Monday, February 1, 2010

‘परिवर्तनवादी चळवळीपुढील आव्‍हाने’ चर्चासत्राचा वृत्‍तांत


चळवळीच्‍या सद्यस्थितीसंबंधीची वैचारिक चर्चा, आत्‍मचिंतन असे स्‍वरुप असलेला हा कार्यक्रम खूप महत्‍वपूर्ण होता. ही चर्चा पुढेही प्रसंगोपात चालू राहणार आहे. म्‍हणूनच त्‍यासंबंधीचा वृत्‍तांत अधिक विस्‍ताराने नवे पर्वच्‍या वाचकांसाठी देत आहोत. वक्‍त्‍यांची भाषणे चालू असताना घेतलेल्‍या टिपणांच्‍या सहाय्याने हा वृत्‍तांत लिहिलेला आहे. स्‍वाभाविकच वक्‍त्‍यांची सबंध तसेच शब्‍दशः मांडणी इथे दिलेली नाही. त्‍यांच्‍या मांडणीतल्‍या आशयांचे मुद्दे असे या वृत्‍तांताचे स्‍वरुप आहे. मुद्द्यांच्‍या अचुकतेत वृत्‍तांतलेखकाच्‍या आकलनाच्‍या मर्यादांमुळे फरक पडू शकतो. या कार्यक्रमाच्‍या प्रारंभी वितरीत करण्‍यात आलेले चर्चेसाठीचे टिपणही स्‍वतंत्रपणे अन्‍यत्र देत आहोत संपादक

श्रमिक प्रतिष्‍ठानतर्फे परिवर्तनवादी चळवळीपुढील आव्‍हाने या विषयावर 16-17 जानेवारी रोजी दोन दिवसांचे एक चर्चासत्र मुंबईतील भुपेश गुप्‍ता भवन येथे आयोजित करण्‍यात आले होते. या चर्चासत्राचा उद्देश समजण्‍यासाठी निमंत्रणपत्रिकेतील पुढील तीन परिच्‍छेद उद्धृत करत आहेः

आपल्या भोवतालचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वास्‍तव फार झपाट्याने बदलत आहे. जुने वैचारिक संदर्भ कालबाह्य होत आहेत. नवी मूल्‍यव्‍यवस्‍था आकारास आल्‍याचे जाणवत नाही. जुन्‍या संस्‍थापक संरचना मोडकळीस येत आहेत. नवे प्रश्‍न पृष्‍ठभागावर येत आहेत. तयार उत्‍तरे कुणाकडेही नाहीत. त्‍यामुळे परिवर्तनवादी चळवळीतसुद्धा तोचतोचपणा येत आहे, साचलेपण आणि स्‍थगितता जाणवत आहे.

परिवर्तनवादी चळवळीतील संकल्‍पना थिट्या पडत आहेत का? परिवर्तनवादी चळवळीतील माध्‍यमे लोकांना कार्यप्रवृत्‍त करण्‍यास, आकृष्‍ट करण्‍यात कमी पडत आहेत का? असे अनेक प्रश्‍न आज परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्‍यांना भेडसावत आहेत.

या प्रश्‍नांची मोकळेपणाने चर्चा करावी म्‍हणून हे दोन दिवसांचे चर्चासत्र आहे. चर्चा संवादी असेल. नव्‍या उपक्रमांना चालना देणारी, नव्‍या जाणिवा जोपासणारी, वैचारिक कृति‍शीलतेला उपकारक ठरेल अशी संवादी चर्चा करणे हे या दोन दिवसांच्‍या चर्चासत्रामागील प्रमुख उद्दिष्‍ट आहे.

या चर्चासत्रात मुख्‍य विषयाचे उपविषय करुन त्‍यांची 4 सत्रांत विभागणी करण्‍यात आली होती. ही चार सत्रे व वक्‍ते असे होतेः

1) प्रचलित जागतिक राजकीय अर्थव्‍यवस्‍थेचे स्‍वरुप, प्रश्‍न व त्‍याचे भारतावरील परिणाम डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. संदीप पेंडसे.

2) बदलते सामाजिक व सांस्‍कृतिक वास्‍तव श्री. अरुण साधू, प्रा. यशवंत सुमंत.

3) बदलते राजकीय वास्‍तव व 21 व्‍या शतकातील समाजवादी समाजनिर्मितीचे प्रश्‍न डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. सुरेंद जोंधळे.

या चर्चासत्राच्‍या प्रारंभी सर्व सहभागींना एक चर्चेसाठीचे टिपण वितरित करण्‍यात आले होते. (या अंकात ते स्‍वतंत्रपणे देत आहोत.)

एकूण चर्चासत्रातील चर्चेसाठीचे टिपण, विषय, मांडणी व चर्चा पाहता प्रारंभी नोंदवलेल्‍या उद्दिष्‍टाची पूर्तता करणारे अतिशय उपयुक्‍त असे हे चर्चासत्र होते, असेच म्‍हणावे लागेल.

कॉ. गंगाधर चिटणीसांच्‍या छोटेखानी प्रास्‍ताविकाने पहिल्‍या सत्राची सुरुवात झाली. या चर्चासत्राचे अध्‍यक्ष होते कॉ. र. ग. कर्णिक. डॉ. संदीप पेंडसे यांनी प्रचलित जागतिक अर्थव्‍यवस्‍थेचे स्‍वरुप स्‍पष्‍ट करताना भांडवलशाहीच्‍या संघटनात झालेल्‍या नव्‍या बदलांचा मागोवा घेतला. भांडवलशाही तिच्‍या उद्गमापासून जागतिकच असल्‍याचे नमूद करुन तिच्‍या आताच्‍या जागतिकीकरणाची वेगळी वैशिष्‍ट्ये त्‍यांनी सविस्‍तरपणे मांडली. त्‍यांनी मांडलेले मुद्दे थोडक्‍यात असेः

आजच्‍या बदलाचा प्रारंभ खूप जुना 1970 पर्यंत मागे जातो. व्हिएतनाममधून अमेरिकेला माघार घ्‍यावी लागणे, साम्राज्‍यवादी राष्‍ट्रांना वसाहती करणे कठीण होणे या पार्श्‍वभूमीवर उत्‍पादनपद्धतीत बदल झाले. श्रम व उत्‍पादन प्रक्रिया जगभर विखुरली गेली. उदा. घड्याळाचा कारखाना पोर्तुगालमध्‍ये. तथापि, त्‍याच्‍या विविध भागांचे उत्‍पादन जगाच्‍या विविध भागांत केले जाते. त्‍याचे एकत्रिकरण पोर्तुगालमध्‍ये केले जाते. अशा कारखान्‍यांची नावेही देशागणिक वेगवेगळी असतात. एका मालकीचा पोलादाच्‍या विविध भागांचे उत्‍पादन करणारा कारखाना फिलिपाईन्‍स, जपान व ऑस्‍ट्रेलिया तिन्‍ही ठिकाणी 3 नावांनी असतो. अशावेळी त्‍या विशिष्‍ट देशात क्रांती झाली आणि त्‍यांनी राष्‍ट्रीयीकरण करावयाचे ठरवले, तरी जगभर विखुरलेल्‍या उत्‍पादन पद्धतीच्‍या कारखान्‍यांचे राष्‍ट्रीयीकरण कसे करणार? 1980 पासून या प्रक्रियेची गती वाढत गेली. शेती भांडवली झाली. भांडवली गतीच्‍या या तर्कशास्‍त्राला पूर्णरुप 1991 साली आले.

उत्‍पादन जाग‍‍तिक पातळीवर विखुरण्‍याच्‍या या प्रक्रियेला 3 कारणे आहेत- 1) कच्‍चा माल 2) स्‍वस्त श्रम 3) तेथील सरकारची अनुकूल धोरणे. या तीन गोष्‍टी जिथे असतील तिथे ही प्रक्रिया सुरु झाली. माहिती तंत्रज्ञानामुळे या सर्व प्रक्रियेचे नियंत्रण सुलभ झाले. माहिती तंत्रज्ञानाचा वापर 3 कारणांसाठी होतो आहे- 1) लष्‍करी वापर (पेंटेगॉन या अमेरिकी लष्‍करी संघटनेसारख्‍या संघटनांमध्‍ये) 2) विकेंद्रित उत्‍पादनाचे सुसूत्रीकरण 3) सट्टेबाजी.

80-90 च्‍या दशकात विकसनशील देशांची तांत्रिक प्रगती झाली. ती करणे त्‍यांना आवश्‍यक होते. थायलंडमध्‍ये पारंपरिक शेतीचे औद्योगिक शेतीत रुपांतर झाले. रोजगार विशिष्‍ट प्रकारचा वाढला. अरिष्‍टावेळी हे सर्व उद्योग थांबले. थायलंडमध्‍ये अनेक ठिकाणचे फ्लायओव्‍हर अर्धवट टाकल्‍याचे फोटो उपलब्‍ध आहेत. या नवीन उत्‍पादन पद्धतीत रोजगाराच्‍या संधी कमी होत आहेत. कामगार कपात व बेरोजगारी वाढते आहे.

मूलभूत उद्योगांऐवजी ताबडतोबीच्‍या फायद्याच्‍या उत्‍पादनांना प्राधान्‍य मिळते आहे. न्‍यूयॉर्कमध्‍ये फॅशन गारमेंट हा मोठा उद्योग आहे. 85 ते 2000 या काळात पर्यटन व्‍यवसाय वाढला. सट्टेबाजीने शेअर बाजार, सोने-चांदी व्‍यापार व्‍यापला. माहिती तंत्रज्ञानामुळे एका रात्रीत भांडवल या देशातून दुस-या देशात स्‍थलांतरित करणे शक्‍य झाले. अरिष्‍टाचे हे एक मोठे कारण आहे. अशारीतीने भांडवलाच्‍या स्‍थलांतराला मुदत घालण्‍याचे अथवा त्‍यावर कर लावण्‍याचे पर्याय असताना एकाही देशाने त्‍यांचा अवलंब केला नाही.

भांडवलाच्‍या प्राथमिक संचयाची नवी व्‍यवस्‍था येते आहे. पाण्‍याचे व्‍यापारीकरण, उत्‍पादित शेतजमिनी ताब्‍यात घेऊन शेतीतून लोकांना बाहेर काढणे असे मार्ग अवलंबले जात आहेत. यावर उपाय म्‍हणून रोजगार हमीसारख्‍या योजना आणल्‍या जात आहेत. पण तो तात्‍पुरता उपाय आहे. शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या हा दूरगामी धोरणाचा भाग आहे. कापूस या विशिष्‍ट उत्‍पादनाशी त्‍याचा संबंध आहे. विकसित ग्रामीण भागातून भांडवली शेती तसेच कंत्राटी शेतीमुळे ग्रामीण मजूर बाहेर फेकला जातो आहे. त्‍यामुळे शहरीकरण वाढत आहे. औद्योगिकोत्‍तर अवस्‍थेत शहरात सेवाउद्योग वाढतो आहे.

...या सगळ्याला विरोध कसा करायचा? ज्‍यावर भरवसा ठेवायचा त्‍या कामगारालाच बाहेर टाकले जाते आहे. अशावेळी नवे मार्ग शोधायला हवेत.

पेंडसेंच्‍या मांडणीनंतर चर्चा सुरु झाली.

या चर्चेत भाग घेताना दादा सामंत म्‍हणाले, पेंडसेंनी वर्णन केलेली प्रक्रिया ही काळाप्रमाणे आहे. त्‍यास भांडवलशाहीही जबाबदार नाही. आता मुले आत्‍महत्‍या करु लागली आहेत. याला कोणीही काहीही करु शकत नाही. आर.एस.देसाईंनी प्रश्‍न केला, ज्‍या प्रकारे विरोधी शक्‍ती उभ्‍या आहेत, त्‍यांच्‍या विरोधात पुरोगामी शक्‍ती चिकाटीने उभ्‍या का राहत नाहीत?’

उल्‍का महाजन यांनी काही प्रश्‍न उभे केले. ते असेः विश्‍लेषण उपाययोजनांत रुपांतरित होते आहे का? आंदोलने उभारण्‍याची क्षेत्रे कोणती? कामगारवर्गातले बदल लक्षात घेता परिवर्तनाचा वाहक वर्ग कोणता? बदलाच्‍या गतीशी आपली चळवळीची गती सुसंगत आहे का? संघर्ष उभारण्‍याचा नवा आकृतिबंध काय? शेतकरी, ग्राहक इ. चेह-यांचे विखंडित्‍व एकात्‍म कसे करायचे?’

कॉ. गोविंद पानसरे यांनी म्‍हटले, पेंडश्‍यांच्‍या मांडणीत एक अपुरेपणा आहे- त्‍यात शेतीविभागाचा विचार नाही. हे योग्‍य नव्‍हे. आज नेमके आव्‍हान कोणते? ते म्‍हणजे डाव्‍या-पुरोगाम्‍यांचे समग्राचे भान सुटले आहे. ते कसे आणून द्यायचे हा प्रश्‍न आहे. एका क्षेत्रात चळवळी करणा-यांना दुस-या क्षेत्राची माहिती नसते. संघटनांचे, राजकीय पक्षांचे आणि निवडणुकांचेही (पक्षाऐवजी व्‍यक्‍ती, त्‍याची जात, पैसा, गुंडगिरी यांना आलेल्‍या महत्‍वामुळे) अराजकीयीकरण झाले आहे. एक एका प्रश्‍नावर सुटी आंदोलने होतात. असे सुटे झगडे परिवर्तनवादी चळवळीला पुढे नेत नाहीत. अराजकीयीकरण वाढवण्‍यात काहींचा हितसंबंध आहे. सगळ्या चळवळींचे एनजीओकरण होऊ लागले आहे. एनजीओंनी परिवर्तनवाद्यांचा अवकाश व्‍यापला आहे. त्‍या आता स्‍वतःला चळवळी म्‍हणू लागल्‍या आहेत. आपली रणनीती नेहमी चुकत आली आहे. सरकारी कर्मचा-यांचा देशव्‍यापी संप हे केवळ प्रतीकात्‍मक की खरोखर देशावर त्‍याचा काही परिणाम होतो? आमच्‍या पक्षातले व पक्षाबाहेरचे मित्र म्‍हणतात, एकजूट व्‍हायला हवी. मग ती का होत नाही? त्‍याबद्दल बोलले पाहिजे. केवळ सदिच्‍छा पुरेशी नाही. मध्‍यमवर्गाचे आताचे स्‍वरुप बदलले आहे. सामाजिकदृष्‍ट्या मागासलेल्‍या विभागातून आलेला मध्‍यमवर्गही वेगळा विचार करत नाही. अस्मितांचे प्रश्‍न पुढे केले जातात. आपल्‍यातले लोकही त्‍यात सामील होतात.

पहिल्‍या सत्रावेळी डॉ. मुणगेकर उपस्थित नसल्‍याने त्‍यांचे भाषण ते आल्‍यानंतर पुढच्‍या सत्रांनंतर झाले. दरम्‍यान इतर वक्‍ते बोलले.

बदलते सामाजिक व सांस्‍कृतिक वास्‍तव या सत्रातील पहिले भाषण अरुण साधू यांनी केले. तंत्रज्ञानातील बदलांनी समाजात कसा जबरदस्‍त बदल केला, हे त्‍यांनी गेल्‍या 20 वर्षांतील अनेक उदाहरणे देऊन स्‍पष्‍ट केले. यावेळी काही व्‍यक्तिगत उदाहरणेही त्‍यांनी दिली. फोन ही एकेकाळी दुर्मिळ असलेली गोष्‍ट आता देशातील 47 टक्‍के लोकांकडे आहे. एसटीडी फोन हे दिव्‍य होते. आता ती सहज बाब झाली आहे. प्रवासाच्‍या व्‍यवस्‍था गतिमान झाल्‍या आहेत. जे अंतर पार करायला 24 तास लागायचे त्‍या गावी जायला आता केवळ 4 तास लागतात. अशा खूप सकारात्‍मक गोष्‍टी झाल्‍याचे त्‍यांनी नोंदवले. त्‍याचबरोबर अनेक उण्‍या बाबींचीही त्‍यांनी नोंद दिली. उदा. ईमेलने संवाद सुलभ, गतिमान झाला. पण पोस्‍टकार्डातून व्‍यक्‍त होणारा मानवी ओलावा त्‍यात नाही. ऑर्कुटवर खूप मित्र जोडता येतात. पण त्‍यात हा ओलावा नाही. माणूस सिंथेटिक होऊ लागला आहे. बाजार ही वाईट गोष्‍ट नव्‍हे. पण बाजारपेठेचे तत्‍त्‍वज्ञान बनवले जात आहे. जुन्‍या पद्धतीने काम करणारी कार्यकर्त्‍यांची जात आता नाहीशी होते आहे. त्‍यांची जागा एनजीओंनी घेतली आहे.

या सत्राचे दुसरे वक्‍ते होते डॉ. यशवंत सुमंत. त्‍यांच्‍या मांडणीतले मुद्दे असेः

व्‍यवस्‍था परिवर्तनाच्‍या संदर्भात काही सनातन आव्‍हाने तर काही उत्‍तर औद्योगिक आव्‍हाने आहेत. एकाचवेळी या व्‍यवस्‍थांशी झुंज द्यायची असते. या व्‍यवस्‍थेत नवभांडवलशाही काय हस्‍तक्षेप करते, याचे भान येणे आवश्‍यक आहे.

औद्योगिक भांडवलशाहीने उत्‍पादनाचे तंत्र बदलले. सामाजिक जीवनात गतिमान स्‍थैर्य दिले. छोटे छोटे बांध ओलांडून नवी नागरिकत्‍वाची ओळख देणारी राष्‍ट्र राज्‍य (नेशन स्‍टेट) या संकल्‍पनेला जन्‍म दिला. आता तर आपण सिटिझन नव्‍हे, नेटिझन आहोत, एका नव्‍हे, अनेक राष्‍ट्रांचे नागरिक झालो पाहिजे, आपण वैश्विक झालो पाहिजे, असे म्‍हटले जाते. मात्र त्‍याचवेळी आपली प्रथम ओळख धर्म, जात, भाषेच्‍या संदर्भात सांगायला लागलो आहोत. 80-90 नंतरचा हा बदल आहे. नेशन स्‍टेटने अग्रक्रम बदलेत. सामाजिक न्‍याय, सामाजिक न्‍याय यातून ते बाहेर निघते आहे. या बाबी त्‍याने समुदायाच्‍या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडून दिल्‍या आहेत. राज्‍यसंस्‍था धर्मनिरपेक्ष व समाज धर्मवादी अशी स्थिती आहे.

अवजड यंत्रांवर काम करण्‍यासाठी आधी कामगार हवे होते. स्‍वाभाविकच कामगारांची किमान सुरक्षितता, कारखान्‍याजवळ त्‍यांच्‍या वसाहती, पूर्णवेळ नोक-या इ. भांडवलदारांची गरज होती. आता अवजड यंत्रांची उत्‍पादनासाठी गरज नाही. कामगार हद्दपार होऊ लागला आहे. तीन पाळ्यांत त्‍याला सांभाळण्‍याची आता गरज नाही. ज्‍या श्रमिक वर्गाच्‍या सहाय्याने आपण परिवर्तन आणू पाहत होतो, ती शक्‍ती आज आपल्‍या हातात नाही. शेतक-यांचीही तीच स्थिती आहे.

उत्‍पादनप्रक्रियेतून जे वर्ग हद्दपार होतात, ते पर्यायांच्‍या अभावी अस्मितेच्‍या आधारे जगू लागतात. म्‍हणूनच ओबीसी समाजविभागांची वर्ग ही जाणीव धूसर होऊन ओबीसी ही ओळख पुढे येते. शेतकरी जमिनीतून, आदिवासी जंगलातून हद्दपार होतो, विकासप्रक्रियेतून विस्‍थपित होतो. त्‍यांचे मोठ्या प्रमाणावर स्‍थलांतर होते. हे सगळे समूह एकत्र कसे करणार? आजचे चर्चासत्र हे डावपेच ठरवण्‍यासाठी नाही. ते प्रश्‍न समजून घेण्‍यासाठी आहे. डावपेच कार्यकर्त्‍यांच्‍या गटात ठरवायचे असतात.

हल्‍ली कार्यकर्त्‍यांची समजून घेण्‍याची इच्‍छाशक्‍ती कमी झाली आहे. फिल्‍ड वर आम्‍ही असतो, हा भाव असतो. अभ्‍यास करण्‍याची मनःस्थिती नाही. त्‍यांच्‍यात चिंतन, इतरांशी संवाद यांचा अभाव जाणवतो.

राजकीय पक्षांचे अभ्‍यासवर्ग, अंतर्गत निवडणुका, लोकांचे जागरण हे काम बंद झाले आहे. त्‍याची जागा व्‍यवस्‍थापनाने घेतली आहे. माणसे भाडोत्री असतात. पोस्‍टर्सच्‍या सहाय्याने आभासात्‍मक अस्तित्‍व दाखवतात. नेतृत्‍वाचा हा पॅटर्न तयार झाला आहे. पक्ष हे साधन, रचना आपल्‍याला हस्‍तक्षेपासाठी आज उपलब्‍ध नाही. अशावेळी माणसे मग अस्मितावादी मंडळींकडे वळतात.

एक जात दुस-या जातीचे स्‍वागत करत नाही. जात एक स्‍वायत्‍त कम्‍युनिटी म्‍हणून उभे राहते आहे. तिला (नेशन स्‍टेटसारखा) व्‍यापक आधार, अखिल भारतीयत्‍वाचे संदर्भ नसतील, तर ती सांप्रदायिक होते.

वसाहतवादविरोधी लढ्याप्रमाणे सामाजिक क्रांतीच्‍या प्रश्‍नासाठी व्‍यापक एकजूट व्‍हायला हवी. महात्‍मा फुले ते महात्‍मा गांधी ही शृंखला जोडता आली पाहिजे. अशी शृंखला जोडणे म्‍हणजे त्‍यांचा समन्‍वय नव्‍हे; तर परस्‍परपूरकता साधता येणे होय.

हे करायचे नसेल तर चर्चा केवळ बौद्धिक आनंदासाठी होईल. कार्यकर्त्‍यांचे बळ नसेल, तर विचार पुढे जात नाही. कार्यकर्ता व विचारवंत एका स्‍तरावर आले पाहिजेत. ती दोन भिन्‍न अस्तित्‍वे नाहीत.

फुले-आंबेडकरी चळवळीचा अपवाद केला तर इतरांनी (डाव्‍यांनी) हिंदू संस्‍कृतीवर भाष्‍य केलेले नाही. गांधी स्‍वतःला सनातनी हिंदू म्‍हणत. मग ते हिंदुहृदयसम्राट का नाहीत? उलट हिंदुत्‍ववादी त्‍यांचा खून करतात. गांधीजींनी घडविलेल्‍या समुदायांच्‍या व्‍यापक हालचाली हा करिश्‍मा आपण समजून घेणार आहोत का? तो फक्‍त बौद्धिक पातळीवर समजून घेता येणार नाही. सत्‍य, अहिंसेपासून अस्‍पृश्‍यताविरोधापर्यंतचे वैश्विकतेकडून विशेष्‍याकडे जाणारे गांधी समजून घ्‍यायला हवेत. डॉ. आंबेडकरांनी सांगितलेला धम्‍म म्‍हणजे सेक्‍युलॅरिझम आहे, हे आपण कधीही सांगितले नाही. खाजगी व सार्वजनिक असे भिन्‍न व्‍यवहार असत नाहीत. ज्‍याला आपण खाजगी म्‍हणतो ते सार्वजनिक कधी होते, हे कळत नाही. फुले खाजगी जीवनातही आपण सर्वधर्मसमभाववादी असले पाहिजे, हे सांगतात. खाजगी व सार्वजनिक यांच्‍या अभिन्‍नता हा फुले-आंबेडकरांचा वारसा. त्‍याची ओळख सांगायची की नाही?’

यानंतर संदीप पेंडसे पुन्‍हा बोलले. त्‍यांच्‍या मांडणीनंतरच्‍या चर्चेला त्‍यांनी उत्‍तर दिले. त्‍यात काही नवीन तसेच आधीच्‍या मांडणीतल्‍या काही मुद्द्यांवर अधिक भर होता. त्‍यांचे मुद्दे असेः

भांडवलदारांमध्‍ये जा‍गतिक व एतद्देशीय असा फरक करु नये. सेझमध्‍ये जमिनी घेणारे भारतीय भांडवलदारच आहेत. औद्योगिक भांडवलशाही कामगारवर्गाची गरज कबुल करत होती. औद्योगिकोत्‍तर भांडवलशाही अशी गरज मानतच नाही. कामगार बेकार होणे म्‍हणजे तो सामूहिक प्रक्रियेतून बाहेर टाकला जाणे. मग त्‍याचा वर्ग कोणता? यातले अनेकजण स्‍वयंरोजगार करुन उपजीविका करतात. श्रमशक्‍तीबरोबरच श्रम विकतात. त्‍याचा उपभोगही घेतात. कामगारवर्गविहिन झालेल्‍या या मंडळींच्‍या जाणिवा वर्ग म्‍हणून कशा असू शकतील?

एनजीओंनी चळवळींची जागा बळकावली आहे. महाराष्‍ट्रात शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये आरएसएसने जाळे फैलावले आहे. अशा संस्‍था उभारण्‍यात समाजवाद्यांनी काहीतरी केले; डाव्‍यांनी काहीच केले नाही. नागरी समाजात हस्‍तक्षेप हा ग्रामसीचा सिद्धांत शिवसेनेने राबवला; डाव्‍यांनी नाही.

भांडवल संचयाचे तंत्र व प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. ती लवचिक झाली आहे. असा संचय फक्‍त कारखान्‍यातूनच-वरकडीतूनच होणे, याऐवजी तो स्‍वयंरोजगार, बाजार यामार्फत होतो आहे. जमीन व पाणी यांवरच्‍या मालकीतून भांडवल संचयाची प्राथमिक अवस्‍था आकाराला येते आहे.

समाजवादी उत्‍पादनाच्‍या कल्‍पनेचे, उत्‍पादक शक्‍तींच्‍या वाढीचे स्‍तोम माजवले गेले. सोव्हिएतमधील कारखाने हे फोर्डच्‍या तत्‍त्‍वज्ञानावरच आधारि‍त होते. फ्रेडरिक व्‍यवस्‍थापनच सोव्हिएतमध्‍ये अमलात आणले गेले. सोव्हिएतची पर्यायी व्‍यवस्‍था कोठे होती? अमेरिकेशी स्‍पर्धा कशासाठी केली गेली? त्‍यांनी अग्निबाण सोडले म्‍हणून सोव्हिएतने सोडले. आता भविष्‍यातल्‍या समाजवादाचे प्रारुप काय याची चर्चा व्‍हायला हवी. परिवर्तनवादी चळवळीचे स्‍वरुप काय राहणार? पार्टी कार्यकर्त्‍यांची की समुदायांची? याचा विचार करावा लागेल.

आधीच्‍या सत्रात राहिलेले डॉ. मुणगेकरांचे भाषण यानंतर झाले. ते म्‍हणाले, स्‍वतःच्‍या देशातील गुंतवणुकीतून मिळणारा नफा कमी झाल्‍याने भांडवल निर्यात करण्‍याची गरज तयार झाली. यातूनच जागतिक अर्थव्‍यवस्‍थेच्‍या रचनेची गरज भासू लागली. भांडवलाचे जागतिकीकरण झाले. राज्‍यव्‍यवस्‍थेचे आंतरराष्‍ट्रीयीकरण झाले. पुढे त्‍यांनी भारतातील कामगारवर्गासंबंधी बोलताना मांडले, आपल्‍या कामगारचळवळीने संघटित कामगारांचे जीवनमान वाढविले. दर 5 वर्षांनी वेतनश्रेणीत सुधारणा होणार हे ठरल्‍यावर चळवळ करण्‍याची आवश्‍यकताच राहिली नाही. हा संघटित कामगार फक्‍त 7 टक्‍के आहे. विकसनशील देशांच्‍या शोषणाचा विकसित देशांतील कामगारांना फायदा मिळतो. त्‍यामुळे जी जगातील कामगारांमध्‍ये दरी तयार होते, तशीच आपल्‍या संघटित व असंघटित कामगारांमध्‍ये दरी तयार झाली आहे. 1986 सालापासून विकेंद्रित कापड उद्योग आपल्‍याकडे सुरु झाल्‍याचे सांगून गिरणीत जे कापड 200 रु.त तयार होते, तेच भिवंडीत यंत्रमागावर 42 रु.ला होत असेल तर मालक व्‍यवहार बघणार नाही का, असा प्रश्‍न डॉ. मुणगेकरांनी विचारला. हे कसे नियंत्रित करायचे याचे समाजवादी प्रारुप आपल्‍याला मांडायला लागेल, ही गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली. परिवर्तनवाद्यांच्‍या व्‍यवहाराबद्दलही त्‍यांनी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्‍हणाले, प.बंगाल सरकारने ओबीसी अहवाल का मान्‍य केला नाही? कलकत्‍त्‍याच्‍या रस्‍त्‍यांवर मानवी रिक्‍या ओढणारे सगळे चांडाळ कसे? जाती हटवा-देशाला वाचवा यापलीकडे समाजवाद्यांनी काय केले? लोहियांची मांडणीही कुंठीत झालेली. जातींचे रुपांतर वर्गात होते, तेव्‍हा तो वर्गासारखाच वागू लागतो. मात्र त्‍याचवेळी वृत्‍तपत्रांतील स्‍थळसंशोधनाच्‍या जाहिरातींत एससी एसटी क्षमस्‍व असेही लिहिले जाते. या जात-वर्ग वास्‍तवाचा समन्‍वय घालून आपण चळवळ का करु शकलो नाही? गांधीजी कोणतेही उत्‍तर आंबेडकरांना सरळ देऊ शकले नाहीत. आंबेडकरांची जातिविध्‍वंसाची संकल्‍पना त्‍यांच्‍या आधीच्‍या लोकांपेक्षा (फुलेंचा अपवाद करता) अधिक मूलभूत होती. लेनिनचे धर्मविषयक विचार वाचून येथील मुस्लिमांचा प्रश्‍न आपण कसा सोडवणार? तंत्रज्ञानाच्‍या संदर्भात आपली भूमिका काय? 6 आसनी रिक्‍शा नको, 3 आसनीच हव्‍यात, अशी भूमिका आपण घेऊ शकतो का? कामगार जादा होणे हे विकासाचे सार आहे. याला आपला पर्याय काय?’

दुस-या सत्राचे अध्‍यक्ष गजानन खातू सत्राचा समारोप करताना म्‍हणाले, मध्‍यमवर्गाची क्रयशक्‍ती वाढविणे ही भांडवलदार वर्गाची गरज आहे. तथापि, आज चांगल्‍या पगारदार तरुणांच्‍याही असमाधानाचे बीज आहे. त्‍यांच्‍याशी संवाद कसा साधायचा? त्‍यासाठी आपल्‍याला इंटरनेट, ईमेल, ब्‍लॉग, चॅटिंग ही त्‍यांची साधने वापरावी लागतील. जीवन जगणे अर्थपूर्ण कसे करायचे, याची मांडणी करण्‍यात, समग्रतेचा विचार देण्‍यात आपण कमी पडत आहोत. पर्यावरणाचा जागतिक प्रश्‍न आपण स्‍थानिकतेशी भिडवला पाहिजे. धान्‍यापासून दारु तयार करण्‍याऐवजी कोरडवाहू शेतक-यांचे ज्‍वारी-बाजरीसारखे धान्‍य रेशनवर देण्‍याची मागणी करायला आपल्‍याला वाव आहे. ज्‍वारी-बाजरी हे आरोग्‍यदायी अन्‍न आहे, हे प्रचारावे लागेल.

दुस-या दिवशी बदलते राजकीय वास्‍तव व 21 व्‍या शतकातील समाजवादी समाजनिर्मितीचे प्रश्‍न हे तिसरे सत्र झाले. प्रारंभी प्रा. सुरेंद्र जोंधळे यांची मांडणी झाली. त्‍यांचे मुद्दे असे होतेः

नवभांडवलशाहीची चौकट आहे- नवउदारमतवाद. नवउदारमतवाद हे एक राजकीय तत्‍त्‍वज्ञान म्‍हणून प्रस्‍थापित झाले आहे. ती विचारप्रणाली बनली आहे. तिच्‍याशी संघर्ष करावा लागणार आहे. नवउदारमतवादाने व्‍यक्‍तीला नागरिक नव्‍हे, तर ग्राहक बनवले आहे. व्‍यक्‍ती हे एकक (युनिट) बनते आहे.

भारतीय राजकारण, मुख्‍यतः कॉंग्रेसचे केंद्राच्‍या डावीकडे (लेफ्ट टू सेंटर) असा समज होता. ते आता अधिकाअधिक केंद्रवादी झाले आहे. हे राजकारण केंद्रवादी राहण्‍याचे कारण वर्गीय ध्रुवीकरण झाले नाही, ते परीघावर राहिले, हे आहे. बहुसंख्‍याकवादी समूह आज विस्‍कळीत आहे. या समूहांचे दारिद्र्य, विषमता हे प्रश्‍न मोठे असूनही हे ध्रुवीकरण झालेले नाही. सामाजिक, सांस्‍कृतिक परंपरांत वैविध्‍य, सहिष्‍णुता असूनही राजकारण मात्र केंद्रवादी झाले. भाजप व कॉंग्रेस या दोहोंची नाळ नवउदारमतवादाशी जुळलेली आहे.

आज नेशन स्‍टेट ऐवजी स्‍टेट नेशन संकल्‍पना अधिक प्रभावी झाली आहे. केवळ भाषिक नव्‍हे, तर इतर अनेक अस्मिता असू शकतात याचे तेलंगणचा प्रश्‍न हे उदाहरण आहे.

भारतीय लोकशाहीचे अस्तित्‍व टिकणे (सर्व्‍हायवल ऑफ इंडियन डेमॉक्रसी) हा प्रश्‍न 1975 नंतर तयार झाला. आता तो ऐरणीवर आला आहे. त्‍याला इतिहासाचा अंत या मांडणीचे एक आंतरराष्‍ट्रीय परिमाण आहे. भांडवली लोकशाही व समाजवादी लोकशाही भिन्‍न असतील, असे आपल्‍याला वाटले होते. पण ते तसे नाही.

आघाडीच्‍या राजकारणाच्‍या काळात मतभेदांचे कंगोरे झिजतात. या काळात दलित मागासवर्गीय जातींचा राजकीय शक्‍ती म्‍हणून झालेला उदय, त्‍यांचे जाणीवपूर्वक प्रयत्‍न व त्‍यांना आलेले यश ही बाब आपल्‍याला टाळून जमणार नाही.

अराजकीय चळवळी आता मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रक्रियेत सहभागी होत आहेत.

भारतातला 40 टक्‍के मध्‍यमवर्ग जागतिक झाला आहे. या नव्‍या मध्‍यमवर्गाला भारताच्‍या घटनात्‍मक चौकटीला आव्‍हान देणे पटत नाही. अशा आव्‍हानांमुळे त्‍याची सुरक्षितता धोक्‍यात येते, असे त्‍याला वाटते. चळवळींविषयी तो साशंक असतो. आता त्‍याचे वर्गचरित्र बदलले आहे. मूलगामी दिशा त्‍याला आवडत नाही.

कल्‍याणकारी कार्यक्रमांतून राज्‍यसंस्‍था माघार घेत आहे.

असंघटित चळवळींना कार्यक्रम देताना विचारसरणी कोणती सांगायची, हा प्रश्‍न आहे. अशी विचारसरणी नसल्‍याने राज्‍यकर्त्‍यांवर दबाव येत नाही.

यासाठी मूलगामी लोकशाहीचे प्रारुप उभे करावे लागेल. त्‍यासाठी नव्‍या राजकीय संवादाची, संकल्‍पनेची आवश्‍यकता आहे.

जोंधळेंच्‍या मांडणीनंतर डॉ. रावसाहेब कसबेंची शेवटची मांडणी झाली. त्‍यांचे मुद्दे असेः

आज आपण एका गंभीर अवस्‍थेतून जात आहोत. हा संधिकाल आहे. म्‍हणजे एक जाऊन दुसरी व्‍यवस्‍था उदयास येण्‍याचा काळ. पण जुनी व्‍यवस्‍था अजून पूर्ण संपलेली नाही. मार्क्‍सवादावर, समाजवादावर आणि माणसावर निष्‍ठा असणा-यांनी या अवस्‍थेचा गंभीरपणे विचार करण्‍याची गरज आहे.

तत्‍त्‍वप्रणालींचा अंत झालेला नाही. त्‍या स्थितीशील झालेल्‍या आहेत. वास्‍तवाच्‍या अंगाने त्‍यांचा विकास व्‍हावा लागतो. जनतेच्‍या जगण्‍याच्‍या प्रश्‍नांवर लढण्‍यास तत्‍त्‍वप्रणाली मदत करणार नसेल, तर जनता ती संपली असे समजून पुढे जाते.

सोव्हिएट युनियनच्‍या उदयाने जगातील दडपलेल्‍या मानवी समूहांना आपले राज्‍य येऊ शकते हा आत्‍मविश्‍वास आला. जगभरच्‍या चळवळींना बळ प्राप्‍त झाले. दुस-या महायुद्धानंतर तत्‍त्‍वप्रणालींचा संघर्ष सुरु झाला. अमेरिका व रशिया ही त्‍याची दोन केंद्रे होती. काय प्रकारचे जग निर्माण करायचे, यासाठीचा हा संघर्ष होता. या स्‍पर्धेत सोव्हिएटची दमछाक होत होती. 42 ते 90 पर्यंतचा हा शीतयुद्धाचा काळ ही जागतिक अवस्‍था होती.

सोव्हिएटच्‍या विघटनाचा भांडवली विचारवंतांना आनंद झाला. ते म्‍हणू लागले, इतिहासाचा अंत झाला. इतिहासाचा अंत मार्क्‍सलाही अभिप्रेत होता. माणसा-माणसातला संघर्ष संपून समाजवादी समाजरचना येईल, जगणे सुंदर होईल त्‍यावेळी इतिहासाचा अंत होईल, असे मार्क्‍स म्‍हणतो. हे लक्षात घेता अजून इतिहासाचा अंत झालेला नाही.

जागतिकीकरणाला मार्क्‍सवाद्यांचा विरोध असता कामा नये. आपण तर आंतरराष्‍ट्रीयवाद मानतच आलो. मुद्दा आहे कोणते जागतिकीकरण मानायचे हा- मार्क्‍सप्रणीत की नवउदारमतवादी?

1992 नंतरचे संघर्ष हे सांस्‍कृतिक स्‍वरुपाचे आहेत. सांस्‍कृतिक संघर्षांना सत्‍तासमतोलामुळे (बॅलन्‍स ऑफ पॉवर) शीतयुद्धकाळात वाव नव्‍हता. हे सर्व संघर्ष हे भांडवलशाहीतीलच आहेत. राज्‍यसंस्‍था वांशिक, भाषिक प्रश्‍न सोडवायला पुढे येते व त्‍या प्रश्‍नांना चालना मिळते. हे सर्व अस्मितांचे संघर्ष आहेत. रामजन्‍मभूमीचे आंदोलन याच काळातले. राज ठाकरेंचे आंदोलन हे त्‍याचे विकसित रुप आहे. मुस्लिम मूलतत्‍त्‍ववाद असेल, स्‍वतंत्र विदर्भासारखे प्रश्‍न असतील हे सर्व वर्गीय जाणिवा संपत चालल्‍याचे व अस्मिता प्रबळ होत चालल्‍याचे लक्षण आहे.

कोपनहेगेन येथे 192 देश एकत्र आले. पर्यावरणाच्‍या प्रश्‍नावरील हा संघर्ष विकसित राष्‍ट्रे विरुद्ध विकसनशील राष्‍ट्रे असा आहे. आम्‍ही कार्बन उत्‍सर्जन कमी करणार नाही, असे विकसनशील देशांनी सांगितले, तर आम्‍हाला उच्‍च राहणीमानाची सवय झालेली असल्‍याने कार्बन उत्‍सर्जन कमी करणे आम्‍हाला जमणार नाही, ते तुम्‍ही विकसनशील राष्‍ट्रांनीच करा. आम्‍ही तुम्‍हाला झाडे लावायला मदत देऊ, अशी विक‍सित राष्‍ट्रांची भूमिका आहे.

मार्क्‍सचे याबाबतचे म्‍हणणे काय? तो म्‍हणतो, हरितक्रांती केवळ शेतमजुरांचेच नव्‍हे, तर शेतीचेही शोषण करते. हजारो वर्षांत जेवढा कार्बन हवेत सोडला गेला, तेवढा गेल्‍या 20 वर्षांत सोडला गेला. माणसांत वाढणारी ही तृष्‍णा थांबवण्‍याची विनंती बुद्धानंतर व गांधींच्‍या आधी मार्क्‍सने केली. माणूस व निसर्गाचे संतुलित नाते याबद्दल मार्क्‍सने मांडणी केली आहे. निसर्गाला इजा न पोहोचवता त्‍यातील स्रोतांचा वापर करु, त्‍यावेळी माणूस व निसर्ग सुरक्षित राहील, असे मार्क्‍स म्‍हणतो.

लाखो माणसे पंढरीला का जातात? धर्म किती समर्थ आहे, याचे मार्क्‍स वर्णन करत. 72 च्‍या दुष्‍काळात हजारो लोक रस्‍त्‍यावर येत. आता तसे येत नाहीत, असे कार्यकर्ते म्‍हणतात. 40 टक्‍क्‍यांचा मध्‍यमवर्ग आपणच (नाचणे-कर्णिकांनी) वाढवला. हा मध्‍यमवर्ग जागतिकीकरणाच्‍या बाजूने आहे. याची कारणे आपण शोधली पाहिजेत.

मार्क्‍स समाजवादाचे ध्‍येय मानवमुक्‍ती (इमॅन्सिपेशन ऑफ मॅन) मानत असे. त्‍यात समग्र, संपूर्ण मानवाचा विचार आहे. भौतिकतेबरोबरच आत्मिक मुक्‍ती मार्क्‍सला अभिप्रेत होती. आपण हे विचार समजून घेतले नाहीत. नाही तर पंढरीच्‍या वारीत चालता चालता तुकारामाच्‍या माध्‍यमातून मार्क्‍स अधिक चांगला आपण सांगितला असता. बुवांना उत्‍तरे दिली असती. बुद्ध म्‍हणतो, अत्‍त दीप भव (स्‍वयंप्रकाशित व्‍हा) तर मार्क्‍स म्‍हणतो, तुझा निर्माता तूच आहेस. हे नाते आपण सांगितले नाही. उलट आंबेडकरांची आपण चेष्‍टा केली. गांधी जनसामान्‍यांत रुजला. मार्क्‍स नाही. खरे म्‍हणजे मार्क्‍स अधिक शास्‍त्रीय होते.

भांडवल व श्रम या मानववंशशास्‍त्रीय बाबी आहेत. नुसत्‍या अर्थशास्‍त्रीय संकल्‍पना नाहीत. त्‍यांना मानवी मूल्‍ये आहेत. त्‍यांची कालसुसंगत मांडणी करावी लागेल. एक क्रांतिकारी सिद्धांत निर्माण करावा लागेल. मार्क्‍सच्‍या मताने विचार क्रांतिकारी कधी होतो? - जेव्‍हा तो जनतेच्‍या मनाची पकड घेतो. तो जनतेच्‍या मनाची पकड कधी घेतो? जेव्‍हा तो जगण्‍याच्‍या संघर्षाशी लावला जाऊन त्‍याचे प्रात्‍यक्षिक सिद्ध होते. हे प्रात्‍यक्षिक तेव्‍हाच सिद्ध होते, जेव्‍हा तो आजूबाजूच्‍या परिस्थितीच्‍या मूळाशी भिडेल तेव्‍हा. आणि हे मूळ तर स्‍वतः माणूसच आहे.

वरील मुद्द्यांच्‍या विवेचनाच्‍या अखेरीस मार्क्‍सच्‍या एक अवतरण नोंदवून डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपले भाषण संपवले. ते अवतरण असेः शिकविणा-यांचे सुद्धा शिक्षण होणे आवश्‍यक आहे. (एज्‍युकेटर्स अल्‍सो मस्‍ट बी एज्‍युकेटेड)

यानंतर चर्चा सुरु झाली. चर्चेत सूचना मांडताना गजानन खातू म्‍हणाले, रावसाहेब ज्‍या वेगाने लिहितात, त्‍या वेगाने आपण वाचत नाही. पुढचे वर्ष हे रावसाहेबांच्‍या विचारांचा वेध घेण्‍याचे वर्ष करुया.

कॉ. एम.ए.पाटील यांनी चर्चेत भाग घेताना अमेरिकेतले अरिष्‍ट संपण्‍याची सुतराम शक्‍यता नसल्‍याचे सांगितले. उदारमतवादाला निर्नियंत्रण सारखा पर्यायी शब्‍द वापरण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली. जोवर आपण आत्‍मटीका करुन आपला व्‍यवहार बदलत नाही, तोवर भांडवलशाहीच्‍या विरोधात शंख करण्‍यात काय मतलब, असा प्रश्‍न करुन या आत्‍मटीकेचे स्‍वरुप त्‍यांनी पुढीलप्रमाणे स्‍पष्‍ट केले, आज रिपब्लिकन, साम्‍यवादी यांत अनेक गट आहेत. व्‍यक्तिवाद प्रभावी होतो आहे. दोन कम्‍युनिस्‍ट पक्ष एक का होत नाहीत? ते एक झाले तर आम्‍ही परिसरात वावरणारे इतर गट एकत्र येऊन त्‍यांना मिळू. आपल्‍याकडे मार्गदर्शनाचे केंद्रच नसल्‍याने विद्यार्थी, युवक आपल्‍याकडे कसे येतील?’ कामगारवर्गाच्‍या वर्गीय जाणिवा पुसत चालल्‍या आहेत, या मताशी असहमती व्‍यक्‍त करुन पाटील म्‍हणाले, असंघटित कामगार, नक्षलवादी आंदोलने, सेझविरोधी आंदोलने या सगळ्यात शेतकरी, शेतमजूर लढत आहेत. मोलकरणी, रिक्‍शावाले, हॉकर्स, सिक्‍युरिटी गार्डस्, कंत्राटी कामगार या सगळ्यांची संख्‍या गिरणी कामगारांच्‍या कितीतरी पटीने अधिक आहे. या सगळ्यांना एकत्र केले तर मुंबई एक होऊ शकते. त्‍यासाठी या सर्वांच्‍या संघटना एक व्‍हायला हव्‍यात.

कॉ. आर.एस.देसाई यांनी ब्रिटन, अमेरिकेत स्‍थानिकांना प्राधान्‍य देण्‍यासंबंधातल्‍या आंदोलनांचा उल्‍लेख करुन स्‍थानिक अस्मिता हा आंतरराष्‍ट्रीय प्रश्‍न असल्‍याचे नमूद केले. सोव्हिएतच्‍या विघटनात प्रादेशिक विचार (रिजनॅलिझम) नव्‍हता का, असाही प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला.

भारती शर्मा यांनी दोन दिवसांच्‍या या चर्चासत्रात अमेरिकेतील अरिष्‍टासंबंधीचे मांडणी व्‍हायला हवी होती, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करुन लॅटिन अमेरिकेतील घडामोडींचा, तेथे चाललेल्‍या वेगवेगळ्या प्रयोगांचा आपण वेध कसा घेणार? असा प्रश्‍न उपस्थित केला. आर.एस.देसाईंच्‍या भाषणाचा संदर्भ पकडून देशोदेशी स्‍थानिक लोकाधिकार समित्‍या तयार होत आहेत, असे त्‍यांनी प्रतिपादन केले. मुस्लिम मूलतत्‍त्‍ववादाची ढाल साम्राज्‍यवादी शक्‍ती करत आहेत, असेही त्‍या पुढे म्‍हणाल्‍या. सांस्‍कृतिक क्षेत्रात सामाजिक परिपोष करणारी नवी नाटके, सिनेमे तयार होत नसल्‍याची खंत कॉ. नाचणेंनी व्‍यक्‍त केली होती, त्‍यावि‍षयी वस्‍तुस्थिती वेगळी असल्‍याने नमूद करुन भारती शर्मा यांनी अलिकडच्‍या काही सिनेमांची उदाहरणे देऊन या बदलत्‍या वातावरणाची आपण दखल घ्‍यायला हवी, असे सांगितले. समाजातल्‍या 50 टक्‍के महिला सरंजामी संस्‍कृतीतून ज्‍या गतीने स्‍वतःला मुक्‍त करुन घेत आहेत, त्‍याचाही वेध आपण घ्‍यायला हवा, अशी अपेक्षा त्‍यांनी शेवटी व्‍यक्‍त केली.

मराठी अभ्‍यास केंद्राचे प्रा. राममोहन खानापूरकर यांनी राज ठाकरे संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनातील हुतात्‍म्‍यांचा उल्‍लेख करुन आपले मुद्दे हायजॅक करत असल्‍याचे नमूद केले. जेट या विमान वाहतूक कंपनीचे कर्मचारी आपल्‍याकडे नाही, तर कृष्‍णकुंजवर (राज ठाकरे यांचे घर) थडकले, याचा प्रांजळ विचार आपण केला पाहिजे, अशी अपेक्षा खानापूरकर यांनी व्‍यक्‍त केली. न्‍यायालयातील मराठीच्‍या वापराविषयीची अनास्‍था, महानगरपालिकेच्‍या मराठी शाळा बंद पडणे, याविषयी खंत व्‍यक्‍त करुन साहित्‍य-कलेत मराठी टिकवू, मात्र ज्ञान-शिक्षणाच्‍या कक्षेत नाही, ही दांभिकता असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.

कॉ. सुकुमार दामले यांनी एकूण मांडणी व चर्चांतले काही संदर्भ पकडून बाळ ठाकरे, राज ठाकरे यांचे स्‍तोम माजवण्‍यात शासन व प्रसारमाध्‍यमांचा मोठा वाटा असल्‍याचे सांगितले. आपण आजही गैरलागू (इरिलेवंट) ठरलो नसल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

कॉ. दास यांनी आजच्‍या भांडवलदारांच्‍या हुकूमशाहीला कामगारवर्गाची हुकूमशाही हाच पर्याय असल्‍याचे सांगून कम्‍युनिस्‍ट पक्षांनी कामगावर्गाची हुकूमशाही ही संकल्‍पना टाकल्‍याबद्दल नाराजी व्‍यक्‍त केली.

दोन दिवसांच्‍या या चर्चासत्राचा शांती पटेल यांनी समारोप केला. ते म्‍हणाले, आपले डोके व मन खुले हवे. परिवर्तन म्‍हणजे काय, याचे स्‍पष्‍ट चित्र हवे. समाजातला प्रत्‍येक माणूस सुखी व्‍हावा, हा आपला उद्देश हवा. या उद्देशाच्‍या पूर्ततेचा मार्ग हिंसक असता कामा नये. हिंसक मार्गाने तात्‍काळ लाभ मिळाला तरी लांबवरचा परिणाम साधत नाही. ब्रिटिशांना महात्‍मा गांधींच्‍या मार्गाने घालवले गेले. आज आपल्‍यासमोर असलेल्‍या आव्‍हानांविषयी बोलताना कायदे संसदेत ठरत असल्‍याने राजकारणाविषयी कामगार संघटनांनी सजग असायलाच हवे, मात्र त्‍याचवेळी त्‍यांच्‍यावर राजकीय पक्षांचा वरचष्‍माही असता कामा नये, असे प्रतिपादन केले. कामगार संघटनांच्‍या एकजुटीचे महत्‍व नमूद करुन हिंद मजदूर सभा व आयटक यांच्‍या एकत्रिकरणाच्‍या प्रक्रियेला खो घातला गेल्‍याबद्दलची वेदनाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. धर्मांधतेच्‍या आव्‍हानाचा विचार मांडताना गांधीजींच्‍या मी सनातनी हिंदू आहे या विधानाचा अर्थच संघपरिवाराने कसा बदलला ते सांगितले. जागतिकीकरण ही प्रक्रिया खूप जुनी, माणूस जन्‍माला आला तेव्‍हापासूनची असल्‍याचे सांगून आज नफेखोर जागतिकीकरण व बिननफेखोर जागतिकीकरण असे जागतिकीकरणाचे दोन प्रकार असल्‍याचे विशद केले. रोजगार हमी योजनेसारख्‍या सरकारच्‍या चांगल्‍या योजनांच्‍या अंमलबजावणीचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे तसेच आपला सर्वांचा समान किमान कार्यक्रम निश्चित केला पाहिजे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कॉ. नाचणे यांनी पुढील नियोजनासाठी श्रमिक प्रतिष्‍ठानचे लोक व निमंत्रितांची एक बैठक 15 दिवसांत घेतली जाईल असे सांगितले. श्रमिक प्रतिष्‍ठान हे मुक्‍त व्‍यासपीठ असल्‍याने मतभेद असलेली पुरोगामी मंडळी इथे एकत्र येऊ शकतात, असे नमूद केले. कॉ. एम.ए.पाटील यांनी सर्वांचे आभार मानून दोन दिवसांचे चर्चासत्र संपल्‍याचे जाहीर केले.

................................................................................................................................................

Tuesday, January 5, 2010

आंबेडकरी चळवळीचे भवितव्‍य आणि युवा पिढी

'सद्धम्‍म'साठी दिलेला लेख

कालची गोष्‍ट.

मनसेचे लोक म्‍हणतात, बाबासाहेब आमचे असे तुम्‍ही का म्‍हणता ? ‘आपले म्‍हणा ना ! त्‍यांनी घटना देशासाठी लिहिली. फक्‍त दलितांसाठी नाही. महाराष्‍ट्र राज्‍याबद्दल, मराठी माणसाबद्दल त्‍यांनी भूमिका मांडली. बाबासाहेब हे आपल्‍या सगळ्यांचे आहेत. सर्व महाराष्‍ट्राचे, सर्व देशाचे आहेत. तुम्‍हीच लोकांनी बाबासाहेबांना संकुचित बनवले.

...वस्‍तीतील एक तरुण कार्यकर्ता बैठक संपल्‍यावर माझ्याशी बोलत होता. नंतर रिपब्लिकन नेत्‍यांना त्‍याने जाम शिव्‍या घातल्‍या आणि मग आपली पोरे मनसेत जातात याला जबाबदार कोण ?’ असा उत्‍तराची अपेक्षा नसणारा प्रश्‍न माझ्यापुढे टाकला.

मागचा एक धम्मचक्रप्रवर्तन दिन.

दीक्षाभूमीवरील स्‍तूपात फिरत होतो. बाबासाहेब व त्‍यांच्‍या वरच्‍या बाजूस बुद्धाची आशीर्वाद देणारी प्रतिमा एकत्रित असलेला एक फोटो समोर होता. सोबतच्‍या तरुण कार्यकर्त्‍याने निरागसपणे विचारले, सर, बाबासाहेब अ‍ाणि बुद्ध एकाच वेळेस होते का ?’

एका साहित्यिक मित्राच्‍या जुने कार्यकर्ते असलेल्‍या वडिलांचा अमृतमहोत्‍सव.

अनेक अधिकारी, संपादक, साहित्यिक, प्रतिष्ठित मंडळी जमलेली. हॉलच्‍या बाहेर अनेक गाड्या लागलेल्‍या.

पंच्‍याहत्‍तरी-ऐंशीचे लोक भाषणात बाबासाहेबांच्‍या काळातल्‍या जुन्‍या स्‍फूर्तिदायी आठवणी जागवत होते. त्‍यांच्‍या वाणीतून, डोळ्यांतून तत्‍कालीन चळवळीचा अभिमान, तेज ओसंडत होते. साठीचे लोक पँथरच्‍या काळातील आठवणींनी सुरुवात करत आज कशी चळवळ संपली आहेचा निराश सूर लावत होते. त्‍यांच्‍या चेह-यांवर काही गमावल्‍याची छाया तरंगत होती.

12 ते 22 वयोगटातील आमची (म्‍हणजे 40 ते 50 चा वयोगट) मुले आजुबाजूला खेळत किंवा गप्‍पा मारत होती. त्‍यांना यात काहीच गम्‍य नव्‍हते. आता ती कंटाळू लागलेली. बुफे च्‍या टेबलावरील पात्रांची झाकणे कधी उघडतात, याची वाट पाहत असलेली.

माझ्या मित्राची शिक्षिका असलेली पत्‍नी मला म्‍हणाली, भाऊजी, ह्यांना आवरतं घ्‍या म्‍हणावं आता. पोरं पार कंटाळलीत. आम्‍हाला त्रास द्यायला लागलीत.

माझा बाप म्‍हणजे तुझा आजा मेलेली जनावरं ओढायचा सांगितल्‍यावर माध्‍यमिक शाळेतील माझा मुलगा मला म्‍हणाला होता- काय पकवतोयस !’

...पुढचं काही ऐकून घ्‍यायला त्‍याला इंटरेस्‍ट नव्‍हता. टीव्‍हीवर चाललेल्‍या रोडीज मधल्‍या युवक-युवतींच्‍या विरोचित करामतींत तो गुंगून गेला.

आपला भू‍तकाळ, आपला समाज, आपली चळवळ याविषयी जाणीवपूर्वक बोलण्‍याचा माझा प्रयत्‍न सुटत नाही. लादले न जाता त्‍याच्‍या कलाकलाने बोलत असतो. थोडा प्रतिसाद, अन् बरेचसे दुर्लक्ष असे चालते.

बालपणापासून फ्लॅट व मिश्र संस्‍कृतीत वाढलेल्‍या माझ्या मुलाला इतरांपासून काही वेगळे दिसत असले तर घरातला बाबासाहेबांचा फोटो, बुद्धाची मूर्ती एवढेच. तो बाय डिफॉल्‍ट निरीश्‍वरवादी आहे. याचे कारण घरात कोणत्‍याही देवाचे अस्तित्‍व नाही, चर्चा नाही.

वरच्‍या सर्व प्रसंगांतील युवा पिढी बौद्धच आहे. पण विविध आर्थिक व शैक्षणिक थरातली. बौद्ध असण्‍याबरोबरच आणखी एक गोष्‍ट तिच्‍यात सामायिक आहे. ती म्‍हणजे- आंबेडकरी चळवळीबाबतची निर्भान, निर्शल्‍य दिशाहिनता. ज्‍याचे भान नाही, ज्‍याचे शल्‍य नाही, ज्‍याचा खेद नाही अशी दिशाहिनता.

ह्याला जबाबदार कोण ?

...परिस्थिती ?

होय. पण काही प्रमाणात. परिस्थिती बदलतच असते. जग परिवर्तनशील आहे. थोपवू म्‍हटले तरी ते थांबणार नाही. जगातल्‍या, समाजातल्‍या सगळ्यांच्‍याच जगण्‍याला ह्या बदलत्‍या परिस्थितीचे संदर्भ असतात. बौद्धांच्‍या तसेच बौद्धेतरांच्‍या.

पण परिस्थिती सुटी नसते. ती एक शृंखला असते. तो एक प्रवाह असतो. स्‍वच्‍छ, गढूळ, डोह, खडक असे सगळे त्‍यात असते. या परिस्थितीच्‍या स्थित्‍यंतरात आधीचे प्रगतीशील घटक पुढच्‍या पिढीकडे जाणीवपूर्वक सोपवावे लागतात. मागच्‍याने पुढच्‍याकडे मशाल सोपवायची असते. मागच्‍याने पुढच्‍याला चाल द्यायची असते. ही जाणीवपूर्वकता चळवळीत विशेष महत्‍वाची असते. आंबेडकरी चळवळीत हे झाले का ? होत आहे का ?

याचे उत्‍तर जवळ जवळ नाही असे द्यावे लागले असते, तरी बरे झाले असते. ते कमी धोकादायक होते. पण विचित्र, तिरपागडे, हानिकारक असे काहीतरी पुढच्‍या पिढीला सोपवले जात आहे. आणि ते खूपच गंभीर आहे.

आंबेडकरी चळवळ याचा अर्थ काय ?

बौद्धांनी (म्‍हणजे पूर्वाश्रमीच्‍या महारांनी) बौद्धांसाठी (म्‍हणजे पूर्वाश्रमीच्‍या महारांसाठी) चालवलेली चळवळ, असा आहे का ?

नाही. ती सर्व पीडितांना, शोषितांना मुक्‍त करणारी मानवमुक्‍तीची चळवळ आहे, अशीच आपण तिची व्‍याख्‍या करतो. ती केवळ बौद्धांपुरती संकुचित होणे आपल्‍याला तत्‍वतः मान्‍य नाही.

मग वरच्‍या पहिल्‍या घटनेतील मनसेला बाबासाहेबांचे व्‍यापकत्‍व आजच्‍या आं‍बेडकरी तरुणांना सांगण्‍याचा अधिकार कोणी दिला ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी छेडलेले देशव्‍यापी भूमिहिनांचे आंदोलन, महाराष्ट्राच्‍या सांस्‍कृतिक सारस्‍वताला हादरविणारे दलित साहित्‍य, सामाजिक-राजकीय जीवनाला थरारुन सोडणारी दलित पँथरची गर्जना, नामांतर-रिडल्‍सची आंदोलने अशा अनेक सत्‍कर्मांची नोंद आंबेडकरी चळवळीच्‍या इतिहा‍सात असली तरी आज वट्टात पराभूतता, दिशाहिनता हेच आहे. याला कारण कोण ?

निःसंशय आंबेडकरी चळवळीतले आजचे नेते आणि आजची शिक्षित व मध्‍यमवर्गीय मध्‍यवयीन पिढी.

आज ऐक्‍य केलेल्‍या रिपब्लिकन नेत्‍यांचा नजिकच्‍या भूतकाळातला व्‍यवहार काय राहिला आहे ?

एकेकाळी दलित चळवळीला सामाजिकतेबरोबरच वर्गीय परिमाण देऊन समग्र परिवर्तनाची मांडणी करणारे नामदेव ढसाळ शिवसेनेबरोबर काय म्‍हणून गेले ? नामांतर लढ्यातील लॉंग मार्चची पुण्‍याई ज्‍यांच्‍या नावावर जमा आहे, त्‍या प्रा. जोगेंद्र कवाडेंनी नितीन गडकरी आणि त्‍यांच्‍या भाजपला पाठिंबा काय म्‍हणून दिला होता ? लढाऊ व संघटक म्‍हणून ख्‍याती व सर्वाधिक लोकप्रियता असलेल्‍या रामदास आठवलेंनी कॉंग्रेस व पुढे राष्‍ट्रवादीशी जातीयवादी शक्‍ती सत्‍तेवर येऊ नयेत म्‍हणून सहकार्य केले. हा तर्क योग्‍यच होता. पण चळवळ सोडायचे काय कारण होते ? सत्‍तेत भागिदारी न करताही हे सहकार्य करता आले असते. त्‍याचा प्रचंड दबाव कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीवर राहिला असता. आठवलेंची नैतिक व पर्यायाने राजकीय ताकद खूप वाढली असती. सत्‍तेत सहभागी व्‍हायचे, ते आपल्‍या समाजासाठी, असे म्‍हणता म्‍हणता ढाण्‍या पँथरची नखे सत्‍ताधा-यांनी बोथट कधी केली, हे त्‍यालाही कळले नाही. कळले तेव्‍हा या पँथरच्‍या आग ओकणा-या डोळ्यांच्‍या कचकड्या झाल्‍या होत्‍या. आता या डोळ्यांना कोण घाबरणार ? दिल्‍लीत मंत्रिपद दिले नाही तेव्‍हा, तसेच शिर्डीत पराभूत झाल्‍यावर आंदोलन करणा-या आठवलेंच्‍या कार्यकर्त्‍यांना जनतेने साथ दिली नाही. सत्‍तेच्‍या विविध स्‍तरांवर लाभार्थी झालेल्‍या पँथर कार्यकर्त्‍यांचे पोषाख, व्‍यक्तिमत्‍व, वागणे अन्‍य सत्‍ताधारी पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांहून कोणत्‍याही अर्थाने भिन्‍न दिसत नाही. सत्‍तेच्‍या दलालांच्‍या या बाजारात नव्‍या पिढीला जुना पँथर कसा होता, हे दाखवायचे झाले, तर म्‍युझियमध्‍ये ठेवायला त्‍याचा सांगाडाही शिल्‍लक नाही. एकतर त्‍यांच्‍या हाडांनाही मांद्य आलेले आहे किंवा ती अगदी भुसभुशीत झालेली आहेत.

रामदास आठवलेंची जमेची बाजू म्‍हणजे ते संकुचित नाहीत, आक्रस्‍ताळे नाहीत. व्‍यापक एकजुटीच्‍या बाजूचे आहेत, धर्मांधतेच्‍या निश्चित विरोधात आहेत. पण हा चांगुलपणा व्‍यवहारात शक्‍ती म्‍हणून आज रुपांतरित होत नाही. प्रकाश आंबेडकरांचे चळवळीतले पदार्पणच मुळी सम्‍यक समाज आंदोलन या व्‍यापक पायावर झाले. ते एकजातीय (म्‍हणजे केवळ बौद्धांपुरते) तेव्‍हाही नव्‍हते, आताही नाहीत. मात्र ते जातींच्‍या बेरजांवर विश्‍वास ठेवतात. शिवाय सत्‍तेच्‍या सारिपाटात कोणाशीही- भाजप-सेनेशीही एकजुटीचे प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष क्रम त्‍यांना मंजूर असतात. विदर्भात काही ठिकाणी त्‍यांनी स्‍वतःचा असा जनाधार तयार केला आहे. संघटना बांधली आहे. ते यावेळच्‍या ऐक्‍य प्रक्रियेपासून ठरवून दूर होते. त्‍यांनी स्‍वतःच्‍या ताकदीवर दोन आमदार यावेळी निवडून आणले आहेत. त्‍यामुळे स्‍वाभिमानाने सत्‍तेचे राजकारण आम्‍हीच करतो, असा दावा ते करु शकतात. पण त्‍यांच्‍या जुन्‍या हेकेखोर व अविश्‍वासार्ह व्‍यवहारांमुळे त्‍यांना आंबेडकरी जनतेची व्‍यापक मान्‍यता अजूनही नाही. गवईंचे राजकारण सत्‍तेची ऊब घेत जाण्‍याचे राहिले. त्‍यांची निष्‍ठा काही काळ त्‍यांच्‍या सुपुत्रांनी रिडालोसमध्‍ये जाऊन भंग केली. तथापि, चुकीची दुरुस्‍ती लगेच करुन ते मूळ वळचणीला परतले.

परिणामी, या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन उमेदवारांचा त्‍यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यांतही (म्‍हणजे बौद्ध मतदार मोठ्या संख्‍येने असलेले विभाग) धुव्‍वा उडाला. याचा अर्थ, ऐक्‍याच्‍या फार्साला नेहमी फसत आलेली आशावादी बौद्ध जनता यावेळच्‍या रिपब्लिकन ऐक्‍यावर मात्र भाळली नाही. तिने एकतर पारंपरिकरित्‍या कॉंग्रेसला आणि तिच्‍यातील तरुणांनी मनसेला कौल दिला. (बसपचे मायाजालही यावेळी फाटले होते)

रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्‍व बौद्धांच्‍या बाहेर कधी गेलेच नाही. त्‍यांनी बाबासाहेब महान होते हे सांगण्‍याच्‍या आणि त्‍यांच्‍या नावाच्‍या वापराच्‍या पल्‍याड परिणामकारक असे काही सांगितलेच नाही. वासाहतिक शोषणाचे विश्‍लेषण करणारे बाबासाहेब, जागतिक लोकशाही लढ्यांचा वारसा व संदर्भ देणारे बाबासाहेब, कामगारांसाठी 8 तासांचा दिवस, कामगार स्‍त्रीला बाळंतपणाची रजा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, समस्‍त हिंदू स्त्रियांना वारसा हक्‍क यांसाठी झगडणारे बाबासाहेब, भाषावार प्रांतरचनेसंबंधी-पाकिस्‍तानविषयी भूमिका मांडणारे बाबासाहेब आम्‍ही अन्‍य समाजाला कधी समजावलेच नाहीत. एवढेच नाही. ज्‍या बाबासाहेबांनी आम्‍हाला वैश्विक बुद्ध दिला. तोही आम्‍ही महार करुन टाकला. अन्‍य समाजातील अनेकांचा बुद्ध हा महार होता असा समज आहे. हे त्‍यांचे अज्ञान आहे, हे खरेच. पण आपले नाकर्तेपण त्‍यामुळे कमी होत नाही.

आज आपल्‍यात 74 टक्‍के (ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या खालोखाल) साक्षरता आहे. 4 वर्तमानपत्रे आहेत. उच्‍चपदस्‍थ अधिकारी, विचारवंत आहेत. सुस्थित असा लक्षणीय मध्‍यमवर्ग आहे. तरीही गेल्‍या 59 वर्षांत बाबासाहेबांनी आपल्‍याला दिलेला बुद्ध हा वैश्विक ठेवा आपण सार्वत्रिक करणे सोडाच; आपल्‍या व्‍यतिरिक्‍तच्‍या अन्‍य दलित व मागास जातींपर्यंत नेऊ शकलो नाही. लोकल ट्रेनमध्‍ये सम्राट हातात असला की इतर लोक थोडे वेगळ्या नजरेने आपल्‍याकडे का पाहतात ?

भारत बौद्धमय करण्‍याचा मार्ग म्‍हणजे जयंती-मयंतीला आपल्‍याच कोंडाळ्यात बेंबीच्‍या देठापासून भाषणे करणे असा आपण लावलेला आहे. शिक्षित मध्‍यमवर्गीय झोपडपट्टीतल्‍या जयंतीत प्रमुख पाहुणा म्‍हणून बाबासाहेबांबद्दल, बुद्धाबद्दल मोठमोठ्या गोष्‍टी करतो आणि आपल्‍याच सोसायटीतल्‍या, ऑफिसातल्‍या दुस-या बौद्धाला चारचौघात जयभीम म्‍हणायला कचरतो. बुद्ध, बाबासाहेब या प्रेरणांचा व विचारांचा गंध आपल्‍या व्‍यक्तिमत्‍वातून अशारीतीने पाझरला पाहिजे की इतर लोक त्‍याकडे आकर्षित व्‍हायला हवेत. आणि त्‍यांनी विचारले पाहिजे, तुमचे व्‍यक्तित्‍व इतके सच्छिल, सुगंधी असण्‍याचे रहस्‍य काय ?’ आणि आपण साभिमान विनम्रतेने सांगू शकलो पाहिजे बाबासाहेब व बुद्ध. पण हे आपण केले नाही.

बौद्धांमधला शिक्षित मध्‍यमवर्ग ही खरे तर ताकद आहे. पण तिच्‍यात अनेक विकृती तयार झाल्‍या आहेत. एकूण मध्‍यमवर्गात आलेली आत्‍ममश्‍गुलता बौद्ध मध्‍यवर्गातही गतीने येऊ लागली आहे. शासकीय नोक-या, आरक्षणे, बढत्‍या, महामंडळांची कर्जे, गृहसंस्‍थांतल्‍या सवलती यांत आपल्‍याला व आपल्‍यानंतर आपल्‍या मुलाबाळांनाच लाभ कसा मिळेल, याबाबत तो विलक्षण दक्ष असतो. आपली जात्‍याच असलेली राजकीय-सामाजिक तल्‍लखता तो इथे पुरेपूर वापरतो. त्‍यासाठी वशिला, लाच, सत्‍ताधा-यांची खुशामत इ. रुढ मार्गांतला कोणताही मार्ग त्‍याला वर्ज्‍य नसतो. पण आपल्‍याच समाजातल्‍या गरीब स्‍तरातील बौद्धांचे कष्‍टकरी, गरीब म्‍हणून असलेले प्रश्‍न सोडवण्‍याबाबत, त्‍यांवर चळवळ संघटित करण्‍याबाबत तो अलिप्‍त राहतो. आपल्‍या मुलांसाठी आपण आरक्षण न घेतल्‍यास आपल्‍यातल्‍या गरीब मुलांना त्‍याचा लाभ मिळेल, हा अंतर्गत सामाजिक न्‍याय त्‍याला मंजूर नसतो. आपली मुले अभिजनवर्गात मिसळावीत म्‍हणून आपली ओळख ओळख लपविण्‍याचा, पुसण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न करतो. आंबेडकरी परिभाषेचा वाराही त्‍यांना लागणार नाही, याची निर्लज्‍ज दक्षता घेतो. सोसायटीतल्‍या गणेशोत्‍सवात सर्वधर्मसमभाव किंवा औचित्‍याचा प्रश्‍न म्‍हणून सहभागी होणे वेगळे. पण आम्‍ही तुमच्‍यातलेच हे दाखवण्‍यासाठी स्‍वतःच गणपती बसविण्‍यासारखे प्रकार तो करतो, हे आक्षेपार्ह आहे. जसजसा आर्थिक स्‍तर बदलेल, जसजसे घर अनेक खोल्‍यांचे होत जाईल, तसतसा बाबासाहेबांचा फोटोही हॉलमधून बेडरुमध्‍ये आणि नंतर तेथूनही दिसेनासा होतो. हा शिक्षित मध्‍यमवर्ग आपल्‍या नेत्‍यांचे राजकारण दुरुस्‍त करण्‍याचा आग्रह धरण्‍याऐवजी संधी मिळताच तो स्‍वतःच त्‍याचा वाटेकरी होतो. आपल्‍या व्‍यवहाराचे ढोंगी समर्थन करतो. आंबेडकरी चळवळीवरची ही साय दिवसेंदिवस दाट होत चालली आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या दिशाहिनतेत त्‍यामुळे भर पडते आहे.

आंबेडकरी चळवळीचे भवितव्‍य धोक्‍यात आहे, ही चिंतेची बाब आहे. आणि त्‍याहून चिंतेची बाब म्‍हणजे युवा पिढीला या धोक्‍याची जाणीवच नसणे ही आहे.

यावर उपाय काय ?

ज्‍यांना हे कळते, असे अनेक कार्यकर्ते आजही आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी चळवळीत आहेत. आंबेडकरी समाजाने आपली मूळ उमेद पुन्‍हा जागवावी, खरेखुरे आंबेडकरी कार्यकर्त्‍याचे नवे तेजोमयी व्‍यक्तित्‍व घडवावे, पहिल्‍यापेक्षा अधिक व्‍यापक जाणीव घेऊन क्रियाशील व्‍हावे, यासाठी या जाणत्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍न करावयास हवेत. परिस्थितीच्‍या रेट्याची वाट न बघता एकएका कार्यकर्त्‍याशी संवाद केला पाहिजे. काही किमान सहमतीच्‍या मुद्द्यांवर हालचाली सुरु केल्‍या पाहिजेत. धुक्‍यात नुसतेच गप्‍प उभे राहण्‍यापेक्षा त्‍यातल्‍या त्‍यात विरळ थरातून हिंमतीने वाट शोधायला लागले पाहिजे. या प्रयत्‍नांतूनच सूर्य उगवणार आहे. धुके सरणार आहे. वाट स्‍पष्‍ट होणार आहे. दिशा मोकळ्या होणार आहेत.

रिपब्लिकन पक्ष नाम के वास्‍ते का होईना आज एकवटला आहे. त्‍याला योग्‍य दिशा देण्‍याचा प्रयत्‍न व्‍हायला हवा. ही दिशा कोणती हे फार शोधण्‍याची गरजच नाही. आता तरी बाबासाहेबांनी त्‍यांच्‍या खुल्‍या पत्रात मांडलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्‍पना पुरेशी आहे. आधी तिथवर पोहोचणे आवश्‍यक आहे. मग त्‍याचा विकास करता येईल.

काय आहे ही संकल्‍पना ?

लोकशाही रचनेत लोकशाहीच्‍या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे (खरा रिडालोस), ही तळमळ त्‍यात आहे. त्‍यात कोठेही एकजातीयता, विशिष्‍टता नाही, तर समष्‍टीच्‍या समग्र कल्‍याणाचा घोष त्‍यात आहे. केवळ बौद्धांचा पक्ष असे जे संकुचित स्‍वरुप आजच्‍या रिपब्लिकन पक्षाचे आहे, त्‍याचा मागमूसही बाबासाहेबांच्‍या मूळ संकल्‍पनेत नाही, किंबहुना त्‍यास पूर्ण विरोधी अशीच बाबासाहेबांची मांडणी आहे. या पक्षाच्‍या संकल्‍पनेसंबंधात त्‍यांनी एस.एम. जोशी, लोहिया यांच्‍याशी बोलणीही सुरु केली होती. तथापि, त्‍याच काळात त्‍यांचे महापरिनिर्वाण झाल्‍याने ही बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत.

या मांडणीबाबत आणखी काही नोंदवत राहणे, ही विनाकारण पुनरुक्‍ती ठरेल. बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना स्‍पष्‍ट करणारे त्‍यांचे खुले पत्र (ज्‍याचा सगळे ऐक्‍यवादी रिपब्लिकन पुढारी उल्‍लेख करत असतात व त्‍यावर आधारित आमचे ऐक्‍य किंवा पक्ष असल्‍याचा दावा करत असतात व नेमके त्‍याच्‍या विरोधात व्‍यवहार करत असतात) जिज्ञासूंनी मुळातून वाचावे. महाराष्‍ट्र शासनाने प्रकाशित केलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे, खंड 20 मध्‍ये ते उपलब्‍ध आहे.

असा रिपल्किन पक्ष उभा करुन सर्व पीडितांच्‍या मुक्‍तीच्‍या कार्यक्रमावर चळवळ उभारणे व त्‍या क्रमात निवडणुका लढणे असे व्‍हायला हवे.

दुसरे म्‍हणजे, बुद्धविहार केंद्र धरुन वस्‍तीत सामाजिक ऐक्‍य उदयास आले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्‍यांचे विचार व त्‍यांनी दिलेला बौद्ध धम्‍म या सर्व गटातटांत मान्‍यता असलेल्‍या सामायिक व अत्‍यंत आदरणीय बाबी आहेत. प्रत्‍येक बौद्ध वस्‍तीत बुद्धविहार असतेच. या बुद्धविहारात त्‍या वस्‍तीतले सर्व गटातटांना मानणारे सामान्‍य लोक एकत्र येऊ शकतील. बाबासाहेब, त्‍यांचे विचार व बुद्ध धम्‍म या सामायिक बाबींबाबत अधिक समजून घेणे, आपले जाणतेपण वाढविणे व समाज म्‍हणून एक राहणे, हे होऊ शकते. अट एकच, पक्षीय किंवा गटाच्‍या राजकीय भूमिकांची या पातळीवर चर्चा न करणे. प्रत्‍येकाला राजकीय भूमिका घ्‍यायला मोकळीक ठेवणे. समान किमान भूमिकेवर आधारलेल्‍या वस्‍त्‍यांवस्‍त्‍यांमधील अशा सामान्‍यांच्‍या ऐक्‍यातूनच राज्‍यपातळीवरील टिकाऊ ऐक्‍य उदयास येऊ शकेल. अत्‍याचार करु धजणा-यांना या ऐक्‍याचा निश्चितच धाक राहील व राजसत्‍तेलाही या ऐक्‍याची पदोपदी दखल घ्‍यावी लागेल.

असे आणखी अनेक उपाय असू शकतात. अशा उपायांनीच आंबेडकरी चळवळीचे भवितव्‍य सुरक्षित करता येईल. अशा सम्‍यक आंबेडकरी चळवळीचा नैतिक व तात्विक दीपस्‍तंभच आपल्‍यातल्‍या युवा पिढीला दिशा देईल.

- सुरेश सावंत

Thursday, December 24, 2009

आंबेडकरी चळवळीचा उद्याच्‍या महाराष्‍ट्रातील मुक्‍काम कोठे ? कसा ?

'आंदोलन'साठी 24 डिसेंबर 2009 रोजी तयार केलेला लेख

महाराष्‍ट्राच्‍या संदर्भात ओळखली जाणारी दलित चळवळ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व वारसा मानणा-या दलितांतील बहुसंख्‍य अशा बौद्ध (पूर्वाश्रमीचा महार समाज) समाजाच्‍या पुढाकाराखालची चळवळ राहिली आहे. तिला आंबेडकरी चळवळ असे म्‍हणण्‍याचा प्रघात पडला आहे. म्‍हणून इथेही मी तेच संबोधन वापरत आहे. वस्‍तीपासून तुटलेल्‍या बौद्ध मध्‍यमवर्गीय कुटुंबातील अलिकडची पिढी सोडली, तर पूर्वी बौद्ध समाजात जन्‍माला आलेल्‍या प्रत्‍येकाला 3 गोष्‍टी जन्‍मतः मिळायच्‍या. एक, बौद्ध धर्म, दोन, कार्यकर्तेपण आणि तीन, रिपब्लिकन पक्ष. जन्‍मतः पक्ष मिळणारा हा एकमेव समाज असावा. माझ्या वाट्यालाही या तिन्‍ही गोष्‍टी जन्‍मतः आल्‍या. पुढच्‍या वाटचालीत माझे नाते अन्‍य प्रगतीशील विचारांशी-चळवळींशी विस्‍तारत गेले. हा स्‍वपरिचय यासाठी की, माझे पुढील कथन त्‍या अर्थाने तटस्‍थ नाही. माझी भावनिक गुंतवणूक निःसंशय त्‍यात आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या वर्तमानातील घडामोडींवरील माझ्या प्रतिक्रिया, आकलन व अपेक्षा अशीच पुढील मांडणी आहे. आंबेडकरी चळवळीचे ऐतिहासिक विश्‍लेषण असे तिचे स्‍वरुप नाही.

या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाने स्‍वतःचे सुमारे 180 उमेदवार उभे केले होते. त्‍यातला एकही निवडून आला नाही. रिडालोसचेही जेमतेम 11 जण निवडून आले. ते आमचे असे भलेही रामदास आठवले म्‍हणत असले, तरी ते काही खरे नाही, हे त्‍यांनाही कळते. रिडालोसच्‍या या जेमतेम यशामागेही शेकापचा भाजपसेनेसहित केलेल्‍या महायुतीचा फॉर्म्‍युला आणि समाजवादी पक्षाचा मुस्लिमांतील वाढता जातीय आधार मुख्‍यतः कारणीभूत आहे. आठवले रिडालोसचे निमंत्रक म्हणून रिडालोसच्‍या यशाच्‍या श्रेयाचे प्रवक्‍तेपण जरुर करु शकतात. तथापि, निवडणुकांच्‍या आधी जो मान त्‍यांना रिडालोसचे अन्‍य घटक देत होते, तो आता उरलेला नाही.

एकच उदाहरण देतो. या आघाडीतील एक पक्ष आहे राष्‍ट्रीय समाज पक्ष. या पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. त्‍याच्‍या सत्‍कारासाठीच्‍या सभेची पोस्‍टर्स जागोजागी लागली. त्‍या पोस्‍टरवर पक्षाचे प्रमुख महादेव जानकर व विजयी उमेदवार यांच्‍याबरोबरीने खरे म्‍हणजे या आघाडीचे निमंत्रक असलेल्‍या रामदास आठवलेंचे नाव ठळकपणे असायला हवे. तथापि, प्रमुख पाहुणे म्‍हणून अबू आझमी (समाजवादी पक्ष) आणि उदघाटक म्‍हणून जयंत पाटील (शेकाप) या दोघांची नावे मोठ्या टाईपात छापलेली होती. आठवलेंचे नाव खालच्‍या बारी‍क टाईपातील यादीत कोठेतरी.

अबू आझमी दोन ठिकाणांहून निवडून आले. शिवाय धनिक. जयंत पाटलांचे 4 लोक निवडून आले. तेही धनिक. (रिडालोसच्‍या शिवाजी पार्कच्‍या सभेचा खर्च जयंत पाटलांनी केला होता. त्‍यामुळे ते त्‍या सभेचे स्‍वागताध्‍यक्ष होते.) सत्‍ता-संपत्‍तीचा हा सरळ हिशेबी व्‍यवहार !

रिपब्लिकन पक्षाला इतर घटकांनी निवडणुकीआधी जे महत्‍व दिले व आठवलेंना निमंत्रक केले त्‍यामागील प्रमुख (कदाचित एकमेव) कारण या पक्षामागे गृहीत धरलेला बौद्ध समाजाचा जनाधार. दलितांत बहुसंख्‍य व राज्‍याच्‍या लोकसंख्‍येत सुमारे 7 टक्‍के ही बौद्ध समाजाची मतांच्‍या राजकारणातली ताकद आहे. बाबासाहेब कसे महान होते, हे राजकारणी मंडळी भाषणात आवर्जून सांगत असतात, त्‍यामागे खरे कारण हेच आहे. महाराष्‍ट्रातल्‍या मराठी माणसाच्‍या हक्‍कांची मांडणी करताना राज ठाकरेंनाही बाबासाहेबांची साक्ष त्‍याचमुळे काढावी लागते. (महात्‍मा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज या महामानवांच्‍या महतीगायनामागेही हाच हिशेब असतो. बिचा-या महात्‍मा गांधींना ते भाग्‍य नाही. त्‍यांच्‍यामागे त्‍यांचा असा समाज नाही. ओबामा किंवा मंडेला अशा एक-दोघांनी त्‍यांना महान म्‍हटले की आपले लक्ष वेधते, एवढेच !)

शिवाजी पार्कच्‍या फारतर 35 हजाराच्‍या (ही संख्‍याही चांगलीच) सभेचे वर्णन आपल्‍या मुखपत्रात एक लाखाची सभा असे करणा-या डाव्‍यांचाही फार वेगळा हिशेब नव्‍हता. जर तो असता तर एकतर, रिडालोसची विशिष्‍ट कार्यक्रमावर आधारित चळवळीच्‍या क्रमात उभारणी करण्‍याचा खूप आधीपासून त्‍यांनी प्रयत्‍न केला असता किंवा निवडणुकांच्‍या एकजुटीसंबंधी काही तत्‍त्‍वांचा आग्रह त्‍यांनी जाणीवपूर्वक धरला असता. मुस्लिम धर्मांधांचा मेरुमणी असलेले अबू आझमी आणि भाजपसेनेसहित बिनदिक्‍कत युतीचा फॉर्म्‍युला वापरणारे शेकाप यांच्‍याबद्दल त्‍यांनी काहीतरी वेगळे म्‍हटले असते, किमान काही चर्चा घडवली असती. हे काहीही झाले नाही. तेरीभी चूप-मेरीभी चूप ! विधानसभेत मनसेच्‍या आमदारांनी अबू आझमींना बुकलले, हे अत्‍यंत गैरच झाले. पण अबू आझमींचे मनसेला उचकावण्‍याचे आधीपासूनचे पद्धतशीर प्रयत्‍न आणि हिंदीत शपथ घेऊन मर्दुमकी गाजवल्‍याबद्दल त्‍यांचा उत्‍तर प्रदेशमध्‍ये करण्‍यात आलेला सत्‍कार व त्‍यावेळी त्‍यांनी उत्‍तर भारतीयांना मुंबईत बिनधास्‍त येण्‍याचे केलेले आवाहन याबद्दल रिडालोसमधील डाव्‍यांनी, समाजवाद्यांनी, रिपब्लिकनांनी काही म्‍हटल्‍याचे ऐकिवात नाही. अबू आझमींनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याला किंमत दिली नसती, हे अलाहिदा ! पण सर्व समाजाच्‍या दृष्‍टीने आणि तत्‍त्‍वाच्‍या दृष्‍टीने आपली भूमिका तरी मांडायला हवी होती. निवडणुका झाल्‍या. व्‍हायचे ते झाले. आता गरज कुणाची कुणाला ? पुढच्‍या निवडणुका येतील तेव्‍हा बघू !

लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात हार पत्‍करावी लागलेली असतानाही आठवलेंना रिडालोसमध्‍ये किंमत होती, ती त्‍यांच्‍यामागे गृहीत धरलेल्‍या बौद्ध जनाधारामुळे. तो तसा नव्‍हता, हे या निवडणुकांत लक्षात आल्‍याने रिडालोसच्‍या अन्‍य घटकांनी आठवलेंना किंमत देणे सोडून दिले.

या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन उमेदवारांचा त्‍यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यांतही (म्‍हणजे बौद्ध मतदार मोठ्या संख्‍येने असलेले विभाग) धुव्‍वा उडालेला दिसतो. याचा अर्थ, ऐक्‍याच्‍या फार्साला नेहमी फसत आलेली आशावादी बौद्ध जनता यावेळच्‍या रिपब्लिकन ऐक्‍यावर मात्र भाळली नाही. तिने एकतर पारंपरिकरित्‍या कॉंग्रेसला आणि तिच्‍यातील तरुणांनी मनसेला कौल दिला. (बसपचे मायाजालही यावेळी फाटले होते). कार्यकर्ते पैश्‍यांनी विकत घेतले गेले आणि आम्‍ही असा खर्च करु शकत नाही, हे रिपब्लिकन नेत्‍यांचे आकांडतांडव वस्‍तुस्थितीला धरुन असले, तरी दांभिक होते. सत्‍ता-संपत्तिसाठी विकले जाण्‍याची परंपरा आधी नेत्‍यांनी सुरु केली. गुरुत्‍वाकर्षणाच्‍या नियमाने ती नंतर कार्यकर्त्‍यांच्‍या खालच्‍या वेगवेगळ्या पातळ्यांपर्यंत वाहत गेली. कोणत्‍याही पातळीवर लोकशाहीची अशी खरेदी-विक्री अर्थातच निषेधार्ह आहे. पण केवळ या खरेदी-विक्रीनेच मतदान होते, हे खरे नाही. आपापल्‍या विवेकाला स्‍मरुन, समजाला धरुन बहुसंख्‍य जनता मतदान करत असते. कार्यकर्त्‍यांनी जरी पैसे घेतले असले, तरी बहुसंख्‍य बौद्ध जनतेने आपल्‍या भूमिकेशी प्रामाणिक राहून मतदान केले आहे. आपल्‍याच कार्यकर्त्‍यांनी आपल्‍याला फसवल्‍याने घायाळ झालेल्‍या जुन्‍या पँथरांचा शहाजोगपणा आता जनतेला नकोसा झाला आहे.

एकेकाळी दलित चळवळीला सामाजिकतेबरोबरच वर्गीय परिमाण देऊन समग्र परिवर्तनाची मांडणी करणारे नामदेव ढसाळ शिवसेनेबरोबर काय म्‍हणून गेले ? नामांतर लढ्यातील लॉंग मार्चची पुण्‍याई ज्‍यांच्‍या नावावर जमा आहे, त्‍या प्रा. जोगेंद्र कवाडेंनी नितीन गडकरी आणि त्‍यांच्‍या भाजपला पाठिंबा काय म्‍हणून दिला होता ? लढाऊ व संघटक म्‍हणून ख्‍याती व सर्वाधिक लोकप्रियता असलेल्‍या रामदास आठवलेंनी कॉंग्रेस व पुढे राष्‍ट्रवादीशी जातीयवादी शक्‍ती सत्‍तेवर येऊ नयेत म्‍हणून सहकार्य केले. हा तर्क योग्‍यच होता. पण चळवळ सोडायचे काय कारण होते ? सत्‍तेत भागिदारी न करताही हे सहकार्य करता आले असते. त्‍याचा प्रचंड दबाव कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीवर राहिला असता. आठवलेंची नैतिक व पर्यायाने राजकीय ताकद खूप वाढली असती. सत्‍तेत सहभागी व्‍हायचे, ते आपल्‍या समाजासाठी, असे म्‍हणता म्‍हणता ढाण्‍या पँथर सत्‍ताधा-यांचे मांजर कधी झाला, हे त्‍यालाही कळले नाही. कळले तेव्‍हा या पँथरच्‍या आग ओकणा-या डोळ्यांच्‍या कचकड्या झाल्‍या होत्‍या. आता या डोळ्यांना कोण घाबरणार ? दिल्‍लीत मंत्रिपद दिले नाही तेव्‍हा, तसेच शिर्डीत पराभूत झाल्‍यावर आंदोलन करणा-या आठवलेंच्‍या कार्यकर्त्‍यांना जनतेने साथ दिली नाही. सत्‍तेच्‍या विविध स्‍तरांवर लाभार्थी झालेल्‍या पँथर कार्यकर्त्‍यांचे पोषाख, व्‍यक्तिमत्‍व, वागणे अन्‍य सत्‍ताधारी पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांहून कोणत्‍याही अर्थाने भिन्‍न दिसत नाही. सत्‍तेच्‍या दलालांच्‍या या बाजारात नव्‍या पिढीला जुना पँथर कसा होता, हे दाखवायचे झाले, तर म्‍युझियमध्‍ये ठेवायला त्‍याचा सांगाडाही शिल्‍लक नाही. एकतर त्‍यांच्‍या हाडांनाही मांद्य आलेले आहे किंवा ती अगदी भुसभुशीत झालेली आहेत.

रामदास आठवलेंची जमेची बाजू म्‍हणजे ते संकुचित नाहीत, आक्रस्‍ताळे नाहीत. व्‍यापक एकजुटीच्‍या बाजूचे आहेत, धर्मांधतेच्‍या निश्चित विरोधात आहेत. पण हा चांगुलपणा व्‍यवहारात शक्‍ती म्‍हणून आज रुपांतरित होत नाही. प्रकाश आंबेडकरांचे चळवळीतले पदार्पणच मुळी सम्‍यक समाज आंदोलन या व्‍यापक पायावर झाले. ते एकजातीय (म्‍हणजे केवळ बौद्धांपुरते) तेव्‍हाही नव्‍हते, आताही नाहीत. मात्र ते जातींच्‍या बेरजांवर विश्‍वास ठेवतात. शिवाय सत्‍तेच्‍या सारिपाटात कोणाशीही- भाजप-सेनेशीही एकजुटीचे प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष क्रम त्‍यांना मंजूर असतात. विदर्भात काही ठिकाणी त्‍यांनी स्‍वतःचा असा जनाधार तयार केला आहे. संघटना बांधली आहे. ते यावेळच्‍या ऐक्‍य प्रक्रियेपासून ठरवून दूर होते. त्‍यांनी स्‍वतःच्‍या ताकदीवर दोन आमदार यावेळी निवडून आणले आहेत. त्‍यामुळे स्‍वाभिमानाने सत्‍तेचे राजकारण आम्‍हीच करतो, असा दावा ते करु शकतात. पण त्‍यांच्‍या जुन्‍या हेकेखोर व अविश्‍वासार्ह व्‍यवहारांमुळे त्‍यांना आंबेडकरी जनतेची व्‍यापक मान्‍यता अजूनही नाही. गवईंचे राजकारण सत्‍तेची ऊब घेत जाण्‍याचे राहिले. त्‍यांची निष्‍ठा काही काळ त्‍यांच्‍या सुपुत्रांनी रिडालोसमध्‍ये जाऊन भंग केली. तथापि, चुकीची दुरुस्‍ती लगेच करुन ते मूळ वळचणीला परतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी छेडलेले देशव्‍यापी भूमिहिनांचे आंदोलन, महाराष्ट्राच्‍या सांस्‍कृतिक सारस्‍वताला हादरविणारे दलित साहित्‍य, सामाजिक-राजकीय जीवनाला थरारुन सोडणारी दलित पँथरची गर्जना, नामांतर-रिडल्‍सची आंदोलने अशा अनेक सत्‍कर्मांची नोंद आंबेडकरी चळवळीच्‍या इतिहा‍सात असली तरी आज वट्टात पराभूतता, दिशाहिनता हेच आहे. अर्थात, दिशाहिनता हे केवळ आंबेडकरी चळवळीचे वैशिष्‍ट्य नाही. वर उल्‍लेख केलेला रिडालोसमधील पुरोगामी शक्‍तींचा व्‍यवहार लघुदृष्‍टीचा व दिशाहिनच आहे. एकूण पुरोगामी चळवळीने कात टाकल्‍याशिवाय ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीलाही दिशा मिळणे कठीण आहे. परिवर्तनाच्‍या चळवळीतील हे घटक परिस्‍परपरिणामकारी, परस्‍परावलंबी आहेत. उद्याचा महाराष्‍ट्र घडविण्‍यासाठी या सर्वांनाच स्‍वतःत मूलगामी बदल घडवावे लागतील.

तूर्त, आपण आंबेडकरी चळवळ या त्‍यातील एका घटकाचा विचार करत आहोत.

आंबेडकरी समुदायाची विशेष दखल घेण्‍याचे कारण म्‍हणजे, तो अख्‍खा समाज म्‍हणून पुरोगामी चळवळीत उतरतो. बुद्ध, कबीर, फुले, शाहू या सर्व पुरोगामी परंपरांचा तो जात्‍याच स्‍वतःला पाईक मानतो. कारण त्‍याचे आराध्‍य असलेल्‍या बाबासाहेबांनी त्‍याला बाबां वाक्‍यं प्रमाणम् पासून, आपला भक्‍त होण्‍यापासून दूर ठेवण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न केला व अन्‍य पुरोगामी परंपरांची गुंफण आपल्‍या मांडणीत करुन त्‍याला ती सोपवली. म्‍हणूनच जातिव्‍यवस्‍थेविरोधात, स्‍त्री-पुरुष विषमतेविरोधात तो सहजच उभा राहतो. मंडल आयोगाच्‍या अंमलबजावणीचा-ओबीसींच्‍या आरक्षणाचा लढा महाराष्‍ट्रात त्‍याने आपला म्‍हणून लढवला. ओबीसी समाज अजून स्‍वतःच्‍याच या लढ्यात पुरता यायचा आहे. बौद्ध समाज पूर्वी अखंड; आता बहुसंख्‍य कष्‍टकरी आहे. आता त्‍यात एक लक्षणीय मध्‍यमवर्ग तयार झाला आहे. तो वाढत असला तरी अजूनही अल्‍प आहे. बहुसंख्‍य समाज गरीब, कष्‍टकरीच आहे. 6 डिसेंबरला चैत्‍यभूमीवर व धम्‍मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर फिरताना हा फरक ठळकपणे जाणवतो.

बौद्धांमधला शिक्षित मध्‍यमवर्ग ही खरे तर ताकद आहे. पण तिच्‍यात अनेक विकृती तयार झाल्‍या आहेत. एकूण मध्‍यमवर्गात आलेली आत्‍ममश्‍गुलता बौद्ध मध्‍यवर्गातही गतीने येऊ लागली आहे. शासकीय नोक-या, आरक्षणे, बढत्‍या, महामंडळांची कर्जे, गृहसंस्‍थांतल्‍या सवलती यांत आपल्‍याला व आपल्‍यानंतर आपल्‍या मुलाबाळांनाच लाभ कसा मिळेल, याबाबत तो विलक्षण दक्ष असतो. आपली जात्‍याच असलेली राजकीय-सामाजिक तल्‍लखता तो इथे पुरेपूर वापरतो. त्‍यासाठी वशिला, लाच, सत्‍ताधा-यांची खुशामत इ. रुढ मार्गांतला कोणताही मार्ग त्‍याला वर्ज्‍य नसतो. पण आपल्‍याच समाजातल्‍या गरीब स्‍तरातील बौद्धांचे कष्‍टकरी, गरीब म्‍हणून असलेले प्रश्‍न सोडवण्‍याबाबत, त्‍यांवर चळवळ संघटित करण्‍याबाबत तो अलिप्‍त राहतो. आपल्‍या नेत्‍यांचे राजकारण दुरुस्‍त करण्‍याचा आग्रह धरण्‍याऐवजी संधी मिळताच तो स्‍वतःच त्‍याचा वाटेकरी होतो. आपल्‍या व्‍यवहाराचे ढोंगी समर्थन करतो. आंबेडकरी चळवळीवरची ही साय दिवसेंदिवस दाट होत चालली आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या दिशाहिनतेत त्‍यामुळे भर पडते आहे.

बौद्ध जनतेला नेत्‍यांचे हे वागणे नकोसे झाले आहे, तिला त्‍याबद्दल पूर्वी खेद होता. आता हे सुधारणारच नाहीत, असे म्‍हणून तिने आपल्‍याला सुचेल ती वाट धरली आहे. संधिसाधू नेत्‍यांविषयी भ्रमनिरास होणे, हे चांगले. कुंकवाचा धनी म्‍हणून नाईलाजाने एकएक नेता धरुन ठेवण्‍याच्‍या मानसिकतेतून ती मुक्‍त होत असेल तर ते योग्‍यच. पण आता चळवळीचे दिवस संपले, आता बाबासाहेब परत येणार नाहीत, आणि तसा कोणी होणारही नाही. आपल्‍याला इतर वापरतात, आता आपणही त्‍यांना का वापरु नये ?... अशा मनो‍वस्‍थेत बौद्ध समाज जात आहे. आपल्‍याला आता पहले खुद का देख पद्धतीने जायला लागणार. तोच आजचा युगधर्म आहे. अशी ठाम समजूत सामान्‍य बौद्ध जनतेची होऊ लागली आहे. भोवतालचे राजकारणी, आपले नेते, आपल्‍यातला मध्‍यमवर्ग यांबद्दल निराभास होता होता तो आंबेडकरी व एकूण परिवर्तनाच्‍या चळवळीबाबतच निराभास होतो आहे, ही सर्वात वाईट व यातनादायी बाब आहे.

ज्‍यांना हे कळते, असे अनेक कार्यकर्ते आजही आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी चळवळीत आहेत. आंबेडकरी समाजाने आपली मूळ उमेद पुन्‍हा जागवावी, खरेखुरे आंबेडकरी कार्यकर्त्‍याचे नवे तेजोमयी व्‍यक्तित्‍व घडवावे, पहिल्‍यापेक्षा अधिक व्‍यापक जाणीव घेऊन क्रियाशील व्‍हावे, यासाठी या जाणत्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍न करावयास हवेत. परिस्थितीच्‍या रेट्याची वाट न बघता एकएका कार्यकर्त्‍याशी संवाद केला पाहिजे. काही किमान सहमतीच्‍या मुद्द्यांवर हालचाली सुरु केल्‍या पाहिजेत. धुक्‍यात नुसतेच गप्‍प उभे राहण्‍यापेक्षा त्‍यातल्‍या त्‍यात विरळ थरातून हिंमतीने वाट शोधायला लागले पाहिजे. या प्रयत्‍नांतूनच सूर्य उगवणार आहे. धुके सरणार आहे. वाट स्‍पष्‍ट होणार आहे. दिशा मोकळ्या होणार आहेत.

रिपब्लिकन पक्ष नाम के वास्‍ते का होईना आज एकवटला आहे. त्‍याला योग्‍य दिशा देण्‍याचा प्रयत्‍न व्‍हायला हवा. ही दिशा कोणती हे फार शोधण्‍याची गरजच नाही. आता तरी बाबासाहेबांनी त्‍यांच्‍या खुल्‍या पत्रात मांडलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्‍पना पुरेशी आहे. आधी तिथवर पोहोचणे आवश्‍यक आहे. मग त्‍याचा विकास करता येईल.

काय आहे ही संकल्‍पना ?

लोकशाही रचनेत लोकशाहीच्‍या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे (खरा रिडालोस), ही तळमळ त्‍यात आहे. त्‍यात कोठेही एकजातीयता, विशिष्‍टता नाही, तर समष्‍टीच्‍या समग्र कल्‍याणाचा घोष त्‍यात आहे. केवळ बौद्धांचा पक्ष असे जे संकुचित स्‍वरुप आजच्‍या रिपब्लिकन पक्षाचे आहे, त्‍याचा मागमूसही बाबासाहेबांच्‍या मूळ संकल्‍पनेत नाही, किंबहुना त्‍यास पूर्ण विरोधी अशीच बाबासाहेबांची मांडणी आहे. या पक्षाच्‍या संकल्‍पनेसंबंधात त्‍यांनी एस.एम. जोशी, लोहिया यांच्‍याशी बोलणीही सुरु केली होती. तथापि, त्‍याच काळात त्‍यांचे महापरिनिर्वाण झाल्‍याने ही बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत.

या मांडणीबाबत आणखी काही नोंदवत राहणे, ही विनाकारण पुनरुक्‍ती ठरेल. बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना स्‍पष्‍ट करणारे त्‍यांचे खुले पत्र (ज्‍याचा सगळे ऐक्‍यवादी रिपब्लिकन पुढारी उल्‍लेख करत असतात व त्‍यावर आधारित आमचे ऐक्‍य किंवा पक्ष असल्‍याचा दावा करत असतात व नेमके त्‍याच्‍या विरोधात व्‍यवहार करत असतात) जिज्ञासूंनी मुळातून वाचावे. महाराष्‍ट्र शासनाने प्रकाशित केलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे, खंड 20 मध्‍ये ते उपलब्‍ध आहे.

उद्याच्‍या महाराष्‍ट्रात नव्‍या तेजोमयी व्‍यक्तित्‍वाचा आंबेडकरी कार्यकर्ता घडायचा असेल, तर आजच्‍या आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी कार्यकर्त्‍यांनी काही समज व व्‍यवहार जाणतेपणाने अमलात आणायला हवेत. उदाहरणादाखल काही बाबी खाली देत आहे.

आजही दलित अत्‍याचारांच्‍या घटना महाराष्‍ट्रात घडत असतात. खैरलांजीच्‍या निर्घृण हत्‍याकांडाने तर महाराष्‍ट्रातील आंबेडकरी व अन्‍य तमाम पुरोगामी जनतेच्‍या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. दलित पँथरच्‍या काळात अशा घटनांबाबत तात्‍काळ प्रतिक्रिया उमटायच्‍या. खैरलांजी हत्‍याकांडानंतर जवळपास महिन्‍याने प्रति‍क्रिया उमटल्‍या. पँथरच्‍या काळाच्‍या तुलनेने आजच्‍या आंबेडकरी समाजात विलक्षण बदल झालेत, तरीही असे का व्‍हावे ? आज बौद्ध समाजात 4 वर्तमानपत्रे आहेत. सुमारे 74 टक्‍के साक्षरता (ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या खालोखाल) आहे. गतीने वाढणारा उच्‍चशिक्षित वर्ग आहे. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांपासून संसदेपर्यंत पहिल्‍यापेक्षा अधिक राजकीय सत्‍तेत सहभाग आहे....तरीही असे का व्‍हावे ? भौतिक विकासाच्‍या क्रमात संवेदनांचा विकास अडखळत तर नाही ?

अशा अत्‍याचारांत न्‍याय मिळणे म्‍हणजे नक्‍की काय ?

एक म्‍हणजे, गुन्‍हेगारांना कठोरात कठोर शासन होणे. हा एक टप्‍पा आहे. त्‍यासाठी सर्वत-हेचे प्रयत्‍न करायला हवेत. मात्र दुसरा टप्‍पा अशारीतीची एकही घटना महाराष्‍ट्रात यापुढे घडणार नाही, असे वातावरण निर्माण करणे हा आहे. पहिला टप्‍पा झाला की आपले काम झाले, असे होऊ नये. दुसरे काम हे लांब पल्‍ल्‍याचे आहे. ते चिकाटीने व सातत्‍याने करावे लागणार आहे.

खैरलांजी हत्‍याकांडातील आरोपींपैकी काहींना फाशी तर काहींना जन्‍मठेप अशी शिक्षा खालच्‍या न्‍यायालयाने दिली. आता वरच्‍या न्‍यायालयात पुढची कार्यवाही चालेल. तिथेही या शिक्षा कायम राहाव्‍यात, यासाठी सजग प्रयत्‍न करावेच लागतील. पण आज खैरलांजीत एकही बौद्ध कुटुंब शिल्‍लक नाही, त्‍याचे काय करायचे ? या हत्‍याकांडानंतर तेथील उरलेली 3 बौद्ध कुटुंबे गाव सोडून निघून गेली. ती परत कशी येणार ?

आंबेडकरी चळवळीत काहींच्‍याकडून दलितांच्‍या स्‍वतंत्र वसाहती करा ही खुद्द बाबासाहेबांनी रद्दबातल केलेली मागणी परत पुढे आली. काहींनी दलितांना बंदुका द्या अशीही मागणी केली. काही विद्यापीठाच्‍या आवारात सुरक्षित राहणा-या विद्वानांनी आता होऊन जाऊ द्या यादवी अशा बेजबाबदार चिथावण्‍याही दिल्‍या.

असे अत्‍याचार पुढे घडता कामा नये, यासाठीची खरोखरीची उपाययोजना दोन पातळ्यांवर करावी लागेल. एक, बौद्धांची-दलितांची संघटनात्‍मक कमजोरी घालविणे आणि दोन, अजूनही सवर्णांच्‍या मनात असलेली तीव्र जातीयता नष्‍ट करणे.

आंबेडकरी चळवळीची संघटनात्‍मक मजबुती म्‍हणजे निवडणुकांच्‍या तोंडावर रिपब्लिकन ऐक्‍याचे फार्स नव्‍हे. रिपब्लिकन पक्ष एकवटण्‍याचे प्रयत्‍न तळातून, कार्यक्रमाधारित व लोकशाही मार्गाने व्‍हायला हवेत. ज्‍यांना रिपब्लिकन पक्षात यायचे नसेल, त्‍यांना स्‍वतंत्र राहण्‍याची मुभा ठेवून दोस्‍ती केली पाहिजे. ऐक्‍य हा भावनिक प्रकार होता कामा नये. नेतृत्‍वाच्‍या वैयक्तिक आकांक्षा व राजकीय भूमिका यांमुळे आजवरचे ऐक्‍याचे प्रयोग फसत आले. याच गोष्‍टी ऐक्‍याच्‍या प्रक्रियेपासून दूर ठेवावयास हव्‍यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्‍यांचे विचार व त्‍यांनी दिलेला बौद्ध धम्‍म या सर्व गटातटांत मान्‍यता असलेल्‍या सामायिक व अत्‍यंत आदरणीय बाबी आहेत. प्रत्‍येक बौद्ध वस्‍तीत बुद्धविहार असतेच. या बुद्धविहारात त्‍या वस्‍तीतले सर्व गटातटांना मानणारे सामान्‍य लोक एकत्र येऊ शकतील. बाबासाहेब, त्‍यांचे विचार व बुद्ध धम्‍म या सामायिक बाबींबाबत अधिक समजून घेणे, आपले जाणतेपण वाढविणे व समाज म्‍हणून एक राहणे, हे होऊ शकते. अट एकच, पक्षीय किंवा गटाच्‍या राजकीय भूमिकांची या पातळीवर चर्चा न करणे. प्रत्‍येकाला राजकीय भूमिका घ्‍यायला मोकळीक ठेवणे. समान किमान भूमिकेवर आधारलेल्‍या वस्‍त्‍यांवस्‍त्‍यांमधील अशा सामान्‍यांच्‍या ऐक्‍यातूनच राज्‍यपातळीवरील टिकाऊ ऐक्‍य उदयास येऊ शकेल. अत्‍याचार करु धजणा-यांना या ऐक्‍याचा निश्चितच धाक राहील व राजसत्‍तेलाही या ऐक्‍याची पदोपदी दखल घ्‍यावी लागेल.

संतांच्‍या, थोर समाजसुधारकांच्‍या या महाराष्‍ट्रात अजूनही जातीयता तीव्र आहे. दृश्‍य अस्‍पृश्‍यता भलेही नसेल; पण जातभावना तीव्र आहे. ती वितळण्‍याची गती फारच हळू आहे. ती गती वाढवावी लागेल. त्‍यासाठी आर्थिक-भौतिक प्रश्‍नांवर लढे लढविणा-या संघटनांनी, नेत्‍यांनी जाणीवपूर्वक आपल्‍या संबंधात येणा-या व कष्‍टकरी म्‍हणून एक नाते असणा-या दलित-सवर्णांच्‍या सामाजिक मनोमीलनाचे कसोशीने प्रयत्‍न करायला हवेत. (खैरलांजीत मारणारे व मरणारे दोघेही कष्‍टकरी व सामाजिक श्रेणीत निम्‍नस्‍तरावरचेच होते.)

महात्‍मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्‍यात मतभेद होते. तथापि, अस्‍पृश्‍यता हा कलंक आहे, ही भावना सवर्ण हिंदूंमध्‍ये मुरविण्‍यात महात्‍मा गांधींचा मोठा वाटा होता. या भावनेची बाबासाहेबांच्‍या चळवळीला अप्रत्‍यक्ष मदतच झाली. महाराष्‍ट्रातील अनेक सवर्णांचे आंबेडकरी चळवळीविषयी अनेक समज-गैरसमज असू शकतात. पण खैरलांजीसारख्‍या अमानुष हत्‍याकांडांना, अत्‍याचारांना नक्‍कीच समर्थन असणार नाही. अशावेळी आंबेडकरी तसेच अन्‍य समाजातल्‍या जाणत्‍यांनी महाराष्‍ट्राच्‍या विवेकशक्‍तीला साद घालण्‍याची गरज आहे. सवर्णांचा व्‍यवहार, हिदू धर्मातील जातीय उतरंड-विषमता यांवर सम्‍यक टीका जरुर हवी; मात्र सवंग प्रसिद्धीसाठी, टाळ्या घेण्‍यासाठी शिव्‍या घालणे आंबेडकरी कार्यकर्त्‍यांनी बंद करावयास हवे. यामुळे मने अधिक फाटतात.

बौद्ध संघटित झाले. त्‍यांना इतर दलितांनी साथ दिली; तरीही ते अल्‍पसंख्‍य आहेत. बहुसंख्‍य समाजावर संख्‍येच्‍या जोरावर नियंत्रण ठेवणे शक्‍य नाही. केवळ आपल्‍या मतांच्‍या जोरावर निर्णायक ठरणे लोकशाही प्रणालीत शक्‍य नाही. कष्‍टकरी म्‍हणून असलेल्‍या हितसंबंधांच्‍या तसेच मानवतेच्‍या कार्यक्रमावर आधारित समाजातील अन्‍य घटकांशी संबंध जोडून बौद्ध समाजास बहुसंख्‍य व्‍हावेच लागेल.

यासाठीच आंदोलनाचे मार्ग नव्‍याने ठरवावे लागतील. राजकारणातील तत्‍त्‍वशून्‍य जातींच्‍या बेरजांच्‍या आहारी जाऊन बहुसंख्‍य होता येणार नाही. प्रथम तत्‍त्‍व, भूमिका निश्चित करावी लागेल. एकाही ब्राम्‍हणाला सोबत घेऊ नका, तरच आम्‍ही चवदार तळ्याच्‍या सत्‍याग्रहात सामील होऊ, ही चवदार तळ्याच्‍या सत्‍याग्रहावेळी ब्राम्‍हणेतर चळवळीतील नेत्‍यांची अट बाबासाहेबांनी अमान्‍य केली होती. मी ब्राम्‍हणांच्‍या नव्‍हे; ब्राम्‍हण्‍याच्‍या विरोधात आहे. हे ब्राम्‍हण्‍य असलेल्‍या ब्राम्‍हणांच्‍या, ब्राम्‍हणेतरांच्‍या तसेच बहिष्‍कृतांच्‍याही (दलितांच्‍या) मी विरोधात आहे, अशी बाबासाहेबांची तत्‍त्‍वकठोर भूमिका होती. तात्‍पुरत्‍या व्‍यावहारिक फायद्यासाठी तत्‍त्‍वहिन बेरजेला त्‍यांनी महत्‍व दिले नाही. आजही तत्‍त्‍वाच्‍या, भूमिकेच्‍या व कार्यक्रमाच्‍या आधारेच सोबत, युती किंवा आघाडी झाली पाहिजे.

प्रक्षोभित होऊन तोडफोड करणे, जाळपोळ करणे हे खरे आंदोलन नव्‍हे. शासनव्‍यवस्‍थाच बदलायची असेल, क्रांती करायची असेल, तर कायदा व सुव्‍यवस्‍था हातात घ्‍यायची अशी आंदोलने एकवेळ समजून घेता येतील. पण तीही तयारीने, मजबूत संघटनाच्‍या व व्‍यापक पाठिंब्‍याच्‍या सहाय्याने करावयाची असतात. दलित चळवळीला भडकाऊ भाषणांची पँथरच्‍या काळापासून प्रथा पडली आहे. पँथरच्‍या काळातील पोटतिडिक जाऊन आता नाटकीपणा आला आहे. सवंगपणे समाजाला भडकावले, कंठाळी भाषण केले तरच आपले नेतृत्‍व शाबित होऊ शकते, असे अनेक नेत्‍यांना-कार्यकर्त्‍यांना वाटते. यामुळे समाजाची फसगत होते. अशा भडकाऊ भाषणांनंतर होणा-या आंदोलनांत सामान्‍य दलित माणूस भरडला जातो. नेते अनेकदा नामानिराळे राहतात. केसेसमधून सोडवायला कोणी येत नाही. औषधोपचाराच्‍या मदतीलाही कोणी हात देत नाही. मृत्‍युमुखी पडलेल्‍यांच्‍या कुटुंबांना लांबवर साथ देण्‍याची उसंत कोणाला नसते. अशा हिंसक आंदोलनांनी मनातील चीड, संताप यांना वाट मिळाली असे वाटते. पण त्‍याने साधत काहीच नाही. उलट आपल्‍याच पायावर धोंडा मारुन घेणे होते. दलित वस्‍त्‍यांतील अनेक उद्रेकांच्‍या-अगदी खैरलांजीनंतरच्‍याही-अनुभवांतून आंदोलनांच्‍या मार्गांच्‍या पुनर्विचाराचाच मुद्दा अधोरेखित होतो.

बाबासाहेबांनी अशी आंदोलने केली नाहीत व अशी आगखाऊ भाषणेही केली नाहीत. मुद्द्याची अभ्‍यासपूर्ण मांडणी, नियोजनपूर्वक आंदोलन व केव्‍हा माघार घ्‍यायची याचा योग्‍य निर्णय ही त्‍यांच्‍या आंदोलनाची वैशिष्‍ट्ये होती. इच्‍छाशक्‍तीचे ताकदीने प्रकटीकरण होणे व जगाचे लक्ष वेधणे हेच जर आंदोलनाचे उद्दिष्‍ट असेल, तर बुद्धाच्‍या शांततेच्‍या मार्गाने होणारे आंदोलन अधिक परिणामकारक होते. महात्‍मा गांधींच्‍या पुढाकाराखालच्‍या आंदोलनांनी हेच सिद्ध केले. हिंसक आंदोलनात इतर समाजाची सहानुभूती गमावली जाते. उलट शांततेने, कळकळीने आवाहन करण्‍याच्‍या आंदोलनांनी इतरांचे लक्ष वेधते, आपले म्‍हणणे समजून घेण्‍याची मानसिकता तयार होते. आंदोलनांची रीत बदलण्‍याचे वळण लागणे कठीण आहे. पण अशक्‍य नाही. शिवाय हे मूळचे बाबासाहेबांचे, बुद्धाच्‍या शिकवणुकीचे वळण आहे. या वळणानेच पुढचे खैरलांजीसारखे अत्‍याचार टळू शकतात.

उद्याच्‍या महाराष्‍ट्रातील शाश्‍वत समतेचा मुक्‍काम आंबेडकरी चळवळीला त्‍याच वाटेवर सापडू शकतो.

- सुरेश सावंत