Thursday, February 7, 2019

अपना बाजारच्या गोष्टीचे तात्पर्य

रुढ अर्थाने खातूभाईंच्या (गजानन खातू) ‘अपना बाजारची गोष्ट’ या पुस्तकाचे हे परीक्षण वा परिचय नाही.  असा परिचय झाल्यास तो आनुषंगिक परिणाम समजावा. या पुस्तकातील मला भावलेल्या, शिकवणाऱ्या व अधोरेखित करावे असे वाटलेल्या काही मुद्द्यांकडे वाचकांचे लक्ष वेधावे आणि त्यांनी त्या मुद्द्यांच्या अधिक विवेचनासाठी मूळ पुस्तक वाचण्यास उद्युक्त व्हावे, हा मर्यादित हेतू या लेखाचा आहे. शीर्षकात नमूद केलेल्या ‘तात्पर्य’ शब्दाची जबाबदारी माझी. लेखक वा वाचकांचे वेगळे मत असू शकते.
समाजवादी-पुरोगामी चळवळीत वय व समज या दोन्ही बाबतीत ज्येष्ठ असलेले खूप कमी लोक आता आहेत. त्यातील एक खातूभाई. या ज्येष्ठाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वय-समजाला अजिबात न दबकता त्यांच्याशी बोलता येते. त्यांना ज्येष्ठ मानणाऱ्या काहींशी बोलताना थोडे दबकायला होते. पण खातूभाईंशी थेट आपल्या वयाच्या पातळीवरुन दोस्ती करता येते. भिन्न मते मांडायला वा त्यांच्या मतावर प्रश्न उभे करायला किंचितही त्यांची ज्येष्ठता आड येत नाही. उलट आपल्या म्हणण्याचे स्वागत होऊन त्याबद्दल आज ना उद्या अजून काही नवे समज वाढवणारे त्यांच्याकडून मिळेल याची खात्री असते. वयाने जुने होत असताना वर्तमानाच्या तारांचे नवनवे झंकार ऐकत भविष्याचा वेध घेण्याची त्यांची वृत्ती व क्षमता अनुभवताना आपल्या म्हातारपणाविषयी मनात एक लोभस चित्र तयार होते. खातूभाईंचे खाणे, राहणे, बोलणे यातला रस पाहता ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हा कविवर्य तांबेंचा स्वतःपुरताच अनुभव असावा असे वाटू लागते.
अशा या खातूभाईंचे वैचारिक लेखन वाचले होते. पण ‘अपना बाजार’शी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधाचा केवळ संदर्भच मला होता. त्याचे तपशील ठाऊक नव्हते. या पुस्तकामुळे ती उणीव दूर झाली. त्यांच्या व्यक्तित्वाची आणि अपना बाजार या एका अत्यंत महत्वपूर्ण सहकाराच्या प्रयोगाची घडण कळायला मदत झाली.
१९६८ ते १९८२ या १४ वर्षांतली, त्यांच्या वयाच्या २७ ते ४२ या कालखंडातली ही घडण ते रेखाटतात तब्बल ३६ वर्षांनी. ‘हे पुस्तक अपना बाजारचा इतिहास नाही. १९४८ ते १९६८ पर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीची त्यात नोंद नाही. १९८२ नंतरच्या कालखंडाचीही चर्चा नाही. त्यामुळे अनेकांना ते अपुरे वाटेल.’ असा ‘कबुलीजबाब’ ते सुरुवातीलाच देतात. पण ‘निरोप घेताना’ या शेवटाकडच्या प्रकरणात ते म्हणतात- ‘ही १४ वर्षे अविरत कामाची होती. प्रतिवर्षी काही ना काही घडत होते. जणू बाल्यावस्थेतून युवावस्थेत वाटचाल होताना जडणघडणीची वाटचाल.’ त्यामुळे या पुस्तकात अपना बाजारचा संपूर्ण इतिहास नसला तरी त्यात नोंदवलेल्या काळाचे मोल मोठे आहे.
पर्सोनेल मॅनेजमेंट हा विषय असलेले खातूभाई ‘क्रॉम्पटनच्या भव्य कारखान्यातली’ नोकरी सोडून अपना बाजारच्या ‘नायगावच्या पत्राशेडच्या कार्यालयात’ येतात.  ते म्हणतात- ‘पण मला त्याचे फारसे वाटले नाही. कारण ही आपली माणसं होती. आपल्या विचारांची होती. क्रॉम्प्टनमधले कामगारविरोधी वातावरण मला कधी आवडले नाही. आपल्या विचारांच्या क्षेत्रात यायला मिळाले याचाही आनंद होता.’
ज्या परिसरात अपना बाजार उभे राहत होते, तो परिसर नायगाव, दादरचा. खातूभाई या परिसराचे व्यक्तित्व रेखाटताना लिहितात- ‘नायगाव हे कामगार व राजकीय चळवळीचं केंद्र. अशोक मेहतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कामगार चळवळीने इथे सामाजिक कामाची पायाभरणी केली. (त्यांच्याच प्रेरणेने अपना बाजार सुरु झाले.) जी. डी. आंबेकरांनी इंटकची उभारणी केली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांनी लाल बावटा उभारला. त्यामुळे नायगावच्या सामाजिक राजकीय जीवनात समाजवादी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. त्यामध्ये नंतर शिवसेनेची भर पडली.’
अपना बाजारच्या टीमचे निर्विवाद कॅप्टन असलेले दादा सरफरे आणि त्यांचे सहकारी या सर्व प्रवाहांना कसे यशस्वीपणे हाताळत होते त्याची नोंद खातूभाई करतात. अपना बाजारची अध्वर्यू असलेल्या या मंडळींची पाळेमुळे त्या भागातील सामाजिक-राजकीय जीवनात खोल रुतलेली होती. नायगावमध्ये आदराचे स्थान असलेल्या दादा सरफरेंबद्दल लिहिताना ते म्हणतात- ‘दादांच्या घरी गेले की दादा बहुधा नायगावमधील कुठल्या तरी मर्तिकाला जाऊन आलेले असत. …बहुधा त्या काळात नायगावमधील एकही मर्तिक असे नसेल ज्याला दादा गेले नाहीत. …दादांच्या या चौफेर जनसंपर्कामुळेच दादा नायगावचे किंगमेकर झाले.’ दादांच्या बरोबरीने अपना बाजार उभारणीतले सहकारी, पुढे आमदार झालेले व आमदार होऊनही शेवटपर्यंत एकाच खोलीच्या घरात राहणारे एन. के. सावंत यांचाही नायगावच्या सामाजिक-राजकीय जीवनावर ठसा होता. अपना बाजारचे बहुतेक कार्यकर्ते प्रजा समाजवादी पक्षाचे. संस्थेच्या कामाचा मोबदला न घेणारे, मासिक बैठकीचा प्रवासभत्ताही पार्टीला देणारे, व्यापाऱ्यांच्या दिवाळी भेटी घरी न स्वीकारता ऑफिसमध्ये जमा करायला लावणारे हे पदाधिकारी. या सर्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या धगधगत्या काळातील प्रेरक, ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या विलक्षण जिद्दीचे कोंदण अपना बाजारच्या घडणीला मिळाले.
या चबुतऱ्यावर अपना बाजारची इमारत आकार घेत होती. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व पुढे जनरल मॅनेजर म्हणून खातूभाईंचा सहभाग सुरु झाला तो या माहोलात, या गतीत. ते लिहितात- ‘पाण्यात पडलेला माणूस जसा जिवाची बाजी लावून हातपाय मारतो तसे आम्ही करत होतो.’ फिरती बससेवा, बोनस स्टॅम्प योजना, विजयी भांडी बचत योजना, दिवाळी भेट, जनता मिठाई अशा अनेक यशस्वी तर काही अयशस्वी उपक्रमांद्वारे तसेच अनेक क्षेत्रांत संचार करत अपना बाजार शिकत पुढे जात होते. या प्रयोगांवेळचे अनेक मासलेवाईक अनुभव-जिंकल्याचे, पडल्याचे, फसल्याचे या पुस्तकात वाचायला मिळतात.
खातूभाईंच्या कारकीर्दीतील या सर्व प्रयत्नांचे फलित नोंदवताना ते लिहितात-‘१९६८ ते १९८२ या चौदा वर्षांत अपना बाजारचा कायापालट झाला. १९४८ साली नायगावमध्ये एक धान्य दुकान सुरु करणाऱ्या नायगाव कामगार ग्राहक सहकारी संस्थेचे १४ शाखा आणि २५ प्राथमिक संस्था सदस्य असलेल्या मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक संस्थेत रुपांतर झाले. अन्नधान्याबरोबर रेशनिंगचे वितरण, कापड दुकान, औषध दुकान आणि औषध भांडार असा विस्तार झाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत संस्थेची ओळख निर्माण झाली.’ नायगावमधील अपना बाजार मागोमाग वाशी, मुलुंड, अंधेरी या ठिकाणी स्वतःच्या इमारतींत अपना बाजार विस्तारला. याच काळात संस्थेने सरकारचे भागभांडवल व कर्जाची संपूर्ण परतफेड केली. अशी परतफेड करणारी संस्था हे अपना बाजारचे वेगळेपण …या तसेच आणखी बऱ्याच मिळकती ते पुढे नोंदवतात.
या यशाची गुरुकिल्ली काय? ..याचं सरळसोपं उत्तर नाही आणि तसं ते नसंतही असे ते म्हणतात. मात्र काही ठळक गोष्टींची, वैशिष्ट्यांची ते नोंद करतात. उदा. पदाधिकारी व अधिकारी यांची साप्ताहिक बैठक. त्यामुळे निर्णयप्रक्रिया जलद व्हायला तसेच पदाधिकारी व अधिकारी यांतील संवाद वाढायला मदत झाली. अपना बाजारचे वार्षिक अहवाल फक्त कायद्याच्या पूर्ततेसाठी नसत तर त्यातून सभासदांना आपली संस्था खरोखरी कशी चालते ते कळण्यासाठी असत. त्यात कारणमीमांसा असे. सभोवतालच्या घडामोडींचा (उदा. १९७१ चे बांगला देशाचे स्वातंत्र्य युद्ध), सरकारी धोरणांचा या अहवालात तपशील असे. खातूभाई म्हणतात- ‘अपना बाजारचे अहवाल म्हणजे वैश्विक विचार आणि स्थानिक कृती याचा वस्तुपाठच आहेत.’ अपना बाजार हे समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम आहे व सहकारी चळवळ परिवर्तनासाठी आहे हे भान कायम ठेवले. परिणामी राजकीयदृष्ट्या कायम एकत्र राहिलेल्या या मंडळींनी संस्था चालवताना पक्षीय संकुचितता येणार नाही याची काळजी घेतली.
परिवर्तनवादी संस्थाचालक आणि त्याच दृष्टिकोणाचा उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेला व्यवस्थापक एकत्र आल्याने धंदा, परिवर्तनाची चळवळ व कामगारांचे हितसंबंध यांची कशी समतोल सांगड घातली जाते, तुटू न देता पेच कसे सोडवले जातात याचे नमुने या पुस्तकात आहेत. अपना बाजारच्या कामगारांनी शिवसेनेची युनियन आणली तेव्हा तिला मान्यता द्यायचा प्रश्न तयार झाला. खाजगी कारखान्यात मालकधार्जिणी युनियन असायला आपला विरोध असतो. सहकारी क्षेत्रही याला अपवाद असता कामा नये. या भूमिकेतून कामगारांच्या युनियन निवडण्याच्या अधिकाराची खातूभाईंनी साथ केली. संस्थाचालक नाराज झाले. पण त्यांनी आपला आग्रह सोडून अखेर या युनियनला मान्यता दिली.
कामगारांचे अधिकार आणि धंद्याचे हित याबाबत कामगार संघटनांतील कार्यकर्ते व नेत्यांची भूमिका हा मोठा प्रश्न आजही आहे. या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार करण्याचे व तसे कामगारांचे शिक्षण करण्याचे काम कॉ. डांगेंनी केले. पण ती परंपरा पुढे चालवणारे नेते पुढे कमी राहिले. जवळपास दुर्मिळ आहेत. खातूभाई या परंपरेचे वाहक आहेत. कामगारांच्या योग्य मागणीसाठी संस्थाचालकांशी संघर्ष आणि संस्थेच्या व पर्यायाने कामगारांच्या भविष्यातील अहिताला रोखण्यासाठी युनियनच्या मागणीला विरोध यात खातूभाईंनी कधी तडजोड केली नाही.
अपना बाजारचा सेवक वर्ग मुख्यतः बहुजन समाजातला. कारागिरी, शेती आणि कष्ट करणारा. पारंपारिकपणे उच्चवर्णीयांचा प्रभाव असलेल्या व्यापारात बहुजनसमाजातील नव्या पिढीत व्यापार हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे काम खातूभाईंच्या पुढाकाराखाली अपना बाजारमध्ये झाले. अपना बाजारच्या चळवळीचे मापन करताना या social engineering ची दखल घेणे गरजेचे आहे, असे खातूभाई म्हणतात ते रास्तच आहे.
अपना बाजारच्या सेवकांना हाऊसिंग बोर्डाच्या जागा मिळाव्यात यासाठी संस्थेने प्रयत्न केले. आर्थिक अडचणींमुळे पुढे न येणाऱ्या सेवकांना ही संधी कशी महत्वाची आहे, त्यासाठी सोने विका, पतपेढीतून कर्ज घ्या असे समजवावे लागे. या कर्जाचा न पेलणारा भार संस्थेने उचलावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खातूभाई सेवकांना देत. यामुळे या सेवकांचे आयुष्य कसे बदलून गेले याची उदाहरणे खातूभाईंनी पुस्तकात दिली आहेत. या सेवकांच्या करवी झालेल्या, सामान्य माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास वाढवणाऱ्या घटनाही ते नोंदवतात. सेवकांना शिकवणारे खातूभाई ‘भोगलेंमुळे मला शिक्षणापलीकडच्या व्यावहारिक शहाणपणाचे दर्शन झाले.’ असेही नमूद करतात.
इतकं सगळं करणाऱ्या खातूभाईंनी अपना बाजार यशाच्या शिखरावर असताना आणि कर्तृत्वाची आणखी भरारी घेण्याचे वय असताना, संस्थेच्या वाढीबरोबरच मोठ्या प्रमाणात वेतनवाढीची शक्यता असताना, विशेषतः मुले लहान व एकटा कमावता असताना अवघ्या ४२ व्या वर्षी अपना बाजार का सोडले?
पदाधिकाऱ्यांबरोबर मतभेद नव्हते. कामकाजात पेचप्रसंग नव्हते. सेवकांशी उत्तम संबंध होते. अशावेळी काहीही कारण नसताना मी अपना बाजार सोडले हे आपल्या स्नेही, सहकाऱ्यांना शेवटपर्यंत पटले नाही, असे खातूभाई म्हणतात. या पुस्तकात काही कारणे, त्यावेळची त्यांची मनःस्थिती तसेच भूमिका ते नोंदवतात.
संस्था उत्तम अवस्थेत असताना, सर्वांशी सलोख्याचे संबंध असताना बाहेर पडावे हे उत्तम, हे पहिले कारण. आपल्याकडून होण्यासारखे, निर्मिती करण्यासारखे जे होते ते झाल्यावर केवळ दैनंदिन कामात अडकून पडावे असे वाटत नव्हते. असे अडकून पडणे संस्थेच्या हिताला तसेच व्यक्तिगत विकासाला अडथळा ठरणार होते. अशावेळी नव्या नेतृत्वाला संधी देऊन नव्या दिशेच्या शोधाच्या शक्यता निर्माण करणे, हे दुसरे.
संवेदना पूर्ण शाबूत ठेवून वस्तुनिष्ठपणे जीवनाला सामोरे जाण्याच्या (छे! जीवनाला वळविण्याच्या) या निःसंग स्थितप्रज्ञतेमुळेच त्यांच्या निरोपाची घटना अशी असू शकते – ‘प्रत्येक माळ्यावरती सर्वांना भेटत चार मजले उतरलो आणि हिंदमाताच्या बस स्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहत उभा राहिलो.’
अपना बाजार सोडल्यावर पुढे काय? ऐन उमेदीच्या काळात गतिमान आयुष्याला ब्रेक लागणार होता. पण त्याच्यावर मात करणारे अपना बाजारच्या बाहेर सामाजिक कामाचे एक बृहद वर्तुळ मी तयार केले होते, असे खातूभाई सांगतात. अपना बाजारमध्ये असतानाच राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, विषमता निर्मूलन शिबिरे, नामांतर आंदोलन, जेपी आंदोलन यांत त्यांचा सहभाग असे. या सामाजिक-राजकीय कामातून अनेक आव्हाने पुढे येत होती. त्यामुळे अपना बाजारनंतर नोकरी स्वीकारली नाही असे खातूभाई म्हणतात. रिटेल मॅनेजमेंटमध्ये कन्सलटन्सी, व्याप न वाढवता गरजेपेक्षा जास्त कमाईच्या मागे लागायचे नाही असे ठरवून १९८२ पासून ‘सार्वकालिक कार्यकर्ता न होता सर्वकाळ सार्वजनिक जीवनात वावरलो.’ असे ते नोंदवतात.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात सहकारी चळवळीच्या भवितव्याविषयी खातूभाईंचे चिंतन आहे. हे प्रकरण मूळातूनच वाचायला हवे. या चिंतनाची प्रत कळावी म्हणून काही सूत्रे नोंदवतो.
  • औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आर्थिक विषमतेच्या कष्टकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांपासून सोडवणूक करायला शासनव्यवस्था पुरेशी सक्षम नव्हती. अशावेळी या दुर्बल घटकांनी सहकारी चळवळीचा आधार घेतला. हे जगभरच्या विकसनशील तसेच विकसित देशांत घडले.
  • आता औद्योगिक भांडवलशाहीची जागा वित्तीय भांडवलशाहीने घेतली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि सेवाक्षेत्रातील रोजगार घटतो आहे. संघटित क्षेत्र मोडल्यामुळे संघटित कामगार चळवळ संदर्भहिन होत आहे. तशीच आजवरची सहकारी चळवळही संदर्भहिन होत आहे.
  • सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचे अधिकार जसे रजिस्ट्रारकडे आहेत, तसेच लहानसहान हाऊसिंग सोसायट्यांची निवडणूकही रजिस्ट्रारच घेत आहे. मग या सगळ्यात लोकसहभाग आणि सहकार राहिला कोठे?
  • शेतीसमाज, औद्योगिक कष्टकरी समाज आणि मध्यमवर्ग या स्थिर व आंतरिक नाते असलेल्या समूहांचे स्थलांतर सुरु झाले. असा विखंडित समूह परस्पर सहकार्याने सहकारी संस्था कशा उभ्या करु शकेल?
  • तरीही सहकारी चळवळीला भविष्य प्रदान करणारी नवी परिस्थिती आता तयार होत आहे. कोणत्याही पेचप्रसंगातून बाहेर पडू शकेल अशी लवचिकता दाखवणाऱ्या भांडवलशाहीला २००८ नंतरच्या अरिष्टातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्थव्यवस्था ठीकठाक करण्याच्या सर्व प्रचलित उपाययोजना निरुपयोगी ठरत आहेत. अशावेळी सहकारी अर्थव्यवस्था प्रस्थापित स्पर्धेच्या मूल्याला, प्रस्थापित नफ्याच्या संकल्पनेला आणि प्रचलित भांडवलीकरणाच्या प्रक्रियेला पर्याय देऊ शकते.
तथापि, यासाठी सहकाराचे नवे प्रारुप सिद्ध करण्याची गरज पुस्तकाच्या अखेरीस ते नमूद करतात.
-सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, फेब्रुवारी २०१९)
अपना बाजारची गोष्ट
गजानन खातू
अक्षर प्रकाशन
पृष्ठेः १९० | मूल्यः २०० रुपये
अप

Friday, February 1, 2019

सामाजिक सद्भाव' या विषयावर सह्याद्री वाहिनीवर झालेली मुलाखत

हुतात्मा दिनी 'सामाजिक सद्भाव' या विषयावर सह्याद्री वाहिनीवर झालेली सुरेश सावंत यांची मुलाखत. सवड झाल्यास ती पहावी ही विनंती.

https://youtu.be/lNIvAXMYp_8

Monday, January 7, 2019

संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकड आयोजकांचा धिक्कार!

संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकड आयोजकांचा धिक्कार!
या कृतीचा निषेध म्हणून संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्या साहित्यकर्मींचे हार्दिक अभिनंदन!!
नियोजित सत्प्रवृत्त अध्यक्ष अरुणा ढेरे यांना त्यांनी अध्यक्षपद नाकारुन ‘सत्’ची बाजू घेण्याचे आवाहन!
__________________________________________

मराठी साहित्य संमेलनाची प्रक्रिया आधीच इतकी दलिंदर होत गेली आहे की आता आपणच उद्घाटक म्हणून बोलावलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना येऊ नका सांगण्याच्या दलिंदरगिरीच्या मापनाला शब्दच राहिले नाहीत. ‘मराठी सारस्वता’च्या या दावेदारांच्या भिकारपणाची आता हद्द झाली आहे. कोणत्याही प्रकारे या संमेलनाशी संबंध ठेवणे हे आपले ‘स्वत्व’ विकण्यासारखे आहे. अनेक निमंत्रित साहित्यिक-पत्रकार मंडळींनी या संमेलनावर बहिष्कार टाकून असे स्वत्व विकण्यास नकार दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांच्या या कृतीला मनःपूर्वक पाठिंबा!

लोकसत्ताकार तसेच अन्य प्रस्थापित मंडळींनीही आपल्या विवेकाला जागून संमेलनावर बहिष्कारच नव्हे तर असा बहिष्कार अन्यांनीही टाकावा यासाठीची मोहीमच सुरु केली हे खूप आश्वासक आहे. प्रत्यक्ष संमेलनात जाऊन बाजू मांडू म्हणणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मी कदर करतो. तथापि, यावेळी अशी भूमिका घेणे हा बोटचेपेपणाच ठरेल. यावेळची घटना इतकी सुस्पष्ट आहे की त्याबाबतची कुठचीच बाजू अस्पष्ट राहिलेली नाही, जी तिथे प्रत्यक्ष जाऊन मांडण्याची गरज आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष सन्माननीय अरुणा ढेरे सत्पवृत्त आहेत. प्रचलित साहित्यिक गट-वादांपासून दूर आहेत हे खरे. पण यावेळच्या घटनेबाबत गप्प राहणे ही सत्प्रवृत्तता खचितच नव्हे. आपल्या अध्यक्षीय भाषणात याचा समाचार घेऊ असे मनाशी ठरवत तोवर गप्प राहणे यावेळी चालणार नाही. हा उशीर यावेळी अक्षम्य आहे. आयोजकांनी नयनतारा सहगलांची माफी मागून त्यांना पुन्हा सन्मानाने उद्घाटक म्हणून बोलवावे; अन्यथा मी संमेलनाची अध्यक्ष राहणार नाही, अशी ठोस भूमिका ढेरे यांनी घेणे गरजेचे आहे.

नयनतारा सहगल यांचे नियोजित उद्घाटकीय भाषण होणे हे मराठी सारस्वताची, महाराष्ट्राच्या प्रगतीशील परंपरेची शान वाढवणारे ठरले असते. हे भाषण आजच्या राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या विचारसरणीला घातक आहे. मराठी संमेलनाला इंग्रजी लेखिका नको या फालतू कारणाच्या आड खरे कारण बहुधा तेच असावे. पुरस्कार वापसी ज्या कारणासाठी सहगलांनी केली ते कारण अजूनही किती उग्र आहे, याचे हे निदर्शक आहे.

नयनतारा सहगलांचे हे भाषण आज सार्वत्रिक झाले आहे. ते संमेलनात होवो न होवो. त्याचा परिणाम ते न होण्याने अधिक होतो आहे. त्यांच्या या भाषणात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वपूर्ण उल्लेख सहगल यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९३६ साली लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. तथापि, त्यांच्या नियोजित भाषणाचा मसुदा पाहिल्यावर प्रतिगाम्यांच्या दडपणामुळे हे मंडळ मागे हटले. त्यांनी बाबासाहेबांचे निमंत्रणच रद्द केले. हे न झालेले भाषण ‘जातिनिर्मूलन’ नावाच्या पुस्तिकेद्वारे कसे अमर झाले याला आजवरचा ८३ वर्षांचा काळ साक्षी आहे. नयनतारा सहगलांच्या या भाषणाला चिरंजिवित्व लाभण्याची ताकद त्याच्या आशयात आहे. त्याचा अधिकाधिक प्रसार नक्की होणार. सूर्याला झाकण्याचे प्रयास नाकाम ठरणार.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Saturday, January 5, 2019

नव्या आकलनाविषयी काही निरीक्षणे, काही शंका

‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवादः नवे आकलन, नव्या दिशा’ हे उद्धव कांबळे (निवृत्त IPS) यांचे लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेले पुस्तक. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनि थिएटरमध्ये २१ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. डॉ. भालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, EPW चे संपादक डॉ. गोपाळ गुरु यांच्यासमवेत मीही एक वक्ता होतो. त्यावेळच्या माझ्या भाषणातील हे काही मुद्देः
पुरोगामी चळवळीला अजगराचा विळखा पडावा तसा विळखा घातलेला आंबेडकर-मार्क्स हा प्रश्न आजही तीव्र आहे. कन्हैया कुमार, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयूतील वादळ या निमित्ताने दलित-दलितेतर पुरोगामी शिक्षित तरुण विभागांच्या एकजुटीला हा मुद्दा मोठा अडसर ठरतो हे आपण अनुभवले. अनुभवत आहोत. बाहेर फॅसिझम धुमाकूळ घालत असताना पुरोगामी छावणीतला हा अंतराय परवडणारा नाही. हा अंतराय सांधण्याच्या आजवरच्या प्रयत्नांतला हे पुस्तक एक सशक्त प्रयत्न आहे. असे पुस्तक देणाऱ्या लेखकाचे व लेखकानेच व्यक्त केल्याप्रमाणे त्यातील आपल्याविषयीची कठोर टीका पचवून त्याचे प्रकाशन करणाऱ्या लोकवाङ्मय गृहाचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच धन्यवाद. या पुस्तकाची तात्त्विक समीक्षा हा माझा आवाका नाही. अभ्यासमंडळाला बसलेल्या एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मला भावलेली, अधोरेखित करावी वाटणारी काही निरीक्षणे, काही शंका, प्रश्न मी मांडणार आहे.

आंबेडकरी समूहातील संशयाची पिशाच्चे शांत करण्यासाठी मार्क्स व आंबेडकर यांना तेच म्हणायचे आहे, अशा गोल गोल पद्धतीने जाऊन चालत नाही हे आजवर लक्षात आले आहे. तद्वत (जाहीरपणे बोलण्याची हिम्मत होत नसली तरी) आंबेडकर हे भांडवलदारांचे हस्तक, एक क्रांतिकारी होऊ शकणारा समुदाय त्यांनी धर्माच्या चौकटीत जेरबंद केला या आरोपांनीही काही पुढचे पाऊल पडत नाही हे सिद्ध झाले आहे. अशावेळी आंबेडकर-मार्क्स या जुटीची अपरिहार्यता या दोन्ही चळवळींविषयी अपार कळकळ असलेल्या उद्धव कांबळे यांनी मांडावी, तीही चिकित्सकपणे याचे मी स्वागत करतो. या मांडणीत मार्क्स-आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या उद्दिष्टातील समानता अधोरेखित करतानाच त्यांच्या मांडणीतील मतभिन्नतेच्या बाबी नेमकेपणाने ते समोर आणतात. त्यात आंबेडकरांच्या विवेचनातील काही मुद्द्यांचे अपुरेपण ते नम्रपणे पण थेट नमूद करतात हे मला खूपच स्वागतार्ह वाटते. असे करणारे खूप कमी लोक आज आहेत. अगदी अपवादात्मक. डॉ. आंबेडकरांनी या टीकेचे स्वागतच केले असते. विचारवंताला आपल्या हयातीत उत्तम टीकाकार मिळणे हे भाग्याचे असते, असे ते म्हणत.

‘बुद्ध आणि मार्क्स’ हे काठमांडूचे बाबासाहेबांचे त्यांच्या अखेरच्या काळातील प्रसिद्ध भाषण. त्यातील बाबासाहेबांची टीकेची पातळी व गांभीर्य समजून न घेता बुद्ध आणि मार्क्स हे दोघे परस्परांचे शत्रू असल्याची भावना आंबेडकरी समुदायात आज आहे. त्याला या भाषणाच्या पुस्तिकेला काही प्रकाशकांनी दिलेले ‘बुद्ध की मार्क्स’ हे पर्यायवाची शीर्षकही जबाबदार आहे. आंबेडकरी समुदायाने मार्क्स समजून घेण्याच्या मार्गात हे भाषण यामुळेच एक stumbling block झाले आहे. या भाषणाचा उद्धव कांबळे यांनी आपल्या ग्रंथात वस्तुनिष्ठ व चिकित्सक आढावा घेतला आहे. त्यांनी मांडलेले सहमतीचे मुद्दे, मतभेदाचे मुद्दे आणि या मतभेदांवरची लेखकाची टीका, विश्लेषण हे खूप उद्बोधक आहे.

या भाषणात मार्क्स व बुद्ध यांच्यातील साम्याची नोंद करताना बाबासाहेबांनी दैन्य, दुःख, यातना आणि शोषण हे एकाच अर्थाने घेण्याचे सूचित केले आहे ते न पटणारे आहे, असे लेखक म्हणतात. त्यांचे म्हणणे- अनेकदा दुःख, दैन्य वैयक्तिकही असू शकते पण शोषण हे नेहमीच सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थेत असते.

समाजात राजा-राजा, सरदार-सरदार, आई-मुलगा, वडिल- मुलगा हे संघर्ष – म्हणजेच वर्गसंघर्ष असतात, असे बुद्धाचे म्हणणे बाबासाहेब सांगतात. हे वैयक्तिक संघर्ष म्हणजे वर्गसंघर्ष नव्हे याचे विवेचन लेखक करतात. मलाही हा प्रश्न नेहमी पडायचा. कारण मी ऐकलेली मार्क्सवादी वर्गाची व्याख्या वेगळी होती. ती अशीः वर्ग  म्हणजे ‘उत्पादन साधनाशी ज्याचा जो संबंध तो त्याचा वर्ग.’ उदा. उत्पादन साधनाची मालकी असलेला तो मालक वर्ग, तर त्याच्या सहाय्याने काम करणारा तो मजूर किंवा कामगार. जमिनदार व शेतमजूर, भांडवलदार व कामगार असे हे वर्ग असतात. शेतकरी हा जमिनीचा म्हणजेच उत्पादन साधनाचा मालक असतो. पण छोटे शेतकरी स्वतः जमिनीचे मालक असतात आणि त्यावर ते स्वतः राबतही असतात. म्हणून तो मध्यमवर्ग. त्याचे हितसंबंध दुहेरी असतात. अल्प उत्पादनाची वेदना असली तरी जमिनीच्या फेरवाटपाला म्हणूनच तो सहसा राजी नसतो. मार्क्सवादातील मध्यमवर्ग म्हणजे प्रचलित अर्थाने मध्यम आर्थिक स्तरातील लोक नव्हेत.

बुद्ध व मार्क्स यांचा काळ पाहता, त्यांची अशी तुलना फार मूलगामी ठरत नाही, हे लेखकाप्रमाणे मलाही वाटते.

बाबासाहेबांची मार्क्सवरील टीका रशिया तसेच भारतातील कम्युनिस्टांच्या व्यवहाराच्या दर्शनातून आली आहे. तिला मर्यादा पडण्याचे दुसरे कारण म्हणजे मार्क्सचे महत्वाचे लिखाण १९५० पर्यंत इंग्रजीत प्रसिद्धच झाले नव्हते, असा एक नवा मुद्दा लेखक मांडतात. तसेच या भाषणावेळची आंतरराष्ट्रीय राजकारणाची नेपथ्यरचनाही ते नमूद करतात. अमेरिका-युरोपची मार्क्सवादाविरोधीची मोर्चेबांधणी ही मोठी पार्श्वभूमी काठमांडूच्या आयोजकांनी ऐनवेळी मूळ विषय बदलून या विषयावर बोलण्याच्या बाबासाहेबांना केलेल्या सूचनेमागे असल्याचे ते नोंदवतात. हा आयामही यापूर्वी पुढे न आलेला आहे.

राज्य नाहीसे होईल (withering away of State) हे घडले नाही, अशी बाबासाहेबांची टीका मार्क्सची मूळ संकल्पनाच समजून न घेतल्याने होते असे लेखकाला वाटते. मलाही ते बरोबर वाटते. राज्य नाहीसे होणे म्हणजे प्रशासकीय व्यवस्थापनाची कामे नाहीशी होणे नव्हे, तर वर्गविभाजन संपुष्टात आल्यावर शोषक वर्गाचे दमनाचे साधन या अर्थी राज्य उरणार नाही.

‘कामगारांची हुकूमशाही’ या शब्दप्रयोगातील हुकूमशाहीचा प्रचलित अर्थ लेखक नाकारतो. विविध व सविस्तर संदर्भांनी मार्क्सच्या परिसरात त्या काळी तो शासन या अर्थी असल्याचे ते स्पष्ट करतात. हेही आपल्याला नवीन आहे.

या चर्चेत बौद्ध धर्माचा स्वीकार व त्याने काय साध्य केले याबद्दलचे लेखकाचे विवेचन मात्र जवळपास आढळत नाही.

हजारो वर्षे इथल्या समाजव्यवस्थेने ज्या अस्पृश्य वर्गाला अस्तित्वहिन केले होते त्याला बुद्ध धम्म स्वीकाराने नवी ओळख, अस्मिता, ऊर्जा मिळाली. या विभागातील आमच्या दुसऱ्या पिढीपर्यंत तरी तिने मोठी कामगिरी बजावली. मी महार नाही-बौद्ध आहे, आम्ही विज्ञानिष्ठ धर्मविचाराचे वाहक आहोत. देव-चमत्काराच्या श्रद्धांना आमच्यात स्थान नाही, ही संपन्नतेची, विलक्षण ताकद देणारी भावना होती. ‘अत्त दीप भव’ ही स्वाबलंबी होऊन जीवन आमूलाग्र बदलण्याची संजीवनी होती. आता पुढे हे ढासळले आहे. त्याला कारण या विचारांचे जाणते वाहक नसणे, आंबेडकरी चळवळीचे विखुरलेपण हे आहे. मूळ बाबासाहेबांची वा बुद्ध धम्माची भूमिका त्यास कारण नाही. ही भूमिका वर्गलढ्याला अपायकारक असण्याचे कारण नाही. उलट ती पूरकच ठरु शकते.

मला इथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. धर्म हा मूळातच प्रतिगामी समजायचे का? धर्म हे शोषणासाठीच जन्माला आले असे म्हणवत नाही. त्यावेळी समाजाच्या भल्यासाठी जेवढे कळले तेवढे त्यावेळच्या भल्या लोकांनी मांडले. कृतीही केली. आजवरच्या विचारवंतांनी जगाचा फक्त अर्थ लावला असे नव्हे. जग बदलण्याचा मुद्दा त्यांच्यापुढेही होता. त्यासाठीची कृती त्यांनी त्यांच्यापरीने करायचा प्रयत्न केला. त्यात शास्त्रीयता येण्याचा मार्क्सचा काळ तेव्हा नव्हता. अर्थात या धर्माचा वापर शोषक शक्तींनी केला, त्यासाठी त्यांनी धर्मतत्त्वांचा अर्थ सोयीने बदलला, नव्याने नोंदवला हे अगदी खरे. पण ‘बहुसंख्याकांचे सर्वच धर्म हिंसा, अन्याय, अत्याचार करत असतात. बुद्ध धर्मही त्याला अपवाद नाही. तोही हिंसेपासून मुक्त नाही,’ हे लेखकाचे म्हणणे सरसकट धर्माला जबाबदार धरणारे आहे. धर्माचे ठेकेदार, अनुयायी म्हणणे अधिक वस्तुस्थितीला धरुन होईल. म्यानमार-रोहिंग्या प्रकरणाला राज्यकर्ते, भिख्खू जबाबदार; ‘न हि वेरेन वेरानी…’ म्हणणारा बुद्ध धम्म कसा जबाबदार? मार्क्सचे ‘धर्म हा पिचलेल्या माणसाचा निःश्वास आहे. हुंकार आहे. धर्म रुक्ष, कठोर (Heartless) जगाचा आत्मा आहे. तसाच तो मरगळलेल्या चैतन्यहिन जगाला चैतन्य देणारा स्फुल्लिंग आहे. तो अशा जगाची अफू आहे. (लेखकाचीच नोंद)’ हे अधिक संयुक्तिक वाटते. शिवाय साम्यवादी अवस्थेत धर्माची गरज उरणारही नाही कदाचित. पण आज ती सर्वसामान्य समाजाला नैतिक जीवनाच्या नियमनासाठी नितांत गरजेची आहे. आणि धार्मिक मूलतत्त्ववादी थैमान घालत असताना धर्माचा आपल्याला उपयुक्त अर्थ (जो त्यातील सत्प्रवृत्तांनी कायम प्रचारलेला आहे) समाजात रुजवणे हे आजचे क्रांतिकारकच काम आहे. विचारबहुल, बहुधर्मी भारतीय समाजाला सेक्युलर भारतात गुंफण्यासाठी गांधीजींची सर्वधर्मी प्रार्थना क्रांतिकारकच ठरली.

या पुस्तकातील  ‘क्रांतिकारी लढ्यातील हिंसेचे स्थान’ हे एक महत्वाचे प्रकरण आहे. मार्क्सकालीन व मार्क्सोत्तर तत्त्वज्ञांच्या मांडणीचे विस्तृत संदर्भ या विवेचनात आहेत. ते वाचताना लेखकाच्या कमालीच्या व्यासंगाची व कष्टाची कल्पना येते. या विवेचनाबद्दल मला काही प्रश्न आहेत.

‘घृणा, कमालीची घृणा, तिरस्कार (Hatred) सुरुवातीला नकारात्मक व अमूर्त वाटत असले तरी क्रांतीच्या लढ्यात तीच शोषितांची खरी संपत्ती असते.’ हा मुद्दा अनेक तत्त्ववेत्त्यांचा हवाला देत, चे गव्हेरासारख्या कांतिकारकाच्या उदाहरणाद्वारे (फितूर मित्राच्या कानशिलात गोळी घालून गव्हेराने त्याला ठार करणे) लेखकाने मांडला आहे. तो मला पचत नाही. रवींद्रनाथ टागोर, नेहरु, गांधी यांच्या ‘माणसाचा दुस्वास नव्हे, त्याच्या विचाराचा विरोध हवा’ या प्रभावाखाली मी आहे. इंग्रज माणूस नव्हे, तर त्यांच्या व्यवस्थेविरोधात आपला संघर्ष आहे, या शिकवणीने भारतीय समाजाला बुळगे बनवले, लढायला कमकुवत केले असे दिसत नाही. उलट त्यांना अधिक मानवी, अधिक उन्नत बनवले असे दिसते.

‘कष्टकरी जनतेला चेपणाऱ्या सशस्त्र सत्ताधाऱ्यांविरोधात आम्ही शक्य असेल तिथे शांततेने संघर्ष करु आणि गरज पडल्यास सशस्त्र लढा देऊ.’ हे मार्क्सचे म्हणणे मला पटते. आंबेडकर, बुद्ध यांनीही अशारीतीने अपरिहार्य हिंसेला समर्थन दिल्याचे लेखकाने नोंदवलेले आहे.

आज ‘अर्बन लक्षली’ वातावरणात तर पुस्तकातील या मांडणीचा तुम्ही नक्षलवाद्यांना समर्थन व चिथावणी देता असाच अर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे.

आणि आज नक्षली सोडले तर कष्टकरी जनता कोणत्याही प्रकारे सशस्त्र वा बिगर सशस्त्र क्रांतीच्या मनःस्थितीत नाही. अनन्वित कष्ट सोसूनही प्रस्थापित चौकटीतच तिची आंदोलने चाललेली असतात. न्यायव्यवस्था, पोलीस यांच्याविषयी कितीही अविश्वास, नाराजी असली तरी ही चौकट आज उद्ध्वस्त करायच्या तयारीत ती नाही. तशी तिची ताकद व जाणीवही नाही.

शेवटचे प्रकरण आहे - ‘उपाय व व्यूहरचना’. याबद्दल विस्तृत चर्चा करुन लेखक शेवटी म्हणतातः ‘…तसेच हे संघटित लढे यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे साध्य-साधनांच्या सापळ्यात न अडकता आक्रमक आणि प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे, त्यांची दमछाक करणारे असले तरच त्याची दखल घेतली जाते. असे दमछाक करणारे, त्यांना घाम फोडणारे लढे श्रमिक कामगार व आपल्या पूर्वसुरींनी केलेले आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेने चाल आणि वाटचाल करणे एवढाच एक पर्याय आता शिल्लक आहे.’

मला वाटते या दिशेच्या कृतीचे ताबडतोबीचे तपशील आपल्याला मांडावे लागतील. भाजपविरोधी लढाई ही क्रमांक एकवर घ्यावी लागेल. यावर डावे सहमत आहेत ही आश्वासक बाब आहे. काँग्रेसहित व्यापक एकजुटीला आज पर्याय नाही. समान किमान कार्यक्रमावर आघाडी व्हायला हवी. त्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष हवा. आणि त्याच्यावरच सोबत सोडणे हवे. डाव्यांनी १२३ वर (अमेरिकेशी अणुकरार) मनमोहनसिंगांची सोबत सोडली, याचा अर्थ खाली पोहोचलाच नाही. ही सोबत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या संघर्षातून सोडली जायला हवी होती.

ज्या समूहांना क्रांतिकारक करायचे त्याबाबत डाव्या चळवळीत आजही पराकोटीची अनास्था आहे. अर्थवादी पद्धतीने कामगार संघटना चालवून राजकीय दृष्ट्या काही हाती लागत नाही, हे आम्हाला कळते आहे. पण वेगाने वळत नाही. ‘लोक आमचे-पण त्यांची डोकी भाजपच्या धर्मद्वेषी प्रचाराची’ अशी स्थिती आजही आहे. ‘लाल सलाम’ बरोबर ‘जयभीम’ म्हणण्यातून केवळ आंबेडकरी समुदाय क्रांतिकारकपणे जोडला जाणार नाही. त्याच्याशी विचारांची देवाण-घेवाण करावी लागेल. राजकीयीकरण करणे म्हणजे सभेत राजकीय बोलणे वा कधीतरी कामगारांचे अभ्यासमंडळ घेणे नव्हे. तो पेळू दैनंदिन कामातून वळावा लागेल. त्यांच्या जनसंघटनेच्या प्रश्नाबद्दल बोलतानाच भोवतालच्या घटनांविषयी त्यांच्याशी संवाद करावा लागेल.

भाजप-सेना-मनसेचे मोर्चे राजकीय असतात. त्यांच्याशी राजकीय सहमती असलेले लोक तिथे येतात. आमच्या राजकीय मोर्च्यात मुख्यतः जनसंघटनांचे लोक असतात. आम्ही त्यांचे प्रश्न सोडवणारे नेते असतो. आम्ही सांगतो म्हणून ते येतात.

आज तरी लेखकाने नोंदवलेल्या संसदीय लोकशाहीच्या, घटनेच्या कितीही मर्यादा असल्या तरी त्या चौकटीतच पुढे सरकावे लागेल. ते अधिक जाणतेपणाने कसे सरकता येईल, आपला आधार त्यायोगे कसा वाढवता येईल, समूहांची जाणीव कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल.

डॉ. आंबेडकर व मार्क्स यांच्या भूमिकांच्या चर्चा चालू राहतील. त्यांच्या समन्वयाचा आग्रह न धरता आजच्या काळात पूरकत्व मांडले पाहिजे. हे ऐतिहासिक मतभेद आजच्या लढ्यांतील सहभागाला कोणत्याही प्रकारे आड येत नाहीत.

बाबासाहेबांची मार्क्सवरील काहीही टीका असली तरी सामाजिक व आर्थिक शोषणाविरुद्ध लढा दलित-सवर्णांनी एकत्र लढला पाहिजे हे त्यांचे प्रमुख सूत्र कायम दिसते. स्वतंत्र मजूर पक्ष-अगदी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा कार्यक्रम ते रिपब्लिकन पक्षाची संकल्पना इथपर्यंत. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. दलितांनी वर्ण-वर्ग वर्चस्व भेदण्याच्या लढ्याचे नेतृत्व करावे ही त्यांची स्वतंत्र मजूर पक्षावेळची धारणा सतत अधोरेखित करायला हवी. २२ ऑगस्ट १९३६ च्या अंकातील हे अवतरण य. दि. फडके यांनी आपल्या ‘आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकात दिले आहे. ते असे – 

‘अस्पृश्यतानिवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरुप जरी जातिनिष्ठ दिसत असले तरी तत्त्वतः तो लढा आर्थिक आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखात सांगितलेले आहे. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधांहून वेगळे किंबहुना परस्परविरोधी असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे प्राप्त होते. परंतु, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी कामकरी वर्गांचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्य वर्गाला आपला आर्थिक लढा स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बाजूंनी गांजलेला अस्पृश्य वर्ग हिंदी श्रमजीविकांच्या लढ्यात पुढारीपण घ्यायला लायक आहे असे आम्ही मागे एकदा म्हटलेले होते.’

या सर्व चर्चेला चालना देण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल. उद्धव कांबळेंना आणि लोकवाङ्मयला पुन्हा एकदा धन्यवाद.

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, जानेवारी २०१९)
_______________
 ‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवादः नवे आकलन, नव्या दिशा’
लेखकः उद्धव कांबळे
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
पृष्ठेः ३२४. किंमतः रु. ३५०
_______________

Sunday, December 9, 2018

नवदीक्षित बौद्धांची नवसांस्कृतिक चौकट कोणती?


संविधान जागर यात्रेच्या तयारीसाठी भेटीगाठी घेत हिंडत होतो. आमच्या विभागातल्या एका नेत्यांना भेटायचे होते. ते माजी मंत्रीही आहेत. ती कोजागिरीची रात्र होती. त्या निमित्त काही तरुण मुलांनी आयोजित केलेल्या गरब्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. आम्ही तिथेच गेलो. तर त्यांनी मंचावरच बोलावून घेतले. समोर गरब्यात थिरकणारी मुले-मुली आणि वर मंचावर आमच्या गप्पा...यात्रेच्या तयारीपासून ते आगामी निवडणुकांपर्यंत. एक प्रश्न बरेच दिवस विचारायचाच होता तो त्यांना विचारला. 

म्हटले, “ही मुले किती धुंद झाली आहेत. अशा या नाचाची त्यांना गरज आहे. तिकडे गुजरातमध्ये आंबेडकर जयंतीला ‘भीम गरबा’ चालल्याचे मी यूट्युबला पाहिले आहे. आपल्याकडे का नाही आपण तसे करत? गरबा किंवा दांडिया हा नाच आहे. देवा-धर्माच्या निमित्ताने तो सुरु झाला. पण आता ती धर्माची चौकट असण्याचे कारण काय? नाच तो नाच. तो देवीच्या गाण्यांवर होतो. तसाच भीमगीतांवरही होऊ शकतो. नाहीतरी गरब्यात सगळी गाणी काय देवीची असतात असे नाही. हिंदी गाण्यांचे रीमिक्स, नुसती धून असतेच की!” 

दहा वाजायला आले होते. नियमाप्रमाणे दहा वाजता थांबायला लागणार होते. शेवटचा टप्पा सुरु होता. समोरची मुले बेधुंद गिरक्या घेत नाचत होती. त्यावेळीही एक हिंदी गाण्याची धूनच लागली होती. त्यात देवी, हिंदू धर्म कोठेच नव्हता. 

आमचे हे नेते-माजी मंत्री म्हणाले, “अरे, करायला हरकत नाही. पण समाज काय म्हणेल म्हणून आपण गप्प बसतो.” 

समाज म्हणजे बौद्ध समाज. आमचा हा विभाग बौद्धांचा बालेकिल्ला. बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळात येणे-जाणे असलेला, दलित पँथरचा झंझावात अनुभवलेला. हिंदू सण-समारंभ करणे सोडा, चुकून त्यात कोणी दिसला तरी त्याची खैर नसायची अशी या पँथर्सची दहशत. आम्ही लहान. पण त्याच दहशतीचे पुरस्कर्ते. हे नेतेही त्याच संस्कारांतून गेलेले. मध्ये खूप पाणी वाहून गेले. दूषित-प्रदूषित. अजूनही वाहते आहे. जुन्या विद्रोहाच्या नौका कागदी असल्यासारख्या कुठच्या कुठे वाहून गेल्या. त्यांचा काहीही थांग नाही. या नौकाचालकांच्या देखत आता या विभागात गणपती बसतात. नवरात्र होते. 

यावेळच्या अनंत चतुर्दशीला आमच्या बुद्धविहाराच्या सर्वसाधारण सभेसाठी मी तिथे होतो. गल्ली-गल्लीतून सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका निघत होत्या. जयभीम वगैरे नावाच्या मित्रमंडळांच्या भक्तगणांचे फ्लेक्स बॅनर रस्ताभर लागलेले. आमच्या या नेत्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. त्यांनी रस्त्यावर कडेला मंडप टाकलेला. त्यात त्या मंचावर उभ्या राहून गणेशभक्तगणांचे स्वागत करुन मिरवणुकांना निरोप देत होत्या. हे गणपती काही मिश्र समाजाचे नव्हते. बौद्धांनी बौद्धांसाठी बसवलेले बौद्धांचे सार्वजनिक गणपती. त्याचे स्वागत करणाऱ्या नगरसेविका बौद्ध. नवरात्र आणि नंतर देवीच्या मिरवणुकाही अशाच बौद्धांनी बौद्धांसाठी काढलेल्या. वर उल्लेख केलेला गरबाही बौद्धांनी आयोजित केलेला. त्यात थिरकणारी मुलेही बौद्धांचीच. आणि आम्ही स्टेजवरचेही सगळे बौद्धच. 

पण एक आहे. आमचा हा विभाग बाबासाहेबांचा कडवा अभिमानी. बालेकिल्लाच तो! भीमजयंतीची मिरवणूक काय जोशात निघते म्हणून सांगू! तिला तोड नाही. 

आमचे हे नेते आंबेडकर जयंतीनिमित्त गरबा आयोजित करण्यात पुढाकार घ्यायला मग का तयार नाहीत? मुलांना तर आवडेलच ते. त्यांना ‘समाज काय म्हणेल?’ ही जी अडचण वाटते तो ‘समाज’ कोणता? 

एकतर यांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही जागे असलेले आदर्श बौद्ध समाजाचे संकेत. जुन्या विद्रोही संस्कारांचे अवशेष. शिवाय बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञांचा वचक. दुसरे म्हणजे बौद्ध मंडळी हिंदू सणांत कितीही ‘समरस’ झाली तरी त्यास अधिकृत मान्यता अजून मिळालेली नाही. आता वस्त्यांत राहत नाहीत, पण माध्यमांतून ज्यांचे धर्मपीठ कब्जा करुन आहे ते विद्वान बौद्ध बौद्धांच्या या अधःपतनाबाबत निवाडे देत असतात, फर्मान काढत असतात. जसा मी, तसेच हे सर्व ज्या वस्त्यांतून बाहेर गेले, त्यांच्या वस्त्यांत हेच चालू आहे, जे माझ्या. त्यांत काहीही हस्तक्षेप करण्याची ताकद आमची नाही. तथापि, अशी ताकद नाही, हे कबूल करण्याचीही कुवत नाही. जिला बाबासाहेब आंबेडकर आणि गणपती दोघेही सारखे ती नवी पिढी आम्हाला जुमानत नाही, जुमानणार नाही. पण आमच्या या नेत्यांच्या मनात आमच्याविषयी काही इज्जत असते. कारण तेही आमच्याच विद्रोही पिढीचे. त्यामुळे नव्या बदलाला सामोरे जाण्याचे त्यांचे धैर्य मर्यादित. त्यांच्या पुढच्या पिढीत ही कमजोरी नक्की असणार नाही. 

माझे हे तिरकस बोलणे सोडून द्या. त्यातल्या मुद्द्याची चर्चा करु. 

जुन्या अन्यायी, कर्मठ व्यवस्थेवर आघात करुन झाले. पण तिच्या जागी नव्या रचनेचे काय? नवदीक्षित बौद्ध हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य मानले गेलेले मुख्यतः महार. या अस्पृश्य मानलेल्या जाती हिंदू धर्मसंस्कारांत वाढलेल्या. हे संस्कार शेकडो वर्षांचे. बौद्ध झाल्या झाल्या ते जातील हे शक्य नव्हते. म्हणूनच काय सोडा व काय धरा हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी धम्मदीक्षेवेळी बावीस प्रतिज्ञा दिल्या. दीक्षा दिल्यावर दीड महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धर्मीय संस्कृतीच्या नव्या संस्थात्मक रचना करण्यासाठीचा पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. तरीही ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. आणि विधीबाबत काही ढोबळ आराखडा मांडला. पुढच्या नेतृत्वाकडून त्यांचा जो विकास होणे अपेक्षित होते, तसा तो झाला नाही. नंतर पँथरच्या काळात जोरदार सांस्कृतिक-सामाजिक तोडफोड, मूर्तिभंजन झाले. पण नवी रचना झाली नाही. हमरी-तुमरीवर येऊनच्या वादांत, नेतृत्वाच्या स्पर्धेत पँथरच्या ठिकऱ्या उडाल्या. जिथे संघटनेचीच रचना नाही तिथे नव्या सांस्कृतिक रचनांचे अवधान ते काय राहणार! 

एक सांगायला हवे. पँथरने कविता, साहित्य, भाषणे, मोर्चे आदि मार्गांनी व्यवस्थेवर जे आघात केले त्यातून आमची पिढी घडली. ती प्रेरणा, अस्मिता आजही बलवान आहे. 

‘हा भाकरीचा जाहीरनामा 
हा संसदेचा रंडीखाना 
ही देश नावाची आई 
राजरोस निजते कुबेराच्या सोबत..’ 

हे नामदेवचे (नामदेव ढसाळ यांचे. तेव्हा नामदेव ढसाळांना नामदेव, राजा ढालेंना राजा असेच म्हणायची प्रथा होती) शब्द ही सडकी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच्या तोफा आमच्या हाती देत असे. 

तर 

‘मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून 
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक’ 

या ओळी कमालीची करुणा आणि संताप आमच्या आत निर्माण करत असत. 

साचलेपण आलेल्या मराठी साहित्यसंस्कृतीला ही निखाऱ्यांची भेट होती. त्यातून तीही तावून-सुलाखून निघाली. दलित, विद्रोही साहित्याने एक नवी संस्कृती साहित्यविश्वात निर्माण केली. त्याने नव्या सौंदर्यशास्त्राचाही निकड अधोरेखित केली. नवे संकेत, नव्या प्रतिमा, नवी भाषा, नवी शैली, नवे शब्द यांनी मराठी साहित्याची समृद्धी वाढायला मदत झाली. 

ही प्रचंड मोठी कामगिरी होती. तथापि, ती या साहित्य क्षेत्रातच. तसेच त्याने प्रेरित झालेला घटक हा शिक्षित दलित तरुणच होता. - त्यातलाही एक विभाग. हे वर्णन वस्तुस्थितीला धरुन होईल. हे मुक्तछंदीय आधुनिक काव्य वा लघुकथा, एकांकिका न आकळणारा सर्वसामान्य समाज बहुसंख्येने या प्रभावक्षेत्राच्या बाहेरच होता. त्याला पँथरांची अन्यायाविरुद्ध आग ओकणारी भाषणे कळत होती. त्याने तो पेटून उठत होता. पण संस्कृतीच्या नव्या रचना त्याला त्यातून मिळत नव्हत्या. त्याच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभाव गाजवत होत्या त्या कव्वाल्या आणि त्याही आधी काही विभागांत आंबेडकरी जलसे. 

जलशांची परंपरा महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलश्यांपासून. बाबासाहेबांच्या काळात भीमराव कर्डकांनी हे जलसे सुरु केले. खुद्द बाबासाहेबांनी ‘माझी दहा भाषणे आणि कर्डकांचा एक जलसा’ अशी त्यांची प्रशंसा केली होती. या जलशांना पुढे ‘आंबेडकरी जलसे’ असे नाव पडले. मी कोकणात हे आंबेडकरी जलसे पाहिलेत. आमच्या वाडीतलेच कलाकार होते. या जलशांतील विषय, गाण्यांचा आशय आंबेडकरी, पण त्याची रचना कोकणातल्या ‘नमन’ किंवा ‘दशावतारी’ या प्रकाराशी साधर्म्य असलेली. 

जसे विद्रोही साहित्यिक-कवी आंबेडकरी समूहातून आश्चर्यकारकरित्या बहुसंख्येने आले, तसेच त्याआधी आणि नंतरही कव्वाली गायक याच आंबेडकरी समूहातून मोठ्या प्रमाणात आले. त्यांतले काही तर खरोखर खूप प्रतिभावान होते. (यातली बरीच प्रतिभा दारुत संपली हे खेदाने बोलावे लागते.) कव्वाली ही सूफी पंथाची देणगी. उर्दूचे बुलंद सौंदर्य प्रकट करणारी. मी ऐकलेल्या आंबेडकरी कव्वालांचेही उर्दू बुलंद होते. त्यांची गायकी उर्दू-मराठी असे. 

आमच्या गावी लग्नाची गाणी बौद्ध महिला म्हणत. त्यांच्या नुसत्या चाली ऐकल्या तर त्या चाली आणि आजूबाजूच्या कुणबी, गवळी, सुतार, गुरव वाड्यांतून कानावर येणाऱ्या लग्नाच्या गाण्याच्या चाली यात फरक नसे. फरक असे या गाण्यांच्या शब्दांत. बौद्ध महिलांच्या लग्नगीतांत बाबासाहेब, बुद्ध...अगदी बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आणि पुतण्या मुकुंद यांचीही नावे गुंफलेली असायची. हीच स्थिती पाळणा गीतांची. ‘जो जो रे बाळा जो’ आणि चाल बौद्ध वा हिंदूंची तीच. त्यातले नावांचे व काही वर्णनांचे शब्द वेगळे. हिंदूंच्या पाळणागीतांत राम-कृष्ण तर बौद्धांच्या पाळणागीतांत भीमबाळाची महती असे. 

संस्कृतीची ही मुळे लोकमनात खूप खोलवर रुजलेली असतात. त्यांच्या आधारावर त्यांचे सामूहिक कलांचे आविष्कार फुलत असतात. विशिष्ट प्रदेशातील लोकसमूह जाती, धर्म निरपेक्ष पद्धतीने या मुळांतून जीवनरस शोषत असतो. आपापला नवस्वीकृत आशय वेगळा असला तरी त्याच्या सांगितिक वा अन्य कलात्मक बंधांचा स्रोत बहुधा एकच असतो. अनेक पुरोगामी चळवळींनी आपल्या प्रचार-प्रसारासाठी या पारंपरिक आकारबंधांचा वापर केला आहे. ओवी, नमन, मंगळागौर, भारुड हे पारंपरिक रचनाबंध आणि त्यातून मांडावयाचा आशय पुरोगामी. स्त्री मुक्ती संघटनेचे मुक्तनाट्य ‘मुलगी झाली हो’ किंवा चळवळीत नेहमी म्हटली जाणारी ‘सावित्रीची ओवी’ हे याचे उत्तम नमुने आहेत. हे पारंपरिक कलाप्रकार वापरल्याने हा आशय लोकांना अधिक भिडतो असे लक्षात येते. आधुनिक अभिजात साहित्यातही हा अनुभव येतो. पारंपरिक स्रोतांशी जोडून विकसित होणारे साहित्य हे अधिक लोकप्रिय होते असे आढळते. परंपरेच्या पायावर नवतेची इमारत अधिक भक्कम होते हा बोध यातून मिळतो. 

बौद्ध वा निधर्मी होऊन हिंदू धर्माशी नाते तोडणे याचा अर्थ त्यातील कर्मकांडाशी, विषमतेशी, अवैज्ञानिक शिकवणुकीशी नाते तोडणे होय. हिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसांत लोकप्रिय असलेले कलाप्रकार त्यासाठी नाकारण्याची गरज नाही. मुळात हिंदू ही ओळख अलीकडची आहे. विविध पंथांचे साहचर्य-विरोध यातून साकारलेली भारतीय संस्कृती ही मिश्र आहे. ती गंगा-जमनी तहजीब आहे. कोणा एका पंथाला तिची सपूर्ण मालकी बहाल करणे हे वस्तुस्थितीला सोडून होईल. त्यामुळेच हे कलाप्रकार हिंदू धर्माच्या मालकीचे आहेत असे समजणे अनैतिहासिक आहे. 

एक खरे की माणूस कलेचा केंद्र होणे ही आधुनिक घटना आहे. त्यापूर्वी सर्व कला या ईश्वराची करुणा भाकणाऱ्या वा त्याच्या निमित्तानेच सादर होत असत. त्यामुळे या कलांचा आशयही धार्मिकच असे. दांडियाचा संबंध कृष्ण-गोपींच्या रासक्रीडेशी आहे. आपण चळवळीच्या गाण्यांत जर देवाचा आशय काढून आधुनिक प्रगतीशील आशय घालतो तर मग दांडिया वा गरबा यातील देवाचा संबंध काढून टाकून त्या जागी नव्या प्रगतीशील आशयाचे रोपण करण्यास काय हरकत आहे? आज दांडिया वा गरबा अनेक धर्मांच्या-जातींच्या मुलांना भारुन टाकत असेल, त्यांच्या ऊर्जेचे विरेचन करत असेल, त्यातील लय-ठेका त्यांना परमानंद देत असेल आणि यात काही नकारात्मक विचार वा जाणीव नसेल तर आपण त्याचा स्वीकार का करु नये? मुले स्वीकारतातच आहेत. त्याच्या असेल त्या आशयासह. आपण जाणत्यांनी त्यात नवा आशय घातला तर ही मुले तो नाकारणार थोडाच आहेत! तुम्ही हा आशय द्या, नका देऊ. त्यांना जे करायचे आहेत ते ते करणारच आहेत. आपण बौद्ध वा पुरोगाम्यांनी आपल्या मनातल्या धुसफुसणाऱ्या कर्मठतेला विराम देण्याची खरी गरज आहे. 

ही अडचण महाराष्ट्राबाहेरच्या दलित उत्थानाला फारशी येत नाही. महाराष्ट्राबाहेरचा नवशिक्षित, नवजागृत दलित थेट बाबासाहेब व त्यांच्यामुळे बुद्धाशी जोडला जातो. त्यात महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचे काही योगदान नाही. त्यामुळे त्यात ही धुसफुसणारी कर्मठताही नाही. 

पारंपरिक ‘बले बले’ भांगडा आणि आफ्रिकी-अमेरिकन विद्रोहींनी सत्तरच्या दशकात अमेरिकेच्या रस्त्यावर लोकप्रिय केलेला ‘रॅप’ यांचे फ्यूजन करुन पंजाबातील दलित समाजातली १७-१८ वर्षाची गिन्नी माही ही गायिका ‘राज बाबा साहिबदा’ व ‘जयभीम’ ज्या जोशात गाते त्याने माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. अभिमानाने ऊर भरुन येतो. ती एका गाण्यात तर आपली जात (डेंजर चमार) ज्या आवेशात सांगते तेव्हा तर तिने व्यवस्थेला लावलेल्या सुरुंगांचेच स्फोट होत आहेत असे वाटते. पंजाबीबरोबरच तिने हिंदीतही गाणी म्हटली आहेत. तिच्या ‘नमो बुद्धाय’ या हिंदी गाण्यात पंचशीलाचे तसेच निळे ध्वज पार्श्वभूमीवर लहरत असतात. बाबासाहेबांच्य प्रतिमा तर बहुतेक गाण्यांत असतातच. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती बुद्धाबरोबरच पंजाबातील सुधारक संत सतगुरु रविदासांची महती गाते. बुद्ध आणि रविदास यांच्या प्रतिमा एकामागून एक येत राहतात. तिला बुद्ध स्वीकारण्यासाठी त्यांच्या पारंपरिक रविदासांना नकार द्यावा लागत नाही. उलट या समन्वयातून ती नवी ताकद जन्मास घालते. 

गुजरातमधील नवजागृत दलितांनी आपल्या पारंपरिक गरब्याला बाबासाहेबांच्या गाण्यांची जोड देऊन ‘भीम गरबा’ निर्माण केला आहे. त्यातले एक गायक अशोक सोळंकी गरब्याच्या तालावर नाचणाऱ्या आपल्या स्त्री-पुरुष साथींना गाण्यातून आवाहन करतात- ‘दलितो नाचो, दलितो गाओ I’ पुढे देवीचे नाही तर बाबासाहेबांचे गुण गातात, त्यांची शिकवण सांगतात- ‘बाबा भीमराव तारा काइदा बोले I’ 

आम्ही मुंबईच्या अनेक बुद्धविहारांत संविधानाच्या प्रचारासाठी बैठका घेत असतो. बौद्ध या नात्याने अनेक धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेत असतो. संविधानावर गाणी रचणारे, ती सादर करणारे माझे दोन सहकारी एकदा विहारातल्या कार्यक्रमाला जमलेल्या बायांना म्हणाले, “विहारात यायचे, वंदना म्हणायची, प्रवचन ऐकायचे आणि जायचे. बरे, वंदना-पूजा हे सगळे पालीत असल्याने काय म्हणतोय तेही कळत नाही. केवळ एवढेच म्हणायचे आणि फक्त ऐकायचे असे का? आपण नाचायचे का नाही? बाया-पुरुषांनी विहारात, त्याच्या पटांगणात गाऊन-नाचून आपले सण का नाही साजरे करायचे? त्यातून आनंद का नाही घ्यायचा?” 

मला एकदम नवे काही कळल्यासारखे झाले. मी पूर्वी बौद्ध धम्मावर प्रवचन देत असे. आताही कधीकधी देतो. पाली सूक्ते मराठीत झाली पाहिजेत हे मी बोलत असे. पण बौद्ध धम्माचे पालन, पूजन ही गंभीरच बाब असली पाहिजे, हा दंडक माझ्याही मनात कुठेतरी होता. माझ्या या सहकाऱ्यांच्या प्रश्नाने मला नवे कळले ते असे- केवळ गंभीरपणे विहारात वंदना घेण्याने बौद्धपण स्थापित होणार नाही. त्यासाठी लोकांना सामूहिकपणे नाचता-गाता येतील, आनंद घेता येईल अशा नव्या रचना करण्याची गरज आहे. केवळ वैचारिक प्रबोधनाने नवी प्रगतीशील संस्कृती आकाराला येणार नाही. लोकांच्या पारंपरिक कलांच्या आकृतिबंधांवर आधारलेले नवे आविष्कार तयार करण्याची नितांत गरज आहे. ते नाही केले तर लोक दोन पातळ्यांवर जगणार आहेत. जगत आहेत- विहारात आणि नवरात्रात. 

हा पेच लडाख-अरुणाचल-सिक्किमच्या पारंपरिक बौद्धांमध्ये नाही. शेकडो वर्षांत त्यांची म्हणून संस्कृती, गाणी, नृत्ये तयार झाली आहेत. प्रश्न महाराष्ट्रातल्या बौद्धांचा आहे. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी महायान, हीनयान या पारंपरिक बौद्ध पंथांपासून निराळा असा ‘नवयान’ जन्मास घातला. जन्मदाते लगेच गेल्याने या नवयानाच्या नव्या संस्कृतीच्या रचनांबाबत त्यांना काही करता आले नाही. आपल्याला मात्र या प्रश्नापासून फार काळ दूर राहता येणार नाही. बाबासाहेबांची धम्मक्रांती प्रवाहित ठेवायची असेल तर नवदीक्षित बौद्धांच्या नव्या संस्कृतीची चौकट सिद्ध करावीच लागेल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, डिसेंबर २०१८) 

Sunday, November 25, 2018

भाजपचा पराजय होईल का?

इच्छा आहे- असे व्हायला हवे. 

होणे शक्य आहे का? – हो. नक्की होऊ शकते. 

होईल का? – ठाऊक नाही. 

हे मुद्दे सविस्तर समजून घेऊ. 

भाजपचा पराभव झालाच पाहिजे. कारण हा संविधानद्रोही पक्ष आहे. भले संविधानाचा तोंडाने कितीही गौरवी जप तो करो. त्याचे खासदार-आमदार-मंत्री-मुख्यमंत्री-पंतप्रधान संविधानाच्या पालनाची गंभीरपणे वा देवाशपथ शपथ घेवोत. पंतप्रधान मोदी संसदेत प्रवेश करताना संसदेच्या पायरीवर डोके ठेवोत. डॉ. आंबेडकर व गांधीजींच्या पुतळ्यांसमोर कमरेत कितीही वाकोत वा लोटांगण घालोत. ही माणसे घटनेला उद्ध्वस्त करायलाच सत्तेवर आली आहेत यात काहीही शंका नाही. नथुरामनेही महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडताना त्यांना आधी अभिवादन केले होते हे विसरुया नको. 

भाजप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय साधन आहे. संघाचा जन्मच मुळी वर्चस्ववादी हिंदू राष्ट्राच्या उभारणीसाठी झाला आहे. इंग्रजांविरोधात चाललेल्या साम्राज्यवादविरोधी संग्रामातून तसेच सामाजिक सुधारणांच्या आंदोलनातून अनेक पुरोगामी मूल्ये उदयास येत होती. स्वतंत्र भारत सेक्युलर असणार. सरकारचा कोणताही धर्म नसेल. प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माच्या पालनाचे स्वातंत्र्य असेल. पण हे स्वातंत्र्य सार्वजनिक व्यवस्था, आरोग्य व सामाजिक नीतिमत्ता यांना धक्का पोहोचविणारे असता कामा नये, सरकारचा कारभार इहवादी पद्धतीने चालणार. ऐतिहासिक कारणांनी सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या मागास राहिलेल्या, आर्थिक बाबतीत दुर्बल राहिलेल्या विभागांच्या विकासासाठी खास पावले उचलावी लागणार. लिंग, जात, वर्ग काहीही असला तरी कायद्यापुढे सर्वांचा दर्जा समान व सर्वांना समान संधी असणार. व्यक्तीची प्रतिष्ठा सर्वोच्च राहणार. व्यक्तीसाठी देश असेल-देशासाठी व्यक्ती नव्हे आदि अनेक मानवी जीवन उन्नत करणारी सूत्रे स्वातंत्र्य चळवळीदरम्यानच्या वैचारिक खलातून विकसित होत होती. जी पुढे संविधानात समाविष्ट झाली. हे काहीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको होते. म्हणूनच आपली जुनाट संरजामी मूल्ये, वर्णश्रेष्ठतावादी रचना, एकसाची संस्कृती या देशात स्थापित करण्यासाठी तो प्रयत्नरत होता. 

प्रगत शक्तींचा स्वातंत्र्य चळवळीत व पर्यायाने सामान्य जनमनात वरचष्मा असल्याने संघस्वयंसेवकांना खूप प्रतिसाद मिळण्याला मर्यादा होती. तथापि, नवभारतात ज्यांना आपले परंपरागत प्रभुत्व नाहीसे होण्याची भीती होती अशा सामाजिक श्रेणीत वरच्या मानल्या गेलेल्या समूहांतील एक लक्षणीय गट त्यांच्या बाजूने ठाम होता. त्यातून असंख्य हितचिंतक व जीवनदायी प्रचारक संघाला मिळाले. या चिवट कार्यकर्त्यांच्या आधारे संघ टिकून राहिला. संधी शोधत राहिला. त्या मिळाल्या तेव्हा त्यांचा पुरेपूर लाभ उठवत विस्तारत गेला. संविधान निर्मितीवेळी हे संविधान पाश्चात्य मूल्यांवर आधारित आहे. त्यात काहीही भारतीय नाही, मनुस्मृतीसारख्या प्राचीन भारतीय मूल्यांचा त्यात समावेश नाही, असा आरोप लावून संघाने ते धिक्कारले होते. राष्ट्रध्वज संविधान सभेत मंजूर झाला तेव्हा तिरंग्यातले तीन रंग हे अशुभ आहेत, ते वाईट मानसशास्त्रीत परिणाम घडवतील असे अगदी अवैज्ञानिक आरोप संघाने केले. हिंदू कोड बिलाद्वारे आलेल्या सुधारणांनानाही पाश्चात्य म्हणून संघाने अव्हेरले. या बिलाचा पाठपुरावा करणाऱ्या आंबेडकर-नेहरुंवर उपरोधिक टीकाही संघाने त्यावेळी केली. विवाह हा हिंदूंत करार नसून ते जन्मजन्मांतरीचे पवित्र बंधन असते, अशी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींची भूमिका होती. घटस्फोटाला त्यांची मान्यता नव्हती. 

मोदी, फडणवीस, गडकरी, राजनाथ सिंह ही तमाम संघस्वयंसेवक मंडळी आज सरकारची राज्य व केंद्रात धुरा सांभाळत आहेत. ही धुरा स्वीकारताना त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. एका बाजूला संविधानाची शपथ घ्यायची व त्याचवेळी नरेंद्र महाराजांना शेजारी बसवून राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा असे बिनदिक्कत फडणवीसांनी म्हणायचे. उत्तर प्रदेशात तर योगी-साधूनेच मुख्यमंत्री व्हायचे. मोदींनी इहवादाला बासनात बांधून शास्त्रज्ञांच्या परिषदेतच गणपतीचा हवाला देऊन प्राचीन काळी आमच्याकडे प्लॅस्टिक सर्जरी होत होती किंवा पुराणातल्या पुष्पक विमानाचा दाखला देत तेव्हा आम्ही विमानविद्येत प्रगत होतो म्हणायचे हे घटनेला धरुन आहे काय? अजिबात नाही. हा देश हिंदूंचा. अन्य आस्था बाळगणारे दुय्यम, ही संघाची भूमिका अमलात आणायचे काम योगी-मोदी आज करत आहेत. अलाहाबादला प्रयागराज हे नाव देणे हे काही केवळ एका शहराचे नामांतर नाही. गंगा-जमनी विचारबहुलतेची मिश्र संस्कृती ज्या अलाहाबादचे वैशिष्ट्य राहिले ते मिटवणे व एकसाची कट्टर हिंदुत्वाच्या दोरखंडात ही उदार संस्कृती करकचून आवळण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. बाकी गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांची कत्तल करणे, लव जिहादचा आळ घेऊन मुस्लिम मुलांना ठार करणे, घोड्यावर बसला म्हणून दलिताचा खून करणे हे तर धार्मिक वर्चस्व आणि जुनी वर्चस्ववादी सामाजिक रचना पुन्हा प्रस्थापित करण्याचीच दिशा आहे. चक्क घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतिनिमित्त संसदेच्या खास अधिवेशनात सेक्युलर, समाजवाद हे शब्द बाबासाहेबांना नको होते, ते नंतर घटनेत घुसडले गेले आहेत अशी सत्यअसत्याची बेमालूम भेसळ करत घटनेतील प्रागतिक संकल्पनांभोवती संशयाचे जाळे उभे करणे हे घटना बदलणे नव्हे काय? घटनेतील शब्द वा तरतुदी प्रत्यक्ष बदलणे हा एक भाग. परंतु, घटनेतल्या तत्त्वांचे अर्थ बदलणे हेही घटना बदलण्याचेच कारस्थान आहे. आजचे सरसंघचालक घटनेचा गौरव करतात, सहिष्णू भारतीयत्वाचा उदोउदो करतात आणि त्याच सूरात भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्व अशीही मखलाशी करतात. अनेक धर्म असलेल्या या भूमीतील नागरिकांचे भारतीयत्व ते एका धर्मात (मग त्याला ते धर्म नव्हे जीवनशैली, संस्कृती वगैरे काहीही म्हणतील) बांधण्याची खटपट करतात. संघ, भाजप वा एकूण त्यांचा परिवार काय बोलतो यापेक्षा तो काय करतो यावरून त्यांचे मापन करणे म्हणूनच गरजेचे आहे. 

ज्यांनी आपल्यात अनेक तऱ्हेचे मतभेद असतानाही सामायिक सहमती शोधत घटना तयार केली, त्या सर्व लोकशाहीवादी शक्तींच्या विभाजनाचा व जनतेतील पुरोगामी विचारांबाबतच्या संभ्रमाचा फायदा घेऊन सत्तेत आलेला संघप्रणीत भाजप सत्तेवरुन खाली खेचणे ही म्हणूनच निकडीची बाब आहे. आगामी निवडणुकांतला संग्राम हा नेहमीचा संसदीय प्रणालीतला निवडणूक व्यवहार नाही, तर स्वातंत्र्य चळवळीत ज्या प्रमाणे इंग्रजांपासून देशाच्या मुक्ततेसाठीचे युद्ध छेडले गेले तद्वत घटनाद्रोह्यांपासून घटना व पर्यायाने देश वाचविण्याचा हा संग्राम आहे, याचे भान ठेवायला हवे. 

भाजपचा पराभव व्हायला हवा, ही म्हणूनच अनेक प्रगतीशील भारतीय नागरिकांप्रमाणे माझीही इच्छा आहे. पण हे होईल का? 

नक्की होऊ शकते. भाजप प्रचंड बहुमतांनी निवडून आला असला तरी गेल्यावेळी त्याची मते ३० टक्केच आहेत. ७० टक्के मते ही भाजपेतर पक्षांना पडली आहेत. ही मते घेणाऱ्यांत काही लोक भाजपचे मित्र किंवा तत्सम धर्मांधता मानणारे अन्य धर्मीय वा संकुचित प्रादेशिक-भाषिक अस्मितांचे पुरस्कर्ते असू शकतात. ते वगळले तरी ज्यांची अधिकृत भूमिका निश्चितपणे लोकशाहीवादी वा संविधानातल्या मूल्यांना प्रमाण मानणारी आहे असे पक्ष यात अधिक आहेत. अधिकृत म्हटले ते यासाठी की या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार या मूल्यांना सोडून झालेला असू शकतो. हे जमेत धरुनही लोकशाही वा संविधानवादी हा या पक्षांच्या भूमिकेचा आजही मुख्य आधार आहे. हे पक्ष जर एकत्र आले आणि त्यांनी भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा केला तर भाजपचा पराभव अटळ आहे. 

पण हे पक्ष एकत्र येतील का? एकास एक उमेदवार भाजपच्या विरोधात उभे करतील का? नक्की सांगता येत नाही. म्हणजे त्या सगळ्यांची भाषा भाजपच्या पराभवाची व त्यासाठी एकत्र येण्याची आहे. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक सापनाथ तर दुसरा नागनाथ ही भूमिका आज जवळपास अदृश्य आहे. या भूमिकेवर तिसरी आघाडी आकार घेणे हा पूर्वी परिपाठच होता. तो आता तेवढा राहिलेला नाही. काही का असेना काँग्रेसच्या काळात लढता तरी येत होते, भाजपवाले तर सरळ आत टाकतात, हे आता बिगरनिवडणुकवाल्या आंदोलकांचेही म्हणणे आहे. शिवाय कितीही कमजोर झाला तरी काँग्रेस आजही देशव्यापी प्रतिमा व संपर्क असलेला पक्ष आहे. त्याला वगळून आघाडी झाल्यास मतविभागणीने भाजपलाच मदत होईल, हेही आता हे सगळे लोकशाहीवादी पक्ष मंजूर करतात. 

काँग्रेसच्या पुढाकाराखाली एक महाआघाडी उभी करण्याचे प्रयास सध्या चालू आहेत. मायावतीही या आघाडीचा भाग आताआतापर्यंत होत्या. मायावती व सोनिया गांधी यांच्या गळाभेटीचे फोटो बरेच गाजले. प्रकाश आंबेडकर बहुजन वंचित आघाडी जोरात पुढे नेत असले वा एमआयएमबरोबर सोबत करत असले तरी काँग्रेसबरोबर आम्हाला जायचे आहे, असेच ते म्हणत आहेत. सीपीआयची काँग्रेसबरोबर जाण्याची भूमिका स्पष्ट आहे. सीपीएम मध्ये प्रकाश करात गट काँग्रेसच्या विरोधात आहे तर सरचिटणीस येचुरी बाजूने आहेत. सीपीएमची स्पष्ट भूमिका अजून येत नसली तरी येचुरी विचारप्रवाह जोम पकडतो आहे, त्याप्रमाणे काँग्रेसशी त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्याचेही कळते आहे. लोहियावाद्यांपैकी अनेकजणांनी भाजपबरोबर चुंबाचुंबी केली असली तरी लालूप्रसाद भाजपविरोधात ठाम राहिले. त्यासाठी काँग्रेसबरोबर त्यांचे नियमित सख्य राहिले. 

भाजपबरोबर ज्यांनी सत्तेसाठी साटेलोटे केले त्यांपैकी शरद यादव, मायावती, चंद्राबाबू आज त्यांच्या विरोधात आहेत. नितीशकुमार, रामविलास, आठवले भाजपसोबत आहेत. हे आधीचे साथीदार वा आताचे सोबती वैचारिक बाबतीत संघ वा भाजपचे अजिबात नाहीत. त्याबद्दल संशय घेण्यात काही मतलब नाही. पण ते मतलबी आहेत. सत्ता हा यांचा मतलब आहे. काँग्रेस हे जळते घर आहे हे बाबासाहेबांचे उद्गार तोंडावर टाकून बाबासाहेबांनी आज काँग्रेसविरोधात भाजपशी हातमिळवणी केली असती असेही हे लालची तथाकथित आंबेडकरवादी म्हणू शकतात. आपल्या स्वार्थाच्या दावणीला बाबासाहेबांना जुंपायला यांना काहीही लाजशरम नाही. असे आंबेडकरवादी आणि लोहिया-समाजवादी स्वतःला विकायला कधीही तयार असतात. त्यांचा भरवसा काय द्यायचा? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसबरोबर आहे, ही त्याची अधिकृत भूमिका आज आहे. पण २०१४ ला सेना मागे सरली तर महाराष्ट्रातील सरकारच्या ‘स्थैर्या’साठी भाजपला पाठिंबा द्यायला शरद पवार तयार होते. मुळात काँग्रेसमधून ते बाहेर पडले त्यासाठीचा सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा दर्शनी मुद्दा तर इतका तकलादू होता की त्यावर त्यांच्या विश्वासातल्या लोकांचाच त्यावर विश्वास नव्हता. आता तर त्यांचे एक प्रमुख नेते तारिक अन्वर पक्षातून बाहेर पडले ते शरद पवारांनी मोदींना राफेल प्रकरणात दिलेल्या स्वच्छतेच्या प्रमाणपत्रामुळे. या सोडचिठ्ठीवेळी अन्वर यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपला देऊ केलेल्या पाठिंब्याचीही आठवण काढली. तरीही आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसबरोबर आघाडीत असणार आहे. 

मायावतींनी काँग्रेसबरोबर आता ताबडतोबीने येणाऱ्या राज्यांच्या निवडणुकांसाठी संबंध तोडले आहेत व त्या स्वतंत्रपणे लढणार आहेत. हा निर्णय जाहीर करताना सोनिया-राहुल यांच्याबाबत चांगल्या भावना व्यक्त करुन दिग्विजयादी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वांवर त्या जाम संतापल्या होत्या. राज्यांतले जागावाटप हा मुख्य तिढा आहे. राजस्थानमध्ये मायावतींची काँग्रेसला तशी फारशी गरज नाही. अशावेळी जास्त जागा मागणाऱ्या मायावतींचे लोढणे गळ्यात कशाला अडकवा असे तिथल्या नेतृत्वाला वाटते. मध्यप्रदेशमध्ये मायावतींची गरज काँग्रेसला आहे. पण जागांची मागणी त्यांना अव्वाच्या सव्वा वाटते. मायावतींना पक्ष टिकवायचा असेल तर पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची व्यवस्था लावणे तसेच मतांच्या भाषेत किती मते पक्षाला मिळाली हे दाखवणेही गरजेचे वाटते. अशावेळी भाजप हा संविधानद्रोही, फॅसिस्ट आहे याबद्दल सहमत, पण त्यासाठी आपले पक्षीय हितसंबंध सोडायची तयारी नाही. ना मायावतींची ना काँग्रेसची. 

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित-बहुजन आघाडीने एमआयएमबरोबर आघाडी करुन महाराष्ट्राच्या राजकीय बलाबलाच्या चर्चेत आघाडी घेतली आहे. त्यांची सहकारी-अनुयायी मंडळी आता बौद्ध समाज अख्खा बाळासाहेबांच्या बाजूला, त्यात मुसलमान जवळपास सर्व आला, भटके तर आलेच होते जवळ आणि आता धनगरादी जातींचा मोठा विभाग साथीला उभा असल्याने आता आम्ही जागा मागणारे नव्हे तर जागा देणारे मुख्य प्रवाह आहोत, असे बोलू लागले आहेत. बाळासाहेब २०१९ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि २०२४ ला पंतप्रधान हा निकाल त्यांनी आताच जाहीर करुन टाकला आहे. तरीही बाळासाहेब काँग्रेस जिथे हरत आली आहे, अशा २४ पैकी १२ जागा लोकसभेसाठी मागत आहेत. मात्र त्यालाही काँग्रेसची तयारी नाही अशावेळी आम्ही काय करायचे असा प्रश्न बाळासाहेब उपस्थित करत आहेत. काँग्रेसने लोकसभेसाठी बाळासाहेबांना पाठिंबा द्यायचे कबूल केले आहे, मात्र त्यांनी एमआयएमची सोबत सोडायला हवी अशी अट घातली आहे. बाळासाहेबांना ही अट अमान्य आहे. त्यांनी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसने जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलीच तर त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करणारच नाही असे नाही असा गर्भित इशाराही दिला आहे. एमआयएम तर ठाम काँग्रेसविरोधी आहे. ओवेसींनी जाहीर केल्याप्रमाणे ते एकाचवेळी भाजप व काँग्रेस दोघांनाही बाळासाहेब आंबेडकर या ज्येष्ठ बंधूंच्या नेतृत्वाखाली आव्हान देणार आहेत. 

बाकी आप, जनता दल, शेकाप, अगदी सीपीआय आदि अनेक पुरोगामी पक्षांना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उद्या काँग्रेसबरोबर ‘योग्य’ समझोता न झाल्यास ‘नाईलाजाने’ स्वतंत्रपणे काही जागा लढवाव्या लागतील, हे ‘खेदपूर्वक’ बोलावे लागते आहे. आणि यातले काही असेही बोलून दाखवतात- भाजपला हरवायचा मक्ता काही आम्हीच घेतलेला नाही. काँग्रेसला याची काही जबाबदारी वाटते की नाही? भाजप पडला तर उद्या काँग्रेसलाच फायदा होणार ना! त्यांनाच याचे काही पडले नसेल तर आम्ही तरी का पर्वा करायची? होऊ दे जे व्हायचे ते! 

आम्हालाच काय पडले आहे, असे या देशातला लोकशाहीची खरी चाड असलेला, फॅसिझमचा खराखुरा विरोधक असलेला, ज्याला अत्याचार सहन करावे लागणार आहेत असा खेडोपाड्यातला राजकीयदृष्ट्या सजग दलित-अल्पसंख्याक म्हणू शकत नाही. हे म्हणणारे शहरातले, मध्यवर्गीय असतात. त्यांना खरे म्हणजे फॅसिझमची बौद्धिक चर्चेपलीकडे फारशी आच लागलेली नसते. ते अशी बोलण्याची चैन करु शकतात. राहिला प्रश्न काँग्रेसचा. आज नेहरुंची काँग्रेस राहिलेली नाही. ना काही दरारा असलेल्या इंदिरा गांधींची. काँग्रेसचा इतिहास काहीही असला तरी तो इतिहास वा वैचारिक वारसा सोनिया-राहुल वा काही मुठभरांनी सांभाळावा, आम्ही फक्त सत्तेच्या पालखीचे भोई असे वर्गचारित्र्य व स्वभाव असलेला मोठा वर्ग काँग्रेसमध्ये आहे. तो इथून उठून कधी भाजपकडे जाईल याचा नेम नसतो. मणिपूरमध्ये तर निवडून आलेली जवळपास अख्खी काँग्रेसच भाजपत गेली. गोव्यात पर्रिकरांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसची सत्ता येण्याचा दाट संभव असतानाच दोन काँग्रेसचे आमदार भाजपला मिळाले. तेव्हा, काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या नेत्यांना (अपवाद गवळता) भाजपच्या फॅसिझमचे काही पडलेले नाही. 

म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाजपविरोधात अभेद्य अशी एकजूट तसे व्हावे अशी इच्छा असली तरी वा तसे होणे शक्य असले तरी, होईलच याची शाश्वती देता येत नाही. 

अशावेळी उद्या काँग्रेसशी लढता येईल पण भाजप पुन्हा सत्तेवर आला तर सगळ्या लढायाच थांबतील, अनेकांना जेलमध्ये सडत राहावे लागेल वा अनेकांना थेट संपवले जाईल याचे खरोखरच लागते आहे अशांनी आपला विवेक पूर्ण जागा ठेवण्याची गरज आहे. या निवडणुका ही भाजपरुपी फॅसिझमला परतवण्याची ऐतिहासिक संधी आहे, हे ध्यानात घेऊन व्यवहार करायला हवा. जागावाटपात जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणावे, पण काहीही झाले तरी तुटू देता कामा नये. भाजपला हरवल्यावर मग जे काही आपसात लढायचे आहे, आपले अस्तित्व दाखवायचे आहे, त्याला खूप अवकाश मिळणार आहे. 

आताच्या या राज्यांच्या निवडणुकांनंतर तरी हा प्रज्ञेचा व विवेकाचा प्रकाश या फॅसिझमविरोधी लोकशाहीवादी पक्षांच्या डोक्यात पडेल अशी आशा बाळगून हे विवेचन आटोपते घेतो. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(प्रजापत्र, दिवाळी २०१८)

Friday, November 9, 2018

फॅसिस्ट हिंदुत्वाचे आक्रमण व आंबेडकरी चळवळीकडून अपेक्षा

शीर्षकात हिंदुत्वाचे आक्रमण असे न म्हणता फॅसिस्ट हे विशेषण त्याला मुद्दाम जोडले आहे. ‘हिंदुत्व’ या शब्दाला आजचा संदर्भ आक्रमक, कट्टर, कर्मठ, राजकारणासाठीचे ध्रुवीकरण असा जरी असला व तो त्या अर्थाने वापरलाही जात असला तरी एक शब्द म्हणून या अर्थाला तो संपूर्ण समर्पित करता येत नाही. गांधीजी, त्या आधी विवेकानंद व त्याआधीपासून वारकरी या मंडळींचेही ‘हिंदुत्व’च होते. पण त्याला एक समावेशक, सुधारणावादी आशय आहे. गोरक्षण वा लव्ह जिहादच्या नावाने निरपराधांचे रक्त वाहवणाऱ्या बजरंगी टोळक्यांच्या हातातील भगव्यातून जे भय प्रतीत होते त्याचा वारकऱ्यांच्या भगव्यात लवलेशही नाही. वारकऱ्यांची भगवी पताका दया, क्षमा, शांतीचा उद्घोष करते. हिंदू संत म्हणून जागतिक मंचावर लखलखताना हिंदू परंपरेतील विचारांची उच्चतमता व आचारातील नीचतमता याबद्दल परखड बोलायला विवेकानंदांच्या हिंदुत्वाला अडचण येत नाही. गांधीजींचे ‘सनातन हिंदुत्व’ देवळात वास करत नाही, तर आश्रमात सर्वधर्मीय प्रार्थना करते. परपीडा जाणणारे ते वैष्णव या व्याख्येला अधोरेखित करते. भगव्या रंगाचा संबंध थेट बुद्धापर्यंत जात असला तरी हिंदू हा शब्द त्यावेळी नव्हता. वेदात, उपनिषदांत, भगवतगीता, महाभारत, रामायण आदि कशातच नव्हता. सिंधू प्रदेशातील लोकांना अरबी-फारसी भाषकांनी अर्पण केलेली ती प्रादेशिक ओळख आहे. यथावकाश व पुढे इंग्रज आल्यावर पाश्चात्य धर्मसंकल्पनांच्या संसर्गाने आपल्याकडच्या सांस्कृतिक अभ्युदयेच्छुंच्या प्रयत्नांनी ‘हिंदू’ ही धर्मओळख ठसठशीत झाली. तत्पूर्वी, केवळ संप्रदाय होते. धर्म हा शब्द समाजाची धारणा, कर्तव्य आदि अर्थानेच वापरला जाई. तो ख्रिश्चन, इस्लाम याप्रमाणेच एक धर्म म्हणून वापरला जाणे ही आजची वस्तुस्थिती आहे. तथापि, या धर्मांप्रमाणे एक आराध्य, एक धर्मग्रंध अशी त्याची अंतर्गत रचना व शिस्त नाही हेही खरे आहे. मात्र तरीही हिंदुत्व शब्दाची व्याख्या संघपरिवाराच्या भाषा व व्यवहाराला आंदण देणे हे धोरण म्हणून नव्हे तर वास्तव म्हणूनच गैर आहे. त्यांचा व्यवहार ज्या हिंदुत्वाचा पुकारा करतो त्याचा एक भाग जुन्या विषमतामूलक ब्राम्हणी वर्चस्वाचा आहे तर दुसरा निखालस हिटलरी सांस्कृतिक-राजकीय फॅसिझमशी नाते सांगणारा आहे. म्हणूनच ज्याचा सामना लोकशाहीवादी, समाजवादी, डावे, अन्य पुरोगामी व आंबेडकरवादी यांना करावयाचा आहे ते ‘फॅसिस्ट हिंदुत्व’ होय. 

या ‘फॅसिस्ट हिंदुत्वा’चा मुकाबला हा पुरोगामी-लोकशाहीवादी शक्तींच्या जीवनमरणाचा प्रश्न कसा तयार झाला आहे, याच्या अधिक विवेचनाची गरज नाही. भोवतालचा प्रत्येक क्षण साक्षी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करताना धाकदपटशा व प्रत्यक्ष खून, प्रसारमाध्यमांना दाम-दंडाने टाचेखाली धरणे, मुजरा करण्यास नकार देणाऱ्या पत्रकारांची गच्छंती, या फॅसिझमच्या विरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाच्या खोट्या आरोपांच्या वावटळीत घुसमटवणे, गोरक्षण-लव्ह जिहादच्या नावाने कायदा धाब्यावर बसवून जिवे मारुन जागेवरच न्याय करणे, घोड्यावर बसलेल्या दलिताचा खून, दलितांच्या घोड्यावरुन वरातीला विरोध, सत्ताधाऱ्यांकडून याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन, सहाय्य व आधार, साधू-बैराग्यांचे सत्तास्थानी येणे, राजसत्तेवरील धर्मसत्तेच्या अंकुशाची सेक्युलर व्यवहाराची शपथ घेतलेल्या राज्यकर्त्यांनी भलामण करणे, नागरिकत्वाच्या ओळखीच्या नोंदणी प्रक्रियेत अधिकृतपणे हिंदूंना आपले व मुसलमानांना परके गृहीत धरणे, सत्तास्थानावरुन घ्यावयाच्या निर्णयांत संसदीय लोकशाहीचे संकेत झुगारुन एकाधिकारशाही चालवणे ...ही यादी न संपणारी आहे. रोज तीत भर पडते आहे. 

मोदी, त्यांचे प्रमुख सहकारी मंत्री, भाजपच्या ताब्यातील महाराष्ट्रादी राज्यांचे फडणवीस वगैरे मुख्यमंत्री असे तमाम सत्तेचे सूत्रधार थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. हे नाते त्यांनी तोडलेले नाही. सोडलेले नाही. उलट सत्तेचे प्रतोद हाती घेऊन मोठ्या जलदीने ते संघाच्या ध्येयपूर्तीसाठी झटत आहेत. ही ध्येयपूर्ती संविधान बदलण्याची आहे. संविधान प्रत्यक्ष बदलणे ही प्रक्रिया तातडीने ते करणार नाहीत. पण शब्दांचे अर्थ बदलणे, संविधानाला अभिप्रेत धोरणांविषयी जनतेतील निरक्षरता ध्यानी घेऊन संविधानाला विपरित धोरणे राबवणे हे चालू झाले आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संसदेचे दोन दिवसीय खास अधिवेशन बोलावून राजनाथ सिंगांकरवी धर्मनिरपेक्ष शब्द बाबासाहेबांचा नव्हेच, तो नंतर घुसडला गेला, तो बदलून पंथनिरपेक्ष असावा असा हेतूतः गोंधळ तयार करणे हे त्याचे ठळक उदाहरण. बाबासाहेबांचे विचार त्यांना अभिवादन करुन उलटे फिरवण्यात ते सराईत आहेत. ३७० कलम, मुस्लिम यांविषयीची राष्ट्रीय जाणीवेने केलेली बाबासाहेबांची मांडणी आपल्याला अनुकूल रीतीने सादर करण्याची त्यांची चलाखी वादातीत आहे. ज्या घटनेची शपथ घेऊन हे स्वयंसेवक सत्तेवर आलेत, त्या संविधानाला त्याचा आधार मनुस्मृती नसल्याने ते भारतीय नाही, परकीय आहे असे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४९ सालीच अव्हेरले होते. राष्ट्रध्वजाला विरोध करताना तिरंग्याचे तीन रंग हे अशुभ आहेत, त्यांचा वाईट मानसशास्त्रीय परिणाम होईल, त्याला कोणी स्वीकारणार नाही..अशी कैक विधाने संघाच्या खातेबुकात लिखित आहेत. खातेबुकातील या नोंदी ना संघाने, ना मोदी-राजनाथ-फडणविशी स्वयंसेवकांनी नाकारल्या आहेत. याचा अर्थ, त्यांच्या परिपूर्तीसाठीच ते सत्तेवर आहेत, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोणी म्हणेल, घटनेची शपथ त्यांनी घेतली, मोदींनी तर संसद प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या पायरीवर डोके ठेवले त्याचे काय? त्यांना उत्तर एकच- ...नथुरामने गांधीजींचा खून करण्याआधी त्यांना अभिवादन केले होतेच! 

हा धोका परतवणे, फॅसिस्ट हिंदुत्वाचा हा झोटिंग सत्तेवरुन उतरवणे हे ज्या मंडळींनी मतभिन्नतेतून सहमती साधत इहवादी भारतीय संविधान रचले त्या सर्वांचे कर्तव्य आहे. केवळ आंबेडकरी चळवळीचे नाही. हो. हे म्हणणे बरोबर आहे. आणि संविधान रचणारा हा सर्व संविधान परिवार घटना उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या संघपरिवाराच्या विरोधात एकवटणे हाच त्याला उपाय आहे. तथापि, या एकवटण्याला बळ यायचे असल्यास, हे एकवटणे अधिक चिवट व्हायचे असल्यास त्यातील या घटकांची त्यांच्या अंतर्गत दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे. फॅसिस्ट हिंदुत्वाच्या आव्हानाशी आंबेडकरी चळवळीचे नाते व त्याला ती कशी भिडणार आहे, याचा स्वतंत्रपणे वेध घेणे म्हणूनच गरजेचे आहे. 

मुस्लिमांविषयी टीका ज्या ग्रंथात आहे, त्या ‘पाकिस्तान अथवा भारताची फाळणी’ या १९४६ च्या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही नोंदवतात - 'हिंदू राष्ट्र जर खरोखर प्रत्यक्षात आले तर देशासाठी ते एक भयानक संकट असेल यात काही शंका नाही. कारण या हिंदू राष्ट्रामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता धोक्यात येईल. याप्रकारे लोकशाहीशी त्याचा मेळ बसत नाही. वाटेल ती किंमत देऊन हिंदू राष्ट्राला रोखले पाहिजे.' 

१९४७ ची फाळणी, त्यानंतरच्या दंगली, १९४८ चा महात्मा गांधींचा खून या घटना अजून घडायच्या होत्या. संघाचा या घटनांतील सहभाग, चिथावणी यांचे प्रत्यंतर यायचे होते. तथापि, सावरकर, हिंदूमहासभेचे अन्य नेते यांची मांडणी बाबासाहेबांसमोर होतीच. ज्या हिंदू वर्चस्ववादी मंडळींशी त्यांचा संघर्ष चालू होता त्यात या हिंदू संघटनांच्या परिवारातील मंडळी अग्रणी होती. त्यांचे सत्तास्थानी येणे त्यावेळी दृष्टिपथात नव्हते. जेवढे दिसत होते त्यातून काँग्रेसच्या मार्फतच ही मंडळी स्वतंत्र भारतात सत्ता चालवतील एवढीच संभाव्यता होती. अशावेळी बाबासाहेब हिंदू राष्ट्राच्या धोक्याविषयी इशारा देत होते. आज हा धोका प्रत्यक्षात आला आहे. साहजिकच बाबासाहेबांना जाणवलेल्या तीव्रतेच्या कैकपटीने आंबेडकरी चळवळीला या धोक्याची तीव्रता आज जाणवली पाहिजे व त्यास परतवण्याचे सामर्थ्य तिने निर्माण केले पाहिजे. 

हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत अन्य धर्मीय अल्पसंख्याक हे दुय्यम मानले आहेत. तद्वत दलित, आदिवासी आदि सामाजिक उतरंडीतले तळचे घटक व्यापक हिंदुत्वाच्या कक्षेत सामावण्याची चलाखी केली तरी उतरंडीतले त्यांचे स्थान अधिकृतपणे तळचेच राहणार आहे. समता हे मूल्य जुनी उतरंड मोडून एका पातळीवरची रचना निर्माण करु पाहते. म्हणून तो शब्द संघपरिवाराला मंजूर नाही. ते ‘समरसता’ हा शब्द योजतात. जुन्या उतरंडीत आपापल्या स्थानावर ‘जैसे थे’ राहून परस्परांशी समरस व्हावे हे त्यांना अभिप्रेत आहे. हे समरसतावादी ज्या चलाख सौजन्यशीलतेने दलित समूहांशी वागतात त्यामुळे अनेकजण त्या जाळ्यात अडकतात. काही जाणतेपणानेही त्यात सामील होतात. कारण त्यांना वैयक्तिक स्वार्थाची आमिषे दिली जातात. समता व समरसता यातील हा मूल्यात्मक भेद समजून उतरंड कायम ठेवू पाहणाऱ्या ‘समरसतेला’ आंबेडकरी चळवळीने निक्षून विरोध करायला हवा व समतेचाच आग्रह धरायला हवा. 

हिंदू राष्ट्राची चलाख पुरस्कर्ती मंडळी बाबासाहेबांना आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरत असतात. त्यासाठी त्यांच्या विधानांचा संदर्भ तोडून वापर करत असतात. त्यातील हे एक - “भारतात केवळ भौगोलिक एकताच नव्हे तर या सगळ्यापलीकडे जिच्याबद्दल शंका घेता येणार नाही अशी एक सखोल व खूपच मूलभूत अशी एकता-सांस्कृतिक एकता या टोकापासून त्या टोकापर्यंत नांदते आहे.’ हे विधान ‘भारतातील जाती’ या त्यांच्या प्रंबधातील आहे. याचा अर्थ बाबासाहेबांना जणू ही सांस्कृतिक एकता म्हणजे हिंदू एकताच अभिप्रेत आहे, म्हणजेच या देशात हिंदू हे प्रधान व त्यात अन्य सर्व सामावलेले असा विस्तार ही चलाख मंडळी करतात. ज्या काळात हिंदू वा आजच्या अर्थाने धर्म हा शब्द अस्तित्वात नाही, त्यातून उद्गम पावलेली मतभिन्नतांसहित विविध संप्रदायांचे सहअस्तित्व असलेली विचारबहुल सांस्कृतिक एकता हे भारताचे थोर वैशिष्ट्य आहे. ते ज्यासाठी बाबासाहेब नमूद करतात ते वाक्य त्यांच्या वरील विधानाला जोडून येते. ते आहे – ‘तथापि, या एकत्वामुळेच जात ही न आकळणारी एक कठीण समस्या बनली आहे.’ 

पुढे संविधान सभेत आपल्या गाजलेल्या २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणात ते या जातींमुळेच आपण राष्ट्र कसे बनू शकलेलो नाही, याची कठोर जाणीव करुन देतात. ते म्हणतात – ‘मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?’ भारत राष्ट्र व्हावे अशीच त्यांची मनीषा आहे. पण ते होण्यासाठी काय अडथळे आहेत त्यांची नोंद करुन हे अडथळे लवकरात लवकर दूर करण्याची अपेक्षा ते भारतीयांकडून करतात. याच भाषणात ते पुढे म्हणतात – ‘भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. ...त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे.’ 

एक फसगत होण्याची संभावना इथे नोंदवणे अगत्याची आहे. ज्या राष्ट्र संकल्पनेविषयी बाबासाहेब बोलत आहेत, ती राष्ट्र ही संकल्पना आधुनिक आहे. ज्याचा सांस्कृतिक एकता म्हणून बाबासाहेब उल्लेख करतात, तिचा आधुनिक राष्ट्र संकल्पनेशी संबंध नाही. वडाची साल पिंपळाला लावण्याचा उद्योग संघपरिवारातील मंडळी करत असतात. त्यापासून सावध राहायला हवे. इतरांनाही सावध करायला हवे. 

आजची आंबेडकरी चळवळ याबद्दल सावध नाही. तिचे भावनिक असणे हे जुने वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांची वस्तुनिष्ठ चिकित्सकता, विभूतिपूजेला नकार हे तिच्या तसे पचनी पडत नव्हतेच. पण आंबेडकरी चळवळीच्या अलीकडच्या निर्नायकी घसरणीच्या काळात तर ही बेसावधता पराकोटीची आहे. बाबासाहेबांची विधाने आपल्या हेतूंसाठी वापरताना त्याचे मेसेज तयार करुन हितसंबंधी मंडळी समाजमाध्यमांत सोडतात. अनेक आंबेडकरी गटांवर ते जोरदार पसरत जातात. शत्रूचे काम आपण आसान करतो हे न कळण्याइतकी समजाची पातळी आंबेडकरी समूहात खाली गेली आहे. आणि आंबेडकरी चळवळीतले जाणते लोक हताश आहेत. ही हताशा जाणत्यांनी सोडून युद्धात उतरायला हवे. युद्ध आधीच सुरु झाले आहे. 

आंबेडकरी चळवळ याचा अर्थ मुख्यतः महार समूहातून बौद्ध झालेल्यांच्या पुढाकाराने व सहभागाने चाललेली चळवळ असे महाराष्ट्रापुरते म्हणणे भाग आहे. ते तसे नसायला हवे. आंबेडकरी विचारांनी प्रेरित सर्व दलित, पीडित तसेच अन्य विभागांतीलही व्यक्तींचा सहभाग असलेली ती असायला हवी होती. आज तसे नाही. यासाठी आणखी उसंत घेऊन चालणार नाही. आपल्या संकुचित अवकाश मर्यादेतून आजच्या आंबेडकरी चळवळीतल्या घटकांनी बाहेर पडायची जल्दी करायला हवी. पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौद्ध यांच्या निकटची दलित जात म्हणजे मातंग. मातंग समाजाच्या मनात बौद्धांविषयी अंतराय तयार करण्यात संघपरिवार व खुद्द बौद्धांतले कर्मठ यशस्वी झाले आहेत. आम्ही बौद्ध झालो, तुम्ही झाला नाहीत, सवलती फक्त घेता...असे मांगांना हिणवण्याचे काम बौद्धांतल्या कर्मठांकडून झाले आहे. होते आहे. त्यातून मातंग समाज दूर व्हायला मदतच झाली आहे. बौद्धांपेक्षा शिक्षण, आत्मविश्वासाने कमी असलेला हा समूह (आज तुटपुंज्या असल्या तरी ज्या आहेत त्या) दलितांसाठीच्या सवलतींचा, राखीव जागांचा लाभ परिणामकारकपणे मिळवायला कमी पडला. त्यामुळेच त्यातून अनुसूचित जातीअंतर्गत आम्हाला आमची स्वतंत्र टक्केवारी द्या अशी मागणी घेऊन तो पुढे आला आहे. हा रोष बौद्धांवर जातो. तो तसा गेला पाहिजे याचे मुद्दाम प्रयत्नही चालू असतात. आंबेडकरी चळवळीतील बौद्धांनी या प्रश्नाला सहानुभूतीने, समजुतीने हाताळायला हवे. त्यासाठी मातंग समाजाशी दोस्ती, जिव्हाळा वाढवायला हवा. आज सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या बैठका घेऊन ‘हो, तुमच्यावर अन्याय झाला आहे, तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता आपले सरकार आहे. शेवटी तुम्ही हिंदूंचाच एक घटक आहात...’ असे म्हणून त्यांना आपल्या बाजूने वळवत आहेत. भीमा-कोरेगाव हल्ल्यांतील आरोपी सूत्रधार मिलिंद एकबोटेंनी लहूजी वस्तादांच्या नावाने संघटना तयार करुन मातंगांना जवळ करण्याचा उपक्रम कधीचा सुरु केला आहे. संभाजी भिडेंच्या समर्थकांत मातंग लक्षणीय आहेत. हा केवळ मातंगांविषयीचाच मुद्दा नाही. अन्य मागास, पीडित जातिगटांशी संबंध जोडून त्यांना आंबेडकरी चळवळीशी जोडण्याचे काम हे फॅसिस्टांशी मुकाबला करण्याच्या सिद्धतेचा महत्वाचा भाग आहे. 

याचा अर्थ केवळ मागास जातींच्या एकजुटीचीच आंबेडकरी चळवळ असेल असे नव्हे. आंबेडकरी चळवळीला नैसर्गिकरित्याच जातीच्या मागासलेपणाचे अंग आहे. त्याचवेळी हे मागास जातसमूह आर्थिक दुर्बलही आहेत. त्यामुळे मागास नसलेल्या जातींतल्या कष्टकऱ्यांशीही तिचे नाते जुळते. हे दुहेरी नाते हे आंबेडकरी समूहाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकाळात ‘जनता’ या आपल्या मुखपत्रात हे वैशिष्ट्य अधोरेखित केले होते. आज आंबेडकरी चळवळीचा जो खोळंबा झाला आहे, त्यावर उपाय व्हायला कळीची अशी ती मांडणी असल्याने ते इथे नोंदवत आहे. 

२२ ऑगस्ट १९३६ च्या अंकातील हे अवतरण य. दि. फडके यांनी आपल्या ‘आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकात दिले आहे. ते असे – ‘अस्पृश्यतानिवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरुप जरी जातिनिष्ठ दिसत असले तरी तत्त्वतः तो लढा आर्थिक आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखात सांगितलेले आहे. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधांहून वेगळे किंबहुना परस्परविरोधी असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे प्राप्त होते. परंतु, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी कामकरी वर्गांचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्य वर्गाला आपला आर्थिक लढा स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बाजूंनी गांजलेला अस्पृश्य वर्ग हिंदी श्रमजीविकांच्या लढ्यात पुढारीपण घ्यायला लायक आहे असे आम्ही मागे एकदा म्हटलेले होते.’ 

अण्णाभाऊ साठे आपल्या एका गीतात ‘वर्ण-वर्ग वर्चस्व भेदूनी राख भीमाचे नाव, सांगून गेले आम्हा भीमराव’ असे जे म्हणतात ते अगदी उचित आहे. आंबेडकरी चळवळीने बाबासाहेबांनंतर दादासाहेब गायकवाडांच्या काळात भूमिहिनांच्या सत्याग्रहात दलित-सवर्ण भूमिहिन ‘वर्ग’ म्हणून एकवटण्याची जी भूमिका घेतली होती, ती पुन्हा जोमाने जागविण्याची गरज आहे. 

फॅसिस्ट हिंदुत्वाचे आक्रमण परतवायचे तर दोन पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. एक, त्यांच्या फॅसिस्ट कारवायांना मिळत असलेला राजकीय सत्तेचा आधार काढून घेण्यासाठी भाजपला राजकीय सत्तेवरुन तातडीने खाली खेचणे. दोन, त्यांनी समाजमनात पेरलेले विष उतरवण्यासाठी लोकांच्या मनाची प्रबोधनाद्वारे मशागत करणे. हे काम लांब पल्ल्याचे आहे. या दोन्ही कामांसाठी आंबेडकरी चळवळीची अन्य पुरोगामी शक्तींशी दोस्ती होणे गरजेचे आहे. या पुरोगामी शक्तींत कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, लोकशाहीवादी पक्ष तसेच संघटना येतात. यांतल्या अनेकांशी अनेक मुद्द्यांवर आंबेडकरी चळवळीचे थेट बाबासाहेबांपासून मतभेद आहेत. बाबासाहेबांचा कम्युनिस्ट पक्षाशी वैचारिक मतभेदांसह कष्टकऱ्यांच्या लढ्यात काही वेळा सहकार्य तर निवडणुकांत विरोध राहिला आहे. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली ती देशातील लोकशाही शाबूत राहण्यासाठी काँग्रेस या प्रबळ सत्ताधारी पक्षासमोर एक सक्षम विरोधी पक्ष उभा राहावा म्हणून. काँग्रेस सत्तेवरुन उतरेल ही नजीकच्या काळातली शक्यता त्यावेळी नव्हती. याचा अर्थ फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांशी राजकीय सामना करण्याची क्षितीजावर काहीही चिन्हे नव्हती. अशावेळी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष हा पुढे जाण्यासाठीचा होता. संविधानातील मूल्यांचा अर्थपूर्ण अंमल, संवर्धन वा विकास हा मुद्दा या संघर्षात होता. या शक्तींपासून संविधान वाचवण्याचा प्रश्न नव्हता. आज तो आहे. अशावेळी ज्या शक्तींशी पुढच्या प्रवासाच्या गती, धोरणांविषयी संघर्ष आहे अशा काँग्रेस-कम्युनिस्ट तसेच या दोहोंदरम्यानच्या अनेक लोकशाहीवादी पक्षांसहित या सर्वांच्या सामायिक शत्रूला-फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांच्या भाजप या राजकीय साधनाला उखडून फेकणे ही आजची रणनीती असायला हवी. मार्क्स की बुद्ध?, गांधीजी नायक की खलनायक?, अन्यांचा समाजवाद योग्य की बाबासाहेबांचा?..या मुद्द्यांपासून आंबेडकरी चळवळीने तूर्त टाईम प्लीज घ्यायला काय हरकत आहे? या मुद्द्यांचा निकाल लागल्याशिवाय एकत्र येता येणारच नाही अशी काहीही अडचण आज नाही. भाजपला सत्तास्थानावरुन व फॅसिस्ट हिंदुत्वाचे विष लोकांच्या मनातून उतरवल्यानंतर हे मतभेद व संघर्ष हाताळायला खूप अवकाश मिळणार आहे. आपण एकत्र नाही आलो तर सगळेच संपू हे वास्तव आ वासून आपल्यासमोर आज उभे आहे, हे आंबेडकरी चळवळीने ओळखले पाहिजे. 

अनेक मतभेदांसहित देशाची घटना तयार करताना लोक एकत्र होते. सामायिक सहमतीच्या शोधाची ती महान प्रक्रिया होती. ज्यांच्याशी बाबासाहेबांचे तीव्र मतभेद होते अशांशी राष्ट्र व समाजाच्या नवनिर्मितीचा चबुतरा तयार करताना बाबासाहेब सहकार्य-संवाद करत होते. फॅसिझमविरोधी आघाडी उभी करताना बाबासाहेबांचा हा आदर्श आंबेडकरी चळवळीला पुरेसा नाही का? 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(अक्षर दिवाळी अंक २०१८)