Friday, May 31, 2019

तिसऱ्यांची खबरबात


मोदींच्या विस्मयकारक, गतवेळेपेक्षा दणदणीत विजयाने सत्ताकारणातील सर्व समीकरणेच कोसळली आहेत. काँग्रेस वा भाजप आघाडीत थेट सामील नसलेल्यांतल्या काहींना मोदींना पूर्वीइतके बहुमत न मिळाल्यास योग्य बोली लावून सत्तासोपान चढण्यास सहाय्य करु अशी आशा होती. खुद्द भाजप आघाडीतीलच कोणाला हिशेबात धरण्याची मोदींना आता गरज उरली नाही, तिथे या स्वतंत्र बाण्यावाल्यांना विचारतो कोण? भाजप आघाडीला ३५१ जागा मिळाल्या असल्या तरी त्यातल्या ३०२ एकट्या भाजपच्या आहेत. गतवेळेपेक्षा २० जागा यावेळी जास्त मिळाल्या आहेत. म्हणजे भाजप केवळ आपल्या हिंमतीवर सरकार स्थापन करु शकतो. त्यामुळे त्याच्या अन्य सहकाऱ्यांना मापात राहावे लागणार आहे. भाजपला पडलेल्या मतांची टक्केवारी यावेळी ५० टक्क्यांहून अधिक आहे. राजस्थानसारख्या राज्यांत तर ती ६० टक्क्यांहून अधिक आहे. गेल्यावेळी ती राष्ट्रीय स्तरावर ३० टक्क्यांच्या आसपास होती. काँग्रेसचीही यावेळची टक्केवारी तुलनेने वाढली असली तरी जागांचा लाभ त्या प्रमाणात त्याला मिळवता आलेला नाही. पूर्वीपेक्षा ७-८ जागा अधिक असल्या तरी भाजपच्या जागा काँग्रेसपेक्षा ६ पटीने अधिक आहेत. खुद्द राहुल गांधी यांचा अमेठीतला पराभव, विधानसभेत नुकत्याच जिंकलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळणे, काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागणे ही त्याची स्थिती खूप दयनीय आहे.

अशावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही आघाड्यांत नसलेल्यांची दखल घेण्यात याक्षणी कोणाला फारसे स्वारस्य वाटणार नाही. परंतु, ९९ जागा आजही त्यांच्या पदरात आहेत ही अगदीच मामुली गोष्ट नव्हे. शिवाय यातल्या अनेकांच्या राजकीय पटावरील पुढच्या चाली चाणाक्ष राजकारण्यांना दुर्लक्षून चालणार नाही. त्या आपल्या सोयीच्या व्हाव्यात यासाठी त्यांकडे त्यांना लक्ष ठेवावेच लागणार. आपल्यालाही या सगळ्याचा संदर्भ असण्यासाठी त्यांचा धावता परिचय करुन घेऊ.

अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष, मायावतींचा बहुजन समाज पक्ष, अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल यांनी उत्तर प्रदेशमध्ये महागठबंधन केले होते. भाजप हटाव हा त्यांचा मुख्य नारा असला तरी त्यात काँग्रेसला त्यांनी सामील केलेले नव्हते. मात्र दोन जागा काँग्रेसला आम्ही स्वतःहून सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. काँग्रेसला हे न रुचल्याने त्याने आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले. हे उमेदवार या गठबंधनाच्या महत्वाच्या उमेदवारांना धक्का लागणार नाही अशा बेताने उभे केले होते, तसेच भाजपला जाणारी उच्चवर्णीयांची मते खायची त्यांची रणनीती होती वगैरे बोलले गेले तरी अशी तिहेरी लढत भाजपला उपयुक्त ठरणार हे नक्की होते. अर्थात, आताच निकाल पाहता हे सर्व एकत्र आले असते तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपनेच मात दिली असती. ८० पैकी भाजप आघाडीला ६४ जागा आहेत. तर महागठबंधनला १५ आणि काँग्रेसला सोनिया गांधींची केवळ एक जागा मिळाली आहे.

काँग्रेसला सोबत घेण्यात मोडता घातला तो मायावतींनी. राजस्थान, मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपात काँग्रेसने त्यांच्याशी योग्य न्याय न केल्याचा त्यांचा आक्षेप होता. जाहीर न केलेले अजूनही एक कारण होते. उद्या काँग्रेस आणि भाजप यांना सत्ता घेण्याइतके बळ नाही मिळाले तर तिसरी आघाडी करुन पंतप्रधानपदावर दावा करण्याचा हेतूही यामागे असल्याचे बोलले जाते. न जाणो भाजपलाच मदत करण्याची वेळ आली तर काँग्रेस मोठा अडथळा ठरणार. कारण तो सोडून महागठबंधनातल्या मायावतींसह अन्य सहकाऱ्यांनी भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ यापूर्वी केलेलीच आहे.

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचाही हाच हिशेब होता. पंतप्रधानकीच्या स्पर्धेत त्याही होत्या. काँग्रेसमधूनच फुटल्याने त्यांची काँग्रेसबद्दलची तीव्रता होतीच. डाव्यांच्या त्या काँग्रेसमध्ये असल्यापासूनच्या विरोधक आहेत. त्यांच्याकडूनच तर त्यांनी सत्ता हिसकावून घेतली. मोदी-अमित शहा यांनी प. बंगालमध्ये-त्यांच्या घरातच मुसंडी मारल्याने त्यांना फॅसिझमच्या विरोधात सर्व बिगर भाजप पक्षांशी मैत्र साधावे लागले. त्यांनी कलकत्त्याला या पक्षांच्या नेत्यांनी बोलावून जी महारॅली केली ती यासाठीच. निवडणुकपूर्व युती मात्र यातल्या कोणाशी त्यांनी केली नाही. भाजपने निवडणूक आयोगाला धाब्यावर बसवून बंगालमध्ये मांडलेल्या प्रचाराच्या मुसंडीला अभूतपूर्व यश आले. त्यांनी ४२ पैकी १८ जागा मिळवल्या. गेल्यावेळी त्या फक्त २ होत्या. तृणमूलच्या जागा २२ झाल्या. गेल्यावेळी त्या ३४ होत्या. कम्युनिस्टांना दोन जागा होत्या. यावेळी एकही नाही. काँग्रेसला गेल्यावेळी ४ जागा होत्या. त्या यावेळी २ झाल्या.

ममतांच्या आधी ३५ वर्षे प. बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या आणि केंद्रात २००४ साली साठच्या आसपास जागा असलेल्या कम्युनिस्टांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होते आहे. आताच्या १७ व्या लोकसभेत जेमतेम ६ जागा त्यांना असणार आहेत. त्रिपुरातली त्यांची सत्ता गेली. यावेळी केरळमधून लोकसभेसाठी त्यांना केवळ १ जागा आहे. २०१४ ला त्या ६ होत्या. उरलेल्या २० पैकी १९ काँग्रेस आघाडीने जिंकल्या आहेत.

फॅसिस्ट भाजपच्या विरोधात सर्व लोकशाहीवाद्यांनी एकवटले पाहिजे, ही डाव्यांची भूमिका राहिली आहे. मात्र माकपमध्ये प्रकाश करात प्रवाह काँग्रेसशी सहकार्य करायच्या बाजूने कायमच नव्हता. गंमत म्हणजे तिसऱ्या आघाडीतल्या भाजपशी थेट संबंधांचा इतिहास असलेल्या पक्षांबाबत असे वावडे करातांना नव्हते. सीताराम येचुरी प्रवाहाने पक्षांतर्गत संघर्ष करुन ही भूमिका मवाळ केली. तथापि काँग्रेसशी प्रत्यक्ष सोबत-एकत्र प्रचार करायचा नाही या अटीवर फॅसिझमच्या मुकाबल्याची रणनीती त्यांनी स्वीकारली. भाकपची भूमिका राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसशी सहकार्याची राहिली. मात्र जागावाटपात काँग्रेसने योग्य तो आदर न राखल्याने नाईलाजाने पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्हाला काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करावे लागले, असे त्यांचे म्हणणे आहे. बेगुसराय कन्हैया कुमारसाठी सोडायला राष्ट्रीय जनता दलाने नकार दिल्याने तिथे तिहेरी लढत झाली. कन्हैया कुमारच्या प्रचाराचा व त्याला मिळालेल्या प्रतिसादाचा रागरंग पहाता तो निवडून येईल अशीच कल्पना अनेकांची होती. प्रत्यक्षात भाजपचे गिरीराज सिंह मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून आले. कन्हैया कुमार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्रात परभणीची जागा भाकपने लढवली. काँग्रेस आघाडीने ती सोडायला नकार दिला होता. दिंडोरीची जागाही अशीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोडायला नकार दिल्याने माकपने स्वतंत्रपणे लढवली.

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील एमआयएमसह केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग खूपच लक्षवेधक होता. काँग्रेसशी युती करण्याची आमची तयारी होती, पण त्यांनी आमच्या मागणीनुसार जागा सोडायला नकार दिल्याने-त्यांनाच युती नको असल्याने आम्ही स्वतंत्रपणे लढलो, असे बाळासाहेब आंबेडकरांचे म्हणणे आहे. १२ जागांच्या मागणीवर काँग्रेस ६ जागा द्यायला तयार झाली. तथापि मुदतीत काँग्रेसने उत्तर दिले नाही म्हणून २२ जागांवर बाळासाहेबांनी उमेदवार जाहीर केले. आता या २२ जागा आम्ही मागे घेणार नाही असे म्हणत त्यांनाच काँग्रेसने हाताची निशाणी द्यावी अशी नवी मागणी त्यांनी केली. मागणी-प्रतिसादाचा हा झुलवता प्रवास जाहीर आहे. मतविभागणीचा फायदा भाजपला नको म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान गहाण टाकायचा का असा वंचितचा सवाल होता. ४८ पैकी आता फक्त एक जागा वंचितची-एमआयएमच्या इम्तियाज अलींची औरंगाबादहून आली आहे. बाळासाहेब स्वतः अकोला व सोलापूर येथून पडले. वंचितच्या उमेदवारीमुळे अशोक चव्हाणांसारखा महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष मतविभागणीने पडला. अशीच अजून काही ठिकाणची स्थिती आहे. सगळे आकडे हा लेख लिहिपर्यंत उपलब्ध नसल्याने अंदाजे बोलावे लागत आहे. भाजपला मदत करण्यासाठीच बाळासाहेबांनी स्वतंत्रपणे लढण्याची ताठर भूमिका घेतल्याचा आरोप होतो आहे. बाळासाहेबांचे त्यावर ‘आम्ही काही कोणाचे गुलाम नाही’ असे प्रत्युत्तर आहे. काँग्रेस संपली आहे. आता लढाई थेट भाजपशी आहे असे सांगून आगामी विधानसभा आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

आंध्रला स्वतंत्र दर्जा देण्याच्या मागणीची पूर्तता करत नाही, याखातर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर भाजपविरोधी आघाडी उभी राहावी याच्या प्रयत्नात राहिले. त्यांना यावेळी आंध्रच्या राज्य आणि लोकसभा या दोन्ही स्तरावर वायएसआरसीच्या जगन रेड्डींनी चितपट केले. लोकसभेच्या २५ पैकी २४ जागा जगन रेड्डींच्या पक्षाने जिंकल्या. केवळ एक जागा चंद्राबाबूंच्या तेलगु देसमला मिळाली. विधानसभेच्या १७५ पैकी १४९ इतक्या भरभक्कम जागा जिंकून राज्य त्यांनी ताब्यात घेतले आहे.

शेजारच्या तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला ८ जागा मिळाल्या आहेत. त्यांचा काँग्रेसला विरोध होता. भाजपसोबतही त्यांना जायचे नव्हते. ते आणि जगन रेड्डी मतदानोत्तर तिसरी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नात होते. पण भाजपच्या विजयी भूकंपाने हे प्रयत्न आता कोलमडून पडले आहेत.

ईशान्य भारतातील जेमतेम एक-दोन लोकसभेच्या जागा असलेल्या काही राज्यांतील विजयी पक्ष आधी भाजप आघाडीचा घटक होते. तथापि नागरिकत्वाच्या नव्या प्रस्तावित कायद्याच्या ते विरोधात असल्याने त्यांनी भाजपची साथ सोडली. बिजू जनता दलाचे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही म्हणून भाजपची साथ सोडली. त्यांना लोकसभेच्या यावेळी १३ जागा मिळाल्या. आपल्या मागण्यांसाठी ते पुन्हा भाजपची साथ करायला तयार आहेत. पण आता भाजपलाच गरज उरलेली नाही.

दिल्लीबरोबर पंजाब-हरयाणातही युतीचा आग्रह आपने धरल्याने काँग्रेसशी त्याची युती होऊ शकली नाही. परिणामी मागच्या वेळेप्रमाणे दिल्लीच्या सातही जागा याहीवेळी भाजपने घेतल्या. आप तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.

भाजप आणि काँग्रेस या दोहोंच्या आघाड्यांच्या बाहेर असलेली ही मंडळी हा काही तिसरा फ्रंट नाही. ते सगळे स्वतंत्र आहेत. त्यातले अनेक सेक्युलर, लोकशाहीवादी म्हणवणारे वा त्यांचा तसा इतिहास असलेले, तर काही थेट डावे आहेत. पण आज जवळपास हे सर्व केवळ आपल्या राज्याच्या वा पक्षाच्या अस्तित्वाच्या हितसंबंधांनी मर्यादित झालेले आहेत. वास्तविक काँग्रेसशी तात्त्विक पायावर त्यांची व्यापक आघाडी होऊ शकते. पण मुख्यतः व्यवहार व काही वेळा वैचारिक अहंता आड येते. भाजपविरोधी आघाडी मजबूत व्हायला तो मोठा अडथळा आहे. ...तूर्त अशा आघाडीने काही साधणार नाही. भाजपचे मजबूत स्वबळ आहे. मात्र, पुढच्या वाटचालीसाठी, सर्वसाधारण सहमतीच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी ही साथसोबत गरजेची आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(महाराष्ट्र टाइम्स, २६ मे २०१९)

Wednesday, May 1, 2019

निकाल काहीही लागला तरी...

हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा महाराष्ट्रातील शेवटचे मतदान होऊन गेलेले असेल. त्यामुळे माझ्या खाली मांडलेल्या विचारांचा मतदानावर काही प्रभाव पडायची वा निवडणुकीत सहभागी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या नाउमेद होण्याची काहीही शक्यता नाही.

आपल्या बोलण्या-लिहिण्याचा इतका मोठा परिणाम होतो असा समज ज्या पुरोगामी मित्रांचा आहे, त्यांच्यासाठी हे वरील स्पष्टीकरण दिले. हा लेख आधी आला असता तरी फारसे काही होण्याची शक्यता नव्हती. याच मनःस्थितीतून प्रवास करणाऱ्यांनी ‘हो, आम्हालाही असेच वाटते’ असे सांगितले असते, तर ज्यांना हे मंजूर नाही, त्यांनी आपला विरोध नोंदवला असता. निवडणुका चालू असल्याने त्याला थोडी अधिक धार असती एवढेच. असे अभिप्राय देणारे हे नेहमीचेच लोक असते.

याचा अर्थ ही स्थिती अशीच कायम राहणार आहे, असे माझे म्हणणे नाही. माणसे परिवर्तनशील असतात. परिस्थिती माणसाला आणि माणूस परिस्थितीला घडवत असतो. त्यातून काही आश्वासक क्रम उदयाला येतात. क्षीण का होईनात असे आश्वासक क्रम आजही कुठे ना कुठे दिसत असतात. या छोट्या व सुट्या धारांचा प्रवाह व्हावा ही अपेक्षा आहे. त्यामुळे माझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे अथवा ते गैरलागू आहे याविषयी सम्यक भाष्य करण्याची अवस्था आज ना उद्या येईल ही शक्यता धरुन मी लिहीत असतो. पुढील मुद्दे नोंदवतानाही हीच अपेक्षा आहे.

मोदींच्या २०१४ च्या सत्ताग्रहणानंतर अनेक पुरोगामी कार्यकर्ते संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराला लागले. मीही त्यातलाच. आधी अशी नड भासली नव्हती. संघप्रणीत फॅसिस्ट प्रवृत्तींचा धिंगाणा आधीही होता. पण सत्तेत आल्यावर तो तुफान वेगाने वाढला. त्याचा धक्का आम्हाला जोरदार बसला. पूर्वी ही प्रचिती नव्हती. काँग्रेसच्या पुढाकाराखालील सरकारविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने लढू शकत होतो. या राजवटीत ती शक्यता राहिली नाही. हा अनुभव अनेक पुरोगामी जाहीरपणे दोन राजवटींची तुलना करताना हल्ली सांगतात. आज संविधानाला दिसणारा धोका पूर्वी वाटत नव्हता.

...तर असे संविधानाच्या रक्षण-संवर्धनाच्या कामात सक्रिय असलेले वा त्याविषयी आस्था असणारे सर्व छटांचे पक्षीय, बिगरपक्षीय, केवळ जनसंघटनावाले, काही एनजीओवाले पुरोगामी एकत्र येण्याचा क्रम सुरु झाला. विविध कार्यक्रम, आंदोलने होऊ लागली. माझा ज्या व्यापक उपक्रमांत सहभाग राहिला त्यातला एक संविधान दिनी देवनार ते चैत्यभूमी ‘संविधान जागर यात्रा’ संघटित करण्याचा आणि दुसरा चवदार तळ्याच्या संगराच्या पूर्वदिनी रायगड ते महाड असा शिवराय ते भीमराय ‘समता मार्च’ काढण्याचा. अजूनही आनुषंगिक बरेच उपक्रम झाले. हजारोंचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमांत आम्ही सर्वांनी ‘भाजपविरोधात एकास एक उमेदवार’ सर्व लोकशाहीवादी पक्षांनी एकत्र येऊन दिले पाहिजेत असे आवाहन करत होतो. सहभागी पक्षांपैकी कोणी त्याला जाहीरपणे नकार दिला नव्हता. उलट बहुतेकांनी पाठिंबाच दिला होता.

प्रत्यक्षात लोकसभेच्या या निवडणुकांत ही एकजूट आकाराला आलेली नाही, ही दुःखद वस्तुस्थिती. आमचे आवाहन हवेत उडून गेले. अर्थात आमच्या आवाहनाच्या ताकदीने हे होणार होते असेही नाही. पण जे झाले ते अत्यंत त्रासदायक आहे. याची कारणे काय?

एक कारण दिले जाते ते असे- “काँग्रेसने आमच्याशी सन्मानजनक बोलणी केली नाहीत. आम्हाला न्याय्य प्रमाणात जागा दिल्या नाहीत. शेवटी आम्हाला आमच्या पक्षाचे अस्तित्व टिकवायचे तर स्वतंत्रपणे उभे राहणे भाग आहे. अर्थात, आम्ही लढवत असलेल्या जागा सोडून अन्य ठिकाणी भाजपला हरवू शकेल अशाच उमेदवाराला पाठिंबा द्या, असे आम्ही आवाहन करतो आहोत.” काहींनी आम्ही अमक्या ठिकाणांहून लढणार आहोत, असे आधीच जाहीर केले. त्याचे कारण “चर्चेला बसल्यावर कमीजास्त करण्यासाठी असे दबावतंत्र अवलंबावे लागते,” असे ते देतात.

दुसरे कारण- “काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुठच्या उमेदवाराचा प्रचार करायचा? हे सगळेच लबाड. त्यांच्या विरोधातच तर आम्ही कायम लढतो आहोत. बरे, त्यांना काही विचाराशी देणेघेणे नाही. तिकिट मिळणार नाही असे दिसताच हे टगे सहजी उठून भाजपमध्ये डेरेदाखल झाले. अशांना कुठे फॅसिझमशी लढायचे आहे? हे तर त्यांचे मित्रच आहेत. अशावेळी का म्हणून आपण आपल्या समुदायांना अशा पक्षांना सहाय्य करायला सांगायचे? आपली लढाई लांबपल्ल्याची आहे. ती आपली आपण लढावी.”

तिसरे कारण- “वंचित-बहुजनांच्या स्वायत्त राजकारणाच्या उभारणीचे. आज तयार झालेला अस्मितेचा माहोल वाया न घालवता त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आम्हीच मुख्य प्रवाह आता होत आहोत. तेव्हा एकास-एकचा प्रश्न येतोच कुठे?”

चौथे कारण दिसते ते असे- काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बोलणी करण्यासाठी डावे, पुरोगामी पक्ष एकत्र येत नाहीत. त्यांचे आपसांतही जागांवर एकमत होत नाही. वा होणार नाही असा अंदाज असतो. त्यात काही बढे भाई म्हणून पेश येतात. म्हणून मग ते स्वतंत्रपणे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बोलणी करतात.

जर फॅसिझमचा धोका एवढा प्रचंड असेल, मोदी निवडून आले तर आजची घटना राहील की जाईल, पुन्हा निवडणुका होतील की नाही ही शंका आहे. म्हणजेच आपल्या सर्वांचेच अस्तित्व शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न आहे. अशावेळी आपल्या पक्षाचे अस्तित्व वा आपला सन्मान ही मुख्य बाब कशी काय होऊ शकते? संसदीय प्रणालीची, आजच्या राजकीय व्यवहाराची, आपले समुदाय टिकवून धरण्याची ती अपरिहार्यता आहे, असे या डाव्या-पुरोगामी पक्षांतील मित्र सांगतात. या अपरिहार्यतेचा मार्क्सवाद, आंबेडकरवाद, गांधीवाद वा समाजवाद वा अन्य प्रगतीशील विचारसूत्रांच्या आधारे केलेले विश्लेषण किमान निकालानंतर तरी त्यांनी करणे गरजेचे आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ अधिकृत परंपरा संविधानवादी असली व अजूनही त्यांत या परंपरेचे वहन करणारे नेते-कार्यकर्ते वा त्यांना प्रतिसाद देणारी जनता असली तरी त्यांतल्या बहुसंख्य नेत्यांचा राजकारण हा वैयक्तिक उन्नतीचा धंदा आहे, ही काही नवी गोष्ट नाही. त्यांची त्यांच्यातच चाललेली कुरघोडी, परस्परांचे पाय कापणे आपण रोज पाहतो आहोत. तरीही फॅसिस्ट भाजपच्या तुलनेत ते चालतील, आज फॅसिझमचा पराभव करु, नंतर या राजकीय धंदेवाल्यांशी लढू असे आपण म्हणतो. कारण आज या दोहोंचा एकाचवेळी पराभव करुन आपण सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नाही, हे आपल्याला कबूल असते.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरंजामी चारित्र्य, आपसातली कापाकापी ही जुनीच बाब आहे. पण आपण डावे, पुरोगामी एकत्र येऊन आपसात जागांची निश्चिती करुन त्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी एकत्रित बोलणी का करु शकत नाही? आपल्यातल्या या एकसंधतेच्या उणीवेला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार आहेत का? आपल्यातल्या काही पक्षांना फोडण्याचा, ज्यांची विशिष्ट मतदारसंघात काही ताकद आहे अशा पुरोगामी पक्षांतल्या महत्वाकांक्षी नेतृत्वाला काही आमिषे दाखवण्याचा प्रयत्न ते जरुर करु शकतात. पण त्यास बळी पडणारे आपल्यातले लोक ही आपली कमजोरी झाली. बरे, दोन डाव्यांच्या बाबत तर हाही प्रश्न नाही. मग ते एकत्र येऊन जागांची बोलणी का नाही करत? यातले द्वंद्व काय ते कळत नाही.

निवडणुकांपूर्वी कधीच अशी पुरोगाम्यांची सरसकट जूट झालेली नाही. ती नेहमी निकालानंतर झालेली दिसते, असे सीताराम येचुरी अलिकडेच म्हणाले. कबूल. पण आज फॅसिझम असताना व आपली सगळ्यांची जाहीर इच्छा त्यांच्याविरोधात एकत्र लढायची असतानाही हे चालू द्यायचे का? बरे, ही वस्तुस्थिती झाली. पण त्यामागची कारणे काय? प्रादेशिक, स्थानिक अडचणी, गुंते, हितसंबंध इ.. पण ते आवाक्यात कसे आणायचे?

वायनाडला राहुल गांधी उभे राहिले. माझ्या मते त्यांनी तसे करायला नको होते. पण राहुल गांधींहून अधिक वैचारिक तयारी, अंतर्विरोधांच्या उकलीचे कौशल्य आणि राजकीय जाणतेपण असलेल्या डाव्यांनी राहुल गांधींची ही कृती गैर आहे, पण फॅसिझमचा धोका ज्या तीव्रतेने आम्हाला जाणवतो तो परतवण्यासाठी आम्ही या जागेहून लढत नाही, अशी भूमिका घेणे का शक्य झाले नाही? अशी ताकद डावे का दाखवू शकले नाहीत?

बेगुसरायला कन्हैया कुमार उभा आहे. त्याबाबतही तेच. महाठबंधनाचा पाठिंबा असेल तरच लढायचे ही कन्हैयाची आधीची भूमिका होती. भाजप निवडून आलेल्या या जागेवर आरजेडी गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आणि कम्युनिस्ट तिसऱ्या स्थानावर होते. आपला दावा सबळ करायला हे कारण आरजेडीकडे होते. वास्तवात आरजेडीच्या तरुण नेतृत्वाला आपल्याला बिहारात नवा तरुण प्रतिस्पर्धी नको आहे, असे बोलले जाते. काहीही असो. आता तिथे तिरंगी लढत आहे. कन्हैयाने महागठबंधनाचा पाठिंबा नसला तरी निवडणूक लढायचे ठरवले. त्याच्या प्रचाराला मिळणाऱ्या प्रतिसादाची दृश्ये रोमांचक आहेत. त्याला आर्थिक तसेच अन्य सहाय्य लोक ज्याप्रकारे करत आहेत, ती फार आश्वासक बाब आहे. केवळ पैसेवाला नव्हे, तर कोणीही सामान्य मनुष्य निवडणुकीला उभा राहू शकतो, हे घटनेतील आदर्श तत्त्व बेगुसरायमध्ये प्रत्यक्षात आलेले दिसते आहे. कन्हैया इथे निवडून येऊ शकतो, असे अनेकांना वाटते. तो निवडून यावा म्हणून मीही देव पाण्यात घालून बसलो आहे. त्याच्या हजरजबाबी, विचारपरिप्लुत आणि अमोघ वक्तृत्वाच्या लोकसभेतील दर्शनाला मी आतुर आहे.

...पण माझ्या पाण्यात घातलेल्या देवांनी दगा दिला तर! तर तिथे भाजप निवडून येईल. मग आजवरच्या कन्हैयाच्या फॅसिझमविरोधातल्या लढाईचे काय करायचे? अशी शक्यता थोडीशी जरी असेल तरी कन्हैयाने लढता कामा नये होते. कम्युनिस्टांनी जाणतेपणाने एकतर्फी माघार घेऊन आरजेडीला पाठिंबा द्यायला हवा होता. शिवाय कन्हैया आज एका मतदारसंघातच अडकला आहे. तो देशभर हिंडून भाजपची धज्जियां उडवायला फिरला असता तर त्याचा कितीतरी अधिक उपयोग नसता का झाला?

आम्ही डावे वा पुरोगामी यांची ताकद क्षीण होते आहे. आम्ही न वाढण्याचे कारण काँग्रेस आहे का? १९७७, १९८९ हा आलेख काँग्रेसच्या खाली जाण्याचा आहे. या काळात आम्ही का नाही वाढलो?  जातीयवादी शक्ती कशा काय वाढल्या? गांधीहत्येनंतर वळचणीला गेलेला संघपरिवार राक्षसी बहुमताने २०१४ ला आमच्या उरावर कसा काय बसतो?. ..याचा विचार आपण करत आलो आहोत. नाही असे नाही. पण त्यातून मिळालेल्या बोधाप्रमाणे वळत नाही आहोत. पुढचे आपले डावपेच त्याप्रमाणे ठरताहेत असे दिसत नाही.

काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ‘गेल्या ५०, ६० वर्षांत काहीही झालेले नाही, गरीब अधिक गरीब झाले...’ या प्रकारे आपण बोलत आलो. आज मोदींनी तेच पकडले आहे. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीही केलेले नाही, हे ते या जुन्या आधारावर दणकून बोलत आहेत. आपली त्यामुळे पंचाईत होते आहे. प्रत्युत्तरादाखल गेल्या ७० वर्षांत काय काय झाले हे नाईलाजाने सांगण्याची आपल्यावर पाळी येते आहे. वास्तविक काय झाले आणि काय नाही, काय राहिले, कुठे घसरण सुरु झाली असे साकल्याने मांडण्याची आपली तऱ्हाच नाही. युनियनच्या वा जनसंघटनांच्या मोर्च्यांसमोर आपण केलेली, ऐकलेली भाषणे आठवावीत.

संसदीय प्रणालीत खूप अपुरेपणा आहे. पण घटनाकारांनी या अपुरेपणाचा विचार करुन आजच्या घडीला तीच आम्हाला उपयुक्त आहे, असा निर्वाळा दिला. तथापि, आमच्या चळवळीच्या गाण्यांत ‘संसद हे दुकान आहे’ किंवा ‘उचला पुढारी-आपटा पुढारी’ असे टीपेला जाऊन म्हटले जाते. यातून समोरच्यांवर आम्ही काय संस्कार करत आलो? आजच्या लोकशाहीला अर्थपूर्ण करण्यासाठी आपण दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांनी लढले पाहिजे असा संदेश न देता या निवडणुका, ही लोकशाही ‘सब झूट है’ हाच विचार रुजवतो. भ्रष्टाचार हाच सर्व दैन्याचे कारण व तो मोडायला सबगोलंकारी पद्धतीने संसदेला घेरण्याच्या आंदोलनांनी आम्ही हर्षोत्फुल्ल होतो. त्यात पुन्हा एकदा संपूर्ण क्रांतीचा उभार आम्हाला दिसू लागतो. या उभाराच्या परमानंदात काँग्रेसबाबतची शिसारी भाजपला आमची दोस्तशक्ती बनवते. अण्णांच्या आंदोलनात डावे, मधले, उजवे एका सूरात ‘इन्किलाब’ची घोषणा देताना आपण पाहिले आहेत.

...मोदींना लोकशाही मोडून कल्याणकारी हुकुमशहाची छबी तयार करायला हे आम्ही तयार केलेले वातावरण आयतेच मिळाले आहे.

आमच्या एकत्रित कृतीच्या परिणामांची आम्ही चिकित्सा काही करतो का हा मला प्रश्न आहे. डाव्या पुरोगामी पक्षांनी आधी रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली रिडालोस तयार केले. ते भाजपच्या वळचणीला गेल्यावर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही आघाडी तयार केली. ती अधिकृतपणे विसर्जित न करता प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी सुरु केली. जे डावे वा पुरोगामी त्यांच्यासोबत गेले नाहीत वा त्यांच्याशी प्रकाश आंबेडकरांनी या नव्या मोहिमेबद्दल ती सुरु करताना चर्चाही केली नाही, त्या डाव्या-पुरोगाम्यांनी याबद्दल कुठचाच प्रश्न बाळासाहेबांना विचारला नाही. बाळासाहेब त्यात नाहीत, तरीही जुनी आघाडी सुरु आहे, असेही दिसत नाही. आता निवडणुकीत बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल या पक्षांचे खाजगीत काहीही मत असले तरी जाहीरपणे त्यातील काही व्यक्तीच बोलल्या. त्यांच्याविषयी पक्षपातळीवर विश्लेषणाचा ठोस आधार असलेली भूमिका डावे, समाजवादी, पुरोगामी घेऊ शकलेले नाहीत. बाळासाहेबांनी स्वतःसह आपल्या वंचित आघाडीच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्यानंतर काही काळाने बाळासाहेबांच्या उमेदवारीला जवळपास सगळ्यांनी आणि त्याव्यतिरिक्त काही ठिकाणच्या त्यांच्या ‘चांगल्या’ उमेदवारांना आपापल्या सोयीनुसार पाठिंबा या मंडळींनी दिलेला दिसतो. ...फॅसिझमला हरवण्यासाठीच्या लढाईच्या डावपेचातली ही आमची सुसंगत कृती आहे, असे ही मंडळी मनापासून म्हणू शकतात का? बाळासाहेबांना मानणारा बौद्ध समुदाय नाराज होऊ नये, ही लघुदृष्टीच त्यामागे दिसते.

काही पक्षीय तसेच बिगरपक्षीय जनसंघटनेचे पुरोगामी कार्यकर्ते निःसंदिग्धपणे भाजपचा पराभव इच्छित असले आणि हा पराभव आम्ही करु शकत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा असे मनोमन त्यांना वाटत असले तरी, जमेल तसे ते आपल्याशी संबंधितांना खाजगीत सांगत वा सूचित करत असले तरी, थेट प्रचारात सक्रिय राहणे त्यांना अडचणीचे वाटते आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराचे चारित्र्य. या कार्यकर्त्यांचा या उमेदवाराबद्दलचा आधीचा अनुभव आणि त्याच्याशी झालेला लोकांच्या प्रश्नांवरील संघर्ष. हे सगळे विसरुन त्याच्या बरोबरीला बसून प्रचार करायचा म्हणजे कसे काय? लोक काय म्हणतील? हेही मॅनेज झाले असा अपप्रचार नाही का होणार? आपल्या कार्यकर्तेपणाच्या नैतिकतेचे काय?

...मला वाटते आपल्या तसेच अन्य सर्व लोकांना जाहीरपणे मनापासून आपली भूमिका सांगणे गरजेचे आहे. त्याउपर कोणाला काय वाटायचे ते वाटो. फॅसिझमला संपवण्याच्या लढ्यासाठी स्वतःची वा संघटनेची प्रतिमा पणाला लावायची वेळ आली तरी बेहत्तर असा हा काळ आहे. फॅसिझमला हरवण्याच्या लढाईत मी कोणत्याही कारणाने कच खाल्ली हे अर्थातच भूषणावह नाही.

या सर्व स्थिती-वृत्ती-विचारांच्या घालमेलीच्या पार जाऊन भाजपविरोधी आघाडीच्या विरोधात सशक्त प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात अनेक पुरोगामी ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते उतरलेले दिसतात. अनेक कलावंत, साहित्यिक, पत्रकार यांनी या निवडणुकीत भाजपविरोधी मतदान करण्याचे जाहीर आवाहन केलेले आहे. हे क्रम छोटे पण आश्वासक आहेत.

मोदींनी २०१४ ला विकासाच्या नावाने मते घेतली व सत्तारुढ झाले. त्यानंतरचा प्रत्यक्ष कारभार हा स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळीतून साकार झालेली आणि संविधानात औपचारिकरित्या बद्ध झालेली मूल्ये उध्वस्त करण्याचाच राहिला. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे भारताची सर्वसमावेशक वीण उसवणारा संघपरिवारप्रणीत संघटनांचा हैदोस आणि त्याला राज्यकर्त्यांचा आधार व संरक्षण हे आपण नित्य अनुभवले.

निकाल काहीही लागला तरी, म्हणजे मोदी पुन्हा सत्तेवर आले तर अधिकच आणि सत्तेवरुन गेले तरीही या मंडळींनी पेरलेले हे विष उतरवणे, त्यांनी उसवलेली वीण ठीकठाक करणे हे खूप चिवट व दीर्घ पल्ल्याचे काम राहणार आहे. त्यासाठीच्या लढ्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वरील प्रश्नांना पुरोगामी पक्षांना-कार्यकर्त्यांना भिडावेच लागेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, मे २०१९)

Thursday, April 18, 2019

बाबासाहेब, संविधान आणि वर्तमान

मनुच्या घटनेद्वारे इथल्या स्त्रीशूद्रातिशूद्रांना धर्माज्ञा म्हणून हजारो वर्षे विकासाच्या वाटा बंद करण्यात येऊन त्यांचे मनुष्यत्व नाकारले गेले. ही मनुस्मृती चवदार तळ्यावर १९२७ साली जाळून पुढे १९४९ ला संविधानाच्या रुपाने भारत देशाची आधुनिक स्मृती अतिशूद्रांत जन्माला आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने साकारावी, हा काळाने उगवलेला केवढा मोठा सूड!

हल्ली बाबासाहेबांच्या घटनेबाबतच्या योगदानाविषयी कळत-नकळत काही गैरसमज पसरवले जातात. एक म्हणजे बाबासाहेबांनी एकट्यानेच ही घटना लिहिली असे काही समर्थक सांगतात तर बाबासाहेबांची तशी फारशी काही भूमिकाच ही घटना तयार करण्यात नाही, त्यांना विनाकारण घटनेचे शिल्पकार म्हटले जाते, असे विरोधक म्हणतात. या विधानांची सत्यता तपासण्यासाठी थोडे वास्तव समजून घेऊ.

घटना तयार करण्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली. तिच्यात देशभरातल्या प्रांतिक विधिमंडळांतून प्रतिनिधी निवडले गेले. संस्थानिकांचे प्रतिनिधी नियुक्त केले गेले. निवडून आलेल्या सदस्यांत बाबासाहेब आंबेडकर एक सदस्य होते. जागतिक संविधानांचे अभ्यासक, कायदे तज्ज्ञ हा बाबासाहेबांचा परिचय संविधान सभेला होताच. पुढे बाबासाहेबांच्या घटना समितीतील भाषणांतून त्यांच्या राष्ट्रीय दृष्टिकोणाची जी प्रचिती संविधान सभेला आली त्यातून संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद बाबासाहेबांकडे चालून आले. संविधानात समाविष्ट करण्याच्या विविध बाबी सभेसमोर मांडणे, त्यांची स्पष्टीकरणे देणे, समर्थने करणे व आलेल्या सूचनांचा कायदेशीर भाषेत संविधानात समावेश करणे हे अत्यंत कष्टदायक काम त्यांना आजाराने शरीर जर्जर झालेले असतानाच्या काळात अहर्निश करावे लागले. त्यांच्या या योगदानाविषयी घटना समितीतल्या अनेकांनी गौरवोद्गार काढले आहेत.

मसुदा समितीचेच एक सदस्य टी. टी. कृष्णम्माचारी काय म्हणतात पहा-

''हे काम एकटया डॉ. आंबेडकरांचेच आहे. सभागृहाला जाणीव असेल की, तुम्ही नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला. एक सदस्य मरण पावले व या जागा भरल्या नाहीत. एक अमेरिकेत, एक संस्थानाच्या कारभारात व दोन सदस्य दिल्लीपासून खूप दूर राहत असल्यामुळे राज्यघटना निर्मितीचे ओझे एकट्या डॉ. आंबेडकरांवरच पडले. त्यांनी हे जबाबदारीचे काम यशस्वीपणे पार पाडले. हे नि:संशय प्रशंसनीय आहे व याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत.''

दुसरे एक सदस्य काझी सय्यद करिमोद्दीन म्हणतात- “पुढील अनेक पिढयांपर्यंत 'एक महान घटनाकार' म्हणून त्यांची निश्चितपणे नोंद होईल.'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनानिर्मितीचे हे श्रेय एकट्याकडे घेत नाहीत. या कार्यात सहकार्य केलेल्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणतात- ''राज्यघटना निर्मितीचे अवघड कार्य पार पाडताना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राव, ए.के. अय्यर, एस.एन. मुखर्जी, सचिवालयातील सर्व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता नमूद केल्याशिवाय ही राज्यघटना मी आपणासमोर सादर करू शकत नाही.”

भारतीय संविधान हा देशातील विविध प्रवाहांचा, हितसंबंधांचा पुढे जाणारा सरासरी दस्तावेज आहे. कोणाच्या एकाच्या मताप्रमाणे अख्खी घटना होणे हे लोकशाहीला धरुन नाही आणि संभवनीयही नाही. उदाहरणार्थ, शेतजमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे, ही बाबासाहेबांची एक अत्यंत महत्वाची सूचना अव्हेरली गेली. शेतजमीन वैयक्तिक मालकीची राहणार नाही. कसू इच्छिणाऱ्यांना सरकार ती भाडेपट्टयाने देईल, त्यासाठीचे भांडवल देईल. यामुळे भूमिहिनांना सुद्धा शेतीचा हक्क मिळेल, हा या सूचनेचा आशय होता. ही सूचना मान्य झाली असती तर शेतीचे आजचे अरिष्ट टळायला मदत झाली असती असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ तसेच सामाजिक सुधारणांची चळवळ यातून उत्क्रांत व विकसित झालेल्या मूल्यांची रुजवात आपल्या संविधानात आहे. या मूल्यांचा अर्थ, संदर्भ व महत्व प्रतिपादन करण्यातली बाबासाहेबांची भूमिका आजही दिशादर्शक आहे. हे प्रतिपादन कदाचित घटनेतील कलमांत दिसणार नाही. ते घटना समितीच्या चर्चांत दिसते. आज न्यायालयेही घटनेतील कलमांचा अर्थ लावताना घटना समितीतील या चर्चांचा आधार घेतात. उदाहरणार्थ, आरक्षित जागांची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये हा निकाल देताना मंडल खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बाबासाहेबांच्या ज्या विधानांचा आधार घेतला ती अशी आहेत-

‘एखाद्या सरकारने जर फार मोठ्या प्रमाणावर राखीव नोकऱ्या ठेवल्या तर कोणासही सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल आणि असा युक्तिवाद करता येईल की राखीव नोकऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवल्या आहेत की त्यामुळे सर्वांना समान संधी हा नियम नष्ट करण्यात आला आहे. अशा राखीव नोकऱ्या ठेवण्यात संबंधित सरकार योग्य रीतीने व शहाणपणाने वागले आहे किंवा नाही याचा निर्णय कोर्ट करु शकेल.’ (३० नोव्हेंबर १९४८, संदर्भः भारतीय घटनेची मीमांसा, बी. सी. कांबळे)

बाबासाहेबांनी आपल्या संविधानासाठी लिहिलेली उद्देशिका हे संविधानाचे अधिष्ठान आहे. पं. जवाहरलाल नेहरुंनी संविधान निर्मितीच्या प्रारंभी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर ती आधारित असली तरी त्यातील बंधुता हे मूल्य खास बाबासाहेबांची देण आहे. त्याचे स्पष्टीकरण संविधानात नाही. ते बाबासाहेबांनी त्यांच्या संविधान सभेतील भाषणात केले आहे. ते म्ह्णतात- “बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता योग्य मार्गाने जाणार नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसाची गरज लागेल.” बाबासाहेब आणखी एके ठिकाणी म्हणतात- “मी प्रथम व अंतिमतः भारतीय आहे.”

हे भारतीयत्व प्रत्यक्षात यायचे तर आपल्या प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याविषयी बंधु-भगिनीभाव असणे नितांत आवश्यक आहे. आरक्षणावरुन दलितांच्या विषयी अवमानकारक बोलणे किंवा मुसलमानांविषयी मनात विद्वेष असणे, हिंदूबहुल इमारतीत त्यांना घरे भाड्याने वा विकत न देणे हे खचितच भारतीयांतील बंधुतेचे लक्षण नव्हे. मतभिन्नतेचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. पण ही मतभिन्नता दुसऱ्याचा आदर ठेवून व्यक्त करायला हवी. अल्पसंख्याकांवरील हिंसा ही या विद्वेषातून जन्मास येते. परमताच्या व्यक्तीला थेट राष्ट्रद्रोही ठरवण्याची वृत्ती प्रत्यक्षात नकळतपणे राष्ट्राच्या एकतेची वीण उसवत असते.

घटना निर्मितीच्या काळातच देशाची फाळणी झाली. हिंदू-मुस्लिम तणावाची छाया घटना समितीवरही होती. त्याचे प्रतिबिंब काही सदस्यांच्या सूचनेत पडले. त्याला बाबासाहेब कसे उत्तर देतात ते पाहिले की खरा राष्ट्रप्रेमी हा मूळात मानवतावादी असतो हे लक्षात येते. शिवाय देशाने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे घारीच्या नजरेने बाबासाहेब संरक्षण करत होते याचाही प्रत्यय येतो.

पाकिस्तान तेथील अल्पसंख्याकांना कोणते हक्क देते ते पाहू आणि त्यानुसार आपल्या देशातील अल्पसंख्याकांना कोणते हक्क द्यायचा त्याचा विचार करु, असा या सदस्यांच्या म्हणण्याचा रोख होता. बाबासाहेब त्यांना निःसंदिग्धपणे बजावतात- “अशी कल्पना मला तरी मान्य नाही. भारतातील अल्पसंख्याकांचे हक्क पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना कोणते हक्क मिळतात त्यावर अवलंबून राहता कामा नये. ...दुसऱ्या देशातील लोक काही करोत, परंतु आपण जे योग्य आहे तेच अल्पसंख्याकांच्या बाबतीत केले पाहिजे.”

आपल्या देशाचा कारभार धर्माच्या आधारे चालणार नाही. या देशावर इथल्या नागरिकांचा अधिकार आहे. मग ते कोणत्याही धर्माचे असोत, या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर बाबासाहेब अढळ आहेत. मात्र त्याबाबत गोंधळ तयार करण्याचे प्रयत्न आज राजरोस होत आहेत. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीला त्यांना अभिवादन करण्यासाठी संसदेचे खास अधिवेशन भाजप सरकारने भरवले होते. त्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द इंदिरा गांधींनी १९७६ घुसवले, बाबासाहेबांना ते मंजूर नव्हते, असा आरोप केला. हे खरे आहे की ही दुरुस्ती मागाहून केली गेली. ती त्या तत्त्वांना अधोरेखित करण्यासाठी. बाबासाहेबांना हे शब्द वा तत्त्वच मंजूर नव्हते, हा राजनाथ सिंह याचा आरोप तद्दन खोटा आहे. घटना अमलात आल्यावर चारच महिन्यांनी १९५० च्या मे महिन्यात नामवंत साहित्यिक मुल्कराज आनंद यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात- “आपल्या घटनेत आम्ही धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाहीचा आदर्श ठेवला आहे.”

संविधान बदलण्याचा धोका म्हणतात तो हा. प्रत्यक्ष संविधान बदलणे ही नंतरची बाब. पण त्यातील शब्दांविषयी जाणीवपूर्वक संशयाचे धुके निर्माण करुन त्या जागी आपल्याला सोयीचा अर्थ स्थापित करणे हे संविधान बदलणेच आहे. हे धोके ओळखून ते वेळीच रोखण्याचा व त्यासाठी अशा शक्तींना सत्तेवरुन पायउतार होण्यास भाग पाडण्याचा संकल्प करणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीदिनी खरे अभिवादन ठरेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(उद्याचा मराठवाडा, १४ एप्रिल २०१९)

Tuesday, April 2, 2019

अंतर्मुख करणारी दारिद्र्याची वास्तपुस्त

मला हे कबूल केले पाहिजे की हेरंब कुलकर्णींची ही ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ एकदम अंगावर आली. अस्वस्थ करुन गेली. तशी ती मला पूर्ण अपरिचित नाही. चळवळीतला कार्यकर्ता या नात्याने या पुस्तकात नोंदवलेल्यांपैकी बहुसंख्य वंचित-पीडित समूहांना मी भेटलो आहे. त्यांच्या व्यथाही मला नवीन नाहीत. त्या ऐकता-पाहताना व्यवस्थेबद्दल चीड, आपल्या चळवळींच्या मर्यादा, त्यातून येणारी खिन्नता या भावनांतूनही मी गेलो आहे. पण हे सगळे असे एकदम, एकाचवेळी अंगावर येणे हे त्रासदायक ठरले. यातील काही समूहांच्या लढ्यात मी सहभागी झालो आहे. त्यातून काहीएक दिलासा मिळाल्याचे, अडकल्याचे, माघारी जाण्याचे प्रसंगही अनुभवले आहेत. तथापि, हेरंब कुलकर्णींनी या समूहांची जी वास्तपुस्त समग्रपणे समोर ठेवली, त्यामुळे या जुन्या भावना-वेदनांचा गुणाकार होऊन त्यांनी चहुबाजूने घेरले. या घेऱ्यातून बाहेर पडायची निर्णायक उपाययोजना माझ्याकडे नाही, यामुळेही येणारी अस्वस्थता अधिक गडद आहे. किमान या शोधयात्रेतील काही निरीक्षणांना दुजोरा देत, काहींमुळे ताज्या झालेल्या आठवणींची सहज नोंद करत, प्रयासांची आधी-अधुरी मोजमापे मांडत आपल्याशी व्यक्त व्हावे असे ठरवतो आहे. असे व्यक्त होण्याने थोडे मोकळे वाटेल अशी अपेक्षा आहे. 

पाच महिने रजा काढून महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतल्या १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन हेरंब कुलकर्णी यांनी तयार केलेला हा अहवाल ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या नावाने समकालीन प्रकाशनाने तो पुस्तकरुपाने प्रकाशित केला आहे. लेखकाच्या मते संशोधनाची किमान चौकट पाळायचा प्रयत्न केला असला तरी हे रुढ अर्थाने संशोधन नाही. या भटकंतीतून जी निरीक्षणे आढळली त्यांच्या अहवालातून ‘धोरणकर्ते, माध्यमे आणि समाजातील संवेदनशील वर्ग यांच्यासमोर तळागाळातले वास्तव ठेवायचे आहे. हेतू हा, की अजूनही विकासप्रक्रियेबाहेर असलेला, पुणे-मुंबई-नाशिक या त्रिकोणापलीकडचा महाराष्ट्र आपल्या विचारविश्वाच्या केंद्रस्थानी यावा.’ ही लेखकाची भूमिका आहे. हे पुस्तक आल्यावर त्याबद्दल अनेक मराठी-इंग्रजी ऑनलाईन-ऑफलाईन वृत्तपत्रांतून लिहून आले आहे. लेखकाच्या मुलाखती आलेल्या आहेत. व्याख्याने होत आहेत. त्यावर चर्चाही संघटित होत आहेत. लेखकाच्या हेतूला पूरक अशीच ही दिशा आहे. आजवरच्या या प्रसिद्धीमधून तसेच पुस्तक वाचून पुस्तकातील अनेक तपशील वाचकांना ठाऊक झालेले आहेत. त्या तपशीलात फारसे न जाता त्यांच्या अनुषंगाने काही मुद्द्यांबाबतच माझे हे व्यक्त होणे आहे. 

गरीब काय खातात, त्यांच्या रोजगाराचे स्वरुप, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी, मजुरांचे स्थलांतर, शेती व शेतकरी आत्महत्या, सिंचनाची अवस्था, कर्जाचा विळखा, भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, खेड्यातले दलित, असंघटित मजूर, गरिबीच्या दाहकतेत भर घालणारी दारु, कल्याणकारी योजनांतील छळवणूक, कुटुंबाला गर्तेत नेणारे अनारोग्य, गरिबीत वाढ करणारा लग्नखर्च, गावपातळीवरचे प्रशासन, रस्त्यांची अवस्था, पिण्याच्या पाण्याची दैना, बचत गट चळवळीचे रोडावणे, वनहक्क व आदिवासी, प्रकल्पग्रस्त...इतक्या विविध आयामांनी घेतलेला हा दारिद्र्याचा शोध आहे. 

पुस्तकातील याचे तपशील जीवघेणे आहेत. पत नसलेल्या माणसांना बॅंकांचे कर्ज मिळत नाही. मायक्रोफायनान्स हे नवे सावकार तयार झाले आहेत. वसुलीसाठी आलेल्या या सावकारांच्या भीतीने धान्याच्या कोठीत लपून बसलेली म्हातारी कोठीचे झाकण लागल्याने गुदमरुन मेली. बायकोबरोबर चालत असलेला शेतकरी नवरा अचानक रस्त्याकडेच्या कोरड्या विहिरीत उडी मारुन जीव संपवतो. घरात नागली असूनही दळायला पैसे नाहीत म्हणून आदिवासी महिला भाकरी करु शकत नाही. ‘असला तांदूळ तर भात करते नाहीतर भीक मागून आणते’ असे सांगणारी भटक्या समाजातली महिला. सरकारी योजनेतल्या गिरणीचे कोटेशन १७ हजाराचे. प्रत्यक्षात मिळतात १५ हजार. वरचे दोन हजार गरिबाने भरायचे. सरकारी अधिकारी गिरणी खरेदी करतात १० हजाराची. उरलेले पैसे ते खातात. दोन हजारासाठी अधिकाऱ्यांचा तगादा. ते मिळत नाहीत म्हणून गिरणी काढून नेतात. ही योजना तीन मंत्री घरी आल्यानंतर मिळालेली असते. भटके गावाला नको असतात. घरकुले मंजूर झालेल्या बहुरुपींची वस्ती गावकरी पेटवून देतात. गावात राहू द्यायला सरपंच दोन लाख मागतो. ते देणे शक्य नसते. हे बहुरुपी गाव सोडतात. यातल्या एका गरोदर बाईला रक्ताची गरज लागते. त्यासाठी डॉक्टरना रहिवासाचा पुरावा लागतो. ही वस्ती आमच्या हद्दीत येत नाही, म्हणून तलाठ्याचा नकार. लेखक या स्थितीचे रास्त वर्णन करतो- ‘एकीकडे पेटवलेल्या घरांचा भूतकाळ आणि दुसरीकडे हा कुपोषित भविष्यकाळ. सर्वांसाठी आरोग्य, सामाजिक न्याय हे शब्द अशा ठिकाणी पोहोचतच नाहीत.’ 

हेरंब कुलकर्णी ज्या गरीब समूहांना भेटले ती ठिकाणे गरिबांची घनता असलेली आहेत. पण हे गरीब केवळ तेथेच आहेत असे नाही. ते थेट मुंबई, पुणे, नाशिक येथेही त्यांच्या विदारक अवस्थेसह भेटतात. स्थलांतरित होऊन जगायला बाहेर पडणारे हे समुदाय या प्रगत शहरांच्या आधाराला येतात. हे प्रमाण नव्या आर्थिक धोरणाच्या अमलानंतर वाढलेले आढळते. गरिबीचे कोणतेही मापदंड योजले तरी एकूण गरिबी वाढली असे दिसत नाही. ती कमी कमी होते आहे. या पुस्तकातच दिलेल्या आकड्यांप्रमाणे देशात १९७३ साली असलेली ५४.१५ टक्के गरीबी २००४ साली २७.६८ टक्के म्हणजे निम्म्याने खाली आहे. मात्र १९७३ ते १९८८ पर्यंत नागरी गरिबीपेक्षा ग्रामीण गरिबी अधिक असण्याचा प्रकार पुढे उलट झाला आहे. आता ग्रामीणच्या तुलनेत शहरातली गरिबी वाढलेली आहे. कनिष्ठ मध्यमवर्ग, मध्यमवर्ग यांतून एक विभाग नव्या आर्थिक धोरणाचा लाभार्थी होऊन वर वर सरकत गेला आहे. काही तर श्रीमंतीचे कडे तयार झाले आहेत. हे वर सरकणे सगळ्यांच्या वाट्याला आलेले नाही. त्यामुळे एक भयावह विषमता तयार झालेली आहे. ही विषमता प्रचंड वाढते आहे. 

या अहवालात २०१३ च्या आर्थिक सर्वेक्षणातील निरीक्षणे लेखकाने नोंदवली आहेत. त्यात म्हटले आहे- ‘महाराष्ट्रात कमी उत्पन्न आणि गरिबी यांचे मूळ कारण उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्तांच्या विषम मालकीत आहे. जमीन, इमारती, शेती, शेअर्स, अनामत ठेवी यांचा यात समावेश होतो. २०१३ मध्ये २० टक्के उच्च स्तरातील कुटुंबांकडे ८४ टक्के संपत्ती होती आणि उर्वरित ८० टक्के लोकांकडे केवळ २० टक्के संपत्ती होती.’ पैश्याकडे पैसा जातो त्याप्रमाणे आधीच्या संपत्तीच्या आधारे नवीन संपत्ती तयार होते. ज्याच्याकडे ती नाही त्याच्याकडे संपत्ती जात नाही. उदा. ज्याच्या बापजाद्यांनी ४ घरे वारसदाराला ठेवली असतील त्याने काहीही केले नाही तरी त्यातील ३ घरे भाड्याने देऊन त्याचे भाडे तो घेऊ शकतो. तो कर्तृत्ववान असला तर या मालकीवर तो कर्ज आदि घेऊन नव्या व्यवसाय-धंद्याच्या सहाय्याने ही संपत्ती वाढवू शकतो. ही संपत्ती ही त्याची पत असते. संपत्तीविहिन माणसाला तारण ठेवायला त्याच्या अस्तित्वाशिवाय दुसरे काही नसते. साहजिकच त्याची पत नसते. त्याला सुलभ कर्ज मिळणे मुश्कील होते. मग मिळते ते सावकाराकडून प्रचंड व्याजाने. पुढे तोच त्याचा सापळा होतो. 

या संपत्ती संचयाला जातीचेही परिमाण आहे. संपत्ती संचयवाल्या या कथित वरच्या व संपत्तिविहिन या कथित खालच्या जाती आहेत. या पुस्तकात नोंदवलेले गरीब समूह हे मुख्यतः या तळच्या सामाजिक थरातले आहेत. ज्या दलितांना वा या सर्वच सामाजिक दुर्बलांना राखीव जागांचा कायदेशीर आधार असला तरी नव्या आर्थिक नीतीने सरकारी-निमसरकारी नोकऱ्या तसेच शिक्षण मारुन काढल्याने राखीव जागांचा आधार केवळ प्रतीकात्मक झाला आहे. ज्या दलितांच्या स्थितीचे वर्णन या पुस्तकात आहे, त्यातील बौद्ध हा जाणता विभागही या राखीव जागांपासून दूर असलेला दिसतो. करुण गंमत अशी की या व्यवस्थात्मक प्रश्नाला भिडण्याचे सोडून वरच्या जातीतले आर्थिक दुबळेही आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकारही पदरचे काहीच द्यायचे नसल्याने आणि आर्थिक धोरणात बदल करावा लागत नसल्याने ही मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने जाते आहे. कायदेशीर पातळीवर ते किती टिकेल हा प्रश्न त्याला आता पडत नाही. आजचा त्रास पुढे ढकलल्याचे समाधान व त्यानिमित्ताने आरक्षण दिलेल्या विभागांच्या राजकीय लाभांशाची आज होणारी बेगमी त्याला हवी आहे. ही लघुदृष्टी खूप घात करणार आहे. या बाबतीत चळवळींतले घटकही जातींचे आधार जाऊ नयेत म्हणून सावध भूमिका घेतात, हे अधिक त्रासदायक आहे. 

शेतीतल्या अरिष्टाने मराठा समाजाचे प्रश्न तयार झालेत. त्या अरिष्टाला भिडायला हवे. आरक्षण हा त्यासाठीचा उपाय नाही. आताचे आरक्षण कोर्टात टिकले तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता अगदीच मामुली आहे. पण हे त्याला कोणी नीट समजावून सांगतच नाही. आजच्या आरक्षित समूहांतल्या पुढे गेलेल्या लोकांनी आपल्यातल्या वंचितांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी स्वतःहून त्यापासून दूर राहायला हवे, हे आपण बोलत नाही. आपण का वाईटपणा घ्या असे प्रगतीशील चळवळीतल्याही अनेकांना वाटते. आपल्या मनातला गोंधळ हेही कारण असते. पण त्याला भिडायचा प्रयत्न आपल्याकडून ताकदीने होत नाही, हे खरे. 

जे दारिद्र्य आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे आज आहे, त्यापेक्षा कितीतरी भयंकर दारिद्र्य अन्य समूहांत आज आहे. पूर्वी होते. मी स्वतः आमच्या गावात कोकणात अनुभवले आहे. पण त्यावेळी कोणी आत्महत्या करत नव्हते. ‘अपराधी वाटण्याची आणि आत्मसन्मान दुखावण्याची ही प्रक्रिया समजून घ्यायला हवी’ असे लेखक या आत्महत्या करणाऱ्या समूहाबद्दल बोलतो ते महत्वाचे आहे. आम्ही सारेच त्यावेळी दरिद्री होतो. अपराधी वाटण्याचा प्रश्न नव्हता. आत्मसन्मान आधी होताच कोठे नंतर दुखावायला? ही गरिबीही रमय्या वस्तावया म्हणत साजरी व्हायची. कारण आम्ही एकाकी नव्हतो. आज आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना समूहाचा आधार नाही. त्याचा अवमान वा मान हा त्याचा वैयक्तिक असतो. समूहाचा होत नाही. यातून ते आहारी जातात ते मागास जातींच्या आरक्षणाने आमचा घात झाला अशा पूर्ण खोट्या विचारांच्या. त्या जातींबद्दल दुस्वास, त्यांच्या आरक्षणाला विरोध, त्यांच्यावर हल्ले, त्यांच्यातल्या मुलाच्या प्रेमात आपली मुलगी पडली तर त्यांचा सैराट करणे आणि पुढे स्वतःच आरक्षणाची मागणी करणे. ...हा कडेलोटाकडचा प्रवास आहे. राज्यकर्ते या प्रवासाला सुहास्य वदनाने शुभेच्छा देत आहेत. 

या सगळ्याचे समग्र भान देऊन नेतृत्व व दिशा देणाऱ्या भक्कम चळवळीची अनुपस्थिती ही आजची मोठी समस्या आहे. यामागच्या कारणांची चिकित्सा व अशा चळवळीच्या उभारणीचे प्रयत्न हा या दारिद्र्याच्या व्यथांवरचा एक उपाय आहे. 

भटक्या समाजातील एका कार्यकर्त्याचे एक निरीक्षण लेखकाने पुस्तकात नोंदवले आहे. त्यात ते म्हणतात- ‘भटक्या जमातीतील लोकांसमोर चांगले जगावे, नीटनेटके राहावे यासाठीचा कोणताही आदर्श नसतो. त्यामुळे या लोकांच्या राहणीमानात सुधारणा होत नाही.’ हे महत्वाचे आहे. हे आदर्श आपल्याला आपलेच उभे करावे लागतील. त्यासाठी बाह्य स्थितीकडे केवळ बोट दाखवून चालणार नाही. बौद्ध वा दलित समुदायाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा हिमालयाइतका मोठा आदर्श मिळाला. आज महाराष्ट्रातल्या आंबेडकरी/दलित चळवळीत बऱ्याच विकृती तयार झाल्या असल्या तरी तिच्या प्रारंभीच्या उभारणीला व चालनेला बाबासाहेब आंबेडकरांचा हा आदर्श खूप प्रेरणादायी ठरला. बाबासाहेबांची ही ताकद देशातल्या नवजागृत दलितांना आजही उपयुक्त ठरते. 

बाह्य स्थितीला बदलण्यासाठी, तिचे आव्हान पेलण्यासाठी दुबळ्या, वंचित, शोषित समूहांना आपली आंतरिक ताकद आणि संघटना मजबूत करणे भाग आहे. या विभागांत काम करणाऱ्यांनी आपले काही खास स्वतंत्र लढे लढवतानाच व्यापक परिवर्तनासाठी परस्परांच्या हातात हात गुंफून एक भक्कम साखळी करणे गरजेचे आहे. एनजीओ की जनसंघटना, गैरपक्षीय राजकारण की पक्षीय राजकारण या चर्चा चालू राहतील. पण काही सामायिक मुद्द्यांवर सामायिक शिस्तीत एकत्र येणे शक्य आहे. असे एकत्र येण्याचे क्रम महाराष्ट्राला नवे नाहीत. ते अधिक आशयसंपन्न. घट्ट व सातत्यपूर्ण होणे निकडीचे आहे. 

उपासमारीवरचा एक उपाय म्हणजे रेशन. आता त्याचा कायदा झाला, नवी तांत्रिक साधने आले, संगणकीकरण झाले तरी त्याचा लाभ नीटपणे गरिबांपर्यंत पोहोचत नाही. यातील भ्रष्टाचार हे मोठे कारण आहे, यात शंका नाही. पण संघटनांची रेशनबाबतच्या नियमांची, नव्या बदलाची अपुरी माहिती व स्थानिक हस्तक्षेपातील सातत्याचा आणि प्रशासकीय पातळीवरील पाठपुराव्याचा अभाव हेही या परिणामकारक अंमलबजावणी न होण्याला मोठे कारण आहे. एखाद्या प्रासंगिक आंदोलनाने हे प्रश्न सुटणार नाहीत. त्या वस्तीत, त्या गावात सातत्याने झगडणारे कार्यकर्ते तयार होणे गरजेचे आहे. हल्ली कायदा पहिल्यापेक्षा अधिक बाजूने आहे. तो येण्यात महाराष्ट्रातल्या चळवळीचा मोठा हस्तक्षेप आहे. संगणकीकरणामुळे लाखो खोटे कार्डधारक बाहेर निघाले आहेत. त्यामुळे लाखोंचा कोटा (इष्टांक) आज आहे. पण लोकांना त्याची माहिती देऊन, त्यांचे फॉर्म भरुन, सरकारी कार्यालयात त्यांचा पाठपुरावा करुन त्यावर दावा करायला आपण कमी पडतो आहोत. याची दुरुस्ती आपल्याच हाती आहे. 

सगळा समाज न्याय्यपूर्ण होणे ही लांबची प्रक्रिया आहे. ज्याला आपण क्रांती म्हणतो त्यानंतर ती बहुधा संभवेल. तथापि, आजच्या भांडवली रचनेत भारतीय संविधानाचा हवाला देत आपल्याला पुढे सरकण्याच्या खूप शक्यता आहेत. खुद्द भांडवलशाही गरिबीच्या बाजूने तत्त्व म्हणून नाही. गरीब राहणारच असे ती म्हणत नाही. उलट संचयित संपत्ती पाझरत खालच्या स्तरांत जाईल असेच ती म्हणते. विषमता ती मानते. गरजेनुसार वितरणाच्या बाजूने ती नाही. पण वंचित कोणी राहू नये, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यास तिचा नकार नाही. आपण जे चळवळीच्या रेट्याने अनेक दिलासे मिळवतो ते या भांडवली शासनाच्या चौकटीतच. ही स्थिती यादृच्छिक न राहता तिचे विचारपूर्वक नियोजन आपण करणे गरजेचे आहे. रेशनच्या चळवळीत रेशन हा आपला हक्क आहे, याची जाणीव एका बाजूने लोकांमध्ये मुरवत, आंदोलनाचे दडपण तयार करत शासन-प्रशासनाला तांत्रिक उपायांच्या सूचना आणि त्यांच्या अंमलबजावणीत सहभाग घेण्याच्या प्रक्रियेत मी सहभाग घेतलेला आहे. हे होऊ शकते हा माझा अनुभव आहे. 

पूर्वी वाट्याला न आलेले अभूतपूर्व संकट आज फॅसिझमचे आहे. तो उरावर बसला तर दारिद्र्याच्या शोधयात्रा काढण्याचेही स्वातंत्र्य राहील का हा प्रश्न आहे. हा फॅसिझम संविधानातील सामाजिक-राजकीय प्रगत मूल्ये पायदळी तुडवतो आहेच; पण नवे आर्थिक धोरण आणलेल्यांच्या पुढे जाऊन ते मोकाट करायचा चंग त्याने बांधला आहे. या स्थितीत दरिद्री विभागांच्या यातना अधिक गहिऱ्या होणार आहेत आणि त्या विरोधात लढण्याचा अवकाशही संकोच पावणार आहे. अशावेळी या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आघाडीचा पराभव करण्यासाठी सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांनी अभेद्य जूट उभारणे हाही दारिद्र्यनिर्मूलनाचाच एक मोठा किंबहुना ताबडतोबीने क्रमांक एकचा उपाय आहे. 

हेरंब कुलकर्णींनी त्यांच्या नेहमीच्या जिद्दीने खूप कष्ट सोसत अपार संवेदनशीलतेने केलेल्या या ‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’ने ही चर्चा अधिक पुढे जाईल ही अपेक्षा आहे. त्यांच्या या प्रयासाबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद! 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, एप्रिल २०१९)

_______________________________________ 

दारिद्र्याची शोधयात्रा 

हेरंब कुलकर्णी 

समकालीन प्रकाशन 

मूल्यः रु. १५० | पृष्ठेः १०४ 

_______________________________________

Sunday, March 10, 2019

लाच न देण्याची चैन!

“काका तुमचं काम झालं!” मी दिलेला कागद फाईलला लावत पोलीस म्हणाले अन् मी मनातल्या मनात हुश्श केले. ताणलेले शरीर-मन एकदम सैल झाले. गेले तीन दिवस खूप ताणात गेले होते. पासपोर्टच्या नूतनीकरणासाठीची प्रक्रिया पासपोर्ट कार्यालयात अगदी सुरळीत झाली होती. पासपोर्ट पोस्टाने हातातही आला होता. पण पोलीस तपासणी त्यालाही लागू असते. त्याशिवाय हातात असलेल्या पासपोर्टला किंमत नसते. परवा पोलीस कॉन्स्टेबल तपासणीसाठी घरी येऊन गेले. मी घरी नव्हतो. मी खरेच इथे राहतो का हे जाणण्यासाठी त्यांनी घरच्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. नंतर ते आसपासच्या घरी गेले. तिथून पुन्हा आमच्या घरी आले व म्हणाले, “त्यांना कोणी ओळखत नाही. ते इथे राहतात हे कशावरुन?” घरच्यांना हे आश्चर्यच होते. सासूबाई आजूबाजूच्या लोकांना तुम्ही असे कसे सांगितलेत हे पोलीसासमोरच विचारायला बाहेर आल्या. पण हे पोलीस कॉन्स्टेबल थांबलेच नाहीत. पोलीस स्टेशनला त्यांना यायला सांगा, असे म्हणून लागलीच निघून गेले. 

मला हे कळल्यावर आश्चर्य वाटले. मनात अस्वस्थता दाटली. ही इमारत तयार होत असतानाच आम्ही राहायला आलो. अठरा वर्षे झाली. अशावेळी मला कोणीच ओळखत नाही, हे कसे असू शकेल? भाडोत्री बदलत असतात. त्यांना ठाऊक नसू शकते. जुन्यापैकी काहींना माझे आडनाव माहीत नसू शकते. माझी पत्नी सोसायटीत क्रियाशील असते. तिच्या आडनावाने मला बरेच जण ओळखतात. ते मी फारसे दुरुस्त करत नाही. पण अनेक जण माझ्या आडनावासहित ओळखणारे आहेत हेही मला ठाऊक आहे. सोसायटीचे पदाधिकारी, कार्यालयीन व्यवस्थापक यांना तर आम्हा दोघांच्या नावे घराची मालकी असल्याने दोन्ही नावांची अधिकृत माहिती आहे. तरीही चौकशीत मी इथे राहत नाही या निष्कर्षाला पोलीस कॉन्स्टेबल ‘पोलीस’ असूनही यावेत याचे मला आकलन होत नव्हते. एखादा आरोपी शोधताना आजूबाजूचे लोक सांगतात तो इथे राहत नाही यावर पोलीस विसंबत नाहीत. ते विविध मार्गांनी खातरजमा करतात. पण माझ्याबाबतीत अशा सहज निष्कर्षाला ते कसे येऊ शकतात? 

....या विचाराने मला त्रास होऊ लागला. अडवणूक करुन पैश्यांची मागणी करण्यासाठी हे असू शकते, असा संशय मनात दाटू लागला. तो खरा त्रासदायक मुद्दा होता. मागे एकदा मुलाच्या पासपोर्टच्या तपासणीसाठी आलेल्या पोलिसाने जाताना ‘चहा-पाण्यासाठी काही आहे की नाही?’ अशी विचारणा केली होती. ‘आम्ही याच्या विरोधात आहोत, तुम्हीही अशी मागणी करु नये, यात मागणाऱ्याची व देणाऱ्याचीही प्रतिष्ठा राहत नाही.’ ...वगैरे उपदेश करुन त्या पोलिसाला परतवले होते. 

त्याचा परिणाम..? 

सगळे नीट असतानाही पासपोर्ट कार्यालयातून निरोप आला पोलिसांनी तुमचा पासपोर्ट रिजेक्ट करण्याची शिफारस केली आहे. आम्ही चिंतेत पडलो. अशी काय उणीव राहिली आमच्याकडून काही कळेना. पासपोर्ट कार्यालयात भेटीला गेलो तेव्हा कळले, पोलिसांनी पत्ता चुकीचा असल्याने पासपोर्ट रिजेक्ट करावा असा शेरा दिला आहे. आमच्या मुलाने पत्त्याची सगळी कागदपत्रे दाखवली तेव्हा ते अधिकारीही हसू लागले. प्लॉट नंबर लिहिलेला नव्हता. तो एरवीही आम्ही कोणी लिहीत नाही. कोठच्याच कागदपत्रावर तो नाही. मुलाच्या आधीच्या पासपोर्टवरही तो नव्हता. अधिकाऱ्यांनी पोलिसांचा आक्षेप अमान्य करुन पासपोर्ट मंजूर केला. 

पण या सर्व सव्यापसव्यासाठी गेलेला वेळ, श्रम. मानसिक त्रास व प्रवासखर्च याचे मोल त्या पोलिसाला द्याव्या लागणाऱ्या पैश्यांपेक्षा कित्येक पटींनी जास्त होते. बरे या सर्व त्रासाअंती काम झाले ही मोठी आनंदाची गोष्ट. त्यामुळे त्या कष्टा-खर्चाचे काही वाटले नाही. पण पोलिसांच्या अडवणुकीने जर काम झालेच नसते तर..? 

आमच्या आधीच्या पासपोर्टवेळी आमच्या एका पोलीस अधिकारी मित्राचे मित्रच संबंधित पोलीस ठाण्यात होते. त्यामुळे तेथील आमचे काम करणाऱ्या कॉन्स्टेबलचे सौजन्यच लक्षात राहिले. त्यावेळी त्याने काय तपासणी केली हे आता आठवत नाही. 

तर दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेलो. कॉन्स्टेबल तरुण होते. त्यांनी कडकपणे मला तुम्हाला तिथे कोणी ओळखत नाही वगैरे सांगायला सुरुवात केली. मी म्हणालो, “अहो, असे एकतर होणार नाही. दुसरे म्हणजे तुम्ही तेवढ्यावर कसे विसंबता? तुम्हाला शंका असेल तर मध्यरात्री येऊन पहा ना तो माणूस तिथे आहे की नाही! तुम्हाला शंका आहे ना! मी तुमच्या खात्यातीलच माझ्या पोलीस अधिकारी मित्राला तुमच्याशी बोलायला लावतो. ते याच भागात राहतात. माझ्या घरी येत असतात.” त्यावर ते कॉन्स्टेबल म्हणाले, “मी अशी ओळखीने कामे करत नाही. जे असेल ते नियमाप्रमाणे करतो.” मी त्यांच्या या म्हणण्याचे जोरात स्वागत केले. म्हणालो, “अगदी योग्य! असेच असायला हवे. तुम्ही नियमाप्रमाणे माझा तपास करा. नियमाप्रमाणे रिजेक्टचा शेरा द्या. माझी काहीच हरकत असणार नाही.” त्यावर ‘’सगळीच कामे कायद्याने होत नाहीत” असे ते पुढे म्हणाले. मला नियमाप्रमाणे करण्याचे व कायद्याने कामे न होण्याचे या दोहोंची काही संगती लागेना. मग थोडी हुज्जत झाली. अखेर ते कॉन्स्टेबल खाली आले. माझ्याकडच्या कागदपत्रांमधून आवश्यक ती कागदपत्रे घेतली. एक सोसायटीचे ओळखीचे पत्र हवे होते. ते दुसऱ्या दिवशी दिले. कॉन्स्टेबल म्हणाले, “काका तुमचे काम झाले.” त्यांना धन्यवाद देऊन “ओळखीने काम न करण्याची तुमची पद्धत मला चांगली वाटली. असेच असायला हवे” अशी त्यांची प्रशंसा केली. संविधानातील मूल्यांची आमची पुस्तिका दिली. कॉन्स्टेबलच्या तोंडावर हसू फुलले. माझा नंबर घेतला. मी नक्की तुम्हाला फोन करीन, असे मी निघत असताना ते म्हणाले. 

माझा ताण हलका झाला. हा ताण कागदपत्रे देण्याचा, फेऱ्या मारण्याचा नव्हता. तो मला कबूल होता. प्रश्न त्या कॉन्स्टेबलने पैसे मागितले तर काय याचा होता. त्यावरुन हुज्जत, अशी लाच घेणे बरोबर नाही, मी देणार नाही, काय करायचे ते करा...हा प्रसंग वाट्याला येणार याने शरीर-मन ताणले होते. आजपर्यंत तरी लाच देणे कधीच वाट्याला आले नाही. ना पोलीस, ना कोणी अधिकारी, ना टीसी. झगडावे लागले. पण काम झाले. 

मात्र एव्हढेच लिहून थांबणे बरोबर होणार नाही. झगडले की काम होते. लाच द्यावी लागत नाही, हा निष्कर्ष फसगत करणारा होईल. तांत्रिकदृष्ट्या मला माझ्या हाताने लाच द्यावी लागण्याचा प्रसंग आला नाही, हे खरे. पण माझ्या वतीने काहींनी ही कामे केली आहेत. माझ्या कळत अथवा नकळत. कोंबडे मी कापले नाही. मी हत्या केली नाही. मी केवळ खाल्ले. पण माझ्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने हत्या केली होती. त्याचे काय करायचे? 

गावच्या नव्या घरी वीज जोडणी घेताना जवळ विजेचा खांब नव्हता. प्रतीक्षा यादीप्रमाणे तो यायला बरेच महिने जाणार होते. आम्हाला तर घाई होती. घराचे कंत्राट घेणाऱ्याकडेच विजेच्या जोडणीची जबाबदारी होती. त्याने त्याच्या ओळखीने, १२-१३ हजार रुपये जास्त देऊन हा खांब, मीटर दोन दिवसात आणला. हे पैसे मी थेट दिले नाहीत. ते घराच्या एकूण कंत्राटाच्या हिशेबात शेवटी कमी-जास्त करताना त्याने लावले. मुंबईच्या घराच्या कामावेळी रस्त्यावर पडलेल्या डेब्रिजचा प्रश्न होता. त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आले. घर पाहिले. मला भेटले. गेले. बाहेर जाताना त्यांच्या सोबत कंत्राटदार गेला. त्याने जे काय ‘मॅनेज’ करायचे ते केले. 

या दोन्ही घटनांत लाच द्यावी लागली व ती माझ्या कामासाठी द्यावी लागली ही वस्तुस्थिती आहे. माझ्या हाताने ती द्यावी लागली नाही. हे कुकर्म मला करावे लागले नाही, एव्हढेच. ट्रेनच्या लांबच्या प्रवासात रिझर्वेशनची गडबड असताना माझी सोय करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी टीसीशी काहीतरी जुगाड केलेला असणारच. तो मला त्यांनी सांगितलेला नाही एव्हढेच. 

आमच्या सत्याच्या आग्रहासाठीच्या चळवळीच्या केसेस कोर्टात चालताना आमच्यासाठी फुकट लढणाऱ्या नामांकित कार्यकर्त्या वकिलांनी एखादा कागद मिळवण्यासाठी, हितचिंतक न्यायाधीशाकडे केस येण्यासाठी तेथील शिपाई वा कारकुनाचे हात स्वखर्चाने ओले केलेले मला ठाऊक आहेत. अगदी भ्रष्टाचाराच्या विरोधातली केस लढवतानाही हा भ्रष्टाचार या वकिलांना करावा लागतो. ती रीतच आहे. ते नाही केले तर आपण लटकू असे त्यांचे म्हणणे असते. 

ज्यांच्याकडे किमान साधनसंपदा, प्रतिष्ठा, शिक्षण आहे अशांना बरेचदा थेट स्वतः लाच न देण्याची सवलत मिळू शकते. तुम्ही मेधा पाटकर-अण्णा हजारे असाल तर ‘त्या येड्यांच्या’ नादाला लागू नका असा सल्ला व्यवस्थेला मिळत असतो. पण मेधा पाटकर-अण्णा हजारे यांसारखे असामान्य नसलेल्या, कोणतीच साधनसंपदा वा किमान शिक्षण व प्रतिष्ठा नसलेल्या सामान्य, अल्पशिक्षित, निरक्षर, गरिबांचे काय? त्यांच्या मदतीला गावातील, वस्तीतील ‘सोशल-पोलिटिकल वर्कर’ येत असतात. सरकारदरबारी करावयाच्या कामांत ते मध्यस्थ असतात. तिथे द्यावयाचे पैसे अधिक त्यांची स्वतःची फी ते या गरिबांकडून वसूल करतात. पैसे न देता कामे करुन घेण्याची चळवळीची यंत्रणा प्रत्येक गावात वा वस्तीत अर्थातच नसते. असली तरी तो दबाव नियमित ठेवणे किती जिकिरीचे असते, हे चळवळीतल्या तळच्या कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. एका अत्यंत लढाऊ व बऱ्याच लढाया जिंकलेल्या युनियनकडून काम लवकर होत नाही असे दिसल्यावर आपल्याला परमनंट करण्यासाठी या युनियनमध्ये असलेल्या सफाई कामगारांनी नगरसेवक-महापौर-अधिकारी यांना काही लाख रुपये जमवून देण्याची तयारी केल्याचे उदाहरण मला परिचयाचे आहे. 

कायद्याने लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हा आहे. फक्त लाचलुचपत खात्याच्या सल्ल्याने लाच घेणाऱ्याला पकडण्यासाठी दिलेली लाच आणि स्टिंग ऑपरेशनवेळची लाच गुन्हा मानला जात नाही. लाच दिल्याचे उघडकीस आल्यास देणाऱ्यालाही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे देणारा न बोलणे, तक्रार न करणे पसंत करतो. याचा फायदा वा संरक्षण लाच घेणाऱ्याला मिळते. म्हणून लाच देणे हा कायद्याने गुन्हा असता कामा नये. तसे केल्यास नाईलाजाने लाच देणारे तक्रार करायला पुढे येतील. लाच घेणाऱ्याचे संरक्षण जाईल व तो सापडणे सुलभ जाईल वा त्याच्या बिनदिक्कत लाच घेण्यास काही प्रमाणात पायबंद बसू शकेल, अशी कायद्यात सुधारणा करण्याची सूचना मनमोहन सिंगांचे अर्थ सल्लागार कौशिक बसू यांनी २०११ मध्ये केली होती. त्यावर खूप गदारोळ उठला. मनमोहन सिंग स्वतः त्या विरोधात होते. पण त्यांनी ही सूचना करण्याचे कौशिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य केले होते. 

या सूचनेच्या विविध अंगांची मला कल्पना नसल्याने ती योग्य की अयोग्य या निष्कर्षाला मी येऊ शकत नाही. तथापि, ही सूचना अमलात आली तरी सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहातील अडिअडचणींत मूलभूत सुधार होईल असे वाटत नाही. सर्व काही नियमांनुसार असताना फाईल पुढे सरकवायला अडवणारे किंवा नियमानुसार नसताना नियम वाकवणारे या दोहोंमुळे नडलेले वा त्यांची गरज असलेले लोक कायद्याचा लंबा मार्ग किती अनुसरतील ही शंका आहे. आज अधिकाधिक एकाकी होत जाणारा, घाईत असणारा समाज पैसा द्या व पुढे सरका या मनःस्थितीत खोल बुडत आहे. त्यासाठीच्या लढाया ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असल्याचे त्याला वाटत आहे. पैसे घेतात अन् कामही करतात असे लोक त्याच्या आदराला पात्र होतात. केवळ बड्यांकडून पैसे घेणारा आणि गरिबांना बिनपैश्यांची मदत करणारा रॉबिनहूड तर लोकांना देवमाणूसच वाटतो. 

‘सगळीच कामे कायद्याने होत नाहीत’ या सल्ल्याची लोकांना, कार्यकर्त्यांनाही प्रचिती येत असते. एका वस्तीत एकाने दुसऱ्याचे कर्ज घेतले. सावकारी पद्धतीच्या या कर्जाचे मासिक दहा टक्के व्याज. व्याज मुदलीच्या चार पट फेडले तरी मुद्दल तशीच. तीही नंतर जवळपास फिटली. थोडी शिल्लक होती. त्या हिशेबात कर्ज देणाऱ्याने गडबड केली. सगळा व्यवहार तोंडीच होता. लेखी काहीच नव्हते. माझी अमूक इतकी मुद्दल अजून बाकी आहे, ती दे म्हणून कर्जदाराला तो धमकावू लागला. आमच्या एका वस्तीतल्या हरहुन्नरी कार्यकर्त्याला हा कर्जदार भेटला. या कार्यकर्त्याला यात अन्याय दिसला. त्याने ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याकडे त्याला नेले. पोलीस अधिकाऱ्याने कर्ज देणाऱ्याला बोलावून घेतले. मुकाट ऐकतोस की सावकारी बंदी कायद्याखाली आत टाकू असे दमात घेतले. कर्ज देणारा सूतासारखा सरळ आला. कर्जदारावरचा अन्याय दूर झाला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर या कार्यकर्त्याने कर्जदाराला सल्ला दिला- ‘ते साहेब होते म्हणून तुझे काम झाले. तुझे पैसे वाचले. आता सद्भावनेने त्यांना काहीतरी दे.’ 

इथे त्या कार्यकर्त्याने त्याच्याकडून आपल्या रदबदलीचे काही घेतले नाही, याची मला कल्पना आहे. असे घेत नाहीत असे नाही. वर अशा सोशल वर्कर मध्यस्थांचा उल्लेख केलाच आहे. पण या कार्यकर्त्याने घेतले नाहीत. त्याची अपेक्षा एवढीच होती, या साहेबांचे आणि त्याचे संबंध चांगले राहावेत. वस्तीतल्या अन्य भांडण-तंट्यात त्यांनी सहकार्य करावे. त्याला मान द्यावा. काम करणाऱ्याला पैसे द्यावेत हा व्यवहार त्याला खटकत नव्हता. उलट साहेबाने मागितले नसताना आपण कृतज्ञ राहायला हवे असे त्याचे तत्त्व होते. ही त्याची तत्त्वच्युती, अज्ञान की सत्प्रवृत्तता? ...निर्णय काय करायचा? 

जीवन व्यामिश्र असते, सगळेच तर्काने चालत नाही..असे काही सूत्र मला मांडायचे नाही. आज ज्या व्यवस्थेचे आपण घटक आहोत, ती सामाजिक-आर्थिक-राजकीय तसेच लिंगीय विषमता व शोषणाने भरलेली आहे. साधनसंपदेचे न्याय्य वितरण अर्थातच नाही. वंचित-शोषितांची जाणीवही त्या दिशेने विकसित झालेली नाही. आहेरे वर्गातल्या विविध थरांना तो आपला जन्मजात व कष्टार्जित मामला वाटतो. सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळायला हवा याविषयी त्यांचे दुमत नाही. पण ते समतेच्या बाजूने नाहीत. त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांची एक स्तरीय उतरंड आहे. त्या त्या थराचे रीतीरीवाज पाळणे (ज्याने त्याने आपापल्या पायरीने राहावे) हे त्यांनी गृहीत धरले आहे. एका जातीचे असलेले, पण आर्थिक बाबतीत वरचे असलेले आपल्या गरीब जातबांधवाने त्याच्या पायरीने वागावे असेच अपेक्षित धरतात. या संस्कारांना अनुसरुन गावातून-वस्तीतून आलेले, पैसे न खाणारे कार्यकर्तेही त्या गावातील-वस्तीतील सामान्यांपेक्षा स्वतःची प्रतिष्ठा वेगळी मानायला लागतात. ...हे सर्व बदलायला हवे. या परिस्थितीच्या साच्यात माणसाचे व्यक्तित्व-वृत्ती घडणे स्वाभाविक असताना जाणत्यांनी माणसांना माणूस घडवण्याचा आज अस्वाभाविक वाटणारा प्रयत्न समांतरपणे करायला हवा. 

तेवीसशे वर्षांपूर्वी चाणक्याने आपल्या अर्थशास्त्रात ‘पाण्यातला मासा पाणी कधी चाखतो ते कळत नाही, तद्वत सरकारी माणूस सार्वजनिक पैसा कसा खातो ते कळणे कठीण आहे’ असे सांगितल्याची नोंद भ्रष्टाचाराचे हे दुखणे किती प्राचीन आहे, हे सांगण्यासाठी केली जाते. हे प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. वर नमूद केलेली पद, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतरचे हे दुखणे आहे. म्हणजेच या विषमतेच्या विलयाबरोबरच भ्रष्टाचाराचे दुखणे संपणार आहे. तोवर नियंत्रणाचे विविध मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातील बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावे लागेलच. 

..आणि तोवर पैसे न देता काम करुन घेण्याची चैन काही लोकांना काही वेळाच परवडू शकते अन् तीही वरवरची, कृतक असू शकते हे शांतपणे स्वीकारावे लागेल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०१९)

बाळासाहेब आंबेडकर यांना मित्रांचे आवाहन

३ मार्च २०१९ 

प्रिय बाळासाहेब, 

महाराष्ट्र लोकशाही आघाडी, जातिअंताची चळवळ तसेच आपल्या नेतृत्वाखालच्या विविध चळवळींत सहभाग घेतलेले, त्याबाबतच्या विचारविनिमयात असलेले आम्ही आपले मित्र आहोत हे आपल्या पक्षपरिवारातही सुविदित आहे. तुमच्या आजच्या अत्यंत वादळी दिनक्रमातही तुम्ही कधी फोनवर-कधी प्रत्यक्ष आमच्याशी मित्रत्वाच्या हक्काने बोलत असता, ही आमच्यासाठी खूप आश्वासक व समाधान देणारी बाब आहे. आपल्यातल्या मित्रत्वाच्या या हक्कानेच आजच्या राजकीय माहोलात आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत. 

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ही आपल्याला मिळालेली जन्मजात विरासत. पण तिचे तुम्ही कधीही भांडवल केले नाहीत. बाबासाहेबांच्या घराण्यातील म्हणून लोक आदराने, भावनेपोटी आपल्याला एक वेगळे स्थान देतात. ते स्वाभाविकही आहे. तथापि, तुम्ही व्यक्तिशः त्यापासून दूर राहण्याची खटपट करत असता हा आमचा अनुभव आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत व्यापक रिपब्लिकन चळवळ एकजातीय घेऱ्यात अडकलेली असताना तुम्ही जाणीवपूर्वक तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न निरंतर करत आहात. गांधी-मार्क्स यांबाबत ठोकळेबाज विरोधाच्या वातावरणात गांधी-मार्क्स-आंबेडकर तसेच अन्य पुरोगामी विचारधारांतल्या पूरकत्वाची साथ करत आलात. आमच्यासारखे मित्र जोडलेत. त्यांच्यासह सामायिक सहमतीचे लढे उभारलेत. यासाठी तथाकथित स्वकियांच्या नाराजीची तुम्ही तमा बाळगली नाहीत. यामुळेच सामाजिक व कष्टकरी या दोहोंबाबत शोषित समूहाला सर्वंकष परिवर्तनासाठी सिद्ध करण्याची संधी व अवकाश आपल्या नेतृत्वाने तयार होतो आहे. देशात बहुसंख्येने असलेल्या सामाजिक व आर्थिक शोषितांना एकवटून आजच्या लोकशाही मतदानाच्या प्रक्रियेत बहुमताने राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नांत आपण निर्णायक ठरु शकता, ही भावना आमची आहे. 

वंचित, बहुजन आघाडी या आपल्या प्रयोगाची दिशाही तीच असावी, अशी आमची अपेक्षा आहे. पायाला भिंगरी लावून ज्या रीतीने गेले वर्षभर आपण विविध जातसमूहांना भिडत आहात, त्यांच्यात सत्ताकांक्षा जागृत करत आहात हे अत्यंत स्पृहणीय आहे. या जातसमूहांच्या आकांक्षा संकुचिततेकडे न जाता आपल्या जातिअंताच्या मोहिमेचा पुढचा टप्पा या नात्याने व्यापक सामाजिक-आर्थिक शोषिततेचे व्यापक भान त्यांना आपण देतच असणार यात शंका नाही. आपल्या प्रचंड संख्येने होणाऱ्या सभा, त्यातील लोकांची ऊर्जा पाहता एक नवीन सामाजिक-राजकीय घटित आपल्या नेतृत्वाखाली उदयास येत आहे, याविषयी आम्हालाच काय आजच्या सत्ताधारी वा विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आपली भूमिका काय राहणार याकडे सगळा महाराष्ट्र डोळे लावून आहे. 

आपली चळवळ लांबपल्ल्याची आहे. मात्र तातडीने येणाऱ्या निवडणुका हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा भाग झाला आहे. भाजपच्या रुपाने संघाचे फॅसिस्ट सरकार आज भारतीय लोकशाहीच्या उरावर बसले आहे, ते तातडीने खाली उतरवणे हे आज सर्व लोकशाहीवाद्यांसमोर कळीचे आव्हान बनले आहे. आपल्या भाषणांतून संघाच्या या फॅसिझमवर जे प्रचंड आघात होत असतात ते त्यामुळेच. लोकशाहीवादी भांडवली पक्षांची साथ न घेता केवळ आपल्या कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके आदि दुबळ्यांच्या संघटनाद्वारे त्यांचा पाडाव व्हायला हवा याविषयी आपल्या कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र वस्तुस्थिती केवळ आपल्या ताकदीवर फॅसिझमचा पराभव करु शकतो ही नाही. तुम्हाला मिळत असलेला प्रचंड पाठिंबा संघटनात्मक पातळीवर स्थिर होऊन मतांत परिवर्तीत होण्याची त्यात क्षमता जरुर असली तरी तेवढा अवधी आज आपल्याकडे नाही. या दोन-तीन दिवसांत निवडणुका जाहीर होतील. अशावेळी भाजपचा पराभव ही क्रमांक एकची बाब करुनच आपल्याला निवडणुकांतले डावपेच ठरवणे भाग आहे. 

तुमची जाहीर भूमिका काँग्रेसशी अनेक बाबतीत मतभेद वा तीव्र विरोध असला तरी सहकार्याची आहे. भाजप हा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि त्याला आधी संपवला पाहिजे, हे आपल्या मनाशी स्पष्ट आहे, हेच त्यातून उघड होते. मात्र त्यासाठी तुमच्या अटी आहेत. जागांच्या आणि संघाला कायदेशीर चौकटीत आणण्याचे त्यांनी जाहीर करण्याबाबतच्या. काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वर्गचरित्राविषयी आपण सहमतीतच आहोत. आजवर आपले लढे त्यांच्या विरोधातच होते. पुढेही राहतील. त्यांचे अधिकृत धोरण आणि त्यांच्या नेत्यांचा व्यवहार यातील अंतर आपल्याला सुपरिचित आहे. उद्या ते सत्तेवर आले तरी त्यांच्याशी लढावेच लागेल याविषयी आपल्या कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र त्यांच्या काळात लोकशाही लढ्यांना जो किमान अवकाश होता तो मूळासकट नष्ट करण्याची भाजपची खटपट आपण रोज अनुभवत आहोत. संघ पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान, निवडणुका राहतील की नाही, ही आपल्या सगळ्यांसमोर भीती आहे. जपान्यांच्या हल्ल्याविरोधात परस्परांचे कट्टर शत्रू असलेले माओ व चैंग कै शेक चीनमध्ये एकत्र येतात. हिटलरच्या फॅसिझमला परतवण्यासाठी आधी एकमेकांच्या विरोधात लढणारे रशिया व इंग्लंड एकत्र येतात. ही उदाहरणे लक्षात घेता भारतात फॅसिझमला गाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या भांडवली पक्षांसह अन्य लोकशाहीवादी शक्तींची कार्यक्रमाधारित एकजूट उभारणे गरजेचे आहे. काँग्रेसशी सहकार्य करण्यासाठी आपण अटी ठेवताना ही मूळ भूमिका आपणास मान्य असणारच. 

आपल्या अटी मान्य करुन काँग्रेसने आपल्याशी एकजूट करावी, अशीच आमचीही अपेक्षा होती. तथापि, एकजुटीबाबत अनुकूल असतानाही तुमच्यात चर्चा होऊन काही पुढचे पाऊल पडत नाही, याबाबत आम्ही चिंतित होतो. मात्र काँग्रेसला २८ फेब्रुवारीची आपण जी अंतिम मुदत दिलीत, त्याला वंचित बहुजन आघाडीचा राज्यभर सुसाट सुटलेल्या वारुची दखल घेत दोन्ही काँग्रेसने संयुक्तरित्या आपल्याला पत्र लिहून जो प्रतिसाद दिला, त्यामुळे कोंडी फुटायला एक अवकाश तयार झाला आहे असे आम्हाला वाटते. ४ जागा नक्की, वाटाघाटीत त्या वाढू शकतात आणि संघाविषयीचे आपल्याला अपेक्षित निवेदन हे ठोस पाऊल पडले असे आम्हाला वाटते. आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करुन चर्चेला बसावे, त्यातून लोकसभेच्या जागांविषयी तद्वत विधानसभांबाबतही आताच आश्वासन घ्यावे. महत्वाचे म्हणजे दलित, कष्टकरी, वंचितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे लेखी अभिवचन घ्यावे. त्याची पूर्तता न झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपला संघर्ष अटळ आहे, याची आताच त्यांना नोंद द्यावी. 

या सहकार्यामुळे, युतीमुळे भाजपला रोखण्याच्या दिशेने दमदार पाऊल पडेल. त्यातून जे आश्वासक वातावरण तयार होईल त्यातून आपल्या समूहांची प्रेरणा वाढेल आणि आपल्यालाही संघटना बांधणीसाठी उसंत मिळू शकेल. 

आपण याचा विचार करावा, हे विनम्र आवाहन. 

कोणत्याही स्थितीत आपल्या स्वतंत्र उभे राहण्याने भाजपरुपी फॅसिझमला मदत होणार नाही, हे आपल्या मनाशी नक्की असणार याची आम्हा मित्रांना खात्री आहे. 

आपल्या जोमदार वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा! 

आपले,

भारत पाटणकर, मिलिंद रानडे, उल्का महाजन, सुरेश सावंत

Thursday, February 7, 2019

अपना बाजारच्या गोष्टीचे तात्पर्य

रुढ अर्थाने खातूभाईंच्या (गजानन खातू) ‘अपना बाजारची गोष्ट’ या पुस्तकाचे हे परीक्षण वा परिचय नाही.  असा परिचय झाल्यास तो आनुषंगिक परिणाम समजावा. या पुस्तकातील मला भावलेल्या, शिकवणाऱ्या व अधोरेखित करावे असे वाटलेल्या काही मुद्द्यांकडे वाचकांचे लक्ष वेधावे आणि त्यांनी त्या मुद्द्यांच्या अधिक विवेचनासाठी मूळ पुस्तक वाचण्यास उद्युक्त व्हावे, हा मर्यादित हेतू या लेखाचा आहे. शीर्षकात नमूद केलेल्या ‘तात्पर्य’ शब्दाची जबाबदारी माझी. लेखक वा वाचकांचे वेगळे मत असू शकते.
समाजवादी-पुरोगामी चळवळीत वय व समज या दोन्ही बाबतीत ज्येष्ठ असलेले खूप कमी लोक आता आहेत. त्यातील एक खातूभाई. या ज्येष्ठाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वय-समजाला अजिबात न दबकता त्यांच्याशी बोलता येते. त्यांना ज्येष्ठ मानणाऱ्या काहींशी बोलताना थोडे दबकायला होते. पण खातूभाईंशी थेट आपल्या वयाच्या पातळीवरुन दोस्ती करता येते. भिन्न मते मांडायला वा त्यांच्या मतावर प्रश्न उभे करायला किंचितही त्यांची ज्येष्ठता आड येत नाही. उलट आपल्या म्हणण्याचे स्वागत होऊन त्याबद्दल आज ना उद्या अजून काही नवे समज वाढवणारे त्यांच्याकडून मिळेल याची खात्री असते. वयाने जुने होत असताना वर्तमानाच्या तारांचे नवनवे झंकार ऐकत भविष्याचा वेध घेण्याची त्यांची वृत्ती व क्षमता अनुभवताना आपल्या म्हातारपणाविषयी मनात एक लोभस चित्र तयार होते. खातूभाईंचे खाणे, राहणे, बोलणे यातला रस पाहता ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हा कविवर्य तांबेंचा स्वतःपुरताच अनुभव असावा असे वाटू लागते.
अशा या खातूभाईंचे वैचारिक लेखन वाचले होते. पण ‘अपना बाजार’शी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधाचा केवळ संदर्भच मला होता. त्याचे तपशील ठाऊक नव्हते. या पुस्तकामुळे ती उणीव दूर झाली. त्यांच्या व्यक्तित्वाची आणि अपना बाजार या एका अत्यंत महत्वपूर्ण सहकाराच्या प्रयोगाची घडण कळायला मदत झाली.
१९६८ ते १९८२ या १४ वर्षांतली, त्यांच्या वयाच्या २७ ते ४२ या कालखंडातली ही घडण ते रेखाटतात तब्बल ३६ वर्षांनी. ‘हे पुस्तक अपना बाजारचा इतिहास नाही. १९४८ ते १९६८ पर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीची त्यात नोंद नाही. १९८२ नंतरच्या कालखंडाचीही चर्चा नाही. त्यामुळे अनेकांना ते अपुरे वाटेल.’ असा ‘कबुलीजबाब’ ते सुरुवातीलाच देतात. पण ‘निरोप घेताना’ या शेवटाकडच्या प्रकरणात ते म्हणतात- ‘ही १४ वर्षे अविरत कामाची होती. प्रतिवर्षी काही ना काही घडत होते. जणू बाल्यावस्थेतून युवावस्थेत वाटचाल होताना जडणघडणीची वाटचाल.’ त्यामुळे या पुस्तकात अपना बाजारचा संपूर्ण इतिहास नसला तरी त्यात नोंदवलेल्या काळाचे मोल मोठे आहे.
पर्सोनेल मॅनेजमेंट हा विषय असलेले खातूभाई ‘क्रॉम्पटनच्या भव्य कारखान्यातली’ नोकरी सोडून अपना बाजारच्या ‘नायगावच्या पत्राशेडच्या कार्यालयात’ येतात.  ते म्हणतात- ‘पण मला त्याचे फारसे वाटले नाही. कारण ही आपली माणसं होती. आपल्या विचारांची होती. क्रॉम्प्टनमधले कामगारविरोधी वातावरण मला कधी आवडले नाही. आपल्या विचारांच्या क्षेत्रात यायला मिळाले याचाही आनंद होता.’
ज्या परिसरात अपना बाजार उभे राहत होते, तो परिसर नायगाव, दादरचा. खातूभाई या परिसराचे व्यक्तित्व रेखाटताना लिहितात- ‘नायगाव हे कामगार व राजकीय चळवळीचं केंद्र. अशोक मेहतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कामगार चळवळीने इथे सामाजिक कामाची पायाभरणी केली. (त्यांच्याच प्रेरणेने अपना बाजार सुरु झाले.) जी. डी. आंबेकरांनी इंटकची उभारणी केली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांनी लाल बावटा उभारला. त्यामुळे नायगावच्या सामाजिक राजकीय जीवनात समाजवादी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. त्यामध्ये नंतर शिवसेनेची भर पडली.’
अपना बाजारच्या टीमचे निर्विवाद कॅप्टन असलेले दादा सरफरे आणि त्यांचे सहकारी या सर्व प्रवाहांना कसे यशस्वीपणे हाताळत होते त्याची नोंद खातूभाई करतात. अपना बाजारची अध्वर्यू असलेल्या या मंडळींची पाळेमुळे त्या भागातील सामाजिक-राजकीय जीवनात खोल रुतलेली होती. नायगावमध्ये आदराचे स्थान असलेल्या दादा सरफरेंबद्दल लिहिताना ते म्हणतात- ‘दादांच्या घरी गेले की दादा बहुधा नायगावमधील कुठल्या तरी मर्तिकाला जाऊन आलेले असत. …बहुधा त्या काळात नायगावमधील एकही मर्तिक असे नसेल ज्याला दादा गेले नाहीत. …दादांच्या या चौफेर जनसंपर्कामुळेच दादा नायगावचे किंगमेकर झाले.’ दादांच्या बरोबरीने अपना बाजार उभारणीतले सहकारी, पुढे आमदार झालेले व आमदार होऊनही शेवटपर्यंत एकाच खोलीच्या घरात राहणारे एन. के. सावंत यांचाही नायगावच्या सामाजिक-राजकीय जीवनावर ठसा होता. अपना बाजारचे बहुतेक कार्यकर्ते प्रजा समाजवादी पक्षाचे. संस्थेच्या कामाचा मोबदला न घेणारे, मासिक बैठकीचा प्रवासभत्ताही पार्टीला देणारे, व्यापाऱ्यांच्या दिवाळी भेटी घरी न स्वीकारता ऑफिसमध्ये जमा करायला लावणारे हे पदाधिकारी. या सर्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या धगधगत्या काळातील प्रेरक, ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या विलक्षण जिद्दीचे कोंदण अपना बाजारच्या घडणीला मिळाले.
या चबुतऱ्यावर अपना बाजारची इमारत आकार घेत होती. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व पुढे जनरल मॅनेजर म्हणून खातूभाईंचा सहभाग सुरु झाला तो या माहोलात, या गतीत. ते लिहितात- ‘पाण्यात पडलेला माणूस जसा जिवाची बाजी लावून हातपाय मारतो तसे आम्ही करत होतो.’ फिरती बससेवा, बोनस स्टॅम्प योजना, विजयी भांडी बचत योजना, दिवाळी भेट, जनता मिठाई अशा अनेक यशस्वी तर काही अयशस्वी उपक्रमांद्वारे तसेच अनेक क्षेत्रांत संचार करत अपना बाजार शिकत पुढे जात होते. या प्रयोगांवेळचे अनेक मासलेवाईक अनुभव-जिंकल्याचे, पडल्याचे, फसल्याचे या पुस्तकात वाचायला मिळतात.
खातूभाईंच्या कारकीर्दीतील या सर्व प्रयत्नांचे फलित नोंदवताना ते लिहितात-‘१९६८ ते १९८२ या चौदा वर्षांत अपना बाजारचा कायापालट झाला. १९४८ साली नायगावमध्ये एक धान्य दुकान सुरु करणाऱ्या नायगाव कामगार ग्राहक सहकारी संस्थेचे १४ शाखा आणि २५ प्राथमिक संस्था सदस्य असलेल्या मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक संस्थेत रुपांतर झाले. अन्नधान्याबरोबर रेशनिंगचे वितरण, कापड दुकान, औषध दुकान आणि औषध भांडार असा विस्तार झाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत संस्थेची ओळख निर्माण झाली.’ नायगावमधील अपना बाजार मागोमाग वाशी, मुलुंड, अंधेरी या ठिकाणी स्वतःच्या इमारतींत अपना बाजार विस्तारला. याच काळात संस्थेने सरकारचे भागभांडवल व कर्जाची संपूर्ण परतफेड केली. अशी परतफेड करणारी संस्था हे अपना बाजारचे वेगळेपण …या तसेच आणखी बऱ्याच मिळकती ते पुढे नोंदवतात.
या यशाची गुरुकिल्ली काय? ..याचं सरळसोपं उत्तर नाही आणि तसं ते नसंतही असे ते म्हणतात. मात्र काही ठळक गोष्टींची, वैशिष्ट्यांची ते नोंद करतात. उदा. पदाधिकारी व अधिकारी यांची साप्ताहिक बैठक. त्यामुळे निर्णयप्रक्रिया जलद व्हायला तसेच पदाधिकारी व अधिकारी यांतील संवाद वाढायला मदत झाली. अपना बाजारचे वार्षिक अहवाल फक्त कायद्याच्या पूर्ततेसाठी नसत तर त्यातून सभासदांना आपली संस्था खरोखरी कशी चालते ते कळण्यासाठी असत. त्यात कारणमीमांसा असे. सभोवतालच्या घडामोडींचा (उदा. १९७१ चे बांगला देशाचे स्वातंत्र्य युद्ध), सरकारी धोरणांचा या अहवालात तपशील असे. खातूभाई म्हणतात- ‘अपना बाजारचे अहवाल म्हणजे वैश्विक विचार आणि स्थानिक कृती याचा वस्तुपाठच आहेत.’ अपना बाजार हे समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम आहे व सहकारी चळवळ परिवर्तनासाठी आहे हे भान कायम ठेवले. परिणामी राजकीयदृष्ट्या कायम एकत्र राहिलेल्या या मंडळींनी संस्था चालवताना पक्षीय संकुचितता येणार नाही याची काळजी घेतली.
परिवर्तनवादी संस्थाचालक आणि त्याच दृष्टिकोणाचा उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेला व्यवस्थापक एकत्र आल्याने धंदा, परिवर्तनाची चळवळ व कामगारांचे हितसंबंध यांची कशी समतोल सांगड घातली जाते, तुटू न देता पेच कसे सोडवले जातात याचे नमुने या पुस्तकात आहेत. अपना बाजारच्या कामगारांनी शिवसेनेची युनियन आणली तेव्हा तिला मान्यता द्यायचा प्रश्न तयार झाला. खाजगी कारखान्यात मालकधार्जिणी युनियन असायला आपला विरोध असतो. सहकारी क्षेत्रही याला अपवाद असता कामा नये. या भूमिकेतून कामगारांच्या युनियन निवडण्याच्या अधिकाराची खातूभाईंनी साथ केली. संस्थाचालक नाराज झाले. पण त्यांनी आपला आग्रह सोडून अखेर या युनियनला मान्यता दिली.
कामगारांचे अधिकार आणि धंद्याचे हित याबाबत कामगार संघटनांतील कार्यकर्ते व नेत्यांची भूमिका हा मोठा प्रश्न आजही आहे. या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार करण्याचे व तसे कामगारांचे शिक्षण करण्याचे काम कॉ. डांगेंनी केले. पण ती परंपरा पुढे चालवणारे नेते पुढे कमी राहिले. जवळपास दुर्मिळ आहेत. खातूभाई या परंपरेचे वाहक आहेत. कामगारांच्या योग्य मागणीसाठी संस्थाचालकांशी संघर्ष आणि संस्थेच्या व पर्यायाने कामगारांच्या भविष्यातील अहिताला रोखण्यासाठी युनियनच्या मागणीला विरोध यात खातूभाईंनी कधी तडजोड केली नाही.
अपना बाजारचा सेवक वर्ग मुख्यतः बहुजन समाजातला. कारागिरी, शेती आणि कष्ट करणारा. पारंपारिकपणे उच्चवर्णीयांचा प्रभाव असलेल्या व्यापारात बहुजनसमाजातील नव्या पिढीत व्यापार हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे काम खातूभाईंच्या पुढाकाराखाली अपना बाजारमध्ये झाले. अपना बाजारच्या चळवळीचे मापन करताना या social engineering ची दखल घेणे गरजेचे आहे, असे खातूभाई म्हणतात ते रास्तच आहे.
अपना बाजारच्या सेवकांना हाऊसिंग बोर्डाच्या जागा मिळाव्यात यासाठी संस्थेने प्रयत्न केले. आर्थिक अडचणींमुळे पुढे न येणाऱ्या सेवकांना ही संधी कशी महत्वाची आहे, त्यासाठी सोने विका, पतपेढीतून कर्ज घ्या असे समजवावे लागे. या कर्जाचा न पेलणारा भार संस्थेने उचलावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खातूभाई सेवकांना देत. यामुळे या सेवकांचे आयुष्य कसे बदलून गेले याची उदाहरणे खातूभाईंनी पुस्तकात दिली आहेत. या सेवकांच्या करवी झालेल्या, सामान्य माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास वाढवणाऱ्या घटनाही ते नोंदवतात. सेवकांना शिकवणारे खातूभाई ‘भोगलेंमुळे मला शिक्षणापलीकडच्या व्यावहारिक शहाणपणाचे दर्शन झाले.’ असेही नमूद करतात.
इतकं सगळं करणाऱ्या खातूभाईंनी अपना बाजार यशाच्या शिखरावर असताना आणि कर्तृत्वाची आणखी भरारी घेण्याचे वय असताना, संस्थेच्या वाढीबरोबरच मोठ्या प्रमाणात वेतनवाढीची शक्यता असताना, विशेषतः मुले लहान व एकटा कमावता असताना अवघ्या ४२ व्या वर्षी अपना बाजार का सोडले?
पदाधिकाऱ्यांबरोबर मतभेद नव्हते. कामकाजात पेचप्रसंग नव्हते. सेवकांशी उत्तम संबंध होते. अशावेळी काहीही कारण नसताना मी अपना बाजार सोडले हे आपल्या स्नेही, सहकाऱ्यांना शेवटपर्यंत पटले नाही, असे खातूभाई म्हणतात. या पुस्तकात काही कारणे, त्यावेळची त्यांची मनःस्थिती तसेच भूमिका ते नोंदवतात.
संस्था उत्तम अवस्थेत असताना, सर्वांशी सलोख्याचे संबंध असताना बाहेर पडावे हे उत्तम, हे पहिले कारण. आपल्याकडून होण्यासारखे, निर्मिती करण्यासारखे जे होते ते झाल्यावर केवळ दैनंदिन कामात अडकून पडावे असे वाटत नव्हते. असे अडकून पडणे संस्थेच्या हिताला तसेच व्यक्तिगत विकासाला अडथळा ठरणार होते. अशावेळी नव्या नेतृत्वाला संधी देऊन नव्या दिशेच्या शोधाच्या शक्यता निर्माण करणे, हे दुसरे.
संवेदना पूर्ण शाबूत ठेवून वस्तुनिष्ठपणे जीवनाला सामोरे जाण्याच्या (छे! जीवनाला वळविण्याच्या) या निःसंग स्थितप्रज्ञतेमुळेच त्यांच्या निरोपाची घटना अशी असू शकते – ‘प्रत्येक माळ्यावरती सर्वांना भेटत चार मजले उतरलो आणि हिंदमाताच्या बस स्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहत उभा राहिलो.’
अपना बाजार सोडल्यावर पुढे काय? ऐन उमेदीच्या काळात गतिमान आयुष्याला ब्रेक लागणार होता. पण त्याच्यावर मात करणारे अपना बाजारच्या बाहेर सामाजिक कामाचे एक बृहद वर्तुळ मी तयार केले होते, असे खातूभाई सांगतात. अपना बाजारमध्ये असतानाच राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, विषमता निर्मूलन शिबिरे, नामांतर आंदोलन, जेपी आंदोलन यांत त्यांचा सहभाग असे. या सामाजिक-राजकीय कामातून अनेक आव्हाने पुढे येत होती. त्यामुळे अपना बाजारनंतर नोकरी स्वीकारली नाही असे खातूभाई म्हणतात. रिटेल मॅनेजमेंटमध्ये कन्सलटन्सी, व्याप न वाढवता गरजेपेक्षा जास्त कमाईच्या मागे लागायचे नाही असे ठरवून १९८२ पासून ‘सार्वकालिक कार्यकर्ता न होता सर्वकाळ सार्वजनिक जीवनात वावरलो.’ असे ते नोंदवतात.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात सहकारी चळवळीच्या भवितव्याविषयी खातूभाईंचे चिंतन आहे. हे प्रकरण मूळातूनच वाचायला हवे. या चिंतनाची प्रत कळावी म्हणून काही सूत्रे नोंदवतो.
  • औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आर्थिक विषमतेच्या कष्टकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांपासून सोडवणूक करायला शासनव्यवस्था पुरेशी सक्षम नव्हती. अशावेळी या दुर्बल घटकांनी सहकारी चळवळीचा आधार घेतला. हे जगभरच्या विकसनशील तसेच विकसित देशांत घडले.
  • आता औद्योगिक भांडवलशाहीची जागा वित्तीय भांडवलशाहीने घेतली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि सेवाक्षेत्रातील रोजगार घटतो आहे. संघटित क्षेत्र मोडल्यामुळे संघटित कामगार चळवळ संदर्भहिन होत आहे. तशीच आजवरची सहकारी चळवळही संदर्भहिन होत आहे.
  • सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचे अधिकार जसे रजिस्ट्रारकडे आहेत, तसेच लहानसहान हाऊसिंग सोसायट्यांची निवडणूकही रजिस्ट्रारच घेत आहे. मग या सगळ्यात लोकसहभाग आणि सहकार राहिला कोठे?
  • शेतीसमाज, औद्योगिक कष्टकरी समाज आणि मध्यमवर्ग या स्थिर व आंतरिक नाते असलेल्या समूहांचे स्थलांतर सुरु झाले. असा विखंडित समूह परस्पर सहकार्याने सहकारी संस्था कशा उभ्या करु शकेल?
  • तरीही सहकारी चळवळीला भविष्य प्रदान करणारी नवी परिस्थिती आता तयार होत आहे. कोणत्याही पेचप्रसंगातून बाहेर पडू शकेल अशी लवचिकता दाखवणाऱ्या भांडवलशाहीला २००८ नंतरच्या अरिष्टातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्थव्यवस्था ठीकठाक करण्याच्या सर्व प्रचलित उपाययोजना निरुपयोगी ठरत आहेत. अशावेळी सहकारी अर्थव्यवस्था प्रस्थापित स्पर्धेच्या मूल्याला, प्रस्थापित नफ्याच्या संकल्पनेला आणि प्रचलित भांडवलीकरणाच्या प्रक्रियेला पर्याय देऊ शकते.
तथापि, यासाठी सहकाराचे नवे प्रारुप सिद्ध करण्याची गरज पुस्तकाच्या अखेरीस ते नमूद करतात.
-सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, फेब्रुवारी २०१९)
अपना बाजारची गोष्ट
गजानन खातू
अक्षर प्रकाशन
पृष्ठेः १९० | मूल्यः २०० रुपये
अप