Wednesday, December 23, 2009

निर्णय


क्षात्रकुलोत्‍पन्‍न मराठा समाजाचे परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्‍कूल, ज्‍यु. कॉलेज व अध्‍यापक विद्यालय यांच्‍या संयुक्‍तपणे निघणा-या विकास या वार्षिकांकात 1983 साली प्रसिद्ध झालेली ही माझी कथा. मी त्‍यावेळी अध्‍यापक विद्यालयात शिकत होतो. सुरेश सावंत

खरे तर चारचौघांसारखं गवत खाणारं आयुष्‍य त्‍याने केव्‍हाच नाकारलं होतं. लग्‍न, पत्‍नी, मुले, संसार या गोष्‍टी आपल्‍यासाठी नाहीतच अशी त्‍याने आपल्‍या मनाची पक्‍की धारणा करुन घेतली होती. माणूस जन्‍माला येतो, मोठा होतो, लग्‍न करतो, संसार करतो आणि मरुन जातो. अखेर यातून तो मिळवतो काय ?

त्‍याला असे चार‍ भिंतींच्‍या आत सडायचे नव्‍हते. त्‍याला बेबंद आयुष्‍य हवे होते. स्‍वतःच्‍या मस्‍तीत धुंदपणे जगायचे होते. स्‍वयंप्रकाशित होऊन जगायचे होते. पण स्‍वतःच्‍या कल्‍याणासाठी, सन्‍मानासाठी नव्‍हे; तर त्‍याच्‍या भोवताली पसरलेल्‍या समाजासाठी, दीनदलितांच्‍या उद्धारासाठी. जन्‍मापासून आजतागायत बकाल झोपडपट्टीतले सगळे संस्‍कार रिचवतच तो मोठा झाला होता. पण ह्या आगीत तो लाकडासारखा जळून खाक झाला नाही, तर धातूसारखा तेजाळून निघाला.

परंतु जसजसा तो मोठा होत गेला, तसतसा नको तेवढा संवेदनशील होत गेला. पाने, फुले, समुद्र, आकाश, तारे यांच्‍याविषयी बरंचसं अनाकलनीय जाणू लागला. हळूवार, तरल स्‍वप्‍नांमध्‍ये रमू लागला. पण फक्‍त रमूच लागला. कारण भोवतालच्‍या समाजव्‍यवस्‍थेला तो पुरता जाणून होता. म्‍हणूनच स्‍वतःची तरलता तो स्‍वतःतच दाबत होता नि ह्या व्‍यवस्‍थेवर वीज होऊन कोसळण्‍याची तयारी करीत होता.

आणि...आणि अचानक त्‍याला ती भेटली. खरं तर तो मुलींना चांगलं ओळखून होता. आयुष्‍याचं हे वळणच असं फुलपाखरी स्‍वप्‍नांचं असतं. ह्या मुली येतात. पण त्‍यांना हवं असतं बागडणं. काही क्षण बागडतात नि आल्‍या तशा निघूनही जातात. पण जाता जाता एक आयुष्‍य, ध्‍येय उध्‍वस्‍त मात्र करतात.

पण ही तशी नव्‍हती. भावनिक, तरल संवेदनशील मनाची अन् अत्‍यंत समजुतदार, खळाळणा-या निर्झरासारखी.

तो स्‍वतःस आवर घालण्‍याचा प्रयत्‍न करतो. हे सगळे भास आहेत. आपल्‍या आयुष्‍यात अशी कोणी येणंच शक्‍य नाही. आपलं आयुष्‍य म्‍हणजे एक विराण वाळवंट. तिथे असं एखादं ओअॅसिस......छे! शक्‍यच नाही !

पण त्‍याने स्‍वतःला कितीही समजावण्‍याचा प्रयत्‍न केला असला तरीही तो त्‍याच्‍या नकळत गुंतत चालला होता.

स्‍त्री, पुरुषाची अर्धांगिनी. तिच्‍याशिवाय पुरुषाला पूर्णत्‍व नाही, यशाची प्रेरणा पुरुषाला मिळते ती स्‍त्रीच्‍या जीवापाड प्रेमातूनच. सावित्रीबाई, रमाबाई, कस्‍तुरबा ह्या साध्‍वी स्त्रियांच्‍या आधारानेच तर फुले, आंबेडकर, गांधी यशस्‍वी आयुष्‍याची वाटचाल खंबीरपणे करु शकले. महात्‍मा होऊ शकले. समाजाला घडवू शकले.

मग आपल्‍या आयुष्‍यात स्‍त्रीमुळे कमकुवतपणा येईल का ? आपली ध्‍येये कोलमडून पडतील का ? नाही. उलट ती आपल्‍या आयुष्‍यात बहार फुलवू शकेल. आयुष्‍याच्‍या नौकेचं सुकाणू समर्थपणे सांभाळू शकेल.

खरंच आपणासही आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक वादळात खंबीरपणे साथ देईल अशीच सोबतीण हवी होती. यासाठी लागणारे सगळे गुण तिच्‍यात ठासून भरलेले आहेत. मग....? .....?

आता त्‍याने स्‍वतःस पूर्णपणे झोकून दिले. तीही त्‍याच्‍यात सामावून गेली. जगाची जाणीवच दोघं विसरुन गेली.

संध्‍याकाळी समुद्रावर ती दोघं जायची. सांध्‍यमेघांमध्‍ये स्‍वप्‍ननगरी वसवायची. कलत्‍या सूर्याच्‍या पाण्‍यावरील सुवर्णांकित चमचमत्‍या राजमार्गावरुन बेभान होऊन धावायची. विशेष म्‍हणजे ती दोघंही कवितांच्‍या प्रदेशात वावरणारी. त्‍यामुळे एकूण बहारच !

अन् एक दिवस.

ए, मला तुझ्या घरी घेऊन चल ना !’

तो एकदम दचकला. घर.......बकाल झोपडपट्टीतलं ते खुराडं. खुराडं तरी सुबक. गरजांच्‍या जाणिवेनुसार बांधलेलं. पण हे-

तसं त्‍याने तिला सगळं सविस्‍तरपणे सांगितलं होतं. घर, परिस्थिती, ध्‍येय वगैरे. आणि तिनेही ह्या सगळ्याला तोंड देण्‍याची केव्‍हाची तयारी केली होती. तुझ्या प्रेमाखातर मी सर्वस्‍वाची होळी करुन तुला साथ देईन. आयुष्‍याच्‍या रणांगणात तुझ्या खांद्याला खांदा भिडवून लढा देईन. तुझ्या दारिद्र्याशी मला काहीही सोयरसुतक नाही. फक्‍त तुझ्या यशस्‍वी आयुष्‍याची भागिदारी मला पत्‍करायची आहे, असेही तिने त्‍याला एका कलत्‍या वेळी सांगितले होते नि तोही तिच्‍या त्‍या उदात्‍त विचारसरणीने आषाढातील मेघांप्रमाणे भरुन आला होता.

पण तरीही तो मनातून दचकला. शंकेची पाल अस्‍पष्‍टशी चुकचुकली..... पण नाही! ती कमकुवत नाही. आपलं मनच शंकेखोर!

आणि त्‍याने तिला आपलं घर, परिसर दाखवून आणले. गटारावरुन उड्या मारताना तिची उडणारी त्रेधा त्‍याला बघवेना. घरात चटईवर बसवताना साधी खुर्चीही आपल्‍याकडे असू नये, याचे त्‍याला मनस्‍वी दुःख झाले. विशेषतः तिच्‍या चेह-यावरचे बदलणारे भाव तर त्‍याला भयानक अस्‍वस्‍थ करु लागले.

तिला निरोप दिल्‍यानंतर तो ह्याच अस्‍वस्‍थतेत बुडून गेला होता. बोलणं सोपं असतं. पण करणं कठीण. कथा-कादंब-यांमध्‍ये श्रीमंत नायिका गरीब नायकासाठी सर्वस्‍वाचा त्‍याग करुन येते. पण हे वाचणं सोपं असतं; प्रत्‍यक्ष कृतीस अवघड. हे तारुण्‍याचे चार-दोन क्षण उडून जातील. पुढे आयुष्‍याशी समायोजन साधणे कसं शक्‍य होईल ? ती पांढरपेशा कुटुंबात वाढलेली. तिच्‍या गरजा वेगळ्या, आकांक्षा वेगळ्या, शिवाय क्रूर जातिव्‍यवस्‍थेने नाडलेल्‍या हिंदू समाजातील संस्‍कारांनी ती जखडलेली.

खरंच ती करेल का याचा भेद ? आपले आयुष्‍य म्‍हणजे एक अग्निकुंड. ती टाकेल यात उडी ? आहे तिच्‍यात एवढं धैर्य ?

पण हे एवढं आपण केलंच का ? काय हक्‍क आहे आपणास एका कळीला अकाली कोमेजवायचा ? तिला उमलण्‍यास तिच्‍या योग्‍य अशी बागच हवी. आपले रेताड काय कामाचे ?

नको. नकोच ! तिला आपण सांगून टाकू सरळ की, तू तुझ्या मार्गाने जा. माझ्या प्रदेशाकडे कधीही फिरकू नकोस.

पण हे सांगणंही तेवढं सोपं नव्‍हतं. आयुष्‍यात त्‍याने पहिल्‍यांदाच, तेही उदात्‍त आकांक्षा बाळगून कोणावर तरी प्रेम केलं होतं. स्‍वप्‍नांचे इमले उभारले होते; पण पांढरपेशा संसाराचे नव्‍हे. त्‍या संसाराच्‍या नाट्यातील एक बाहुली म्‍हणून त्‍याला नको होती ती. समाज संग्रामात उतरण्‍यास त्‍याला हवी होती ती सावित्रीबाई फुले म्‍हणून. कस्‍तुरबा गांधी म्‍हणून. रमाबाई आंबेडकर म्‍हणून.

त्‍याच्‍या डोक्‍यात भयानक गुंता माजला होता. आपण असा विचार का करतोय ? ती तशी नाही. ती इतकी डरपोक नाही. आपल्‍या मनाला समजू शकणारी आहे ती. पण... आज तिच्‍या चेह-यावरचे बदललेले भाव..?

त्‍या संध्‍याकाळी तो तिला गाठतोच. ती काहीशी गंभीरच असते. दोघंही समुद्र किना-यावर नेहमीच्‍या ठिकाणी येऊन बसतात.

समुद्रावर सांज गडद होत चाललेली. सूर्य अस्‍तास गेलेला. तो तिला सरळ विचारतो-

इतकं पाहूनही तू तयार आहेस माझ्याशी लग्‍न करायला ?’

ती काहीच बोलत नाही. तो पुन्‍हा विचारतो-

बोल तू तयार आहेस ?’

तरीही तिचे मौन.उत्‍तरोत्‍तर गडद होत चाललेल्‍या कातरवेळेसारखी ती गहिरी होत चाललेली...


No comments: