Saturday, February 13, 2021

इश्क़ आज़ाद है



युरोपात रोमिओ-ज्युलिएट, मध्यपूर्वेत शिरीन-फरहाद किंवा लैला-मजनू, भारतात हीर-रांझा किंवा सोहनी-मेहवाल या प्रेमाच्या कहाण्या जगप्रसिद्ध आहेत. त्या अजरामर आहेत. जोवर दोन मानवी जीव असे प्रेम करत राहणार आहेत, तोवर या तसेच अशा असंख्य कहाण्या जिवंत राहणार आहेत. त्यांत नव्यांची भर पडत राहील. पण संपणार नाहीत. ज्यांची नावे दिली त्या शोकांतिका आहेत. समाजाची बंधने त्यांना रोखण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतात. पण त्यास या जोड्या हार जात नाहीत. मृत्युला कवटाळतात, मात्र एकमेकांपासून विलग होत नाहीत. हे प्रेमिक मरुन जिंकतात. बंधने घालणारी तख्ते हरतात. म्हणूनच या कहाण्यांना (त्या युगुलांचे लग्न होऊन सुखाचा संसार होत नाही या अर्थाने) विफल म्हणण्याची रीत असली, तरी त्या त्या अर्थाने सफल आहेत. या कहाण्या अपवाद नाहीत. आजही त्या जगात, देशात, आपल्या आसपास घडत आहेत. ‘प्यार की आंधी रुक न सकेगी, नफ़रत की दीवारों से’ या दुर्दम्य विश्वासाने, कुस्करुन टाकण्याची कराल ताकद असलेल्या शक्तींना ललकारत ‘ऐ मोहब्बत ज़िंदाबाद’चा नारा देताना त्या दिसतात.

हे खरे की सर्वच प्रेमिक एवढी हिंमत दाखवत नाहीत किंवा अन्य काही अपरिहार्यता असतात. जात, धर्म, आर्थिक स्तर यांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी या प्रेमिकांना शारीरिकदृष्ट्या विलग केले जाते, काहींचे दुसरीकडे त्यांच्या इच्छेच्या विरोधात लग्न लावले जाते, या दडपणापुढे रुढ अर्थाने हे प्रेमिक मान तुकवतानाही दिसतात. सगळेच काही पळून जात नाहीत वा त्यांचे जीव संपवत नाहीत. पण मनाने या प्रेमिकांना तोडणे शक्य होत नाही. ज्यांचे पसंतीच्या जोडीदाराशी लग्न झालेले नसते, ज्यांचा संसारही नीट चाललेला असतो, नवा जोडीदार जीव लावणारा, जपणारा असतो; अशांच्याही मनाचे काही कोपरे अखेरपर्यंत ‘तो’ किंवा ‘ती’ने व्याप्त राहतात. म्हणून ती आताच्या जोडीदाराशी प्रतारणा वगैरे असत नाही. तसा त्यावर स्वतः किंवा इतरांनी शिक्का मारणे हा केवळ मूर्खपणा असतो. असा भूतकाळाचा हळवा कोपरा जपत वर्तमान नाते आनंदाने जगता येते. या नात्यातील दोन्ही घटकांत त्याबाबतच्या समजाची प्रगल्भता मात्र हवी.

शारीरिक संबंध हा प्रेमाचा एक महत्वाचा भाग असतो. पण तो म्हणजे प्रेम नसते. केवळ शारीरिक गरजेसाठी संबंध ठेवणारे जुन्या काळापासून आहेत. त्यात मनांची गुंतवणूक अजिबात वा फारशी नसते. लैंगिक बाजार अथवा राजांचे जनाने सोडले, तर अशा बिनलग्नाच्या संबंधांना नैतिक मान्यता नसे. अलिकडच्या पिढीत सरसकट नसले तरी केवळ शारीरिक गरजांच्या पूर्ततेसाठी एकत्र येणे हा एक नैतिक-अनैतिकतेला खिजगणतीत न धरणारा प्रवाह जोम धरतो आहे. लग्नाशिवाय ‘लिव्ह इन’ मध्ये राहणे यात धरायचे नाही. लग्न हा समाजासाठीचा वा कायदेशीर बाबींसाठीचा सोपस्कार असतो. तो महत्वाचा असू शकतो. पण ‘लिव्ह इन’ मध्येही परस्परांची मानसिक गुंतवणूक चिवट असलेली दिसते. त्यांनी एकमेकांना वरलेले असते. त्यांच्या नात्यावर समाजाने मोहोर उठवण्याची त्यांना गरज वाटत नाही. किंवा रीतसर लग्नासाठीच्या काही व्यावहारिक अडचणीही त्यांच्या असतात. आजच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेत लग्नानंतर परस्परांना गृहीत धरण्याची एक स्वाभाविक प्रक्रिया सुरु होते, ती काहींना नको असते. रीतसर संसार सुरु असणाऱ्यांचाही नकळत कुठेतरी कोणावर तरी ‘जीव जडतो.’ विवाहबाह्य संबंधांना लैंगिक स्वैराचार म्हणून मोडीत काढले जाते. मात्र त्यातही, कायदेशीर जोडीदाराकडे व्यक्त करता येत नाही, अशा काही अंतरीच्या गाठी मोकळ्या करण्याचे खूप आत्मीय मैत्र असू शकते. कधी ही मैत्रं एकापेक्षा अधिक असू शकतात. यातून गुंते तयार होतात, हे खरे. पण प्रौढपणे ते सोडवायला हवेत. त्यावर नैतिक-अनैतिकतेचे शिक्के मारण्याने त्यांची सोडवणूक होत नाही. एकमेकांवरचे प्रेम वेगळे आणि शारीरिक संबंध वेगळे असेही नाही. शारीरिक संबंधांना बहार यायला परस्परांवरचे प्रेम आवश्यक असते. समलिंगी संबंधांनाही हे सर्व लागू आहे.

या सर्व गुंत्यात प्रेमाची उत्कटता हा घटक मूलभूत असतो. तो आनुषंगिक नसतो. प्रिय व्यक्तीच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या मनाची अवस्था ‘हकीकत’ सिनेमातील एका गाण्यात कैफी आजमींनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात – ‘ज़रा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं..’ प्रीतीच्या अनुभूतीचे महात्म्य वा किंमत अनंत मरणांशी कवी गोविंदाग्रज तोलतात. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा’ या त्यांच्या ओळी प्रसिद्ध आहेत. याच कवितेत प्रीतीच्या अनुभूतीचे वर्णन करताना ते म्हणतात- ‘तरंगति झणी। गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी’.

प्रीतीच्या या तरंगांचा, नवथर लहरींचा अनुभव ज्यांना येत नाही, त्यांच्याबाबत गालिब म्हणतो ते खरे – ‘..हाय कंबख्त तूने कभी पी ही नहीं.’

सुरुवातीला उल्लेख केलेल्या कहाण्यांतील प्रेमिकांची ही पुरेपूर अनुभूती आहे. म्हणूनच ते परस्परांसाठी प्राणही द्यायला तयार होतात. शमेच्या ओढीने तिच्याकडे झेपावणाऱ्या परवान्याचा मृत्यू अटळ असतो. पण त्यातच त्याचे जीवित साफल्य असते. या कहाण्यांतील प्रेमिकांचा प्रेमोत्सव हा असा काळाच्या दृष्टीने अल्प पण दिव्यानुभूती देणारा असतो. समाजाच्या विरोधापायी आपण एकत्र राहू शकणार नाही, या निर्णयाला आलेली युगुलं आत्महत्या करण्याच्या बातम्या येतात. काहींना पालकच संपवतात. त्यांचे ऑनर किलिंग करतात. खोट्या प्रतिष्ठेपायी खून हा प्रेमाचा ऑनर संपवण्याचा फोल प्रयत्न असतो. त्याने माणसे संपवली जातात. पण प्रेम आबादाच राहते. म्हणजेच या फक्त कहाण्या नाहीत. ते आजचे वास्तव आहे. प्रेमासाठी संपणे वा संपवले जाणे हा मानवी समाजाचा इतिहास आणि वर्तमानही आहे. ज्यांचे खून होतात, ते त्यांच्या हातात नसते. पण आत्महत्या करणे हे समर्थनीय नाही. त्यांनी व्यवस्थेशी झुंजावे हेच आपण म्हणू. इथे मुद्दा इतकाच की उत्कट प्रेम ही कहाणी वा भूतकाळ केवळ नाही, तर तो वर्तमान आहे आणि भविष्यही असणार आहे. मानव असेपर्यंत ते असणार आहे.

अशा या प्रेमाचा उत्सव करण्याऐवजी माणसे त्याला नाना मान्यतांच्या, संकेतांच्या, धर्म नियमांच्या बंधनांत अडकवायचा नाहक प्रयत्न करतात. नाहक यासाठी की आधी म्हटल्याप्रमाणे ही माणसे ‘माणसे’ मारतात. पण प्रेमाचा आदिम प्रवाह रोखू शकत नाहीत. ती प्रेम करणाऱ्यांबरोबरच स्वतःलाही हानी पोहोचवतात. स्वतःची आनंद घेणारी, उन्नत भावनांनी समृद्ध करणारी आपली इंद्रियेच नष्ट करतात.

या प्रेमाच्या विरोधकांनी जात, धर्म, संपत्ती, प्रतिष्ठा यापायी प्रेमाला कैद करण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही ते उसळी घेताना दिसते. जाती-धर्माच्या बाहेर लग्न करणाऱ्यांचे एकूण प्रमाण खूप नाही. पण त्यांची संख्या तीव्र विरोध असतानाही वाढती आहे. ती कमी झालेली नाही. विरोध, मारहाण, मृत्यू ठाऊक असूनही प्रेमी युगुले हे धैर्य करतात, ही एक जैविक प्रेरणा आहे. ती नैसर्गिक आहे. तिला अडवायचे प्रयत्न कृत्रिम आहेत. निसर्ग नियमाच्या विरोधात आहेत. जिथे सरमिसळ आहे, अशी महाविद्यालये, नोकऱ्यांची ठिकाणे, राहत्या वसाहती इथे प्रेमात पडणारी मुले योगायोगाने एका जातीची असू शकतात. ती जात वा धर्म बघून प्रेमात पडत नाहीत. ती त्या माणसाच्या प्रेमात पडतात. हे अगदी नैसर्गिक आहे. जात, धर्म हे संदर्भ लग्नावेळी येतात. ते तेव्हातरी का यावेत? ते अनैसर्गिक आहेत. या प्रेमी युगुलाचे नाते जाहीर करण्यासाठीचा लग्न नावाचा विधी सामाजिक आहे. आजच्यासारखे संविधान नव्हते, त्या वेळी धर्माने आध्यात्मिक गरजेबरोबरच सामाजिक नियमन केले. त्यावेळी लग्न विधीत धर्माचा संबंध समजण्यासारखे होते. हा संबंध अडवण्याच्या पद्धतीने नाही, तर त्या नात्याच्या स्वागतासाठी हवा. त्याही वेळी परस्परांना साक्षी मानून देवाच्या मूर्तीला अभिवादन करुन एकमेकांच्या गळ्यांत हार घालून गांधर्व विवाह केले जात होते. आता संविधानाची कारकीर्द सुरु झाल्यावर धर्माने सामाजिक क्षेत्रातला आपला हस्तक्षेप बंद करुन आत्मिक मुक्तीच्या आपल्या मूळ कामावर लक्ष द्यायला हवे.

अलीकडेच डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी त्यांच्या स्वामी विवेकानंदांवरच्या एका लेखात विवेकानंदांना याची किती ठळक स्पष्टता होती, हे विवेकानंदांची काही अवतरणे देऊन नोंदवले आहे. त्यातील एक अवतरण असे आहे - ‘सामाजिक गोष्टींच्या बाबतीत धर्माने ढवळाढवळ केली, ही धर्माची सर्वात मोठी चूक आहे. सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काहीही अधिकार नाही. धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी आहे, त्याने सामाजिक क्षेत्रात अजिबात ढवळाढवळ करू नये. आत्तापर्यंत जे अनर्थ घडले त्याचे एकमेव कारण- धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केली, हे आहे.’

लव्ह जिहाद व त्याबाबच्या कायद्याची चर्चा सध्या जोरात आहे. हा कायदा घटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याच्या पूर्ण विरोधात आहे. कायदा, वास्तविक वटहुकूम उत्तर प्रदेश सरकारने काढला आहे. सहा महिन्यांत त्याला विधानसभेत मंजुरी घ्यावी लागेल. मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक ही भाजपशासित राज्येही आपल्या राज्यात असा कायदा करण्याच्या वाटेवर आहेत. ज्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत थांबून चर्चा करुन कायदा करायला फुरसत नाही, अशा तातडीच्या बाबीसाठी वटहुकूम काढला जातो. या प्रकरणात एवढी काय तातडी होती? यामागे जे गृहीतक आहे ते असे - लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम तरुण हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फशी पाडून त्यांचे धर्मांतर करुन लग्न करतात. इस्लाम धर्म वाढविण्यासाठीचा हा जिहाद म्हणजे धर्मयुद्ध आहे. याला वस्तुस्थितीचा काय आधार? तर काही नाही. संसदेतच या प्रश्नाला सरकारने लव्ह जिहादचा कोणताही पुरावा नाही असे उत्तर दिलेले आहे. तरी हा कायदा का? तर मुसलमानांना त्रास द्यायला. हिंदूंच्या राज्यात ते दुय्यम नागरिक आहेत, हे स्थापित करण्याच्या रणनीतीचा तो भाग आहे.

हा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत मुसलमानांना त्रास द्यायची संधी त्यामुळे मिळणार आहे. ती घ्यायला त्यांनी सुरु केले आहे. ज्यांच्याविरोधात पहिल्या तक्रारी करण्यात आल्या, त्यातील एक जोडप्याचा घरच्यांच्या संमतीनेच विवाह ठरला होता. मुस्लिम व हिंदू असे दोन्ही पद्धतींनी ते लग्न होणार होते. आईबापांची, नातेवाईकांची तक्रार नसताना कोणा एका हिंदू युवा वाहिनीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी या दोन प्रेमी जीवांना लग्नापासून अडवले व चौकशीच्या नावाखाली त्रास द्यायला सुरु केली. दुसऱ्या एका जोडप्याचे लग्न झाले, कोणा नातेवाईकाची तक्रार नव्हती. तरी त्यांच्याबाबत याच हिंदू युवा वाहिनीद्वारे आलेली तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. सुमारे पन्नासेक लोकांवर आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्यात. त्यात दोन मुलींनी तक्रार केल्याचेही वृत्तपत्रात आले आहे. त्याचे तपशील अजून समजायचे आहेत.

इथे हिंदू स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची बाब म्हणजे या कायद्यात हिंदू पुरुषांपेक्षा हिंदू स्त्रियांना अक्कल कमी आहे, मुस्लिम पुरुषांवर त्या विचार न करता भाळतात असे गृहीत आहे. मनुस्मृतीने हेच सांगितले होते. लहानपणी बापाने, तरुणपणी नवऱ्याने व म्हातारपणी मुलाने स्त्रीचे रक्षण करावे, तिला स्वातंत्र्य देऊ नये. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिचे दहन केले होते. पुढे याच महामानवाच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित संविधानाच्या रुपाने नवी स्मृती दिली गेली. या नव्या स्मृतीच्या जागी जुनी मनुस्मृती आणण्याची मनोमन इच्छा असणाऱ्यांनी लव्ह जिहाद कायद्याच्या रुपाने छळवाद मांडला आहे.

घटनेने आवडणारा धर्म स्वीकारण्याचे, धर्मच न मानण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जबरदस्तीने, आमिष दाखवून धर्मांतर करण्याची परवानगी घटना देत नाही. त्यासाठी काही राज्यांनी साठच्या दशकापासूनच कायदे केले आहेत. असे कायदे आपल्या राज्यात करण्याऐवजी वा जिथे ते आहेत तिथे त्याखाली तक्रारी करण्याऐवजी हा नवा कायदा आणण्याची काहीही आवश्यकता नाही.

भाजप समान नागरी कायद्याचा उद्घोष करत असतो. कोणत्याही धर्मातील, जातीतील वयाच्या अटीत बसणाऱ्या स्त्री-पुरुषांना आपले धर्म न बदलता या कायद्याप्रमाणे लग्न करता येते. या कायद्याचा आग्रह व प्रचार भाजप का करत नाही? हिंदू मुलीचा धर्मच बदलण्यावर आक्षेप असेल तर या कायद्याने त्या आक्षेपावर इलाज करता येतो. अन्य धर्मीयाशी लग्न करुनही ती हिंदू राहू शकते. पण या कायद्याच्या मसुद्यात नसलेला मूळ हेतू मुसलमानाशी हिंदू मुलीने लग्न करता कामा नये हा आहे. उद्या दलित जातींतील मुलांशी लग्न न करण्याबद्दलचाही कायदा करायला हे लोक धजावतील. नाहीतरी आता दलित जातीतील मुलगा असेल तर त्याचा एकट्याचा वा त्याच्याबरोबर त्याच्या प्रेमात पडलेल्या सवर्ण मुलीचाही खून करण्याच्या घटना भाजपशी संबंधित मंडळींकडून झालेल्या आहेतच. आधी मुसलमान, नंतर नंबर दलितांचा..!

स्वामी विवेकानंद हल्ली भाजप व संघपरिवाराने आंदण घेतले आहेत. त्याच विवेकानंदांची मूळ शिकवण धर्माचा सामाजिक बाबतीतील हस्तक्षेप संपवण्याची आहे, ती ते का पाळत नाहीत? स्वामी विवेकानंद असेही म्हणतात – ‘इतरांचे नुकसान होत नसेल तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत, कोणाशी विवाह करावा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवा.’ या वचनाशी खरोखरच या लोकांची निष्ठा असती तर लव्ह जिहाद कायदा, गोमांस खाल्ल्याच्या, बाळगल्याच्या संशयावरुन दलित-मुस्लिमांना झुंडीने मारुन टाकण्याचे प्रकार घडलेच नसते.

आजच्या तरुणाईने या कारस्थानाच्या विरोधात जाणतेपणाने व खंबीरपणे उभे राहायला हवे. यात कोण कोणता पक्ष मानतो वा त्यास मत देतो हा नाही. तरुणाईच्या प्रेम करण्याच्या मोकळिकीला जेरबंद करणाऱ्या सर्वांच्या विरोधात युद्ध छेडले पाहिजे. ‘लव्ह’ चे रक्षण करण्यासाठी ‘जिहाद’ पुकारला पाहिजे. साहिर लुधियानवी आपल्या एका कव्वालीत म्हणतात – ‘इश्क़ आज़ाद है, हिंदू ना मुसलमान है इश्क़’.

प्रेम करण्याचा आमचा हक्क आहे. ते जबाबदारीने करण्याबद्दल, ते अधिक कसे फुलविता येईल याबद्दल जरुर सल्ले द्या. पण या प्रेमालाच जात-धर्माच्या नावाखाली कैद कराल, तर खबरदार..!

– हा इशारा या व्हॅलेंटाईन डेला जरा सणसणीतपणेच देऊया.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मिळून साऱ्याजणी, फेब्रुवारी २०२१)

No comments: