Tuesday, July 18, 2023

अण्णा भाऊ साठे : जीवन, विचार व साहित्य


आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरील चिंतन कार्यक्रमात 'अण्णा भाऊ साठेः जीवन, विचार व साहित्य' या विषयावरील १७ ते २० जुलै २०२३ या कालावधीतील ४ छोटेखानी भाषणांची ही टिपणे.

अण्णा भाऊ साठे : वारसा आणि जीवन

रुढ अर्थानं औपचारिक शिक्षण न झालेल्या, उपेक्षित समाजात जन्मलेल्या माणसाचं साहित्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात लागतं, त्यांच्या साहित्याचा जगभर गौरव होतो, रशियासारख्या देशात त्यांचा पुतळा उभा राहतो, असे अण्णा भाऊ साठे आपल्या राज्याला-देशाला ललामभूत आहेत. मराठी मनं थरारून टाकणारी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातली त्यांची शाहिरी कामगिरी लक्षात घेता ते मराठी जगताचा मानबिंदू ठरतात.
वास्तविक, प्रत्येक मनुष्याची प्रतिभा विकसित व्हायला समान अवसर मिळायला हवा. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनेनं तसेच आपल्या देशाच्या संविधानानं ते ठळकपणे नमूद केलं आहे. मात्र आर्थिक स्थिती आणि विशेषकरुन जातिव्यवस्था हे घडू देत नाही. भारतीय उपखंडाला विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेनं जराजर्जर केलं. आपले कायदे, योजना यांनी आज तुलनेनं फरक पडला असला तरी त्यातून आपली पूर्ण सुटका अजून झालेली नाही. जोवर लग्न करताना माणसं जातीतच स्थळ शोधतात तोवर जात गेली असं म्हणता येणार नाही.
माणसांना जखडून टाकणाऱ्या जातींच्या या उतरंडीत अगदी तळाला असलेल्या, एकेकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या मातंग समाजात अण्णा भाऊ जन्माला आले. त्यांच्या जन्माच्या जवळपास पाऊण शतक आधी महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत शिकलेली मुक्ता साळवे मातंग समाजातली. मुक्ताचा ‘ज्ञानोदय’मासिकामध्ये १ मार्च १८५५ ला "मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध" या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात अस्पृश्यांना वेद, धर्मग्रंथ वाचायला मनाई करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना ती ठणकावते – “याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग!” या निबंधात मुक्तानं तत्कालीन अस्पृश्य मानल्या गेलेल्या समूहांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून त्यांना अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.
मुक्ताच्या आणि पुढं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेचे, लढ्याचे वारसदार अण्णा भाऊ आहेत. त्यांच्या जन्माच्या वेळी मुक्तानं वर्णन केलेली अवस्था फारशी बदललेली नव्हती. इंग्रजी राजवटीच्या काळात शहरात काही प्रमाणात उद्योगधंदे उभे राहत होते. त्यामुळे गावाकडं रोजगाराविना उपासमार होणारे आणि जातीचा जाच सोसणारे समुदाय मुंबईची वाट धरु लागले. अण्णा भाऊंचे वडील आधीच मुंबईला आले होते. त्यांच्या मागोमाग अण्णा भाऊंसह त्यांचं सर्व कुटुंब मुंबईला आलं. कसं? तर चालत. प्रवासासाठी पैसे नाहीत. म्हणून मजल दरमजल करत, मध्ये लागलेल्या शहरांत काही काम करुन अन्न मिळवत ते मुंबई नगरीत पोहोचले.
या मुंबई नगरीत ते मजूर वस्तीत राहतात. वाढतात. तिथल्या कामगार लढ्यांत सहभागी होतात. शोषणमुक्तीच्या लढ्याचं शास्त्र सांगणाऱ्या मार्क्सवादाची दीक्षा त्यांना या कामगार लढ्यांत मिळते. या नवविचाराच्या सहाय्यानं शोषितांच्या दुःखाची गाणी, कथा, कादंबऱ्या, पोवाडे ते लिहितात. लोकनाट्यांतून त्यांच्या वेदनेला सादर करतात. भाषावार प्रांत रचना होताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभं राहतं. त्या आंदोलनात शाहीर अमरशेख, गवाणकर यांच्यासह अण्णा भाऊ आपल्या शाहिरी कलापथकाद्वारे उभा महाराष्ट्र जागवतात. ‘आनंद भुवन तू भूवरी भूषण भारतवर्षा’ असं महाराष्ट्राचं गौरव गान गातात.
सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावात १ ऑगस्ट १९२० रोजी जन्माला आलेले प्रतिभावान साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ता असलेले अण्णा भाऊ साठे मुंबई या त्यांच्या कर्मभूमीत १८ जुलै १९६९ ला वयाच्या ४९ व्या वर्षी कारकीर्दीच्या ऐन उमेदीत कायमचा विसावा घेतात.
...........

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, दिवसाही पुरेसा उजेड नसलेल्या झोपडीत, रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात अण्णा भाऊ साठेंनी आपलं बहुतेक साहित्य लिहिलं. ते प्रचंड आहे. वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या ७ कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. त्यांनी लघुकथा लिहिल्या. त्यांचे २२ कथासंग्रह आहेत. लोकनाट्यासाठी लिहिलेले वग, नाटिका यांची १६ पुस्तकं आहेत. त्यांनी केलेल्या रशियाच्या प्रवासाचं वर्णन करणारं एक पुस्तक आहे. याशिवाय त्यांची गीतं, छक्कड, लावणी, पोवाडे हे पद्यलेखन बरेच आहे.
त्यातल्या काही कृतींची नावं पाहू. अकलेची गोष्ट, अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरची भुतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकिरा,फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, शेटजींचे इलेक्शन, संघर्ष, सुगंधा, सुलतान. ...अशी ही यादीच दमछाक करणारी आहे. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या अधाश्यासारख्या वाचल्या जात. त्यांची शैली, निसर्गवर्णनं, व्यक्तिचित्रणं, कथानकांतले वळसे वाचकाला खिळवून ठेवतात.
त्यांच्या काही कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. ‘आवडी’ कादंबरीवर ‘टिळा लावते मी रक्ताचा’, ‘माकडीचा माळ’ वर ‘डोंगरची मैना’, ‘चिखलातील कमळ’ वर ‘मुरली मल्हारी रायाची’, ‘अलगूज’ कादंबरीवर ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’, तर वैजयंता, वारणेचा वाघ, फकिरा या कादंबऱ्यांवर त्याच नावाने सिनेमे निघाले. वैजयंता सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
अण्णा भाऊंच्या साहित्यात काय आहे आणि त्याचे मोल काय हे समजून घेण्यासाठी त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहू. त्यात खांडेकर म्हणतात, "समाजाच्या तळाच्या थरातील माणसं, घटना आणि जीवन हे सारं अण्णा भाऊंनी अनुभवलं आहे, पचविलं आहे. माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आरामखुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात. तसं अण्णा भाऊंचं नाही. या थरातच त्यांचा जन्म झाला. ...टीपकागद जसा झटकन ओली अक्षरं टिपतो, त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातली दलितांच्या आयुष्यातली आसवं अण्णा भाऊंच्या कलावंत मनाने टिपून घेतली आहेत. नुसती आसवंच नाहीत तर त्यांच्या आकांक्षा. त्यांचे राग-लोभ सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे. या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत."
अनेक नामवंत लेखक-कलावंत अण्णा भाऊंची दखल घेत पुढं जातात. पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा ‘तीन पैश्यांचा तमाशा’ हे मुक्तनाट्य अण्णा भाऊंना अर्पण केलं आहे. अण्णा भाऊंचे ‘लाल बावटा कलापथका’तले सोबती शाहीर अमरशेख म्हणतात – ‘शाहीर अण्णा भाऊंनी तमाशाचा वग लिहावा. आम्ही तो महाराष्ट्र जनतेपुढं ठेवावा आणि महाराष्ट्रीय जनतेनं, आबालवृद्धानं, धुंद मनानं त्याला डोक्यावर घेऊन नाचावं, हा मुळी अलीकडील काळात महाराष्ट्रीय कलेच्या क्षेत्रात पायंडाच पडून गेला आहे.’
‘आई’ या जगप्रसिद्ध कांदबरीचे लेखक मॅक्झिम गॉर्की. ते रशियातले. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सदा कऱ्हाडे अण्णा भाऊंवर गॉर्कीचा प्रभाव असल्याचं नोंदवतात. मात्र त्यांनी त्याचं अनुकरण केलं नाही, असाही निर्वाळा देतात. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ ला ऐतिहासिक कादंबरी संबोधून ते इतिहासाचं साधन मानतात.
अण्णा भाऊंच्या साहित्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा याआधी बरीच झाली आहे. पुढेही होत राहील.
..........

अण्णा भाऊ साठे यांचा साहित्य विचार

‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ हा आपल्याकडे वादाचा विषय राहिलेला आहे. त्याचे अनेक पदर आहेत. हे किंवा ते अशा दोनच पर्यायांत विचार करता कामा नये, असंही म्हटलं जातं. या वादाची चिकित्सा हा आताचा विषय नाही. अण्णा भाऊ साठे यांना यात कुठं बसवायचं? त्यांचा साहित्यविषयक विचार काय आहे? हे आपण पाहणार आहोत.
‘कलेसाठी कला’ या बाजूचे ते नव्हते, एवढं नक्की म्हणता येईल. याचा अर्थ त्यांचं साहित्य प्रचारकी होतं का?
‘हो’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही उत्तरं द्यावी लागतील. त्यांच्या मुक्तनाट्यांतले वग, पोवाडे हे प्रचारकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांची शाहिरी प्रचार करते. पण त्यांच्या कथा, कादंबऱ्या थेट प्रचारकी नाहीत. त्या मुळात कलात्मक रचना आहेत. या कलात्मकतेतून प्रतीत होणारा आशय हा समाजातल्या तळच्या, उपेक्षित विभागांच्या, स्त्रियांच्या वेदनेचं जळजळीत अंजन आपल्या डोळ्यांत घालतो. हे अंजन या पीडित-शोषित विभागांबद्दल आपल्या मनात करुणा जागी करतं. त्यांना त्यांच्या या अवस्थेतून मुक्त करण्याची जाणीव आणि प्रेरणा देतं. कलेनं अशी प्रेरणा देऊ नये, त्यामुळे त्यातलं सौंदर्य बाधित होतं अशी काही अट नाही. अण्णा भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे जे प्रचारकी पोवाडे, लावण्या त्यांनी लिहिल्या तेही कलेचे अव्वल नमुने आहेत.
उदाहरणादाखल 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड घ्या. मुंबईला येताना आपल्या प्रियेला निरोप देतानाचं कासावीस होणं. तिच्या कोमेजलेल्या कळीचं वर्णन, तिची समजूत काढतानाचे वायदे हे ज्या शब्दांत, प्रतिमांत अण्णा भाऊंनी गुंफलं आहे, त्याला तोड नाही. ती अत्युच्च विराणी आहे. पण ती स्त्री-पुरुष नात्यापुरती मर्यादित नाही.
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी म्हटल्याप्रमाणं “हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे. अण्णा भाऊंच्या छकडीतली मैना नितांत सुंदर आहे. तसाच हा बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग देखील सुंदर आहे. हा भाग आपल्याला मिळाला नाही. इतर महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली आहे असं अण्णा भाऊ सुचवतात. दोन जिवांची ताटातूट झाल्यावर काय होतं याचं समर्पक वर्णन या छकडीमध्ये आपल्याला दिसतं."
एका आत्मनिष्ठ नात्यातला भाव समग्रतेला भिडतो म्हणूनच आजही ही छक्कड ऐकल्यावर आपल्याला घायाळ व्हायला होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या प्रचाराचं गीत एवढ्यावर तिची बोळवण आपण करणार की उत्तम काव्यगुण असलेली श्रेष्ठ कलाकृती म्हणून तिचा सन्मान करणार?...याचा निर्णय ज्यानं त्यानं करावा.
केवळ प्रतिभेनं काम भागत नाही. उत्तम कलाकृती निर्माण होण्यासाठी प्रतिभेला कोणते आधार हवे असतात, याबद्दल खुद्द अण्णा भाऊ एके ठिकाणी म्हणतात – ‘प्रतिभेला सत्याचं, जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती हे शब्द निरर्थक आहेत. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. कल्पकता निर्बल होते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेला जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही.’
कलावंतानं भूमिका घेऊ नये, त्यामुळे कलेच्या आविष्कारावर परिणाम होतो, असा एक विचार प्रचारला जातो. अण्णा भाऊंचं उदाहरण याला पुष्टी देत नाही. ते प्रतिभावान होतेच. पण त्यांच्या प्रतिभेला हे भूमिकेचं कोंदण असल्यानं ते श्रेष्ठ कलावंत झाले.
..........

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायिका

जाती आणि त्यातलं स्त्रियांचं स्थान सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मडक्यांच्या उतरंडीचं रुपक योजतात. कथित उच्चतेच्या मान्यतेनुसार जातींची मडकी एकावर एक रचलेली आहेत. सगळ्यात वर सर्वोच्च मानलेल्या जातीचं. मग त्याखाली वरच्याहून दुय्यम पण खालच्यापेक्षा वरचं मानलेल्या जातीचं. अशी ही उतरंड आहे. या उतरंडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक जातीच्या मडक्यात दोन थर आहेत. वरचा थर पुरुषाचा तर खालचा स्त्रीचा. म्हणजेच प्रत्येक जातीत स्त्री पुरुषाच्या तुलनेत दुय्यम मानली गेली आहे. कथित सर्वोच्च जातीतली स्त्री त्या जातीतल्या पुरुषाहून कमी लेखली जाते आणि कथित तळच्या जातीतली स्त्रीही त्या जातीतल्या पुरुषापेक्षा कमतर मानली जाते. या कथित तळच्या जातीतल्या स्त्रीला तिहेरी जाच सोसावा लागतो. ती जातीनं तळची असल्यानं त्या जातीचे भोग तिच्या वाट्याला येतातच. शिवाय स्त्री म्हणून आपल्या जातीतल्या पुरुषांचं वर्चस्व, त्रास सहन करावा लागतो. तळच्या जातीतली आणि स्त्री असल्यानं ती साधनसंपत्तीपासून वंचित असते. तिला आपल्या मुलांच्या, कुटुंबाच्या पोषणासाठी मिळेल ती मजुरी, रोजगार करावा लागतो. ही मजुरी देणाऱ्या मालकांच्या शोषणाचा त्यांना सामना करावा लागतो.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायिका मुख्यतः या तळच्या विभागातल्या आहेत. त्या तिहेरी शोषणाचा मुकाबला करतात. डगमगत नाहीत. त्यांची जीवनप्रेरणा त्यांना चिवटपणे झुंजायला लावते. अण्णा भाऊंच्या साहित्याच्या बहुतेक अभ्यासकांनी त्यातल्या स्त्री चित्रणाविषयी हे निरीक्षण नोंदवलं आहे. तारा रेड्डी, प्रा. इंदिरा आठवले अण्णा भाऊंच्या साहित्यातल्या स्त्रियांना लढाऊ, आत्मविश्वासानं बहरलेल्या नायिका मानतात. आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड्या या गावगुंडाला शेवटी फुला ही नायिका त्याच्या रानातल्या घरात कोंडून, जाळून मारते. बापानं आजारी, अयोग्य नवऱ्याशी लग्न केलं म्हणून त्याला सोडून जाणारी बरबाद्या कंजाऱ्याची मुलगी आणि तिच्या भल्यासाठी समाजाचं वैर ओढवून घेणारा बरबाद्या, यातून चुकीचे संबंध फेटाळणाऱ्या नायिकेचं दर्शन घडतं.
अण्णा भाऊंच्या विचार व साहित्याचे अभ्यासक महादेव खुडे यांच्या मते अण्णा भाऊंच्या नायिकेचं खरं विस्तृत जीवन त्यांच्या कादंबऱ्यांतून कळतं. त्यांच्या काही कादंबऱ्या तर नायिकाप्रधान आहेत. चित्रा, वैजयंता, चंदन, चिखलातील कमळ, फुलपाखरु, रत्ना, आवडी, टिळा लाविते मी रक्ताचा या कादंबऱ्यांमधल्या नायिका स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या प्रातिनिधिक नायिका आहेत. तर अलगूज, राणगंगा, संघर्ष, अहंकार या प्रेमकथांमधल्या नायिका उदात्त प्रीतीचं दर्शन घडवतात. माकडीचा माळ मधली दुर्गा, चंदन, आवडी, चित्रा, वैजयंता, रत्ना, माझी मैनामधली मैना, निखारातली फुला यांनाच खऱ्या अर्थानं अण्णा भाऊंच्या प्रातिनिधिक नायिका मानावं लागेल असं खुडे म्हणतात. त्याचं कारण नोंदवताना ते म्हणतात – या नायिकांचं वर्णन करताना अण्णा भाऊंनी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीनं सन्मानाचा, आदराचा दर्जा दिला आहे. अण्णा भाऊंच्या नायिका नाजूक कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. त्या रणरागिणी आहेत. खांद्यावर बंदूक घेऊन पुरुषांच्या बरोबरीनं ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी मंगला इथं आढळते. पैलवान भावानं केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी घरदार सोडून रामोशी समाजातल्या प्रियकराची साथ करणारी चौगुल्याची आवडी इथं सापडते. दुर्दैवी मजूर स्त्रीचं जीवन जगताना झोपडपट्टी दादाबरोबर लढणारी चंदन आढळते. भटक्या जमातीतली वासनेनं बरबटलेल्या रानरेड्याशी झुंजणारी दुर्गा आपल्याला भेटते.
अशा प्रकारे कष्टकरी-शोषित स्त्रियांना आपल्या साहित्यातल्या नायिका बनवून त्यांना संघर्षाच्या मैदानात उतरवणं हे अण्णा भाऊ साठे यांचं अनन्य वैशिष्ट्य आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
Like
Comment
Share

Tuesday, July 4, 2023

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

काल वर्षावासास प्रारंभ झाला. आमच्या बुद्धविहारात त्यानिमित्ताने कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर मी राहत होतो त्या गल्लीतल्या एक महिला येऊन मला भेटल्या.

“तुम्ही येणार हे कळल्याने भेटायला आले. तुम्हाला काही सांगायचे आहे. हे बरोबर नाही. यावर काही तरी केलं पाहिजे.” त्या म्हणाल्या.
“हो. बोला ना. काय झालं?” मी म्हणालो.
त्या म्हणाल्या, “विश्व हिंदू परिषदेने आम्हाला वस्त्यांत ट्युशन्स घ्यायला सांगितले आहे. त्याचे आम्हाला महिन्याला ३ हजार रुपये देणार आहेत. या ट्युशन्सचा महत्वाचा भाग हा हिंदू प्रार्थना आणि त्यांचा प्रचार आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत, असे ते सांगतात. याबद्दल आपण काहीतरी करायला पाहिजे.”
माझी पहिली प्रतिक्रिया तातडीने अशी आली – “त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तुम्ही त्यात भाग घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवा.”
पुढे त्या म्हणाल्या – “मी हे करणार नाही. पण आपल्यातल्या (म्हणजे बौद्धांतल्या) अनेक बाया काहीतरी रोजगार मिळणार म्हणून त्यांच्या केंद्रावर जातात. तिथे ते लोक प्रशिक्षण देतात. त्यात या प्रार्थना कशा म्हणायच्या, काय शिकवायचे हे सांगतात. आमच्यातल्या काहींनी आम्ही आमच्या समाजात (बौद्ध समाजात) या हिंदू प्रार्थना घेणार नाही, फक्त शाळेचा अभ्यास शिकवू, असे सांगितले. त्यावर मग त्यांनी बौद्ध वंदनेचाही त्यात समावेश करा अशी सूट दिली. पण पैसे हवेत तर हे करावेच लागेल, असे बजावले.”
काहींनी नकार दिला. पण गरजवंत म्हणून अनेक बौद्ध महिला हे करत आहेत, याचा अंदाज या महिलेच्या बोलण्यातून आला.
या आमच्या गल्लीतल्या महिलेला आम्ही तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात काही करायला हवे, अशी अपेक्षा होती. मी त्यांना समजावले – “तुम्ही हे लक्षात आणून दिलेत हे चांगले झाले. पण त्यांना त्यांचा हा उपक्रम करण्याचा अधिकार आहे. आपण त्यात सहभागी होऊ नये. त्याचबरोबर आपण आपले पर्यायी वर्ग सुरु करायला हवे. त्याबद्दल काय करता येईल ते पाहू.”
............
मला याचे आश्चर्य वाटले नाही. त्यातल्या त्यात बरे वाटले ते अशा महिला जागृत आहेत, या बाबींची चीड त्यांना येते, यांच्या विरोधात काही करायला हवे, याची तातडी त्यांना वाटते याचे. कारण गेली कित्येक वर्षे आमच्या परिसरात ही कडवी हिंदुत्ववादी मंडळी जाळे विणत आहेत. बौद्धांचे बालेकिल्ले म्हणवणाऱ्या वस्त्यांतही त्यांनी शिरकाव केला आहे. आमच्या काही जुन्या पँथर्सची मुले आंबेडकर जयंती जोरदार करतात; त्याचवेळी बजरंग दलाच्या हनुमान जयंतीच्या फ्लेक्सवरही पदाधिकारी म्हणून त्यांच्या छब्या दिसतात.
पँथरच्या भराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळ आमच्या या बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आमच्या घरांतले अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य असे. त्याची एक झिंग होती. २२ प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते.
आता डीजे लावून आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका इथली तरुणाई संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीतांनी सगळा माहोल उत्साहाने ओसंडत असतो. ..आणि मग काही काळाने आमच्या विहारासमोर साई भंडारा होतो. शेजारी नवरात्र चालतो. जवळपास गणपती बसतात. हे करणारे तरुण एकजात बौद्ध असतात.
मग एकेकाळी पँथरमधून आलेले आमचे नगरसेवक, नेते काय करतात? त्याला शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावतात. गणपतीच्या मिरवणुकांचे स्वागत करतात. खाजगीत बोलताना या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. नाईलाजाने हे करावे लागते. निवडून यायचे तर लोक आपल्या बाजूने राहायला हवेत, अशी कबुली देतात.
या तरुणांना आपण बौद्ध असतानाही हे करतो याचे काहीही वैषम्य वाटत नाही. (आधीच्या पिढीत चोरुन लपून हिंदू आचरण करणाऱ्यांना ते वाटे.) आपण बौद्ध का झालो, हिंदू धर्म का सोडला, याची नीटशी समज त्यांच्यात दिसत नाही. त्यांच्या बाबतीत बौद्ध आणि हिंदू यातली सीमारेषा धूसर झालेली आहे. आपण हिंदूंमधलीच एक जात आहोत अशी काहीतरी त्यांची मानसिकता असावी. मुसलमानांविषयीचा विद्वेष पुरेपूर आहे. महिलांच्या बैठकांतही सलोख्याचा मुद्दा समजावताना ‘सर तुम्हाला माहीत नाही ती मुसलमानं कशी असतात ती..!’ असे त्यातली एखादी आदर राखून दुरुस्ती करते.
ही प्रक्रिया विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचा थेट शिरकाव होण्याआधीपासून सुरु झालेली आहे. या कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटनांना या प्रक्रियेने मदत झाली. मुसलमान द्वेष हा त्याचा पाया असतो. बौद्ध-हिंदू-जैन-शिख सगळे आपण एक आहोत, इथले मूळ भारतीय आहोत. मुसलमान परकीय, आक्रमक आहेत. त्यांचा पाकिस्तान त्यांना दिला आहे. तरीही ते इथे वाटेकरी आहेत..वगैरे वगैरे पढवले जाते. शहरातील बौद्धांना अस्पृश्यता, जातीय अत्याचार यांचा ग्रामीण भागातल्या एवढा सामना करावा लागत नाही. त्यामुळे ती वेदना तीव्र नसते. तरुणाईला राष्ट्रवादी आवाहने, जोश शमवणाऱ्या मिरवणुका, त्यातल्या घोषणा, त्यांच्यातल्या पुढारपण करणाऱ्यांना दरमहा विशिष्ट रकमेची पाकिटे, व्यसन, पार्ट्या आणि हत्यारे हा या कट्टरपंथी हिंदुत्ववादी टोळ्यांचा नित्याचा कार्यक्रम असतो.
याबद्दल खटकत असणारे काही तरुणही भेटतात. पण त्यांची ताकद अगदी मर्यादित असते. कधी एकदा शिकून, नोकरी मिळवून या वस्तीच्या बाहेर पडतो, अशी त्यांची मनोवस्था असते.
.........
जीवन बदलण्याची आंबेडकरी प्रेरणा आणि त्याला आरक्षण, शिष्यवृत्त्या यांच्या साथीने वस्त्यांतून बाहेर पडलेले, शिक्षित होऊन, चांगल्या नोकऱ्यांत जाऊन मध्यमवर्गीय झालेले आम्ही लोक आता वस्तीशी नियमित संबंध ठेवत नाही. कधीमधी कार्यक्रमाला जातो. पण विहारात किंवा तत्सम जागेत. ती जयंती असते, वर्षावास असतो किंवा पँथरचा सुवर्णमहोत्सव किंवा विद्रोही वा आंबेडकरी साहित्य-संस्कृती संमेलन. वक्ते व श्रोते बहुतेक आम्ही बाहेरचेच असतो. अजूनही ही जाणीव असलेले वस्तीत राहणारे काही लोक येतात. पण ते सुटे सुटे. वस्तीतून समुदाय म्हणून लोक या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी नसतात. ज्या विहारात किंवा सभागृहात आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्या आसपासच्या गल्ल्यांत जाऊन दलित पँथर काय होते, राजा ढाले-नामदेव ढसाळ कोण होते, दलित किंवा आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य म्हणजे काय, मुळात साहित्य म्हणजे काय हे नव्या पिढीला विचारायचे प्रयोग आम्ही केले तर खजिल करणारी उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
आम्ही मध्यमवर्गीय बौद्ध आणि आमचे प्रगतीशील चळवळीतले सवर्ण मित्र दलित अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करतो. त्यालाही आम्ही सुटे सुटे असतो. आम्ही जिथून आलो, त्या वस्तीतले कोणी आमच्या सोबत नसतात. आम्ही त्यांना आणू शकत नाही. कारण आमचा त्यांच्याशी अजिबात किंवा फारसा संबंध नसतो.
बौद्ध मध्यमवर्गाचे हे आपल्या वस्तीतल्या समुदायापासून तुटणे, त्याला आपल्या प्रबोधित जाणिवांपासून अलग ठेवणे, तिथल्या मुला-महिलांच्या विकासाशी संबंध नसणे, त्यांना तिथल्या भाईंच्या आणि जातीच्या मतपेटीआधारे सत्तेशी सौदा करणाऱ्या बौद्ध राजकारण्यांच्या स्वाधीन करणे याचे काय करायचे?
सुरुवातीला नोंदविलेल्या ट्युशन्सच्या निमित्ताने हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या उपक्रमाबद्दल चीड येणाऱ्या महिलेला एकाकी ठेवायला आम्ही त्याच वस्तीतून आलेले बौद्ध मध्यमवर्गीय जबाबदार नाही का?
आमच्यातले काही जण केवळ फेसबुक-व्हॉट्सअपवर आवाज उठवत असतात. काही जण प्रासंगिक आंदोलनात सहभागी होतात. काही जण अजूनही वस्तीतल्या विहारांचे, संस्थांचे ट्रस्टी आहेत, ते कार्यक्रमांपुरते तिथे जातात. काहींची पूर्वीची वस्तीतली घरे भाड्याने दिलेली आहेत किंवा आता पुनर्विकासात तिथे इमारती होऊन मोठी प्रॉपर्टी होणार आहे म्हणून अपरिहार्यपणे संबंध ठेवतात. काहींचे जवळचे नातेवाईक अजूनही तिथेच असतात. नाईलाजाने काही नात्यातल्या कार्यक्रमांवेळी, अडचणींवेळी त्यांना भेटावे लागते. मर्तिकावेळी तर टाळणे कठीण जाते. काही जण एनजीओचे पगारी कार्यकर्ते असतात म्हणून तिथे प्रोजेक्ट राबवत असतात.
.......
आज बौद्धांतल्या मध्यमवर्गीयांनी ठरवले तर स्वतःच्या संसाधनांनी आपण जिथून आलो त्या वस्त्यांत विविध विकासाचे, जागृतीचे, लोकांना संघटित करण्याचे उपक्रम ते करु शकतात. ते आठवड्याला वस्तीत जाऊन मुलांचे वर्ग घेऊ शकतात. ज्यात शैक्षणिक आणि सामाजिक-राजकीय विचारांचे प्रबोधन असेल. नोकरी-व्यवसायाचे मार्गदर्शन असेल. पुढे जाऊन त्यांच्या आर्थिक-भौतिक-सामाजिक प्रश्नांवर ते लढले तर उत्तमच.
विश्व हिंदू परिषदेच्या ट्युशन्स म्हणून कळलेल्या या उपक्रमाचा गूगल करुन शोध घेतला. त्याचे नाव आहे – संस्कार शाळा. मला आमच्या गल्लीतल्या महिलेने तिला मुलांना शिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून मिळालेले जे हिंदू प्रार्थना, मंत्र, घोष शिकवण्याचे कागद दिले (ते सोबत जोडले आहेत), त्यातही शीर्षकस्थानी ‘संस्कारशाला : आचार पद्धति एवं प्रमुख विषय’ असे लिहिलेले आहे. देशभर त्यांनी त्या सुरु केल्या आहेत. स्थानिक प्रेरित, गरजू महिला-पुरुषांना ३ हजार किंवा अशीच काही रक्कम दरमहा देऊन ते मिशन म्हणून हा उपक्रम चालवतात. साधने, पैसे नंतर येतात, त्याआधी विशिष्ट ध्येयाची बांधिलकी मानलेले लोक लागतात. ते त्यांच्याकडे उदंड आहेत.
बौद्ध मध्यमवर्गाला आपल्या उद्देशाला आकार देणारे असे ‘संस्कार वर्ग’ संघटित करणे, त्यासाठी पैसे उभे करणे कठीण आहे का?
बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ट असणाऱ्या संघटनांनी आपल्या कामात हा ध्येयवाद आणणे आणि त्यानुसार उपक्रम व विषय ठरवून आपले काम अधिक अर्थपूर्ण करणे कठीण नाही.
बाबासाहेबांच्या काळात ‘समता सैनिक दला’ने केवळ आपल्याच नव्हे, तर अन्य प्रगतीशील शक्तींसहितच्या व्यापक आंदोलनात सुव्यवस्था आणि व्यत्यय आणणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आज चैत्यभूमी, चवदार तळे, दीक्षाभूमी, भीमा कोरेगाव वा तत्सम ठिकाणी वा प्रसंगी मानवंदना देणे, काही व्यवस्था ठेवणे ही कामे समता सैनिक दल करत असते. ते महत्वाचे आहे. ते करावेच. पण त्यापलीकडे जाऊन बजरंग दली संघटनांना प्रत्युत्तर देणारे तरुणांचे गट संघटित करण्यात त्यांनी पुढाकार घेणे अशक्य नाही. काही ठिकाणी करुन पाहायला हवे.
बौद्ध मध्यमवर्ग अशारीतीने सक्रिय झाला तर वस्त्यांतून त्यांना ‘आपले लोक’ म्हणून जी मान्यता आजही मिळते, ती आणखी वाढेल. वस्तीतली तरुण मंडळी जोडली जातील. आपल्याला अपेक्षित उपक्रम संघटित करु लागतील.
मध्यमवर्गीय बौद्धांनी नव्या भानाने, नियमित सक्रिय होण्याने विश्व हिंदू परिषदेच्या संस्कार शाळेच्या विरोधात बोलणाऱ्या महिलेला ताकद मिळेल. ज्या गरजवंत म्हणून पैश्यासाठी नाईलाजाने हे वर्ग चालवतात अशा बौद्ध महिलांना तिथून बाहेर पडण्याची उभारी येईल.
बौद्ध मध्यमवर्ग हलत नाही तोवर माझे उत्तर काही एका अपेक्षेने आलेल्या त्या महिलेला एवढेच असेल का?– “त्यांना असे वर्ग घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही त्यात जाऊ नका.”
........
मी किंवा आमचे सहकारी एवढेच म्हणून थांबणार नाही. थांबलो नाही. वैयक्तिक आणि आमच्या संघटनेच्या मर्यादित आवाक्यात या दिशेने आम्ही काही ना काही हालचाल करत असतो. ती अधिक नेटकी करुन नेटाने चालू ठेवूच.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com | ४ जून २०२३

(जीवनमार्ग, ९ ते १५ जुलै २०२३)





Monday, July 3, 2023

चाणक्य नीती की सांविधानिक नीती..?

आज चाणक्याचे संविधान नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीयांच्या प्रतिनिधींनी घडवलेले संविधान आहे. चाणक्य नीती नव्हे; तर सांविधानिक नीती आमच्या राजकीय व्यवहाराचा पाया आहे. 

आपल्याला पटणाऱ्या भूमिकांचे वहन करणाऱ्या पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना मत देण्यासाठी निवडणुका आहेत. तुम्ही कोणत्याही पक्षाला मत द्या. त्यातून बहुमत मिळेल ते सत्तेत येतील. सत्तेत आल्यावर जे कायदे ते करतील तेही जनता आणि विरोधी राजकीय गट यांना अधिकाधिक विश्वासात घेऊन करतील. न पटणाऱ्या किंवा सुधारणा हव्या असलेल्या कायद्यांबद्दल सनदशीर मार्गाने आपण विरोध करु शकतो. लढू शकतो. ...याला 'संविधानवाद' म्हणतात.

आता राजेशाही नाही. राजांच्या आपसातील स्पर्धा, सत्तेसाठीची युद्धे, चाणक्य नीती यांची कक्षा राजेशाही होती. आता लोकशाही आहे. 'आम्ही भारताचे लोक' भारताचे कर्ते, नियंते आहोत.

चाणक्य नीतीचा गौरव म्हणजे सांविधानिक नीतीला आणि संविधानवादाला तिलांजली देणे. 'आम्ही भारताच्या लोकांनी' स्वतःहून सत्तेचा अपहार करणाऱ्यांना शरण जाणे होय.

यातून केवळ अराजक माजेल. अराजकाची सगळ्यात अधिक झळ सामान्य, कष्टकरी, पीडित यांना बसते, हा आपला अनुभव आहेच.

एका दुसऱ्या शक्यतेसाठीही आजची स्थिती पक्व नाही.

या अराजकातून जनता निराभास होऊन क्रांती करेल हे दिवास्वप्न आहे. क्रांती आपोआप होत नाही.

क्रांतीसाठी असंतोषाचे वातावरण पूरक ठरते. अराजक म्हणजे असंतोष नव्हे. त्यावर स्वार होऊन क्रांती होत नाही. कष्टकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या सत्तेसाठी जी क्रांती हवी त्यासाठी परिस्थितीचा उलगडा करून पुढील दिशा दाखवणारा तत्त्व-विचार, हा विचार स्वीकारून तिचे भौतिक शक्तीत रूपांतर करणारी जनता आणि त्या आधी या सगळ्याचे संचालन करणारी बांधेसूद राजकीय संघटना या पूर्वअटी आहेत.

आज हे नाही. त्यामुळे अराजकाचा फायदा लुटालूट करणारे टगेच प्रामुख्याने घेतील. लोकशाही आवाज पूर्ण दाबून टाकून फॅसिझम आपल्या कराल जबड्यात संसदीय लोकशाहीचा चुराडा करेल.

...म्हणून जे संविधान आज आहे, ते टिकवणे हेच आजचे क्रांतिकार्य आहे.

_________

सुरेश सावंत, sawant.suresh @gmail.com

Tuesday, March 7, 2023

बहुप्रवाही भारतीय संस्कृती


गडचिरोलीत गोंड आदिवासी गावांतून हिंडत असताना आढळलेली ‘महाप्रजापती महात्मा राजा रावण मडावी’ असे लिहिलेली रावणाची प्रतिमा मी फेसबुकवर टाकली होती. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावर मी सविस्तर याबाबत लिहावे, असेही काहींनी सुचवले. वास्तविक अशा लेखनासाठी काही संदर्भ, अभ्यास गरजेचा आहे. तूर्त, आता जेवढे वाचले, ऐकले आहे त्याआधारे माझा अभिप्राय नोंदवतो. अभ्यासक त्यात दुरुस्त्या, भर घालू शकतात. ते खोडून काढू शकतात. याबाबतचे म्हणणे अधिक समग्र व्हायला त्याची मदतच होईल.

एकतर हा फोटो टाकल्यावर त्यातील चेहरा महाभारत मालिकेतल्या नटाचा आणि धडाचा भाग शिवाजी महाराजांचा असल्याची नोंद करुन “हा कुठचा रावण, हा तर अरविंद त्रिवेदी!” असे काहींनी उद्गार काढले आहेत. त्यातील काहींना “हा फोटो जसा होता, तसा मी इथे टाकला” असे उत्तर दिले. पण हे उद्गार काढणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, मुद्दा रावणाचा खरा फोटो कोणता हे सिद्ध करण्याचा नसून अन्यत्र रावणाचे दहन होत असताना या भागातले आदिवासी त्याला आपला महान राजा मानून त्याची मिरवणूक काढतात, हा होता. रावणाचा किंवा रामाचा किंवा सीतेचा किंवा लक्ष्मणाचा-खरेतर फोटो काढायचा शोध लागलेला नव्हता त्या काळातल्या कोणाचाही खरा फोटो कोणाकडे आहे? जे प्रचलित फोटो, चित्रे आहेत, त्यातील अधिकृत कोणती मानायची? आज ठाऊक असलेल्या व्यक्तीचा म्हणजे अरविंद त्रिवेदीचा चेहरा नसता तर रावणाचा हा फोटो चालला असता? लोक आपल्याला वाटते त्याप्रमाणे शक्कल लढवून आपल्या आराध्यांच्या प्रतिमा तयार करतात. त्यांची ती सर्जनशीलता मानून त्यातून काय म्हणायचे आहे, यावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. रामलीलेत राम-सीतेची भूमिका करणाऱ्या पात्रांच्या लोक पाया पडतात, त्यावेळी ते त्या व्यक्तींना नव्हे, तर त्यांनी भूमिका वठवलेल्या आराध्यांना नमन करतात. तसेच हे समजून घ्यायला हवे.

रावण राक्षस आणि खलनायक असताना आणि त्याचे दहन करणे हीच रीत असताना रावणाला नायक करण्याचा हा प्रकार काहींना आक्षेपार्ह वाटतो, तर काहींना आश्चर्य वाटते.

वास्तविक, आपल्याकडे भारतीय संस्कृतीतील संघर्षाबाबत खूप लिहिले व बोलले गेले आहे, जाते आहे. त्याची काहीही कल्पना नसल्याने हे आश्चर्य वाटते. ज्यांचा आक्षेप असतो, त्यांच्यातल्या काहींना हे ठाऊक नसते आणि ज्यांना ते ठाऊक असते त्यांच्यातल्या काहींना ते मान्य नसते. पचत नसते.

भारतीय संस्कृती एकसाची नाही, हे नीट लक्षात घ्यायला हवे. फार मोठा समुदाय आज हिंदू या संज्ञेने ओळखला जातो. तथापि, वेद, महाभारत, रामायण, मनुस्मृती आदि हिंदू मानत असलेल्या प्राचीन ग्रंथांत हिंदू ही ओळख आढळत नाही. ती नंतर आलेली आहे. ती कशी हा मुद्दा आता गौण आहे. इथे हे समजून घेऊ की आज हिंदू म्हणून जे ओळखले जातात त्यांच्यातही धारणांचे-मान्यतांचे प्रचंड वैविध्य आहे. ज्या मान्यतांना मुख्य प्रवाही मानले जाते, त्या मान्यता प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता असलेल्या अभिजनांच्या आहेत. ज्यांच्याकडे लिहिण्याची, ते जपून ठेवण्याची आणि पुढे नेण्याची ताकद होती त्यांनी लिहिलेला इतिहास हाच इतिहास होतो. हा इतिहास अर्थातच या अभिजनांच्या सोयीचा असतो. बहुजन असूनही ज्यांच्याकडे ही ताकद नव्हती, त्यांचा इतिहास आता उघडकीस आणण्याचे प्रयास सुरु आहेत. बहुजनांतले शिक्षित तसेच अभिजनांतले न्यायाचे पक्षपाती ही सत्यशोधाची मोहीम गेली दीड शतके चालवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते आजच्या काळात महाराष्ट्रातील आ. ह. साळुंखे-प्रा. अरुण कांबळेपर्यंत अनेकांनी भारतातील या प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षाचा वेध घेतला आहे. त्यातून बहुजनांतल्या विविध समूहांना आत्मबल मिळू लागले. आपल्या धडावर आपलेच डोके हवेचे भान येऊ लागले. दुय्यमत्व दिलेल्या अथवा त्याज्य मानलेल्या त्यांच्या धारणा, मान्यता, सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा आविष्कार ते खुलेपणाने करु लागले. मुख्य प्रवाही मानलेल्या मान्यतांना आव्हान देऊ लागले.

दंडकारण्यातल्या (आजचा महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली ते मध्यप्रदेशातील बस्तर विभाग) आदिवासींनी रावणाला त्यांचा पूर्वज कल्पून महाप्रजापती राजा मानून त्याचा गौरव करण्याची घटना त्याच अर्थाने समजून घ्यायला हवी. अनेक अभ्यासकांनी रावण दंडकारण्यात असू शकतो, असे अनुमान काढले आहे. श्रीलंकेत रावण होता याचे काहीही उल्लेख तेथील सिंहलींच्या पुराकथांत, लोककथांत आढळत नाहीत. राम-रावण कथेशी संबंधित ज्या जागा पर्यटकांना तिथे दाखवल्या जातात, त्या पर्यटकांच्या धारणांचा व्यवसायासाठी खुबीने केलेला वापर आहे, असे जाणकार सांगतात.

रावणाला मानणे वा त्याला महात्मेपण देणे हे केवळ तो आपला पूर्वज आहे म्हणून नव्हे. तर त्यामागे या मानणाऱ्यांचे त्यांचे म्हणून एक ‘कथ्य (narrative)’ असते. रावण महापराक्रमी, विद्वान, विविध क्षेत्रांतला तज्ज्ञ होता. त्याची कळ लक्ष्मणाने प्रथम काढली. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक लक्ष्मणाने कापले. आपल्या बहिणीच्या विटंबनेचा सूड घ्यायला रावणाने सीतेचे हरण केले. पण तिला हात लावला नाही. हे त्यांचे म्हणणे. रामाचे-लक्ष्मणाचे म्हणणे प्रस्थापित रामायणात आलेच आहे. तेच खरे कशावरुन? संस्कृतमध्ये पंडितांनी लिहिले म्हणून? भक्तिभावाने वाचल्या जाणाऱ्या पोथ्यांत, भजनांत आहे म्हणून? बरे रामायण एक नाही. कथानकांतील भेदांच्या विविध आवृत्त्या असलेली शेकडो रामायणे आहेत. राम-सीता बहीण-भाऊ असलेलेही रामायण आहे.

रावणाला पुजले जाण्याची प्रथा गोंडांतच फक्त नाही. उत्तर प्रदेशात कानपूर, बिसरख, राजस्थानात मंडोर, मध्य प्रदेशात मंदसौर आणि विदिशा, आंध्र प्रदेशात काकीनाडा अशी भारताच्या वेगवेगळ्या भागात रावणाची देवळे आढळतात. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी येथे दुर्योधन आणि कर्णाची देवळे आहेत. ही देवळे बांधणारे आणि त्यांची पूजा करणारे लोक आजच्या ‘हिंदू’ संज्ञेतच मोडतात.

हे लोक खलनायक दुर्योधनाला का मानतात? त्यांचे म्हणणे तो जातपात मानत नव्हता. कर्ण या सूतपुत्राला त्याने आपला बंधुसमान मित्र मानला. पहिला पांडव म्हणून तसेच सर्वात शूर असूनही कर्णाचा अधिकार हिरावला गेला होता. बिनलग्नाचे अपत्य म्हणून कुंतीने त्याला जन्मतः त्यागले होते. ती कथा आपल्याला ठाऊक आहे. कर्णावरील या अन्यायाच्या विरोधात असलेले तसेच त्याला आणखी काही कारणाने मानणारे लोक त्याचे देऊळ बांधतात.

महिषासुर दिवस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात साजरा केल्याबद्दल स्मृती इराणी यांनी संसदेत दुर्गावतार धारण केलेला आपण पाहिला आहे. महिषासुराचा गौरव म्हणजे दुर्गेचा अपमान. दुर्गेचा अपमान म्हणजे राष्ट्रद्रोह असा त्यांचा निष्कर्ष होता. वास्तविक जेएनयूमध्ये हा दिवस बऱ्याच वर्षांपासून साजरा होतो, हे एकेकाळचे ‘कठोर आंबेडकरवादी’ सनदी अधिकारी आणि तत्कालीन भाजपचे खासदार (आता काँग्रेसी झालेले) उदित राज यांनीच जाहीर केले. ते स्वतः अशा कार्यक्रमात वक्ता म्हणून पूर्वी सहभागी झालेले होते. महिषासुराचा बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात आदिवासी तसेच अन्य प्रगतीशील विद्यार्थ्यांचा त्यात पुढाकार असे.

बंगालमध्ये एकीकडे महिषासुरमर्दिनीचे देखावे आणि दुर्गोत्सवाची धुमधाम असताना त्याच बंगालातील संथाळ आदिवासी समुदाय महिषासुराची आराधना करत असतात. आम्ही महिषासुराचे वंशज आहोत, असे ते सांगतात. दुर्गोत्सव साजरा करणाऱ्यांच्या लेखी महिषासुर हा लोकांना त्रास देणारा दैत्य. त्याचा वध करुन दुर्गेने लोकांना या दैत्याच्या जाचातून वाचवले. संथाळांचे म्हणणे उलट आहे. त्यांच्या मते आमचा राजा महिषासुर हा कल्याणकारी राजा होता. त्याचे हे कल्याणकारीपण सहन न झालेल्यांनी दुर्गा या एका सुंदर युवतीला महिषासुराकडे पाठवले. तिने त्याला वश केले. त्याच्याशी लग्न केले आणि नवव्या दिवशी महिषासुराचा खून केला. ज्या बंगालात भद्र लोक. त्याच बंगालात संथाळ. दोघेही भारतीय. दोहोंची कथ्ये वेगळी. …कोणते खरे?

बळी आणि वामनाची कथा अशीच. बळीचे महानपण सहन न झालेल्या देवांनी त्याचा काटा काढण्यासाठी विष्णूला वामनाचा अवतार घेऊन पाठवले. वामन हा बटु. बालक. दानशूर बळीराजाकडे तो दान मागतो. बळी माग म्हणतो. बटु वामन केवळ तीन पावले जमीन मागतो. राजाने दिली म्हणताच तो हिमालयाएवढा उंच होतो. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापतो. “तिसरे पाऊल कुठे टाकू?” असे वामनाने विचारल्यावर “माझ्या मस्तकावर ठेव.” असे राजा म्हणतो. वामन तसे करतो आणि बळीला पाताळात गाडतो. ही प्रचलित कथा. महाराष्ट्रात बळीची थोरवी विदित करणारे ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे लोकवचन आहे. केरळमध्ये आणखी एक पुढची आवृत्ती आहे. पाताळात गेलेला महाबली मुळातच कल्याणकारी राजा. तो दरवर्षी आपल्या प्रिय जनतेची ख्यालीखुशाली विचारायला पृथ्वीवर येतो. दहा दिवस त्यांच्यासोबत राहतो. आनंदोत्सव साजरा करतो. मग पुन्हा पाताळात जातो. हे दहा दिवस दिवाळीसारखे केरळमधील सर्वधर्मीय जनता साजरा करते. तो सण आहे ‘ओणम’.

अशा अजून कित्येक प्रस्थापित मान्यतांना आव्हान देणाऱ्या मान्यता भारतीय संस्कृतीत आढळतील. मुद्दा आहे, याकडे आपण आता कसे बघणार हा. या प्रश्नाला सरळ सोपे उत्तर आहे – आहे तसे स्वीकारा. ज्याला जे करायचे आहे, म्हणायचे आहे ते म्हणू द्या. कोणी कोणाला अडवू नका.

संविधानाने विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य दिलेच आहे. जुन्या काळापासून हे चालत आहे. त्यावेळी जर खूप काही प्रश्न तयार झाले नाहीत. लोकांनी या सगळ्या आस्था-मान्यतांचे सहअस्तित्व स्वीकारले, तर आता संविधानाने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले असताना हे प्रश्न का यावेत?

पौराणिक तसेच श्रद्धा-आस्थांचा मामला कोणतीही अभ्यास समिती नेमून सुटणारा नाही. दुर्गा श्रेष्ठ की महिषासुर? बळी श्रेष्ठ की वामन? राम श्रेष्ठ की रावण? ...या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वस्तुनिष्ठ असे कोणते आणि कसे ऐतिहासिक संशोधन करणार? ते निर्विवाद कसे असू शकेल? या काही ऐतिहासिक व्यक्ती नव्हेत. कधीकाळी असल्याच तरी त्यांच्या प्रतिमा कितीतरी परिवर्तने होत लोकमानसातून वाहत आल्या आहेत. ऐतिहासिक व्यक्तींच्या मापनाबद्दल संशोधकांत एकमत होत नाही, तिथे पुराकथांतील या मंडळींच्याविषयी कसे होणार?

आहे तसे स्वीकारणे. टीका व चिकित्सेला पूर्ण वाव ठेवून परस्परांच्या कथ्यांचा आदर करणे, त्याबद्दल सहिष्णू राहणे हाच उपाय आहे.

या बाबतीत बंगालातील भद्र लोकांनी टाकलेले एक पाऊल मला स्वागतार्ह वाटते. काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती. आता ती माझ्याकडे नाही. मला आठवते त्याप्रमाणे भद्र लोकांनी दुर्गोत्सवाच्या मंडपात संथाळांच्या भजन मंडळाला आमंत्रित केले होते. संथाळांनी तिथे महिषासुराची भजने गायली होती.

हे असेच घडले असेल वा अजूनही घडत असेल तर तो आदर्श नमुना आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा. आम्ही आमचे म्हणणे मांडतो. या मांडण्यात कोणी कोणाचा अपमान केला अशी भावना करुन घ्यायची नाही. ऐकणाऱ्या लोकांनी त्यातले काय घ्यायचे, काय सोडायचे हे त्यांचे स्वातंत्र्य राहील.

अलीकडे रावणाची पूजा करणाऱ्या आदिवासी समूहांत एक विभाग रावणाच्या अन्यत्र होणाऱ्या दहनालाच विरोध करतो आहे. छत्तीसगडपासून महाराष्ट्राच्या चंद्रपूर आदि भागांतील काही आदिवासी संघटना त्यासाठी मोर्चे काढत आहेत. त्यातल्या काहींचे म्हणणे – “तुम्ही रामाला मानता जरुर माना. रावणाला मानत नाही. नका माणू. आमचा त्याला विरोध नाही. पण आम्ही ज्याला देव मानतो त्या रावणाचे तुम्ही दहन करता हे आम्ही सहन करणार नाही.”

मला हे बरोबर वाटत नाही. तुम्ही रावणाला भजा. ते रामाला भजतील. रावणाचे दहन ही त्यांची परंपरा आहे. तिला विरोध करणे योग्य नाही. आदर आणि सहिष्णुता ही दोन मूल्ये महत्वाची आहेत. दुसऱ्याच्या मताचा आदर करा. किमान ते सहन करा. गोहत्येच्या विरोधात असलेले गांधीजी त्याच्या कायद्याच्या बाजूने नव्हते. ‘मी गायीला पवित्र मानतो, पण ते दुसऱ्या कोणाचे तरी अन्न आहे. त्याला मी विरोध करणे बरोबर नाही,’ अशी त्यांची भूमिका होती.

बहुप्रवाही, विचारबाहुल्य असलेल्या आणि संविधानाने त्यातील सामाजिक विषमतांसारख्या जखमांवर इलाज केलेल्या भारतीय संस्कृतीचे एकसाचीकरण करणे म्हणजे भारताचे व्यक्तित्व दुभंगवणे होय. त्या बाबतीत जबरदस्ती करण्याने भारताचे भारतपणच राहणार नाही.

| ता. क. |

सांस्कृतिक एकसाचीकरणाचा आग्रह धरणाऱ्या कडव्या हिंदुत्ववाद्यांचा आणि त्यांच्या भाजप या राजकीय साधनाचा भारत हिंदुराष्ट्र करणे हे अंतिम लक्ष्य आहे. आजतरी हिंदुत्वाचा ज्वर पसरवून त्याद्वारे बहुसंख्याकांची मते मिळवून ते लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेत. ही सत्ता मिळवताना त्यांना साथीला त्यांचे म्हणणे पूर्णतः मान्य असलेले लोकच हवेत असे नसते. विविध व्यक्ती आणि काही समूहही त्यांच्या लघुदृष्टीच्या तात्कालिक स्वार्थासाठी भाजपला सामील होतात. येन केन प्रकारेन त्यांना गळाला लावण्याचा उद्योग भाजप करत असतो. साम, दाम, दंड, भेद ही त्यांच्या हिंदुत्वाची (कपट) नीती आहे. त्यामुळे अनेक विसंगती ते कवेत घेऊ शकतात.

गडचिरोलीच्या ज्या गोंड-कंवर आदिवासी गावांतून आम्ही हिंडत होतो, तिथे बिरसा मुंडाच्या प्रतिमा व जयघोषाबरोबरच आणि रावणपूजेबरोबरच ‘जय श्रीराम’ चे अस्तित्व भिंतींवर दिसते. गडचिरोली-चंद्रपूरच्या आदिवासी बहुल भागात निवडून आलेले आदिवासी समाजातले नगरसेवक, आमदार, खासदार हे मुख्यतः भाजपचे आहेत. चंद्रपूरला रावणदहनाविरोधात मोर्चा काढण्यात भाजपच्या नगरसेविकेचा पुढाकार होता. तिला भाजपच्या जयश्रीरामची अडचण आली नाही आणि भाजपला तिच्या रावणदहनाच्या विरोधाचा त्रास झाला नाही.

भाजपच्या तळ्यावर वाघ व बकरी असे एकत्र पाणी पितात.

न्यायाधीशांच्या निवडीत सरकारला अधिकार हवा म्हणून सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या मागे हात धुवून लागलेले केंद्रीय विधी मंत्री किरण रिजिजू भाजपचेच एक मुस्लिम नेते मुख्तार अब्बास नकवी यांच्या विधानावर काय म्हणाले ते समजून घेणे रोचक आहे. नकवी म्हणाले – “गोमांस खाणाऱ्यांना पाकिस्तानला पाठवा.” त्यावर रिजिजू म्हणाले – “ईशान्य भारतात बीफ खाण्याचा रिवाज आहे. मी बीफ खातो. त्यावर कोणीही बंधन घालू शकत नाही.”

दोन वेगळे बोलणाऱ्यांना भाजप सामावून घेते. एवढेच नव्हे, तर भाजपच्या गोहत्याविरोधी कायद्याच्या मुख्य भूमिकेच्या विरोधी असलेले रिजिजू त्यांचे सन्मान्य मंत्री राहतात. मेघालयाच्या अलिकडेच झालेल्या निवडणुकांच्या धामधुमीत तेथील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गोहत्याविरोधी कायद्याबद्दल विचारले असता तेही तेच म्हणाले - “गोमांस हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यावर कोणीही बंधन घालू शकत नाही.”

आज काहीही करुन सत्ता. त्यासाठी वैचारिक विरोधकांनाही स्वार्थपूर्तीचे गाजर दाखवून सामावणे. त्यांच्या विरोधी सूरांना सोयिस्करपणे सहन करणे. बाजूच्या नसलेल्या वैचारिक विरोधकांना हेच केल्याबद्दल अर्बन नक्षली किंवा तुकडे तुकडे गँग किंवा फुरोगामी ही बिरुदे व सोबत तुरुंग, ईडीच्या कारवाया बहाल होतात. हेच बोलणाऱ्या मात्र भाजपच्या तंबूत दाखल होणाऱ्यांना सर्व माफ. उलट आर्थिक तसेच सत्तेची बक्षीसे मिळतात. उद्या कत्तलखान्यातच रवाना करायचे आहेत. तोवर माजण्याची उसंत या बोकडांना भाजप देते आहे. कदाचित व्यक्तिगत त्यांची कत्तल न करता त्यांना सोन्याचा चारा असलेल्या पिंजऱ्यात ठेवले जाईल. मात्र ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करत आहेत, त्या समूहांची मात्र कत्तल अपरिहार्य असेल.

भाजपच्या अशा ‘विरोधविकासाची’ आज तरी चलती आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(६ मार्च २०२३)







Thursday, February 9, 2023

विचारप्रणाली आणि माणूस

 

भूमिका वा विचारप्रणाली नको हा चकवा आहे. माणूस विचारानेच चालतो, त्या विचारांची एक व्यवस्था असते. ती असंघटित, कच्ची वा स्वैरही असू शकते. पण ती असतेच. विचारप्रणाली नसते असे कोणीही सापडू शकत नाही. माणूस आहे म्हणजे त्याची विचारप्रणाली आहे. ती नसणे म्हणजे कोमात जाणे होय. त्यामुळे भूमिका वा विचारप्रणाली नको किंवा आता विचारप्रणाल्यांचा काळ संपुष्टात आला आहे, हा प्रचार केवळ भूलभूलैया आहे. त्यापासून सावध राहायला हवे. ज्यांना ही विषम समाजव्यवस्था बदलून न्याय्य पायावर तिची उभारणी करायची आहे, त्यांनी तर या गोंधळापासून पूर्ण मुक्त असायला हवे. इतरांनाही मुक्त करायला हवे.

 

विचारप्रणाली आणि माणूस यांचा संबंध शोधण्यापुरता हा मुद्दा सरळ नाही. आज सार्वजनिक जीवनात, एकूण जगातच माणसाला विशिष्ट विचारप्रणाली असावी का, हा मुद्दा मुद्दामहून उपस्थित केला जातो आहे. तो करण्यामागे अर्थ व राज्य व्यवस्थेच्या संदर्भातले हितसंबंध गुंतलेले आहेत. शोषणाविरोधात लढणारे, विषमतेविरोधात आवाज उठवणारे, विकासातला न्याय्य वाटा मागणारे, समाजाचे सम्यक परिवर्तन अपेक्षिणारे यांच्यात वैचारिक गोंधळ निर्माण करण्याची संधी साधणारे बनचुके यात बरेच आहेत. या सगळ्याचा वेध घेणे इथे शक्य नाही. सामान्य वाचक, कार्यकर्ते यांच्या समजाला उपयुक्त ठरेल अशारीतीने या गोंधळाचे काही पदर उलगडण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहे.
माणूस हा पृथ्वीतलावरील असंख्य जीवांपैकी एक जीव आहे. एक प्राणी आहे. तथापि, हजारो वर्षांपूर्वी चिमणी घरटे बांधत होती, तसेच घरटे आताही ते बांधते. मात्र माणसाच्या निवासाचा प्रारंभ गुहेपासून होऊन आता गगनचुंबी इमारतीपर्यंत गेला. माणूस अन्य प्राण्यांपासून वेगळा झाला. त्याच्या या उत्क्रांतीमागे विविध कारणे आहेत. त्यातले एक कारण वा अवस्था ही त्याची कल्पनाशक्ती म्हणजेच पुढचा विचार करण्याची क्षमता हे आहे. प्राणी, पक्षी वा अन्य जीवजंतू केवळ जीव असलेल्या निश्चेष्ट पेशी नव्हेत. जगण्यासाठीच्या किमान खुबी वा सावधानता त्यांच्याकडे असतातच. त्यासाठीची किमान विचारशक्ती त्यामागे असतेच. अंगावर कोणी आले तर त्याचा गुरकावून सामना करणारी किंवा पळून जाणारी कुत्री गल्लीत आपण पाहतोच. सरावाच्या माणसांशी आणि बिगरओळखीच्या माणसांशी गाई-गुरे वा अन्य पाळीव प्राणी वेगवेगळे वागतात, हेही आपल्याला ठाऊक आहे. ही केवळ प्रतिक्षिप्त क्रिया वा जैविक गुणधर्म नसतो. प्राणी विचार करतात, त्यांचे किमान ध्वनिद्वारे प्रकटीकरण करतात, हे शास्त्रज्ञांनी शोधले आहे. मात्र माणसासारखी शरीररचना, भाषा आणि कल्पनाशक्ती त्यांच्याकडे नसते वा त्या दर्जाची नसते. आजचा माणूस व्हायला या बाबींची मोठी मदत माणूस प्राण्याला झाली.
प्रवासात समोरुन डोळ्यांवर प्रखर प्रकाश आला की पापण्या मिटू लागतात, ही माणसाची प्रतिक्षिप्त क्रिया जरुर. पण अशावेळी माणूस तिथेच खोळंबून राहत नाही वा मागे वळत नाही. प्रकाशाच्या या प्रखर झोताला बगल देऊन पुढे जाण्याचा मार्ग माणूस शोधतो, तो तेथील स्थितीचा विचार करुन. म्हणजेच विचार ही त्याची अंगभूत बाब आहे. विचाराशिवाय माणूस असत नाही. या विचार आणि कल्पनाशक्तीमुळे निसर्गातल्या बाबींचे निरीक्षण करुन, त्यातले नियम शोधून त्याने ते आपल्या हिताकरता वापरले. त्यातून नवे निर्माण केले. वणव्यात भाजलेल्या प्राण्या-पक्ष्यांचे मांस रुचकर, चावायला हलके आणि टिकायला अधिक हे त्याला निरीक्षणाने कळल्यावर त्याने प्राणी भाजून खायला सुरुवात केली. घर्षणातून अग्नी तयार होतो, हे त्याला कळलेच होते. गारगोट्या घासून अग्नी तयार करणे व तो टिकवणे हे तो करु लागला होता. जमिनीत पडलेले बी पावसात रुजते व त्याला त्याच प्रकारचे भरघोस दाणे येतात हे स्त्रियांना निरीक्षणाने ज्ञात झाले व त्यांनी शेतीचा शोध लावला. उंचावरुन सखल भागाकडे पाणी वाहते या निरीक्षणातून बोध घेऊन बांध घालून पाण्याला माणसाने वळवले आणि आपली शेती समृद्ध केली. ..ही सगळी उदाहरणे वाचकांना ठाऊक आहेत. ती पुन्हा नमूद करण्याचे कारण माणूस विचार करतो हे अधोरेखित करण्यासाठी.
माणूस विचार करतो, यात नवे काय असेही कोणाला वाटेल. पण प्रारंभी म्हटले त्याप्रमाणे याच बाबीत सध्या गोंधळ करण्याच प्रयत्न होतो आहे. त्यामागे मोठे हितसंबंध आहेत. या गोंधळात भरकटायचे नसेल, तर ‘माणूस विचार करतो व त्याप्रमाणे वागतो’ ही प्राथमिक बाब ठळकपणे मनात जागी ठेवावी लागेल.
माणूस विचार करुन त्याप्रमाणे वागतो किंवा तो वागतो त्या मागे विचार असतो, हे कबूल केले की माणसाचे वागणे, त्याची कृती ही निरुद्देश नसते, हेही आपणास पटायला हरकत नाही. आपल्या हितासाठी त्याची ही कृती असते, हेही आपल्याला पटेल. पटेल कशाला, आपला तो अनुभवच असतो. विचाराची खोली आणि व्याप्ती वाढू लागते ती या हिताचे स्वरुप ठरवताना. आपल्या कृतीने स्वतःचे हित, कुटुंबाचे हित, नातेवाईकांचे हित, आपण राहतो त्या समाजाचे हित..असे वाढत जात जातीचे, वर्गाचे, धर्माचे, राज्याचे, देशाचे आणि जगातील सर्व मानवजातीचे हित अशी या हिताची कक्षा वाढत जाते. हिताची कक्षा अशी व्यापक करायची की मर्यादित ठेवायची तसेच हे हित साधायचे कसे यामागे विचारांची एक व्यवस्था तयार होऊ लागते. तिला म्हणतात विचारप्रणाली. विचारप्रणाली म्हटले की तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचीच ती असली पाहिजे असे नव्हे. ज्याला आज समाजवाद, भांडवलवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद असे म्हटले जाते त्या विचारप्रणाल्या आहेतच. पण असे काहीही नाव न दिलेल्या विचारांच्या व्यवस्था समाजात तयार झालेल्या असतात. त्याप्रमाणे माणसे वागत असतात. रुढी, परंपरा, संकेत, नीतिमत्ता या मागे विचारांच्या व्यवस्थाच असतात. बाईच्या जातीने पुरुषाची बरोबरी करु नये, खालच्या जातीतल्यांनी आपल्या पायरीने राहावे, लग्न आपल्या जातीतल्याशी व त्यातल्या आपल्या बरोबरीच्याशीच करावे या प्रतिगामी भूमिकांमागे विचारप्रणालीच असते. माणसाच्या विकासक्रमातील हितसंबंधांच्या संघर्षांतून ती तयार होते. नंतर ती मनुस्मृती वा तत्सम धर्मग्रंथांत संकलित होते. याचा विरोध करणाऱ्या अधिक व्यापक मानवी हित साधू पाहणाऱ्या विचारप्रणाल्या समांतरपणे तयार होत असतात. त्यांच्या संघर्षातून मानवाच्या विकासाचे पुढचे पाऊल पडत असते. काही वेळा मागेही जावे लागते. त्यावेळच्या संघर्षात जय कोणत्या विचारांचा होतो, त्यावर ते अवलंबून असते. टेकडीवरुन पाहिले तर ही वाट वळणावळणाची, कधी खाली जाणारी अशी दिसली तरी तिचा एकूणात प्रवास वर सरकण्याचाचा राहिलेला दिसतो. पण म्हणून खाली जाणारी वाट वर येण्याची निमूटपणे प्रतीक्षा करायची नसते. ही वाट वर येण्यासाठी नव्या विचारांची व्यवस्था, प्रणाली विकसित करुन त्याप्रमाणे कृती करायची असते. माणसे आपल्या परीने कधी मोठ्या तर कधी छोट्या प्रमाणात ते करत असतातच. त्याला लगेच यश येतेच असे नाही.
माणूस विचार करतो, विकासाच्या क्रमात त्याची विचारप्रणाली तयार होते, या विचारप्रणालीच्या सहाय्याने त्याचे आजचे आणि पुढचे जीवन तो संघटित करत असतो. विचारप्रणाली व माणूस यांचे नाते अविभाज्य आहे. हे आता आपण नक्की केले आहे.
आता गोंधळाबाबत बोलू.
विचारप्रणाली हे माणसाच्या अनुभवांच्या संचितातून आलेले सूत्र असते. ते मोठी शास्त्रीय व्यवस्था असतेच असे नाही. वैयक्तिक पातळीवर माणसे या सूत्राच्या सहाय्याने व्यवहार करतात. इथवर ठीक. पण त्यापुढे जाऊन इतरांना त्या सूत्राप्रमाणे वागण्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सल्ला देतात. हे सूत्र तर्काच्या पातळीवर, विवेकाच्या पातळीवर टिकणारे नसतेही. पण ते त्या व्यक्तीला भावलेले असते. उदा. प्रतिकूल स्थितीतून पुढे आलेले, यश मिळवलेले नामवंत त्यांच्या मुलाखतीतून यशाचा मंत्र सांगत असतात – “खूप मेहनत करा. अशी मेहनत करणाऱ्याला ईश्वर, सृष्टी-कायनात साथ देते.” कोणीतरी “नशिबाने साथ केली तर एकदम तुम्ही वर पोहोचता.” असेही सांगते. मेहनत, चिकाटी असलीच पाहिजे, हे ते आवर्जून सांगतात. केवळ नशिबावर अवलंबून राहावे, असे ते म्हणत नाहीत. नशीब हे सापशिडीसारखे एकदम तुम्हाला वर नेऊन ठेवते. हेच नशीब त्या सापशिडीवरुन एकदम तळाला पोहोचवते, हेही ओघाने आलेच.
नशीब, ईश्वर, सृष्टी यांची साथ हा विचारप्रणालीचा आधार झाला की त्याला तर्क, बुद्धी, विश्लेषण, विवेक यांची गरज राहत नाही. गरिबीतून मेहनत करुन पुढे गेलेले लोक दिसतातही. त्यांची संख्या लाखांत एक अशी असते. ज्यांच्या जवळपास शाळा नाही, जिथे शाळा आहे तिथे जायला नीट रस्ता आणि वाहन नाही, तिथे केवळ मेहनत कामी कशी येणार? अगदी अपवादात्मक कोणी तरी ते गाव सोडून दूर शाळेच्या गावात जाते. खूप मेहनत करते. शिकते. प्रगती करते. ज्यांना उत्तम शाळा, सर्व तऱ्हेची साधने, घरची आर्थिक स्थिती, अभ्यासाच्या सोयी यांची अनुकूलता असेल त्यांची कमी मेहनतही खूप वरपर्यंत त्यांना पोहोचवते. जो जेवढी मेहनत घेईल त्याला तेवढी ईश्वराची साथ आणि तेवढी त्याची प्रगती असे दिसत नाही. ज्यांच्या घरात आधीचीच गरीबी असेल, कोणी शिकलेले नसेल, जे जातीने खालचे मानले जात असतील त्यांची अशी सरसकट प्रगती होत नाही. त्यांतील मुली तर आणखी मागे पडतात. याचा अर्थ मेहनतीला ईश्वर, नशीब यांशिवाय इतर अनुकूल घटक असावे लागतात. ते ज्यांच्या वाट्याला नसतात, त्यात त्यांचा वा त्यांच्या आधीच्या पिढीचा दोष नसतो. तर त्यामागे इथली विषम व्यवस्था असते. ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो. खुली स्पर्धा वा मेहनत घेण्यासाठीची समान रेषा सर्वांसाठी तयार व्हावी यासाठीचे अडसर दूर करावे लागतात. पुढे जाऊन, स्पर्धा नव्हे तर सहकार्याने सर्वांच्या ऊर्मी-वृत्ती फुलवणारी व्यवस्था आणण्याचे संभाव्य, तर्कसंगत स्वप्न जागवावे लागते. हे सांगणारी विचारप्रणाली हवी.
आज दूरदर्शनवरील वाहिन्यांतून थोडीशी बुद्धी, बरेचसे अनुमान आणि खूप सारे नशीब यावर करोडपती बनवणारे कार्यक्रम चालतात. गायन-नर्तनाची जन्मजात प्रतिभा असलेले सगळेच ‘रिअॅलिटी शो’त नंबर एकवर येत नाहीत. त्या पहिल्या नंबरावर येणाऱ्या त्यांच्यातल्याच कोणा एकासाठी खूप प्रतिभा असतानाही इतरांना टप्प्याटप्यावर शोमधून रडून बाहेर पडावे लागते. खूप खुशी आणि खूप गम याचे हे शो त्याच्या निर्मात्यांना मालामाल करत असतात. प्रत्यक्ष जगण्यात असा नंबर एकचा प्रकार नसतो. आपापल्या प्रतिभेप्रमाणे जसा अवकाश मिळेल तसा प्रत्येकजण शो करत असतो. ‘नंबर एक अन्यथा बाहेर’ ही विचारप्रणाली सर्वांना विकासाची संधी आणि साधने देणाऱ्या व्यवस्थेची कल्पनाही येऊ देत नाही. असे का हा प्रश्नच मनात येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी ती घेते.
अलीकडे तर ‘वास्तुशास्त्र’ हा प्रकार सामान्यांपासून उच्चशिक्षित-उच्चभ्रूंपर्यंत ज्या प्रकारे बोकाळला आहे, तो चिंताजनक आहे. घरातील दरवाजा, किचन यांची दिशा पाहून ती वास्तुशास्त्राच्या ‘अशास्त्रीय अंधश्रद्धेत’ बसते आहे, याची खात्री करुन घरे घेतली जातात. बांधली जातात. मोठमोठे अधिकारी, मंत्री आपल्या सरकारी कार्यालयातील टेबल-खुर्ची कुठच्या दिशेला असेल याबाबत दक्ष असतात. या सगळ्यांच्या विचारप्रणालींचा तर्क काय? - अमूक दिशा शुभ म्हणून त्या दिशेला तोंड. हा त्यांचा कार्यकारणभाव. कारण अमूक दिशा शुभ. तीच शुभ का? ..याला उत्तर नसते. ती शुभच आहे, हे गृहीत असते. ही सर्व माणसे विचारांनीच वागतात. त्यांची विचारप्रणाली ही अशी विवेकहिन असते.
या विवेकहिनतेला नकार देणारे, आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो असे म्हणणारे बुद्धिवंत, साहित्यिक, पत्रकार या कोटीतले लोक असतात. मात्र ते जो गोंधळ घालतात, तो विषम समाजव्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठीची विचारप्रणाली स्वीकारण्यालाच गैर ठरवतो. हे प्रकरण अंधश्रद्ध-विवेकहिन विचारप्रणालीपेक्षा अधिक गंभीर आहे. हे विचारवंत लोक पुढीलप्रमाणे मुद्दे मांडताना दिसतात –
“पत्रकारांनी तटस्थ असले पाहिजे. त्यांनी कोणत्याही भूमिकेचे, विचारसरणीचे बांधील असू नये. त्यांनी नेहमी न्यायाची बाजू घ्यायला हवी. त्यांनी पक्षपाती असता कामा नये.” – एक ज्येष्ठ संपादक.
“कार्यकर्त्यांनी नेहमी मन खुले ठेवले पाहिजे. विचारांची झापडं लावता कामा नयेत. वैचारिक गुलामगिरीच्या आजच्या माहोलात आपले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे. ” – एक कष्टकऱ्यांच्या चळवळीतून एनजीओत गेलेले कार्यकर्ते.
“माझी कोणतीही भूमिका नाही. …मी कोणत्याही हेतूने लेखन करत नाही. जे विचार मनात येतात ते कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेच्या आधारे शब्दबद्ध करतो. एका कादंबरीत एक विचार मांडला असेल, तर दुसऱ्या कादंबरीत त्याच्या विरोधीही विचार असू शकतो. ...माझं लिखाण हे केवळ साहित्यमूल्यांची जोपासना करणारं असतं. ...ठरावीक विचारसरणीतून लिहिलेलं साहित्य काळाच्या कसोटीवरही टिकत नाही. ...आपल्याकडील साहित्यिक वैचारिकतेत वाहत जातात. अशा प्रचारकी साहित्याला मूलभूत साहित्य म्हणता येत नाही.” – एक सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक.
‘आमची काही भूमिका नाही’ हीही एक भूमिका म्हणजेच विचारप्रणाली असते. प्रचलित विचारप्रणालींच्या ठळक वर्गवारीत कदाचित ती नसेल. त्या अर्थाने ती त्यातील एखाद्या वर्गवारीला बांधलेली नसेल. कदाचित एकाचवेळी अनेक वर्गवाऱ्यांतील विविध छटा धारण करत असेल. पण म्हणून ती भूमिका वा विचारप्रणाली नाही असे असू शकत नाही. माणसाच्या विचारप्रक्रियेच्या नैसर्गिक रचनेत भूमिका नसणे, विचारप्रणाली नसणे बसू शकत नाही. माणूस आणि विचारप्रणाली अविभाज्य आहेत, हे आपण वर पाहिले आहेच.
‘पत्रकारांनी तटस्थ असले पाहिजे’ असे म्हणताना सध्याच्या ठळक विचारसरणींपैकी एखादीला बांधून घेऊ नये असे त्या ज्येष्ठ संपादकांना म्हणावयाचे असू असते. कारण पत्रकारांनी ‘न्यायाची बाजू’ घ्यावी असा जो पुढचा सल्ला ते देतात, त्यात ‘न्यायाची बाजू कोणती’ ही भूमिका आहे. हाथरस असो वा अन्य ठिकाणच्या पीडितांच्या न्यायासाठी त्यांच्याविषयीची खरी स्थिती समाजासमोर आणू पाहणाऱ्या पत्रकारांना जेरबंद केले जाते. अनेकांना कित्येक वर्षे जामीन मिळत नाही. त्यांच्या मागे त्यांचे संपादक आणि माध्यमेही अगदी अपवादाने उभी राहिलेली दिसतात. एकदा न्यायाची बाजू ठरली की पक्षपात हा आलाच. मग ‘पक्षपाती असू नये’ हा सल्ला विसंगत ठरतो. पक्षपात निरपेक्ष असावा, स्वतःचा स्वार्थ लक्षात घेऊन नसावा, ज्याच्यावर खरोखर अन्याय होतो आहे त्याच्या बाजूने असावा, असे म्हणणे असायला हवे. नव्या, हुन्नरी पत्रकारांपुढे केवळ तटस्थ राहावे, विचारसरणीला बांधून घेऊ नये, पक्षपाती असू नये...असे म्हटल्याने त्यांचा गोंधळ होतो. काय मूल्य घेऊन पुढे जावे हे त्यांना कळत नाही. सोयीचे ते कर, कोणाशीही एकनिष्ठ राहू नको, ना विचारांशी-ना समूहांशी असाच त्याला अर्थ लागण्याची शक्यता असते. त्यामुळे भूमिका नको हे प्रचारणे हीच एक प्रतिगामी भूमिका वा विचारप्रणाली ठरते.
माझी कोणतीही भूमिका नाही असे म्हणणारे सुप्रसिद्ध साहित्यिक त्यांच्या मुलाखतीतून आपली भूमिका (किंवा अनेक भूमिका) मांडतात. एका कादंबरीत एक विचार तर दुसऱ्या कादंबरीत दुसरा विचार मी मांडतो असे ते म्हणतात. याचा अर्थ दोन वेगळ्या कादंबऱ्यांत दोन वेगळ्या भूमिका ते मांडतात असे फार तर म्हणू. पण भूमिकाच मांडत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. माझी कोणतीही भूमिका नाही याऐवजी माझी कोणतीही एक भूमिका नाही, असे त्यांनी म्हणणे योग्य ठरले असते. ‘प्रचारकी साहित्य हे मूलभूत साहित्य नव्हे’ किंवा ‘वैचारिकतेत साहित्यिकांनी वाहत जाणे अयोग्य’ ही त्यांची भूमिका आहे. तिचा विचार करावा असे मलाही वाटते. ‘ठरावीक विचारसरणीतून लिहिलेले साहित्य काळाच्या कसोटीवर टिकत नाही’ हीही त्यांची भूमिका आहे. पण मला ती अमान्य आहे. जगातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या साहित्यिकांत बहुधा अशा विचारसरणीवाल्या साहित्यिकांचीच संख्या अधिक भरेल. विचारसरणी व्यक्त करणारा प्रबंध लिहिणे व विचारसरणी असलेल्या लेखकाने साहित्यकृती निर्मिणे या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रबंधाला साहित्यमूल्य नसते. साहित्याला ते असते. त्याच्यावरुनच साहित्यकृतीचे मापन करावे. पाऊणशे वर्षांपूर्वी आपल्याकडे झालेल्या ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला’ या वादात ती कला असायला हवी याबाबत कोणाचेच दुमत नव्हते. तेच इथे आहे. लेखक कोणती विचारसरणी बाळगतो यापेक्षा तो प्रसवत असलेले साहित्य हे ‘साहित्य’ आहे का याबाबत या मोठ्या साहित्यिकांनी दक्ष राहायला हवे.
वैचारिक गुलामगिरीपासून कार्यकर्त्यांना मुक्त राहण्याचा एनजीओच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सल्ला हाही खरे म्हणजे डाव्या विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला आहे. फंडिंगवरच सर्व गुजारा, चैन व कार्यकर्तेपणाची प्रतिष्ठा विसंबून असणाऱ्यांसाठी तो इशारा व दिलासा आहे- समाजोपयोगी काम जरुर करा, काही अधिकारांची आंदोलनेही उठवा. क्रांतिगीते गा. विद्रोही घोषणा द्या. पण आपापले रिंगण सोडू नका. व्यापक राजकीय पर्याय तयार करु नका. तथापि, आजच्या केंद्र सरकारला एनजीओंचं एवढंही काम अंगावर येतं. ते त्यांच्या मागे हात धुवून लागले आहे.
भूमिका वा विचारप्रणाली नको हा चकवा आहे. माणूस विचारानेच चालतो, त्या विचारांची एक व्यवस्था असते. ती असंघटित, कच्ची वा स्वैरही असू शकते. पण ती असतेच. विचारप्रणाली नसते असे कोणीही सापडू शकत नाही. माणूस आहे म्हणजे त्याची विचारप्रणाली आहे. ती नसणे म्हणजे कोमात जाणे होय. त्यामुळे भूमिका वा विचारप्रणाली नको किंवा आता विचारप्रणाल्यांचा काळ संपुष्टात आला आहे, हा प्रचार केवळ भूलभूलैया आहे. त्यापासून सावध राहायला हवे. ज्यांना ही विषम समाजव्यवस्था बदलून न्याय्य पायावर तिची उभारणी करायची आहे, त्यांनी तर या गोंधळापासून पूर्ण मुक्त असायला हवे. इतरांनाही मुक्त करायला हवे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुरुष उवाच, दिवाळी २०२२)
Like
Comment
Share