Friday, December 15, 2017

धर्म, श्रध्दा व मानवाचे उन्नयन


हातात मोबाईल, खांद्याला उंची पर्स; मात्र पायात चपला नाहीत. हे दृश्य रस्त्यात, स्टेशनवर जागोजाग या नवरात्रात आपण पाहिलं आहे. दरवर्षीच पाहतो हे. पूर्वी हातात मोबाईल नसायचे, कमरेत जीन्स नसायची. साडी, सलवार-कुर्ता असायचा. साधने, वेष बदलला. त्यात अधिक प्रगती, आधुनिकता आली. पण मनावरचा रुढींचा प्रभाव जुनाच राहिला. जीवनाला वेग आला. त्या वेगाशी जुळवताना आधुनिक साधनांचा वापर वाढला. त्यात प्रत्यक्ष पूजेला बसण्याचा वेळ वाचवण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने पूजा सांगण्याचेही प्रकार लोक अवलंबतात, असे ऐकले आहे. एवढंच कशाला, कुठेतरी एक अनुभव वाचला होता. एका म्हातारीचा अंत्यविधी सुरु होता. भटाचे विधी चालले होते. त्याच्यासमोर लॅपटॉप होता. त्या लॅपटॉपवर स्काईपवर म्हातारीचा अमेरिकेतला मुलगा होता. हातातल्या महत्वाच्या एंगेजमेंटस सोडून तातडीने - तेही हजारो किलोमीटरवरुन - आईच्या अंत्यविधीला वेळेवर पोहोचणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो या मार्गाने सहभागी झाला. भटालाही काही प्रॉब्लेम नव्हता. भट भारी लवचिक असतात. अलिकडे भटही यजमानाच्या अपेक्षेप्रमाणे तासाची, मिनिटांची पूजा सांगतात. सगळी पॅकेजेस त्यांच्याकडे उपलब्ध असतात. दक्षिणेत तडजोड नसली म्हणजे झाले.

कोणी म्हणेल ही धर्माची चेष्टा आहे. कोणी म्हणेल हे आधुनिक जगाबरोबर बदलणे आहे. दोन्ही असू शकते. पण यात धर्माचा एक भाग विसरला जातो, जो अनेक थोर संतांनी सतत प्रतिपादला आहे. तो म्हणजे, ईशशक्ती चराचरात व्यापलेली आहे. तिचे स्मरण, तिच्याशी तादात्म्यता साधणे हाच धर्म आहे. त्या शक्तीशी काही मागायचे नसते. अनवाणी राहून वा अन्य एखादे व्रत करुन भौतिक जगातील समृध्दीची कामना करायचा सौदा करायचा नसतो. उलट परमशक्तीला समर्पित व्हायचे असते.

इथेच श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्या सीमारेषा ठळक होतात. हा सौदा व त्याप्रीत्यर्थ करावयाचे कर्मकांड ही अंधश्रध्दा आहे. एखादा निर्मिक कल्पून त्याच्याप्रती समर्पित होणे ही श्रध्दा आहे. अंधश्रध्दा असो वा श्रध्दा दोहोंना विज्ञानाचा, तर्काचा पाठिंबा नाही. देव, निर्मिक यांचे अस्तित्व किंवा त्याची कृपा विज्ञानाने सिध्द होत नाही. म्हणून काही जण निरीश्वरवादी, नास्तिक असतात. त्यांना अशी श्रध्दा बाळगणे, देवापुढे हात जोडणे हेही मंजूर नसते. काहीजण ईश्वर असेल वा नसेल, आज त्याची प्रचिती येत नाही, जीवन वा सृष्टीच्या घडामोडींत त्याचे अस्तित्व दिसत नाही, सबब त्याची चर्चा करण्यात वेळ घालवणे हेच निरर्थक आहे, असे मानतात. या गटातल्यांना अज्ञेयवादी म्हणतात.

संत तुकाराम, महात्मा फुले, गाडगेमहाराज ही निर्मिकाला मानणारी, त्याच्या प्रति श्रध्दा बाळगणारी पण अंधश्रध्देवर तुटून पडणारी मंडळी. त्यांची सश्रध्दता वैज्ञानिकतेत भले बसत नसेल पण मनुष्यजातीला पुढे नेणारी आहे. नाशिकला गोदावरीत उभे राहून स्वर्गवासी पितरांना ओंजळीत पाणी घेऊन अर्घ्य देणाऱ्यांच्या शेजारी गाडगेबाबा उभे राहतात. स्वत:ही तसेच खापरात पाणी भरुन ओतत राहतात. अर्ध्य देणाऱ्या शेजारच्या इसमाला त्यांची ही कृती चमत्कारिक वाटून 'तुम्ही हे काय करत आहात?' असे तो विचारतो. गाडगेबाबा उत्तर देतात, 'माझ्या अमरावतीच्या शेताला पाणी घालतो आहे.' प्रश्नकर्ता हसू लागतो. 'हा काय वेडपटपणा! शेकडो किलोमीटरवरच्या शेताला असे कसे पाणी पोहोचेल?' उत्तरादाखल गाडगेबाबांचा प्रतिप्रश्न असतो, 'अमरावतीपेक्षा दूर असलेल्या स्वर्गातील पितरांना जर तुमचे हे अर्ध्य पोहोचते तर माझ्या शेताला का नाही पोहोचणार?'

'गोपाळा गोपाळा-देवकीनंदन गोपाळा' असे कीर्तन करत गाडगेबाबा माणसांना माणूसपणाच्या धरतीवर उतरवण्यासाठी आयुष्यभर झटले. महात्मा फुले निर्मिकाला मानूनही कर्मकांड पसरविणाऱ्या, सत्यनारायणासारखा स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठीचा विधी प्रचारणाऱ्या ब्राह्मणांचे कसब उघडे करण्याचा सत्यशोधकी जागर करत राहिले. तथागत बुध्द अज्ञेयवादी. ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेत पडत नाहीत. जन्म व मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यानचे माणसाचे जीवन सुखी कसे होईल हे त्यांचे लक्ष्य होते. त्यामुळे बौध्द धर्मात ईश्वराच्या जागी त्यांनी 'नीती'ची प्रस्थापना केली. डॉ.आंबेडकर 'बुध्द आणि त्याचा धम्म' या आपल्या ग्रंथात म्हणतात, 'माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.'

गांधीजी हे देखील तुकाराम, फुले, गाडगेबाबा यांच्या पंक्तीत बसतात. मात्र गांधीजी धर्माचा स्वत:चा अर्थ लावतात व तो समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात. 'ज्या धर्मात अस्पृश्यता आहे तो हिंदुधर्म माझा नाही' हे, अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजाला स्वत:ला हिंदू म्हणवून घेत ते सांगतात. ते कधीही कुठल्याही देवळात गेलेले नाहीत. त्यांच्या हस्ते एकाच देवळाचे उद्घाटन झाले ते भारतमातेच्या आणि त्यातही भारतमातेची मूर्तीही नाही. काशीविश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कस्तुरबा आणि महादेवभाईंना ते, 'तिथे दर्शन घेण्याऐवजी तुम्ही सत्याग्रह करून मेला असतात तर मला आनंद झाला असता' म्हणून फटकारतात. 'मी सनातनी हिंदू आहे' असे ते म्हणतात तेव्हा धर्माचे शुद्ध स्वरुप त्यांना अपेक्षित असते, कर्मकांडांनी भ्रष्ट झालेले नव्हे.

आपण पाहिले हे लोक श्रध्दावान, धार्मिक आहेत. त्यांचा समाजाला पुढे न्यायला खूप उपयोग झाला आहे. त्यांची धार्मिकता मनुष्यजातीला पोषकच ठरली आहे. त्यामुळे मुळात धार्मिकताच वाईट असे म्हणता येत नाही. निरीश्वरवाद हा विज्ञानवाद आहे. त्याचेही स्वागतच असायला हवे. या विचारांची मंडळी धर्म मानत नसतील, तरी हरकत नाही. पण ते जर सर्वसामान्यांच्या श्रध्दांवर, धर्मावर केवळ कर्कश्य कोरडेच ओढत राहिले, तर त्यातून काही साध्य होत नाही. त्यांना अपेक्षित माणसे बदलत नाहीत. उलट ती तुटतात. हे निरीश्वरवादी माणसाचे माणसाशी असलेले नाते अधिक सुंदर करायला काय करतात, कोणती नीतीतत्वे प्रचारतात हेच त्यांच्या कार्याचे मापदंड राहणार आहेत. ते देवाला मानत नाहीत, हे नीतीमूल्य नाही. ती त्यांची धारणा आहे. धारणा नव्हे, तर नीतीमूल्य व त्याचा प्रसार माणसे बदलतो, हे निरीश्वरवाद्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

अंधश्रध्दांचा तर माणसाचे माणूसपण वाढविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. नऊ दिवस अनवाणी फिरा, उपवास करा, सिध्दिविनायकाला दहा किलोमीटर रांग लावा यातून स्वत:ला माणसे कष्टवतील, त्यातून पुण्यप्राप्तीचे कृतक समाधान मिळवतील एवढेच. दारु प्याल्यावर येणारी आभासी सुखद झिंग व ही कृतक पुण्यप्राप्तीची झिंग एकाच कुळातली. दारुची झिंग सकाळी उतरते तरी. अंधश्रध्देची ही झिंग अशी उतरत नाही. विवेकवादी विचारांची जोपासना हाच त्यावरचा उतारा असतो.

पण ही मंडळी जोवर इतरांना आपल्या अंधश्रध्दांचा त्रास देत नाहीत तोवर त्यांना ती पाळायचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. निरीश्वरवादी, श्रध्दावादी, अज्ञेयवादी व दुसऱ्याला त्रास न देणारे अंधश्रध्दावादी यांना आपल्या आस्था, विचार जपण्याचे, आचरणाचे व प्रचारण्याचे स्वातंत्र्य भारतीय घटनेने दिलेले आहे. तथापि, देशाचा कारभार धार्मिकतेवर चालणार नाही, भौतिकवादच त्याचा पाया राहील.

भारतीय संविधानाने धर्म व त्याची उपासना हा व्यक्तीला दिलेला अधिकार आहे. धर्माला किंवा धर्माच्या ठेकेदारांना स्वातंत्र्य दिलेले नाही. म्हणूनच मशिदीवरचे भोंगे असोत की दहीहंडीची उंची असो, यावर नागरिकांच्या वैयक्तिक वा सार्वजनिक हितासाठी सरकार बंधन आणू शकते. मुस्लिम किंवा हिंदू धर्माचे मुखंड सरकार आमच्या धर्मात ढवळाढवळ करत आहे, असे म्हणू शकत नाही. शनि-शिंगणापूर असो की हाजीअली दर्गा, जिथे-जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे-तिथे महिलांना प्रवेश द्यावाच लागेल असा आदेश म्हणूनच न्यायालय देते. न्यायालयाच्या या आदेशाला न मानणे, आमच्या धार्मिक बाबी आम्हीच ठरवणार तसेच आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ व त्याचाच स्वीकार सर्वांनी करायला हवा यासाठी हट्टाग्रही राहून भल्याबुऱ्या मार्गांचा, हिंसेचा, दहशतीचा वापर करणे याला धर्मांधता असे म्हणतात. धार्मिकता व धर्मांधता यात मूलभूत फरक आहे. धर्मांधता माणसाचे माणसाशी असलेले नाते समृध्द करत नाहीच. उलट ते नासवते. वैरभावी करते. धार्मिकता अशी नकारात्मक नसते. ती हे नाते वृध्दिंगत करु शकते. किमान नासवत तरी नाही.

धर्मांधता ही धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीतून येते. तथापि, धर्माचा वापर आपल्या राजकीय वा अन्य सत्ता-स्वार्थासाठी करणे हा निराळा प्रकार आहे. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना हे वैयक्तिक पातळीवर अजिबात धार्मिक नव्हते. इस्लामला मंजूर नसलेल्या अनेक गोष्टी व्यक्तिगत पातळीवर ते करत. तथापि, सत्ताकारणासाठी त्यांनी इस्लामी भावनेला भडकावले. धर्म हा राष्ट्राचा पाया मानला. हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, हा त्यांनी सिध्दांत मांडला. हाच सिध्दांत सावरकरांनीही मांडला. मुस्लिम व हिंदू या धर्मांतल्या कट्टरतावादाचा हा धर्मबाह्य राजकारणाचा, सत्ताकारणाचा आयाम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या धार्मिक कट्टरतावादाचा धर्माशी काहीही संबंध नाही. लालकृष्ण अडवाणींनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली व पुढे बाबरी मशीद कोसळवल्यानंतर जी हिंदू-मुस्लिम दंगल झाली, जी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या प्रक्षोभक उद्गारांनी अधिकच भडकवली या मागे केवळ आणि केवळ सत्तेचे राजकारण होते. गोध्रा येथील ट्रेनमधला व त्यानंतरचा तसेच अलिकडे मुजफ्फरनगर असो की दादरी असो, या सर्व ठिकाणचा हिंसाचार याचा पाया धर्म नसून सत्ताकारण आहे. पाकिस्तानशी होणाऱ्या संघर्षाला किंवा काश्मीरमधील उद्रेकांना दोन्ही देशांतील हितसंबंधी धर्माची फोडणी द्यायचा प्रयत्न म्हणूनच करत असतात.

धर्मांधांपासून तसेच सत्तेसाठी धर्माला वापरणाऱ्या या चलाखांपासून लोकांना सतत सावध करत राहावे लागेल. तथापि, एक लक्षात घ्यायला हवे. भौतिक प्रगतीबरोबर माणसे आपोआप प्रगत होत नाहीत. त्यासाठी मनांची मशागत समांतरपणे करत राहावी लागते.या मशागतीचा एक भाग धर्म, धार्मिकता, श्रध्दा, अंधश्रध्दा, अज्ञेयवाद, निरीश्वरवाद व संविधानाचा त्यांच्याप्रतीचा दृष्टिकोन यांच्या स्पष्टतेचे प्रबोधन हा असेल.

- सुरेश सावंत, 

No comments: