Friday, November 7, 2014

दलित अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी

दलित अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठीच्या उपायांमधील एक कळीचा उपाय बाबासाहेबांचे एक सहकारी व आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते मांडत असत त्याप्रमाणे 'गावकुसाच्या आतल्या व गावकुसाच्या बाहेरच्या समतावाद्यांची एकजूट' हाच आहे, असे मला वाटते.
सूचना बाळबोध वाटेल, पण माणसातील 'माणसाला', त्याच्या विवेकाला, त्याच्यातील सत्प्रवृत्ततेला साद घालणारे, वाईटाविरोधी संघटितपणे उभे राहण्याचे 'संतपद्धतीचे' आवाहन करणारे सवर्णांचा पुढाकार असलेले जथे-यात्रा संवेदनशील, अत्याचारप्रवण भागांमध्ये का निघू नयेत? मनात अनेक जातीय किल्मिषे असणाऱ्या सर्वांचाच अशा हत्यांना पाठिंबा असतो असे नाही. आज ही माणसे गप्प, तटस्थ राहतात. 'मतभेद, भांडणे चर्चेने वा कायद्याने सुटली पाहिजेत, कायदा हातात घेता कामा नये, अशी अमानुष कृत्ये तर होताच कामा नयेत', असे ठामपणे सांगणारी कृतीशील माणसे तयार करणे अगदी अशक्य आहे का? ग्रामसभा, शाळा, काॅलेजे, महिला मंडळे, बचत गट, युवक मंडळे, उत्सव मंडळे, देवळांच्या कमिट्या अशा अनेक मंचांवर माणसांशी संपर्क करुन, फाटे फोडणाऱ्या अन्य कोणत्याही चर्चा न करता केवळ वरील मर्यादित भूमिकेवर लोकांना संघटित करणे, जाहीर शपथांचे कार्यक्रम करणे, शांतता समित्या तयार करणे शक्य आहे का? ... पूर्वी असे उपक्रम अनेक विषयांबाबत झालेले आहेत. स्त्री मुक्ती संघटनेने राज्याच्या तसेच देशाच्या अनेक भागांत काढलेल्या स्त्री-पुरुष समानता यात्रांमध्ये सहभागी असताना तसेच मुंबईतील ९२-९३ च्या दंगलींत राष्ट्रीय एकता समितीत काम करत असताना मीही हा अनुभव काही प्रमाणात घेतलेला आहे. अधिक सखोल सामाजिक-राजकीय मांडणी करणाऱ्या आंदोलनांचे महत्व आहेच. त्यांना पर्याय म्हणून नव्हे, तर पूरक म्हणून या उपक्रमाचा विचार करता येणे शक्य आहे.

No comments: