Sunday, August 2, 2015

याकूबचा अंत्यविधी

याकूबचे शव माहीमला येणार व तिथून ते अंत्यविधीसाठी ६ वा. मरिन लाईन येथील बडा कबरस्तानमध्ये नेले जाणार असे जाहीर झाले होते. अंत्ययात्रेला मात्र बंदी होती. या दोन्ही ठिकाणचा माहौल पहावा, मुस्लिम समाजाच्या मनःस्थितीचा अंदाज घ्यावा म्हणून मी गेलो. निलेशशीही येण्याचे बोललो होतो. त्याला सरळ मरिन लाईनलाच यायला सांगितले होते. माहीमला सव्वा चारला पोहोचलो. तर मी पोहोचण्याच्या १० मिनिटे आधीच याकूबचे शव सी लिंकवरुन नेण्यात आल्याचे कळले. त्याच्या घराच्या व माहीम चर्चपर्यंतच्या परिसरात हजारो लोक जमले होते, असे आमच्याशी संबंधित तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या मते हे लोक फक्त माहीमचे नव्हते. खूप लोक बाहेरुन आले होते. ते 'याकूब मेमन अमर रहे'च्या घोषणा देत होते. स्त्रिया अशा प्रसंगात कमी असतात. पण इथे स्त्रियाही लक्षणीय होत्या. त्याही घोषणा देत होत्या. या कार्यकर्त्यांना हा माहौल नवीन होता. त्यांना वातावरणात खूप ताण व काहीशी भीतीही जाणवत होती. याकूब मेमनच्या घराजवळ राहणाऱ्या एका कार्यकर्तीशी बोललो. तिच्या म्हणण्यानुसार याकूब मेमन गुन्हेगार होता, हे कोणाच्याही गावी नव्हते. मुस्लिम म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, इतर समाजाच्या तुलनेत आम्हाला असेच लक्ष्य करण्यात येते अशी रागाची भावना लोकांच्या मनात ठसठसते आहे. हे ठसठसणे काय रीतीने बाहेर येईल, याबाबत या कार्यकर्तीला भय वाटते.

नंतर आम्ही त्या परिसरातून, त्याच्या घराच्या जवळून एक चक्कर टाकली. त्यावेळी खूप विरळ लोक रस्त्यावर होते. पोलीस बंदोबस्त मात्र जोरात होता. तिथून मी मरिन लाईनला बडा कबरस्तानला गेलो. निलेश माझ्या आधीच तिथे गेला होता. मी प्रवासात असतानाच त्याच्याकडून कळले की, तो तिथे जाण्याआधीच याकूबचा दफनविधी झालेला होता, लोक परतत होते. मी ६ च्या दरम्यान पोहोचलो. मलाही लोक व पोलीस तसेच अन्य सुरक्षा दलाचे लोक परतताना दिसले. याचा अर्थ जाहीर वेळेच्या आधीच अंत्यविधी झाला होता.

बडा कबरस्तानच्या आत डोकावलो. पण लोक बाहेर निघत असल्याने आता थांबण्यात व अधिक आत जाण्यात काही अर्थ नव्हता. मग मीही परतलो. मरिन लाईन स्टेशनवर आलो तर पलिकडे समुद्र व ढग जमून आलेले दिसले. ट्रेन पकडण्याऐवजी सरळ समुद्रावर गेलो. पाऊस सुरु झाला. वारा व पाऊस अंगावर घेत कठ़ड्यावरून चालत नरिमन पॉईंटवरुन चर्चगेट स्टेशनला आलो. रात्रभर जागलो होतो. पहाटे सव्वापाचच्या न्यायालयाच्या निकालानंतर आडवा झालो. पण ताठरलेपणाने काही झोप येत नव्हती. आता जे व्हायचे ते झाले होते. याकूब संपला व दफनही झाला. त्यामुळे तसेच वारा-पाऊस-समुद्र-चालणे यामुळे माझ्या अंगातला-मनातला ताणही विरु लागला होता. आता घरी आलो. मोकळे वाटते आहे. पुढे जे होईल, त्याला सामोरे जायला निश्चिंत झालो आहे.

(३० जुलै २०१५)

No comments: