Thursday, April 5, 2018

असा घडला ‘समता मार्च’


रायगड-पाचाड-महाड (शिवराय ते भीमराय) या १९ मार्चच्या समता मार्चचे फोटो व त्याचे वर्णन, सहभागींच्या प्रतिक्रिया फेसबुक-व्हॉट्सअप मार्फत हा लेख छापून येईपर्यंत आपल्यातल्या अनेकांपर्यंत पोहोचल्या असतील. या लेखाद्वारे आपल्याला ठाऊक असलेल्या तपशीलाची पुनरुक्ती न करता या मार्चच्या जुळवाजुळवीतील काही वैशिष्ट्ये, संदर्भ तसेच त्याच्या यशस्वीतेबाबतचे माझे आकलन मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

ज्या निमित्ताने हा समता मार्च होता त्याविषयी आधी थोडेसे. 

२० मार्च हा चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केल्याचा दिवस. १९२७ च्या १९-२० मार्चला सत्याग्रह परिषद भरली. महत्वाचे ठराव १९ मार्चला झाले. प्रत्यक्ष सत्याग्रह २० मार्चला झाला. ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत अधिकारासाठी आहे’ ही बाबासाहेबांची ललकार साऱ्या देशभर दुमदुमली. केवळ पूर्वास्पृश्यांनाच नव्हे तर मानवी अधिकाराच्या बाजूने संघर्षरत असलेल्या स्पृश्यांनाही यातून अदम्य अशी ऊर्जा मिळाली. महाडपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या, दलित-पीडितांच्या व्यथा मुखर करणाऱ्या, जन्माने सवर्ण असलेल्या प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांनी तर आपल्या एका अंकाच्या मुखपृष्ठावरच बाबासाहेबांचे चित्र छापले. 

या संगरातील सहभागींत अस्पृश्यांची बहुसंख्या असली तरी तो केवळ त्यांनीच संघटित केलेला नव्हता. रामचंद्र बाबाजी मोरेंसारखे तेजस्वी अस्पृश्य तरुण जसे या सत्याग्रहाच्या आघाडीवर होते, तसेच त्यांचे सहकारी असलेले सुरबानाना टिपणीस, अनंत चित्रे, सहस्रबुद्धे आदि अनेक सवर्ण कार्यकर्त्यांचा यात बरोबरीचा पुढाकार होता. स्वतःच्या समाजाच्या विरोधात जाऊन, प्रसंगी त्यांचा बहिष्कार सोसून ही मंडळी बाबासाहेबांना जिवाभावाने साथ देत होती. १९२३ साली सी. के. बोले यांनी मुंबई विधिमंडळात सार्वजनिक पाणवठे सर्व जाति-धर्मासाठी खुले राहतील असा कायदा करवून घेतला होता. १९२४ ला सुरबानाना टिपणीस महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते. आजोबांपासून सुधारकांची परंपरा असलेल्या सुरबानानांनी या कायद्याप्रमाणे महाडमधील चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले करावे असा ठराव महाड नगरपरिषदेत संमत केला. या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. 

या सत्याग्रहाच्या स्मृतिदिनी २० मार्चला मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता इथे जमत असते. समग्र उत्थानाची भाषा बोलत असले तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात तरी आंबेडकरी चळवळीला एकजातीय वळण मिळाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यातही फाटाफूट. त्यामुळे महाडला भक्तिभावाने येणाऱ्या आंबेडकरी जनतेला या एकाच दिवशी, एकाच वेळी अनेक सभांचा सामना करावा लागतो. एकमेकांत मिसळणाऱ्या लाऊड स्पीकर्सच्या कर्कश्यतेत कोणतीच सभा नीट ऐकता येत नाही. (मुंबईला ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर असते तसेच हे.) गटा-तटांच्या बॅनर्सचा भडिमार तर शहर विद्रूप करणारा. महाडात बाबासाहेबांचे करोडो रुपयांचे राष्ट्रीय स्मारक शासनाने बांधलेले आहे. अजूनही काही वास्तू बाबासाहेबांच्या तसेच माता रमाईंच्या नावे या परिसरात आहेत. क्रांतिभूमीतल्या या वास्तूंत काही किरकोळ कार्यक्रम वगळता फारसे काही घडत नाही. काही तर नुसत्या पडून आहेत. 

या स्थितीने अस्वस्थ झालेल्या महाडच्या काही तरुणांनी एकत्र येऊन यात बदल करण्याचा चंग बांधला. ते क्रांतिभूमी युवा प्रतिष्ठान नावाने संघटित झाले. अनेक उपक्रम करु लागले. त्यातील एक होता फाटाफुटीचे ओंगळ चित्र पुसून २० मार्चला सर्वांचा एकच एक मंच लागावा हा. त्यांनी त्याला नाव दिलेः ‘एक विचार-एक मंच’. त्यासाठीच्या भेटीगाठी त्यांनी सुरु केल्या. 

महाडच्या या तरुणांच्यातील एक प्रमुख संघटक नागेश जाधव मुंबईतील आमचे सहकारी आहेत. ते दोन्हीकडे क्रियाशील आहेत. त्यांच्याकडून महाडमधील या प्रयत्नांची माहिती आम्हाला नियमित मिळत होती. त्यांना सहकार्य राहील असेही आम्ही सांगितले होते. संविधान संवर्धन समितीच्या आमच्या एका बैठकीत महाडमधील अजून काही मंडळी आली व त्यांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले. वास्तविक, ‘एक विचार-एक मंच’बद्दल आमच्यातल्या काहींनी शंकाही उपस्थित केल्या. हा रिपब्लिकन ऐक्याच्या प्रयोगासारखा प्रकार आहे व तो यशस्वी होणे कठीण आहे. शिवाय भाजपला मिळालेल्या आठवलेंपासून परस्परांशी न जमणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर, कवाडे आदि सगळ्यांची मोट बांधण्यात ‘एक विचार’ काय आहे, हे आम्हाला कळत नाही. केवळ जातीच्या ऐक्याचेच प्रयत्न त्यातून प्रतीत होतात वगैरे. अन्य पुरोगामी मंडळींनाही बोलवावे असे नागेशसारख्या तरुणांचे म्हणणे होते. पण या एक विचार-एक मंच मार्फत ते नीट आकाराला येत नव्हते. 

याच बैठकीत २० मार्चच्या एक विचार-एक मंचच्या स्थानिक तरुणांच्या लोकशाही निर्णयाला धक्का न लावता त्याच्या आधल्या दिवशी १९ मार्चला रायगड ते महाड अशी रॅली काढावी (पुढे त्याला समता मार्च नाव दिले गेले) व त्यात महाराष्ट्रभरच्या पुरोगामी संघटनांना सहभागाची हाक द्यावी अशी कल्पना संजय लोखंडे यांनी मांडली. भीमा-कोरेगावमुळे बौद्ध व सवर्ण (मुख्यतः मराठा) जी दरी तयार झाली, बौद्धांचे जे एकाकीपण वाढले त्यावरचा एक उपाय म्हणूनही बौद्धांसहित परंतु बौद्धेतरांचा सहभाग अधिक असलेला असा एखादा उपक्रम होणे आम्हाला निकडीचे वाटत होते. त्यामुळे संजयची सूचना आम्हाला एकदम पटली. या बैठकीत महाडच्या तरुणांशी विचारविनिमयाने परंतु आम्ही बाहेरची मंडळी या रॅलीच्या-समता मार्चच्या संघटनात विशेष लक्ष घालू असे आश्वासन आम्ही दिले. महाडला तरुणांची बैठक झाली. त्यात रॅलीऐवजी रायगड ते महाड मानवी साखळी करावी अशी कल्पना पुढे आली. तथापि, एवढ्या कमी वेळात तिच्या तयारीतली अव्यावहारिकता लवकरच त्यांच्याही ध्यानात आली व समता मार्चवर मतैक्य झाले. 

मुंबईत गेल्या वर्षी संविधान दिनी २६ नोव्हेंबरला संविधान जागर यात्रा झाली होती. त्यात आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी शक्ती एकवटल्या होत्या. अशा एकजुटीच्या भरघोस यशाचे साक्षीदार व भागिदार असलेल्या काही कार्यकर्ते व संघटनांचा रायगड जिल्ह्यातही मजबूत आधार आहे. उल्का महाजन व त्यांचे सर्वहारा जनआंदोलन रायगड जिल्ह्यात आदिवासी-कष्टकरी-शेतकऱ्यांच्यातले दमदार घटक आहेत, हे सुविदित आहे. प्रमोद निगुडकर, युवराज मोहिते हे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते गोरेगाव (माणगाव) येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे आताचे कर्तेधर्ते आहेत. हे सगळे लोक संविधान जागर यात्रेच्या संयोजनातील-विचारविनिमयातले घटक असल्याने हा समता मार्च त्या यात्रेतील भूमिका पुढे नेण्याची एक संधी आहे याबद्दल एकमतात होते. स्थानिक जमवाजमवीत उल्का महाजन व सर्वहारा जनआंदोलन हा मजबूत आधार असल्याने समता मार्च संख्येच्या व नेतृत्वाच्या पातळीवर दुबळा ठरणार नाही ही खात्री होती. मुंबईत संविधान जागर समिती (संविधान जागर यात्रेच्या संयोजन समितीचे आताचे नाव) च्या बैठकीत समता मार्च संघटित करण्यात आपण जास्तीत जास्त जोर लावायचा असे ठरले. 

पुढे मग माणगावला बैठक झाली. त्यात स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते होते. त्यांच्यातील व मुंबईतील काहींच्या समावेशाने एक संयोजन समिती तयार करण्यात आली. पुण्यात बैठक झाली. समता मार्चच्या विचारविनिमयात आधीपासूनच असलेल्या सुभाष वारेंच्या पुढाकाराने ही बैठक झाली. तिला नाशिकहून अनिता पगारे आल्या होत्या. अशाच काही बैठका वा भेटी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच अन्यत्रही झाल्या. शांताराम पंदेरे, मंगल खिंवसरा, ललित बाबर, अविनाश पाटील, अरुण जाधव, राजन इंदुलकर अशा अनेक पुढारी कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता. या सर्व मंडळींनी आपापल्या भागातून ताकदीनिशी उतरायचे ठरवले. तसे ते उतरलेही. यात मुंबईतलीही अनेक नावे आहेत. ती सगळीच घेणे शक्य नाही. तरीही आता नावांचा उल्लेख करतोच आहे, तर शरद कदम, उमेश कदम, अल्लाउद्दिन शेख, सागर तायडे, अविनाश कदम, शिवराम सुखी, किशोर कांबळे, संजय मं. गो., मोहन सकपाळ ते थेट तरुण कार्यकर्ता दीपक सोनावणेपर्यंत अनेक नावे घेता येतील. आम्ही संविधान संवर्धन समितीतील मंडळी अशी व्यक्तिगत नावे घेण्याचे टाळत असलो तरी आता इतरांची घेत असताना आमच्यातलीही काही घेणे औचित्याला धरुन होईल. शरद शेळके, मुमताज शेख, प्रदीप शिंदे, हिरामण खंडागळे, मोहन सोनावणे, अजित बनसोडे, वैशाली जगताप, कालिदास रोटे, लक्ष्मण साळवे अशा कितीतरी जणांनी समता मार्चच्या जमवाजमवीत तसेच संघटनात मोलाचा सहभाग दिला. हिरामण खंडागळेंनी समता मार्चवर एक गाणेच तयार केले होते. फारसे व्यक्त न होता समन्वयाचे धागे गुंफण्यात यावेळी शरद शेळकेचा वाटा मोठा होता. आमच्यातलेच पण अन्य दोन मोठ्या संस्थांचेही प्रमुख घटक असलेले महेंद्र रोकडे, संजय लोखंडे, राजेश ठोकळे, प्रफुल्ल शिंदे यांचे संसाधनांच्या जुळवाजुळवीतले सहाय्य फार मोलाचे ठरले. त्यामुळे संयोजनासाठीच्या आमच्या हालचाली खूप सुकर झाल्या. संजय तर प्रारंभापासून शेवटपर्यंत आणि आता पाठपुराव्यातही उत्प्रेरकाची भूमिका निभावतो आहे. खुद्द महाड-माणगाव परिसरातील मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस, श्रीप्रकाश अधिकारी, दीपक क्षीरसागर, सतीश शिर्के, चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार, आरिफ करबेळकर, संदेश कुलकर्णी तसेच क्रांतिभूमी युवा प्रतिष्ठानचे तरुण कार्यकर्ते यांच्यावर स्थानिक नियोजनाची मोठी जबाबदारी पडली होती. मधुकर गायकवाड सांगता सभेचे स्वागताध्यक्ष होते. आता नावे थांबवतो. अशी नावे घेणे हे मोठे जिकीरीचे काम. ज्यांची राहिली असतील त्यांनी क्षमा करावी. 

समता मार्चच्या सांगता समारंभाचे वक्ते निवडणे हेही कमी त्रासाचे नव्हते. ते पुरोगामी हवेत पण सम्यकही असावेत. शिवाय असे सम्यक लोक उपलब्धही हवेत. अखेरीस सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख व प्रमुख वक्त्यांत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कर्वे इन्स्टिट्यूट (पुणे) येथे अध्यापन करणाऱ्या सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या प्रा. अंजली मायदेव व सुराज्य सेनेचे संस्थापक सदस्य फारुक अहमद नक्की झाले. बहुतेक वक्ते स्वखर्चाने, दुरुन व कष्टपूर्वक प्रवास करुन आले होते. त्यांची भाषणेही अपेक्षेप्रमाणे संयत व समता मार्चची भूमिका पुढे नेणारी झाली. 

समता मार्च शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पुतळ्याला तसेच समाधीला अभिवादन करुन रायगडावरुन सुरु झाला. वर २५ लोक गेले होते. त्यात लक्ष्मिकांत देशमुखही होते. बाकी सगळ्यांना गडाच्या पायथ्याशी पाचाडला जिजाऊंच्या समाधीजवळ बोलावण्यात आले होते. जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करुन तिथून मुख्य मार्चला प्रारंभ झाला. मध्ये मध्ये स्वागत व नाते-कोळोसेला जेवण व पुढे महाड शहरातून दोन तास पायी मिरवणूक आणि शेवटी चवदार तळ्यावर सांगता झाली. 

स्थानिक तरुणांचे प्रतिनिधी नागेश जाधव यांचे प्रास्ताविक, स्वागताध्यक्ष मधुकर गायकवाड यांचे स्वागतपर भाषण, उल्का महाजन यांची भूमिका मांडणी, तीन वक्ते व अध्यक्ष यांची भाषणे, ठराव व संकल्प हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे झाला. हे सात वक्ते व सूत्रसंचालक युवराज मोहिते अशा आठ जणांव्यतिरिक्त मंचावर कोणीही असणार नाही हे आधी ठरल्याप्रमाणे पाळले गेले. 

दुपारच्या जेवणाची साडेनऊशे पानं उठली. याचा अर्थ समता मार्चमधील लोक हजाराच्या वर नक्की असावेत. बौद्ध अल्पसंख्य व अन्य मंडळी अधिक, झेंडे फक्त तिरंगे हे दृश्य महाडकरांना नवीन होते. एकूण मार्चबद्दल पोलीस, स्थानिक सवर्ण तसेच आंबेडकरी समूहातील मंडळींच्या प्रतिक्रिया सर्वांचीच उमेद वाढवणाऱ्या आहेत. नागेशने महाडच्या तरुणांचे प्रयत्न व भूमिका मांडणारे केलेले सभेतील भाषण बौद्ध समाजातील लब्धप्रतिष्ठित, कोत्या प्रवृत्तींवर कोरडे ओढणारे व व्यापक एकजुटीची दिशा ठळकपणे अधोरेखित करणारे होते. नागेशच्या भाषणावर वक्तेही खूष झाले. अंजली मायदेव तर खूपच प्रभावित झाल्या होत्या. आंबेडकरी चळवळीत असह्य अशा ज्या विकृती तयार झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्याच समूहातील तरुणांकडून तीही महाडच्या क्रांतिभूमीतून अशी भूमिका पुढे येणे हे सगळ्यांनाच आश्वासक वाटले. महाराष्ट्राच्या अन्य भागांतील आंबेडकरी तरुणांना प्रेरणा व दिशा देणारी ही घटना असल्याचे अनेकांना वाटते. 

ज्यासाठी महाडची तरुण मंडळी कंबर कसून मागे लागली होती तो २० मार्चचा ‘एक विचार-एक मंच’ हा उपक्रम काही सफल झाला. त्यातील अंतर्विरोधांच्या भाराने तो कोसळला. रिपब्लिकन नेत्यांच्या भेटींचे ‘उद्बोधक’ अनुभव खाजगीत त्यांच्याकडून ऐकावेत. ते जाहीरपणे नोंदवणे हे चिखलात दगड मारण्यासारखे आहे. एक झाले, या अनुभवांनी या तरुणांचे खाली गेलेले मनोधैर्य परत वर यायला समता मार्चची मोठी मदत झाली. 

समता मार्चच्या या तयारीवेळचा एक अनुभव त्रासदायक होता. वर उल्लेख केलेल्या व नागेशने आपल्या भाषणात कोरडे ओढलेल्या बौद्धांतील एका विभागाच्या संकुचितपणाचा तो दाखला होता. जे ठराव सांगता सभेत प्रस्तावित होते, त्यातील एक बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहाला सुरबानाना टिपणीस यांचे नाव देण्याच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, हा होता. परंतु, महाडच्या तयारीच्या बैठकीत याला विरोध झाला. सुरबानाना थोर आहेत, त्यांचे स्मारक स्वतंत्रपणे उभारावे, बाबासाहेबांच्या नावाच्या स्मारकात दुसरे कोणाचे नाव असता कामा नये अशी मते बौद्धांतील ज्येष्ठ मंडळींकडून आली. यावर चर्चा नको असेही एकजण म्हणाले. सुरबानानांचे नातू मिलिंद टिपणीस बैठकीला होते. ते म्हणाले, “मी आतापर्यंत कधी बोललो नाही. पण माझे वडिल गेले, त्यांच्या हयातीत काही झाले नाही. आता आम्ही असेपर्यंत तरी ते व्हावे.” 

आम्ही यावर खेद व्यक्त केला. बाबासाहेबांचे व सुरबानानांचे नाते पाहता व अन्य मुख्य स्मारकांतील दालनांना इतरांची नावे देण्याची प्रथा पहाता बाबासाहेबांच्या नावाला कमी महत्व येईल ही भीती अनाठायी आहे. शिवाय ही काही नवी मागणी नाही. शासन निर्णय २००७ चा आहे. असे असताना दहा वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी न होणे हे व्यथित करणारे आहे. याबद्दल तरुण कार्यकर्त्यांनी आता काही ठरवण्याची गरज आहे. आपण त्यांच्यावर हा निर्णय सोडू, असे म्हणून हा मुद्दा आम्ही त्या बैठकीपुरता सोडून दिला. पुढे स्थानिक तरुणांच्यातही या मुद्द्यावर पूर्ण सहमती आहे असे न दिसल्याने सांगता सभेच्या ठरावांत त्याचा समावेश आम्ही करु शकलो नाही. 

