Wednesday, April 29, 2020

तारीक है दिल का आंगन

चांद तन्हा है, आस्मां तन्हा
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा 

या ओळी आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी हिच्या कवितेतल्या. बैजुबावरा, पाकिजा, कोहिनूर, साहिब, बीवी और गुलाम या चित्रपटातल्या तिच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. चित्रपटातल्या तिच्या बहुतेक भूमिका शोकात्म आहेत. तिचं व्यक्तिगत जीवनही असेच शोकात्म आहे. उदास, अप्राप्य आशेवर जगणारं. मीना काव्य व जीवन अभिन्नपणे जगत होती. 

तिला असं हवं होतं तरी काय? फक्त प्रेम, साधं, निर्व्याज प्रेम. प्रियकर-प्रेयसीचं आदर्श एकात्म, अभिन्न असं भावविश्व. ती एका कवितेत आपल्या इच्छेचं स्वरुप उलगडते – 

हम तुम दोनों एक छंद है 
शायर जिसको भूल गया 

आपण दोघं एक छंद आहोत. असा छंद ज्याला गीतकारच विसरुन गेला. पण यातला ‘तुम’ तिला कधीच हवा तसा मिळाला नाही. एखादा भेटायचा. पण या दोघांचं नातं मीनाच्या एका कवितेप्रमाणेच दिवस व रात्रीसारखं अलग राहायचं. ती म्हणते – 

हमसफर कोई गर मिले भी कहीं 
दोनों चलते रहे यहाँ तन्हा 

जीवनाच्या वाटेवर हे प्रवासी चालायचे, पण कसे? तर एकाकी. याला काहीच अर्थ नव्हता. पण तरीही दुरुन का होईना याने तिला साथ दिली का? …मग मीना असं का म्हणते? – 

पलटकर यूं न देखो तुम मुझे बस 
तडपता छोड़ दो बिस्मिल समझकर 

तो तिला घायाळ अवस्थेत सोडून जायचा. पण मीना आशावादी. ती म्हणते – 

बैठे हैं रास्ते में बयाबान ए दिल सजाकर 
शायद इसी तरफ से एक दिन बहार गुजरे 

विराण हृदय सजवून ती रस्त्यात बसायची. ‘बहार’ची वाट बघत. अन् तिला क्षितिजावर आशेचा किरण दिसू लागायचा. पण तिचं अपयशी मन साशंक असायचं. आजवर जे झालं तेच होणार का याची तिला भीती वाटायची. ती म्हणते – 

उफ़क के पार जो देखी है रोशनी हमने 
वह रोशनी है खुदा जाने या अंधेरा है 

आणि हे खरंही व्हायचं. तो अंधारच असायचा. मग तिला या लोकांची दांभिकता तीव्रतेने जाणवायची. हे जग स्वार्थी आहे. आपणास कोणी समजू शकणार नाही, हे तिला पटायचं. मग ती या जगाची अन् आपली तुलना करायची – 

तुम लोग तो बादल हो 
हवाओं के साथ आए 
कुछ देर आस्मान पर छाये रहें 
बरसे, 
और कहीं दूर निकल गये. 

हम चट्टाने हैं 
अपनी जगर पर कायम 
और हमें मालूम है कि 
जानेवाले लौटकर नहीं आते. 

पण अखेर आशा माणसाला जगवते. एवढं होऊनही मीनाची आशा दबत नाही. एका क्षणी ती पुन्हा डोकं वर काढते – 

गम की सुनसान काली रातों में 
दूर एक दीप टिमटिमाता है 

अन् मीना या दिव्याच्या रोखाने धावत सुटली. तो तिला मिळालाही. आनंदाने बेहोश होत ती त्याच्यासवे अंधार कापत निघाली. पण – 

यह दिया बुझ गया आज किस मोड़ पर 
खो गई है अंधेरे में हर रहगुज़र 
कैसे जारी रखे कोई अपना सफर 
आज तूही बता – 
मेरे कदमों तले से निकलती हुई जिन्दगी की डगर. 

आणि मग पुन्हा मीना उध्वस्ततेच्या गर्तेत सापडली. आपलं म्हणून तिला कुणी वाटलं असेल तर दारु आणि रात्र. या रात्रीच्या डोहात मदिरेच्या धुंदीत स्वतःला विसरुन जायची. रात्र तिला कशी वाटते पहा – 

आह रात आई 
चुपचाप चली आई 
इसकी खामोशी में पनाह है 
कितना प्यारा सांवलापन है 
रात का खामोश चेहरा 
झुकी हुई नर्म-नर्म खामोश आँखें 
भरी-भरी खामोश गोद 
अच्छा हुआ जो रात आई 

या रात्रीत मग तिच्या वेदना तिच्यासमोर थैमानू लागतात. अन् मग तिची स्थिती अशी होते – 

रात सुनसान है, तारीक है दिल का आंगन 
आसमां पर कोई तारा न जमीं पर जुगनू 
टिमटिमाते हैं मेरी तरसी हुई आँखों में 
कुछ दिये - 
तुम जिन्हे देखोगे तो कहोगे : आंसू. 

मीना मनसोक्त रडायची. पण रडता रडता आपल्या मनाची समजूत घालायची – 

हंस हंस के जवां दिल के हम क्यों न चुने टुकडे 
हर शख्स की किस्मत में इनाम नहीं होता 

छिन्न हृदयाचे तुकडे वेचत वास्तव का नाही स्वीकारत आपण? प्रत्येकाच्या नशिबात बक्षीस थोडंच असतं! ती आपल्या डोळ्यांनाही रडू नका म्हणून बजावयाची – 

बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर 
जो मय से पिघल जाए वह जाम नहीं होता 

ओघळणाऱ्या अश्रूंनीच डोळ्यांना समजावलं की दारुने जो वितळतो तो प्यालाच नसतो. पण हा तिचा निश्चय किती काळ टिकणार? कारण अश्रू हेच तर आता तिचं सर्वस्व उरलंय. म्हणून ती म्हणते – 

मुद्दत हो गई अब तो रोये 
बरसों से बरसात अलग है 
अन् ती पुन्हा अश्रू ढाळू लागते. 

असे हे मीनाचं शोकात्म जगणं. तिच्या कवितांचं परीक्षण ते काय करणार? परीक्षण करणं म्हणजे तटस्थ होणे. ते मला शक्य नाही. मीनाच्या भावनांशी फारकत घेणं मला शक्य किंबहुना सहनच होणार नाही. माझ्या अस्वस्थतेच्या काळात या कविता माझा मोठा आधार असतो. म्हणून मी मीनाच्या कविता मला कशा भावल्या त्याची केवळ नोंद इथे केली आहे. 

पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, मीना फार वाईट जगली. अखेरपर्यंत ती कोणाच्या-कशाच्या तरी प्रतीक्षेत होती. जग एकाकीच सोडावं लागणार हे ठाऊक असतानाही..! 

राह देखा करेगा सदियों तक 
छोड़ जायेंगे यह जहां तन्हा... 

___________________________ 

१९८३-८४ च्या सुमारास मी अठरा-एकोणीस वर्षांचा असताना लिहिलेले हे टिपण. कागदाचे काही जीर्ण तुकडे एका जुन्या फायलीत सापडले. त्यावर हे टिपण होते. आता ते टाईप केले. – सुरेश सावंत 

No comments: