Monday, July 3, 2023

चाणक्य नीती की सांविधानिक नीती..?

आज चाणक्याचे संविधान नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीयांच्या प्रतिनिधींनी घडवलेले संविधान आहे. चाणक्य नीती नव्हे; तर सांविधानिक नीती आमच्या राजकीय व्यवहाराचा पाया आहे. 

आपल्याला पटणाऱ्या भूमिकांचे वहन करणाऱ्या पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना मत देण्यासाठी निवडणुका आहेत. तुम्ही कोणत्याही पक्षाला मत द्या. त्यातून बहुमत मिळेल ते सत्तेत येतील. सत्तेत आल्यावर जे कायदे ते करतील तेही जनता आणि विरोधी राजकीय गट यांना अधिकाधिक विश्वासात घेऊन करतील. न पटणाऱ्या किंवा सुधारणा हव्या असलेल्या कायद्यांबद्दल सनदशीर मार्गाने आपण विरोध करु शकतो. लढू शकतो. ...याला 'संविधानवाद' म्हणतात.

आता राजेशाही नाही. राजांच्या आपसातील स्पर्धा, सत्तेसाठीची युद्धे, चाणक्य नीती यांची कक्षा राजेशाही होती. आता लोकशाही आहे. 'आम्ही भारताचे लोक' भारताचे कर्ते, नियंते आहोत.

चाणक्य नीतीचा गौरव म्हणजे सांविधानिक नीतीला आणि संविधानवादाला तिलांजली देणे. 'आम्ही भारताच्या लोकांनी' स्वतःहून सत्तेचा अपहार करणाऱ्यांना शरण जाणे होय.

यातून केवळ अराजक माजेल. अराजकाची सगळ्यात अधिक झळ सामान्य, कष्टकरी, पीडित यांना बसते, हा आपला अनुभव आहेच.

एका दुसऱ्या शक्यतेसाठीही आजची स्थिती पक्व नाही.

या अराजकातून जनता निराभास होऊन क्रांती करेल हे दिवास्वप्न आहे. क्रांती आपोआप होत नाही.

क्रांतीसाठी असंतोषाचे वातावरण पूरक ठरते. अराजक म्हणजे असंतोष नव्हे. त्यावर स्वार होऊन क्रांती होत नाही. कष्टकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या सत्तेसाठी जी क्रांती हवी त्यासाठी परिस्थितीचा उलगडा करून पुढील दिशा दाखवणारा तत्त्व-विचार, हा विचार स्वीकारून तिचे भौतिक शक्तीत रूपांतर करणारी जनता आणि त्या आधी या सगळ्याचे संचालन करणारी बांधेसूद राजकीय संघटना या पूर्वअटी आहेत.

आज हे नाही. त्यामुळे अराजकाचा फायदा लुटालूट करणारे टगेच प्रामुख्याने घेतील. लोकशाही आवाज पूर्ण दाबून टाकून फॅसिझम आपल्या कराल जबड्यात संसदीय लोकशाहीचा चुराडा करेल.

...म्हणून जे संविधान आज आहे, ते टिकवणे हेच आजचे क्रांतिकार्य आहे.

_________

सुरेश सावंत, sawant.suresh @gmail.com

No comments: