Thursday, October 13, 2022

Natchathiram Nagargiradhu : आंबेडकरी विचारविश्वाची साक्ष

परवा पुण्यात सुनीलच्या ( Sunil Gajakosh ) घरी Natchathiram Nagargiradhu हा सिनेमा Netflix वर पाहिला. मला हा सिनेमा आल्याचे ठाऊक नव्हते. त्याने सुचवले आणि आम्ही दोघांनी तो पाहिला. एक श्रीमंत अनुभव दिल्याबद्दल सुनीलला धन्यवाद. 

तामिळ भाषा. इंग्रजी उपशीर्षके. संवादात सूचकता, विविध संदर्भ आणि खोल अर्थ असल्याने थांबून थांबून ते वाचत, समजून घेत, चर्चा करत पुढे जात राहिलो.

सिनेमातील नायिकेला तिचा सहकारी मित्र विचारतो - "तू कम्युनिस्ट आहेस?" ती उत्तरते - "आंबेडकरवादी."

आंबेडकरवादी परिप्रेक्ष्यातून जात, लिंग, आर्थिक आदी माणूसपण हिरावून घेणाऱ्या विविध विषमतांच्या विरोधातला विद्रोह, स्त्री-पुरुष संबंधातल्या रुढ मान्यतांना धडका, त्यांतील गुंतागुंत, व्यवस्थेतील अनेकविध ताण आणि या सर्वांतून प्रेम, मैत्री, समता यांचा जागर मांडणारा हा कलात्मक आविष्कार मनाचा तळ ढवळतो तसेच समृद्ध करतो. 

आशय आणि रुपबंध यांच्या एकात्मतेचा हा विलक्षण प्रयोग अत्यंत प्रत्ययकारी आहे. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटक आणि चित्रपट या दोन्हींच्या सामर्थ्यांचे यातील अद्वैत उच्च दर्जाचा कलात्मक अनुभव देतो. समाज परिवर्तनाच्या जाणीवा देणाऱ्या कलाकृती या प्रचारी असतात, त्या कलात्मक निकषांवर कमी पडतात, या आरोपाला मूठमाती देणारा हा चित्रपट आहे. 

आंबेडकरी विचारविश्वाला (त्यात बुद्ध अविभाज्य आहे) केवळ दलित उठावाच्या सीमेत बद्घ करणाऱ्या नजरांना या सिनेमात मधून मधून येणाऱ्या अथांग अवकाशातील  तारकापुंज दिपवल्याशिवाय तसेच त्यातून आकस्मिक होणारे उल्कापात चकित केल्याशिवाय राहणार नाहीत. बुद्धमार्गी आंबेडकरी विचारविश्व अवघी मानवता कवेत घेते, याची साक्ष देणारा हा सिनेमा आहे.

आंबेडकर आणि बुद्ध यांच्या प्रतिमा व विचार ज्योती प्रच्छन्न नव्हे, तर उघडपणे हाती घेऊन प्रस्थापित सिनेविश्वात आपले अव्वल स्थान पक्के करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रालाही दखल घ्यायला लावण्याची क्षमता असणारा पा. रंजित हा तरुण दिग्दर्शक खरोखर थोर आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा!!

Thursday, September 29, 2022

संविधानातील मूल्यांची ओळख

आकाशवाणीवर २१ ते २४ सप्टेंबर २०२२ या काळात झालेल्या प्रत्येकी ४ मिनिटांच्या ४ भाषणांची टिपणे
भाग १

आपण नुकतीच भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली. या स्वातंत्र्यासाठीच्या महान संग्रामात, इंग्रजांशी लढत असतानाच, स्वतंत्र भारत कसा घडवायचा, याचा आराखडाही बनवला जात होता. स्वातंत्र्य लढ्याच्या सोबतच सामाजिक सुधारणांची चळवळ सुरु होती. त्यातून नवी मूल्यं विकसित होत होती. त्यामुळे हा आराखडा अधिक समृद्ध होत होता. या विचारांचा, मूल्यांचा समावेश आपल्या संविधानात केला गेला.

म्हणूनच, भारताचं संविधान ही केवळ राज्यकारभाराची नियमावली नव्हे. किंवा या कारभारातील विविध घटकांचं स्वरुप स्पष्ट करणारा फक्त एक दस्तावेज नव्हे. हे तर त्यात आहेच. मात्र त्या पलीकडे भारतीय जनतेच्या आकांक्षांचा तो संकल्प आहे. भारत कसा घडवायचा, त्यातील जनतेचं सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन कसं समृद्ध करायचं, भारतीय जनतेत परस्पर भ्रातृभाव, भगिनीभाव वा सहभाव कसा वृद्धिंगत करायचा याचं दिग्दर्शन आपल्या संविधानात आहे.

संविधानातील ३९५ कलमं, २२ भाग आणि १२ अनुसूची यांमधून संविधानातील विचार किंवा मूल्यं शोधायची कशी? ...यासाठी संविधानकारांनी आपली सोय करुन ठेवली आहे. ती म्हणजे उद्देशिका. तिला प्रास्ताविका, सरनामा असंही म्हटलं जातं. संविधानाच्या प्रारंभी असलेल्या या उद्देशिकेत संविधानाचं सार आहे. त्याचा विस्तार संविधानातल्या विविध कलमांत आढळतो. संविधानाचं तत्त्वज्ञान, विचार, मूल्यं या एका वाक्याच्या उद्देशिकेत सामावलं आहे. ..हो, ही उद्देशिका एका वाक्याची आहे. ओळी अनेक दिसत असल्या तरी वाक्य एकच आहे. या एका वाक्यातले विविध शब्द ही मौलिक रत्नं आहेत. या रत्नांचा एका वाक्याच्या सूत्रात गुंफलेला हा मौल्यवान रत्नहार आहे. ही उद्देशिका समजणं म्हणजे संविधानाचं मर्म समजणं होय.

लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. निवडणुकीद्वारे जनता आपले प्रतिनिधी पाठवून राज्य करत असते. हे प्रतिनिधी उद्दिष्टांनुसार कारभार करतात की नाही, यावर जनतेचं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणूनच, हे राज्य ज्या संविधानावर चालतं, ते संविधान समजून घेणं, किमान उद्देशिका समजून घेणं ही आपल्या नागरिकत्वाची पूर्वअट आहे. यादृष्टीने, उद्देशिकेत नमूद केलेल्या संकल्पना आणि मूल्यं यांचा पुढील चार भागांत आपण थोडक्यात परिचय करुन घेणार आहोत.

‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांपासून आपल्या संविधानाची उद्देशिका सुरु होते. देशाचं जे काही बरंवाईट करायचं, त्याचे सर्वाधिकार भारतीय नागरिकांच्या हाती आहेत. संविधानातली प्रत्येक बाब संविधान सभेत चर्चा होऊन संमत झाली आहे. उद्देशिकेवरही चर्चा झाली. त्यावेळी काही सूचना आल्या. संविधानाचं कामकाज सुरु असतानाच गांधीजींची हत्या झाली होती. त्यांचं हौतात्म्य आणि राष्ट्रपिता म्हणून जनतेच्या मनात असलेलं त्यांचं स्थान लक्षात घेता, उद्देशिकेच्या प्रारंभी, महात्मा गांधीजींच्या प्रति कृतज्ञता अर्पण करण्याची सूचना एका सदस्यानं केली. त्याला गांधीजींच्या अनुयायांकडूनच विरोध झाला. गांधीजी कितीही महान असले, त्यांचे देशावर कितीही उपकार असले तरी, अशा नोंदीमुळे लोकांऐवजी एखाद्या व्यक्तीला विशेष महत्व संविधानात मिळतं. ते होऊ नये, जनतेचंच स्थान आणि अधिकार अव्वल राहावा, यासाठी राष्ट्रावर अनंत उपकार असलेल्या महान व्यक्तीच्याही नावाचा उल्लेख उद्देशिकेत करणं आपण नाकारलं.

आम्ही भारताचे लोक या उद्देशिकेत जो संकल्प करत आहोत, त्यातील पहिला संकल्प भारत घडवण्याचा आहे. भारत कसा घडवणार आहोत? ..तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य पद्धतीचा. या प्रत्येक मूल्याचा तसेच उद्देशिकेतील आणखी काही संकल्पनांचा अर्थ आपण पुढील भागात समजून घेऊ.

====


भाग २

संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या देशाच्या स्वरुपाविषयीच्या मूल्यांची चर्चा या भागात आपण करुया.

आपला देश सार्वभौम असेल. सार्वभौम याचा अर्थ आमच्या देशावर आता इंग्रजांसारख्या कोणत्याही परकीय शक्तींचं नियंत्रण असणार नाही. तसेच देशाच्या अंतर्गत असलेल्याही कोणा समूहाचं वा शक्तीचं देशावर नियंत्रण असणार नाही. नियंत्रण असेल ते फक्त आणि फक्त भारतीय जनतेचं. एखाद्या राजकीय पक्षाला अथवा पक्षांच्या आघाडीला ५ वर्षे देशाचा कारभार करण्यासाठी जनता निवडते. तथापि, या काळापुरतं का होईना, सत्ताधारी पक्ष म्हणजे देशाचे मालक नव्हेत. अंतिम सत्ताधारी जनताच असणार.

देशाच्या स्वरुपाचं वर्णन करणारी दुसरी संकल्पना आहे - समाजवाद. जंगल, जमीन, उद्योग, खाणी आदि उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची न राहता, ती समाजाच्या, पर्यायाने सरकारच्या मालकीची असणं आणि येणाऱ्या उत्पन्नाचं समाजात न्याय्य वितरण करणं म्हणजे समाजवाद. - हा समाजवादाचा अभिजात अर्थ. आपल्या देशातला समाजवाद असा अभिजात नाही. खाजगी आणि सरकारी मालकीची संमिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली. मात्र एकूण आर्थिक धोरणात इथल्या गरीब, कष्टकरी, वंचित समूहांच्या विकासाला प्राधान्य असेल, असं आपण ठरवलं. कमाल जमीन धारणेसारखे कायदे आणून आपण भूमिहिनांना जमिनीचं वाटप केलं, ते याच धोरणातून. संपत्तीचा संचय एका जागी होऊ न देता उपजीविकेच्या साधनांचं न्याय्य वितरण करण्याचं मार्गदर्शक सूत्र संविधानात आहे. आपला समाजवाद हा या प्रकारचा आहे.

धर्मनिरपेक्षता हे देशाच्या स्वरुपाचं वर्णन करणारं तिसरं मूल्य. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माचं पालन, त्याचा प्रसार आणि त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य असेल. तथापि, शासनाचा कोणताही धर्म नसेल. व्यक्तीला असलेलं धर्म स्वातंत्र्य निरंकुश नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य, नैतिकता तसेच अन्य मूलभूत अधिकारांना हानी पोहोचणार नाही या अटी त्यात आहेत. धर्म पालनाबरोबरच धर्म न पाळण्याचाही अधिकार इथं गृहीत आहे. उद्देशिकेच्या प्रारंभी ‘ईश्वरास स्मरुन’ असं लिहावं, अशीही एक सूचना संविधान सभेत आली होती. ही सूचना बहुमतानं फेटाळली गेली. ही सूचना फेटाळणारे बहुसंख्य सदस्य काही निरीश्वरवादी नव्हते. मात्र शासनाचा कोणताही धर्म नसेल याबाबत या सर्वांची सहमती होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत झालेल्या विचारमंथनातून ही सहमती आकारास आलेली होती.

लोकशाही हे देशाचं स्वरुप नोंदवणारं चौथं मूल्य. प्रौढ आणि सार्वत्रिक मतदानानं लोकप्रतिनिधींची निवड आणि त्यातील बहुमताच्या गटाचं सरकार ही संसदीय लोकशाहीची प्रणाली आपण स्वीकारली. कायदा करताना ज्यांच्याविषयी तो कायदा आहे, त्या समाज घटकांकडून सूचना घेऊन, विरोधकांना विचारात घेऊन शक्य तितकी सहमती करुन तो मंजूर करायचा ही सांविधानिक नैतिकता सरकारनं पाळणं गरजेचं असतं. तरच लोकशाही अर्थपूर्ण होते. लोकशाही हे शासनाच्या कारभाराचं तसेच लोकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनाचंही मूल्य आहे.

देशाच्या स्वरुपाविषयीचं पाचवं आणि शेवटचं मूल्य – गणराज्य. सत्तेशी संबंधित कोणतंही पद वंशपरंपरागत नसणं म्हणजे गणराज्य. इंग्लंडमध्ये लोकशाही आहे. पण तिथं आतापर्यंत राणी होती. आता राजा आहे. राणी वा राजा वंशपरंपरागत असतात. आपल्याकडे राष्ट्रपतींची निवडणूक होते. म्हणूनच इंग्लंड हा लोकशाही देश आहे; पण ते गणराज्य नाही. भारत हे लोकशाही गणराज्य आहे.

पुढच्या दोन भागांत आपण देशातील नागरिकांना बहाल केलेले न्याय, स्वातंत्र्य, समता हे अधिकार आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या बंधुतेच्या अटीची चर्चा करणार आहोत.

====


भाग ३

आम्ही भारताचे लोक आम्हा भारतीय जनतेला कोणते अधिकार प्रदान करत आहोत, त्याची चर्चा या भागात आपण करुया.

भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्यायाची हमी दिलेली आहे. हा न्याय तीन प्रकारचा आहे. पहिला सामाजिक, दुसरा आर्थिक आणि तिसरा राजनैतिक. हा क्रमही महत्वाचा आहे. गरीब असो वा श्रीमंत, तथाकथित उच्चवर्णीय असोत वा अनुसूचित जाती-जमातीचे लोक, स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला मतदानाचा तसेच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. निवडणुकांत पैश्याची आमिषं, जाती-पातीची आवाहनं या न्यायात अडथळा आणत असली तरी, हा न्याय बऱ्याच अंशी प्रत्यक्षात येतो. या आधीचे दोन न्याय - सामाजिक आणि आर्थिक, अजून अपुरे आहेत. अनेक महत्वाचे कायदे झाले आहेत. त्यांचा उपयोग होतो. आधारही मिळतो. तथापि, सामाजिक भेदभाव आजही तीव्र आहे. जातींची उतरंड कायम आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, स्त्रिया यांच्यावरील अत्याचार थांबलेले नाहीत. सामाजिक न्यायाचा मुक्काम बराच दूर आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता घडवण्याचं मोठं काम करत राहावं लागणार आहे.

आर्थिक विषमता तीव्र होते आहे. कोविडच्या काळात स्थिर आणि उच्च उत्पन्न असलेल्यांना फारशी झळ पोहोचली नाही. तथापि, हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती शोचनीय झाल्याचं आपण पाहिलं. आर्थिक विषमता वाढत राहिली तर महत्प्रयासानं उभारलेली आपली ही लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला होता. तो लक्षात घेणे गरजेचे आहे.

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच प्रकारची स्वातंत्र्यं संविधानानं दिली आहेत. ही स्वातंत्र्यं इतरांच्या याच स्वातंत्र्यांना धक्का न पोहोचवता भोगावयाची आहेत. विशिष्ट विचाराचा स्वीकार आणि त्या विचाराची भाषण, लेख, नाट्य, सिनेमा, कथा, कविता, चित्र आदि माध्यमांद्वारे अभिव्यक्ती करणं याचा व्यक्तीला अधिकार आहे. वास्तविक, भारतीय परंपरा ही परस्परांच्या आस्थांचा आदर राखणारी आहे. हा आदर राखून धर्ममतांची चिकित्सा करण्याचा संदेश देणारे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. मध्ययुगात कबीर, रविदास, तुकोबा, जनाबाई, बुल्लेशहा आदि संतांनी कर्मकांडावर आघात केलेत. ब्रिटिश काळात नवशिक्षण घेतलेल्या पिढीतील महात्मा फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे वगैरे समाज सुधारकांनी हे चिकित्सेचं प्रबोधन खूप पुढं नेलं.

मात्र आज लोकांच्या धार्मिक-जातीय भावना फारच हळव्या झालेल्या दिसतात. त्याचा फायदा संविधानातील मूल्यांचे विरोधक घेतात. भिन्न मतं मांडणाऱ्यांना धमक्या देतात. प्रत्यक्ष हिंसेवर उतरतात. टीकेला उत्तर टीका हेच आहे. मतभेद असलेल्यांना धमक्या वा हिंसा हे उत्तर कदापि असता कामा नये. ‘वादे वादे जायते-तत्त्वबोधः’ हे प्राचीन विचारसूत्र आपल्या संविधानानंही अधोरेखित केलं आहे. ते धोक्यात येणं हे समाजाच्या पतनाचं लक्षण आहे. आधी मनांचं आणि नंतर देशाचं विघटन होतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

ही स्वातंत्र्यं व्यक्तीला दिलेली आहेत. उदाहरणार्थ, प्रौढ स्त्री-पुरुषांना पसंतीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यांच्या जातीच्या वा धर्माच्या समूहाने त्यात बाधा आणता कामा नये. आपापले धर्म कायम ठेवून विशेष विवाह कायद्याखाली लग्न करता येतं. अशा लग्नांना प्रोत्साहन, संरक्षण आणि सहाय्य देणं हे शासनाचं कर्तव्य आहेच. पण समाजानेही ते मनापासून स्वीकारणं आवश्यक आहे. समाजाच्या निरामय वाढीसाठी ते गरजेचं आहे.

====

भाग ४

या शेवटच्या भागात आपण समता आणि बंधुता या संविधानातल्या मूल्यांचा परिचय करुन घेणार आहोत.

देशातील प्रत्येक नागरिकाचा धर्म, लिंग, जन्मस्थान, भाषा कोणतीही असो, हे सर्व नागरिक कायद्यापुढे समान असतील आणि त्या सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असेल. तथापि, समता म्हणजे एवढंच नव्हे. संविधानाच्या उद्देशिकेत समतेचा उल्लेख करताना ‘दर्जाची व संधीची समानता’ असं म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा वा मूल्य समान असेल. या सर्वांना विकासाची संधी समान असेल. पाच-सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. महाराष्ट्रातील दोन धर्मस्थळांत पुरुषांना जिथवर प्रवेश दिला जातो, तिथवर आम्हालाही प्रवेश द्या, अशी त्या त्या धर्मातल्या महिलांनी मागणी केली होती. या मागणीच्या मागे स्त्री आणि पुरुष या दोहोंचा दर्जा संविधानानं समान मानला आहे, हे सूत्र होतं. बरीच आंदोलनं या महिलांनी केली. नंतर न्यायालयात त्यांनी दाद मागितली. न्यायालयानं संविधानातील दर्जाच्या समानतेचं तत्त्व प्रमाण मानून या महिलांच्या बाजूनं न्याय दिला.

समान संधी याचा अर्थ तगडे आणि दुबळे यांची एकाच रेषेवरुन स्पर्धा लावणं नव्हे. यात तगडे जिंकणार हे उघडच आहे. समाजातील संसाधनं तसेच विकासाच्या संधी यांत खुली स्पर्धा ठेवली, तर समाजातील ताकदवान व्यक्ती वा समूहच त्यांवर कब्जा करतील आणि दुबळ्या व्यक्ती वा समूह वंचित राहतील. त्यांच्या प्रति न्याय होणार नाही. म्हणून अशा दुबळ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी, सवलती, राखीव जागा यांची व्यवस्था सरकार करतं. ही सकारात्मक विषमता खरी समता अस्तित्वात येण्यासाठी गरजेची आहे. अर्थात, दुबळे अन्य सशक्तांबरोबर स्पर्धा करायला तयार होईपर्यंतच ही वेगळी तरतूद, सवलत वा राखीव जागा असणार आहेत.

बंधुतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनन्यसाधारण महत्व देतात. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही एक तत्त्वत्रयी ते मानतात. यातलं कोणतंही एक वगळून चालणार नाही. बंधुता नसेल तर न्याय, स्वातंत्र्य, समता यांच्या रक्षणासाठी पोलीस ठेवायला लागेल असं ते म्हणतात. समाजातील व्यक्तींना परस्परांबद्दल आपुलकी, ममत्व नसेल, तर दुसऱ्याचं दुःख कळणार कसं? ते कळलं नाही तर त्यावर उपाय करायला पुढं येणार कसं? समाजातले दुबळे, उपेक्षित समूह, अल्पसंख्य, स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायानं मन कळवळलं तरच त्यांच्या संरक्षणासाठी लोक पुढे येतील. या विभागांबद्दल जर मनात विद्वेष, नफरत असेल, तर त्यांनाही न्याय मिळावा, त्यांनाही समान दर्जा व संधी मिळावी, त्यांनाही सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्यं मिळावीत, यासाठी प्रयत्न वा सदिच्छाही राहणार नाही. अशावेळी संविधानानं या विभागांना दिलेले अधिकार संविधानातच राहतील. ते प्रत्यक्षात येणार नाहीत.

‘व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता’ अशी शब्दरचना उद्देशिकेत आहे. यातील क्रम महत्वाचा आहे. इथं व्यक्ती प्रथम आहे. व्यक्तीचं सुख हा आपल्या संविधानाचा केंद्रबिंदू आहे. या व्यक्तीसाठी राष्ट्र आहे. राष्ट्रासाठी व्यक्ती नव्हे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता आवश्यक आहे, ती व्यक्तीच्या भल्यासाठी. हे सूत्र कळलं, तर ‘राष्ट्र म्हणजे भूप्रदेश नव्हे; तर तेथील लोक’ आणि या लोकांचं कल्याण म्हणजेच राष्ट्रकल्याण हे आपल्या मनात दृढ होईल.

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांच्या या ओळखीतूनच आपल्या भारतीयत्वाची ओळख सिद्ध होते, हे आपल्या ध्यानी आलं असेलच.

====

हिजाब काढणे व घालणे या दोहोंतील सक्तीच्या मी विरोधात


मुस्लिम मुली हिजाब घालतात तो त्यांचा अभिमानाचा मुद्दा माझ्या दृष्टीने नक्कीच नाही. तो पुरुषी वर्चस्वाचाच धर्मातला भाग आहे. तो जायला हवा, हेच माझे मत आहे. पण तो निर्णय त्या मुलींचा हवा. त्यासाठीचे प्रबोधन व संघर्ष त्या समाजांतर्गत व्हायला हवा. इराण मध्ये तो सुरु आहे. त्याचे मी स्वागत करतो. हिजाबच्या सक्तीपायी महसा अमिनी या इराणी युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्या विरोधात इराणमध्ये तेथील प्रतिगामी राजवटीविरुद्ध जो प्रक्षोभ उसळला आहे, ते समाजाला पुढे नेणारे पाऊल आहे, असेच मला वाटते. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.
तथापि, "जब मुस्लिम देश ईरान में हिजाब के खिलाफ उठ रही आवाज तो फिर हिंदुस्तान में इसके समर्थन में हंगामा क्यों?" हा प्रश्न उपस्थित करणारे एकतर सरळ मार्गी आहेत, अज्ञानी आहेत किंवा मतलबी. इराण व भारत येथील स्थिती एक नाही. दोन्ही समाजातले ताणेबाणे व वर्तमान अंतर्विरोध सारखे नाहीत.
इराणमध्ये एकाच धर्मातल्या कर्मठ व प्रगतीशील या दोन गटांत संघर्ष आहे. भारतात हिंदू कट्टरपंथी हा तिसरा आणि सर्वाधिक ताकदीचा घटक आहे. जो सर्वार्थाने प्रतिगामी आहे. सर्व प्रगतीशील मूल्यांचा तो शत्रू आहे. त्याचा शासन-प्रशासनावरही प्रभाव आहे. त्याचा शिक्षण संस्थांत मुलींनी हिजाब घालण्याला विरोध हा सेक्युलॅरिझम वरील विश्वासापायी नसून मुस्लिम द्वेषातून आहे. 'हे हिंदू राष्ट्र आहे. इथे मुस्लिमांनी मापात राहा', असे ते मुस्लिम मुलींच्या हिजाबला विरोध करण्याच्या मिषाने बजावत आहेत. मुस्लिम मुलींविषयी कणव वा न्याय ही त्यांची भावना नाही.
अशावेळी परधर्माचे कोणी मला जबरदस्तीने मी ज्याला (अज्ञान, रुढी याने का होईना) मानबिंदू मानते, ती बाब काढायला सांगत असेल तर मी त्या बाबत अधिकच आग्रही राहणार. कारण तो माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, पर्यायाने माझ्या अस्तित्वावरचा घाला आहे, असे मी मानते. कर्नाटकातल्या मुलींची ही मनःस्थिती समजून घ्यायला हवी.
त्यामुळे इतरांना हानी न पोहोचवणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे ही भूमिका या स्थितीत योग्य राहील. यात हिजाब नाकारणाऱ्या इराण मधील मुस्लिम स्त्रिया आणि हिजाब हवा म्हणणाऱ्या भारतातील मुस्लिम मुली या दोहोंच्या व्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा द्यावा लागेल. यात मला विसंगती दिसत नाही.
इराणमध्ये महिला एकाच शत्रूशी लढत आहेत. भारतात मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही कट्टरपंथीयांशी एकाच वेळी लढायचे कसे? एकाला विरोध करताना दुसऱ्याला त्याचा फायदा होता कामा नये, यासाठीची रणनीती काय? कार्यक्रम काय? ...हा पेच सोडवण्याचे परिणामकारक मार्ग पुढे येईपर्यंत व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याला धरुन दोन्ही देशांतील मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्याची माझी भूमिका राहील. त्याचवेळी हितचिंतक म्हणून हळुवारपणे, जमेल तसे, जमेल तिथे, जमेल तेवढे, हिजाब घालणे ही गुलामी आहे, हेही नोंदवण्याचा प्रयत्न मी करत राहणार.
- सुरेश सावंत

'धर्म आणि संविधान' पुस्तिकेचे प्रकाशन

'दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा परिवार' साठी मी लिहिलेल्या 'धर्म आणि संविधान' या पुस्तिकेचे आज अन्नपूर्णा परिवाराच्या वारजे, पुणे येथील सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख मेधाताई सामंत, कॉ. सुरेश धोपेश्वरकर, प्रमोद मुजुमदार, वृषाली मगदूम तसेच संस्थेचे अन्य विश्वस्त मंचावर उपस्थित होते. तत्पूर्वी 'धर्म, धार्मिकता आणि धर्मांधता' या विषयावर प्रमोद मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात नीलम पंडित, संकेत मुनोत, परिमल माया सुधाकर, तमन्ना इनामदार व प्रशांत केदारी हे वक्ते होते.
_______

धर्म आणि संविधान
सुरेश सावंत
पृष्ठे : ८० | किंमत : ६० रु.
_______

पुस्तिका मिळण्याचे ठिकाण :

दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा परिवार, सुवास्तू प्रेस्टिज, आदित्य गार्डन सिटी जवळ, मेघमल्हार सोसायटी शेजारी, आर. एम. डी. इन्स्टिट्यूटच्या मागे, मुबई - गोवा हायवे जवळ, वारजे, पुणे - ४११०५८
मो. क्र.: ९३७२७१५४२१; ९९२२९६७०००

काही काळात खालील वेबसाईटवर मोफत download करण्यासाठी पुस्तिका उपलब्ध होईल :
यथावकाश या पुस्तिकेचा इंग्रजी अनुवादही प्रकशित होणार आहे आणि तोही वरील वेबसाईटवर उपलब्ध होईल.

Monday, May 2, 2022

सोलापुरातील बाबासाहेबांची चळवळ


गूगलच्या नकाशात एका मोठ्या भूभागातील छोटे ठिकाण आकार वाढवून (zoom in) आपण पाहतो तेव्हा त्यातील अनेक बारीक तपशील आपल्यासमोर येतात. थोरांच्या चरित्राचेही तसेच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र चरित्र आपण वाचलेले असते. त्यात चळवळीच्या निमित्ताने भेटी दिलेल्या, काही कार्यक्रम घेतलेल्या शहरांचे, गावांचे उल्लेख येतात. तथापि, त्यांचे विस्तृत वा सखोल विवेचन, वर्णन तिथे नसते. ते शक्यही नसते. मात्र असे तपशील कळले तर बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या भूमिकांविषयी, आंदोलनाविषयी, संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या ताकदीविषयी अधिक जाणता येऊ शकते. ही उणीव भरुन काढण्याचे प्रयत्न अभ्यासकांनी, त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी करावयाचे असतात. पण तसे होतेच असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या महाराष्ट्रातील विविध भागांतील संचाराविषयी तेथील मंडळींनी तपशील गोळा करुन असे काही लिहिल्यास बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, तेथील जनतेच्या प्रेरणा व स्पंदनांविषयी बऱ्याच बाबी उजेडात येऊ शकतील, अधिक ठळक होतील. हे घडू शकते, अगदी प्रभावीपणे घडू शकते, याचा नमुना म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचे ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकाखाली अधिक स्पष्टतेसाठी ते नोंदवतात – ‘रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले सोलापूर.’ सोलापुरातील बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारे हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे. वयाच्या ऐंशिव्या वर्षी कोविडच्या काळात दत्ता गायकवाड हा प्रकल्प हाती घेतात व विविध संदर्भ शोधत, अभ्यासत तडफेने पूर्ण करतात, हे विशेषच म्हणावे लागेल आणि त्यासाठी त्यांना धन्यवादच द्यावे लागतील.

पुस्तकाच्या परिचयादाखल काही बाबींची नोंद इथे करत आहे.

१९२४ ते १९५४ या कालखंडातील सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतील वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातील विविध भागांतील या नोंदी आहेत. पहिल्या प्रकरणात बार्शीच्या भेटींविषयी लिहिताना १९२४, १९३७ व १९४१ अशा तीन भेटी बाबासाहेबांनी बार्शीला दिल्याचे ते सांगतात. २४ साली बाबासाहेब ३३ वर्षांचे युवक होते. मात्र त्याही वयात दलित जनतेने त्यांना आपल्या उद्धारकर्त्याचे स्थान दिले होते. ‘बाबासाहेब कोण हाय – दलितांचा राजा हाय’ ही घोषणा प्रत्येक भेटीवेळी लोक देताना दिसतात. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठीची लोकांची आतुरता, त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून लोकांची साधनांची कमतरता असलेल्या त्या काळातली धडपड यांचे चित्रदर्शी वर्णन या पुस्तकात आहे. बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर त्या गावातील लोक आपल्या अन्य गावांतील सोयऱ्याधायऱ्यांना आमंत्रित करत असत. बाबासाहेब कितीही विरोध करत असले, तरी लोक पाया पडायला धडपडत असत. समता सैनिक दलाचा बंदोबस्त असतानाही एक बाई एका स्वयंसेवकाच्या पायातून शिरली व बाबासाहेबांच्या चरणांवर पडली. मरिआईच्या कट्ट्यावर बाबासाहेबांनी सभा घेतल्याची कोंडाबाई कांबळे या वयोवृद्ध बाईंची आठवण लेखक नोंदवतात. एके ठिकाणी बाबासाहेबांना उतरण्यासाठी योग्य जागा नव्हती म्हणून शाळेतला एक वर्ग स्वच्छ केला जातो. तिथे गादी, पलंग घातला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी दलित समाजातील तरुण पहिलवान चहुबाजूंनी रात्रभर पहारा देतात. त्या काळात लोकांच्या बाबासाहेबांच्या प्रति काय भावना आहेत, याचा अंदाज आपल्याला असतो. पण त्याचे हे तपशील वाचल्यावर आपणास त्याची अचंबित करणारी प्रचिती येते.

मोठ्या चरित्रात छोट्या घटना व त्यातील मानवी संबंध फारसे व्यक्त होत नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई गरोदर असताना त्यांची प्रकृती खालावली होती. हवापालटासाठी मुंबईच्या बाहेर नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी सोलापुरातील बावी येथे रमाई सहकुटुंब राहिल्या होत्या. सत्यशोधकी विचारांच्या वालचंद कोठारींनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. त्या वसतिगृहात रमाई उतरल्या होत्या. निंगप्पा ऐदाळे हे आधी शाहू महाराजांकडे असलेले बाबासाहेबांचे सहकारी वसतिगृहाची व्यवस्था पाहत असत. त्यांची पुतणी गंगुबाई या रमाईंच्या सहवासात होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात रमाईंविषयीच्या या काळातील आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील एक अवतरण लेखकांनी या पुस्तकात दिले आहे. इतिहास लेखनाचे हे स्रोत गायकवाडांनी उजेडात आणले आहेत. अन्यथा ते अंधारातच गुडूप झाले असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक आणि निजामाचे हस्तक होते, हे दोन आरोप आजही हितसंबंधी मंडळी करत असतात. हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत, हे बाबासाहेबांच्या भूमिकांचे वस्तुनिष्ठ परिशीलन करणाऱ्यांना लक्षात येते. या पुस्तकात २२-२३ फेब्रुवारी १९४१ च्या सोलापुरातील कसबे तडवळे येथे झालेल्या महार मांग परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील काही उतारे आहेत. त्यातील एक खाली देत आहे. त्यावरुन या आरोपांचा फोलपणा आपल्याला सहज ध्यानात येतो. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात -

“निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे. ही गोष्ट अस्पृश्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हिंदी संघराज्यात सामील होण्याला निजामाचा विरोध आहे. ...त्याबद्दल त्याची गय करता कामा नये. तसेच निजाम हा अस्पृश्यांचा आणि अस्पृश्यांच्या मातृभूमतीचा शत्रू आहे. म्हणून हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यप्रिय दलितांनी हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे.”

अशा परिषदांमध्ये व्यापक धोरणासंबंधी तसेच स्थानिक प्रश्नासंबंधीचे ठराव होत असत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणेबरोबरच शिक्षण, संघटन व राजकारण यांची अपरिहार्यता समजून सांगत. त्या त्या वेळच्या ऐरणीवर आलेल्या (उदा. महार वतन खालसा करण्याची गरज) मुद्द्यांविषयी सविस्तरपणे समजावत असत. वैज्ञानिक दृष्टी असलेला नवा माणूस घडविण्यासाठी जुनाट अंधरुढींवर ते प्रहार व त्याचे प्रात्यक्षिक करत असत. या परिषदांच्या वेळी गोसावी, पोतराज, माळकरी, जटाधारी यांनी आपापल्या अंगावरच्या माळा, आभरान, भगव्या कफन्या स्टेजजवळच्या खड्ड्यात टाकून त्यावर रॉकेल ओतून त्यांचे दहन केल्याचे प्रसंग लेखकाने चितारले आहेत. देवदासींनी आपल्या जटा कापून त्यांना जाळल्याचेही प्रसंग यात आहेत. या परिषदांवेळी प्रबोधनात्मक जलसे होत. या जलशांत काही ठिकाणी स्टेजवर महिला सहभागी झाल्याचीही नोंद या पुस्तकात आहे. पाण्यासाठी अस्पृश्यांची स्वतंत्र विहीर बांधली जाते. तिला ‘आंबेडकर बावडी’ नाव पडते. या विहिरीचे उद्घाटन बाबासाहेब करतात. त्यांच्या हातून पाणी पिण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. हाही प्रसंग लेखकाने नोंदवला आहे. बाबासाहेबांच्या विचार-प्रेरणेची ऊर्जा माणसाचे माणूसपण कसे जागे करते त्याची कैक उदाहरणे सोलापुरातील या हकिगतींत आढळतात.

येवल्याला १९३५ साली धर्मांतराची घोषणा होण्यापूर्वी त्याबाबतचे सूतोवाच कितीतरी आधी सोलापुरात बाबासाहेब करतात. सोलापूरची मिल मालकाने बंद केल्याने खाजगी संपत्तीच्या अधिकारासंबंधीची पहिली घटना दुरुस्ती होते. गाडगे महाराज आजारी असताना भेटायला आलेल्या बाबासाहेबांना आपली पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा शैक्षणिक कामासाठी दान करतात. अशा अनेक घटनांची नोंद या पुस्तकात आहे.

बाबासाहेबांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, चळवळीसाठी विविध मार्गांनी सहकार्य करणारे दलित व सवर्ण सहकारी हे आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य राहिले आहे. सोलापुरातील अशा सहकाऱ्यांचे पुस्तकात प्रसंगाप्रसंगाने उल्लेख, वर्णने येतातच. त्याचबरोबर लेखकांनी शेवटी त्यावर खास प्रकरणच लिहिले आहे. अशा सहकाऱ्यांची सविस्तर माहिती त्यात आहे. मोठ्या चरित्रात ठळक नावे येतात. बाकी असंख्य कार्यकर्ते विस्मृतीत जातात. स्थानिक चळवळीच्या इतिहासाची नोंद करणाऱ्या अशा पुस्तकांतून त्यांचा यथोचित परिचय देणे ही त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेबांचे जवळचे सहकारी जिवप्पा ऐदाळे अखेरपर्यंत निष्कांचन होते, हे इथे आपल्याला कळते. सोलापुरातील बाबासाहेबांच्या समकालीनांमध्ये वालचंद कोठारी, निंपप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, उद्धव शिवशरण, जनार्दन सोनकांबळे, जी. आर. देशपांडे, दादासाहेब व भालचंद्र मुळे, एन. टी. बनसोडे, जी. डी. जाधव, हणमंतू सायन्ना यांची विस्तृत नोंद लेखकांनी केली आहे. जी. डी. जाधवांची एक हकिगत इथे कळते. महाडच्या संग्रामातील एक प्रमुख नेते अनंतराव चित्रे यांच्या घरी जेवणाच्या पंगतीत त्यांची कन्या जाधवांच्या नजरेस पडते. ते तिला मागणी घालतात. सगळ्यांना आनंद होतो. त्यांचा विवाह चळवळीतून झालेला आंतरजातीय विवाह होता.

पुस्तकाच्या परिचयाच्या अखेरीस येताना बाबासाहेबांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सोलापुरातातील भेटींतही कसे दिसते, हे लक्षात घेणे उद्बोधक ठरेल. बाबासाहेब कमालीचे लोकशाहीवादी, विचार स्वातंत्र्यवादी होते. मतभिन्नता असलेल्यांचा दुस्वास नव्हे, तर त्यांचा आदर करणे, मात्र त्याचवेळी आपली मते पातळ न करता रोखठोक मांडणे हे बाबासाहेबांचे खास वैशिष्ट्य होते. बाबासाहेबांच्या या गुणामुळेच तर त्यांना त्यांच्याशी अनेक बाबतींत असहमती असणारेही भेटीचे निमंत्रण आग्रहाने देत असत. सोलापुरील अशा तीन भेटी लेखकांनी नोंदवल्या आहेत.

त्यातील एक, बार्शीच्या महात्मा गांधी छात्रालयाचे अ. दा. सहस्रबुद्धे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या बोर्डिंगला बाबासाहेबांची भेट. ही आठवण सहस्रबुद्धे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात – “बाबासाहेबांनी प्रथम मला माझे नाव विचारले. मी सहस्रबुद्धे असे सांगितले.” त्यावर बाबासाहेब काय म्हणाले त्याची नोंद ते करतात – “म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात तर! ब्राम्हण लोकांत माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत. माझ्या चळवळीत अनेक ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आहेत. ब्राम्हण्यवृत्ती असलेल्या सनातनी ब्राम्हणांबद्दल मात्र मला मनस्वी चीड आहे.”

बाबासाहेब सहस्रबुद्धेंना विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी विचारतात. त्यावर सहस्रबुद्धे सांगतात – “बोर्डिंगमधील महार विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचा अत्यंत प्रभाव आहे. हिंदू धर्माचे सण, उपवास, प्रार्थना या बाबी त्यांना अजिबात पसंत नाहीत. आषाढी, कार्तिकी या एकादशीच्या दिवशी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भाजीभाकरीचे जेवण आम्ही देतो व मांग, चांभार विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य देतो. आश्रमीय प्रार्थना महार विद्यार्थ्यांना पसंत नसते म्हणून सर्वांच्या संमतीने वंदे मातरम ही प्रार्थना बोर्डिंगमध्ये होते. सूतकताई मुलांच्या इच्छेवर ठेवली आहे. विद्यार्थ्यांवर बळजबरीने कोणतीही गोष्ट लादली जात नाही. अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मी जास्त काळजी घेतो. विद्यार्थी शिकावेत, शहाणे व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी योग्य वाटेल तो सामाजिक, राजकीय विचार स्वीकारावा हे येथील बोर्डिंगचे वैशिष्ट्य आहे.”

सध्याचे हिजाब प्रकरण आठवून पहा. सर्वसमावेशी सेक्युलर धोरण काय असावे याची १९३४ सालची ही नोंद आहे. ती मुद्दाम सविस्तर दिली. आंबेडकर व गांधीवादी या दोहोंतल्या संवादातले हे मूल्य आपण आज गमावत आहोत. धूसर करत आहोत.

दुसरी भेट आहे, १४ जानेवारी १९४६ रोजीची. बाबासाहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापुरातील सावरकर मंडळाने तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेब सहभागी झाले. तिसरी भेट एम. एन. रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सोलापुरातील कार्यालयास भेट.

गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट या तिन्हींशी बाबासाहेबांचे मतभेद किती तीव्र होते हे जगजाहीर आहे. अशावेळी या कोणालाही अस्पृश्य न मानता त्यांच्याशी माणूस म्हणून संवादी राहण्याची बाबासाहेबांसारख्या महामानवाची ही भूमिका आजच्या परमत असहिष्णुतेच्या वास्तवात खास अधोरेखित करण्याची गरज आहे.

बाबासाहेबांच्या चळवळीचा आपापल्या जिल्ह्यातील मागोवा घेण्याची प्रेरणा या पुस्तकाने नक्कीच संबंधितांना मिळेल आणि त्या योगे दत्ता गायकवाडांचे ऐंशिव्या वर्षी असे पुस्तक लिहिण्याचे श्रम अधिकाधिक सार्थकी लागतील असे मला वाटते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मे २०२२)

____________

चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दत्ता गायकवाड

सुविद्या प्रकाशन

पृष्ठे ३०३ | मूल्य ३५० रु.

संपर्क क्रमांक : ९९७५६२६७१०

_____________

कळल्यावरी कुठे कशास्तव…

सध्या आमचे सामाजिक सलोखा अभियान सुरु आहे. चेंबूर-मानखुर्द-ट्रॉम्बे परिसरातील साधारणपणे दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या वस्त्यांत आमच्या बैठका, भेटीगाठी सुरु आहेत. आमच्या म्हणजे संविधान संवर्धन समितीच्या. संविधानावरील हल्ल्यांच्या विरोधात आवाज उठवणे, चळवळ करणे हे या संघटनेचे काम. या कामाचा एक महत्वाचा भाग म्हणून संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून ती करत असते. संविधान जागर यात्रा, कलापथक, महामानवांचे जन्म-स्मृतिदिनांचे उत्सव त्यांच्या विचारांचे संविधानाशी नाते जोडून साजरे करणे हेही तिचे उपक्रम. संविधानाला इजा पोहोचवणाऱ्या राजकीय-सामाजिक कृत्यांविरोधात निदर्शने-आंदोलनांद्वारे प्रासंगिक प्रतिसाद देत असते.

यावेळचा प्रसंग होता व आहे, तो राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याच्या इशाऱ्याचा. हा इशारा उघडच हिंदू-मुस्लिम तणावातून प्रक्षोभक वातावरण तयार करण्यासाठी आहे. सध्या देशभर अशा सांप्रदायिक आणि संविधानातील मूल्यांची गळचेपी करणाऱ्या घटनांना ऊत आला आहे. केंद्रात सरकार म्हणून आणि रस्त्यावर पक्ष म्हणून भाजप आपल्या परिवारातील कट्टर हिंदुत्ववादी शक्तींना चालना देत आहे. उरल्या सुरल्या संविधानाला कायमची मूठमाती देऊन २०२४ पर्यंत त्यांना अपेक्षित हिंदू राष्ट्र प्रत्यक्षात आणण्याचे संघपरिवाराचे लक्ष्य साधण्यासाठी या शक्तींच्या हालचालींचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजप विरोधी मोहिमेत जान फुंकणाऱ्या राज ठाकरेंनी ईडीच्या भयाने असो वा त्यांना नवा साक्षात्कार झाला म्हणून असो, शीर्षासन करुन त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मालिक से वफादार होत ते मुसलमानांच्या मागे लागले आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्द्यामागे भाजप-संघ परिवाराची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आज हा तर उद्या दुसरा मुद्दा घेऊन त्यांचा विखारी प्रचार वा घातक कारवाया चालणारच आहेत. देश ज्या मूल्यांवर उभा राहिला, तो पाया उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधी युद्धातली ही लढाई आहे, हे लक्षात घेऊन राज ठाकरेंचा इशारा गंभीरपणे घेणे भाग आहे. या इशाऱ्यात ते वेगवेगळे बदल करु शकतात. पण हे सर्व बदल हिंदू-मुस्लिम तणाव वाढवत दंगली घडवण्याच्या दिशेने जाणारे असतील, एवढे नक्की दिसते आहे.

त्यामुळेच मुस्लिमांतही या इशाऱ्यानंतर असुरक्षितता व अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. वस्त्यांत फिरताना ते जाणवते. ९२-९३ च्या दंगलींच्या आठवणी आमच्या या वस्त्यांतल्या बैठकांत निघत आहेत. आमच्या मोहिमेची या क्षणीची मांडणी आहे ती सामाजिक सलोखा राखण्याची. आपल्या वस्तीत कोणत्याही प्रकारे तीन मे नंतर वा त्यापुढच्या नजिकच्या काळात सांप्रदायिक टकराव होता कामा नये. कोणी कितीही उसकवले तरी हिंदू-मुसलमानांनी हिंसेला प्रवृत्त होता कामा नये. अगदी अजानच्या वेळी मशिदीसमोर जाणून बुजून हनुमान चालीसा वा तत्सम प्रकार घडले तरी मुस्लिम समाजातून त्याला प्रतिक्रिया येता कामा नये, असे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.

या बैठकांना हिंदू, मुस्लिम, बौद्ध समुदायांचे लोक हजर असतात. ‘आमच्या वस्तीत आम्ही सगळे एकत्र आहोत. इथे काही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही’, असे सांगतात. ९२-९३ ला आम्ही भोगले आहे. महागाई, करोना यांनी एवढी हालत झाली आहे की माणसे या राज ठाकरेच्या नादाला लागणार नाहीत, असेही काहींना वाटते. ‘तुमचे हे एकजुटीचे वातावरण चांगलेच आहे. ९२-९३ चा धडा आपल्या लक्षात आहे, हे उत्तम आहे. पण त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीचे काय? ती आज राज ठाकरेंसारख्यांना प्रतिसाद काय देते, याचा विचार आपण कसा करणार?’ ..असे प्रश्न आम्ही उपस्थित केल्यावर त्याला लोकांची उत्तरे ठाम नसतात. आपल्या वस्तीत आपली मुले काही गडबड करणार नाहीत, इथून बाहेर गडबड करायला जाणार नाहीत, बाहेरची मुले गडबड करायला इथे येणार नाहीत, यावर आपण नजर ठेवणे, काही होण्याची तयारी चालल्याचे कळल्यास लगेच पोलिसांना खबर करणे या दक्षता लोक मान्य करतात.

वाशिनाक्याच्या मुकुंद नगर मध्ये बौद्धांनी बुद्धविहाराच्या पटांगणात हिंदू व मुसलमानांना एकत्र करुन इफ्तारची पार्टी दिली होती. ही नक्कीच विशेष बाब होती. या वस्तीत वर्षभरापूर्वी हिंदू-मुसलमान संघर्ष झाला होता. त्या पार्टीनंतर तिथेच निवडक लोकांबरोबर आमची बैठक झाली. स्थानिक नगरसेवकही होते. एकजुटीचा महिमा सगळ्यांनीच गायला. हा मुख्य मुद्दा झाल्यानंतर एकाने नगरसेवकापुढे अडून राहिलेल्या रस्त्याचा प्रश्न मांडला. रस्ता नसल्याने अंत्ययात्रेवेळी मयत कसे रेल्वे रुळांवरुन उचलून न्यावे लागते वगैरे. नगरसेवक म्हणाले, ‘मी माझ्या खर्चाने रस्ता पूर्ण करायला तयार आहे. पण तुमच्यातली भांडणे मिटवा.’ बैठक झाल्यावर अधिक चौकशी केली तेव्हा कारण कळले ते असे. एका बाजूला मशीद आणि एका बाजूला होऊ लागलेले मंदिर यांतले एक हटवल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही.

हा प्रश्न इफ्तार पार्टीने सुटत नाही. त्याला सततच्या संवादाचे, विश्वास निर्माण करण्याचे आणि हे करु शकणारे लोक तिथे असण्याची गरज आहे. धारावीत ९३ च्या दंगलीनंतर एका वस्तीत शेजारच्या गल्ल्यांत राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांनी एका रात्रीत भिंत उभी केली होती. तिथे राष्ट्रीय एकता समिती म्हणून आम्ही काम करत होतो. एका बाजूला जाळलेल्या घरांबाबतचे, मनुष्यहानीचे मदत कार्य आणि दुसऱ्या बाजूला मने सांधण्याचे काम आम्ही करत होतो. मने सांधण्याच्या गटाचा मी भाग होतो. या दोन्ही समूहांची आधी अतितीव्र प्रतिक्रिया होती. भिंत राहणारच यावर ते अटळ होते. रोजच्या आमच्या भेटींनी ही तीव्रता कमी होत गेली. अखेरीस ते राजी झाले. भिंत तुम्ही पाडा असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही भूमिका घेतली – ‘भिंत तुम्ही बांधलीत. तोडायची तुम्हीच.’ पुढे भिंत त्यांनी तोडली. आमचे मिशन यशस्वी झाले. वस्त्यांतले असे प्रश्न सोडवायला असा सततचा संवाद करणारे, नैतिक अधिकार असलेले लोक, संघटना गरजेचे आहे. प्रासंगिक भेटींतून वा मनोमीलनाच्या कार्यक्रमांतून हे आपोआप घडेल असे समजणे योग्य नाही. असे प्रसंग हा या मोहिमेचा प्रारंभ वा क्रमातला टप्पा समजला पाहिजे. तेच अंतिम ध्येय असू नये.

रामनवमीच्या दिवशी रात्री उशीरा मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीत जी तोडफोड झाली तिथे आम्ही काहींना भेटलो. यापूर्वी अशी मिरवणूक कधीही इथून गेलेली नाही. यावेळी जाणूनबुजून तरुणांच्या एका गटाने ती काढली. हे बाहेरचे लोक होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मशिदीच्या जवळ आल्यावर मुद्दाम घोषणा आणि डिवचणारी भाषा वापरली गेली. त्यातून बाचाबाची झाली. मिरवणूक काढणारे परत गेले आणि रात्री उशीरा मोठ्या संख्येने येऊन मशिदीच्या आसपासच्या परिसरातील वाहने त्यांनी तोडली. ही वाहने काय फक्त मुसलमानांची नव्हती. मशीद व अन्य इमारती जवळ जवळ आहेत. मुस्लिम, हिंदू आणि लक्षणीय संख्येने बौद्ध इथे राहतात. सगळ्यांची वाहने तिथे होती.

ही घटना सुटी बघून चालणार नाही. तोडफोड करणारे तरुण भले बाहेरचे असतील. पण या वस्तीत आणि आसपास बजरंग दल, हिंदू शब्दापुढे जागृती, युवा वाहिनी वगैरे असलेल्या संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिंनी बरीच वर्षे आपले जाळे विणले आहे. तरुण मंडळींना सदस्य करण्याची मोहीम आणि विविध हिंदू सणांच्या निमित्ताने वा अन्य निमित्ते तयार करुन त्यांच्या मिरवणुका, मेळावे सतत सुरु असतात. बौद्ध मुलेही त्यांनी गळाला लावलेली आहेत. या संघटनांचा भाजप तर पालकच आहे. पण शिवसेना, मनसेचे लोकही या कट्टरपंथीय हिंदूंच्या बाजूने असतात. वरच्या नेतृत्वाची भूमिका मग काहीही असो. अन्य पक्षांतले हिंदूही या प्रकारच्या ‘हिंदुत्वाला’ सहानुभूत असतात किंवा तटस्थ राहतात. बौद्धांचे म्हणणे असते, आमच्या वाट्याला कोणी जात नाही. अशा एका प्रतिक्रियेवर मी म्हणालो, ‘पण तुम्ही हस्तक्षेप करत नाही ना! कोणा एकाची बाजू भले नका घेऊ. मात्र जे काही करायचे ते कायद्याने करा. संविधानात्मक मार्ग वापरा. हिंसा आम्ही होऊ देणार नाही, असे रस्त्यावर येऊन तुम्ही बजावायला नको का?’ असे बोलल्यावर ‘हो. हा हस्तक्षेप करायला हवा’ यास ते कबूल होतात.

याच म्हाडा कॉलनीतल्या एका विशीतल्या मुलीने वर्षभरापूर्वी मशिदीच्या भोंग्यांविषयी मशिदीच्या आवारात एकटीने जाऊन जाब विचारला होता. तिच्या या शौर्याचे बरेच व्हिडिओ माध्यमांवर त्यावेळी फिरले. देशभरच्या हिंदू कट्टरांनी तिला जोरदार पाठिंबा तिला. घरी येऊन तिचा सत्कार केला. प्रारंभीची आवृत्ती एवढीच होती – या मुलीच्या खिडकीच्या दिशेने मशिदीच्या भोंग्यांचा आवाज थेट येतो. अजान भोंग्यांवर करायला तिचा विरोध नाही. आवाज कमी ठेवा एवढेच तिचे म्हणणे. पुढे जाऊन यात तीव्रता तयार होते. आणि ही मुलगी हिंदू कट्टरांची पाठिराखी होते. किंवा ती या कट्टर हिंदू संघटनांची आधी घटकही असेल. त्यांच्या मोहिमेचा भाग म्हणूनही तिची हे विरोचित कृत्य असेल. आमच्या सहकाऱ्याने रस्त्यावरुन तिच्या खिडकीकडे बोट दाखवले. तिथे भगवा झेंडा लावलेला होता.

या मुलीच्या ट्विटरवर हा लेख लिहिण्याआधी चक्कर मारली. तिथे सलगपणे हिंदू कट्टरांची भलामण करणारे संदेश दिसतात. १० एप्रिलला रामनवमी होती. त्या दिवशी म्हाडा कॉलनीत हिंसाचार झाला. त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे ८ तारखेला तिने युद्धाच्या पवित्र्यातील धनुष्यधारी रामाचे चित्र देऊन एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते – ‘राम बिती हुई हिस्टरी नही, हमारा वर्तमान है, वर्तमान हमें बताता है कि, क्यूं शस्त्र के बिना धर्म की रक्षा नही हो सकती. कोई सीमा पर शस्त्र धारण करता है, इसलिए हमारी धर्मशाला में धर्म नाच रहा है. ध्यान और युद्ध अलग नही किये जा सकते..’

बाकी अनेक ट्विटांमध्ये ‘जय हिंद. जय श्रीराम. स्टँड फॉर ह्युमन राईट्स. जय संविधान. वंदे मातरम.’ असे ती लिहिताना दिसते. तिला पाठिंबा देणाऱ्या हॅशटॅग मोहिमेबद्दल आभार व्यक्त करते. आपण करतो तेच संविधानाला खरोखर अभिप्रेत आहे अशी या मुलांची भूमिका असेल, तर आम्ही संविधानाच्या प्रचार-प्रसाराचे काम करणारे लोक त्यांच्यादृष्टीने स्यूडो ठरतो, हे उघडच आहे.

मशिदींवरचे लाऊड स्पीकर कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत नसतील, तर त्यांची तक्रार जरुर व्हावी. त्यासाठी प्रयत्न करुन थकलेल्या आणि संतप्त झालेल्या मुलीने थेट मशिदीत जाऊन भांडण काढले हे समजू शकते. पण इथे केवळ तसे दिसत नाही. जाणीवपूर्वक मुस्लिमांची खोड काढत, त्यांना डिवचत, अवमान करत त्यांना प्रक्षुब्ध करण्याचा व त्यांच्याकडून हिंसक प्रतिक्रिया आणण्याचा आणि त्यायोगे दंगली घडवण्याचा हा सुनियोजित डाव आहे, याला देशभरच्या अलिकडच्या अनेक घटनांतून पुष्टी मिळते.

माहुल, गवाणपाडा, विष्णू नगर, भारत नगर, टेकडीवरील राहुल नगर, नागाबाबा नगर, अशोक नगर, सह्याद्री नगर, पेट्रोलियम विभागातील वाहतुकीसाठीच्या रेल्वे पटरीच्या आसपासचा परिसर ते चेंबूर कँप इथपर्यंत विविध वस्त्यांमध्ये मी २०-२५ वर्षांपूर्वी साक्षरता आणि पुढे रेशन या चळवळींसाठी खूप हिंडत असे. त्यावेळी न दिसलेली आणि त्यानंतर मी अनेकवेळा या भागात जाऊनही तिचे गांभीर्य न कळलेली बाब म्हणजे संघपरिवारातल्या संघटनांचे वाढते जाळे. मानखुर्दची म्हाडा कॉलनी, पीएमजीपी कॉलनी, साठे नगर, गोवंडीची बैंगनवाडी, शिवाजी नगर ते माहुल-वाशिनाका हा चेंबूर-ट्रॉम्बेचा पट्टा या संघटनांनी प्रचंड पोखरला आहे. वाशिनाक्याच्या रस्त्यावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची विविध निमित्ताने सतत फ्लेक्स पोस्टर्स लागलेली असतात. त्यांच्या मिरवणुका निघत असतात. गेल्या वर्षी आमच्या एका बौद्ध व चळवळीत सक्रिय सहकाऱ्याच्या मुलाचा फोटो बजरंग दलाच्या बॅनरवर मी पाहिला होता. १८ वर्षांच्या खालच्या मुलांचा भरणा यांत मोठा असतो. हिंदू राष्ट्राची मन उचंबळवणारी भावना त्यांना एक ध्येय देते. त्यासाठी मुसलमानांचा निःपात हे कर्तव्य त्यांच्या मनात रुजवले जाते. अनधिकृतपणे शस्त्रे दिली जातात. सोबत बटन नावाने प्रसिद्ध असलेले ड्रग मुबलक दिले जाते. पैश्यांची पाकिटे येतात. रात्री चायनीज वा अन्य हॉटेलांत यांचे अड्डे जमतात. तिथले खर्च कोणी दानी करत असतात. आधी ध्येय, त्यासाठीचा भावनिक उन्माद वाढवणारी कथ्ये, घोषणा आणि त्या सर्वांच्या पोषणासाठी नंतर धनाचा मुबलक आधार हा क्रम असतो. १८ वर्षांच्या खालील मुलांनी गुन्हे केले तरी त्यांना कायद्याने सज्ञान नसल्याचा फायदा मिळून कायद्याच्या कचाट्यातून वा शिक्षेतून ती लवकर बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे या कोवळ्या संस्कारक्षम, भावनाशील आणि ऊर्जावान वयाच्या टप्प्यावर समाज विघातक शक्ती त्यांना पकडतात.

हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर झाले. पण आम्ही नीट पाहू शकलो नाही. ओळखू शकलो नाही. या मुलांशी आपल्याला भेटता येईल का, बोलता येईल का, या माझ्या प्रश्नाला तिथले आमचे सहकारी उत्तर देतात – ‘काही उपयोग नाही. बोलण्याच्या मनःस्थितीतच ही मुले नसतात. पालकांचेही ऐकत नाहीत. बोलणे सहन झाले नाही तर अंगावर येतात.’ पण कसा, कुठे याचा विचार करुन हा संवाद करावाच लागेल, अशी माझी भूमिका आहे. मी ती सहकाऱ्यांशी बोलत असतो. जी मुले यांत नाहीत, त्यांच्यासाठी काय उपक्रम करता येतील, याचा विचार करायला हवा. थेट वाईटाला भिडता आले नाही तरी चांगले वाढवणे हे वाईटाचा परिणाम घटवणारे असते. या दिशेने काही ठरवावे लागेल.

बौद्ध विभाग हा आमचा मुख्य आधार. राजकीयदृष्ट्या अत्यंत दक्ष हा त्याचा लौकिक. पण तोही अंतर्गत फाटाफुटी, नव्या स्थितीच्या समजाचा अभाव यांमुळे या स्थितीत दखल द्यायला पुरेसा सक्षम नाही. त्यातही संघपरिवाराने काहींना गळाला लावले आहे. मातंग, चर्मकार, वाल्मिकी आदि दलित समूह बौद्धांच्या जुटीत येत नाहीत. बौद्धांविषयीच्या खऱ्याखोट्या गृहितकांनी, व्यवहाराने ते बौद्धांविषयी दुस्वास व्यक्त करतात. त्यांना तर संघपरिवाराने कधीच आपलेसे केले आहे. बुद्धविहारातल्या बैठकांत मुस्लिमांविषयी घृणेने बोलणारेही भेटतात. पण ते कमी दिसतात. मातंग-चर्मकारांत ते अधिक असतात. मातंग-चर्मकारांना व्यापक हिंदू आयडेंटी अधिक प्रतिष्ठेची वाटते. साठे नगरच्या मांगिरबाबा मंदिरात मातंग अधिक संख्येने असलेल्या बैठकीत याचा प्रत्यय आमच्या कार्यकर्त्यांना आलाच. मशिदीवरील भोंग्यांबाबत त्यांची प्रतिक्रिया तीव्र होती.

या भेटी-गाठी, बैठका करणे हे कष्टप्रद, कधीकधी नाऊमेद करणारेही काम आहे. आमच्या संघटनेत कोणी पगारी पूर्णवेळ काम करणारे नाही. आपापले व्यवसाय, नोकऱ्या करुन स्वखर्चाने हिंडणारे, वेळ देणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची संख्या प्रसंगाप्रसंगाने कमी वा अधिक असते. कधी कधी एकटे-दुकटेच फिरावे लागते. ज्या वस्तीत स्वतःचा प्रवास खर्च, वेळ काढून जावे, तिथे लोक जमलेले असतील असे नाही. काही वेळा आपल्यालाच लोक जमवावे लागतात. कधीतरी लोक येतच नाहीत. एखाद-दुसऱ्या व्यक्तीशी बोलून पुढची वेळ ठरवून परतावे लागते. बरे या कष्टाची नोंद कोणी तसे घेत नाही. अनेकांना तुम्ही एकटे कुठे हिंडत असता हे कळतही नाही. बैठक झाली आणि त्याचे फोटो फेसबुक-व्हॉट्सअपवर टाकले तरच ते कळते आणि काही लाईक्स मिळतात. त्यामुळे हा उद्योग करण्यापेक्षा फेसबुकवर हिंदू फॅसिस्टांच्या करवायांविषयी प्रतिक्रिया देत राहणे सोपे आहे. त्यातून ‘काही केल्याचे’, त्यांची ‘जिरवल्याचे’ समाधान (जे कृतक आहे) मिळते. आपले समविचारी फ्रेन्ड्स आपल्या या पोस्ट्सची वाहवा करतात. त्यातून आपण रणभूमीवर आहोत आणि शत्रूला खडे चारत आहोत, अशी एक विजयी योद्ध्याची भावना मनात नांदत राहते. ती कमी झाली की पुन्हा एक पोस्ट. पुन्हा विजयी भावना. हे सतत करणाऱ्याला अहर्निश चळवळीच्या कामात आपण आहोत, ही भावना सहज टिकवता येते. कायम ठेवता येते. (हे काहीसे ‘बटन’ च्या नशेसारखे आहे, असा माझा कयास आहे.)

हिंदू कट्टरपंथीयांकडे जे एक ध्येय आणि त्यासाठीची पॅशन आहे, तिची पुरोगामी प्रवाहांत वानवा आहे. हे ध्येय आणि पॅशन कशी आकार घेणार हा मोठा प्रश्न आहे. माझे वैयक्तिक नुकसान या क्षणी काही नाही. माझ्या जीवनमानात काहीही फरक नाही. अशावेळी मला जाणिवेनेच हा धोका समजून घ्यायला हवा. पण आज हे सार्वत्रिक नाही. त्यामुळे मानवाच्या प्राथमिक अवस्थेत अग्नी जपायला गुहेत बसून एखाद-दुसऱ्याला अग्निहोत्र करावे लागे, तसे ते आज ज्यांना कळते त्यांना करत राहावे लागणार आहे. कोण दखल घेतो हा मापदंड असून चालणार नाही.

आमच्या संघटनेच्या प्रवासात कधी वाळवंट, कधी ओढा, कधी एकदम पूर आणि पुन्हा प्रवाहातले खडक उघडे, एकाकी असे होत राहते. संविधान जागर यात्रा एकदम हजारोंच्या; नंतर जेमतेम ५० लोक. कधीतरी नुसतेच एकेकाला भेटत हिंडायचे. कधी संविधानावर भाषणे करायला निमंत्रणे, तर कधी आपणच भाषणांचे ‘वार’ लावून घ्यायचे. म्हणजे मी तुमच्याकडे उद्या संविधानावर बोलायला येतो आहे, जमेल तेवढ्यांना एकत्र करा, असे सांगायचे. मानधन सोडा, चहा कोणी दिला, आपण जाण्याआधी लोकांनी झाडून-लोटून ठेवले यानेच बरे वाटते. औपचारिक कार्यक्रमांत, व्याख्यानांना बोलावून मानधन देणारेही असतात. पण ते अगदीच प्रासंगिक. चळवळीच्या यात्रांसारख्या कार्यक्रमांना लोक आर्थिक सहाय्य करतात. पण दैनंदिन कामांसाठी पैसे उभे राहत नाहीत.

प्रारंभी उल्लेख केलेल्या आमच्या सध्याच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबई पोलीस कमिशनर आले. ते पूर्वनियोजित नव्हते. वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या कानावर आमच्या हितचिंतकांनी ही बाब घातली, विनंती केली आणि ते आले. पण त्यामुळे आमच्या सभेला एकदम प्रसिद्धी मिळाली. ते फोटो फेसबुकवर टाकल्यावर भरपूर लाईक्स, शेअर आणि प्रशंसा आमच्या वाट्याला आली. आमचे लोक खुश झाले. मेहनतीचे चीज झाले असे वाटले.

हे ठीक आहे. त्यामुळे उमेद वाढली. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटे फिरावे लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावे लागेल हे मनात पक्के असायला हवे. या मापदंडांच्या पलीकडे जाऊन ‘कळल्यावरी कुठे कशास्तव, मरणे सोपे रे ध्येयास्तव’ या प्रचितीचा शोध जारी ठेवायला हवा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(मुक्त संवाद, मे २०२२)

Sunday, April 10, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कामगार चळवळीतील भूमिका व कार्य


इयत्ता तिसरीला असताना आम्हाला ‘थोरांची ओळख’ नावाचे इतिहासाचे पुस्तक होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती देणाऱ्या प्रकरणाचे शीर्षक होते ‘दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि त्यातील चित्र महाडच्या सत्याग्रहाचे. त्यावरुन बाबासाहेबांनी फक्त दलितांच्या उद्धारासाठीच काम केले, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबत असे. देशाची घटना त्यांनी लिहिली, ती काही केवळ दलितांसाठी नाही. देशातल्या सर्व जनतेसाठीचे त्यांचे हे कार्य होते, हे पुढे या विद्यार्थ्यांना तसेच लोकांना कळते. पण ही बाब अपवाद आहे, ते दलितांचेच नेते होते, हा समज मनात पक्का राहतो. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीनंतर आणि आता त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतिनिमित्ताने किमान त्यांच्या समग्र कार्याबद्दल लेखन व चर्चा सुरु झाली. स्त्रिया, शेतकरी, कामगार, जलव्यवस्थापन आदि क्षेत्रातले त्यांचे काम तसेच अर्थ-मानववंशशास्त्रीय लेखन, चिंतन यांचा मागोवा माध्यमांतून घेतला जाऊ लागला. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा वा कार्याचा हा आढावा अनेकांना दीपवून टाकतो. तथापि, या बाबी इतक्या सार्वत्रिकपणे प्रचारल्या जात नाहीत; त्यात जातीय संकुचिततेची वाढती धार यांमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे महानपण आकळण्याला मर्यादा पडते हे खरे. म्हणूनच त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामांचा पुन्हा पुन्हा प्रचार करणे भाग आहे. याच हेतूने बाबासाहेबांची कामगार चळवळीतील भूमिका व कार्य यांतील काही बाबींचे विवेचन खाली करत आहे.

१९३६ साली स्थापन झालेल्या त्यांच्या पक्षाचे नावच ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ होते. बाबासाहेबांनी पक्षस्थापनेमागची भूमिका स्पष्ट करताना केवळ अस्पृश्य श्रमजीवी नव्हे, तर सर्वच मजुरांचे हित व कल्याण साधण्यासाठी हा पक्ष काम करेल असे जाहीर केले होते.

कामगार चळवळ ही कम्युनिस्टांच्या कार्याच्या गाभ्याचा भाग. बाबासाहेबही कामगार क्षेत्रात उतरले होते. तथापि, कम्युनिस्टांच्या मांडणी व व्यवहाराबाबत बाबासाहेबांचे मतभेद होते. त्यांच्या मते ‘कम्युनिझम व कामगारवर्गाची चळवळ’ ही एक नव्हेत. ते पुढे म्हणतात- ‘आम्हाला कामगार संघाची चळवळ अवश्य पाहिजे आहे. भांडवलशाहीशी कामगारांच्या वतीने झगडण्याची आवश्यकताही आम्हाला पूर्ण मान्य आहे. इतकेच नव्हे, तर संप हे सुद्धा कामगारांचे एक कायदेशीर शस्त्र आहे असेच आम्ही समजतो. परंतु, या शस्त्राचा जपून व योग्य वेळीच उपयोग करावयाचा असतो.’ कम्युनिस्ट त्यांच्या राजकीय उद्दिष्टांसाठी संपाच्या हत्याराचा वापर करतात. संपासारखे पाऊल उचलताना सर्व बाजूंनी विचार करणे गरजेचे असते. ते त्यांच्याकडून होत नाही, ही बाबासाहेबांची कम्युनिस्टांवर टीका होती. कम्युनिस्टांचा पुढाकार असलेल्या १९३४ च्या गिरणी कामगारांच्या सार्वत्रिक संपाला त्यांचा पाठिंबा नव्हता. पुढाऱ्यांतली मतमतांतरे, कामगारांत अभेद्य एकीचा अभाव, जागतिक मंदीमुळे वाढणारी बेकारी ही पार्श्वभूमी संप यशस्वी होण्यास अनुकूल नाही, असे त्यांना वाटत होते. दोन महिने चाललेला हा संप काहीही तडजोड होण्याआधीच मागे घ्यावा लागला. कामगार चळवळीत डॉ. आंबेडकर फूट पाडत आहेत, असा आरोप करणाऱ्या डाव्यांना ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ या त्यांच्या घोषणेची आठवण ते करुन देतात आणि अस्पृश्य कामगारांशी सवर्ण कामगार जो भेदभाव करतात, त्यावर तुमचे मौन का, असा सवाल करतात. भांडवलशाही व ब्राम्हणशाही या दोन्हींशी एकाच वेळी लढायचे बाबासाहेबांचे धोरण होते. हे दोन्ही कामगार चळवळीचे शत्रू आहेत, असे ते म्हणत.

कम्युनिस्टांशी त्यांचे मतभेद असले तरी काही वेळा हे दोन्ही घटक कामगारांच्या प्रश्नावर एकत्र आल्याचेही दिसते. १९३४ च्या संपाच्या बाजूने बाबासाहेब नव्हते. पण या संपावेळी ज्या कम्युनिस्ट नेत्यांवर सरकारने खटले भरले, त्यांचे वकिलपत्र घेऊन ते लढले. बाबासाहेबांच्या या प्रयत्नांमुळे हे सर्व कम्युनिस्ट नेते निर्दोष सुटले. १९३८ साली मुंबई प्रांतात काँग्रेस सरकारने आणलेल्या औद्योगिक कलह विधेयकाच्या विरोधात बाबासाहेब विधानसभेत गरजले- ‘संप करणे हा गुन्हा ठरवून काँग्रेस सरकारने कामगारांवर गुलामगिरीच लादली आहे.’ या विधेयकाविरोधातल्या एक दिवसाच्या सार्वत्रिक संपाच्या तयारीसाठी डांगे, रणदिवे, मिरजकर यांच्यासोबत बाबासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रित सभा केल्या. बाबासाहेबांच्या प्रशिक्षित सुसंघटित समता सैनिक दलाने या संपाच्या व्यवस्थेत मोठी कामगिरी बजावली. सवर्ण व अस्पृश्य कामगारांच्या या अभूतपूर्व एकजुटीच्या प्रेरणादायी आठवणी पुढे अनेकांनी नोंदवल्या आहेत.

स्वतंत्र मजूर पक्षाचे ध्येय-धोरण तसेच मागण्या सर्व जातीय-धर्मीय व्यापक कष्टकरी समाजासाठी होत्या. उदाहरणार्थ, किमान वेतन निश्चिती, ८ तासांचे काम, भरपगारी रजा, आजारपणाची रजा, पेन्शन, अस्थायी कामगारांना कायम करणे, अपघात नुकसान भरपाई, कामगारांसाठी स्वस्त घरे, त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय इ.. या तसेच अन्य मुद्द्यांना त्यांनी विविध मंचांवर लावून धरले. अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनी काही प्रश्न मार्गीही लागले.

धोरणात्मक बाबी ठरविणे व अमलात आणणे यासाठीचा अवकाश बाबासाहेबांना मिळाला तो महाराज्यपालांच्या (व्हाईसरॉयच्या) कार्यकारी मंडळात त्यांचा मजूर मंत्री म्हणून समावेश झाल्यावर. वास्तविक, बाहेर इंग्रजांच्या विरोधात रान पेटले असताना, चले जावची चळवळ भरात असताना बाबासाहेबांचे १९४२ साली व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात असणे हे अनेकांना खटकले होते. देशद्रोही, इंग्रजांचा बगलबच्चा अशी शेलकी दूषणे त्यांना झेलावी लागली होती. इंग्रजांच्या विरोधात, स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याच्या भूमिकेचा अनेक वेळा बाबासाहेबांनी निर्वाळा दिला होता. तथापि, ज्या अस्पृश्य-पीडितांसाठी ते लढत होते, त्यांच्या भविष्याचे दोर स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना आजवर छळणाऱ्या समूहांच्या हाती गेले तर काय, ही चिंता त्यांना भेडसावत असे. इंग्रज आहेत तोवर पुढच्या काही संरक्षक रचना करुन घ्याव्यात, हा त्यांचा प्रयत्न होता. मजूर मंत्री असताना १९४३ साली एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणतात- ‘भारतात कामगारांनी कामगार मत्रिमंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. भारतास स्वातंत्र्य मिळणे एवढीच गोष्ट पुरेशी नाही. ते स्वराज्य कोणत्या लोकांच्या हातात पडते याला महत्व आहे.’ बाबासाहेबांना खलनायक ठरविण्यापूर्वी हा अंतर्विरोध ऐतिहासिक दृष्टीने समजून घेणे गरजेचे आहे. आजवर ते ज्या कामगार हितासाठी लढत होते, त्याबाबतीत प्रत्यक्ष काही करण्याची संधी बाबासाहेबांना व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळातील सहभागातून मिळाली.

युद्ध साहित्याचे काम करत असलेल्या कारखान्यांत कामगारांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी संयुक्त कामगार नियामक समिती स्थापण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या मजूर मंत्रिपदाच्या काळात झाला. लवादाचे तत्त्व न्यायपद्धतीत कायमस्वरुपी मान्य झाले. निरनिराळ्या योजनांतून तयार होणाऱ्या अनुभवी, अर्धशिक्षित तंत्रज्ञांना रोजगारासाठी भटकावयास लागू नये म्हणून सेवायोजन (एम्लॉयमेंट एक्स्चेंज) कार्यालयाच्या स्थापनेसारखे कामगारहिताचे मोठे पाऊल त्यांना उचलता आले. कामगारांचा पगार आणि उत्पन्न याविषयी संशोधन आणि त्यांना सामाजिक संरक्षण (सोशल सिक्युरिटी) मिळवून देण्याच्या दृष्टीने माहिती संकलन करण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे घेण्यात आला. स्त्रियांना कारखाना कायद्याद्वारे रात्री कामावर बोलावण्यास बंदी घालण्यात आली. स्त्रियांच्या बाळंतपणाच्या काळात त्यांना विशेष भरपगारी रजेसाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. कारखान्यात बारमाही कामगारांना कोणत्याच रजेचा फायदा मिळत नसे. त्यांच्यासाठी भरपगारी रजेचे कलम घातलेले विधेयक त्यांनी मध्यवर्ती मंडळात मंजूर करुन घेतले. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी मालकांवर सोपवणे, वाढत्या महागाईच्या निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्त्याची पूर्तता करणे हे मुद्दे त्यांनी सरकारी मंडळे तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उठवले. याचबरोबर इंडियन बॉयलर्स कायदा, मोटार वाहन कायदा, अपघात नुकसान भरपाई कायदा, अभ्रक खाण कामगार कल्याण कायदा आदि विधेयकांतले अपुरेपण आणि जाचक बाबी दूर करण्याचे काम बाबासाहेबांनी केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दृष्ट्या जर्जर झालेल्या ब्रिटिशांना आपल्या वसाहती सांभाळणे जड झाले. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या हालचालींना वेग आला. १९४६ साली ब्रिटिश सरकारकडून कॅबिनेट मिशन भारतात आले. संविधान सभा स्थापन होऊन संविधान निर्मितीचे काम सुरु झाले. बाबासाहेब व काँग्रेसमधील तणावामुळे संविधान सभेत बाबासाहेबांच्या प्रवेशाला काँग्रेसमधील काही नेतेगण प्रारंभी अनुकूल नव्हते. मुंबई प्रांतातून बाबासाहेबांना निवडून आणण्याची बाबासाहेबांच्या पक्षाची ताकद नसल्याने पूर्व बंगालमधून त्यांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुस्लिम लीगचे सहाय्य घेऊन बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवले. बाबासाहेबांची घटनाततज्ज्ञ म्हणून विद्वत्ता सुविदित होती. यथाक्रम त्यांच्या राष्ट्रीय जाणीवेचा साक्षात्कार काँग्रेस व एकूणच घटना समितीला झाला. त्यांचे संविधान सभेतले स्थान अनिवार्य होऊ लागले. नेमक्या यावेळी देशाला स्वातंत्र्य जाहीर झाले. त्याचबरोबर देशाची फाळणी झाली. फाळणीमुळे बाबासाहेबांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला. बाबासाहेब घटना समितीच्या बाहेर पडण्याची स्थिती तयार झाली. अशावेळी राष्ट्रीय गरज म्हणून बाबासाहेबांना काँग्रेसने मुंबईतून बिनविरोध निवडून आणले. बाबासाहेबांच्या घटना समितीतील फेरप्रवेशानंतर त्यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात कायदे मंत्रिपद तसेच संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. या दोन्ही पदांवर असताना जी कामगिरी त्यांनी पार पाडली, त्यांतून मतभेदांच्या गलबल्यातूनही कामगारहिताच्या अनेक बाबी अधिकार म्हणून वा कायदे करण्यासाठीची दिशा म्हणून भक्कपणे रुजवल्या गेल्या. घटनेतील मूलभूत अधिकार तसेच राज्यधोरणाची मार्गदर्शनक तत्त्वे यांतून आपल्याला त्याची प्रचिती येते.

घटना समितीत वा स्वतंत्र भारताच्या प्रारंभीच्या सरकारांत कामगार हिताच्या बाबी येण्यात स्वातंत्र्य व सामाजिक न्यायाच्या चळवळीचा मोठा वारसा होता. हा वारसा मानणारे नेतृत्व सरकारात होते. आताचे नेतृत्व हा सर्व वारसा मिटवण्याचा बेछूट प्रयत्न करत आहे. यातील काही बाबी खाजगीकरण, उदारीकरण नावाने आधीच्या सरकारांतच सुरु झाल्या होत्या. पण कामगार, कष्टकरी, गरीब, दलित, आदिवासी, भटके, स्त्रिया यांच्याबाबतीत दुजाभावाची, निम्नतर दृष्टी असलेल्या विचारांचे व हितसंबंधांचे आताचे सरकार मोठ्या कष्टाने उभारलेल्या धोरणांच्या, कायद्यांच्या, योजनांच्या इमारती निर्दयपणे जमीनदोस्त करत आहे. अशावेळी जुन्या वैचारिक-व्यावहारिक संघर्षांचे संदर्भ नव्याने तपासून लढ्यातील मित्रांची फेरजुळणी करावी लागेल. त्यादृष्टीने जो काही आराखडा तयार करावा लागेल, त्यात व्यापक एकजुटीचा बाबासाहेबांनी २२ ऑगस्ट १९३६ च्या जनतेच्या अंकात नोंदवलेला हा मंत्र आजही पायाभूत ठरु शकतोः

‘अस्पृश्यतानिवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरुप जरी जातिनिष्ठ दिसत असले तरी तत्त्वतः तो लढा आर्थिक आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखांत सांगितलेले आहे. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधांहून वेगळे किंबहुना परस्परविरोधी असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे प्राप्त होते. परंतु, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी कामकरी वर्गांचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्य वर्गाला आपला आर्थिक लढा स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बाजूंनी गांजलेला अस्पृश्य वर्ग हिंदी श्रमजीविकांच्या लढ्यात पुढारीपण घ्यायला लायक आहे असे आम्ही मागे एकदा म्हटलेले होते.’

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(श्रमकल्याण युग, डिसेंबर २०२१)