Sunday, March 10, 2019

बाळासाहेब आंबेडकर यांना मित्रांचे आवाहन

३ मार्च २०१९ 

प्रिय बाळासाहेब, 

महाराष्ट्र लोकशाही आघाडी, जातिअंताची चळवळ तसेच आपल्या नेतृत्वाखालच्या विविध चळवळींत सहभाग घेतलेले, त्याबाबतच्या विचारविनिमयात असलेले आम्ही आपले मित्र आहोत हे आपल्या पक्षपरिवारातही सुविदित आहे. तुमच्या आजच्या अत्यंत वादळी दिनक्रमातही तुम्ही कधी फोनवर-कधी प्रत्यक्ष आमच्याशी मित्रत्वाच्या हक्काने बोलत असता, ही आमच्यासाठी खूप आश्वासक व समाधान देणारी बाब आहे. आपल्यातल्या मित्रत्वाच्या या हक्कानेच आजच्या राजकीय माहोलात आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत. 

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ही आपल्याला मिळालेली जन्मजात विरासत. पण तिचे तुम्ही कधीही भांडवल केले नाहीत. बाबासाहेबांच्या घराण्यातील म्हणून लोक आदराने, भावनेपोटी आपल्याला एक वेगळे स्थान देतात. ते स्वाभाविकही आहे. तथापि, तुम्ही व्यक्तिशः त्यापासून दूर राहण्याची खटपट करत असता हा आमचा अनुभव आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत व्यापक रिपब्लिकन चळवळ एकजातीय घेऱ्यात अडकलेली असताना तुम्ही जाणीवपूर्वक तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न निरंतर करत आहात. गांधी-मार्क्स यांबाबत ठोकळेबाज विरोधाच्या वातावरणात गांधी-मार्क्स-आंबेडकर तसेच अन्य पुरोगामी विचारधारांतल्या पूरकत्वाची साथ करत आलात. आमच्यासारखे मित्र जोडलेत. त्यांच्यासह सामायिक सहमतीचे लढे उभारलेत. यासाठी तथाकथित स्वकियांच्या नाराजीची तुम्ही तमा बाळगली नाहीत. यामुळेच सामाजिक व कष्टकरी या दोहोंबाबत शोषित समूहाला सर्वंकष परिवर्तनासाठी सिद्ध करण्याची संधी व अवकाश आपल्या नेतृत्वाने तयार होतो आहे. देशात बहुसंख्येने असलेल्या सामाजिक व आर्थिक शोषितांना एकवटून आजच्या लोकशाही मतदानाच्या प्रक्रियेत बहुमताने राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नांत आपण निर्णायक ठरु शकता, ही भावना आमची आहे. 

वंचित, बहुजन आघाडी या आपल्या प्रयोगाची दिशाही तीच असावी, अशी आमची अपेक्षा आहे. पायाला भिंगरी लावून ज्या रीतीने गेले वर्षभर आपण विविध जातसमूहांना भिडत आहात, त्यांच्यात सत्ताकांक्षा जागृत करत आहात हे अत्यंत स्पृहणीय आहे. या जातसमूहांच्या आकांक्षा संकुचिततेकडे न जाता आपल्या जातिअंताच्या मोहिमेचा पुढचा टप्पा या नात्याने व्यापक सामाजिक-आर्थिक शोषिततेचे व्यापक भान त्यांना आपण देतच असणार यात शंका नाही. आपल्या प्रचंड संख्येने होणाऱ्या सभा, त्यातील लोकांची ऊर्जा पाहता एक नवीन सामाजिक-राजकीय घटित आपल्या नेतृत्वाखाली उदयास येत आहे, याविषयी आम्हालाच काय आजच्या सत्ताधारी वा विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आपली भूमिका काय राहणार याकडे सगळा महाराष्ट्र डोळे लावून आहे. 

आपली चळवळ लांबपल्ल्याची आहे. मात्र तातडीने येणाऱ्या निवडणुका हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा भाग झाला आहे. भाजपच्या रुपाने संघाचे फॅसिस्ट सरकार आज भारतीय लोकशाहीच्या उरावर बसले आहे, ते तातडीने खाली उतरवणे हे आज सर्व लोकशाहीवाद्यांसमोर कळीचे आव्हान बनले आहे. आपल्या भाषणांतून संघाच्या या फॅसिझमवर जे प्रचंड आघात होत असतात ते त्यामुळेच. लोकशाहीवादी भांडवली पक्षांची साथ न घेता केवळ आपल्या कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके आदि दुबळ्यांच्या संघटनाद्वारे त्यांचा पाडाव व्हायला हवा याविषयी आपल्या कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र वस्तुस्थिती केवळ आपल्या ताकदीवर फॅसिझमचा पराभव करु शकतो ही नाही. तुम्हाला मिळत असलेला प्रचंड पाठिंबा संघटनात्मक पातळीवर स्थिर होऊन मतांत परिवर्तीत होण्याची त्यात क्षमता जरुर असली तरी तेवढा अवधी आज आपल्याकडे नाही. या दोन-तीन दिवसांत निवडणुका जाहीर होतील. अशावेळी भाजपचा पराभव ही क्रमांक एकची बाब करुनच आपल्याला निवडणुकांतले डावपेच ठरवणे भाग आहे. 

तुमची जाहीर भूमिका काँग्रेसशी अनेक बाबतीत मतभेद वा तीव्र विरोध असला तरी सहकार्याची आहे. भाजप हा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि त्याला आधी संपवला पाहिजे, हे आपल्या मनाशी स्पष्ट आहे, हेच त्यातून उघड होते. मात्र त्यासाठी तुमच्या अटी आहेत. जागांच्या आणि संघाला कायदेशीर चौकटीत आणण्याचे त्यांनी जाहीर करण्याबाबतच्या. काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वर्गचरित्राविषयी आपण सहमतीतच आहोत. आजवर आपले लढे त्यांच्या विरोधातच होते. पुढेही राहतील. त्यांचे अधिकृत धोरण आणि त्यांच्या नेत्यांचा व्यवहार यातील अंतर आपल्याला सुपरिचित आहे. उद्या ते सत्तेवर आले तरी त्यांच्याशी लढावेच लागेल याविषयी आपल्या कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र त्यांच्या काळात लोकशाही लढ्यांना जो किमान अवकाश होता तो मूळासकट नष्ट करण्याची भाजपची खटपट आपण रोज अनुभवत आहोत. संघ पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान, निवडणुका राहतील की नाही, ही आपल्या सगळ्यांसमोर भीती आहे. जपान्यांच्या हल्ल्याविरोधात परस्परांचे कट्टर शत्रू असलेले माओ व चैंग कै शेक चीनमध्ये एकत्र येतात. हिटलरच्या फॅसिझमला परतवण्यासाठी आधी एकमेकांच्या विरोधात लढणारे रशिया व इंग्लंड एकत्र येतात. ही उदाहरणे लक्षात घेता भारतात फॅसिझमला गाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या भांडवली पक्षांसह अन्य लोकशाहीवादी शक्तींची कार्यक्रमाधारित एकजूट उभारणे गरजेचे आहे. काँग्रेसशी सहकार्य करण्यासाठी आपण अटी ठेवताना ही मूळ भूमिका आपणास मान्य असणारच. 

आपल्या अटी मान्य करुन काँग्रेसने आपल्याशी एकजूट करावी, अशीच आमचीही अपेक्षा होती. तथापि, एकजुटीबाबत अनुकूल असतानाही तुमच्यात चर्चा होऊन काही पुढचे पाऊल पडत नाही, याबाबत आम्ही चिंतित होतो. मात्र काँग्रेसला २८ फेब्रुवारीची आपण जी अंतिम मुदत दिलीत, त्याला वंचित बहुजन आघाडीचा राज्यभर सुसाट सुटलेल्या वारुची दखल घेत दोन्ही काँग्रेसने संयुक्तरित्या आपल्याला पत्र लिहून जो प्रतिसाद दिला, त्यामुळे कोंडी फुटायला एक अवकाश तयार झाला आहे असे आम्हाला वाटते. ४ जागा नक्की, वाटाघाटीत त्या वाढू शकतात आणि संघाविषयीचे आपल्याला अपेक्षित निवेदन हे ठोस पाऊल पडले असे आम्हाला वाटते. आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करुन चर्चेला बसावे, त्यातून लोकसभेच्या जागांविषयी तद्वत विधानसभांबाबतही आताच आश्वासन घ्यावे. महत्वाचे म्हणजे दलित, कष्टकरी, वंचितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे लेखी अभिवचन घ्यावे. त्याची पूर्तता न झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपला संघर्ष अटळ आहे, याची आताच त्यांना नोंद द्यावी. 

या सहकार्यामुळे, युतीमुळे भाजपला रोखण्याच्या दिशेने दमदार पाऊल पडेल. त्यातून जे आश्वासक वातावरण तयार होईल त्यातून आपल्या समूहांची प्रेरणा वाढेल आणि आपल्यालाही संघटना बांधणीसाठी उसंत मिळू शकेल. 

आपण याचा विचार करावा, हे विनम्र आवाहन. 

कोणत्याही स्थितीत आपल्या स्वतंत्र उभे राहण्याने भाजपरुपी फॅसिझमला मदत होणार नाही, हे आपल्या मनाशी नक्की असणार याची आम्हा मित्रांना खात्री आहे. 

आपल्या जोमदार वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा! 

आपले,

भारत पाटणकर, मिलिंद रानडे, उल्का महाजन, सुरेश सावंत

No comments: