Monday, May 2, 2022

सोलापुरातील बाबासाहेबांची चळवळ


गूगलच्या नकाशात एका मोठ्या भूभागातील छोटे ठिकाण आकार वाढवून (zoom in) आपण पाहतो तेव्हा त्यातील अनेक बारीक तपशील आपल्यासमोर येतात. थोरांच्या चरित्राचेही तसेच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र चरित्र आपण वाचलेले असते. त्यात चळवळीच्या निमित्ताने भेटी दिलेल्या, काही कार्यक्रम घेतलेल्या शहरांचे, गावांचे उल्लेख येतात. तथापि, त्यांचे विस्तृत वा सखोल विवेचन, वर्णन तिथे नसते. ते शक्यही नसते. मात्र असे तपशील कळले तर बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या भूमिकांविषयी, आंदोलनाविषयी, संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या ताकदीविषयी अधिक जाणता येऊ शकते. ही उणीव भरुन काढण्याचे प्रयत्न अभ्यासकांनी, त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी करावयाचे असतात. पण तसे होतेच असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या महाराष्ट्रातील विविध भागांतील संचाराविषयी तेथील मंडळींनी तपशील गोळा करुन असे काही लिहिल्यास बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, तेथील जनतेच्या प्रेरणा व स्पंदनांविषयी बऱ्याच बाबी उजेडात येऊ शकतील, अधिक ठळक होतील. हे घडू शकते, अगदी प्रभावीपणे घडू शकते, याचा नमुना म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचे ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकाखाली अधिक स्पष्टतेसाठी ते नोंदवतात – ‘रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले सोलापूर.’ सोलापुरातील बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारे हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे. वयाच्या ऐंशिव्या वर्षी कोविडच्या काळात दत्ता गायकवाड हा प्रकल्प हाती घेतात व विविध संदर्भ शोधत, अभ्यासत तडफेने पूर्ण करतात, हे विशेषच म्हणावे लागेल आणि त्यासाठी त्यांना धन्यवादच द्यावे लागतील.

पुस्तकाच्या परिचयादाखल काही बाबींची नोंद इथे करत आहे.

१९२४ ते १९५४ या कालखंडातील सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतील वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातील विविध भागांतील या नोंदी आहेत. पहिल्या प्रकरणात बार्शीच्या भेटींविषयी लिहिताना १९२४, १९३७ व १९४१ अशा तीन भेटी बाबासाहेबांनी बार्शीला दिल्याचे ते सांगतात. २४ साली बाबासाहेब ३३ वर्षांचे युवक होते. मात्र त्याही वयात दलित जनतेने त्यांना आपल्या उद्धारकर्त्याचे स्थान दिले होते. ‘बाबासाहेब कोण हाय – दलितांचा राजा हाय’ ही घोषणा प्रत्येक भेटीवेळी लोक देताना दिसतात. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठीची लोकांची आतुरता, त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून लोकांची साधनांची कमतरता असलेल्या त्या काळातली धडपड यांचे चित्रदर्शी वर्णन या पुस्तकात आहे. बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर त्या गावातील लोक आपल्या अन्य गावांतील सोयऱ्याधायऱ्यांना आमंत्रित करत असत. बाबासाहेब कितीही विरोध करत असले, तरी लोक पाया पडायला धडपडत असत. समता सैनिक दलाचा बंदोबस्त असतानाही एक बाई एका स्वयंसेवकाच्या पायातून शिरली व बाबासाहेबांच्या चरणांवर पडली. मरिआईच्या कट्ट्यावर बाबासाहेबांनी सभा घेतल्याची कोंडाबाई कांबळे या वयोवृद्ध बाईंची आठवण लेखक नोंदवतात. एके ठिकाणी बाबासाहेबांना उतरण्यासाठी योग्य जागा नव्हती म्हणून शाळेतला एक वर्ग स्वच्छ केला जातो. तिथे गादी, पलंग घातला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी दलित समाजातील तरुण पहिलवान चहुबाजूंनी रात्रभर पहारा देतात. त्या काळात लोकांच्या बाबासाहेबांच्या प्रति काय भावना आहेत, याचा अंदाज आपल्याला असतो. पण त्याचे हे तपशील वाचल्यावर आपणास त्याची अचंबित करणारी प्रचिती येते.

मोठ्या चरित्रात छोट्या घटना व त्यातील मानवी संबंध फारसे व्यक्त होत नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई गरोदर असताना त्यांची प्रकृती खालावली होती. हवापालटासाठी मुंबईच्या बाहेर नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी सोलापुरातील बावी येथे रमाई सहकुटुंब राहिल्या होत्या. सत्यशोधकी विचारांच्या वालचंद कोठारींनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. त्या वसतिगृहात रमाई उतरल्या होत्या. निंगप्पा ऐदाळे हे आधी शाहू महाराजांकडे असलेले बाबासाहेबांचे सहकारी वसतिगृहाची व्यवस्था पाहत असत. त्यांची पुतणी गंगुबाई या रमाईंच्या सहवासात होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात रमाईंविषयीच्या या काळातील आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील एक अवतरण लेखकांनी या पुस्तकात दिले आहे. इतिहास लेखनाचे हे स्रोत गायकवाडांनी उजेडात आणले आहेत. अन्यथा ते अंधारातच गुडूप झाले असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक आणि निजामाचे हस्तक होते, हे दोन आरोप आजही हितसंबंधी मंडळी करत असतात. हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत, हे बाबासाहेबांच्या भूमिकांचे वस्तुनिष्ठ परिशीलन करणाऱ्यांना लक्षात येते. या पुस्तकात २२-२३ फेब्रुवारी १९४१ च्या सोलापुरातील कसबे तडवळे येथे झालेल्या महार मांग परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील काही उतारे आहेत. त्यातील एक खाली देत आहे. त्यावरुन या आरोपांचा फोलपणा आपल्याला सहज ध्यानात येतो. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात -

“निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे. ही गोष्ट अस्पृश्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हिंदी संघराज्यात सामील होण्याला निजामाचा विरोध आहे. ...त्याबद्दल त्याची गय करता कामा नये. तसेच निजाम हा अस्पृश्यांचा आणि अस्पृश्यांच्या मातृभूमतीचा शत्रू आहे. म्हणून हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यप्रिय दलितांनी हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे.”

अशा परिषदांमध्ये व्यापक धोरणासंबंधी तसेच स्थानिक प्रश्नासंबंधीचे ठराव होत असत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणेबरोबरच शिक्षण, संघटन व राजकारण यांची अपरिहार्यता समजून सांगत. त्या त्या वेळच्या ऐरणीवर आलेल्या (उदा. महार वतन खालसा करण्याची गरज) मुद्द्यांविषयी सविस्तरपणे समजावत असत. वैज्ञानिक दृष्टी असलेला नवा माणूस घडविण्यासाठी जुनाट अंधरुढींवर ते प्रहार व त्याचे प्रात्यक्षिक करत असत. या परिषदांच्या वेळी गोसावी, पोतराज, माळकरी, जटाधारी यांनी आपापल्या अंगावरच्या माळा, आभरान, भगव्या कफन्या स्टेजजवळच्या खड्ड्यात टाकून त्यावर रॉकेल ओतून त्यांचे दहन केल्याचे प्रसंग लेखकाने चितारले आहेत. देवदासींनी आपल्या जटा कापून त्यांना जाळल्याचेही प्रसंग यात आहेत. या परिषदांवेळी प्रबोधनात्मक जलसे होत. या जलशांत काही ठिकाणी स्टेजवर महिला सहभागी झाल्याचीही नोंद या पुस्तकात आहे. पाण्यासाठी अस्पृश्यांची स्वतंत्र विहीर बांधली जाते. तिला ‘आंबेडकर बावडी’ नाव पडते. या विहिरीचे उद्घाटन बाबासाहेब करतात. त्यांच्या हातून पाणी पिण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. हाही प्रसंग लेखकाने नोंदवला आहे. बाबासाहेबांच्या विचार-प्रेरणेची ऊर्जा माणसाचे माणूसपण कसे जागे करते त्याची कैक उदाहरणे सोलापुरातील या हकिगतींत आढळतात.

येवल्याला १९३५ साली धर्मांतराची घोषणा होण्यापूर्वी त्याबाबतचे सूतोवाच कितीतरी आधी सोलापुरात बाबासाहेब करतात. सोलापूरची मिल मालकाने बंद केल्याने खाजगी संपत्तीच्या अधिकारासंबंधीची पहिली घटना दुरुस्ती होते. गाडगे महाराज आजारी असताना भेटायला आलेल्या बाबासाहेबांना आपली पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा शैक्षणिक कामासाठी दान करतात. अशा अनेक घटनांची नोंद या पुस्तकात आहे.

बाबासाहेबांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, चळवळीसाठी विविध मार्गांनी सहकार्य करणारे दलित व सवर्ण सहकारी हे आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य राहिले आहे. सोलापुरातील अशा सहकाऱ्यांचे पुस्तकात प्रसंगाप्रसंगाने उल्लेख, वर्णने येतातच. त्याचबरोबर लेखकांनी शेवटी त्यावर खास प्रकरणच लिहिले आहे. अशा सहकाऱ्यांची सविस्तर माहिती त्यात आहे. मोठ्या चरित्रात ठळक नावे येतात. बाकी असंख्य कार्यकर्ते विस्मृतीत जातात. स्थानिक चळवळीच्या इतिहासाची नोंद करणाऱ्या अशा पुस्तकांतून त्यांचा यथोचित परिचय देणे ही त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेबांचे जवळचे सहकारी जिवप्पा ऐदाळे अखेरपर्यंत निष्कांचन होते, हे इथे आपल्याला कळते. सोलापुरातील बाबासाहेबांच्या समकालीनांमध्ये वालचंद कोठारी, निंपप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, उद्धव शिवशरण, जनार्दन सोनकांबळे, जी. आर. देशपांडे, दादासाहेब व भालचंद्र मुळे, एन. टी. बनसोडे, जी. डी. जाधव, हणमंतू सायन्ना यांची विस्तृत नोंद लेखकांनी केली आहे. जी. डी. जाधवांची एक हकिगत इथे कळते. महाडच्या संग्रामातील एक प्रमुख नेते अनंतराव चित्रे यांच्या घरी जेवणाच्या पंगतीत त्यांची कन्या जाधवांच्या नजरेस पडते. ते तिला मागणी घालतात. सगळ्यांना आनंद होतो. त्यांचा विवाह चळवळीतून झालेला आंतरजातीय विवाह होता.

पुस्तकाच्या परिचयाच्या अखेरीस येताना बाबासाहेबांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सोलापुरातातील भेटींतही कसे दिसते, हे लक्षात घेणे उद्बोधक ठरेल. बाबासाहेब कमालीचे लोकशाहीवादी, विचार स्वातंत्र्यवादी होते. मतभिन्नता असलेल्यांचा दुस्वास नव्हे, तर त्यांचा आदर करणे, मात्र त्याचवेळी आपली मते पातळ न करता रोखठोक मांडणे हे बाबासाहेबांचे खास वैशिष्ट्य होते. बाबासाहेबांच्या या गुणामुळेच तर त्यांना त्यांच्याशी अनेक बाबतींत असहमती असणारेही भेटीचे निमंत्रण आग्रहाने देत असत. सोलापुरील अशा तीन भेटी लेखकांनी नोंदवल्या आहेत.

त्यातील एक, बार्शीच्या महात्मा गांधी छात्रालयाचे अ. दा. सहस्रबुद्धे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या बोर्डिंगला बाबासाहेबांची भेट. ही आठवण सहस्रबुद्धे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात – “बाबासाहेबांनी प्रथम मला माझे नाव विचारले. मी सहस्रबुद्धे असे सांगितले.” त्यावर बाबासाहेब काय म्हणाले त्याची नोंद ते करतात – “म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात तर! ब्राम्हण लोकांत माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत. माझ्या चळवळीत अनेक ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आहेत. ब्राम्हण्यवृत्ती असलेल्या सनातनी ब्राम्हणांबद्दल मात्र मला मनस्वी चीड आहे.”

बाबासाहेब सहस्रबुद्धेंना विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी विचारतात. त्यावर सहस्रबुद्धे सांगतात – “बोर्डिंगमधील महार विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचा अत्यंत प्रभाव आहे. हिंदू धर्माचे सण, उपवास, प्रार्थना या बाबी त्यांना अजिबात पसंत नाहीत. आषाढी, कार्तिकी या एकादशीच्या दिवशी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भाजीभाकरीचे जेवण आम्ही देतो व मांग, चांभार विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य देतो. आश्रमीय प्रार्थना महार विद्यार्थ्यांना पसंत नसते म्हणून सर्वांच्या संमतीने वंदे मातरम ही प्रार्थना बोर्डिंगमध्ये होते. सूतकताई मुलांच्या इच्छेवर ठेवली आहे. विद्यार्थ्यांवर बळजबरीने कोणतीही गोष्ट लादली जात नाही. अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मी जास्त काळजी घेतो. विद्यार्थी शिकावेत, शहाणे व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी योग्य वाटेल तो सामाजिक, राजकीय विचार स्वीकारावा हे येथील बोर्डिंगचे वैशिष्ट्य आहे.”

सध्याचे हिजाब प्रकरण आठवून पहा. सर्वसमावेशी सेक्युलर धोरण काय असावे याची १९३४ सालची ही नोंद आहे. ती मुद्दाम सविस्तर दिली. आंबेडकर व गांधीवादी या दोहोंतल्या संवादातले हे मूल्य आपण आज गमावत आहोत. धूसर करत आहोत.

दुसरी भेट आहे, १४ जानेवारी १९४६ रोजीची. बाबासाहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापुरातील सावरकर मंडळाने तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेब सहभागी झाले. तिसरी भेट एम. एन. रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सोलापुरातील कार्यालयास भेट.

गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट या तिन्हींशी बाबासाहेबांचे मतभेद किती तीव्र होते हे जगजाहीर आहे. अशावेळी या कोणालाही अस्पृश्य न मानता त्यांच्याशी माणूस म्हणून संवादी राहण्याची बाबासाहेबांसारख्या महामानवाची ही भूमिका आजच्या परमत असहिष्णुतेच्या वास्तवात खास अधोरेखित करण्याची गरज आहे.

बाबासाहेबांच्या चळवळीचा आपापल्या जिल्ह्यातील मागोवा घेण्याची प्रेरणा या पुस्तकाने नक्कीच संबंधितांना मिळेल आणि त्या योगे दत्ता गायकवाडांचे ऐंशिव्या वर्षी असे पुस्तक लिहिण्याचे श्रम अधिकाधिक सार्थकी लागतील असे मला वाटते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मे २०२२)

____________

चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दत्ता गायकवाड

सुविद्या प्रकाशन

पृष्ठे ३०३ | मूल्य ३५० रु.

संपर्क क्रमांक : ९९७५६२६७१०

_____________

कळल्यावरी कुठे कशास्तव…

सध्या आमचे सामाजिक सलोखा अभियान सुरु आहे. चेंबूर-मानखुर्द-ट्रॉम्बे परिसरातील साधारणपणे दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या वस्त्यांत आमच्या बैठका, भेटीगाठी सुरु आहेत. आमच्या म्हणजे संविधान संवर्धन समितीच्या. संविधानावरील हल्ल्यांच्या विरोधात आवाज उठवणे, चळवळ करणे हे या संघटनेचे काम. या कामाचा एक महत्वाचा भाग म्हणून संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून ती करत असते. संविधान जागर यात्रा, कलापथक, महामानवांचे जन्म-स्मृतिदिनांचे उत्सव त्यांच्या विचारांचे संविधानाशी नाते जोडून साजरे करणे हेही तिचे उपक्रम. संविधानाला इजा पोहोचवणाऱ्या राजकीय-सामाजिक कृत्यांविरोधात निदर्शने-आंदोलनांद्वारे प्रासंगिक प्रतिसाद देत असते.

यावेळचा प्रसंग होता व आहे, तो राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याच्या इशाऱ्याचा. हा इशारा उघडच हिंदू-मुस्लिम तणावातून प्रक्षोभक वातावरण तयार करण्यासाठी आहे. सध्या देशभर अशा सांप्रदायिक आणि संविधानातील मूल्यांची गळचेपी करणाऱ्या घटनांना ऊत आला आहे. केंद्रात सरकार म्हणून आणि रस्त्यावर पक्ष म्हणून भाजप आपल्या परिवारातील कट्टर हिंदुत्ववादी शक्तींना चालना देत आहे. उरल्या सुरल्या संविधानाला कायमची मूठमाती देऊन २०२४ पर्यंत त्यांना अपेक्षित हिंदू राष्ट्र प्रत्यक्षात आणण्याचे संघपरिवाराचे लक्ष्य साधण्यासाठी या शक्तींच्या हालचालींचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजप विरोधी मोहिमेत जान फुंकणाऱ्या राज ठाकरेंनी ईडीच्या भयाने असो वा त्यांना नवा साक्षात्कार झाला म्हणून असो, शीर्षासन करुन त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मालिक से वफादार होत ते मुसलमानांच्या मागे लागले आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्द्यामागे भाजप-संघ परिवाराची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आज हा तर उद्या दुसरा मुद्दा घेऊन त्यांचा विखारी प्रचार वा घातक कारवाया चालणारच आहेत. देश ज्या मूल्यांवर उभा राहिला, तो पाया उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधी युद्धातली ही लढाई आहे, हे लक्षात घेऊन राज ठाकरेंचा इशारा गंभीरपणे घेणे भाग आहे. या इशाऱ्यात ते वेगवेगळे बदल करु शकतात. पण हे सर्व बदल हिंदू-मुस्लिम तणाव वाढवत दंगली घडवण्याच्या दिशेने जाणारे असतील, एवढे नक्की दिसते आहे.

त्यामुळेच मुस्लिमांतही या इशाऱ्यानंतर असुरक्षितता व अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. वस्त्यांत फिरताना ते जाणवते. ९२-९३ च्या दंगलींच्या आठवणी आमच्या या वस्त्यांतल्या बैठकांत निघत आहेत. आमच्या मोहिमेची या क्षणीची मांडणी आहे ती सामाजिक सलोखा राखण्याची. आपल्या वस्तीत कोणत्याही प्रकारे तीन मे नंतर वा त्यापुढच्या नजिकच्या काळात सांप्रदायिक टकराव होता कामा नये. कोणी कितीही उसकवले तरी हिंदू-मुसलमानांनी हिंसेला प्रवृत्त होता कामा नये. अगदी अजानच्या वेळी मशिदीसमोर जाणून बुजून हनुमान चालीसा वा तत्सम प्रकार घडले तरी मुस्लिम समाजातून त्याला प्रतिक्रिया येता कामा नये, असे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.

या बैठकांना हिंदू, मुस्लिम, बौद्ध समुदायांचे लोक हजर असतात. ‘आमच्या वस्तीत आम्ही सगळे एकत्र आहोत. इथे काही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही’, असे सांगतात. ९२-९३ ला आम्ही भोगले आहे. महागाई, करोना यांनी एवढी हालत झाली आहे की माणसे या राज ठाकरेच्या नादाला लागणार नाहीत, असेही काहींना वाटते. ‘तुमचे हे एकजुटीचे वातावरण चांगलेच आहे. ९२-९३ चा धडा आपल्या लक्षात आहे, हे उत्तम आहे. पण त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीचे काय? ती आज राज ठाकरेंसारख्यांना प्रतिसाद काय देते, याचा विचार आपण कसा करणार?’ ..असे प्रश्न आम्ही उपस्थित केल्यावर त्याला लोकांची उत्तरे ठाम नसतात. आपल्या वस्तीत आपली मुले काही गडबड करणार नाहीत, इथून बाहेर गडबड करायला जाणार नाहीत, बाहेरची मुले गडबड करायला इथे येणार नाहीत, यावर आपण नजर ठेवणे, काही होण्याची तयारी चालल्याचे कळल्यास लगेच पोलिसांना खबर करणे या दक्षता लोक मान्य करतात.

वाशिनाक्याच्या मुकुंद नगर मध्ये बौद्धांनी बुद्धविहाराच्या पटांगणात हिंदू व मुसलमानांना एकत्र करुन इफ्तारची पार्टी दिली होती. ही नक्कीच विशेष बाब होती. या वस्तीत वर्षभरापूर्वी हिंदू-मुसलमान संघर्ष झाला होता. त्या पार्टीनंतर तिथेच निवडक लोकांबरोबर आमची बैठक झाली. स्थानिक नगरसेवकही होते. एकजुटीचा महिमा सगळ्यांनीच गायला. हा मुख्य मुद्दा झाल्यानंतर एकाने नगरसेवकापुढे अडून राहिलेल्या रस्त्याचा प्रश्न मांडला. रस्ता नसल्याने अंत्ययात्रेवेळी मयत कसे रेल्वे रुळांवरुन उचलून न्यावे लागते वगैरे. नगरसेवक म्हणाले, ‘मी माझ्या खर्चाने रस्ता पूर्ण करायला तयार आहे. पण तुमच्यातली भांडणे मिटवा.’ बैठक झाल्यावर अधिक चौकशी केली तेव्हा कारण कळले ते असे. एका बाजूला मशीद आणि एका बाजूला होऊ लागलेले मंदिर यांतले एक हटवल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही.

हा प्रश्न इफ्तार पार्टीने सुटत नाही. त्याला सततच्या संवादाचे, विश्वास निर्माण करण्याचे आणि हे करु शकणारे लोक तिथे असण्याची गरज आहे. धारावीत ९३ च्या दंगलीनंतर एका वस्तीत शेजारच्या गल्ल्यांत राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांनी एका रात्रीत भिंत उभी केली होती. तिथे राष्ट्रीय एकता समिती म्हणून आम्ही काम करत होतो. एका बाजूला जाळलेल्या घरांबाबतचे, मनुष्यहानीचे मदत कार्य आणि दुसऱ्या बाजूला मने सांधण्याचे काम आम्ही करत होतो. मने सांधण्याच्या गटाचा मी भाग होतो. या दोन्ही समूहांची आधी अतितीव्र प्रतिक्रिया होती. भिंत राहणारच यावर ते अटळ होते. रोजच्या आमच्या भेटींनी ही तीव्रता कमी होत गेली. अखेरीस ते राजी झाले. भिंत तुम्ही पाडा असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही भूमिका घेतली – ‘भिंत तुम्ही बांधलीत. तोडायची तुम्हीच.’ पुढे भिंत त्यांनी तोडली. आमचे मिशन यशस्वी झाले. वस्त्यांतले असे प्रश्न सोडवायला असा सततचा संवाद करणारे, नैतिक अधिकार असलेले लोक, संघटना गरजेचे आहे. प्रासंगिक भेटींतून वा मनोमीलनाच्या कार्यक्रमांतून हे आपोआप घडेल असे समजणे योग्य नाही. असे प्रसंग हा या मोहिमेचा प्रारंभ वा क्रमातला टप्पा समजला पाहिजे. तेच अंतिम ध्येय असू नये.

रामनवमीच्या दिवशी रात्री उशीरा मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीत जी तोडफोड झाली तिथे आम्ही काहींना भेटलो. यापूर्वी अशी मिरवणूक कधीही इथून गेलेली नाही. यावेळी जाणूनबुजून तरुणांच्या एका गटाने ती काढली. हे बाहेरचे लोक होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मशिदीच्या जवळ आल्यावर मुद्दाम घोषणा आणि डिवचणारी भाषा वापरली गेली. त्यातून बाचाबाची झाली. मिरवणूक काढणारे परत गेले आणि रात्री उशीरा मोठ्या संख्येने येऊन मशिदीच्या आसपासच्या परिसरातील वाहने त्यांनी तोडली. ही वाहने काय फक्त मुसलमानांची नव्हती. मशीद व अन्य इमारती जवळ जवळ आहेत. मुस्लिम, हिंदू आणि लक्षणीय संख्येने बौद्ध इथे राहतात. सगळ्यांची वाहने तिथे होती.

ही घटना सुटी बघून चालणार नाही. तोडफोड करणारे तरुण भले बाहेरचे असतील. पण या वस्तीत आणि आसपास बजरंग दल, हिंदू शब्दापुढे जागृती, युवा वाहिनी वगैरे असलेल्या संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिंनी बरीच वर्षे आपले जाळे विणले आहे. तरुण मंडळींना सदस्य करण्याची मोहीम आणि विविध हिंदू सणांच्या निमित्ताने वा अन्य निमित्ते तयार करुन त्यांच्या मिरवणुका, मेळावे सतत सुरु असतात. बौद्ध मुलेही त्यांनी गळाला लावलेली आहेत. या संघटनांचा भाजप तर पालकच आहे. पण शिवसेना, मनसेचे लोकही या कट्टरपंथीय हिंदूंच्या बाजूने असतात. वरच्या नेतृत्वाची भूमिका मग काहीही असो. अन्य पक्षांतले हिंदूही या प्रकारच्या ‘हिंदुत्वाला’ सहानुभूत असतात किंवा तटस्थ राहतात. बौद्धांचे म्हणणे असते, आमच्या वाट्याला कोणी जात नाही. अशा एका प्रतिक्रियेवर मी म्हणालो, ‘पण तुम्ही हस्तक्षेप करत नाही ना! कोणा एकाची बाजू भले नका घेऊ. मात्र जे काही करायचे ते कायद्याने करा. संविधानात्मक मार्ग वापरा. हिंसा आम्ही होऊ देणार नाही, असे रस्त्यावर येऊन तुम्ही बजावायला नको का?’ असे बोलल्यावर ‘हो. हा हस्तक्षेप करायला हवा’ यास ते कबूल होतात.

याच म्हाडा कॉलनीतल्या एका विशीतल्या मुलीने वर्षभरापूर्वी मशिदीच्या भोंग्यांविषयी मशिदीच्या आवारात एकटीने जाऊन जाब विचारला होता. तिच्या या शौर्याचे बरेच व्हिडिओ माध्यमांवर त्यावेळी फिरले. देशभरच्या हिंदू कट्टरांनी तिला जोरदार पाठिंबा तिला. घरी येऊन तिचा सत्कार केला. प्रारंभीची आवृत्ती एवढीच होती – या मुलीच्या खिडकीच्या दिशेने मशिदीच्या भोंग्यांचा आवाज थेट येतो. अजान भोंग्यांवर करायला तिचा विरोध नाही. आवाज कमी ठेवा एवढेच तिचे म्हणणे. पुढे जाऊन यात तीव्रता तयार होते. आणि ही मुलगी हिंदू कट्टरांची पाठिराखी होते. किंवा ती या कट्टर हिंदू संघटनांची आधी घटकही असेल. त्यांच्या मोहिमेचा भाग म्हणूनही तिची हे विरोचित कृत्य असेल. आमच्या सहकाऱ्याने रस्त्यावरुन तिच्या खिडकीकडे बोट दाखवले. तिथे भगवा झेंडा लावलेला होता.

या मुलीच्या ट्विटरवर हा लेख लिहिण्याआधी चक्कर मारली. तिथे सलगपणे हिंदू कट्टरांची भलामण करणारे संदेश दिसतात. १० एप्रिलला रामनवमी होती. त्या दिवशी म्हाडा कॉलनीत हिंसाचार झाला. त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे ८ तारखेला तिने युद्धाच्या पवित्र्यातील धनुष्यधारी रामाचे चित्र देऊन एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते – ‘राम बिती हुई हिस्टरी नही, हमारा वर्तमान है, वर्तमान हमें बताता है कि, क्यूं शस्त्र के बिना धर्म की रक्षा नही हो सकती. कोई सीमा पर शस्त्र धारण करता है, इसलिए हमारी धर्मशाला में धर्म नाच रहा है. ध्यान और युद्ध अलग नही किये जा सकते..’

बाकी अनेक ट्विटांमध्ये ‘जय हिंद. जय श्रीराम. स्टँड फॉर ह्युमन राईट्स. जय संविधान. वंदे मातरम.’ असे ती लिहिताना दिसते. तिला पाठिंबा देणाऱ्या हॅशटॅग मोहिमेबद्दल आभार व्यक्त करते. आपण करतो तेच संविधानाला खरोखर अभिप्रेत आहे अशी या मुलांची भूमिका असेल, तर आम्ही संविधानाच्या प्रचार-प्रसाराचे काम करणारे लोक त्यांच्यादृष्टीने स्यूडो ठरतो, हे उघडच आहे.

मशिदींवरचे लाऊड स्पीकर कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत नसतील, तर त्यांची तक्रार जरुर व्हावी. त्यासाठी प्रयत्न करुन थकलेल्या आणि संतप्त झालेल्या मुलीने थेट मशिदीत जाऊन भांडण काढले हे समजू शकते. पण इथे केवळ तसे दिसत नाही. जाणीवपूर्वक मुस्लिमांची खोड काढत, त्यांना डिवचत, अवमान करत त्यांना प्रक्षुब्ध करण्याचा व त्यांच्याकडून हिंसक प्रतिक्रिया आणण्याचा आणि त्यायोगे दंगली घडवण्याचा हा सुनियोजित डाव आहे, याला देशभरच्या अलिकडच्या अनेक घटनांतून पुष्टी मिळते.

माहुल, गवाणपाडा, विष्णू नगर, भारत नगर, टेकडीवरील राहुल नगर, नागाबाबा नगर, अशोक नगर, सह्याद्री नगर, पेट्रोलियम विभागातील वाहतुकीसाठीच्या रेल्वे पटरीच्या आसपासचा परिसर ते चेंबूर कँप इथपर्यंत विविध वस्त्यांमध्ये मी २०-२५ वर्षांपूर्वी साक्षरता आणि पुढे रेशन या चळवळींसाठी खूप हिंडत असे. त्यावेळी न दिसलेली आणि त्यानंतर मी अनेकवेळा या भागात जाऊनही तिचे गांभीर्य न कळलेली बाब म्हणजे संघपरिवारातल्या संघटनांचे वाढते जाळे. मानखुर्दची म्हाडा कॉलनी, पीएमजीपी कॉलनी, साठे नगर, गोवंडीची बैंगनवाडी, शिवाजी नगर ते माहुल-वाशिनाका हा चेंबूर-ट्रॉम्बेचा पट्टा या संघटनांनी प्रचंड पोखरला आहे. वाशिनाक्याच्या रस्त्यावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची विविध निमित्ताने सतत फ्लेक्स पोस्टर्स लागलेली असतात. त्यांच्या मिरवणुका निघत असतात. गेल्या वर्षी आमच्या एका बौद्ध व चळवळीत सक्रिय सहकाऱ्याच्या मुलाचा फोटो बजरंग दलाच्या बॅनरवर मी पाहिला होता. १८ वर्षांच्या खालच्या मुलांचा भरणा यांत मोठा असतो. हिंदू राष्ट्राची मन उचंबळवणारी भावना त्यांना एक ध्येय देते. त्यासाठी मुसलमानांचा निःपात हे कर्तव्य त्यांच्या मनात रुजवले जाते. अनधिकृतपणे शस्त्रे दिली जातात. सोबत बटन नावाने प्रसिद्ध असलेले ड्रग मुबलक दिले जाते. पैश्यांची पाकिटे येतात. रात्री चायनीज वा अन्य हॉटेलांत यांचे अड्डे जमतात. तिथले खर्च कोणी दानी करत असतात. आधी ध्येय, त्यासाठीचा भावनिक उन्माद वाढवणारी कथ्ये, घोषणा आणि त्या सर्वांच्या पोषणासाठी नंतर धनाचा मुबलक आधार हा क्रम असतो. १८ वर्षांच्या खालील मुलांनी गुन्हे केले तरी त्यांना कायद्याने सज्ञान नसल्याचा फायदा मिळून कायद्याच्या कचाट्यातून वा शिक्षेतून ती लवकर बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे या कोवळ्या संस्कारक्षम, भावनाशील आणि ऊर्जावान वयाच्या टप्प्यावर समाज विघातक शक्ती त्यांना पकडतात.

हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर झाले. पण आम्ही नीट पाहू शकलो नाही. ओळखू शकलो नाही. या मुलांशी आपल्याला भेटता येईल का, बोलता येईल का, या माझ्या प्रश्नाला तिथले आमचे सहकारी उत्तर देतात – ‘काही उपयोग नाही. बोलण्याच्या मनःस्थितीतच ही मुले नसतात. पालकांचेही ऐकत नाहीत. बोलणे सहन झाले नाही तर अंगावर येतात.’ पण कसा, कुठे याचा विचार करुन हा संवाद करावाच लागेल, अशी माझी भूमिका आहे. मी ती सहकाऱ्यांशी बोलत असतो. जी मुले यांत नाहीत, त्यांच्यासाठी काय उपक्रम करता येतील, याचा विचार करायला हवा. थेट वाईटाला भिडता आले नाही तरी चांगले वाढवणे हे वाईटाचा परिणाम घटवणारे असते. या दिशेने काही ठरवावे लागेल.

बौद्ध विभाग हा आमचा मुख्य आधार. राजकीयदृष्ट्या अत्यंत दक्ष हा त्याचा लौकिक. पण तोही अंतर्गत फाटाफुटी, नव्या स्थितीच्या समजाचा अभाव यांमुळे या स्थितीत दखल द्यायला पुरेसा सक्षम नाही. त्यातही संघपरिवाराने काहींना गळाला लावले आहे. मातंग, चर्मकार, वाल्मिकी आदि दलित समूह बौद्धांच्या जुटीत येत नाहीत. बौद्धांविषयीच्या खऱ्याखोट्या गृहितकांनी, व्यवहाराने ते बौद्धांविषयी दुस्वास व्यक्त करतात. त्यांना तर संघपरिवाराने कधीच आपलेसे केले आहे. बुद्धविहारातल्या बैठकांत मुस्लिमांविषयी घृणेने बोलणारेही भेटतात. पण ते कमी दिसतात. मातंग-चर्मकारांत ते अधिक असतात. मातंग-चर्मकारांना व्यापक हिंदू आयडेंटी अधिक प्रतिष्ठेची वाटते. साठे नगरच्या मांगिरबाबा मंदिरात मातंग अधिक संख्येने असलेल्या बैठकीत याचा प्रत्यय आमच्या कार्यकर्त्यांना आलाच. मशिदीवरील भोंग्यांबाबत त्यांची प्रतिक्रिया तीव्र होती.

या भेटी-गाठी, बैठका करणे हे कष्टप्रद, कधीकधी नाऊमेद करणारेही काम आहे. आमच्या संघटनेत कोणी पगारी पूर्णवेळ काम करणारे नाही. आपापले व्यवसाय, नोकऱ्या करुन स्वखर्चाने हिंडणारे, वेळ देणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची संख्या प्रसंगाप्रसंगाने कमी वा अधिक असते. कधी कधी एकटे-दुकटेच फिरावे लागते. ज्या वस्तीत स्वतःचा प्रवास खर्च, वेळ काढून जावे, तिथे लोक जमलेले असतील असे नाही. काही वेळा आपल्यालाच लोक जमवावे लागतात. कधीतरी लोक येतच नाहीत. एखाद-दुसऱ्या व्यक्तीशी बोलून पुढची वेळ ठरवून परतावे लागते. बरे या कष्टाची नोंद कोणी तसे घेत नाही. अनेकांना तुम्ही एकटे कुठे हिंडत असता हे कळतही नाही. बैठक झाली आणि त्याचे फोटो फेसबुक-व्हॉट्सअपवर टाकले तरच ते कळते आणि काही लाईक्स मिळतात. त्यामुळे हा उद्योग करण्यापेक्षा फेसबुकवर हिंदू फॅसिस्टांच्या करवायांविषयी प्रतिक्रिया देत राहणे सोपे आहे. त्यातून ‘काही केल्याचे’, त्यांची ‘जिरवल्याचे’ समाधान (जे कृतक आहे) मिळते. आपले समविचारी फ्रेन्ड्स आपल्या या पोस्ट्सची वाहवा करतात. त्यातून आपण रणभूमीवर आहोत आणि शत्रूला खडे चारत आहोत, अशी एक विजयी योद्ध्याची भावना मनात नांदत राहते. ती कमी झाली की पुन्हा एक पोस्ट. पुन्हा विजयी भावना. हे सतत करणाऱ्याला अहर्निश चळवळीच्या कामात आपण आहोत, ही भावना सहज टिकवता येते. कायम ठेवता येते. (हे काहीसे ‘बटन’ च्या नशेसारखे आहे, असा माझा कयास आहे.)

हिंदू कट्टरपंथीयांकडे जे एक ध्येय आणि त्यासाठीची पॅशन आहे, तिची पुरोगामी प्रवाहांत वानवा आहे. हे ध्येय आणि पॅशन कशी आकार घेणार हा मोठा प्रश्न आहे. माझे वैयक्तिक नुकसान या क्षणी काही नाही. माझ्या जीवनमानात काहीही फरक नाही. अशावेळी मला जाणिवेनेच हा धोका समजून घ्यायला हवा. पण आज हे सार्वत्रिक नाही. त्यामुळे मानवाच्या प्राथमिक अवस्थेत अग्नी जपायला गुहेत बसून एखाद-दुसऱ्याला अग्निहोत्र करावे लागे, तसे ते आज ज्यांना कळते त्यांना करत राहावे लागणार आहे. कोण दखल घेतो हा मापदंड असून चालणार नाही.

आमच्या संघटनेच्या प्रवासात कधी वाळवंट, कधी ओढा, कधी एकदम पूर आणि पुन्हा प्रवाहातले खडक उघडे, एकाकी असे होत राहते. संविधान जागर यात्रा एकदम हजारोंच्या; नंतर जेमतेम ५० लोक. कधीतरी नुसतेच एकेकाला भेटत हिंडायचे. कधी संविधानावर भाषणे करायला निमंत्रणे, तर कधी आपणच भाषणांचे ‘वार’ लावून घ्यायचे. म्हणजे मी तुमच्याकडे उद्या संविधानावर बोलायला येतो आहे, जमेल तेवढ्यांना एकत्र करा, असे सांगायचे. मानधन सोडा, चहा कोणी दिला, आपण जाण्याआधी लोकांनी झाडून-लोटून ठेवले यानेच बरे वाटते. औपचारिक कार्यक्रमांत, व्याख्यानांना बोलावून मानधन देणारेही असतात. पण ते अगदीच प्रासंगिक. चळवळीच्या यात्रांसारख्या कार्यक्रमांना लोक आर्थिक सहाय्य करतात. पण दैनंदिन कामांसाठी पैसे उभे राहत नाहीत.

प्रारंभी उल्लेख केलेल्या आमच्या सध्याच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबई पोलीस कमिशनर आले. ते पूर्वनियोजित नव्हते. वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या कानावर आमच्या हितचिंतकांनी ही बाब घातली, विनंती केली आणि ते आले. पण त्यामुळे आमच्या सभेला एकदम प्रसिद्धी मिळाली. ते फोटो फेसबुकवर टाकल्यावर भरपूर लाईक्स, शेअर आणि प्रशंसा आमच्या वाट्याला आली. आमचे लोक खुश झाले. मेहनतीचे चीज झाले असे वाटले.

हे ठीक आहे. त्यामुळे उमेद वाढली. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटे फिरावे लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावे लागेल हे मनात पक्के असायला हवे. या मापदंडांच्या पलीकडे जाऊन ‘कळल्यावरी कुठे कशास्तव, मरणे सोपे रे ध्येयास्तव’ या प्रचितीचा शोध जारी ठेवायला हवा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(मुक्त संवाद, मे २०२२)

Sunday, April 10, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कामगार चळवळीतील भूमिका व कार्य


इयत्ता तिसरीला असताना आम्हाला ‘थोरांची ओळख’ नावाचे इतिहासाचे पुस्तक होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती देणाऱ्या प्रकरणाचे शीर्षक होते ‘दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि त्यातील चित्र महाडच्या सत्याग्रहाचे. त्यावरुन बाबासाहेबांनी फक्त दलितांच्या उद्धारासाठीच काम केले, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबत असे. देशाची घटना त्यांनी लिहिली, ती काही केवळ दलितांसाठी नाही. देशातल्या सर्व जनतेसाठीचे त्यांचे हे कार्य होते, हे पुढे या विद्यार्थ्यांना तसेच लोकांना कळते. पण ही बाब अपवाद आहे, ते दलितांचेच नेते होते, हा समज मनात पक्का राहतो. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीनंतर आणि आता त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतिनिमित्ताने किमान त्यांच्या समग्र कार्याबद्दल लेखन व चर्चा सुरु झाली. स्त्रिया, शेतकरी, कामगार, जलव्यवस्थापन आदि क्षेत्रातले त्यांचे काम तसेच अर्थ-मानववंशशास्त्रीय लेखन, चिंतन यांचा मागोवा माध्यमांतून घेतला जाऊ लागला. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा वा कार्याचा हा आढावा अनेकांना दीपवून टाकतो. तथापि, या बाबी इतक्या सार्वत्रिकपणे प्रचारल्या जात नाहीत; त्यात जातीय संकुचिततेची वाढती धार यांमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे महानपण आकळण्याला मर्यादा पडते हे खरे. म्हणूनच त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामांचा पुन्हा पुन्हा प्रचार करणे भाग आहे. याच हेतूने बाबासाहेबांची कामगार चळवळीतील भूमिका व कार्य यांतील काही बाबींचे विवेचन खाली करत आहे.

१९३६ साली स्थापन झालेल्या त्यांच्या पक्षाचे नावच ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ होते. बाबासाहेबांनी पक्षस्थापनेमागची भूमिका स्पष्ट करताना केवळ अस्पृश्य श्रमजीवी नव्हे, तर सर्वच मजुरांचे हित व कल्याण साधण्यासाठी हा पक्ष काम करेल असे जाहीर केले होते.

कामगार चळवळ ही कम्युनिस्टांच्या कार्याच्या गाभ्याचा भाग. बाबासाहेबही कामगार क्षेत्रात उतरले होते. तथापि, कम्युनिस्टांच्या मांडणी व व्यवहाराबाबत बाबासाहेबांचे मतभेद होते. त्यांच्या मते ‘कम्युनिझम व कामगारवर्गाची चळवळ’ ही एक नव्हेत. ते पुढे म्हणतात- ‘आम्हाला कामगार संघाची चळवळ अवश्य पाहिजे आहे. भांडवलशाहीशी कामगारांच्या वतीने झगडण्याची आवश्यकताही आम्हाला पूर्ण मान्य आहे. इतकेच नव्हे, तर संप हे सुद्धा कामगारांचे एक कायदेशीर शस्त्र आहे असेच आम्ही समजतो. परंतु, या शस्त्राचा जपून व योग्य वेळीच उपयोग करावयाचा असतो.’ कम्युनिस्ट त्यांच्या राजकीय उद्दिष्टांसाठी संपाच्या हत्याराचा वापर करतात. संपासारखे पाऊल उचलताना सर्व बाजूंनी विचार करणे गरजेचे असते. ते त्यांच्याकडून होत नाही, ही बाबासाहेबांची कम्युनिस्टांवर टीका होती. कम्युनिस्टांचा पुढाकार असलेल्या १९३४ च्या गिरणी कामगारांच्या सार्वत्रिक संपाला त्यांचा पाठिंबा नव्हता. पुढाऱ्यांतली मतमतांतरे, कामगारांत अभेद्य एकीचा अभाव, जागतिक मंदीमुळे वाढणारी बेकारी ही पार्श्वभूमी संप यशस्वी होण्यास अनुकूल नाही, असे त्यांना वाटत होते. दोन महिने चाललेला हा संप काहीही तडजोड होण्याआधीच मागे घ्यावा लागला. कामगार चळवळीत डॉ. आंबेडकर फूट पाडत आहेत, असा आरोप करणाऱ्या डाव्यांना ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ या त्यांच्या घोषणेची आठवण ते करुन देतात आणि अस्पृश्य कामगारांशी सवर्ण कामगार जो भेदभाव करतात, त्यावर तुमचे मौन का, असा सवाल करतात. भांडवलशाही व ब्राम्हणशाही या दोन्हींशी एकाच वेळी लढायचे बाबासाहेबांचे धोरण होते. हे दोन्ही कामगार चळवळीचे शत्रू आहेत, असे ते म्हणत.

कम्युनिस्टांशी त्यांचे मतभेद असले तरी काही वेळा हे दोन्ही घटक कामगारांच्या प्रश्नावर एकत्र आल्याचेही दिसते. १९३४ च्या संपाच्या बाजूने बाबासाहेब नव्हते. पण या संपावेळी ज्या कम्युनिस्ट नेत्यांवर सरकारने खटले भरले, त्यांचे वकिलपत्र घेऊन ते लढले. बाबासाहेबांच्या या प्रयत्नांमुळे हे सर्व कम्युनिस्ट नेते निर्दोष सुटले. १९३८ साली मुंबई प्रांतात काँग्रेस सरकारने आणलेल्या औद्योगिक कलह विधेयकाच्या विरोधात बाबासाहेब विधानसभेत गरजले- ‘संप करणे हा गुन्हा ठरवून काँग्रेस सरकारने कामगारांवर गुलामगिरीच लादली आहे.’ या विधेयकाविरोधातल्या एक दिवसाच्या सार्वत्रिक संपाच्या तयारीसाठी डांगे, रणदिवे, मिरजकर यांच्यासोबत बाबासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रित सभा केल्या. बाबासाहेबांच्या प्रशिक्षित सुसंघटित समता सैनिक दलाने या संपाच्या व्यवस्थेत मोठी कामगिरी बजावली. सवर्ण व अस्पृश्य कामगारांच्या या अभूतपूर्व एकजुटीच्या प्रेरणादायी आठवणी पुढे अनेकांनी नोंदवल्या आहेत.

स्वतंत्र मजूर पक्षाचे ध्येय-धोरण तसेच मागण्या सर्व जातीय-धर्मीय व्यापक कष्टकरी समाजासाठी होत्या. उदाहरणार्थ, किमान वेतन निश्चिती, ८ तासांचे काम, भरपगारी रजा, आजारपणाची रजा, पेन्शन, अस्थायी कामगारांना कायम करणे, अपघात नुकसान भरपाई, कामगारांसाठी स्वस्त घरे, त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय इ.. या तसेच अन्य मुद्द्यांना त्यांनी विविध मंचांवर लावून धरले. अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनी काही प्रश्न मार्गीही लागले.

धोरणात्मक बाबी ठरविणे व अमलात आणणे यासाठीचा अवकाश बाबासाहेबांना मिळाला तो महाराज्यपालांच्या (व्हाईसरॉयच्या) कार्यकारी मंडळात त्यांचा मजूर मंत्री म्हणून समावेश झाल्यावर. वास्तविक, बाहेर इंग्रजांच्या विरोधात रान पेटले असताना, चले जावची चळवळ भरात असताना बाबासाहेबांचे १९४२ साली व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात असणे हे अनेकांना खटकले होते. देशद्रोही, इंग्रजांचा बगलबच्चा अशी शेलकी दूषणे त्यांना झेलावी लागली होती. इंग्रजांच्या विरोधात, स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याच्या भूमिकेचा अनेक वेळा बाबासाहेबांनी निर्वाळा दिला होता. तथापि, ज्या अस्पृश्य-पीडितांसाठी ते लढत होते, त्यांच्या भविष्याचे दोर स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना आजवर छळणाऱ्या समूहांच्या हाती गेले तर काय, ही चिंता त्यांना भेडसावत असे. इंग्रज आहेत तोवर पुढच्या काही संरक्षक रचना करुन घ्याव्यात, हा त्यांचा प्रयत्न होता. मजूर मंत्री असताना १९४३ साली एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणतात- ‘भारतात कामगारांनी कामगार मत्रिमंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. भारतास स्वातंत्र्य मिळणे एवढीच गोष्ट पुरेशी नाही. ते स्वराज्य कोणत्या लोकांच्या हातात पडते याला महत्व आहे.’ बाबासाहेबांना खलनायक ठरविण्यापूर्वी हा अंतर्विरोध ऐतिहासिक दृष्टीने समजून घेणे गरजेचे आहे. आजवर ते ज्या कामगार हितासाठी लढत होते, त्याबाबतीत प्रत्यक्ष काही करण्याची संधी बाबासाहेबांना व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळातील सहभागातून मिळाली.

युद्ध साहित्याचे काम करत असलेल्या कारखान्यांत कामगारांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी संयुक्त कामगार नियामक समिती स्थापण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या मजूर मंत्रिपदाच्या काळात झाला. लवादाचे तत्त्व न्यायपद्धतीत कायमस्वरुपी मान्य झाले. निरनिराळ्या योजनांतून तयार होणाऱ्या अनुभवी, अर्धशिक्षित तंत्रज्ञांना रोजगारासाठी भटकावयास लागू नये म्हणून सेवायोजन (एम्लॉयमेंट एक्स्चेंज) कार्यालयाच्या स्थापनेसारखे कामगारहिताचे मोठे पाऊल त्यांना उचलता आले. कामगारांचा पगार आणि उत्पन्न याविषयी संशोधन आणि त्यांना सामाजिक संरक्षण (सोशल सिक्युरिटी) मिळवून देण्याच्या दृष्टीने माहिती संकलन करण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे घेण्यात आला. स्त्रियांना कारखाना कायद्याद्वारे रात्री कामावर बोलावण्यास बंदी घालण्यात आली. स्त्रियांच्या बाळंतपणाच्या काळात त्यांना विशेष भरपगारी रजेसाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. कारखान्यात बारमाही कामगारांना कोणत्याच रजेचा फायदा मिळत नसे. त्यांच्यासाठी भरपगारी रजेचे कलम घातलेले विधेयक त्यांनी मध्यवर्ती मंडळात मंजूर करुन घेतले. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी मालकांवर सोपवणे, वाढत्या महागाईच्या निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्त्याची पूर्तता करणे हे मुद्दे त्यांनी सरकारी मंडळे तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उठवले. याचबरोबर इंडियन बॉयलर्स कायदा, मोटार वाहन कायदा, अपघात नुकसान भरपाई कायदा, अभ्रक खाण कामगार कल्याण कायदा आदि विधेयकांतले अपुरेपण आणि जाचक बाबी दूर करण्याचे काम बाबासाहेबांनी केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दृष्ट्या जर्जर झालेल्या ब्रिटिशांना आपल्या वसाहती सांभाळणे जड झाले. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या हालचालींना वेग आला. १९४६ साली ब्रिटिश सरकारकडून कॅबिनेट मिशन भारतात आले. संविधान सभा स्थापन होऊन संविधान निर्मितीचे काम सुरु झाले. बाबासाहेब व काँग्रेसमधील तणावामुळे संविधान सभेत बाबासाहेबांच्या प्रवेशाला काँग्रेसमधील काही नेतेगण प्रारंभी अनुकूल नव्हते. मुंबई प्रांतातून बाबासाहेबांना निवडून आणण्याची बाबासाहेबांच्या पक्षाची ताकद नसल्याने पूर्व बंगालमधून त्यांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुस्लिम लीगचे सहाय्य घेऊन बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवले. बाबासाहेबांची घटनाततज्ज्ञ म्हणून विद्वत्ता सुविदित होती. यथाक्रम त्यांच्या राष्ट्रीय जाणीवेचा साक्षात्कार काँग्रेस व एकूणच घटना समितीला झाला. त्यांचे संविधान सभेतले स्थान अनिवार्य होऊ लागले. नेमक्या यावेळी देशाला स्वातंत्र्य जाहीर झाले. त्याचबरोबर देशाची फाळणी झाली. फाळणीमुळे बाबासाहेबांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला. बाबासाहेब घटना समितीच्या बाहेर पडण्याची स्थिती तयार झाली. अशावेळी राष्ट्रीय गरज म्हणून बाबासाहेबांना काँग्रेसने मुंबईतून बिनविरोध निवडून आणले. बाबासाहेबांच्या घटना समितीतील फेरप्रवेशानंतर त्यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात कायदे मंत्रिपद तसेच संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. या दोन्ही पदांवर असताना जी कामगिरी त्यांनी पार पाडली, त्यांतून मतभेदांच्या गलबल्यातूनही कामगारहिताच्या अनेक बाबी अधिकार म्हणून वा कायदे करण्यासाठीची दिशा म्हणून भक्कपणे रुजवल्या गेल्या. घटनेतील मूलभूत अधिकार तसेच राज्यधोरणाची मार्गदर्शनक तत्त्वे यांतून आपल्याला त्याची प्रचिती येते.

घटना समितीत वा स्वतंत्र भारताच्या प्रारंभीच्या सरकारांत कामगार हिताच्या बाबी येण्यात स्वातंत्र्य व सामाजिक न्यायाच्या चळवळीचा मोठा वारसा होता. हा वारसा मानणारे नेतृत्व सरकारात होते. आताचे नेतृत्व हा सर्व वारसा मिटवण्याचा बेछूट प्रयत्न करत आहे. यातील काही बाबी खाजगीकरण, उदारीकरण नावाने आधीच्या सरकारांतच सुरु झाल्या होत्या. पण कामगार, कष्टकरी, गरीब, दलित, आदिवासी, भटके, स्त्रिया यांच्याबाबतीत दुजाभावाची, निम्नतर दृष्टी असलेल्या विचारांचे व हितसंबंधांचे आताचे सरकार मोठ्या कष्टाने उभारलेल्या धोरणांच्या, कायद्यांच्या, योजनांच्या इमारती निर्दयपणे जमीनदोस्त करत आहे. अशावेळी जुन्या वैचारिक-व्यावहारिक संघर्षांचे संदर्भ नव्याने तपासून लढ्यातील मित्रांची फेरजुळणी करावी लागेल. त्यादृष्टीने जो काही आराखडा तयार करावा लागेल, त्यात व्यापक एकजुटीचा बाबासाहेबांनी २२ ऑगस्ट १९३६ च्या जनतेच्या अंकात नोंदवलेला हा मंत्र आजही पायाभूत ठरु शकतोः

‘अस्पृश्यतानिवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरुप जरी जातिनिष्ठ दिसत असले तरी तत्त्वतः तो लढा आर्थिक आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखांत सांगितलेले आहे. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधांहून वेगळे किंबहुना परस्परविरोधी असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे प्राप्त होते. परंतु, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी कामकरी वर्गांचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्य वर्गाला आपला आर्थिक लढा स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बाजूंनी गांजलेला अस्पृश्य वर्ग हिंदी श्रमजीविकांच्या लढ्यात पुढारीपण घ्यायला लायक आहे असे आम्ही मागे एकदा म्हटलेले होते.’

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(श्रमकल्याण युग, डिसेंबर २०२१)

Saturday, March 26, 2022

अल्पजीवी दलित पँथर

‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. सवर्ण समाजाच्या मस्तवाल आविष्काराला आव्हान देणारे हे दलितांचे उद्रेक एकूण सामाजिक उत्थापनात अल्पजीवी ठरले. त्यातील अनेक नामवंत पुढारीही आता काळाच्या पडद्याआड जात आहेत. त्यांना जर आपली एकजूट टिकवता आली असती तर दलित चळवळीला बेबंद सत्ताधाऱ्यांच्या वळचणीत जगण्याचा प्रसंग आला नसता आणि उच्चवर्णीय मानसिकतेलाही योग्य चाप बसला असता. अर्जुन डांगळे यांनी आपल्या या दस्तावेजात दलित पँथरची पाच वर्षे उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दलित पँथर ही महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय प्रस्थापिताला हादरविणारी सत्तरीच्या दशकातली घटना होती, याबद्दल कोणाचेही दुमत असू नये. तिचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, तिचे जन्मदाते कोण, तिचे एकूण जीवनमान किती, तिने काय साधले याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात. पण पँथरच्या स्फोटाची कंपने देशात आणि देशाबाहेरही पोहोचली आणि ती कितीही अल्पजीवी असली तरी आज तिच्या निर्मितीला पन्नास वर्षे झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही, हे विधान अधोरेखित करावेच लागेल. अधोरेखित हा शब्द अर्जुन डांगळे यांच्या अलीकडेच लोकवाङ्मयने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील शीर्षकाचा. ‘दलित पँथरः एक अधोरेखित सत्य’ हे त्यांच्या पुस्तकाचे नाव. याआधी पँथरवर बरेच लिहिले गेले आहे. तरीही त्यांना लिहिण्याची गरज का वाटली हे सांगताना ते म्हणतात- ‘सत्याचा अपलाप, अर्धसत्य, एकारलेपण असे काही दोष ‘दलित पँथर’चा कालपट मांडणाऱ्या लिखाणात दिसून आले.’ अर्थात, ते असे लिखाण करणाऱ्या सगळ्यांच्याच हेतूबद्दल शंका घेत नाहीत, जाणीवपूर्वक त्यांनी ते केले असा त्यांचा आरोप नाही. या चळवळीतला प्रथमपासून संबंधित असलेला एक लेखक-कार्यकर्ता म्हणून या त्रुटी दूर करुन पँथरच्या वाटचालीचा ‘वस्तुनिष्ठ आलेख’ नव्या पिढीसमोर मांडावा असा त्यांचा उद्देश या पुस्तकाच्या लिखाणामागे आहे. त्यांनी ज्यांच्या लिखाणातील त्रुटी अधोरेखित केल्या आहेत, तशा त्यांच्या या लिखाणाबाबतही पुढे त्यांच्यासारखाच चळवळीतील कोणी जुना कार्यकर्ता, अभ्यासक काही वेगळे अधोरेखित करेल. या प्रक्रियेचे डांगळे स्वागतच करतात. दलित साहित्य चळवळीचा आढावा, दलित पँथरच्या स्थापनेआधीची स्थिती, सत्तरच्या दशकातील अस्वस्थता, युवक आघाडीची वाटचाल, साधना प्रकरण, वरळीची दंगल, दलित पँथरच्या फाटाफुटीचे विविध टप्पे, पँथरची बरखास्ती, सत्याच्या अपलापाचा पंचनामा हे या पुस्तकातील विवेचनाचे प्रमुख घटक आहेत. लेखकाने पुस्तकात ज्या बाबी अधोरेखित केल्या आहेत, त्यातील काही बाबींची, त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद काही आवश्यक टिप्पणीसह परिचयादाखल मी या लेखात घेणार आहे. त्यांचा नीट आवाका येण्यासाठी मूळ पुस्तक वाचायला हवे, हे आधीच अधोरेखित करतो.

दलित पँथर ही घटना काही अचानक वीज पडल्यासारखी नाही. तशी ती दिसली तरी असे सामाजिक घटित स्वयंभू नसते. तो चमत्कार नसतो. त्याच्यामागे एक घटनाक्रम असतो, प्रचलित वास्तव असते, या वास्तवातील विचारविश्वाचे परस्परसंबंध उलगडता आले पाहिजेत, तरच त्याचे नीट आकलन होऊ शकते, अशी अर्जुन डांगळेंची भूमिका आहे. त्यासाठी बुद्धाचा ‘प्रतीत्य समुत्पाद’ म्हणजे कार्यकारणभाव किंवा मार्क्सच्या परिभाषेत ‘डायलेक्टिस’ मदत करते, असेही ते नोंदवतात. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी याचा किती व कसा वापर केला, याबद्दल चर्चा होऊ शकेल. पण ही रीत त्यांनी मांडली ती सत्याच्या दिशेने प्रवास करायला खूप मदतकारक आहे, हे नक्की. पँथरच्या आधीची आंबेडकरोत्तर रिपब्लिकन पक्षातील फाटाफूट व प्रस्थापितता, बौद्ध तसेच दलित साहित्याच्या चळवळी, युवक आघाडीसारख्या संघटना, पँथरच्या नेत्यांची पार्श्वभूमी, त्यांच्यावर संस्कार करणारे वैचारिक प्रवाह, पँथरच्या युक्रांदसहित तमाम समाजवादी तसेच डाव्या संघटना, पक्ष, व्यक्ती या मित्रशक्ती यांची तपशीलवार नोंद डांगळेंनी या पुस्तकात केली आहे. एवढी, अगदी वस्तीवार कार्यकर्त्यांची नावे ते का देत आहेत, असे एखाद्याला वाटू शकेल. पण ते म्हणतात त्याप्रमाणे एखादी चळवळ स्वयंभू नसते. तिला ज्ञात-अज्ञात असंख्य हात कारण असतात. लाल निशाण पक्षाच्या लोकांनी मेगॅफोन वा हॉल दिला, ही तशी किरकोळ बाब. यापेक्षा मोठे सहाय्य इतर अनेकांनी केलेले आहे. पण या छोट्या छोट्या थेंबांचे चळवळीच्या तळ्याला मोल असते. वस्तुस्थिती आणि कृतज्ञता म्हणूनही ही नोंद या पुस्तकाचे केवळ लेखक म्हणून नव्हे, तर त्या चळवळीतले प्रथमपासूनचे एक नेते म्हणून डांगळे घेतात, हे मला वृत्तीच्या दृष्टीने महत्वाचे वाटते.

या पुस्तकाचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे यातली परिशिष्टे. पुस्तकाची २० प्रकरणे व तेवढीच म्हणजे २० परिशिष्टे. एवढी परिशिष्टे देण्यात काय औचित्य हे ही संख्या पाहून वाटू शकते. पण पुस्तक वाचताना त्यातील मुद्द्याचा पुरावा आणि त्याची संदर्भ चौकट कळायला या परिशिष्टांचा खूप उपयोग होतो. लेखकाच्या निवेदनाची वस्तुनिष्ठता तपासायलाही ते मदतनीस ठरतात. उदा. दलित पँथरच्या ज्या जाहीरनाम्यावरुन फुटीचे चर खोलवर गेले, ती मूळ नामदेव ढसाळकृत पँथरची भूमिका व त्यावर राजा ढाले यांची ‘जाहीरनामा की नामाजाहीर’ ही टीका, त्यावरचे ‘सत्यचित्र’ मध्ये प्रसिद्ध झालेले रमेश आवाड यांचे भाष्य जसे होते तसे परिशिष्टात वाचायला मिळते. मूळ पुस्तकात लेखक त्यातील जी अवतरणे देतो त्यावरच एरवी सामान्य वाचकाला अवलंबून राहावे लागले असते. सगळेच काही संदर्भ शोधायला ग्रंथालयात जात नाहीत. या संदर्भांची उपलब्धता असलेले ग्रंथालय जवळ असावे लागते, हा आणखी एक भाग. त्यामुळे वाचकाला असे आयते संदर्भ लेखकाने उपलब्ध करुन दिलेत, हे खूप चांगले झाले. वाचकाला आपली स्वतंत्र मते बनवायलाही त्यांची मदत होते.

दलित पँथरची स्थापना कधी व कोणी केली, हा तिच्या स्थापनेपासूनचा गेली पन्नास वर्षे चाललेला वाद आहे. पँथरच्या प्रमुख नेत्यांनी बहुधा यावरच आपली लेखणी, वाणी, कौशल्य व ताकद अधिक झिजवली आहे. जो नेता यावर लिहितो, तोच याचा कसा संस्थापक व धुरीण होता, हे थेट वा आडवळणाने सिद्ध करत असतो. कधी, कोणी स्थापन केली याचा शोध यथावकाश चालू राहावा, पण पँथरने काय साधले, काय बिघडवले, या साधले-बिघडले मधून पुढच्या चळवळीसाठी काय इशारे वा मार्ग मिळतात याची चर्चा प्रामुख्याने व्हायला हवी. ही चिकित्सा काही प्रमाणात डांगळेंनी केली आहे. मात्र त्यांनीही स्थापनेसंबंधीच्या तपशीलात (त्यांच्या हेतुनुसार सत्याचा अपलाप दूर करण्यासाठी) पुस्तकाची खूप पाने खर्च केली आहेत. श्रेयशोधाची छाया सबंध पुस्तकभर जाणवत राहते. लेखक स्वतः पँथरच्या स्थापनेपूर्वीपासून साहित्य चळवळीत सक्रिय आहेत. याच साहित्य चळवळीतून पँथरच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली. प्रत्यक्ष पँथरच्या स्थापनेतले ते घटक राहिलेत. तथापि, इतिहास नोंदवणाऱ्या पँथरच्या नेत्यांनी जाणते-अजाणतेपणी लेखकाच्या योगदानाची योग्य ती नोंद घेतली नाही, म्हणून लेखकाला आपली बाजू या पुस्तकातून मांडावी लागली. अशी बाजू मांडणे गरजेचे होते. पण त्यासाठी इतके लिहिणे गरजेचे होते का, असे वाचकाला वाटू शकते. असो. डांगळेंचे एक वैशिष्ट्य नोंदवलेच पाहिजे. ते म्हणजे, मतभेद असलेल्या व्यक्तींचे म्हणणे त्यांच्याच शब्दात ते पूर्ण मांडतात. आपल्या सोयीनुसार त्यातील विधाने उचलत नाहीत, ही सत्यान्वेषणाची खरी रीत ते अवलंबतात. शिवाय त्यांच्याशी नीट न वागलेल्या, त्यांना मुद्दाम डावललेल्यांच्या योगदानाचीही ते योग्य ती नोंद घेतात. प्रशंसा करतात. पँथरच्या या प्रमुख नेत्यांचा एक गुण मानायला हवा. एकमेकांना शह-काटशह, कठोर टीका, आरोप एवढे केल्यावरही त्यांचे वैयक्तिक मैत्र, परस्परांच्या कौटुंबिक अडीअडचणीला धावून जाण्याची वृत्ती कायम राहिली. डांगळेंनी नामदेव ढसाळांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांचे याला पुष्टी देणारे विधान पुस्तकात नमूद केले आहे.

७२ ला जन्माला आलेल्या मूळ पँथरचा भराचा काळ अडीच वर्षांचा. ७७ ला ती बरखास्त झाली हे धरले तर पाच वर्षांचा. पुढे निराळ्या रुपात ती गटागटात चालू राहिली. मध्येच रिपब्लिकन ऐक्यात एकटवटली. पुन्हा विस्कटली. या काळात नेतृत्वाचे स्खलन, मूळ चित्त्याचे कागदी होणे, विकले जाणे हे रुप त्रासदायक आहे. मात्र पहिल्या भराच्या काळात तिचा दरारा, ताकद याला तोड नव्हती. विशी-तिशीतल्या या पँथर्सनी प्रस्थापिताला ललकारणे, अंगावर घेणे विलक्षण होते. दलित अत्याचाराच्या घटना जिथे होतील, तिथे धावून जाणे, जात-सत्तेच्या ताकदीने वरचढ असलेल्या अत्याच्याऱ्यांची गचांडी धरणे, त्यांना दहशत बसविणे हे आता स्वप्नवत वाटते. आर्थिक अभावग्रस्तता, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली ज्वलज्जहाल अस्मिता, प्रेरणा, व्यवस्थाबदलाचा वैचारिक पाया, प्रस्थापिताला नकार यातून हा जोश येत होता. शिवसेनेचा वाघ याच काळात डरकाळ्या फोडत होता. त्याची आयाळ धरण्याचे काम पँथर्सनी केले. परिशिष्टात नवाकाळमधील एक बातमी डांगळेंनी दिली आहे. त्यात नामदेव ढसाळांच्या बाळ ठाकरेंना एकेरी संबोधून केलेल्या भाषणाची नोंद आहे. ढसाळ म्हणतात – “याला अनेक जाहीर सभांतून मी आव्हाने दिली आहेत. हिंमत असेल तर मैदानात ये. परंतु बांबूला बांबू लावायची हिंमत नाही. तुला कशामुळे माज चढला होता मला माहीत आहे. ती गोठा विसरलेली वासरे आता इकडे परत आली आहेत. आता तुझ्या गमज्या बस झाल्या.”

पँथरच्या पूर्वी खूप बौद्ध मुले शिवसेनेकडे आकर्षिली गेली होती. शिवसैनिक बनली होती. ती आता शिवसेना सोडून पँथरमध्ये आलीत, हा संदर्भ इथे आहे. शिवसेनाप्रमुखांना या भाषेत ललकारणाऱ्या नामदेव ढसाळांचे पुढच्या काळातील त्यांच्याशी झालेले सख्य सुविदित आहे.

आपण प्रारंभीच्या जोशाबद्दल बोलतो आहोत. राजा ढाले तर वरताण होते. हिंदू देवदेवतांची, ग्रंथांची निर्भर्त्सना करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांनी तर शिवाजी पार्कवर जाहीर गीतादहन केले. सामान्य पँथर्स कार्यकर्तेही आपल्या पातळीवर अशीच भाषा व वर्तन करत होते. पँथर्सची भाषा केवळ आक्रमक नव्हती, तर इतरांच्या श्रद्धांचा-मान्यतांचा अधिक्षेप करणारी होती. पण ती सहन केली जात होती. आज हे कठीण नव्हे; अशक्य बनले आहे. त्यावेळच्या अन्य पुरोगामी चळवळी, नेते, त्यांचा समाजातला नैतिक अधिकार, प्रस्थापिताचे प्रतिनिधी असूनही शासकांच्या मनातील लोकशाही मूल्यांची बूज याला कारण आहे. आज हे राहिलेले नाही.

स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या साधनेच्या विशेषांकातल्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखात राजा ढालेंनी राष्ट्रध्वजाबद्दल वापरलेली प्रक्षुब्ध भाषा आणि त्यावरुन उठलेले वादळ याचा सविस्तर आढावा डांगळेंनी या पुस्तकात घेतला आहे. त्यासंबंधात हा लेख साधनेत छापणाऱ्या अनिल अवचटांचा लेखही परिशिष्टात दिला आहे. या प्रकरणात साधनेच्या विश्वस्तांनी माफी मागितली, पण त्याचबरोबर एस. एम. जोशींसारख्या मोठा नैतिक अधिकार असलेल्या नेत्याने समाजाला प्रश्नही केला- राजाने या लेखात नमूद केलेल्या दलितांवरील अत्याचाराबद्दल आपण जाब देणार आहोत की नाही?

७४ साली ५ फेब्रुवारीला पँथर व डाव्या संघटनांचा दलित-कामगार एकजुटीचा प्रचंड मोर्चा सचिवालयावर काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्च्याची नोंद डांगळेंनी पुस्तकात घेतली आहे. त्यातील परिशिष्टात या मोर्च्याचा नवाकाळ मध्ये आलेला सविस्तर वृत्तांत दिला आहे. त्यात कॉ. डांगेंनी सरकारबरोबरच न्यायालयालाही इशारा दिला होता – “न्याय देण्याबाबत दृष्टिकोन बदलला नाही तर या हायकोर्टाच्या इमारतीचा एक दगडही शिल्लक राहणार नाही!”

आजच्या कोर्टाने आणि शासनाने ही भाषा वापरणाऱ्या डांगेंना न्यायालयाच्या अवमानाचा आरोप लावून आत टाकले असते.

पँथरच्या आक्रमतेला अन्य पुरोगामी चळवळींचे आणि शासनाच्या सौम्यपणाचे हे कोंदण मिळाले होते, हे विसरता कामा नये. या व्यापक एकजुटीचे महत्व जाणण्यात तसेच ते व्हावे असे मनोमन वाटणाऱ्यांत नामदेव ढसाळ आघाडीवर होते. ते याच विराट मोर्च्यात म्हणतात – “या घाणेरड्या देशात आजचा सोन्याचा दिवस दिसत आहे. कारण वर्षानुवर्षे भिंत बांधून दूर ठेवलेले दोन भाऊ आज एकत्र येत आहेत. ही एकजूट अभेद्य आहे व या नालायक काँग्रेस सरकारला ती मोडता येणार नाही. मुंबईचे राज्य यापुढे श्रमिक व दलित यांच्या इच्छेप्रमाणे चालणार.”

या मोर्च्याच्या आधी वरळी दंगलीनंतर पँथरसहित सर्व डाव्या, समाजवादी युवक आघाड्यांचा २१ जानेवारी ७४ ला मोर्चा निघाला होता. त्या मोर्च्याचे वर्णन करुन डांगळे म्हणतात – “वर उल्लेखलेल्या दोन मोर्च्यांच्या वेळी जी भावना महाराष्ट्राच्या जनमानसात निर्माण झाली होती, तिच्यात जर सातत्य राहिले असते आणि ती गतिमान झाली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळे वळण लागले असते आणि संयुक्त महाराष्ट्र समिती वेळी जे वातावरण होते तसे निर्माण झाले असते. पण वळण लागले ते वेगळेच.”

अर्जुन डांगळेंची ही खंत खरीच आहे.

नामदेव ढसाळांच्या एका सभेचा प्रसंग डांगळे नोंदवतात. ढसाळांचा भाषणातील मुद्दा होता – “आपल्याला देवधर्मासंबंधी टिंगल टवाळी करायची नाही. तर, आपला लढा हा भाकरीसाठी आहे!” त्यावेळी राजा ढाले यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क भाकरी आणली आणि ते म्हणाले – “ही घ्या भाकर आणि भाषण थांबवा!”

जाहीरनामा प्रकरणानंतर राजा ढालेंनी नामदेव ढसाळांना पँथरमधून काढायचे ठरवले. काढलेही. मात्र त्याआधीच नामदेव ढसाळांनी राजा ढाले व ज. वि. पवारांना पँथरमधून काढून टाकल्याचे घोषित केले. ...हा पोरकटपणा, मस्ती की उद्दिष्टाविषयीची बेफिकिरी?

वैयक्तिक उपजीविका, संघटनात्मक कामासाठीचा खर्च यातून होणारी कुचंबणा हा मोठा प्रश्न असतो. त्याची सहसा बाहेर चर्चा होत नाही. तोही आयाम इथे असावा. पण त्याची सोडवणूक करण्याची रीत तयार न होणे हा संघटनात्मक कमजोरीचाच भाग झाला. चळवळीसाठीच्या निधीचा वापर हा सामुदायिक मुद्दा असतो. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ असे झाले की चळवळीच्या सामुदायिकतेचे काही खरे नसते. यातून येणाऱ्या ताणांना, विरोधांना मग अनेकदा वैचारिक मतभेदांचा मुलामा चढवला जातो.

पँथरच्या फुटीचे पहिले कारण मार्क्सला मानणारे व शुद्ध आंबेडकरवादी या पँथरमधील दोन प्रवाहांचे मतभेद हे सांगितले जाते. या मतभेदांच्या निरासाचा मंच काहीच नव्हता का? लोकशाही प्रक्रियेने चर्चा घडवून पर्यायी जाहीरनामा काढण्यासाठी संघटनात्मक निर्णयप्रक्रियेची काहीच रीत नव्हती का? नव्हती तर ती निर्माण का नाही केली? एवढे करुनही फूट झाली असती तर ते समजू शकते. ...वास्तविक हे मतभेद एवढेच कारण नव्हते. अन्य तेवढीच किंबहुना अधिक महत्वाची कारणे होती हम करे सो कार्यशैली, नेतृत्व व श्रेयासाठीची स्पर्धा, कुरघोडी आणि या आधी नमूद केलेला निधीचा ताबा. पँथरमधील ही ऐतिहासिक फूट काही एकच नव्हती. पुढेही सातत्याने फुटी होत राहिल्या. पुढे झालेल्या या पँथर वा रिपब्लिकन फुटींना काय मार्क्स-आंबेडकर विचारधारांविषयीचे मतभेद कारण आहेत? निवडणुकीतली युती कोणाशी करायची यावर होणाऱ्या फुटींचे आधार वैचारिक वा डावपेचात्मक भूमिकांपेक्षाही अन्यच राहिले आहेत.

प्रस्ताव, चर्चा, सहमती किंवा बहुमताने निर्णय, त्याप्रमाणे कृती, तिचे मापन, पुन्हा चर्चा, नव्या समजाने नवा निर्णय...ही लोकशाही प्रक्रिया आंबेडकरी नाही का? जे राजकारणातल्या हितसंबंधात गुंतलेले नाहीत, अशा आंबेडकरी समूहातल्या विद्वान, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अशांच्यातल्या मतभेदांचाही निरास का होत नाही? अभिनिवेशाने प्रत्येकाने आपल्या फडातच दंड थोपटत राहण्याने पुढे जाता येत नाही. अर्जुन डांगळे याबाबत रास्तपणे म्हणतात – “वर्षानुवर्षे आपण त्याच विषयांवर चर्चा करतो आहोत. दलित शब्द वापरायचा की नाही? १४ ऑक्टोबर की विजयादशमी? विपश्यना करायची की नाही? ...हे विषय आपण कधी संपवणार आहोत की नाही?”

डांगळेंच्या मते चळवळीला आलेली स्थितीशीलता यास कारण आहे. पण चळवळ चैतन्यशील असतानाच्या अडचणीही आपण पाहिल्या. एकूणच पँथरच्या पन्नास वर्षांत आंबेडकरी चळवळीचा समज, गांभीर्य वाढले आहे, असे म्हणता येत नाही. देशभरचा दलितवर्ग बाबासाहेबांना आपला उद्धारकर्ता मानून जयभीमच्या घोषणा देत ताकदीने रस्त्यावर उतरताना दिसतो आहे. ही स्थिती आश्वासक आहे. पण तिच्याशी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचा संबंध नाही. आज संविधान संपविणाऱ्या फॅसिस्ट शक्ती चढाईवर असताना हे सगळे निळे एल्गार एकवटले पाहिजेत. अन्य मित्रशक्तींच्या हातात हात घालून फॅसिस्टविरोधी तसेच व्यवस्थेच्या सम्यक परिवर्तनाचा लढा बुलंद केला पाहिजे. दलित पँथरच्या पन्नाशीनिमित्त तिचा जन्म साजरा करताना तिच्या घडण्या-बिघडण्याची विवेकी चिकित्सा समाजात करुन पुढची दिशा ठरवण्याची संधी घेतली पाहिजे.

या सर्व प्रवासाचे साक्षी, त्यातील बऱ्या-वाईटाचे जबाबदार घटक असलेल्या अर्जुन डांगळे यांच्या ‘दलित पँथरः अधोरेखित सत्य’ या पुस्तकातील संदर्भ या कामी नक्की उपयुक्त ठरतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(ललकारी, विशेषांक, मार्च-एप्रिल २०२२)

_________________

दलित पँथरः अधोरेखित सत्य

अर्जुन डांगळे

लोकवाङ्मय गृह प्रकाशन

किंमत : रु. ६००

_________________

Wednesday, January 26, 2022

तर मग संविधानात टिपू सुलतान का ?

''टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव महापालिकेने मैदानाला देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्याचं महिमा मंडन करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस संतापून म्हणाले.

मैदान तर क्षुल्लक बाब. चक्क संविधानाच्या मूळ प्रतीत झाशीच्या राणीच्या शेजारी टिपू सुलतानचे चित्र आहे. ते कसे?

बुद्ध, महावीर, सम्राटअशोक, विक्रमादित्य, राम, अकबर, शिवाजी महाराज अशी अनेकांची चित्रे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा म्हणून घटनेत आहेत. शांतिनिकेतनचे मोठे कलावंत नंदलाल बोस यांनी आपल्या महनीय राष्ट्रीय नेत्यांच्या विनंतीवरुन ही संविधानाच्या मूळ प्रतीची सजावट केली आहे. ही मूळ प्रत हस्तलिखित आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हे लिखाण केले आहे. संसदेच्या ग्रंथालयात हेलियम वायूने भरलेल्या काचपेटीत संविधानाची ही मूळ प्रत दिमाखाने प्रदर्शित केलेली आहे.

ही बाब फडणवीसांचे पूर्वसुरी श्यामाप्रसाद मुखर्जी संविधानसभेत असताना त्यांच्या कशी लक्षात आली नाही? त्यांनी विरोध केला होता का त्यावेळी?

या मूळ प्रतीतले रामाचे चित्र असलेले पान भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रविशंकर प्रसाद अभिमानाने जाहीर सभेत, टीव्ही चॅनेलवरुन लोकांना सतत दाखवत असतात. त्यांनीही टिपूच्या चित्राला आक्षेप घेतल्याचे किंवा हे चित्र घटनेतून काढून टाकण्याची मागणी केली आहे का?

फडणवीसांनी याबद्दल जनतेला माहिती दिल्यास बरे होईल.

_________

सेंट्रल व्हिस्टात जुन्याची फेररचना सुरु आहे. अशावेळी संविधानाची मूळ प्रत काचपेटीतून काढून तिचीही नव्याने सजावट होण्याची शक्यता अर्थातच नाकारता येत नाही. २०२४ च्या आधी खूप साऱ्या ऐतिहासिक चुकांचे परिमार्जन करायचे आहे.

- सुरेश सावंत

Saturday, January 22, 2022

कोल्हे - पवार यांनी गोलमोल नव्हे; थेट बोलावे

सिनेमा - नाटक मग ते कलावादी, जीवनवादी वा प्रचारकी काहीही असो, त्यातील विचाराशी सहमत असो नसो, त्यात भूमिका करण्याचे स्वातंत्र्य कलावंताला घटनेने दिले आहे. 

एखाद्या पक्षात गेल्यावर, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावरही हे त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहते. पक्षाच्या भूमिकेविरोधातल्या भूमिकेचा प्रचार करणारा कलावंत आपल्या पक्षात ठेवायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच पक्षालाही आहे.

कलावंत म्हणून एखादी भूमिका करणे म्हणजे त्या भूमिकेचे असणे नव्हे, ही बाब अमोल कोल्हे व शरद पवार दोघेही मानतात. मात्र त्याचवेळी ही घटना म्हणजे फिल्म कोल्हे पक्षात येण्याच्या आधीची आहे, असेही कोल्हे व पवार आवर्जून नमूद करतात. याचा अर्थ, आता अशी भूमिका आल्यास ती कोल्हे करणार नाहीत, असा होतो.

कलावंत म्हणून अशी भूमिका करण्याचे स्वातंत्र्य पक्षात आल्यावरही का असू नये? याचे उत्तर हे दोघेही देत नाहीत. म्हणजेच जी भूमिका कोल्हेंनी केली आहे, तिच्यातून ज्या विचारांचा प्रचार जनतेत होतो, ती त्यांच्या पक्षाला अडचणीची आहे.

अशावेळी अमोल कोल्हे यांचे निवेदन खालीलप्रमाणे असायला हवे :

'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसताना Why I killed Gandhi या फिल्म मध्ये नथुराम गोडसेची भूमिका मी केली. तो माझा भूतकाळ आहे. आता अशी भूमिका मी करणार नाही. या फिल्ममधून तसेच माझ्या भूमिकेतून जो संदेश जातो, तो अत्यंत गैर आहे. राष्ट्रविघातक आहे. स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळीतून उत्क्रांत झालेल्या मूल्यांना - Idea of India ला उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तींचा प्रतिनिधी म्हणून नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली, असे माझे स्पष्ट मत आहे.'

कलावंत म्हणून सहमत असण्या-नसण्याचा, अफजलखान, रावण यांची भूमिका कलावंतांनी करण्याचा गोलमोल मुद्दा कोल्हे वा पवारांनी मांडू नये. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोल्हे असताना काय असायला हवे ते थेट बोलावे. 

देश ज्या पायावर उभा केला गेला, तो पायाच उखडून टाकण्याच्या आजच्या फॅसिस्ट राजकारणाचा नथुरामचा प्रकट व प्रच्छन्न उदोउदो हा एक कळीचा घटक आहे. हे लक्षात घेता कोल्हेंचा मुद्दा कलावंताचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य एवढ्यापुरता राहत नाही, हे समजण्याचे 'जाणतेपण' राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही असे कोण म्हणेल?

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com


Tuesday, January 4, 2022

हर हर मोदी (?)


गेल्या महिन्यात (मोदींनी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे उद्घाटन केले त्या आधी पंधरा दिवस) आम्ही आठवडाभर वाराणसीत होतो. देशपातळीवरच्या एका प्रशिक्षण शिबिरात संविधानाच्या विविध पैलूंबाबत बोलण्यासाठी आम्हाला निमंत्रित केले गेले होते. गंगेच्या काठावर अत्यंत रम्य व शांत अशा जे कृष्णमूर्ती फाऊंडेशनध्ये आमचा निवास व प्रशिक्षण स्थळ होते. हा परिसर राजघाट. तिथून पुढे विविध घाट रांगेत आहेत. दिवसभर सत्रे असत. मात्र सकाळी व सायंकाळनंतर रात्री उशीरापर्यंत आम्ही फिरु शकत होतो.

देवदिवाळी (त्रिपुरी/कार्तिक पौर्णिमा) हा इथला मोठा उत्सव. देशभरच्या भाविकांची मोठी गर्दी असते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. गंगेच्या काठावर त्यांनी लावलेल्या पणत्यांची (दीपदान) दुसरी गंगा वाहत असते. आरास, आतषबाजी नेत्र दीपवून टाकत असतात. हा सर्व भव्य, विलोभनीय देखावा आम्हाला नावेतून हिंडत पाहता आला. त्यानंतर एके दिवशी अस्सी घाटावरची गंगा आरती, अंत्यविधी होणारा मणिकर्णिका घाट तसेच अन्य बरेच घाट, काशी विश्वनाथाचे मंदिर व त्याचा पूर्ण होत आलेला कॉरिडॉर, त्यात घेरलेली मशीद (‘काशी मथुरा बाकी है’ मधली), घाटाकडे जाणाऱ्या तसेच बनारसच्या अन्य भागातल्या गल्ल्या, अशाच एका गल्लीतली संत कबीर यांची मूळ गादी (म्हणजे घर), बुद्धाचे पहिले प्रवचन (धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ते प्रसिद्ध आहे) जिथे झाले ते बनारसपासून जवळच असलेले सारनाथ, तेथील सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप तसेच विहारांचे अवशेष, भारताने राजमुद्रा म्हणून स्वीकारलेला चार सिंह असलेला प्रसिद्ध अशोक स्तंभ...असे बरेच काही पाहता आले. बनारसची कचोरी, वेगवेगळ्या मिठाया, दूध यांचा आस्वाद घेता आला.

कोणत्या परिसरात, वातावरणात आम्ही लोकांशी बोलत होतो, त्याचा हा कॅनव्हास. तो अर्थातच मर्यादित आहे. जे बोललो, निरीक्षणे केली, अंदाज बांधले त्याचे सर्वसाधारणीकरण करणे योग्य होणार नाही, हे उघडच आहे. मात्र पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेले, प्राचीन व आजही महत्वाचे असलेले उत्तर प्रदेशातील हे शहर काय विचार करते, हा संदर्भही दुर्लक्षून चालणार नाही.

कोरोनाने थैमान घातलेला, सामान्य तसेच पद्मश्री-पद्मभूषण उपाध्या मिळालेली माणसे त्यात गमावलेला हा भाग आता बिनमास्कचा आहे. आपण मास्क लावला तर लोक काय म्हणतील, असे वाटावे अशी स्थिती. ४० वर्षांपूर्वी बिहारमधून इथे आलेल्या एका रापलेल्या चेहऱ्याच्या, बहुधा दलित किंवा तत्सम अतिपिछड्या वर्गातील रिक्शावाल्याशी झालेला हा संवाद :

“कोरोनाने आपके रोजगार को चौपट किया होगा ना?”

“हां साब. उस वक्त बहुत परेशानी हुई. पर अब ठीक है.”

“नोटबंदी की वजह से आपको बहुत तकलिफ हुई होगी?”

“हां. वैसे तो हुई. पर दीवार में चुनवा गयी नोटे मोदीजी ने बाहर निकलवायी. कितना काला पैसा था! सब बाहर आ गया.”

“फिर भी महंगाई कितनी बढ़ गयी है...”

“वो तो होगी ही ना! इतना कुछ मोदी जनता के लिए कर रहे हैं. वो कहां से पैसा लाएंगे? कुछ अच्छा करना है, तो खर्चा लगेगाही. महंगाई तो बढ़ेगीही. ”

“क्या किया मोदीजीने?”

“आप ये देख नहीं रहे हो? ...ये नये रास्ते मोदी आने के बाद हुए है. घाट, मंदिरों की मरम्मत उन्होनेही करवाई. ये जगह इतनी साफसुथरी पहले कभी भी नहीं थी.”

पुढचा संवाद एका दुसऱ्या रिक्शावाल्याशीच. पण हा रिक्शावाला शिबिरार्थींच्या व्यवस्थेत असलेला. सद्भावना असलेला. संवेदनशील. त्याला हे प्रशिक्षणाचे काम भावले होते. ही मंडळी खूप चांगले काम करतात. त्याला मदत म्हणून नेहमीच्या दरांपेक्षा कमी दरात व बोलावू तेव्हा तो उपलब्ध राहत असे. हा ओबीसी किंवा मध्यम जातीतला असावा. मूळचा बनारसचा. मात्र भूमिहिन. रिक्शा हेच उत्पन्नाचे साधन.

महागाई, नोटबंदी, कोरोना, रस्ते यावरची त्याची मते आधीच्या रिक्शावाल्यासारखीच. काहीही फरक नाही. दोघे एकमेकांशी ठरवून बोलल्यासारखे. त्यामुळे संवादातले वेगळे मुद्दे इथे पाहू.

“कल हमने काशी विश्वनाथ का कॉरिडॉर देखा. आजकी स्थिती में इतना खर्च करने की जरुरत क्या थी?”

“यहां के पहलेवाले हालात नहीं देखे हैं आपने. कितनी गंदगी, अव्यवस्था थी यहां! ये जगह सिर्फ बनारसवालों की नही है. पुरे देश के हिंदुओं का यह अभिमान है. अब तक किसी सरकार ने यह काम नही किया जो मोदीजी ने कर दिखाया है. ...उनके लिए (म्हणजे मुसलमान) तो अनेक देश हैं, हमारे लिए तो यही एक है.”

“भय्या, आपके पड़ोसवाले मुसलमान यहीं पैदा हुये, यहीं मरेंगे. कौन जानेवाला है दूसरे देश. यह हम सब का देश है.”

“हां. वो तो सही है.”

मग मी काशी विश्वनाथ मंदिराजवळच्या मशिदीचा विषय काढला.

“हमने कल देखा, वो मस्जिद तो पुरी घिरी हुई है. क्या अब भी यह मसला है?”

“देखो साब. आपकेही घर में घुस कर आपकी दीवारे कोई तोड़ता है, तो आप क्या करोगे?”

(औरंगजेबाने मंदिर तोडून तिथे मशीद बांधली हा आक्षेप.)

“इतिहास में जो कुछ हुआ, वो सच है या झूठ, जो भी हो, उसकी वजह से आज का माहोल क्यों बिगाड़ना? और अभी तो १५ अगस्त १९४७ में ऐसी विवादित वास्तुओं की जो स्थिती थी, वोही बरकरार रहे, ऐसा तय हुआ है.”

“वो तो ठीक है. पर लोगों के मन में तो यह बात रहेगी ही ना!”

मी दुसरा मुद्दा काढला.

“यह जो लव्ह जिहाद के नाम से, गोहत्या का कारण बताकर जो मुसलमानों के साथ हिंसा होती है, उसका क्या करे?”

तो थोडा थांबला. म्हणाला, “वो ठीक नहीं है. लेकिन दो तरफा कारण होते है.”

यावर त्याला अधिक बोलायचे नव्हते. आमचा रिक्शाचा प्रवास सुरु होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, “गांधीजीने एक बात ठीक नही की.”

माझी उत्सुकता ताणली. विचारले, “कौनसी?”

तो उत्तरला, “बटवारे के समय उन सबको (म्हणजे मुसलमान) यहां से पाकिस्तान भेजना चाहिए था. यह झगड़े की जड़ ही नही रहती.”

हे ऐकून मी सर्द झालो. हा माणूस काही कडव्या, अंगावर येऊन बोलणाऱ्या ‘भक्तगणा’तला नव्हता. त्याचा हिंदूंवरही राग होता. वेगळ्या कारणासाठी. मात्र संदर्भ याच रांगेतला. तो म्हणाला, “उनके (म्हणजे मुसलमान. त्याने एकदाही थेट मुसलमान म्हटले नाही.) वोट एक तरफा गिरते है. और हमारे वोट बंट जाते हैं.” हा सर्वसामान्य हिंदू त्याची व्यथा, खंत मोकळेपणाने मांडत होता.

ज्या अनेकांशी बोललो, त्यातले हे दोन प्रातिनिधिक. एकच माणूस मोदींच्या विरोधात बोलणारा मिळाला. पण तो अखिलेश यादवच्या समाजवादी पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होता. एका यादव नावाच्या तरुणाला त्याचे यादव नाव लक्षात घेऊन सपाबद्दल (म्हणजे समाजवादी पार्टी) विचारले, तर तो म्हणाला, “यह दंगे भड़काने वाली पार्टी है.”

आमच्या शिबिरात शिबिरार्थींच्या विविध जिल्ह्यातील अनुभव कथनाचे एक सत्र होते. हे शिबिरार्थी वाराणसीच्या सभोवतालच्या चार जिल्ह्यांत चार गट करुन गेले होते. वेगवेगळ्या थरातल्या लोकांशी भेटणे, अनौपचारिक गप्पा मारणे, त्यायोगे तिथली सामाजिक-राजकीय स्थिती, दृष्टिकोन समजून घेणे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या वृत्तांत कथनात आमच्या या अनुभवाला दुजोराच मिळाला. लोकांना महागाई, करोना, नोटबंदी याचे फार काही वाटत नव्हते. नोटबंदीचे तर समर्थनच होते. वरच्या समजल्या जाणाऱ्या जातींत तर मोदींना पाठिंबा होताच. पण खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींतही मोदींबद्दल आस्था होती. हा माणूस संसार-परिवारवाला नाही. तो चोरी-लबाडी किंवा भ्रष्टाचार कोणासाठी करेल, हा त्यांचा प्रश्न होता.

हे सगळे ऐकताना योगी आदित्यनाथनी काय केले, ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हा मुद्दाच कोणाच्या लेखी नव्हता. उत्तर प्रदेशचे पालक मोदीच आहेत, ही भावना होती. “बनारसची माणसे मुंबईला नोकरीला का येतात? इथे उद्योग-कंपन्या मोदींनी का सुरु केल्या नाहीत?” असा एकाला प्रश्न केला त्यावेळी त्याचे उत्तर होते – “उसका कारण यहां के बाहुबली. कोई कंपनी अगर यहां आयी तो ये बाहुबली उसको सताते है. कंपनीवाले क्यों रुकेंगे यहां?” म्हणजे दोष मोदींचा नाही. मोदींची इच्छा आहे, प्रयत्न आहेत. पण ते सफल होऊ न देणारे अन्य कोणी आहेत.

मोदींनी काशी कॉरिडॉरच्या उद्घाटकीय भाषणात धर्माबरोबरच ऑप्टिकल फायबरचे जाळे आम्ही कसे विणत आहोत हा विकासाचा शंखही फुंकला. पण त्याहून वेगळ्या कारणासाठी हे लोक मोदींना मानतात. ते कारण आहे, हा माणूस आम्हा हिंदूंच्या अस्मितेचा-स्वत्वाचा रक्षक आहे. तो जे काही करतो आहे, त्यात यश येईल, अपयश येईल; पण तो खराखुरा आमचा माणूस आहे. काशी कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी दिवसातून त्याने किती वेळा कपडे बदलले, ते किती महागडे होते, ५५ कॅमेरे कशी त्यांची छबी टिपत होते, तिजोरीत खडखडाट होत चाललेला असताना किती कोटी खर्च या कार्यक्रमावर झाला...ही सगळी टीका ‘आमचा माणूस’, ‘हिंदूंच्या स्वत्वाचा रक्षक’ प्रतिमेच्या तुलनेत फिकी पडते. गल्ल्यांचे पुरातनत्व, मंदिरांचे प्राचीनत्व कॉरिडॉरच्या बांधकामात चिणले गेले हे खरे. पण संबंधितांना भरभक्कम नुकसान भरपाई दिली गेली. (मोदींच्या जवळच्या भांडवलदारांनी यात मोठी साथ केली, त्यात वावगे काय? ) या गल्ल्यांतून म्हाताऱ्या माणसांनी, इतर काही कारणांनी ज्यांना चालणे कठीण जाते अशांनी घाटावर येणे, गंगेत स्नान करुन मग काशी विश्वनाथाचे दर्शन घेणे हे खूप जिकीरीचे होते. आता गंगेत स्नान करुन थेट बाबा विश्वनाथाला भेटता येते. ही बाब किती महत्वाची आहे हे ईश्वरपूजेशी, तीर्थस्थळांशी देणेघेणे नसणाऱ्यांना कळणे कठीण आहे. मोदी म्हणतात त्याप्रमाणे परंपरा व आधुनिकता यांचा संगम या कॉरिडॉरमध्ये आहे. त्यात धंदाही आहे. अर्थात, श्रद्धा व धंदा ही जुनीच गोष्ट. मोदींनी त्यास अत्याधुनिक केले. पण लोकांची सोय किती झाली! तीर्थस्थळी येणारे लोक (यातले भिकारी, अतिगरीब वगळू. ते तुलनेत कमी असतात.) सोयींसाठी खर्च करायला तयार असतात. त्यांना बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी जो वेळ लागायचा, जी गैरसोय सहन करावी लागायची, ती आता निश्चित कमी होणार आहे. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले ३००० चौरस फूटांचे मूळ मंदिर आता ५ लाख चौरस फुटाच्या सुसज्ज, भव्य प्रांगणात दिमाखात उभे आहे. (आणि हिंदूंवरील आक्रमणाचे प्रतीक, औरंगजेबाने बांधलेली मशीद बापुडी होऊन कॉरिडॉरच्या भव्य भिंतींच्या मागे कशीबशी टिकून आहे.) ...हे अहिल्याबाईंनंतर मोदींचेच कर्तृत्व!

आम्ही प्रसिद्ध गंगा आरती बघायला अस्सी घाटावर एके संध्याकाळी गेलो. आरतीच्या लांबट आयताकृती मंचावर पूजेच्या वस्तूंची नेटकी मांडणी. आरती करणाऱ्या तरुणांचे आखीव-रेखीव वेश व समलयीतल्या हालचाली. एका सुरात शंख फुंकणे. सगळे प्रभावित करणारे. गंगेतून तसेच घाटावरुन सगळ्यांना या हालचाली दिसाव्यात म्हणून आरती करणारा चमू सर्व दिशांनी फिरणे. आरतीला आलेल्यांसाठी मांडलेल्या खुर्च्या. आरती संपल्यावर मिळणारा प्रसाद. आणि भक्तांनी देणग्या, दान देणे वगैरे. सगळे शिस्तीत. हा रोजचा परिपाठ.

एक शंका होती. हिंदूंच्या आरत्या इतक्या लयबद्ध, एका सुरात सिनेमातच दिसतात किंवा रेकॉर्डवर ऐकू येतात. प्रत्यक्ष होणाऱ्या आरत्या अशा नसतात. पण असेल इथली खास तयारीची परंपरा असे मी समजलो. आरत्यांचे हे मंच एकाचवेळी चार ठिकाणी होते. मी जिथे होतो, तिथे त्याच घाटावर मागे एक हनुमानाचे मंदिर होते. तिथूनही आरतीचा आवाज येत होता. ती आरती या आरतीबरोबर सुरु झाली आणि या आरतीबरोबर संपली. पण या दोन आरत्यांचे मिश्रण रसभंग करत होते. आमच्यातल्या एकांनी आरती संपल्यावर हनुमानाची आरती करणाऱ्यांना (ते चारच लोक होते. देऊळही अगदी लहान होते.) विचारले, “हा काय प्रकार आहे?” त्यावर या हनुमान भक्तांनी गंगा आरतीवाल्यांवर बरेच तोंडसुख घेतले. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे – गंगा आरती ही जुनी परंपरा. पण अलीकडच्या काही वर्षांपासून मोदींनी जपानी पंतप्रधानांना इथे आणल्यापासून त्याचे व्यावसायिकीकरण सुरु झाले आहे. त्यांना दाखवण्यासाठी आरतीचे सुबक, सुंदर नाट्य रचले गेले. तेव्हापासून या रोजच्या आरत्यांची संख्या वाढली आहे. याचे कंत्राटदार आहेत. ते तरुण मुलांना प्रशिक्षण देऊन हा कार्यक्रम सादर करतात. हे कोणी भक्त नाहीत. तो त्यांचा व्यवसाय झाला आहे. त्याचा निषेध म्हणून गंगा आरतीच्या वेळी हे हनुमान भक्त आपली आरती करत असतात. नंतर आम्ही पाहिले. गंगा आरती परफॉर्म करणारी मुले आरती संपल्यावर एका खोलीत गेली. झकपक, किनारीची धोतरे-कुर्ते-उपरणी नाटकातल्या कलाकारांसारखी त्यांनी उतरवली. बाहेर येऊन चहा घेऊन, मुठीत शंकराला वर्ज्य नसणारा पदार्थ चोळत ती निघून गेली. उद्या संध्याकाळी परतण्यासाठी.

(नंतर कळलेला एक मुद्दा - इथल्या पंड्यांचा दावा आहे, काशीच्या घाटांवर आरती करण्याचा अधिकार केवळ आम्हाला आहे. त्यामुळे इतर व्यक्ती, संस्था यांना गंगा आरती करण्यास मनाई करावी म्हणून त्यांनी अशा आरत्यांसमोरच आंदोलने केली. अलिकडे घाटावरच्या या आरतीला येणाऱ्या भाविकांची,पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरतीवाल्यांची कमाईही वाढली आहे. हे भांडण त्या कमाईसाठी आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढला आहे तो असा – गंगा आरतीच्या नावाखाली घाटावर होणारे अतिक्रमण व मनमानी चालणार नाही. एका घाटावर एकाच व्यक्ती किंवा संस्थेला गंगा आरतीच करण्याचा परवाना मिळेल. तो एक वर्षासाठी असेल. त्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असेल.)

...पण यामुळे काय फरक पडतो? हे सर्व पडद्यामागे. लोकांना गंगेच्या विशाल पात्राकाठचा हा सुरेल, झगमगीत परफॉर्मन्स अधिकची आध्यात्मिक किक देत असेल, तर त्याला लोकांनी का म्हणून नावाजू नये?

१३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना गुलामीच्या न्यूनगंडातून देश बाहेर पडत असल्याची द्वाही नरेंद्र मोदींनी फिरवली. या उद्घाटनाच्या निमित्ताने एक महिनाभर भाजप बनारसमध्ये कार्यक्रम करणार आहे. त्यावर अखिलेश यादव यांनी टोमणा मारला- ‘शेवट आला की माणसे काशीला येऊन राहतात.’

...मला प्रश्न पडला, या विधानाचा लोकांवर काय परिणाम होईल?

लोकांशी भेटायचे, बोलायचे, त्यांची मानसिकता समजून घ्यायची हे आमचे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही घाटांवर लोकांशी बोलत, भेटत हिंडत होतो. आमच्या एका सहकाऱ्याला एक माणूस भेटला. तो इथे कशासाठी आला हे विचारल्यावर त्याने थेट उत्तर दिले- “मरायला.” तो आणि त्याची बायको दोघे इथे मरायला आले होते. कारण इथे मेल्यावर मोक्ष मिळतो, ही धारणा. बायको मेली. तिला मोक्ष मिळाला. त्याला आठ वर्षे झाली. तेव्हापासून हा माणूस इथेच आहे. आपल्या मरणाची म्हणजेच मोक्षाची वाट बघत.

इथल्या अंत्यविधीच्या घाटांवर अहोरात्र चिता धडधडत असतात. ‘मसाण’ सिनेमा याच घाटांवर शूट केलेला. हे अंत्यविधी करणाऱ्या डोंब या अस्पृश्य समाजातील शिक्षित युवकाचा होणारा कोंडमारा दर्शवणारा. मणिकर्णिका घाटाची दुरुस्ती पेशव्यांनी केली आहे. त्याची नोंद करणारा दगडी फलक तिथे आहे. त्यावरचा एक उल्लेख असा आहे – ‘मणिकर्णिका घाट पर अनवरत प्रज्ज्वलित चिताओं की अग्नि काशी में मृत्यु में भी एक उत्सव का एहसास कराती है.’ अंत्यविधी करणारे इथले डोंब समाजातले लोक सांगत होते – “इथे दिल्ली, मुंबईहून प्रेते दहनासाठी आणली जातात.” यामागे ही मोक्षाची धारणा आहे. तो मुक्तीचा उत्सव आहे. म्हणूनच बहुधा अन्यत्र स्मशानात दिसतो तसा शोक इथे दिसत नाही.

यामुळेच, अखिलेशच्या टोमण्याचा त्याला अपेक्षित परिणाम पोहोचेल याची मला खात्री वाटत नाही. हे टर उडवणे सर्वसामान्य हिंदूंच्या पचनी पडणे कठीण आहे.

मोदींच्या काशीतील भाषणाआधी राहुल गांधींनी जयपूरच्या भाषणात हिंदू व हिंदुत्वाचा भेद मांडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी हिंदुपणावर दावा करुन मोदींच्या विद्वेषी, खुनशी हिंदुत्वापासून सहिष्णू, समावेशक हिंदूपण वेगळे काढले. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण आताच्या वातावरणात तो कसरत वाटू शकतो. मुस्लिम राजवटी आणि स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचे लांगूलचालन व छद्म धर्मनिरपेक्षता यांचे संगोपन करणारी नेहरु-गांधी घराण्याची सत्ता यांमुळे इथल्या हिंदूचे स्वत्व हरपले होते, तो गुलामीच्या न्यूनगंडात जखडला गेला होता. त्याचे स्वत्व जागवून त्याला गुलामीच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्याची दमदार ऐतिहासिक कामगिरी मोदींनी केली, ही त्यांची प्रतिमा घट्ट होते आहे. अशावेळी मोदींच्या हिंदुत्वापासून अलग होऊन राहुल गांधींचे सर्वसमावेशी हिंदूपण स्वीकारायला आजच्या घडीला किती लोक पुढे येतील, ही शंकाच आहे.

राहुल गांधींना आपले म्हणणे, कथ्य (narrative) गंभीरपणे विकसित करावे लागेल. आपल्या राजकारणाची आधारशिळा नक्की करावी लागेल. अन्यथा ते प्रासंगिक विचारांचे सपकारे ठरतील. त्यातून समग्र चित्र तयार होणार नाही. गांधींजी सर्वधर्मसमभावी सनातनी हिंदू होते. त्याचवेळी या देशावर बहुसंख्याक धर्मीयांचा नव्हे, तर भारतातील सर्वांचा समान अधिकार असेल, यावर ते अढळ होते. (म्हणूनच तर हे मंजूर नसणाऱ्यांनी त्यांची हत्या केली.) मी गाईला पवित्र मानतो. लोकांनी स्वतःला पटून तिची हत्या थांबवायला हवी. मात्र ते आज इतरांचे खाद्य असल्याने गोवंश हत्याबंदी कायद्याला त्यांचा पाठिंबा नव्हता. नेहरु ईश्वरवादी नव्हते. मात्र त्यांनी भारतीय संस्कृतीचा शोध घेऊन अनेक विविधतांना सामावणाऱ्या समृद्ध भारतीयत्वाची ओळख जनतेत रुजवली. सेक्युलर शासनाशी हे अजिबात विसंवादी नव्हते. त्यांना कधी या सेक्युलरपणाशी तडजोडही करावी लागली नाही. जिथे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून असे प्रसंग आले, तिथे त्यांनी हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केले. भले ते यशस्वी झाले नसतील. पण त्यांची भूमिका सुसंगत होती. पक्षातल्या लोकांचे तसेच जनतेचे ते त्याबाबत शिक्षण करत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मी प्रथम व अंतिमतः भारतीय आहे’ असे घोषित करुन या भारतीयत्वाच्या ओळखीला धर्म, प्रदेश, जात, भाषा आदि अस्मितांनी छेद जाता कामा नये, हे बजावले. आपल्या भारतीयत्वाच्या ओळखीला व तिच्या व्यवहाराला आधार देणारे, मार्गदर्शन करणारे संविधान रचले. त्याद्वारे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची हमी दिली. गांधी, नेहरु, आंबेडकर यांच्या या भूमिकांनी जी फळी तयार होते, तिच्यावर राहुल गांधींनी भक्कम पाय रोवून आपला विचार विकसित व प्रसारित करायला हवा. हे लांब पल्ल्याचे आहे. पण तेच करावे लागेल. यास शॉर्टकट नाही.

सेक्युलर, पुरोगामी म्हणवणाऱ्या शक्तींचे शॉर्टकट, बेसावधपणा आणि धिम्या गतीने, पण चिवटपणाने गेली ९७ वर्षे संघ परिवाराने केलेले काम यांमुळे मोदी आजची मुसंडी मारु शकले आहेत. बहुसंख्य हिंदू ज्या देशात आहेत, ते हिंदूंचे राज्य असण्यात गैर काय? इतर धर्माच्या लोकांना आम्ही काही त्रास देत नाही. त्यांनीही गुण्यागोविंदाने (पण हिंदू प्रमुख आहेत याचे भान) ठेवून नांदावे, ही भावना सर्वसामान्य हिंदूंत खोलवर गेली आहे. हे हिंदू स्थानिक हिशेबानुसार मत कोणत्याही पक्षाला देत असोत. त्याने या भावनेत फरक पडत नाही. आपल्या देशाच्या सेक्युलरपणाला हे मोठे आव्हान तयार झाले आहे. विविध जुळण्या, फेरजुळण्या, आर्थिक असंतोष, हिंदीवरुन तीव्रता असणारा दक्षिण-उत्तर भेद आदिंची नीट मोट बांधली गेल्यास मोदी, भाजप कदाचित निवडणुकांत हरतीलही. पण हे आव्हान त्यामुळे संपत नाही. दुःखाचे, कष्टाचे हरण करणारा या अर्थाने ‘हर हर महादेव’ हा घोष काशीच्या घाटांवर दुमदुमत असतो. मोदींनीही तो आपल्या काशीतील भाषणावेळी वारंवार दिला. काही एका प्रमाणात हिंदू मानसिकतेत ‘हर हर मोदी’ होऊ लागले आहे. ते रोखले गेलेच पाहिजे.

हे आव्हान पेलण्याचा समग्र कार्यक्रम विकसित करावा लागेल. तोवर वा त्या दिशेने जाताना आध्यात्मिकतेचा, हिंदू तसेच सर्व संप्रदायांतील पुढे जाणाऱ्या परंपरांचा आब राखत, त्यांत संवाद घडवत, या परंपरांतील घातक बाबींना समान रीतीने विरोध करत भारतीयत्वाचा जागर मांडणे आपल्याला शक्य आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मुक्त संवाद, जानेवारी २०२२)