सुरबानानांचे घर गोविंद निवास हे महाडमधील बाबासाहेबांचे निवासाचे ठिकाण तसेच चवदार तळे सत्याग्रहाचे विचार विनिमय केंद्र होते. त्याला अलीकडेच आग लागून त्याचे बरेच नुकसान झाले आहे. ते दुरुस्त करुन त्याचे स्मारक नक्की व्हावे. परंतु बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील एका सभागृहाला त्यांचे नाव देता येणार नाही अशी भूमिका म्हणजे ‘सवर्णांच्या पाणवठ्यावर तुम्हाला पाणी पिण्याचा हक्क कशाला पाहिजे, आम्ही तुमच्यासाठी स्वतंत्र पाणवठा देतो’ म्हणण्यासारखे आहे. ही भेदभावाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 

शिवराय ते भीमराय जोडणे हे एक आव्हान आहे. पण ते पेलण्याच्या ताकदीआड येणाऱ्या या दुसऱ्या आव्हानाचे काय करायचे? भीमरायाने ज्यांना सख्खेसोबती मानले त्यांच्याशी परजातीचे म्हणून भीमरायांच्या अनुयायांनी अंतराय राखणे या आव्हानाला भिडावेच लागेल. त्या अर्थाने समता मार्चची खरी सांगता होणे अजून बाकी आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, एप्रिल २०१८)



समता मार्चच्या सांगता सभेतले ठराव 

१) छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या कर्तृत्वाची, योगदानाची स्मृती व इतिहास जतन करून पुढील पिढ्यांकरिता मांडण्यासाठी शिवसृष्टी व भीमसृष्टी हे प्रकल्प साकारण्यात यावेत अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. शिवसृष्टी साठी जागा उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे महाडमधील क्रांतीस्तंभालगत असलेल्या १५ एकर जमिनीवर भीमसृष्टी साकारण्यात यावी अशी मागणी या ठरावाद्वारे आजची सभा करीत आहे. 


२) १९ मार्च १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक अशी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद महाडमध्ये ज्या ठिकाणी भरवण्यात आली, ते त्या काळचे विरेश्वर थिएटर व सध्याचा गाडीतळ ही जागा परिषदेचे स्मृतिस्थळ म्हणुन जतन करण्यात यावे व त्या जागी सदर स्मृतींना उजाळा देणारे, परिषदेची माहिती मांडणारे, तसेच परिषद व समता संगरामधे अनमोल योगदान देणाऱ्या सर्व मंडळींचा परिचय देणारे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी आजची सभा करीत आहे. 


समता मार्चच्या सांगता सभेच्या अखेरीस घेतलेला संकल्प 

आम्ही या स्वतंत्र, सार्वभौम भारत देशाचे नागरिक आजच्या दिवशी, म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता संगराला सुरूवात केलेल्या ऐतिहासिक दिवशी असा संकल्प घेतो की, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य जनतेसाठी, समतेच्या व रयतेच्या राज्यासाठी दिलेल्या संघर्षाच्या वाटेवर चालण्यास आजच्या काळातही आम्ही कटिबद्ध आहोत. 

भारताचे संविधान ज्या समता, न्याय, बंधुता, समाजवाद व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांच्या अंमलबजावणीचे आश्वासन देते व त्यासाठी मार्ग दाखवते, त्यातील एकाही मूल्याला आम्ही धक्का लागू देणार नाही. ती मूल्ये प्रत्यक्ष जीवनात टिकवण्यासाठी व संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचे जीवन पणाला लावू. संविधानातील मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींशी सर्व बळानिशी संघर्ष करण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत. 

No comments: