असतो हेच खरे. पण हे कप्ताना, तुझे कार्य कोण विसरेल? तुला शतशत प्रणाम!’

___________________________

क्रांतदर्शी म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ

संपादक – यशवंत मनोहर

प्रकाशक – प्राईम पब्लिशिंग हाऊस

संपर्क - ८९९९२३४५५६ / ९६६५६२६७१७

किंमत: ५५० रु.

_____________________________

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Tuesday, May 6, 2025

सामाजिक सद्भाव (दूरदर्शन वरील मुलाखत))


 https://youtu.be/lNIvAXMYp_8?si=gqeDBGXbHjzyCB-Q

सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते यांचा सामाजिक सद्भाव हा विशेष कार्यक्रम

निर्माता - विजय ढगे 

सखी सह्याद्रीमध्ये ३० जानेवारी २०१९ रोजी थेट प्रसारण झाले.


Friday, March 21, 2025

महाबोधी विहारला ‘मुक्ती’ची प्रतीक्षा !


जवळपास पंधरा वर्षांपूर्वी बिहारमधल्या बोधगयेच्या महाबोधी विहारात मी गेलो होतो. त्यावेळी बुद्धवंदना सुरु होती. वंदना संपली आणि उपरणे घातलेले पुरोहित हातात आरतीचे ताट घेऊन आत आले. त्यांनी आरती सुरु केली. ...हे पाहून मी अचंबित झालो. नंतर कळले की हे विहार निर्णायकपणे बौद्धांच्या ताब्यात नाही. तेथील व्यवस्थापन मुख्यतः हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हा प्रश्न खूप जुना आहे. त्याविरोधात अनेकवेळा आवाज उठवूनही तो अद्याप सुटलेला नाही. सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाने जोर पकडला आहे. महाबोधी विहाराच्या परिसरात उपोषणे तसेच देशात विविध राज्यांत आंदोलने सुरु आहेत. जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपिले केली जात आहेत.

विविध अभ्यासकांनी महाबोधी विहाराच्या इतिहासाबद्दल नोंदवलेल्या या काही बाबी :

ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, त्या परिसरात सम्राट अशोकाने बांधलेले हे विहार. २३०० वर्षांपूर्वी. नंतर गुप्त आणि पाल राजांनी त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या. बौद्धांचा कट्टर विरोधक असलेल्या ब्राम्हणी धर्माच्या बंगालच्या शशांक राजाने पालांवर आक्रमण करुन त्यांना पराभूत केले. पालांची महाबोधी विहार परिसरावरील देखरेख संपली. पुढे एका शैव महंताने हे विहार ताब्यात घेतले. अनेक पुरातत्व उत्खनने करणाऱ्या अलेक्झांडर कनिंघम या इंग्रज अधिकाऱ्याने या महाबोधी विहाराचा मातीत गाडला गेलेला भाग बाहेर काढून विहाराचे एकूण संकुल नीटनेटके केले.

शैव महंताच्या ताब्यातून हे विहार बौद्धांच्या अखत्यारित यावे यासाठी १८९० पासून अनागारिक धर्मपाल या मूळच्या श्रीलंकेच्या बौद्ध भिख्खूंनी आवाज उठवला. हे विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे, यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. जागतिक बौद्ध समूहांशी संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांच्या सहाय्याने बोधगया तसेच सारनाथ येथील परिसरातील बौद्ध स्थळांच्या विकासासाठी ते अविरत कार्यरत राहिले. महाबोधी विहाराच्या ताब्याचा प्रश्न सोडवायला ब्रिटिश आधी अनुकूल होते. मात्र अनागारिक धर्मपालांच्या जपानी सधन बौद्धांच्या सहाय्याने या परिसराच्या जवळ काही वास्तू उभ्या करण्याच्या प्रयत्नांनी ब्रिटिश सावध झाले. जपान आणि इंग्लंड यांचे तणावाचे संबंध लक्षात घेता, जपान्यांचे हे हेरगिरीचे प्रयत्न असावेत या संशयाने बिथरलेल्या ब्रिटिशांनी वास्तू बांधण्याचा हा उपक्रम मोडून काढला आणि एकूणच या मुद्द्याला जैसे थे ठेवले.

काँग्रेसने या मुद्द्यावर १९२२ साली राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अन्य सहा सदस्यांत बोधगयेचे ‘महंत’, स्वामी दयानंद सरस्वती, बाबू ब्रजकिशोर प्रसाद, के. पी. जयस्वाल यांच्याखेरीज बौद्धांच्या वतीने केवळ भिख्खू अनागरिक धर्मपाल यांचा समावेश होता. हिंदुमहासभा त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व सर्वार्थाने मान्य करणारी संघटना होती. हिंदूमहासभेने आपल्या सभेत विहाराचा ताबा हिंदू आणि बौद्ध यांच्याकडे संयुक्तपणे असावा, असा ठराव केला. बुद्धाला हिंदू विष्णूचा नववा अवतार मानतात; त्यामुळे तो हिंदूंचाही आहे, या मान्यतेचा आधार त्यांनी यासाठी घेतला. खरे म्हणजे, ब्राम्हणी वैदिक धर्माविरोधात उभ्या ठाकलेल्या बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करणे हे विरोधकाला आत्मसात करुन संपवण्यासाठी केलेले अपहरण आहे. परंतु ‘पाच बौद्ध आणि पाच हिंदू यांच्याकडे या स्थळाचा ताबा असावा’ अशी शिफारस राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

अनागारिक धर्मपालांच्या नंतर जे महत्वाचे प्रयत्न महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी झाले त्यातला महत्वाचा प्रयत्न थोर बौद्ध विद्वान राहुल सांकृत्यायन यांचा होता. राहुल सांकृत्यायन काँग्रेसचे सचिव असताना त्यांनी महाबोधी विहाराचा मुद्दा महात्मा गांधीजींपुढे मांडला. स्वातंत्र्य आंदोलनात कोणतीही फाटाफूट नको, याबद्दल दक्ष असणाऱ्या गांधीजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर या प्रश्नाची सोडवणूक आपण करु, असे आश्वासन सांकृत्यायनांना दिले.

स्वातंत्र्य मिळाले आणि लगोलग १९४८ साली गांधीजींचा खून झाला. गांधीजींच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी केली नाही. उलट बिहार सरकारने घटना समितीचे कामकाज सुरु असतानाच जून १९४९ मध्ये महाबोधी विहार कायदा केला. या कायद्यानुसार विहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी ९ जणांची समिती मुक्रर करण्यात आली. त्यात ४ हिंदू, ४ बौद्ध आणि गया जिल्ह्याचा हिंदू जिल्हाधिकारी अध्यक्ष असेल, असे ठरवण्यात आले. जर जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर अन्य हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून त्याच्या जागी नेमले जाईल, अशीही त्यात तरतूद होती. म्हणजेच ४ बौद्ध आणि ५ हिंदू. हिंदूंची बहुसंख्या. अर्थात निर्णयप्रक्रियेत हिंदूंचा वरचष्मा. या कायद्यात २०१३ साली दुरुस्ती करण्यात आली, ती जिल्हाधिकारी हिंदू नसला तरी तो या समितीचा अध्यक्ष होईल ही. यावेळी नितीश कुमारांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना जिल्हाधिकारी हिंदू असला पाहिजे ही अट संविधानातील धर्मनिरपेक्षतेला मारक असल्याने आम्ही ही दुरुस्ती करत आहोत, असे सांगितले. एकतर बिगर हिंदू कलेक्टर असण्याची शक्यता कमी. कारण कलेक्टर कोण नेमायचा हे सरकारच्या हाती असते. दुसरे म्हणजे समितीतले हिंदूंचे प्रतिनिधीत्व काढून टाकण्याचा मुद्दाच या दुरुस्तीत नव्हता. त्यांची ४ ही संख्या तशीच राहणार होती. कलेक्टर हिंदूच नेमला जाणार हेही उघड होते. त्यामुळे ५ हिंदूंची ९ जणांच्या समितीतली बहुसंख्या तशीच राहिली. पर्यायाने महाबोधी विहाराचा कब्जाही हिंदूंकडेच राहिला.

हा कायदा आजतागायत आहे. बिहारात काँग्रेस गेली. लालू यादव आले. ते जाऊन नितीश कुमार आले. तरी परिस्थिती जैसे थे. आंदोलन करणाऱ्या बौद्धांतल्या पुढाऱ्यांनाच समितीत घेण्याचे डावपेच आखून आंदोलनातील हवा काढण्याचे प्रयत्न या मंडळींनी केल्याचे बोलले जाते. पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात विहार देण्याने हिंदूंची नाराजी ओढवून घ्यायची या कोणाचीही तयारी नाही.

वास्तविक जगात आणि देशातही ज्या धर्माचे प्रार्थनास्थळ असते त्याच धर्माच्या लोकांचे त्याच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आढळते. मग महाबोधी विहार त्याला अपवाद कसे? शिवाय सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती होऊन तो तथागत बुद्ध झाला, ते हे जगातील बौद्धांचे सर्वात पवित्र स्थळ. ते बौद्धांच्या ताब्यात असू नये का? आज या महाबोधी विहारात आरती होते, स्तूपाला शिवलिंग बनवून त्यावर दुधाचा अभिषेक होतो, बुद्धाच्या पाच शिष्यांच्या मूर्तींना पाच पांडव म्हणून सांगितले, पुजले जाते. पिंडदान राजरोस सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बौद्धांचे केंद्र आणि युनोने जागतिक वारसा मानलेल्या या विहाराची अशी विटंबना नियमित सुरु आहे.

प्रार्थनास्थळे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात असावीत, हा संकेत व विवेक केवळ नाही. तर तो सांविधानिक अधिकार आहे. आपल्या संविधानात अनुच्छेद २६ नुसार प्रत्येक धार्मिक गटास आपल्या धार्मिक प्रयोजनासाठी संस्था चालवण्याचा, त्याचे नियमन करण्याचा, धार्मिक व्यवहार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. अनुच्छेद १३ मध्ये संविधान निर्मितीच्या आधीचे मूलभूत अधिकारांचे हनन करणारे कायदे रद्द समजले जातील असे नमूद आहे. १९४९ चा महाबोधी विहार कायदा हा संविधान मंजूर आणि लागू होण्याच्या आधीचा आहे. मग संविधान लागू झाल्यावर तो निरस्त न होता चालू कसा राहिला? या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन दशक झाले. तथापि, अजून त्याची सुनावणी झालेली नाही.

बौद्ध विरुद्ध हिंदू अशा स्वरुपात या मुद्द्याकडे म्हणून पाहू नये. अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या बौद्धांची साधी मागणी आहे, आमचे प्रार्थनास्थळ आमच्या ताब्यात द्या. त्यासाठी संविधानाच्या विरोधात असलेला बिहार सरकारचा १९४९ चा महाबोधी विहार कायदा रद्द करा. आता हे विहार जागतिक वारसा म्हणून युनोने जाहीर केले आहे. त्यानुसार त्याचे हिंदूकरण थांबवून त्याचे मूळ स्वरुप टिकवणे ही केंद्राच्या पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे. पुरातत्व खाते आणि राज्यशासन यांनी पुरातन वारसा म्हणून त्याच्या देखभालीत जरुर लक्ष घालावे; पण बाकीचे धार्मिक विधी आणि आनुषंगिक जबाबदारी ही पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यायला हवी.

ही मागणी संविधानातील मूलभूत हक्काची आहे. म्हणूनच ती केवळ बौद्धांची न राहता सर्व भारतीयांची व्हायला हवी.

- सुरेश सावंत,sawant.suresh@gmail.com

(लोकसत्ता, २१ मार्च १९८३)